मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साबुदाण्याची उसळ– ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साबुदाण्याची उसळ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

‘नववधू प्रिया मी बावरते’ असे होते ते दिवस.  “उगवत्या  चंद्राला  लागली रजनीची  चाहूल…. माजगावकरांची  कन्या  गोपीनाथ रावांच्या संसारात  ठेवते  पाऊल.  .” असा काहीसा कुणीतरी शिकवलेला   घोटून घोटून  पाठ  केलेला उखाणा अडखळत  धडधडत मी घेतला  खरा  पण डोळ्यासमोर काजवे चमकत  होते. कसं असेल बाई हे सासरच  गाव ? आपण अस्सल पुणेरी आणि सासर अस्सल खान्देशी.. त्यातून भुसावळ कधी  पाह्यलेलं पण नाही. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात डोकं खुपसतांना नकाशात  ठिपका  बघितला  होता. बस एवढीच काय ती त्या गावाची ओळख. आणि आता तर सगळं आयुष्यच  काढायचय   तिथे.  मनात भीती,  हुरहूर  सगळ्या भावनांचं   मिश्रण होतं. त्यातून . महाराष्ट्र एस्प्रेसचा  बारा तासांचा  प्रवास. दुसऱ्या गाडीने गेलं तर मनमाडला गाडी बदलावी लागायची  . मनमाड स्टेशन हें sssभलं मोठ्ठ, आणि तें  बघून मॅडच  व्हायची वेळ यायची.  तर अशा ह्या भुसावळ गावांत माझा गृहप्रवेश झाला.  खान्देशी आमटी जिभेला चव  आणायची,  तर ठेचा  आणि भरीत  मेंदूला झटका देऊन डोळ्यात पाणी आणायचं.  पण माझी खरी  त्रेधा तिरपीट उडाली ती  खान्देशी भाषेशी हात मिळवणी करतांना.         

एकदा काय झालं, बस स्टॉपवर उभी  होते .एका आजी बाईंना विचारलं,” बस गेली का हो आजी?”   खडया आंवाजात  उत्तर आलं , ” बस कवांच चालली गेली.  सरळ जाऊन  फाकली बी असलं ., ”  अरे बाप रे ! फाकली काय,  चालली  गेली काय,  माझ्या मेंदूला काही अर्थ बोधच  होईना.   काय करावं  ?   हे गावात  वाट बघत  असतील. मी भांबावून उभीच . तोवर आजींचा  दणदणीत आवाज कानावर पडला  , “आता  काय करून राह्यली तू ? तरणीताठी पोरगी हायेस.  जा कीं झपाझपा चालत. नायतर घरी  जाऊन दादल्या संगट ये सायकल वरन डब्ब् ल शीट. ” काय सांगू त्यांना,दादला घरी नाही तर गावात वाट बघतोय   म्हणून . मख्ख  उभी  राहयले. आता कुठला  नविन   गोंधळात  टाकणारा शब्द कानावर पडणार ह्या भीतीने गप्प बसले. बाईं गं ! धसकाच घेतला होता मी त्या आजींच्या शब्दांचा.                  अहो काय सांगु तुम्हाला ? दुसरी फजिती  माझी घरीच  झाली की हो !. त्याचं असं झालं  सासूबाईंचा  उपास होता.  आपली  पाककृती  दाखवून त्यांना खुश  करावं म्हणून मी  विचारलं .  “आई  काय करू उपवासाच ? कुणाशी  तरी बोलताना त्यांनी  उत्तर  दिलं. “कर की  साबुदाण्याची  उसळ”..  मी उडालेच.  बाप रे! साबुदाण्याची उसळ ? आणि आता हा कुठला नवीन पदार्थ ? 

माहेरी लाडोबा आणि त्यातून शेंडेफळ . मोठ्यां तिघी बहिणी,आई ,आत्या,     काकु अशा गृहकृत्यदक्ष अन्नपूर्णा होत्याच की घरात.त्यामुळे वहिनीवर  पण सून असून जबाबदारी नव्हती.  मग माझी काय कथा ! त्यातून माझी नोकरी.  स्वयंपाक घराशी  सबंध  खाण्यापुरताच . जरा इकडे तिकडे केल.,   कधीतरी  वरणाला  मोहरी जाळून सणसणित  फोडणी दिली, तरी वडील कौतुक   करायचे.   अशा  सुगरणीला  सासूबाईनी साबुदाण्याची उसळ करायला  सांगितली… दिवसा तारे चमकले  डोळ्यासमोर. सासूबाई वयानी माझ्यापेक्षा  बऱ्याच मोठया.  मला संकोच  आणि  भीती  वाटायची  त्यांची.  त्यातून त्या चार  बायकात बसलेल्या . साबुदाण्याची उसळ कशी  करायची ? हें त्यांना विचारू कसं बाई ?  अज्ञानाला आमंत्रणच कीं हो ! मनात नुसता गोंधळ   चालला  होता. साबुदाणा भिजेल पण ==पण त्याला मोड कसे आणायचे  ?   हे दिवे आईपुढे  पाजळावे.तर  फोनची  सोय पण  नव्हती तेव्हा.   तरी आई  लग्नाआधी  कानी कपाळी ओरडायची, स्वयंपाकाची सवंय ठेव  म्हणून.  आता काय करायच ? बसा आता रडत. घड्याळ तर पुढे सरकत होतं.  जरा वेळाने सासरे व सासूबाई फराळाला आत  येतील.   साबुदाणा तर केव्हाच   भिजवलाय., डोकं लढवून.  पण???त्याची उसळ???फराळाच्या ताटलीत सासऱ्यां पुढे  काय ठेऊ?    दरदरून घाम  फुटला मला.  आणि  मग  एकदम, शेजीबाई  आठवली.    मागच्या दाराने तिच्याकडेपळत गेले. ‘ ‘उसळीच ‘ अज्ञान तिच्या पुढे उघडं  केल.    तीने पण एवढंही येत नाही कां हीला?   अशा नजरेने बघून कृती  सांगितली.  आणि मग एकदम ट्यूब पेटली. ‘अय्या  !अगंबाई!    हीं  तर साबुदाण्याची खिचडी ..ही तर येते कीं  मला.सोप्पी तर आहे . उगीचच   घोळ   घातला बाई इतका वेळ .आणि अहो मग काय!खिचडी जमली कीं हो मला ! सासुबाई आणि सासरे एकदम खुश झाले,खिचडी खाऊन.  पण एक मात्र झालं हं! आपल्याकडच्या साबुदाण्याच्या खिचडी ला तिकडे ‘ साबुदाण्याची उसळ ‘ म्हणतात ह्या नविन शब्दाची ज्ञानात  भर  पडली.आणि तेव्हाच  साबुदाण्याची  उसळ पदार्थाचा शोध मला लागला. अशी खानदेशी भाषेशी फुगडी खेळता खेळता भुसावळ वास्तव्यातला बहिणाबाईंच्या भाषेतला ‘अरे संसार संसार ‘ पार पाडला. आणि बरं कां मंडळी!अजूनही बरेच किस्से आहेत बरं का ! पण आपली फजिती एकाचं वेळी सगळी सांगणं बरं नव्हे ! नाही का ?  सांगेन हं,पुढच्या वेळी,पुन्हा  कधी तरी ,  केव्हा  तरी…                     

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचे तात्या … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आमचे तात्या … ☆ श्री सुनील देशपांडे

श्री. विनायक दामोदर सावरकर  , आज आपल्या पश्चात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी उलटून गेला, पण आपण स्वातंत्र्यवीर की माफी वीर, हा वाद काही मिटता मिटत नाही. परवाच रणदीप हुडाने तयार केलेला आपल्या जीवनी वर आधारीत नवनिर्मित सिनेमा पाहिला आणि माझ्या मनात या द्वंद्वाने पुन्हा उचल खाल्ली. तुमच्या विषयींचे मनोगत, हे तुम्हाला सांगणेच योग्य म्हणून हा प्रपंच…..

प्रथमदर्शनी तर हेच दिसते आहे की चूक नव्हे प्रचंड मोठा अपराध हा तुमच्याकडूनच झाला आहे. संपूर्ण आयुष्यात तुम्ही लहानमोठ्या इतक्या चूका केलेल्या लक्षात येते की त्यामुळेच तुमच्या कार्यकर्तृत्वाची ही जी काही आजही उपेक्षा सुरू आहे, हे योग्यच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मी जरा जास्त स्पष्टपणे माझे मत मांडतो आहे, कृपया राग मानू नये. काय करणार…‌ तुमचाच स्पष्टवक्तेपणा कणभर का होईना झिरपला आहे… अर्थात हा दोषही तुमचाच.असो.

खरं पाहता छान शिष्यवृत्ती मिळालेली, त्या काळात विलायतेत राहून अभ्यास पूर्ण करून , बॅरिस्टरची पदवी पदरात पाडून, तिथेच सेटल व्हायचे , अथवा भारतात परतून तत्कालीन इतर बॅरिस्टर मंडळींप्रमाणे छान प्रॅक्टीस करत गडगंज पैसा कमवत ऐषोआरामाचे जीवन जगत केवळ एक छंद, टाईमपास म्हणून सवडी नुसार राजकारण करायचं, ही पद-पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणारी त्रिसूत्री अवलंबायची सोडून नको ते डोहाळे तुम्ही स्वताचे पुरवत बसलात. यात सर्वस्वी दोष तुमचाच आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. नेहरू, गांधी, जिन्ना यांची जीवनशैली, यशस्वीता , प्रसिद्धी पाहून सुद्धा तुम्हाला कधी आपला मार्ग तसूभरही बदलावा वाटला नाही हे एक महद् आश्चर्यच !!!!

अहो, तुम्ही शिक्षणासाठी विलायतेला गेलात आणि शिक्षणासोबत नको नको त्या गोष्टी करत राहिलात.स्वत: तर भरकटलातच पण सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासा पासून विचलीत करण्यात यशस्वी झालात. काय गरज होती १८५७ चे स्वातंत्र्य समर , सहा सोनेरी पाने अशी पुस्तके लिहिण्याची ? तुम्ही अभ्यास करत होता वकिलीचा आणि इकडे इतिहास संशोधन व दुरुस्ती. काय साधलं त्यातून ?? म्हणे दृष्टीकोन बदलायचा आहे. तुम्ही काय मानसशास्त्रज्ञ झाला होता ? अहो, जिथे गीता-ज्ञानेश्वरी वाचून काही फरक पडला नाही, राजा हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज प्रभृतींनी आपल्या जीवाचं रान केलं तरी ज्यांचा दृष्टीकोन बदलला नाही , असे आम्ही दगड , आणि तुम्ही अशा दगडांना घडवायला निघालात !!!!

१८५७ साली जे काही झालं , त्याला शिपायांचे बंड म्हणा किंवा भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले गेलेले सशस्त्र युद्ध म्हणा , त्याने काय मोठा फरक पडणार आहे ? सर्वसामान्य जनता तेव्हाही उदासीन होती व आजही उदासीनच आहे. कारण त्यातून भाकरी मिळत नाही तात्या. पोटाची भूक नाही भागत. राजकीय स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी जुन्या पिढीतली मंडळी अजूनही इंग्रजी राज्य होतं तेच बरं होतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसतात. काय आहे ना , की आम्हाला तुमच्या सारखे स्वताच्या सुखी संसाराला स्वताच्या हाताने चूड लावणे नाही पटत. तुमच्या हट्टापायी, देशप्रेमापायी तुम्हा दोघा भावांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण घराची अन्नान्न दशा झाली. तुमच्या वंशाच्या अस्तित्वावरच संकट आले…. क्षमा करा पण हा पूर्णपणे अव्यवहारी वेडाचार आहे. अहो, शिवाजी जन्माला यावा , त्याने रामराज्य निर्माण करावं , हे सगळे आदर्श वाचायला बोलायला ठीक आहेत.

….  पण हे सगळं शेजारच्या घरात, आम्ही त्याचे फायदे घेण्यात , सुखात भागीदार होण्यात नक्कीच धन्यता मानू , पण आम्हाला काही त्रास होता कामा नये, असेच धोरण असायला नको का ? जेणेकरुन आमच्या जीवनाची शांती, सुरक्षितता, आमची लाईफस्टाईल कुठेही बाधीत होणार नाही, आणि याची काळजी मलाच कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायला हवी ,    ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी “

आपण मात्र प्रत्येक क्षणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वताच्या व सावरकर कुटुंबाच्या , तसेच तुम्हाला मानणाऱ्या इतर तरुण क्रांतिकारकांच्या आयुष्याचा होम करत होतात. तुम्ही एवढे भारावले होता की, ज्यांच्या साठी एवढा आटापिटा तुम्ही आयुष्यभर चालवला होता, त्यांना ते हवे आहे का ? याचा किंचितही विचार करण्याची तुम्हाला गरज सुद्धा वाटली नाही….

चिखलात लोळणाऱ्या आम्हा डुकरांना, उकिरड्यातच स्वर्ग उपभोगणाऱ्या गाढवांना तुम्ही आलिशान महालात नेवू पाहण्याचा हा तुमचा अट्टाहासच आजच्या तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

लक्षात घ्या, छत्रपतींना स्वराज्य स्थापनेपासूनच सर्वात जास्त संघर्ष वा विरोध कुणाचा सहन करावा लागला ?? सो कॉल्ड, खानदानी मराठ्यांचा, त्यांच्याच जातभाईंचा .

क्रांतिकारकांच्या लपण्याच्या जागांची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कोण पुरवत होते, भारतीयच ना….

तुम्ही तुरूंगवासातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या स्वागताला किती जण होते, हे जनतेने तेव्हाच तुम्हाला दाखवून दिले होते. तुमच्या त्यागाची, भावनांची , संघर्षाची , कष्टाची किंमत त्यांना किती आहे ते. तुमचे विचार म्हणजे वाघिणीचे दूध, ते वाघाचा बछडाच पचवू शकतो. आमच्या सारख्या मेंढरांचे ते कामच नाही. तेव्हा ही ते शक्य नव्हते व आजही नाहीच.

अजून एक सांगायचं राहून गेलं. आजकालचा फण्डा आहे, ” जो दिखता है , वही बिकता है ” पण अशी आपली दिखावा करण्याची मानसिकताच नाही, मग समाजमान्यता तुम्हाला मिळणार तरी कशी ?? तुम्ही अंदमानात सहन केलेल्या यमयातनांची, अमानवीय छळाची मार्केटिंग करावी असा तुमचा पिंडच नसल्याने तिथला तुमचा जाच , शारीरिक पिडा , उपासमार, बौद्धिक, भावनिक कोंडमारा यापेक्षा आम्हाला सूत कताई सोबत केलेल्या प्रतिकात्मक उपोषणाचे महत्त्व जास्त वाटलं तर यात आमचा दोष कसा काय असू शकतो ??

वर्गात जो विद्यार्थी प्रत्येक वेळी पहिला असतो, शिवाय खेळात , नाटकात ….तो इतर विद्यार्थ्यांच्या रोषालाच पात्र ठरतो. कारण तो सर्व शिक्षकांचा आवडता असतो. प्रत्येक शिक्षक त्याचच कौतुक करत असतात, त्याचच उदाहरण सर्वांना आदर्श म्हणून घालून देत असतात. आपण भारतमातेचे लाडके सुपुत्र आहात , तिच्या गळ्यातील रत्नहार आहात, पण आपलं अनेकांगी व्यक्तिमत्त्व, आपली नैतिक, वैचारिक, बौद्धिक उंची आमच्या कल्पनेच्याही खूप खूप पलिकडची. तुमची बरोबरी आम्ही नाही करू शकत. मग निर्माण होणाऱ्या द्वेषाचे, असूयेचे काय करायचे ? तुमच्या छोट्या बंधूंना १९४८ साली दगडांनी ठेचून ठेचून मारण्याच्या महापराक्रमाने आम्ही हे दाखवून दिलेलेच आहे.

शेवटचं पुन्हा सांगतो, तात्याराव सर्व आयुष्य भर तुम्ही या  देश, धर्म अन् समाजा करता केलेले सर्वस्व समर्पण. तुमची ओजस्विता , तेजस्विता , सर्व सर्व काही आमच्या दृष्टीने मातीमोल . आकाशातील सुर्य आकाशीच शोभून दिसतो. आम्ही तुम्हाला आमच्या रंगाने नाही रंगवू शकत… तुमचं तेजही नाही सहन करू शकत. म्हणूनच तुमच्या वर थुंकण्याचा आमच्या लायकी प्रमाणे आम्ही प्रयत्न करत राहणार. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार , आमची ही अगतिकता तुम्हीच समजून घ्याल अशी अपेक्षा करून आता आपला निरोप घेतो. 

लेखक :  प्रविण शिंदे.

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो ऐकलंत का जरा !”

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”

“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”

“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”

“काय s s s s ?”

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”

“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”

“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”

“म्हणजे ?”

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”

“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’

“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”

“यात कसलं आलंय सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं.”

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे.”

“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”

“तेच ते, अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी  ‘ठुशी’ कशाला घ्यायची ? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की ?”

“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं.”

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत.  त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”

“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”

“प्रेशर कुकर आणि…..”

“काय  s s s ?”

“अगं किती जोरात ओरडलीस ? शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”

“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”

“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय बाजारात!”

“काय सांगताय काय ?”

“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते ?”

“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना, की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”

“बरं, मग ?”

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”

“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”

“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”

“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”

“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात!”

“असं कोण म्हणत ?”

“आम्ही बायकाच!”

“अगदी बरोबर, पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेडच म्हणायचा.”

“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय, ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”

“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू, पटकन त्याच नांव….”

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”

“का s s य ?”

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस.  बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”

“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन, त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पाडव्याला आडवा पडलो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तू आहेसच…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तू आहेसच” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ईश्वर – परमेश्वर – देव —भगवान…

तुझी असंख्य नांवे…. अनेक रूपे

तू नाहीस असं ठिकाणच नाही …. चराचरात भरून राहिला आहेस तू…

हो तू आहेसच …. मी मानतेच तुला. ..

तुझी पूजा, नैवेद्य, आरती करत असते …. तुझी स्तोत्र.. मंत्र म्हणत असते … जप करते..

सप्तशतीचा पाठ करते…

 

आताशा एक जाणीव मात्र  व्हायला लागली आहे की…

हे सगळे बाह्योपचार झाले रे…. … आणि इतके दिवस त्यातच रमले मी …. ..

पण आता मात्र….. सगुणातून निर्गुण भक्तीकडे वळावे असे वाटायला लागले आहे…

मनाला सगुण भक्तीची सवय आहे त्यामुळे ती सवय लगेच सुटणार नाही पण…..

…. खोलवर जाऊन अगदी मनापासून तुझ्या जवळ यावं असं वाटायला लागलेल आहे….

 

आता तुझ्याकडे एक विनम्र विनवणी आहे. …

मी जे वाचते जे म्हणते  … त्यातले जे ज्ञान आहे जी शिकवण आहे  जे तत्त्वज्ञान आहे…

……  रोजच्या जगण्यात ते माझ्या…. वाणीतून …. कृतीतून …. विचारातून …. वर्तनातून … अंतरंगातून

प्रगट होऊ दे….. तनामनातून पाझरू दे….. मगच  ती तुझी खरी पूजा होईल. आणि मला माहित आहे..

तुलाही भक्तांकडून हेच अपेक्षित आहे….

प्रसाद म्हणून सद्गुरूंचा हात हातात असू दे त्यांची कृपा माझ्यावर राहू दे….

 

नुसतं शांत बसावं…

आत्मसमर्पण हा खूप मोठा मार्ग आहे..  कठीणही आहे…

पण आता चालायला सुरुवात करावी म्हणते……

चालताना अडखळायला, ठेचकळायला …. थोडं भरकटायलाही होईल ……पण सावधपणे सावकाशपणे चालत राहीन.. .. हळूहळू तो मार्ग ओळखीचा होईल……

चिंतन कशाचं करायचं याचाही अभ्यास करायचा आहे…

 

एक खरच मनापासून सांगू का? खूप काही नको आहे

आता राहिलेलं आयुष्य सहज सोपं करून जगायचं आहे….

देणारा हात …  दुःख ओळखून ते बघू  शकणारे डोळे ….  सत्य ऐकणारे कान …  निर्मळ मन … 

 आणि मधुर वाणी………

… तू आहेसच की वाट दाखवायला …,.. आणि  तुझा हात हातात आहे हे केवढे मोठे भाग्य आहे ….

.. मग जमेलच……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उत्पादन, निगा आणि मशागत — ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

उत्पादन, निगा आणि मशागत — ☆ श्री मकरंद पिंपुटकर

(Manufacturing, maintenance and cultivation)

माधव – पाचवीतला एक सत्शील मुलगा. हल्लीच्या मुलांत आढळतो तसा आक्रस्ताळेपणा क्वचितच त्याच्यात दिसे. माझी बायको आणि मी – आम्ही दोघेही त्याच्या आईवडिलांचे याबद्दल नेहमीच कौतुक करत असतो. आणि ते दोघेही नेहमीच त्यांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बोट दाखवत “महाराजांची कृपा” म्हणत नम्रपणे ते कौतुक स्वीकारत असत. 

“यात महाराजांच्या manufacturing चं कौतुक आहे, आमचं काही त्यात श्रेय नाही,” अशी त्यांची यावर नेहमीची टिप्पणी असे. 

माधवचे आईवडील नव्या पिढीतले. तो इंजिनिअर, स्वतंत्र व्यवसाय, आणि व्यवसायानिमित्त अनेकदा फिरतीवर. तीसुद्धा इंजिनिअर – संगणक क्षेत्रातली. जरी work from home करत असली, तरी कधी जपान – हाँगकाँगचे clients, तर कधी युरोप अमेरिकेचे clients, त्यामुळे तिचा दिवस कधी अगदी पहाटे सुरू व्हायचा तर कधी अगदी मध्यरात्रीपर्यंत चालायचा. 

त्रिकोणी कुटुंब छान बहरत होतं.

एकदा माझ्या बायकोनं माधवला डझनभर “किंडरजॉय” चॉकलेटं आणून दिली. आणि त्याच्या आईला सांगून ठेवलं, “लेकाला सांगू नकोस हो. उगाच एकदम बकाबका खाऊन टाकायचा.”

त्यावर माधवची आई हसली आणि म्हणाली, “नाही, आमच्याकडे तो प्रॉब्लेम नाही. त्याच्यासमोर सगळी चॉकलेटं ठेवली, तरी तो एखाददुसरंच खाईल. त्याला नाही सांगावं लागत.”

काहीच न बोलता, मी नुसतं सहेतुकपणे तिच्याकडे पाहिलं, तिनंही नेहमीप्रमाणे महाराजांच्या कृपेला याचं श्रेय दिलं. 

“फक्त तेवढंच नाहीये,” मी यावेळी प्रश्न धसाला लावायचं ठरवलं होतं.  “एखाद्या गोष्टीचं उत्पादन manufacturing अतिशय छान असलं, तरी त्याची नीट निगा maintenance राखणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मग ती मर्सिडीज गाडी असो किंवा मुलं…. लहान असताना छान असलेली मुलं आईवडिलांच्या अती लाडांनी बिघडलेलीही पाहिली आहेत, किंवा करिअरच्या नादापायी मुलांकडे झालेल्या दुर्लक्षाने ती वाया गेलेलीही पाहिली आहेत…. आणि तुमच्या बाबतीत तुम्ही नुसती त्याची निगा राखत नाहीत, तर त्याच्या चांगल्या गुणांची मशागतही cultivation करत आहात. त्याच्या चांगल्या गुणांची जोपासनाही करत आहात.” 

आणि हे खरंच होतं…

माधवचे आईबाबा त्याचे लाडही करायचे, पण त्याला लाडावून ठेवायचे नाहीत. ते कामात गर्क असतील आणि तो काही विचारत असेल, तर त्याला तसं समजावून सांगायचे, नंतर वेळ देऊ म्हणायचे. पण त्याचबरोबर माधवचं खरंच काही – तेवढंच महत्त्वाचं आणि तातडीचं काम असेल तर हातातलं काम बाजूला ठेवून त्याला मदतही करायचे. 

मुख्य म्हणजे ते त्याच्याशी संवाद साधायचे, या वयात असतात तशा त्याच्या निरनिराळ्या शंकाकुशंकांचं – अगदी राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि शाळेतील इयत्ता पाचवीतील partiality पर्यंतच्या सर्व अगत्याच्या विषयांचे – ते मनापासून – न कंटाळता – न वैतागता – न चिडचिड करता निरसन करायचे. 

“तू गप्प बस, तुला काय करायचाय नसता चोंबडेपणा ?” किंवा “तू अजून लहान आहेस, मग मोठा झाल्यावर सांगू.” अशी उत्तरं द्यायचे नाहीत.

आज दुपारी जेवताना असंच झालं. मी कॉलेजला होम सायन्सला शिकवतो म्हणजे नक्की काय करतो असा माधवला प्रश्न पडला होता. मग होम सायन्स म्हणजे “घर कसं चालवायचं त्याचं सायन्स” अशी मी काहीशी बाळबोध व्याख्या केली, त्यावर “म्हणजे फक्त होम कसं चालवायचं ते शिकायला एवढा मोठ्ठा तीन वर्षांचा अभ्यासक्रम ?”  असा माधवचा पटकन् प्रश्न आला. 

त्याचं वाक्य पूर्ण होतंय की नाही त्याच्याआत, त्याच्या बाबांनी “थांब, थांब. फक्त होम कसं चालवायचं असं म्हणून अपमान करू नकोस.” असं म्हणत त्याला होम सायन्सचे कंगोरे समजावून दिले, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ‘घर चालवणं किती श्रेष्ठ आणि तेवढंच किचकट काम आहे’ हे माधवला समजावलं.  

त्याच्या आईनेही “बघ, मी किंवा आजी आजोबा घरी काम करताना कधी कधी चुका करतो, मग त्या चुकांतून आम्ही शिकत जातो. असं चुका करून शिकण्यापेक्षा त्याचा readymade तयार अभ्यासक्रम असेल तर किती छान ना ? म्हणजे आज्जी lifetime मध्ये जे शिकली ते इथं तीनच वर्षांत शिकता येईल,” असं सांगत, आणखी काही उदाहरणं देत होम सायन्सबद्दल माधवला माहिती दिली. 

त्यांना इतक्या उत्स्फूर्तपणे त्याला माहिती देताना पाहून मी आणि माझ्या बायकोने एकमेकांकडे पाहिलं. 

महाराजांच्या कृपेची निगा आणि मशागत छान सुरू होती. 

… आणि आम्हासकट सगळ्यांसाठीच तो एक आदर्श वस्तुपाठ होता. 

(सत्य घटना — आणि आज माधवच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवसही आहे, हा एक सुंदर योगायोग.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

लहानपणीची गोष्ट.घरच्यांसोबत दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणं व्हायचं.मंदिराच्या बाहेर प्रशस्त फुटपाथ होता.त्या फुटपाथवर एक दत्ताचं चित्र काढलेलं असायचं. रंगीत खडुंनी रंगवलेल्या त्या चित्रावर असंख्य नोटा.. नाणी असायच्या. आणि त्यांची राखण करत एक काळासावळा मुलगा बसलेला असायचा. प्रत्येक गुरुवारी चित्र असायचं दत्ताचचं.. पण त्यातील रंगसंगती बदललेली असायची. त्यामुळे नेहमी ते नवीनच वाटायचं.

मला एक खुप उत्सुकता होती. ते चित्र काढताना बघायची.मग एकदा मी सकाळी लवकरच त्या मंदिरात गेलो.बाहेर फुटपाथवर तोच तो काळा सावळा मुलगा उभा होता. शर्टची बटणं काढत होता. त्याने शर्ट काढला. तो हातात धरला.. आणि फुटपाथ झटकायला सुरुवात केली. त्याच्या द्रुष्टीने फुटपाथ एकदम क्लीन झाला.. मग जवळच्या पिशवीतुन त्यानं कोळसा काढला.

त्या कोळश्यानं त्यानं एक चौकोनी आऊटलाईन काढली.. चित्राच्या आकाराची.मग निरनिराळ्या रंगांचे खडू घेऊन त्यांचं चित्र काढणं सुरु झालं.कधी कुठं चुकलं की सरळ त्या भागावर थुंकायचा… आणि तो भाग दुरुस्त करायचा.त्याबद्दल त्याला काहीच वाटायचं नाही.

चित्र काढुन झाल्यावर त्यानं खिशातुन काही नोटा काढल्या.त्या दत्ताच्या चित्रावर ठेवल्या.काही नाणी विखरुन ठेवली.त्याच्या द्रुष्टीने सगळं चित्र पुर्ण झालं होतं.आता तो दिवसभर त्या चित्राशेजारी बसुन लोकांची वाट पहाणार होता.

नंतर मला त्या चित्रकार मुलाबद्दल बरीच माहिती मिळाली.दत्तु त्यांचं नाव.तो जसा गुरुवारी दत्ताचं चित्र काढतो..तसाच शुक्रवारी देवीच्या मंदिरासमोर देवीचं चित्र काढतो.. सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर चित्र काढतो.त्याचा बापही पुर्वी मंदिराबाहेर बसायचा.देवादिकांची चित्रे.. पुस्तके विकायचा.लहानगा दत्तु बापाजवळ बसलेला असायचा.मग बाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगे.एकदा कधीतरी पुस्तकात बघून दत्तुनं चित्र काढलं..तिथेच.. रस्त्यावर.एवढ्याश्या मुलानं काढलेलं ते चित्र बघुन चार लोकांनी त्यावर पैसे टाकले.आणि मग त्याला तो नादच लागला.

कुठलंही कलेचं शिक्षण न घेतलेले हे कलाकार.त्यांच्यात उपजतच हा एक सुप्त गुण असतो.कितीतरी कलाकार असतात असे.अगदी डोंबाऱ्याचे खेळ करणारे पहा.उंचावर दोरी बांधलेली असते.त्यावरुन तोल सावरत जाणं सोपं तर नक्कीच नसतं.हातात आडव्या धरलेल्या काठीने ते शरीराचा तोल सावरत जीवघेणा खेळ करत असतात.

काही जणांकडे एक अगदी छोटी लोखंडी रिंग असते.एका बाजुने त्यात घुसायचे.. आणि दुसर्या बाजुनं बाहेर यायचं.शरीराचं अगदी छोटं मुटकुळं करुन हा खेळ करताना किती कसरत करावी लागत असेल.

रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारा वासुदेव हाही खरंतर कलावंतच.मी एकदा अश्याच एका वासुदेवाला तयार होताना पाहिलंय.पहाटे साडेचार वाजताच तो उठला होता. स्नान करुन शुचिर्भूत झाला. अगदी छोटंसं घर होतं त्याचं.लाकडी फडताळातुन त्यानं अंगरखा काढला.हा अंगरखा म्हणजे एक बाराबंदीच होती. धोतर नेसलेलं होतंच. त्यावर तो बाराबंदीच सारखा अंगरखा चढवला.एका बाजुला असलेल्या नाड्या खेचुन तो घट्ट बांधला.

एका पिशवीतुन काही माळा काढल्या. त्यात कवड्यांची माळ होती.. एक मोठ्या टपोर्या मोत्यांची माळ होती.. पिवळ्या मण्यांचे सर होते. ते परिधान केले. मग मेकअप. कपाटातुन काढलेल्या झोळीत एक छोटा आरसा होता. त्यात बघुन वासुदेवानं कपाळावर सुरेख गंध रेखलं. त्या उभ्या गंधाच्या मधोमध बुक्क्याचा टिळा काढला. हातात चिपळ्या घेतल्या.. आणि दान पावलं..दान पावलं..म्हणत पहाटेच्या सुमारास बाहेर पडला.

बहुरुपी हाही कलावंतच.पूर्णपणे पोलिसाच्या गणवेशात तो दुकानात येऊन उभा रहायचा.दारात पोलिस आल्यावर जरा दचकायला व्हायचे.त्याच्या हातात वही पेन.

“चला निघा दुकानातुन.. तुमच्या नावाचं वॉरंट आणलंय”

असं एकदम दरडावून बोलायचं.सुरुवातीला खरंच घाबरून जायचो.. हे काय आपल्यामगे लागलंय म्हणून भीती वाटायची. पण मग लक्षात यायचं.. अरे हा तर बहुरुपी. जराशी हुज्जत घालुन दहा वीस रुपये मग त्याला द्यायचो.

आणि तो त्याचा अधिकार असायचा.. असं आत्ता वाटतं.हातावर पोट असणारी ही माणसं.वर्षातले आठ महिने शेती करणं..ती नसेल तर कोणाच्या तरी शेतावर राबणं.. अगदी काहीच नाही तर बिगारी काम करणं. आणि हे करत आपली कला दाखवत चार पैसे मागणं हेच यांचं आयुष्य.

याचना करणे म्हणजे भीक मागणे. देवळाबाहेर बसुन.. हात पसरुन जे मिळेल त्यात भागवणारे वेगळे. त्यांना भिकारी म्हणणं एकवेळ ठीक.. पण हे भिकारी नसतात. ते लोकांपुढे हात पसरतात..पण त्याआधी ते आपली कोणती तरी कला सादर करतात. म्हणुनच ते असतात.. ‘ कलाकार.’ 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … ! 

मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….! 

डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं…. 

पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. ! 

एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…! 

पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो…. 

खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !

मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!

आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ??? 

माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…! 

साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम…  यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…! 

मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …! 

यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…

लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक  घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…! 

… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. ! 

का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ? 

का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ? 

माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक  घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!

पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा…. 

मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!! 

कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ? 

मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…! 

आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???

तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…!  तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…

जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही….  परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….! 

जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे ….  शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….!  यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं,  म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…

यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो…. 

तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले. 

हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले.       “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…! 

एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो. 

मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही … 

मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…! 

आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… ! 

वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटण  हे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत. 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!

आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…! 

मनातलं काही …

  1. Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.

अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….! 

अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात;  आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत… 

रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!! 

