मराठी साहित्य – विविधा ☆ ऋतूनां कुसुमाकर… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “ऋतूनां कुसुमाकर…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.

कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है..अन् मन, सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… अशा एक ना दोन अनेक जादू घडत गेल्या आणि या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले… फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं ,रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये…, वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…

खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्‍यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा, वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…

ऋतू वसंत तुम

अपनेही रंग सो

पी ढुंढन मै

निकसी घर सो

ऋतू बसंत तुम..

जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…

सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश,पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार,उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा..असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं..जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग,गंध,रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील..हीच तर वसंताची जादू आहे..वसंत म्हणजे सकारात्मकता.वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन..वसंत येतो, दवांत न्हातो… दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे मंथर गाणे गातो..कधी फुलात हसतो,वनी लगडतो, झऱ्यांत झुळझुळ वाहतो..तर कधी गंध कोवळा  माखून घेऊन आभाळी पसरतो..कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो..एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो  असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो..मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला..तेव्हा आठवतं, ‘गगन सदन तेजोमय’ …तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक एप्रिल… दुसरी बाजू… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

एक एप्रिल… दुसरी बाजू ☆ सौ कल्याणी केळकर बापट

एक एप्रिल ही तारीख आपण गमतीशीर रित्या घेतो.ह्या दिवशी “अशी ही बनवाबनवी”करायला अधिकृतपणे मान्यता असते अशी समजूत आहे.

माझ्या लेखी एक एप्रिल ही तारीख खूपसा-या वैविध्यपूर्ण महत्त्वाच्या घटनांमुळे विशेष आहे.एक एप्रिल हा दिवस रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार ह्यांचा जन्मदिवस, रिझर्व्ह बँकेची स्थापना,भारतीय लष्कराची स्थापना , डॉ.आंबेडकर ह्यांना भारतरत्न, गुगलने जीमेल ही ईपत्रलेखनासाठी काढलेली प्रणाली इ.महत्वपूर्ण घटनांसाठी प्रसिद्ध आहे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”म्हंटला की डोळ्यांसमोर चटकन येतं ते त्यांच शिस्तबद्ध वागणं आणि देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मदतीची गरज असतांना गाजावाजा न करता तत्परतेनं संघातील स्वयंसेवकांचं धावून जाणं आणि ती मदत सातत्याने गरज असेपर्यंत, संकटनिवारण होईपर्यंत उस्फुर्तपणे गरजूंपर्यंत पोहोचविणं.

खरचं कुठून आले असतील हे सद्गुण प्रत्येक स्वयंसेवकांमध्ये ?,अभ्यासपूर्ण बघितलं की लक्षात येत ज्याचं बीज सकसं असतं,मूळं कणखरं, खंबीर असतात तो वृक्ष हा बहरणारचं,निकोप राहणारचं.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार,भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक.डॉ. चा जन्म 1 एप्रिल 1889 चा.तिथीने चैत्रशुद्ध प्रतिपदेचा.

व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोहोचते तेव्हा ही वाटचाल करतांना तिच्यातील सदगुणांची पोटली हळूहळू उलगडू लागते

त्यांच्यातील सच्चे नेतृत्व, त्याग,सेवा, समर्पित भावना, दूरदर्शी विचार, शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ जीवनकार्य शैली ह्यांचा परिचय आपल्याला त्यांचे जीवन जाणून घेतांना होतो.

डॉ. हेडगेवार ह्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी अथक प्रयत्न,भगव्या ध्वजाप्रती निस्सीम प्रेम,गुरूं बद्दल आदर,गुरुदक्षिणेबद्दलची जरा वेगळी संकल्पना दैनंदिन शाखा आणि संस्थेतील पारंपरिक अध्यक्ष, संचालक मंडळ ह्या पदांना फाटा ही काही ठळक वैशिष्ट्ये.

कोणासाठी आपण जेव्हा मनापासून कामं करतो तेव्हा सतत त्या संस्थेच्या उत्कर्षाचाच मनात विचार,ध्यास आणि काळजी असते.डॉ. चे पण तसेच आपल्या पश्चात ह्या संघाची धुरा उत्तमप्रकारेच सांभाळली जावी हाच विचार मनात घोळत असल्याने त्यांनी आपल्या स्वतःसारखेच तालमीत तयार झालेले निःस्पृह,व्रतस्थ गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस,भैय्याजी दाणी यांच्यासारखे कुशल संघटक अनुयायी पुढील धुरा यशस्वीपणे सांभाळण्यासाठी मनोमन नियोजीत केले.

सतत हिंदुत्वाच्या उन्नतीसाठी च्मा ध्येयाने पछाडलेल्या डॉ. नी तब्बल पंधरा वीस वर्षे द़ौरे, बैठका ह्यामुळे फिरस्तीवर काढलेत.प्रकृती अस्वास्थ्यामुळे 21 जून 1940 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही कर्मयोगी आपल्या कर्तृत्वाने पुढील कित्येक पिढ्यांपुढे आपला आदर्श ठेवून जातात. अशा महान.विभूतींपुढे खरोखरीच.नतमस्तक. व्हायला होतं.

अश्याच प्रकारे आपल्या देशाला लाभलेले डॉ. आंबेडकर हे ही एक बुद्धिमान सुपुत्र.आजच्याच तारखेत ह्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.

आजच्याच दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.थोडक्यात म्हणजे बँकाची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक .1 एप्रिल 1935 ला कलकत्ता येथे रिझर्व्ह बँकेची सुरवात झाली. देशपातळीवरील संस्थांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम रिझर्व्ह बँक करते.भारतीय चलनीनोटांची गरजेनुसार छपाई, भारताची गंगाजळी म्हणजेच आर्थिक बाजू सांभाळणे

सगळ्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थावर देखरेख ठेवणे,अशी अनेक कामे रिझर्व्ह बँकेची आहेत.

आज आपण ज्यांच्या भरवशावर निर्धास्त राहू शकतो,सुरक्षितता, स्वतंत्रता उपभोगू शकतो अशा भारतीय लष्कराच्या स्थापनेचा दिवस.आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा गौरवाचा दिवस.

आधुनिक युगात प्रगतशील व्हायचे असेल तर परंपरेला जपून, सांभाळून आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही धरावीच लागते.आज एक एप्रिल गुगलने आजच्या दिवशी जीमेल ही ईपत्रलेखनासाठी नवीन प्रणाली सुरू केली आणि आज तर आपले रोजच्या कामकाजात ह्याशिवाय पान देखील हालत नाही.

अशा सगळ्या थोर व्यक्ती, मोठ्या महान घटना  आठवल्या आणि त्या आठवणींना ह्या पोस्ट द्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – अर्थात हे अनुभव जगावेगळे नाहीत. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील आणि त्यांना हे वाचायला आवडतीलही. जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!)

बालपणातल्या या ‘गोड’ आठवणींच्या दरम्यानच घडलेला एक प्रसंग इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात मी पुस्तकातल्या पिंपळपानासारखा अलगद जपून ठेवलाय!

नृसिंहवाडीला येऊन आम्हाला चार सहा महिने होऊन गेले होते. हे पोस्टिंग म्हणजे दत्तगुरूंवर अपार श्रद्धा असणाऱ्या माझ्या आई-बाबांसाठी न मागता मिळालेल्या वरदानासारखी एक पर्वणीच होती! सरकारी नियमानुसार इथला कमीतकमी तीन वर्षांचा कार्यकाळ अर्थातच त्या दोघांनीही गृहीतच धरला होता. नित्यनेमानं त्यांची दत्तसेवा निर्विघ्नपणे सुरू असताना एक दिवस अचानक सगळ्याच गृहितांना तडे जावेत तसं घडलं. त्यादिवशी बाबांची  कोल्हापूरच्या हेडपोस्ट ऑफिसमधे बदली झाल्याची ऑर्डर आली. इथे येऊन सहा महिनेही पूर्ण झालेले नसताना अचानक बदली झाल्याचं बाबांना खूप आश्चर्य वाटलं.पण त्याहीपेक्षा जास्त यापुढे आपण नित्य दत्तदर्शनाला पारखे होणार या कल्पनेने ते कासावीस होऊन गेले.आईची मनोवस्था यापेक्षा वेगळी नव्हतीच. ती ट्रान्स्फर ऑर्डर आली आणि अतिशय समाधानाने आणि प्रसन्न चित्ताने सुरू असणाऱ्या त्या दोघांच्याही रोजच्या कामातला ताल आणि वेग कुठेतरी हरवूनच गेला. एक-दोन दिवस याच अस्वस्थतेत गेले. त्या रात्री ऑफिसमधलं काम संपवून बाबा आत आले आणि घोटभर चहा घेऊन रोजच्यासारखे पालखीला जाण्यासाठी घराबाहेर पडले. आई आमच्या सोबतीसाठी अर्थातच घरीच थांबली होती. खूप उशीर झाला तरी बाबा परत आले नव्हते. बाबांची वाट पहात कंदीलाच्या मंद प्रकाशात आई आम्हाला थोपटत बराच वेळ बसून होती.

खूप उशिरा बाबा परत आले. न बोलता पाय धुवून त्यांनी कोट काढून खुंटीला अडकवला.

“झोपली नाहीस अजून?”

“नाही. तुमचीच वाट पहात होते.दोघांची पानं घेते. या लगेच.”

दोघं जेवायला बसले तरी त्यांचं मन जेवणात नव्हतंच.

“किती उशीर केलात? पालखी संपली तरी तिथेच थांबून  राहिला होतात ना?”

“तिथून उठावंसंच वाटेना. मनात खळबळ तर होतीच आणि समोर स्वच्छ वाटही दिसत नव्हती. अखेर शरणागती पत्करली. माझी पोस्टाची नोकरी. बदलीचं काय? कधीही,कुठेही झाली तरी जायला हवंच.पण ती अशी,इतक्या लौकर? अचानक?माझ्या दत्त सेवेत कांहीं कसूर तर झाली नसेल ना?आपला इथला अन्नाचा शेर संपला असं समजून निघून जावं म्हटलं तर पावलंच जड होऊन गेली अशी अवस्था! मग करायचं काय? महाराजांना साकडं घालण्यावाचून पर्यायच नव्हता.मग हात जोडून त्यांना प्रार्थना केली. म्हटलं, “महाराज,माझी नकळत कांही चूक झाली असली तर त्याची एवढी कठोर शिक्षा नका देऊ.माझी बदली झाल्याचं दुःख आहेच. पण आज नाहीतर उद्या कुठेतरी बदली होणारच हेही मला माहीत आहे.एकच कळकळीची विनंती आहे.कांही कारणानं आत्ताच बदली होणार असेल,तर ती कुठेही होऊ दे पण तुमचं नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे. कृपा करुन मला अंतर देऊ नका….’ असं विनवून आलोय.

”’हो  पण…आता  कोल्हापूरच्या बदलीची आॅर्डर तर आलीय ना? मग आता हे सगळं कसं शक्य आहे?”

“महाराजांनी मनात आणलं तर अशक्य काहीच नाही. त्यांची जी काही आज्ञा असेल ती आपण शिरसावंद्य मानायची. माझ्या हातात फक्त त्यांच्यापुढं गा-हाणं मांडणं एवढंच होतं. मी ते केलं. तुला खरं सांगू?मनोमन मी मघाशी त्यांच्याशी बोललो, मन मोकळं केलं आणि डोक्यावरचं सगळं ओझं उतरल्यासारखं हलकंच वाटलं एकदम “

ते हे बोलले खरे पण कुठल्याही क्षणी आता रिलीव्हर येईल की इथून लगेच चंबूगबाळं आवरून कोल्हापूरला चालू लागायचं या विचाराची बोच कांही केल्या मनातून जात नव्हती. पण आश्चर्य म्हणजे रिलीव्हर आलाच नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतर पत्र आलं ते बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याचं!आणि त्यासोबत दुसरी ऑर्डर होती ती बाबांची कोल्हापूर ऐवजी कुरूंदवाडला बदली झाल्याची! एखाद्या भीतीदायक स्वप्नातून जाग यावी आणि ती भीतीच नाहीशी व्हावी तशी बाबांची अवस्था झाली.

दत्तमहाराजांचा ‘कृपालोभ’ म्हणजे नेमकं काय याची ती प्रचितीच होती जशीकांही. हे सगळं कसं घडलं याचं उत्तर म्हणजे या मूर्तीमंत चमत्काराच्या आड दडलेलं एक रहस्य होतं! कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणारे एक जी.एस् लिमये होते.माझे बाबाही जी.एस्.लिमयेच. नावातील या साधर्म्यामुळे त्यांची ऑर्डर चुकून बाबांसाठी काढली गेली होती! बाबांची बदली व्हायचा प्रश्नच नव्हता. पण ती  करणं मात्र आता क्रमप्राप्त झालं होतं. कारण मूळ ट्रान्स्फर चेनमधला बाबांचा रिलीव्हर नृसिंहवाडीला जॉईन होण्यासाठी आधीच रिलीव्ह झालेला होता.म्हणून मग बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याच्या आॅर्डरसोबतच दुसरी ऑर्डर आली ती बाबांची कुरुंदवाडच्या पोस्टात बदली झाल्याची! ती संपूर्ण घटनाच अतर्क्य आणि अनाकलनीय होती! निव्वळ योगायोग म्हणून या घटनेची संभावना होऊच शकत नव्हती. या प्रसंगातल्या प्रत्येक घटनेच्या घटीतामागे नेमका काही एक

कार्यकारणभाव होता आणि बाबांनी तो मनोमन ओळखला होता आणि स्वीकारलाही होता!

“मी महाराजांना शब्द दिलाय. ‘माझी बदली कुठेही होऊ दे पण नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे’ असं मी महाराजांना सांगितलं होतं. त्यांनी माझं गाऱ्हाण ऐकलंय. आता या स्वतःच्या शब्दाला मी बांधील आहे. हे बंधन नाहीय तर मनापासून स्वीकारलेली ही माझी स्वतःचीच बांधिलकी आहे!”

ही बांधिलकी सोबत घेऊनच बाबांनी आपला कुटुंबकबिला कुरूंदवाडला हलवला.तेथून नृसिंहवाडीपर्यंतचं  अंतर म्हणाल तर फक्त एक मैलाचं. त्यामुळे रोज दत्तदर्शनाला वाडीला जाणं अशक्य किंवा अवघड तरी कां असावं? निदान तेव्हा बाबांना तरी ते तसं वाटलं नव्हतं.

पण ते वाटलं तेवढं सोपं नाहीय याचं प्रत्यंतर मात्र बाबांना रोज नव्याने येऊ लागलं. तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस हा त्यांची कसोटी पहाणाराच ठरू लागला.कुरुंदवाड पोस्टातल्या कामाची वेळ डबल शिफ्टमधे होती. त्यानुसार सकाळी ७ ते ११ आणि दुपारी २ ते ६ अशी त्यांची ड्युटी असे. कामं जास्त असतील तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय उठता यायचं नाही. त्यामुळे पहिल्या शिफ्टनंतर जेवणासाठी घरी परत यायची वेळ नक्की नसे. तरीही रोज जमेल तेव्हा जमेल तसे ते दत्तदर्शनासाठी वाडीला जात राहिले.तेही केवळ शब्द पाळायचा म्हणून नव्हे तर जाणं राहून गेलं तर त्यांनाच चैन पडणार नव्हती म्हणून! त्यांचा दृढनिश्चय वादातीत होताच आणि आईचीही त्यांना मनापासून साथ होती.तिथल्या साडेतीन वर्षातले पावसाळ्याचे एकूण सोळा महिने तर त्यांची अतिशय कठोर परीक्षाच असे.सकाळची आॅफीसवेळ ७ ते११असली तरी  कामाचा ढीग उपसून पोस्टातून जेवायला घरी यायलाच त्यांना दुपारचा एक वाजून जायचा. कसंबसं जेवण उरकून आराम न करता दुपारी दोन वाजताची आॅफीसची वेळ गाठावीच लागे.त्यामुळे जेवण होताच ते घाईघाईने चपला पायात सरकवायचे. त्यामुळे दत्तदर्शन अर्थातच ऑफिस संपवून ते परत आल्यानंतरच. पूर्वी तोवर कोयना धरण नसल्याने पावसाळ्यात पूर ठरलेलाच. पुराचं पाणी घराच्या उंबऱ्याला लागलेलं असायचं. आम्हा मुलांची रात्रीची जेवणं आवरून आईने आम्हाला झोपवलं तरी बाबांचा पत्ता नसायचा.कंदील हातात घेऊन आई दाराजवळ अंधारातच त्यांची वाट पहात ताटकळत उभी रहायची. ते कधी आठ साडेआठला यायचे तर कधी त्याहीपेक्षा उशिरा.उशीर झाला तर ते घरात आत यायचेच नाहीत. बाहेरच्या बाहेरच आईच्या हातातला कंदील घेऊन , तो छत्रीच्या आड कसाबसा सावरत ते वाडीच्या दिशेने अंधारात अदृश्य व्हायचे आणि ते पाहून आईच्या काळजाचा ठोकाच चुकायचा. कारण त्याकाळी घरोघरी वीज आलेली नव्हती, तिथे रस्त्यात दिवे कुठून असायला?फक्त एक मैलाचंच अंतर पण ते पायी चालत जाताना दुतर्फा असणाऱ्या चिंचेच्या वृक्षांमुळे अधिकच काळोख्या भासणाऱ्या अंधारातून आणि रस्त्यावरच्या कमरेएवढ्या पुराच्या पाण्यातून ते अंतर कापावे लागे. असं मैलभर चालून गेल्यावर नदीकाठ यायचा. त्याकाळी आत्तासारखा मधे पूल नव्हता. त्यामुळे तिथून नावेनेच नदी पार करावी लागे. वाडीला जाणाऱ्या नावेच्या शेवटच्या फेरीची वेळ गाठता आली नाही तर वाडीला पोचणंच अशक्य.म्हणून ती वेळ चुकू नये यासाठी बाबा जीवाचा आटापिटा करायचे.

आईच्या हातातला कंदील घेऊन ते निघायचे तेव्हा “तू माझ्यासाठी ताटकळत थांबू नकोस.वेळेवर जेवून घे.आराम कर.” असं ते आईला बजावून जायचे.प्रत्येक वेळी आई ‘हो’ म्हणून होकारार्थी मान हलवायची, पण बाबा थकून परत येण्यापूर्वी तिने चूल पेटवून त्यांच्यासाठी हात पाय धुवायला पाणी तापवून ठेवलेलं असायचं. बाबा गरम पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे  तेव्हा तिने जेवणाची दोन पानं वाढून घेतलेली असायची. दिवसभराच्या कामामुळे खूप थकून गेलेली असूनसुद्धा ती रोज बाबांसाठी जेवणासाठी थांबायची. केवळ सोय म्हणून एकटी कधीच जेवायची नाही!

या श्रद्धेच्या वाटेवर दत्तसेवेबरोबरच बाबांची अशी सोबत तिने नि:शब्दपणे आणि प्रसन्नचित्ताने केलेली पहातच आम्ही भावंडे लहानाची मोठी होत होतो. खरंतर ‘तो’ आणि मी यांच्यामधल्या अतूट धाग्यानेच माझ्या मनातलं श्रध्देचं भरजरी वस्त्र या अशा वातावरणातच  हळूहळू विणलं जात होतं पण मला त्या बालवयात त्याची कल्पना कुठून असायला?

मनात दत्तावरची श्रद्धा मूळ धरू लागल्यानंतरही त्यासोबत बाबांची कर्तव्यकठोरताही मनावर ठसत असायची.नित्यदर्शन विनासायास सहजसुलभ व्हावं,म्हणून पोस्टातल्या  कामाच्या ओझ्यापासून सुटका करून घ्यायला त्यांनी कधी खोट्या सबबी सांगून ती कामं टाळली नाहीतच आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे असणारी पुसटशी सीमारेषाही त्यांनी कधीच ओलांडली तर नाहीच आणि पुसलीही नाही!!

माझ्या मनात ‘तो’ दृढ झाला तो या साऱ्या पार्श्वभूमीवर! अर्थात ही फक्त सुरुवात होती. माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पना कुठून असायला? पण  ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास त्याचेच बोट धरुन अगदी निश्चितपणे सुरू झाला होता एवढं खरं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी

मनात उतरणारी हळवी अक्षरं! निसर्गाशी होणारा संवाद, अक्षरांशी आशयाची होणारी एकतानता, एकरूपता, सुंदर निरागस भावना, तेवढाच सुंदर आशय व त्यांच्या बद्दल मनात असणारी भक्ती, जीवनाचा आस्वाद घेण्याची आतुरता, समरसता, या सगळ्याचा परिपाक म्हणजे कागदावर अवतरलेली अक्षर शारदा! हो, अगदी अ – क्षर शारदा असते. संजीवनी मराठे यांची कविता ही स्वप्नांची निर्मिती असते. तरीही सत्य, संस्कृती, समाज यांच्याशी जोडलेल्या नाळेचं भान असणारी असते. त्यांच्या मते प्रेम हे कधीच, कशालाही अडकाठी बनत नसते, उलट जगण्याला, व्यक्तिमत्व विकासाला, स्वर्गीय चैतन्याचा वेध घेण्याला पोषक व पूरक असते. निसर्गात, चराचरात परमतत्व पाहण्याची दृष्टी त्यांना रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून मिळाली होती. त्यांच्या कवितात जशी सहजता आहे तशी प्रासादिकता पण आहे.

त्यांची आपल्या ओठावर रेंगाळणारी कांही गाणी, सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ कां, या गडे हासू या.

त्यांच्या पुरस्कार प्राप्त ‘बरं का गंआई ‘ ह्या कवितेची कल्पना फार सुंदर आहे. छोटी मुलगी आईला म्हणते, “तू आहेस बेबी, मी आहे आई, हे विसरायचं नाही, झोपताना मात्र तू आई व्हायचं, अंगाई म्हणत थोपटत राह्यचं, दुपारचं काही आठवायचं नाही, बरं का गं आई!”

आज 1एप्रिल, कवियित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतिदिन! त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. त्यांना संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय घ्यायचा होता, त्यामुळे त्या मुलींच्या शाळेत गेल्या आणि नंतरही त्यांनी SNDT महिला विद्यापीठातून MA पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या  १६ व्या वर्षी कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनात त्या कवियित्री म्हणून सगळ्यांना परिचित झाल्या. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचा ‘काव्य संजीवनी ‘ हा कविता संग्रह प्रसिद्ध केला होता.

पद्मा गोळे त्यांच्या वर्ग मैत्रीण होत्या. दोघींच्या वहीत निदान एकदिवसाआड  एक नवीन कविता असायची. ही गोष्ट शिक्षकांनाही माहित असायची त्यामुळं ते ही वर्गात वाचून दाखवायला सांगायचे. कधी कधी गायला सांगायचे.लहानपणा पासून घरून व शाळा कॉलेजातील शिक्षकांकडून कविता लिहिण्याला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांच्या कवितांवर  काही प्रमाणात भा. रा. तांबे व रविकिरण मंडळातील  कवींचा प्रभाव होता. त्यांचे ७ – ८ काव्य संग्रह, बालसाहित्य, लेख संग्रह, गीतांजली हा काव्यानुवाद प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची मुलगी अंजूने परदेशातून त्यांना लिहीलेल्या पत्रांचे संकलन त्यांनी प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘बरं का गं आई’, ‘हसू बाई हसू’ या बालगीतांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने गौरविले आहे.

त्यांचा आवाज चांगला होता व त्यांनी सुरांचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे कविता करताना शब्द आणि सूर एकत्रच यायचे, नि लयीत कविता व्हायची. त्या कविता  गाणाऱ्या म्हणूनच प्रसिद्ध होत्या. काव्य वाचनाच्या कार्यक्रमात स्वतःची कविता वाचायला त्यांना आवडायचं नाही. गद्य वाचायचं, पद्य कसं वाचायचं हा त्यांना प्रश्न पडायचा. त्यामुळे कायम त्या सुरात काव्य वाचन –नव्हे गायन करायच्या.

आपल्याला सांगली करांना अभिमान वाटावा अशी गोष्ट मला कळली, ती म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात त्या पतीबरोबर खानापूर – बेळगावी सोडून सांगलीला आल्या होत्या. राम मंदिराजवळ त्यांचा ‘ रामकृपा ‘ नावाचा बंगला होता. काही दिवस त्यांनी सांगलीला शिक्षिका म्हणूनही काम केले.

संजीवनी मराठे यांची आकाशवाणी वर मुलाखत घेतली होती, त्यातील प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरे आहेत. पण मी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडी अधिक माहिती मिळेल अशी त्यांच्या तोंडची वाक्ये देत आहे. त्या म्हणतात, “आयुष्याचं चिंतन केल्यावर त्यातून निघणारं नवनीत म्हणजे कविता! मला जेंव्हा कवितेतला आशय व सूर यांचं ऐक्य लक्षात यायला लागलं तेंव्हा कवितेचं गाणं होणं सोपं झालं. कविता लिहितांना सूर, भाव, शब्दरचना, व स्पष्ट आशय यांचं भान ठेवावं लागतं. जसं फूल आणि सुगंध यांना आपण वेगळे करू शकत नाही, तसंच आयुष्य व कविता तितकेच सत्य आहेत, एकरूप आहेत, त्यांना आपण वेगळे करू शकत नाही. आयुष्य पेलत असतांना त्यातला मतितार्थ सापडतो, तीच कविता असते. कवितेत भाव असतो त्यामुळे मला वृत्तांपेक्षा छंद व जाती आवडतात. स्वप्नांचा बुरखा घ्यायचा आणि त्यातून वास्तवाकडे पहायचं, तीच कविता! माझ्या कवितात प्रेम असतं कारण मला प्रेम आवडतं. प्रेमात देवघेव असते, प्रेम निरपेक्ष असतं. प्रेमात आपण एकमेकांचे असतो. मी लहान मुलांच्या कविता केल्या. कारण मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं लावण्य, निरागसता यात मी गुंतून, हरवून जाते. अलीकडच्या कविता देवाशी, त्या निराकाराशी बोलणाऱ्या आहेत.माझ्यावर संस्कार असे आहेत कि कर्मकांडात गुंतू नये, इतर मार्गांनी त्या देवत्वाशी नतमस्तक व्हावं. आता त्याच्या जवळ जाण्याचा एक ध्यास आहे. त्याच्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे. मी कवितेकडेच वळले कारण गद्य लेखनाला तपशीलात जावे लागते आणि मला अजिबात तपशील कळायचे नाहीत आणि कळले तरी जो सांगायचा विषय, आशय आहे तो इतका मोठ्ठा लिहीत बसण्यापेक्षा कवितेतून सांगणं सोपं वाटायचं.”

आत्ता कविता दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची ‘ मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी ‘ ही कविता वाचली आहेच.

लाघवी, सहज फुलणाऱ्या कल्पना, प्रासादिक शब्द, उपमा, रुपके यांचा मुक्त वापर करून  सुंदर कविता करण्याचं , हे त्यांचं कसब या कवितेतून लक्षात येते.अशीच त्यांची आणखी एक सुंदर पण थोडी भावुक कविता —

जायचे असेल जरी, न कळता निघून जा, न कळता निघून जा

फूल फूल हुंगता, चांदण्यात दंगता, देहभान हरपता, खुशाल मज पुढून जा

न कळता निघून जा

केशपाश सोडूनी, त्यात वदन झाकुनी, रुसूनी बैसते तदा, लपत छपत दूर जा

न कळता निघून जा

गान गायिल्या वरी, बीन सारुनी दूरी, थकून नयन झाकते, त्याक्षणी उठून जा

न कळता निघून जा

क्षणिक जायचे असे, लागू दे तुला पिसे, विरही मीलनी सुखे, मजसी गुंगवून जा

न कळता निघून जा

आणि जर अखेरचे, तुज असेल जायचे, जात जात पदतली, प्राण हे चुरुन जा

न कळता निघून जा

न कळता निघून जा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक कानसेन (?) ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक कानसेन (?) ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या आधी माझा डोळस पणा सांगितला होता. आज काही गाणी ( माझ्या कानसेन असण्याची ) सांगते. आज ज्यावेळी ती  नीट समजतात त्यावेळी ती गाणी

कोण होतास तू ….

काय ऐकू आलास तू….

अशी अवस्था होते.

असे नुसते सांगू कशाला… काही उदाहरणेच ( थोडीच बरं का ) सांगते ना…

*आदर आणि पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. ( आज राणी पूर्वीची…. )

*इनीला गोंडे लेलिना दुपट्टा मेरा ( इन्ही लोगोने….)

*माझी रेणू कामावली झाली झाली सावली ( माझी रेणुका माऊली… )

*केसरा केसरा जो भी हो

*कंपास आये यू (तू) मुस्कुराए (तुम पास आये…)

*आदिनाथ गुरू सकाळशी जाता (आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा….)

*एक लाजरा साजरा माकडा डुकरा वाणी…

*रात्र काळी घागर काळी याची तर मी पार वाट लावली होती. फार थोडे शब्द बरोबर म्हणत असे.

*आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये तो बाप बन जाये….

*संधिकाली या आशा

*झाली फुले कल्याणची

*स्वर गंगेच्या कथावर्ती

*देवास तुझे फुल वाहायचे

*आज हृदय मामा विशाल झाले

*चिंधी बांधिते द्रौपदी उजव्या बोटाला

*काळ्या मातीत मातीत

ती पण चालते मी पण चालते

आणि हो, सर्व परिचित ज्यांना आपण अगदी लहानपणापासून मुखोदगत म्हणजे तोंडपाठ म्हणतो आणि मोठमोठ्याने टाळ किंवा टाळ्या वाजवून म्हणतो त्या पारंपरिक आरत्या!  त्यांच्या समजुतीची कमाल राहिलीच आहे.

अगदी आवडती बाप्पाची आरती…

*सुखकर्ता दुःखकर्ता….

त्यातीलच बरेच शब्द

*ओटी शेंदुराची

*फळीवर वंदना

*दसरा माझा वाट पाहे सदना

*संकष्टी पावावे….

*जय देवी महिषासुर मथिनी

*घालीन पटांगण वंदून शरण…

आणि शेवटची मंत्र पुष्पांजली म्हणजे तर सगळ्या चुकीच्या शब्दांचा उच्चांकच…

तर अशी माझ्या कानसेन असण्याची फजिती. यात कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या बरं का..

फक्त चुकीच्या समजुतीमुळे चुकीचे उच्चार होऊन मूळ अर्थ कसा बदलतो हे सांगायचे होते. आणि हो अशी अजून बरीच गाणी आहेत. यात पूर्वीची काही नाट्यगीते घेतलीच नाहीत. मला तर असे वाटायचे, यातील शब्द कळू नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे.

पण मंडळी वाचताना गंमत वाटली ना? आणि थोडे फार हसूही आले असेल. म्हणजे माझा उद्देश सफल झाला म्हणायचा. आणि हो, आता आपली पण विचारचक्रे चालू झाली असतील आणि असे शब्द धुंडाळायला सुरुवात झाली असेल. हो ना? असे शब्द सापडले की नक्की कळवा वाट बघत आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

वसंतोत्सव ☆ श्री प्रसाद जोग

२६ मार्च पासून वसंतोत्सवाला सुरवात झाली आहे.

सहा ऋतूंमधे वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात .दहा दिशांना बहरून टाकत येतो तो हा ऋतुंचा राजा. याच्या आगमनाच्या आधीच निसर्गाच्या सुगंधाच्या रूपाने याची चाहूल लागते .आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

होळीपासून वाढत चाललेल्या गरमीमध्ये, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव शोधत असतात.अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांवर अचानक एके दिवशी कोवळी कोवळी, हिरवीगार पोपटी पालवी फुलते  नुसती पालवीच नाही तर पळस रंगाची उधळण करायला लागतो,गुलमोहर  फुलतो ,बहावाचे घोस लटकायला लागतात, फुलेही बहरायला लागतात.

दयाळ, कोकीळ, भारद्वाज अश्या पक्षांना वसंत ऋतुत कंठ फुटेल आणि वसंताच्या आगमनाची वर्दी गोड आवाजात द्यायला सुरवात करतील.

या काळात दिवसाचा,उन्हाच्या काहिलीचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान झालेली असते. घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असतात, या काळात शारीरिक शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.

‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी, कारण वसंत नांव असणाऱ्यांनी वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

साहित्यातले वसंत 

वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला.

रंगभूमीवरील वसंत 

आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,

संगीतातले  वसंत

आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार वसंत निनावे,वसंत आजगावकर, वसंत कानेटकर,वसंतकुमार मोहिते आणि वसंत अवसरे असे टोपण नाव घेऊन गाणी लिहिणाऱ्या शान्ता शेळके  यांनी.

अशा या ऋतुराज वसंता मुळे कविंना देखील स्फूर्ती येते आणि ते वसंताचा गौरव करताना वेगवेगळी गाणी लिहितात

वसंत ऋतू आला

आला वसंत देही, मज ठाउकेच  नाही

उपवनी गात कोकिळा

हृदयी वसंत फुलताना 

कुहू कुहू येई साद

साद कोकीळ घालतो कधी वसंत येईल

कोकीळ कुहू कुहू बोले

गा रे कोकिळा गा

मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला

ऋतुराज आज वनी आला ऋतुराज आज वनीं आला

बसंत की बहार आयी,

(नाट्क> मंदारमाला)

अजूनही खूप गाणी आहेत चला तर मंडळी आपणही वसंतऋतूचे स्वागत करूया त्याचा.आनंद साजरा करताना म्हणूया

चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो

चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो

पक्षी कूजन मधुर ऐकू ये, आसमंत हा गुंगुन जावा

फुलाफुलातून साद उमलते,

 

वसंत घ्यावा

वसंत घ्यावा

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खेळताना रंग बाई होळीचा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ खेळताना रंग बाई होळीचा…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(होळी – अध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयीचा लेख.)

ऋतू वसंत आलेला

मास फाल्गुन सजला

रंग रंगीला गुलाल

माझ्या मनात रुजला

फाल्गुन म्हणजे गुलाल, गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे व त्यागाचे प्रतीक. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचे काम करतो. या सणाला महाराष्ट्रात “शिमगा” व “होळी” तर उत्तर प्रदेशात “होरी” असे म्हणतात. ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात. फाल्गुन शुद्ध १३ ते १५ अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते “दोलोत्सव” म्हणतात. बंगाल प्रांतात “दोलायात्रा” तर दक्षिणेत “कामदहन” या नावाने संपन्न होणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

अध्यात्मिक दृष्टीकोन

या घटनांमुळे होळीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

१) भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने बहीण होलीकेला आमंत्रित केले. मी तुला जाळणार नाही असा अग्नीने होलीकेला वर दिला होता. हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला होलीकेसह चितेवर बसवून ती पेटवली त्यात होलिका भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वराचा दुरुपयोग केला होता. प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे लोकांना आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवतात.

२) रामाच्या राज्यात ढुंढा नावाची राक्षसीण होती “जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद्यवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल”. असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ढुंढा राक्षसीण लहान मुलांना पळवून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटवली व तिच्याभोवती दोन्ही हाताने बोंब ठोकून अपशब्द वापरले ढुंढा राक्षसीण पळून गेली. त्या आनंदा प्रित्यर्थ पेटविलेल्या होळीत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली.

३) कंसाज्ञेने आलेल्या पुतना राक्षसीचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांनी पुतनेला जाळून, होळी पेटवून व्यक्त केला.

४) त्रिपुरा सुराचा मुलगा तारकासुर लोकांचा छळ करू लागला भगवान शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा शंकर ध्यानमन अवस्थेत होते त्यांचा ध्यानभंग करण्यासाठी मदनांनी सोडलेल्या मदनबाणामुळे शंकरांनी मदनाला भस्म केले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.

५) या दिवसाला महत्त्व आहे कारण श्रीराम आणि सुग्रीवाची भेट याच फाल्गुन पौर्णिमेला झाली.

६) होळीमध्ये रंग खेळताना भांगेची सेवन केले जाते त्यामागे एक अध्यात्मिक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी शंकरांनी जेव्हा विष प्राशन केले. तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत असताना त्यांनी भांग पिली भांग ही वनस्पती थंड असल्यामुळे त्यांचा दाह कमी झाला म्हणून वाढत असलेल्या उष्ण दिवसांमध्ये होळी हा सण येतो आणि उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या उत्सवात खास करून भांग पिली जाते.

सांस्कृतिक दृष्टीकोन

आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. बाराही महिन्यामध्ये होणारे सणवार याला सांस्कृतिक महत्त्व आहे. निसर्गातील सर्व चांगल्या गोष्टींना आत्मसात करून त्याचे संगोपन व संवर्धन करायला लावणारी आपली श्रेष्ठ संस्कृती आहे.

पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक करावा लागे. दुसरे कुठलेच ईंधनाचे साधन नव्हते घरोघरी गाई गुरे असत. त्यामुळे दही दूध घरोघरी असावयाचे तसेच गाई गुरांच्या शेणापासून गोवऱ्या लावल्या जायच्या. त्या उन्हाळ्यात वाळवून त्याचा साठा करण्यासाठी एक शेणाचा ‘उडवा’ रचला जायचा(उडवा म्हणजे मधे गोवऱ्या गोल रचून गोलाकार त्याला शेणामातीने लिंपले जाई व पावसात भिजू नये म्हणून पूर्ण बंद केले जाई.अगदी एखाद्या छोट्याशा डेरेदार झोपडी सारखे ते दिसत असे त्याला गोवऱ्या काढण्यासाठी पुढच्या बाजूने एक माणूस आत जाईल असे तोंड ठेवले जाई.त्याला उडवा म्हणत.)अजूनही ग्रामीण भागात हे पहायला मिळते.त्यामध्ये त्या गोवऱ्या सुरक्षित ठेवल्या जायच्या. पावसाळा सुरू झाला की लाकूड मिळत नसे किंवा सर्व ओले असे त्यामुळे या गोवऱ्यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जायचा. त्याची तयार होणारी राख तिचा वापर भांडे घासण्यासाठी व्हायचा, किती ठिकाणी तर दात घासण्यासाठी देखील या राखुंडीचा वापर व्हायचा. झाडाच्या आळ्यामध्ये ही राख घातली जायची आणि त्यामध्ये नवीन बिया लावल्या जायच्या जेणेकरून नवीन रोपे लवकर तयार होतील हा उद्देश त्यामध्ये असायचा. होळीसाठी खास मुले घरोघरी जाऊन “होळीच्या गोवऱ्या पाच पाच गोवऱ्या नाही दिल्या तर…..”असे म्हणून बोंब मारतात. या जमवलेल्या गोवऱ्या पानगळ झालेली सारी पाने गोळा करून त्याची होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी याच होळीच्या राखेची धुळवड खेळली जाते ती राख एकमेकांच्या अंगाला फासली जाते.अजूनही होळीच्या राखे मध्ये. भोपळ्याचे वेल लावले जातात, कारल्याचे वेल लावले जातात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी कुठेही कधीही पुरणपोळी मिळायची नाही ती केवळ काही खास सणांना केली जायची त्यातलाच एक सण म्हणजे होळी. “होळी रे होळी पुरणाची पोळी”असे खास म्हटले जाते. पुरणपोळी खाण्यासाठी सर्वजण आतुरतेने होळीची वाट पाहायचे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

आगीपासून जीव अर्थहानी होऊ नये म्हणून या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकून नारळ अर्पण करतात व होळीत दूध टाकून तिचे विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात म्हणून या सणाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परांतील प्रेम संबंधाने फुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी १४ मन्वादी म्हणजे मन्वंतराच्या प्रारंभ तिथी आहेत दक्षिण हिंदुस्थानातील बहुसंख्य उत्सव या महिन्यात संपन्न केले जातात या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा व्रत करतात या व्रतात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा करतात गावातील तरुणांनी एकत्र जमून गाव स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करावा व त्याची होळी करावी परंतु लाकडांची होळी करू नये म्हणजे वृक्षहानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल अशी प्रथा आहे.होळी किंवा रंगपंचमीला अंगावर थंडगार पाण्याचे रंग उडवले जातात यातून ऋतूबदलाचा सुंदर संदेश दिला आहे तो म्हणजे आता थंडी संपली आहे उष्णतेच्या काहिलीत गरम पाणी हे आरोग्यास अपायकारक असते म्हणून होळी नंतर थंड पाण्याने स्नान करावे.आपले पूर्वज खूप श्रेष्ठ होते प्रत्येक ऋतुमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सणवार निर्माण केले व त्यानुसार आपण वर्तन केल्यावर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येऊ शकतो.

