मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.

वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.

दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.

नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.

तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।

घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.

नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.

जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.

वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.

एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.

चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.

नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.

मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.

एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.

अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.

सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…

… अशी ही सांजवेळ.

लेखिका : शैलजा दांडेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ  

मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटेसे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता. बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच.

मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात पी. यू. सी. सायन्सला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५. २०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.

बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडून 

कॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी. एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील ‘अजिंठा’ आणि ‘मराठवाडा’ या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला. तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, “ बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. “.. तर तो म्हणाला, “पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है. ” 

मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच “वाचकाचे मनोगत” या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.

दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.

आश्चर्य म्हणजे ‘दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, ” विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली. ” मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.

पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र ‘अजिंठा’मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. ” गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत. ” 

मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात “रेल निलायम सिकंदराबाद”कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना….. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.

रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५. २० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र मला डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}

एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, “आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल. “

म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆ |

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर

एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यातला.

पण अखेर आपापल्या उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले ते मात्र एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत.

अर्थातच एक गेला, ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच… आणि त्या दुसर्‍याने माझ्याही पिढीची, तरुणाई धुंद करून सोडली. म्हणजे बघा ना… ‘पहेला नशा पहेला खुमार.. नया प्यार है नया इंतेजार’ लिहितेवेळी, हे जुनं खोड पंच्याहत्तरच्या आसपास होतं.

तर… एका प्रतिभावानाने लिहिलं होतं…

‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही

जवळी जरा ये हळू बोल काही

हात चांदण्यांचा घेई उशाला

अपराध माझा असा काय झाला’

आणि दुसर्‍याने लिहिलं होतं…

‘रातकली एक ख्वाब में आई

और गले का हार हुई

सुबह को जब हम नींद सें जागे

आँख तुम्ही सें चार हुई’

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. आणि असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या सिद्धहस्त लेखणीतून, स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे

धूळ उडाली, भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा

झुलवू नको हिंदोळा’

आणि…

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा 

न घबराइए

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की 

चले आइये’

आहाहा ! रोमान्सनी काठोकाठ भरलीयेत ही दोन्ही गाणी. पण तरीही अगदी कणभरानेही व्हल्गर नसल्यामुळेच, एका स्त्रीच्या तोंडीही खुलून येतांना दिसतात.

बरं नायिकाच नाही… तर ह्या दोघांच्याही शब्दांच्या पायघडीवरुन चालणारा नायकही, अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रेमभावनेनी. आणि तरीही… ती आत्यंतिक संयतपणे व्यक्त करणाराही आहे तो.

एकाचा नायक म्हणतो…

‘अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी

यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी

घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

नविन आज चंद्रमा’

दुसर्‍याचा नायक म्हणतो…

‘जब तलक ना ये तेरे रसके भरे होठों से मिलें

यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले

गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए

जलते हैं जिसके लिये’

तर… १ ऑक्टोबर, ह्या दोघांचा जन्मदिन. आणि दोघांचं जन्मवर्षही एकच… १९१९. काय म्हणावा हा दैवी योगायोग……

#ग_दि_माडगुळकर

#मजरुह_सुलतानपुरी

… आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, मनःपूर्वक अभिवादनाचं ओंजळभर अर्ध्य.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दाम्पत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दाम्पत्य” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

 

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवालाही कळले नाही

नवऱ्याने काय पाप केलेले असते

 

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

 

वस्तू कुठे ठेवली हे

बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

 

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसतानाही

बायकोला होतेय खूपच छोटी

 

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

 

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 

 काट्याकुट्याच्या रस्त्यातून

 नवरा किती मस्तीत चालतो

 याला कारण खरं बायकोचा

 मस्त, धुंद सहवास असतो

 

 बायको गावाला गेली की

 देवाशपथ, करमत नसतं

 क्षणाक्षणाला रुसणारं

 घरात कुणीच नसतं

 

 नवरा-बायकोचं

 वेगळंच नातं असतं

 एकमेकांचं चुकलं तरी

 एकमेकांच्याच मिठीत जातं

 

 बायकोवर रागावलो तरी

 तिचं नेहमी काम पडतं

 थोडा वेळ जवळ नसली तर

 आपलं सर्वच काही अडत असतं

 

 अव्यवस्थित संसाराला

 व्यवस्थित वळण लागतं

 त्यासाठी अधूनमधून

 बायकोचं ऐकावंच लागतं

 

 बायकोशी भांडताना

 मन कलुषित नसावं

 दोघांचं भांडण

 खेळातलंच असावं

 

 नाती असतात पुष्कळ

 पण कुणी कुणाचं नसतं

 खरं फक्त एकच

 नवराबायकोचं नातं असतं

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “काहीही चालवून घ्यायचे का ??? ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ काहीही चालवून घ्यायचे का ??? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

“ ह्याचा पेक्षा चांगला मराठी नाही येतात का? “

वरील ह्याचा या शब्दातील ‘चा’ या शब्दाचा उच्चार ‘चार’ मधील ‘चा’ सारखा समजावा. तसाच ‘चांगला’ शब्दातील ‘चां’ चा उच्चार ‘च्या’ सारखा समजावा!

तर तमाम मराठी वर्तमानपत्रात आज ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वर्तमानपत्रे जाहिरातदारांनी दिलेला मजकूर जसाच्या तसा छापतात हे कबूल. पण म्हणून या मराठी वर्तमानपत्रांनी काहीच नाही म्हणायचं का?

किमान मराठी वृत्तपत्रे आपण मराठी वृत्तपत्रे आहोत याचे भान राखून जाहिरातदारांना बदल, दुरुस्ती सुचवू शकत नाहीत का? की पैसे मिळाले की काम झाले? इतर भाषिक, विशेषतः दाक्षिणात्य लोक त्यांच्या भाषेत एक काना मात्रा अधिक उणा खपवून घेत नाहीत. संगणकामध्ये इंग्लिश स्पेलिंगची अगदी किरकोळ चूक जरी झाली तरी त्वरित तांबडी अधोरेखा दिसू लागते. असे मराठीत कधी होईल?

जर खरेच आपली मराठी भाषा अभिजात म्हणून प्रस्थापित करायची असेल तर सर्व ठिकाणी किमान स्वीकारार्ह मराठी उच्चार, लेखन व्हावे, याचा आग्रह धरला पाहिजे. जाहिराती, सार्वजनिक सूचना या जर मराठीत लिहायच्या असतील तर त्यांतील मजकूर तपासून घ्यायला पाहिजे. यासाठी हे काम करून देणारी अधिकृत संस्था असणे गरजेचे आहे. अशी संस्था नसेल तर ती स्थापन केली गेली पाहिजे. तोवर मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठे यांतील तज्ज्ञ यांचेकडून हे काम विनंतीपूर्वक आणि सशुल्क करून घेणे अनिवार्य करावे.

एक तर बहुतांश जाहिरातदार संस्था अमराठी असाव्यात, असे दिसते. महामार्गांवर जे सूचना फलक दिसतात त्यात लेखन अपराध दिसतात, त्याचे एक कारण म्हणजे देश पातळीवर बहुधा contracts दिली जात असावीत आणि ही contracts बहुदा अमराठी लोकांकडे जात असावीत. अन्यथा असे प्रकार झाले नसते. आंबेगाव चे अम्बेगाव झाले असते का? हिंजवडी (म्हणजे हिंजव हा सलग उच्चार आणि लगेच डी.. जसे पुनव… डी.. म्हणजे पुणे) असे गावाचे नाव आहे.. त्याचे हिंजेवाडी झाले नसते. लोह गाव लोहे गाव झाले नसते. या अमराठी लोकांकडे हिंदी, इंग्लिश जाणणारे लोक उपलब्ध असतात आणि ते याच लोकांकडून मराठी मजकूर लिहून, वाचून घेतात. मग अशा चिंधीवृत्तीने घोटाळे होणारच !

अभिजात मराठीची अशा प्रकारांनी इभ्रत जात असते, हे ध्यानात कधी घेणार आपण? की हेच भाषेचे प्रवाहीपण असे मानायचे?…..

मोरया चा मोरिया, गोट्या चा गोटिया, शेतकऱ्याचा शेतकरीयाचा …. असा हिंदी उच्चार जवळपास सर्वमान्य झाला आहेच. च, ळ इत्यादी मुळाक्षरे अमराठी बांधवांना आणि भगिनींना जड जातात, हे मान्य.. पण म्हणून काहीही चालवून घ्यायचे का?

केवळ पैसे वाचवण्यासाठी contractors, copy writers कुणाकडूनही मराठी कामे करून घेत आहेत.

जर एखादी अधिकृत संस्था स्थापन केली गेली तर बरेचसे नियंत्रण येईल, असे वाटते !

तोवर नाही येत ऐवजी नाही येतात, असे वाचायची आणि ऐकायची सवय करून घ्यावी लागेल.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ को-जागर्ती…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

?विविधा ?

☆ को-जागर्ती…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच असते. मस्ती, गाणी, आणि आटीव मसाला दूध ! तरुणाई तर या पर्वणीची वाटच पहात असते. त्यांना चांदण्यात फिरण्याची एक आगळीच मौज अनुभवायची असते. अगदी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. ‘. अशीच.

अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी व इंद्र ऐरावत पूजनाचा हा दिवस. रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्राला अटीव दुधाचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. यादिवशी नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चंद्राचं एक वेगळंच रूप आपल्याला भासतं. व त्याचं महत्त्वही आहेच. खरंतर पौर्णिमेचा चंद्र नेहमीच छान दिसतो म्हणून तर कितीतरी कवींनी त्याच्यावर कविता केल्यात. अगदी चंद्राची कोर ते पौर्णिमेपर्यंतच्या चंद्राचं आगळं रूप यावर. !

त्यात हवीहवीशी थंडी अन मधुर सुंदर चंद्रप्रकाश मन प्रसन्न करतोच.

निसर्गाचा प्रत्येक रूप तसं लोभस सुंदरच असतं. चंद्र प्रकाशा इतकाच रात्रीचा आभाळभर पसरत जाणारा अंधार देखील. ! अमावस्येलाही स्वतःचं असं एक देखणे पण असतं तसंच पौर्णिमेला पूर्ण बिंबानं शोभणाऱ्या चंद्राचं सौंदर्य ही असतं…. खरंच मुळात पौर्णिमा मनाला भुरळ घालते त्यात शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सौंदर्य अन सगळ्यांचा जल्लोष, गाण्यांच्या मैफिली मस्तच. अगदी लक्ष लक्ष चांदण्यांना स्वच्छ निरभ्र आकाशानं मैफिलीचं निमंत्रणच दिले असं वाटतं. शहरापासून थोडं लांब किंवा एखाद्या बागेत घराच्या टेरेसवर असं मोकळ्या वातावरणात मोकळ्या जागेत याचा जास्त आनंद घेता येतो.

असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्र मंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन. प्रत्येकालाच ती विचारते की ‘को-जागर्ती ‘ ? म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कोणी जागा आहे का ?आणि तिच्या या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. जागरण करतात मग तिची वाट पाहणाऱ्या.. साद देणाऱ्या सगळ्यांनाच ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी देते. हे शीतल कोजागिरीचं चांदणं अंगावर घेतलं की मन:शांती, आरोग्य लाभते कारण अमृताचे काही थेंब तरी आटलेल्या दुधात पडतात. सारं जग जरी झोपलं तरी बुद्धिमान, विचारी, संयमी अन आपले कर्तव्य चोख बजावणारे लोक जागे राहतातच. याबरोबर निदान मौज करण्यासाठी तरी सगळे जागे असतात.

माझ्या माहेरी वालचंदनगरला चाळ संस्कृती हो. सगळे शेजारीपाजारी मैत्रिणी जमून चंद्र चांदण्या पौर्णिमा यांना अनुसरून गाणी म्हणायची. ग्राऊंडवर मस्त फेरफटका मारायचा आणि नंतर दूध घ्यायचे. त्याबरोबर भेळही असायची. लग्नानंतर रेल्वे क्वार्टरच्या पटांगणातच दूध आटवत ठेवायचे. भेंड्या खेळायच्या. शरदाचं चांदणं अंगावर घेत चंद्राच्या सोबतीनं महालक्ष्मीच्या हाकेची वाट पाहायची. आजही आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र जमतो आणि या पौर्णिमेचा आनंद घेतो. चांदण्यात फिरतो. दुधाबरोबरच एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. जीवन जगताना आपल्याला असे छोटे-मोठे आनंद नेहमीच सुंदर जगायला हवे असतात. आपली संस्कृती नेहमीच आपल्याला आरोग्य आणि जीवन याचा समतोल राखायला मदतच करत असते. मनाच्या, शरीराच्या, व्याधी म्हणजे सगळा अंधार त्यामुळे नाहीसा होतो आणि एक सुंदर निरामय जीवन आपल्याला लाभतं …. अन् आजही तनामनातला अंधार मिटवून, एक एक चांदणी मनाच्या निरभ्र आकाशात उमलते. अन पूर्ण चंद्रबिंब अमृत धारा बरसतांना महालक्ष्मीची हाक ऐकू येते,

……. “ को-जागर्ती.. ?.. को-जागर्ती.. ? “ …. अन् आभाळभर पसरलेल्या चंद्र प्रकाशात त्या आटीव दुधाला, बालपणापासून जिभेवर रेंगाळणारी तीच अमृताची चव येते…. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(पोस्टाची संगीतसेवा…)

९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे… 

३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!

भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते.

स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्‍यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.

यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!

अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..

पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.

‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!

पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…

उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.

आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!

मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.

आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्‍याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!

आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?

आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? मनमंजुषेतून ?

☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…

आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.

सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !

… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शौर्य गाथा : नायक जदुनाथ सिंह राठोड… परमवीर चक्र – लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ शौर्य गाथा : नायक जदुनाथ सिंह राठोड… परमवीर चक्र – लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री मेघःशाम सोनवणे

नौशेरा सेक्टर येथे एकट्याने डझनावारी शत्रू सैनिकांशी लढून भारतीय सैन्यासाठी महत्वाचा असा एक दिवस वाचवलेला योद्धा.

ही खऱ्या अर्थाने हिरो असलेल्या नायक जदुनाथ सिंह राठोड या राजपूताची वीरगाथा आहे. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी उत्तरप्रदेशातील शहाजहानपूर च्या खजुरी गावी झाला होता. भारतीय सैन्याच्या 1/7 राजपूत रेजिमेंट (आताची ब्रिगेड ऑफ गार्डस् ची चौथी बटालियन) मध्ये ते सेवेत होते..

६ फेब्रुवारी १९४८ रोजी काश्मिर मधील नौशेरा सेक्टरच्या तैंधर येथे शत्रूसैन्याच्या अगदी समोरची दोन नंबरची चौकी आर्मी नंबर 27373 जदुनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली होती. ही चौकी शत्रुच्या अगदीच समोर होती. हत्यारांनी सज्ज मोठ्या संख्येतील शत्रुला सामोरे जाण्यासाठी फक्त नऊ सैनिक या चौकीवर होते. ही चौकी जिंकण्यासाठी शत्रूने हिरीरीने लागोपाठ हल्ले केले. शत्रूसैन्याच्या हल्ल्याची पहिली लाट या चौकीवर येऊन आदळली. आपले शौर्य व नेतृत्वगुणाचे प्रदर्शन करीत आपल्या जवळ असलेल्या छोट्या तुकडीच्या हिंमतीच्या बळावर नायक जदुनाथ सिंह यांनी शत्रुला गोंधळात टाकत पळवून लावले.

आपल्यापैकी चार सैनिक जखमी झाले पण तरीही जदुनाथ सिंह यांनी आपले उच्च नेतृत्वगुण व समजदारीच्या बळावर आपल्या हुकुमातील, संख्येने कमी असलेल्या सैनिकांचा मोर्चा बांधून पुढच्या हल्ल्यास सामोरे जाण्यास ते सज्ज झाले. त्यांचे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व व हिम्मतीवर त्यांच्या सैनिकांना पुर्ण विश्वास होता व ते शत्रुच्या हल्ल्याचा सामना करण्यास जय्यत तयार होते. शत्रूसैन्याने दुसरा हल्ला मोठ्या उमेदीने व आधीपेक्षा जास्त सैनिकांसह प्रखरतेने चढवला. शत्रूच्या अपेक्षेविपरीत, अगदीच नगण्य सैनिक राहिले असतांनाही, नायक जदुनाथ सिंह यांच्या शौर्यपुर्ण नेतृत्वाखाली त्यांनी ही चौकी लावून धरली. सर्वच सैनिक जखमी झाले होते. नायक जदुनाथ सिंह यांचाही उजवा हात जखमी झाला होता, तरीही घायाळ ब्रेन गनरला बाजूला सारून त्यांनी स्वतः ब्रेनगनचा ताबा घेतला.

शत्रुसैन्य चौकीच्या अगदी भिंतींपर्यंत येऊन पोहोचले होते, पण नायक जदुनाथ सिंह यांनी पुन्हा अतुलनीय धैर्य दाखवत शर्थीने शत्रूशी लढत राहिले. स्वतःच्या जिवीताची पर्वा न करता जखमांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आपला धीरगंभीर स्वभाव व शौर्य दाखवत लढत रहाण्यासाठी आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवत राहिले.

नायक जदुनाथ यांचा गोळीबार इतका विध्वंसक होता की, चौकी हरण्याच्या स्थितीत असतांनाही विजयश्री खेचून आणल्याचे स्पष्ट दिसत होते. शत्रूसैन्य जमीनीवर विखुरलेल्या त्यांच्या मृत व जखमी सैनिकांना सोडून आरडाओरडा करत पळून गेले.

आपल्या अतुलनीय शौर्याने अत्यंत बिकट परिस्थितीत खऱ्याखुऱ्या योद्ध्याप्रमाणे लढत, कणखर नेतृत्वगुणाचे उदाहरण स्थापित करीत नायक जदुनाथ सिंह यांनी दुसऱ्या हल्ल्यापासून आपल्या चौकीचे रक्षण केले. आतापर्यंत या चौकीवरील इतर सर्वच भारतीय सैनिक वीरगतीस प्राप्त झाले होते. ही चौकी जिंकायचीच या निर्धाराने शत्रूसैन्याने मोठ्या संख्येने आपला तिसरा निर्णायक हल्ला चढवला.

आतापर्यंत खूपच जखमी झालेले नायक जदुनाथ सिंह अक्षरशः एकहाती तिसऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज झाले. अगदी हिंमतीने व कणखरपणे ते आडोशामधून बाहेर आले व पुढे सरसावत असलेल्या शत्रुसैन्याच्या तुकडीवर एकट्याने आपल्या स्टेनगनने अविश्वसनीय असा हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने विस्मयचकीत होत शत्रूसैन्याची तुकडी सैरावैरा पळत सुटली.

नायक जदुनाथ सिंह यांना या तिसऱ्या व निर्णायक हल्ल्यात डोक्यात व छातीवर अशा दोन गोळ्या लागल्याने वीरमरण प्राप्त झाले. अशारीतीने पुढे सरसावणाऱ्या शत्रूवर एकहाती हल्ला चढवतांना दाखविलेल्या धाडस व अतुलनीय शौर्य गाजवत केलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे युद्धातील महाभयंकर अडचणीच्या वेळी या वीर सैनिकाने, नौशेराच्या संरक्षणासाठी असलेल्या आपल्या सैन्याची कुमक व संपुर्ण विभागावर शत्रूसैन्याला चाल करून जाण्यापासून रोखले होते.

अशी अत्यंत धोकादायक परिस्थिती समोर दिसत असतांनाही अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वोच्च बलिदान देत हौतात्म्य पत्करल्याचे उतराई होत, नायक जदुनाथ सिंह राठोड यांना युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परम् वीर चक्र’ (मरणोपरांत) प्रदान करुन गौरविण्यात आले. हा सन्मान मिळवणारे ते चौथे वीर होते.

देशाला त्यांच्यावर गर्व आहे. “ हे वीर जवान, तुझे सलाम।” 

मूळ लेखक- अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांना वेळ देता येतो. आपण म्हणतो पण, काही क्षण हे त्या दोघांनीच स्वतःसाठी जगले पाहिजे. कशी गंमत असते, लग्नाच्या बेडीत अडकलं की जबाबदाऱ्यांमधून दोघांचीही सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवेफुगवे होतात, कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ या वरुन तात्त्विक वाद होतात. पण, दोघांपैकी एक जण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकूळ होते. संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या, काही नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात समजतो. पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्याचे असते ना!कारण, दोघे संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात. भाळणं संपलेलं असतं, आता जपणूक सुरू झालेली असते. म्हणून तर व. पु. म्हणतात, “आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे..”

 हे लिहिण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी ” शुक्रतारा मंद वारा.. ” या गीताला पन्नास वर्षे पूर्ण झाली. आणि मुख्य म्हणजे प्रेम, निर्मळ प्रेम काय असते त्याचा अर्थ सांगणारे हे भावगीत आहे. ज्याची मोहिनी आपल्या सर्वांच्या मनावर अजूनही आहे. व. पु. म्हणतात, ” प्रेम म्हणजे नेमके काय तर समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं.. ” या गाण्यातील नायकाची इच्छा काय आहे तर, बाहेर इतके सुंदर वातावरण आहे, मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदने ही तिच्याजवळ व्यक्त करताना, तिने डोळ्यातील भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सारं काही सांगतील. तसंच, तिची साथ ही कायम त्याला हवी आहे. म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत,

 ” आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा.. “

 तारुण्यात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत कितीही वाद झाले तरी त्यांच्यापासून फार काळ दूर राहणे शक्य नसते. एकदा का वयाची पन्नाशी ओलांडली की खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. पण प्रेम कमी होते का? अजिबात नाही. व. पु. म्हणतात, ” भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे.. ” प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं. स्त्री ही जन्मतः लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे हळुवार बंध जोडीदार समजून घेईल असे तिला वाटत असते, किंबहुना खात्री असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासाने इतका भारावून गेला आहे की, त्या प्रेमाचा, मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला आहे. ही मनातली भावना आतादेखील ओठांवर आणताना थोडासा बुजरेपणा अजून आहे. पण एक मात्र नक्की, जसं व. पु. म्हणतात, ” सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.. ” त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळे, तिच्या साथीमुळे सार्थकी लागला हे खरं. म्हणून तर म्हटलं आहे,

 ” भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा,

 तू अशी जवळी रहा.. ”

 हे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटले पाहिजे. आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्नं आपण प्रत्येक जण बघतोच. आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा ना, जेव्हा ही दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी तो धरलेला हात हा न सुटणारा आहे, ही भावना मनात असते. आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात, तेव्हा हाच प्रवास जेव्हा डोळ्यासमोर येतो, तेव्हा डोळ्यांतून येणारे अश्रू हे आनंदाचे असतात. कारण, सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो. हेच व. पु. म्हणतात, ” पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो.. ” या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो, “जा, मला तुझी गरज नाही. ” पण जेव्हा गात्रं क्षीण होत जातात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असावी हाच मनाचा हट्ट असतो. किती बदल होतो ना!

 ” वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा,

 तू असा जवळी रहा.. ”

 एकमेकांची झालेली सवय, एकत्र घालवलेले क्षण हे आठवून खरंच वाटतं, किती मोठा प्रवास होता हा! या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते. कारण, हे वयच असे असते की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते, तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमताच उरलेली नसते. मी आधी देखील लिहिले होते, साठी, सत्तरी पार केलेल्या तसेच कोणालाही परावलंबित्व नको असते. आपल्या सवयी या जोडीदाराला माहित असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात. म्हणून तर हे सांभाळणं याचसाठी महत्त्वाचे असते. ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी हे गीत इतकं सुंदर गायलं आहे की, जेव्हा ते म्हणतात, तू अशी जवळी रहा. तेव्हा डोळ्यांसमोर झोपाळ्यावर बसलेले आजी आजोबा दिसतात. ज्यांना फक्त सहवास हवाहवासा आहे. म्हणून तर, या गाण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली, पण कधीही कानावर पडले तरी कर्णसुख मिळाल्याशिवाय राहत नाही.  

लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print