मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मोरपीस… – लेखक : प्रा. रमेश कोटस्थाने ☆ परिचय – सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मोरपीस… – लेखक : प्रा. रमेश कोटस्थाने ☆ परिचय – सुश्री शांभवी मंगेश जोशी

ज्येष्ठ लेखक, प्राचार्य रमेश कोटस्थाने यांचं ‘मोरपीस ‘हे पुस्तक हातात मिळालं. थोडसं चाळलं, वाचलं आणि मी गुंतत गेले. वाचतच राहिले. अलगद मनातून मोरपीस फिरावं असं काहीसं वाटत राहिलं. मुलायम तेवढीच मौलिक भाषा. सहज तेवढीच प्रभावी. भाषे मध्ये लालित्य तेवढाच मधाळ मिष्कील गोडवा. लिखाणात रंजकताही तेवढीच. ज्या ज्या लेखकांचे लिखाण वाचून, लिखाणाची प्रेरणा मिळाली, त्यांच्याबद्दल ऋणमोचन करण्यासाठी, हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा सद्हेतूच फार हृद्य आहे. लेखकांची सरांशी कधीच भेट झाली नाही. तरी त्यांच्या शब्दांमधून अक्षर नाती जुळली. ती नाती पुन्हा उलगडून वाचकांच्या मनात लेखक जागते ठेवले आहेत. हा ही पुस्तक लिखाणाचा तेवढाच महान उद्देश.

बहिणाबाई पासून बर्नार्ड शॉ, पर्यंत आणि वि. आ. बुवांपासून वुड हाऊस पर्यंत. मराठी आणि इंग्रजी मधील थोर साहित्यिकांबद्दल लेख, मोरपीस या पुस्तकामध्ये कोटस्थाने सरांनी लिहिले आहेत. सार्‍यांच्या समग्र साहित्याचा लेखाजोखा एकाच लेखात मांडण्याचा आवाका अफाट आहे. मोठेच आव्हान आहे.

 ते कुठेही बोजड, न वाटता, मोर पिसासारखे मुलायम, तेवढेच विविध रंगी चित्ताकर्षक झाले आहे. एकेक लेखा मागे केवढे अफाट वाचन आहे हे समजून आपण आवाक् होतो.

‘पुस्तक घेऊन भविष्यातल्या कित्येक तासांचा सुखाचा विमा उतरवायचा ‘ हे वाक्य वाचून मी सुखावले. यावरून लेखकाच्या दृष्टीने आयुष्यात पुस्तकांचं सुखाच्या दृष्टीने किती मोल आहे हे कळतं. बाल वयातलं झुंजार कथा वाचनाचे वेड अजूनही लेखकाच्या डोक्यात आहे. ते तेवढ्याच वेडेपणानं सहज लेखात उतरलेलं आहे. त्या वेडात शहाणपणा एवढा, की आजही बाबुरावांची परिस्थिती काय आहे, ते कुठे राहतात, त्यांच्या लिखाणातली पात्र कोण, हे सर्व तपशील अत्यंत नेमकेपणाने आलेले आहेत. बाबुरावांच्या लेखनात साधेपणा इतकच रंजनमूल्य किती आहे हे बाबूरावांचे वांङमय न वाचता सरांच्या लेखातून समजत.

सोरायन

या लेखकाचे नावही माहित नाही.. मला तरी. तसं ते सरांनाही माहीत नव्हतं. पण रस्त्यावर या लेखकाचे पुस्तक मिळालं. अवघ्या दोन रुपयात मिळाल्यामुळे आनंदाने ते घेतले. त्यावर लेखक म्हणतात इतक्या मोठ्या संपत्तीचा सौदा रस्त्यावर झाला याची खबर न विक्रेत्याला होती ना वाचकाला. त्यानंतर लेखकाने, लायब्ररीत जाऊन सोरायनच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला. ती पुस्तकं वाचून सोरायनकडून सरांना अत्यंतिक समृद्धी आणि संपन्नता मिळाली. महत्त्वाचं असं की सोरायनमुळे सरांना आपण लेखक आहोत याचा अभिमान वाटला.

राम गणेश गडकरी

देवाघरची दौलत असं शीर्षक देऊन गडकरीं बद्दल प्रगाढ श्रद्धा आणि त्यांची उत्तुंग प्रतिमा सर निर्माण करतात. त्याच वेळेस त्यांचे अक्षर साहित्य दुर्लक्षित राहीले अशी खंत व्यक्त करतात. त्यामुळे नवी पिढी काहीतरी अमोलीक श्रेय हरवून बसली आहे यासाठी हळहळत राहतात. सर म्हणतात, गडकर्यांनी जे जे लिहिले ते,

 उलगडती पीळ हृदयाचे, सुटती बंध देहाचे की जीव देहभर नाचे अशा ऊन्मनी अवस्थेत लिहिले.

गडकर्‍यांच्या विनोदाच्या अनुकरणावर कित्येक लेखकांनी गुजराण केली. तरीही त्यांच्या विनोदाची खुमारी ओसरत नाही.

आर. के. नारायण.

आपल्या सगळ्यांना मालगुडी डेज ही मालिका आठवत असेल. आजी आजोबा नातवंड आणि आपण. सगळ्यांना एकत्र आनंद देणारी. मालगुडी गावातला निखळ, नितळ, स्वच्छ सुंदर अनुभव देणारी. ही आर के नारायण यांची लेखन कलाकृती. आर के नारायण दक्षिणेतले असल्यामुळे, लेखक म्हणतात, प्रादेशिकता जोवर प्राणशक्तीच्या अविष्करणाला कारक आणि साहाय्यकारक आहे तोवर ती कवचा सारखी संरक्षक असते. तिचा कोप झाला की आतल्या आत घुस्मटून टाकते. नारायण यांची प्रवृत्ती आणि प्रकृती पिंडी ते ब्रह्मांडी बघण्याची असल्याने त्यांच्या प्रादेशिकतेने वैश्विक आशयाला सहज सुंदर रित्या अंकित केले आहे, अलंकृत केले आहे. दक्षिणेच्या घाटात उत्तरेचे गंगाजल ठेवले, आणि त्यात चंद्रबिंब बघितले तर भारतीय मनाला काय दिसेल काय दिसावे? नारायण यांच्या नजरेला ते ‘ऐश्वर्य’ दिसते. मालगुडीचे दाक्षिण्य साऱ्यांनाच आवडणारे. लेखक म्हणतात आर के म्हणजे अंतर बाह्य अस्सल आणि मिश्किल आप्त. नारायण आणि लक्ष्मण (व्यंगचित्रकार) दोघेही भाऊ हसवतात. कळ उठवतात. लेखक त्यांच्या बद्दल लिहिताना भक्ती भावाने लिहितात. पण त्यांचे न पटणारे मत ही तेवढेच स्पष्टपणे मांडतात. उदा: इंग्रजी भाषा ही भारतीय आहे असे आर के चे मत मला अजिबात मान्य नाही.

 बहिणाबाई –

बहिणाबाई बद्दल लिहिताना लेखकांनी काळजाला हात घातलेला आहे. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी गाणी लिहिली नाहीत. त्यांना ती ऐकू आली, दिसली. देवानं आदिकालापासून लिहिलेली, गायलेली, चितारलेली. निसर्गात इथे तिथे विखुरलेली. कडे कपारीतून उसळत, घुसळत, फेसाळत जाणारा झरा, भुईतून वर येणारी पानं, रोजचे चंद्र सूर्य तारे, त्या सार्‍यात रहणारं, त्यातून वाहणारं जीवन गाणं त्यांना दिसलं. ऐकू आलं. त्यामुळे घट पटादी खटाटोप न करतात त्यांची गाणी जणु केवळ प्रतिध्वनीत झाली. इतकी सहजता, अभिजात सुंदरता त्यांच्या गाण्यात आहे. बहिणाबाईंच्या सुंदर काव्याचं, गाण्यांचं, असं लोभस नेमकं वर्णन क्वचितच कोणी केलं असेल. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी जे काय सोसलं, भोगलं, ते त्यांच्यासोबत काळात विलीन झालं. आपल्यासाठी मात्र ही हंड्या झुंबर लखलखलतच राहतील असं लेखक म्हणतात,

पु. लं.

म्हणजे अंतरीचा दिवा तेवत असणारे उजळ व्यक्तिमत्व. असे उजळ व्यक्तिमत्व मला तरी अख्ख्या भारतात दिसले नाही. लेखाला तीर्थरूप नाव देऊन वडिलांसारखेच ते मला वाटतात असं म्हणतात. पुलंच्या लेखणीतून एक आनंदाची धार स्त्रवत राहिली. आणि जिथे जिथे मराठी मनोवस्ती आहे तिथे तिथे ती वाहत गेली. मराठी इतिहासातली ही सर्वात मोठी पवित्र नदी, प्रत्येक गावाला आपली वाटते तिच्या दोन्ही काठावर, प्रायोजित उपयोजित कलांचे किती मळे भरले. पुणेरी धरणासह किती घाट बांधले गेले. तिच्या पाण्यावर किती पाणपोया चालतायेत, किती दक्ष, लक्ष भाविकांना हिच्या प्रवाहात डुंबत पारोसेपणातून मुक्त होण्याचा आनंद मिळाला याची गणतीच नाही. असं पु. लं बद्दल नेमके पणाने व्यक्त होतात अनेक थोर मराठी साहित्यिकांंबद्दल लिहिताना, तेवढ्याच थोर इंग्रजी लेखकांबद्दलही भरभरून लिहिलेलं आहे.

* * सोरायन, र्बर्ट्रान्ड रसेल, बर्नार्ड शाॅ पर्ल बक, पी. जी. वूड हाऊस हे ते इंग्रजी लेखक. पण जी. ए. कुलकर्णी, लेखकाची दुखरी नस. हळवी जागा. अंतरीचा दिवा. म्हणूनच त्यांच्याबद्दलच्या लेखाला, काळोखातील क्ष किरण असं समर्पक नाव दिलेलं आहे. जी. ए. न्चे साहित्य म्हणजे गूढ गहन ऐश्वर्याचे गारुड ! ऐश्वर्याचे आभाळच!

अर्थातच कोटस्थाने सरांनी हे आभाळ लीलया पेललेलं आहे. जी ए यांची कथा अथ पासून इती पर्यंत मंत्रावून गेलेली आहे. माणसाच्या जगण्याच्या विरुपिके चे असंख्य मासले दाखवून, ते या गारूडाचे विस्मय जनक भावदर्शन देतात. अंतिम ज्ञानाचा अंगठा दक्षिणा म्हणून गुरुने हिरावून घेतल्यावरही एकाग्र शरसंधान करणार्‍या एकलव्याचे अमोघ सामर्थ्य जी एं च्या लेखणीत आहे. मात्र हे शरसंधान विध्वंसक नाही. विकृत तर नाहीच नाही. मला जीए वाचता आले. माझे मन जी एन् च्या कथा वाचल्याच्या आनंदाने ओथंबून गेले आहे. आर्द्र झाले आहे.

 ते म्हणतात एकांताचे आत्म शोधाला जे साह्य, रेडियमच्या लकाकीला अंधाराचे जे साह्य, तेच नियतीच्या अथांगतेचे जी एन् च्या कथेतील सत्य शिव सुंदरतेच्या ध्यासाला साह्य.

जी एन् च्या कथा साहित्या एवढेच, आत्मीयतेने इतरही अनेक लेखकांबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. तेवढेच अभ्यासपूर्वक. काळजाच्या शाईने. त्यातील काही लेखांबद्दल मी उच्च हेप्रातिनिधिक स्वरूपात लिहिले आहे. ते वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल. कोटस्थाने सरांच्या शब्दात सांगायचं तर, हे पुस्तक घेऊन आपण आयुष्यातील काही तासांचा आनंदाचा विमा उतरवू शकतो… हे निश्चित. मोरपिसाने या लेखकांचं लिखाण निश्चित औक्षवंत होईल.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची ” – लेखिका: सुश्री संगीता पी मेनन मल्हन  – अनुवाद : श्री प्रा. संजय विष्णू तांबट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची ” – लेखिका: सुश्री संगीता पी मेनन मल्हन  – अनुवाद : श्री प्रा. संजय विष्णू तांबट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची  

लेखिका: संगीता पी मेनन मल्हन 

अनुवाद: प्रा. संजय विष्णू तांबट

 पृष्ठे: ३१०

मूल्य: ३५०₹ 

एका सामान्य वृत्तपत्रापासून एका नामांकित वृत्तपत्रापर्यंतचा प्रवास. प्रत्येक उद्योजकाने नक्की वाचावे असे सुंदर पुस्तक. ब्रँड कसा बनतो? व्यवसाय म्हणजे नक्की काय? निर्णय कसे घ्यावेत? कल्पना, संकल्पना कशा राबवाव्यात? अशा नाना प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील. 

समीर जैन यांच्या नेतृत्वाखाली टाईम्स घेतलेली भरारी थक्क करते. आज टाईम्स ग्रुप देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या वृत्तपत्र समूहात गणला जातोय तो जैन यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे, व्यवसायिक दृष्टिकोनामुळे… 

लेखिका संगीता पी. मेनन मल्हन यांनी अतिशय छान शब्दात टाईमस ची कहाणी चितारली आहे. पुस्तकातील एक एक टप्पे पार करताना टाईम्स बद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होतोच. एका भव्य ब्रँड चा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे

भारतातील वृत्तपत्र व्यवसाय अनेक वर्षे अलिखित; पण काहीशा कठोर, साचेबद्ध नियमांनी बांधलेला होता. एकोणिसशे ऐंशीच्या दशकात हे चित्र बदलले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स आणि इतर प्रकाशनांची मालकी असलेल्या बेनेट, कोलमन आणि कंपनीने (बीसीसीएल) या उद्योगाचे नियमच जणू नव्याने लिहिण्यास प्रारंभ केला. मग ते नियम वृत्तपत्राच्या किमतीसंबंधीचे असतील, किंवा जाहिरात आणि संपादकीय स्वातंत्र्याबद्दलचे ! त्यामुळे पुढच्या दोन दशकांत भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा चेहरामोहराच बदलला.

टाइम्स ऑफ इंडिया च्या १९८५ मध्ये केवळ तीन आवृत्त्या होत्या आणि एकूण खप साधारण ५.६ लाख प्रती इतका होता. मात्र, मार्च २०१२ पर्यंत ते भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक बनले. देशभरात १४ आवृत्त्या आणि ४५ लाखांवर खपाची मजल त्याने गाठली. या वृत्तपत्राने स्वतः वाढत असताना बातमीदारी, संपादकीय धोरण, विपणनाच्या नव्या पद्धती शोधल्या आणि माध्यम विश्वातील खेळाचे नियमच पालटले.

तरीही, भारतातील माध्यम व्यवसायाचे रंगरूप पालटणाऱ्या टाइम्स समूहाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. टाइम्स ऑफ इंडियात काही काळ पत्रकारिता केलेल्या संगीता मल्हन यांनी ही उणीव दूर केली आहे. या वृत्तपत्राचे स्वरूप बदलण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, अशा काही पत्रकार आणि कॉर्पोरेट नेत्यांच्या मुलाखतींनी या लेखनाची सुरुवात झाली. त्यात जाणवलेल्या व्यक्ती व्यक्तींमधल्या अहंभावाच्या लढाया, भूमिका-दृष्टिकोनांमधील फरक, बदलत गेलेला व्यवसायाचा चेहरा यांच्या मेळातून एक रंजक कथा पुढे आली. ही कहाणी माध्यम क्षेत्राशी संबंधितांनी तर वाचलीच पाहिजे; पण बातमी कशी घडते, कशी रिचवली जाते यात रस असलेल्या इतर सर्वांसाठीही ती नवे भान देणारी ठरू शकते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “शूरा मी वंदिले” – संकल्पना : सौ. माधवी नाटेकर – लेखक : सतीश अंभईकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “शूरा मी वंदिले” – संकल्पना : सौ. माधवी नाटेकर – लेखक : सतीश अंभईकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : शूरा मी वंदिले

संकल्पना : सौ.माधवी नाटेकर, 9403227288

लेखक : सतीश अंभईकर 

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन, सांगली

मूल्य : रु.२००/-

सौ.माधवी नाटेकर यांच्या संकल्पनेतून उतरलेले व श्री.सतीश अंभईकर लिखित ‘ शूरा मी वंदिले ‘ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.१९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या एका मराठी मावळ्याची ही शौर्यगाथा आहे.

या शौर्यगाथेची सर्वांनाच उत्सुकता असेल.पण सुमारे बासष्ट वर्षांपूर्वी घडलेल्या युद्धाची कथा आत्ता कशी काय प्रकाशात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.त्यामुळे या पुस्तकाच्या जन्माची कथा समजून घेणे आवश्यक आहे.

सेकंड लेफ्टनंट शहीद विष्णू आठल्ये हे अकोल्याचे रहिवासी.याच अकोल्यात काही वर्षे श्री.सतीश अंभईकर हे रहात होते.अकोल्यातील जठारपेठ या भागात श्री.अंभईकर यांना एका रस्त्याच्या सुरुवातीला काळ्या फरशीचा छोट्याश्या शिलालेखासारखा एक फलक दिसला.तो अत्यंत अस्वच्छ व उपेक्षित अवस्थेत होता.परंतू श्री.अंभईकर यांना चैन पडत नव्हते.अनेक प्रयत्नांनंतर एक दिवशी त्या फरशीवरील कोरलेली अक्षरे त्यांना वाचता आली. त्यावर लिहीले होते–

“शहीद लेफ्टनंट कर्नल विष्णू आठल्ये मार्ग..जन्म ४मार्च १९४१.मृत्यू १९६२.सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये. “

या अक्षरांनी श्री.अंभईकर यांच्या मनात वादळ निर्माण केले.अवघ्या एकवीस वर्षांचा वीर जवान शहीद कसा झाला हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना.आपण याचा शोध घ्यायचाच असे त्यांनी ठरवले.पण कसा ? हा प्रश्न सर्वात मोठा होता.६२ वर्षांपूर्वीची घटना.कोणताही संदर्भ नाही. काहीही माहिती नाही.कधी लेखन केलेले नाही.परंतू युद्ध, युद्धशास्त्र, संरक्षण विषयी लेखन करणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी त्यांनी संपर्क साधला.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली येथील सौ.माधवी श्रीनिवास नाटेकर या विष्णू आठल्ये यांच्या भगिनी. श्री.अंभईकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व विष्णू आठल्ये यांच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.त्यानंतर अनेक निवृत्त लष्करी अधिका-यांनी

सुद्धा माहिती पुरवली.या सर्वांनी दिलेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे या पुस्तकाची निर्मिती झाली.मुळात केवळ उत्सुकतेपोटी घेतलेला शोध आणि त्याचा अथक पाठपुरावा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हेच या पुस्तक निर्मितीचे रहस्य आहे.त्यामुळे पुस्तक वाचताना सौ. नाटेकर यांचे मनोगत व श्री.अंभईकर यांचे ‘आभार ऋणानुबंधाचे ‘ हे लेख जरुर वाचावेत.

सुरूवातीलाच ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा १९६२ च्या चिनी आक्रमणासंबंधी एक लेख आहे.यामध्ये त्यांनी युद्धाची पार्श्वभूमी, भारत चीन सीमावादाची कारणे व मुख्यतः चीन युद्धातील भारताकडून झालेल्या घोडचुका यांचा आढावा घेतला आहे.युद्धाचा हा विषय समजून घेण्यासाठी सामान्य वाचकाला यातून खूप चांगली माहिती मिळाली आहे.आपली कितपत तयारी होती व धोरणे कशी चुकली हे यातून समजून येते.

यापुढील प्रकरण आहे ‘ वलाॅन्गची लढाई आणि विष्णू आठल्ये यांचे युद्धातील शौर्य ‘ .विष्णू आठल्ये यांना आणि त्यांच्या तुकडीला कोणत्या परिस्थितीत लढावे लागले व त्यांनी या प्रसंगाला कसे तोंड दिले यांची सविस्तर माहिती या प्रकरणात दिली आहे.सुरुवातीला लेखकाने या रणभूमीची भौगोलिक स्थिती आपल्या समोर ठेवली आहे. ती वाचून आपल्याला प्रतिकुलतेची आणि सैन्यावर असलेल्या जबाबदारीची कल्पना येऊ शकते.सुमारे ९२७ चौ.मैल एवढ्या विस्तृत क्षेत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी या तुकडीवर होती.प्रतिकूल नैसर्गिक वातावरण, अपुरी साधन सामुग्री आणि राजनैतिक पाठिंब्याचा पूर्ण अभाव अशा पेचामध्ये सापडूनही आपल्या सेनेने पराक्रमाची शर्थ केली.अत्यंत शिस्तबद्ध व संयमाने लढा देऊन या सेनेने आपल्या भूभागाचे रक्षण केले.त्संगधर या क्षेत्रातील लढाई आपल्या युद्धाच्या इतिहासातील सर्वात दुःखदायक लढायांमध्ये असली तरी भारतीय सैनिकांच्या अभूतपूर्व धैर्याची गाथा गणला गेली आहे असे लेखकाने म्हटले आहे.हे वाचताना पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.प्रत्यक्ष चढाईची इत्थंभूत माहिती वाचताना एकीकडे अंगावर काटा येतो, ऊर अभिमानाने भरुन येतो तर दुसरीकडे राजकीय नेतृत्वाची नादानी पाहून मन अस्वस्थ होते .असीम पराक्रम गाजवूनही सेनादलाकडून विष्णू आठल्ये यांना कोणताही शौर्य पुरस्कार मिळाला नाही याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे.

वास्तविकता या प्रकरणानंतर, शौर्यगाथा सांगून झाली आहे म्हणून हे लेखन थांबवता आले असते.पण लेखकाने तसे केलेले नाही.यापुढील प्रकरणे ही विष्णू आठल्ये यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.अनेक नकाशे, फोटो, यांचा समावेश केल्यामुळे पुस्तक म्हणजे महत्वाचा दस्तावेज झाले आहे.

पुस्तकाच्या पुढील भागामध्ये विष्णू आठल्ये बेपत्ता व नंतर मृत घोषित केल्याची जी अधिकृत पत्रे आहेत त्यांचा मजकूर देऊन मूळ पत्रांची फोटोप्रतही दिली आहे.आठल्ये यांच्या व्यक्तीगत वस्तूंची सूची, त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून लढलेल्या अमर अशा अकरा जवानांची छायाचित्रे, एन.डी.ए.मधील छायाचित्रे, युद्धात वापरलेल्या तोफा, विमाने यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत.वलाॅन्ग वॉर मेमोरियल, राष्ट्रीय समर स्मारक, तेथील छायाचित्रे दिल्यामुळे युद्धप्रसंगाचे उचित स्मरण होते.पुढील काही प्रकरणांमध्ये आठल्ये यांच्या रेजिमेंटचा परिचय, विविध पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे.आठल्ये घराण्याशी संबंधित सेनादलातील व्यक्तींचा परिचय व कर्तृत्व सविस्तरपणे कथन करण्यात आले आहे.

आठल्ये यांच्या भगिनी सौ.माधवी नाटेकर यांनी १७ पॅरा फिल्ड रेजिमेंटला भेट दिल्यानंतर त्याविषयीचा लेखही छायाचित्रांसह समाविष्ट करण्यात आला आहे.विष्णू आठल्ये यांचा जीवनप्रवास व पत्रे यांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.या युद्धाव्यतिरिक्त त्यांनी गोवामुक्ती संग्रामात घेतलेला सहभाग व कामगिरी यांची माहितीही आपल्याला वाचायला मिळते.

पुस्तकाच्या दुस-या भागामध्ये विष्णू आठल्ये यांच्या निकटवर्तीयांनी लिहीलेल्या आठवणी देण्यात आल्या आहेत.त्यातून कौटुंबिक आठवणी, छायाचित्रे यांचे दर्शन होते. गीतेत सांगितलेला कर्मयोग व विष्णू आठल्ये यांचे कर्तृत्व यातील साम्य् दाखवणारा सौ.माधवी नाटेकर यांचा लेखही आपणास वाचायला मिळतो.या सर्व एकत्रित तपशिलामुळे वाचकाला सर्व इतिहास समजून घेणे सहज शक्य झाले आहे.शूर वीरांच्या बलिदानाचे महत्व लक्षात येते.

नकळतच हात जोडले जातात आणि शब्द उच्चारले जातात

” युद्धभूमी हिच ज्यांची तपोभूमी, अशा शूरा मी वंदिले.”

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पाय स्टोरीज (पुस्तक संच)” – लेखक : श्री अमर भूषण – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पाय स्टोरीज (पुस्तक संच)” – लेखक : श्री अमर भूषण – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या स्पाय स्टोरीजचा चार पुस्तकांचा संच … 

१)एस्केप टू नोव्हेअर

२)मिशन नेपाळ 

३) टेरर इन इस्लामाबाद

४) द झीरो- कॉस्ट मिशन

संच मूल्य: १०४०₹ 

पुस्तक क्रमांक १

एस्केप टू नोव्हेअर

पृष्ठे: १८४ मूल्य: ३४०₹

भारताच्या ‘एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस’ अर्थात ‘एजन्सी’च्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो… या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो… आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो !

२००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो, असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी, देशाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता, ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते.

पुस्तक क्रमांक २

मिशन नेपाल

पृष्ठे: १५९ मूल्य: २५०₹

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !

भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या ईस्टर्न सर्व्हिस ब्युरोचे प्रमुख जीवनाथन यांच्यावर एजन्सी हेडक्वार्टर्सने हा ब्युरो बंद करण्याचं काम सोपवलंय. प्रामुख्याने नेपाळ, आणि भारताच्या पूर्वेच्या अन्य शेजारी देशांच्या संदर्भात इंटेलिजन्स गोळा करणं, ऑपरेशन्स चालवणं असं या ब्युरोचं काम, परंतु बराच काळ त्यांच्याकडून फारशी उपयुक्त माहिती हाती आली नसल्याने या ब्युरोवर अधिक खर्च करत राहणं हेडक्वार्टर्सला मान्य नव्हतं. या परिस्थितीकडे जीवनाथन ब्युरोचं पुनरुज्जीवन करण्याची एक संधी म्हणून पाहतो आणि एकापाठोपाठ एक बेधडक ऑपरेशन्स आखतो… ही ऑपरेशन्स त्याचा ब्युरो वाचवू शकेल? नेपाळ आणि भारत यांचे संबंध सुधारतील?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा…

मिशन नेपाळ आणि द वॉक इन !

पुस्तक क्रमांक ३

टेरर इन इस्लामाबाद

पृष्ठे: १३५ मूल्य: २००₹

पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो. वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं. तो ते फार सावधपणे पार पाडत असतो…

आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं, माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !

पुस्तक क्रमांक ४

द झीरो – कॉस्ट मिशन 

पृष्ठे: १६७ मूल्य: २५०₹

जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ?

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ हुंदक्यांचा गाव (कविता संग्रह) –  कवी : श्री नरेंद्र वानखेडे  ☆ परिचय  प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ हुंदक्यांचा गाव (कविता संग्रह) –  कवी : श्री नरेंद्र वानखेडे  ☆ परिचय  प्रा. भरत खैरकर 

पुस्तक : हुंदक्यांचा गाव ( कवितासंग्रह )

कवी : नरेंद्र सीताराम वानखेडे 

साधा भोळा भाव “हुंदक्याचा गाव”…

“अनुभवाचा वेचा” ह्या पहिल्या काव्यसंग्रहानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी “हुंदक्याचा गाव “हा नरेंद्र सिताराम वानखेडे ह्या कवीचा काव्यसंग्रह आपल्या भेटीस आला आहे. पहिल्या काव्यसंग्रहाच्या वेळी थोडीशी बाल स्वरूपात असलेली कविता दुस-या संग्रहात पोक्त झाल्यासारखी वाटत आहे.

“हुंदक्यांचा गाव” मध्ये एकूण ८६ कविता आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला मित्रवर्य भरत खैरकर यांनी “अनुभवाचा वेचा”साठी लिहिलेला छोटेखानी अभिप्राय आहे.. त्यानंतर गजानन दिगंबर संगेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना व कवीचं मनोगत आहे.

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणात काम करणारा हा कवी.. वेळ मिळेल तसा आपला गाव.. तिथली माणसं.. परिसर.. ऑफिस.. व्यक्ती.. नातेवाईक.. श्रध्दास्थानं.. इत्यादी सह जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.. त्यामध्ये जे काही त्याला सुचतंय.. दिसतंय.. किंवा रुचतंय.. ते सारं त्यानं जमेल तसं कवितेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भौतिक सुखाला सुख समजण्याच्या वृत्तीमुळे माणसाला सुख मिळत नाही त्यातून तो प्रचंड निराशेच्या आहारी गेला आहे. असं कवीच ठाम मत आहे. मनुष्य हीच जात मानणारा हा कवी आहे. त्याला “वसुधैव कुटुम्बकम” असावं असं वाटतं. माणसाला काय हवं हे सांगत असताना तो प्रेमाचा भुकेला आहे. पाहुण्याला गडवाभर पाणी.. भिक्षुकाला भाकरी चटणी.. घायाळाला घोटभर पाणी.. एवढं “हवं आहे” असं त्याचं म्हणणं आहे.

अलीकडे रात्रीला अंगणात चांदणं पडत नाही ,ही खंत कवीची आहे. संग्रहातला कवी एकदम प्रामाणिक साधा भोळा सोबतच देवभोळाही आहे. इथेच करा इथेच भरा हा निसर्गाचा न्याय असं त्याचं म्हणणं आहे.. नव्हे ती वाचकाला समज आहे. स्वप्न आणि कष्टाचं नातं सांगताना स्वप्न आनंदी ठेवतात व कष्ट जिवंत ठेवतात असं त्यांचं म्हणणं आहे.

काव्यसंग्रह वाचताना ‘ चार कडव्याचीच कविता असते. ‘असं जणू कवीचं मत असावं असं वाटून गेल्याशिवाय राहत नाही.. कारण बऱ्याचश्या कविता ह्याच पठडीतल्या आहे.. जास्त कविता लिहिण्याच्या नादामध्ये.. एका विशिष्ट चाकोरीत अडकल्याचे आपण कवीला बघतो..

बहिणाबाईची जवळीक साधू पाहणारी “अरे संसार संसार.. कधी चढ कधी उतार” ही कविता आपण येथे वाचू शकतो. पैशामागे लागलं तर काय होऊ शकतं हे सांगताना “खूप धावू नको पैशासाठी.. समाधान ठेव काही सुखासाठी” असा सल्ला कवीचा आहे. १९८०च्या दशकातलं ग्रामीण जीवन ” जुनी श्रीमंती ” ह्या कवितेतून कवीने मांडली आहे. दिव्याखाली अभ्यास करणाऱ्यांचा तो जमाना आणि ती श्रीमंती किती मस्त होती! हे कवी या ठिकाणी दाखवून देतो. “बाप बोलतो” ही कविता बापाचं कुटुंब.. मूल.. पोरंबाळ.. त्यांचं शिक्षण.. त्यांची सुरक्षा.. त्यासाठी धडपडणार जीवन मांडत. तर “मुलास उद्देशून” ही कविता मुलाने बापजाद्याची परंपरा चालविली पाहिजे.. हे सांगताना “बापाच्या धनाभोवती मारू नको गुंडाळी”… तुझं जगणं तू जग.. असा सल्ला मुलाला देतो.. वाचकाला मिळतो. आई.. बाबा.. मुलं.. गाव.. नातेवाईक.. ऑफिसचे कर्मचारी.. इत्यादींमध्ये रमणारा कवी कुटुंब वत्सल वाटतो.. आईच्या व बापाच्या कष्टाची कदर असलेला कवी आपल्याही मुलाने तोच वारसा सांभाळावा ही आशा बाळगतो..

कवी जलसंधारण विभागात काम करत असल्याने थेंब थेंब पाण्यासाठी त्याचा जीव तळमळतो आहे.. त्यातून जलबचतीचे भान कुणालाही उरलं नाही आणि गाय व माय कशी पाण्यासाठी रानोरान भटकते आहे. हे वाचून वाचकाच्या डोळ्यात पाणी येत!

“आठवणीतले दिवस “जगत असताना कवीला बाल मैत्रिणी आठवते.. अजून मुलाबाळासाठी झटू नकोस.. स्वतःसाठी जग.. कशाला धरतेस पंख पाखरांचे.. उडू दे त्यांना.. त्यांच्या आकाशात.. कशाला बघतेस जुनी राजा राणीची चौकट असलेला फोटो.. जिंदगी फक्त चार पावले शिल्लक आहे.. हे लक्षात ठेव.. हे सांगणारा कवी अजूनही बालमैत्रिणीला विसरला नाही हे दिसतं! आपल्या सजनासाठी सजलेल्या “नवल परी”ला चार प्रश्न कवी विचारतो,तिही कविता फार छान झाली आहे.

आपल्या चिमुकल्या मुलीचं.. लेकीचं हळूहळू किलबिलत.. प्रौढ होणं.. तिचं बापाला लळा लावणं.. हे सारं आठवून कवी लेकीचं महत्त्व विशद करतो. संकटाच्या काळी कोणीच मदतीला येत नाही, ही लोक त-हा कवी लागोपाठच्या “हात सैल होताच” व “नजरेत आले “ह्या कवितेतून मांडतो.

मधेमध्ये गझल सदृश कविता लिहिण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. मात्र अभ्यास कमी पडल्याने कवितेला पाहिजे तसा उठाव दिसत नाही.. तुत्यारी मधून बैलाच दुःख मांडणारा कवी प्राणीमात्रावर प्रेम करा हे शिकून जातो. निवृत्तीच्या वयात आलेला कवी ऑफिस मधील पीएफ आणि निवृत्तीनंतरची उलघाल दोन-तीन कवितेत मांडताना दिसतो. ” युद्धावर उत्तर फक्त बुद्धच आहे. ” असं ठाम मत कवीच आहे. सोबतच बाबासाहेब.. गौतम बुद्ध.. रमाई.. महात्मा फुले.. प्रजासत्ताक.. संविधान आणि देशप्रेम.. यांच महत्त्वही कवीने इतर कवितातून विशद केलं आहे.

कवीच्या गावाजवळ असलेल्या पारडसिंगा येथील सती अनुसया मातेचे महात्म्य कवीने नेमक्या शब्दात मांडलेल आहे. सोबतच सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित मृत्यूनंतरचा विरह ” सिंधुमाई ” कवितेत कवीने मांडला आहे.. केवळ “मुठभर फुलांचा धनी” व्हावं एवढीशी आशा कवीला आपल्या जगण्यातून आहे… कवी स्वतःला खूप मोठा मान्यवर किंवा थोर समजत नाही.. ह्यातूनच.. कवीच साधं जगणं आणि आजूबाजूच्या भोवतालाशी समरसून जाणं लक्षात आल्यावर ” हुंदक्यांचा गाव “मधली कविता इतकी साधी.. सहज.. सोपी.. आणि भोळीभाबळी कां आहे ? हे वाचकाला समजून येतं.. थोडा इतर कवितांचा अभ्यास वाचन व वैचारिक व्याप्ती वाढवल्यास पुढच्या कविता अधिक चांगल्या व वाचकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. कवीला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा..

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ चुटकीभर गंमत – लेखिका : डॉ.  मृण्मयी भजक  ☆ परिचय –  सुश्री वीणा रारावीकर ☆

सुश्री वीणा रारावीकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ चुटकीभर गंमत – लेखिका : डॉ.  मृण्मयी भजक  ☆ परिचय –  सुश्री वीणा रारावीकर ☆

पुस्तक : चुटकीभर गंमत 

लेखिका : डॉ.  मृण्मयी भजक

पृष्ठ संख्या – १४७

प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन 

किंमत – रुपये २००

जेव्हा आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो.  त्याला काही खास कराण नसतं.  त्यावेळी काही करायची इच्छा नसते.  कोणाकडून उपदेशाचे डोस, तत्वज्ञान ऐकायचे किंवा वाचायची इच्छा नसते.  फार काही मानाविरूद्ध झालेल नसतं आणि ९० च्या दशकातील तीच तीच गाणी युट्बुवर ऐकून अजून बोअर व्हायच नसतं, तर काय कराल? कोणतं पुस्तक हाती घ्याल? तर माझ उत्तर आहे “चुटकीभर गंमत”.  कारण नावाप्रमाणेच चुटकी मारून गंमत आणणारे पुस्तकातील छोटे छोटे लेख.  डोक्याला ताप न देणारे, हलके-फुलके लेख.  कोणतेही पान उघडावे आणि एखाद-दुसरा लेख वाचून आनंद घ्यावा आणि आपल्या पुढच्या कामाला लागावे.  गंमत ही भाजीतल्या मीठ-साखरेच्या प्रमाणासारखीच असते.  नाही तर मग ती कुस्करीची मस्करी व्हायला वेळ लागत नाही.  असो.  रोज येता जाता सहजपणे दोन-चार लेख वाचून पुस्तक संपवाव असं हे पुस्तक.  या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉ.  मृण्मयी भजक.  एकूण ५० ललित लेख यात आहेत.  या लेखांत प्रामुख्याने प्रसंगचित्रे आहेत.  नव्या जुन्या विचारांचा, आठवणींचा संगम आहे.

आपल्यापैकी कदाचित काही लोकांना डॉ.  मृण्मयी भजक या माहित असतील.  या लेखिकेला आपण डीडी सह्याद्री या वाहिनीवर ‘सखी सह्याद्री’ आणि ‘हॅलो सह्याद्री’ या थेट प्रेक्षपण असणार्‍या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांची मुलाखत घेताना पाहिले असेल.  शिक्षणाने होमिओपॅथी डॉक्टर.  काही वर्षे होमिओपथी तज्ञ म्हणून काम केले आणि आता निवेदन, सूत्रसंचालन, एकपात्री प्रयोग, आकाशवाणी पुणे येथे उद्घोषक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मृण्मयीचे लेखन क्षेत्रातही वाखाणण्याजोगे काम आहे.  वृतपत्रीय लेखन आणि अमेरिका खट्टी-मीठी आणि चुटकीभर गंमत ही तिची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

लेखकाची प्रतिभा, निरक्षण, आकलन आणि कल्पना शक्ती नेहमीच इतरांपेक्षा वेगळी असते.  म्हणून त्यांच्या हातून साहित्याची निर्मिती होते.  लेखिकेचे लेख याचा प्रत्यय आणून देतात आणि त्याचबरोबर तिने काढलेले निष्कर्ष वाचून आपण विस्मयचकीत होऊन जातो.  तिला कोणत्याही गोष्टीवरून लेखनासाठी विषय सुचतात.  म्हणजे घरात काढून ठेवलेले जुने कपडे, स्वयंपाकघरातील भांडी, कोणाच्या घरी गेल्यानंतर न उघडणारे बाथरूमचे दार, डोक्याला चोपडलं जाणार तेल, चहा इत्यादी इत्यादी.  कदाचित लेखाचे विषय साधे असतील परंतु त्यावरून काढलेले तर्क मनात सहज रेंगाळत रहातात.

या पुस्तकाला जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना लाभली आहे.  प्रस्तावनेतील वाक्यांचा पुस्तक वाचताना प्रत्यय येतो आणि मनोगत वाचल्यानंतर पुस्तकाचे नाव असे का ठेवले आहे हे समजतं.  सध्याच्या आयुष्यात आपण काय हरवून बसलो आहे? पुस्तक वाचल्यानंतर याची खात्री पटते.  विजयराज बोधनकर सरांनी अतिशय चपखल मुखपृष्ठ काढलं आहे.  एका स्त्रीच्या खिडकीतून दिसणारे जग आणि त्या खिडकीत असलेली फुलपाखरे.  फुलपाखरांसारखे सुंदर, छोटे लेख, तरीही उडून न जाणारे मनात घर करून रहाणारे.

गंमत हा किती लेखांच्या शीर्षकामध्ये आला आहे, याचा गंमत म्हणून वाचकांनी एक डाव खेळावा.  अशी लेखांची शीर्षके.  ‘आमची खिडकी न अश्शीच उघडते’ लेखाचे असे गंमतीशीर नाव वाचून लेख नककीच वाचावासा वाटतो.

त्रिकोणी पोळी का आठवायची आणि ठिपक्यांची सममितीमधीलच रांगोळी काढायची का दुसर्‍या नक्षीदार आकाराची रांगोळी? असे प्रश्न समोर मांडत लेखांना सुरवात होते.

