मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

 ☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.

“नाही” डॉक्टरांनी सांगितले.

“दुसरा काही मार्ग?”

“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”

“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

क्रमशः…

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

☆  इंद्रधनुष्य ☆ सकारात्मक विचार… ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे.

एका रात्री तिने लिहीले की….

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा पती रात्रभर फार मोठयाने घोरतो कारण काय तर त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर – खटमल झोपून देत नाही. म्हणजेच तो रात्री घरी असतो,आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दर महिन्याला लाईट बिल,गैस,  पेट्रोल, पाणी वगैरेची बिलं भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहे, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असते. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपे पर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या साफ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर,छत नाही त्याचे काय हाल होत असतील.

★ मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्या जवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेट देऊ शकते. जर हे लोक नसते तर जीवन कीती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

★ मी फार सुखी समाधानी आहे

रोज पहाटे अलार्म वाजला, की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत  माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे- की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

“सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.”

“Gratefulness” is the Best Prayer. ??

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

9422409713

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

३. डाल्फिन-

स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डाल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.

अलास्कन कॅरिब्यू –

सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६०० कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.

नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर

बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग ते जवळच्या तळ्याकाठी,  पाण्याचा साठा असेल,  तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहेर येणार्‍या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात. पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.

मगर आणि सुसर

मगरी आणि सुसरी, त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्‍यावर येते. गवत रानटी झुडुपे वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.

 समुद्री कासव

हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८ चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे. पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी.चा प्रवास करून तिथे पोचतात.

मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्‍यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं .अर्थात अनेक जण अन्य भुकेल्यांचं भक्ष्य बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले,  म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतात आणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावर ती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंतसापडलेले नाही.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ जलचरांचं स्थलांतर –  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 १. उत्तरेकडील फर सील

उत्तरेकडील फर सील प्रत्येक वर्षी स्थलांतराच्या वेळी खूप लांबवरचा प्रवास करतात.  सीलची मादी जवळ जवळ ९६०० कि.मी. एवढा प्रवास करते. मे ते नोहेंबर सीलची नवी पिल्लं प्रिबिलॉफ आयलंडवर जन्माला येतात. हे बेट दक्षिण-पश्चिम अलास्का येथे आहे. नर आणि मादी दोघेही त्या बेटापासून दूर पोहत जातात. नर अलास्का गल्फमध्ये थांबतात. पण माद्या खूप लांबचा प्रवास करतात. जवळ जवळ ४८०० कि.मी. एवढा प्रवास करून दक्षिण कॅलिफोर्निया इथे येतात.

२. व्हेलचं स्थलांतर

मार्च-एप्रीलच्या दरम्यान दक्षिण कॅलिफोर्निया येथे सॅन डिआगो बे जवळ करड्या रंगाच्या (ग्रे) व्हेलचं स्थलांतर बघायला मिळते. हे भले मोठे सस्तन प्राणी खरं तर मासे, १९,२०० कि.मी. एवढी राउंड ट्रीप घेतात. ते आपला उन्हाळा, उत्तर पॅसिफिकमहासागरात घालवतात. तिथे क्रीलसारखे छोटे जलचर आणि समुद्री प्राणी खातात. नंतर पानगळीच्या दिवसात ते पुन्हा आपल्या स्थलांतराला सुरुवात करतात. दक्षिण दिशेला , दक्षिण कॅलिफोर्नियाकडील खार्‍या पाण्याच्या सरोवरांकडे ती जातात. गर्भवती माद्या आपला प्रवास आधी पूर्ण करतात. डिसेंबरमध्ये त्या आपल्या पिलांना जन्म देतात. ही पिले ४ मीटर लांबीची असतात. एखाद्या महिन्यानंतर अन्य माद्या तिथे येतात. आणि त्यांचे नराशी मीलन होते. मार्चमध्ये सर्व व्हेल उत्तरेकडे आपल्या उन्हाळी अन्नदात्या क्षेत्रात आपला परतीचा प्रवास सुरू करतात. सन डिअ‍ॅगोच्या किनार्‍यापासून सुमारे दीड किलो मीटर अंतर ठेवून ते प्रवास करतात. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात अगणित व्हेल पोहत जाताना पाहण्यासाठी किनार्‍यावर गर्दी करतात.

३. माशांचे स्थलांतर  – ईल आणि सालमन

गोड्या पाण्यातील ईल मासे आणि पॅसिफिक महासागरातील सायमन या माशांचे स्थलांतर एकमेकांच्या अगदी विरुद्ध असते. पानगळीच्या दिवसात उत्तर अमेरिकन आणि युरोपियन ईल त्यांच्या गोड्या पाण्यातून अटलांटिक महासागरातील बर्म्युडा बेटाजवळील, सरगॅसो समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथील निरुपयोगी झाडात ते आपली अंडी घालतात आणि नंतर मरतात. अंडी फुटून जेव्हा छोटे जीव बाहेर येतात, तेव्हा ते बोटाच्या नखांएवढे असतात. त्यांना लाव्र्हा असं म्हणतात. या छोट्या लाव्र्हा प्रवाहाबरोबर आपल्या मूळ प्रदेशाकडे वाहू लागतात. या  माठ्या होत जाणार्‍याया ईलपैकी उत्तर अमेरिकेकडून आलेल्या ईलची पिल्ले युनायटेड स्टेटस आणि कॅनडाकडे पोहत जातात. हे स्थलांतर पूर्ण व्हायला जवळ जवळ एक वर्ष लागतं. तरुण युरोपियन ईल सरगॅसोच्या वेगळ्या भागातून प्रवाहाबरोबर पोहू लागतात आणि ते युरोपकडे येतात. त्यांचा प्रवास लांबचा असतो आणि मूळ ठिकाणी पोचायला त्यांना २/३ वर्षे लागतात. जेव्हा ते वेगवेगळ्या काठाने पोहत आपल्या मूळ ठिकाणी परत येत असतात, तेव्हा छोट्या लाव्र्हांमध्ये बदल होत जातो. ते बारीक, निमुळते आणि पारदर्शक होत जातात.  त्यांना ग्लास ईल असे म्हणतात. नंतर ते मोठे होतात आणि त्यांचा रंग काळा होतो. ते काठाशी पोचतात, तेव्हा त्यांना एलव्हर्स असे म्हणतात. नर एलव्हर्स खार्‍या पाण्याच्या बंदरालगतच्या दलदलीच्या प्रदेशात राहतात आणि माद्या पोहत वरच्या बाजूला गोड्या पाण्याकडे येतात. खूप वर्षानंतर त्यांच्या जन्मदात्यांप्रमाने ते पुन्हा गोड्या पाण्यातून खार्‍या सॅरॅगॉन समुद्राकडे आपलं रहस्यमय स्थलांतर सुरू करतात.

पॅसिफिक सालमनचं स्थलांतर याच्या अगदी विरुद्ध असतं. आपलं सगळं आयुष्य खार्‍या पाण्याच्या समुद्रात घालवल्यानंतर, हे मासे जवळ जवळ ३२०० कि. मी. चा प्रवास करून गोड्या पाण्याच्या प्रवाहात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांना यावेळी, धबधबे, नदीच्या उताराच्या बाजूला वाहणारे वेगवान प्रवाह इ. अडथळ्यांना तोंड देत पोहावं लागतं. शरद ऋतूत, अनेक अडथळे पार करून अंडी देण्याच्या जागी आलेले सालमन अंडी देतात आणि मरून जातात. अंडी फुटतात आणि छोटे सालमन समुद्राच्या दिशेने जाऊ लागतात. काही काळानंतर ते पुन्हा, जिथे त्यांचा जन्म झाला,  त्याच गोड्या पाण्याच्या प्रवाहाकडे परत येतात .त्यांना परतीचा मार्ग कसा सापडतो?  नक्की माहीत नाही, पण शास्त्रज्ञांना वाटतं,  त्यासाठी त्यांना त्यांच्या घ्राणेंद्रियांचा उपयोग होत असावा.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्थलांतर – भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतर – भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मुंग्यांची फौज भाग २

दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात.

जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं,  तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात.

ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते,  तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात्  त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या, इतक्या मुंग्या असतात की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते.

जर नदी रुंद असेल,  तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मध्ये राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्‍या तिराला पोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते.

त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात.

पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल,  तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते.

त्या सतत कूच का करतात?  त्या कुठे जातात?  आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.

सगळ्यात दूरवरचं स्थलांतर

अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट दिशेकडे तोंड करून स्थलांतर करतात. या सर्वांमध्ये आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी सगळ्यात दूरवरच पल्ला गाठतात. त्याबाबतीत त्यांना स्थलांतर बहाद्दर किंवा उड्डाण बहाद्दरच म्हंटलं पाहिजे.

आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी स्थलांतर करतात, कारण उन्हाळी ऊबदार वातावरण वर्षभर त्यांच्याभोवती असावं असं त्यांना वाटतं. त्यांना दिवसभर प्रकाश असावा,  असं वाटतं. दरवर्षी स्लेंडर, काळे-पांढरे पक्षी ३५२०० कि.मी.चा वर्तुळाकार प्रवास करतात. ही म्हणजे, जगाभोवती केलेली प्रदक्षिणाच असते.

उन्हाळ्याच्या दिवसात अगदी उत्तरेच्या प्रदेशात ते घरटी करतात. यावेळी उत्तर धृव सूर्याकडे कललेला असतो. सूर्य जवळजवळ पूर्ण वेळ डोक्यावर असतो. या प्रदीर्घ सूर्यप्रकाशाच्य काळात त्यांना व त्यांच्या छोट्या पिलांना समुद्रातील भरपूर मासे दिसतात आणि पकडता व खाता येतात.

उन्हाळा संपत येता येता दिवस लहान होऊ लागतो. थंडी वाढत जाते आणि आर्क्टिक टर्न आपला प्रवास सुरू करतात आणि अंटार्टिकाला जातात. अलास्कन टर्न उत्तर-दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक सागराच्या किनारपट्टीवरून जातात. इतर अनेक टर्न उत्तरेकडच्या इतर घरटी बांधण्याच्या क्षेत्राकडे उडतात आणि ब्रिटीश बेटांमध्ये भेटतात. तिथून ते दक्षिणेकडे आफ्रिकन किनारपट्टीकडे झडप घेतात.

प्रवासाला सुरुवात करायची वेळ झाली, हे आर्टिक टर्नना कसं कळतं?

तापमानातील बदल, सूर्यप्रकाशातील बदल यामुळे बहुदा त्यांना ते कळतं. पण हे प्रवासी पक्षी इतकी भली मोठी आश्चर्यकारक राउंड ट्रीप दरवर्षी का घेतात, ते कुणालाच कळले नाही.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतर – भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतरभाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या  ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्‍या या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.

स्थलांतर कशा प्रकारचं?

काही प्राणी एकाच मार्गाने, एक रेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तुळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्यं, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.

कोणत्या प्रकारचे प्राणी कुठे कुठे स्थलांतर करतात

प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत पोहत नदीच्या गोड्या पाण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.

प्राणी स्थलांतर का करतात?

एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर का करतात?  प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.

१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी

२. काही प्राणी दुसर्‍या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी

३ .काही जण आपल्या अन्नाच्या शोधात

४. काही जण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.

स्थलांतर कसं, केव्हा करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?

आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो. पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे? शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ,  हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे. दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं,  ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरक ही खूण असावी.

स्थलांतर कुठे, कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?

स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात पण इतर प्राण्यांचं काय?  ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.

मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर

काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क  जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२०० कि. मीचा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते.

वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई -वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावर तीही बसतात.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि ☆ आह्वान ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि  ☆ आह्वान 

कह दो उनसे

संभाल लें

मोर्चे अपने-अपने,

जो खड़े हैं

ताक़त से मेरे ख़िलाफ़,

कह दो उनसे

बिछा लें बिसातें

अपनी-अपनी,

जो खड़े हैं

दौलत से मेरे ख़िलाफ़,

हाथ में

क़लम उठा ली है मैंने

और निकल पड़ा हूँ

अश्वमेध के लिए…!

 

©  संजय भारद्वाज 

(कविता संग्रह योंही से)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधीक महिना ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ इंद्रधनुष्य ☆ अधीक महिना ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

अधिक मास

अधिक मास म्हटलं की प्रत्येकच स्त्रीमध्ये एक प्रकारे उत्साह जागतो आणि महिनाभर वेगवेगळ्या प्रकारची रोज ३३ फुले वाहून ती आपल्या बाळकृष्णाची मनोभावे पूजा करते.

कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार . जेव्हा भगवान विष्णूंना विचारले गेले की तुम्हाला जाई, मोगरा, गुलाब, चंपा, पारिजातक अशी कोणती फुले पाहिजेत ? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की मला यातील कोणतेही फूल नको, मला आठ फुले पाहिजेत. ती आठ फुले कोणती याचे सुंदर वर्णन या संस्कृतच्या श्लोकामध्ये आपल्याला पहावयास मिळते .

? अयुसा प्रथमं पुष्पं

पुष्पं इंद्रियनिग्रहं

सर्वभूत दयापुष्पं

क्षमापुष्पं विशेषतः

ध्यानपुष्पं दानपुष्पं

योगपुष्पं तथैवच

सत्यं अष्टोदम पुष्पं

विष्णू प्रसीदं करेत ! ?

