सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-२ ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

(“बघून घेईन मी तुझ्याकडे, आता बघच मी कसं तुला जाळ्यात अडकवतो ते !” आणि पाय आपटत तो गेला.) – इथून पुढे.

संध्याकाळी स्वप्ना आली ती तणफणतच. नुसती धुमसत होती ती. आता हिला काय झालंय! रागिणीला कळेना. तिच्याजवळ ती गेली तर स्वप्नानें तीचा हात झिड कारला. खोदून खोदून विचारल्यावर ती म्हणाली, ” रागिणी तू अशी असशील असं वाटलं नव्हतं. इतक्या दिवसाची दाट मैत्री आपली. मला कुणी जवळच नाही म्हणून तुला मी बहिण मानत होते पण आता मला घृणा वाटते तुझी. आपली मैत्री आज पासून संपली. तू मात्र केसांनी गळा कापलासं माझा. रागिणी सुन्न झाली. “अगं काय झालय काय, तुला? नीट सांग ना जरा. डोकं फिरलंय का तुझं ?” “ हो फिरलय माझं डोकं. आणि, ते तू, फिरवलस. हेवा करतेस ना तू माझा?बघवत नाही नां तुला माझं सुखं. ?माझं आणि संतोषच लग्न ठरलय. तो प्रेम करतो माझ्यावर आणि माझंही किती प्रेम आहे सगळं सांगितलं होतं मी तुला. आणि एवढं सगळं माहित असूनही तू त्याच्यावर प्रेमाचं जाळ टाकलसं. हेवा करतेस ना तू माझा? माझ्याबद्दल खोटंनाटं सांगून त्याला माझ्यापासून हिरावून घेण्याचा काल तू प्रयत्न केलास. सांगितलय संतोषनी सगळं मला. ” 

एवढी खंबीर रागिणी हे सारं ऐकून मटकन खालीच बसली. अखेर त्यांनी डाव साधला होता. आणि साधी भोळी स्वप्ना त्याच्या नाटकाला फसलीच म्हणायची. नंतर तिला कितीही समजावलं तरी हा तेढा सुटत नव्हता. उलट त्या मवाल्याबरोबर तिचं हिंडणं फिरणं वाढलंच होतं. आणि इकडे रागिणीच्या मनात प्रश्नांचा फेरा फिरत होता. काय करायचं आता? कसं या चिखलातून हिला बाहेर काढायचं ? तो नाटक्या प्रेमाचं नाटक करतोय. तो फसवेल तुला. आयुष्य बरबाद होईल तुझं आयुष्यभर रडायची वेळ येईल तुझ्यावर. पण नंतर काय उपयोग ?आता कसं सांगू हे सगळं मी तिला?आता आपणचं काहीतरी करायला हवंय. आपल्यासमोर एक भोळी भाबडी मुलगी, आपली मैत्रीण, बरबाद होईल. कारण चौकशी केल्यावर रागिणीला कळलं होतं की तो एक लफंगा आहे.. विचार करून रागिणीचं डोकं दुखायला लागलं. अखेर निर्धाराने ती रणरागिणी पेटून उठली. अनेक मुलींना फसवणाऱ्या या बदमाश्याला चांगलाच धडा शिकवायला हवा आहे.

एका जवळच्या ग्रुप मधल्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन तिने सारा प्रकार सांगितला. पुढची सूत्र तिने भराभर हलवली. त्यांच्याच ग्रुप मधल्या त्या मैत्रिणीला संतोष बरोबर प्रेमाचं नाटक करायला सांगितलं. समाजात अशा नराधमांच्या कारस्थानाला भोळ्या भाबड्या मुली फसतात. आणि आयुष्यातून उठतात. त्यांना आपण वेळीचं वाचवायला हवय. आणि स्वप्ना तर आपली जवळची मैत्रीण. हीच वेळ आहे तिला सांवरायची. या विचाराने झपाटलेल्या त्या दोघींनी प्लॅन आखला, आणि तो सक्सेसही झाला. सभ्यतेचा बुरखा फाडल्यावर संतोषचं खरं रूप समोर आलं. त्याचं पितळ, उघडं पडलं. पुराव्यानिशी संतोष, स्वप्नासमोर पकडला गेला. अशा मवाल्यावर प्रेम करणाऱ्या, साध्या सरळ अशा स्वप्नांसाठी हा धक्का प्रचंड होता. निराशेच्या खोल खोल गर्तेत ती इतकी रुतली की आयुष्य संपवण्याच्या मागे लागली. आणि इतका वेळ या नाटकाच्या पडद्याकडून काम करणारी रागिणी पुढे झाली. आपल्या या मैत्रिणीं च्या साधेपणाची, दुबळेपणाची तिला भयंकर चीड आली. संताप आंवरत स्वप्नाला सावरत ती म्हणाली, “मूर्ख आहेस का तु ? अशा नालायक माणसासाठी तू आत्महत्या करायला निघालीस? लांडग्यांच्या कळपात. सापडली होतीस तू. इतकं भोळसट राहून नाही चालत. कळलं ना तुला आता. ? तो कसा हैवान आहे ते. त्याच्या नजरेतला विखार मी पहिल्या दिवशीच ओळखला होता. तुझ्या आधी अनेक मुलींना त्यानी बरबाद केलेलं आहे. शंका आल्यावर मी पूर्ण माहिती काढली. मूर्खपणामुळे तु माझ्यावरच अविश्वास दाखवलास. ” 

स्वप्ना म्हणाली, ” सॉरी फारच चुकलं गं माझं ! माफ कर नां मला. पण सांग ना! मी आता काय करू?मला मला आता जगावसंच वाटत नाहीये. तिला आधार देत ती रणरागिणी म्हणाली, “आधी हा बावळटपणा भोळसटपणा सोड. आणि माणसं ओळखायला शिक. नशीब थोडक्यावर निभावलं, नाही तर हे प्रकरण कुठल्या कुठे गेलं असत. वेळीच सावध झालीस, नशीब समज. सोळावं वर्ष धोक्याचं मोहमयी असतं पण ती धोक्याची वाट ओळखता आली पाहिजे. नाहीतर आयुष्याची माती होते. आणि काय ग! रडतेस कशाला ? आपले मोलाचे अश्रू आणि मोलाच् आयुष्य अशा लफग्यांसाठी आपण मातीमोल नाही करायचं. त्या पळपुट्या मवाल्यासाठी जीव द्यायला निघालीस. तो किती नालायक आहे हे समजलं ना तुला ? पुस ते डोळे. तू गुन्हेगार नाहीसचं. आयुष्यात कधीतरी वाकड्या वाटा येतातच पण त्या ओळखून, पुढच् आयुष्य ‘ जशास तसं ‘ वागून जगायचं असतं. वाईटाबरोबर चांगली माणसेही, अगदी आपल्यावरून जीव ओवाळून टाकणारी माणसेही, जगात असतात. ते ओळखण्याची नजर मात्र आपल्याजवळ हवी. मी आहे तुझ्या पाठीशी त्या संतोषला चांगला धडा शिकवू आपण. अशी अद्दल घडऊ की इतर मुली तरी त्याच्या तावडीतून वाचतील. ” मैत्रीची पकड घट्ट करीत स्वप्ना म्हणाली,

“पण तूच सांग, आता मी काय करू ?, तिला अडवत रागिणीने मागची आठवण करून दिली. “संतोषच्या प्रेमाने आंधळी झाली होतीस. त्यावेळी तू कौतुकाने सांगत होतीस संतोष नेहमी म्हणतो ‘तुझा आवाज चांगला आहे ‘ म्हणून. आता तू त्याच्याविरुद्धच आवाज उठव. तुला भीती वाटते ना! तो तुझ्याशी गुंडगिरी करेल की काय म्हणून, परत तो तुझ्या वाटेला गेला तर कानाखाली आवाज काढ त्याच्या. अशी घाबरू नकोस. आपण आता कराटेचा क्लास लावूया. तुझा गेलेला आत्मविश्वास परत आणायचाय“ 

आपल्याला. मैत्रिणीचा भरभक्कम आधार मिळाल्यावर कोलमडलेली स्वप्ना खंबीरपणे उभी राहिली. भोळ्या भाबड्या मैत्रिणींना मोहनगरीतून सावरायला रणरागिणीच्या मदतीने तिला सज्ज व्हायलाच हवं होतं. आणि मग मैत्रिणींच्या भरभक्कम आधाराने ती निर्धाराने उठली. अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तिला आता दुबळेपणा टाकून लढायचं होत. आणि मग त्यांच्या मैत्रीचा धागा अगदी पूर्वीसारखा घट्ट झाला.

अगदी घट्ट. अशा जीवाला जीव देणाऱ्या वेळीच सावरणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या, मैत्रिणीची मैत्रीची साथ प्रत्येकीलाच मिळायला हवी आहे, नाही का ! मग त्या एकजुटीनी अबला नक्कीच सबला होतील हॊ नां!

– समाप्त – 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments