मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कृष्णकन्या संत सखू

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – रावा प्रकाशन

पृष्ठ संख्या – 64 

किंमत – 120 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

श्रीमती अनुराधा फाटक

लेखिका अनुराधा फाटक यांची एक नवीन लघुकादंबरी, ‘कृष्णकन्या संत सखू’ रावा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने संत सखूचा अगदी बालपणापासून विठ्ठलाच्या पायावर देह ठेवेपर्यंतचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.आत्तापर्यंत आपण संत सखू भजनातून, गाण्यातून ऐकली होती, इथे मात्र कधी न बघितलेली सखू आपण सरूप पाहतो. नुसती पहात नाही तर हळूहळू आपण तिच्या डोळ्यात तिची कहाणी वाचायला लागतो, अनुभवायला लागतो. इतकी ती कथा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दचित्रात आहे. तिचा कृष्ण, तिचा विठ्ठल, तिची कृष्णामाई सगळं आपलं होतं. अर्थात कृष्णामाईच आपल्याला सखू ची गोष्ट सांगते आहे म्हणजे तिला आपल्यासमोर सरूप यायलाच हवं नं! अनुराधाताईंच्या शब्दात, वर्णनात इतकी ताकद आहे की त्या सखूची आपल्याला ओढ लागते. तिच्या अनिवार विठ्ठल भक्तीत आपणही कुठेतरी हरवून जातो. असं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं!

© सौ.मंजिरी येडूरकर

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वन पेज स्टोरी” – डॉ. विक्रम लोखंडे ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

अल्प परिचय 

शिक्षण – M.Com,M.Lib

विशेष – छंद – वाचन, लेखन. सद्या लहान मुलांचे क्लासेस घेते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वन पेज स्टोरी” – डॉ. विक्रम लोखंडे ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆ 

पुस्तक – वन पेज स्टोरी

लेखक – डॉ विक्रम लोखंडे

प्रकाशक – साकेत प्रकाशन प्राइवेट लिमिटेड, औरंगाबाद 

पृष्ठ संख्या – 128 

आयुष्य हे एक अनुभवांचे पुस्तकच तर आहे असं आपण सहजच म्हणतो तसंच डॉ विक्रम लोखंडे यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपले काम करताना येणारे अनुभव या पुस्तकातून आपल्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने पोहचवले आहेत . रोज नवनवीन लोकांशी भेटी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात ,पेशंटच्या तसेच त्याच्या नातेवाईकांच्या भावना समजून घेताना   डॉक्टरांना काय वाटतं होतं,त्यांच्या मनात कोणकोणते विचार येत होते आणि त्यातून जी कथा सुचत गेली त्याचे हे पुस्तक..वन पेज स्टोरी या नावातच पुस्तकाचं मोठं गुपित आणि यश दडलेले आहे  कारण प्रत्येक कथा एका पानातच संपते. कथा एका पानावर संपते म्हणून ती कुठंही अर्धवट किंवा अर्थहीन,बोधविरहित मात्र नक्कीच वाटत नाही तर अगदी कमी वेळात बसल्या बसल्या एखादी कथा खूप काही सांगून जाते,एखादा छानसा बोध आणि वाचनाचा आनंद ,समाधान देवून जाते. आपल्या मनोगतात लेखक म्हणतात की, नवीन पिढी खूप फास्ट आहे, त्यांचा संयम कमी आहे, लांबलचक लेख वाचायला खूप कमी लोकांना आवडते. जास्त वेळ एकाग्र न राहू शकणाऱ्या,सगळं झटपट,थोडक्यात पटकन हवं असणाऱ्या या पिढीची आकलन क्षमता मात्र खूप जास्त आहे.नेमकं सांगितलेलं त्यांना पटकन समजतं आणि आवडतही. म्हणून हा लेखन प्रयोग. नेमका आशय,भावना पोहचवताना शब्दांची जी कसरत करावी लागत होती ती रोमांचक होती. लेखकाचे हे पुस्तक लिहितानाचे अनुभव वाचून खूप छान वाटले पेक्षा  बऱ्याच गोष्टींची खरोखर गंमत वाटली.  लिहणं ही मला सर्वोत्तम क्रियेटीव्हीटी वाटते . यात तुम्ही न जगलेली खूप सारी आयुष्यं जगता येतात. लेखकाचे हे वाक्य वाचून आपण जे थोडफार तोडकं मोडकं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो याबद्दल कौतुक वाटले.

या पुस्तकांत काही बोलक्या चित्रांसहित तब्बल 42 कथा आहेत. सर्वच्या सर्व हृदयस्पर्शी.

कथांमधून नाती, त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि आपेक्षाभंग याचं दर्शन लेखक करून देतात. प्रत्येक कथेतून लेखकाचा व्यापक  दृष्टीकोन लक्षात येतोच पण कथेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक कथा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक भाग वाटू लागते. एक एक छोट्या कथांमधून लेखक आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेवून जात आहे हे आपल्या लक्षात ही येते आणि या कथा म्हणजे लेखकाने आपली केलेली आनंददायी फसवणूक वाटू लागते. एक डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना एक लेखक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टीकोन खरोखर खूप कौतुकास्पद वाटतो. या पुस्तकातून मला काय मिळालं हे सांगणं अवघड आहे कारण 42 कथा 42 नव्या गोष्टी सांगून गेल्या त्यातल्या नेमक्या एक एक बाबी सांगणं म्हणजे  वाचकाची सत्वपरीक्षा ठरेल म्हणूनच मला इथे कथांचा सारांश देणे उचित वाटत नाही. शिवाय लेखकाने पुस्तकांत इतक्या कमी शब्दांत आपल्या भेटीला इतक्या छोट्या पण छान कथा आणल्या आहेत तर प्रत्येकीने त्या वाचूनच पाहायला काहीच हरकत नाही.. हो ना?

क्षणक्षणात नवं आयुष्य

पुस्तकाच्या पानापानांत

उलगडताना दिसतं

प्रत्येक पानावर नवं काहीतरी भेटतं..

प्रत्येक दिवशी नवं जगणं

नव्या अनुभवातून नवं शिकणं

रोज नवं कोणी भेटणं

भेटीतूनच एक कथा फुलणं…

त्याचं सुंदर पुस्तक बनलं

नाव त्याचं वन पेज स्टोरी ठरलं

एकाच पानात एक कथा

कधी आनंदी गाथा तर कधी सांगे व्यथा….

परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती” – लेखक – अतुल कहाते ☆ परिचय – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆

सुश्री प्रिया कोल्हापुरे

परिचय..

शिक्षण – B.com

विशेष 

  • गृहिणी. वाचनाची, वाचलेल्या पुस्तकांवर बोलण्याची, लिहिण्याची आवड. 
  • काही पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत.
  • काही हिंदी, मराठी कविता लिहिल्या आहेत.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती” – लेखक – अतुल कहाते ☆ परिचय – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ 

पुस्तकाचे नाव – भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती”

लेखक – अतुल कहाते

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन 

पृष्ठ संख्या – ५०

पहिल्या भागात पॅरिस शहरातील आपले काम संपवून मैसूरला परतण्याआधी साम्यवादी देशांचा फेरफटका मारण्याच्या हेतूने ‘निस’ गावात पोहोचलेल्या तरुणास हादरवून सोडणारा अनुभव सांगितला आहे. रेल्वेच्या डब्यात स्थानिक तरुणीने सहज तिथल सरकारी वातावरण किती कडक आहे यावर काही संभाषण केलं. त्यावरून त्या दोघांनी बल्गेरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार विषयी टीकात्मक चर्चा केली या आरोपावरून त्या युवकाला व तरुणीला पोलिसांनी अटक केली. 72 तास अन्न पाण्याविना त्या युवकाचे झालेले हाल, तिथून त्याची झालेली सुटका, व त्याची विचारसरणीच पालटवून टाकणारा हा अनुभव यात वर्णन केला आहे.

हा युवक म्हणजे इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नागवार रामाराव नारायण मूर्ती.

मूर्ती यांचा जन्म म्हैसूर मधल्या ब्राह्मण कुटुंबातला. वडील शिक्षक,आई पाचवी शिक्षण झालेली,ही पाच मुली आणि तीन मुलं अशी भावंड,समाधानी कुटुंब. मुलांनी शिकावं अशी इच्छा असणारे आई-वडील. वडिलांना पुस्तक वाचन व शास्त्रीय संगीताची आवड तीच आवड मूर्तीनाही जडली.कमी पगार असल्यामुळे काटकसरीने, जबाबदारीने, विना तक्रार जगण्याचे कौशल्य आईकडून त्यांनी लहानपणी अंगीकृत केले. मूर्ती शाळेत हुशार होते.विज्ञान, गणित त्यांचे आवडते विषय.

घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाची निवड करताना केलेली तडजोड, महाविद्यालयात त्यांना मिळालेले यश, शिक्षणाबाबतची त्यांची वाटचाल इथे सांगितले आहे. वडिलांनी मूर्तींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यास आपण सक्षम नसल्याचे सांगूनही त्यांच्या वरती राग न धरता स्वतःच्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.

उच्च पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरी न करता कृष्णय्या या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार संगणक शास्त्राचा अभ्यास करण्याचे मूर्तीनी ठरवले. त्याबद्दलचे शोध निबंध वाचन त्यांनी सुरू केले संगणक शास्त्राचे ज्ञान संपादन करण्यासाठी केलेली वाटचाल इथे सांगितली आहे. त्यांची कम्युनिस्ट विचारसरणी विषयीची आपुलकी ही इथं नमूद केली आहे.मूर्तींचे संगणक शास्त्राचे ज्ञान बघून’सेसा’ या फ्रेंच कंपनीने त्यांना सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी पॅरिसला बोलवले.

पॅरिसमधील त्यांचे अनुभव, उद्योजकांबद्दल त्यांचा बदललेला दृष्टिकोण येथे सांगण्यात आला आहे. डाव्या विचारसरणीचे वारे डोक्यात असल्यामुळे मिळालेले पैसे गरजे पुरते ठेवून बाकीचे ते दान करत. तिथलं काम पूर्ण करून ते भारतात परतले. इथलं वातावरण त्यावेळी खूप तणावपूर्ण होतं. इथं आल्यावर मूर्तींनी एम.आर.आय नावाची कंपनी सुरू केली ज्यात त्यांना अपयश आलं.

या भागात सुधा मूर्ती यांची कौटुंबिक-शैक्षणिक माहिती, शैक्षणिक प्रवास, त्यांची जिद्द याची सविस्तर माहिती दिली आहे. मूर्तींची सुधा यांच्याशी झालेली भेट त्यातून त्यांचा प्रेममय प्रवास, सुधा यांच्या वडिलांचा विरोध, त्यांचा विवाह या भागात सविस्तर सांगितला आहे.

पुढील भागात नरेंद्र पटणी यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर संगणकाच्या टेप्स आणि डिस्कमध्ये डेटा एन्ट्री करण्याचा उद्योग सुरू केला. त्याचे सविस्तर वर्णन येथे आहे. तिथेच मूर्ती कामाला लागले. तिथला त्यांचा प्रवास, सहकाऱ्यांची माहिती, त्यांच्या कामाचा आढावा इथे सांगितला आहे. इन्फोसिसच्या निर्मितीची पाळमुळं ही इथेच रोवली गेली. सुधा यांचा त्यासाठीचा दृष्टिकोन आणि सहकार्य देखील आपल्याला समजते.

पुढे इन्फोसिसच्या जन्माची माहिती, ती निर्माण करण्यामागचा हेतू, त्यासाठी केलेली धडपड, अनेक तडजोडी, कंपनीतले कामाचे आराखडे, सहकाऱ्यांची आणि मूर्तींची विचारसरणी, पटणी यांची नाराजी, इन्फोसिसच्या यशाचा प्रवास इथे वाचायला मिळतो.

कंपनीला भांडवल मिळवण्यासाठी बँकेकडून कर्ज न घेता शेअर बाजारातून पैसे उभा करण्याचा निर्णय इथे सांगितला आहे. त्याची सविस्तर माहिती इथे वाचायला मिळते.

पुढील भागात भारतामध्ये संगणक क्षेत्रासाठी बदललेलं चित्र, भारतात आयटी क्षेत्रात झालेला बदल, शैक्षणिक- औद्योगिक प्रगती इथे वाचायला मिळते.कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचा,कर्मचाऱ्यांची काही माहिती इथे वाचायला मिळते.

सुधा मूर्ती यांचं मूर्तींच्या आयुष्यातले योगदान इथे सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाची उचललेली जबाबदारी,केलेल्या तडजोडीत,वाद न होऊ देता काढलेला मार्ग खूपच विचार करायला लावतो. इन्फोसिस फाऊंडेशनची धुरा त्यांनी कशी सांभाळली हेही यात समजतं.

इन्फोसिस मधून निवृत्त होऊन मूर्तींनी घरच्या वडीलधाऱ्याने वागाव तसं त्यांचं इन्फोसिसशी नातं ठेवलं पण त्यानंतर इन्फोसिस मध्ये झालेले चढ-उतार, इन्फोसिस वर-मूर्तींवर झालेल्या टीका इथे वाचायला मिळतात.

नुकसानीकडे चालणाऱ्या इन्फोसिसला तारण्यासाठी मूर्तींनी पुनरागमन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय,इन्फोसिस मधलं वातावरण,त्यांचं झालेलं कौतुक, काही टीका इथे सांगितल्या आहेत.

साधेपणातही सुंदर,समाधानी आयुष्य जगता येतं स्वतःच्या प्रगती सोबत इतरांचीही प्रगती व्हावी हा उदात्त हेतू असणाऱ्या या मूर्तींबद्दल वाचताना अभिमान वाटतो. हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.

© सुश्री प्रिया कोल्हापुरे

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “गणिती“ – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

परिचय..

शिक्षण – MSc(Applied Electronics)

वय – 57 वर्षे

विशेष 

  • जवळ जवळ 25 वर्षे लेक्चररशिप केली (इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स मध्ये)  आणि गेल्या पाच सहा वर्षांपासून स्वेच्छेने निवृत्ती पत्करली आहे.
  • सध्या माझे छंद जोपासतेय. लेखन, वाचन, अभिवाचन आणि पेंटिंग.
  • तरुण भारत, दिव्य मराठी, सकाळ वगैरे वृत्तपत्रातून  तसेच साप्ताहिक लोकप्रभातून ललित लेखन.
  • पुण्याच्या जनमंगल ह्या साप्ताहिकात 2022 मध्ये वर्षभर सदरलेखन केलेले.
  • कविता, अभिवाचन, नाटक ह्यात विशेष रुची.
  • पेंटिंग्जचे ची 2, 3 सोलो शोज आणि 3, 4 ग्रुप शोज झाले आहेत.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गणिती“ – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

पुस्तक -गणिती

लेखक द्वय  – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई 

परिचय- मधुमती व्हराडपांडे 

मनोविकास  प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आणि श्री. अच्युत गोडबोले व डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे लिहिलेलं “गणिती” हे अतिशय माहितीपूर्ण आणि तितकेच रंजक असे पुस्तक! गणितावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर ही एक मेजवानीच! गणितासारख्या अतिशय रुक्ष आणि क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या विषयावर तब्बल 465 पानांचे पुस्तक लिहिणे आणि वाचकाला अगदी शेवटच्या पानापर्यंत त्यात गुंतवून ठेवणे ही किमया अच्युत गोडबोलेच करू शकतात ह्याची हे पुस्तक वाचतांना खरोखरच  प्रचिती येते!

तसं पाहिलं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गणित असतं. पण आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा माहिती नसते. पशु, पक्षी, वनस्पती सगळ्यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या घरांमध्ये, फर्निचर मध्ये, घरट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे गणित दडलेले असते. झाडांना येणारी पाने एक विशिष्ट क्रमाने येतात असे आढळून आले आहे.  मधमाश्यांची उत्पत्तीही एका ठराविक क्रमाने होते, बऱ्याच फुलांच्या पाकळ्यांतही  काही विशिष्ट क्रम दिसून येतो. ही  क्रमरचना फिबोनाची क्रमिकेशी (Fibonacci series) मिळतीजुळती असते. 1,1,2,3,5,8,13,21,…. ह्या क्रमवारीला फिबोनाची सिरीज म्हणतात. ह्यातली  प्रत्येक संख्या ( पहिले दोन वगळता) आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. निसर्गातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ही सिरीज आढळते.

तसेच सुवर्ण गुणोत्तर (Golden ratio) हा सुद्धा निसर्गात आढळणारा एक अफलातून प्रकार! तुम्ही पोस्ट कार्ड, ग्रिटिंगकार्ड, खिडक्या, दारांच्या चौकटी, फोटो, आरसे ह्यांचे आकार किंवा मनुष्य किंवा इतर प्राणी यांच्या शरीराचे आणि चेहऱ्याचे आकार  बारकाईने बघितले तर एका विशिष्ट गुणोत्तरात असतात. तोच हा Golden ratio! त्यामुळेच ते आकार डोळ्याला आल्हाददायक वाटतात  आणि म्हणूनच चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ह्या सगळ्यांमध्ये हा रेशो वापरलेला असतो. ह्या गोल्डन रेशो चा शोध सर्वप्रथम पायथॅगोरस ची पत्नी थेओना हिने लावला आणि नंतर यूक्लीड ने सर्वप्रथम त्याची व्याख्या केली.

सामान्यतः आपणास आपल्या आजूबाजूला सगळीकडेच गणित आहे ह्याची कल्पनासुद्धा नसते. अर्थात त्याने बिघडत काहीच नाही पण जेव्हा ते कळतं तेव्हा गणितातलं हे सौंदर्य आपल्या मनाला भुरळ पाडतं. प्रस्तावनेतच दोन्ही लेखकांनी हे अधोरेखित केलंय की हे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा उद्देशच मुळी लोकांना गणित किती सुंदर असू शकतं  हे समजावं, ती शोधणाऱ्या गणितज्ञांची आयुष्ये कशा विविध चित्रविचित्र अनुभवांनी, घटनांनी भरलेली आहेत हे कळावं हा होता. आणि त्यांचा तो उद्देश ह्या पुस्तकाने अगदी सफळ संपूर्ण केलाय! आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक गोष्टींमध्ये दडलेल्या गणितातलं मुलतत्व सोप्या भाषेत वाचकांना समजावून सांगितले आहे.

पुस्तकात आर्यभट , ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर, रामानुजन, नीलकंठ यांच्यासारख्या भारतीय गणितज्ञांसोबतच पायथॅगोरस, युक्लीड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, पास्कल, फर्मा, नेपिअर ह्यांच्याविषयी, त्यांच्या अनमोल शोधांविषयी अतिशय रंजक माहिती दिलेली आहे. निसर्गातल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूंचं अचूक वर्णन आपण गणितामुळेच करू शकतो. विश्वरचनेचं कोडं उलगडण्यासाठी आज ज्या भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानातल्या  अतिप्रगत थिअरीज वापरल्या जाताहेत त्याचा पाया  हजारो वर्षांपूर्वी अनेक गणितज्ञांनी  शोधलेल्या गणितावरच आधारलेला आहे. मात्र त्यासाठी त्यांना समाजाविरुद्ध कसा लढा द्यावा लागला त्याचीही इत्यंभूत माहिती आपल्याला ह्या पुस्तकात मिळते. पुस्तकाच्या सुरवातीलाच विश्वनिर्मिती झाल्यानंतर अंकांचा शोध कसकसा लागत गेला, त्यानंतर निरनिराळ्या आकृत्या त्यांची गणितं, त्यांचा देवळं, पिरॅमिड, घरं बांधण्यासाठीचा उपयोग इ बद्दल सुंदर विवेचन केलंय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर प्रचंड असे इजिप्शियन पिरॅमिड बांधताना त्या लोकांनी खगोलशात्र आणि गणिताची सांगड घातली होती. आजसुद्धा जगभरातल्या पर्यटकांचे ते एक आकर्षण स्थळ आहे.

आपल्याकडे इ. स. पूर्व 800 च्या सुमारास यज्ञवेदींच्या रचनेसंदर्भात काही विशिष्ट गणिती सूत्रांचा वापर केला जायचा. त्याला “शुल्वसूत्र” असं म्हटलं जायचं. त्या काळात गणिताचे सर्व ज्ञान मंत्रांच्या स्वरूपात होतं. Trigonometry चे अख्खे टेबल  आर्यभटाने फक्त एका श्लोकात मांडले होते! अशा अनेक गोष्टी वाचतांना आपण आश्चर्यचकित होत जातो.

आर्यभटानंतर भारतीय गणितात अत्यंत मोलाची कामगिरी करणारा गणितज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त. त्याने जगाला “शून्य” म्हणजेच काहीही नसणे किंवा अस्तित्वविरहितता ही संकल्पना देऊन सगळ्याच गणितात प्रचंड क्रांती केली. मानवी मनाची ही सर्वात प्रगल्भ कृती होती असे लेखक म्हणतो. संपूर्ण जगाच्या गणिताचा चेहरामोहराच ह्या आविष्काराने बदलून टाकला!

आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त यानंतर महावीराचार्य, रंगाचार्य, भास्कराचार्य, नीळकंठ, माधवाचार्य यांनी भारतीय गणितात फार मोलाची कामगिरी करून ठेवली. भास्कराचार्यांचे “सिद्धान्तशिरोमणी” आणि “लीलावती” हे ग्रंथ त्यांच्या अमूल्य योगदानाची साक्ष देतात. काही लोकांचे म्हणणे आहे कि लीलावती भास्कराचार्यांचे पत्नीचे नाव होते. काहींच्या मते ते त्याच्या अतिशय लाडक्या मुलीचे नाव होते. लग्नानंतर लवकरच वैधव्य आल्यामुळे भास्कराचार्याने तिला माहेरी आणले आणि तिचा वेळ चांगला जावा म्हणून तिला गणित शिकवले. तसेच तिचेच नाव आपल्या ग्रंथाला दिले. आज सुद्धा गणित कसं शिकावं ह्याचा आदर्श म्हणून ह्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. तसाच केरळ मधला विद्वान गणितज्ञ म्हणजे नीळकंठ. त्याचेही “तंत्रसंग्रह” हे पुस्तक खूप गाजले. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या निश्चित वेळा काढण्याचं काम सर्वप्रथम नीलकंठाने केलं.

गणित म्हणजे केवळ मोजणे किंवा आकडेमोड करणे ह्यापलीकडेही काहीतरी आहे हे जगाला दाखवून देण्याचं श्रेय ग्रीक विचारवंत थेल्स याला जातं. त्यानंतर गणिताच्या इतिहासात अजरामर झालेला ग्रीक गणितज्ञ म्हणजे पायथॅगोरस! पायथॅगोरस ची ओळख प्रत्येकाला सातवी आठवीतच झालेली असणार. त्यामुळे सगळ्यांच्याच परिचयाचा! म्हणूनच त्याच्याविषयी सांगितली जाणारी एक छोटीशी कथा पुढे देते आहे.

ग्रीस मधल्या एका लहानश्या गावात डेमॉक्रिटस नावाचा एक अतिशय विद्वान गृहस्थ राहायचा. त्याला एकदा एक तरतरीत मुलगा लाकडाची मोळी विकण्यासाठी नेतांना दिसला. अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटक्या बांधलेल्या त्या मोळीने डेमॉक्रिटसचं लक्ष वेधून घेतले. त्याने त्या मुलाला “तुला मोळी कुणी बांधून दिली?” अशी पृच्छा केली असता तो मुलगा उत्तरला , “माझी मोळी मीच बांधतो, मला आईवडील नाहीत” “मोळी विकून काय करणार?” ह्या प्रश्नावर तो मुलगा उत्तरला की मोठेपणी त्याला डेमॉक्रिटस सारखे विद्वान व्हायचे आहे. ते ऐकताच डेमॉक्रिटस ला त्या मुलाबद्दल कुतूहल वाटले व त्याने त्याला मोळी सोडून पुन्हा पहिल्यासारखी बांधून दाखवायला सांगितले. त्या मुलाने तसे केले. त्याचे मोळी बांधण्यातले कौशल्य, सुसंगती, अचूकता अन नेटकेपणा बघून डेमॉक्रिटस खुश झाला अन त्याने त्या मुलाच्या पोटापाण्याची अन शिक्षणाची जबाबदारी घेतली. हाच तो सुप्रसिद्ध पायथॅगोरस!

अशा अनेक गणितज्ञांच्या आयुष्यातील आख्यायिका, कथा आपल्याला ह्या पुस्तकात भेटतात. अतिप्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात कशी झाली, त्याच्या वेगवेगळ्या शाखा कशा निर्माण झाल्यात त्याचा रोचक इतिहास आणि त्यांच्या सगळ्याच प्रवासाची एक सुंदर झलक आपल्याला ह्या पुस्तकातून दिसते .

खरं सांगायचं तर पुस्तकाचा आवाका इतका प्रचंड आहे की इतक्या थोडक्यात त्याबद्दल सांगता येणं खूपच कठीण आहे. एवढं बाकी नक्की की ज्यांचा गणित हा विषय आहे, ज्यांना गणितामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी तर हे विस्तृत पुस्तक म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे! मात्र असे असूनही ज्यांचा गणित विषय नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाहीच असे बाकी मुळीच नाही. ते सुद्धा पुस्तकातला काही भाग वगळून ह्या पुस्तकाचा आनंद निश्चितच घेऊ शकतात. एकंदरीतच प्रत्येक वाचकाला गणिताच्या अतिशय अद्भुत आणि रंजक विश्वाची एक सुंदर सफर हे पुस्तक घडवून आणतं ह्यात शंकाच नाही !

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “हस्व“ – सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हस्व – सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

पुस्तकाचे नाव — र्‍हस्व

लेखिका –राधिका भांडारकर

प्रकाशक —  शाॅपीजन

प्रकाशन — मार्च २०२३ ( प्रथम आवृत्ती )

मूल्य — रू. २४५/-

पृष्ठे — ९०

प्रसिद्ध कथा लेखिका राधिका भांडारकर यांचा पाचवा लघुकथा संग्रह र्‍हस्व नुकताच प्रकाशित झाला.  कथा लेखनावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या राधिकाताईंचा हा संग्रह सुद्धा अतिशय वाचनीय झालेला आहे. या संग्रहात एकूण १३ कथा आहेत. सर्वच कथा आपल्या सर्वांच्या भावविश्वाशी सहजपणे धागा जोडतात. प्रत्येक कथा ही जीवनातल्या एकेका पैलूचे दर्शन घडवते.

सौ राधिका भांडारकर

कथा विषयांचे वैविध्यही खूपच भावते. आवर्जून उल्लेख करावा असा विषय म्हणजे स्त्रीचे ऋतुमती होणे. हा विषय तसा खुलेपणाने न बोलला जाणारा आहे. ‘ पाउल ‘ या कथेत या स्थित्यंतरातील स्त्रीची भावनिक आंदोलने खूप छान पद्धतीने टिपली आणि मांडली आहेत.

‘ पत्त्यांचा बंगला ‘ ही कथा समाजात घडणाऱ्या विलक्षण मनोव्यापाराचे दर्शन घडविते. अत्यंत हलाखीत बालपण गेलेल्या कथानायकाला परिस्थितीच महाराज बनवते. माणसांची दुखरी नस अचूक ओळखणारा तो धूर्त, चाणाक्ष नायक हे नाटक कसे वठवतो हे वाचण्यासारखेच आहे. एका वेगळ्याच विषयावरची ही कथा प्रभावी मांडणीने मनाची पकड घेते.

‘ पस्तीस – छत्तीस ‘  ही कथा मनमानी नवऱ्याचा इगो, वर्चस्व, रुबाब जपताना संसाराचा तोल सांभाळण्यासाठी करिअर सोडून देणाऱ्या एका हुशार, कर्तृत्ववान ‘ती’ ची कथा आहे. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी ही कथा अप्रतिम जमून आली आहे.

आणखी एक सुंदर कथा म्हणजे ‘ क्षपणक ‘. अतिशय बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी पण तितकाच अस्थिर स्वभावाचा पती आणि प्राणपणाने घर, संसार, मुलं, नवरा यांना जपणारी, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांची ही कथा.  रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता त्या क्रियांना मदत करून शेवटी त्यातून बाहेर पडणारे क्षपणक म्हणजे कॅटाॅलिस्ट तो बनवितो. पण शेवटी तो मनापासून कबुल करतो की,’ त्याच्या खऱ्या आयुष्यातली क्षपणक तीच आहे.’ ही कथा अतिशय प्रभावी झाली आहे.

‘ उत्तरायण ‘ ही कथा ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली आहे . दुर्दैवाने बालविधवा झालेली कथा नायिका मोठ्या जिद्दीने, हिंमतीने पुढची वाटचाल करते. एकुलता एक मुलगा संस्कारी, सक्षम, कमावता बनतो. तिथेच तिचे उत्तरायण सुरू होते. लेखिकेने ग्रहताऱ्यांची भ्रमंती आणि मानवी जीवनाची वाटचाल यांची खूप छान सांगड घातली आहे .

सर्वच तेरा कथा एकापेक्षा एक सरस झाल्या आहेत. विषयही सामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने वाचक पटकन त्यांच्याशी जोडले जातात.

‘ चंद्रोदय ‘, ‘ शुभरजनी ‘ या आजकाल मुले परदेशस्थ आणि देशात पालक एकटे या वास्तवावर सकारात्मक भाष्य करणाऱ्या दोन सुंदर कथा आहेत. ‘चंद्रोदय’ मध्ये शिसवी पाटावर साक्षात चंद्रच जेवत होता या सुंदर वाक्याने होणारा कथेचा शेवट मनाची पकड घेतो.

‘ स्थळ ‘ कथा आजकालच्या लग्न जमणे, जमवणे या गोष्टींवर छान प्रकाश टाकते. यात लेखिकेने एक जबाबदार सदस्य म्हणून केलेली निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. शेवटही छान केला आहे.

कथांची शीर्षकं ही लेखिकेची खासियत आहे. सर्वच शीर्षकं वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  पस्तीस छत्तीस हा आलिशान बीएमडब्ल्यू चा नंबर आहे. त्याचा तो स्टेटस सिम्बॉल. पत्त्याचा बंगला, शुभरजनी, परीघ, क्षपणक, पाउल ही शीर्षकं कथेला वेगळा आयाम देतात.

‘ वाळा ‘ म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना !पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे वयाची साठी पार झाल्यावरही  परिस्थितीचा  तगादा आणि मनातील वडिलांचे प्रोत्साहन यामुळे संगीत शिकून एक प्रतिथयश गायिका बनलेल्या नायिकेची ही कहाणी आहे. संगीतातील तपशीलवार बारकाव्यांचेही छान वर्णन आहे. त्यामुळे कथा रसाळ झाली आहे.

या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली र्‍हस्व ही कथा सर्वात लहान बहीण सर्वात आधी गेल्याने विलक्षण दुःखी झालेल्या मोठ्या बहिणीचे हे मनोगतच आहे.

” ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे ॥ 

केले नारायणे उफराटे ॥”

हा संत निवृत्तीनाथांचा अभंग वाचताना जसा जीव गलबलतो ही कथा वाचतानाही तशीच भावना मनी दाटून येते‌

सर्वच कथांमध्ये लेखिकेने अतिशय हळुवारपणे कथाबीज फुलवलेले आहे. त्यातून तिचे प्रगल्भ, संवेदनशील मन,  वास्तवाचे सखोल निरीक्षण जाणवते. जगण्यातले काही तरल क्षण सामोरे येतात. सुंदर सकारात्मक संदेशही देतात.

कथेची भाषा अगदी सहज सोपी, ओघवती, चित्रदर्शी आणि मनाला भिडणारी आहे. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो.

या कथासंग्रहाला ज्येष्ठ लेखिका अरुणाताई मुल्हेरकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

राधिकाताईंनी हे पुस्तक आपले प्रेरणास्थान असणाऱ्या रसिक वाचकांना अर्पण केले आहे ही विशेष बाब आहे.

या आधीच्या कथासंग्रहांप्रमाणेच या कथासंग्रहाचे पण वाचक उस्फूर्तपणे स्वागत करतील यात शंका नाही. कारण याही कथा वाचनीय आणि प्रभावी आहेतच. त्यासाठी राधिकाताईंचे मनापासून अभिनंदन. यापुढेही त्यांच्या उत्तम उत्तम कथा रसिकांना वाचायला मिळोत यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “सेवारती…” – डाॅ.दिलीप शिंदे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सेवारती…” – डाॅ.दिलीप शिंदे ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

पुस्तक परीक्षण :

नाव : सेवारती

लेखक : डॉ. दिलीप शिंदे

प्रकाशक : साधना प्रकाशन – २०२१

किंमत : १००/-

आज सांगलीतच काय महाराष्ट्रातही डॉ. दिलीप शिंदे हे नाव परिचित आहे. डॉक्टर हा रुग्णांचा देव असतो अशी श्रद्धा अजूनही लोकांच्या मनात रुजलेली आहे. पूर्वी संपूर्ण कुटुंबाचा एकच पिढीजाद डॉक्टर असे. त्याला सर्व कुटुंबाचा आरोग्य इतिहास माहिती असे त्यामुळे कुणाला कोणते औषध देणे गरजेचे आहे हे त्याला समजत असे. तेव्हा आजच्या सारखे स्पेशालिस्ट नव्हते. डॉक्टर व कुटुंबीय यांच्यात एक भावनिक बंध जुळलेला असे.असे डॉक्टर आता दुर्मिळच झाले आहेत. पण त्याला अपवाद असणारे एक डॉक्टर आहेत – डॉ. दिलीप शिंदे. त्यांनी लिहिलेले

सेवारती या पुस्तकाची थोडक्यात ओळख मी करून देण्याचा प्रयत्न करतेय. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातील दुर्मिळ होत चाललेली ध्येयवादी सेवावृत्ती डॉक्टरांच्या रक्तातच भिनलेली आहे. डॉक्टर हा जणू देवदूतच असतो. त्यांची  “संवेदना” ही संस्था एक आदर्श सेवाभावी संस्था आहे. ‘ लागले रे नेत्र पैलतीरी ‘ अशा मनोवस्थेतल्या व अंथरुणावर खिळून पडलेल्या  वृद्धांचा व त्यांची संवेदशीलतेने, प्रेमाने शुश्रुषा व देखभाल करणाऱ्या डॉक्टर पती – पत्नी आणि परिचारिका यांचं कोरोना काळातील जगणं शब्दबद्ध करणाऱ्या या कथा आहेत. यातील १२ ही कथांचे संक्षिप्त वर्णन थोडक्यात नाही करता येणार. पहिल्याच “औक्षवंत होऊया” यात संस्थेचा ४ था वर्धापन दिन व डॉक्टरांचा वाढदिवस येथील वृद्ध कसा साजरा करतात याचं हृद्य दर्शन आपल्याला घडतं. ‘ पुरुष सगळे सारखेच ‘ या कथेत समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती मुळे स्त्रीला होणार त्रास दिसून येतो. ‘ वडिलांच्या विरोधाचा अर्थ ‘ अशी ही वेगळ्या धाटणीची कथा आपल्याला बापाचे प्रेम कसं असतं याचा प्रत्यय देते. राहत्या घरात सेवा केंद्र करण्यास त्यांचा विरोध का असतो हे कथा वाचल्यावर लक्षात येते.

‘ मी लग्न करू का नको ‘ हा केंद्रातल्याच एका परीचारीकेला पडलेला प्रश्न आपल्यालाही अस्वस्थ करून जातो. लग्नानंतर ही नोकरी सोडायची अट मुलाकडून आल्यावर तिने दिलेला नकार आपल्याला पटतो. तिला ते काम मनापासून आवडत असते. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची भूमिका खूप महत्वाची असते., असे असूनही त्यांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. समाजाचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा निकोप नाही.

पुरुषाच्या यशस्वीतेमागे स्त्रीचे योगदानही मोलाचे असते ही गोष्ट डॉक्टर इथे विसरलेले नाहीत. ‘ बायकोचे योगदान ‘  ही कथा म्हणजे डॉ. नीलमचा जीवनपटच आहे. खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून ती पूर्णपणे समर्पित झालेली आपल्याला दिसून येते. सहजीवनात आलेल्या काही कठीण प्रसंगात तिने दिलेला आधार एखाद्या दीपस्तंभा सारखा भर भक्कम होता असे डॉक्टर कबूल करतात.

आता पुढच्या कथेकडे पाहू.

‘ सहजीवन आणि समजूतदारपणा ‘.  या गोष्टीत एका वृध्द जोडप्याची स्थिती अशी आहे की आजोबा केंद्रात राहतात. मुलगा सून नोकरीवाले. आजोबा या दोघाशी नीट वागायचे पण आज्जी समोर आल्या की चिडचिड करायचे. बिचाऱ्या आज्जी बाहेरच बसून राहायच्या. १६ -१७ वर्षे ती दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. जर त्या दोघांनीही आपल्या सहजीवनात थोडा समजूतदार पणा दाखवला असता तर ही वेळ आली  नसती.

‘ जे टाळणे अशक्य ‘ या कथेत डॉक्टरांचे बालपण आपल्या डोळ्यांसमोर येते.  बालपणातल्या अनेक शालेय, शेतीच्या आठवणी त्यांनी विषद केल्या आहेत. काही काही अटळ गोष्टी दैवगतीने कशा निभावल्या गेल्या हे समजते.

दारूचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम यावर प्रकाश झोत टाकणारी कथा – ‘अवघड आहे’

संसाराची व स्त्रीची झालेली परवड आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. कळते पण वळत नाही अशी आजची स्थिती आहे. एका बाजूस दारू पासून मिळणाऱ्या महसुलाविना अडचणीत येणारे सरकार आणि दुसऱ्या बाजूला सरकारने दारूबंदी करावी अशी अपेक्षा असलेल्या स्त्रिया.. अवघड आहे.

एक आदर्श शिक्षिकेला, आदर्श पत्नी, आदर्श माता नाही बनता आले त्यामुळे तिचा झालेला कोंडमारा ‘ मला तिचे तोंडही बघणार नाही ‘ या कथेत दिसून येतो. मुलीच्या मनात बसलेली आढी शेवटी दूर होते हीच एक समाधानाची गोष्ट.

‘ लढण्यात शान आहे ‘ नावातच आपल्याला कथेचं सार समजून येते. संवेदना केंद्राची व्याप्ती जसं जशी वाढत गेली तस तशी जागेची कमतरता भासू लागली. वर्षभर अनेक खस्ता काढून डॉक्टरनी एक नवा प्लॉट घेतला. बांधकामात खूप अडचणी येत होत्या. त्यातच कोरोना वाढत चालला होता. प्रकल्प अर्धाच राहतो की काय याचा ताण आला होता. पण त्यांच्या सासऱ्यांच्या पाठिंब्याने तो प्रकल्प हळू हळू आकाराला येत होता. लढायला बळ देत होता.

स्त्री पुरुषांमध्ये असणाऱ्या इगोला जरा जरी धक्का लागला तर दोघानाही कशी घुसमट सहन करावी लागते, हे ‘ बंधन आणि स्वातंत्र्य ‘ मध्ये आपल्या दृष्टीला पडते. इथे डॉक्टर एक विधान करतात –

” प्रत्येक कुटुंबात स्त्री पुरुषांमध्ये सहकार्य आणि संघर्ष चालूच असतो. स्त्री यथाशक्ती स्वतःवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत राहते, मात्र त्याचवेळी सहकार्य करणेही तिला भाग पडत असते ‘. किती रास्त म्हणणे आहे ना.

यातील शेवटची कथा आहे –

‘ कोरोना आणि मरण ‘

कोरोना शब्द उच्चारला तरी मरणाची भीती आणि आठवण होते आणि मरण म्हंटले तरी कोरोनानेच मेला अशी शंका मनात येई. ही गोष्ट त्या कोरोना काळात मनात पक्की बसली होती. संस्थेतील आजी – आजोबांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते. अशा या अभद्र काळात एका आजींचा मोठा मुलगा कोरोना नव्हता तरी घाबरून वारला होता आणि ही गोष्ट त्या आजीपासून लपवावी लागली होती. पुढे त्या आजी घरी गेल्यावर त्यांना ही बातमी सांगितली गेली.

अशा या १२ कथांना ललित भाषेचा बाज आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी खूप मुद्द्यांचा उहापोह केलाय.त्यातील काही अधोरेखिते :

  • भरल्यापोटी जीवनाची निरर्थकता सांगणारे साहित्यिक जीवनाचे सकारात्मक पैलू गांभीर्याने घेतली एवढा प्रभाव या ” सेवारती” च्या कथा पडतात.
  • “संवेदना” हे दवाखाना व वृद्धाश्रमातील जे जे चांगले आहे त्याचा संगम असलेलं व प्रेम, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांची त्रिसूत्री जपणारे वृद्धसेवा केंद्र आहे
  • सेवारती च खरं सामर्थ्य आहे लेखक डॉ. शिंदे यांच्या स्वानुभवाधारीत कथा
  • सहजीवन कसं असावं, संसारातल व व्यावसायिक दोन्ही प्रकारचं, याचं नमुनेदार उदाहरण म्हणजे हे डॉक्टर दाम्पत्य एकंदरीत या कथांमध्ये, आजच्या गडद निराशेच्या व जगण्याची निरर्थकता प्रकर्षाने जाणवणाऱ्या कालखंडात  आशेचे दीप माणसाच्या मनात पेटवत त्याची निराशा दूर करण्याचं सामर्थ्य आहे असं त्यांनी आपल्या ब्लर्बमध्ये लिहिलं आहे.

आपण सर्वांनी निदान एकदा तरी या कथा वाचल्या पाहिजेत.

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆

सौ. अक्षता गणेश जोशी

(सौ. अक्षता गणेश जोशी आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण – बी. ए. (इतिहास) आवड – वाचनाची आवड आहे… ऐतिहासिक वाचन आवडते… वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय लेखनचा प्रयत्न करते…

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – व्हाय नॉट आय?

लेखिका – वृंदा भार्गवे.

पृष्ठ संख्या – २५२

अमेय प्रकाशन

मूल्य – २५०₹

जन्मतः माणसाला सुदृढ, निरोगी,धडधाकट आयुष्य मिळणे म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. ती टिकवणे आपल्याच हातात आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरी एखादी व्यक्ती त्याला अपवाद असू शकते. वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या एका चुकीमुळे पाणीदार डोळ्याच्या देखण्या देवू ची (देवकी) दृष्टी गेली.याचा परिणाम त्वचा,दात, केस,वर्ण या सगळ्यावर झाला.एवढं सगळं होऊन ही तिने आणि तिच्या आईने जिद्द सोडली नाही…

सत्य घटनेवर आधारित असणारी ही आहे “उजेडयात्रा”… कादंबरी,कथा,अनुभव कथन कशात ती बसू शकेल याची कल्पना नाही. ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आहे हे मात्र नक्की!!

“अंधारावर उजेड कोरणाऱ्या मायलेकीची कहाणी…”

लेखिकेने अतिशय सुरेख शब्दात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे. घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. डोळ्यांत पाणी तरळते…देव सुद्धा एखाद्याची किती परीक्षा घेत असतो…की मागच्या जन्मी चे पाप-पुण्या चा तर्क वितर्क आपण जोखत असतो… देवू च्या यातना सोसण्याला परिसीमा नाहीच…पण त्याहीपेक्षा तिचे स्वावलंबी होणे जास्त मनाला वेधून जाते…

तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन जातीबाह्य विवाह केला.दोन्ही बाजूंनी तसा विरोधच…सासरे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे एम.ए. करून इतिहासात बी.एड.केले. नवरा पुढे एम.फिल.कर असे म्हणत होता पण तिने शिक्षण थांबवून शिक्षकीपेशा स्वीकारला…

पंधरा वर्षाच्या संसारात दोन मुली मोठी रेणू 10 वर्षांची आणि धाकटी देवू (देवकी)साडेतीन वर्षांची.

काही तासापूर्वी तिच्याशी बोलत असणारा तिचा नवरा ज्याचे पोट थोडे दुखत असल्याचे निमित्त होऊन अकस्मातच गेला…ती आणि तिच्या मुली एकदमच बिचाऱ्या झाल्या. तिची शाळेतील नोकरी होती तरीही…

नवरा गेल्या नंतर सासरी होणारी मानसिक कुचंबणा,निराशेचे वातावरण तिला तिच्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी नको होते म्हणून मुलींना घेऊन ती माहेरी आली. बहिणीचे लग्न झाले होते, भावांनीही वेगळे संसार थाटले होते.लहानपणी भावा-बहिणींमधले प्रेम, परस्परांसाठी जीव तुटणे ही ओढ कोठे तरी हरवली आहे असे जाणवले…तिच कमतरता आई वडिलांच्या नजरेत जाणवली… सर्वार्थाने ती एकटी पडली होती. सगळीकडून तिला व्यवहारिकतेचे अनुभव येऊ लागले.तिने लक्षात ठेवले ते माणसाचे तत्वज्ञान… माणस जपायला पाहिजेत पण माणस वेगळी आणि नातलग वेगळे हे समजलेच नाही…

आपल्याला सगळे झिडकारत आहेत असे वाटू लागले.विरंगुळा काय तो दोन मुलींचा.रेणू अगदी नवऱ्यावर देखणी शांत,खळीदार हसणं… बाबा गेल्यावर उदास-गप्प गप्प रहायची, आता आपले हक्काचे नाही याची समज तिला लवकर आलेली.रेणूचा धाकटी म्हणजे देवू वर विलक्षण जीव. देऊ चे डोळे म्हणजे तिचा अँसेट… अतिशय बोलके,मोठाले डोळे, काळ्याभोर पापण्या प्रचंड मोठया,आकाशीसर पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाची बुब्बुळ… दोघीना रंगाचे भारी वेड…

तिला स्वतःला आर्टिस्ट व्हायचे होत पण एक वेगळंच आयुष्य तिच्या वाट्याला आलेलं…पण दोन्ही मुलीना मात्र त्यांच्या आवडीने जगू द्यायचे अस ठरवलेलं पण हे स्वप्न नियतीने पुन्हा उध्वस्त केलेले… ९ ऑक्टोबर १९९३ ला देवू ला अचानक सर्दी खोकला  झाला. त्यातच ताप  आला.अंगावर काढण्यापेक्षा बालरोगतज्ज्ञ यांच्या कडे घेऊन गेली.

त्या रस्त्याने त्या दवाखान्यात जात नव्हती तर ती तिच्या गोंडस,सुंदर पाणीदार डोळ्याच्या मुलीच्या आयुष्याची शोकांतिका लिहायला चालली होती.

औषध घेऊन ही ताप कमी येत नव्हता.घसा लालसर झाला शरीरावर ही डाग दिसू लागले,एक डोळा लाल झाला. पुन्हा डॉक्टरानी तेच औषध सुरू ठेवा असे सांगितले. तापाचे प्रमाण पुन्हा कमी जास्त होत गेले.पण डोळे मात्र लाल, त्यातून येणारा पांढरा स्त्राव,पूर्ण शरीरावर भयंकर रँश.वरचा ओठ पूर्णपणे सुजलेला…एका विचित्र संकटाची चाहूल तर नाही ना…

रक्ताची तपासणी करून आणून द्या मगच समजेल… तोपर्यंत सेपट्रन हे औषध चालू ठेवा…हे औषध अगदी ओळखीचे झालं होत. तपासणी मध्ये मलेरिया झाले एवढंच समजले. डॉक्टरानी ताबडतोब अँडमिट करायला सांगितले. 26 तारखेला डॉक्टरांनी देवू चा नवाच आजार जाहीर केला.”STEVENS JOHNSON SYNDROME”  तिला तर समजलेच नाही. काळजी करू नका.ट्रीटमेंट बदलू असे डॉक्टर म्हटत. देवू च्या सर्वांगावर पडलेले लाल डाग आता काळ्या डागात परावर्तित झालेले.”ममा, रोज नवा फुगा तयार होतो बघ…”ती फोडाला फुगा म्हणायची… आता तिच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हते.ऍडमिट केल्यापासून सलायन,अनेकदा ब्लड काढण्यासाठी सुया टोचल्या जायच्या.पण देवू एकदाही रडली नाही. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे होते.देवू साठी आणि देवू च्या आईसाठी… या सगळ्यात तिला तिच्या धाकट्या दिराची मदत झाली.वेगवेगळे डॉक्टर यायचे ते सांगतात ते ऐकायचे त्यांच्या दृष्टीने तिची वेगळी केस असायची… अगदी हैद्राबादला मध्ये तिला दाखवले एक तर डोळ्यात आलेला कोरडेपणा आणि गेलेली दृष्टी… प्रत्येकाची वेगळी औषधे आणि त्यांचे चार्जेस….

(देवू च्या सुरुवातीच्या आयुष्यात जे वेदनादायी प्रसंग आले ते मला लिहणे सुद्धा त्रासाचे झाले जे याही पेक्षा तिने कोणावरही राग,दोष न देता सहन केले…खरच काय म्हणावे तिच्या सहनशक्तीला…)

या काळात तिला नवऱ्याची प्रकर्षाने उणीव भासली कारण तो फार्मासिस्ट होता…त्याच्या मुळे तिच्या देवू वरचे संकट तरी टळले असते… पण ती आठवण सुद्धा व्यक्त करायला सवड नव्हती….या दिवसात तिच्या सोबत तिचे आई वडील असूनही नव्हते आणि नसूनही होते.तिच्या मात्र सारख्या दवाखान्याच्या चकरा असायच्या.देवू कोणतेही आढे वेढे न घेता जायची.ज्यावेळी तिला कधीच दिसणार नाही हे कळाले तेव्हा निरागस मुलीने आईची समजूत घातली आणि तिलाच धीर दिला,”ममा तू रडतेस, मी चालेन हं… पण मला आता गाड्या दिसणार नाहीत… मी त्रास देणार नाही, शहण्यासारखी वागेन…तू मला काठी आणून दे.”  या सगळ्यात तिचा धाकटा दीर आणि धाकटा भाऊ यांची साथ मिळाली.आणखी बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले ते सहानभूती म्हणून नाही तर देवू आणि तिच्या आईची जिद्द बघून…काळकर काका फ्रान्सहून येताना देवू साठी प्रिझर्व्हेटिव्ह फ्री टीअर ड्रॉप्स च्या ट्यूब आणल्या(डोळ्यातला ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी) एकही पैसा घेतला नाही, वावीकर बाईनी ब्रेल किट च हातात सोपवलं,देवू ला ब्रेल शिकवायची…

माणूसवेडी देवू कोणी आले की तिला प्रचंड आनंद व्हयचा.स्पर्शा चे ज्ञान तिला आता चांगले अवगत झाले होते.घरातल्या घरात ती सहज वावरू लागली… गप्प राहणाऱ्यातली मुळीच नव्हती ती.देवू ला आईच्या शाळेतच घातले. आई तिला पुस्तक मोठ्या ने वाचून दाखवत असत.एकक शब्द आणि त्याचा अर्थ…तिचे मार्क नेहमी छान असायचे…तिची हुशारी बघून इतर मुलांमध्ये न्यूनगंड येईल म्हणून तिचे प्रत्येक विषयातले मार्क कमी केले. हे कळल्यावर देवू च्या आईला खूप वाईट वाटले.पण त्या काही बोलू शकल्या नाहीत…पण काही शिक्षक असे ही होते की तिला योग्य मार्गदर्शन करत तिच्यावर त्यांचा जीव होता कारण ती हुशार आणि बुद्धीमान म्हणून नव्हे,तर तिला प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याची मनस्वी ओढ होती. असे चांगले वाईट अनुभव आले तरी त्या दोघी पुन्हा नव्याने सज्ज होत…तिच्या रेणू दि ची ही साथ खूप मोलाची होती.

देवू सातवीच्या वार्षिक परीक्षेत चारी तुकड्या मधून पहिली आली. सेमी इंग्लिश मिडीयम च्या वर्गासाठी निवडलेल्या मुलांच्या यादीत तिचा पहिला क्रमांक होता.तिची स्मरण शक्ती अफलातून होती.स्वतःचे वेळापत्रक स्वतः आखून त्याप्रमाणे पूर्तता झाली पाहिजे हा तिचा कटाक्ष असे.दहावी ला तिला 86% मार्क मिळाले. देवू च्या यशात नँब ने प्रचंड सहाय्य केले.तिथल्या लोकांनाही देवू चे वेगळे जाणवले असावे.फोन केल्यावर,”बोला देवू ची आई”काय हवं नको ते विचारायचे. दक्षिणेतल्या अंदमान सफरीसाठी महाराष्ट्र राज्यातून काही अपंग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात देवू चा ही समावेश होता.ती व्यवस्थित जाऊन आली ही…

देवू ने आर्ट्स ला ऍडमिशन घेतले. इकॉनॉमिक्स हा विषय तिला खूप आवडतो.शाळेतल्या प्रमाणे तिला कॉलेजमध्ये मैत्रिणी ही खूप छान मिळात गेल्या… “10 वी 12 वी त पहिलं येणं नाही ग एवढं क्रेडीटेबल… मला माणसांसाठी, त्यांच्या सुखासाठी काहीतरी करायचंय,त्यासाठी भरपूर शिकू दे ग मला’असे ती म्हणयची. देवूला संशोधनात रस आहे… जे तिला करावेसे वाटते त्याची पूर्तता झाली असे लेखिकेने दाखविले आहे…

या सगळ्या यशात देवू ला तिला आई, बहीण आणखी खूप जणांची साथ लाभली असली तरी तिची अभ्यासू वृत्ती, जिद्द, स्वतः चे विचार मांडण्याचे धाडस,सगळ्याच गोष्टीत शिस्तबद्धता…या तिच्या गुणांचे योगदान खूप महत्वाचे आहे…

हे प्रेरणादायी पुस्तक वाचनीय आहे.

धन्यवाद!!

संवादिनी – सौ. अक्षता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

सौ. माधुरी समाधान पोरे

(सौ. माधुरी समाधान पोरे आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण- बी. ए. आवड- वाचन, लेखन छंद- वारली पेंटिंग,  शिवणकाम.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – सागरात हिमशिखरे (अकरा देशांचा सफरनामा)

लेखिका – मेधा आलकरी

जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे

घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे

अशी मनःस्थिती झाली नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. घर हवं नि भटकणंही, हेच जीवन जगण्याचं मर्म असतं. मेधा अलकरींच्या कुंडलीत भटकण्याचे ग्रह उच्चस्थानी, आणि जोडीदारही साजेसा मग कायं सोने पे सुहागा….

उपजत आवड आणि फोटोंची योग्य निवड यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला.पुस्तकातील फोटोंचं पूर्ण श्रेय त्यांच्या पतींचे.

मेधाताईंनी देशविदेशात, सप्तखंडांत मनापासून भटकंती केली. किती वैविध्यपूर्ण प्रदेशातून त्या वाचकांना हिंडवून आणतात ते नुसतं लेखांची शीर्षक वाचलं तरी ध्यानात येतं.अनेक खंडात फिरण्याचे अनुभव, समुद्राचे नाना रंग, ज्वालामुखीचे ढंग, पुरातन संस्कृतीचे अवशेष आणि वैभव, तर दुसरीकडे जंगलजीवनाचा थरार, यामधे फुलांचे सोहळे असे चितारले आहेत की जणू वाचक शब्दातून त्यांच सौंदर्य जाणवू शकतो. हे सामर्थ्य आहे लेखनाचं.

सागरात हिमशिखरे हा लेख समुद्राचे बहुविध मूड दाखवतो. अंटार्क्टिका हे पृथ्वीचं दक्षिण टोक. तिथे निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला,अनुभवायला मिळतात. या प्रवासाची आखणी खूप आधीपासून करावी लागते.  इथला अंदाज वर्तवणं अशक्य. इथले रहिवासी पेंग्विन. आर्क्टिकचा राजा हा मान आहे पेंग्विनचा, मानवसदृश हावभाव न्याहाळणं हा अद्वितीय अनुभव आहे. त्यांची परेड म्हणजे  पर्यटकांच्या नयनांना मेजवानीच. सील माशाचं जगणं, अल्ब्राट्रास ह्या मोठया पक्ष्याचं विहरणं हे वाचताना देहभान हरपतं. हिमनगाच्या जन्माची कहाणी त्याचा जन्म रोमांचकारी अनुभव आहे. निसर्गमातेची ही किमयाचं! चिंचोळया समुद्रमार्गातून जाताना बसणारे हेलकावे, हिमनदी, उंच बर्फाचे कडे, शांत समुद्र, त्यात पडलेले पर्वताचे प्रतिबिंब, कयाकमधून हिमनदयांच्या पोकळयातून वल्हवणं यामुळे सर्वांच जवळून दर्शन होतं. इथे अनेक पथक संशोधनासाठी येतात. आपल्या भारताचंही पथक इथं आहे ही अभिमानाची बाब आहे. खरंच शुभ्र शिल्पांनी नटलेल्या या महासागराची, द्वीपकल्प ची सफर एकमेवाद्वितीय!

यातील पेरूची फोड तर फारच गोड पेरू  हा प्राचीन संस्कृतीचा, भव्यतेचा आणि अनोख्या सौंदर्याचा देश. शाकाहारी मंडळींना विदेशात फिरताना येणारा शाकाहाराचा अर्थ किती वेगळा भेटतो हे जाणवतं. बर्‍याचदा ब्रेड-बटरवरच गुजराण करावी लागते. तेथील सण, समारंभ, यात्रा, जत्रा, रंगबेरंगी पोषाखातील स्री-पुरूष, असे अनेक सोहळे पाहायला मिळतात.  अनेक भूमितीय आकृत्या, प्राणी, पक्ष्यांच्या आकृत्या, नाझका लाइन्सची चित्रं पाहून कोकणातील कातळशिल्प आठवतात.  ही कुणी व का काढली असतील हे वैज्ञानिकांनाही गूढच आहे. माचूपिचू हे प्रगत संस्कृतीची देखणी स्थानं. म्युझियम, सूर्योपासकांचं सूर्यमंदिर, दगडी बांधकामाच्या जुन्या भक्कम वास्तू असा सारा समृद्ध इतिहास कवेत घेऊन हे शहर वसलं आहे. खरंच हा दीर्घ लेख वाचावा- आनंद घ्यावा असाच आहे.

समुद्रज्वाला हा बिग आयलंडमधील जागृत ज्वालामुखी या लाव्हांचे वर्णन या लेखात आहे. 1983 पासून किलुआ ज्वालामुखी जागृत आहे. 2013 मधे त्याचा उद्रेक होऊन पाचशेएकर जमीन निर्माण झाली. आजही तो खदखदतोय. हे रौद्र रूप, गडद केसरी लाव्हा हे दृश्य खूपच विलोभनीय.  हा नेत्रदीपक, अनुपम निसर्गसोहळा डोळयांनी पाहताना खूप छान वाटते. या लव्हांचा कधी चर्र, कधी सापाच्या फुत्कारासारखा, तर कधी लाह्या फुटल्यासारखा आवाज असतो.

लेखिकेला मोहात टाकणारा फुलांचा बहर त्यांनी मनभरून वर्णन केलाय फूल खिले है गुलशन गुलशन!  या लेखात. बत्तीस हेक्टरचा प्रचंड मोठा परिसर, वेगवेगळया आकाराची रंग आणि गंध यांची उधळण करणारी असंख्य फुलं! खरंखुरं नंदनवन! एप्रिल आणि मे महिन्यात आठ लाख पर्यटक हजेरी लावून जातात. हाॅलंडची आन-बान-शान असलेला ट्युलिप हे हाॅलंडचं राष्ट्रीय पुष्प! या  बागेत फिरताना मनात मात्र एक गाणे सतत  रूंजी घालत होते…..’दूर तक निगाहमे हैं गुल खिले हुए’.

लाजवाब लिस्बन या लेखात लिस्बन या शहराचे वर्णन केले आहे. हे सात टेकड्यांवर वसलेले शहर आहे. सेंट जॉर्ज किल्ला उभा आहे. या किल्ल्यांचे अठरा बुरूज प्राचीन ऐश्वर्याची साक्ष देतात. तटबंदीवरून शहराचा मनोरम देखावा दिसतो.  गौरवशाली इतिहास, निसर्गसौंदर्य, स्वप्ननगरीतल्या राजवाड्यांचा तसेच भरभक्कम गडकिल्ल्यांचा आणि खवय्यांचा हा लिस्बन खरोखरच लाजवाब!

हाऊस ऑफ बांबूज या लेखात गोरिलाभेटीचा छान अनुभव मांडला आहे. हा मर्कटजातीतील अनोखा प्राणी,  याचे अस्तित्व पूर्व अफ्रिकेतील उत्तर रंवाडा, युगांडा व कांगो या तीन सीमा प्रदेशात आहे.   हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. पण त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे अशी शंका आली तर तो काहीही करू शकतो. त्याच्यासमोर शिंकायचे नाही, मनुष्याच्या शिंकेतू न त्याला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. घनदाट जंगल,  नयनमनोहर सरोवर आणि वन्यजीवांना मुक्त संचार करता यावा अशी अभयारण्यं, एक निसर्ग श्रीमंत देश! रवांडाच्या हस्तकलेचा एक वेगळाच बाज आहे.

आलो सिंहाच्या घरी या मसाई माराच्या जंगलसफारीवर लिहलेला लेख वाचताना लक्षात येत की, प्राणी दिसण्याची अनिश्चितता नेहमीच असते. प्राणी दिसले तरी शिकारीचा थरार दिसेल याचा नेम नाही. पण विविधतेनं नटलेलं जंगल पाहण्याचा, तेथील सुर्योदय-सूर्यास्त अनुभवण्याचा, तंबूत राहण्याचा आणि मसाई या अदिवासी जमातीची संस्कृती जवळून पाहण्याचा अनुभव आपल्या कक्षा रुंदावतो.

भव्य मंदिराच्या रंजक आख्यायिका या लेखात जपानमधील पर्यटनात मंदिराचा वाटा  मोठा आहे. तिथला परिसर, स्वच्छता, शांतता सारचं अलौकिक.  परंपरा जपणारे भाविक नवीन वर्षाच स्वागत सकाळी लवकर उठून मंदिरात जातात. खरंच  ‘उगवत्या सूर्याचा देश’  हे जपानचं नाव अगदी सार्थक आहे असे वाटते.

चीन देशाच्या रापुन्झेल ह्या लेखात लांब केसांच्या एका तरुणीच्या जर्मन परीकथेचा  उल्लेख येतो. पायापर्यंत लांब केसांच्या  असलेल्या ‘रेड याओ’ जमातीतील स्त्रीयांच्या  लांब केसाच्या मजेदार कथा आहेत.  केस हा स्त्रीयांचा आवडता श्रृंगार. तिथल्या केसांबद्दल काय रूढी आहेत याच्या गमतीदार कहाण्या वाचायला मिळतात.

प्रवास माणसाला,  आयुष्याला अनुभवसमृद्ध करतो. आपण गेलो नसलो तरी त्यांच वर्णन वाचून आपलं निसर्गाबद्दलचं आणि संस्कृतीच ज्ञान वाढतं. मेधाताईंच हे पुस्तक वाचकाला निखळ आनंद देईल अशा ऐवजाने भरलेले आहे.

सागरात हिमशिखरे हा अकरा देशांचा सफरनामा वाचत असताना खरोखरं सफर करून आल्यासारखं वाटंल!!

संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नांव – विज्ञानबिंदू

लेखक – प्रा. मोहन पुजारी, इचलकरंजी

श्री. मोहन पुजारी यांचा हा पहिलाच लेख संग्रह. वैज्ञानिक व शैक्षणिक लेखांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे. तसंच ते विषयाला साजेसं आहे. इचलकरंजी शहरात एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. विज्ञान – जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन, विद्यार्थी व पालकांचा संपर्क आणि त्यांचं सामाजिक भान यातून त्यांच्यातला लेखक घडला आहे. त्यामुळे या पुस्तकात तीनही दृष्टीने लिहिलेले लेख वाचायला मिळतात. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकातील पहिल्याच ” मुलांमधील संवेदनशीलता”या लेखात सध्या पालकांच्या समोर असलेल्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. संवेदनशीलता म्हणजे काय हे सांगून,ती बोथट का झाली आहे याचे विवेचन केले आहे. एवढेच नाही तर त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत. त्यामुळे विषयाला न्याय मिळाला आहे.

बहुपयोगी बांबू या लेखात बांबू या वनस्पतीची शास्त्रीय माहिती त्यांनी दिली आहे. बांबू सारख्या वनस्पतीचे विविध उपयोग वाचून मन थक्क होते.सामान्य माणसांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल. शिक्षणातून संस्कार या लेखात विज्ञान विषयाची सांगड संस्कांराशी कशी घालावी याची मोठी रंजक माहिती मिळते. उदा.  न्यूटनच्या सप्तरंगी तबकडीत त्यांना भारतीयांची एकात्मता आढळते.जीवशास्र आपल्याला निसर्गाचं मानवी आयुष्यातलं महत्त्व सांगतो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं महत्त्व विषद करतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी रसायनशास्त्रातील पदार्थांच्या गुणधर्माचा उपयोग करून पटवून देण्याचा प्रयत्न ते करतात. एक संवेदनशील विचारी शिक्षक या लेखकाच्या मनात दडलेला दिसतो.निसर्गाशी नाते जोडूया या लेखात वनस्पतींवर झालेल्या प्रयोगाचे उदाहरण दिले आहे. वनस्पतींना भावना असतात. निसर्ग व माणूस यातला जिव्हाळा त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो या एका वेगळ्या मुद्द्याचा उल्लेख या लेखात केलेला दिसतो. निसर्गातून घेण्याच्या गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. जसं की; सिंहाचा रुबाबदारपणा,हरणाचा चपळपणा, फुलपाखराचे सौंदर्य,मधमाशीकडून समाजसेवा, मुंगीची शिस्त इ. यांत्रिकीकरणामुळे मिळालेला वेळ आणि रिकामे हात निसर्ग संवर्धनासाठी वापरा हा संदेश या लेखात दिला आहे.

जलसंवर्धन – काळाची गरज – या लेखात त्यांचा या विषयाचा अभ्यास लक्षात येतो. या लेखात आणि एकूणच पुस्तकातील माहितीपर लेखात क्रमांक घालून मुद्दे,उपमुद्दे गुंतागुंत व क्लिष्टता टाळली गेली आहे.वाचकाला विषय समजणं सोपं झालं आहे. लिखाणाच्या याच वैशिष्टपूर्ण पद्धतीमुळं टेस्ट ट्यूब वनस्पती हा लेख वाचनीय झाला आहे.

नयनरम्य प्रवाळे हा लेख या पुस्तकाचा आकर्षण बिंदू आहे. प्रवाळ म्हणजे काय, प्रवाळांची वैशिष्ट्ये,त्यांचे प्रकार, उपयोग, अनुकूलन अशा सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी केला आहे.त्यांचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येते. समुद्रातील अतिशय सुंदर पर्यावरणसंस्थेची माहिती वैज्ञानिक भाषेची क्लिष्टता टाळून लिहिण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रवाळांच्या फोटोमुळे लेख वाचताना कुतूहल निर्माण होते आणि लेख आकर्षक ठरतो.

घर,शाळा आणि आरोग्य, सार्वजनिक उत्सवांचे बदलते स्वरूप, व्यसनाधीनता,सुखावह वृद्धत्व अशा लेखांमधून लेखकाचे सामाजिक भान लक्षात येते. थकलेली शारीरिक अवस्था व कमकुवत ज्ञानेंद्रिये,परावलंबन आणि परिणामी आलेली मानसिक अस्वस्थता यांचा तोल साधत वृद्धत्व सुखावह कसे करावे हे छानशा भाषेत सांगितले आहे. लेखक स्वतः जबाबदार ज्येष्ठ नागरिक असल्यानं या विषयाची हाताळणी संवेदनशील मनानं झाली आहे.

व्यसनाधिनता- एक सामाजिक समस्या या लेखात व्यसनाधिनतेची कारणे, त्यावरील उपाय वाचायला मिळतात.या लेखाच्या शेवटी पालकांना सल्ला देताना ते एक जीवनमंत्र देतात.मुलांना मुठीत न ठेवता मिठीत ठेवा हाच तो मंत्र! मुलांना वाचनाचे आणि अभ्यासाचे व्यसन लागू दे अशा शुभेच्छा देखील ते देतात.

वनस्पतींचा आरोग्याशी असलेला संबंध, महाराष्ट्रातील सण -उत्सव आणि वनस्पती, वनौषधी आणि स्री सौंदर्य, तसेच उतू नका,मातू नका, फळांच्या साली टाकू नका अशा सारख्या लेखांमधून वनस्पतींचं महत्त्व साध्या,सोप्या भाषेत सांगितले आहे. संपूर्ण पुस्तकात असलेली साधी, सोपी सहज भाषा; पुस्तक वाचनाची ओढ निर्माण करते. ‘ ज्याप्रमाणे थर्मामीटर मधील पारा वर- खाली होतो, पण बाहेर पडू शकत नाही ‘ किंवा आपले घड्याळ आपल्या मानगुटीवर बसले आहे.’

वरवर बघता साधी वाटणारी अशी वाक्ये लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि विचारशक्ती दाखवतात.

वैज्ञानिक लेखांच्या या लहानशा पुस्तकाला कुतुहल निर्माण करणारे आकर्षक मुखपृष्ठ लाभले आहे. विषयाची सोप्या पद्धतीने हाताळणी, मुद्देसूद मांडणी, वैज्ञानिक संज्ञा न वापरता सामान्य माणसाला समजेल अशी भाषा, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास ही या पुस्तकाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे

लेखकाचे नाव- रमाकांत देशपांडे

प्रकाशक- अनिरुद्ध कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रथम आवृत्ती- १ एप्रिल 20 19

किंमत- 450 रुपये.

“स्वामी” या रणजीत देसाई यांच्या कादंबरीतून ‘राम शास्त्री’ यांचे नाव वाचले, ऐकले होते परंतु त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती नव्हती. ती या पुस्तकातून चांगली मिळाली.

राम शास्त्री प्रभुणे यांचे गाव सातारा जवळ माहुली हे होते. विश्वनाथ शास्त्री प्रभुणे यांचे ते चिरंजीव होते. लहान असताना त्यांचे वडील गेले. बालपणी अतिशय हूड स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांची आई- पार्वती बाई यांना रामची खूप काळजी वाटत असे. लहानपणी शिक्षण घेण्यात त्यांनी खूप टाळाटाळ केली. त्यामुळे सर्वांच्याकडून बोलणी खावी लागत होती. शेवटी गाव सोडून बाहेर पडले. सातारला आले व तिथून पुढे पुण्यापर्यंत आले. त्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी काशीला जाण्याचा निर्धार केला. काशीला जाऊन विद्वान पंडित होऊन राम शास्त्री बारा वर्षांनी घरी आले. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पुणे येथे वेदशास्त्र संपन्न पंडित म्हणून बोलावून घेतले. तेथपर्यंत त्यांचा जीवन प्रवास वाचताना त्यांचा स्वाभिमान, बाणेदारपणा , निर्भीडपणा हे सर्व गुण दिसून येतात. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. न्यायी वृत्ती आणि चांगल्या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा स्वभाव हे सर्व कादंबरीकारांनी चांगले रंगवले आहे.

पुणे येथे पेशव्यांच्या दरबारात त्यांचा योग्य तो सन्मान झाला. राम शास्त्रींनी धर्मशास्त्र आणि राजकारण यांची सांगड घालून पेशव्यांच्या दरबारात स्वतःचे स्थान प्रस्थापित केले. नानासाहेबांनंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या दरबारात त्यांनी अतिशय चांगले कार्य करून न्यायासनाची प्रतिष्ठा राखली. त्यांना न्यायदानाचे सखोल ज्ञान होते.  राघोबा दादांनी नारायण रावांचा खून कसा करवला याविषयीचा सर्व तपशील या कादंबरीत वाचावयास मिळतो. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा बाणेदार पणा अनेक प्रसंगातून लेखकाने दाखवून दिला आहे. नारायणराव पेशव्यांच्या खुना संदर्भात सर्व पुरावे त्यांनी गोळा केले.आणि त्यानंतर  राघोबा दादांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. त्यातून त्यांचा निर्भीडपणा दिसून येतो. कादंबरी वाचताना डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सत्य तर हवेच पण रंजक पणा ही  हवा या दोन्ही गोष्टी कादंबरीत दिसून येतात. पुणे, शनिवार वाडा, पेशवाई याविषयीच्या सर्वच गोष्टी मराठी वाचकांना मनाला भावणाऱ्या असतात. त्यामुळे कादंबरी वाचताना आपण कथानकाशी  तद्रुप होऊन जातो.

राम शास्त्री प्रभुणे यांची व्यक्तिरेखा उलगडून दाखवण्यात लेखक अगदी यशस्वी झाले आहे असे या कादंबरी बद्दल मला वाटले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print