मराठी साहित्य – विविधा ☆ श्वानपुराण… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ श्वानपुराण… ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोकल हैं भाई! इधर के ही हैं!

अंधेरी रातों में..सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले…पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी!  (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर…ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार?

लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो…पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने,विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.

श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल..म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल….रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो…दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.

कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी,हलकी वाहने(कार,रिक्षा इ.) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.

कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत…आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे…आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात…कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार..तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य…थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो…या स्तंभ शब्दावरून आठवले….कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे..साधन नव्हे!

सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे…अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन.जी.सी.,डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे,प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली…(बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!)

वाघ,सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत,हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं..हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे  marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते…नाहीतर आपले सरकारी फलक…वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.

दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच  (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात,अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी,मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत…यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो…आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो..शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.

आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत…आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी,कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात..आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते…ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत..उलट मागून येणा-या दुस-या  वाहनांच्या मागावर…नव्हे वासावर राहतात…त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही!

पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री…तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली  साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.  

एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती ,गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे…काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत…..अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत…दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत…लोकल ही भाई…इधर के ही हैं….(आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत…!) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही…असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो..पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो…शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम! 

 (या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!)

(सहजच आपली गंमत! संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजीप्रभूंचे बलिदान… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ बाजीप्रभूंचे बलिदान… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

१३ जुलै. तब्बल पावणे चारशे वर्षे होत आली. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला तोच हा दिवस. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन खिंड पावन झाली, तोच हा दिवस.

बाजी, आजही तुम्ही तेथे लढता आहात का? आज ही तुमचे कान ५ तोफांचे आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत का? आजही तुम्ही तुमच्या शूरवीर मावळ्यांच्या समवेत अभेद्य अशा खडकाप्रमाणे उभे आहात का?

बाजी, तुम्ही आपल्या स्वामी-भक्तिचा संदेश केवळ मराठी मनालाच नव्हे, महाराष्ट्रलाच नव्हे तर संपूर्ण जगताला देऊन अमर झाला आहात .आणि म्हणूनच प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक मराठी ओठावर 

आजच्या दिवशी या ओळी आपसूक येत राहतील …. 

” गाऊ त्यांना आरती

     भारतभूची ही पावन धरती

        पृथ्वीचे अलंकार इथे घडती

           बलीदानाने तुमच्या

                पावन झाली

                  पावनखिंडीची धरती

        

 मराठी मने तुम्हाला

               अभिमानाने स्मरती

                    गाऊ त्यांना आरती .

                             गाऊ त्यांना आरती .

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆

सौ. राधिका (माजगांवकर) पंडित 

? मनमंजुषेतून ?

☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆ 

मी राधिका गोपीनाथ पंडित. माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा.”अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.

लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे. 

असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला…

मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची. 

एकदा शाळेत जाताना आईने मला त्या गुरुजींना “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. 

धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पूजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी माजगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय.”

गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली.”

ते काय पुटपुटले ते मला काहीच कळल नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरं .

इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरूजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.

आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या,’ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. 

तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर..” 

गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो.”

तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. साडे बारा ला नक्की जेवायला या हं!. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल”. आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्ह ता.

आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली गेली आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता. 

“बसा नं जेवायला. माझ्या मुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला.” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न- प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे.

आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, च विष्ट होतं जेवण. खरं सांगू!माई आमची मंडळी गेल्या पासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.

आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरूजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी.  इकडे आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होत. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.

त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला  माझ्या मोठ्या बहिणीने  लीलाने गाठले.आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्या मुळे बघ आईला केवढा त्रास झाला,’ असं म्हणून भरपूर झापलं.

मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. 

माझ्या क्षमाशील आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले.”

तर, असा सकारात्मक विचारांचा धडा आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणू काही..

© सौ. राधिका (माजगांवकर) पंडित

पुणे

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सिंदबादची सफर… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सिंदबादची सफर… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

टीम सेव्हरीन

पावनखिंड बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय.शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली.पुर्वी तिचं नाव घोडखिंड होतं..पण बाजीप्रभूच्या बलिदानाने ती पावन झाली.. म्हणून मग पावनखिंड.

काही वर्षांपुर्वी काही शिवप्रेमींनी ठरवलं.शिवाजी महाराज या खिंडीतून ज्या प्रकारे गेले.. तस्साच प्रवास करुन गडावर पोहोचायचे.तश्शाच एका पावसाळी रात्री त्यांनी ती पावनखिंड पार केली.गो.नी.दांडेकर,बाबासाहेब पुरंदरे यांनी पण अनेकदा ती पार केली.इतिहास प्रेमी जे असतात.. किंवा इतिहासाचे अभ्यासक..ते अश्या प्रकारची साहसी करतच असतात.

कालीदासाचं मेघदुत हे एक दीर्घ काव्य.या काव्यातील मेघाचा प्रवास सुरु होतो तो मध्य भारतातुन.. साधारण नागपुरच्या परिस्थितीनं निघालेला मेघ उत्तर भारतात कसा जातो ‌.त्याला भारताच्या या भागातील निसर्ग कसा दिसतो याचे वर्णन म्हणजे मेघदुत.

मध्यंतरी याच मार्गाने एकाने प्रवास केला.. हेलिकॉप्टर मधुन..आणि मेघदुतामधील वर्णन अनुभवलं.

सिंदाबादची सफर पण आपण वाचत आलोय.. मुळ अरबी भाषेतील या सुरस कथा.सिंदाबादच्या सात सफरी वाचुन एकाला वाटलं की आपण सुध्दा अश्या सफरी कराव्यात.सिंदाबादने ओलांडले तसे..त्याच मार्गाने.. तश्याच पध्दतीच्या जहाजातुन.

टीम सेव्हरीन त्यांचं नाव.हा एक आयरीश संशोधक होता.या संपूर्ण मोहिमेचा खर्च उचलला होता ओमानच्या सुलतानाने.ओमान  मधील सोहर हे एक बंदर.सिंदबाद या गावचा होता अशी येथील गावकऱ्यांची समजुत.त्यामुळे या जहाजाचे नाव ठेवलं गेलं..सोहर.