होळी जेव्हा रचली जाते तेव्हा त्याच्या मध्य भागात एरंडाच्या झाडाची मोठी फांदी ठेवली जाते. केवढा मोठा शास्त्रीय विचार आहे पहा याच्यामागे. एक कथा मी ऐकलेली येथे सांगावीशी वाटते. आफ्रिकेतील जंगलामध्ये काही लोक झाडे तोडून तेथे घर उभारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी तेथे लाकडाचे खांब उभे करतात, दुसऱ्या दिवशी येतात तर सगळे खांब अस्ताव्यस्त पडलेले असतात ते पुन्हा उभे करतात पुन्हा दुसऱ्या दिवशी अस्ताव्यस्त केलेले असते. पुन्हा उभे करतात आणि रात्री डबा धरून बसतात तर वानरांची एक टोळी येते आणि सर्व अस्ताव्यस्त करत असते तिसऱ्या दिवशी रात्री ते लोक तिथे खिरीचे भांडे ठेवतात आणि त्यामध्ये विष घालतात ठरल्याप्रमाणे वानरांची टोळी येते आणि त्या खिरीच्या भांड्या भोवती येऊन थांबते. त्यांच्यापैकी सर्वात वयस्क वानर येऊन त्या खिरीचा वास घेते व नंतर जंगलात जाऊन एरंडाचे लाकूड आणून खिरीच्या भांड्यामधून फिरवते आणि मग ती खिर ते सर्व वानरं खातात आणि त्या खिरीतील विष नष्ट झालेले असते आपल्याकडे होळीमध्ये ही एरंडाची फांदी ठेवण्याचे कारण म्हणजे होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वापरलेले असतात व नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण त्याची धुळवड आपल्या अंगाला फासतात त्यामुळे त्याचा काहीही अपाय होऊ नये व त्यात एखादे विषारी द्रव्य असेल तर ते नष्ट व्हावे म्हणून एरंडाच्या झाडाची फांदी होळीमध्ये ठेवली जाते जेणेकरून त्याची राख त्या सर्व धूळवडीमध्ये मिसळली जाईल व कोणाला काही अपाय होणार नाही किती मोठा शास्त्रीय दृष्टिकोन यामागे आहे पहा.

समाजात जसे चांगले लोक असतात तसेच वाईट प्रवृत्तीचे देखील लोक असतात. मानवी मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर वाईट भावना असतील तर तो त्या कोणासमोर बोलून दाखवू शकत नाही आणि मग ती प्रवृत्ती मनामध्ये कुठेतरी घर करून राहते ते वाईट विचार मनातले बाहेर पडावेत म्हणूनही होळीची निर्मिती झाली असावी होळी समोर सर्वजण काहीही वाईट शिवीगाळ करू शकतात, बोंबाबोंब करू शकतात जेणेकरून मनातील अपप्रवृत्ती नष्ट होऊन मन स्वच्छ आणि निर्मळ होईल. एकूण काय माणसाला मन मोकळे करण्यासाठी या होळीची निर्मिती झाली असावी.

होलीकोत्सवा मागची ही मानसशास्त्रीय बैठक आहे हुताशनी हे तिचे नाव अर्थपूर्ण आहे हुत म्हणजे हवन केलेले आणि अर्पण केलेले आणि अशनी म्हणजे खाऊन टाकणारी आपल्या दुर्भावना होळीत अर्पण केल्या तर ती त्या खाऊन टाकते असा भाव. फाल्गुन पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा यानंतर जी पौर्णिमा येते ती नव्या वर्षातील पौर्णिमा म्हणून या वर्षातील शेवटच्या पौर्णिमेला मनातील दुष्ट भावना ओकून होळीमध्ये टाकाव्यात हाच या उत्सवा मागचा मूळ हेतू असावा.

आयुर्वेदात सांगितले आहे जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजूक तूप नाजूकपणे वापरायचे नाही म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते पण तुपाने कोलेस्ट्रॉल वाढेल याचे काय? त्यासाठी आपण करतो कटाची आमटी या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इत्यादी कोलेस्ट्रॉल कमी करते.आहे की नाही वैज्ञानिक दृष्टिकोन.

आहे होळी

खा पुरणपोळी

वाटी तुपाची

आमटी कटाची

नका करू काळजी

आरोग्याची

फक्त पूर्वजांचे ऐकावे सारे

जीवनात येईल सुखाचे वारे

असीम प्रेमाचे महत्त्व श्रीकृष्णाने वृंदावनात राधिकेसोबत रास करून होळी खेळली आणि सर्व जगाला पटवून दिले. जगात प्रेम ही भावना नसेल तर माणूस सुखाने आयुष्य जगू शकणार नाही त्याच्या आयुष्यात कुठेतरी प्रेमाचा ओलावा हा असलाच पाहिजे हा गोड संदेश श्रीकृष्णांनी गुलाल उधळून,रास खेळून साऱ्या जगाला करून दिला.

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धुळवड… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

धुळवड ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज  न्युजपेपरला धुळवडीची सुट्टी. धुळवड म्हंटली की चटकन नजरेसमोर येतं ते गोकुळ. तो नटखट किशनकन्हैय्या आणी त्या कान्हावर  जिवाभावाचं मानसिक प्रेम करणा-या त्या गोपिका. त्यामुळे एका मैत्रीणीच्या खास आग्रहास्तव ब-याच जणांना खूप आवडलेली पोस्ट आज परत एकदा मांडते आहे.

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर. श्रीकृष्णाची अनंत रुपे, वेगवेगळी नावे. त्याचं  सगळ्यांना सगळ्यातं भावलेलं नाव म्हणजे कान्हा.

कान्हा म्हंटलं की अगदी जवळचा, आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला, समजायला पुढे पुढे जावं तितका तितका तो मारुती च्या शेपटीसारखा अनाकलनीय वाटतो. पण त्या कान्ह्याला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून वीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळूहळू माझ्यासारख्या वाचकांच्या. बुद्धीस झेपेल, पचेल, आकलन होईल असा माझा कान्हा उलगडायला सुरवात केली. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला आपला हा मधुसुदन किती कमी कळलायं. हिमनगाप्रमाणं. जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.

“युगंधर “आणल्याबरोबर एकदा सलग वाचून काढलं. तरीही आता परत एकदा “युगंधर” वाचायला सुरवात केल्यानंतर असं जाणवलं की आपल्याला आपला हा मुरलीधर परत नव्याने कळतोयं. ” युगंधर”हे खूप अप्रतिम पुस्तक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी कृष्णप्रेमींसाठी लिहीलयं. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तकं. आणि जो एकदा हे पुस्तक हाती घेईल तो हमखास नेहमी उशालगत कायम वाचण्यासाठी जवळ बाळगणारचं.

खूप सुंदर कृष्णाची विविध रुपं ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत. ह्यामध्ये महाभारता दरम्यान घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा वाचायला मिळतो.

ह्या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला सखे अनेक

गुरु दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, तसेच बहु पत्नी, कन्या, पुत्र होते सख्या मात्र दोनच एक राधा आणि दुसरी द्रौपदी. “राधा”ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळलायं युगंधर मधून. “रा” मँहणजे लाभो किंवा मिळो, आणि “धा” म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती.

खरचं युगंधरची निर्मीती ही श्रीकृष्ण लीलांपैकीच एक लीला असावी. त्याच्या कृपेशिवाय एवढा अद्भुत अविष्कार शक्यच नव्हता.

आज गोकुळाष्टमीच्या निमीत्ताने मी परत माझी रचना सादर करतेय.

  गजबजलेल्या गोकुळात होता कान्हाचा वास,

त्या कान्ह्याला मात्र सदा दुधालोण्याची आस,

सगळ्यांची नजर चुकवून हट्ट पुरवी राधा,

असे हा प्रेमाचा खेळ सिधासाधा ।।।

नव्हता ह्या खेळात दोघांचाही स्वार्थ,

एकमेंकांची काळजी घेणे एवढाच ह्यात अर्थ,

मात्र राधाशिवाय कृष्णाचे जीवन होते व्यर्थ,

राधाकृष्णानेच केले प्रेमाचे नाव सार्थ ।।।

राधा होती मोठी, कृष्ण होता तान्हा,

प्रेमरज्जूंनी बांधल्या गेले राधा अन कान्हा,

वयामुळे नाही आली कधीच प्रेमात बाधा,

अशी ही राधाकृष्णाच्या प्रेमाची अलौकिक गाथा ।।

कृष्णाला कळली राधेच्या प्रेमातील खरी आर्तता,

राधेशिवाय कधी होणारच नाही श्रीकृष्णाची पूर्तता,

राधाकृष्णाच्या प्रेमाची गोष्टच न्यारी,

जरी कृष्णावरती प्रेम करीती सारी ।।।

सोडीताच गोकुळ सा-यांना वाटे भिती,

कसे होईल आता, कोमेजेल का ही प्रिती,

शरीर होती भिन्न पण जुळले आत्म्यांचे सूर,

म्हणून कोसो अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर

म्हणून हे अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर ।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सखा… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “सखा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

माणूस माणसाशी बोलताना नकळत हातात हात घेतो. सहज कृती आहे ती. जसा सहज श्वास घेतो तसा सहज जगू शकतो का ? याचे उत्तर बहुधा नाही असेच आहे. जगणे सोपे व्हावे म्हणून प्रत्येकालाच एक मितवा हवा असतो. तो प्रसंगी मित्र , तत्वज्ञ किंवा वाटाड्या, मार्गदर्शक होवू शकेल असा कोणीही आपल्याला हवाच असतो. बरेचदा काय होते , आयुष्यातला प्रॉब्लेम जेवढा मोठा तेवढे समोरचे आव्हान मोठे वाटू लागते. आव्हान आपल्या अहंकारला सुखावण्यासाठीच असते. मुळात अहंकार नसतोच पण तो निर्माण केला जातो. यात मुख्य सहभाग त्या लोकांचा असतो जे त्यांना स्वत:ला आपले हितचिंतक मानतात. एखाद्या छोट्या गोष्टीला डोंगराएवढी करण्यात त्यांचा पुढाकार असतो,  Psychoanalyst, गुरु मंडळी, तत्ववेत्ते तुमच्या नसलेल्या problems ना अस्तित्व देतात नाहीतर त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागेल. अडचणीत जर कोणी आलेच नाही तर ते मदत कोणाला करणार? हा ही प्रश्न उरतोच. खरेतर नक्की काय शोधत असतो आपण? नेमके काय हवे असते आपल्याला? याचा विचार का करत नाही आपण? आपण जे पचायला सोपे ते आणि तेवढेच स्वीकारतो आणि जे पटत नाही ते सोडून देतो. बरेचदा सरावाने आपल्याला कळत जाते काय घ्यायचे आणि काय नाही,  पण त्यातही आपली कुवत आड येतेच.

आपण सारेच तसे अर्जुन असतो.आपापल्या कुरूक्षेत्रांवर लढण्यासाठी ढकलले गेलेले अर्जुन..आणि प्रत्येकाला कोणी कृष्ण भेटतोच असे नाही.म्हणून आपल्याला स्वतःमधला कृष्ण  चेतवावा लागतो परिस्थितीप्रमाणे.. कृष्णच का ??..तर कृष्ण ही वृत्तीची तटस्थता आहे.आपल्या वर्तनाचा त्रयस्थ राहून विचार करणारी.स्वतःला ओळखण्यासाठी त्रयस्थ व्हा..आरसा व्हा स्वतःचाच ..” प्रत्येकात कृष्ण असतोच .तो कोणाला सापडतो , कोणाला भासमान दिसतो , कोणी कृष्ण होतो तर कोणी कृष्णमय…” अर्जुनालाही कृष्णमय व्हावे लागले तेव्हाच त्याला महाभारतीय युद्धाची आवश्यकता , त्यासाठीचे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे असणे उमजले…” कृष्णायन ”

पण कृष्णायन म्हणजे गीता नव्हे.स्वतःला ओळखणे , स्वतःच्या अस्तित्वाचा हेतू ओळखणे , स्वतःच्या कोषातून बाहेर काय आहे याची जाणिव होणे म्हणजे गीता.एखादा कोणी जेव्हा म्हणतो की तुझ्याकडे कोणतीच कसलीच प्रतिभा नाही..तेव्हा हा विचार करावा कृष्णाने सांगीतलेला..दुस-या कोणापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःला जास्त ओळखू शकता..तुमची ताकद , तुमची मर्यादा तुम्हाला माहिती हवी..असे कोणी म्हणल्याने तुमच्याकडे काही येत नाही तसे जातही नाही.ते असतेच अंगभूत.. माऊलींनी देखील स्वतःचा स्वतःमध्ये लपलेल्या अर्जुनापासून विलग होऊन कृष्णरुप होण्याचा प्रवासच जणु ज्ञानेश्वरीत मांडला आहे. आपल्याला काय काय हवे आहे ह्याची बकेट लिस्ट  नक्कीच करावी. पण आपल्याकडे काय काय आहे आणि नाही  हे आपल्याला कळले आहे का ह्याची लिस्टही जरुर करावी आणि ह्या कळण्यातही किती वाढ झाली हे पण पहावे. आपल्याकडे असलेल्याचा वापर आपण कसा करतो यावर आपले व्यक्तिमत्व घडते. “माझ्याबाबतीच असे का होते”? “त्याला मिळू शकते तर मग मला का नाही”?  असे प्रश्न पडत असतील तर आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळलेच नाही हे पक्के ओळखावे. आयुष्य अनुभवानी आपल्याला समृद्ध करत असते. आणि श्रीमंत ही ! आपले असमाधान आपल्या अपेक्षांना जन्म देते त्यामुळे असे असमाधानी असण्यापेक्षा अप्रगतच असणेच  बरे नाही का?

चोरी फक्त गरजा भागवण्यासाठीच केली जाते असे नाही होत.  काहीजण गरजा लपवण्यासाठीही चोर्‍या  करतात. उघडपणे केले तर समाज बहिष्कृत करेल या भितीने चोरुन करतात. काय हवे,  काय नको हेच साठत जाते नंतर. काय हवे आहे आणि का हवे आहे  ह्याचा विचारच करायला विसरतो आपण. हे नाही, हे सुध्दा नाही. असे सगळेच नाकारून पहा एकदा, सर्व नकार संपले. . . की एक आणि एकच होकार उरेल. हेच हवे असते आपल्याला.  हेच असते आपले खरे सत्य, सत्व आणि अस्तित्व. मानवी प्रयत्न , मानवी जीवन , मानवी आकांक्षा या सर्वांमध्ये ..यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा परिपाक आपल्याला मानवतेच्या छटांचे दर्शन घडवत राहतो….” पिंडी ते ब्रम्हांडी ” जे मनात उपजते तेच आपण अंगिकारतो.हिग्ज बोसाॅन , क्वांटम थिअरी , ब्लॅक होल या संकल्पना ज्ञानेश्वरांनी अभ्यासल्या होत्या  की नाही हे माहिती नाही पण  ” मी विश्वरुप आहे ” ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.प्रत्येकाने आहे आणि नाही यामधला अवकाश समजून घेतला पाहिजे ही जाणिव जिथे उमगते…तिथे कृष्ण भेटतो. ….

घनसावळ्या….

अजूनही थिरकतात मीरेची पावलं

तुझ्या त्या मुरलीच्या स्वरांवर

आजही बावरी होते राधा

तुला कदंबाखाली शोधताना

राधा काय किंवा  मीरा काय

तुझीच रुपं अद्वैत 

तू जादुगार. ..

बांबूच्या  पोकळीत स्वर गुंफून त्यांना सजीव करणारा

तुझ्या वेणुच्या स्वरांतून जन्मतात मानवी देहाचे

षड्ज

तू निराकार , साकार ,सगुण, निर्गुण

तूच सर्वत्र

तूच आदिम तूच अंतिम सोहळा

हे घनसावळ्या. …….

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘तो’ म्हणजे अर्थातच देव..! त्याची माझ्या मनात नेमकी कधी प्रतिष्ठापना झाली हे नाही सांगता यायचं. की कशी झाली असेल हे मात्र सांगता येईल. ‘देव’ ही संकल्पना माझ्या मनात कुणीही जाणीवपूर्वक,अट्टाहासाने रुजवलेली नाहीये. ती आपसूकच रुजली गेली असणार. दत्तभक्त आई-वडील, घरातले देवधर्म, नित्यनेम, शुचिर्भूत वातावरण, हे सगळं त्याला निमित्त झालं असणारच. पण रुजलेला तो भाव सर्वांगानं फुलला तो कालपरत्त्वे येत गेलेल्या अनुभूतीमुळेच!

हे रुजणं, फुलणं नेमकं कधीपासूनचं याचा शोध घेता घेता मन जाऊन पोचतं ते मनातल्या सर्वात जुन्या आठवणीपर्यंत.मी दोन अडीच वर्षांचा असेन तेव्हाच्या त्या काही पुसट तर काही लख्ख आठवणी. आम्ही तेव्हा नृसिंहवाडीला होतो. वडील तेथे पोस्टमास्तर होते. सदलगे वाड्याच्या भव्य वास्तूच्या अर्ध्या भागात तेव्हा पोस्ट कार्यालय होतं. आणि आमच्यासाठी क्वार्टर्सही.वडील आणि आई दोघांचंही नित्य दत्तदर्शन कधीच चुकायचं नाही. रोजच्या पालखीला आणि धुपारतीला वडील न चुकता जायचे.बादलीभर धुणं आणि प्यायच्या पाण्यासाठी रिकामी कळशी बरोबर घेऊन आई रोज नदीवर जायची. धुतलेल्या कपड्यांचे पिळे आणि भरलेली कळशी घेऊनच ती पायऱ्या चढून वर आली की आधी दत्तदर्शन घ्यायची आणि मग उजवं घालून परतीची वाट धरायची.आम्ही सर्व भावंडे तिची वाट पहात दारातच ताटकळत उभे असायचो.त्या निरागस बालपणातली अशी सगळीच स्मृतिचित्रं आजही माझ्या स्मरणात मला लख्ख दिसतात.त्यातलं एक चित्र आहे आम्हा भावंडांच्या ‘गोड’ हट्टाचं! पोस्टातली कामं आवरून वडील आत येईपर्यंत आईने त्यांच्या चहाचं आधण चुलीवर चढवलेलं असायचं. तो उकळेपर्यंत आई देवापुढे दिवा लावून कंदील पुसायला घ्यायची.अंधारून येण्यापूर्वी कंदील लावला की रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू करायची. तोवर चहा घेऊन देवाकडे जाण्यासाठी वडिलांनी पायात चप्पल सरकवलेल्या असायच्या.

“मुलांनाही बरोबर घेऊन जा बरं. म्हणजे मग मला स्वैपाक आवरून, तुम्ही येईपर्यंत  जेवणासाठी पानं घेऊन ठेवता येतील” आईचे शब्द ऐकताच आम्हा भावंडांच्या अंगात उत्साह संचारायचा.

“चला रेs”  वडीलांची हाक येताच आम्ही आनंदाने उड्या मारत बाहेर पडायचो.त्या आनंदाचं अर्थातच देवदर्शनाची ओढ हे कारण नसायचं.त्या वयात ती ओढ जन्माला आलेलीच नव्हती. त्या आनंद, उत्साहाचं कारण वेगळंच होतं. वडिलांच्या मागोमाग आम्हा बालगोपालांची वरात सुरक्षित अंतर ठेवून उड्या मारत मारत सुरू होई.दुतर्फा पेढेबर्फीच्या दुकानांच्या रांगा आज आहेत तिथेच आणि तशाच तेव्हाही होत्या. रस्ताही आयताकृती घोटीव दगडांचा होता. ती दुकानं जवळ आली की माझी भावंडं मला बाजूला घेऊन कानात परवलीचे शब्द कुजबुजायची. मी शेंडेफळ असल्याने त्यांची हट्ट करायची वयं उलटून गेलेली आणि मी हट्ट केला तर वडील रागावणार नाहीत हा ठाम विश्वास. मग त्यांनी पढवलेली घोषणा ऐकताच नुसत्या कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटायचं.डोळे लुकलुकायचे.न राहवून आपल्या दुडक्या चालीने धावत जाऊन मी वडिलांचा हात धरून त्यांना थांबवायचा प्रयत्न करायचो.

“काय रे?”

“कवताची बलपी..”

“आधी दर्शन घेऊन येऊ. मग येताना बर्फी घेऊ.चलाs..” ते मला हाताला धरून चालू लागायचे. काय करावे ते न सुचून मी मान वळवून माझ्या भावंडांकडे पहायचो. त्यांनी केलेल्या खुणांचा अर्थ मला नेमका समजायचा. मी वडिलांच्या हाताला हिसडा देऊन तिथेच हटून बसायचो.आणि माझ्या कमावलेल्या रडक्या आवाजात..’ कवताची बलपी’ घेतलीच पायजे..’ अशा बोबड्या घोषणा देत रहायचो. वडील थांबायचे. कोटाच्या खिशात जपून ठेवलेला एक आणा न बोलता बाहेर काढायचे.’अवधूत मिठाई भांडार’ मधून कवठाची बर्फी घेऊन ती पुडी माझ्या हातात सरकवायचे. त्यांनी तो एक आणा देवापुढे ठेवायला घेतलेला असायचा हे त्या वयात आमच्या गावीही नसे. न चिडता,संतापता, आक्रस्ताळेपणा न करता, कसलेही आढेवेढे न घेता माझा हट्ट पुरवणाऱ्या वडिलांच्या त्या आठवणी माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. कारण त्या ‘गोड’ तर आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या आठवणींना दत्तमंदिराच्या परिसराची सुरेख,पवित्र, शुचिर्भूत  अशी सुंदर महिरप आहे.

देव म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या वयातली ही त्याच देवाच्या देवळासंदर्भातली सर्वात जुनी आठवण! ‘त्या’ची गोष्ट सुरू होते ती त्या आठवणीपासूनच! देवाची खरी ओळखच नसणाऱ्या माझ्या त्या वयात वडिलांमागोमाग चालणाऱ्या माझ्या इवल्याशा पावलांना, जीवनप्रवासातील अनेकानेक कठोर प्रसंगात खंबीरपणे उभं रहायचं बळ ज्याच्यामुळे मिळालं ‘त्या’चीच ही गोष्ट!

माझी कसोटी पहाणारे कितीतरी प्रसंग पुढे आयुष्यभर येत गेले.अर्थात या ना त्या रूपात ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. पण त्या प्रसंगातही माझ्या मनातली त्याच्याबद्दलची श्रद्धा कधी डळमळीत झाली नाही. त्या अर्थानं सगळेच प्रसंग माझी नव्हे तर त्या श्रद्धेचीच कसोटी पहाणारे होते. त्यापैकी अनेक प्रसंगात मी माझ्या मनातली ‘देव’ ही संकल्पना मुळातूनच तपासून पहायलाही प्रवृत्त झालो आणि पुलाखालून बरच पाणी वाहून गेल्यानंतरच्या आजच्या या क्षणीही त्या पाण्याबरोबर वाहून न गेलेली ती श्रद्धा तितकीच दृढ आहे !

माझ्या आयुष्यातल्या या सगळ्याच अनुभवांबद्दल लिहायला मी प्रवृत्त झालो खरा, पण हे अनुभव जगावेगळे नाहीत याची नम्र जाणीव मला आहे. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील.अशांना माझे हे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची माझी निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print