ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ञ श्रीमती ताराबाई मोडक यांचा आज स्मृतीदिन. 

 (१९-४-१८९२ ते ३१-८-१९७३) 

यांचे आईवडील प्रार्थना समाजाचे अनुयायी असल्याने घरात आधुनिक – प्रगत वातावरण होते. पण पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना अनेकदा हेटाळणी सहन करावी लागली.  १९०२ साली त्यांनी पुण्याच्या हुजूरपागेत प्रवेश घेतला. पण शाळेच्या वसतीगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीही त्यांना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा नेहेमीच अभिमान वाटत असे. १९०६ साली वडील गेल्यावर, त्यांना मुंबईत यावे लागले, आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या ‘अलेक्झांडर गर्ल्स स्कूल’ मध्ये जायला लागल्या. लवकरच शाळेत रुजल्या. आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला तो बदल त्यांना खूप काही शिकवून गेला. पुढे फिलॉसॉफी विषयात  B.A. केले. 

प्रार्थनासमाजामुळे त्यांचे विचार आणि जीवनमानही प्रगत झाले. अशा अभिरूची संपन्न जीवनशैलीने त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ मिळाले. त्यांना विविध छंद होते. त्या टेनिस, बॅडमिंटन उत्तम खेळत. विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यातही त्यांना विशेष रस होता. लग्नानंतर त्या अमरावतीला रहायला गेल्या. तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. १९१५ साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तिथे त्यांनी काही काळ नोकरी केली. 

संसारातून विभक्त झाल्यानंतर, १९२१ साली राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ‘प्राचार्य’ म्हणून त्यांना बोलावण्यात आले. ही नोकरी उत्तम असली तरी आव्हानात्मक होती. त्यासाठी विशेष शिकवणी लावून त्यांनी गुजराती भाषा शिकून घेतली. त्यांच्या कामात व्यवस्थापनाचाही मोठा भाग होता. त्याचे तंत्रही त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. पण काही कारणाने दोन वर्षांनी त्यांनी ती नोकरी सोडली. 

याच दरम्यान श्री. गिजुभाई बथेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगांविषयी त्यांना माहिती मिळाली. आणि त्या भावनगरला गेल्या. हे गृहस्थ मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यासाठी  त्यांची  सहकारी म्हणून ताराबाईंनी काम करायला सुरूवात केली. त्या दोघांची ही भेट ‘ऐतिहासिक’ ठरली असेच म्हणायला हवे. कारण भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी ठरली; आणि त्यांनी बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते. त्यात बालशिक्षण ही कल्पना तर गौणच होती, आणि त्याचे महत्त्व पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. ताराबाईंना समाजाची ही मानसिकता माहिती होती. त्यामुळे त्यांच्या विचारांना शास्त्रीय बैठक असेल तरच लोकांना काहीतरी पटेल, या विचाराने त्या दोघांनी शास्त्राचा आधार असणा-या मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, त्याला भारतीय रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला… आणि आज बालशिक्षण हे एक शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. 

भावनगरच्या वास्तव्यातच त्यांच्यातली लेखिकाही त्यांना सापडली. १९२२ साली नूतन बालशिक्षण संघाची म्हणजे ‘मॉन्टेसरी’ संघाची स्थापना झाली… त्यांच्यातर्फे ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक प्रकाशित केले जाऊ लागले. आणि संपादकाचे काम अर्थातच् ताराबाईंकडे आले. हिन्दी आणि मराठी या दोन्ही आवृत्ती ताराबाईंमुळेच नियमित प्रकाशित होऊ लागल्या. तिथे ताराबाईंनी काही पुस्तकांचे लेखन केले. शंभरपेक्षाही जास्त पुस्तकांचे संपादन केले. मॉन्टेसरी संमेलने भरवली. आणि ‘बालशिक्षण’ हे त्यांचे कार्यक्षेत्रच होऊन गेले. 

शिक्षणाला पावित्र्याची किनार हवी हे जाणून त्यांनी बालघरांचे रूपांतर बालमंदिरांमध्ये केले. त्यात भारतीय नृत्ये, कला प्रकार, अभिजात संगीत, लोकगीते यांचा समावेश केला. बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला ही विशेष अर्थ आहे हे जाणून… या सर्व विचारांचा आणि संकल्पनांचा मेळ बालशिक्षणात साधला. एकीकडे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्या जोडीने पालक आणि शासन या दोन्हींच्या प्रबोधनाचे कामही केले. आता त्यांना खेड्यातील बालशिक्षणाचा ध्यास लागला होता. त्यासाठी अत्यावश्यक असणारी साधने बनवण्याची जबाबदारीही त्यांनी सहजपणे स्वीकारली.

पुढे मुंबईला आल्यावर, त्यांनी या सगळ्या कल्पनांवर आधारित अशी ‘शिशुविहार’ शाळेची १९३६ साली स्थापना केली; आणि भविष्यात जास्त बालशिक्षकांची गरज भासणार हे लक्षात घेऊन तिथेच ‘बाल अध्यापक विद्यालयांची’ स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही करून ठेवले. हळूहळू त्यांच्या या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे आणि आदिवासींच्या संदर्भाचे परिमाण मिळाले, कारण मुंबई नंतर बोर्डी, तसेच कोसबाड इथे त्यांनी हे काम सुरू केले. असा हा प्रवास पुढे हरिजनवाड्या, कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला. 

ताराबाईंचे हे फार मोठे योगदान लक्षात घेऊन, १९६२ साली केंद्रसरकारने ताराबाईंना ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्रदान केला. शिक्षणतज्ञ या नात्याने त्यांनी अनेक पदे भूषविली, अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले. १९४६ ते १९५१ त्या मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्ष होत्या. म.गांधींनी त्यांच्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे कम ताराबाईंना सोपवले होते. या विषयावर इटलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाषण केले होते.

विशेष म्हणजे ताराबाईंच्या ‘शिशुविहार’ मध्ये आता दोन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात – १) मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून ‘शिशु-बँकेची’ योजना, २) निरक्षर पालकांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवणे. 

ताराबाई मोडक यांचे प्रकाशित साहित्य : नदीची गोष्ट / बालकांचा हट्ट / बालविकास व शिस्त / बिचारी बालके / सवाई विक्रम . 

सौ. ललितकला शुल्क यांनी ताराबाई मोडक यांचे लिहिलेले चरित्र प्रसिद्ध आहे. 

बालशिक्षणासाठी पुरे आयुष्य झोकून देणा-या श्रीमती ताराबाई मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || श्री गणेश || ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || श्री गणेश ||  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

वंदन श्रीयेशा,

वंदन श्रीयेशा,

बुद्धिदायक हे परमेशा,

यशकीर्तिच्या परेशा ||

 

कार्यारंभी आवाहन करतो,

मनोभावे पूजा करतो,

सुरवर सारे तुजला स्तविती,

दैत्यांनाही येई प्रचिती ||

 

रिद्धीसिद्धी चा आहेस कर्ता,

विघ्ननाशका विघ्नहर्ता,

सुखकारक तू दुःखहर्ता,

सगुणरुपी तू आनंद दाता ||

 

पृथ्वी प्रदक्षिणेची चुरस लागली,

कार्तिक, गणेश सज्ज जाहले,

प्रथम निघाले मयुरावरी कार्तिक,

श्रीगणेशाने मातेलाच प्रदक्षिणा घातली ||

 

प्रदक्षिणेने श्रीगणेशास जयश्रीने सजविले,

बुद्धिमत्तेचे द्योतक श्रीगणेश शोभले,

चौदा विद्यांचा खरे आहेस तू कर्ता,

चौसष्ट कलांचा आहेस दाता ||

 

इतिहासाने सांगितले,

गणेशजी मुषकावरून जात असता कोसळले

त्यामुळे चंद्र हासला शाप दिला गणेशाने

मुख चंद्राचे जो पाही, आळ चोरीचा येई ||

 

शंकराचे आत्मलिंग लंकेश्वर नेता,

अडविले श्रीहरीने गणेश हस्ता,

पश्चिम समुद्री स्थापिले आत्मलिंग हे असे

गोकर्ण महाबळेश्वर म्हणून नावाजले कसे ||

 

ये हासत नाचत गणेशा

दूर करी रे देश समस्या

एकजुटीचा मंत्र देई

देशभक्तीचे गीत गाई ||

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाऊस असा घनघोर ,

जिवाला घोर.

खचतील ,

संयमी भिंती .

पाऊस जरी घनघोर ,

होउन यार,

ठरवितो व्यर्थ ,

मनाची भीती.

पाऊस असा मायावी,

गारुड घालून अवघे,

व्यापतो पुरा,

मनस्वी .

पाऊस असा दयावंत ,

बरसून अमृतधारा.

संपन्न चिंब करुनी,

साक्षात उभा भगवंत.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पावसाचं ये जा चालूच आहे. आषाढात कोसळणारया पाऊस म्हणजे भरू लागलेली धरणे आणि मनात महापुराची भीति. पण हळुहळू हा जोर कमी होऊ लागतो. पुन्हा पाऊस आणि बघता बघता पाऊस गायब. हा लपंडाव म्हणजे श्रावण. म्हणजेच ऑगस्ट. श्रावण असो किंवा ऑगस्ट, दोन्ही  दृष्टींनी हा महिना महत्वाचा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाच्या दोन घटना या महिन्यात घडल्या. एक म्हणजे नऊ ऑगस्ट!  1942 च्या या दिवशी स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ‘चले जाव’ च्या घोषणेने अवघा देश दुमदुमून निघाला. दुसरा महत्वाचा  दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट. 1947 च्या या दिवशीच आपला देश स्वतंत्र झाला हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना आपल्या सर्वांना खूप खूप महत्त्वाचा. या दोन महत्वाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्यही काही दिवस महत्वाचे आहेत. एक ऑगस्ट हा मुस्लिम स्त्रिया हक्क दिन आहे. 1905 मध्ये बंगालाच्या फाळणीच्या विरोधात जी स्वदेशी चळवळ कलकत्त्यात सुरू झाली त्याची आठवण म्हणून सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीचा दिवस वीस ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. तर हाॅकीतील किमयागार मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.

या ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तरावरील अनेक दिवसांचेही महत्व आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे आहे. आदिवासींचे अस्तित्व व त्यांची संस्कृती याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आहे. छायाचित्र कला व कलाकार यांच्या सन्मानार्थ एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी व एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्याच्या जखमांची आठवण करून देणारे दिवस म्हणजे अनुक्रमे हिरोशिमा दिन आणि नागासकी दिन. !

प्राण्यांचे रक्षण आणि वर्धन यांचे महत्त्व लक्षात आणून देणारे दिवस म्हणजे जागतिक सिंह दिन, हत्ती दिन आणि कुत्रा दीन. हे अनुक्रमे दहा, बारा आणि सव्वीस ऑगस्टला साजरे होतात.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, दत्तभक्त टेंबेस्वामी, हुतात्मा राजगुरु, गोस्वामी तुलसीदास, महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी या महान व्यक्तींच्या जन्माचा हा महिना. तर याच महिन्यात लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिनही याच महिन्यातील.

या ऑगस्ट इतकाच  महत्त्वाचा श्रावण महिना! एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण तर दुसरीकडे सण, व्रतवैकल्यांची गडबड. रंग गंधाचे लावण्य अंगावर मिरवणारा मास. राखीपौर्णीमा साजरी करून भावाबहिणींचे नाते दृढ करणारा मास. नारळ वाहून समुद्राला शांत होण्याची विनंती करणा-या दर्यावर्दींचा मास. नागपंचमी, बैलपोळा यासारख्या कृषी संस्कृतीशी निगडीत असणा-या सणांचा महिना. मोहरमचे ताबूत नाचवणा-या मुस्लिमधर्मीयांचा मास.  पारशी नूतन वर्ष, फरवर्दिन, याच महिन्यात सुरू होते.

आषाढात कोसळून कोसळून दमलेल्या पावसाला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटत असावे. म्हणून तर श्रावणातल्या हलक्याफुलक्या  सरी थांबून थांबून पडत असाव्यात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, श्रावणात निळा घन बरसून जाता जाता घनश्यामाची आठवण करून देत असतो. निसर्गातील आणि संस्कृतीतील वैभवाचे दर्शन घडवणारे साहित्य, काव्य, गीते यामुळे तर मनाची प्रसन्नता आणखीनच वाढत जाते. या प्रसन्न मनाने आपण सगळेच उत्सुक असतो मोरयाचे स्वागत करण्यासाठी!सुखकर्ता दुःखहर्ता अशा त्या गणरायाचे वेध लागलेले असताना, हवा हवासा वाटणारा श्रावण केव्हा निघून जातो, समजतही नाही. कालचक्राचे एक पाऊल मात्र पुढे पडतच असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? विविधा ?

☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गणपती आणि निळी कमळं यांचं माझ्या मनात अतूट नातं आहे… २००३ साली माझ्या मुलाचं अभिजितचं लग्न झालं त्यानंतर पाच महिन्यांनी गणेशोत्सव आला. आमच्या घरात गणपती बसत नाही… पण घराच्या दारातच मंडळाचा गणपती बसतो… माझी सून प्रिया एक दिवस म्हणाली, आपण उद्या पहाटे दगडूशेठ हलवाईं च्या गणपतीला जाऊ ! आम्ही सर्वजण तयार होऊन पहाटे चार वाजता गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते गणपती दर्शन अलौकिकच असतं ! गणेशाचा वाहण्यासाठी मुली /बायका निळी कमळं विकत असतात! गेली अनेक वर्ष आम्ही ती निळी कमळं विकत घेतोय बाप्पासाठी आणि घरी परतताना आमच्यासाठीही ! निळी कमळं फक्त त्याच एका पहाटे घेतली जातात… माझ्या आजोळच्या गावात एक तळं होतं ..म्हणजे आहे.. आमच्या लहानपणी त्यात असंख्य निळी कमळं असायची… निळ्याकमळाचं आकर्षण तेव्हांपासूनचं… पुढे निलकमल हा सिनेमा पाहिला तेव्हाही राजकुमारी “निलकमल” अर्थात वहिदा रेहमानला पाहून तळ्यातली निळी कमळंच आठवली होती….

दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम अर्थात सूनबाईनी पाडलेला पायंडा २००३ पासून आम्ही पाळतोय कोरोना काळात तो खंडित झाला ! या वर्षी कदाचित पहाटे पाऊले गणेशाच्या दर्शनासाठी वळतील पण आता ही प्रथा आमच्या घरात सुरू करणारी प्रिया आणि अभिजित, सार्थक तिघेही सिंगापूरला आहेत सध्या! पण माझ्यासारखी एरवी “सूर्यवंशीय” असलेली बाई सूर्य उगवायच्या आत उठून तेव्हा सारखंच आताही गणेश दर्शन घ्यायला जाईल असं वाटतंय…

ती निळी कमळंही साद घालतीलच आ ऽऽऽऽ जाओ….अशी☺बस गणेशजी का बुलावा आना चाहिए….🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

” आक्के किती प्रकारचे नाष्टे बनवती गं? खाणारी तोंड तरी नक्की किती? “

“अगं काय सांगू, खाणारी तोंड दहा बाराच आहेत. पण प्रत्येकाच्या निराळ्या तऱ्हा. बरं त्यांना या वयात या अवस्थेत नाही म्हणायला मला नाही आवडत. म्हणून करते जमेल तसं. हे बघ ए तायडे, हे नर्सिंग होम तुझ्या दादांनी जरी उभारले असले तरी याला आईची माया या आक्केने लावली आहे. लोकांना उगा वाटते, दादांच्या औषधाने पेशंट बरे होतात म्हणून. तो हातगुण या आक्केचा आहे.”

” आक्के एवढा हातगुण आहे तर, तू का नाही डॉक्टरी शिकली? “

” शिकले असते हो, पण मला तुझ्या आई वडिलांसारखे आईवडील नाही ना लाभले. मी लहान असताना आईवडील  पाठोपाठ गेले. दादा वहिनींनी पोटच्या पोराप्रमाणे वाढविले. पण हे ओझे ते तरी किती वागवणार? वयात आले आणि दिले लग्न लावून. पण तुझ्या दादांच्या रूपाने देव भेटला बघ मला.”

” हो का? मग तुझ्या या देवाने का नाही तुझे शिक्षण पूर्ण केले?”

“अगं सगळ्यांच्या नशिबी का कर्वे येतात? पण दादांनी मला कमी मात्र काही पडू दिले नाही एवढे नक्की. शेवटी सरकारी डॉक्टराच्या पदरी किती नी काय पडणार. पण जेवढे त्यांच्या पदरी पडले तेवढे निमूटपणे गोळा करून माझ्या ओंजळीत ठेवले. कधी पैशाचाही हिशेब विचारला नाही बघ.”

“आक्के पाठीमागे दादांचे एवढे कौतुक करते आणि समोर आले की व्हस व्हस करते.”

” का नको करू? अगं निवृत्ती मिळाली, म्हटले आता करतील थोडा आराम. या वयात तरी मिळेल निवांतपणा. पण कसले काय? जेवढे पैसे मिळाले तेवढे पैसे गुंतवून हे नर्सिंग होम उभारले. ना दागिना ना कपडा. वर म्हणे, समाजाने दिलेले समाजासाठी वापरले.”

” पण अनुदान मिळाले ना गं नर्सिंग होमला?”

” कसले अनुदान गं, चार स्वयंसेवी संस्था मदत करतायत म्हणून चाललेय बघ सगळे. मागे कोणाच्या सांगण्यावरून केला होता अर्ज. पण पुढे जाऊन कोणाशी बोलायला नको का? दोन खेपा घालायला नको का? कसले काय, सरकारकडून मिळाले तेवढेच खूप आहे, आणखी काही नको असे म्हणत बसले घरी.”

” पेशंटचे नातेवाईक तरी …

” अगं दवाखान्याला पैसा उरला नाही की, टाकतात आणून इथे. वर परत मागे वळून बघणे नाही. कितीदा तर दादांनी फोन करून बोलावले, तरी येत नाहीत. मग सांभाळतो आम्हीच दोघे.”

” आणि मी येते ते अधूनमधून ? “

” कोण तू? माहेरवाशीण म्हणून येतेस आणि माझी कामे वाढवतेस.”

” असे गं काय आक्का. बाकी तुझ्या तोंडून हे सारे ऐकायला भारी वाटते. तुझ्या नी दादांच्या संसाराची शाहिरीच जणू.”

” हं झाडावर नको चढवायला. तुझ्या आवडीचे पोहे केले आहेत. अगदी तुला आवडतात तसे साखर, लिंबू, खोबरे, कोथींबीर सगळे घालून. खा गरम गरम आणि कर आराम आत जाऊन.”

लेखक : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ मी…???… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

मी— १ मुलगी, १ बहिण, १ मैत्रीण, १ पत्नी, १ सून, १ जाऊ, १ नणंद, १ आई, १ सासू , १ आजी, १ पणजी,….

सर्व काही झाले… पण “ मी “ चं व्हायचं राहून गेलं… आयुष्य संपत आलं… अन् आता वाटतयं स्वतःसाठी जगायचंच राहिलं। 

कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं… नंतर दादा अन् बाबांनी बंधन घातलं… वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघू लागले… अन् नकळत माझे चारित्र्यच चर्चेत यायला लागले… माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्या वर सोईस्कररित्या बंधन आले… एका मित्राची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले… 

अन् आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले…नोकरीचा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार …सासरच्यांना विचारुनच करावी लागणार… बाजारात वस्तू दाखविल्याप्रमाणे १० वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला … प्रश्नांचं भांडार अन् अपेक्षांचा ढीग माझ्यासमोर आला… त्याचा हसत हसत स्वीकारही केला -साथीदाराकडे बघून… नंतर त्याचे फोन, त्याची मर्जी सुरु झाली… मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खूप आश्वासने दिली… नकळत मी एका ‘ संसार ‘ नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले …

अन् पुढचे आयुष्य जणू मृगजळच झाले … घर नवरा सासू सासरे यांच्यात गुंतले… छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले… माहेरी नाही सांगितले, वाईट वाटेल म्हणून… हसतमुख राहिले नेहमी दुःख लपवून…अन् अचानक माझ्यावर कोडकौतुकाचा वर्षाव झाला सुरू… कारण माझ्यामुळे येणार होतं घरात एक लेकरु… मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू… अन् खरचं मलाही कळत नव्हते काय काय करु… विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली…

अन् कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली… नऊ महिने सरले… अन् त्या निष्पाप जिवाकडे बघून मी भरुन पावले… आई असे नवे नाव मला मिळाले… त्या छोटयाश्या नावासोबतच खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली… आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात… वेगळीच धांदल उडू लागली माझी घर सांभाळण्यात … 

आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली… अन् मुलांसाठी पै पै साठवली… शिक्षण झाले भरपूर,  तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना… आई वडिलांसह सोडून गेले देशाला… मधून मधून येत होते. भेटी गाठी घेत होते. … लग्न तुम्ही जमवा म्हणाले तेच काय कमी होते? … लग्न झाले दोघांचे तशी सासूही झाले… मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले … उतारवयात आता त्यांच्याच आधार वाटू लागला … अन् दुधात साखर म्हणजे एक नातू  माझा भारतात सेटल झाला… पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले… आता त्याचे लग्न झाले … नातसुनेचे पाऊल घराला लागले … मन आनंदाने भरुन गेले… अन् कवळी बसवलेल्या बोळक्याला हसू आले…

अपेक्षांचा आलेख उंचावत होता… अन् मला पणतीचा चेहरा पहायचा होता … तीही इच्छा माझी पूर्ण झाली… घरात एक  गोंडस पणती आली… पुन्हा ए कदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले…

अन् आता मात्र सर्वजण वाट पाहू लागले … माझ्या मरणाची… तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं…

अन् सगळं काही झालं असताना उगाच काही तरी बाकी असल्यासारखं वाटू लागलं…संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आले की… ‘मी’ व्हायचंच  राहून गेलं … सर्वांची लाडकी झाले, पण स्वतःची झालेच नाही कधी …नेहमी दुसऱ्यांचा विचार केला– स्वतःच्याही  आधी…हे सर्व लक्षात यायला ९० वर्षांचा काळ लोटला होता …

पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता… कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लिवलेस ड्रेस घातला… मस्त मेकअप करुन तयार झाले मनसोक्त फिरायला … कुठे जायचयं असं काहीच ठरलं नव्हतं …देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं … त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी … पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी … !!

— असे होण्याआधीच जीवनाचा खरा आनंद घ्या, स्वतःला देखील वेळ द्या, आणि आपणच आपले लाड करा.

 “ मी “ ला ओळखा.

लेखक : अनामिक

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू. स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो.

वपु काळे. ~’ तू भ्रमत आहासी वाया..’ 

संग्राहिका : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग ३ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

हैदरपाशा इथून रात्रीच्या रेल्वेने आम्ही सकाळी डेन्झीले स्टेशनवर उतरलो. इथून पामुक्कले इथे जायचे होते. फॉल सीझन सुरू झाला होता. रस्त्याकडेची झाडं सूर्यप्रकाशात सोनेरी किरमिजी रंगात झळाळून उठली होती तर काही झाडं चांदीच्या छोट्या, नाजूक घंटांचे घोस अंगभर लेवून उभी होती. दसऱ्याचं सीमोल्लंघन काल युरोप खंडातून आशिया खंडात झालं होतं. आज हे चांदी सोनं डोळ्यांनी लुटत चाललो होतो.

तुर्की  भाषेमध्ये पामुक्कले म्हणजे कापसाचा किल्ला! हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तिथल्या डोंगरातून अजूनही गरम पाण्याचे झरे वाहतात. त्यातील कॅल्शियमचे थरांवर थर साठले. त्यामुळे हे डोंगर छोट्या- छोट्या अर्धगोल उतरत्या घड्यांचे, पांढरे शुभ्र कापसाच्या ढिगासारखे वाटतात. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यात पाय बुडवून बसायला मजा वाटली.

जवळच एरोपोलीस नावाचे रोमन लोकांनी वसविलेले शहर आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या या शहरातील डोंगरउतारावरचे, दगडी, भक्कम पायऱ्यांचे, एका वेळी बारा हजार माणसं बसू शकतील असे अर्धगोलाकार ॲंफी थिएटर मात्र सुस्थितीत आहे.

इफेसुस या भूमध्य समुद्राकाठच्या प्राचीन शहरात,  संगमरवरी फरशांच्या राजरस्त्याच्या कडेला जुनी घरे, चर्च, कारंजी, पुतळे आहेत. निकी  देवीचा सुरेख पुतळा सुस्थितीत आहे.  दुमजली लायब्ररीच्या प्रवेशद्वाराचे संगमरवरी खांब भक्कम आहेत. खांबांमध्ये संगमरवरी पुतळे कोरले आहेत. त्याकाळी १२००० पुस्तके असलेल्या त्या भव्य लायब्ररीची आणि त्या काळच्या प्रगत, सुसंस्कृत समाजाची आपण कल्पना करू शकतो.

कॅपॅडोकिया इथे जाताना वाटेत कोन्या इथे थांबलो. कोन्या ही सूफी संतांची भूमी! ‘रूमी’ या कलंदर कवीच्या कवितांचा, गूढ तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव फारसी, उर्दू व तुर्की साहित्यावर झाला आहे. या रुमी कवीचा मृत्यू साधारण साडेसातशे वर्षांपूर्वी कोन्या इथे झाला. त्याची कबर व म्युझियम  पाहिले.या मेवलवी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उपासक घोळदार पांढराशुभ्र वेश करून स्वतःभोवती गिरक्या घेत, नृत्य करीत सूफी संतांच्या कवनांचे गायन करतात. रात्री हा व्हर्लिंग दरवेशचा नृत्य प्रकार पाहिला. शब्द कळत नव्हते तरी त्या गायन वादनातील लय व आर्तता कळत होती.

आज बलून राईडसाठी जायचे होते.एजिअस आणि हसन या दोन मोठ्या डोंगरांमध्ये पसरलेल्या खडकाळ पठाराला ‘गोरेमी व्हॅली’ असे म्हणतात. तिथल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आडव्या लोळा- गोळा होऊन पडलेल्या बलूनमध्ये जनरेटर्सच्या सहाय्याने पंखे लावून हवा भरण्याचं काम चाललं होतं. हळूहळू बलूनमध्ये जीव आला. ते पूर्ण फुलल्यावर गॅसच्या गरम ज्वालांनी त्यातली हवा हलकी करण्यात आली. त्याला जोडलेली वेताची लांबट चौकोनी, मजबूत टोपली चार फूट उंचीची होती. कसरत करून चढत आम्ही वीस प्रवासी त्या टोपलीत जाऊन उभे राहीलो. टोपलीच्या मधल्या छोट्या चौकोनात गॅसचे चार सिलेंडर ठेवले होते. त्यामध्ये उभे राहून एक ऑपरेटर त्या गॅसच्या ज्वाला बलूनमध्ये सोडत होता. वॉकीटॉकीवरून त्याचा नियंत्रण केंद्राशी संपर्क चालू होता. बलूनमधली हवा हलकी झाली आणि आमच्यासकट त्या वेताच्या टोपलीने जमीन सोडली. अधून मधून गॅसच्या ज्वाला सोडून ऑपरेटर बलूनमधली हवा गरम व हलकी ठेवत होता. वाऱ्याच्या सहाय्याने बलून आकाशात तरंगत फिरू लागलं. आमच्या आजूबाजूला अशीच दहा-बारा बलून्स तरंगत होती. सूर्य नुकताच वर आला होता. खाली पाहिलं तर  पांढरे- गोरे डोंगर वेगवेगळे आकार धारण करून उभे होते. हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या थरांच्या या डोंगरांनी वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन केले. ते डोंगर वरून बघताना शुभ्र लाटांचे थबकलेले थर असावे असं विलोभनीय दृश्य दिसत होतं.  काही ठिकाणी डोंगरांच्या सपाटीवर फळझाडांची शेती दिसत होती. बगळ्यांची रांग, डोंगरात घरटी करून राहणाऱ्या कबुतरांचे भिरभिरणारे थवे  खाली वाकून पहावे लागत होते. बलून जवळ-जवळ५०० फूट उंचीवर तरंगत होते. हवेतला थंडावा वाढत होता. मध्येच बलून खाली येई तेंव्हा खालचं दृश्य जवळून बघायला मिळंत होतं. अगदी तासभर हा सदेह तरंगण्याचा अनुभव घेतला.  आता वाऱ्याची दिशा बघून आमचं आकाशयान उतरवलं जात होतं. जवळ एक ओपन कॅरिअर असलेली मोटार गाडी येऊन थांबली. तिथल्या मदतनीसांच्या सहाय्याने ती लांबट चौकोनी टोपली गाडीच्या मोकळ्या कॅरिअरवर टेकविण्यात आली. हवा काढलेले बलून लोळा गोळा झाल्यावर कडेला आडवे पाडण्यात आले. पुन्हा कसरत करून उतरण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी धाव घेतली ती भोवतालच्या द्राक्षांच्या झुडूपांकडे! काळीभोर रसाळ थंडं द्राक्षं स्वतःच्या हातांनी तोडून अगदी ‘आपला हात जगन्नाथ’ पद्धतीने खाण्यातली मजा औरच होती. काही द्राक्षांच्या उन्हाने सुकून चविष्ट मनुका तयार झाल्या होत्या. त्या तर अप्रतिम होत्या.

इस्तंबूल भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 48 – मनोज के दोहे…. ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है   “मनोज के दोहे…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 48 – मनोज के दोहे …. 

कण-पराग के चुन रहे,भ्रमर कर रहे गान।

कली झूमतीं दिख रही, प्रकृति करे अभिमान।।

 

नयनों में काजल लगा, देख रही सुकुमार।

चितवन गोरा रंग ले, लगे मोहनी नार।।

 

खोली प्रेम किताब की, सभी हो गए धन्य।

नेह सरोवर डूब कर, फिर बरसें पर्जन्य।।

 

तन पर पड़ी फुहार जब, वर्षा का संकेत।

सावन की बरसात में, कजरी का समवेत।।

 

गौरैया दिखती नहीं, राह गईं हैं भूल।

घर-आँगन सूने पड़े, हर मन चुभते शूल।।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

image_print

Please share your Post !

Shares