मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर 

अपघातामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.प्रचंड बोर झालेलो पण नाईलाज.मित्राचा फोन आला “काय रे,काय उद्योग करून घेतला.”

“विशेष नाही.छोटासा अक्सीडेंट झाला”

“काही सीरियस नाही ना”

“अं हं,मुका मार जास्त लागलाय.”

“नक्की काय झालं.” 

“पिवळ्या विमानानं धावती भेट घेतली.”

“कुठल्या विमानानं??”

“पिवळ्या.रोज सकाळी लेकीला शाळेत सोडायला जातोस तेव्हा पाहिलं असशीलच की….”

“कशाला डोक्याची मंडई करतोस.नीट सांग नाहीतर फोन ठेवतो”मित्र वैतागला.

“अरे स्कूल व्हॅनची धडक बसली”

“असं स्पष्ट बोल की,उगीच विमान वगैरे कशाला??”

“बस,व्हॅन,रिक्षा रस्त्यावर सकाळी विमानाच्या स्पीडनं तर पळतात.” 

“हो रे,कशाही गाड्या चालवतात.भीतीच वाटते.खरंच रस्त्यावरची विमानच.काहीतरी करायला पाहिजे.”

“एक कल्पना आहे.तुझी मदत पाहिजे”

“नक्की!!काय करायचे ते बोल.”

“व्हिडिओ शूट करायचयं.कुठं,कधी,कसं ते सांगतो.आपल्या भागातील प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलची अपॉईटमेंट मिळालीय.सोबत येतोस का”

“डन,काळजी हे”मित्राने फोन ठेवला.ठरल्याप्रमाणं प्रिन्सिपलांना भेटलो.उपक्रमाची माहिती दिली.त्यांनीसुद्धा लगेचच  सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि कार्यक्रम ठरला. 

रविवारी सकाळी शाळेच्या हॉलमध्ये प्रिन्सिपल,शिक्षक,पालक प्रतिनिधी आणि सुमारे पंचवीस स्कूल बस,व्हॅन,रिक्षाचे ड्रायव्हर जमले होते.नक्की कसला कार्यक्रम आहे याविषयी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.“पिवळं विमान” व्हाटसप ग्रुपमध्ये ऍड केल्याचं प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर आपसात चर्चा सुरू झाल्या.तितक्यात प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरवात केली.“आज सुट्टी असूनही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार.एका चांगल्या कारणासाठी ग्रुप तयार केलाय.कृपया कोणीही ग्रुपमधून बाहेर पडू नये.आज इथं का जमलोय,काय करायचं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.जास्त वेळ घेणार नाही.”प्रिन्सिपल मॅडमनी थोडक्यात प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडं दिली.वॉकरच्या आधारानं उभं राहत बोलायला सुरवात केली. “पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद!!नवीन ग्रुपवर शॉर्ट व्हिडिओज पाठवलेत ते आधी पहा.नंतर बोलू” व्हिडिओ बघितल्यावर चूळबुळ सुरू झाली. 

“हे काय आहे”वैतागलेल्या एकानं विचारलं.

“आपल्याच शाळेच्या गाड्यांचे गेल्या आठ दिवसातले व्हीडिओज.” माझ्या उत्तरावर एकदम गदारोळ सुरू झाला. काही ड्रायव्हर तावातावानं,ओरडून बोलायला लागले. 

“आम्ही आमचं काम प्रामाणिक पणे करतो आहोत.उगीच चुकीची माहिती पसरवू नका.”

“बदनामी करण्यासाठी बोलावलंयं का?तसं असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही.”

“सगळी पोरं सेफ आहेत.तरी सुद्धा असले विडिओ कशाला दाखवता”

“रस्ता म्हटल्यावर किरकोळ गोष्टी होणारच.आम्ही व्यवस्थितच गाड्या चालवतो.”

“पोटच्या पोरांइतकीच गाडीतल्या मुलांची काळजी घेतो.”

“उगीच शाळेच्या आणि पालकांच्या मनात काहीबाही भरून देऊ नका”

“तुम्ही कोण कुठले.शाळेशी काय संबंध” चिडलेले ड्रायव्हर संतापून बोलत होते.प्रिन्सिपल मॅडमनी विंनती केल्यावर सगळे शांत झाले.मी पुन्हा बोलायला सुरवात केली“सर्वप्रथम एक गोष्ट क्लियर करतो की इथं कोणाला दोष देण्यासाठी किवा जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये.”

“मग हे व्हिडिओ कशासाठी?.मुलांची काळजी घेतो.त्यांचे लाड करतो ते दिसलं नाही का?”एकाच्या बोलण्यावर बाकीच्यांनी ‘बरोबरयं’ म्हणत माना डोलावल्या. 

“तुमच्याविषयी तक्रार नाही परंतु हे व्हिडिओज सुद्धा वस्तुस्थिती आहे.”

“आधी तुम्ही कोण ते सांगा.”

“पंधरा दिवसांपूर्वी सकाळी स्कूल व्हॅननं मला उडवलं. नशीब बलवत्तर म्हणून पायावर निभावलं.”

“रस्त्यावर अपघात होणारच.नेहमी दोष ड्रायव्हरचा नसतो”

“शंभर टक्के मान्य.माझ्या केसमध्ये ड्रायव्हर खूप घाईत,मोबाइलवर बोलत गाडी चालवत होता.”

“मग त्याच्यावर कारवाई करायची.”

“पण त्यानं मूळ प्रश्न सुटणार नाहीये.”

“एकानं चूक केली म्हणून सगळे वाईट नसतात.”

“रोज रिस्क घेऊन ओव्हरटेक करता,गरज नसताना कट मारता,रॉंग साइडनं गाडी घुसवता,गाडी सोबत फोनही चालूच असतो.हे खूप धोक्याचं आहे.आतापर्यंत काही गंभीर घटना झाली नाही परंतु यापुढे कधीच होणार नाही ही खात्री नाही.त्यात गाडीत लहान मुलं असतात.बेफाम गाडी चालवून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवत आहोत.याचा जरा विचार करा.सर्वांना विनंती आहे की विनाकारण जीव धोक्यात घालू  नका.” 

“पुढे काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.” 

“करेक्ट पण काळजी घेणं तर आपल्या हातात आहे.वेळ गाठण्याससाठी म्हणून मन मानेल तशी गाडी चालवणं बरोबर नाही.स्वतःबरोबर  अनेक पालकांचा काळजाचा तुकडा तुमच्यासोबत असतो त्याचाही जीव पणाला लावता.” बोलण्याचा परिणाम तात्काळ दिसला.हॉलमध्ये चिडिचूप शांतता पसरली.

“माफ करा.साहेब.तुमचं बोलणं ऐकून डोळे उघडले.”एकजण हात जोडत म्हणाला. 

“तुम्ही माफी मागावी म्हणून नाही तर बेदरकारपणे सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्या पाहून पोटात गोळा येतो.तसंही आता घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊनच फिरावं लागतं.हे अनेकांचं मत आहे.मला ठेच लागल्यावर लक्षात आलं की नुसती चडफड करण्यापेक्षा तुमच्याशी एकदा संवाद साधावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती आणि मनपूर्वक धन्यवाद!!”

“साहेब,आजपासून आम्ही काळजी घेऊ.हा ग्रुप आता आम्ही चालवू.आमच्या गाड्यांना तुम्ही दिलेलं “पिवळं विमान” नाव भारीयं.आता गाडीचा स्पीड वाढला की हे नाव नक्की आठवेल आणि आपसूकच कंट्रोल होईल.”ड्रायव्हरच्या दिलखुलास बोलण्यावर ‘हो, हो’ म्हणत सगळे मोठ्यानं हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .

वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .

वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .

सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .

एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ‘ स्थलकाल ‘ या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .

प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .

मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .

खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .

पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .

संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत .

एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .

आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ‘ विकास ‘ करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

– समाप्त – 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

🌟 वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ 🌟 श्री सुनील काळे 🌟

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .

वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .

महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले  सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने  येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .

परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर  निसर्गरम्यस्थानी  घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले .

साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत  शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश  वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले

डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते  गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .

त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक  सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे .

परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा  आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .

सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले  तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .

वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले .

प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या  विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमणचारा… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ चिमणचारा☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मंदिराच्या कट्ट्यावर विद्वानांचा मेळावा भरला होता. प्रत्येक जण आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत होता.

“अहो आहात कुठे ? मी या मंदिराला 1000 देणगी दिली. शिवाय सहस्त्र भोजनही घातलं. सगळ्यांनी आडवं पडेपर्यंत भोजनावर आडवा हात मारला. नको नको म्हणेपर्यंत ब्राह्मणांना भरपूर भोजन दिलय मी. ” मला या ढोंगीपणाची, आत्मस्तुतीची  चीड आली. बढायावर बढाया मारणं चाललं होतं. इतक्यात माझं लक्ष झाडाखाली बसलेल्या साधू बाबांकडे गेलं. शांतपणे डोळे मिटून ते पक्षांचा किलबिलाट ऐकत होते.

तुंदील तनुवर हात फिरवत बसलेल्या पंडितजींकडे मी बघितलं. त्यांच्यासाठीच  मी शिधा आणला  होता. मनात आलं ह्या भरगच्च जेवणावर  ताव मारून ढेकर देणाऱ्या पंडितजींना हा शिधा देण्यात काय अर्थ आहे? अन्नावर अन्न आणि  आणि वस्त्रावर वस्त्र  असंच नाही का होणार ते ? त्यापेक्षा या गरीब साधूला हे सगळं द्यायला काय हरकत आहे? विचारासारखी मी ताडकन उठलो. साधूबाबाच्या जवळ जात म्हणालो,

” बाबा एक विनंती आहे, तुमची काही हरकत नसेल तर हा शिधा देऊ का मी तुम्हाला? घ्याल? नाही म्हणू नका. ”.. माझ्या प्रश्नावर धीरगंभीर आवाजात उत्तर आलं ” बंधू निर्मळ, निरपेक्ष मनाने तू  हे शिधादान करतो आहेस. देवाच्या दरबारातला प्रसाद समजून अवश्य घेईन मी तुझे दान “. कुठली  हाव नाही, कुठलीही  आसक्ती नाही. मिळेल ते दान पदरांत पडल्यावर समाधान मानण्याची  त्यांची  वृत्ती बघून मला बरं वाटलं. लगबगीने मी पिशव्या  त्यांच्या स्वाधीन केल्या. आणि माझ्या लक्षात आलं बाबांना एकच हात आहे. पिशवी जवळजवळ माझ्या हातातून ओढून घेऊन, तांदुळाच्या पिशवीत हात घालून मुठभर तांदूळ बु्वांनी कट्ट्यावर फेकले. माझा राग अनावर झाला. ‘ केवढा हा माजोरेपणा? ‘  ‘ ‘भिकाऱ्याला ओकाऱ्या ‘ म्हणतात ते असंच असावं. पायरीवर बसलेले पंडितजी माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसले. त्यांच्यासाठी आणलेला शिधा  मी साधूबाबांच्या झोळीत टाकला होता ना !

कुणीतरी म्हणाले सुद्धा, “ हे लेकाचे फार माजलेत. दान सत्पात्रीच द्यावं. अशा माजोरडयांना अशा भिकाऱ्यांना नाही. ”  

मी पण  तिरीमिरीत उठलो  साधूबाबांच्या अंगावर ओरडलो, “अहो काय केलंत हे ? मी तुम्हाला प्रेमाने धान्य दिलं आणि तुम्ही ते भिरकावून दिलंत ? अन्नपूर्णेचा अपमान आहे हा “. ‘ माजोऱ्या सारखा ‘ हा शब्द  मात्र मी गिळून  घेतला. शांतपणे  मान झुकवून ते म्हणाले, ” नाही बंधू.. धान्याचा असा अपमान मी कसा करेनं ? उलट तुमचं धान्य भुकेलेल्या मुक्या जीवांपर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून मी ते पारावर टाकलं. तुमचं दान सत्पात्री  पडलय. क्षुधा शांतीने तृप्त झालेली ती चिमणी पाखरं भरल्या पोटी आनंदाने घरट्याकडे वळलीत. तुमच्या धान्यातला कण न कण वेचला  आहे त्यांनी. तिकडे बघा  सहस्त्र भोजन  झालय. पण थाळीमध्ये लोकांनी टाकून दिल्यामुळे उकिरड्यावर  फेकलेलं अन्न वाया गेलंय. पोटभर भोजन करून चिमण्या उरलेले दाणे आपल्या चोचीत साठवून आपल्या बाळांना देण्यासाठी व घरट्यात जाण्यासाठी आसुसल्या आहेत. ”  

मी डोळे विस्फारून  पाराकडे बघतच राहिलो. चिवचिवणाऱ्या चिमण्यांचा थवा दाणा न दाणा टिपून घेत होता. साधूबाबा निर्मळ हसत म्हणाले, ” देख बंधू, ‘दाने दाने पर भगवान ने खानेवाले का नाम लिखा  है।”  आता मी हात जोडले आणि म्हणालो, ” बाबा खरंय तुमचं, बोलक्या जीवांना ओरडून अन्न मिळवता येतं. पण ही मुकी भुकेली पाखरं कशी मागणार धान्य आपल्याजवळ? “ साधू बाबा पुढे म्हणाले, ” चिमण्यांचा चिमणासाचं जीव आहे. पण त्यांनाही पोट आहेच ना?  बलवान पक्षी मारतात त्यांना. अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्याची शक्ती ह्यांच्यातही यायला हवी आहे.. हो ना ? त्यांचा दुबळेपणा जाऊन त्यांनी बलवान व्हावं म्हणून मी हा चिमणचारा त्यांना चारला. क्षमा कर मला. ” …. हे तत्वज्ञान ऐकून मी अवाक झालो. माझ्या मनात आलं सगळीच माणसं ढोंगी लबाड नसतात. देवमाणसं पण जगात आहेत. गाभाऱ्यातल्या अन्नपूर्णा देवीला मी हात जोडले. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य मला साधूबाबांच्या डोळ्यात दिसलं. साधू बाबा दुसऱ्या पाराकडे  वळले होते. आणि पुन्हा त्यांची पिशवीतल्या तांदुळानी मूठ भरली गेली होती. पाखरांची क्षुधा शांती करण्यासाठी… 

मी ओरडून म्हणालो, “बाबा आपके लिए भी कुछ रखो. “ हसून हात हलवत ते म्हणाले, ” फिकर  मत कर बेटा, तेरे जैसे भगवानने दिया हुआ प्रसाद हैं ये. मै भी उसमे भागीदार हो जाऊंगा…” 

काय किमया आहे बघा ! मलाच ते भगवान समजताहेत आणि मला त्यांच्यात  भगवान दिसतो आहे. मंदिरातली भगवती मात्र आम्हाला आशिर्वाद देत होती. आणि आपल्या सगळ्या लेकरांवरून वात्सल्यपूर्ण नजर फिरवत होती. खडतर आयुष्याचं गणित सोपं करून जगणाऱ्या ह्या निर्मळ मनाच्या साधूबाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मी हात जोडले. काही प्रसंग साधे असतात. पण त्यात मोठा आशय भरलेला असतो नाही का ? आयुष्याचं तत्वज्ञान सहज सोपं करून सांगणारी अशी ही देवमाणसं जगात आहेत. आणि म्हणूनच जग चाललंय… म्हणूनच… जग चाललंय..

(धन्यवाद. मंडळी …  माणसांच्या मनाचे अनेक कंगोरे असतात. कुणी स्वतःच्या पोळीवर तूप ओढून  घेणारे असतात तर. आपल्या घासातला घासही दुसऱ्यासाठी राखून ठेवणारे दिलदारही या जगात आहेत. साधुबुवा एक हाताने अर्थार्जन नाही करू शकत. पण मिळालेल्या धान्यातून ‘चिमणचारा’ ते बाजूला काढू शकतात. एक तीळ सात जणांनी वाटून खावा ही म्हण त्यांना लागू पडते. स्वार्थ आणि परमार्थही ते साधू शकतात. आणि ‘ विश्वची माझे घर ‘ या आनंदात ते जगू शकतात. साधीच माणसं पण विचार मोठे याची प्रचिती मला आली…. म्हणून हा लेखप्रपंच )    

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “मास्टरपीस” -लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मी काही कामानिमित्त बॅास्टनला गेले होते. काम झाल्यावर जवळच्या एका मॅालमधे जेवायला गेले. तिथे दहा पंधरा प्रकारची वेगवेगळी रेस्टॅारंटस् होती. सगळे प्रकार बघून मी शाकाहारी असल्याने भारतीय जेवणच घ्यायचं ठरवलं. भात व पालक-दाल घेऊन तिथल्या टेबलावर बसले. आजूबाजूला अनेक भाषा, अनेक रंग, अनेक पेहराव, अनेक मूड असलेले सर्व वयाचे लोक होते. 

माझ्या टेबलाच्या अगदी शेजारच्या टेबलवर एक आई व दोन मुली बसल्या होत्या. आईने डोक्याला हिजाब गुंडाळला होता पण बारा आणि दहा वर्षाच्या मुलींनी हिजाब न घालता काळ्या केसांची एक वेणी घातली होती. त्या वेणीला वर आणि खाली चकचकीत फुलाचे रबरबॅंडस लावले होते. आईच्या कपड्यांवरून व भाषेवरून ते कुटुंब इराकचे असावे असे वाटत होते. त्या दोन मुलींनी काय पुण्य केले म्हणून त्यांची इराक मधून सुटका झाली असे वाटले. तिथे या मुली अन्यायाखाली दबून गेल्या असत्या. बायकांना अत्यंत कनिष्ठ दर्जा देणाऱ्या इराकमधे १८ व्या वर्षी त्यांचे लग्न उरकून त्यांच्यावर अत्याचार पण झाले असते. पिंजऱ्यातून सुटलेल्या पक्षासारख्या त्या तिथे बागडत होत्या. त्या आईच्या चेहऱ्यावर मात्र अत्याचार सहन केलेल्या अनेक रेषा दिसत होत्या. Nike कंपनीनं हल्ली हिजाब बनवून विकायला सुरूवात केली आहे म्हणून त्या आईने Nike चा हिजाब घातला होता. “आम्ही तुझ्याबरोबर आहोत” हे Nike सारख्या मोठ्या कंपनीनं सांगितल्या सारखे होतं ते! मला Nike कंपनीचे हिजाब बनवण्यासाठी मनापासून कौतुक वाटले.  

त्या पुढच्या टेबलावर एक भारतीय कुटुंब बसले होते.  त्यांचा १२ वर्षाच्या मुलगा कसाबसा चालत होता. त्याच्या डोळ्याला अत्यंत जाड चष्मा होता. वडील जेवण घेऊन आले पण ते मुलाशी फारसे बोलत नव्हते. आई मात्र कौतुकाने तिच्या लेकराशी गप्पा मारत त्याला भरवत होती. त्या मातृत्वापुढे माझी मान आदराने झुकली. काय काय सहन केलं असेल त्या माऊलीने! आपल्या बाळानं जगातलं सर्व यश मिळवावं हे चिंतणाऱ्या आईला आपला मुलगा आपल्या हाताने जेऊ शकत नाही..चालू शकत नाही हे पाहतांना काय यातना झाल्या असतील? ते दु:ख गिळून कोणाचीही पर्वा न करता ती आई लेकराला भरवताना बघून देवानं आई का निर्माण केली हे परत एकदा कळलं. 

त्याच्या शेजारच्या टेबलावर एक अमेरिकन कुटूंब बसलं होतं. त्यांनाही १३-१४ वर्षांचा मुलगा व ८-१० वर्षांची मुलगी होती. दोघं उंच व बाळसेदार होते. भरपूर खरेदी केल्याने बरोबर अनेक बॅगा होत्या. अत्यंत सुबत्तेत वाढणाऱ्या या मुलांना कसं कळेल की जगात लहानशी गोष्ट मिळावी म्हणून काहींना भगीरथ प्रयत्न करावे लागतात ते! पण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांचं नशीब होतं. गदिमा नाही का म्हणाले..

घटाघटांचे रूप आगळे। प्रत्येकाचे दैव वेगळे..॥

मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ॥

चौथं टेबल होतं माझं ! भारतातल्या मिरजेसारख्या लहान गावातून अमेरिकेत आलेली मी भारतातच रहात असते तर कशी घडले असते? परक्या देशात येऊन इथले रितीरिवाज शिकून या देशांतल्या चांगल्या गोष्टी व भारतातल्या चांगल्या गोष्टी याची सांगड मला व माझ्या नवऱ्याला घालता आली का? मुलं आमच्या परीने आम्ही उत्तम वाढवली. त्यांचं कॅालेज, नोकरी, लग्न होऊन सेटल झालेलं बघताना खूप समाधान आहे पण काही करायचं राहिलं का हा प्रश्न मान वर करतोच! 

या विचारांच्या भोवऱ्यात मी खोलात जात असताना समोर एक गोष्ट घडली. इराकी मुलीचा बॅाल त्या भारतीय मुलाकडे गेला. त्याने तो पायाने ढकलला. पुढच्या वेळी तो बॅाल त्या अमेरिकन मुलाकडे गेला. त्याने तो झेलला व परत तिच्याकडे टाकला. धाकटीला तो झेलता आला नाही. त्याने तिला कसा झेलायचा दाखवले. “To me..” तो भारतीय मुलगा म्हणाला. त्याच्या पायातून तो बॅाल घरंगळत पलिकडे बसलेल्या कृष्णवर्णीय मुलीकडे गेला. तिने तो परत त्या मुलीकडे टाकला व त्यांचा खेळ सुरू झाला. ती मुलं एकमेकांकडे बॅाल टाकून खेळत असताना हळूहळू तुझं नाव, गाव, इयत्ता काय वगैरे देवाण घेवाण झाली. एका लहानशा बॅालने जात, धर्म, भाषा, देशाच्या सीमा ओलांडून मैत्री घडवून आणली जे भल्या भल्या राजकारण्यांना हजार वेळा भेटून जमत नाही. 

तेवढ्यात तिथे एक विदूषक आलेला बघून ही मुलं घाईने त्याच्याभोवती गोळा  होऊ लागली. इराकी मुलीनं भारतीय मुलाचा हात धरला व त्याच्या आईला विचारलं,” Can I take him to see the show?” आईने कौतुकाने हो म्हटलं. मुलाच्या डोळ्यात उत्साह मावत नव्हता. त्याने तिचा हात धरला व तो तिरकी पावलं कष्टाने पण उत्साहाने टाकत त्या विदूषकाजवळ गेला. त्याचे बाबा घाईने त्याला आधार द्यायला उठले पण आई म्हणाली, “Let him go!” तिचा मुलाला सुटा करण्याचा प्रयत्न बघून मी मनात टाळ्या वाजवल्या. 

विदूषक त्यांना डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवत होता आणि ते वेगवेगळ्या संस्कृतीचं, रंगांचं, भाषांचं, देशांचे सुंदर चित्र निरोगी व अपंग या मर्यादा ओलांडून एक मास्टरपीस बनून माझ्यासमोर उभं होतं. माझ्या हातात जवळच्या Museum of Fine Arts ची तिकीटं होती पण तिथे काय दिसेल असं चित्र इथे बघताना अंगावर काटा आला.  

ते सुंदर चित्र माझ्या कॅमेऱ्यात पकडताना वाटलं..

पंछी, नदिया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हें रोके

बदलून 

पंछी, नदिया, बच्चे, और पवन के झोंके…

असं करावं. 

मुलांकडून मोठ्यांनी हे शिकायला हवं. सतत बॅार्डरवर युध्द करणाऱ्यांनी तर नक्कीच शिकलं पाहिजे ! मग ते भारत-पाकिस्तान असो, रशिया-युक्रेन असो नाहीतर इस्त्राईल-हमास असो..माणूसकी, दया आणि प्रेम यांनी बनवलेला बॅाल मोठे एकमेकांकडे का नाही टाकू शकत? त्यांना एकमेकांकडे बॅाम्बच का टाकावेसे वाटतात? 

जग मुलांकडे बघून मैत्रीचा हात पुढे करायला कधी शिकेल का?

लेखिका : ©® ज्योती रानडे

(खरी घडलेली घटना आहे. काल्पनिक नाही.) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा… लेखिका : सुश्री फुलवा खामकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

बाबा…

आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली. मी पाचवी मधे होते.सकाळपासून खूप धडधडत होतं.आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं.बाबा गेले.मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या ! 

दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो?एक अत्यंत प्रतिभावान,हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारू मुळे वयाच्या अवघ्या३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! 

मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहेत याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे ! 

ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला, पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना… .. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !! 

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं फुलवा. नेहमीप्रमाणे ते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं ..  भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही  म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलवाच ठेवणार, ती नाव काढेल ! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला, त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही ‘ सामान्य माणूस ‘ या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत, कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो ! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हतं ! असहाय्य होतो आम्ही… 

बाबा, इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता,  पण आता तो नाहीये ! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरंच खूप  वाटतंय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !

तुमची फुलवा… 

(प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर ही प्रतिभावंत लेखक अनिल बर्वे यांची मुलगी हे माहीत नव्हतं .पण फुलवाच्या या पत्रामुळे कळलं. .हे पत्र जरूर वाचा ! एका दारू व्यसनाच्यापायी केवढा मोठा लेखक आयुष्य संपवतो हे लक्षात येईल ! ) 

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी” च्या काही व्याख्या… — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

मराठी” च्या काही व्याख्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मराठी कशी आहे.. म्हणजे मराठी म्हणजे काय असे मला वाटते ..  ते या काही व्याख्यांमधून मांडण्याचा प्रयत्न…  मराठी भाषादिनानिमित्त…

 नामनात प्रत्येकाच्या

 राहणारी अशी 

 ठीपक्या ठीपक्यांची सुंदर रांगोळी…… ती मराठी.

 

न्जूळ नादाने 

रात्रंदिवस जी

ठीबकते मन पिंडीवर…… ती मराठी.

 

शाल चंद्राची पेटलेली असताना

रात्रीच्या त्या रम्य आकाशात

ठीणग्या चांदण्यांच्या सांडते…… ती मराठी

 

हाल शब्दांचा सजवून

राग विविध छेडून

ठीकठिकाणी रसाळता शिंपडणारी …… ती मराठी

 

धुर मिलनाची ओढ मनात ठेउन

राजीव अंतरंगी फुलवत 

ठीय्या मनाचा घेऊन क्षणात अंगी भिनते …… ती मराठी

 

हान लेणीमध्ये 

राष्ट्रीयतेचा झेंडा हाती फडकवत

ठीक-या न उडालेला शीलालेख ……. ती मराठी

 

नगाभा-यात जळणारी कापराची लडी जी

रानावनातून भरून वाहणारी दुथडी जी

ठीगळे जोडून ऊब देणारी गोधडी जी ……ती माय मराठी

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’ 

मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे  खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?”  तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती.  तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव  मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला.  चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे.  कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’ 

कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा  खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.

खरंच हा खेळ वेळेवर आवरायला हवा …. बघा पटतेय का ? 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

अजूनही वृद्धाश्रम म्हटलं की गरीब  बिचारी म्हातारी माणसं…

असंच मनात येतं.

आता केअर सेंटर असे नाव दिले जात  आहे.

आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळलं जातं.

ते आनंदी कसे राहतील हे पण बघीतल जातं.

अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात.

काही तिथेच रहायला आले आहेत.

तिथे भरपूर झाडं होती ,कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता.

 एका ओळखीच्या  आजींचा वाढदिवस होता.  आजींना भेटाव व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले .

तिथल्या खोल्या बघितल्या .काॅट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. काॅलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.

खोल्याखोल्यातुन मी चक्कर मारली.

स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या…

सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला आपली कहाणी सांगायला उत्सुक होते…

एक एकजण सांगत होते.

“अग माझ्या दोन्ही मुली आपापल्या संसारात त्यांच्यात माझी लुडबुड नको ग …..  शिवाय संकोचही वाटतो बघ आणि  हे गेले आता एकटी कशी राहु ?म्हणून मी ईथे आले.”

“मुंबईत घर घेणं कुठे परवडतं…नातवाच लग्न झाल  म्हणून मीच म्हटलं मला इथे ठेवा….”

” मला तर मूलबाळच नाही… भाचे पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी ..साठीला आले….”

” माझी नात सून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात….माझं अजून एक ओझं  तिच्यावर कुठे घालू ग….”

“माझा मुलगा सून  परदेशी गेले आहेत…..लेकीच  बाळांतपण करायला..  म्हणून  काही महिन्यांसाठी मी इथे….”

एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते.

दुसरे आजोबा सांगायला लागले..

 ” माझी  एकुलती एक मुलगी मला छान संभाळते. पण तिला चार महिन्यांसाठीऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून तोपर्यंत मी इथे “

प्रत्येकाकडे एक एक कारण होते…..इथे येण्याचे… मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता.

इतक्यात एक मुलगा सांगत आला 

” चला … चला खाली  तयारी झाली आहे ….”

एक आजी थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या. 

“अग या कालच आल्या आहेत ” एकीनी सांगितलं 

दुसऱ्या  आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या ” हळूहळू होईल तुम्हाला सवय … चला आता खाली “

असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या.

खालच्या पार्किंगमध्ये सजावट केली होती .खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.

छान  जरीची साडी नेसुन आलेल्या आजींनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून  हॅपी बर्थडे चा गजर केला…

नव्वदीचे चे आजोबा ….  “जीवेत शरद शतम्……” असा आशीर्वाद देत होते.

डिशमध्ये सर्वांना केक वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले.

“झालं न खाणपीणं….आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीण  बाईंनी सांगितले.

एक आजोबा पेटी घेऊन आले. टाळ, चिपळ्या आल्या गाणी सुरू झाली…..एकच घमाल सुरू झाली.

पंच्याऐंशीच्या आजी

“सोळावं वरीस धोक्याचं गं…” ठेक्यात म्हणत होत्या.

” पाऊले चालती पंढरीची वाट ” सुरू झालं ..अभंग म्हणत म्हणत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.

मी प्रसन्न मुद्रेने हे सगळं बघत होते.

अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला…

 वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्यासाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते…..

खरं सांगू हे वाटतं तितकं सोपं नाही…..मोह ,माया इतकी लगेच सुटत नाही…. भरल्या घरातून इथे यायचं.. फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं….

आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे  इथे आले होते…..

तरीपण…. यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते.

फार अवघड आहे… हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले….

वाटलं… येत जावं इथं अधून मधून…आपलेही पाय जमिनीवर राहतील…

घरात राहून आपण  छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही….

इतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला…. गाऊन घातलेल्या आजी…

 ” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा……आई मला नेसव शालु नवा…” म्हणत होत्या..

माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं….

त्या नादमयी वातावरणाला एक कारूण्याची झालर आहे हे आतल्या आत कुठेतरी जाणवत होते…

तरीसुद्धा यांचा उत्साह बघुन म्हटलं..

“वाह क्या बात है…असेच मजेत आनंदात  रहा…. परत येईन भेटायला……..”

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ 3 G.? की दत्तगुरू !… लेखिका : सुश्री अनुजा बर्वे ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

“अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता, इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.

‘एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?’

‘ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे.’

‘पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं’ फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.

रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,

‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण “3G”मध्ये रमून जाते.’

‘आज्जी,”हे” म्हणायला यू आल्सो नीड “3G”?’

रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,

‘अरे,दत्तात्रय म्हणजे ‘ब्रम्हा -विष्णु -महेश” टुगेदर, म्हणजे “3G”च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची ‘नीड’ असलेल्या “3G” मध्ये एक मेजर फरक आहे.’

‘फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?’ रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.

‘सांगते! सगळे ज्याचे फॅन झालेत ‘ते “3G” मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं. पण मी नुसतं “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असं म्हटलं तरी इनफ आहे.’

 ‘का ?असं का ?आणि “दिगंबरा” म्हणजे ?’ रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.

‘अरे,”दिगंबरा”चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला.”दिगंबरा”

हे दत्ताचं अजून एक नाव आहे.’

या अशा संवादानंतर “3G” ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.

‘So श्रीदत्त  म्हणजे 3 in one देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ‘ गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.

‘दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच “श्रीदत्तात्रय”!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी “ब्रम्हा-विष्णु-महेश” या देवांची कठोर आराधना केली.’

‘कठोर आराधना म्हणजे?’ मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.

‘म्हणजे “hard worship” ! त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला “गोष्ट” हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.

‘म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं continuous hard try करायला लागतं….’त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरुवात केली.

‘अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला “त्रिदेव पुत्रप्राप्ती” झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तजयंतीच्या दिवशी ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा….” ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?’ 

मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली, ‘आरतीमध्ये “त्रैमूर्ति” का म्हटलंय ते आता मला करेक्ट समजलंय आजी. पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय, कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी ?’

खरंतर त्याच्या तोंडून ‘तसबीर’ हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं. माझे ‘मराठी प्रयत्न’ रूजतांना पाहून छान वाटतं होतं. पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,

‘पृथ्वी – म्हणजे “मदर अर्थ” कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं “प्रतिक” आहे.”प्रतिक” म्हणजे symbol. आता पहा, ते “3G” symbol दिसत असलं की सगळे कसे खूश असतात. त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं ! ४ कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे– “ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद” !’

‘वेद म्हणजे काय आजी ?’ रोहिननं अधीरपणे विचारलं.

खरं तर “वेद” म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.तरीही मी म्हटलं,

‘काही माहिती हवी असेल, काही क्वेरी असेल, काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण विकिपिडिया रिफर करतात,राइट ? ‘वेद’ म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं “ज्ञानाचं भांडार” आहे.’   त्याला  चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.

‘व्हेरी इंटरेस्टींग. आज्जी अजून सांग नं ‘आता रोहिनला राहवेना.

‘शंख-चक्र हे श्रीविष्णूचे तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे. मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?’

‘अगदी बरोबर आज्जी,” ब्लूटूथसाठी डमरू आणि जनरल सेटिंग्ज ला चक्र “अशा साइन्स असतात. आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे ?’

‘अरे त्याला कमंडलू म्हणतात. कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.’

व्हाॅटस्अॅपच्या सिम्बाॅलशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं. माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.

‘पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू “अवधूत चिंतन …..”असं का म्हणतेस ?अवधूत म्हणजे ?’

‘अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे. ह्या नावाचं मिनिंग आहे ” नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा “.

म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे, नेहमी आनंदात ठेवणारी. पहा, आजकाल “3G” चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?

काय?’

रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही ! खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली, एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.

सध्याच्या “4 G” च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या “3G” शी कनेक्ट करू शकले… आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?

लेखिका : सुश्री अनुजा बर्वे

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print