  1. माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते. 

आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही… 

जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे. 

आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही… 

माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल. 

आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…! 

या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे…. 

माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..! 

हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!

असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….! 

मनातील सर्व भावना आज आपल्या पायाशी ठेवत आहे…. !!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

मी जेव्हा जेव्हा माझ्या मिस्टरांना घेऊन अंबानी हाॅस्पिटलला जाते तेव्हा माझे मन नैराश्यानी ग्रासून जाते.

जातानाच मन उदास असते. माझ्याच नशीबी या वा-रा 

का?

पण तिथे पोचल्यावर जेव्हा आजूबाजूचे पेशन्टस् बघते 

तेव्हा वाटतं माझा नवरा या कॅन्सरवर मात करून 

नाॅर्मल आयूष्य जगतोय तरी. 

किती तरुण मुले, किती लहान मुले, अजून त्यांनी जगही पाहिले नाही.त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात तरळणारे दुःख मन पिळवटून टाकते.

कितीतरी वयस्क, त्यांची हतबलता, त्यांना सावरणारी अर्धांगिनी, ती ही कापणा-रा हातानी, मनातली भीती 

न दाखवणारी. 

त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा मुलगा, तोही पन्नाशीजवळ 

आलेला, ऑफीसला रजा टाकून. मधे मधे तो ऑफीसचे फोन अटेन्ड करतोय. तो ही या युगातला श्रावणच. 

कुणाच्या हाताला सलाईनच्या नळ्या,कुणी यूरीनची बॅग 

सांभाळत,कुणी व्हीलचेअर वर 

प्रत्येकाचे दुःख वेगळे पण डोळ्यात तेच केविलवाणे भाव. 

अशावेळी मलाही पसायदान आठवते. 

देवा तू सर्वांना सुखी का नाही ठेवत.?

या शारीरिक वेदना कशासाठी?

आणि गरीबांनी काय करायचे  ?

त्यांना तर या महागड्या ट्रीटमेन्टस् कशा परवडणार?

या खेळात तुला कसली गंमत वाटते.?

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की “आपण ग्रामीण भागकडे जास्त लक्ष द्यावे.”

बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठीच  काढायचे.

लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही भाग डोंगराळ व जंगली  होते.

एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात ‘बडेरी’ नावाचे एक गांव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर्सचे अंतर डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे.

मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे.

तिथे कोणीतरी पी. के. व्यास नांवाचे मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि कां कोण जाणे, ते पद  सोडतही नव्हते. मी आदेश दिला की “त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये.  ही अचानक भेट असेल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल.

मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ, कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.

समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती.

शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.

वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरं तर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क गृहस्थ व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत.

त्याने सांगितलं की मुख्याध्यापक गुरुजी एव्हढ्यातच येतील.

आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो, तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षांचे सद्गृहस्थ, आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.

त्यांनी येताच आपला परिचय दिला, “मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरतही होते.” ते हसून म्हणाले.

त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नांव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, “तुम्ही प्रशांत व्यास म्हणजे इंदूरच्या गुजराती कॉलेजमध्ये होते तेच कां?”

त्यांनी सुद्धा ओळखल्यासारखे  आश्चर्याने विचारले, “आपण अभिनव आहात कां? अभिनव श्रीवास्तव !” मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे.”

वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता. खूप मेहनत करूनही, कधी तरीच मला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील.

आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे असायचा.

आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे, जिंकल्याचे समाधान वाटत होते. आणि खरं सांगायचं तर, मनांतूनही मी खूप खुष  होतो.

मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?”

त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, “एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसं तरी शिक्षण पूर्ण केलं. मार्क चांगले असले, तरी सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. पण नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गांवात बदली मिळाली.  आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात  निभावून जाईल.

मग तो हसत म्हणाला, “अशा दुर्गम गांवात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्नही नाही झालं. आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?

माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.

इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जेव्हढी जमेल तशी त्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.”

“आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो. 

रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गांवात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्तीचे अभियान ही चालवतो.

स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.

मनांत होतं, पण मी सी. ए. करूच शकलो नाही. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत ! आणि काही जण चांगल्या नोकरीतही आहेत.”

“माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो.

तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते.”

मी मधेच म्हणालो, “आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाही का?”

तो हसून म्हणाला, “मला कळतं की जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो.”

त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.

निघतांना मी त्याला म्हणालो “प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन”.

तो हसून म्हणाला “आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे.” असे म्हणून त्याने हात जोडले.

नोकरीत त्याच्यापेक्षा वरच्या पदावर आपली नियुक्ती झाल्याच्या यशामुळे माझ्या मनांत निर्माण झालेला अहंकार, गर्व 

हे सारे भ्रम एका क्षणांतच विरून  गेले !!

तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट  आणि  असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत  झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.

आपण माणसांची पारख, सुख – सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.

निघताना, त्या ‘कर्मऋषी’ला हात जोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, “तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!”

सारांश: 

आपले प्रशासकीय पद काय आहे किंवा काय होते, हे खरोखरच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे हे असते की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि कसे बनत आहोत.

मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव 

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

माॅर्निग वाॅकला बाहेर पडले की ट्रॅकवर विविध वयाची, विविध तऱ्हेची माणसं भेटतात.तसाच तिथला निसर्ग ही वेळ काळानुसार बदलता दिसतो. 

अत्ता अत्ता पर्यंत हिरवेगार दिसणारे वृक्ष शिशिराच्या पानगळतीमुळे कसे उघडे बोडके दिसू लागले ते लक्षातच येत नाही. गुलमोहराची लांब लांब छोट्या छोट्या पर्णिका असलेली पाने चवऱ्या ढाळत असतात तर त्यावरील वाळलेल्या शेंगा तुटून खाली पडत असतात.त्यांच्यावर पाय पडला की कट्कन मोडतील इतक्या वाळक्या असतात. जणू निसर्ग कसा वाळत,सुकत चाललाय याची जाणीव करून देत असतात.

आंबा,फणस,वड यासारखी छाया आणि फळे देणारी झाडे जवळपास दिसत नाहीत,पण गुलमोहर,कॅकेशिया सारखी रंगीबेरंगी केशरी,जांभळी, गुलाबी रंगांची फुले असणारी झाडे मात्र रस्तोरस्ती दिसतात ! गंध नसला तरी त्यांची रंगांची विविधता डोळ्यांना सुखवते.थंडीची ऊब गेली रे गेली की सकाळच्या वेळी सूर्याचे आगमन प्रसन्न वाटते.इथल्या झाडांवर भारद्वाज आणि कोकिळा आपले अस्तित्व दाखवू लागतात.राखाडी रंगाच्या चिवचिव चिमण्या अंगणात दाणे टिपताना दिसत नाहीत पण चिमणीसारखाच एक छोटा पक्षी सगळीकडे झाडांवर दिसतो..

होळी जसजशी जवळ येते तसा निसर्गातील बदल अगदी स्पष्ट दिसायला लागतो. वाळकी झाडे, फांद्या होळीच्या ज्वाळेत टाकून सगळं वाईट नष्ट करून नवीन जगण्याला सुरूवात करावी त्याचेच हे प्रतीक म्हणजे निसर्गातील झाडेझुडपे असतात.

आता पंधरा दिवसांतच चैत्र येईल.चैत्राची सुरुवात म्हणजे सृजनाची चाहुल ! मग सुरू होईल खरा वसंतोत्सव ! रंगपंचमीला विविध रंग आणि पाणी उडवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते.सूर्याच्या वाढत्या झळांपासून संरक्षणासाठी निसर्ग आपल्याला छान फळे पुरवतो. कोकम, कैरी यांचे पन्हे शीतल असते तर कलिंगड, खरबूज सारखी फळे थंडावा देतात.आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे हे तर माहिती आहे आपल्याला ! चैत्रामध्ये चैत्र गौरीची पूजा करून आपण तिचा उत्सव साजरा करतो. घराघरातून पन्हं, कैरीची डाळ करून हळदीकुंकू केले जाते.देवीला झोपाळ्यावर बसून झुलवले जाते.देवीची आरास करायची, गुलाब पाण्याचे सिंचन करायचे, वाळा, मोगरा घालून माठातील पाणी सुगंधित ठेवायचे … किती किती तऱ्हांनी आपण चैत्र वैशाखाचा वणवा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो.

फाल्गुन पौर्णिमा झाली की पुढचे पंधरा दिवस म्हणजे संधीकाल वाटतो मला! उन्हाळ्याची सुरुवात आणि थंडीचा शेवट! सकाळचा गारवा अजून सुखद वाटतो.पहिल्यातून अजून मन बाहेर पडत असते, तर दुसऱ्यामध्ये अजून पदार्पण व्हायचं असतं! असा हा संधीकाल! मन आणि शरीर थोडे अस्थिर होणारच! नवीन वातावरणाला अनुकूल होण्यासाठी शरीरही थोडे कुरकुरत असतेच!

असा हा संधीकाल आयुष्यातही खूपदा डोकावतो. शाळा संपवून पुढील शिक्षणात पदार्पण करताना, शिक्षण संपवून नोकरी, उद्योगात प्रवेश करताना, गृहस्थाश्रम स्वीकारताना आणि नंतर संसारातून मुक्तता घेऊन ज्येष्ठत्त्व स्वीकारताना ! प्रत्येक स्थित्यंतराच्यावेळी थोडेतरी पाऊल अडखळतेच! मन ठेचकाळतं, पुढच्या आशा खुणावत असतात, मन मागेच रेंगाळत असते. असाही एक संधीकाल असतो. जो माणसाला सुखदुःखाच्या उंबरठ्यावर ठेवतो.त्यामुळे वाटते,संधीकाल म्हणजे हुरहूर लावणारा काळ! जो प्रत्येक क्षणाला लंबकासारखा हेलकावे असतो.कधी भूतकाळात तर कधी भविष्यात! वर्तमानाच्या उंबरठ्यावर क्षणभरच टेकतो तो, दोन्हीची सांगड घालीत!

निसर्ग हा नेहमी आशावादी असतो.पडलेल्या बी तून नवीन निर्माण करणारा! झाडाच्या वठत चाललेल्या खोडातही कुठूनतरी कोंब निर्माण करणारा! काही काळ तो सुप्तावस्थेत असेलही पण अनुकूल परिस्थिती येताच तरारून वर येणारा! निसर्गाचा चमत्कार वसंत ऋतूतील पालवीत दिसतो,गुलमोहराच्या केशरी फुलांत दिसतो, तर मोगरीच्या छोट्या कळीत दिसतो.

असा हा संधीकाल मी अनुभवते आहे.-निसर्गात आणि मनात! निसर्ग चिरंतन आहे.तो बदलत्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे.त्याच्यापुढे आपण  तर नगण्य आहोत.छोट्या आयुष्यातले छोटे छोटे बदल स्वीकारताना सुध्दा संधीकालात अडकून पडणारे! पुढे पाऊल टाकू की नको या संभ्रमात असणारे! शेवटी प्रेरणा देणारा तोच आहे, त्यामुळे प्रत्येक संक्रमणात तोच आपल्याला अलगद नेतो.

या संधीकालातून पुढे नेणारा .. आपल्या प्रत्येक पावलावर आशेचा किरण दाखवणाऱ्या नियंत्याला नमन करून सकाळचे प्रत्येक पाऊल मला अधिक ऊर्जा देऊ दे अशी प्रार्थना करत मी सकाळची फेरी संपवते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print