टीम सेव्हरीन ओमान मधील शहरांमधून..बंदरांमधुन भटकला.सिंदबाद ज्या प्रकारच्या जहाजातुन निघाला होता,ते जहाज नेमकं कसं होतं यावर त्यानं संशोधन केलं.त्याला समजलं की हे जहाज बांधण्यासाठी आपल्याला लाकुड आणावं लागणार आहे ते.. भारतातील मलबार किनारपट्टी वरुन.

तो कालिकतला पोहोचला.फार पुर्वी कालीकत बंदरामधुन मसाल्याचा व्यापार चालत असे.येथे येणाऱ्या अरबी जहाजांमुळे येथे बरेच उद्योग बहरले होते.जहाज बांधणारे.. दोरखंड वळणारे..जहाजांसाठी लागणारे लाकूड विकणारे.

येथे आल्यावर सेव्हरीनला समजलं की सागवान लाकडांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी आणली आहे.मग ऐनाचं लाकूड वापरायचं ठरवलं.मंगलोरच्या आसपास जंगलं, टेकड्या धुंडाळल्या.शेवटी कोचीन जवळ हवं तसं लाकूड मिळालं.

जहाजाच्या तळाचा भाग हा सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी साधारण बावन्न फुट लांबीचा सरळसोट वासा हवा होता.बराच तपास केल्यानंतर तोही मिळाला.बाकी महत्त्वाची खरेदी होती काथ्याची.चारशे मैल इतक्या लांबीचा काथ्या मिळणं आवश्यक होतं.लक्षद्विप बेटावरच्या या विषयातला तज्ञ म्हणजे कुन्हीकोया.त्याच्या सल्ल्यानुसार ही पण खरेदी झाली.

फळ्या जोडण्यासाठी पाव टन डिंक.. चुन्याची पोती..जहाजाला बाहेरुन लावण्यासाठी माशांचं तेल..ते सहा पिंप..हत्यारे..हातोड्या..अशी ही भली मोठ्ठी यादी.

जहाज शिवण्याची कला असलेले मोजकेच माणसं होते.. तेही लक्षद्वीप बेटावर.मग तेथुन दहा माणसं ओमानला आणण्यात आली.

आणि मग एका शुभ दिवशी जहाज बांधणीला सुरुवात झाली.तो दिवस होता ४ फेब्रुवारी १९८०.काही दिवसांतच सोहर नावाचं ते भव्य जहाज उभं राहिलं.

मस्कतमधील बंदरात जहाज उभं राहीलं.. अगदी मध्ययुगीन काळात होतं तसं.मग त्यावर एक एक साहित्य जमा होऊ लागलं.जनरेटर..कंदील..लाईफ जॅकेटस्.. खाद्य वस्तु..हजारो अंडी.. कांदे बटाटे.. आणि ओमानी खजुर.

सोहरवर कमीत कमी वीस कर्मचारी होते.परंपरागत जहाज हाकण्याची कला असलेले खलाशी.. देखभाल करणारे..शिडं हाताळणारे.. त्याशिवाय रेडिओ ऑपरेटर.. कॅमेरामन.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ.

२३ नोव्हेंबर १९८० या दिवशी सोहर ची वाटचाल सुरु झाली.ज्या मार्गाने आठव्या शतकात सिंदबाद गेला होता..त्यांचं मार्गाने सोहर निघालं.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोहर लक्षद्वीप बेटावर आलं.इथुन पुढे कालीकत.. मग श्रीलंका.पंचावन्न दिवसांच्या प्रवासानंतर सोहर  सुमात्रा बेटावर पोहोचलं.नंतर सिंगापूर आणि शेवटी चीनचा किनारा.

नकाशा पुढे ठेवून बघितलं तर कळतं की सेव्हरीनची ही सफर सुरू झाली मस्कत पासून.अरबी समुद्र.. हिंदी महासागरातुन सहा हजार मैलांचा प्रवास करत साडेसात महिन्यांनी ही सफर पुर्ण झाली.खलाशांचं जीवन तसं धोक्याचचं असतं.सोहर वरील निम्मे खलाशी कधी ना कधी संकटात सापडले होते.अनेक संकटांचा सामना करत टीम सेव्हरीनची ही सफर पार पडली.ती मुळच्या सिंदबादच्या सफरीइतकीच रोमांचक होती.

या प्रवासासाचा सुरस तपशील आपल्याला वाचायला मिळतील मिळतो तो टीम सेव्हरीन ने लिहीलेल्या आपल्या पुस्तकात..१९८२ सारी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे.. ‘दि सिंदबाद व्हॉयेज’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरेदी…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरेदी…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

“ तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे? ”

“ होय आहे !.” 👌

“कधी घेतलात?”

“झाली की १५-२० वर्षे.”

“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.” 🤣

“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”

“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.” 🤣

“पण मग घेतला कशाला?”

“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.”

“ म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?”

“नाही. चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली जाळ्या, जळमटे फार छान निघतात.” 🤦‍♀️‍♀️

“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो !. कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. …मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.” 🤣

“मी म्हणतो तिला तूच कर. तर म्हणते कशी… हे पुरुषांचं काम आहे. 🤦‍♂️”

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा घेतो आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.” 🤣

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे.??? रोज करता की नाही व्यायाम?”

“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.” 

“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…” 🤦‍♀️‍♂️ 😖

“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.?” 🤦‍♀️‍♂️‍♀️

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”

“होता. ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. ही पण म्हणाली होती कि मी पण करीन व्यायाम 🏋🏼‍♂️🚴🏼‍♀️ पण राहूनच गेले. 😠

“आता वापरून बघू यात का?”

“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.” 🤣

“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”

“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.” 👌

“त्याचं काय करता?”

“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.” 👌

“अरे व्वा! वहिनींना त्रास कमी झाला असेल नाही.”

“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणिक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.” 🤦‍♀️‍♀️

“मग घेताना लक्षात आले नाही?”

“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.” 🤣

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय आहे … हे बघा, ही म्हटली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. 🤦‍♂️ 🤣 मी विचारत नाही का? कशाला?”

“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“हो. आहे ना.” 👌 🎁 👌

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.” 🤣

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.पंधरा”

“मधे कधी घालून बघितलात?” 🤣

“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.” 🤣

“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बसं इतकाच.” 🤦‍♀️‍♂️ 🤣

“काय किंमत होती?”

“त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू 🎁 👌 त्या अजून वापरतात?”

“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?” 🤦‍♀️‍♀️

“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना दर वेळी तोच तोच शालू वापरला तर इतर बायका हसतील असे तिला वाटते.” 🤣 

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत. 🤦‍♂️ 🤦‍♀️” 🤣

“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. 💎 👌 कधी घेतला?”

“फार वर्षे झाली.”

“कधी वापरला जातो?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. सेटमध्ये ३६ पीस होते, आता ३५ पीस राहिलेत.” 🤦‍♂️ 🤦‍♀️ पैशांचा अपव्यय ! 🤣 ! आईला-सासुला, गरीब पुतण्याला देणार नाहीत 🤦‍♂️

“मग दुसरा बाउल आणायचा ना!”

“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.” 🤣

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.” 😠

“शोकेसमध्ये छान दिसतो पण.” 🤣

“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.” 🤣

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“ बरेच !….खूप आहे कि. राईस कुकर, ओव्हन, पोळ्या लाटायचे मशीन, कॉफी मशीन, स्युईंग मशीन. आणखी काय काय आहे बघावं लागेल. ” 👌 🤣  

“व्वा! चालू द्यात. चला निघतो मी.” 🤦‍♀️‍♂️ 🤣

* * * * * * * * * * * * * * *

उगाच हसू नका. 😊  तुमच्या घरात काही वेगळे नाही 😊 . तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशिच, हीच असणार. 😊 🤣 पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी 🤣. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नासिक, पुना, मुंबई,तळेगावला घेतात 😖. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात 🤣 तर रस्ताच विसरलेले असतात.. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात. 🤣 

 तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून

असो !. येतो मी !. 

चहा पुढच्या वेळी घेऊ. ! ! !

विवेक जागृत ठेवा,

आनंदात राहू शकाल,…..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

१२ जुलै १९६१. पानशेत धरण फुटलं. नदीकाठच्या पेठा वाहून गेल्या. संसार उध्वस्त झाले. वाडे पडले. घरं वाहून गेली. माणसं गेली, पैसाआडका गेला, दागिने वाहून गेले, पुण्याचं होत्याचं नव्हतं झालं.

त्याआधीचं पुणं वेगळं होतं. पुण्यात गुरांचे गोठे होते. बरेच बोळ होते. रस्त्यांवर फारसा प्रकाश नसे. घोड्यांच्या पागा होत्या, टांगे होते, बग्ग्या होत्या. खूप साऱ्या सायकली होत्या. घरोघरी चुली होत्या, शेगड्या होत्या, कोळशाच्या वखारी होत्या. कंदील होते. पलंग होते. खाटा होत्या. हौद होते…

पहाटे पिंगळे यायचे, सकाळी वासुदेव यायचे. दुपारी डोंबारी आणि दगडफोडे आपापला खेळ करून पैसे मागायचे. खोकड्यातला सिनेमा यायचा. मुलं त्याला डोळा लावून ‘शिणूमा’ बघायची. माकडाचे खेळ यायचे. नागसापवाले गारूडी यायचे. डोंबारी दोरीवरून चालायचे. ‘जमूरे’ चादरीत लपून गायब व्हायचे.

पुणं पहाटेचंच उठायचं. पूजाअर्चा चालायच्या. खूप मंदिरं होती. त्यात घंटानाद व्हायचे. धूपदीपांचा सुगंध दरवळायचा. आरती नैवेद्य व्हायचे. व्रतवैकल्यं असायची. सण जोरात साजरे व्हायचे. त्यात धार्मिकता ठासून भरलेली असे. अगदी पाडव्यापासून सुरू होऊन, वटसावित्री, श्रावण, मंगळागौरी, नारळीपौर्णीमा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी, रथसप्तमी, होळीपर्यंत सण उत्साहात साजरे होत. गणपतीत वाड्यावाड्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत. गणपती चौकात सतरंज्या टाकून लोक गजानन वाटव्यांची गाणी ऐकत. घरोघरी धार्मिकतेनं गणपती बसे. सत्यनारायण वगैरेही जोरात होई. घरोघरी नवरात्र बसे. वाड्यावाड्यात भोंडले होत. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा…’ ऐकू येई. अनेक बायकांच्या अंगात देवी येई. दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ बनत. मुलं किल्ले करत. मुली रांगोळ्या काढत. वर्षभर सणसमारंभ चालत.

त्याकाळी बरेच पुरुष धोतर नेसत. बायका नऊवारी साडी नेसत. पाचवारी साडी अजून रूळायची होती. बालगंधर्व बायकांचे आवडते होते. त्यांचे हावभाव, साडी नेसणं याची बायका नक्कल करत. ‘असा बालगंधर्व पुन्हा न होणे…’ हे सर्वमान्य होतं.

मुलं पतंग उडवत, विट्टीदांडू खेळत. आट्यापाट्या, लगोरी, सूरपारंब्या वगैरे मुलांचे आवडते खेळ होते. मुली सागरगोटे, बिट्ट्या वगैरे खेळत. भातुकली हा मुलींचा आवडीचा खेळ होता. मुलं चड्ड्या घालत. मुली परकर पोलकं घालत. बायका अंबाडा घालत. त्यात एक फूल खोचत. ठसठशीत कुंकू लावत. मंगळसूत्र घालत. मुली कानात डूल घालत. काही मुलं शेंडी ठेवत.

पानशेत पुरामुळेच पुण्याचं रूप पालटलं. मुकुंदनगर, महर्षीनगर, सहकारनगर, दत्तवाडी, पानमळा असे अनेक नवीन भाग उदयाला आले. वाड्यांच्या पुण्यात बंगल्यांची एंट्री झाली. तिथून पुणं वाढायला सुरुवात झाली. पेठांमध्ये वसलेलं पुणं, ही पुण्याची ओळख पुसून नवीन पुढारलेलं पुणं दिसू लागलं. जसं ते रहाणीमानात बदललं, तसं ते आचारविचार आणि संस्कृतीतही बदलू लागलं. कर्मठ पुण्याचं आता प्रगतीशील पुण्यात रुपांतर होऊ लागलं. संस्कृती, आचारविचार, रुढी, परंपरा या मागासलेपणाचं निदर्शक मानल्या जाऊ लागल्या. साठच्या दशकात संसाराला लागलेल्या पिढीची तारेवरची कसरात झाली. रुढी परंपरांवर त्यांच्या आईवडिलांच्या दबावामुळे असलेला अर्धवट विश्वास आणि आभासी प्रागतिक विचारांचं सुप्त आकर्षण यात त्यांची कुतरओढ झाली. म्हणून ते आपल्या मुलांवर कुठलेच संस्कार नीट करू शकले नाहीत. कर्मठपणावरून त्यांचा विश्वास  उडाला होता आणि नवीन, प्रागतिक विचार पचवायला ते असमर्थ होते.

या दरम्यान पुणं वाढतच होतं. साठच्या दशकात जन्माला आलेली नवीन पिढी मोठी होत होती. धार्मिकता, कट्टरता यावर आपल्या आईवडिलांचा डळमळीत झालेला विश्वास त्यांना जाणवत होता. ही पिढी प्रागतिक विचार बोलू लागली होती. त्यांच्या या विचारांपुढे त्यांचे आईवडील हतबल झालेसे वाटत होते. आईवडीलांच्या पिढीत आईवडील मोठे असत. मुलं त्यांच मनोभावे ऐकत असत. पुढच्या पिढीत आईवडील मुलांच्या प्रागतिकतेनं मंत्रमुग्ध झाल्यानं आईवडील मुलांचं ऐकू लागले.

नव्वदच्या दशकात पुढची पिढी आली. तिच्या आईवडिलांवरच पुरेसे संस्कार झालेले नव्हते. तिच्यावर कसलेच संस्कार करायला तिच्या आईवडिलांना वेळ नव्हता. वेळही नव्हता आणि माहितीही नव्हती. आजी आजोबा ही स्थानं संपली होती. गोष्टी सांगणारी आजी लुप्त झाली होती. ‘ममा, पप्पां’ना गोष्टी सांगता येत नाहीत. त्यांना तेवढा वेळही नाही. त्यात टीव्ही घरात आले. आजीपासून नातवापर्यंत सगळे निरनिराळ्या सिरीयल्समध्ये अडकले. त्यात ‘डिस्टर्ब’ नको, म्हणून आईबापांनीं मुलांच्या हातात मोबाईल दिला. त्यानं ती व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली. बहुतेकसे आईवडील एकपुत्र असल्यानं मुलांना बोलायला घाबरू लागले. आपल्या मास्तरांनी मारलेल्या छड्यांचे वळ अभिमानाने मिरवणारे आईबाप मुलांच्या अंगावर हात टाकायला बिचकू लागले. मुलांच्याही ते लक्षात आले. ती अवास्तव मागण्या करू लागली. त्यांचे हट्ट पुरवले जाऊ लागले. आजीआजोबा किंवा आईवडीलांचा  ‘धाक’ संपला. धाक हा शब्द डिक्शनरीत जाऊन पडला. शिक्षकांनी मुलांना मारणं गुन्हा ठरू लागला. मारलं तर मुलं आत्महत्या करू लागली. शिक्षकांना जेल होऊ लागली. मुलांवरचा धाक संपला!

त्यात आय.टी. इंडस्ट्री पुण्यात आली. जो तो आयटीत पळू लागला. त्यांना अवाच्यासवा पगार मिळू लागले. त्यातल्या प्रत्येकानं दोनदोन चारचार फ्लॅट्स विकत घेतले. त्यानं पुणं अजूनच विस्तारलं. पुण्याची राक्षसी वाढ होऊ लागली. खराडी, वाकड, धानोरी, अशी अनेक पूर्वी कधी पुण्यात न ऐकलेली नावं सर्रास ऐकू येऊ लागली. पेठेत रहाणारी लोकं आपापली घरं व्यापाऱ्यांना विकून तिकडे रहायला जाऊ लागली. आयटी क्षेत्रानं पुण्याची संस्कृती अजून रसातळाला गेली. आजचं आणि आत्ताचं पहा, आम्हाला कोणी मोठे नाहीत. अगदी आईवडील सुद्धा नाहीत. त्यांना असा कितीसा पगार होता. आत्ताच आम्ही त्यांच्या दसपट कमावतो, असा गंड मनात मूळ धरू लागला. मुली सर्रास दारू पिऊ लागल्या. रस्त्यावर सिगारेटी पिऊ लागल्या. वीतभर चड्ड्या घालून रस्त्यावरून फिरू लागल्या. लग्न करायची गरज कमी होऊ लागली. ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ नावाचा नवीन विचार पुढे आला. आईवडील अधिकच हतबल होऊन पहात राहिले. अनेक कुटुंबं आयटीमधल्या मुलींच्या पैशावर पोसली जात असल्यानं, आईवडील मुलींना काही बोलू शकत नव्हते. आता पुणं, आयटी पुणं झालं होतं. जागांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. खूप हॉटेलं झाली होती. अनेकांच्या घरी स्वयंपाक बनत नव्हता. बाहेरचं खाण्याची संस्कृती रुजत चालली होती. दारू फारच सामान्य झाली होती. ड्रग्जचे नवनवीन प्रकार येत होते. एकमेकांच्या संगतीनं नवी पिढी त्यात ओढली जात होती.

आयटी बरोबर परप्रांतीयही पुण्यात खूप आले. त्यांनी त्यांची संस्कृती पुण्यात मिसळली. रंगपंचमी बंद होऊन पुण्यात धुळवड जोरात खेळली जाऊ लागली. प्रचंड पैसा घेऊन पुण्यात शिकायला आणि नोकरीला आलेल्यांनी नीतिमत्ता पूर्णपणे धाब्यावर बसवली. पुण्यात बुद्धिमत्ता कमी झाली आणि पैसा बोलू लागला.

या आयटीयन्स् मुळे जागांना प्रचंड भाव आले. पुण्याभोवतालचे शेतकरी शेती बंद करून ‘स्कीमा’ करू लागले. बिल्डर बनू लागले. ‘गुंठामंत्री’ नावाची एक नवीन जमात उदयाला आली.

साठ वर्षांत पुणं आता पूर्णपणे बदललं आहे. ब्राम्हणी पुणं तर केव्हाच लोप पावलंय.  सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक अशी पुण्याची ओळख पुसली गेली आहे. पुरणावरणाच्या पुण्यात, सदाशिव पेठेत मटण आणि बिर्याणीची दुकानं दाटी करू लागली आहेत.

आता पुण्यात फारसे वाडे शिल्लक नाहीत. सकाळी वासुदेव येत नाही. दगडफोडे, डोंबारी, भुते, ‘जग्ग’ डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या बायका, कुडमुडे, पोपटवाले ज्योतिषी, ‘जमूरे’ वाले नाहीसे झालेत. नदीचं आता गटार झालंय. पानशेतफुटीपूर्वी ओंकारेश्वराजवळ सुद्धा नदीचं पाणी पिता यायचं. आता त्यात पाय घालायचीही किळस येते. पानशेत फुटीनंतर पुणं बदललं, वाढलं, विस्तारलं. पण जे रूप बदललं, ते पुणं नाही राहिलं. ते बौद्धिक, तात्विक, विचारवंतांचं, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं पानशेतच्या पुरात वाहून गेलं. उरलं आणि वाढलं ते पुणं नाहीये, एक अक्राळविक्राळ संस्कृतीहीन, चेहेरा नसलेलं, मुंबईच्या पावलावर पाऊल टाकायला निघालेलं एक चेहेराहीन, पानशेतफुटीनं  बकाल केलेलं गर्दीचं एक शहर!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कर चले हम फिदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कर चले हम फिदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

# कर चले हम फ़िदा… अब तुम्हारे हवाले… #

“… हे काय? अजून तुम्ही स्टूलावरच उभे आहात काय? गळफास लावून घ्यायला धीर होत नाही ना? …पाय लटलट कापायला लागलेत ना! तो फास गळ्यात अडकवून घ्यायला हात थरथरायलाही लागलेत का?.. अगं बाई! चेहरा कसा भीतीने फुलून गेलाय… अंगालाही कापरं भरलयं वाटतं… आणि छप्पन इंचाची नसलेली छाती कशी उडतेय धकधक… ह्यॅ तुमची.. तुमच्याने साधं फासाला जाणं देखील जमणारं नाही…  घरातल्या इतर कामा सारखंच फाशी घेण्याचं कामं सुध्दा तुम्हाला जमत नाही…म्हणजे बाई कमालच झाली म्हणायची…अहो बाकीच्या  संसाराच्या कामात मेलं एकवेळ राहू दे हो  पण निदान फासावर जाण्याच्या कार्यात तरी पुरूषार्थ दाखवयाचा होताना…तितही डरपोक निघालात….तुका म्हणे तेथे हवे जातीचे हे येरागबाळ्याचे काम नोव्हे… आणि हे काय हातात लिहिलेला कागद कसला घेतलाय? बघु दे मला एकदा वाचून… आपल्या आत्महत्येला जबाबदार म्हणून माझं नावं वगैरे तर लिहिले नाही ना त्यात… हो तुमचा काय भरवंसा.. तुम्ही मनात आलं नाही तर फासावर लटकवून घ्याल नि व्हालं मोकळे एकदाचे… आणि मी बसते इथे  विनाकारण पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देत नि कोर्ट कचेऱ्याच्या हेलपाट्या टाकत आयुष्यभरं… तसं जिवंत पणीही तुम्ही मला सुखानं जगू दिलं तर नाहीच पण मेल्यावर सुद्धा माझ्या आयुष्याची परवड परवड करून गेल्याशिवाय चैन ती तुम्हाला कसली पडायची नाही… जळ्ळं माझं नशिब फुटकं म्हणून देवानं हा असला नेभळट नवरा माझ्या नशीबी बांधून दिला… अरेला कारे केल्याशिवाय का संसाराचा गाडा चालतोय… पण ती धमकच तुमच्या खानदानातच नाही त्याला तुम्ही तरी काय करणार… अख्खं गावं तुम्हाला भितरा ससोबा महणतयं आणि मला  जहाॅंबाज गावभवानी… पण कुणाची टाप होती का माझ्या वाटेला येण्याची… एकेकाची मुंडीच पिरगाळू टाकली असती… मी होते म्हणून तर इथवरं संसार केला… आणखी कुणी असती तर तेव्हाच गेली असती पाय लावून पळून… चार दिडक्या कमवून घरी आणता म्हणजे वाघ मारला नाही… घर संसार माझा तसाच तुमाचाही आहे… नव्हे नव्हे बायको पेक्षा नवऱ्याचा संसार जास्त महत्त्वाचा.. त्याचा वंशवेल वाढत जाणार असतोना पुढे… मग तो कर्ता पुरुष कसा असायला हवा हूशार, तरतरीत, शरीरानं दणकट नि मनानं कणखरं.. हयातला एकही गुण तुमच्याजवळ असू नये… जरा बायकोनं आवाज चढवला कि तुम्ही घरातून पळून जाता… कंटाळले मी तुमच्या या पळपुटेपणाला… एकदाचं काय ते कायमचे पळूनच का जात नाही म्हणताना आज तुम्ही हि फिल्मी स्टाईल स्टंटबाजीनं फासावर लटकवून घेण्याचं काढलतं.. कशाला मला भीती घालायला… असल्या थेरांना मी भिक घालणारी बाई नाही… माझ्या मनगटातलं पाणी काही पळून गेलंल नाही… माझं मी पुढचं सगळं निभावून न्यायला खंबीर आहे… तुम्ही तुमचं बघा… आणि काय ते लवकरच आटपा … आज एकच रविवारची सुट्टी असल्याने सगळं घरं झाडून घ्यावं म्हणतेय मी… मला ते तुमच्या पायाखालचं स्टूल हवयं.. तेव्हा तुमचा निर्णय लवकर अंमलात आणा… मला थांबायला वेळ नाही बरीच कामं पडलीत घरात… नाहीतर असं कराना एवीतेवी तुम्ही फासावर लटकायचं हे ठरवलंय ना.. मग जाण्यापूर्वी शेवटचं एकदा घर झाडून द्यायला मदत करुनच गेलात जाता जाता तरं माझ्या मनाला तेव्हढचं समाधान मिळेल हो… आणि त्या आधी तुमचे आवडीचे दडपे पोहे  नि त्याबरोबर गरम गरम चहा ठेवलाय तोही पिऊन घ्यालं… नाहीतर उगाच माझ्या मनाला नकोती रुखरुख लागेल… आता बऱ्या बोलानं खाली उतरतायं कि कसं.. का मारू लाथ त्या स्टूलाला अशीच… “

… ” नको नको…मी खाली उतरतो… तू म्हणतेय तसं फासावर जाण्यापूर्वी दडपे पोहे नि चहा घेतो… ते घरं झाडायला तुला मदतही करतो… पण पण तू असं समजू नकोस कि मी माझ्या निर्णायापासून परावृत्त झालो म्हणून… ते आपलं तुझ्या शब्दाचा मान राखावा आणि तुला ते स्टूल हवयं म्हणून… हे सगळं आवरून झालं कि मी माझा निर्णय  अंमलात आणणारं हं… मग भले त्यावेळी तू कितीही मधे मधे आढेवेढे आणलेस तरी माघार घेणार नाही… पण त्यावेळी तू मात्र दडपे पोहे नि गरमागरम चहाच्या मोहात फशी पाडू नकोस बरं… नाहीतर…. “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली  ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन

घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’

आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही

म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही 

घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच. 

एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.

त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की  काहीच  प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात. 

माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.

– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार 

अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!

आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला  असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !

कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’ 

तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला

सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं 

काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.

जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय

म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”

कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि 

बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर  ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”

समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई 

आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… ! 

मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”

आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं

दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘  असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.

अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात  जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच  दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …! 

सांंगा कोणता….? ” बsssरं…! “

‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’

….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं

 नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?

मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वैशाली आणि गौरवचं नुकतंच एका महिन्यापूर्वी लग्न झालेलं… दोघेही मूळ अकोल्याचे. नोकरी निमित्त गौरव आधीच मुंबईमध्ये स्थाईक झालेला आणि आता लग्नानंतर वैशालीने देखील मुंबईमध्ये नोकरी बघण्याचे ठरले. वैशाली जरी अकोल्यात वाढलेली तरी एकदम स्मार्ट, प्रचंड हुशार आणि हुशार असल्याने साहजिकच थोडीशी आत्मकेंद्री.. नाही म्हणजे मित्र मैत्रीण होते तिला, पण तरीही तिचा अभ्यास वगैरे सांभाळून मगच त्यांच्या बरोबर मज्जा करायला, फिरायला जाणारी अशी होती ती. आई अनेकदा तिला सांगत, अगं असं घुम्या सारखं राहू नये.. चार लोकात मिसळावं, आपणहून बोलावं, ओळखी करून घ्याव्यात… पण तेव्हा तिला काही ते फार पटत नसे.. आई सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिलाही कधी एकटं वगैरे वाटलं नाही…

आता मुंबईमध्ये आल्यावर हळू हळू इथलं वातावरण अंगवळणी पडत होत तिच्या.. वैशालीला मुंबईला घरी येऊन १०/१२ दिवस झाले होते.. कामवाली बाईसुद्धा मिळाल्याने वैशालीचा भार एकदम कमी झाला होता… 

ती अशीच एका दुपारी पुस्तक वाचत बसली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. तिने थोडंसं नाराजीनेच दार उघडलं.. पाहते तो साधारण ७० च्या आसपास वय असलेल्या आज्जी उभ्या होत्या दारात… 

तिने दारातूनच विचारलं, “आपण कोण? काय हवं आहे?”

“मी, लतिका देवस्थळी.. इथे शेजारच्या फ्लॅट मध्ये राहते.” आज्जीबाईंनी माहिती पुरवली.

“बरं…काही काम होतं का??”, आपली नाराजी सुरातून फार जाणवू न देता वैशालीने विचारलं.

” १०/१२ दिवस झाले तुम्हाला येऊन , म्हटलं ओळख करून घेऊ.. म्हणून आले… आत येऊ? ” 

वैशालीने थोडं नाराजीनेच दार उघडलं… तशी आज्जीबाई आनंदाने घरात येऊन सोफ्यावर बसल्या…

“थोडं पाणी देतेस??”, आज्जी नी विचारलं.

“हो…”

वैशाली स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास घेऊन आली…

“छान सजवलयस हो घर… निवड चांगली आहे तुझी… मला थोडी साखर देतेस.. घरातली संपली आहे… ह्यांना चहा करून द्यायचाय.. मेला, तो किराणावाला फोन उचलत नाहीये माझा.. कुठे उलथलाय देव जाणे..” आज्जी एका दमात सगळं बोलून गेल्या.

“हो आणते…”  वैशाली वाटी भरून साखर घेऊन आली….. 

“चला आज साखर दिलीस.. आपलं नातं साखरे सारखं गोड राहील हो पोरी “, असं म्हणून देवस्थळी आज्जी तिच्या गालाला हात लावून निघून गेल्या…

जरा विचित्रच बाई आहे?? असं पहिल्याच भेटीत कोणी काही मागत का.. आणि हे काय, गालाला काय हात लावला तिने.. जरा सांभाळूनच राहावं लागणार असं दिसतंय… वैशालीचं आत्मकथन सुरू होतं.. तेवढ्यात गौरव आला….. 

तिने गौरवच्या कानावर घडलेला प्रकार घातला… तो म्हणाला, ” अग म्हाताऱ्या आहेत ना वाटलं असेल तुझ्याशी बोलावं म्हणून आल्या असतील.. नको काळजी करूस..”

एक दोन दिवस गेले अन् परत दुपारी दारावरची बेल वाजली..

वैशालीने दार उघडलं तर समोर आज्जी… आणि हातात वाटी…. आज ही काहीतरी मागायला आल्यात वाटतं…

“जरा थोडा गूळ देतेस का?? ह्यांना आज गूळ घातलेला चहा प्यायचाय आणि घरातील गूळ संपलाय…” इति आज्जी

“हो.. देते…”

वैशाली वाटीतून गूळ घेऊन आली … 

“वा .. धन्यवाद हो पोरी… चांगली आहेस तू… असं म्हणून तिच्या हाताला हात लावून आज्जी घरी गेल्या..”

तिला परत असं त्यांनी स्पर्श करणं जरा खटकलं ….. 

पुन्हा एक दोन दिवस झाले आणि आज्जी दारात उभ्या आणि हातात वाटी, “जरा दाणे देतेस…”

— हे असं हल्ली दर एक दोन दिवस आड चाले… काहीतरी मागायचं आणि जाताना हाताला, गालाला, पाठीला, डोक्याला हात लावून निघुन जायचं… वैशालीला ते अजिबात आवडत नसे, अस परक्या बाईने आपल्याला हात लावणं..

ती आपली गौरवला नेहमी सांगायची पण तो काही हे सगळं फार सिरीयसली घेत नव्हता…

एके दिवशी न राहवून तिने ठरवलं आता आज आपण त्यांच्या घरी जाऊन काहीतरी मागू या… हे काय आपलं सारखं घेऊन जातात काही ना काही….. 

वैशाली ने आज्जींचं दार वाजवलं.. आजींनी दार उघडलं तशी वैशाली घरात गेली..

आज्जी, ” अरे व्वा, आज चक्क तू माझ्या घरी आलीस.. छान छान.. खूप बरं वाटलं…” 

वैशाली आपलं स्मितहास्य करत घरावरून नजर फिरवत होती आणि एका जागी तिची नजर खिळली… भिंतीवर २५/२६ च्या आसपास असलेल्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि त्याला हार…

आज्जीच्या लक्षात आलं… 

” ही माझी वैशाली… काय गंमत आहे नाही… सेम नाव… काही वर्षांपूर्वी अपघातात गेली… मला कायमच पोरकं करून… जेव्हा तू इथे रहायला आलीस आणि तुझं नाव ऐकलं ना तेव्हा सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या… खूप अडवलं ग मी स्वतःला की माझी वैशाली आता नाहीये आणि परत कधीच येणार नाहीये… पण मन फार वेड असतं पोरी… बुद्धीवर मात करतंच….  

…. आणि मग मी सुरू केलं तुझ्याकडे उसनं सामान घ्यायला येणं… पण खरं सांगू, मी सामान नाही ग .. 

स्पर्श उसना घेत होते… !! ” 

लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – माझे बाबा ‘तो’ आणि मी यांच्यातला एक दुवा आहेत असं पूर्वी वाटायचं. ते गेले आणि तो दुवा निखळला याची रुखरुख पुढे बरेच दिवस मनात होती.पण ‘त्या’नेच मला सावरलं. तो दुवा निखळल्यानंतर ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर खरंतर वाढायला हवं होतं पण तसं झालं नाही.ते दिवसेंदिवस कमीच होत गेलं.)

आज मला जाणवतं ते असं की माझ्या अजाण वयापासूनच सभोवतालच्या आणि विशेषतः घरच्या वातावरणामुळे श्रद्धेचं बीजारोपण माझ्या मनोभूमीत झालंच होतं. नंतरच्या अनेक अघटीत घटना, प्रसंग यांच्या खतपाण्यामुळे ते बी रुजलं,अंकुरलं आणि फोफावलं. त्या श्रद्धेबरोबरच आई-बाबांनी त्यांचे अविरत कष्ट, प्रतिकूल परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा, सह्रदयता आणि माणुसकी यासारख्या मूल्यांचे संस्कार स्वतःच्या आचरणांनी आम्हा मुलांवर केले होतेच. त्यामुळे मनातल्या श्रद्धेतला निखळपणा सदैव तसाच रहाण्यास मदत झाली. ती श्रद्धा रुजता-वाढताना कधी कणभरही अंधश्रद्धेकडे झुकली नाही.अनेक अडचणी, संकटांच्यावेळीही ‘त्या’च्याकडे कधी ‘याचक’ बनून पहावंसं वाटलं नाही. त्या त्या प्रत्येक वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना ‘तो’ फक्त एक साक्षीदार म्हणून सदैव माझ्या मनात उभा असायचा. ‘कृपादृष्टी असू दे’ एवढीच मनोमन एकच प्रार्थना ‘त्या’च्या चरणी असे. त्यामुळे स्वतःची अंगभूत कर्तव्यं निष्ठेने आणि मनापासून पार पाडण्याकडेच कल कायम राहिला. नित्यनेमाचे रूपांतर त्यामुळेच असेल कर्मकांडात कधीच झाले नाही. तसे कधी घडू पहातेय अशी वेळ यायची तेव्हा या ना त्या निमित्ताने मी सावरलो जायचो. मग आत्मपरीक्षणाने स्वतःच स्वतः ला सावरायची सवय जशी अंगवळणी पडली तसा मी ‘त्या’च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर कमी होत जाण्याचे हे एक ‘प्रोसेस’ होते!

आणि मग वेळ आली ती माझ्या कसोटीची. पण त्यालाही माझे बाबा १९७३ साली गेल्यानंतर दहा वर्षांचा काळ उलटून जावा लागला!

बाबा नेहमी म्हणायचे, “दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळे ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकाला जमत नाही.करवून घेणारा ‘तो’च ही भावना हवी.एकदा निश्चय केला कि  मग त्यापासून परावृत्त करणारेच प्रसंग समोर येत रहातात.तेच आपल्या कसोटीचे क्षण.जे त्या कसोटीला खरे उतरतात तेच तरतात….! “

‘तो’ आपली कसोटी पहात असतो म्हणजे नेमकं काय? आणि त्या कसोटीला ‘खरं’ उतरणं म्हणजे तरी काय? याचा अर्थ समजून सांगणारा अनुभव मला लगेचच आला.

तो दत्तसेवेच्या वाटेवरचं पुढचं पाऊल टाकण्याचा एक क्षण होता. घडलं ते सगळं  अगदी सहज घडावं असं.

यापूर्वी उल्लेख केल्यानुसार १९५९ साली कुरुंदवाड सोडून किर्लोस्करवाडीला जायची वेळ आली तेव्हा आईने दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला येण्याचं व्रत स्वीकारलं होतं. ते व्रत जवळजवळ दोन तपं अखंड सुरु होतं. आई वय झालं तरी ते व्रत बाबा गेल्यानंतरही श्वासासारखं जपत आली होती.

माझे बँकेतले कामाचे व्याप, जबाबदाऱ्या, दडपणं हे सगळं दिवसेंदिवस वाढत होतंच. त्यामुळे रोजची देवपूजा आणि गुरुचरित्राचं नित्य-वाचन एवढाच माझा नित्यनेम असायचा.

नोव्हेंबर १९८३ मधल्या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई नृसिंहवाडीला गेली आणि अचानक माझी मावस बहिण सासरच्या कार्यासाठी या भागात आली होती आणि माझ्या आईला  भेटून जावं म्हणून आमच्या घरी  आली. थोडा वेळ बसून बोलून मग पुढे पुण्याला जायचं असं तिनं ठरवलं होतं.आई यायची वेळ होत  आली होतीच म्हणून तिची वाट पहात ती  थोडा वेळ थांबली होती.

मी नुकताच बँकेतून येऊन हातपाय धुवत होतो तेवढ्यात आई आली. त्यामुळे दार उघडायला तीच पुढे झाली. आमच्या मुख्यदारापर्यंतच्या तीन पायऱ्या चढतानाही आई खूप थकल्यामुळे गुडघ्यावर हात ठेवून सावकाश चढतेय आणि बहिण तिला हाताचा आधार देऊन आत आणतेय हे मी लांबून पाहिलं आणि कपडे बदलून मी बाहेर जाणार तोवर बहिणीने तिला खुर्ची देऊन भांडंभर पाणीही नेऊन दिलं होतं.

“किती दम लागलाय तुला. आता पुरे झालं हं. अगदी देवधर्म आणि नेम झाला तरी शरीर स्वास्थ्यापेक्षा तो महत्त्वाचा आहे कां सांग बघू. खूप वर्ष सेवा केलीस.आता तब्येत सांभाळून रहायचं” बहिण तिला पोटतिडकीने सांगत होती. दोघींचा संवाद अगदी सहज माझ्या कानावर पडत होता.

“सवयीचं झालंय ग आता.नाही त्रास होत.जमेल तेवढे दिवस जायचं. नंतर आराम आहेच की. त्याच्या कृपेनंच तर सगळं मार्गी लागलंय. मग घरच्या कुणी एकानं तरी जायला हवंच ना गं? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे व्याप आहेतच ना? इथं मी रिकामीच असते म्हणून मी जाते एवढंच” आई म्हणाली.

आईनं आजपर्यत हक्कानं, अधिकारानं आम्हा कुणावर कधीच काही लादलं नव्हतं. आज मावस बहिण आल्याचं निमित्त झालं म्हणून आईच्या मनाच्या तळातलं मला नेमकं समजलं तरी. आई आता थकलीय. घरातल्या कुणीतरी एकानं जायला हवंच तर मग ते मीच हे ओघानंच आलं. कारण तेव्हा माझा मोठा भाऊ बदली होऊन नागपूरला गेला होता. लहान भाऊ अजून शिकत होता. प्रवासाची दगदग आता यापुढे आईला जमणार नाही हे या प्रसंगामुळे मला तीव्रतेने जाणवलं होतं आणि आईचं ते व्रत आता यापुढे आपण सुरु ठेवायचं आणि त्यातून तिला मोकळं करायचं हे त्याचक्षणी मी मनोमन ठरवून टाकलं. त्यानंतरची डिसेंबर १९८३ ची पौर्णिमा दत्तजयंतीची होती.

या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई सकाळीच नृ.वाडीला गेलेली.त्या संध्याकाळी मी बँकेतून परस्परच वाडीला गेलो. दत्तदर्शन घेतलं. हात जोडून मनोमन प्रार्थना केली ,

‘दर पौर्णिमेला निदान एक तप नित्यनेमाने आपल्या दर्शनासाठी येण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आपला कृपालोभ असू दे. हातून सेवा घडू दे.” अलगद डोळे उघडले तेव्हा आत्यंतिक समाधानाने मन भरून गेलं होतं. अंत:प्रेरणेने पडलेलं दत्तसेवेच्या वाटेवरचं हे माझं पुढचं पाऊल होतं.

घरी हे आईला सांगितलं.आता यापुढे खूप दगदग करून,ओढ करुन तू अट्टाहासानं नको जाऊस.मी जात जाईन असंही म्हटलं.सगळं ऐकून आई एकदम गंभीरच झाली.

“माझ्याशी आधी बोलायचंस तरी..” ती म्हणाली.

” का बरं?असं का म्हणतेस?”

“उद्या तुझी कुठे लांब बदली झाली तर? कशाला उगीच शब्दात अडकलास?”

“नकळत का होईना अडकलोय खरा” मी हसून म्हटलं. ” तू नेहमी म्हणतेस ना, तसंच. सुरुवात तर केलीय. होईल तितके दिवस जाईन. पुढचं पुढं”

आईशी बोलताना मी हे हसत हसत बोललो खरं पण तिच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.

खरंच. देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्स्फरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण थोडेच या परिसरात रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?”

या जरतरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print