मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

एकदा सकाळ सकाळीसच गोरटेली गोल गरगरीत बाई दवाखान्यात आली. प्रस्थ श्रीमंतांकडचं दिसत होतं. गळा दागिन्यांनी भरलेला. गळाच काय जिथे जिथे दागिने असायला हवेत तिथे तिथे ते विराजमान असलेले. आल्या आल्या ती सरळ वजन काट्यावरच उभी राहिली. वजनकाटा नव्वदच्या वर सरकला, तशी ती किंचाळलीच. “अग्गो बाई नव्वदच्या वर गेलं की हो! बरेच दिवस अठ्ठ्यांशीवर रोखून धरले होते. डॉक्टर काहीतरी करा, मला वजन कमी करायचेय, त्यासाठी मी तुमच्याकडे आलीय.”  मी तिला पुन्हा आपादमस्तक न्याहाळलं. मग सहजच बोललो, “यात दोन किलो वजन तुमच्या दागिन्यांचंच असेल.”  तिला नेमकं ते वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं. आपले दागिने ठीकठाक करत, टेबलावर ठेवलेली पर्स पुन्हा ताब्यात घेत समोर खुर्चीवर बसली पसरट फैलावून, व म्हणाली, “नाही हो डॉक्टर, माझं वजन इतकं काही नाहीये. आमच्या घरी कुणीही काट्यावर उभं राहिलं की काटा शंभरी पार जातो. सगळ्यांच्या तब्येती मस्त, हे एक वजनाचं सोडलं तर! ” मग तिने अख्ख्या खानदानाचा वजनी लेखाजोखाच मांडला. 

आता त्याचं (किंवा तिचं) असं होतं की ती पंजाबी होती. मेदस्वी असणं हे वंशपरंपरागत. त्यातही फॅमिली बिझनेस आलिशान दारूचं दुकान. सगळी उच्चकोटीची गिऱ्हाईकं. बिझनेस करता करता त्यांच्या बरोबर पिणं ही आलंच व आपसूक खाणंही. तेही प्रमाणाबाहेर. पुन्हा ते पंजाबी खाणं. मक्के की रोटी सरसों का साग, तेलतर्री व पनीरचा बोलबाला. शिवाय लस्सीचा मारा, मलई मार के. प्रकरण तसं गंभीरच होतं. म्हणजे वजन कमी करण्याबाबत. “मला हे सुटलेलं शरीर नकोसं झालंय. मी विशीत जशी शिडशिडीत होते तसं मला पुन्हा व्हायचंय.”  चाळिशीची असूनही नव्वदीला टेकलेल्या स्थूलदेहधारिणीने निक्षून सांगितले. 

“तुम्ही योग्य वेळी व योग्य ठिकाणी आलात. काळजी करू नका. मात्र तुमचा विशीतला एखादा फोटो असेल तर अवश्य दाखवा, म्हणजे शिडशिडीत असण्याची तुमची व्याख्या तरी कळेल!! ” असं मी म्हणताच तिने लागलीच मोबाईल काढून, दोन मिनिटे स्क्रोल करून एका सुंदर तरूणीचा फोटो मला दाखवला. कुणीही तिच्या प्रेमात पडावं असा!! मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तरीही विचारून घेतलं, “या तुम्हीच का?” यावर, “म्हणजे काय?” म्हणत, गोड लाजत तिने मान हलवली. आता आव्हान माझ्यापुढे होतं. गोल गरगरीत असण्यापेक्षा सुडौल असणं ही तिची प्रबळ इच्छा होती. वय फारसं उलटलेलं नव्हतं, तेव्हा तिला आश्वस्त करणं भाग होतं. तिची थोडक्यात हिस्ट्री घेतली तर तिने आयुष्याचा पटच रंगवला. नाशिक हे तिचं माहेर, इंदोर हे सासर. माहेराकडून मिळालेला वजनी वारसा सासरीही निभावला गेला. “खाना कंट्रोल ही नहीं होता हे पालुपद तिने कितीतरी वेळा उच्चारलेले. संयुक्त कुटुंबाचा गोतावळा, घरी पैपाहुण्यांचा राबता. खाणंपिणं याची रेलचेल. तरी “एवढ्यात पिणं मी कमी केलंय, वजन वाढत गेलं तसं, पण तेही थोडंफार सवयीचंच झालंय.” निर्विकारपणे तिने सांगितलं. “ ते अगोदर बंद करावं लागेल!” असं मी म्हटलं रे म्हटलं तिचा चेहेरा पडला. तरीही स्वतःला सावरत ती विशालकाय निश्चयाने उद्गारली, “ मैं कुछ भी करूंगी, मलाच हे ओझं सहन होत नाही. इतर तंदुरुस्त बायका पाहिल्या की माझा जळफळाट होतो, त्यांची डौलदार चाल, त्यांचे नखरे, फिगर मेंटेन केल्याचा अभिमान पाहून मी कष्टी होतेच होते. माझं वय काही फार नाही. इतक्या लवकर मी जाडगेलेसी कशी काय झाली याचं मलाच नवल वाटतं, तेव्हा इतर बायकांच्या बरोबरीने नव्हे पण त्यातल्यात्यात चांगलं दिसावं ही माझी तळमळ, मळमळ काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण आहे.”  तिने तिचा न्यूनगंड उघड केला. सहानुभूती वाटावी अशीच तिची जटिल समस्या! खरंतर तिचा विशीतला फोटो डोळ्यासमोरून हलत नव्हता. तसं असलं तर कुणीही सहज स्टेटस म्हणून ठेवला असता मोबाईलमधे. सिनेतारकांपेक्षाही ती उजवीच होती तेव्हा. तेव्हा तिला पुनश्च तिचं वैभव मिळवून द्यायचं याचा विडा मी उचललाच! 

तिचा न्यूनगंड घालवणं आवश्यक होतं. मी म्हटलं, “देखो, गोल गरगरीत असणं हा काही गुन्हा नाही. राऊंड हाही एक शेपच आहे. त्यात बदल करणं एकदम सोपं नाही, तसेच अवघडही नाही. वेळ लागेल, काही तपासण्या, काही पथ्यपाणी, व्यायाम शिवाय औषधं याने तुम्ही बरंच काही मिळवू शकाल, आयमीन घालवू शकाल! तेव्हा काळजी करू नका. ” 

आतापर्यंत चेहेऱ्यावर ताण घेऊन बसलेली ती एकेकाळची सौंदर्यवती आता थोडीफार प्रफुल्लित दिसायला लागली. वजन कमी होऊ शकतं असं म्हणणारा जणू मीच पहिला भेटलो असावा या आविर्भावात तिने सांगितलं, “माझा नवरा सहा महिन्यांसाठी कॅनेडात गेलाय, तो परत यायला आठ महिनेही लागू शकतील. मुलं ही बोर्डिंग स्कुलला शिकतात. तेव्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा माझा इरादा आहे. तुम्ही सांगाल ते पथ्यपाणी, गोळ्या औषधं सगळं करेन पण मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय! ”

एक डॉक्टर म्हणून मला तिच्या कटात सामील होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिचा विशीतला फोटो नजरे समोर ठेऊन !! 

(४/३/२०२४ रोजी झालेल्या ‘ वर्ल्ड ओबेसिटी डे ‘ निमित्त.) 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

केस विंचरताना छोटे झालेले, काहीसे पांढरे आणि थोडे कुरळे केस विंचरताना मनात आलं की, हेच का ते आपले लांब सडक केस! त्यांची आता रया गेली आहे! विचार करता करता केसांचा जीवनातील बदल माझ्या डोळ्यासमोर येत गेला….

बाळ जन्माला आलं की त्याला बघायला येणारे लोक त्याचा रंग,नाक, डोळे याबरोबरच त्याच्या जावळावर चर्चा करीत असतात.

एखाद्या बाळाला खूप जावळ असते तर एखादे बाळ एकदम टकलू असते! मग त्यावरून ते कोणाच्या वळणावर गेलं आहे, यावर बायका चवी चवीने बोलत असतात. त्यातून ती मुलगी असेल तर बघायलाच नको. तिची आजी तिच्या लांब सडक होणाऱ्या केसांची वेणी घालण्याची स्वप्ने बघू लागते. साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी लांब सडक केस हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. अंबाडा, खोपा यातून बाहेर येऊन स्त्रिया लांब सडक वेणी कडे वळल्या होत्या तो काळ! अजूनही दक्षिणेत लांब सडक केसांचे महत्त्व जास्त दिसते आणि त्या केसावर कायमच गजरा आणि फुले माळली जातात.

माझ्या लहानपणी आई आणि आजी दोघी बेळगाव, रत्नागिरी भागात राहिलेल्या असल्याने केसांचे कौतुक फार! दर रविवारी सकाळी केसांना तेल चोपडले जाई. पाटावर बसायचं, चार बोटं तेलाची जमिनीवर टेकवायची आणि केसांनाच काय पण हात पाय, पाठ, तेल लावून चोळून घ्यायचं! तेव्हा ते नको वाटायचं, पण सक्तीचंच असे. नंतर बंब भर पाणी तापवलेले असे. गवला कचरा (सुगंधी वनस्पती) घालून केलेली शिकेकाई  आमच्याकडे भरपूर असे. मग काय अभ्यंग स्नानाचा थाट!

कोकणात पावसाच्या दिवसात केस वाळायचे नाहीत म्हणून आई तव्यावर थोडे निखारे टाकून त्यात धूप घालायची, त्यावर एक टोपले पालथे घालून मंद आचेवर केस सुकवून द्यायची.तेव्हा त्याचा असा काही सुगंध घरभर दरवळायचा की बस! अजून ते सुगंधी दिवस आठवतात!

ओले केस वाळवण्यासाठी त्याची बट वेणी घालून दुपारपर्यंत केस वाळले की  आई केसांच्या कधी दोन तर कधी चार वेण्या घालून द्यायची. घरातल्या फुलांचा गजरा माळला की, इतर कोणत्याही वेशभूषाची गरज लागायची नाही. आम्हा सर्व मैत्रिणीचे केस लांब सडक होते, पण देशावर आल्यावर हे सर्व बदलले. कोकणात पाणी आणि हवा लांब केसाला पोषक आहे, तसेच जे लोक मासे खातात त्यांचे केस तर विशेष तुकतुकीत असतात! असे हे लांब केस मिरवीत माझे कॉलेज शिक्षण संपले.

लग्नात लांब केसांची वेणी घालून उभी राहिले. मुलीचे लांब केस ही जणू लग्नातली एक अटच वाटत असे त्याकाळी! पुढे बाळंतपणात केसांची लांबी आणि जाडी थोडी कमी झाली. आणि केसांचे प्रेम ही कमी झाले .चाळीशी च्या आसपास केसांचे शेंडे कमी केले की केस वाढतात असा समज होता आणि नाहीच वाढले तर आणखी थोडे कापून “पोनि टेल” वर येतात, तसंच माझं झालं! केसात रुपेरी चांदी दिसू लागल्यावर इतक्यात पांढरे केस दिसायला नको म्हणून वेगवेगळे डाय आणि मेहंदी लावली. त्याचा परिणाम म्हणून केस आणखीनच  कमी होऊ लागले. माझे मोठे दीर म्हणायचे,

“Once you dye, you have to dye, until you die..!”

तसं केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. केसाचा अनुवंशिक गुण हाही महत्त्वाचा आहे .काहींचे केस मुळातच दाट असतात तर काहींचे मुळातच विरळ असतात. माझ्या परिचयातील कोकणातील एक आजी साठीच्या होत्या, पण त्यांचे केस पांढरे शुभ्र झाले तरी लांब सडक होते, तर दुसऱ्या आजी  85 वर्षाच्या होत्या, तरी केस लांब आणि काळेभोर होते. एकंदरीत कोकणातील स्त्रियांचे केस खास असत!

अलीकडे प्रदूषण, हवेतील रखरखीत पणा, तेल न लावणे यामुळे केसांची वाढ कमी झाली आहे असे वाटते. केसांची निगा राखायला वेळ मिळत नाही आणि आधुनिकतेच्या नावाखाली केस कापणे ओघानेच होत आहे. अर्थात कापलेले केस ही मेंटेन करावे लागतात. नाहीतर आमच्या आईच्या भाषेत डोक्याचा अगदी “शिपतर”(टोपले )झालंय असं म्हटलं जाई! अगदी जन्मापासून केसांमध्ये असा हळूहळू बदल होत जातो. वयाबरोबर केसांची रया जाते.

नकळत आरशात बघताना  किती उन्हाळे- पावसाळे या केसांनी पाहिले हे जाणवते आणि नुसत्या उन्हा पावसानेच नाही तर अनुभवाने हे पांढरे झालेले केस विचारांची परिपक्वता दाखवत डोक्यावर शिल्लक आहेत असे उगीचच वाटते! असो, कालाय तस्मै  नमः! केसासारख्या छोट्याशा नाजूक विषयावर सुद्धा त्याच्या बदलत्या रंग रूपाचं वर्णन हे असं करावसं  वाटले !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ सायकलवाली आई … लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.     

आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही. 

ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची .

गळ्यात चार मणी, हातात दोनच  काचेच्या बांगड्या. 

माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. 

त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे. 

लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश. 

तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. 

जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.

हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! 

ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता  ,कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE (right to education) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 

एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंग मध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …

” अग तो बघ तो!

तो first आला ना, 

so मी  second आले …” 

आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. 

मी त्याची paper sheet पाहिली … 

मोत्यासारखं सुंदर अक्षर …! 

अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले ,

” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? “

माझे डोळे संताप ओकत होते. 

त्याची आई शांतपणे म्हणाली ,

” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना! ”  

….. सणसणीत चपराक. 

मी निरुत्तर. 

मी खोचकपणे विचारलं, 

“कोणत्या क्लासला पाठवता याला?”

 ती म्हणाली,

” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे!’

हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. 

ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .

पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली. ….

” टिचरने खूप कौतुक केले  त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत, म्हणाल्या..फक्त थोडे बोलता येत नाहीत म्हणाल्या . त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ” मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले … 

” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यात पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसलीं. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.

मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”,  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लर मधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा”, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा ” स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी  ” जोहरी मम्मा ” … ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे. *फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक..  

लेखिका : सुश्री यशश्री रहाळकर

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

सहल पहावी करून ! ☆ श्री मनोज मेहता 

मी खरंतर एकट्याने फिरणारा फिरस्ता. माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकट्याने ६०% भारत भ्रमंती केली होती.

वपण लग्न झाल्यावर अनेकदा आम्ही म्हणजे, सौ.मधुरा व दोन्ही कन्यांसह स्वतः प्लॅन करून फिरायला जायचो. माझ्या गप्पा मारण्याच्या सवयीने अनेक लहान- मोठ्यांच्या ओळखी डोंबिवलीत होऊ लागल्या होत्या. त्यातील एक म्हणजे श्री.व सौ.दुनाखे दांपत्य. त्यांचा स्वतःचा ‘मधुचंदा ‘ नावाचा पर्यटन व्यवसाय. ते एकदा सहज गप्पांच्या ओघात म्हणाले ,’चला मनोजभै तुम्हीपण आमच्या बरोबर, सिमला-कुलू-मनालीला ! म्हटलं किती खर्च येईल? आम्ही दोघं व दोन लहान मुली. ही गोष्ट १९९७ सालची हं. तेव्हा चंद्रकांत दुनाखे म्हणाले २१००० रूपये. मी विचार केला आणि म्हणालो, ‘मी आत्ता अर्धे देईन, बाकीचे आल्यावर महिन्याभरात देईन, चालेल का ? त्यावर लगेच सौ.निलिमा दुनाखेंनी होकार दर्शवला. आणि दिल्ली-सिमला-कुलू-मनाली, असा  खऱ्या अर्थाने समूह सहलीचा आमचा प्रवास सुरु झाला. राजधानीने सकाळी दिल्लीत पोचल्यावर, श्री.दुनाखे यांनी दिल्ली स्थानकावरच आमचे स्वागत केले आणि  मग छान आरामशीर बसप्रवास सुरु झाला.

बसमध्ये मी इतका वेळ शांत कसा बसणार ? माझ्यासाठी मोठाच प्रश्न होता. म्हटलं चला आता अन् सुरू झालो. मी स्वतःची व माझ्या कुटुंबाची ओळख सांगितल्यावर प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला. ही ओळखपरेड संपली नि लगेचच जेवणाचा थांबा आला. मस्त सरसोका साग, मक्के की रोटी अन् लय भारी जम्बो लस्सी, क्या बात है! तिथल्या सरदारजी मालकाने सर्वांचे अगत्याने स्वागत करून, आग्रहाने खाऊ घातले. पाजी, की लाऊ जी? लगेच मैं बोल्या, ‘सरदार, अब मेरा पेट फाडेगा क्या? ‘,असं म्हणताच सरदारजी आणि नुकतीच ओळख झालेली मंडळी व त्यांची लहान मुलं खळखळून हसायला लागली.

आपला मित्र सर्वांच्या मनांत भरला ना राव!

असो, सुमारे नऊ तासांच्या प्रवासानंतर आम्ही  सारे, रात्री सिमल्याला पोचलो. बसमधून उतरताच प्रचंड थंडीने आमचे स्वागत केले अन् मग लगोलग मोठ्या मोठ्या खोल्या असलेल्या हॉटेलात जाऊन जेवण करून, सगळे गुडुप! सकाळी नाष्टा करून निघालो की बसने ! चक्क दोन दिवस सिमला दर्शन ! मॉल रोड, कुफरी, चाडविक फॉल्स,जाखू हिल, सिमला राज्य संग्रहालय, समर हिल अशी सर्वांग सुंदर स्थळं  पाहून पुन्हा त्याच अप्रतिम हॉटेलात रात्री मुक्काम ! तिसऱ्या दिवशी सकाळी चहा, नाष्टा करून कुलूचा प्रवास सुरु झाला. चौफेर निसर्गाचं विलोभनीय दर्शन करत करत गाने तो बनता है ना ! मध्येच सुसु ,जेवण -चहा पॉईंट इत्यादि करत-करत संध्याकाळी कुलूला पोचलो.

अप्रतिम बंगलेवजा हॉटेल, क्या बात है ! आणि हिमाचल प्रदेशातील जेवण म्हणजे लाजवाब हो !  दुनाखेंनी कुलूला पोचल्यावर दुसऱ्या दिवसांपासून ते मनाली सोडेस्तोवर मात्र आपलं बुवा हं,  म्हणजे मराठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय केली होती .

