मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…” लेखक : डॉ. नील वाघमारे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…” लेखक : डॉ. नील वाघमारे 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.

या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी, धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये इस्रोने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

..  श्री. भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….

लेखक : डॉक्टर नील वाघमारे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

🌸 विविधा 🌸

☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

देवकीया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, का शेखीं उपेगा गेला, पांडवासी..

असा तो.देवकीने प्रसवला,यशोदेने वाढवला,आणि तो झटला पांडवांकरता.वसुदेवाचा अंश होता, पण नंदाचे भाग्य झाला.अष्टनायिकांचा नाथ,सोळा सहस्रांचा आधार.गोपिकांचे सुखनिधान,राधिकेचा प्राण.गोपालकांचा सखा,गोधनाचा पाठीराखा.दुष्टांचा मारक,सज्जनांचा तारक.अधर्माचा विच्छेदक आणि धर्माचा संस्थापक.परम ईश्वराचा पूर्णावतार आणि मानवपणाचा साक्षात्कार.

सर्वांना तो त्यांचा वाटे.कदंबाखाली गोपालांशी खेळताना किंवा वृंदावनात रस रचताना त्यातल्या प्रत्येकाला वाटे,तो आपलाच.सुदाम्याला वाटले हा माझा सहचर ,कुब्जेला वाटले ‘हे माझ्यास्तव.’

पण साऱ्यांचा असून तो कुणाचाच नव्हता. गोकुळ सोडलं,प्राणप्रिय बासरी परत कधी अधरावर धरली नाही.अष्टनायिकांच्या मोहात, राधिकेच्या त्यागात, कृष्णेच्या सख्यत्वात,कुंतीच्या ममत्वात कशा कशात गुंतला नाही तो.

जिथे गेला तिथे पूर्णांशाने त्यात होता. तिथले प्रयोजन संपताच कमलपत्राच्या निर्लेपपणे आपला आभाळासारखा निळा शेला उचलून निघून जायची त्याची रीत. पण एका जागी मात्र हा जगन्नायक गुंतून पडला.त्याच्या शेल्याचं टोक अडकून पडावं अशी एकच जागा होती -अर्जुन !

धर्म भीमांना नमस्कार करणारा,नकुल सहदेवांना आशीर्वाद देणारा कृष्ण अर्जुनाला मात्र उराउरी भेटत असे.’पांडवांमध्ये मी अर्जुन’ असे त्याने म्हणावे इतके त्याचे याचे एकत्व! ‘अप्रांतमती’ लेखात द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘देवकी,यशोदा,गोप-गोपी,राधा,द्रौपदी सारेजण कृष्णाला दर्पण करून आत्मदर्शन घेत होते;एकटा अर्जुन असा होता की जो कृष्णाचा आरसा झाला होता-कृष्ण अर्जुनात आत्मदर्शन घेत होता!’ काय नितळ मन असेल अर्जुनाचं!

हे कृष्णाचं गुंतणं जाणलं ज्ञानदेवांनी.गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना योगेश्वराचा स्वर कुठे हळुवार झाला, कुठे त्याचा कंठ दाटून आला, कुठे त्याला अर्जुनप्रीतीचे भरते आले, कुठे त्याला काळजी वाटली, कुठे तो हलके रागे भरला,हे त्यांच्या हळुवार अंतःकरणानं हलकेच टिपलं.त्या अर्थी ज्ञानेश्वरही आरसा झाले.ज्ञानेश्वरीत त्यांनी कृष्ण होऊन श्रोत्यांना अर्जुनाच्या जागी बसवलं,आणि कृष्णाहून हळुवार होऊन आपल्यातील अर्जुनाला समजावलं!

दभि म्हणाले तसं ‘ज्ञानेश्वरांना कृष्णाचे सर्वस्पर्शित्व नेमके आकळले आणि त्याचे केंद्रही गवसले होते. त्याचे पूर्णकाम,निरिच्छ,जीवन्मुक्त असणे त्यांनी जाणले.आणि तसेच अर्जुनातले त्याचे गुंतणेही!’ ज्ञानेश्वरांचे निर्मळ,उन्नत आणि संवेदनशील मनच हे जाणू शकते.

ज्ञानेश्वरीतले कृष्णार्जुन प्रेमाचे दाखले फार लोभस आहेत!

पाचव्या अध्यायात योगशास्त्राचे महत्व ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की हे सारं फार छान आहे. हे मला पुन्हा एकदा नीट समजाव .आणि अर्जुनाला योगमार्गाविषयी गोडी निर्माण होते आहे हे जाणून आनंदलेल्या कृष्णाचे वर्णन करताना माऊलींनाही आनंदाचे भरते आले आहे .

आधींच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे!

आधीच प्रेमाचं माणूस ,त्यात शिकायची इच्छा,त्यामुळे आता जो अपूर्व भाव उमलेल तो अद्भुत असेल खास !

ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टि,की नवया स्नेहाची सृष्टि,हे असो नेणिजे दृष्टी,हरीची वानू.

जे अमृताची वोतली,की प्रेमचि पिउनी मातली,म्हणोनि अर्जुन मोहे गुंतली,निघो नेणे!

श्रीहरीचे ते पार्थाकडे पाहणे कसे होते म्हणून सांगू ?त्यात कारुण्याची वृष्टी आहे की नव्याने उचंबळलेल्या स्नेहाने परिपूर्ण अशी भगवंताची दृष्टी आहे ? ती दृष्टी म्हणजे जणू अमृताची वोतीव पुतळी होती, जी त्या अद्भुत क्षणात निर्माण झालेला प्रेमरस पिऊन अशी मातली, की अर्जुनाच्या प्रेमाच्या विळख्यातून तिचा पाय निघेना !

पुढे ज्ञानदेव म्हणतात की ही कल्पना किती फुलवावी तितकी फुलेल पण मला त्या प्रेम दृष्टीचे अचूक वर्णन करता येणार नाही .परमात्म्याचे प्रेम इतके अथांग आहे त्याचे वर्णन कसे शक्य आहे? पण ज्याअर्थी त्यांनी अर्जुनाला आधी ‘परिस बापा’ असे संबोधले त्या अर्थी हा प्रेमाचा गुंता आहे असे मला खचित वाटते !

पुढे सहाव्या अध्यायात ब्रह्मविद्या सांगताना तर ज्ञानदेवांच्या योगेश्वराच्या मनात भय दाटून येते. की खरेच मी ही गुह्यविद्या याला देणे योग्य आहे का ? अर्जुनाच्या मनात जर अद्वैताचा भाव जागा झाला आणि हा याचा देहाचा अहंभाव विसरून माझ्यात मिसळून गेला तर मी याच्या प्रेमाच्या सुखाला मुकेन !मी एकटा करू काय ?

विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल, एकलेया..

दिठीचि पाहतां निविजे, कां तोंड भरुनी बोलिजे, नातरी दाटून खेंव दीजे,असे कोण आहे!

आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले..

ज्याला पाहताच दृष्टी निवावी आणि ज्याच्यापाशी मन मोकळे करावे किंवा उत्कटपणे ज्याला मिठी मारावी असं अर्जुना वाचून दुसरं आहे कोण ? हा जर माझ्याशी एकरूप झाला तर माझ्या मनाला भावलेली एखादी गोष्ट मी सांगावी कुणाला ?आनंदाने माझे अंतःकरण उचंबळून येईल आणि मनात हर्ष अगदी मावेनासा होईल तेव्हा मी ते कुणापुढे ओतावे ? आणि मग योगेश्वराने एक तलम पडदा तसाच ठेवला जेणे करून दोघांचे द्वैत अबाधित राहील.

या ओव्या वाचताना वाटलं,ज्ञानदेवांनी भोगलेलं एकटेपणच या ओव्यांमधून हळुवार संयतपणे व्यक्त झालंय.कोवळ्या वयात हरपलेले मायबापांचे छत्र,सोसावे लागलेले समाजाचे वार,निवृत्तीनाथांची योग्यता जाणून त्यांची गुरु म्हणून केलेली सेवा,लहानग्या मुक्ता सोपानाची काढावी लागणारी समजूत,समाजापुढे स्वतःला सिध्द करण्यासाठी करावी लागलेली दिव्ये ..या साऱ्या झंझावातात हा बालयोगी निचळ एकटा उभा राहिला.या साऱ्या सोसण्याचा अस्फुटसाही उद्गार साऱ्या साहित्यात कुठेही नाही.पुसटसाही नाही.पण साऱ्या विश्वाचा भार वहाणारा जगजेठी एकटा असतो,अगदी एकटा,हे ज्ञानदेवांइतकं कुणाला समजेल ?

ज्याला आपले बालसुलभ हर्षखेद सांगावेत,कधी शोक झाला,हृदय विव्हल झालं तर खांद्यावर डोकं ठेवावं,आनंदाने विभोर होऊन मिठी मारावी असं बरोबरीचं मैत्र त्यांच्या वाट्याला होतं कुठे ? मग साऱ्या भूतमात्रांनाच मित्र केलं त्यांनी.गुरु-शिष्य,माता-बालक, ईश्वर-भक्त अशी अनेक नाती ज्ञानेश्वरीत उलगडली पण पसायदानात स्थान मिळालं ते मैत्रभावाला.भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे !

गीता समजून घेताना कृष्ण त्यांचा सखा बनला असणार.गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात करताना त्यांच्या तरल प्रज्ञेला गीतेतलं कृष्णार्जुनाचं भावविश्व जाणवलं असणार.त्यामुळंच कृष्ण जे थेट बोलला ते आणि न बोलताही त्यानं जे सांगितलं ते,दोन्ही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलं..

एकाच तिथीला जन्मलेली ही दोन अप्रांतमती व्यक्तित्वे एकमेकांत अशी मिसळून गेलेली वाटतात.

तूं तो माझें, मी तो तुझे ,ऐक्य जाले तेथें कैचें दुजें !

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मंगळागौर व्रताचे बदललेले स्वरूप… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

मंगळागौर व्रताचे बदललेले स्वरूप ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

मंगळागौर व्रत हे आईने मुलीला दिलेले व्रत आहे. शंकर पार्वती हे आदर्श जोडपे .त्यांचा आदर्श आपल्या मुलीने समोर ठेवून चांगला संसार करावा यासाठी हे व्रत असते. हे व्रत सलग पाच वर्षे करायचे असते. मी चार पिढ्यांच्या मंगळागौरी पाहिल्या. पूर्वी मुली लहान असत. घरातील मोठी माणसे सांगतील त्याप्रमाणे वागत .हे व्रत या माध्यमातून  भक्ती भावाने केले जायचे. डामडौल अजिबात नव्हता. खेडेगावात वाहनांची सोय नव्हती. पाऊस भरपूर असायचा. त्यामुळे पै पाहुणे फारसे कुणी या व्रताला जात नसत. घरच्या पुरतीच ही पूजा असायची. सजावट वगैरे फारशी नसायची. जेवायला मात्र साग्र संगीत नैवेद्य असायचा. मुली अगदी “न्हाऊनी माखुनी”, नऊवारी चा बोंगा सावरत, भरपूर दागिने अंगावर घालून व्रताला बसत. जिरे साखर तोंडात घेऊन पूजा भक्तिभावाने करत. दुपारचे जेवण मुक्याने करत असत. संध्याकाळी गावातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावले जायचे. दारात मोठी रांगोळी असायची. साखर खोबऱ्याची खिरापत आणि गव्हाने ओटी भरली जायची. संध्याकाळी वशेळ्या मुलींना भाजके पदार्थ खाऊ घालत. बहुतेक सगळ्यांना मग कढी, खिचडी, लाडू ,करंज्या, चकली ,मटकीची उसळ, असे पदार्थ जेवायला असत. रात्री मनसोक्त खेळ खेळत. त्यातून मग मनमोकळा संवाद होत असे. दुसरे दिवशी पहाटे उठून मुली आरती करत. दही भाताचा नैवेद्य दाखवत. व फुले, पत्री यांचे विसर्जन करून व्रताची सांगता करत असत. हे व्रत सलग पाच वर्षे करत. मग पाचव्या वर्षी आईला वाण देऊन या व्रताचे उद्यापन करत असत.