‘वाढदिवसाला स्वतःच स्वतःला भेटवस्तू द्यायची’ अशा प्रकारची एक संकल्पना तिने ‘गिफ्ट आगळंवेगळं’ या लेखात मांडली आहे.

‘नाच ग घुमा’ या लेखातील सुप्रिया ‘नाचू मी कशी?’ असं म्हणत नाचायला उठते का ते वाचकांनी वाचून बघावे.

‘तुला एवढंही कसं जमत नाही’, असं आपण लहान मुलांना बोलतो, तेव्हा गरज असते त्यांच्या जागी जाऊन पहाण्याची, त्यांच्या विश्वात जाऊन अनुभव घेण्याची.

आपण एखादी गोष्ट कोणाला तरी आवडत नाही, म्हणून त्याचा त्याग करतो का? मग त्यात आवडत्या रंगाचे कपडे किंवा एखादी आवडती डिश किंवा एखाद्या शैलीतील सिनेमा किंवा नाटक काहीही असेल.  असे घडण्याचे काही खास कारण असते का? एखादी घटना घडून गेल्यानंतर काही वर्षांनी आपण ती घटना विसरून जातो आणि त्याच्या बरोबर चिकटलेल्या नकारात्मक भावना वर्षानू वर्षे मनात साचवून पुढे जात असतो.  यासाठी ‘हा रंग मला शोभत नाही’ हा लेख प्रपंच.

शेवटच्या लेखाचे नाव आहे ‘शेवटचं पान’.  शाळा-कॉलेजमध्ये असताना शेवटच्या बाकावर बसून वहीच्या शेवटच्या पानावर प्रत्येकाने काय केलं, ते जरूर आठवा.

आपल्याही रोजच्या आयुष्यात साधे-सुधे प्रसंग येत असतात.  लेखकाच्या नजरेतून असे प्रसंग, घटना बघायला, वाचायला शिकलं पाहिजे.  हे लेख वाचून दैनंदिन जीवनातील घटनांकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन लाभेल.

आता तुम्ही हे ही विचाराल की काही लेखांचा परिचय दिलात, इतर लेख कोणते आहेत? हिच तर एक गंमत आहे.  तुम्ही सर्वांनी पुस्तक वाचून त्यातील आनंद घ्या.

परिचय : वीणा रारावीकर

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सीतायन” –  लेखिका: डॉ. तारा भवाळकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सीतायन” –  लेखिका: डॉ. तारा भवाळकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक :  सीतायन

…वेदना-विद्रोहाचे रसायन

लेखिका: डॉ. तारा भवाळकर

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे

प्राचीन भूतकाळ हा अंधाऱ्या गुहेसारखा असतो. त्याच्यासंबंधी नेमकी अशी कोणतीच विधाने करता येत नसतात. एक हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीतल्यासारखी संशोधकाची स्थिती होते. काही प्रकाशकणांच्या आधारे लेखक सामुग्रीची जुळवाजुळव करतो आणि ती अभ्यासुन आपले मत मांडतो. भारतीय इतिहासाच्या संबंधात हे अधिकच खरे आहे. कारण भूतकाळासंबंधीच्या साधनसामुग्रीचा अभाव ही एक इथल्या इतिहासाची बुद्धिनिष्ठ सत्यान्वेषी मांडणी करण्यातील अडचण आहेच; पण त्याचबरोबर ब्राह्मणी विचारपद्धती हाही त्यातील एक प्रमुख अडसर आहे. येथील विद्वान हे एकाच वर्ग संस्कृतीत वाढलेले आहेत. कारण त्यांनाच फक्त अध्ययन आणि अध्यापनाचा अधिकार होता… शिक्षणाचा अधिकार होता. म्हणून त्यांच्या मनाची जडण-घडण ठेवणसुद्धा एकसारखी आहे. हा साचा ठरून गेला आहे. त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्यांच्या अंगावर ते वस्सकन धावून जातात, तुटून पडतात. त्यांना फक्त आपण वाचलेली पुस्तके दखलपात्र वाटतात आणि बाकीची सगळी चिकित्सक पुस्तके त्यांना पिवळी पुस्तके वाटतात.

आतापर्यंत जेवढी रामायणे लिहिली गेली वा दृकश्राव्य माध्यमात दाखवली गेली ती सगळीच रामाचा गौरव करणारी होती. त्यात फक्त रामाच्या गुणकर्तृत्वाचे गोडवे गाईले गेले, त्याच्या पराक्रमाचे, पौरुषाचे, मर्यादा पुरूषोत्तमाचे कौतुक केले गेले. सीता पतिव्रता असल्यामुळे तिला मिळाले दुय्यम स्थान! स्त्रियांच्या बाबतीत ही संस्कृती नेहमीच पक्षपाती राहिलेली आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेच आहे. कारण या संस्कृतीने पुरुष वर्गालाच न्याय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीतायन’ या पुस्तकात मात्र आजवर सातत्याने अन्याय झालेल्या, दुर्लक्षिल्या गेलेल्या सीतेला यथोचित न्याय देण्याचा, तिची भूमिका मांडण्याचा, समजावून घेण्याचा आणि राम-सीतेतील नात्याचा योग्य सांस्कृतिक अन्वयार्थ लावण्याचा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून आणि जनमानसात रुजलेल्या रामायणातून तारा भावाळकरांनी सीतेची वेदना चपखल शब्दात मांडली आहे.

तसे पाहिले तर आजचे वाल्मिकी रामायण खूप अर्वाचीन आहे. बुद्धकाळानंतरचे ते आहेच. कारण यवनांचेही उल्लेख त्यात आढळतात. त्याअर्थी ते अलेक्झांडरच्या स्वारीनंतरचे असावे असेही म्हटले जाते. रामायणाची केवळ दोन-चार संस्करणे झालेली नाहीत. दोन-चारशे संस्करणे झालेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक प्रक्षेप त्यात झालेले आहेत. अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे वाटेल ते त्यात घुसडले आहे. त्यातील प्रक्षेप बाजूला काढून निश्चित मूळ वाल्मीकी रामायण बाजूला काढणे वाटते तितके सोपे नाही. ते कठीण काम आहे. प्रक्षिप्त भागांसंबंधी मत प्रतिपादन करताना अनेकदा आपले पूर्वग्रह आड येण्याची शक्यता असते. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आपल्या पूर्वनिश्चित दृष्टिकोनावर आघात करतात, धर्मश्रद्धा पायदळी तुडवतात तो भाग प्रक्षिप्त म्हणून मोकळे व्हायचे. ही ब्राह्मणी विचारवंतांची आणि ग्रंथकारांची अनैतिहासिक एकांगी धर्मश्रद्धवृत्ती अनेकदा कोणत्याही बाबीच्या सत्यन्वेषणाला आड येते, बाधा निर्माण करते.

रामायणाचे मूळ कोणते यासंबंधी विचारवंतांत मतभेद आहेत. ए. वेबर या ग्रंथकाराने रामायणाचे मूळ, बौद्धांच्या दशरथ जातकात आहे असे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘प्राचीन धार्मिक राजासंबंधी जी बौद्धकथा प्रचलित होती तीच या रामायण काव्याला आधारभूत झाली’ (महाराष्ट्रीय ज्ञानकोश हिंदूस्थान खंड, पृ. ७३). याशिवाय संस्कृतिकोशात म्हटले आहे ‘वाल्मिकीच्या पूर्वी रामाविषयी काही गाथा प्रचलित होत्या. याचे प्रमाण बौद्ध त्रिपिटिकावरूनही मिळू शकते. या रामविषयक गाथा हाच रामकथेचा मूलस्त्रोत असे म्हणता येईल. ‘ (भारतीय संस्कृतिकोश खंड ८, पृ. १७). डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनीसुद्धा रामायणाचा मूलस्त्रोत बौद्धांच्या जातककथा हाच सांगितला आहे. रामायणातील काही श्लोक व जातकातील काही गाथा सारख्या आहेत हे त्यांनी त्यांच्या ‘जातकठ्ठ कथा’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सप्रमाण दाखविले आहे, ते म्हणतात की, ‘रामकथा का अनगढ़ स्वरूप जातक में है और वाल्मिकी के रामायण में चित्रित उसी का सँवारा स्वरूप है। (खाजगी मुलाखत : डॉ. भदंत आनंद कौसल्यायन). श्री. दिनेशचंद्र सेनसुद्धा दशरथ जातकात रामकथेचा आधार व पूर्वरूप पहातात. (बेंगाली रामायण पृ. ७३). या सर्व बाबी पाहिल्या म्हणजे जातक आणि रामायण यातील संबंध लक्षात येतो. परिणामी आज आपल्या हाती असलेले ‘वाल्मिकी रामायण’ खूपच अर्वाचीन आहे हे लक्षात येते. त्यातही अनेक प्रक्षेप घुसवलेले आहेत. त्यामुळे ‘आम्ही वाचलेले वाल्मीक रामायण तेवढेच खरे’, असे समजणे हा आपलाच कोतेपणा ठरतो.

रामायणासंबंधात अनेक वेगवेगळ्या धारणा आहेत. जगभर ही कथा वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहे. तिच्या अनेक आवृत्या आहेत. अनेकांच्या मते, रामायण ही एक मिथ् (पुराणकथा) आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. (पण आजचे हिंदुत्ववादी मात्र रामायणाला हिंदुत्वाच्या अस्मितेपोटी भारताचा प्राचीन इतिहासच समजतात. ) खरे पहाता वाल्मिकीच्या प्रतिभेला स्फुरलेली ती सर्जनशील कलाकृती आहे. वाल्मिकी रामायण घडले की घडले नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. राम, लक्ष्मण, सीता कैकेयी, रावण इ. या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की नाही हेही महत्त्वाचे नाही. महत्वाचे आहे ते हे की रामायण भारतीयांच्या मनामनात कशा पद्धतीने रुजलेले आहे त्याचा ठाव घेणे. ज्यात राम हा क्षत्रिय राजकुमार म्हणून अवतरतो. ब्राह्मण्याचा समर्थक व संरक्षक असे त्याचे रूप लक्षात येते. मनुस्मृती आणि रामायणाचा अनुबंध लक्षात येतो. ‘सीतायन’ ग्रंथाच्या लेखिकेनेही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील ‘अंकुशपुराण’, ‘कन्नड चित्रपट रामायण’, ‘चंद्रावती रामायण’, ‘बंगाली दुर्गा पुजा’, ‘दशरथ जातक’ अशा विविध रामायणात लिहिलेल्या कथांचा अभ्यास करून त्यातील सीतेचे सत्व अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ‘ओवीगीतातील सीतायन’ या प्रकरणामध्ये अडाणी, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या पण सुजाण मनाच्या स्त्रियांनी ओव्यातून..

