सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

एक एप्रिल… दुसरी बाजू ☆ सौ कल्याणी केळकर बापट

एक एप्रिल ही तारीख आपण गमतीशीर रित्या घेतो.ह्या दिवशी “अशी ही बनवाबनवी”करायला अधिकृतपणे मान्यता असते अशी समजूत आहे.

माझ्या लेखी एक एप्रिल ही तारीख खूपसा-या वैविध्यपूर्ण महत्त्वाच्या घटनांमुळे विशेष आहे.एक एप्रिल हा दिवस रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार ह्यांचा जन्मदिवस, रिझर्व्ह बँकेची स्थापना,भारतीय लष्कराची स्थापना , डॉ.आंबेडकर ह्यांना भारतरत्न, गुगलने जीमेल ही ईपत्रलेखनासाठी काढलेली प्रणाली इ.महत्वपूर्ण घटनांसाठी प्रसिद्ध आहे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ”म्हंटला की डोळ्यांसमोर चटकन येतं ते त्यांच शिस्तबद्ध वागणं आणि देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मदतीची गरज असतांना गाजावाजा न करता तत्परतेनं संघातील स्वयंसेवकांचं धावून जाणं आणि ती मदत सातत्याने गरज असेपर्यंत, संकटनिवारण होईपर्यंत उस्फुर्तपणे गरजूंपर्यंत पोहोचविणं.

खरचं कुठून आले असतील हे सद्गुण प्रत्येक स्वयंसेवकांमध्ये ?,अभ्यासपूर्ण बघितलं की लक्षात येत ज्याचं बीज सकसं असतं,मूळं कणखरं, खंबीर असतात तो वृक्ष हा बहरणारचं,निकोप राहणारचं.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार,भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या हिंदुत्ववादी संघटनेचे संस्थापक.डॉ. चा जन्म 1 एप्रिल 1889 चा.तिथीने चैत्रशुद्ध प्रतिपदेचा.

व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोहोचते तेव्हा ही वाटचाल करतांना तिच्यातील सदगुणांची पोटली हळूहळू उलगडू लागते

त्यांच्यातील सच्चे नेतृत्व, त्याग,सेवा, समर्पित भावना, दूरदर्शी विचार, शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ जीवनकार्य शैली ह्यांचा परिचय आपल्याला त्यांचे जीवन जाणून घेतांना होतो.

डॉ. हेडगेवार ह्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी अथक प्रयत्न,भगव्या ध्वजाप्रती निस्सीम प्रेम,गुरूं बद्दल आदर,गुरुदक्षिणेबद्दलची जरा वेगळी संकल्पना दैनंदिन शाखा आणि संस्थेतील पारंपरिक अध्यक्ष, संचालक मंडळ ह्या पदांना फाटा ही काही ठळक वैशिष्ट्ये.

कोणासाठी आपण जेव्हा मनापासून कामं करतो तेव्हा सतत त्या संस्थेच्या उत्कर्षाचाच मनात विचार,ध्यास आणि काळजी असते.डॉ. चे पण तसेच आपल्या पश्चात ह्या संघाची धुरा उत्तमप्रकारेच सांभाळली जावी हाच विचार मनात घोळत असल्याने त्यांनी आपल्या स्वतःसारखेच तालमीत तयार झालेले निःस्पृह,व्रतस्थ गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस,भैय्याजी दाणी यांच्यासारखे कुशल संघटक अनुयायी पुढील धुरा यशस्वीपणे सांभाळण्यासाठी मनोमन नियोजीत केले.

सतत हिंदुत्वाच्या उन्नतीसाठी च्मा ध्येयाने पछाडलेल्या डॉ. नी तब्बल पंधरा वीस वर्षे द़ौरे, बैठका ह्यामुळे फिरस्तीवर काढलेत.प्रकृती अस्वास्थ्यामुळे 21 जून 1940 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही कर्मयोगी आपल्या कर्तृत्वाने पुढील कित्येक पिढ्यांपुढे आपला आदर्श ठेवून जातात. अशा महान.विभूतींपुढे खरोखरीच.नतमस्तक. व्हायला होतं.

अश्याच प्रकारे आपल्या देशाला लाभलेले डॉ. आंबेडकर हे ही एक बुद्धिमान सुपुत्र.आजच्याच तारखेत ह्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.

आजच्याच दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.थोडक्यात म्हणजे बँकाची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक .1 एप्रिल 1935 ला कलकत्ता येथे रिझर्व्ह बँकेची सुरवात झाली. देशपातळीवरील संस्थांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम रिझर्व्ह बँक करते.भारतीय चलनीनोटांची गरजेनुसार छपाई, भारताची गंगाजळी म्हणजेच आर्थिक बाजू सांभाळणे

सगळ्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थावर देखरेख ठेवणे,अशी अनेक कामे रिझर्व्ह बँकेची आहेत.

आज आपण ज्यांच्या भरवशावर निर्धास्त राहू शकतो,सुरक्षितता, स्वतंत्रता उपभोगू शकतो अशा भारतीय लष्कराच्या स्थापनेचा दिवस.आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा गौरवाचा दिवस.

आधुनिक युगात प्रगतशील व्हायचे असेल तर परंपरेला जपून, सांभाळून आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही धरावीच लागते.आज एक एप्रिल गुगलने आजच्या दिवशी जीमेल ही ईपत्रलेखनासाठी नवीन प्रणाली सुरू केली आणि आज तर आपले रोजच्या कामकाजात ह्याशिवाय पान देखील हालत नाही.

अशा सगळ्या थोर व्यक्ती, मोठ्या महान घटना  आठवल्या आणि त्या आठवणींना ह्या पोस्ट द्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments