मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.

ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥

मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥

३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥

आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥

अ असे निराकार। आत्मा होई मिळता आकार। इजा बिजेने भेटा ईश्वरासी॥

उल्हास मनी दाटे। ऊठोनी मन पळू लागे। एकदा तरी धागे ऐसे जुळावे॥

ओज येता भुईवर। औटघटकाभर। अंबराकडे पाहून अः म्हणा॥ 

मुळाक्षरांकडे आता। नजर आपली करू चला।किती संत अन् देवांनी ही भारली असे॥

 

‘क’ असे विठ्ठल। ठेऊनी ऊभा कटेवरी कर। त्यात  तयाचे रूप दिसतसे॥

‘ख’ असे एकमेव। एकत्र येती दोन जीव। जीव-शीव दर्शन घडतसे॥

‘ग’ वाटे गजानन। पहा जरा देऊन ध्यान। सोंड वळवून बसला असे॥

‘घ’ म्हणजे रिद्धि-सिद्धी। तयार  गणेश सेवेसी। चवरी घेऊन, वारा घालती॥

‘ङ’ म्हणजे लक्ष्मी माता। सजली पहा दागिण्यांनी आता। हिरा तिच्या नथणीचा चमकतो॥

‘च’ कडे जाता नजर।साई मज दिसे सत्वर।हात पसरूनी बसला असे॥

‘छ’ म्हणजे छत्रपती।घोड्यावर बसले तलवार हाती।अन्याय मुळीना खपतसे॥

‘ज’ वाटती गाडगेबाबा।गाडगे हाती घेऊनी ऊभा। स्वच्छता सकला मागतसे॥

‘झ’ वाटतो अर्जून। उभा धनूष्य ताणून । मनोवेध अचूक साधतसे॥

‘ञ’ म्हणजे समर्थ रामदास। दंडूका तयांचा हा खास। मनोभावे त्यास करू वंदन॥

‘ट’ म्हणजे कालीमाता।असूरांचा करी वध आता। चरणावरी माथ टेकवू चला॥

‘ठ’ म्हणजे वाटे जनी। तिचे ते जाते असे बाई।पिठ त्यातून दळू चला॥

‘ड’ म्हणजे असे नारद। उभा दारी शेंडी वर।नारायण जप करीतसे॥

‘ढ’ म्हणजे गोराकुंभार।चाक त्याचे अन् माती त्यावर।आकार मडक्यास देत असे॥

‘ण’ म्हणजे बालाजी रूप। गंध त्याचे सुखवी खूप। श्रीमंतीही वाढवू चला॥

‘त’ म्हणजे देवराज ईंद्र। ऐरावताची ती सरळ सोंड। ऐश्वर्य पाहू डोळाभरी॥

‘थ’ म्हणजे हनूमान।बसला चरणी गदा घेऊन। स्वामीभक्तासही नमू आपण॥

‘द’ असे कोणी योगी। तपश्चर्या करी एका पायावरी। सिद्धी तयास मिळोनी जावो॥

‘ध’ असे हो एकवचनी राम।सज्ज बाण भाता घेऊन। पुन्हा रामयूग मागू चला॥

‘न’ म्हणजे बटू कोणी। आला याचक होऊनी।दान तयास देऊ चला॥

‘प’ म्हणजे सावतामाळी मळ्यातील मचाणावर बसोनी तो राखी मळा॥

‘फ’ म्ह्णजे धन्वंतरी । एका हाती कलश घेऊनी। आरोग्य दान करीतसे॥

‘ब’ म्हणजे तुकाराम। उभे गळ्यात एकतारी घालून । विठ्ठल नाम सदा मुखी॥

‘भ’ म्हणजे बलराज भीम। खांद्यावरी ती गदा घेऊन।शक्तीने तो विजयी होई॥

‘म’ म्हणजे कार्तीकेय। मयूरावर बसून। विश्व प्रदक्षिणेस निघाला॥

‘य’ म्हणजे मीरा भोळी।एकतारी करी घेऊनी।एक पाय्वर घेऊनी बसली असे॥

‘र’ म्हणजे पार्वती देवी।सड्पातळ अन गौर वर्णी।तिजलाही वंदन आता माझे॥

‘ल’ असे हो विष्णूदेव।कमल पुष्पावरी स्वार।तिन्ही लोकांचे नियंत्रण करी॥

‘व’ असेहो सूर्य देव। ऊगवे तो क्षितीजावर।चराचरा चैतन्य देई॥

‘श’ असती विवेकानंद।ऊभे फेटा बांधून।हाताच्या घडीसह चिंतन करती॥

‘ष’ असे सरस्वती देवी।मांडीवरती वीणा ठेऊनी।गान मराठीचे गात असे॥

‘स’ वाटे राधाकृष्ण। ऊभा पाय दुमडून। खांद्यावरी राधा विसावतसे॥

‘ह’ म्हणजे पवनदेव।जोराने ती ऊठे वावटळ।परी सकल विश्व व्यापलेसे॥

‘ळ’ म्हणजे ज्ञानेश्वर।बसले पद्मासन घालून।पसायदान मागती हे॥

‘क्ष’ म्हणजे शंकरदेव।उभे ते डमरू घेऊन।एका हाती त्रिशूळ असे॥

‘ज्ञ’ म्हनजे महिषासूर मर्दिनी।पायी महिषासूर, हाती त्रिशूळ घेऊनी।सकल जनास शांती देई॥

ऐसी सर्व मुळाक्षरे वसती पहा मराठी गृही।बाराखडी सवे त्यास सजवावे॥

करावा त्यांचा आदर।शब्दांस द्यावा आधार।शब्दांगण फुलोनी जाई॥

अक्षरांपासून शब्द बनती।शब्द काव्य अथवा लेखन साकारती।तयातून ग्रंथभांडार निर्मीतसे॥

म्हाणोनी घ्यावी शपथ।वर्णमालेसी कंठात घालेन।तिजला सांभाळेन जन्मभरी॥

उतू नये मातू नये। घेतला वसा टाकू नये।मराठीस करावे आपलीशी॥

प्रसार हिचा करू चला।घट्ट वीण गुंफू चला।मराठीस वंदू मनोभावे॥

बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।

पंढरीनाथ महाराज की जय।मराठी माऊलीचा जय॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.

रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर.       फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार. 

गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं. 

एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं.  तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं. 

गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर  स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला.  “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला.  पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर  छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी!  तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”

बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी.  मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ”  धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची  शिट्टी वाजली.  फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हे सोहळे की देखावे…….” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “हे सोहळे की देखावे….…” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित

नाना आमचे स्नेही.. परवा त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला खरंतर हा सोहळा त्यांच्या मनाविरुद्धच, कारण त्यांना त्यांचा जन्मसोहळा नव्हे तर 81 वी जीवनयात्रा त्यांच्या ठराविक स्नेह्यांसमवेत  घरी साजरी करायची होती पण मुलांसाठी सुनांसाठी अन नातवंडांसाठी ही एक पर्वणी होती स्वतः चे हितसंबंध जपण्याची ! 

आता बघा नाना रिटायर्ड -80 पूर्ण तर  नानी 75 वर्षाच्या!  तिन्ही मुलं फ्लॅट संस्कृतीत रमणारे, गावातच राहतात अन बैठ्या घरात नाना नानी एकटेच राहतात ! जमत नाही हल्ली स्वयंपाक करणं म्हणून एका मावशींकडचा डबा  सकाळीच येतो. खरं तरं गरमागरम जेवण ही नानांची तरुणपणची आवडच ! 

“ बरेच दिवस झालेत गरमागरम जेवण जेवून “..  चार दिवसापूर्वीच ते नानींना म्हणालेत ! पोळी चावत नाही, भाजी तिखट असते म्हणून नानी मिक्सरमधून  पोळी काढून वरणासोबत देतात. घरकामास अनेक  वर्षांपासून मदतीला असते मालू ! 

आठ दिवसांपूर्वी मुलं सुना सर्वजण नानींकडे जमले, नानींना कोण आनंद झाला. लगेच त्यांनी श्रीखंडाच्या वड्या सर्वांच्या हातावर ठेवल्या. धाकट्या सुनेनं येण्याचं  प्रयोजन सांगितलं .. ‘ आम्हा सगळ्यांना नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करायचाय,’  क्षणभर शांतता.!.

.. हल्ली असले  सोहळे आणि तो दिखावू थाट नाही सहन होत म्हणून नानांनी विषय बंद केला ,नानी म्हणाल्या, ” छान घरी करू साजरा यांचा वाढदिवस, तुमच्या किलबिलाटानं घरं हसेल, आनंदून मोहरेल . यांना आवडेल असे गरमागरम दोन पदार्थ अन् मऊसा वरण- भात- तूप ठेवू, त्यांचे समवयस्क  स्नेही 

बोलवू !”  …..पण नवीन पिढीला नव्या पद्धतीने करायचं होतं सेलिब्रेशन.. परवा नाना-नानींना  सत्कार मूर्ती   बनवून बॅंक्वेट हॉलच्या सजवलेल्या सोफ्यावर बसवलं, नाना कडक सफारीत तर नानी  भारी भक्कम पैठणीत आणि दागिन्यांनी मढवलेल्या..चेहरा थकलेला न् शरीर दमलेलं ! येणारे पाहुणे कुणीच ओळखीचे नसल्यानं आलेली, भेदरलेली भावना ! 

मुलांचे बॉस.. सहकारी.. मित्र मंडळ.. नातवंडांचे कॉलेज कंपू.. सुनांचे किटी ग्रुप्स.. सोशल नेटवर्किंग, यात 250 माणसं झाली  मग झालं काय…नाना अन् नानींचे 8-10 जण ‘ उगीचच वाढतात ‘ म्हणून बोलवले गेलेच  नाहीत..! त्यामुळे सोहळा नक्की कुणाचा याचा नाही म्हटलं तरी नानींना राग आलेला ! बरं दणक्यात सोहळा करायचा तर पदार्थही वेगवेगळे हवेत ! कुणाला चायनीज आवडतं तर कुणाला पंजाबी ..साउथ इंडियन डिशसुद्धा आपली स्टाईल दाखवत होत्या..महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच होतात म्हणून त्यांना सुट्टी दिलेली ! आईस्क्रीम अन्  विविध पदार्थांची  रेलचेल ..पण नाना नानींना गोडबंदी होती, मग खायचं काय..?दात नसलेल्या सत्कारमूर्तींसाठी खाण्याचा पार आनंदच होता ! बरं खाण्याच्या टेबलपर्यंत जायचं कसं? मॅनर्स पाळायला हवेत म्हणून आजी आजोबा गेल्या तीन तासापासून नुसतेच सूप पिवून गप होते ! 

एकदाचा सत्कार सोहळा दिमाखात  संपन्न झाला अन आता रात्रीचे 10:30  झालेत. ‘ जेवण  जात  नाही रे बाबाsss ‘ म्हणत दोघांनी जरासं पुन्हा सूपच घेतलं !  मुलांनी रात्री 11वाजता नानांना  घरीच रिलॅक्स वाटतं म्हणून बैठ्या घरी आणून सोडलं…!

 ….. …. 

सकाळी मालू आली.. जणू सगळं जाणणारी… 

नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा याचा नीट उच्चारही करता न येणा-या, न समजणा-या तिनं  मात्र आज त्यांच्या आवडीचा  गरमागरम वरण भात घरून करून  आणला अन् वरून तुपाची धार ओतत ती म्हणाली, 

” माह्या मायबापाले मी तं पायलं नाय जी, पर तुमी मायेनं मले वागोता यातच मले माहे बावाजी भेटले.. माह्याकडून काय द्यावा इचार केल्लो अन् आठोलं तुमाले गरम वरन भात लै आवडते..नानी नं दिवाडीले देल्लेल्या जास्तीच्या  पैशातनं तूप आनलं.. नाई मनू नका जी..! “ 

… काय बोलणार  होते दोघं …. डबडबलेल्या डोळ्यांनी नानींनी नानांना वरण भाताचा घास भरवला.. 

मालू आज दोघांसाठी ख-या अर्थी अन्नपूर्णा होती. ! 

लेखिका : ज्योती चौधरी

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

आई आणि शिकेकाई — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.” 

मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.

गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला. 

वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली  “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.

मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली. 

आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नकार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “नकार…” ☆ सौ राधिका भांडारकर 

नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार  इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.

काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही.  विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.

नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.

सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार.  बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला  हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.

माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.

पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”

हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ  लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”

आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.

बँक गॅरंटी  हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे.  त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.

“ही व्यक्ती  कोण लागते तुमची?   तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”

माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली.  मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या  नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात  आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही. 

नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की.  वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.

“नाही कशी म्हणू तुला”  या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.

कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप  टळू शकतात.

दान देणं, देणाऱ्याचे हातच  घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास  सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.

मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते  याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.

मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला  दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”

ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते.  तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि  तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”

थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा  निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.

माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …

कैकयीने  मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता  तर…

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….

तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पर्शतृष्णा… – लेखिका – सुश्री वैशाली पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ स्पर्शतृष्णा… – लेखिका – सुश्री वैशाली पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.

आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.

सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.

पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.

स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटा वळणे शरीराने पार केलेली दिसतात.

लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.

वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले. काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा. पण एकंदरीने तेव्हा बाबा, वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.

मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा. बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.

लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं. जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ, प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या. हव्याहव्याशा झाल्या.

मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी ‘बाजुला व्हा रे, किती अंगचटीला येता? जरा मोकळी राहू द्या ना मला ! ” असंही मी ओरडले त्यांच्यावर.

गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर, मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता. तो घरी आला की मला भरतं यायचं. मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.

मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.

या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते, गळामिठी घालते. अशावेळी स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील, मोकळेपणे बोलतील, जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत. त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मीहून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत, मला त्यांचे लाड करू देतात पण…. जाणवतंच काहीतरी..आतल्या आत…!

माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली, ”किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं ! ”

तिच्या त्या  उद्गारात अर्थांचे डोंगर सामावले होते. मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्रदिशी अंजन गेलं.

मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ, वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे, मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.

आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते. तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.

आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.

एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.

मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.

सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया (ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.

माझ्या नेहमीच्या मैत्रिणी, मित्र यांनीही भरभरून दाद दिली. हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.

पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.

काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले, सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.

अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता. एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की, माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.

कोणाला दूर असलेला भाऊ आठवला, कोणाला लाड करणारा मामा आठवला. कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला. जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरुषांची संख्या जास्त होती.

हेही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण… अजून…

 आज सकाळी पावणेआठचा सुमार. बेल वाजली म्हणून दार उघडलं. तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमला घामेजलेला. श्वास फुललेला.

”तुम्ही वैशाली पंडित का?” तिने विचारलं.

”हो. आपण? या ना.. ” मी.

यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?

” प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ”

नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं. एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना, हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.

शेवटी आवाज चढवला.

” बाई गं, माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे. कोण तू? का रडतेस?”

आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाक डोळे पुसले.

” मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले, मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो, नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो. तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची. सतत पाणी वहायचं. हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो. एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली, या गं जवळ बसा. मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळे पण उघडेना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं. तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते. शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती. आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग केला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो. भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ”

अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई, माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.

मी सुन्न.

थोड्या वेळाने ती सावरली.

जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवा गाडीत बसवून दिलंय. निघते.

माझा हात हातात घेतला.— ‘ मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.’ 

ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला, काय बोलले नाही आठवत. इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही, एवढी जागेवर खिळले होते.

माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही. खरंच कुठे ठेवू  तरी मी हे संचित ?

लेखिका : सुश्री वैशाली पंडित

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेकच ती… – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ लेकच ती… – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

साडीचे टेक्श्चर थोडं कडकच होतं…निऱ्या नीट बसेनात, माझी आपली कसरत चालूच…खाली मान घालून मोडायची वेळ आली तरी साडी काही मनासारखी नेसली जाईना. कॉलमध्ये व्यग्र असलेली लेक…कानात हेडफोन्स् घालून धावत आली..हाताने खूण करत तिने पटकन निऱ्यांच्या चुण्या हातात घेतल्या आणि मांडी घालून मस्तपैकी खाली बसली. एक एक चुणी दोन बोटांच्या चिमटीत धरुन एकसारखी निरीवर निरी घालत तिने सगळ्या निऱ्या सेफ्टीपिनेत अडकवून दोन मिनिटांत नेटकी साडी नेसायला मला मदत केली.

हुश्श…मी एकदम रिलॅक्स झाले. क्षणभर या आवडलेल्या साडीऐवजी दुसरी साडी नेसून मोकळं व्हावं असंही वाटून गेलं. पण शेवटी लेकच ती…मनातलं सगळं जाणणारी… अगदी ऐनवेळी मदत करुन नामानिराळी होणारी…

तिचा कॉल म्यूट करत तिने, मी बांधलेल्या पोनीवर ही आक्षेप घेतला. “ इतकी छान साडी नेसलीस तर ते केस का आवळून बांधतेस…सोड जरा मोकळे….मी छानपैकी क्लचर लावून देते.” तिने डोक्याचा देखील ताबा घेतला. मी अगदी दहा वर्षाच्या पोरीसारखी तिच्यापुढं उभी राहिले, “ कर बाई तुला माझं काय करायचं आहे ते. ऑफिस चालू आहे हे मात्र विसरु नकोस,म्हणजे झालं !”

तिने मॅचिंग क्लचर मध्ये केस सैलसर अडकवून दिले…हलकीशी लिपस्टिक ओठावर ओढली…आणि माझी हनुवटी दोन बाजूस फिरवून…’ हं नाऊ ओके…जा आता…’ चा इशारा दिला.

तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून गेलं.आणि ती … “ मोठी गबाळी पर्स खांद्यावर टांगून जाऊ नकोस, एखादी वन साईड नाजुक पर्स घे, पैसे मोबाईल बसतील अशी.. तू म्हणजे ना कशावर काहीही करत असतेस.” 

कोण कुणाची आई आहे हेच क्षणभर मला विसरायला झालं. “ आई छान रहावं ग…तू अशी छान असलीस की मलाही छान वाटतं…”

“अग गधडे…हेच लहानपणी मला तुमच्याकडून अपेक्षित असायचं..पण आम्हाला धुडकावून तुम्ही कधी ऐकलंत का आमचं?”

मला एकदम लहानपणीची हीच ती लेक आठवून गेली. खेळ,शाळा, अभ्यासातून वेळ मिळत नसताना, तिला असं आवरून देताना, माझ्या आईपणाला असंच भरतं येत असे. ती वैतागायची…बाहेर मैत्रिणी उभ्या असायच्या…” तू बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस ना आई… “ तिचा सूर चिडका व्हायचा. “ नीट आवरून सावरून जावं ग बाहेर पडताना…” मी आपली सूचनावजा एखादं वाक्य टाकायची.पण त्या फटकुऱ्या जुनाट जीन्स् अन् वर ते टिचभर झबलं अडकवून, त्यांना धावायची कोण घाई असायची.

“ नको ग घालूस त्या रंग उडालेल्या जीन्स ,कसं दिसतं ते जुन्या बाजारातून आल्यासारखं….!”

“ आई हीच फॅशन आहे…आणि कंफर्टेबल पण असतात. तुमचा आणि आमचा फॅशन सेन्स फार वेगळा आहे… “ आपली बोलती बंदच !

सवयीने जुनीच, समोर असलेली चप्पल पायात अडकवली…तिचं लक्ष होतंच …. 

“ नवीन घेतलेल्या मोजड्या घाल पायात…ते जुनं पादत्राण फेकून दे आता…!”

जाता जाता…एक बाण आलाच.

मी बाहेर पडताना…हळूच तिच्या कानाशी कुजबुजले… “ समजलं…कसं वाटतं ते ! माझीही अशीच चिडचिड होते, तुझा जीन्समधला अवतार बघून….कर्मा रिटर्न्स  हं !” 

ती मनापासून हसली…” आई तू पण ना….. “

लेखिका : सुश्री सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सहज शांतपणे बसायचं …

हळूच डोळे मिटून घ्यायचे 

अंतरंगातले कल्लोळ शांत होईपर्यंत काहीही करायचं नाही.

 मनाला स्थिरता आली की 

मानसपुजा  सुरू करायची..

 

 प्रेमाने मायेने अंतकरणपूर्वक…

 हळूहळू आत आत  जायचं 

हे  आता जमायला लागले होते……….

 

प्रथम डोळे भरून त्याच्याकडे बघायच.नमस्कार करायचा..पुजा सुरू करायची..

 पंचामृत स्नान ,मग शुद्धोदक स्नान जरतारीची मखमली  देवाची वस्त्र ..

ती अर्पण करायची..

सोन्यामोत्याचे अलंकार घालायचे .

 

सुंदर हार फुलं देवाला वहायची..

आणि मग एकटक .. 

ते गोजिर रूप बघतच राहावं असं वाटायचं ..

जीव त्यात रमायचा..

 

 मोठ्या चांदीच्या ताटात पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवायचा

 आरतीच तबक निरंजनांनी सजवायचं….

 

 आरत्या म्हणायच्या सोबत टाळाचा गजर त्या नादात पाच-सहा आरत्या होऊन जायच्या..

 धूप लावायचा ..

कापूरच्या आरतीने ओवाळायच ओवाळताना कापूर आरती म्हणायची मंत्रपुष्पांजली झाली की

साष्टांग दंडवत घालायचा 

…..

 सगळं कसं यथासांग  करायचं

 नंतर त्याच्यासमोर बसून राहायचं…..

काही न बोलता शांतपणे…

कारण  

त्याला सगळंच माहित असत..

 

 असं वाटायचं पुजा  सफल झाली……

 पूर्वी तेवढ्याने जीव रमायला  लागला होता .

आताशा एक वेगळीच ओढ लागली होती…

 

मनात यायच  पंचामृताचा फुलांचा वास कधीतरी जाणवावा..

पक्वान्नांचा गंध नाकाला क्षणभर तरी यावा ..

निरंजनाची उष्ण ऊब आरती घेताना  हाताला स्पर्शून जावी..

 निदान कापराचा तो चिरपरिचित वास तरी यावा….

 

काहीतरी घडावं असं वाटायचं आजही क्षणभर तसंच वाटलं…..

 

 अर्थातच तिला माहीत होत आपला इतका अभ्यास नाही …भक्ती भाव नाही हे लगेच घडणार नाही..

 खूप मनोभावे अनेक वर्ष तप साधना करायला हवी तेव्हाच हे होईल 

 

आज तर मनाने बजावलच ही अपेक्षा करूच नकोस ..

अनुभव प्रचिती या फार लांबच्या गोष्टी आहेत …

तिथपर्यंत पोहोचायला अजून खूप वेळ आहे …

साक्षात्कार काय इतक्या सहजासहजी होत नसतो…

इथे सबुरी हवी .

 

आणि खरंतर असं कुठलं मागणं मागायलाच नको …

इथपर्यंत वाटचाल करायचं हे भाग्य मिळालं हेही खूप झालं .

 

हे सगळं कळत होतं पण मन मात्र आज खुळावलं होतं .

 

ती भानावर आली. पूजा पूर्ण झाली होती .कापूर अजून जळत होता. दिव्यांच्या वातीच्या उजेडातलं ते मोहक रूप  ती बघत  होती..

 

 किती वेळ गेला काही कळलच नाही आणि अचानक हवेच्या मंद झोक्याबरोबर खिडकी जवळच्या प्राजक्तांचा वास दरवळला..

 अंगावर एक अनामिक लहर आली मन भारल्यासारखं झालं ..

 

देवाने आज जणू कौलच दिला होता प्रसाद म्हणून हा सुवास आला होता का…जाणवला होता का..

काय सुचवायचे असेल बरं…

 

 केवळ मानस पूजेतच तो नाही तर चराचरात तो भरून राहिलेला आहे ही तर शिकवण देवाने दिली नसेल ..

एक हलकीशी गोड जाणीव मनाला स्पर्श करून गेली …

खरतर हा वास नेहमी यायचा..पण त्यातला हा गर्भित अर्थ आज ऊमगला..

 

तो असतोच आसपास कुठल्या ना कुठल्या रूपात.

 सगुणरूपाची पूजा करायची सवय असल्याने तेच रूप परिचित असते आणि तेच खरे वाटते.

 इतके संकुचित रूप असेल का बरं  त्याचे ?

 

त्यासाठी आता  शांतपणे  विचार करायला हवा  ….हळुहळु  मग तो चराचरात  दिसेल.

 अगदी आसपासच्या  माणसातही ….

हेच सुचवायचं असेल का ?

ती भानावर आली …

खरंच मनापासून प्रयत्न करायला हवे आहेत हे तिच्या लक्षात आले. वरवरच्या विचारातून बाहेर येऊन अंतरंगात खोल डोकावून पहायला हवे आहे..

 संकल्पना तपासून बघायला हव्या आहेत .

आज मनाला एक वेगळाच विचार स्पर्शून गेला होता .

त्यावर अभ्यास करायला हवा .

विचार नीट तपासून बघायला हवे

 तिला मनोमन संतोष वाटला. 

 

त्यानी  मार्ग दाखवला  आहे.. त्यावरून आता जायला हवे.

 जे हवेहवेसे वाटते आहे ते तिथे गवसेल.

 

डोळे उघडून ती लौकिकात परत आली. 

आज मन मात्र  काहीसे शांत स्थिर झाले आहे असे वाटत होते .

अननभूत असे काहीसे त्याला आज गवसले होते .

 

एक मात्र खरे होते..

आजची मानसपूजा खूप काही शिकवून गेली होती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..  

“ए,काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की,येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं. 

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की..”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”

“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”

“ए गपयं.सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”

“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं  माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट  असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत. 

नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ,वरवरचं आहे.काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला.आता मुलांचं भावविश्व बदललयं.बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही.याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत.आता बालपण लवकर संपतं कारण…” 

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

…बाळा, निवृत्त हॊ… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

(आई बाबांचे  पन्नाशीच्या मुलाला पत्र) 

प्रिय बाळा.. शुभाशीर्वाद. 

‘आईबाबा मी voluntary रिटायरमेंट घेऊ कां ?’ हा तुझा प्रश्न आणि आमच्याकडून  तुला हवं असलेलं उत्तर आणि अनुभवाचा सल्ला विचारण्याचा तुझा हेतू  लक्षात आला. तू भविष्याच्या विचाराने गोंधळून न जाता अवश्य रिटायरमेंट घे. आतापर्यंत धावपळीच्या सर्कशीत कितीतरी मोलाचे, सोन्यासारखे क्षण तुम्ही गमावलेत. तुला नोकरी लागल्यापासून सारखा पळतोयसच तु त्यापुढे तुला बायका,मुले,आई वडील यांच्यासाठी द्यायला जराही वेळ नाहीये.इतकं धाऊन-धाऊन काय मिळवता रे तुम्ही? पैसाच  नां?  अरे तो कितीही मिळवलास ना तरी अपुराच ठरतो. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघ. हा गरीब वर्ग एका खोलीतच आपला स्वर्ग सजवतो. तेच स्वयंपाक घर.तिथेच हॉल आणि तिथेच बेडरूम . तुझे मात्र हिल स्टेशनवर दोन बंगले, फार्म हाऊस राहता प्रशस्त प्लॅट आहे .एवढी जागा, बंगले, खरंच लागतात का रे ? आणि तिथल्या शांततेचा अनुभव घ्यायला वेळ तरी मिळालाय का तुम्हाला?या सगळ्या धावपळीच्या चक्रातून तू बाहेर पड.  आता पन्नाशी उलटलीय तुझी . कुठेतरी थांबायलाच हवं. मिळवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून रोग बळावले तर पुढील आयुष्यात कसा उपभोग घेणार तुम्ही या ऐश्वर्याचा? सेवानिवृत्त होऊन मोकळ्या हवेतला मोकळा श्वास घ्यायला तुझ्या फार्म हाऊस मध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुणासाठी  सांठवताय रे इतका पैसा ? मुलांना शिक्षण दिलेस. त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलास. पण सहज मिळालेलं आयत  सुख मुलांना आळशी बनवतं . त्यांना त्यांच्या हाताने काहीतरी करू दे ना  जरा ! स्वावलंबी होण्याची सवय लागू दे त्यांना .तुझ्या बरोबर सुनबाई घरच्या राम रगाड्यात भरडली गेली. तिलाही मोकळी हवा मिळू दे.तिच्याही कष्टी मनाला तुझ्या प्रेमाचा शिडकावा हवाच की रे!आपल्या खानदेशात तुझ्या जन्मगावी तिला घेऊन जा.तापी काठची भरताची वांगी,  मेहरूंणची बोरं, उडीद ज्वारी घालून केलेली कळण्याची पौष्टिक भाकरी, भाकरीवरचा झणझणीत ठेचा, तो खातांना ठेच्याच्या झणझणीतपणा बरोबरच आनंदाचे अश्रू पण येतिल तिच्या डोळ्यातून ., ते बघ.

आता बेकारी, महागाई आभाळाला पोचलीय. ज्यांना नोकरी नाही अशांसाठी तू काहीतरी कर.तू तुझी जागा खाली कर म्हणजे नवतरुणांना नवीन जागा मिळेल.सूर्य नाही होता  येणार तुला. पण त्यांच्यासाठी आशेचा प्रकाशदिप तर होउ शकतोस ना तू?

तेव्हा बाळा आता निवृत्ती घे. आमच्या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने शांत,निवांत, निरामय आयुष्याचा आस्वाद घे. लहानपणीच्या आठवणीत रंगून जा. वर्तमानाचा आनंद घेऊन भविष्यकाळाची स्वप्न उज्वल कर.                 

सौ सुनबाईंना आणि आमच्या गोड नातंवंडांना शुभाशीर्वाद

तुझे हित चिंतणारे …. तुझेच हितचिंतक

सौ आई-बाबा.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print