“राम म्हणू राम। न्हाई सीतेच्या तोलाचा।

हिरकणी सीतामाई। राम हलक्या दिलाचा।।”

असे म्हणत रामाला धिक्कारले आहे. असे अनेक ओव्यांचा आधार घेत त्यांनी सिद्ध केले आहे. सीतेच्या सोशिकतेचा कडेलोट रामाच्या अहंकारामुळे कसा झाला, तिला कैकेयीच्या सासुरवासामुळे भूमिगत कसे व्हावे लागले याचे विश्लेषणात्मक वर्णन मनाला भावून जाते आणि ‘स्त्री जन्मा तुझी ही कहाणी’, असे वाटल्या वाचून राहत नाही. पुस्तकात रामायणाचा विचार सीतेच्या दृष्टिकोनातून केल्यामुळे लेखिकेने सीतेची प्रतिमा रामापेक्षा उजवी दाखवलेली आहे, असा आरोपही सनातनी रामभक्त करतात; पण खरे पाहता लोक परंपरेचं रामायणाशी असलेलं नातं लक्षात घेता सीतेच्या संदर्भात भारतीय जनमानसाने सीतेलाच झुकते माप दिले आहे हे मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध कथा आणि अनेक आदिवासी कथांमधूनही वाचकाच्या लक्षात येते. अर्थात हा वेगळा विचार सनातनी भक्तांच्या पचनी पडेलच असे नाही… किंबहुना तो पचनी पडतच नाही म्हणूनच ते या पुस्तकावर सोशल माध्यमात तोंडसुख घेताना दिसतात. पण सजग विचारी माणसांनी या पुस्तकाचे स्वागतच केलेले आहे. मागच्या शतकात ‘रिडल्स इन हिंदूईझम’ लिहिणारे आंबेडकर, ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ लिहीणारे प्रा. अरुण कांबळे आणि ‘सच्ची रामायण’ लिहिणारे स्वामी पेरियार यांनी ज्या पद्धतीने रामायणाची विवेकी चिकित्सा केली त्याच तोडीची रामायणाची चिकित्सा करणारे तारा भावाळकरांचे ‘सीतायन’ हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे. रामाला उच्चासनी बसवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाने सीतेला खरा न्याय दिलेला आहे

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ☆ पुस्तक “रतन टाटा.. एक दीपस्तंभ” – लेखक : शंतनू नायडू – अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके  ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

☆ पुस्तक “रतन टाटा.. एक दीपस्तंभ” – लेखक : शंतनू नायडू – अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके  ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆ 

पुस्तक : रतन टाटा.. एक दीपस्तंभ 

लेखक : शंतनू नायडू

अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके 

प्रकाशन : मंजुळ प्रकाशन 

पृष्ठे : 235

मूल्य : 399₹

नितांत सुंदर पुस्तक. रतन टाटा यांच्यासोबत ज्याने काही काळ एकत्र व्यतित केला आहे. (एकुणात श्री रतन टाटा यांच्या विषयी मनात आदरच होता परंतु, शंतनू विषयी इंटरनेटवर, काहीबाही छापून येत असे. यु ट्यूब वर रिल्स येत असत, त्यामुळे त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चुकीच्या धारणा माझ्या कडून केल्या गेल्या होत्या. त्या सर्व शंकांचं निरसन हे पुस्तक वाचताना झालं. ) अशा शंतनू नायडू याने आपल्या सहज सुंदर शब्दांतून त्याचे व श्रीयुत रतन टाटा या एकमेकांचे नाते तर उलगडून दाखवले आहेच. सोबत रतन टाटा यांच्या स्वभावाची दुसरी बाजूही सुंदर मांडली आहे.

आपणाला श्री रतन टाटा हे अस्सल भारतीय व भारतीयांवर नितांत प्रेम करणारे, संकट काळात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, कोरोनासारख्या जागतीक महामारित सरकारला मोठी देणगी देणारे, फक्त देणगी देऊन न थांबता इतरही गोष्टी द्वारे समाजसेवा करणारे, एका कुटुंबाला टु व्हिलर वरुन जात असता नॅनो कारची संकल्पना मांडणारे व ती प्रत्यक्षात आणणारे आणि बरंच काही आपणाला माहीत आहे.

शंतनू नायडू यांनी आपल्या या पुस्तकातून श्री रतन टाटा यांच्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत. मूळातूनच या पुस्तकाद्वारे शंतनू व श्री. रतन टाटा यांचा सहप्रवास या पुस्तकाद्वारे वाचायला हवा.

श्रीयुत रतन टाटा यांची पहिली भेट, त्याच्या स्टार्टअप मोटोपॉजचे काम, त्याचे कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण, जेथे स्वतः श्री रतन टाटा यांनी शिक्षण घेतलं आहे. तेथील अनुभव, त्या काळातील टाटांचा आधार, तेथून परत भारत, टाटा ट्रस्ट चे काम, ते त्यांचा जवळचा मित्र, ते कार्यालयातील त्यांचा खाजगी सचिव. शंतनू चे आई वडील, मित्र मंडळी, विविध मंडळींची वेळोवेळी झालेली मदत, त्याचे श्वानप्रेम आणि बरंच काही…

अतिशय नितांत सुंदर पुस्तक वाचल्याचा आनंद नक्कीच हे पुस्तक देते. आणि हो या पुस्तकातील रेखाचित्रे संजना देसाई यांनी अप्रतिम अशी रेखाटली आहेत. पुस्तकातील अनुभव वाचकांच्या मनात जीवंत करण्यात त्या या रेखाचित्रांद्वारे यशस्वी झाल्या आहेत.

एका दीपस्तंभाची कथा भावी होऊ घातलेल्या भविष्यातील दीपस्तंभाकडून लिहिलेली कथा मुळातूनच वाचायलाच हवी.

परिचय –  श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा” – लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर ☆

सुश्री गौरी गाडेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा” – लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर

पुस्तक: लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा

लेखिका: डॉ. तारा भवाळकर

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ हा डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या ‘ पुण्यनगरी ‘ च्या साप्ताहिक पुरवणीत व अन्यत्र प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे.

प्राचीन ते आधुनिक मानवी जीवनाला व्यापून राहिलेल्या समूहमनाच्या संचितात काळानुसार बदल होत असले, तरी त्यात आदिमतेपासूनच्या खुणाही शिल्लक असतातच. या बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे.

डॉ. तारा भवाळकर

ताराबाईंचं बालपण शहरी व ग्रामीण वातावरणात गेल्यामुळे चूल-पोतेरे, दळणकांंडण, ओव्या-शिव्या वगैरे ग्रामीण जीवनाचा, तसेच पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, भजने-कीर्तने वगैरे पुण्यातील जीवनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीविषयी अकारण भक्तिभाव न ठेवता तटस्थपणे, चिकित्सकपणे त्यांनी या विषयांचा अभ्यास केला. समाजाच्या स्थितीगतीचा शोध घेताना लोकपरंपरांचा खूप मोठा खजिना त्यांना सापडला. त्याची ही ओळख.

माणूस म्हणजे देह, संवेदनशील व विकारशील मन आणि विचारशील मेंदू. या भावना, विकार, विचार आणि इतर वस्तुरूप पसारा म्हणजे संस्कृती. निसर्गाने अनुकूल व्हावे, म्हणून एक अज्ञात शक्ती निर्माण झाली, जी कल्पना पुढे विस्तारून देव निर्माण झाले. त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी विधि- विधाने, उपासना प्रकार, गाणी, कथा, वाद्ये आली. त्यातून लोककलांचा उगम झाला.

पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची.

बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक मुद्दा असा की, शिक्षण म्हणजे केवळ लिहितावाचता येणे या धारणेला हादरे देणाऱ्या अनेक कथा, गीते, म्हणी, उखाणे, लोकसमज या अनक्षर समाजस्तरात विखुरलेले आहेत. स्त्रीच्या स्थितिगतीवर तथाकथित शिक्षित स्त्रीपेक्षा अधिक थेट व परखड भाष्य या अनक्षर स्त्रियांनी केले आहे.

जात्यावरची ओवी म्हणजे शुद्ध, प्राकृतिक, सहज, आपोआप मन मोकळं करण्यासाठी ‘झालेलं’ (‘केलेलं’ नाही) गाणं. बाईंच्या मते ‘चित्ताच्या विविध प्रबळ भावभावनांचा एकांतात अचानक झालेला उद्रेक म्हणजे कविता ‘ ही वर्ड्स्वर्थने केलेली काव्याची व्याख्या ओवीला तंतोतंत लागू पडते.

पुरुषप्रधान व्यवस्थेत मुलाला वरचा दर्जा असला तरी आईसाठी दोघं सारखीच. हे सांगताना एक अनक्षर बाई म्हणते,

“लेकापरीस लेक कशानं झाली उणी

एका कुशीची रत्नं दोन्ही. “

भारतीय परंपरेत स्त्रियांची प्रतिष्ठा पुरुषसापेक्षतेनेच मोजली जाते. त्यातूनच ‘अहेव मरण’, पुरुषांच्या सोयीसाठी देवदासी वगैरेंचा जन्म झाला.

सांगलीतील एका महिला संघटनेने साजरा केलेल्या विधवांच्या हळदीकुंकू समारंभाविषयी बाईंनी लिहिले आहे.

सौभाग्याची व्रते साजरी केली जात असताना एका समाजात ‘रांडाव पुनव’ साजरी केली जाते. यल्लम्माच्या जोगतिणी ‘वैधव्याचे व्रत’ करतात.