अर्थात –

अयुसा हे पहिले पुष्प आहे . म्हणजेच जाणुनबुजून किंवा अजाणतेपणी कोणत्याही प्रकारे हिंसा करू नका.

दुसरे पुष्प आहे इंद्रियनिग्रह.आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवा . मला हे पाहिजे , माझ्या कडे ते नाही असे म्हणू नका.समाधानी रहा.

तिसरे पुष्ष आहे सर्वभूत दया. सर्वांवर प्रेम करा . कोणाचाही तिरस्कार करू नका .

चौथे आणि विशेष पुष्प आहे क्षमा . कोणी आपल्याला चुकीचा म्हणत असेल तरीही त्याला क्षमा करा.

ध्यान पाचवे पुष्प आहे .ध्यान करा ज्यामुळे मन एकाग्र होऊन मनावर ताबा मिळवता येईल.

दान सहावे पुष्प आहे . सढळ हाताने दान करा.

सातवे पुष्प आहे योग. योगा करा.

सर्वात महत्त्वाचे आठवे पुष्प आहे सत्य. नेहमी सत्य बोला .सत्य बोलून एखाद्या वेळी कोणाचे मन दुखले तरी चालेल पण असत्य बोलून एखाद्याच्या मनातून कायमचे उतरु नका.

ही पुष्पे अर्पण करून भगवान विष्णूला प्रसन्न करा.

अधिक मासाच्या भरभरून शुभेच्छा.

 

संग्राहक: सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’

सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’

सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.

कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’

वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.

असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.

ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.

सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.

त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.

सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर.

प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)

मोबाइल : ९४२०७ ३८३७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ इंद्रधनुष्य : सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

अंगणात एक छानसा पक्षी आला होता. मी पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या कुंड्यात त्यानं चक्क आंघोळ उरकली. शेजारी ठेवलेले दाणे खाल्ले. पाणी प्यायला. थोडावेळ नाचला..चिवचिवला..उडून गेला. माझी सकाळ प्रसन्न झाली.मी पुन्हा कामाला लागले.

मनात सहज विचार आला..सुंदरच होता तो पक्षी. आवाजही गोड. पण ना मी त्याला पिंजऱ्यात ठेवलं, ना त्यानं माझ्याचकडे राहावं असा हट्ट धरला. ना त्यानं मी ठेवलेल्या दाण्यापाण्याबद्दल आभार मानले. खरं तर तो त्याच्या त्याच्या जगात स्वतंत्र जगत होता. योगायोगानं माझ्या अंगणात आला काही क्षण राहिला आणि उडून गेला. मला त्याच्या सहवासात आनंद झाला कारण मला त्याला बांधून ठेवायचं नव्हतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती माझी. मुळात मी त्याच्यात गुंतले नव्हते.

माणसांच्या बाबतीतही असाच विचार केला तर…म्हणजे अगदीच न गुंतणं शक्य नाही. विशेषत: जवळच्या नात्यात गुंततोच आपण. पण हे गुंततानाही थोडं भान ठेवलं, की हा माणूस एक स्वतंत्र जीव आहे आणि तो त्याचं आयुष्य जगायला या जगात आला आहे.आपण त्याला देऊ केलेल्या ऐहिक वस्तू(दाणा पाणी) प्रेम, संस्कार, विचार, मैत्री, मदत हे सगळं आपण आपल्या आनंदासाठी त्याला दिलं. आता ते घेऊन त्यानं उडून जायचं की आपल्या अंगणात खेळत राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना…या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून दखल घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्र्न आहे. आपल्याला त्याच्या सहवासाचा जो आनंद मिळाला, आपले काही क्षण आनंदात गेले, तेच पुरेसं नाही का?गीतेत भगवंतांनी अनपेक्ष असलेला भक्त मला आवडतो असं म्हटलंय. यालाच निष्काम कर्मयोग म्हणत असतील. अल्बर्ट एलिस सारखा मानसशास्त्रज्ञ सांगतात, की कुणीतरी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच चुकीची आहे. मी सुखी होणार की नाही, हे दुसऱ्यानं माझ्याशी कसं वागावं यावर अवलंबून असेल तर आपण कधीच सुखी होणार नाही.

मग मला साहीरच्या ओळी आठवल्या…

“जो भी जितना साथ दे एहसान है…”

मी त्या बदलून मनातच अशाही केल्या,

“जो भी जैसा साथ दे, एहसान है…”

आणि सुखाचा एक मंत्र मला सापडला.

 

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print