तर मंडळी, बियास नदीच्या खोऱ्याच्या भागाला कुलू  म्हणतात. ताज्या भाज्या, मसाले, औषधी वनस्पती, गहू, मका, तुती, देवदार, बार्लीची शेती हा इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय ! इथली गरीब घरातली मुलं सुद्धा कसली गोड दिसतात हो ! आरोग्यकारक उष्मोदकाचे झरे असल्याने, विहार व विश्राम यांसाठी कुलूला प्रवासी पुष्कळ येतात. येथील प्राचीन हिंदू मंदिरांवरील शिल्प प्रेक्षणीय आहे. त्यामुळे छोटेखानी स्वर्ग असलेल्या कुलूला वेगळेच महत्व आले आहे. दोन दिवस कुलू व्हॅली भटकंती करून, पाचव्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता मनालीकडे निघालो.

कुलू ते मनाली माझ्या अंदाजाने बसने प्रवास ५६ किमी.चा. घाटाघाटातून प्रवास करत अखेर मनालीच्या टुमदार हॉटेलात पोचलो, अन् जेवण करून मनालीतील छोटेखानी मॉलरोडवर फिरायला गेलो. मधुचंदाच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारला. श्री.व सौ.दुनाखे यांचं व्यवस्थापन एकदम चोख, मानलं राव ! सहाव्या दिवशी हिडिंबा मंदिर पहात असताना तर मला काय फोटो मिळाला! मी जाम खूष. जुन्या मनालीतील मनु मंदिर पाहून परत भोजन व आराम करून नागरगढी हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी गेलो, त्याचं किती वर्णन करू तितकं कमीच.

सातव्या दिवशी नेहरू कुंड व विविध पारंपरिक वस्तू आणि इमारतींच्या प्रतिकृती असलेले, हिमाचलचा वारसा प्रदर्शित करणारे, लहानसे संग्रहालय पाहिले आणि संध्याकाळी मस्त आराम केला. आठव्या दिवशी सकाळी – सकाळी सुप्रसिद्ध रोहतांगपास या बर्फाच्छादित रुपडं असलेल्या, प्रसिद्ध ठिकाणी पोचलो. गमबूट, कोट, हातमोजे, टोपी प्रत्येकाच्या आकाराप्रमाणे परिधान करत, चालतोय चालतोय!आलटून -पालटून दोन्ही मुलींना कडेवर घेत, कसेबसे पोचलो अन् समोर जणू काही सिनेमातील दृश्य  अवतरलेलं! आपण आपल्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष पाहतोय, यावर विश्वासच बसेना, असा कोसो-दूर पसरलेला बर्फ !आहाहा! आमच्या पैकी बरेच जण  चक्क बर्फावर आडवे झालो. नंतर अर्थातच एकमेकांवर हो हो, तीच फेका-फेकी आम्हीही केली बरं.  पण -पण काहींच्या विकेट जायला सुरवात ना, कारण गमबुटात बर्फ गेल्यामुळे बधिर पणा यायला लागला आणि मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत नुसती धमाल व रडारड की! अन् तिथून सर्वांचे पाय बसकडे वळायला लागले. किती लांब ती बस? त्याला इकडे बोलवा ना ! अखेर हुश्श हुश्श करत सगळेच एकदा भाड्याचे सामान परत देऊन कसे-बसे बसपर्यंत पोचलो. आत जाऊन कधी एकदा बसतोय असं झालं ना ! हु §हु§हु§ बसमध्ये कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, चिडीचूप! 🤗

दुपारी दोनच्या सुमारास हॉटेल मध्ये पोचलो बुआ. त्यादिवशी सगळ्यांनी साडेतिनला गरम -गरम जेवणावर ताव मारला अन गुडुप! संध्याकाळी हळूहळू खोलीच्या बाहेर येऊन, चहाचे घोट घेत, कसली फाटली ना! याचीच चर्चा. पुन्हा गमती-जमती व जेवण करून गप्पांचा फड रंगला आणि हळूहळू आपल्या खोलीत रवाना. इकडे मी आमच्या खोलीत आलो आणि मधुराला कापरं भरलं. मी जाम टरकलो. लगेच सौ.दुनाखे वहिनींना बोलावलं. त्यांनी स्थानिक डॉ.ना फोनाफोनी सुरू केली, पण कोणी फोन उचलेना. कारण मनालीत त्यावेळी संध्याकाळी ७ नंतर सगळे डॉ.भेटणार नाही हं, असं म्हणायचे. मग हॉटेलची मालकीण आली, तिनं बघितलं आणि पांच मिनिटांत आख्खी ब्रँडीची बाटली आणून मधुराच्या पूर्ण शरीराला, तिने ब्रँडीने मसाज केला. एका तासानं ती शुद्धीवर आली अन् आम्ही सारे हुश्श! त्या पंजाबी मालकीणीने सांगितलं,’ ऐसा किसी किसीको होता है, जादा थंड में जाके आने के बाद ऐसा होता है! त्या पंजाबन बाईने एक पैसा घेतला नाही हा तिचा दिलदारपणा हो. ‘ये तो मेरी महमान है जी!’ सलाम त्या माउलीला.

या संपूर्ण प्रवासात सौ.मधुराला मी दम दिला होता, मी छायाचित्रकार आहे हे कोणालाही सांगायचं नाही, नाहीतर मला सहलीचा आनंदच घेता आला नसता. आणि तिने ही गुप्तता पाळली चक्क. 🤗

नवव्या दिवशी आम्ही नाष्टा करून बाप्पा मोरया करत, बसमधून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच दिल्लीला निघालो. मनालीहून निघालेली बस अडीच तासात कुलू-मनालीच्या मध्येच बंद पडली. आम्ही वाट बघून खाली उतरलो, ड्रायव्हर आणि क्लीनर काय नक्की झालं ते बघत होते. कारण गेले दहा दिवस बसने कुठेही कुरकुर केली नव्हती. नेमकी बंद पडली आणि तीही रस्त्याच्या मधोमध  ना! त्यावेळेस घाटाच्या खाली कुठेही काहीही नव्हतं, फक्त रस्ता, सुंदर निसर्ग व बियास नदीच्या पाण्याचा खळाळता गोड आवाज! एका तासाने समजलं पाटा तुटला अन् बस दुरुस्त व्हायला

किमान ८/९ तास तरी लागतील, होईल हेही नक्की नाही. झालं, नुसता गोंधळ, आमचं विमान / रेल्वेचं आरक्षण आहे ते चुकणार, आता काय होणार, मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे. हो, आणि ९७ साली मोबाईल नव्हते व आजूबाजूला कुठंही फोन नव्हते. नाही म्हटलं तरी सहल आयोजक पण गोंधळून गेले ना! आम्ही रस्त्यावरच कडेला उभे होतो, तितक्यात श्री.दुनाखे म्हणाले, कोणाचंही नुकसान झाल्यास मी भरपाई देईन हे नक्की! त्यांची काहीच चूक नसताना हे  सांगणं, ही खरंच हिम्मत लागते! ती त्यांनी दाखवली. मला धरमशालाला जाऊन दुसऱ्या बसची सोय करावी लागेल, आणि मगच सर्वांना घेऊन निघावं लागेल. पण यासाठी संध्याकाळ होईल. मी म्हटलं तुम्ही ट्रक वगैरे जी दिसेल त्या गाडीने निघा, मी सांभाळतो सगळ्यांना अन् ते रवाना झाले.

गोंधळ  नुसता वाढतच चाललेला! मी सर्वांना शांत करत परिस्थितीची कल्पना दिली, आता कृपया शांत रहा अन्यथा काहीही होणार नाही.

मी दोघांना घेऊन रस्त्यावर पुढे चालत निघालो. अर्ध्या तासानं छोटं मंदिर दिसलं अन् माझ्या जीवात जीव आला. तिथं पोचल्यावर आत एक माणूस होता, त्याला विचारलं, स्टो वगैरे काही आहे का? सर्व कल्पना दिल्यावर त्याने होकार दिला अन आम्ही खूष झालो. बिचारा सामान घेऊन बस थांबली तिथं आला, त्यानं आडोसा पाहून स्टो पेटवला. मग दुनाखेंचे आचारी होते त्यांनी चहा बनवला. नंतर भात व डाळ शिजायला ठेवली.

इकडे मंडळींना चहा दिल्यामुळे, सगळे शांत झाले होते. आता मी वहिनींची परवानगी घेऊन, बसचा ताबा घेतला. मी फर्मान सोडलं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गमतीदार प्रसंग सांगा, असे म्हणताच एक एक करत बोलू लागले. कोणी म्हणालं लग्न झालं, मुलगा /मुलगी जन्मले / आई बाबांची पुण्याई / माझी कॉलेज मधली मैत्रीण, नेमकी माझ्याच गळ्यात पडली / लॉटरी५० रु. ची लागली / एकजण म्हणाले तुम्हीच भेटला / आमच्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिलाच हनिमून वगैरे करता -करता चक्क ३ तास हशा-टाळ्यात कसे गेले ते समजलंच नाही. मी लगेच खाली उतरून जेवण तयार झालं ना ते बघितलं आणि सर्वांना खाली उतरवलं व सांगितलं थोडं रस्त्याखाली या, इथं थोडी बसायला जागा आहे . सर्व मंडळींचं भोजन उरकेपर्यंत दुपारचे ३ वाजले. मी हुश्श झालो, दुनाखे वहिनी तर मनोमन माझे आभार मानत होत्या. मी म्हटलं लोकं ओरडणार हो साहजिक आहे, पण किती वेळ ओरडतील? 😂

नंतर ज्यांना डुलकी घ्यायची ते बसमध्ये गुडूप, आणि मी चहा बनवण्याच्या तयारीला. संध्याकाळी तिकडे अंधार लवकर पडतो.५ वाजता चहा दिला मंडळी एकदम खूष. केव्हा येणार दुनाखे, कसे येणार, असं करता -करता, रात्री ९ ला श्री.दुनाखे दुसरी बस घेऊन आले आणि सर्व सामान भरून, आपली आपली पार्सलं बसमध्ये बसली अन् गाडी बुला रही है करत, सकाळी दिल्लीत पोचलो.

मंडळी मधुचंदा ट्रॅव्हल्स, उत्तम सोयी, भोजन आणि भरभरून देणारे दुनाखे दांपत्य, काय आणि किती  सांगू ?

आज मधुचंदा खूप मोठी झाली आहे. मुलगा चेतन व सून सौ.अनुजा दोघेही तितकीच काळजी घेतात व देशविदेशात आनंदाने व सुखरूप फिरायला घेऊन जातात.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“विश्वास” हा शब्द वाचायला एक सेकंद, विचार करायला एक तास आणि समजायला एक वर्ष लागतं….मात्र तो सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं…! 

नात्यांचा “श्वास” हा विश्वासावर चालतो…!!! 

जेव्हा विश्वास उडून जातो, तेव्हा हि नाती खळ्ळकन् फुटून जातात… फुटलेले तुकडे पुन्हा जोडायचं म्हटलं तरी ते पुन्हा नव्या सारखे होत नाहीत…. 

फाटलेल्या कपड्याला शिवण घातली तरी शिवण दिसायचीच….! 

असेच फुटलेले तुकडे आणि फाटलेल्या चिंध्या रस्त्यावर पडून आहेत वर्षानुवर्षे… ! 

असेच गोळा केलेले तुकडे एकत्र करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे…. 

आणि फाटलेल्या चिंध्याना शिवण घालण्याचा प्रयत्न करत आहे…

आमच्या खेड्यात याला “वाकळ” म्हणतात…! 

मला ही वाकळ खूप आवडते, कारण या वाकळी मध्ये साडी पासून सफारी पर्यंत आणि सफारी पासून लेंग्यापर्यंत सर्व चिंध्या एकमेकांचे हात धरून सोबत राहतात…. मला रस्त्यावर भेटणाऱ्या भिक्षेकर्यांचही असंच आहे…  रावा पासून रंकापर्यंत आणि रंकापासून रावापर्यंत येथे सर्वजण सापडतात…. 

आयुष्यभर या चींध्यांनी अपमानाचे चटके सहन केलेले असतात…. कदाचित म्हणूनच वाकळ जास्त उबदार असते….!

अशा या दिसायला बेढब …चित्र विचित्र….  मळखाऊ…. चींध्यांनी बनलेल्या, तरीही उबदार वाकळीचा फेब्रुवारी महिन्यातील “शिवणप्रवास” आपणास सविनय सादर !!! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. या महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन प्रौढ महिला भेटल्या. तिघींचीही मुलं मोठी आहेत. धुणं भांडी करून, कुणाचीही साथ नसताना; खस्ता खाऊन, मुलांना मोठं केलं, मुलांनी संसार मांडले. पुढे मुलांना आईचं ओझं झेपेना… मुलांनी तीनही आईंना घराच्या बाहेर काढले….

या आईंनी पोरांची हाता पाया पडून गयावया केली….

मुलं म्हणाली, ‘आई आजपर्यंत काय केलंस तू आमच्यासाठी… ?’  पण … या आईला ऐनवेळी काहीच आठवेना…

मुलं म्हणाली, ‘आजपर्यंत काय राखून ठेवलंस आई तू आमच्यासाठी… ? ‘.. यावर या आईला काहीच बोलवेना… 

मुलं म्हणाली, ‘तू आमच्या भविष्याची काय तजवीज करून ठेवलीस, म्हणून मी आता तुला सांभाळू ?  सांग ना … ? आताही या आईला काहीच सांगता येईना… 

आई नेहमीच स्वतःच्या दुःखाची “वजाबाकी” करून जन्माला घातलेल्या पोरांच्या सुखाची “बेरीज” करत जाते… 

स्वतःच्या ताटातल्या भाकरीचा “भागाकार” करून, पोराच्या ताटात चतकोर चतकोर भाकरीचा “गुणाकार” करत जाते…. 

उपाशी राहूनही आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधान कसं ? याचं “गणित” पोराला शेवटपर्यंत सुटत नाही…! 

आणि इतकं सारं करूनही, आयुष्याच्या शेवटी आईच्या पदरात, “बाकी” म्हणुन एक भला मोठ्ठा “शून्य” येतो…

पोरांसाठी आयुष्यभर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करून जगातली ती सगळ्यात मोठी गणितज्ञ होते…

‘ आई, मग हे तुझ्या आयुष्याचं गणित असं का ?’

असं एखाद्या आईला विचारलं, तर तेव्हा सुद्धा आईकडे उत्तर नसतंच… 

कारण…. कारण…. आईला कुठं हिशोब येतो…??? 

जमा खर्चाची नोंद तिनं कधी केलेलीच नसते…. 

कारण आईला कुठे हिशोब येतो ??? 

यातील दोन आईंना स्थिर हातगाडी घेऊन दिली आहे. विक्री योग्य साहित्य घेऊन दिले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. 

एका आईला वजन काटा घेऊन दिला आहे.  

पोरांना आईचा “भार” झेपला नाही म्हणून, स्वतःच्या म्हातारपणाचं “ओझं” स्वतःच्याच डोक्यावर घेऊन, या तिन्ही आई स्वतःचं “वजन” सावरत निघाल्या आहेत, आता पैलतीराच्या प्रवासाला…!!!

मी फक्त साक्षीदार….

  1. मराठीत”अंध पंगु न्याय” असा एक वाक्प्रचार आहे…

तो असा: अंध व्यक्तीने पंगू (अपंग /दिव्यांग) व्यक्तीला खांद्यावर घ्यावे…. अंध व्यक्ती चालत राहील आणि पंगू व्यक्ती, अंध व्यक्तीला खांद्यावर बसून दिशा दाखवत राहील… इथे एकमेकांना साथ देऊन दोघांचेही काम भागते…! 

याचाच उपयोग करून, अपंग महिला…. ज्यांना शिवणकाम येते; अशांना यापूर्वी आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिले आहे, त्यांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी आपण कापड देत आहोत, यानंतर शिवलेल्या पिशव्या भीक मागणाऱ्या अंध व्यक्तींना विकायला देत आहोत… 

येणारा नफा दोघांमध्ये समसमान वाटत आहोत…

“अंध पंगु न्याय”… दुसरं काय… ? 

वैद्यकीय

  1.   रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासंबंधी सुचवत आहोत आणि त्यांना व्यवसाय सुद्धा टाकून देत आहोत.
  2. अनेक आज्यांच्या कानाच्या तपासण्या केल्या आणि ऐकायचे मशीन त्यांना मांडके हियरिंग सर्व्हिसेस पुणे येथून घेऊन दिले आहे.
  1. अनेक भिक्षेकर्‍यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करवून घेऊन डोळ्यांची ऑपरेशन्स केली तथा त्यांना चष्मे घेऊन दिले आहेत.

लहानपणी पोराला “नजर” लागू नये म्हणून “दृष्ट” काढणारी आई… 

तीच पोरं मोठी झाल्यावर आईला “दृष्टीआड” करतात… 

कालांतराने रस्त्यावर आलेली हि आई गुपचूप देवाघरी निघून जाते… 

तरीही पोरांचे “डोळे” उघडत नाहीत…! 

आई बाप जिवंत असताना त्यांना दोन घास जेऊ घालत नाहीत आणि मेल्यावर मात्र पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन् तास बसून राहतात… 

मला नेहमी असं वाटतं, माणसांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याआधी, “दृष्टिकोनाची” शस्त्रक्रिया करायला हवी…!!! 

अन्नपूर्णा

जगात सगळ्यात जवळचं कोण ??? 

कोणाचं काहीही उत्तर असेल…. 

माझ्या मते, प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची असते ती भूक…

जगातला सर्वात सुंदर सुवास कोणता….? 

भूक लागलेली असताना, भाकरी किंवा चपाती भाजतानाचा घमघमाट, हा जगातला सर्वात सुंदर सुवास आहे …

प्रत्येकाच्या आयुष्यातले भूक आणि भाकरी हेच दोन मुख्य गुरुजी ….

आपण झोपल्यावर सुद्धा जी जागी असते…. ती भुक….

न मरताही आयुष्यभर चितेवर जळायला लावते…. ती भुक…

आयुष्यात काहीही करायला लावते…. ती भुक…

घुंगरू न घालताही अक्षरशः नाचायला लावते…. ती भुक…. 

या भुकेसाठी, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक दुर्बल कुटुंबांकडून आपण डबे विकत घेऊन त्यांना उपजीविकेचे साधन देत आहोत.

हे डबे घेऊन आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

भाकरीचा सुगंध वाटण्याचे काम आम्हाला मिळालं…. निसर्गाचे आम्ही ऋणी आहोत….! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

मनातलं काही …. 

  1. माझ्या आयुष्याच्या चढउतारांवर आणि कामात आलेल्या अनुभवांवर एक पुस्तक छापलं आहे…. एकाच वर्षात या पुस्तकाच्या 3000 प्रती खपल्या. हे सुद्धा श्रेय समाजाचं….

या पुस्तकाच्या विक्रीतून भीक मागणाऱ्या ५२ मुलांचे आपण शिक्षण करत आहोत 

आता एप्रिल महिन्यामध्ये शिक्षणाचा हा अवाढव्य खर्च माझ्या अंगावर पडेल…. कोणाला जर माझं पुस्तक हवं असेल तर मला नक्की कळवावे …. पुस्तकाचे देणगी मूल्य पाचशे रुपये आहे…. ! 

हाच पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरला जाईल. (आमचा एक मुलगा यावर्षी इन्स्पेक्टर होऊ इच्छितो, दुसरी मुलगी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे, तिसरा मुलगा कॉम्प्युटर्स सायन्स करत आहे आणि चौथी मुलगी कलेक्टर व्हायचे स्वप्न बघत आहे)

या सर्वांचे शिक्षण माझ्या पुस्तकावर अवलंबून आहे…

  1. येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त, या वर्षात ज्या महिलांनी भीक मागणे सोडले आहे, अशा ताईंना आपण भावाच्या भूमिकेतून साडीचोळी करणार आहोत….

ज्या मुलींनी भिक मागणे सोडून शिक्षणाची वाट धरली आहे , अशा माझ्या मुलींना, बापाच्या भूमिकेतून ड्रेस घेऊन देणार आहोत. 

इथे ड्रेस आणि साडी महत्त्वाची नाही …. 

आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून मिळणारा सन्मान महत्त्वाचा… 

जागतिक महिला दिनाच्या या, एकाच दिवशी, मी मुलगा होईन….बाप होईन आणि भाऊ सुद्धा… ! 

या परते अजून मोठे भाग्य कोणते…??? 

निसर्गाने मला पितृत्व आणि मातृत्व दोन्ही दिलं…! 

बघता बघता, दिवस न जाताही , “आई” झालो की राव मी….!!!! 

बस्स, जीने को और क्या चाहिये…. ??? 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्त्री – एक उत्तम व्यवस्थापिका” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “स्त्री : एक उत्तम व्यवस्थापिका…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

स्त्रीला आचार्य अत्रे यांनी इस्त्रीची उपमा दिली कारण ती नवऱ्याच्या विस्कटलेल्या जीवनाला इस्त्री करते.

स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका सफाईदारपणे बजावू शकते. माता, पत्नी, सून, मुलगी, बहिण, भावजय, नणंद आणि सखी, कधी दूर्गा, कधी सरस्वती तर कधी लक्ष्मी.

तिला उपजतच व्यवस्थापन कला, मल्टी टास्कींग, टाईम मॅनेजमेंट जमते.

घरातल्या सर्वांच्या वेळा सांभाळणे,सर्वांना समजून घेणे,नोकर माणसांकडून कामे करवून घेणे, त्यांच्या गैरहजेरीत ती कामे स्वतः उरकणे,सकाळी दूध गरम करण्यापासून ते रात्री झोपताना ओटा आवरेपर्यंत तिची मॅनेजमेंट चालूच असते.

हेच तिचे उपजत कौशल्य ती जेव्हा उद्योजक बनते तेव्हा तिला उपयोगी पडते.

माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी काही टिपा देत आहे.

मनाचा कणखरपणा वाढविणे…

शांता शेळके म्हणतात,स्त्री, काळोखात हळूच डोळे पुसणारी. 

ती मनाने हळवी असल्यामुळे, सासूबाई रागे भरल्या, नवरा तिच्यावर क्षुल्लक कारणासाठी चिडला तरी तिचे डोळे झरू लागतात. पण अश्रू हे दुर्बलता दर्शवितात.

व्यवसायात रोजचाच दिवस एक आव्हान असते. कधी कुठले संकट समोर येईल हे सांगता येत नाही.

अगदी छोट्या गोष्टी, कधी फॅक्टरीत ब्रेकडाऊन, कधी डिलीव्हरी अर्जंट असते आणि नेमकी वीज जाते.

कधी टेम्पोचा संप असतो. कधी कुणी कामगार नेमका गैरहजर असतो. कधी कच्चा माल वेळेवर पोहचत नाही. कधी कस्टममधे माल अडकतो व डॅमेरेज चढत जाते. कधी ग्राहकांच्या तक्रारी, तर कधी सरकारची शुक्लकाष्ठे, …. मारुतीच्या शेपटासारखी ही यादी संपणारी नाही.

अशावेळी रडून चालत नाही. संकटाशी सामना करायला शिकले पाहिजे.

मी माझ्या एका मोठ्या ग्राहकाकडे पेमेंट मागण्यासाठी गेले होते. मोठी रक्कम होती म्हणून स्वतः गेले होते.

त्याने मला बराच वेळ बाहेर बसवून ठेवले. त्याची कंपनी लाॅसमधे होती म्हणून तो कुणाचेच पेमेंट करत नव्हता असे समजले. कारण माझ्यासारखेच बरेच जण बाहेर ताटकळत बसले होते.

मी त्याच्या केबिनमधे गेल्यावर तो वसकन् मला म्हणाला, “ मी तुमचे पेमेंट देणार नाही, गेट आऊट प्लीज.”  

मी बाहेर आले. पण माझे इतके पैसे बुडतात समजल्यावर,आणि माझा इतका अपमान त्याने केल्यावर मला रडू आले. लिफ्टमधून खाली उतरेपर्यंत, गाडीत बसेपर्यंत माझे डोळे झरत होते.

माझा सेल्स मॅनेजर म्हणाला, “ मॅडम तुमच्यासारख्या देवीचा त्याने अपमान केला.”

तीन दिवसांनी त्याचा पेपरमधे फोटो आला. त्याने केलेल्या स्कॅममुळे त्याला अटक झाली होती.

तेव्हापासून ठरवले ,आपण रडायचे नाही. आपले अश्रू इतके स्वस्त नाहीत.

संवाद साधण्याची कला 

स्त्री ही मूळातच मृदू भाषिणी असते.याचा उपयोग तिने मार्केटिंग मधे करावा. आपली विकायची वस्तू  ग्राहकाला आवडली पाहिजे. त्याची किंमत त्याला पटली पाहिजे.आणि ती वस्तू त्याने आपल्याकडूनच विकत घ्यावी असे त्याला वाटले पाहिजे यासाठी ग्राहकांबरोबर सुसंवाद साधण्याचे कौशल्य तिने वाढवावे.

तसेच आपल्या हाताखालच्या माणसांना सूचना देताना, दूरच्या साईटवर असणाऱ्यांना सुद्धा सूचना देताना त्या त्यांना नीट समजतील, संदिग्धता राहणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्याला नेमके काय पाहिजे हे कम्यूनिकेट करता येणे फार महत्वाचे असते.

व्यवसायात आपल्याला कच्चा माल पुरवणारे सप्लायर्स, फायनान्स करणारी बॅन्क, ग्राहक,कामगार,पदोपदी वेगवेगळ्या पातळीवरच्या माणसांशी संबंध येणार. यांच्याशी परस्पर सुसंवाद साधता आला तर बरीच कामे सोपी होतात.

सुसंवाद म्हणजे नेमके काय?

समोरच्या व्यक्तीला न दुखावता,त्याच्या इगोला ठेच न पोहचवता, त्याची बाजू नीट ऐकून घेऊन,त्याला सन्मान देऊन बोलता येणे. तसेच पत्रव्यवहार करताना पत्रातील भाषा फार सांभाळून लिहीली पाहिजे. बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी चालतो परंतु लिहिताना नेटके व मोजकेच लिहावे.

मलाही या गोष्टी शिकाव्या लागल्या.

आज व्यवसाय सुरू करून ४५वर्षे झाली. माझे जुने व नवे ग्राहक, आमचे संबंध सलोख्याचे आहेत.

जुने कामगार रिटायर व्हायला मागत नाहीत. 

कायद्याचे ज्ञान…

उद्योजकाला प्रत्येक कायदा माहीत असतो असे नाही. परंतु माहिती जरूर करून घ्यावी.

उदा. दरवर्षी डिसेंबर महीन्यात फॅक्टरी लायसन्स रिन्यू करायचे असते. पहिल्या वर्षी मी विसरले.

जानेवारी महिन्यात रिन्यू करायला गेले तर ७०००रूपये दंड भरावा लागला.

मी अमेरिकेतून जाॅगिंग मशीन मागवली होती. कंपनीने मला मशीनसोबत एक बेल्ट फुकट पाठविला होता.म्हणून बिलात बेल्टची किंमत शून्य लिहिली होती. मी जेव्हा ड्यूटी भरायला गेले तेव्हा माझ्यावर अंडर इन्वाॅइसचा गुन्हा ठोकला. केवळ अज्ञानामुळे आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. छोट्या चुका सुद्धा महाग पडतात.

म्हणून कुठलीही गोष्ट करताना हे पडताळून पहावे

‘Is it legally right?’

स्वतःची उन्नती….

व्यवसायात प्रगती साधायची असेल तर प्रथम स्वतःला उन्नत करणे जरूरी आहे.

आपली कार्यक्षमता वाढवायची, आपली पोटेन्शियलस वाढवायची. स्वतःला अपग्रेड करत रहायचे.

वाचन, प्रवास व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधायचा. स्वतःच्या चुका सुधारायच्या. 

चांगल्या गोष्टींचे अनुकरण, इतर व्यक्तींचे चांगले गुण टिपायचे.

मी माझ्या वडीलांचे निरीक्षण करून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांची फोनवर बोलायची पद्धत,डिक्टेशन द्यायची पद्धत, फायलिंग कसे करायचे, बिझिनेस पत्रे कशी लिहायची, दिलेली वेळ कशी पाळायची, नोट्स कशा लिहायच्या — अशा खूप गोष्टी…. ते माझे आदर्श होते.

ते म्हणायचे कुठलाही निर्णय घेताना आधी स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा. स्वतःला अपराधीपणाची भावना असेल, स्वतःच्या नजरेतून आपण उतरणार असू तर तो निर्णय  कितीही  फायद्याचा असला तरी तो चुकीचाच.

शेवटी निर्मितीचा आनंद हाच खरा नफा…

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

कळत नकळत आपल्या जीवनाची जडणघडण होत असताना कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यातील जागा  ठळकपणे ठरत जातात. आपले कुटुंबीय, आपले गुरुजन, आपले सखे सोबती,अफाट निसर्ग, इतकेच नव्हे तर आपले प्रतिस्पर्धी, विरोधक यांना सुद्धा आपल्या जीवनात कोणते ना कोणते स्थान असतेच.

माझेही जीवन  यापेक्षा वेगळे नाही. पण जेव्हा जेव्हा मी सखोलपणे माझ्या वर्तमान आणि गतायुष्याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की  मला आयुष्यात खूप काही मिळालं ते भाषिक साहित्यातून. कथा, कादंबऱ्या, कविता,चरित्रं, ललित साहित्याचा हात धरूनच मी वाढले आणि गद्य आयुष्य जगत असताना पद्यांनी माझ्या भोवती सदैव एक हिरवळ जपून ठेवली.

या माझ्या जीवनात कवितांचे स्थान काय याचा विचार करत असताना मनात आलं ही कविता तर माझ्यासोबत जन्मानंतरच नव्हे तर जन्मापूर्वीही होतीच की! मातेच्या उदरात वाढत असताना

। ये ग ये ग विठाबाई।

। दहीभाताची उंडी घालीन तुझ्या तोंडी।

 ।कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।

हले हा नंदाघरी पाळणा।। 

किंवा 

कन्हैया बजाव बजाव मुरली।  

…. अशी अनेक गाणी माझ्या आईने तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला गोंजारून म्हटलीच असणार आणि ते नाद ते शब्द माझ्यात, गर्भात असतानाच झिरपले नाही का?

त्याच माझ्या मातेने मांडीवर थोपटत “निज निज रे लडिवाळा” किंवा “ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये”  “आडगूळ मडगुळ सोन्याचं कडगुळं” अशी कितीतरी बडबड गीतं गाऊन मला जोजवलं, वाढवलं.

“ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही”

असेच म्हणत मला झोपेतून जागं केलं. त्यावेळच्या या बाल कवितेने जीवनातला केवढा तरी मोठा आशय नंतर दाखवलाही.

जेवू घालताना तिने

“ चांदोमामा चांदोमामा भागलास का?” म्हणत माझ्या मुखी अमृततुल्य वरण भाताचे घास भरवले.

कधी रडले, कधी रुसले तर,

“ रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसू तिकडून आला बाई कोणीतरी खुदकन हसू” शिवाय “लहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

“ पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोटा”

“ ये ग ये ग सरी माझे मडके भरी” अशा अनेक गीतांनी माझं बालपण बहरलं. मला सदैव हसवलं, आनंदी ठेवलं आणि संस्कारितही केलं.

केव्हातरी रात्र उलटून गेली…  बालपण सरलं  पण कवितांनी कधीच सोबत सोडली नाही. त्यावेळी अंकुरलेल्या   कोवळ्या प्रीतीच्या भावना जाणवणारे उद्गार मीही कागदावर  उतरवले असतील.त्या कविता मात्र फक्त माझ्या आणि माझ्या अंतर्मनात घुमणारी स्पंदने होती.

त्यावेळी 

“जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते” या काव्य शब्दांनी माझ्याही मनातली अव्यक्त, अनामिक हुरहुर जाणवून दिली होती.

आयुष्याचे कितीतरी टप्पे ओलांडले. तळपत्या उन्हात रस्त्यावरचे वृक्ष जसे सावली देतात ना तशी शितल छाया मला केशवसुत, पाडगावकर, विंदा, बोरकर, ग्रेस, वसंत बापट, शांताबाई, बहिणाबाई, इंदिरा संत आणि कितीतरी…. यांच्या कवितांनी दिली.

 विमनस्कपणे स्वपदे उचलीत

 रस्त्यातुन मी होतो हिंडत 

एका खिडकीतून सूर तदा पडले 

दिड दा दिड दा दिड दा…

केशवसुतांच्या या सतारीच्या बोलांनी तर कित्येक वेळा माझ्या आयुष्यात दाटलेला काळोख दूर केलेला आहे.

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा..”

या काव्यांने तर जादूच केली म्हणा ना! सकारात्मक जीवन जगण्यासाठी जणूं काही मजबूत दरवाजे उघडून दिले..

 झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे

 लाटांवर

 पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमाली वरती 

फुलराणी खेळत होती…

बालकवींच्या या कवितांनी तर निसर्गाशी मैत्रीच घडवली. वृक्षवेलींशी संवाद साधला.

 “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

या बहिणाबाईंच्या रसाळ काव्यपंक्तींतून तर जीवनातल्या तत्त्वज्ञानाचे कोडे अगदी सहजपणे सोडवले. काळ्या मातीशी नातं जोडलं.

कवी ग्रेस संपूर्णपणे नाही उमगले. पण

 “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवत होता…”

 या ओळींनी मन अक्षरशः घनव्याकुळ झाले.

 हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय

 कुडकुडणारे हे जीव 

पाहू नको, डोळे शिव!

 नको पाहू जिणे भकास

 ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडेल श्वास

 विसर यांना, दाब कढ

 माझ्या मना बन दगड…

 विंदांनी तर खिळे ठोकावे तसे शब्द आणि विचार मनावर अक्षरशः ठोकले. आणि दमदारपणे जगण्याची कणखर प्रेरणा दिली.

 “माझी मैना गावाकडे राहिली

 माझ्या जीवाची होतीया काहिली” शाहीर अण्णाभाऊंच्या या कवितांनी तर अनेक वेदनांना उघडं केलं.

 “होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

 देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे …

गुरु ठाकूर यांचे हे गीत खरोखरच मनातले अंधारलेले कप्पे क्षणात उजळून टाकतात. आधार देतात.

अशा कितीतरी कविता …

आयुष्यात उचललेल्या प्रत्येक पावला सोबत येत गेल्या. कविता माझ्या जीवनात सदैव सावली सारख्या सोबत असतात. 

“तेरी आवाज मे कोई ना आये

 तो फिर चल अकेला रे, 

यदि सभी मुख मोड रहे सब डरा करे 

 तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ

 अपनी बात बोल अकेला रे

 तेरे आवाज पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे 

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेने जीवन वाटेवरचे काटे अगदी सहजपणे वेचायला शिकवले, नव्हे त्या काट्यांनाच बोथट केले.

कवितांचे आपल्या जीवनात  स्थान काय याविषयी काही भाष्य करताना मी वर्ड्सवर्थच्याच  शब्दात म्हणेन

FOR OFT WHEN ON MY COUCH I LIE

IN VACCANT OR IN PENSIVE MOOD 

THEY FLASH UPON THAT INWARD EYE

WHICH IS THE BLISS OF MY SOLITUDE

AND THEN MY HEART WITH PLEASURE FILLS

AND DANCES WITH THE DAFFODILS….

जेव्हां मी एकटी असते, उदास लेटलेली असते तेव्हां खरोखरच —रेताड, रुक्ष  वाळवंटात ठिकठिकाणी उगवलेली सोनेरी डॅफोडील ची फुले जशी मनाला प्रसन्न करतात तसं कवितांनी माझं मन टवटवीत ठेवलं.

 अंगणात प्राजक्ताचा सडा बरसावा  तसे कवितांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे शिंपण केले.

 कवितांच्या अथांग सागराने माझी जीवन नौका  डुबु  दिली नाही. तिला पैल तीरावर सांभाळून नेले.

 जोडीदाराच्या हातात हात घालून पैल तीर गाठतानाही सुहास पंडितांच्या या काव्यपंक्तीच मनावर रेंगाळतात.

धकाधकीच्या जीवनातले 

क्षण शांतीचे वेचून घेऊ 

तुडुंब भरले कुंभ सुखाचे

 हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता

 जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता

 गाठू विश्रांतीचा पार जुना….

मातीतून मातीकडे जाताना, मातीत पेरलेल्या या  महान कवींच्या कवितांनी आयुष्यभर दीपस्तंभ सारखी सोबत केली. बेडा पार किया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ लाखमोलाची पुडी ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ लाखमोलाची पुडी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

माझा एक मित्र आहे. अवि नावाचा.आयुर्वेदाचा डॉक्टर आहे तो.आता डॉक्टरच म्हटल्यावर काही ना काही कारणाने त्याच्याकडे जाणे होतेच.

त्याच्याकडे गेले की नेहमीचे दृश्य. पितळी खलबत्त्यात तो औषधे कुटत असतो.बाजुच्या टेबलवर कागदाचे चौकोनी तुकडे मांडून ठेवलेले असतात.साधारण पंचवीस तीस तुकडे.तीन बाय तीन इंचाचे.औषध कुटुन झाल्यावर तो त्या प्रत्येक कागदावर ती पुड टाकत जातो. अगदीच समप्रमाणात. बरोबर शेवटच्या कागदापर्यंत पुरतं ते औषध. समोरच एक लाकडी मांडणी. त्यात छोट्या छोट्या डब्या. औषधांच्याच. एखादी डबी घ्यायची. त्यातील एक एक गोळी प्रत्येक कागदावर ठेवायची. मधुनच पेशंट अजुन काही तरी एखादी तब्येतीची तक्रार सांगतो.

“ठिकेय..देतो औषध त्याच्यातच टाकून”

मग अजुन एखाद्या डबी उघडतो.बारीक चमचाच्या टोकाने कुठली तरी पुड त्या कागदांवर टाकतो.काळी पुड..तपकिरी पुड..लाल गोळी.. पांढरी गोळी.. प्रत्येक कागदावर आहे ना हे बघतो.सगळी औषध योजना मनासारखी झाली याची खात्री पटली की एक एक पुडी बांधायला घेतो.

अगदी कुशलतेने तीन चार घड्या घातल्या की इंचभर लांबीची अगदी घट्ट पुडी तयार होते. एवढ्या पुड्या बांधायला वेळ लागतोच.एकदा मी त्याच्या मदतीला धावलो.माझा व्यवसाय सोनाराचा.सोन्याच्या दागिन्यांच्या पुड्या बांधायची सवय असतेच.तसं अवीला..म्हणजे डॉक्टरांना सांगितलं.

तो म्हणाला..

“अरे बाबा..तुमच्या पुड्या म्हणजे लाखमोलाच्या पुड्या..”

छोटी असते ती पुडी.. मोठा असतो तो पुडा. पण ते बांधणे म्हणजे कौशल्याचेच काम.किराणा दुकानात आता सगळं वाणसामान पैक केलेलं असतं,पण पुर्वी गिर्हाईकाच्या ऑर्डर नुसार बांधुन द्यायचे.राजाभाऊ जोशींचं किराणा दुकान होतं आमच्या गल्लीत. काही आणायला गेलं की ते ,पेपर घेऊन त्याच्या बाजुची पट्टी टर्रकन फाडायचे.ती त्या पेपरवर ठेऊन काट्यामध्ये ठेवायचे.मग रवा,साखर काय असेल ते काट्यामध्ये टाकुन वजन झाले की तो कागद अगदी कुशलतेने उचलुन दोन्ही हात उंचावून त्याच्या घट्ट पुडा बांधायचे.त्यावर एकावर एक दोर्याचे फेरे लपेटायचे..दोर्याचा बंडल दिसायचा नाही.प्रश्न पडायचा की हा दोरा येतोय कुठुन.पण असा छान आणि घट्ट पुडा बांधायचे ना ते..कुठुन कागदाच्या फटीतून रवा साखर बाहेर येण्याची शक्यताच नाही.

कधी चिवडा आणायला जावे.त्याचाही पुडा असाच बांधायचे.फक्त दोऱ्याचे चार पाच वेढे झाले की लाल रंगाचा चतकोर कागदी तुकडा त्यावर ठेवायचे.’कोंडाजी यांचा उत्तम चिवडा’..फेटा घातलेल्या कोंडाजी पहिलवानाचा फोटो.. त्या कागदावरुन पुन्हा दोरा गुंडाळायचे.नाशिक चिवड्याचा हा पुडा अखिल भारतात तेव्हापासून प्रसिद्ध होता.

कितीतरी पुडे आठवतात.कधी संध्याकाळी येताना गजरा आणावा. वेडावून टाकणारा मोगऱ्याचा गंध.हिरव्या मोठ्या पानात ठेऊन त्याची हलक्या हाताने बांधलेली पुडी. आतल्या नाजुक कळ्या कोमेजून जाऊ नाही म्हणून. हळुवारपणे तो खिशात ठेऊन आणायचो.

गुरुवारी एकमुखी दत्ताच्या दर्शनाचा नेम.जाताना रामसेतुजवळच्या पांडे मिठाई कडून पळसाच्या पानात बांधलेले चार पेढे. दत्तापुढे उघडून ठेवलेली ती पुडी. छोटासा गाभारा..धुपाच्या सुगंधाने भरलेला.. आणि भारलेला.सगळी मुर्ती फुलांना झाकुन गेलेली. त्यातून दिसणारा दत्ताचा तो तेजस्वी चेहरा.पाठीमागून येणारा ‘दिगंबरा..दिगंबरा..’ चा गजर..

दोरा न वापरता पुडी बांधणे ही एक कलाच आहे. आमचा व्यवसाय सोनारकामाचा. पुर्वी धर्मकाट्यावर वजन करण्यासाठी जावे लागायचे. म्हटलं तर खुप अवघड काम. तिथे गर्दीत उभं रहायचं..आपला नंबर आला की हळुच पुडी उघडायची..त्यातले सोन्याचे मणी तिथल्या लहान वाटीत टाकायचे..वजन झालं की पुन्हा त्याची पुडी बांधायची.हे सगळं गर्दीत.. उभ्यानेच. एखादा मणी सुध्दा खाली पडता कामा नये.

पण एक गोष्ट नक्की. सोन्याच्या दागिन्यांची पुडी बांधावी तर आमच्या दादांनीच..म्हणजे वडिलांनी.

पेपरचा साधासाच चौकोनी कागद.. त्यावर त्याच आकाराचा गुलाबी कागद. या गुलाबी कागदाची रंगछटा खुपच आगळी. त्यावर सोन्याचा दागिना जेवढा खुलुन दिसतो ना..तेवढा कशावरच नाही. तर त्या गुलाबी कागदावर ठेवलेलं ते गंठण.सोन्याच्या तारेत गुंफलेलं..खाली ठसठशीत मंगळसूत्राच्या दोन वाट्या.अतिशय सुबकपणे एक उजवी घडी..एक डावी घडी घालत दादा त्याची पुडी बांधत. त्यातही एक नजाकत होती.आजकालच्या शेकडो रुपयांच्या ज्वेलरी बॉक्सला मागे सारणारी ती मंगळसूत्राची पुडी.. अवी म्हणतो तश्शीच…. अगदी ‘लाखमोलाची पुडी’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

धर्म म्हणजे काय ?

तर माझ्या मते धर्म म्हणजे एक आदर्श जीवन पद्धती आहे.

नियम आणि चौकटी धर्माने आखून दिलेल्या आहेत.

त्यांचे योग्य तऱ्हेने पालन करून जीवन जगावे .असे जीवन आनंददायी आहे .

 

अगदी सकाळी ऊठल्यानंतर  अंथरुणावरून खाली उतरण्याच्या आधीच गादीवर बसून  …

प्रार्थना केली जाते…

“कराग्रे वसते लक्ष्मी 

करमुले सरस्वती

करमध्ये तु गोविंदा

प्रभाते कर दर्शनम्

समुद्र वसने देवी

पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यमं 

पादस्पर्श क्षमस्व मे…”

हे पृथ्वी माते माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार म्हणून क्षमा याचना करून दिवसाची सुरुवात करायची.

 

हे म्हणताना शब्दातून आपोआप लीनता येते. आपली कृतज्ञता दाखवली जाते.

हात जोडले जातात..

नंतर नित्यकर्म सुरू….

आंघोळ करून देव पूजा …

तेव्हा मग स्तोत्र – मंत्र आरती……..

 

मात्र हे नुसतं म्हणायचे नसतात ..

त्यात शिकवण असते …मनाची समजूत असते… 

तसे देवाचे प्रेम आणि माया पण असते .

त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे भावार्थ समजून घेऊन ती म्हणायची असतात.

 

संकटात दुःखात मनाला त्यांचा फार मोठा आधार असतो.

फुलांनी सजलेल देवघर,मंद तेवणारी समई,उजळलेली निरांजन बघताना मनात  सदभावना दाटून येते.

 

सकाळ अशी सात्विकतेने सुरू झाली की दिवस आपोआप निरामय आनंदात जातो.

हे नुसतं म्हणणं नाही तर याचे पाठांतर पण हवे ….

यासाठी अभ्यास हवा..

त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा …

 

आणि मग ते स्तोत्र – मंत्र शांतपणे डोळे मिटून एकांतात म्हटले की मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही .

त्याचा अनुभव घ्यायला हवा.

 

जेवताना…

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे….”.म्हणावे..

मग ते साधे जेवण होत नाही तो  यज्ञ कर्म  होतो हे …  मार्मिकपणे सांगून ठेवले आहे .

याला आयुर्वेदाचा आधार आहे….

“सीताकांत स्मरण जय जय राम…”

 म्हटल्यानंतर त्या अन्नाकडे बघायची आपली दृष्टी बदलते .

अन्न उत्तम रीतीने पचते .घरच्या गृहिणीने कष्ट घेऊन ते बनवलेले असते. त्याचा आपोआप मान राखला जातो .पवित्रता जपली जाते .

 

म्हणूनच त्याला पूर्णब्रह्म म्हटलेले आहे …..

 

हे रोज म्हणायला जमणार नाही पण सणावारी …रविवारी म्हणून तर बघा आपला आपल्यालाच आनंद वाटतो.

 

शाळेत आजही सरस्वती मातेला प्रथम वंदन केले जाते .

“या कुंदेंदु तुषारहार धवला

या शुभ्र वस्त्रावृता…”

असे म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली जाते .तिच्याकडे आमची जडता (अज्ञान) दूर कर अशी विनवणी करायची. मात्र त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहेत.  आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचे आहे.

 

मनाचे श्लोक ,अथर्वशीर्ष ,पसायदान हे शाळेत म्हणून घेतले जाते.पाठ करून घेतले जाते.

 कदाचित त्या वयात अर्थ लक्षात येत नाही .पण मोठे झाल्यानंतर तो आपोआप बरोबर कळतो… समजतो..

हेच ते संस्कार….

हुरहुर  लावणारी संध्याकाळ… दिवेलावणीची वेळ  झालेली असते… तेव्हा देवासमोरचा दिवा लावला जातो … तेवढ्या मंद प्रकाशाचाही आधार वाटतो…क्षणभर हात जोडले जातात.

“शुभंकरोती कल्याणम्…” म्हणायचं ..आरोग्यम् धनसंपदा हे किती वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलं आहे .सवयीने आपण ते म्हणतो पण ते कृतीतही यायला हवं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

निरामय आरोग्यासाठी आपला आहार विहार योग्य असायला हवा. जाताजाता केवढी शिकवण दिलेली आहे. आपण सहजपणे नेहमी  म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही…

 

रात्री झोपायच्या वेळी शरण आलेल्या लोकांचे क्लेश दु:ख दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार करायचा .

“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः”

 

असा संपूर्ण दिवस प्रार्थनेने संस्काराने आपोआप बांधला गेला आहे.

त्याचे एक संरक्षित आवरण आपल्या भोवती असते. त्यात आपल्याला सुरक्षित वाटते.

एक अदृश्य शक्ती आहे ती मला सांभाळते आहे… हा मनात विश्वास असतो .

संकट येत नाही तोपर्यंत काही वाटत नाही .मात्र ते आले की आपण आपोआपच परमेश्वराला शरण जातो. मस्तक टेकवले जाते. हात जोडले जातात.. त्या क्षणी त्या एकाचाच आधार आहे  हे आपल्या अंतरंगातून आपल्याला जाणवते.

.. आणि मग त्याची प्रार्थना अजूनच आर्ततेनी  केली जाते. 

मनापासून जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती प्रार्थना सफल होते..

 

 आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात इतकं सगळं म्हटलं जात नाही.

 हेही तितकच अगदी खरं आहे .

नाही म्हटलं गेलं तरी चालेल …

पण दिवसातून एकदा अगदी मनापासून त्याला हाक दिली त्याची आळवणी केली तरी ती त्याच्या पर्यंत पोहोचते….

 किती वेळा काय काय म्हणतो… हेही महत्त्वाचे नाही .

आतूनच जाणीव होऊन खरं खरं  त्याच्याशी बोलायचे…

 त्याला सांगायचे….

अभ्यास वाढला की सांगणे पण कमी होते…

तो सर्वज्ञच आहे….

याची जाणीव होते..

 

इतके सारे ज्ञान भांडार आपल्या हाताशी आहे. पूर्वजांनी हा ठेवा  देऊन ठेवलेला आहे.

 

 शब्दांचा फार मोठा आधार असतो. त्या जगनियंत्त्याला शरण जाऊ…

आपली विनवणी त्याच्यापर्यंत पोहोचेलच….. तो विश्वास मात्र मनात हवा.

तो असला की पुढचे सगळे सोपे होते.

“सर्वेपि सुखिनः:सन्तु सर्वे संन्तु निरामया:

सर्वे भद्राणी  पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात…”

.. .. रात्री झोपताना सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करायची.

आपल्याही नकळत आपला दिवस असा जातो…..

 

हाच तो धर्म…… प्रत्येकाचा आपला आपला धर्म असतो.आणि तो त्याप्रमाणे वागत असतो.

सर्व धर्मात हीच शिकवण असते .. शब्द फक्त बदलतात…..

 

यासाठी  दिवसाच्या चोवीस  तासांतील फक्त काही मिनिट आपल्याला  द्यावी लागतील.

 प्रत्येकाला सुखी शांत आणि आनंदी जीवनाची आस असते, तसंच प्रत्येकाचा ही एक स्वतःचा असा

” धर्म.”…….असतो.

मला काय म्हणायचे आहे तुम्हाला समजले असेलच…. 

त्याप्रमाणे आचरण करून निश्चिंत  जीवन जगूयात. 

शुभं भवतु…..

श्री कृष्णार्पणमस्तु…. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता 

मला पक्कं आठवतंय मी ५वीत होतो आणि आमच्या बंगल्यात भावाने हौसेने गुलाबाची रोपे आणून कुंडीत लावली होती, कुंड्या  मी माझा मोठा भाऊ क्रांती व सख्खा शेजारी जिवलग मित्र पूनम दुर्वे त्यावेळेस धारावी कुंभारवाड्यातून येथून टेक्सिने दादर तिथून लोकलने आणल्याचे स्मरणात आहे, सुमारे ५०/६० कुंड्यात वेगवेगळी गुलाबाची रोपे लावली होती त्याला रोज पाणी घालणे, खत घालणे, पाने खुरडणे, कीड असल्यास ती टूथब्रशच्या साहाय्याने घासून काढून रोगोर नावाचे औषध फवारायचे,  ह्यात मी बघून बघून तरबेज होत नंतर मी हेच काम करायला लागलो अन डोळ्यावर फांदी कापायची. या सगळ्याची फळे मिळण्यास सुमारे ६ महिने गेले की, मग काय एकेदिवशी सकाळी बघतो तर आख्खी गच्ची गुलाबाच्या फुलांनी डवरून गेलेली, 🤗झपकन वाटावे आपण काश्मिरात तर नाही ना ! इतका आनंद आमच्या घरातील प्रत्येकाला झाला होता. बरं तोडायची नाहीत पाकळ्या गळून गेल्या की व्यवस्थित पाहून तो भाग कापायचा. ते पाहायला डोंबिवलीकर सेलिब्रेटी यायचे. असं एक महिना सुरू राहीलं की. आणि एके दिवशी चक्क लहानशा मुलीने भल्या पहाटे डेरिंग करून ती गच्चीतील फुले हातात येतील तेव्हडी तोडली व पळाली ना शेजारच्या प्रतिभा दुर्वे काकीने सांगितले म्हणून कळले तरी.

मग मी दोन दिवसांनी घरातील कोणालाही न सांगता पहाटे उठून ती फुले व्यवस्थित कापून पिशवीत भरली आणि सकाळी बरोब्बर ७ वाजता डोंबिवली पूर्वेला रेल्वे तिकीट घराजवळ उभा राहून ती अंदाजे दोनशे गुलाबाची फुल दोन तासात विकून अभिमानाने घरी आलो.

अर्थातच समाचार झालाच कुठे गेला होतास वगैरे वगैरे…  माझे ऐकल्यावर मोठ्या भावाचा तिळपापड झाला खूप आरडाओरडा तुला अक्कल नाही दीडशहाणा आहेस ढुंगण घुवायची अक्कल नाही असो…..

त्यादिवशीच संध्याकाळी वडिलांपर्यंत बातमी आली आणि पुन्हा घरातच न्यायालय ना. त्यातून माझे वडील म्हणजे कै. कैलासचंद्र मेहता नामवंत कामगार कायदा तज्ज्ञ.

खरं म्हणजे त्यावेळेस परमपूज्य पिताश्रींसमोर बोलायचे म्हणजे चड्डीतच सुसू व्हायची ना! पण धीर एकवटून मी का ही फुलं विकली हे सांगावे लागले आणि काय सांगू तुम्हाला न्यायालयाचा निकाल चक्क माझ्या बाजूने लागला. वडिलांनी सांगितले त्याने कोणताही गुन्हा केला नाही उलट स्वावलंबाने व धाडसाने ही फुल विकली एरव्ही रोज फुकट जाण्यापेक्षा ती कोणाला कामाला आली मनोजच्या या कामाला माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे. अशा प्रकारे मी गुलाबाची फुलं अभिमानाने विकू लागलो अगदी २५ पैसे, ५०पैसे, ते चक्क १ रूपायालाही विकायचो. ही गोष्ट १९७० ची हं. म्हणजे माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली म्हणा ना. इतक्या लहानवयात लोकांशी आणि मुख्य म्हणजे बायकांशी कसे बोलावे याची रीतसर शिक्षणाची गुरुकिल्ली या मुक्तविद्यापीठातून शिकायला मिळाली. कोणतीही लज्जा न बाळगता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम करू द्यावे / करावे या मताशी आजही मी पक्का ठाम आहे. माझ्या दोन्ही मुली आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवतात हे पाहून मन नक्कीच प्रफुल्लीत होते.

जसा गुलाबाचा मौसम तसे माझे मुक्त दुकान जोरात असायचे, नंतर माझ्या भावाला कळून चुकले की त्याने जे त्यावेळेस ५ हजार रुपये या गुलाबाच्या वेडापायी घातले होते ते मी मिळवून तर दिलेच पुन्हा व्याजही मिळू लागले. जितके मिळत होते ते सर्व सुपूर्द करून पुन्हा शाळा – अभ्यास – खेळ यात रमून जायचो. पण मला मात्र पैशाचा व्यवहार कधीच कळला नाही त्यामुळेच कदाचित मी आजही खूप सुखी आहे. थोडक्यात काय कोणतीही लाज न बाळगता आपल्या आवडीचे काम करा ते छोटे मोठे मी कसं करू लोकं काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका. आपल्या मुलांना त्यांची आवड ओळखून मोकळीक द्यावी हे नक्की. आपल्या इच्छा मुलांवर लादू नये हे कळकळीचे सांगणे. मला कडक शिस्तीचे व माझ्यावर प्रेम करत नकळत संस्कार करणाऱ्या माझ्या वडिलांना भावाला माझा विनम्र प्रणाम व नमस्कार.💓🙏💓

(ही कथा आवडल्यास लेखकाच्या नावासह आणि कथेत कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.)

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print