आता सगळे बदलले. मुली मोठ्या असतात. बहुतेक नोकरीवाल्या असतात. त्यांना वेळ नसतो. मग त्या पहिल्या वर्षी पहिल्याच मंगळवारी व्रताचे उद्यापन करून टाकतात. थाटमाट भरपूर असतो. फुले, पत्री यांची भरपूर सजावट असते .बहुतेक ठिकाणी महादेवाची पिंड करतात. पण माझ्या मंगळागौरीच्या वेळी माझ्या आईने पिंड करण्यास नकार दिला. एक तर गंज काळा करण्यास तिचा विरोध होता. शिवाय तो उपडा घालून ती मंगळागौर झाकली जाते असे तिचे म्हणणे असायचे. आता लाईटच्या माळा, फुले, विविध प्रकारचे डेकोरेशन, सजावट भरपूर .फोटो, व्हिडिओ शूटिंग ,नातेवाईकांची गर्दी, मित्र-मैत्रिणींचा धांबडधिंगा असतो .रात्री जागरण फार करत नाहीत. संस्कार भारतीने मंगळागौरीच्या खेळांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आता खूप जणी तयार झाल्यात. मग अक्षरशः दहा दहा हजार रुपये देऊन त्या मुलींना बोलावतात. माझा देखील सातारला खूप मोठा ग्रुप होता. एका दिवशी पाच सहा ठिकाणी आमंत्रणे असत. मग सोयीप्रमाणे कधी कधी सकाळी नऊ वाजता सुद्धा जाऊन तासभर खेळून यायचे. बाकीच्या बायका फक्त पहात बसतात. कोणी खेळत नाहीत. काही ठिकाणी तर मुलींना रजा नाही या नावावर संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर पूजा असते. ते सुद्धा हात पाय धुऊन त्या मुली बसतात. मेकअप भरपूर असतो. ज्वेलरी,  कपडे, फोटो, व्हिडिओ शूटिंग हे मात्र अतीच असते. आता हा दिवस व्रत नव्हे तर इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. देणे घेणे भरपूर असते. कालाय तस्मै नमः!. पण काही का असेना लग्नानंतर श्रावणातली एक तरी मंगळागौर साजरी केली जाते हे तरी अजून चालू आहे. पुढे काय होईल कोण जाणे. आता मुली  लग्न होऊन परदेशी जातात. तिथे कुठली आली मंगळागौर आणि कुठले आले आहे व्रत! असो. मंगळागौरी श्रावणातल्या मंगळवारीच करायची असते हे देखील आता मागे पडत चालले आहे. मुलींना किंवा त्यांच्या आईला, सासूला रजा नसते. म्हणून मंगळवारी घरातल्या घरात पूजा करून रविवारी मोठा कार्यक्रम करतात. मुलींना खेळायला बोलावतात. सोयीप्रमाणे व्रताचे बदललेले रूप पाहून अवाक व्हायला होते. यातही आणखी गंमत म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी लग्न होऊन अमेरिकेला गेली. ती डिसेंबर मध्ये फक्त तीन आठवड्यांसाठी आली. आणि त्यावेळी त्यांनी वर्षातले सगळे सण साजरे केले. डिसेंबर मध्ये मंगळागौरीचा इव्हेंट केला. आता बोला !

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसरं ‘क्षितीज’ विस्तारताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसरं ‘क्षितीज’ विस्तारताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सृष्टीच्या निर्मात्याने स्त्री आणि पुरूष अशी दोन आभाळं निर्माण केली आणि त्यांना आपापली क्षितीजं नेमून दिली…पण या दोन्ही क्षितीजांच्या जाड, ठसठशीत सीमारेषांच्या मध्ये एक निराळंच आभाळ उगवलं आहे, याचं त्यालाही भान राहिलं नसावं कदाचित! या आगंतुक आभाळाला क्षितीज दिलं जाण्याचा प्रश्नच उदभवला नसावा त्याच्या मनात ! 

पौरूषत्वाचं रूपडं घेऊन उगवलेली असंख्य नक्षत्रं मात्र स्त्रीत्वाच्या क्षितीजाकडे धाव घेत होती. आणि स्त्रीत्त्वाचं क्षितीज काही तेवढं विस्तारलेलं नव्हतं यांना कवेत घेण्याइतपत. एका बाजूला देह पुरूषांच्या आभाळात अ‍डकून आणि मन त्या दुस-या नाजूक आभाळाकडे डोळे लावून बसलेलं ! यातून संघर्ष, निराशा, अवहेलना, प्रताडना, उद्विग्नता, असहाय्यपणा असा उल्कापात होणं निसर्ग नियमाला धरूनच होतं. अवकाशातून पृथ्वीकडे झेप घेणारे ख-याखु-या खगोलीय पदार्थांपैकी निदान काहींना जमीनीच्या कुशीत आसरा मिळतो…पण या तिस-या आभाळातील तारका पृथ्वीकडे वेगाने निघालेल्या असताना वातावरण त्यांना मधल्यामध्येच जाळून भस्म करून टाकते….राख मग फिरत राहते अंतराळात…अनंत काळाचा अंत होण्याची वेडी आशा मनात मिरवत ! 

विषयच एवढा लपवून ठेवलेला की शब्दांतून व्यक्त नाही होत सहजी…फक्त आवाजातून ऐकू येत राहतो…दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात आदळले आणि दोन्ही तळव्यांच्या मध्ये चेपली गेलेली हवा तिथून निसटायचा प्रयत्न करते तेंव्हा एक ध्वनी निर्माण करत जाते. जे ‘त्यातले’ नाहीत,ते आपण त्यातले नाही आहोत या समाधानाचा सुस्कारा सोडत पुढे निघून जातात. पण जे त्यातच आहेत…त्यांना देह जगवण्यापुरता तरी हात पसरावा लागतोच ! पुरुषी देह स्त्रीत्वात नटवण्यासारखं अवघड काम जगात दुसरं नसावं बहुदा. कारण वाढत्या वयासोबत पौरूषत्वाच्या खुणा अधिकाधिक गडद होत गेलेल्या असतात,त्या मिटवणं जिकीरीचं होत जातं. स्वरयंत्राने आपल्या तारा आधीच जुळवून ठेवलेल्या असतात, त्यातून कोमल स्वर निघणं केवळ अशक्य…खर्ज मात्र लागतोच लागतो ! राऊळाच्या दारातील घंटेचा लोलक घंटेच्या तनूकडे ढकलावा आणि त्यातून मंजुळ ध्वनीऐवजी वीजेचा कडकडाट कानी पडावा…असं झालं तर कोण ऐकत थांबणार…तेथून आवाजाच्या कक्षेच्या बाहेर पळण्यातच भले ! 

