सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

धुळवड ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज  न्युजपेपरला धुळवडीची सुट्टी. धुळवड म्हंटली की चटकन नजरेसमोर येतं ते गोकुळ. तो नटखट किशनकन्हैय्या आणी त्या कान्हावर  जिवाभावाचं मानसिक प्रेम करणा-या त्या गोपिका. त्यामुळे एका मैत्रीणीच्या खास आग्रहास्तव ब-याच जणांना खूप आवडलेली पोस्ट आज परत एकदा मांडते आहे.

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर. श्रीकृष्णाची अनंत रुपे, वेगवेगळी नावे. त्याचं  सगळ्यांना सगळ्यातं भावलेलं नाव म्हणजे कान्हा.

कान्हा म्हंटलं की अगदी जवळचा, आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला, समजायला पुढे पुढे जावं तितका तितका तो मारुती च्या शेपटीसारखा अनाकलनीय वाटतो. पण त्या कान्ह्याला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून वीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळूहळू माझ्यासारख्या वाचकांच्या. बुद्धीस झेपेल, पचेल, आकलन होईल असा माझा कान्हा उलगडायला सुरवात केली. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला आपला हा मधुसुदन किती कमी कळलायं. हिमनगाप्रमाणं. जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.

“युगंधर “आणल्याबरोबर एकदा सलग वाचून काढलं. तरीही आता परत एकदा “युगंधर” वाचायला सुरवात केल्यानंतर असं जाणवलं की आपल्याला आपला हा मुरलीधर परत नव्याने कळतोयं. ” युगंधर”हे खूप अप्रतिम पुस्तक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी कृष्णप्रेमींसाठी लिहीलयं. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तकं. आणि जो एकदा हे पुस्तक हाती घेईल तो हमखास नेहमी उशालगत कायम वाचण्यासाठी जवळ बाळगणारचं.

खूप सुंदर कृष्णाची विविध रुपं ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत. ह्यामध्ये महाभारता दरम्यान घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा वाचायला मिळतो.

ह्या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला सखे अनेक

गुरु दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, तसेच बहु पत्नी, कन्या, पुत्र होते सख्या मात्र दोनच एक राधा आणि दुसरी द्रौपदी. “राधा”ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळलायं युगंधर मधून. “रा” मँहणजे लाभो किंवा मिळो, आणि “धा” म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती.

खरचं युगंधरची निर्मीती ही श्रीकृष्ण लीलांपैकीच एक लीला असावी. त्याच्या कृपेशिवाय एवढा अद्भुत अविष्कार शक्यच नव्हता.

आज गोकुळाष्टमीच्या निमीत्ताने मी परत माझी रचना सादर करतेय.

  गजबजलेल्या गोकुळात होता कान्हाचा वास,

त्या कान्ह्याला मात्र सदा दुधालोण्याची आस,

सगळ्यांची नजर चुकवून हट्ट पुरवी राधा,

असे हा प्रेमाचा खेळ सिधासाधा ।।।

नव्हता ह्या खेळात दोघांचाही स्वार्थ,

एकमेंकांची काळजी घेणे एवढाच ह्यात अर्थ,

मात्र राधाशिवाय कृष्णाचे जीवन होते व्यर्थ,

राधाकृष्णानेच केले प्रेमाचे नाव सार्थ ।।।

राधा होती मोठी, कृष्ण होता तान्हा,

प्रेमरज्जूंनी बांधल्या गेले राधा अन कान्हा,

वयामुळे नाही आली कधीच प्रेमात बाधा,

अशी ही राधाकृष्णाच्या प्रेमाची अलौकिक गाथा ।।

कृष्णाला कळली राधेच्या प्रेमातील खरी आर्तता,

राधेशिवाय कधी होणारच नाही श्रीकृष्णाची पूर्तता,

राधाकृष्णाच्या प्रेमाची गोष्टच न्यारी,

जरी कृष्णावरती प्रेम करीती सारी ।।।

सोडीताच गोकुळ सा-यांना वाटे भिती,

कसे होईल आता, कोमेजेल का ही प्रिती,

शरीर होती भिन्न पण जुळले आत्म्यांचे सूर,

म्हणून कोसो अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर

म्हणून हे अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर ।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments