मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय, असे कदाचित वाटू शकेल.

पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. 

हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे. उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

खरंच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे, काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात.

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली…….

||• श्री •||• लिहून पत्राची सुरुवात.

*श्री.रा.रा. – श्रीमान राजमान्य राजश्री.

*स.न.वि.वि. – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

तीर्थरुप आई / बाबा.

*शि.सा.न. –  शिरसाष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत. 

कळविण्यास आनंद होतो की… असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे…

– कळावे, लोभ असावा.

– आपला.

– तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक!)

– आपला आज्ञाधारक

– मो.न.ल.अ.उ.आ‌. छो.गो. पा. : मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा, असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा.

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.

त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत.

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर ता.क (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहीली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. 

आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.

पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहिच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. 

यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग “काय? कसे काय? बाकी सगळे ठीक आहेत ना?” असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणीसारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते. 

अधिक काय लिहू?

कळावे…

आपला नम्र

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते.

वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे._____

आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो…. म्हणून त्याला” विजयी पांडुरंग” असे म्हणतात.

या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यानं मंदिर बांधलं आणि सोनाराकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  “माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल “मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे…

त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते. ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे  सांगितले…

त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत, तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली “दास जेवू घाला न.. घाला” म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत.

प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं.  हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही. म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो.

याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिले. मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे…!

प्रस्तुती : मंजिरी येडूरकर 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग

रणजित देसाई

जन्मदिन : ८ एप्रिल,१९२८

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला आवडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.

त्यांचे कथा लेखन कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून प्रसिद्ध होत असे. त्यांच्या ‘भैरव’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. ‘रुपमहाल’, ‘कणव’, ‘जाणे’, ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’, ‘मधुमती’, ‘मोरपंखी सावल्या’ इ. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि सामाजिक विषयावरच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठरावीक असा वाचक वर्ग तयार झाला. ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एक प्रकारे चित्रकथाच होत्या. इतकी त्यांची जिवंत मांडणी होती. ‘बारी’, ‘माझं गाव’ या कादंबर्‍या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या.

त्यानंतर १९६२ साली ‘स्वामी’ ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘स्वामी’ मुळे एक श्रेष्ठ लेखक म्हणून रणजित देसाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. एखादी कादंबरी वाचकांनी उचलून धरली म्हणजे काय? हे स्वामी कादंबरीच्या आवृत्या ची लांबलचक यादी वाचल्यावर लक्षात येते . मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे  ते अजुनंच नम्र झाले आणि एका आवृत्तीच्या सुरवातीला त्यांनी लिहिले, 

अहंकाराचा वारा  ना लागो माझ्या चित्ता.

त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यानंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणार्‍या कादंबरीची वाट पाहू लागला.

‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिड’, ‘राजा रवी वर्मा’ या सर्व कादंबर्‍यांच्या जोडीनं विशेष गाजलेली, त्यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ ही आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्‍या लिहिणे ही त्यांची हातोटीच झाली होती. रणजित देसाईंनी पुढील काळात काही नाटकंही लिहिली. ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’ आणि त्यातही ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली. या व्यतिरिक्त ‘नागीण’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘सवाल माझा ऐका’ इ. चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. १९७७ साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर बडोदे साहित्य संमेलनाचे १९६५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांना फाळणीमुळे विस्थापित व्हावे लागले त्यांना मध्यवर्ती ठेवून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कुटुंबाची होरपळ त्यांनी ” हे बंध रेशमाचे” या नाटकात दाखवली.या नाटकाचे भाग्य काही औरच होते.याची श्रेय नामावली पहा.

दिग्दर्शक : मधुकर तोरडमल

गीते : शान्ता शेळके

संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

नेपथ्य : रघुवीर तळाशिलकर

कलाकार : वसंतराव देशपांडे, रामदास कामत,जोत्स्ना मोहिले ,बकुळ पंडित,क्षमा बाजीकर

निर्माता : मोहन वाघ.

यातल्या शान्ताबाईंच्या गाण्यांनी नाट्य रसिकांवर टाकलेली मोहिनी आजही कायम आहे

आज सुगंध आला लहरत,

का धरिला परदेश,

काटा रुते कुणाला,

छेडियल्या तारा,

दैव किती अविचारी,

विकलं मन आज झुरत असाहाय्य,

संगीत रस सुरस.

हे बंध रेशमाचे या नाटकात लावणी गात असलेला प्रसंग आहे ती लावणी देखील लोकांना खूप आवडते >>दिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का अन राया अशी जवळ मला घ्याल का << क्षमा बाजीकर यांनी अगदी ठसक्यात ही लावणी म्हटली आहे .

रणजीत देसाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव  हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ! ) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व ( रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर  नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

महारुद्र जे मारुती रामदास।

कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे | शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||”

समर्थ रामदास

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक  प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान  व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा!.

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच!. समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष ) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर  असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो , तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची ) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व.पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक  वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून , ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला  तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

 जय जय रघुवीर समर्थ।

।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर

आज बापू  पुन्हा दिसला. त्याच गल्लीतून बाहेर पडत होता. मागच्या आठवड्यात मी या भागातुन चाललो होतो. टु व्हिलरवरून. तेव्हा तो दिसला. पण मी घाईत होतो. त्यामुळे थांबू शकलो नाही. आज पुन्हा इकडे या भागात आलो..पुन्हा बापू दिसला.. हो तो बापूच होता.कितीतरी वर्षांनी दिसला होता.

मलाही वेळ होता.एकदम त्याच्या पुढ्यातच गाडी थांबवली. बापू  दचकला.. माझ्याकडे जरा रागानेच त्यानं पाहीलं..पण मग मला ओळखल्यावर एकदम दिलखुलास हसला.काही  बदल नव्हता त्याच्या त्या हसण्यात..आणि दिसण्यातही.गोरटेलासा..उंचीने जरा कमी..कुरळे केस..

बापूचं हे असं हसणंच मला खूप आवडायचं.आम्ही दोघे शाळकरी मित्र.दोन वर्ष तर एकाच बाकावर बसायचो.त्याची माझी मैत्री खुप पटकन जमली.

“काय बापू ..इकडे कुठे?”

 मी विचारले.

“अरे,कांता किती वर्षांनी भेटतो आहेस..”

“हो ना.मागच्या आठवड्यात पण मी तुला पाहीलं.याच गल्लीतुन येताना. इकडे काय कोण रहातं का?”

“नाही रे..इकडे एक उदबत्तीचा कारखाना आहे. मी तिथेच नोकरी करतो.”

बापू  ही अशी नोकरी करतो याचा मला जरा धक्काच बसला. कारण बापुची खुप मोठी स्वप्नं होती.बापुचे वडील पेपर विकायचे.पहाटे उठून पेपरचे गठ्ठे आणायचे.. घरोघर ते टाकायचे.आणि मग त्यांच्या घराच्या पुढे एक टेबलवर स्टॉल लावायचे.मी कधी शाळेत जातांना बापुला बोलवायला जायचो.बापु तिथेच स्टॉलवर बसलेला असायचा. एका खुर्चीवर. एक लोखंडी घडीची खुर्ची. निळ्या रंगाची. बापु त्यावर मोठ्या ऐटीत बसायचा.एखाद्या बादशहा सारखा. एक पाय खाली सोडलेला,आणि दुसरा पाय त्यावर आडवा..सतत  हलणारा….. मला त्याची ही पोज खुप आवडायची.

मी आलो की बापू उठायचा.आत घराकडे बघुन त्याच्या वडिलांना हाक मारायचा. ते आले की बाजुला ठेवलेलं दफ्तर उचलायचा.आणि मग आम्ही शाळेकडे जायचो.

त्या लोखंडी घडीच्या खुर्चीत बसुन बापु स्वप्नं रंगवायचा.त्याला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं होतं.आपला एकदम पॉश दवाखाना असेल..मोठ्ठं टेबल..आणि त्यामागे आपली खुर्ची. गोल गोल फिरणारी..खाली छोटे चाकं असणारी.

कधी त्याला वाटायचं..आपण बँकेतला साहेब व्हावं..आपल्याला छानसं केबिन असेल..बाहेर दरवाज्यावर नावाची पाटी असेल.. आणि आपल्या साठी खास खुर्ची.. अशीच.. गोल गोल फिरणारी.

वेळोवेळी त्याची स्वप्नं बदलायची.. पण एक गोष्ट मात्र कॉमन.. ती त्याची खुर्ची.

शाळा सोडल्यानंतर बापु  आज प्रथमच भेटत होता.मधली बारा पंधरा वर्षं कशी झरकन गेली होती.त्याला पाहीले..अन् मला हे सगळं आठवलं.बापुच्या त्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांचं..मोठा अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचं पुढं काय झालं ते मी विचारुच शकलो नाही.त्याच्या एकंदरीत अवसानावरुन.. त्याच्या नोकरीवरून मला त्याच्या परीस्थितीचा अंदाज आला.

पण मग गप्पा मारताना त्यानेच सगळं सांगितलं.शाळा सुटली..मार्क जेमतेमच.अकरावीला कॉलेजमध्ये पण गेला.आणि अचानक त्याचे वडील वारले.घरची जबाबदारी त्याच्यावर पडली.कॉलेज सोडुन तो पेपर स्टॉलवर बसु लागला.पण त्याला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.

कोणाच्या तरी ओळखीने त्याला ही नोकरी मिळाली होती.

“तु बघ कांता.. मला आता या उदबत्तीच्या धंद्याची बरीचशी माहिती झाली आहे.अजुन फारतर दोन तीन वर्षे..मग..”

“..मग..काय?” मी विचारलं.

“मीच एक उदबत्तीचा कारखाना टाकणार आहे.मुंबईहुन कच्चा माल आणायचा.. दहा बारा बायका..मुलं कामाला ठेवायची.आपण फक्त लक्ष ठेवायचं..गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीत बसुन..”

गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीचं वेड काही त्याच्या डोक्यातुन गेलं नव्हतं.

त्यानंतर मात्र बापुची भेट नाही.मधल्या काळात असाच एकदा रस्त्यानं जात असताना एक भंगारवाल्याची गाडी दिसली.त्यावर एक जुनी खुर्ची ठेवलेली होती.. उलटी करुन.तुटकी चाकं अशी वरती दिसत होती.ती खुर्ची बघुन मला एकदम बापुची आठवण आली.

मग एकदा वेळ काढून मी बापुकडे गेलोच.तो तिथेच रहात होता अजुन.पत्र्याच्या खोलीत.पेपर स्टॉलमागेच त्यांचं घर होतं.आता तो रस्ता खुपच रहदारीचा झाला होता.

दार वाजवलं.एका विशीच्या मुलानं दार उघडलं.बापूचा मुलगाच असावा तो.दिसायला साधारण बापुचाच तोंडावळा.

“कोण आहे रे..”

म्हणत बापु बाहेर आला.त्याचं हे असं भेटणं मला एकदमच अनपेक्षित होतं.बापु खुर्चीत बसला होता.. चाकाच्या खुर्चीत..पण..

..पण ती व्हिल चेअर होती.दोन्ही हातांनी चाकं फिरवत तो बाहेर आला.त्याचा एक पाय प्लास्टरमध्ये होता.

मला बघताच बापुला खुप आनंद झाला.बापुला भेटुन मलाही बरं वाटलं.नुकताच त्याचा एक छोटा अपघात झाला होता ‌काही दिवसांसाठी पाय प्लास्टरमध्ये ठेवला होता.म्हणुन त्याच्या मुलानं ही खुर्ची आणली होती.

गप्पा मारताना आम्ही जरा भुतकाळात हरवलो.. आणि मला आठवलं ते बापुचं स्वप्न.

आणि मग बापुच म्हणाला..

“तुला आठवतं..माझं एक स्वप्न होतं ते? चाकाच्या खुर्चीच? ते पुर्ण झालं बघ.बसलो आहे चाकाच्या खुर्चीत.”

बापू हसला.पण त्यांचं ते हसणं कसंतरीच होतं.नेहमीचं नव्हतं.मलाच वाईट वाटलं.त्याला समजावलं.

“अरे आत्ता महिनाभरात ही खुर्ची सुटेल तुझी.चांगला हिंडायला फिरायला लागशील.”

मग आम्ही विषय बदलला ‌त्याच्या त्या जुन्या खुर्चीची आठवण झाली.बापुनं ती अजुन जपुन ठेवली होती.बापाची आठवण म्हणुन.पोराला सांगुन त्यानं ती खुर्ची आतल्या खोलीतून मागवली.गंजली होती..पण बाकी तशीच होती.निळ्या रंगाची..पांढर्या पाईपची.थोडा रंग उडाला होता इतकंच.

मी उठून ती खुर्ची उघडली.करकर आवाज करत ती उघडली.त्यात बसलो.अगदी बापुच्याच थाटात.

“तुला सांगतो कांता..मला अजुनही वाटतं कधी कधी..माझं ते स्वप्न पुर्ण होणार आहे.चाकाच्या खुर्चीचं..गोल गोल फिरणार्या   खुर्चीचं.”

बापुचं ते वाक्य ऐकुन मला बरं वाटलं.पुन्हा जुना बापु दिसला मला.त्याचं ते अधुरं स्वप्न त्याच्या मनातुन गेलं नव्हतं.अशी स्वप्न पहाण्याची क्षमता असणारी माणसं एका अर्थानं मला ग्रेट वाटतात.खरंच..बापु बदलला नव्हता.बापुचं  ‘बापुपण’ हे त्याच्या ह्या स्वप्नाळू व्रुत्तीमध्ये होतं.

_____________________

बापुंचं पाठवलेलं निमंत्रण माझ्यासमोर पडलं होतं.बापुच्या मुलानं दुकान टाकलं होतं.आणि त्यांचं हे निमंत्रण होतं.

संध्याकाळी मी गेलो.बापुच्या त्या जुन्या घराशेजारीच एक नवीन बिल्डिंग झाली होती.तेथेच एका गाळ्यात बापुच्या मुलानं दुकान सुरू केलं होतं.ते एक जनरल स्टोअर होतं.छान नवीन फर्निचर.. फुलांच्या माळा…बाहेर मंडप टाकला होता.बोर्डवर लाईटस्  माळा होत्या.मुलगा आत काउंटरवर होता.

आणि कडक पांढर्या  सफारीतला बापु इकडुन तिकडे फिरत होता.कोण कोण येतंय.. कुणाला डिश मिळतेय की नाही यावर लक्ष देऊन होता.

मला बघताच बापु धावत आला माझा हात हातात घेतला.आणि मला घेऊन आत गेला.दुकानच्याच एका भागात एक छोटं केबीन बनवलं होतं.एक टेबल.. आणि एक खुर्ची ‌तीच..बापुला हवी होती तशीच.बापु टेबलच्या मागे गेला.. आणि त्या खुर्चीत बसला.अतीव आनंदाने त्याने एक गोल गिरकी मारली.

“बघ..झालं की नाही माझं स्वप्न पुर्ण? मग? माझ्या पोरांनं खास माझ्यासाठी ही केबीन आणि खुर्ची बनवुन घेतलीय”

बापुला त्या खुर्चीत बसलेलं बघताना मला खुप आनंद झाला.. खुप बरं वाटलं.जसं काही माझंच स्वप्न पुर्ण झालं होतं.

बोलत बोलत आम्ही बाहेर आलो.प्रसाद घेतला,डिश घेतली.

शेजारीच त्यांचं ते जुनं घर होतं.अजुनही तसंच..पत्र्याचं.

दार नुसतंच लोटलेलं होतं.बापु आत गेला.आणि दोन खुर्च्या घेऊन बाहेर आला.मी एका खुर्चीत बसलो.बापु त्याच्या खुर्चीत बसला.तीच खुर्ची.. लहानपणापासून बघत आलो ती‌.पाठीमागच्या निळ्या पत्र्यावर बापुनं करकटने त्यांचं नाव कोरलेले.. शाळेत असतानाचं.त्यावरुन त्यानं बापाचा मारही खाल्लेला.

आता ती चेपली होती.जराशी डुगडुगत पण होती‌.बापु त्या खुर्चीत बसला होता.. तस्साच..एक पाय खाली सोडलेला.. दुसरा त्यावर आडवा..हलत रहाणारा.आणि चेहर्यावरचे भाव जग जिंकल्याचा.खर्याखुर्या 

बादशहा सारखा..

.. आणि मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता मांजरे-कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्मिता मांजरे – कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बीए साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला . अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रमा यात ती सहभागी होऊ लागली.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यानुसार एलएलबी ला प्रवेश घेतला. पण मनातली वैद्यकीय शिक्षणाची इच्छा परत जागृत झाली आणि मग दहावीच्या गुणपत्रिकेवर तिने डीएचएमएस या होमिओपॅथीच्या पदविकेसाठी पण प्रवेश घेतला! कालानुक्रमे दोन्ही शिक्षणे पूर्ण केली आणि वकिली आणि डॉक्टरी अशा दोन्ही व्यवसायाभिमुख पदव्या स्मिताताईंनी मिळवल्या. त्यानंतर आवडीप्रमाणे नागपुरात स्वतःचा दवाखाना टाकला. तो चांगलाच चालू लागला.डॉ. स्मिताच्या हाताला चांगला गुण होता. भरपूर पेशंट येत असत. त्या आणि त्यांची असिस्टंट दवाखाना संपल्यावर सगळे पैसे मोजत बसायच्या. स्वतःचा दवाखाना झाला, दुचाकी आली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.यामुळे डॉक्टर स्मिता मांजरे यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

यादरम्यान घरात लग्नाचे वारे वाहू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात चहा पोहे आणि मुलगी पाहणे असे कार्यक्रम सर्रास होत असत. पण स्मिता ताईंनी एक-दोन कार्यक्रम झाल्यानंतर हे दाखवून घेणे काही बरे नाही, असे वाटून त्यांनी ते थांबवले. 

या दिवसांत त्यांच्या हातामध्ये विनोबा भावे यांचे ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक पडले.जसजशा स्मिताताई हे पुस्तक वाचत होत्या तसतसे त्या अंतर्मुख होत गेल्या. त्यामध्ये सांगितलेली ‘जीविका आणि उपजीविका’ यांचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ‘माझा स्वधर्म काय आहे’या विचाराने त्यांना भंडावून सोडले. अंगावर ल्यायला उत्तम कपडे, दाग दागिने, फिरण्यासाठी गाडी , चांगली कमाई हे सगळं असूनही काहीतरी अनुपस्थित आहे , असे व्याकुळ असमाधान या युवतीला जाणवू लागले.

त्याच भागात एक ध्येयवेडा तरुण डॉक्टर एम डी पूर्ण करत होता. एमबीबीएस झाल्यावर तो बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन राहिलेला होता.त्याच लोकांसाठी अधिक शिक्षण घेऊ या हेतूने तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. या डॉक्टरचे नाव होते रवींद्र कोल्हे !! बैरागड येथील आदिवासी जनजाती लोकांना आरोग्य सेवा द्यायची हे ध्येय ठरवून बसलेला हा तरुण सुयोग्य जीवनसाथीच्या शोधात होता. यादरम्यान स्मिताताईंचे परिचित सुभाष काळे यांनी ताईंना हे स्थळ सुचवले. पण त्याचबरोबर मुलाच्या वेगळ्या चार अटी सांगितल्या.या अटी काय होत्या 

१) महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल

२) चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे 

३) लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे 

४) कोर्ट मॅरेज करावे लागेल.

सुभाष काळेंनी सहजच सुचवले होते. कारण त्यावेळची स्मिताताईंची राहणी ही उच्चभ्रू प्रकारातील होती. जेव्हा या अटी कळाल्या तेव्हा आपण चारशे रुपयांची साडी नेसत होतो, गाडीवरून नागपुरात आरामात फिरत होतो आणि आपली कमाई पण भरभक्कम होती असे स्मिताताई एका मुलाखतीत सांगतात.

मात्र जसजसा त्या या अटींचा विचार करू लागल्या तसतसे त्यांना गीता प्रवचने वाचल्यापासून ज्या असमाधानाने अस्वस्थ केले होते ते असमाधान दूर होऊ लागले असा प्रत्यय आला. त्यांना या अटींमध्येच आपला स्वधर्म आहे, आपले जीवन ध्येय आहे याची आंतरिक जाणीव झाली.आणि मग दोघे भेटले १९८८ साली या ध्येयवेड्यांनी विवाह बंधन स्वीकारले.डॉ.स्मिता मांजरे डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आली.लग्न कोर्ट पद्धतीने झाल्यामुळे सप्तपदी झाली नाही .मात्र नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी नव्या नवरीला तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागड पर्यंत ३५ किलोमीटर चालत जावे लागले.लग्न ठरल्यानंतर स्मिताताईंनी दवाखाना बंद केला. आपले साठवलेले सगळे पैसे त्यांनी बँकेत एकरकमी डिपॉझिट करून ठेवले. स्वस्तातल्या साड्या खरेदी केल्या. महाग महाग साड्या मैत्रिणी आणि बहिणींना दिल्या. उंची सॅंडल्स, पर्सेस, प्रसाधने सारे काही वाटून टाकले आणि खऱ्या अर्थाने नवजीवनचा प्रारंभ केला !

डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते. ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात घेत असत. औषधांसाठी शहरातील धनिक लोकांना विनंती करून आदिवासी लोकांना जमतील तितकी औषधेही ते उपलब्ध करून देत. स्मिता ताईंनी जेव्हा बैरागड मध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांची स्वतःची झोपडी देखील नव्हती. आजूबाजूच्या जनजाती लोकांनी लाकडे कुडे आणि गवताने साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मिताताईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वीज नाही, नळ नाही, पिठाची गिरणी नाही, जवळपास दुकाने नाहीत असा नन्नाचा पाढा सगळीकडे दिसत होता. त्यातच आजूबाजूला दारिद्र्याने गांजलेली आजाराने ग्रस्त आणि अज्ञानी अशी आदिवासी जनजाती कुटूंबे. त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या.किर्र अरण्याचा एक वेगळाच गंध, शहरी सुरक्षिततेची उब नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांना नव्याने जाणवू लागल्या. पण एकदा मनापासून कार्य स्वीकारले की समस्या भेडसावत नाहीत .थोड्याच दिवसात विहिरीवरून पाणी भरणे, शेण गोळा करून आणणे, घर सारवणे, जात्यावर दळणे ही सगळी कामे त्यांच्या अंगवळणी पडली. नवीन शिकण्याची आवड त्यांना येथे कामाला आली. 

एका मोठ्या लोक वस्तीला एकच डॉक्टर असल्याने कोल्हेना अक्षरशः श्वास घ्यायला फुरसत नसे. खरं म्हणजे स्मिताताईंना पण आपण आरोग्यसेवा द्यावी, पेशंट तपासावे असे वाटत असे. पण सुरुवातीला आदिवासी लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता. त्यांना तेथील लोक कोल्लं आणि कोल्लाणी म्हणत .

एक  घटना घडली आणि लोकांनी कोल्लाणीला वैद्यकीय ज्ञान आहे हे स्वीकारले!!.वाघाने अक्षरशः फाडलेला एक पेशंट आला आणि त्यावेळी  स्मिताताईंना जवळपास ४०० टाके घालावे लागले.अत्यंत चिकाटीने त्यांनी ते काम पूर्ण केले आणि तो पेशंट  वाचला!! काही दिवसांत बरा झाला.नंतर तो चालत दवाखान्यात आला आणि डॉक्टर बाईंना नमस्कार करून गेला!. तेव्हापासून आदिवासी जनजाती लोकांनी ताईंना डॉक्टर म्हणून सहर्ष स्वीकारले!!मग मात्र तपासायला ताईच हव्या अशी आग्रही मागणी पण सुरू झाली!!

मेळघाटात कुपोषणाचे बळी जात असतात. आत्ताही जातात. पण आता प्रमाण कमी आहे. त्यावेळी रवींद्र कोल्हेंनी एमडीला हाच विषय घेऊन प्रबंध लिहिला. त्यांच्या मते हा प्रकार उपासमारीमुळे अर्थात अन्न कमी पडल्यामुळे, पोटाची खळगी न भरल्यामुळे घडतो.त्यांनी नंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची बातमी एका वृत्तपत्राच्या बातमीदाराला दिली. छोट्या चौकटीतील त्या बातमीने दिल्ली मुंबई हादरली. कारण आपल्या संविधानानुसार ”स्टारव्हेशन कोड” म्हणजे ‘भूकबळी’ हा शासनाचा गुन्हा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा विषय गाजला.दिल्ली मुंबईत सूत्रे हलली. घाईघाईने सारे मंत्री, सरकारी अधिकारी मेळघाटामध्ये येऊन पोहोचले.त्यांनी चर्चा केली. स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी तेथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू मातामृत्यू यांची माहिती दिली.मात्र या मृत्यूना ‘उपासमारीचे बळी’ असे न म्हणता ‘कुपोषणाचे बळी’ असे म्हणावे अशी शासकीय यंत्रणेने विनंती केली. सर्व प्रकारची मदत शासकीय यंत्रणा करणार आहे या गोष्टीमुळे स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी देखील तसे म्हणण्याचे मान्य केले आणि मग एकेकाळी १००० मागे २००मुले दगावत ते प्रमाण खूप कमी होत गेले . शासनाच्या मोठ्या यंत्रणेचा अशिक्षित गरीब लोकांना लाभ मिळवून देणे हे आपले ध्येय आहे.शासनाला समांतर कार्य यंत्रणा उभी करणे हे नव्हे , हे दोघही पती-पत्नींनी ठरवलेले होते.

आपल्या सोबतच्या या रान सवंगड्यांना प्रेरणा मिळावी , अन्नटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्मिता आणि रवींद्र यांनी सुधारित शेतीचे प्रयोग केले. स्वतः दुबार पिके काढून दाखवली. खते बियाणांची माहिती दिली  रेशन धान्याचे दुकान टाकले. कोल्हेंच्या दुकानांमध्ये तीस तारखेपर्यंत धान्य मिळत असे. आजही हे दुकान दिमाखात चालू आहे 

आपले कार्य , त्याच्या मागची प्रेरणा ही पुढच्या पिढीत रुजवण्यातही स्मिताताई आई म्हणून यशस्वी ठरल्या! त्यांचा मोठा मुलगा रोहित सुधारित शेती करतो.त्याचे प्रशिक्षण देतो. तर धाकटा मुलगा राम एमबीबीएस एमडी सर्जन होऊन मेळघाट  बैरागड येथेच वैद्यकीय सेवाकार्य करतो. खास वैदर्भीय शैलीतील आघळपघळ बोलणे, पण आवश्यक तिथे ठामपणे उभे राहणे आणि निर्भयता हे दोन महत्त्वाचे गुण स्मिताताईंच्या अंगी आहेत. नामदार नितीन गडकरी हे त्यांचे एकेकाळचे अभाविप मधले सहकारी कार्यकर्ते! त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या नाल्यांवर मोठमोठे पूल झाले आहेत, बरेच ठिकाणी रस्ते देखील आले आहेत. पण म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत.

नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही कन्या आता आदिवासी बंधू भगिनींची आई झाली आहे. एखादे व्रत घेणे सोपे पण  सातत्यपूर्ण आचरण अत्यंत कठीण असते. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासारख्या तेजस्वी दीपांचे महत्व असते.

लेखिका : डॉ रमा दत्तात्रय गर्गे

प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं… लेखक :श्री एकनाथ वाघ ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.

दारात शिवराम.

शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या. आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.

मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी ‘नको नको’ म्हणाला. आग्रह केला, तेव्हा बसला. पण अवघडून.

मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

 

‘किती मार्क मिळाले मुलाला ?’

‘बासट टक्के.’

‘अरे वा !’ त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.

हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूश दिसत होता.

 

‘साहेब, मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !’

‘अच्छा, म्हणून पेढे वगैरे !’

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,

‘साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.’

 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, ‘साहेब सॉरी हां, काय चुकीचं बोललो असेन तर.

माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा,

‘आनंद एकट्याने खाऊ

नको सगल्य्यांना वाट !’

हे नुसते पेढे नाय साहेब

हा माझा आनंद आहे !’

 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, ‘शिवराम, मुलाचं नाव काय ?’

‘विशाल.’ बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – ‘प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात राहा – तुझ्या बाबांसारखा !’

‘शिवराम हे घ्या.’

‘साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्टं बोल्लात, यात आलं सगलं.’

‘हे विशालसाठी आहे ! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.’

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

‘चहा वगैरे घेणार का ?’

‘नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल ? मला वाचता येत नाही. म्हनून…’

‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !’ मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद, पंच्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला / मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

 

आपण त्यांना नको हसूया. कारण आपण सगळेच असे झालोय- आनंद ‘लांबणीवर’ टाकणारे !

माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

 

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे. मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो, त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं.

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून… आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखीपैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची ‘पोजिशन’, आणखी टक्के…!

या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक – श्री एकनाथ वाघ

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

हिंदुस्तानवालों! अब तो मुझे पहचानो!

८१ वर्षांनंतरही हे शब्द अगदी समर्पक आहेत, असे म्हणावे लागेल. १९४३ ते २०२४ हा सुमारे ८१ वर्षांचा कालखंड. या सर्व वर्षांतला एकही दिवस असा नसेल की एक आवाज कुठे ऐकला गेला नसावा. मास्टर विनायक (अर्थात विनायक दामोदर कर्नाटकी. मागील काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे वडील) यांनी एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता ‘गजाभाऊ’. चित्रपट जरी मराठी भाषेत काढला जात असला तरी यातलं एक गाणं हिंदीत होतं…कवी होते पंडित नरेंद्र इंद्रा. आणि गाणं होतं या लेखाचं शीर्षक. दुर्दैवाने हा चित्रपट आणि गाणं कुठंही उपलब्ध नाही. या चित्रपटात लता दीनानाथ मंगेशकर ही चौदा पंधरा वर्षांची मुलगी निव्वळ आई,भावंडांचा उदरनिर्वाह होण्यास दोन पैसे मिळावेत म्हणून अभिनय करीत होती. त्याकाळी पार्श्वगायन फारसे प्रचलित झालेले नव्हते. कलाकार आपापली गाणी स्वत:च गात (खरे तर म्हणत!) असत. यासाठी अभिनयासोबत गाणंही येणं आवश्यक असे. आणि हा योग काही फारसा जुळून येत नसे. लतादीदींना आवडत नसतानाही अभिनय शिकावा लागला होता आणि गाणं आवडत असूनही तोपर्यंत तशी संधी मिळत नव्हती. त्यामुळेच लतादीदींनी हे गाणं अगदी पोटातून, अतिशय समरसून गायले असावे, यात शंका नाही.

लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा १९४३ पासून सुरू झालेला जीवनप्रवास सुमारे आठ दशके सुरू राहिला. दीदींचा हा प्रवास म्हणजे एक इतिहासच म्हणाव. दुर्दैवाचे सर्व अवतार जवळून पाहिलेल्या या शूर स्त्रीने आपल्या उपजत गानकलेने गायन क्षेत्रातील सम्राज्ञीपदाला गवसणी घातली हाही इतिहासच.

गायन,अभिनयासोबतच ज्योतिषाचा उत्तम अभ्यास असलेल्या मास्टर दीनानाथांनी आपल्या या लेकीच्या गळ्यात जसा गायनाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता तसा तिच्या ललाटावरील कर्माचा लेखही वाचला होता. त्यांनी दीदींना त्यावेळी असे सांगितल्याचं वाचनात येतं की, “लता, तु फार मोठी गायिका होशील. तुझे हे यश पहायला मी या जगात नसेन. आणि तुझे लग्न होणार नाही!” पहिल्या दोन भविष्यवाणींप्रमाणेच तिसरीही भविष्यवाणी अप्रिय असली तरी खरी ठरली याला दैव असं नाव आहे! कदाचित दैवाला दीदींना त्यांच्या त्यावेळी खूप संकटात असलेल्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी कानांना तृप्त करण्याची अपार शक्ती असलेल्या गायनकलेसाठी अधिक वेळ द्यायचा असावा! तसंच तर झालं किंबहुना तसंच केलं दीदींनी…हा इतिहास आहे!

आयुष्यात खूप नंतरच्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं…पुन्हा जन्म नाहीच मिळाला तर बरेच आहे…पण पुनर्जन्म मिळालाच तर तो लता मंगेशकर म्हणून नको! लता मंगेशकर बनना आसान नहीं!

अगदी कोवळ्या वयातच आपल्या आईची आणि चार भावंडाची आई होण्याची जबाबदारी स्वत:हून पत्करणं आणि ती अखेरपर्यंत निभावून नेणं हे जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळू शकेल! सामाजिक व्यवहारातला त्यांचा करारी बाणा त्यांनी भोगलेल्या परिस्थितीतून आला असावा असं समजण्यास पूर्ण वाव आहे. ‘बहोत लोगों ने मेरे पैसे खाये!” असं एका मुलाखतीत दीदींना हसत सांगितलं आहे. आणि या बुडव्यांची नावे न उघड करण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला!

गाण्याचं ध्वनिमुद्रण करायला कक्षात जाताना आपली पादत्राणे त्या बाहेरच काढीत असत हे सर्वांनी पाहिलं आहे. कला ही देवता आणि कलाकार भक्त हा विचार त्यामागे होताच शिवाय ज्यामुळे पोटाला दोन घास मिळतात त्या कलेप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत होती. सार्वजनिक जीवनात एका प्रसिद्ध स्त्रीने,त्यातून अविवाहीत स्त्रीने कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणजे दीदी. व्यवसायानिमित्त पुरूषांच्या गराड्यात राहणे अपरिहार्य असताना त्यातील प्रत्येकला दीदी म्हणावंसं वाटावं यासाठी सर्वोत्तम चारित्र्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.

सामान्य माणूस म्हणूनच जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याने असामान्यत्वाची पायरी गाठेपर्यंत अडचणी,समस्या,नैमित्तिक प्रलोभनं,मानवी स्वभावातील गुणदोष यांच्याशी संघर्ष करावा लागतोच. किंबहुना असामान्य होण्यापूर्वी माणूस सामान्यच असतो. या सर्वच अनुभवांतून तावून सुलाखून निघालेल्या दीदींनी स्वत:च्या वैय्यक्तिक आयुष्यात कुणालाही डोकावू दिले नाही. आणि यामुळे लोक काय आणि किती काय काय म्हणतील याची पर्वा केली नाही. जसा अंगभर पदर तसेच संपूर्ण आयुष्य नीटसपणे झाकून घेतलेले. एकतर गद्यात बोलणं अगदी नेमके आणि गाण्यासारखेच मधुर. शब्द अतिशय निगुतीने निवडलेले आणि उत्तरादाखल केलेल्या स्मितहास्यात माझे अबोलणेही विपरीत होत आहे अशी अवस्था अजिबातच नसे.

जगाच्या शब्दशस्त्राने क्लेश झाले नसतील असं नाही. पण जग होता वन्ही…संते आपण व्हावे पाणी हे त्यांनी माऊलींकडूनच शिकलेले असावे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नसावा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही…नाही मानियेले बहुमता हे तुकोबारायांचे शब्दही त्या जगत राहिल्या. जगाला सातत्याने ऐंशी वर्षे तोंड देत राहणे हे सामान्य जीवाचे कामच नव्हे, हेच खरे! दीदींच्या मौनात सर्व मिटून गेले आणि आता तर त्याही अंतर्धान पावल्या आहेत.

हिंदी-इंग्लिश वृत्तपत्रे,हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच ब-यावाईट बाबींकडे दीदींनी अतिशय प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले. मराठी वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य वाहिन्यांनी मात्र दीदींच्या बद्द्ल कधी वावगे लिहिले,बोलल्याचे आढळत नाही….याला दीदींचे असाधारण व्यक्तिमत्व कारणीभूत आहे! भगवदगीता ध्वनिमुद्रित करण्याआधी पहाटे लवकर शुचिर्भूत होऊन दोन तीन तास श्लोक बिनचूक म्हणण्याचा सराव करणा-या आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी जाणा-या दीदी, अत्यंत पीडादायक शारीरिक व्याधी असतानाही संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करण्यासाठी तासनतास उभे राहणा-या दीदी,परदेशात शेकडो कार्यक्रम करून भारताचे नाव जगभर पोहोचवणा-या दीदी, ऐ मेरे वतन के लोगों गाण्यातील भावना चिरंजीव करून ठेवणा-या दीदी, १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करणा-या दीदी…अशा शेकडो गोष्टी आहेत आणि सामान्यांना अज्ञात अशा अनेक गोष्टीही असतीलच.

स्वत: कुठला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न न करणा-या लतादीदींनी आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथांच्या स्मृती जतन करण्याचा मनोभावे आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाणं हे ही मोठेपणाचंच द्योतक. असो. लिहावं तेवढं कमीच आहे आणि आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी दीदींबद्दल लिहिले आहे.

गेल्या काहीवर्षांत प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट काढले गेले. आणि त्यात वावगे काहीच नाही. यामुळे या मोठ्या लोकांच्या आयुष्यात लोकांना डोकावता येते. परंतू, जेंव्हा जेंव्हा लतादीदींच्या आयुष्यावरील चित्रपटाचा विषय निघाला तेंव्हा तेंव्हा दीदींनी स्पष्ट नकार दिला. तरीही काही लोकांनी त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असणा-या कथा लिहून त्यावर चित्रपट काढला. साज (साझ) नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शबाना आझमी प्रमुख भूमिकेत होत्या. मेरी आवाजही पहचान है नावाची एक दूरदर्शन मालिकाही येऊन गेली. लतादीदींच्या आयुष्यावर (अनाधिकाराने) भाष्य करणारे युट्यूब विडीओज विशेषत: हिंदीत अनेक दिसतात. पण मंगेशकर कुटुंबियांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत या गोष्टींना अजिबात महत्त्व दिले नाही.

दीदींच्या हयातीत त्यांना त्यांच्या बायोपिक (चरित्रचित्रपट) विषयी अनेकांनी विचारणा केलेली होती. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकारच दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तर याबाबत खूपच जोरात प्रयत्न झाले असतील. कारण लता मंगेशकर हा विषयच अत्यंत वेगळा आहे. पण एरव्ही काहीही माहित नसताना दीदींबद्दल विविध गोष्टी सांगत आणि पसरवत बसलेल्या व्यावसायिक लोकांकडून लता या विषयाला कितपत न्याय मिळाला असता हा ही प्रश्नच आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही अशा चित्रपटास परवानगी देण्याचे स्वच्छ शब्दांत नाकारले आहे. दीदींच्या प्रतिमेला न्याय देऊ शकेल असं कुणी असावं असं त्यांना वाटत नाही. समाजानेही त्यांच्या या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. पण लतादीदींचे आयुष्यही लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्यापेक्षा पात्र अन्य कुणी व्यक्ती नाही. आठ दशके हृदयनाथ आणि दीदी सातत्याने एकत्र राहिलेत. हृदयनाथ स्वत: दीदींबद्द्ल लिहित आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा त्यांचे लेखन जास्त विश्वसनीय आहे यात दुमत नसावं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही साडे तीनशे पाने मजकूर लिहिला असून आणखी तितकीच पाने भरतील एवढ्या आठवणी,गोष्टी त्यांच्या स्मरणात आहेत. आणि हृदयनाथांची लेखनशैली सुद्धा अतिशय उच्चदर्जाची आहे. यापैकी आरंभीचे तीन लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित आणखीही होतील. बाळासाहेबांनी अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,या लेखांचे पुस्तक निघावे अशीच रसिकांची इच्छा आहे. कारण तेच हे काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील! कारण हिंदुस्थानवालों, अब तो मुझे पहचानो असे सुरूवातीलाच म्हणून गेलेल्या लता मंगेशकर नावाच्या भारतरत्न स्वरचमत्काराला अजून हिंदुस्तानाने नेमके ‘पहचानलेले’ आहे, असे म्हणता येत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या मनोवांच्छित कार्यास शुभेच्छा!

(मनातले सर्वच लिहिता येते असे नाही. अनेक बाबी निसटून जातात लिहिता लिहिता. पण तरीही एक प्रयत्न. संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आनंद” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

दोघी बहिणी तीन दिवसांच्या ट्रीपला निघाल्या.

 पहिला दिवस मजेत …आता उद्या सकाळी नऊला निघायचे आहे .टूर लीडरने सांगितले.

दोघी रूमवर आल्या फ्रेश झाल्या

” उद्याचा ड्रेस काढून ठेवते ” धाकटी म्हणाली.

“थांब एक गंमत दाखवते…. उद्या आपण हे घालायचं आहे…”

“काय ग..”

“हे घे…” .. धाकटीने घडी उलगडली. आणि बघतच राहिली…

ते फ्रॉक सारखं होतं…. पण त्याचा घेर मोठा होता.

“नविन वेगळच दिसतय ..काय म्हणतात ग “

“अग दुकानदारानी काहीतरी नाव सांगितलं  बाई..पण मी गेले विसरून आपण पूर्वी फ्रॉक घालायचो त्याच्यासारखंच आहे ना हे…”

“हो ग किती छान आहे ग…”

 

धाकटीने लगेच घालून बघितला .. ती सुखावलीच..

“ताई किती मस्त आहे ग… आईच्या फ्रॉकचीच आठवण आली उंची जरा जास्त आहे आणि घेरही मोठा आहे एवढाच फरक पण किती कम्फर्टेबल आहे..”

त्याचा गुलाबी रंग एम्ब्रॉयडरी लेस… धाकटी हरखुनच गेली.

“अग ताई याला एक खिसा  हवा होता.अजून मज्जा आली असती”

“आवळे चिंचा ठेवायला?”

…. दोघी मनमुराद हसल्या….

 

“अगं दुकानात हे बघितलं आणि आईची आठवण आली.

ती कापड आणून  साधे फ्रॉक शिवायची दोघींचे एकसारखे. फॅशन काही नाही..

शाळेत अकरावीत साडी कंपल्सरी मग आजीने फ्रॉक घालूच दिला नाही

तेव्हा तिची ती मतं….”

“तू गप्प बसायचीस पण मला राग यायचा. किती बावळट होतो अस आता वाटतं”

“जाऊ दे ..आपलं ठरलं आहे ना…. मागचं काढून उगीच गळे काढून रडायचं नाही..आनंदानी पुढे चालायचं …. म्हणून दुकानात हे दिसलं आवडलं की घेतलं…. .. “समजूतदार शहाणी ताई धाकटीला सांगत होती…

 

दोघी सकाळी ते फ्रॉकसारखं घालून तयार झाल्या….. मैत्रिणी बघायलाच लागल्या..

“ए किती मस्त आहे ग….. कुठून घेतलं.?….. काय म्हणतात..?”

 

सगळ्यांना  तो प्रकार आवडला.

“ए मला पण आवडेल हे घालायला “

दुकानदाराला दाखवायला  तीनी फोटोही काढला..

 

फ्रॉकचा विषय निघाला आणि एकेकीचं मन उलगडायला लागलं……. 

 

“नहाण आलं आणि माझा तर फ्रॉक बंदच झाला.”

“माझ्या आईकडे फॅशन मेकर होतं ती वेगवेगळे डिझाईनचे फ्रॉक शिवायची..”

“माझी मावशी मुंबईला रहायची तिथुन नविन फॅशनचे आणायची”

“एकदा फ्रॉक ची उंची कमी झाली होती ….तर बाबा आईला खूप रागावले होते..”

“माझा लाल लेस वाला फ्रॉक मला फार आवडायचा..”

“मला कायम मोठ्या बहिणीचा जुना मिळायचा….”

….. प्रत्येकीकडे फ्रॉकची एक तरी आठवण होतीच..

खरंतर फ्रॉक एक निमित्त होतं आईची आठवण सुखावत होती…

 लहानपणी तिच्याभोवतीच तर सगळं जग होत….हो की नाही…

तुम्हाला आली का तुमच्या फ्रॉकची आठवण…..

 

मैत्रिणींनो आता आपली छान गट्टी जमली आहे ना….

मग एक सांगते ते ऐका..

 

जे घालावं असं वाटतंय ते खुशाल घाला….

कोण काय म्हणेल ?

कोणाला काय वाटेल…

याचा विचार करू नका .

कोणी इतकं तुमच्याकडे निरखून बघत नसतं….

कोणी आणून देईल याची पण वाट बघू नका..

तुम्हीच जा आणि घेऊन या..

….. आनंदाची परिस्थिती आपली आपणच निर्माण करायची असते हे लक्षात ठेवा…

“काय म्हणतेस तूच धाकटी आहेस

अगं मग ताई साठी तूच घेऊन ये…..”

मजेत आनंदात राहा…

तुमचा नवीन ड्रेस घालून काढलेला फोटो मला जरूर पाठवा

वाट बघते….

 

सुखाची गुरुकिल्ली आपल्याच हातात असते…

ती कशी कुठे लावायची हे समजले की आयुष्यच बदलते..

….. ती  किल्ली अजून कुठे कुठे लावता येईल याचाही विचार करा….

हेच तर  तुम्हाला सांगायचं होतं…… मैत्रिणींनो  मजेत राहा…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print