मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “संवादू अनुवादू” – उमा वि कुलकर्णी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

पुस्तक  – संवादू अनुवादू

लेखिका – उमा वि कुलकर्णी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस 

मूल्य –  450 रु

संवादु अनुवादु (आत्मकथन)

‘उमा वि कुलकर्णी’ हे नाव वाचले की डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या पर्व, वंशवृक्ष, मंद्र या भैरप्पांच्या कादंबऱ्या! आम्हाला त्या मराठीत वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या त्या उमाताईंनी ! वास्तविक शिवराम कारंथ, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती यांच्याही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. काही पुस्तके, मालिका यांचेही लेखन केले आहे. परंतु भैरप्पा आणि उमताई हे समीकरण वाचकांच्या मनात अगदी पक्के बसले आहे. याच उमाताईंचे आत्मकथन म्हणजे ‘संवादु-अनुवादु’ हे पुस्तक!

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथे त्यांचे बालपण गेले. वास्तविक घरात मराठी भाषा बोलत असले तरी आजूबाजूच्या लोकांच्या सहवासात राहून कन्नड पण त्यांना उपजतच येत होते. शिवाय पंजाबी घरमालक, नायर शेजारी त्यामुळे मल्याळम , मिलिटरीचे ठाणे शेजारीच असल्यामुळे हिंदी- इंग्रजी भाषेचा संस्कार , असे विविध भाषांचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर झाले.

नंतर विरुपाक्ष यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांना कन्नड बोलण्याचा सराव करावा लागला. ती भाषा कळत असली तरी बोलायला आणि लिहायला – वाचायलाही त्यांना जमत नव्हती. मग इतके अनुवाद त्यांनी कसे केले हा वाचकांना प्रश्न पडतो.

पण एक प्रसंग असा घडला की त्या अनुवादाकडे वळल्या. शिवराम कारंथ याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनी ती कादंबरी मिळवून वाचून काढली.त्यांचे वर्णन ऐकून उमाताईना पण ती वाचण्याची उत्सुकता वाटू लागली. पण नुसते कथानक ऐकून त्यांचे समाधान झाले नाही. मग उमताईंनी त्यांना ती हट्टाने वाचून दाखवायला सांगितली.आणि सहजच जे ऐकले ते मराठीत लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अनुवाद लिहिला गेला. तेथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.

त्याच प्रवासाची कहाणी म्हणजे हे आत्मकथन आहे. या प्रवासात उमाताई आपल्याला गुंतवून ठेवतात. त्यांनी ज्या लेखकांचे साहित्य अनुवादित केले ते सर्व लेखक वेगवेगळ्या विचारधारेचे होते. त्यांची लेखनशैली वेगवेगळी होती. तरीही त्याचा अनुवाद करताना कुठेही उमाताई कमी पडल्या नाहीत. त्यांची अनुवादित पुस्तके तितक्याच रसिकतेने वाचली जातात आणि हेच अनुवादकाचे कौशल्य आहे. कित्येकदा अनुवादकाला दुय्यम स्थान दिले जाते. तसेही अनुभव यात त्यांनी मांडले आहेत. आहे तसे, घडले तसे मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो केवळ त्यांचाच प्रवास नाही , तर वाचकांनाही उत्सुकता निर्माण करणारा आणि ती शमवणारा लेखनप्रपंच आहे. हे आत्मकथन आपल्याला अनेक गोष्टींवर विचार करायला लावणारे, अंतर्मुख करणारे आहे. जीवनप्रवासात आलेले कटू गोड अनुभव त्या एकाच तराजुतून तोलतात. म्हणूनच अपत्य नसल्याची खंत न बाळगता आपल्या पुस्तकरुपी अपत्यात त्यांनी तो आनंद शोधला.   अनुवादातून मिळणारा आनंद व्यक्त करताना त्या म्हणतात,“ मूळ लेखक कितीही प्रतिभावान असला तरी त्याच्या निर्मितीला मर्यादा आहेत; पण अनुवादकाला ही मर्यादा नाही.अनुवाद त्याला आयुष्यभर साहित्यक्षेत्रात रमायची सोय करुन देतो. आपल्या आयुष्यात अनुवादक कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती आपल्या वाचकांना देऊ शकतो.” वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद त्यांनी या लेखनात शोधला आणि हेच त्यांचे संचित आहे. म्हणूनच त्या म्हणतात की,“आमचे अनुवाद आणि आमचे जीवन इतकं एकमेकांत मिसळून गेले आहे की ते वेगळे काढणे आता शक्य नाही.”

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “शेल्टर” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

कथा संग्रह  – शेल्टर

अनुवादिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

पुस्तक परिचय: शेल्टर ( हिंदीतील कथांच्या अनुवादाचे पुस्तक)

श्रीमती उज्ज्वला केळकर

लेखिका उज्वला केळकर यांचा ‘शेल्टर’हा अनुवादित कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे .

वेगवेगळ्या प्रतिथयश लेखकांच्या निवडक कथांचा अनुवाद लेखिकेने लीलया केला आहे.

एक एक कथा म्हणजे एक एक मोती आणि या मोत्यांचा सर गुंफण्यात आणि वाचकाला वाचनात सक्रिय ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

लेखिकेनं कथा अनुवादित केल्या आहेत नव्हे तर त्यांचे अनुसृजन झाले आहे असे म्हणावे लागेल .सामाजिक परिस्थिती ,पात्रांची मानसिकता,त्या त्या प्रांतातील पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि या सर्वातील बदल यांच्या तपशिलाने पुस्तक सजले आहे .

पुस्तकातील प्रत्येक कथा ही हलकीफुलकी, समजायला सोपी,हृदयाला भिडणारी आणि शेवटी एक संदेश देऊन जाणारी अशी आहे .

लेखिकेची भाषा प्रवाही आहे अनुवाद करताना संबंधित प्रांतातील त्या कथेतील पात्रांची नावे लेखिकेने जशीच्या तशी ठेवून कथेचा लहेजा कायम ठेवला आहे.

लेखिकेची सृजनात्मकता पाहून नक्की प्रेमात पडावं असा हा कथासंग्रह !!

एकूण तेरा कथा असलेला हा कथासंग्रह!! त्यापैकी काही कथांचा परामर्श मी इथे घेत आहे. मृत्युपत्र कथा अंतर्मुख व्हायला लावते आपल्या दोन्ही मुलांवर अपार प्रेम असलेली आई आपल्या सुनांना मुलीं प्रमाणे वागणूक देते.मुलांसाठी समान वाटणी असलेले मृत्युपत्र ही रजिस्टर करते. तिची आई ज्यावेळी तिला संभाळण यावरून दोन्ही मुलात वाद होतात तेव्हा मृत्यूपत्र बदलते आणि संपूर्ण संपत्ती ट्रस्टच्या नावे करते.

कहाणी अतिशय बोलकी आहे ती केवळ लेखिकेने खूपच touching feel दिला आहे म्हणून..

‘शेल्टर’ ही मुलाने अव्हेरल्यावर स्वतःचे शेल्टर शोधणाऱ्या आईची कथा ! मिस्टर कपूर हेच तिचं अखेर शेल्टर बनतात…..

‘कुणाचा फोन वाचतोय’ ही कथा म्हणजे भ्रमाचा भोपळा फुटला असं आपण म्हणतो ना तसं काहीसं कथानक …….आपण केलेल्या कथासंग्रहाला दाद मिळावी ही स्वाभाविक अपेक्षा असणाऱ्या राजदीप ची ही मनाची घालमेल दर्शवणारी कथा !फोनची वाट पाहण्यात आलेली त्याची अस्वस्थता खूपच छान रित्या लेखिकेने वाचकांपर्यंत पोहोचली आहे .

‘धूर’ या कथेतील केवल राम हा मुसलमान द्वेष्टा! त्याच्या भूतकाळातील अपमानाच्या खुणा अजूनही ताज्या आहेत. कोणताही स्वाभिमानी, आक्रमकांनी दिलेल्या जखमा विसरू शकत नाही .या त्याच्या तिरस्काराच्या ठिणगी वर कुटुंबीय वारं घालतात सरतेशेवटी तो ‘take the life as it comes’ या तत्त्वाचा स्वीकार करतो. त्याच्या मानसिकतेतील उतार-चढाव लेखिकेने छान अधोरेखित केले आहेत.

‘अढळ पर्वत’ या कथेत ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतलेल्या धरमदासला सन्मानपूर्वक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आमंत्रण असते पण तो नुसता सन्मान स्वीकारायला तयार नाही .गुंडांची दहशत समूळ मोडून काढायची चळवळ त्याला गप्प बसू देत नाही आणि त्यासाठी तो सज्ज होतो .

‘बंध नात्याचे’ या कथेमध्ये विधवा स्त्रीच्या मन भावना चितारल्या आहेत ती स्वतःसाठी आधार शोधते. याची जाणीव तिच्या मुलाला असत नाही. समाजाच्या विरोघात जाऊन समाजमान्य नसलेल्या गोष्टी करायला मुलगा तयार होत नाही. त्यामुळे तो तिला विरोध करतो. सर्व बंधने झुगारून ती मात्र आपल्या मित्राचा हात हातात घेते. अशी ही कथा लेखिकेने छान खुलवली आहे .

आपण डेटिंग ज्याला म्हणतो तशी काहीशी कथा ‘सहप्रवासी’! संपूर्ण संभाषणामध्ये दोघांचीही मते जुळत नाहीत परंतु संभाषणाच्या शेवटीशेवटी मनं जुळतात हे समजते हे केवळ लेखिकेच्या लेखन कौशल्यामुळे…

‘नातरा’म्हणजेच पुनर्विवाह मूळ लेखक भरत चंद्र रश्मी यांची याच नावाने असलेली ही कथा त्यातील नावे पात्र न बदलता लेखिकेने मांडली आहे विशिष्ट चालीरिती रूढी यांच्या कचाट्यात सापडलेल्या भुरीची ही कथा फारच हृदयस्पर्शी आहे.

‘खंधाडिया’ या कथेचे शीर्षक मूळचेच ठेवून लेखिकेने ही कथा रंगवली आहे तत्वनिष्ठ अशा बापाचं आपल्या लाच खाऊ आणि व्यभिचारी मुलाशी मुलाचे असलेलं हे द्वंद्व आहे. आपल्या सुनेला मुलगी मानून तिच्यासाठी लढणारा ढेडिया लेखिकेने खंबीरपणे उभा केला आहे.

‘तो क्षण’ ही या

कथासंग्रहातील शेवटची कथा! काही वर्षांपूर्वी झालेल्या कलहातून एक हिंदू आणि एक मुसलमान यामध्ये एक’ मजहब कि दीवार’ उभी राहते. मृत्यूची चाहूल लागलेले मौलाना अगतिक होतात. आपली शेवटची इच्छा प्रकट करायचा हक्क त्याना असतोच आणि ती पूर्ण करायची जबाबदारी आप्तांची…… पंडिताला भेटायची त्याची इच्छा पूर्ण होते पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते.

पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय आकर्षक चितारलेले आहे.

एकूणच जगण्याची कला शिकवणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे!!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ वाकळ – लेखिका मीनाक्षी सरदेसाई ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ वाकळ – लेखिका मीनाक्षी सरदेसाई ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

 

लेखिका मीनाक्षी सरदेसाई यांच्या अनेक कथा, ललित लेख दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहे. त्यातीलच निवडक 26 लेखांचा संग्रह म्हणजे ‘ वाकळ ‘.

वाकळ म्हणजे गोधडी, आजच्या काळात quilt. पूर्वी स्त्रिया दुपारचा वेळ सत्कारणी लावणे, जुनी लुगडी, धोतरे, यांचा वापर करून उबदार पांघरूणे हातानी शिवणे,  अंथरूण पांघरुण घरीच बनवून संसाराची एक गरज पुरी करण्यासाठी हातभार लावणे, असा साधा सरळ मानस. तो पूर्णं करायच्या प्रयत्नातून गोधडीचा जन्म झाला..त्यात वापरलेले तुकडे हे वापरणा-याच्या प्रेमाची,  आणि वात्सल्याची प्रचिती देतात,  असा प्रेमळ समज.

लहान मोठे,  रंगबिरंगी तुकडे जोडून त्याला चारी बाजूंनी नेटकीशी किनार लावून शिवलेली वाकळ घरच्यांना प्रेमाची,  आपलेपणाची ऊब आणि भावनिक सुरक्षिततेची हमी देत असे.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

लेखिकेने अनेक अनुभवांच्या, अनेक व्यक्तींच्या व अनेक आठवणींचे लिखाण एकत्र करून ही  संग्रहाची ‘वाकळ’  निर्मिली आहे.

संग्रहातील प्रत्येक रचनेला  स्वतःचे वेगळेपण आहे. चपखल अशा वैविध्यपूर्ण शब्दांतून प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब उभे रहातात.

सुरवातीच्या, म्हणजे वाकळीचा पहिला तुकडा “केशरचनेची गुंतावळ” . ऋषी मुनि,  देव-दानव, यांच्या केशरचनेपासून,  अत्याधुनिक शाॅर्ट कट असे दहा विविध प्रकार सामावले आहेत. शेवटी स्त्री सुलभ स्वभावानुसार त्या केसांचं कौतुकही करावं, अशी लाडिक मागणीही केली आहे. ‘ गुंतावळ’ म्हणण्यापेक्षा “कुंतलावली” असं नाजुक नाव द्यावं,  इतकं छान लेखन.

“लाडक्याबाई,” “अनाथांची आई”, ” गृहिणी”, “गुरुविण”, यातील व्यक्तिरेखा इतक्या सुंदर रेखाटल्या आहेत की त्या ओळखीच्या नसल्या तरी जवळच्याच वाटू लागतात. त्यांच्याच सारख्या आपल्या परिचित व्यक्ती मनात रुंजी घालू लागतात.

“सुवर्णमध्य”, “कागदी घोडे”, “विहिणी विहिणी”, “मूल्यशिक्षणाचे धडे”, तसेच  “डाॅक्टर तुम्ही सुद्धा”, “कामवाली सखी”,  “ओम् नमो जी आद्द्या”, “आलंय ते घ्यायला हवं”, या लेखनामधून सामाजिक परिस्थिती, घराघरातून थोडेसे अवघड झालेले प्रश्न, शिक्षण संस्था, वैद्यकीय व्यवसाय,  नातेसंबंधातली गुंतागुंत  आणि त्यातून समाजमनावर, कुटुंब व्यवस्थेवर होणारे परिणाम यावर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. व त्यावरचे उपायही समजावले आहेत.

“घडलंय बिघडलंय” हा छान खुमासदार लेख. वाचताना मनात खुदुखुदु हसू येतं. आपले पण असे घडलेले प्रसंग आठवतात. स्वयंपाक हे शास्त्र आहे. प्रयोग करता करता येणा-या अनुभवातून लागलेले शोध व त्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या यांचं शब्दांकन तंतोतंत पटतं.

माणसांव्यतिरिक्त असणारा प्राण्यांचा सहवास इतका जवळचा असतो कि त्यांना  आपण सोयराच मानतो.  “वाघाची मावशी”, आणि ” वानर”  त्यानाही समाविष्ट केले आहे.

“आईबाबा”, “बहिणी बहिणी”, “अनुभव”, “जामातो दशमग्रहृ”, या लेखांमधून अनुभव,  आप्तसंबंधातील प्रेम, तसेच न रूचणा-या गोष्टी तून स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडतात.

” सख्खे शेजारी “, आणि

” मायबोली ची लेणी ” हे या वाकळीचे सर्वात जुने तुकडे.  त्यांचा पोत, त्यांचा गाभा किंवा गर्भितार्थ आजच्या काळात ही लागू पडतो.

” येस बाॅस” हा एकदम नवीन तुकडा.

अशी ही ” वाकळ ” अनुभवांच्या तुकड्यांची.  पूर्वीच्या स्त्रियांच्या जीवनातील अव्यक्त जाणीवांवर प्रकाश टाकणारी, कष्ट,  दुःख,  सल, अपमान यांत भिजलेले तुकडे सांभाळणारी,  पतीचे प्रेम,  वडीलधा-यांचे वात्सल्य,  एकमेकींसह, जुळवलेल्या तुकड्यांबरोबर  जुळलेली मने, या सर्वांचा अनोखा पट उलगडणारी  ” वाकळ”.

स्थलकालाच्या सीमारेषा पार करणारी,  स्त्रीचे अंतरंग जपणारी, आधुनिक स्त्री च्या स्वावलंबनाचा व आर्थिक सक्षमतेचा मानदंड असणारी ही गोधडी म्हणजेच ” वाकळ “.

” वाकळ ” वाचता वाचता आपण ती कधी अंगावर घेतो, आणि  वाचन संपता संपता त्या उबदार दुलईत कधी शिरतो, कळतंच नाही.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 39 – वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह – थॅक्यू बाप्पा  ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है  उनके द्वारा श्री अनिल पाटील जी के काव्य संग्रह   “थँक्यू बाप्पा ” का  निष्पक्ष पुस्तक परिक्षण (पुस्तक  समीक्षा )। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #39☆ 

☆ वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह – थॅक्यू बाप्पा  ☆ 

पुस्तक परिक्षण 

पुस्तकाचे नाव – थँक्यू बाप्पा

लेखक – अनिल पाटील

प्रकाशक – चपराक प्रकाशन,पुणे

बुकगंगा ऑनलाइन लिंक >>>> ‘थँक्यू बाप्पा

 

मी काही फार मोठा समिक्षक वैगरे नाही. पण बर्‍याच ठिकाणी परीक्षण केल्याने  वाचनाचा  आस्वाद शोधक नजरेने घेण्याची सवय लागली. लेखक अनिल पाटील यांचा थॅक्यू बाप्पा हा कथासंग्रह माझ्या सारख्या चोखंदळ रसिकांच्या  अपेक्षा आणि जिज्ञासा पूर्ण करणारा आहे.

चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेला एकशेवीस पानांचा हा कथासंग्रह मुखपृष्ठासह अतिशय सुंदर सजला आहे.  विषयाचे वैविध्य,  नाविन्यता,  चतुरस्र,  परखड, रास्त  आणि कणखर  मते मनोगतात वाचायला मिळाली.  कौटुंबिक जीवनातील बारकावे हळुवारपणे टिपून घेत  अनेक वैशिष्ट्य जोपासत हा संग्रह सजवला आहे.  मनापासून भावलेले शब्द साध्या सोप्या भाषेत पण प्रभावी पणे या कथांनी व्यक्त केले आहेत

किल्लारी येथे झालेल्या भुकंपाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा संग्रहाचे मुख्य  आकर्षण ठरली आहे. सामाजिक भान जपणारी आणि प्रखर वास्तव टिपणारी ही कथा संवेदनशील लेखनशैलीने परीपूर्ण झाली आहे. *भूकंपाच्या काळ्या ढगाला लागलेली रूपेरी कड* , प्रांतिक भाषेतील विशिष्ट संवाद शैली,  वैयक्तिक दुःख विसरून नेमून दिलेल्या कामात  एकरूप झालेला रामसिंग, ढिगा-यातून बचावलेली मुलगी पाहून भावविवश झालेला पिता,  वाचकांना खिळवून ठेवणारे सशक्त कथानक यांनी पहिलीच कथा गणेशाचा आशिर्वाद मिळवून देते.  आणि  प्रत्येक कथा ताकदीने व्यक्त करण्याचा श्रीगणेशा करते. रसिकांची पसंती या पहिल्याच कथेने जोरदारपणे घेतली आहे. भूमिकन्या गेली हा शब्द काळजात घर करून राहिला. *सुख के क्षण प्रदान करने वाला सुखकर्ता हे शब्द प्रयोग चपखल ठरले आहेत*  एका मुलीला  आणि पालकांना मिळालेला निवारा रामसिंगच्या परीवाराचे दुःख हरण करणारा आहे. त्यामुळे या कथेचे शिर्षक साहित्यात  एका विशिष्ट  उंचीवर ही कथा घेऊन जाते.  अनेक जाणिवा, नेणिवा आणि भावना  यांचे उत्कट दर्शन या कथेच्या  शब्द चित्रणातून झाले आहे.

प्रसिद्ध साहित्यिक  प्रा. व .बा. बोधे यांची मार्गदर्शन करणारी विस्तृत प्रस्तावना संग्रहाची लोकप्रियता  अधिक वाढवते. योग्य समिक्षण आणि परीक्षण सरांनी केले आहेच. संग्रहाचे  अचूक विश्लेषण त्यांनी केले आहे.

मराठवाड्यातील खेड्यातला भुकंपग्रस्त राजू फलाट नंबर दहा ते कारगिल व्हाया इराॅस हे नाविन्य पूर्ण नाव कथेची  उत्सुकता वाढवते. कलाटणी देणा-या अनेक घटना  एकाच कथेचे गुंफण्याची कला नाविन्य पूर्ण वाटली. राजूचे बदलत जाणारे व्यक्ती मत्व ,  परीवर्तन  आणि त्याचा होणारा सत्कार हा सर्व प्रवास रमणीय ठरला आहे. या सर्व प्रसंग चित्रणात वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे.  अनेक छटा  असलेली ही कथा खूप वेगळी  आणि दमदार वाटली. लेखकाने केलेली नायकाची कानउघाडणी आणि त्यातून झालेले त्याचे परीवर्तन,  भावनिक  आंदोलने या  कथेत खूपच भारदस्त पणे व्यक्त झाली आहेत.  माणूस माणसाला बदलवू शकतो हा संदेश देणारी ही कथा खूप आवडली.

*सबाह अल खेर* ही कथा परदेशातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी सक्षम प्रेमकथा.  इराक मधील मिस स्वाद  आणि स्टेशन मास्तर  अमित यांची प्रेमकथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. युद्धानंतरची इराकची परीस्थिती,  रान हिरवे डोळे,  लालचुटुक पातळ ओठ,  अरेबिक शब्दांची तोंड ओळख, भारतीय संस्कृतीचा गोडवा  आणि स्वतः विवाहित  असुनही रंगत जाणारी प्रेमकथा, खूपच नाविन्य पूर्ण पद्धतीने हाताळली आहे.

*रूपाताई तुस्सी ग्रेट हो* ही रूपा  आणि प्रकाश यांची कथा महापालिकेच्या भ्रष्ट कारभार  उघड करणारी आहे. ललवाणी संकुलातील ही कथा सामाजिक  आणि राजकीय हितसंबंधावर मार्मिक भाष्य करते.  एक  आघात करण्याची  क्षमता या कथेच्या  आशयात आहे.  आशयघनता  आणि समाज प्रबोधन करण्यात ही कथा यशस्वी ठरली आहे. संघर्ष  आणि लढा यांचे यथार्थ वर्णन या कथेत केले आहे.

पाऊलवाट चुकलेल्या मुलाची *पुंडलिक वरदे हारी विठ्ठल* ही कथा  असाच मनाला चटका लावून जाते. समीर आणि शबाना यांची प्रेमकथा  एका वेगळ्या पार्श्वभूमीवरून हाताळली आहे. दहशतवादाचा धोका, इसिस चे मायाजाल,  मुंबई मिशन ब्लास्ट चा गुन्हेगारी तडका देत  कल्पना  आणि वास्तवता यांच्या मिश्रणात ही कथा धार्मिक, कौटुंबिक, आणि सामाजिक बांधिलकी जपत  आपला स्वतःचा ठसा  उमटवून जाते.

झुकझुक झुकझुक  आगीनगाडी,कश्या साठी पोटासाठी? वचन पूर्ती, थॅक्यू बाप्पा या सर्व कथा नव नवीन पद्धतीने साकार झाल्या आहेत. रेल्वेतील कामकाज विभागाचे बारकावे,  रेल्वे विश्वातील प्रवास, या श्रेत्रातील सांकेतिक शब्द,  आणि वैशिष्ट्य पूर्ण विदेशी भाषा या संग्रहातून या विविध कथाद्वारे पुढे  आली आहे.

लेखकाची व्यक्ती गत  भावनिक ,कल्पनारम्य आणि वैचारिक  गुंतवणूक या लेखसंग्रहाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरली आहे.  गणपती बाप्पाला पत्र लिहिणारी छोटीशी  आरोही संपूर्ण कुटुंबाला पुर्ण पणे कसे सावरते हे  शब्द कौशल्य  अजमावण्या साठी हा कथासंग्रह पुन्हा पुन्हा वाचावा असा ठरला आहे.  कथेची शिर्षक नेहमीच्या पेक्षा वेगळी  असली तरी प्रत्येक कथेला  अनुरूप ठरली आहे. त्यामुळे हा संग्रह दर्जेदार आणि वैविध्य पूर्ण साहित्य निर्मिती करणारा ठरला आहे.  कथेच्या सर्व बारीक सारीक गोष्टी नाविन्यता जोपासत  अनिलजी आपण  आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. रसिकांना खिळवून ठेवणारी शब्द शैली  आणि विचारांची नवी दिशा देणारे कथाबीज  आपण या संग्रहात खूप सुंदर रूजवले आहे.  अनेक ठिकाणी केलेले निरिक्षण, वाचन व्यासंग,  आणि शब्द सामर्थ्य यांनी समृद्ध झालेला थॅक्यू बाप्पा हा लेखन संग्रह मनोरंजनातून विचारांची देवाणघेवाण करणारा  एक चिंतन शील कथा संग्रह आहे. वाचन संस्कृती विकसित करणारा नाविन्य पूर्ण कथासंग्रह म्हणून या संग्रहाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.  खूप खूप गोष्टी या कथेतून लेखक म्हणून  आपण रसिकांना दिल्या आहेत.  रसिकांच्या  उत्तम साहित्य वाचनाच्या  अपेक्षा या संग्रहाने समर्थ पणे पूर्ण केल्या आहेत. या सर्व प्रवासात घनश्याम पाटील  आणि चपराक परीवाराचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.

आपल्या पुढील यशस्वी वाट  चालीस हार्दिक शुभेच्छा. आणि  अतिशय वेगळा आणि दर्जेदार कथासंग्रह रसिकांना दिल्या बद्दल  एक साहित्य रसिक म्हणून मनापासून थॅक्यू

 

*सुजित कदम, पुणे*

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य- पुस्तक समीक्षा – काव्य संग्रह ☆ विजय पर्व ☆ कविराज विजय यशवंत सातपुते – (समीक्षक –श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे)

काव्य संग्रह  – प्रकाश पर्व – कविराज विजय यशवंत सातपुते

सामाजिक जाणिवा जपणारे….विजयी प्रकाश पर्व 

कविता ही आभाळाऐवढी विस्तीर्ण असते आणि कवी मोठ्या लकबिने वेदना काळजाशी बाळगत आभाळा एवढ्या कवितेलाच आपल्या सहृदयी कवेत घेतो.

हे कविचं की कवितेचं मोठेपण…हे न उलगडणारं कोडं..!! मात्र  तरीही शेवटी या कवितेचा जन्मदाता हा कवीच् असल्याने तो थोरचं..!!

अनेक कवींच्या….नेक कविता बऱ्याच वेळेला सामान्य वाचकांच्या काळजाला हात घालतात..नव्हे नव्हे तर, समाजभान जागवून प्रबोधनाच्या क्रांतीची मशाल पेटवतात.आणि त्यातीलच एका जिंदादिल कवीची ही कविता …!!

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धात्मक आयुष्य जगताना पैसा आणि भौतिक सुख याचेच राज्य वाढत चालले आहे. या उपभोगिकरणाच्या मायाजालात आयुष्याचे सार मोजले जात असताना, कवितेत आपलं सर्वस्व ओतणारा आणि या कवितांनाच्, जीवनाचे सार मानून नव्या उमेदीने विचार भावनेतून विश्वात्मक होणारा एक जिंदादिलं कवी.. की ज्याच्या नावातच विजय आहे. या विजयाच्या हर्षात्मक विचार -स्पर्शाने मराठी साहित्याच्या दशदिशा आसमंत उजळवणारा लेखक..कवी…साहित्यिक,नव्हे..नव्हे तर याच्या पलीकडे जाऊन अनेकांच्या हृदयात..समाजात  मानवतेचा दीप प्रकाशमय ठेवणारा खराखुरा  प्रबोधनाचा प्रकाश आणि त्या प्रकाशाचं अखंड प्रकाशमय राहणार पर्व म्हणजे प्रकाशपर्व –  उर्फ – कविराज विजय यशवंत सातपुते…!!!

प्रकाशपर्व हा विजयजींचा तिसरा  काव्य संग्रह होय.अक्षरलेणी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.

समीक्षक – श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

त्याचा दोन  आवृत्ती प्रकाशित झाल्या.  अजुन देखील काव्य रसिकांच्या मनावर या दोन्ही  आवृत्ती  राज्य करत आहे.  कवितेशीच खऱ्या अर्थाने संसार करणाऱ्या या अवलियाने मराठी साहित्यातील कविता जिवंत ठेवण्यात योगदान दिले आहे, यात शंकाच नाही. प्रकाशपर्व दुसऱ्या काव्यसंग्रहात कविराज विजय सातपुते समाजातील वास्तव टिपणाऱ्या सच्च्या माणसांना म्हणजेच सर्व कवींना व या जगातून निरोप घेवून गेलेल्या आपल्या लहान बहिणीच्या आठवणीत गहीवरताना अंतरात अस्वस्थ करणारी वेदना आणि यातून काळजावर घाव घालणारी कविता म्हणजे फक्त स्वतःच्या आयुष्याचे सार नव्हे तर या कवीचं सर्वस्वच भावार्पण म्हणून अर्पण करतो. . . हे सगळं पाहत  असताना  कवीच्या विशाल हृदयात स्पंदणारी कविता किती दुःखं झेलत असेल …? किती  यातना पचवत असेल…?  हे सांगण अवघड आहे. फाटलेल्या आयुष्यात माणसांना जोडत जगणं सांधण्याची विजयजींची  भूमिका अचंबित करणारीच आहे. म्हणून प्रकाश पर्व या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता मनाला स्पर्शून जाते. कवितेतील व्यथा आपलीच असल्याची ठळकपणे जाणीव होते आणि मग वाचक कवितेच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही….इतकं काही लपलय त्यांच्या कवितेत.

एक भावार्पण

अंतरीच्या अंधारात

घुसमटणाऱ्या

त्या प्रकाशपर्वा साठी..!

मनाच्या अंतरीच्या अंधारात बहिणीच्या आठवणीमुळे होणारी उलघाल या कविस किती जाळत असावी आणि त्या ममतेच्या वेदना पचविण्याची ही कवीची धडपड..त्यातूनच जन्मास येणार प्रकाशपर्व …सर्व काही अनाकलनीय..!!!

आज खऱ्या अर्थाने  समाजात मानवतेच्या आणि सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करण्याची निर्माण झालेली गरज ओळखून आपल्या अतिशय खास अशा शैलीत कविराज कवितेतून सामाजिक वैचारिक प्रबोधन करत राहतात. याच माध्यमातून आपल्या सर्जनशील विचारांची देवाण घेवाण करताना कवी म्हणतो..

” लेक माझी सासुराला

आज आहे जायची

एक कविता द्यायची

एक कविता घ्यायची”

जाती,धर्म,विद्वेष,अंधश्रद्धा यांना सुरंग लावत कविराजांची लेखणी माणुसकीचा महिमा गाते. माणूस म्हणून जगताना, माणसांबरोबर राहताना ,सुखदुःखाची देवाण घेवाण करताना हा कवी स्वतःचं अस्तित्व शोधत राहिला आणि कवितेनेच यांच्या जगण्याचा यक्षप्रश्न सोडविला आहे. मात्र हे सर्व करत असताना गर्व, प्रसिद्धी, प्रतिभा ,पुरस्कार,सन्मान या मोहमायांचा छेद करत करत हा कवी आणि त्यांची कविता ही फक्त लोकाभिमुख करीत राहिला. साहित्य शारदेची  अखंड सेवा करण्यातच  ही लेखणी आत्ममग्न झालेली आहे. अस सर्व सदृश्य वास्तव.

ही आपली भावना सांगताना कवी म्हणतो –

 “नुरला तो गर्व…आणि उदयास आले प्रकाशपर्व”

“उजेडाच्या गावा जाऊ ..ज्योत क्रांतीची घेवू” या प्रकाशपर्व नावाच्या पहिल्याच कवितेतून व्यक्त होताना राजकीय..धार्मिक..जातीय पक्षांचे झेंडे गाडत समतेची गुढी उभारण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश दारोदार पोहोचवण्यासाठी कवीची लेखणी सतत तळपत राहते.अशावेळी हा कवी सामाजिक मर्मावर बोट ठेवत स्वतःला यासाठी सर्वप्रथम बदलण्याचं व विवेकी होण्यासाठी आवाहन करतो.अनिष्ट रूढी,प्रथा,कथा,अंधश्रद्धा, अघोरी कृत्ये यांना खोडत व सत्य असत्याची चिकित्सा करत न्यायाची पताका उरी बाळगून क्रांतीला सुरुवात करणारी कविता… हेच कविराज  विजय सातपुते यांच्या कवितेचे खास वैशिष्ट आहे.

साऊ,राजर्षी, शंभूराजा या व्यक्ती चारित्रांवरच्या त्यांच्या खऱ्या इतिहासाची .. योगदानाची… परिवर्तनाची साक्ष देणाऱ्या कवितांचा महिमा हा केवळ अगाधच आहे.  क्रांतिज्योतीची गौरव गाथा आपल्या  कवितेतून  गाताना कवी म्हणतो की,

“समाज नारी साक्षर करण्या

झटली माता साऊ रे..

क्रांतिज्योती ची गौरव गाथा

खुल्या दिलाने गाऊ रे..!”

बुद्धाचा मध्यम मार्ग ते भारतीय संविधान याद्वारे   समतेचा मार्ग सांगत असतानाच बाबासाहेबांना अभिवादन करताना कवी म्हणतो की –

“हे भिमराया गाऊ किती रे

तुझ्या यशाचे गान

जगण्यासाठी दिले आम्हाला

अभिनव संविधान..!!”

प्रकाशपर्व या कवी विजय यांच्या काव्यसंग्रहात विविध विषयांच्या चौफेर उधळणाऱ्या ,कधी विद्रोह करणाऱ्या ,प्रेमाच्या,नात्याच्या,मातेच्या, क्रांतीच्या, अभिवादनाच्या, स्वातंत्र्याच्या, भुकेच्या, परिवर्तनाच्या, बहुजनांच्या..सत्याच्या सर्वच कविता वाचकाला मंत्रमुग्ध करतात.एकाच शैलीत व्यक्त न होता, विविध प्रकारात कविता मांडण्याची शैली हे यांच्या कवितेचं वेगळेपण आहे.फक्त लिखाणातूनच नव्हे तर वास्तविक तशाच पद्धतीचं जीनं  हा माणूस चौफेर जगतो यामुळे  फक्त कवितेचीचं नाही तर कवीच्या जगण्याचीच उंची वाढली आहे.असा हा प्रतिभा संपन्न कवी…उत्तरोत्तर अष्टपैलू बनत जातो.

पुरस्कारांच्या पलीकडची मराठी साहित्य शारदेची सेवा कवीला अजुन खुणावत राहो.. त्यांच्याकडून साहित्याची आजन्म सेवा व्हावी आणि वसंत बापट यांनी कवी विजय यांना दिलेली ‘कविराज’ ही पदवी दिवसेंदिवस साहित्य सौंदर्याने झळकत राहो हीच सदिच्छा.

प्रतिभावंतांसाठी बहुत काय लिहणे..!!

 

समीक्षक – कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे

मु/पो-वेळू(पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511

मोबाइल-7743884307  ईमेल – [email protected]

 

(तळटीप – बुकगंगा. कॉम वर  कविराज विजय यशवंत सातपुते यांचा “प्रकाशपर्व” हा काव्यसंग्रह  सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा.  तसेच 7743884307 या नंबर वर संपर्क करून हा “प्रकाशपर्व” काव्यसंग्रह आपण घरपोच मिळवू शकता.)

 

Please share your Post !

Shares
image_print