माघी पौर्णिमेला (रांडाव पुनम) त्या विधवा होतात. पुढे चार महिन्यांनी ज्येष्ठी पौर्णिमेला (अहेव पुनव) त्या पुन्हा सौभाग्यवती होतात. कारण त्या जिचं मानवी प्रतिरूप आहेत, त्या रेणुकामातेचा पती जमदग्नी याचा कार्ताविर्याने वध केला. पुढे चार महिन्यांनी पुत्र परशुरामाने त्याचा सूड घेऊन पित्याला जिवंत केले. म्हणून हे व्रत. पित्यासाठी एवढा आटापिटा करणाऱ्या परशुरामाने आईच्या पातिव्रत्यभंगाच्या नुसत्या संशयावरून पित्याच्या आज्ञेनुसार आईचा वध केला होता. ही कथा स्त्रीजीवनाच्या स्थितिगतीची आणि पितृप्रधान व्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याची सूचक आहे.

या वैधव्याच्या व्रताचे सांस्कृतिकदृष्ट्या मानववंशशास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे मातंगी (रेणुका) ही मूलतः भूदेवता. पिकांच्या कापणीनंतर वरील चार महिन्यांच्या काळात जमीन उजाड होते, नवनिर्मिती करू शकत नाही, म्हणजे विधवा होते. म्हणून तिचं प्रतिरूप असलेल्या जोगतिणी हे वैधव्याचं व्रत पाळतात.

या संदर्भात बाईंनी एक विचारप्रेरक प्रसंग सांगितला आहे. नागपूरच्या मातृमंदिर या स्त्रीसंस्थेच्या संस्थापक श्रीमती कमलाबाई हॉस्पेट यांनी आपल्या वैधव्याचा पन्नासावा वाढदिवस जाहीरपणे ‘साजरा’ केला. कारण त्यांना बालपणीच वैधव्य आल्यामुळे त्या इतक्या स्त्रियांना, अनाथ मुलांना आयुष्यात उभं करू शकल्या.

बहुपत्नित्व ही बायकांनाच बायकांचा शत्रू करणारी; पण पुरुषांना फायदेशीर अशी व्यवस्था होती. या संदर्भात बाईंनी, वेदांचे भाषांतरकर्ते म. म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या ऋग्वेद ग्रंथातील ‘सपत्नीनाशनसूक्तां’विषयी लिहिले आहे.

त्या लेखात बंगालमधील ‘सेंजुती व्रता’चाही उल्लेख आहे. त्या व्रताचा उद्देश ‘सवतीचं वाट्टोळं व्हावं’ हाच. ओवीप्रमाणेच स्त्रियांच्या व्रतातूनही स्त्री आपापसातच बोलते. ती कुटुंबातही व्यक्त होऊ शकत नाही.

‘पाऊस : साजिवंत सखा’ हे लेखाचे शीर्षकही अर्थपूर्ण, नादमय आहे. बाईंनी म्हटले आहे की ‘येरे येरे पावसा|तुला देतो पैसा|| ‘ हे लोकपरंपरेतले आणि लोकभाषेतले आद्य पर्जन्यसूक्तच आहे.

बाई म्हणतात की या लोककवयित्रींनी निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी मानवीपण बांधले आहे. उदा. ‘ईजबाईचं नर्तन’, ‘जिमिनबाई भरदार’,

‘धरतीच्या कुशीमधी, बीय बीयाणी रुजली|

वऱ्हे पसरली माटी, जशी शाल पांघरिली ||’

बाईंच्या मते लोकपरंपरेतल्या प्रकृतिसंवादी जगण्यातच चेतनगुणोक्ती ( अचेतनावर चेतनाचा आरोप करून केलेली रचना) असते. उदा. ‘जात्या तू ईसवरा, नको मला जड जाऊ|’

पण कविता म्हणून स्त्रियांच्या या साहित्याचा विचारच फार झाला नाही. त्या निसर्गाकडे आपल्याच अस्तित्वाचे प्राकृतिक रूप म्हणून नाते जोडतात.

यात नागपंचमीविषयी एक लेख आहे. नाग हे आदिपुरुषतत्त्व. बाप, भाऊ, पती-प्रियकर, पुत्र या नात्याने तो रक्षणकर्ता असतो. कधी तो कुळाचा, धनाचा रक्षक असतो. प्रियकर-पती म्हणून तो सर्जक पुरुषतत्त्व असतो.

गिरीश कर्नाड ‘नागमंडल’ या नाटकातून, शंकर पाटील ‘भुजंग’ या कथेतून नवीन अन्वयार्थ लावून, स्त्री-पुरुष संबंधांची गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न करतात.

दिवाळीच्या संदर्भात बाई लिहितात : पूर्वी धनत्रयोदशीला बायकांची अभ्यंगस्नानं असत. ती आता डिलिट झालीत. पुरुषांची नरकचतुर्दशी, भाऊबिजेची अभ्यंगस्नानं चालू आहेत. बायका फक्त इतरांची कौतुकं करण्यासाठी, ही धारणा पक्की.

हल्ली सजावट ‘रेडीमेड’ वस्तूंनी होते. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यापेक्षा आपण उत्तम दर्जाच्या, स्वस्त, आकर्षक वस्तू का निर्माण करू नयेत?

ऐतिहासिक दंतकथा व लोककथांविषयी बाई म्हणतात : भक्तिभाव बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे चिकित्सा केली, मानवशास्त्रीय वा पूरक अभ्यासशाखांच्या आधारे मागोवा घेतला, तर इतिहास संशोधनाच्या वाटाही समृद्ध होतील.

लोकप्रतिभा आपापला अनुभव देवादिकांवर, त्यांच्या स्थितीवर आरोपित करते. देवाला आपल्या जगण्याशी जोडून घेते. म्हणूनच

‘हळदीचं‌ जातं जड जातंया म्हाळसाला|

 संग आणली बाणाईला ||’

घरात कष्टाची कामं करायला हक्काचं माणूस म्हणजे लग्नाची बायको, हा परंपरेचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

जात्यावरची ओवी आपल्या जगण्याचे कालसंवादी आशय देव-देवतांच्या चरित्रात पाहते. एका काळाच्या सामाजिक स्थितीगतीचा, संस्कृतीचा, धारणांचा, देवतांचा, श्रद्धेचा, उपासनांचा मोठा पट या मौखिक साहित्यातून शोधता येतो.

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लोकसांस्कृतिक बैठकीवरून लोकदेवतांच्या संशोधनाच्या वाटा समन्वित अभ्यासपद्धतीने दाखवल्या आहेत. एका आदिम दैवताच्या उन्नतीकरणाची कथा त्यांनी त्यांच्या लोकसांस्कृतिक प्रातिभ दृष्टीने मांडली आहे. त्यांच्या मते देवताविषयक शोध हा त्या देवतेचा शोध नसून देवताविषयक मानवी -सामाजिक धारणांचा, मानवी श्रद्धाविश्वासाचा शोध असतो.

आदिम अवस्थेत पुरुष -देव व स्त्री -देवता स्व-तंत्रपणे नांदताना दिसतात. उपासनेत त्यांच्या नैमित्यिक भेटी उत्सवातून भक्त घडवीत असतात. मानवी जीवनात विवाहसंस्था स्थिर झाल्यावर आता त्या दूरस्थ देवतांचे विवाहसोहळेही भक्त साजरे करतात. लोकदेवतांच्या चरित्रांतून, ते ज्या समाजाचे देव आहेत, त्या समाजाच्या स्थित्यंतराचा सामाजिक/सांस्कृतिक इतिहास कळतो.

डॉ. ढेरे यांच्या सगळ्या ग्रंथरूप सांस्कृतिक शोधयात्रा या समाजाच्या सर्वांगीण स्थित्यंतरांचा शोध घेणारे, अंतर्दृष्टी देणारे प्रकल्प आहेत.

बडबडगीतांविषयी बाई म्हणतात : ‘अडगुलंs मडगुलं’पासून सुरू झालेल्या प्रवाहात नाच, गाणं, संवाद, चिऊ-काऊच्या गोष्टी, त्या सादर करण्याची नाट्यात्मक शैली यांचं अजब रसायन अनुभवत कित्येक पिढ्या वाढल्या. मायबोलीचा नाद ताल-लयीसह अवघ्या व्यक्तिमत्त्वात मुरत असे. मग आताच इंग्रजी ऱ्हाईम्स मुलांच्या माथी का मारल्या जातात?

‘इतिहासाचे जागले’ असलेल्या शाहिरांनी पोवाड्यांमधून, लोकगीतांतून वस्तुनिष्ठ नोंदींसह इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. समकालीन लोकमन, चालीरीती, रूढी, क्रिया-प्रतिक्रियांतून व्यक्त केलेले लोकमन आणि लोकमत प्रवाही ठेवले.

लोककथा हा माणसांच्या चित्रविचित्र वृत्ती-प्रवृत्तींचा सतत वाहता प्रवाही खजिना आहे. काळ, प्रदेश, भाषा कोणतीही असली, तरी मानवी जीवनाचे नमुने सर्वत्र समान असतात. त्यामुळेच देशविदेशातील कथांतून सारखेपणा आढळतो.

‘सहा शब्दांच्या कथा’ या लेखात बाईंनी, बोलीभाषेतील म्हणी म्हणजे अल्पाक्षरी कथाच आहेत, हे सांगितलं आहे. उदा. ‘अग अग म्हशी, मला कुठे नेशी |’, ‘अति झालं देवाचं, कपाळ उठलं गुरवाचं|’, ‘ कोडग्याला हाणलं पिढं (पाट), म्हणतं बसायला दिलं|’, ‘ काग बाई अशी?, तर शिकले तुझ्यापाशी|’ वगैरे. परंपरेतल्या अनुभवांचं खूप मोठं संचित यांत साठलेलं आहे.

”अशी’ ही एक ‘सती’ ‘ : १८६४ साली ‘थोरले माधवराव पेशवे ‘ या नाटकाचे प्रयोग होत असत, तेव्हा गावातल्या स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी नाटकास येऊन ‘सती’ जाणाऱ्या रमाबाईंची (स्त्रीपार्टी नट विष्णू वाटवे) ओटी भरत असत. हे ओट्या भरणं आणि नंतर खण, तांदूळ, नारळ साठवणं, यातच तास – दोन तास जात असत. याचा निष्कर्ष सांगताना बाई म्हणतात, ‘लोकसंस्कृतीच्या प्रवाहात असेही एखादे श्रद्धेचे डबके लोकमनात साचून राहतेसे वाटते. ‘

‘असे प्रेक्षक, अशा जाहिराती’ या लेखात १८५३ ते १८७३ या काळातील नाटकांच्या जाहिरातींविषयी बाईंनी लिहिले आहे.

