मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.

वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.

दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.

नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.

तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।

घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.

नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.

जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.

वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.

एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.

चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.

नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.

मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.

एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.

अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.

सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…

… अशी ही सांजवेळ.

लेखिका : शैलजा दांडेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ  

मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटेसे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता. बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच.

मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात पी. यू. सी. सायन्सला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५. २०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.

बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडून 

कॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी. एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील ‘अजिंठा’ आणि ‘मराठवाडा’ या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला. तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, “ बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. “.. तर तो म्हणाला, “पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है. ” 

मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच “वाचकाचे मनोगत” या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.

दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.

आश्चर्य म्हणजे ‘दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, ” विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली. ” मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.

पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र ‘अजिंठा’मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. ” गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत. ” 

मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात “रेल निलायम सिकंदराबाद”कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना….. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.

रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५. २० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र मला डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}

एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, “आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल. “

म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆ |

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर

एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यातला.

पण अखेर आपापल्या उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले ते मात्र एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत.

अर्थातच एक गेला, ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच… आणि त्या दुसर्‍याने माझ्याही पिढीची, तरुणाई धुंद करून सोडली. म्हणजे बघा ना… ‘पहेला नशा पहेला खुमार.. नया प्यार है नया इंतेजार’ लिहितेवेळी, हे जुनं खोड पंच्याहत्तरच्या आसपास होतं.

तर… एका प्रतिभावानाने लिहिलं होतं…

‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही

जवळी जरा ये हळू बोल काही

हात चांदण्यांचा घेई उशाला

अपराध माझा असा काय झाला’

आणि दुसर्‍याने लिहिलं होतं…

‘रातकली एक ख्वाब में आई

और गले का हार हुई

सुबह को जब हम नींद सें जागे

आँख तुम्ही सें चार हुई’

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. आणि असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या सिद्धहस्त लेखणीतून, स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे

धूळ उडाली, भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा

झुलवू नको हिंदोळा’

आणि…

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा 

न घबराइए

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की 

चले आइये’

आहाहा ! रोमान्सनी काठोकाठ भरलीयेत ही दोन्ही गाणी. पण तरीही अगदी कणभरानेही व्हल्गर नसल्यामुळेच, एका स्त्रीच्या तोंडीही खुलून येतांना दिसतात.

बरं नायिकाच नाही… तर ह्या दोघांच्याही शब्दांच्या पायघडीवरुन चालणारा नायकही, अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रेमभावनेनी. आणि तरीही… ती आत्यंतिक संयतपणे व्यक्त करणाराही आहे तो.

एकाचा नायक म्हणतो…

‘अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी

यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी

घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

नविन आज चंद्रमा’

दुसर्‍याचा नायक म्हणतो…

‘जब तलक ना ये तेरे रसके भरे होठों से मिलें

यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले

गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए

जलते हैं जिसके लिये’

तर… १ ऑक्टोबर, ह्या दोघांचा जन्मदिन. आणि दोघांचं जन्मवर्षही एकच… १९१९. काय म्हणावा हा दैवी योगायोग……

#ग_दि_माडगुळकर

#मजरुह_सुलतानपुरी

… आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, मनःपूर्वक अभिवादनाचं ओंजळभर अर्ध्य.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(पोस्टाची संगीतसेवा…)

९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे… 

३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!

भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते.

स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्‍यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.

यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!

अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..

पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.

‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!

पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…

उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.

आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!

मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.

आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्‍याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!

आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?

आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? मनमंजुषेतून ?

☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…

आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.

सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !

… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

अन्नपूर्णेची परिक्षा- 

माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा. “अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.

लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे… असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला….. मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. सौ. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.

एकदा शाळेत जाताना सौ. आईने मला त्या ब्राह्मणाला “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पुजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी मानगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय. ” गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी… तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली. ” ते काय पुटपुटले ते मला काहीच कळले नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरे.

इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरुजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.

आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या, ‘ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर….. ” 

गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो.. उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो. ” तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. “ साडेबाराला नक्की जेवायला या. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. ”

आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्हते. आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली, आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.

“बसा नं जेवायला. माझ्यामुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला. ” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे. आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, चवीष्ट होतं जेवण. खरं सांगू माई, आमची मंडळी गेल्यापासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.

आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरुजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे सौ. आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होता. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.

त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझी मोठी बहिण कु. लीला ने गाठले आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्यामुळे बघ आईला केवढा त्रास झाला, ‘ असं म्हणून भरपूर झापलं.

मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. माझ्या क्षमाशिल आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले….. “

तर, असा सकारात्मक विचारांचा धडा सौ. आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणूं.

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “को जागर्ति ?” कोजागरी☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

को जागर्ति ?” कोजागरी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागे आहे असे विचारते.

नुसते शरीराने जागे नव्हे, तर शरीराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा ह्याचा अर्थ.

 जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.

आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.

कोजागरी म्हटली की आमच्या लहान पणाचे दिवस आठवतात.. लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्री जागरण करून कोजागरी साजरी करायचो. आधी सगळ्या मैत्रिणी एकत्र येवून कोजागरीचा कार्यक्रम कसा करायचा हे ठरवायचो. मग वर्गळी गोळा करणे व मग सामानाची खरेदी अशी एक दोन दिवस आधी पासून तयारी असायची. कोणाची आई नाहीतर आजी प्रेमाने एखादा पदार्थ करून द्यायची.

सगळ्यात आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या घरासमोरचे अंगण साफ करायचो. ह्याच अंगणात रात्री आम्ही सगळे खूप मैदानी खेळ खेळायचो. खेळून दमल्यावर बैठे खेळ खेळायचो. मधेच मध्यरात्री मसाला दूध प्यायचो. मग नाचं, गाणी, भेंड्या, पत्ते, कानगोष्टी असे कार्यक्रम असायचे.. ह्यात कुणाच्या आई, काकू व आजीचाही सहभाग असायचा. थोडे दमल्यावर कोणी चुटकुले सांगायचे तर कोणी आपल्याला आलेले वेगळे अनुभव सांगायचे.

पहाटे पहाटे सगळ्यांनी मिळून केलेली भेळ, पोहे, बटाटावडा नाहीतर विकत आणलेला सामोसा असा काहीसा बेत असायचा. नंतर सगळ्यांनी अंगणात गोल करून ते सगळे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आनंदात भर म्हणून कधी कधी कोणाचे काका नाहीतर बाबा यांच्याकडून पेप्सीकोला नाहीतर आइस्क्रीम चा कप ही मिळायचा.

त्यानंतर सगळे आवरून पहाटे पहाटे भटकंती म्हणजे फिरायला जायचो. रस्त्यावर थोडी रहदारी वाढली की सगळे आपापल्या घरी छान आठवणी घेवून परतायचो.

लहानपणीच्या ह्या कोजागिरीच्या आठवणी अजूनही इतक्या ताज्या वाटतात की आत्ता एखादी मैत्रीण येईल व आपल्याला खेळायला येतेस का ग म्हणेल असा भास होतो.

आत्ताच्या आणि पूर्वीची कोजागरी साजरी करण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचा समाधान वाटायचे. सगळी मैत्रीची नाती निर्मळ व निरपेक्ष असायची अगदी घट्ट.

आजकालच्या आभासी आयुष्यात सगळ्याच गोष्टीमध्ये कृत्रिमपणा, दिखावा आला आहे …. मग तो नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीमध्ये … अथवा साजरे करण्यामध्ये.

लहानपणीच्या कोजागरीच्या आठवणींची मनात एक विशेष जागा आहे.. नेहमीच लक्षात राहील अशी एक गोड आठवण.

… मैत्रिणी एकमेकांना जणू विचारात आहेत ‘ को जागर्ति ‘ कोण जागर्ती…

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकुर बघुन माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही. मागच्या बाजुला होता तो फक्त पुढे आणलाय. “

“बडी बेंच??”माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं” तिनं उलगडा केला.

“अगबाई ! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.

… किती सुरेख कल्पना आहे ! केवढाली ओझी असतात या लहान जीवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे, एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “ का नाही येणार? एकजण तरी येतच कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच. ” या बाईला इतके साधे कसे कळत नाही असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळभाबड्या जगात सुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं.

“किती छान माहिती सांगितलीस ग ! तू कधी बसली आहेस बडी बेंच वर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खुप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या. ” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालु लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे, डॉक्टरकडे, वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

… कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी, समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहल्या होत्या..

…. चल.. बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न,

 उदात्त हेतू मनी ठेवुनी होऊ buddy, यार, सखा, मित्र ! … “ 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संपलं ग नवरात्र… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ संपलं ग नवरात्र… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

देवीच नवरात्र आलं आलं म्हणता म्हणता आता संपलं सुध्दा…. दिवस कसे भुर्रकन उडून गेले..

किती तयारी आणि गडबड चालली होती…. माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग….. ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा.. घट बसवायचे, कडकण्या करायच्या, रोज एक माळ अर्पण करायची..

श्री सूक्ताची एकवीस आर्वतन… सप्तशतीचा पाठ..

धागरा घालून केलेला गरबा…. भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर.. नंतर खिरापतीची मजा…

भजनाचे कार्यक्रम.. त्यात गोंधळ, जागरण हवाच…. कुंकूम् आर्चन, सवाष्णीच्या ओट्या नि कुमारीपुजन…

रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या.. दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं मग गप्पा……

टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा. डफ तुंतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची..

निरनिराळे उपवासाचे पदार्थ.. आरास, रांगोळ्या.. नऊ दिवस रोज देवीदर्शनाला जायची गडबड..

नवरात्रीची सांगता देवीला पुरणावरणाचा नैवेध दाखवून…..

कसं भारावल्यासारखंच वातावरण असतं नाही का ?

दसरा झाला आणि आज बघ….. सगळं कसं शांत शांत झालं

अगं लक्षात घे….

नवरात्री पुरतीच देवी आई आली होती का?….. ती जगतजननी आहे …. ती इथेच असते.. तिच्या देवळात…. आपली वाट बघत उभीच असते … आपण मात्र फक्त त्या त्या दिवसापुरतं जातो तिच्याकडे…

गर्दीत, गोंधळात हारा फुलांच्या राशीत एक मिनिट तिला बघतो…

आता एक कर.. शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल.. सजावट काढली असेल…

कुठलाही भपका नसेल…. बसावं तिच्या समोर..

… इतर वेळेस पण भेटावं ग देवी आईला…. नवरात्र नसताना सुद्धा … सहज आठवण आली म्हणून……

अचानक पण जावं ग…. किती बरं वाटेल तिला…. आणि आपल्यालाही…

— वाचता वाचता तिचे डोळे भरून आले……. मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती……

सवड काढून येत जा ग… बघावसं वाटतं तुला…

वाट बघणारी आई आहे तोपर्यंत भेटत जा ग तिला …. आईला तर कुठल्याच भारी साड्या, साज शृंगार, दागिने काही नको…… तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तुमच्या मिठीत सामावलं की ती तृप्त असते … स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ते मनातून फार सुखावतं… आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हव असतं…

तेवढचं तीच मागणं आहे ग….. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या….

… नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं.. !!!!

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

पुण्यात असतानाची गोष्ट आहे. एकटाच बॅचलर म्हणून राहत होतो. भाजीपाला विकायचे बंद झाले होते. एका चांगल्या कंपनीत मी वॉचमन म्हणून पर्मनंट झालो होतो. आणि त्याच कंपनीत राहत होतो. राहण्याची आणि खाण्याची माझी सोय फुकटात झालेली असल्यामुळे माझं चांगलं चाललेलं होतं.

मला आठवतंय त्या दिवशी तेरा मे तारीख होती. त्या दिवशी गावाकडून वडिलांचा मला फोन आला आणि वडील म्हणाले, “ हे बघ, येत्या सतरा तारखेला म्हणजे अजून चार दिवसांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे. तयार रहा. ” एवढं बोलून डायरेक्ट वडिलांनी फोन कट केला. पुढं बोलायची संधी जरी मिळाली असती तरी त्याचा काही उपयोग नव्हता. वडिलांचे ठरले की ठरले. त्यात बदल होत नसतो. हे मला माहीत होतं.

चार दिवसांनी आपलं लग्न. कुणासोबत, मुलगी कोण? कशी आहे? कुठं असते. ?असे असंख्य प्रश्न मनात. मी ड्युटी वर होतो. माझी चाललेली तडफड मी कुणालाही सांगू शकतं नव्हतो. कारण मी वॉचमन होतो. माझी केबिन गेटवर होती. त्या केबिन मध्ये मी एकटाच असायचो.

ड्युटी संपल्यावर रात्री आईला फोन केला. मग आईने सांगितले, “मुलगी पिंपरी मध्ये असते. आपल्या खूप जवळच्या नात्यातील आहेत. आम्ही सर्वांनी मुलगी बघितली आहे. तुझी आजी आणि तिचे आजोबा ही सख्खे बहिण भाऊ आहेत. मुलगी चांगली शिकलेली आहे. उद्या पिंपरीत जा. तिथं भाजी मंडई मध्ये त्यांचा भाजीपाल्याचा गाळा आहे. त्यांचं आडनाव रूपटक्के. सुखदेव रूपटक्के म्हणून विचारत जा सापडतील. ” मी होय म्हणून फोन बंद केला.

दुसऱ्या दिवशी शिफ्ट बदलून घेतली. आणि सकाळी दहा वाजता पिंपरी गाठली. पिंपरीची ती भली मोठी भाजी मंडई बघून जीवात कालवा कालव झाली. त्याच गर्दीत आता नाव विचारत विचारत चालू लागलो. भांबावून गेलो होतो. आयुष्याचा जोडीदार पहिल्यांदा बघणार होतो. उत्सुकता होतीच पण त्याहून जास्त भिती. विचारात दंग होऊन माझी नजर गर्दी चिरत होती. एवढ्यात चालता चालता एका पोरीला माझा धक्का लागला. तिच्या डोक्यावर कोथंबिरीचं पोतं होतं. तिच्या गालावर कोथंबिरीची पाने चिकटली होती. जसा माझा धक्का लागला तसं तिने रागाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणली, “ ये बाबा बघून चाल की जरा नीट.. ? डोळ्यात काय माती गेली का.. ? ” अजून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करून ती गर्दीत नाहीशी झाली.

भाजीवाले रूपटक्के हे नाव विचारत विचारत मी योग्य जागी पोहचलो. तिथं आजोबा आणि आजी दोघेजण मांडी घालून बसलेले होते. ज्या पोरीला धक्का लागला होता तीच पोरगी तिथं बाजूला खाली वाकून मक्याची कणसे रचत होती. मी आजोबांना आवाज दिला. “ ओ आजोबा, मी कवठेमहांकाळचा. चंदनशिवे यांचा मुलगा. हिराबाईचा नातू. तुमच्या बहिणीचा नातू. ” आजोबा ताडकन उभे राहिले. खाली बसलेल्या आजीने डोक्यावरचा पदर नीट केला. आणि माझ्या हातात हात देत बाजूच्या कणसे रचणाऱ्या त्या पोरीला आजोबा म्हणाले, “ दीपा अगं तुझा नवरा आलाय की, कंबरेत वाकलेली ती एका सेकंदात ताठ झाली. आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली. तिच्या अंगावर मळलेला पांढरा फुल्ल शर्ट. त्याच्या आत तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोक्याला रुमाल गुंडाळून उभी राहिलेली ती. माझी नजर काही नजरेला मिळाली नाही. ती काहीच बोलली नाही. पसंत नापसंत या असल्या भानगडींची ओळख दोघांनाही नव्हती. आमच्या दोघांची कुटुंबे त्यावेळी मध्यम वर्गातही मोडत नव्हती. हातावर पोट असणारी गरीब माणसं आम्ही.

सतरा मे या दिवशी आमचं लग्न थाटामाटात झालं. मी पिंपळे निलख मध्ये भाड्याने खोली घेतली. आमचा संसार सुरू झाला. नंतर एकमेकांना आम्ही ओळखू लागलो. मी कवी आहे हे तिला कळलं. माझ्या कविता तिला ऐकवू लागलो. हळूहळू माझी कविता पसरू लागली. नोकरीतून वेळ काढून संमेलनात जाऊ लागलो. पण बऱ्याचवेळा नोकरी महत्वाची मानून अनेक संमेलने रद्द करावी लागत होती. अगदी महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून मागणी यायला सुरवात झाली. पण नोकरी मुळे जाता येत नव्हते. कवितेचा कार्यक्रम नोकरीमुळे रद्द केला की डोळ्यातून पाणी सांडत राहायचं. आणि त्या पाण्यातून कविता ही ओघळून जायच्या.

नोकरीत मन रमत नव्हतं. सगळा जीव कवितेत अडकला होता. आतल्या आत घुसमट वाढत चालली होती. रोज कुणाचा तरी फोन यायचाच. कार्यक्रमाचे आमंत्रण असायचेच. पण नकार द्यावा लागायचा. एके दिवशी हिला मनातली घुसमट बोलून दाखवली. आणि एका क्षणात तिने मला उत्तर दिलं. “ द्या सोडून नोकरी.. मन रमत नाही तिथं थांबायचं कशाला.. माझं घर चालेल एवढं जर तुमच्या कवितेने मला दिलं तरी मी आनंदी राहीन.. ” मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. आणि त्याच दिवशी मी राजीनामा दिला. नोकरी सोडली. आता नाही तर कधीच नाही. असा विचार करून राजीनामा लिहिला. विनाकारण इथ राहून घरभाडे भरावे लागणार. कार्यक्रम करतच फिरायचे आहे तर पुण्यात राहण्यापेक्षा गावी जाऊ तिथच राहू. आई वडील ही सोबत असतील. हे ही तिनेच सुचवले. आणि ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी पुण्याचा निरोप घेतला. आणि गावी आलो.. पर्मनंट नोकरी सोडून गावी आल्यामुळे मला अनेकांची बोलणी ऐकावी लागली. कित्येक नातेवाईकांनी तर मला नावे ठेवताना कसलीही कसर केली नाही.

या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. माझी कविता दूरवर पोहचली. कार्यक्रम सुरू आहेत. तिने ही गावी येऊन शांत न राहता किराणा दुकान सुरू केले आहे. टेलरिंग व्यवसाय ही वाढला आहे. नाही म्हणले तरी आम्ही मध्यम वर्गाच्या यादीच्या शेवटच्या पानावर का होईना पण पोहचलो आहोत. आणि दोन मुले आमच्या पदरात आहेत. ती आई आणि मी वडील आहे.

हा सगळा प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहण्याचे कारण म्हणजे, आजच इंग्लड मधल्या केंब्रिज वरून मला फोन आला आहे. पंचवीस डिसेंबर या दिवशी केंब्रिज मध्ये मी माझी कविता घेऊन उभा राहणार आहे. आणि आयोजकांनी आम्हाला जोडीने बोलावले आहे. दोघांचाही तिकीट खर्च ते करणार आहेत. म्हणजे आम्ही दोघेही केंब्रिज मध्ये जाणार आहोत. ती पहिल्यांदाच विमानात बसणार आहे.

तिला जेव्हा हे सांगितले तेव्हापासून ती, गुगलवर केंब्रिज हे नाव सर्च करत आहे. आणि मी आमचा सगळा प्रवास आठवत तिच्याकडे एकटक पाहत आहे. तिने त्या क्षणाला माझ्या मनाची घुसमट ओळखून जर निर्णय घेतला नसता तर आज या क्षणाला मी केंब्रिजचे स्वप्न न पाहता त्याच केबिन मध्ये वॉचमन म्हणून बसलेलो असतो.

एखादा कलावंत असला तरी तो कलंदर असतो. त्याच्यातला माणूस विसरून त्याच्या आतला कलावंत सांभाळणारा जोडीदार जर त्याला भेटला तरच तो कलेला न्याय देऊ शकतो. मला हे मिळालं. म्हणूनच माझ्या घराच्या उंबरठयावर माझी कविता माझं स्वागत करण्यासाठी नेहमी उभी असते.

आयुष्यात आलेल्या या जोडीदाराची कविता, कथा, कादंबरी कधीच लिहिता येणार नाही. पण माझ्या कलाकृतीची प्रस्तावना मात्र तिच्याच काळजातून येत राहणार आहे.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print