पण हा कर्कश आवाज मनापासून ऐकून तो इतरांच्या कानांवर सहन होईल अशा रितीने पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक आणि तितकाच परिणामकारक प्रयत्न करणारा एक लेखक, कवी मराठीत निर्माण झाला याचं मराठी माणूस म्हणून कौतुक वाटणं साहजिकच आणि माणूसकीला धरूनच आहे, असं म्हणावं लागेल. 

क्षितीज पटवर्धन त्याचं नाव. लेखक म्हणून आघात, सतरंगी रे, टाईमपास, लग्न पहावं करून, डबल सीट, क्लासमेटस,वायझेड,फास्टर फेणे, माऊली, धुरळा इथपर्यंत चित्रपट. मोहिनी, मन धागा धागा जोडते नवा, अरे कृष्णा…अरे कान्हा, मन शेवंतीचे फूल, रोज रोज नव्याने, तुला जपणार आहे, जल्माची वारी, इथपासून ते.. फिसल जा पर्यंत गीतकार, आधी नाटक-दिग्दर्शक,लेखक आणि असंच बरंच काही नावावर असणारा क्षितीज तृतीय पंथी बांधवांच्या ‘ताली’ मध्ये आपला तळहात मिळवतो तेंव्हा त्याच्याबद्दलचा आदर प्रचंड दुणावत जातो ! 

या आधीही या तिस-या जगातल्या विषयाला अनेकांनी स्पर्श केलाय…पण क्षितीजने विषय प्रवेशच केला नाहीये केवळ, तर विषयाचा काही विषयच ठेवलेला नाही. कोरोनाचं संकट, वाटेत आलेले नकार,आपला विषय पटवून देताना करावे लागणारे दिव्य, चंदेरी दुनियेत मराठी स्वप्नांना मुळातच असलेली पडेल किंमत, या आणि अशा अनेक लाटांना तोंड देत क्षितीजने ‘ताली’ वाजवून तर दाखवलीच आहे, पण जो कोणी ही ‘ताली’ ऐकेल, पाहील त्याला एकच टाळी नव्हे तर टाळ्यांचा कडकडाट करायला भाग पाडलं आहे..आणि या टाळ्यांना आसवांची ओलही त्याच्याच शब्दांनी प्रदान केलेली आहे. आजकाल माणसांना रडवणं अत्यंत अवघड झालेलं असताना किमान सहृदय माणसांच्या काळजातील खोलवरच्या पाण्याला पृष्ठभागावर आणण्याचं भगीरथी काम क्षितीजने केले आहे…हे ताली पाहताना, ऐकताना, समजून घेताना पदोपदी जाणवत राहतं. ताली एक एक भाग करून पहावा लागतो…जशी भरलेल्या सभागृहात कुणी प्रेक्षक एका टाळीने सुरूवात करून देतो तसं आहे हे काहीसं. मग पाहणा-याची विषयाच्या ब्रम्हानंदी टाळी लागते…शेवटच्या भागाच्या अंतापर्यंत पाहणा-याचा जीव टांगणीला लागून राहतो…आणि सकारात्मकतेचा ध्वनिकल्लोळ उमटवून टाळी थांबते….मात्र तिचा आवाज मनात खोलवर रूजत जातो. 

‘ ताली ‘  चित्रपट असता तर किती बरे झाले असते…सलग एक परिणाम विषयाला एक वेगळे परिमाण देऊन गेला असता. आणि आणखी लोकांपर्यंत पोहोचला असता. सर्व भाग एकत्र करून नवे प्लॅटफॉर्म न परवडणा-या किंवा सहज उपलब्ध नसलेल्या लोकांपर्यंत ताली पोहोचला तर छानच होईल. तालीमधले हिंदीतले संवाद थेट मनावर कोरले जातात. हे संवाद छापील स्वरूपात वाचायला मिळाले तरी एक आख्खी कादंबरी, एक समग्र आत्मचरित्र वाचल्याचे समाधान निश्चित लाभेल. अर्थात हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाचे, प्रेक्षकाचे स्वप्नरंजन आहे म्हणा. प्रत्यक्षात लेखकाला किती अडचणी आल्या असतील हे आपल्याला नाही समजणार. 

दिग्दर्शक रवी जाधव…मानलं ! स्वच्छतागृहात एका बाजूला पुरूष आणि दुस-या बाजूला स्त्री अशी खूणचित्रे दिसताहेत…आणि भिंतीवर मधोमध असणा-या आरशात नायिकेचे प्रतिबिंब अधिकाधिक स्पष्ट होत जातं आहे….तिच्या चेह-यावरची शाई तिने वॉशबेसिन मध्ये धुण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती शाई हळूहळू तिथून वॉशबेसीनच्यामध्ये असलेल्य छिद्रातून ओघळून जाते आहे….ही कमाल रवी जाधवांचीच खास ! निर्माते अर्जुनसिंग बरन, कार्तिक डी.निशानदार यांची निर्मिती प्रशंसनीय.  गाणी,संगीत,अभिनय,चित्रीकरण,प्रतिमांचा वापर, कसलेल्या कलाकारांचा अभिनय, नवख्या कलाकारांचा वावर आणि करून घेतलेला वापर…यावर स्वतंत्र लिहावे लागेल. 

लढवय्या गौरी सावंत सुश्मिता सेन यांच्या आवाजातून आणि चेह-यावरून जिंकत जाताना दिसतात ….त्या विजयात क्षितीज पटवर्धन नावाच्या शब्दांच्या, भावनांच्या, विचारांच्या शिलेदाराचे मोठे योगदान असते…..गौरी सावंत यांना समाजाने वीजेचे लोळ दिले,वादळं दिली…क्षितीजने श्री गौरी सावंत यांच्या संघर्षाच्या आभाळाला इंद्रधनुष्य दिले असेच म्हणावे लागेल ! 

‘त्या’ सर्वांना ‘ताली’ पाहता यावा. किंबहुना तशी सोय कार्यकर्त्यांनी करावी. ‘त्यातले’ नसलेल्या सुदैवी लोकांनी ‘ताली’ पहावीच…किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे. वेदनेला अंत नसला तरी किमान काहीजणांना खंत वाटू लागली तरी क्षितीजच्या शब्दांचे चीज होईल. त्यातून काही चांगले निर्माण होईलच कधी न कधी तरी. लेखक,कवी,संवाद लेखक क्षितीज पटवर्धन यांचे हे वर्तमानातील काम भविष्यकाळात ऐतिहासिक ठरेल,हे निश्चित ! 

(‘ताली’ या वेब सिरीजबद्दल हा माझा View लिहिलाय ! अधिक-उणे असेलच.)   

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्य…एक चकवा..… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आयुष्य…एक चकवा. ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज दोघंही खूपच आनंदात होते..पुण्याहवाचन करण्याची खूप इच्छा होती पण मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय नको म्हणून एकत्र मानसपूजा केली..लगबगीनी आपल्या वाटणीची कामे आटोपली..मुलांना …नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवून दोघंही संध्याकाळीच घराबाहेर पडले…

“आता कळवू मुलांना” उतावीळपणानी तिनी विचारले..अन् होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..

तोच मुलाचा फोन वाजला…टेलिपथी..म्हणतच तिनी आनंदानी फोन घेतला…आणि…काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला..

“आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं…हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली..तिच्यासोबत डिनरला जायचेय..मुलंही चलणार अाँटीला भेटायला…तुम्ही जेवून घ्या हं…आणि हो..औषध – गोळ्या घ्यायला विसरू नका हं..बाय”…

काहीही न बोलता तिनी फोन ठेवला..

तो किंचीत हसला अन् बोलला..”मुलांचा कार्यक्रम ठरलाय नं”..

तिनी मान हलवली..तो उदासला..म्हणाला..”आता..?..ह्या सरप्राईजचं काय?..”

“आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं..”

त्याचे डोळे भरले…. पण ती शांतच…. “ चल घे…”

रात्री मुलाची व्हॉट्स ऍप पोस्ट आली..” आम्ही पोहोचलो…तुम्ही लवकर या..”

आईनी पोस्ट टाकली..” तुम्ही झोपा..”

मुलानी पुन्हा विचारलं..” तुम्ही कुठे,? “

आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला..

“त्या” दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा दचकलाच…

त्यानी थेट फोन लावला…”आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय..”

आई शांतपणे म्हणाली..”असू दे बाळा…आम्ही हॉटेल सोडलंय..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांचं  नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग…बाय..”

मुलानी पुन्हा व्हॉट्स ऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी वाचलं…”50th..Wedding Anniversery”…..

त्यानी हळूच तिचा हात हातात घेतला..डोळ्यांच्या कडा पुसत ती म्हणाली…” जीवन म्हणजे चकवा असतो नाही?…फिरून त्याच जागी आणणारा..?. ..वैवाहिक जीवनाची सुरूवात आपण दोघांनीच केली होती नं?…आजही आपण दोघंच उरलोयत..”

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

पुढे धाव घेण्याची, झोकून देण्याची, समर्पणाची, एकरूप होण्याची असोशी आपल्या  अल्पाक्षरी रूपात व्यक्त करणारा लक्षवेधी शब्द म्हणजे ओढ!

ओढ म्हणजे अंतर्मनात अस्वस्थ खळबळ माजवणारी अनिवार भावना!

आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या मनातली घरट्याकडे परतण्याची असो, आईच्या मनातली बाळाला कवटाळण्याची वा बाळाच्या अबोध मनातली आईच्या कुशीत शिरण्याची असो,एखाद्याच्या मनातील मैत्रीची असो,कलासक्त मनातील नवनिर्मितीची असो वा भक्तियुक्त अंत:करणातील ईश्वरप्राप्तीची असो या सर्व विविधरुपरंगी ओढींचे उत्कटता हे अविभाज्य अंग असते.उत्कट भावनेशिवाय  ओढ निर्माण होऊच शकत नाही आणि मनात कळकळ,तळमळ नसेल तर उत्कटताही निर्माण होत नाही.ही अशी तळमळ निर्माण व्हायला त्या क्षणापुरता कां होईना ‘स्व’चा विसर अपेक्षित असतो आणि अपरिहार्यही.

प्रेम, माया, कल, प्रवृत्ती, पसंती, आवड,ओढा,आकर्षण असे ओढ या शब्दाचे विविध अर्थरंग या शब्दातला भाव व्यक्त करण्यास पुरेसे नाहीत.कारण  सकारात्मक भावनांनी युक्त अशा या अर्थशब्दांना परस्पर छेद देतात ते गरीबी,अभाव दर्शवणारा ओढग्रस्त, जोर लावणे,ताणणे या अर्थाचा ओढणे,दडपण व्यक्त करु पहाणारा ओढाताण मनाची चंचलता,स्वैरता,द्वाडपणाचं प्रतिबिंब सामावून घेणारा ओढाळ असे अनेक शब्द! ही सगळी ओढ या शब्दाचीच विविधरंगी रुपे!

पण तरीही ही होती सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वातली,मर्यादीत पैस असणारी ओढ! सर्वसाधारण माणसाच्या मनातली उत्कटता ध्वनित करणारी! या प्रकारची ओढ व्यक्तिगत परिघात वावरणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदु:खातून निर्माण होत असते. या परिघाला अंगभूत मर्यादा असणे स्वाभाविकच.पण स्वतःच्या सुखाचा,स्वास्थ्याचाच नव्हे तर सर्वस्वाचा होम करुन देशहितासाठी हालअपेष्टा सोसणाऱ्या देशभक्तांच्या मनातली मातृभूमीची ओढ ही सर्वांनाच सतत प्रेरणादायी ठरणारी अशीच असते.

काळ्यापाण्याच्या प्रदीर्घ काळातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीरयोध्यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांच्याच शब्दांत व्यक्त होते तेव्हा त्या शब्दाशब्दांत भरुन राहिलेले असते ते हेच देशप्रेम!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातली ही ओढ जेव्हा काव्यरूप धारण करते तेव्हा त्या ओढीतली असोशी आणि तळमळ….

‘ ने मजसी ने s परत मातृभूमीला….

सागरा प्राण तळमळला..’

अशा उस्फुर्त,उत्कट शब्दातून नेमकी व्यक्त होते..!

स्वार्थाचा लवलेशही नसलेली उत्कट देशप्रेमातून निर्माण झालेली ही तळमळ कुणीही नकळत नतमस्तक व्हावे अशीच म्हणावी लागेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली.) इथून पुढे. 

एके दिवशी दोघांनी हसत हसत येऊन निर्णय दिला… “आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत… !”

तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणाऱ्या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं ! आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो…! मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली… तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..! मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो… तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो…! 

या लग्नात मी वरातही झालो… आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो…! मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो… !

भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो … ! आणि त्याच्याबरोबर जातांना, ज्या क्षणी ‘दादा’ म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या मी तीचा बापच झालो… !

आज या लग्नाला दोन वर्षे झाली. दोघंही आनंदात आहेत, तीच्या अगोदर असलेल्या मुलासह ! 

या मुलाचं मला कौतुक वाटतं… आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता…! कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का… ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही!

असो ! 

जमिनीवर पडते ती सावली… ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!

हे दोघेही एकमेकांना आधार देत, मुलाची छाया बनले आहेत. बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे, खऱ्या अर्थानं तो बाप झाला आहे…! 

बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय ! संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही… मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते… ती ऐकु आली म्हणजे झालं… ! पहिली दाद या झंकाराला दिली… की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात… ! या कवितेत गाणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं… ! या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!! 

आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे…

‘ती’ अजुन एकदा आई होणार आहे हे मला ‘त्या’ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं. म्हणाला “सर, आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला…”

“होय बाबा, आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी …” माझ्या या बोलण्यावर ‘तो’ लाजला होता. 

यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वगैरे आटोपुन 19 जून 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला ! ‘त्या’ला आणि ‘ती’ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो. दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता.

लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ? पण हरकत नाही, ये भी सही ! चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही… काटे बोचायला लागले की, ती जागा सोडण्यासाठी का होईना, पण चालणाराचा वेग वाढतो… ! 

तो, नको नको म्हणत असतांना, त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले. 

तो म्हणाला, “सर, हाॕस्पिटलची बिलं, औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय, वर अजुन हे पैसे कशाला… ?”

“पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं…” मी खळखळुन हसत म्हणालो… 

मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता … !

ती नाहीच बोलली काही… पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते… ! 

मी बाळाकडे पाहिलं… इतकं देखणं बाळ… ! कमळ चिखलात उगवतं हेच खरं… !

“तुझ्यासारखंच आहे गं बाळ” मी म्हटलं. 

पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली… !

कोणत्याही रडणाऱ्या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं, ‘स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ’ म्हणावं…  ती हसणारच ! कारण वजन फुलांचं होत असतं, सुगंधाचं नाही…!

एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ? ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !

“बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?” निरोप घेत मी उठत सहजच विचारलं. 

अगदी सहज आवाजात ती म्हणाली, “हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं … !”

“क्काय … ?” खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन. कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं ! 

जीभ चावत, हळु आवाजात म्हटलं…, “का गं  ? अभिजीत का ?”

म्हणाली, “दादा, मला ना आई, ना बाप, ना भाऊ ना बहिण…पण तुम्ही माझी आई, बाप, भाऊ आणि बहिण होवुन ती उणिव भरुन काढली ! 

आज माझ्या मुलाचं नाव मी जर अभिजीत ठेवलं तर मला त्याला सतत जाणिव करुन देता येईल…

कितीही मोठा झालास तरी कधीतरी, तान्हं बाळ होवुन, मुल नसलेल्या आईचं मुल हो….

अनाथ एखाद्या बहिणीचा भाऊ हो…

रस्त्यांत तळमळत पडलेल्या पोराची कधीमधी आई हो…

आणि माझ्यासारख्या रस्त्यांवर पडलेल्या एखाद्या पोरीचा आयुष्यात कधीतरी बाप हो…

मी शिकवीन त्याला…”

पुढचं तीला बोलता येईना… आणि मलाही ऐकु येईना….

जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता… ! माझा सन्मान होता !

दवाखान्यातुन मी निघालो… तर ‘तो’ आडवा आला, म्हणाला, “सर, ठेवु ना तुमचंच नाव बाळाला… ? तुमची परवानगी हवीय… !”

म्हटलं, “येड्या, परवानगी कसली मागतोस, माझा बाप झालास की रे आज… बाप परवानगी मागत नाही… !”

तो माझ्या पायाशी झुकला… ! 

आणि मी, नव्यानंच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईबापाच्या पायाशी नतमस्तक झालो… !

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टीप…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “टीप…” ☆ श्री मंगेश मधुकर

वाढदिवसाच्या निमित्तानं सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मुलांनी निवडलेलं हॉटेल खरचं चांगलं होतं. नुसताच दिखाव्यावर खर्च केला नव्हता तर जेवणाची क्वालिटी आणि चवसुद्धा उत्तम होती. फक्त वेटरची सर्विस म्हणजे निवांत कारभार.

भरपूर गप्पा आणि आवडत्या डिशेशवर यथेच्छ ताव मारल्यावर वेटर बिल आणि बडीशेप घेऊन आला. कार्ड पेमेंट केलं आणि तो क्षण आला…. “ थँक्यु सर ”म्हणून वेटर गेल्यावर बायको आणि मुलगी माझ्याकडं एकटक पाहत होत्या. मुलगा मोबाईलमध्ये हरवलेला.दोघींच्या बघण्यावरून लक्षात आलं की आता नेहमीच्या वादाला तोंड फुटणार आहे. भरपूर आवडीचं खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडला. मनापासून वाटत होतं ‘टीप’ द्यावी. पण बायको आणि मुलीचा तीव्र विरोध. ‘ टू बी ऑर नॉट टू बी ‘अशी संभ्रम अवस्था. मी खिशातून पाकीट काढलं….. 

“अजिबात द्यायची नाही ” .. बायको 

“ मागच्या वेळी सांगून सुद्धा तुम्ही दिली होती. आज नाही म्हणजे नाही ” .. मुलगी 

“ बाबा,तुम्ही टीप द्या ” मोबाईल वरची नजर न हटवता मुलगा म्हणाला.

“ काय द्या ?आणि कशाला ??” .. बायको. 

“ बाबा,नाही हं ” .. मुलगी 

“ जेवणावर एवढा खर्च झाला ना मग आता क्षुल्लक गोष्टीसाठी वाद नको ” .. मी 

“ येस,बाबा यू आर राईट ” .. मुलगा 

“ ए,तु गप रे ” .. मुलगी खेकसली. 

“ पन्नास रुपायानं काय फरक पडणारयं ”

“ तेवढ्या पैशात एक लिटर दूध येतं ”

“ आपण जेवलो तेवढ्या पैशात महिनाभराचं दूध आलं असतं ” .. मी चिडलो. 

“ प्रश्न पैशाचा नाहीये ” .. बायको 

“ मग,प्रॉब्लेम काय ? ”

“ मेंटॅलिटी ”

“ कसली डोंबलाची मेंटॅलिटी,त्याचा इथं काय संबंध? ”

“ हॉटेलमध्ये आलो. ऑर्डर दिली, वेटरनं सर्व्ह केलं. जेवलो. बिल पे केलं.विषय संपला ”

“ अगं पण..”

“ वेटरनं त्याचं काम केलं. त्याचेच तर पैसे मिळतात.” 

“ बक्षिस म्हणून ‘टीप’ देतात. वेटरच्या अपेक्षा असतात. तशी पद्धत आहे.”

“ कोणी सांगितलं ? अशी पद्धत बिद्धत काही नाहीये. उगीच आपलं सगळे देतात म्हणून आपणही टीप द्यायची. त्याला काही लॉजिक नाहीये ” .. मुलगी उसळली.

“असं काही नाही. टीप न देता जाणं योग्य दिसत नाही ” .. मी 

“ हे मेंढरांच्या कळपासारखं झालं. एकदा सर्वात पुढे असलेली मेंढी चुकून खड्ड्यात पडली आणि उठून पुन्हा चालू लागली. मागच्या सर्व मेंढयानी खड्ड्यात उड्या मारल्या. ’टीप’ द्यायचं पण असंच काही आहे.” .. बायको

“ ते काही माहीत नाही. उगीच ईश्यू करू नका. आज वाढदिवस आहे तेव्हा..” .. मी 

“तेच तर आज चांगला दिवस आहे.असल्या गोष्टी बंद करा”मुलगी 

“ तुमच्यासारखे कर्णाचे अवतार आहेत म्हणून तर हे टीपचं फॅड सुरू झालंय. चला आता, एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही.” 

इतरवेळी मायलेकीचं अजिबात पटत नाही.  पण इथं लगेच एकमत झालं. टीप न देण्याविषयी बायको आणि मुलीनं युती करून माझ्याविरुद्ध आघाडी उघडली.

“आजच्या दिवस देऊ दे नंतर कधीच देणार नाही.” … मी समेटाचा प्रयत्न केला. सगळे उभे राहिले परंतु टीप न देता बाहेर पडणं विचित्र वाटत होतं. हॉटेलमधले सगळे माझ्याकडेच बघताहेत असा भास व्हायला लागला. उगीचच गिल्ट आला. सर्विस देणारा वेटरनं एकदोनदा माझ्याकडं पाहिलं. पाय निघता निघेना. काहीतरी आयडिया करून टीप द्यावी असा विचार चालला होता, परंतु सोबतचे चार डोळे रोखून प्रत्येक हालचालीकडे पाहत असल्याने नाईलाज होता. पाकीट हातात धरून उभा असताना मनात  मात्र विचारांचे चक्रीवादळ  “ काय करावं? ‘टीप’ द्यावी की नाही. “ तुम्हाला काय वाटतं…… 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…) – इथून पुढे —

हे ऐकल्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरविला. मी तिची काळजी करतो यापेक्षा मी माझ्या बहिनींच्या आरोग्याची अशी काळजी करतोय याचा तिला जास्त आनंद झाला होता. 

माझ्या सर्व बहिणी उच्चशिक्षित आहेत. सर्व जनी सरकारी नोकरीत आहे. त्या स्वावलंबी आणि मनाने कणखर आहेत. त्यांचे रक्षण करण्याची फारसी संधी मला आजवर कधी मिळाली नव्हती. बहिणीकडून राखी बांधून घेवून बहिणीच्या रक्षणाचे कर्तव्य भाऊ स्विकारतो. आजवर अनेक रक्षाबंधने झाली. पण भावाच्या कर्तव्याची पुर्ती केल्याचा खरा आनंद मला प्रथमच मिळाला होता. बहिणींच्या सर्व छोट्या मोठ्या आजारांचे वेळीच निदान झाल्याने पुढील धोके टळले होते. माझ्या या रक्षाबंधनच्या आगळ्या वेगळ्या गिप्टच्या कल्पनेवर मीच खुप खुष झालो होतो. 

तात्पर्य

मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरांत, भले कमीजास्त प्रमाणांत असेल, मात्र अनेक वस्तू, गॅजेटस्, पैसाअडका, सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला आणखी एखादी वस्तू भेट देऊन त्यांच्याकडे आहे त्यात आणखी भर घालण्यात काहीच अर्थ नाही. या भेटींचा तेवढ्या पुरता हसून स्वीकार होतो आणि ती वस्तू कायमची त्या घरात धूळ खात पडून राहाते.

लोकसंख्येचा विस्फोट तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ताणतणाव आणि प्रदुषणासारख्या समस्यांनी आज गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत असलेल्या अनेक “सायलेंट किलर” आजारांचे प्रमाण आज प्रचंड वाढलेले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, जीवनसत्वांची कमतरता, हाडे ठिसूळ होणे तसेच वेगवेगळ्या कॕन्सरचे प्रमाण पटींमध्ये वाढले आहे. पण या आजारांबाबत आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत आपल्या देशात पाश्चात्त्य देशांइतकी जागरूकता नाही. पाश्चात्त्य देशात वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असते. पाश्चात्त्य देशांना आरोग्य तपासण्यांचे महत्व पटलेले आहे. पाश्चात्त्य देशात माणसाच्या जिवाला जशी किंमत आहे तशी आपल्याकडे का नाही? उदाहरणार्थ, पाश्चात्त्य देशांनी नियमीत पॕप स्मिअर या तपासणीद्वारे गर्भाशय मुखाचा कॕन्सरच्या ८०% केसेस थांबवल्या आहेत. आपल्याकडे मात्र हा कॕन्सर ८०% वेळा तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये लक्षणे आल्यावर सापडतो. आपल्याकडे मात्र आजही वर्षाला ६० ते ७० हजार स्रिया या आजाराने दगावतात. पाश्चात्त्य देशात आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी केवळ एक स्री दगावते. पाश्चात्त्य देशात स्तनाचा कॕन्सर लक्षणे यायच्या आधीच्या स्टेजेस मध्येच वार्षिक मॕमोग्राफीवर पकडला जातो. आपल्याकडे मात्र स्तनातील गाठ हाताला लागू लागल्या स्री घाबरून डॉक्टरांना दाखवायला जाते. तोपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्याकडे आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी चार स्रिया वर्षाच्या आत दगावतात. भारतात दर वर्षी ७० ते ८० हजार स्रिया स्तनाच्या कॕन्सरने दगावतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी २६ नवीन स्तनाच्या कॕन्सरच्या केसेस आणि २२ नवीन गर्भाशय मुखाच्या केसेस सापडतात. दुर्दैवाने बहुतेक वेळी आजार तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये असतो. हाडांच्या ठिसूळपणामुळे खुब्याचे हाड मोडल्यास २०% लोक वेगवेगळ्या गुंतागुंती होऊन वर्षाच्या आत मरतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे दर वर्षी २०० ते २४० खुब्याची हाडे मोडतात. वयाच्या पन्नाशी नंतर एखाद्या स्रिची स्तनाच्या कॕन्सरने मरण्याची जितकी शक्यता असते तितकीच खुब्याचे हाड मोडून मरण्याची शक्यता असते. ही आकडेवारी भयंकर आहे. भारतात आज डायबेटीसची कॕपिटल झाला आहे. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या ३३% लोक तर ग्रामीण लोकसंख्येच्या २५% लोक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या २७% लोकांच्या आणि ग्रामीण लोकसंख्येच्या १७% लोकांच्या रकातील कोलेस्टेरॉलने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे.  हे तिन्ही आजार कसलेही लक्षणे न दाखवता शरीराला वाळवी लागल्यासारखे आतून पोखरून टाकतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा हे आजार सापडतात तेव्हा हृदय, किडनी, मेंदू सारख्या शरीरातील अनेक महत्वपुर्ण अवयवांना कायमस्वरूपीची इजा होऊन गेलेली असते. बहुतेक सगळ्या सायलेंट किलर आजारांची भारतात हीच स्थिती आहे. 

रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ राखण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.  स्री ही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. भारतीय स्रियांनी प्राधान्यक्रमात त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी प्राधान्य दिलेले असते. ती कुटुंबासाठी दिवसरात्र झटत असते. तिला सुट्टी नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. तिला आजारी पडायचीही सोय नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी तिने केलेला हा एक त्यागच असतो. पण या त्यागाची किंमत तिला गंभीर स्वरूपाचे आजार स्विकारून चुकवावी लागते. हे होऊ नये म्हणून त्यांच्या रक्षकाने (कुटुंबप्रमुखाने वा भावाने) प्रोॲक्टीव्हली चार पावलं पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक रक्षाबंधनला आपल्या घरातील स्रियांना “वार्षिक आरोग्य तपासणी पॕकेज” भेट दिले तर खऱ्या अर्थाने त्यांचं रक्षण करण्याकामी ते आपले योगदान ठरेल. ती करत असलेल्य त्यागाची परतफेड करणे शक्य नाही. किमान तिचे आरोग्य जपले तर ज्या कुटुंबासाठी ती त्याग करते आहे त्या कुटुंबाचा भाग म्हणवून घ्यायला आपण लायक ठरू.

कसा वाटतो हा विचार? पटल्यास आम्हांला जरूर कळवा..

..आणि हो, आम्हांला कळवण्याहून अधिक महत्वाचं म्हणजे या विचारावर कृती करून तो नक्की अंमलात आणा. 

यापुढे आपणही असे ‘खरेखुरे रक्षाबंधन’ नक्की साजरे करा.

– समाप्त –  

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

गणपती का बसवतात ? त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का होते?…. 

आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले. परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यांना महाभारत काव्य लिहिण्याची विनंती केली. मला गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल, त्यामुळे गणपतीला थकवा येईल त्यावेळी पाणीही ‌ वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषींनी गणपतीच्या शरीरावर मृतिकेचे लेपन केले. आणि भाद्रपद चतुर्थीला त्याची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन असल्यामुळे गणपती अडकून पडला. म्हणून यांना पार्थिव गणपती हे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर गणपतीच्या शरीराचे तापमान वाढले आहे आले. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात ठेवले. तेव्हापासून चतुर्थीला गणपती बसवला जातो.  त्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होते ही प्रथा पडली.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print