मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी सत्यनारायण पूजा, सप्तशतीचा पाठ, लघुरुद्र, हे सर्व  पुरुष करत असत. 1975 साली थत्ते मामांनी स्त्रियांनी हे शिकायला हरकत नाही असा विचार मांडला. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच तेव्हाच्या समाज रचनेनुसार हे स्वाभाविक होते. तरीसुद्धा मामांनी उद्यान प्रसाद पुणे येथे खास स्त्रियांसाठी हे वर्ग सुरू केले.

स्वाभाविकच स्त्रियांचा प्रतिसाद अल्प होता. स्त्रियांच्या मनातील भीती, घरातून विरोध, वेळ कसा काढायचा, शिवाय संस्कृत भाषा…. इत्यादी अनेक अडचणी समोर दिसत होत्या. मात्र काही स्त्रियांना घरातून परवानगी मिळाली आणि त्या वर्गाला आल्या.

पहिली बॅच सुरू झाली. त्यात आमच्या गुरु मालती जोशी होत्या. सदाशिव पेठेत अनाथ विद्यार्थी गृहासमोर असलेले नरसिंहाचे देऊळ बाईंचे आहे.  त्या तिथेच राहत आहेत. मुळातच हुशार असल्याने त्या भराभर शिकत गेल्या.

थत्ते मामांनी सर्वांना प्रार्थने पासून सर्व  शिकवले. संसाराची  जबाबदारी सांभाळून हे सर्व तोंड पाठ करायचे होते. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली .

आठ दहा बायका हे शिकल्या.थत्ते मामांना अतिशय आनंद झाला. जोशीबाई अनेक वर्ष  थत्तेमामांबरोबर   पुजा पाठ करायला जात होत्या.

काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचे वर्ग त्यांच्या घरी सुरू केले. अत्यंत अल्पशा फी मध्ये त्या  शिकवत असत.

बाईंचा एक अलिखित नियम होता..

की जे शिकवलं असेल ते पुढच्या वेळी म्हणून दाखवायचे .आम्ही 55 ते 60 वर्षाच्या होतो. खूप वर्षांनी पुस्तकं अभ्यासासाठी हातात घेतली होती. पाठ असलं तरी बाईंच्या समोर म्हणून  दाखवताना  चुका व्हायच्या.

बाई गप्पा मारायच्या, चहा करायच्या, लाडू खायला द्यायच्या पण पाठांतर केलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कडक शिस्त असायची.चुकलं तर परत म्हणावे लागे.

बाईंची आम्हाला भिती वाटायची. नंतर त्यात गोडी वाटायला लागली. पाठांतराची सवय झाली….प्रेरणा द्यायला बाई होत्याच…

अनेक जणी बाईंच्या कडे शिकून तयार झाल्या . बाईंच्या बरोबर आम्ही पुण्यात आणि बाहेरगावी कार्यक्रम केले.  त्यातल्या काहीजणी आता इतरांना शिकवत आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी  मृत्युंजयेश्वर मंदिरात आम्ही रुद्र म्हणायला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात एके दिवशी सारसबाग गणपती समोर ब्रह्मणस्पती म्हणायला जातो.  बाईंच्या बरोबर देवीच्या देवळात सप्तशतीचे पाठ  करायला जातो हे सर्व सेवा म्हणून करतो.हे  बाईंच्या मुळे शक्य झाले आहे.

आज शांतपणे घरी बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त ,त्रिसुपर्ण, विष्णुसहस्त्रनाम, शीव महिम्न  म्हणताना   अपार आनंद होतो … बाईंनी आम्हाला हा बहुमूल्य ठेवा दिलेला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी थत्ते मामांनी बायकांच्यावर विश्वास ठेवला. आणि  त्या पण हे करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. आज त्यांची पण आठवण येत आहे. थत्ते मामांना माझा विनम्र नमस्कार.

त्यांनी लावलेले हे झाड आज बहरलेले आहे .आज अनेक स्त्रिया पौरोहित्य करत आहेत .

याचे श्रेय मामांना जाते.

खरं तर घरं संसार, मुलं बाळं, आला गेला ..हे सगळं सांभाळून बाईंनी हे शिकवायला सुरुवात केली हे किती विशेष वाटते.

शिवाय त्याचा कुठेही गर्व अभिमान नाही शांतपणे प्रेमाने त्या शिकवत  राहिल्या.

बाईंच्या 95 व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जानेवारीला आम्ही सर्वांनी परत एकदा बाईंचा घरी सगळ्यांनी जमुन  वर्ग भरवला .

स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हंटले. बाई आमच्याबरोबर म्हणत होत्या.

शेवटी बाईंनी आशीर्वाद मंत्र म्हटला तेव्हा डोळे भरून आले होते. ..

अशा गुरू लाभल्या हे आमचे परमभाग्य.

त्या माझ्या बाईंना माझा त्रिवार साष्टांग नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चर्पट पंजरिका स्तोत्र : मराठी भावानुवाद – रचना : आदि शंकराचार्य – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

चर्पट पंजरिका स्तोत्र : मराठी भावानुवाद – रचना : आदि शंकराचार्य – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

दिनमपि रजनी सायं प्रात: शिशिरवसन्तौ पुनरायात: ।

काल: क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुच्चत्याशावायु: ।। १ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

प्राप्ते संनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ् करणे ।। (ध्रुवपदम्)

*

रात्रीनंतर दिवस येतसे दिवसानंतर रात्र

ऋतूमागुती ऋतू धावती कालचक्र अविरत

काळ धावतो सवे घेउनी पळे घटिका जीवन

हाव वासना संपे ना जरीआयुष्य जाई निघुन ॥१॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

काळ येता समीप घोकंपट्टी रक्षण ना करते ॥ध्रु॥

*

अग्रे वह्नि: पृष्ठे भानू रात्रौ चिबुकसमर्पितजानु: ।

करतलभिक्षा तरुतलवासस्तदपि न मुच्चत्याशापाश: ।। २ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुढूनी अग्नी  दिवसा मागे भास्कर देहा भाजुन घेशी

हनुवटी घालुन गुढघ्यामध्ये थंडीने  कुडकुडशी

भिक्षा मागुन हातामध्ये तरुच्या खाली तू पडशी

मूढा तरी आशेचे जाळे गुरफटुनीया धरिशी ॥२॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

यावद्वित्तोपार्जनसक्तस्तावन्निजपरिवारो रक्त: ।

पश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे ।। ३ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

सगेसोयरे साथ देउनी मागुती पुढती घुटमळती

हाती तुझिया जोवर लक्ष्मी सुवर्णनाणी खणखणती

धनसंपत्ती जाता सोडुन वृद्ध पावले डळमळती

चार शब्द बोलाया तुजशी संगे सगे कोणी नसती ॥३॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुकृतवेष: ।

पश्यन्नपि च न पश्यति लोको ह्युदरनिमित्तं बहुकृतशोक: ।। ४ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

जटाजूटधारी मुंडित कुंतल करुनीया कर्तन

कषायवर्णी अथवा नानाविध धारण करिशी वसन

नखरे कितीक तरी ना कोणी पर्वा करिती  तयाची

जो तो शोक चिंता करितो अपुल्याच उदरभरणाची ॥४॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

भगवद्गीता किंचिदधीता गंगाजल लवकणिकापीता ।

सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यम: किं कुरते चर्चाम् ।। ५ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

मद्भगवद्गीता करता मनापासुनीया पठण

किंचित असेल केले जरी  गंगाजलासिया प्राशन

एकवार जरी श्रीकृष्णाशी अर्पण केले असेल अर्चन

यमधर्मा ना होई  धाडस करण्यासी त्याचे चिंतन ॥५॥

*

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

अंगं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम् ।

वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुच्चत्याशा पिण्डम् ।। ६ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

उरले नाही देहा त्राण केशसंभार गेला पिकुन

मुखात एकही दंत न शेष गेले बोळके त्याचे बनुन

जराजर्जर देहावस्था फिरण्या दण्डाचे त्राण

लोचट आशा तरी ना सोडी मनासिया ठेवी धरुन ॥६॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

बालास्तावत्क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्त: ।

वृद्धस्तावच्चिन्तामग्न: पारे ब्रह्मणि कोऽपि न लग्न: ।। ७ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

लहानपण मोहवी सदैव खेळण्यात बागडण्यात

यौवन सारे व्यतीत होते युवती स्त्री आसक्तीत

जराजर्जर होता मग्न विविध कितीक चिंतेत

परमात्म्याचे परि ना कोणी करिते कधीही मनचिंतन ॥७॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।

*

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् ।

इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ।। ८ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुनः पुनश्च  जन्म घेण्या मातेचा गर्भावास

पुनः पुनश्च मृत्यू येई जीवनास संपविण्यास

दुष्कर अपार भवसागर हा पार तरुनिया जाण्यास

कृपादृष्टीचा टाक मुरारे कटाक्ष मजला उद्धरण्यास ॥८॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुनरपि रजनी पुनरपि दिवस: पुनरपि पक्ष: पुनरपि मास: ।

पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुच्चत्याशामर्षम् ।। ९ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

दिवस मावळे उदय निशेचा पुनरपि मग येई दिवस

पुनरपि येती जाती पुनरपि पक्षापश्चात मास

अयना मागुन अयने येती वर्षामागून येती वर्षे

कवटाळुन तरी बसशी  मनात आशा जोपासुनीया ईर्षे ॥९॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

वयसि गते क: कामविकार: शुष्के नीरे क: कासार: ।

नष्टे द्रव्ये क: परिवारो ज्ञाते तत्त्वे क: संसार: ।। १० ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

येता वयास ते वृद्धत्व कसला कामविकार

शुष्क होता सारे तोय कसले ते सरोवर

धनलक्ष्मी नाश पावता राही ना मग परिवार

जाणुनी घे या तत्वाला असार होइल संसार ॥१०॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्यामायामोहावेशम् ।

एतन्मांसवसादिविकारं मनसि विचारय बारम्बारम् ।। ११ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

पुष्ट उरोज खोल नाभी नारीचे ही माया

मोहविण्यासी नर जातीला आवेश दाविती त्या स्त्रिया

असती ते तर मांस उतींचे विकार फुकाचे भुलवाया

सुज्ञ होउनी पुनःपुन्हा रे विचार कर ज्ञानी व्हाया ॥११॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कस्त्वं कोऽहं कुत आयात: का मे जननी को मे तात: ।

इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् ।। १२ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कोण मी असे तूही कोण अनुत्तरीत अजुनी हे प्रश्न

जननी कोण  ठाउक नाही असे पिता वा तो कोण

विचार विकार जीवनातले असती भासमय स्वप्न

जीवन आहे असार सारे जाणुनी होई सज्ञान ॥१२॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

गेयं गीतानामसहस्त्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्त्रम् ।

नेयं सज्जनसंगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम् ।। १३ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

नित्य पठण करी भगवद्गीता तथा विष्णुसहस्रनाम

श्रीपाद रूपाचे मनी निरंतर करित रहावे रे ध्यान 

साधूसंतांच्या सहवासी करी रे चित्तासी मग्न

दीनदुबळ्यांप्रती धनास अपुल्या करित रहावे दान ॥१३॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत्पृच्छति गेहे ।

गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये ।। १४ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

काया जोवर धरून आहे अपुल्या ठायी प्राण

सगे सोयरे कुशल पुसती आपुलकीचे ध्यान

जीव  सोडता देहासि तो पतन होउनि निष्प्राण

भये ग्रासुनी भार्या ही मग जाई तयासिया त्यागून ॥१४॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

सुखत: क्रियते रामाभोग: पश्चाद्धन्त शरीरे रोग: ।

यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुच्चति पापाचरणम् ।। १५ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

काल भोगतो सुखात असता कामात उपभोगात

तदनंतर किती व्याधी ग्रासत पीडायासी देहात

शरण जायचे मरणालागी अखेर देहत्यागात

तरी न सोडुनी मोहा जगती सारे पापाचरणात ॥१५॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

रथ्याचर्पटविरचितकन्थ: पुण्यापुण्यविवर्जितपन्थ: ।

नाहं न त्वं नायं लोकस्तदपि किमर्थं क्रियते शोक: ।। १६ ।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

चार दिसांचे चंचल जीवन नशिबी चादर चिखलाची

पंथा भिन्न अनुसरले चाड मनी पापपुण्याची

नसेन मी नसशील ही तू नाही शाश्वत काहीही

शोक कशासी फुकाच करिशी जाणुनी घ्यावे ज्ञानाही ॥१६॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम् ।

ज्ञानविहीन: सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन ।। १७।।

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

गंगास्नान करूनिया  वा व्रतवैकल्यांचे पालन

दीनदुबळ्या केलेसी धन जरी अमाप तू दान

कर्मबंधा मुक्ती नाही जाहले जरी शतजन्म

मोक्षास्तव रे एकचि दावी मार्ग तुला ब्रह्मज्ञान ॥१७॥

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते ।।

*

॥ श्रीशंकराचार्यविरचितं चर्पट पंजरिका स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

*

॥ इति श्रीशंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित चर्पट पंजरिका स्तोत्र सम्पूर्ण ॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त ) 

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले ! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

                                 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

                                 लब्ध प्रकाश इतिहास – निसर्ग माने,

                                 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,

                                 बुध्याची वाण धरिले करी  हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच  महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.

तुकोबा  ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 कर्तव्यं मे न विद्यते किंचीत

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम

लेखक :   आचार्य अत्रे.

दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा पट आणि भारत… ☆ अनुवादक – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाचा पट आणि भारत… ☆ अनुवादक – श्री सुनील देशपांडे

सुमारे 63 वर्षांपूर्वीची घटना आज सगळ्यांच्या विस्मृतीत गेली आहे. अर्थात विस्मृतीत गेली असे म्हणणे सुद्धा अवघड आहे. कारण किती जणांना ती सविस्तर माहिती होती?

ॲडमिरल एन कृष्णन हे त्यावेळी भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी जर पुस्तक लिहिले नसते तर ही घटना नक्कीच विस्मृतीत गेली असती. 

१९७१ मध्ये त्यावेळी अमेरिकेने भारताला, पूर्व पाकिस्तान (म्हणजे आत्ताचे बांगलादेश) बरोबर सुरू केलेले युद्ध थांबवा नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील अशी इशारा वजा धमकीच दिली होती. या इशाऱ्याची दखल घेऊन भारताने रशियाकडे सहकार्याची मागणी केली होती. त्यावेळचा हा प्रसंग जवळपास इतिहासातून नामशेष झाला होता. परंतु वरील पुस्तकाने तो कायमचा करून ठेवला आहे.

डिसेंबर १९७१ मध्ये जगातील दोन बलाढ्य लोकशाहीवादी देशांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला धमकी दिलेली होती.

जेव्हा पाकिस्तानचा पराभव समोर दिसत होता त्यावेळी श्री हेनरी किसिंजर यांनी हे युद्ध संपविण्यासाठी आणि भारताला रोखण्यासाठी अमेरिकेचे सातवे आरमार पाठवण्याची शिफारस केली होती. 

हे सातवे आरमार म्हणजे काय होते?

जगातील सगळ्यात मोठे ७५ हजार टनाचे आणि अणुऊर्जेवर चालणारे, ७० युद्ध सज्ज विमानांना घेऊन जाऊ शकणारे त्या काळातील जगातील सर्वात मोठे आणि सर्वश्रेष्ठ असे आरमार होते. 

त्या मानाने भारताकडील सगळ्यात मोठे आयएनएस विक्रांत हे जहाज वीस हजार टनाचे आणि वीस हलकी युद्धविमाने घेऊन जाऊ शकणारे जहाज होते.

बांगलादेश मधील अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी हे आरमार पाठवले जात असल्याचे अमेरिकेकडून जरी वरकरणी सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने आणि पाकिस्तान सरकारला मदत करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करण्याचा विचार होता.

तेवढ्यात आणखी एक भय वाढवणारी बातमी रशियन गुप्तचरांमार्फत भारत सरकारला मिळाली.

ब्रिटिश सरकारच्या नौदलातील काही जहाजांचा समूह अरबी समुद्राकडे येण्यास निघाला आहे. त्यामध्ये एच एम एस ईगल या विमानवाहू युद्धनौकेचा आणि एचएमएस अलबियन या खतरनाक युद्ध कमांडोज सह येणाऱ्या जहाजांसह आणखी काही प्रचंड संहारक अशा युद्ध नौकांचा  समावेश होता.

भारताला सगळ्या बाजूने कोंडीत पकडून भारतावर दबाव आणून पाकिस्तानला मदत करून बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध दडपून टाकण्याची योजना अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी आखली होती.

खरोखरच हा प्रसंग आंतरराष्ट्रीय दडपणाखाली दडपून जाऊन  आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागण्याचा आणीबाणीचा प्रसंग होता. 

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे सातवे आरमार हिंदी महासागरात येऊन ठेपले सुद्धा.

दुसऱ्या बाजूने ब्रिटनचे आरमार वेगाने अरबी समुद्राकडे कूच करीत होते. 

अत्यंत कसोटीचा क्षण आणि सगळे जग श्वास रोखून परिस्थिती पाहत होते. आणि त्या निर्णायक क्षणाला सुरुवात झाली. अमेरिकेचे सातवे आरमार पूर्व पाकिस्तान कडे सरकू लागले आणि एवढ्यात अमेरिकन आरमाराला प्रचंड मोठा धक्का बसला.

रशियन पाणबुड्या तत्पूर्वीच पाण्याखालून भारताच्या किनाऱ्याच्या जवळपास पोहोचल्या होत्या. त्या एकदम समुद्रातून वर आल्या आणि अमेरिकन सातवे आरमार आणि भारताचा समुद्रकिनारा यामध्ये या पाणबुड्यांची साखळी उभी राहिली. याबाबत अनभिज्ञ असलेले अमेरिकन आरमार गोंधळून गेले. 

सातव्या आरमाराचा ॲडमिरल गोर्डन याने संदेश पाठवला “सर आपल्याला खूपच उशीर झाला आहे. सोविएत आपल्या आधीच येथे पोहोचले आहेत”

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशावेळी नाईलाजाने अमेरिकेच्या सातव्या आरमाराला व ब्रिटिश आरमाराला सुद्धा मागे फिरावे लागले. 

पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सरकारला पाठिंबा देण्यासाठी तिसरे महायुद्ध ओढवून घ्यायचे का? त्यापेक्षा अमेरिकन आरमाराने माघार स्वीकारली. 

भारतीय नौदल व लष्कर आणि त्याचे प्रमुख व सर्वात मुख्य म्हणजे निर्णय घेणाऱ्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, यांच्या धैर्याला आणि आंतरराष्ट्रीय डावपेचांना खरोखरच तोड नाही. 

 यानंतरचा भारताचा विजय आणि बांगलादेशी स्वातंत्र्य हे तर सगळ्यांनाच माहित आहे. परंतु त्यामागे केवढे जगड्व्याळ घटना क्रमांचे, चतुराईचे राजकारणाचे बुद्धिबळ खेळावे लागले हे समजल्यानंतर खरोखरच त्या सर्व घटना क्रमातील सर्वांचाच अभिमान वाटतो. 

— एका इंग्रजी लेखाचा केलेला स्वैर अनुवाद. 

अनुवादक – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।

नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्‌ ॥ ११ ॥

*

रणभूमीवर अपुले आसन

कुश मृगचर्म वस्त्र पसरून

अतिउच्च नाही अति नीच ना

स्थिर तयाची करावी स्थापना ॥११॥

*

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।

उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥

*

आरुढ आसनावरती व्हावे

गात्रे-चित्त क्रिया वश करावे

मनासिया एकाग्र करावे

योगाभ्यासे मन शुद्ध करावे ॥१२॥

*

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।

सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌ ॥ १३ ॥

*

स्थिराचल ठेवुनी कायामस्तकमान 

कायामने अपुल्या अचल स्थिरावुन

नासिकाग्रावरी एकाग्र दृष्टीला करुन

अन्य दिशांना मुळी  ना अवलोकुन ॥१३॥

*

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।

मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥

*

व्रत आचरता ब्रह्मचर्य असावे निर्भय शांत

मनास घालुन आवर व्हावे माझ्या ठायी चित्त ॥१४॥

*

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।

शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥

*

मनावरी संयम योग्याचा निरंतर आत्मा मज ठायी

परमानंद स्वरूपी शांती तयाला निश्चित प्राप्त होई ॥१५॥

*

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।

न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥

*

आहार जयाचा अति अथवा अनशन जो करितो 

अतिनिद्रेच्या आहारी जो वा सदैव जागृत राहतो

सिद्ध होई ना योग तयांना जाणुन घेई कौंतेया

सम्यक आचरणाचे जीवन योगा साध्य कराया ॥१६॥

*

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥

*

युक्त आहार युक्त विहार युक्त यत्न कर्मात 

युक्त निद्रा युक्त जागृति दुःखनाशक योग सिद्ध  ॥१७॥

*

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥

*

अंकित केले चित्त होता स्थिर परमात्म्यात

भोगलालसा लयास जाते तोचि योगयुक्त ॥१८॥

*

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥

*

पवन नसता वहात जैसा दीप न चंचल  

जितचित्त योगी तैसा परमात्मध्यानी अचल ॥१९॥

*

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥

*

योगाभ्यासे निरुद्ध केले चित्त होत उपरत

ध्याने  साक्षात्कारी प्रज्ञा परमात्म्यात संतुष्ट ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कुसुमाग्रज आणि ज्ञानपीठ पुरस्कार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

१७ सप्टेंबर १९८८.. सकाळचे कार्यक्रम नुकतेच आटोपले होते. तात्यासाहेब आपल्या आरामखुर्चीत बसुन वर्तमान पत्र चाळत होते.बाईंच्या तसबिरी समोर लावलेल्या उदबत्तीचा खोलीत मंद दरवळ पसरला होता..मुखाने नेहमीप्रमाणे ‘श्रीराम‌..’असं सुरु होतं.

तोच जिल्हाधिकारी कार्यालयातुन एक कर्मचारी आला.. आणि साहेब येत आहेत.. आपण घरीच आहात ना..हे पहायला मला पाठवलं होतं.. तात्यांनी मान डोलावली..

थोड्या वेळात जिल्हाधिकारी सारंगी साहेब.. आणि कमिशनर अजय दुआ आले.

“अभिनंदन.. आपले नाव ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहे..”

आणि मग १८ सप्टेंबरच्या सर्वच वर्तमान पत्रात ही बातमी अग्रभागी छापली गेली.तात्यासाहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

☆ ☆ ☆ ☆

ज्ञानपीठ कुणाला मिळतं?

ते ठरवण्यासाठी प्रत्येक भाषेतील तीन जणांची एक समिती असते.तिला L.A.C.म्हणतात.म्हणजे लॅंग्वेज ॲडव्हायजरी कमिटी.ही कमिटी आपापल्या भाषेतील एका लेखकाची शिफारस करते.. ज्ञानपीठ साठी.

मराठी साठी असलेल्या या कमिटीतील तिघे जण होते..बाळ गाडगीळ,म‌.द.हातकणंगलेकर, आणि प्रा.सरोजिनी वैद्य‌. या कमिटीने कुसुमाग्रजांच्या नावाची कधीच शिफारस केली नाही.आलटुन पालटुन त्याच त्या तीन नावांची शिफारस करत होती.ती तीन नांवें म्हणजे..पु.ल..विंदा..आणि गंगाधर गाडगीळ.

तर त्या वेळी केंद्रीय मंत्री पी.व्ही‌.नरसिंहराव हे ज्ञानपीठचे अध्यक्ष होते.महाराष्ट्र टाईम्स चे अशोक जैन त्यावेळी दिल्लीत होते.एका भेटीत ते नरसिंह राव यांना म्हणाले..

“जरा आमच्या मराठीकडे बघा एकदा. ‌कितीतरी वर्षात ज्ञानपीठ मराठीकडे आलं नाही.या सन्मानाला योग्य असे कुसुमाग्रज आहेत आमच्या कडे.”

हे ऐकून नरसिंह राव चकीत झाले.त्यांनी विचारलं..

“अहो, पण कुसुमाग्रज तर केंव्हाच वारले ना?”

अशोक जैन तर थक्कच झाले.म्हणाले..

“नाही हो.. कुसुमाग्रज छानपैकी जिवंत आहेत नाशकात.”

त्यानंतर साधारण दोन महिन्यांनी लेखक रवींद्र पिंगे दिल्लीत गेले होते.तिथे त्यांना डॉ.प्रभाकर माचवे भेटले.पिंग्यांना ते म्हणाले..

“अनायासे नरसिंह राव ज्ञानपीठचे अध्यक्ष आहेत.ते मराठी उत्तम जाणतात.तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर तारांचा भडीमार करा.. आम्ही दिल्लीतली बाजु सांभाळतो.मी स्वतः नरसिंहरावांशी बोललोय.डॉ.निशिकांत मिरजकरांनी कुसुमाग्रजांची थोरवी वर्णन करणारा इंग्रजी लेख लिहीला आहे.आपली पण लॉबी झाली पाहिजे.आपण प्रयत्न केले पाहिजे.. प्रत्येक वेळी आपले कुसुमाग्रज उपेक्षित रहातात.”

त्यानंतर एकदा L.A.C.चे प्रमुख बाळ गाडगीळ यांची आणि नरसिंह राव यांची दिल्लीत एका भोजन प्रसंगी भेट झाली.गाडगीळांनी ज्ञानपीठाचा विषय काढला.नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ मराठी कडे यावं असं तुम्हाला खरंच वाटत ना !मग तुम्ही एक ठराव लिहून द्या.त्यात कवी कुसुमाग्रज यांच्या नावाची शिफारस करा”

बाळ गाडगीळ पेचात पडले.कारण त्यांच्या कमिटीने कुसुमाग्रज यांच्या नावाचा कधी विचारच केला नव्हता.ते नाव कधीही कुणी सुचवलं नव्हतं.तसं त्यांनी नरसिंह राव यांना सांगितलं.शांत पण घट्ट स्वरात नरसिंह राव म्हणाले..

“ज्ञानपीठ सन्मान मराठीलाच मिळावा असं तुम्हाला खरंच वाटलं ना?मग आत्ताच्या आत्ता मला लिहून द्या..

L.A.C. कुसुमाग्रज यांच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ कडे करीत आहे.”

बाळ गाडगीळ यांनी तत्परतेने तसं लिहुन दिलं.लागलीच नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद बोलावली.अक्षरश: पाचच मिनिटांत नरसिंह रावांनी जाहीर केलं..

यंदाचा ज्ञानपीठ सन्मान कवी कुसुमाग्रज यांना जाहीर होत आहे.

आणि मग जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं दिपोत्सव सुरु झाला.तात्यासाहेबांना जितका आनंद झाला.. त्यापेक्षाही अधिक आनंद समस्त मराठी बांधवांना झाला.. आपल्या घरातच तो सन्मान आला हीच भावना प्रत्येकाची होती.

तात्यांचे एकामागून एक सत्कार समारंभ सुरु झाले. मुंबईत ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान समारंभ पण झाला.बाकी होता तो नाशिककरांकडुन होणारा सत्कार.तात्यांनी सुरुवातीला तर नकारच दिला.अखेर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रस्थापनेची घोषणा करण्यासाठी म्हणून एक समारंभ आयोजित केला गेला.या देखण्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते..प्रा.वसंत कानेटकर.

या घरच्या सत्काराला उत्तर देताना तात्यासाहेब म्हणाले..

“ज्ञानपीठाच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातुन हजारो रसिकांच्या प्रेमाची बरसात माझ्यावर झाली,ती मला खरोखरच महत्वाची वाटते.ज्ञानपीठालाही कवेत घेणारा प्रेमपीठाचा हा जो पुरस्कार मला मिळाला,यात माझ्या जीवनाची सार्थक झालं असं मला खरोखर वाटतं आणि आजचा हा समारंभ म्हणजे या सत्कारपर्वाचा कलशाध्याय आहे.”

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे आवडते साहित्यिक… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ माझे आवडते साहित्यिक ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

साहित्यिक प्रेमी,  बंधू भागिनींनो 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके कवी , ” विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज” यांचा जन्मदिवस . त्यांची स्मृती म्हणून आजच्या मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो . कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम पण केले . 

देश पातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी अनेक नामवंत  संतापासून , पंतापर्यंत आणि पंतापासून तंतापर्यंत, तसेच अनेक नामवंत साहित्यिकानी यात मोलाची भर घातली . अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेलेत. त्यांनी पण मराठी भाषा समृध्द केलीच .

पण मला अलीकडच्या काळातील, पुण्यातील प्रसिद्ध साहित्यिक ,स्त्रीरोगतज्ज्ञ “प्रा. डॉ. निशिकांत श्रोत्री “यांच्या बद्दल आज  तुम्हाला सांगायला आवडेल . व मराठी भाषेचा गौरव दिन , खऱ्या अर्थाने साजरा होईल असेच वाटते . हो ! पण माझी अवस्था आज काजव्याने सूर्याला ओवळण्या सारखी झाली आहे ! ! 

।। क्व च सूर्य वंश , क्व च अल्पा विषयामती ।।

मुळातच डॉ श्रोत्री यांचा जन्म पुण्यात पुण्य नगरीत झाला .  सुसंस्कारीत , ऋजु आणि बुद्धिमान घराण्यात , श्रोत्री कुटुंबियांत 1945  ला   झाला . जन्मजात कलेचा वारसा ज्यांना लाभला , ते डॉ निशिकांत श्रोत्री सर , साहित्य ,कला आणि नाट्य क्षेत्रात आपले नाव गाजवलेच . वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी जोरदार मुसंडी मारली . वैद्यकीय क्षेत्रात दुर्लक्ष नको म्हणून ह्या नाट्य क्षेत्रातील अभिनेत्याने , रंगभूमीवरून रजा घेतली ! 

कला क्षेत्राशी फारकत घेणे त्यांना रुचले नसावे . म्हणूनच आकाशवाणीवर नाटके , भावगीते रचना याद्वारे त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली . प्रसिध्द संगीतकार श्री गजानन वाटावे यांनी , डॉ श्रोत्री सरांच्या भावगीताना चाली लावल्या . त्यांचे बालपणीचे किस्से पण असेच नवल वाटावे असे आहेत .

लहानपणीच त्यांचे पाय पाळण्यात दिसू लागले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . मोंट्सरित असतानाच त्यांनी आपली बडबड गीत स्वतः रचून म्हणण्यास सुरुवात केली होतीच . घरीं त्यांचे आजोबा दादा भट ह्यांचे मार्गदर्शन पण होतेच . दादा भट हे कडक शिस्तीचे ! त्यांचा अभ्यास , व्यायाम , अन परवचा संस्कृत पाठांतर हे अगदी ठराविक वेळेत होत होते . एक शिस्तबद्ध वळण अन मुळात डॉ श्रोत्री हे अभ्यासू अन हुशार व्यक्तिमत्व आजोबांच्या देखरेखीखाली तावून सुलाखून निघालं . इयत्ता पाचवी मध्ये त्यांनी “कार्तिकस्वामीच लग्न ” ही विनोदी कथा लिहली . अन तेथूनच त्यांच्या काव्य साहित्याचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत ! त्यांच्या सिध्द हस्त लेखणीला माता सरस्वतीचा वरद हस्त लाभला होता.

त्यांनी मेरिटमध्ये बी जे मेडिकल  कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळाला , अन त्यांचं साहित्य तसेच नाट्य क्षेत्र पण बहरून आलं . पु ल देशपांडे यांचे “तुझं आहे तुझपाशीं ” ह्या नाटकात श्यामची भूमिका केली . अशी पाखरे येती , वाजे पाउल आपले अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या . अन येथेच पु ल देशपांडे ह्यांच्याशी ओळख झाली . नाटकानिमित्त डॉ श्रोत्री यांचे पु ल च्या घरी येणें जाणे सुरू झाले . काही नाटक पुणे रेडिओ स्टेशनवर पण प्रसारित झाली . बी जे आर्ट सर्कल हे त्यावेळी पुण्यातील सांस्कृतिक माहेरघर मिळाले खरे , पण डॉ श्रोत्री यांनी आपलं शैक्षणिक प्रगती सुध्दा उंचीवर नेऊन ठेवली .ते सतत विध्यापिठात प्रथम स्थान घेत , साहित्य क्रांती पण केली . 

एम डी गायनाकोलोजी मध्ये त्यांनी सर्व विध्यापिठात सुध्दा प्रथम श्रेणी घेतली . पदवी उत्तर शिक्षणातच त्यांचा डॉ  देशपांडे यांच्याशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर विवाहात कधी जाहले ते कळलं पण नाही . 

त्यांची ग्रंथ संपदा पण तोंडात बोट घालणारी आहे . 

कथा संग्रह , कथाकथन , काव्य संग्रह , लेख , ललीतलेख , कादंबऱ्या ह्या वाचनीय , सहज सुलभ प्रतिभेला गवसणी घालणाऱ्या वाटतात . हे सर्व कमी म्हणून की काय , त्यांनी संपूर्ण भगवद्गीता ह्यांचे काव्यमय भाषांतर तर केलेच त्याशिवाय , ऋग्वेद सारखा कठीण प्राय वेद सुध्दा काव्यमय भाषांतर करून प्रसिध्द गायका कडून गाऊन घेतला . ह्या सर्व ऋचांचे त्यांनी यु ट्यूब वर पण प्रक्षेपण केलं . विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे,रुक्ष अन क्लिष्ट अश्या  वैद्यकीय क्षेत्रात राहून 

जे कार्य केले ते खचितच , वखण्याण्यासारखे आहेच . शिवाय आचम्बीत करणारे आहे एवढे खरे . ऋजु स्वभावाचे असणारे डॉ . श्रोत्री ह्यांच्या प्रतिभेची गगन भरारी त्यांच्या काव्यातच नव्हेतर कथा , कथा सादरीकरण , कादंबरीत स्पष्टपणे दिसून येते . त्यांची ग्रंथ संपदा खाली दिलेली आहेच . त्यावर नुसता दृष्टी क्षेप टाकला तरी कल्पना येते . एवढी ग्रंथ संपदा असूनही ते आज पण साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत . साहित्यात नवनवीन प्रयोग पण करीत आहेत . त्यांच्या कार्याला माझा त्रिवार मुजरा तर आहेच . त्यांना दीर्घकाळ आयुआरोग्य मिळो व त्यांच्या हातून आणखी साहित्य सेवा घडो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी आपली रजा घेत आहे . खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरवंदिन साजरा केल्याचा आंनद आज मला मिळतो आहे हे पण नसे थोडके .

डॉ निशिकांत श्रोत्री सरांची ग्रंथ संपदा 

कादंबरी

 

अनिता   

दीड दिवस 

 ड्युशने

स्वप्नातल्या कळ्यानो

 सिद्धयोगी

वाटचाल

निवडुंगाचे फुल

हकनाक

सुवर्ण सिध्दी

शीतल छाया बाभळीची

अनोळखी

सौदामिनी

कर्मभूमी 

शिखंडी

पिसाट

कुंचले घेऊन हाती

महायोगी

राखेतील ठिणगी

उपासना 

शांतीवन

पद्मसंभव

साडेसाती 

शिर्डी ते पुटपार्थी

नादब्रह्म 

संरक्षीता

 

कथा संग्रह 

——–

ब्रह्मास्त्र

सुवर्ण पुष्कराज

डायग्नोसी

 

काव्य संग्रह 

——–

मनाची पिल्लं

साई अभंगवाणी

शब्दांची वादळ

अर्चना

गीतसत्य साई 

श्री साईनाथ चरित्र

निशिगंध

मुक्तायन

 

वैद्यकीय

——-

कुटुंबनियोजन आणि वैद्यकीय गर्भपात

स्त्री आणि आरोग्य

एड्स सेक्स सेक्सउल प्रशिक्षण

यौवनावस्था म्हणजे काय

सुरक्षित प्रसूती

हेल्थ डायरी

Surgical Principles in

Obstetrics & Gyaaecology

ध्वनिफीत 

——–

भजनांजली

सर्वधर्म परमेश्वर

मुलगी का मुलगा

नव्या युगाचा वसा

 

आकाशवाणी व दूरदर्शन

मान्यताप्राप्त अभिनेता

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

एका अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !

कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

सन १९३७ !! फिलीप फॉक्स नामक ब्रिटीशाने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई महाराज साहेबांबद्दल अपमानकारक लेखन केलेलं होतं. ते लिखाण वाचून एका तरूणाचं मन बंड करून उठलं. या विषयावर अभ्यास करुन, त्यावर लेखन करुन, ‘ सत्य काय ’ ते जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी त्याने असंख्य ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळली. दुर्दैवाने त्या वेळच्या ब्रिटीश अंमलाखाली अनेक साधनं आधीच नष्ट झालेली होती. त्याच वर्षी त्याने झाशी, कानपूर, ग्वाल्हेर, ब्रह्मावर्तासारख्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. कागदपत्रं शोधून अभ्यासली, तपासली. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर कित्येक दशकांचा काळ उलटून गेलेला होता. १८५७ चे बंड व त्या काळचा इतिहास समजणं दुरापास्त झालेलं होतं. लॉर्ड जॉर्ज कॉनवेल या ब्रिटीशाने लिहिलं होतं – ” १८५७ चा खरा इतिहास या पुढे कधी बाहेर येईल किंवा कोणाला समजेल ही आशा व्यर्थ आहे “. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर अभ्यास करुन झाशीच्या राणी साहेब आणि १८५८ विषयाबद्दलची जास्तीतजास्त योग्य ती माहिती ‘ केसरी ’ मध्ये लेखमाला लिहून जनमानसापर्यंत पोचवायचं काम केलेलं अजोड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.

धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला. काशिनाथ हे तात्यासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव. स्वभावाने थोडे अबोल, मितभाषी पण जुन्या काळात मनस्वी रमणारे काशिनाथ इतिहासाबद्दल रूची बाळगून होते. त्यांचा ‘ १८५७ ’ व  ‘ नेपोलियन ’ या दोन विषयांवरचा अभ्यास थक्क करून टाकणारा होता. बी.ए. व वकिलीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पार पाडतानाही त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला, त्यात संशोधन केलं, हे खरोखर विशेष!! ॲडव्होकेट होत असतानाच त्यांनी ‘ज्योतिर्भूषण’ ही पदवीदेखील मिळवलेली होती ज्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

अतिशय पितृभक्त असलेल्या काशिनाथ केळकरांनी वडिलांचा लेखनवारसा पुढे चालवत ‘केसरी’ वृत्तपत्रामधून विपुल लिखाण केलं. त्यांनी केलेली वाङ्मय सेवा व साहित्य निर्मिती बहुत दखलपात्र आहे. “ आपल्या वडिलांचे लेखणीशिवाय आपण दुसऱ्या कोणासही गुरू मानले नाही ” असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, ” वाळवंटातील पाऊले ” मध्ये नमूद केलेलं आहे. जाज्वल्य पितृभक्तीचा झळाळता अभिमान त्यांनी आयुष्यभर बाळगल्याचे अशा वाक्यांतून सतत दिसत राहते. त्यांच्या जन्मपत्रिकेतला माणसाला प्रसिद्धी बहाल करणारा ग्रह मात्र अयोग्य घरात पडलेला होता. प्रसिद्धी मिळाली नाही तरीही या नादिष्ट लेखकानं केसरी पाठोपाठ ‘ सह्याद्री ’मध्येही पुष्कळ लेखन केलं.

स्वतःच्या लिखाण कामाखेरीज त्यांनी आपल्या वडिलांच्या हजारो पृष्ठांच्या अप्रकाशित साहित्याचे सहा ग्रंथ प्रकाशित केले. काशिनाथ केळकरांची ही कामगिरी अतिशय बहुमूल्य स्वरूपाची आहे. ” केळकर निबंधमाला ” या साक्षेपाने संपादित व प्रकाशित केलेला त्यांचा हा ग्रंथ ‘ केळकर अभ्यासकांना ’ न डावलता येण्याजोगा आहे. श्री. न. चिं. केळकर यांनी आपल्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे हक्क काशिनाथांकडे दिलेले होते. पूर्वपरवानगी शिवाय त्या साहित्याचा वापर करणाऱ्यांना ॲडव्होकेट काशिनाथांनी स्वतःच्या वकिली ज्ञानाची चुणूकही चांगलीच दाखवलेली होती.

घरी ते अनेकांच्या जन्म कुंडल्या तयार करून भविष्यकथन करीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या अंताचं त्यांनी वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं होतं. लेखन व इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत ते उत्तम चित्रही काढायचे. स्वतःच्या वडिलांचं व नेपोलियनचंही त्यांनी चित्र काढलं होतं. हे एक विशेषच म्हणावं लागेल. ऐतिहासिक लेखनामध्येही त्यांनी जुनी चित्रं शोधून आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करुन दिलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं चित्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

बापूंच्या आत्मचरित्राखेरीज महत्त्वाच्या इतर वाचनीय पुस्तकांची यादी खाली देत आहे:-

रामायणावरील काही विचार (१९२८)

शेतीवाडीची आर्थिक परीक्षा (१९३५)

हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (१९३२)

नेपोलियन व हिटलर (१९४६)

नेपोलियन व्यक्तीदर्शन (१९४६)

शमीपूजन (१९४७)

‘दोन घटका मनोरंजन’ हा त्यांचा निवडक लेख संग्रहही खूप मनोरंजक आहे. 

‘नेपोलियन’ व ‘१८५७’ या दोन विषयांवर बापू तासन्-तास बोलत. इतर कोणी नेपोलियनवर अभ्यास वा लिखाण केलं तर ते वाचून आवर्जून प्रतिक्रिया देत. थोर इतिहास अभ्यासक कै. म. श्री. दिक्षित यांच्या संग्रहामध्ये बापूंनी पाठवलेलं असंच एक ‘ शाबासकी पत्र ’ दिसून येतं.

श्री. न. चिं. केळकर यांचे अनेक गुण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी, काशिनाथ व यशवंत यांनी, अंगी बाणवले. वडिलांनी बांधलेलं घर त्यांनी जिवापाड सांभाळलं. बापू वयाच्या ८२व्या वर्षी १० एप्रिल १९८२ रोजी देवाघरी गेले.

आज २५ फेब्रुवारी! बापूंचा १२४ वा जन्मदिवस!!

अतिशय विपुल काम, संशोधन आणि लेखन केलेले, वडिलांची किर्ती आपल्या कामांमधून वृद्धिंगत करणारे कै. काशिनाथ नरसिंह केळकर हे विस्मृतीत गेलेले इतिहास अभ्यासक आज आपणा सर्वांसमोर आणत आहे. माझ्या अल्पशा लेखनसेवेतून या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करतो.

गेल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून बापूंचा जुना दुर्मिळ फोटो मिळवू शकलो आणि सर्वांचा समोर आणू शकलो हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही मला.

लेखक : श्री  नंदन वांद्रे

पुणे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दास नवमी… — ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

दास नवमी… ☆ माहिती संकलक : श्री प्रसाद जोग ☆

श्री समर्थ रामदास स्वामी महानिर्वाणदिन माघ कृष्ण ९, शके १६०३ चैत्र शुक्ल ९ शके १५३० – रामनवमी या शुभमुहूर्तावर त्यांचा जन्म झाला त्याचे नांव नारायण ठेवले.हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.

वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते.

सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, “नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे.” हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, “नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?” त्यावर नारायणाने उत्तर दिले, “आई, चिंता करीतो विश्वाची”

नारायणाने मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला.

वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले.

नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले.

श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराण श्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच “अनुदिनी अनुतापे तापलो रामराया” अशी करुणाष्टके प्रगटली.

ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले.

श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे थोडी शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. वाई येथे मारुतीस्थापना करून पिटके, थिटे, चित्राव यांना अनुग्रह दिला नंतर माहुली व जरंडेश्वर येथे काही दिवस राहीले. शहापूर येथे सतीबाई शहापूरकर यांना अनुग्रह देऊन त्यांच्यासाठी चुन्याचा मारुती स्थापन केला. समर्थ स्थापित ११ मारुतीतील शहापूरचा हा पहिला मारुती. यानंतर क-हाड, मिरज, कोल्हापूर या भागात अक्का, वेण्णा, कल्याण व दत्तात्रेय हे शिष्य समर्थांना मिळाले.

उंब्रज येथे मारुती स्थापना करून समर्थ पंढरपूर येथे गेले. तेथे तुकाराम महाराजांची भेट झाली. परत येताना मेथवडेकर यांना अनुग्रह दिला. चाफळ येथील मठाचे कार्य दिवाकर गोसावींकडे सोपवले. माजगांव येथे मारुतीस्थापना करून समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले.

१६७६ साली समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले.

प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती.

त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी १६८२ या दिवशी तंजावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले

माझी काया आणि वाणी ।

गेली म्हणाल अंत:करणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ॥

 

आत्माराम दासबोध ।

माझे स्वरुप स्वत:सिद्ध ।

असता न करावा हो खेद । भक्त जनीं ॥

माघ कृष्ण ९ , शके १६०३, (२२ जानेवारी, १६८२ ) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले.

ज्याठिकाणी श्रीसमर्थांवर अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी राममंदिर व तळघरात समाधीमंदिर बांधले.

त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला.

समर्थानी दासबोध आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी,काही स्‍फूटरचना, भीमरूपी- मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या रचल्या.

सोबत करुणाष्टकांची पी.डी.एफ. ची लिंक देतो आहे .

http://www.samarthramdas400.in/literature/karunashtake.pdf

शेवट करताना एवढेच म्हणावेसे वाटते

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।

असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।।

जय जय रघुवीर समर्थ.

(संदर्भ :श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांची वेबसाईट) 

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सिंहाचलम”… भक्त प्रल्हाद व प्रभु नृसिंह..!… लेखक : श्री श्रीकांत पवनीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमजवळ समुद्र सपाटीपासून आठशे फूट  उंच असलेल्या सुरेख व अप्रतिम  डोंगराचे नाव आहे  सिंहाचलम…!  सिंह आणि अचलम( पर्वत) म्हणजे सिंहाचलम..! सिंहाचा पर्वत ..!  समुद्रातीरावरच्या आंध्र प्रदेशातल्या  उत्तर विशाखापट्टणम पासून केवळ सोळा किलोमीटरवर  जवळ एक अप्रतिम असा पर्वत आहे आणि या पहाडावर एक सुरेख अनेक वृक्षांनी बहरलेले लहानसे स्वच्छ सुंदर शहरच आहे.पहाडा वरच्या रम्य वनश्रीत वसलेली जणूकाही देवभूमीच..! या उंच मार्गावर अननस,आंबे व अनेक फळांची व फुलांच्या झाडांची नुसती बहार आहे. या अनेक वृक्षांखाली मोठमोठ्या दगडी शिला स्थापित आहे आणि अनेक भाविक पर्यटक येथे दर्शना अगोदर नंतर  या सिंहाचलम पर्वतावर विश्रांती घेत असतात. हा पर्वत म्हणजे प्रभु नृसिंहाचे निवासस्थान मानले जाते.भक्त प्रल्हादाच्या रक्षणाकरिता प्रभू नृसिंह प्रगट झाले अशी अनादि काळापासून पारंपारिक मान्यता आहे आणि आपले बालपण अशा गोष्टीत रमून गेले होते.

लुनार वंशाचे ऋषि पुरुरवा हे आपली पत्नी उर्वशी सोबत वायु भ्रमण करत असताना एका विशिष्ट नैसर्गिक शक्तीने प्रभावित होऊन या सिंहाचलम पर्वतावर पोहोचले व त्यांना  एक विष्णूची प्रतिमा/मूर्ती  डोंगरात पुरलेली दिसली. ती मूर्ति काढून धुळ साफ करताना  भगवंताची आकाशवाणी झाली .मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन वर्षातून फक्त  एकदा भक्तांना मुळ मूर्तीचे दर्शन घडवावे व भक्तांचे कल्याण करावे.ऋषि पुरुरवा यांनी ही भगवंताची  आज्ञा मानून या शोधलेल्या ठिकाणी प्रतिमा /मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि भक्तांचा ओघ सुरू झाला. आज येथे भव्यदिव्य  श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिरात संपूर्ण चंदनाचा लेप असलेली  नरसिंहाची मूर्ती बघायला मिळते.या मंदिराची विशेषता अशी की येथे भगवान विष्णु हे वराह आणि नृसिंहच्या संयुक्त अवतारात लक्ष्मीसोबत स्थापित झालेले आहे आणि याची स्थापना भक्त प्रल्हादाने केली आहे असे मानल्या जाते.हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भक्त प्रल्हादाने हे मंदिर बांधले आणि ते काळाच्या ओघात या पहाडात गडप झाले आणि ऋषि पुरुरवा यांच्या दृष्टीस पडले.आतले मंदिर अतिशय भव्य असून बघितल्या बरोबर प्राचीनत्व जाणवते . मंदिरातले वातावरण अत्यंत भारावलेले असून मंद दिव्यांच्या आराशीची एक दिव्य झळाळी चन्दन मूर्ती समोर व मंदिरात दिसते.मूर्ती जवळ प्रवेश मिळतो. अकराव्या शताब्दीत मुळ मंदिराचे  गर्भगृह बांधल्या गेले असे समजते. विष्णूच्या  “वराह नरसिंह” रूपातले हे मंदिर आहे व इथल्या अनेक मंदिरात प्रत्येक खांबावर मूर्तीकलेचा प्राचीन  कलात्मक आविष्कार  बघायला मिळतो आणि त्या कलावंतांना दाद द्यावीशी वाटते. . वर्षभर मूर्ती चन्दन लेपाने झाकलेली असते आणि पुजारी पाटा वरवंट्यावर चंदनाचा लेप तयार करताना मंदिर परिसरात दिसतात. येथील मुख्य उत्सव चैत्र शुद्ध एकादशीला होणारा  “वार्षिक कल्याणम” आणि वैशाखातल्या तिसर्‍या दिवशीची “चन्दन” यात्रा असते  .याला “ चंदनोत्सव ” म्हणतात. मंदिरात कपाळावर चन्दन लाऊन चंदनाचा प्रसाद वाटला जातो. वैशाखातल्या अक्षयतृतीयेला संपूर्ण सिंहाचलमचे महोत्सवाचे  दृश्य बघण्यासारखे असते आणि देश विदेशातून असंख्य भाविक दर्शनाला येतात. अक्षयतृतीयेच्या  दिवशी भगवान लक्ष्मीनृसिंहाचा ओल्या चन्दनाने अत्यंत आकर्षक शृंगार केल्या जातो. भगवंताचे वास्तविक स्वरूप केवळ याच एका दिवशी बघायला मिळते.

असुर शक्तिची संस्कृती  शक्तिशाली होत असताना असुर राज हिरण्यकश्यपू व कयाधुच्या पोटी विष्णुभक्त  प्रल्हादाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचे  वरदान असल्याने उत्तरप्रदेशातल्या हरदोईचा हा राजा हिरण्यकशपु  निरंकुश झाला होता.या राजाच्या  आदेशानुसार कुणीही राज्यात  विष्णुची भक्ति करू शकत नव्हते. पण पुत्र  भक्त प्रल्हादाची भगवान विष्णुवर  अतूट श्रद्धा असल्याने क्रोधित होऊन राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि बहीण होलीकाने या कपटात त्याला  मदत केले. होलिकेला आगीपासून संरक्षण असल्याने ती प्रल्हादाला घेऊन आगीत बसली परतू भगवंताच्या कृपेने प्रल्हादाला काहीच न होता होलीका भस्म  झाली आणि दुसर्‍याच  दिवशी भगवान नरसिंहाने विष्णुचे रूप घेऊन हिरण्यकशपुला मारले आणि प्रजेला अत्याचारा पासून मुक्त केले.ही घटना मात्र हरदोई येथे घडली असे समजते तर काही अभ्यासकांच्या मते ही घटना सिंहाचलमच्या पहाडावर  घडल्याचे सांगितल्या जाते.याची आठवण म्हणून होलिका दहन उत्सत्वाला हरदोइ पासून सुरवात झाली.  हिरण्यकश्यपुचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्याचा आणि तो तेथला राजा सुद्धा होता ..!   पण अत्यंत कठोर  तपस्येने व  भक्तीने त्याने ब्रंहादेवाकडून विचित्र वर मागून जवळपास अमरत्व प्राप्त केले. त्याला असे वरदान होते की कुठलाच मनुष्य,पशु, दैत्य, देवता, नाग, प्राणी, यांच्या कडून आकाश आणि जमिनीवर  मृत्यु येऊ नये. तसेच घरात व बाहेर , दिवसा व रात्री सुद्धा मृत्यु येऊ नये .पण भगवान विष्णुने नृसिंहाचे(ना स्त्री ना पुरुष)  असे रूप घेऊन त्याचा  अंत हरदोईच्या पहाडा वरील उंचीवरच्या  महालाच्या दरवाज्यात ऐन सायंकाळी केला आणि हिरण्यकशपुचे वरदान सुद्धा कायम राहिले.हिरण्यकश्यपूला मारल्यावर अनेक दिवसपर्यंत नृसिंहाचा क्रोध कायम होता व भक्त प्रल्हादाने हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. हाच क्रोधाग्नी शांत करण्याकरिता ते या  डोंगरावर  आले व “सिंहाचलम” हे त्यांचे कायमचे निवासस्थान बनले . हरदोईला हिरण्यकशपुच्या किल्ल्यांचे काही अवशेष अजूनही बघायला मिळतात असे समजते. “हरिद्रोह” म्हणजे हरीचा द्रोह करणारा हे नाव हिरण्यकशपुने  ठेवले कारण तो हरी सोबत नेहमी द्रोह करायचा व पुढे त्याचे  हरदोई झाले.तर काही  अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार येथे हरीचे दोन अवतार झाले आणि ते  म्हणजे नृसिंह आणि वामन..! हरीने दोन वेळा येथे अवतार घेतले म्हणून याला “हरिद्वय”म्हणतात ..पुढे त्याचे हरदोई झाले अशीही मान्यता आहे . .हरदोईला हिरण्यकश्यपुची नगरी मानल्या जाते.प्रल्हाद कुंड व प्रल्हाद किल्ला व  नृसिंह मंदिर आजही हरदोईला बघायला मिळतात. याच्या वरून सिंहाचलम व हरदोई ही दोन्ही स्थळे प्रभु नृसिंहाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.भारतामध्ये नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत पण सिंहाचलमला नृसिंहाचे घर म्हटल्या जाते.         

पद्म पुराणानुसार प्राचीन काळात वैशाख महिन्यातल्या शुक्लपक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह प्रकट झाल्याने हा त्यांचा जन्मदिवस मानला  जातो. 

असे हे भक्त प्रल्हाद व प्रभू नृसिंहाचे निवासस्थान   “नृसिंहाचलम” ..! पण काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन नृसिंहाचलम चे आज “सिंहाचलम” झाले ..!

लेखक :श्री श्रीकांत पवनीकर

पर्यटन लेखक, नागपूर.  

मो -9423683250

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print