मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभाळमाया… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आभाळमाया… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

सूर्य निरोपला तेव्हा,

चंद्र माथ्यावर आला.

त्याने फेकला फेकला

धरेवर चांदणशेला

 

कसा नाजुकसा शेला

धरा तृप्तली तृप्तली

तिच्या शेल्यात लपेटून

सारी सृष्टी सुस्तावली.

मायेच्या कुशीत, उबेत

बाळ निजते निजते

तिच्या काळीजकुपीतून

आभाळमाया ओसंडते.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #185 ☆ मैत्री आपुली… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 185 – विजय साहित्य ?

☆ मैत्री आपुली ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

मैत्री आपुली सांगून जाते

शब्दांच्याही पलीकडले.

नजरेमधुनी कळते भाषा

कसे जीवावर जीव जडले..!

मैत्री आपुली अनुभव लेणे

माणूस माणूस वाचत जाणे

स्नेहमिलनी स्वभावदोषी

दृढ मैत्रीचे चलनी नाणे.. . !

मैत्री आपुली नाही कौतुक

शिकवून जाते धडा नवा

कसे जगावे जीवनात या

लावून जाते नाद हवा.. !

मैत्री आपुलीआहे कविता

संवादातून कळलेली

अंतरातली ओढ मनीची

अंतराकडे वळलेली.. !

मैत्री आपुली हळवी जाणिव

परस्परांना झालेली

तू माझा नी मीच तुझा रे

मने मनाला कळलेली.. . !

मैत्री आपुली नाते आत्मिक

विश्वासाचे अजोड हात

सुखदुःखाच्या सर्व प्रसंगी

ओठी मित्रा तुझीच बात…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – फिटेल डाएटचे  ते जाळे… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ – फिटेल डाएटचे  ते जाळे… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

विडंबन (मूळ गाणे -फिटे अंधाराचे जाळे)

फिटे डाएटचे ते जाळे

 झाले मोकळे ते पाश

 खाऊगल्लीतून येई

दाबेलीचा सुवास सुवास

 

भजी तळून झाली सारी

 रगडा पॅटीस तयार झाला

पाणीपुरी येता प्लेटमध्ये

इच्छा जाग्या झाल्या सा-या

एक अनोखा बटाटा वडा

 असा चविष्ट झकास

 

चहा पिऊन नवेली

झाली शरीराची पाती

पुरी तळून नव्याने

 सजली कुर्म्याच्या ग प्लेटी

क्षणापूर्वीचे मंचुरियन

त्याची ग्रेव्ही होती खास

 

झाली आजची कचोरी

 प्यायले होते काल मँगो शेक

दहीवडयाला दहयाचा

  रूपेरी हा अभिषेक

 समोसे रोजचे तरीही

त्याची मोहक आरास

 

थालीपीठ ते खुसखुशीत

 मिसळ ती झणझणीत

ढोकळा तो जाळीदार

अळुवडी कुरकुरीत

जिलेबी – फाफड्याचा पहा

खंमग दरवळे सुवास

 

खाऊ गल्ली जवळ दिसता

डाएट  झाले क्षणातच गुप्त

हे सारे चाखायाची

इच्छा होती मनी सुप्त

मारता यावर आडवा हात

जिव्हा-मन झाले तृप्त

 

 

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

वृक्षवल्ली  आम्हा सोयरी वनचरे…

रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ‘ बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते…? ‘ श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ‘ हं, बोला राजे. ‘ राजेश म्हणाला, ‘ बाबा, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ‘ श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ‘ अगदी बरोबर. बेटा, तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे बरं .’ ‘ अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ‘ ‘ बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ‘ बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ‘ बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का हो ? ‘ हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ‘ बाबा, हा राजेश ना काय विचारेल काही सांगता येत नाही..’

‘ नाही नाही पिंके, अग आपल्या राजेशला पडलेला प्रश्न बरोबरच आहे. या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो. पण त्याआधी तू एक काम कर. तू आईला आपल्या सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पोहे करायला सांग. आणि पोहे झाले की तिला पण इकडे ये म्हणावं. ‘

‘ हो बाबा, आता सांगते आईला ‘ असं म्हणत पिंकी स्वयंपाकघराकडे पळाली. ती गेली तशी परतलीही.

राजेश म्हणाला, ‘ आता सांगा ना बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर. ‘

‘ हो सांगतो. त्याचं काय आहे राजेश, त्या वेळी आजच्यासारख्या शाळा वगैरे नव्हत्या. गुरुजी किंवा पंतोजी घरी येऊन शिकवायचे. काही ठिकाणी गुरुकुलासारखी पद्धतही होती. पण वृक्षांचे, पर्यावरणाचे महत्व वेगळे सांगावे लागत नव्हते. कारण त्याची जाण त्या काळातील लोकांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुळातच होती. ते स्वतःच पर्यावरणाला जपायचे, त्याची काळजी घ्यायचे. त्याचे संस्कार आपोआपच त्या काळातील लहान मुलांवर व्हायचे. वृक्षांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जायची. कामापुरतीच विशिष्ट झाडे तोडली जायची. जंगले शाबूत होती, घनदाट होती. त्यावर लोकांची उपजीविका चालायची. आणि तुकाराम महाराजांसारखे संत तर वनातच राहायचे. तिथेच त्यांची उपासना, ध्यान, जपतप इ. गोष्टी व्हायच्या. त्या वनातील वृक्ष, प्राणी हेच त्यांचे सखेसोबती असायचे. त्यांच्या संगतीत त्यांचा वनवासही सुखकर व्हायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साधूसंतांना मुळातच पर्यावरणाची जाण होती, त्याचे महत्व कळले होते. समर्थ रामदासांच्या दासबोधात सुद्धा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने वृक्षांचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘ बाबांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.

‘ बरोबर आहे बाबा तुमचं, ‘ पिंकी म्हणाली. आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं आहे. अं, काय बरं त्याचं नाव ? हं , आठवलं. ‘ दास डोंगरी राहतो ‘ असं काहीतरी नाव आहे. म्हणजे समर्थ डोंगरातच राहत होते ना.. ?

‘ हो  बरोबर आहे पिंकी,’ आई पोह्याच्या डिश ठेवत म्हणाली. ‘ अगं, गो नी दांडेकरांची आहे ती कादंबरी. आपल्याकडे आहे. मी देईन तुला काढून. ‘

‘ अहो, मी काय म्हणते ? उद्या रविवार आहे. आपण बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही. आपण मुलांना घेऊन कुठेतरी जाऊ या का ? ‘

पिंकी, राजेश दोघांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. ‘ बाबा, जाऊ या ना मस्त कुठेतरी. ‘ पिंकी म्हणाली.

‘ बरं बरं आता तुम्ही सगळे म्हणताय तर जाऊ या. आपल्या गावाजवळ एक अभयारण्य आहे. तिथे शंकराचं एक हेमाडपंती देऊळ पण आहे. तुम्हाला मस्तपैकी झाडं, प्राणी सुद्धा बघायला मिळतील. ‘ श्यामराव म्हणाले. चला, जा आता. तुमचा गृहपाठ पूर्ण करा. मग थोडावेळ बाहेर खेळायला जा. ‘ मुलं आनंदानं तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामराव, श्यामलाताई, राजेश, पिंकी आणि त्यांची पिंकी जंगल सफारीला निघाले. काही ठिकाणी रस्ता कच्चा होता. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता ऊन झाले होते आणि मुलांना भूक लागली होती. रस्त्यात एक विस्तीर्ण पसरलेले वडाचे झाड श्यामरावांना दिसले. त्यांनी तिथे गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरले. श्यामलाताईंनी गाडीतून जेवणाचे डबे काढले. श्यामरावांनी राजेश आणि पिंकीला गाडीतील सतरंजी काढून खाली टाकायला सांगितली. आता सगळेच छानपैकी बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. राजेश म्हणाले, ‘ बाबा, इथे किती छान, फ्रेश आणि थंड वाटते आहे ! हवा पण छान आहे. ‘

‘ राजेश, हे कोणते झाड आहे माहिती आहे का ? ‘ बाबांनी विचारले. ‘बाबा, मी सांगू ? ‘ पिंकीने विचारले.

‘ हो सांग की ‘

‘ हे वडाचे झाड आहे. बाबा, बघाना याला पारंब्या किती फुटल्या आहेत ! पिंकी म्हणाली.

‘ अगदी बरोबर आहे पिंकी. वडाच्या झाडाला खूप पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत जाऊन वाढतात. हे झाड खूप मोठे वाढते. काही काही वटवृक्ष तर एवढे मोठे असतात की त्यांच्या छायेत एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात. प्राचीन काळामध्ये व्यापारी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबत असत म्हणून या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन ट्री असेही म्हटले जाते. आणि ही झाडे दीर्घायुषी असतात बरं का राजेश. काही झाडे तर हजार वर्षांपर्यंत जगतात. ‘

‘ बापरे, आश्चर्यच आहे. माणसापेक्षा सुद्धा ही झाडे जास्त जगतात. ‘ राजेश उदगारला.

‘ हो राजेश, वड, पिंपळ यासारखी झाडे खूप वर्षे जगतात. हे अक्षय वृक्ष आहेत. यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. ‘

राजेशची आई शाळेत विज्ञान विषय शिकवायची. ती म्हणाली, ‘ राजेश, पिंकी , तुम्हाला माहिती आहे का की वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कडुलिंब यासारखी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. पिंपळ वातावरणातील १००% कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो तर वड आणि कडुलिंब अनुक्रमे ८० आणि ७५ टक्के कॉ डा ऑक्साईड शोषून घेतात. वातावरण शुद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या गाळण्याच आहेत. ‘

‘ अरे वा, झाडे किती उपयोगी पडतात मानवाच्या !’ राजेश म्हणाला.

‘ अगदी बरोबर आहे राजेश, ‘ बाबा म्हणाले. पण राजेश आणि पिंकी तुम्हाला सांगतो की ही सगळी आपली देशी झाडं बरं का ! पर्यावरण शुद्धीसाठी ही फार मदत करतात. पण गुलमोहर, निलगिरी यासारखी झाडे मात्र या दृष्टीने फारशी उपयोगाची नाहीत. या झाडांची सावली फारशी पडत नाहीत. या झाडांवर पशुपक्षीही घरटे करत नाहीत. पण जे पशुपक्षांना कळते, ते मानवाला मात्र कळत नाही. बाळांनो, तुम्ही थोडावेळ आईशी बोला. तोपर्यंत मी जवळपास आणखी काही बघण्यासारखे आहे का त्याचा तपास करतो. ‘ असं म्हणून श्यामराव तिथून निघाले.

श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर आणि आपली सगळीच झाडे अतिशय औषधी आहेत बरं का ! ते आपल्याला ऑक्सिजन तर देतातच पण आपले अनेक आजारही बरे करतात. कडुलिंबाच्या काडीने नियमितपणे दात घासल्यास दातांना कीड लागत नाही. पिंपळाची पाने तर किती सुंदर असतात. हृदयाच्या आकाराची ! जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ते छान गुलाबी, तांबूस असतात. मग हिरवी होतात. त्यांची सळसळ, वाऱ्यावर डोलणं किती मनमोहक असतं. पिंपळाची पाने, साल आणि मुळे औषधी असतात. पोटाच्या आजारांवर त्यांचा उपयोग होतो. पिंपळ पानांचा काढा आपले शरीर डिटॉक्स करतो म्हणजे त्यातील दोष किंवा टॉक्सिन्स काढून टाकतो. पिंपळाची फळे पक्षांचे आवडते खाद्य आहे. या वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. याचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा येतो. गौतम बुद्धानी याच वृक्षाखाली तप केले. त्यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. बिहारमधील बोधगया येथे हा वृक्ष आहे.

पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे अश्वत्थ मारुतीचे दर्शन पुण्यप्रद मानले जाते. श्रावण महिन्यात तर दर शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ वृक्षाचे महत्व सांगणारा एक छान श्लोक आहे. तू आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करा तो.

मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू , शाखा शंकरमेवच

पत्रे पत्रे सर्वदेवायाम, वृक्ष रादन्यो नमोस्तुते.

म्हणजे ज्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, सालीमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर आणि प्रत्येक पानात देवीदेवतांचा निवास असतो, अशा वृक्षराजाला ( पिंपळाला ) नमन असो. ‘

‘अरे वा, आई किती माहिती आहे ग तुला! आज तर आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या. ‘ पिंकी म्हणाली.

राजेश म्हणाला, ‘ आई या वडाच्या झाडाभोवती नुसत्या फेऱ्या मारल्या तरी किती छान वाटते. ‘ श्यामलाताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही याच झाडाची पूजा करतो. त्याला प्रदक्षिणा घालतो. ‘ पिंकी म्हणाली, ‘ आई, ते माहितीये, पण का पूजा करतात आणि प्रदक्षिणा का करतात ते सांग ना… ?’

श्यामलाताई म्हणाल्या, ‘ पिंकी तू सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकली असशीलच. तरी मी सांगते. सावित्री ही पतिव्रता होती. यमाने सत्यवानाचे प्राण हरण केले होते. पण सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमाकडून त्याचे प्राण परत मागून घेतले. वटवृक्षाखालीच सत्यवानाचे प्राण पुन्हा परत आले. तेव्हापासून सवाष्ण स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याला प्रदक्षिणाही करतात. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा केल्याने आपोआपच शुद्ध प्राणवायूचा आपल्या फुफ्फुसांना होऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय वडाची मुळे, साल, पाने औषधी असतात. सांधेदुखीवर त्यांचा चांगला उपयोग होतो.

तसेच केस वाढण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग करून तेल बनवतात.

कडुलिंबाचे झाड सुद्धा असेच औषधी असते. त्याची सावली तर खूप थंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या कोवळ्या पानांपासून चटणी बनवतो. ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी असते.

‘अबब ! किती उपयोगी असतात ही झाडे, नाही का ? पिंकी म्हणाली.

‘हो तर. म्हणून बाळांनो, आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून आणि ग्लोबल वार्मिंगपासून वाचायचे असेल, आपली वसुंधरा हिरवीगार ठेवायची असेल तर विदेशी झाडांचा मोह सोडून देऊन प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक  औदुंबर, वड, पिंपळ, कडुलिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत. तसेच प्रत्येक घरासमोर, परसबागेत किंवा आपल्या गच्चीवर तुळस अवश्य लावावी. तुळस अत्यंत औषधी तर आहेच पण पण ती भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनस्पती आहे. ‘

‘आई, आता कळले की तुकाराम महाराज, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ असं का म्हणत असावेत. ‘

एवढ्यात श्यामराव परत आले. ‘ अरे, मायलेकांच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का ? चला, आपल्याला अजून बरेच काही पाहायचे आहे. ‘

सगळे परत गाडीत बसले. गाडी जंगलाकडे मार्गस्थ झाली.

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचवा कोपरा… भाग – 1 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? जीवनरंग ?

☆ पाचवा कोपरा… भाग – 1 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“श्रद्धा देसाई इथेच राहतात ना? “

बाहेरून आवाज आला तसे , “मित्र परिवार ” चे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी दोन पुरूष आणि एक स्त्री उभे होते .

” आत या. इथेच राहतात मॅडम . काही काम होतं का?” देशपांडेंनी विचारलं .

 “भेटायचं होतं मॅडमना”, असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमधे बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला . श्रद्धाताई लिहीत बसल्या होत्या . बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला . पांढरी ओढणी नीट घेतली . कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले . वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला . मोबाईल घेतला .. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धा ताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उठून उभे राहिले. नमस्कार झाले . आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली , ” मी वैशाली . वैशाली राजे . “मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय . हार्दिक अभिनंदन ” .

“प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची . आता दुसरी काढतोय . ” मी रमाकांत जाधव  , मुख्य प्रकाशक . अभिनंदन मॅडम .” त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली.

जाधव साहेबांनी श्रध्दाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं . पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता .

त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले . म्हणाले , ” मॅडम आपलं  पुस्तक हिंदी , आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. . प्रत्येकी पाच लाखांचा तो अॅडव्हान्स आहे. आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत.

“दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतोय . त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत. ” एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं . ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या . सह्या झाल्या. आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला.

” श्रद्धाताई , “पाचवा कोपरा ” आणखी किती भाषांमधे येईल ठावूक नाही. मराठीच्या किती आवृत्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा . सही साठी . ” असं हसत म्हणून , पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. 

संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व “मित्र परिवाराने” श्रद्धा ताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी “आता पार्टी हवी” म्हणून आग्रह केला.

सारं काही स्वप्नवत् होतं . काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडीतशी बोलत बसल्या . त्या झोपायला गेल्या तरी , श्रद्धाला झोप नव्हती . दुःखात झोप येत नाही , तशीच अत्यानंदानेही माणसाला झोप येत नाही . ताईंचे हेच झाले होते. 

त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या . काही संदर्भ ग्रंथ , कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. . एक फोटो अल्बम होता . तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या. तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या.

वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं . नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं  मोठं केलं होतं . स्वतःचं घर केलं होतं . नोकरी , घर , सासर माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं . आई आणि बाबा होऊन.

यथावकाश शिक्षण , नोकरी करत बाळचं लग्न झालं . सुरवातीचे काही महिने बरे गेले. तेव्हा त्याही नोकरीत होत्या . श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. ” जागरण करू नका, आराम करा “अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच . तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला ,गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता.

स्वतः जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली . आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवीह होती. 

घरी मित्र आलेत , तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच , ” मला आजीची खोली हवी . स्वतंत्र .”  

बाबांनी “नाही” म्हणताच तो चिडला . म्हणाला “तीन बेडरुमचा फ्लॅट  का नाही घेतलात? “

” अरे बाळा , आमची ऐपत नव्हती , आणि आजीकडेपण पैसा नव्हता . विचार तुझ्या आजीला . ” असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता.

घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजी सोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. 

एक दिवस कहरच झाला . सुनेनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममधे झोपेल. आईंनी हॉलमधे सोफ्यावर झोपावं .

दोन चार दिवस खूप विचार केला . चौकशा झाल्या . मुलगा ,सून ऑफिसला जात होते .

मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार ” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला .

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.) इथून पुढे —

पेसी अंकल हे पाचगणी येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले ,त्यांचा प्रचंड मोठा आठ एकर परिसरातील मेडस्टोन हा वंशपरंपरागत पारंपारिक बंगला असला तरी स्वभावाने मात्र ते अतिशय कंजूष होते .

त्यांच्याकडे खूप आर्थिक संपन्नता असली तरीही कित्येक वर्ष जुनी असलेली फियाट गाडी ते वापरत असत. त्यांना आलेले एकही पत्र ते कधीही फेकून देत नसत.  उलट या पत्र आलेल्या पाकिटाचा भाग असेल तो पूर्णपणे उघडून त्याच्या पाठीमागे ते पत्र लिहित आणि त्याचा उपयोग करत. (आजही त्यातील काही पत्र माझ्याकडे आहेत. ) त्यांच्याकडे येणारे सर्व कामगार अतिशय कमी पगारामध्ये काम करत असत.  त्यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से हे कामगार मला सांगत असत .

पेसी अंकल यांना एकूण तीन मुले व एक मुलगी होती.त्यांची तिन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. त्यांचे दहा-बारा एकरामध्ये प्रचंड मोठी आलिशान राजवाड्यासारखी घरे होती. पेसी अंकल पावसाळ्यामध्ये कधीकधी तीन-चार महिन्यांसाठी इंग्लंडला जात असत. तेथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन युरो (2×80=160 रुपये ) लागतात म्हणून ते वर्तमानपत्र अजिबात वाचत नसत.  तिकडची एकही वस्तू घेत नसत. तिकडचे राहणीमान हे भारतापेक्षा खूप महाग आहे हे त्यांच्या मनाने खूप गांभीर्याने घेतलं होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मुलाबरोबर त्यांचे पटत नसे. शेवटी मी आपला पाचगणीतच बरा आहे आणि शेवटी मी पाचगणीतच मरेन असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सर्व मुलांना, नातवंडाना दिला होता आणि तो इशारा त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केला .

पेसी अंकलने मला पाचगणी आर्ट गॅलरी व पांचगणी क्लब याठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत केली ,त्याचप्रमाणे वेळोवेळी माझी चित्रकला विकत घेऊन माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांची काही चित्रकलेची पुस्तके मला दिली. इंग्लडचे विन्सर अँड  न्यूटनचे महागडे रंग चित्रांच्या बदल्यात मला दिले. एकदा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर, महात्मा गांधी यांनी लावलेल्या गुलमोहराच्या झाडाचे मी काढलेले चित्र घेण्यासाठी विरजींच्या बंगल्यावर आले, त्यावेळी पेसी अंकलचा आनंद गगनात मावत नव्हता.

मात्र एकदा माझे शिक्षण पूर्ण झाले, आणि  त्यावेळी मी पाचगणीला कायमचा राहण्यासाठी आलो होतो. असाच एके दिवशी मला पेसी अंकलचा निरोप आला. त्यांच्याकडे कोणीतरी जर्मनीमधून खास पर्यटक आलेले होते आणि त्यांना मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागचे कृष्णा व्हॅलीचे एक जलरंगातील चित्र हवे होते .मी माझे सर्व चित्रकलेचे साहित्य घेऊन बंगल्याच्या पाठीमागे छानपैकी चित्र रंगवत बसलो होतो. चित्र रंगवत असतानाच माझा छान मूड लागल्यामुळे मी आणखी काही चित्र रंगविण्यास सुरुवात केली. 

पेसी विरजींच्या मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागे एक खूप मोठी स्टोअर रूम होती . ती नेहमी उघडीच असे. दुपारच्यावेळी मला एक खुर्ची, व छोटे टेबल चित्र ठेवण्यासाठी पाहिजे होते म्हणून मी त्या स्टोअररूममध्ये गेलो .तेथे सहजपणे माझी नजर एक चित्रकलेची फाईल कोपऱ्यात होती तेथे गेली. मी ती फाईल सहज उघडली तर त्यामध्ये माझी शिकत असताना काढलेली निसर्ग चित्रे होती. ही सर्व चित्रे वेगवेगळ्या पर्यटकांना विकलेली आहेत असे मला पेसी अंकल यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ही चित्रे पेसी अंकल यांनीच विकत घेतलेली आहेत हे मला समजत होते. व वेळोवेळी त्यांनी त्याचे पैसेही दिले होते. म्हणून पुढच्या क्षणी रागानेच मी ती फाईल घेऊन पेसी अंकल यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 

अंकल त्यावेळी निवांतपणे पेपर वाचत होते .मी त्यांना विचारले की “ तुम्ही तर माझी चित्रे पर्यटकांना विकली आहेत असे सांगितले, पण चित्रे तर इथेच आहेत.  पण तुम्ही मला पैसे तर सगळे दिले. जर चित्रे विकली नव्हती तर तसं सांगायचे होते मला. असे का केले तुम्ही ? “

… त्यावेळी पेसी अंकल त्यांच्या खुर्चीतून उठले आणि मला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि म्हणाले … ” सॉरी दिकरा ,तू त्या वेळेस शिकायला आर्ट कॉलेजमंदी पुण्यात होता … आणि तुला पैशांची गरज होती, मी तुला मदत म्हणून पैसे दिले असते तर ते तू घेतले नसते याची मला पूर्ण खात्री होती. पण तुला मदत करणे फार गरजेचं होते. म्हणून मी ही सगळी चित्रे वेळोवेळी पर्यटकांनी विकत घेतलेली आहेत असे मुद्दाम खोटेच सांगितले. आय ॲम रियली सॉरी फॉर दॅट… पण चांगल्या कामासाठी खोटा बोलले तर चालते, हे मला माहित आहे.” 

पेसीअंकल यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले . कोण ? कुठला मी ? पण माझे शिक्षण पूर्ण व्हावे, मला पैशांची कमतरता जाणवू नये, म्हणून स्वतः पैसे पाठवून गेली चार वर्ष ते मला मदत करत होते. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ते आणि इतर नातलग म्हणवणाऱ्या मंडळीनी माझी कधीही साधी विचारपूसही केली नाही . नात्यातला हा विरोधाभास कायम लक्षात राहिला.

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की “ पूर्ण चित्रकलेवर तुमचं जीवन कसं जगलं जातं ? कसं भागलं जाते ?” … 

… आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते ही कला जिवंत ठेवण्यासाठी अशी पेसी अंकलसारखी माणसे आहेत, ज्यांना कला आणि कलाकार यांच्याविषयी आस्था, आपुलकी, प्रेम व मनापासून मदत करण्याची इच्छाशक्ती आहे, आणि म्हणूनच कलाकार व त्याची कला जिवंत राहू शकते.

१९९५ साली ‘ माझे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी उदघाटनासाठी सांस्कृतिक मंत्री येणार ‘  याचा माझ्यापेक्षा पेसी अंकल यांनाच  फार आनंद झाला होता. त्या प्रदर्शनासाठी अंकल आपली तब्येत बरोबर नसतानाही मोठ्या उत्साहाने जहांगीर आर्ट गॅलरीला आले होते. त्या प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक यश मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला दिसत होता. आपल्या गावाकडचा एक मुलगा जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो याचे त्यांना फार कौतुक वाटत होते आणि ते सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवत होते .पाचगणीत कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करावी अशी त्यांची फार इच्छा होती. आणि मी सुरुही केली, पण कायमस्वरूपी टिकवू शकलो नाही याची खंतही कायम माझ्या मनात राहिली.

पुढे म्हातारपण आल्यामुळे पेसी अंकल पूर्णपणे थकले होते. हळूहळू डायबेटिस व इतर रोगांनी त्यांना पूर्णपणे घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आणि संपत्ती त्यांच्या बहिणीची मुलगी गीता चोक्सी हिने ताब्यात घेतली आणि हळूहळू त्यांचे सर्व सामान , फर्निचर, सर्व वस्तू विकून टाकल्या व अंतिमतः ती जागा व बंगला शेजारच्या बाथा स्कूलला मोठया किमतीमध्ये विकून टाकली… आणि माझा, पेसी अंकल व मेडस्टोन बंगल्याबरोबरचा संबंध कायमचा संपवला…

मी मात्र पेसी अंकलची इच्छा माझ्या ‘निसर्ग ‘ स्टुडीओ व बंगल्याची निर्मिती करून माझी बकेट लिस्ट पूर्ण केली आहे… आजही कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणून जातात की हा तर पारशी माणसाचा बंगला वाटतो, त्यावेळी नकळतपणे माझे डोळे पाणवतात व वाटते पेसी अंकलला हे माझे घर नक्की आवडले असते व मोठयाने टाळ्या वाजवून ते परत परत म्हणाले असते …

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय .. अॅटलास्ट यु कंम्लीटेड  युअर बकेट लिस्ट . यु डीड इट…” 

आजही मी ज्यावेळी शांतपणे विचार करतो त्यावेळी मला जाणवते की अशी पेसी अंकलसारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर हा माझा चित्रकलेचा काटया -कुट्यातला, सदैव अडचणीतला प्रवास फार पूर्वीच संपुष्टात आला असता.

एखादे चांगलं चित्र झाले आणि मी शांतपणे ते चित्र पहात बसलो की आजही मला टाळ्यांचा आवाज येतो… आणि मोठ्या प्रेमाने कौतुकाचे शब्द ऐकू येतात 

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय ” 

आणि मी मनातच नतमस्तक होऊन माझ्या ” निसर्ग ” बंगल्याच्या गझीबोमध्ये बसलेला असताना पेसी अंकलच्या ” मेडस्टोन ” बंगल्याच्या परिसराच्या  आठवणीत मनसोक्तपणे रमून जातो …

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते सोळा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

 अ॒स्माकं॑ शि॒प्रिणी॑नां॒ सोम॑पाः सोम॒पाव्ना॑म् । सखे॑ वज्रि॒न्सखी॑नाम् ॥ ११ ॥

 अमुचा अमुच्या सहचारीणींचा तू हितकर्ता

आम्हा पाठी सदैव असशी होऊनिया तू भर्ता

तुला आवडे सोमरसाचे करण्याला प्राशन

वज्रधारी देवेंद्रा तुजला  सोमाचे अर्पण ||११||

तथा॒ तद॑स्तु सोमपाः॒ सखे॑ वज्रि॒न्तथा॑ कृणु । यथा॑ त उ॒श्मसी॒ष्टये॑ ॥ १२ ॥

 वज्रधारी हे देवेंद्रा रे तू अमुचा मित्र

तुझ्या कृपेचे सदा असू दे अमुच्यावर छत्र

प्रसन्न होउनि देई आम्हा शाश्वत वरदान

अभिलाषा ना असावी दुजी इंद्रकृपेवीण ||१२||

रे॒वती॑र्नः सध॒माद॒ इंद्रे॑ सन्तु तु॒विवा॑जाः । क्षु॒मन्तः॒ याभि॒र्मदे॑म ॥ १३ ॥

 अमुच्या सहवासे इंद्राला परम मोद व्हावा

दिव्य वैभवाचा आम्हाला लाभ सदैव व्हावा

जलधिसारखी अमुची असुदे समृद्धी परिपूर्ण

या सामर्थ्ये आम्हा व्हावा अतुल्य परमानंद ||१३||

 आ घ॒ त्वावा॒न्त्मना॒प्तः स्तो॒तृभ्यो॑ धृष्णविया॒नः । ऋ॒णोरक्षं॒ न च॒क्र्योः ॥ १४ ॥

 चंडप्रतापी हे देवेंद्रा तुला सर्व मान

अनुपम तू रे अन्य तुला ना काही उपमान

आळविली प्रार्थना ऐकुनि सिंहासन सोडिशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१४||

 आ यद्दुवः॑ शतक्रत॒वा कामं॑ जरितॄ॒णाम् । ऋ॒णोरक्षं॒ न शची॑भिः ॥ १५ ॥

आभा पसरे  तव प्रज्ञेची  तेजोमय दिव्य

दास तुझे ही तुझ्या कृपेने  तृप्त सुखी  सदैव

हवी मिळाया सेवकासी तव जागृत तू राहशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१५||

शश्व॒दिंद्रः॒ पोप्रु॑थद्‍भिर्जिगाय॒ नान॑दद्‍भिः॒ शाश्व॑सद्‍भि॒र्धना॑नि ।

स नो॑ हिरण्यर॒थं दं॒सना॑वा॒न्स नः॑ सनि॒ता स॒नये॒ सः नो॑ऽदात् ॥ १६ ॥

 उन्मादाने नाद करिती ते सवे अश्व घेउनी

पराक्रमाने अपुल्या आणिशी संपत्ती जिंकुनी

शौर्य तयाचे अद्भुत जितके उदार तो तितुका

दाना दिधले सुवर्णशकटा वैभवास अमुच्या ||१६||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/o9wi_A2EK1g

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाणं आणि कविता… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ गाणं आणि कविता… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मित्राने आज विचारलं..

असा काय फरक आहे रे गाणं आणि कवितेमधला ??

 

मी म्हणालो…

मित्रा..

शब्दांचे अर्थ कळले.. तर गाणं

आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले.. तर कविता

 

‘कर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर गाणं

आणि ‘मर्म’ म्हणून यमक जुळवलंस.. तर कविता 

 

‘पान’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर गाणं 

आणि ‘मन’ भरण्यासाठी लिहिलंस.. तर कविता

 

पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलंस.. तर गाणं

आणि लिहिल्यावर पुरस्कार मिळाला असं वाटलं.. तर कविता

 

काहीतरी ‘सुचलं’ म्हणून लिहिलंस.. तर गाणं

आणि काहीतरी ‘साचलं’ म्हणून लिहिलंस.. तर कविता

 

थोडक्यात ‘जगण्यासाठी’ लिहिलंस.. तर गाणं 

आणि ‘मरण्यासाठी’ लिहिलंस.. तर कविता 

 

आता.. 

तळहातावर घे सप्तरंग.. मग डोळे मिट आणि उधळून टाक दाही दिशांना.. मग डोळे उघड..

 

तळहाताच्या रेषांवर ‘उरलेल्या’ रंगांची नक्षी.. म्हणजे गाणं

आणि.. दिशांवर उधळलेल्या रंगांची ‘बदलत जाणारी’ नक्षी.. म्हणजे कविता

 

पण.. याही पलीकडे.. एखाद्या क्षितिजाच्या पार..

‘सहज’ म्हणून एखादं ‘गाणं’ लिहिता लिहिताच ‘अचानक’ डोळ्यात पाणी आलं.. तर समज.. झालं आहे एका अस्सल ‘कवितेचं’ गाणं…

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पाऊस केव्हाचा पडतो…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ पाऊस केव्हाचा पडतो… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

पाऊस केव्हाचा पडतो… काळ्या ढगातून जलाचे घड्यावर घडे आज तो रिते करतो… वाऱ्यालाही त्यानं तंबी दिलीय खबरदार आज माझ्या वाट्याला आलास तर कोसळणाऱ्या सरींवर सरीच्या भिंतीना हादरवून गेलास तर…वारा मग पावसाच्या वाऱ्यालाही उभा राहण्यास धजला नाही.. दुतर्फा झाडांची दाट राईचीं अंगे अंगे भिजली जलधारानी.. ओंथबलेले पानं न पान नि सरी वर सरीच्या माऱ्याने झाडांची झुकली मान…इवलीशी तृणपाती, नाजुक कोमल लतावेली चिंब चिंब भिजून जाण्यानं काया त्यांची शहारली… हिंव भरल्या सारखे थरथर कापे पान न पान.. खळखळ पाण्याचा लोट धावे वाट फुटे तसे मनास भावे… जीर्ण शिर्ण पिवळी पानं, काटक्या,काड्या, कागदाचा कपटा, सारं सारं  मिळालेल्या प्रवाहात जाई पुढे पुढे ते वाहात.. सरली तुमची सद्दी उचला तुमची जुनीपुराणी रद्दी. आता नव्हाळीची असे गादी…स्वच्छ झाले शहर नगर, स्वच्छ झाले भवताल… चकचकीत झाले रस्ते… दर्पणाला देखिल त्यात स्वताला निरखून पाहावेसे वाटले…घन अंधार दाटला भवताल त्यात बुडाला.. रस्तावरचे पथदिवे आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने रस्ता रस्ता उजळून टाकला… निराशेच्या वाटेवर असतो आशेचाही एक किरण आणि तो शोधून सापडण्यास करावी खारीची मदत असा होता  त्यांचा एक मनसुबा…दारं खिडक्या कडेकोट झाली बंद माणसा माणसांनी कोंडूनी जोडूनी घेतला घरोबा…  स्थानबद्ध झाले सगळेच जीवबध्द…चिटपाखरू  न धजे विहराया  बसे घरटयात आपुल्या पिलांच्या कोंडाळ्यात… दाणा गोटा कुठे मिळावा  त्यांना अश्या प्रलयंकारी पावसात…हतबल झाले सारे एका निर्सागा समोरी… पुरे पुरे बा पावसा कोसळणे तुझे हे.. शरणागत आलो तव पायी कळून आली आमची माजोरी…खाऊ देशील का कोरडी सुखी भाकरी… नको नको असा उतु मातू नको दावू ओला दुष्काळ तो… प्रसन्न तू सदा असावे म्हणून आरती तुझी आम्ही नित्य गातो…

गडगडाटी हास्य पावसानं केलं कडकडाटासह कोरडा चपलाने तो ओढला… नि पाऊस हळूहळू कमी होत गेला… पाऊस  शांत शांत झाला..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 124 ☆ लघुकथा – दुख में सुख ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘दुख में सुख’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 124 ☆

☆ लघुकथा – दुख में सुख ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

गर्मी की छुट्टियों में मायके गयी तो देखा कि माँ थोड़ी ही देर पहले कही बात भूल रही है। अलमारी की चाभी और रुपए पैसे रखकर भूलना तो आम बात हो गयी। कई बार वह खुद ही झुंझलाकर कह उठती— ‘पता नहीं क्या हो गया है ? कुछ याद ही नहीं रहता- कहाँ- क्या रख दिया ?’ झुकी पीठ के साथ वह दिन भर काम में लगी रहती। सुबह की एक चाय ही बस आराम से पीना चाहती। उसके बाद घर के कामों का जो सिलसिला शुरू होता वह रात ग्यारह बजे तक चलता रहता। रात में सोती तो बिस्तर पर लेटते ही झुकी पीठ में टीस उठती।

माँ की पीठ अब पहले से भी अधिक झुक गयी थी पर बेटियों के मायके आने पर वह सब कुछ भूलकर और तेजी से काम में जुट जाती। उसे चिंता रहती कि मायके से अच्छी यादें लेकर ही जाएं बेटियां। माहौल खुशनुमा बनाने के लिए वह हँसती-गुनगुनाती, नाती-नातिन के साथ खेलती, खिलखिलाती…?

गर्मी की रात, थकी-हारी माँ नाती – पोतों से घिरी छत पर लेटी है। इलाहाबाद की गर्मी, हवा का नाम नहीं। वह बच्चों से जोर-जोर से बुलवा रही है- ‘चिडिया, कौआ, तोता सब उड़ो, उड़ो, उड़ो, हवा चलो, चलो, चलो,’ बच्चे चिल्ला- चिल्लाकर बोलने लगे, उनके लिए यह अच्छा खेल था।

माँ उनींदे स्वर में बोली – ‘बेटी, जब से थोड़ा भूलने लगी हूँ, मन बड़ा शांत है। किसी की तीखी बात थोड़ी देर असर करती है फिर किसने क्या ताना मारा……. कुछ याद नहीं। हम औरतों के लिए बहुत जरूरी है यह।’ ठंडी हवा चलने लगी थी। माँ कब सो गयी पता ही नहीं चला। चाँदनी उसके चेहरे पर पसर गयी।

माँ ने दु:ख में भी सुख ढूंढ़ लिया था।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print