त्यात नाटकात ‘उत्कृष्ट सिनरी’, ‘सूर्य, चंद्र, तारे, ‘ ‘बागेचा देखावा, व्याघ्राने धरलेली स्त्री, विमान, वारांगनांचा ताफा, ‘ तसेच ‘नारायणरावाच्या वधाचा फार्स’ दाखवताना त्याचे पोट फाडून साखरभात व आतडी हुबेहूब दाखवू’ वगैरे आमिषे असत. त्याबरोबर, ‘ खेळाच्या जागी तंटा करायला, विडी ओढायला, पान खाऊन थुंकायला मनाई आहे’, ‘कमी प्रतीचे तिकीट घेऊन जास्त प्रतीचे जागी जाणाऱ्यास पैसा न देता बाहेर घालवले जाईल’ असा सज्जड दमही असे. याचं तात्पर्य बाई सांगतात : ‘जाहिरात हे केवळ प्रसिद्धीचे साधन नसून सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितिगतीचा वेध घेण्याचे साधनही होऊ शकते. ‘

‘इडिपस कॉम्प्लेक्स’विषयीच्या लेखात बाईंनी इतिहास संशोधक श्री. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे. या सखोल, संशोधनपर ग्रंथात शतरूपा आणि तिचा पिता वसिष्ठ, मनू आणि त्याची कन्या इला, जह्नू आणि त्याची कन्या जाह्नवी, सूर्य आणि त्याची कन्या उषा ऊर्फ सरण्यू यांच्यात पतिपत्नीसारखे संबंध होते. नैसर्गिक नर-मादी आकर्षणाचा हा भाग होता. पुढे संस्कृतीच्या प्रवासात नर-मादीचे मुक्त लैंगिक संबंध प्रतिबंधित केले गेले. माता-पुत्र, पिता-कन्या, सख्खे भाऊ-बहीण या नात्यांत लैंगिक संबंध निषिद्ध मानले गेले.

मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ या पुस्तकात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसंस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांवर अभ्यासपूर्ण, तरीही सोप्या भाषेत विवेचन केलेले आहे.

वाचकांनी ते मुळातूनच वाचल्यास, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नक्कीच विस्तारित होतील.

परिचय –  सुश्री गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “शह आणि काटशह” – लेखक : डॉ. राजीव जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शह आणि काटशह” – लेखक : डॉ. राजीव जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : शह आणि काटशह (वैद्यकीय व्यवसायातील चुरस)

लेखक : डॉ. राजीव जोशी 

पृष्ठे : २४४

मूल्य: ४००₹ 

या पुस्तकातील एकूण ३१ प्रकरणांतून वैद्यकीय व्यवसायातील चांगल्या-वाईट घटनांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि शह आणि काटशह या स्वरूपात लिहिलेली आहे, जी वाचनीय आहे. त्यातील काही भाग-

व्यवसायातील चुरस

या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. सुहास नेने यांनी लिहिली आहे …. ‘कोणतीही गोष्ट अर्थार्जन करण्यासाठी करायची म्हटली की, त्यात नफ्याचा आणि तोट्याचा विचार आलाच. कोणीही जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा आणि तोही कमीत कमी तोटा सोसून असाच विचार करणार. अगदी वैद्यकीय व्यवसायातही ही गोष्ट ओघानेच आली. किंबहुना क्वचितप्रसंगी चार गुना अधिकच ! चार पैसे दुसऱ्यापेक्षा जास्त मिळवायचे म्हणजे त्यात चुरस, ईर्षाही आलीच. चुरस आली की त्यात डाव, प्रतिडाव, शह-काटशह हे पण येणे क्रमप्राप्त झाले. ‘Everything is fair in love and war. ‘ …. असे त्यात त्यांनी म्हटले आहे. शह-काटशहदेखील चुकीच्या मार्गाने द्यायचे, का नीतीच्या मानदंडांचा विचार करायचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. रुग्णाच्या हितासाठी राबवलेली चुरस रुग्णाच्या नक्कीच कायम फायद्याची यात कणभरही शंका नाही.

डॉक्टर राजीव जोशी अशाच निर्हेतुक चुरशीचे स्वागत करतात आणि त्याप्रमाणे वागतात आणि म्हणून अगदी निःसंकोचपणे लिहूनही जातात……

… चुरशीच्या डावाची सुरुवात प्रतिष्ठित, आधीपासूनच एस्टॅब्लिश्ड असलेल्या डॉक्टरांच्या रुग्णालयाच्या जवळ स्वतःचे रुग्णालय सुरू करण्यापासून होते आणि एका गोष्टीतून दुसऱ्या तितक्याच उत्कंठावर्धक गोष्टीचा जन्म होतो. हा सिलसिला सुरूच राहतो आणि त्यातून वैद्यकीय विश्वातील अनेक सुरस, चमत्कारिक कथा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने उलगडत जातात. सत्यकथा असल्याने त्यात पुण्यातील प्रतिष्ठित, नामांकित डॉक्टरांची नावेही प्रत्यक्षपणे, कधी कधी अप्रत्यक्षपणे येऊन जातात. घासाघीस करून पदरात पाडून घेणाऱ्या तडजोडी, बहाद्दर व्यावसायिकांची कहाणीपण येते. येनकेन प्रकाराने स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे अगदी सीनियर सुद्धा त्यातून सुटत नाहीत. गरज नसताना आपण ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले नाही; त्याची औषधे बिचाऱ्या अगतिक, अडाणी रुग्णांना देण्याचा अधिकार आहे का, हा सवाल आपोआपच येतो. बऱ्याच वेळी लोकांना साधे हवामानात बदल झाल्यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन असते; की जे आपले आपणच औषधाविना काही दिवसांत जाणारच असते, त्यासाठी भारी भारी अँटिबायोटिकची आवश्यकता नसते. जे काम टाचणीने होणार आहे; त्यासाठी अ‍ॅटमबॉम्बचा उपयोग करणे चूकच आहे, परंतु याविषयी माहीत नसल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे केले जाते. अलंकारिक नसली, तरी ओघवत्या भाषेत असल्यामुळे प्रत्येक घटना अतिशय स्वच्छपणे डोळ्यांसमोर येते.

नुसता प्रॉब्लेम सांगून डॉक्टर राजीव थांबत नाहीत; तर त्यासाठी काय करावे, काय करू नये असा टेक-होम मेसेजही देतात. ही या लिखाणाची खासियत मी समजतो. ‘तुम लढो मैं कपडे संभालता हूँ’ सारखी बोटचेपी वृत्ती त्यांची नाही. इन्शुरन्स कंपन्यांच्या वाढत्या, गोंडस, फसव्या कारभाराबद्दल बोलताना ते परखडपणे आपली मते मांडतातच आणि ‘पती-पत्नी और वो’ यांच्यातील ‘वो’ कडेपण आता खूप लक्ष द्यायला लागणार आहे, असा संकेत देतात. कट किंवा कमिशन आणि डॉक्टर यांचा चोली दामन का साथ असतो, असे समीकरण काही लोकांच्या डोक्यात अतिशय फिट बसलेले आहे. त्यातल्या स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दलही ते बोलतात; पण या वेळी डॉक्टरांची लेखणी अडखळत नाही, कारण ‘कर नाही तर डर कोणाला !’ कटची कटकट ठेवली नाही, तर डोक्याला त्रास होणारच नाही! (कट घेणारे फक्त फॅमिली डॉक्टरच असतात, असा गोड गैरसमज डॉक्टर जोशींनी करून घेतला असावा; असा माझा समज आहे ! कट घेणाऱ्याचा एक डीएनएच असतो, तो डिग्री किंवा पॅथीमध्ये नसतो !!) आयुर्वेदातील एमडी किंवा एमएससारख्या डिग्ग्रांनी रुग्णांची फसगत करणाऱ्या महाभागांना पण जाता जाता ते सहज फटकारतात. त्यांच्या डिग्रीतला फोलपणा सिद्ध करायला कचरत नाहीत. अप्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या, औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या ज्ञानावर अवलंबून, त्यांच्या इशाऱ्यावर नाचून औषधे देणाऱ्यांना चिमटा काढायला सोडत नाहीत.

साठा उत्तरांची ही कहाणी सुफल संपूर्ण होताना डॉक्टर राजीवची लेखणी दुसऱ्या भागासाठी सरसावलेली दिसते. ते प्रवेश प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात शिरतात आणि न सुधारलेल्या किंवा सुधारायचेच नाही, अशा मनोवृत्तीत राहिलेल्या न्याययंत्रणेचे वाभाडे काढतात. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात रोजनिशी लिहावी, अशा पद्धतीने उत्कंठावर्धक शैलीत मांडलेल्या या कडू सत्य घटनेत स्वतःसाठी नाही, तर वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरुद्ध ‘जनहित याचिका’ (PIL) दाखल करून घेतानाचे स्वानुभव अतिशय रंगतदारपणे रेखाटले आहेत. सहाध्यायी, मित्र- मैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक, वृत्तपत्रे, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या साऱ्यांची प्रतिबिंबे या गढूळ पाण्यात आपापल्या कर्माप्रमाणे स्वच्छ पडलेली दिसतात! लाल फितीचा आब, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेचा रुबाब, नियमांप्रमाणे चाललेल्या शिक्षणार्थीचा आक्रोश कसा दाबून टाकतो, ‘Justice delayed is Justice denied’ हेच पुनःपुन्हा कसे अधोरेखित करतो आणि रास्त हक्कासाठी सामान्यांना किती झगडावे लागते आणि हातात सत्ता असली की, मी म्हणेन तीच पूर्व दिशा असे राबवणारे कसे भेटतात, हे पटवून देतो.

प्रस्थापित न्यायव्यवस्थेविरुद्ध स्वतःसाठी नव्हे, तर अयोग्य पद्धतीने येऊ पाहिलेल्या पण चुकीच्या राजमार्गाला (!) विरोध करण्यासाठी पदरमोड करून, लष्करच्या भाकरी भाजताना करावा लागणारा मनस्ताप, घालवलेली मनःशांती या साऱ्यांचाही आढावा या दुसऱ्या भागात येतो.

चुरस, शह-काटशह यांना दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी वापरलेला बुद्धिबळाचा पट शीर्षकाची यथार्थता नक्की दाखवतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares