मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पांघरूण ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : पांघरूण ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले. 

क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ , गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात. 

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील  काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो पण इथे खेळायला.. बघायला. . त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात.  आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू.’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही.’ त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता. 

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले. 

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, असंही तिथे सांगण्यात आलं. तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश.’ 

हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशाला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या आशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव. 

माझ्या कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं. ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत.  मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. आशा अनेक कल्पित प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमानातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो.’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो. 

डेव्हीड सर्जाला, ‘ तू तुझ्या घराचे फोटो पाठव,’ असं पत्रातून लिहित असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगाड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी. यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तूलना सुरू व्हायची. फोटोत  बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं, मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर– 

सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधीक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड, दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या सांसाराबाबतचं कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडलेका’शिवाय बोलणं नाही. आईदेखील सदा कारवादलेली. 

सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग. एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर.’

हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे.’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं. कधी भावा-भैणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई. 

त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत. 

त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली. 

मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली-  

‘मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला

कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला.’

ही प्रार्थना, मी डी. एड.कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला. 

त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि चादरी वाटप सुरू झालं. 

माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल, गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्. आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला नीळं, नीळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.

कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?   

सर्जा भयंकार उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते. हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल. अशी चिकटेल, लई मजा येईल. तो सर्जाच्या अंगावरचे  ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘माझ्या जर्मनीतल्या बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही.’

‘तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो. 

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधीकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते. 

‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्‍या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुशी पत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला. 

‘पांघरूण’ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भावा-भावनांचं, रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे. 

मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला  नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.  

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्येटारू – भाग – २ ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ ज्येटारू – भाग – २ ☆ सुश्री वैशाली पंडित 

ज्ये टा रू  नंबर २

आंतरराष्ट्रीय महिलादिन.शासकीयच.

मुख्यमंत्री आणि त्यांचा लवाजमा कार्यक्रमस्थळावर पोचतो. रितीप्रमाणे राष्ट्रगीताला आणि राज्यगीताला मुख्यमंत्र्यांसह स्तब्ध ताठ उभे राहतात.मुख्यमंत्री तर दोन्ही गीतं स्वतःही म्हणतांना दिसतात.

अपवाद फोटोग्राफर्सचा.

इकडे राष्ट्रगीत सुरू आहे आणि तिकडे सगळे फोटोग्राफर उभे आडवे मेरे धरत फोटो काढतायत.अरे राष्ट्रगीताला उभे राहिले याचे फोटो कशाला ? आणि तुम्ही भारतीय नागरिक नाही आहात का ? राष्ट्र राज्यगीताला उभं राहणं,मान देणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का ?  नंतर काढा की फोटो जीव जाईस्तो.

त्या फोटोग्राफर्सना कोणीही कसं सांगितलं नसेल?

असो.

शेवटी हे ज्येटारूच.

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !! – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “नमाज .. प्रार्थना ..  प्रेयर !!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ही घटना असेल साधारण पाच सहा वर्षांपूर्वीची ! 

त्या दिवशी मंगळवार होता मला चांगलं आठवतंय… कारण या दिवशी मी सकाळच्या वेळी सेंट अँथनी चर्च कॅम्प येथे असतो. 

 तिथे असताना, रस्त्यावर भिक्षेकऱ्यांमध्ये तपासताना, एका सुटाबुटातल्या माणसाने कार थांबवून मला “ऑर्डर दिली”, आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक माणूस निपचित पडलाय, बहुतेक मेलेला असेल, भिकारी वाटतो तो मला, बघून घ्या एकदा…! 

तो कार मधून सुसाट निघून गेला, बिचाऱ्याच्या महत्त्वाच्या मीटिंग असतील. 

घराबाहेर एक माणूस “मेला” असेल, पण त्याने काय फरक पडतो ?  मीटिंग महत्त्वाची…! 

असो,

ज्याला प्रतिष्ठा नसते, अशा व्यक्तीसाठी तो “गेल्यावर”… मेला हाच शब्द वापरतात… 

बाकी कालकथीत, कालवश, पैगंबरवासी, दिगंबरवासी, कैलासवासी, देवाघरी… असे शब्द फक्त प्रतिष्ठा असणाऱ्यांनाच मिळतात. 

माझ्याही भीक मागणाऱ्या लोकांना, गेल्यावर तरी प्रतिष्ठा मिळेल का ? यासाठी जगताना त्यांनी काय करायला हवं ? हा किडा तेव्हापासून डोक्यात वळवळतो आहेच…

असो, मी रस्त्यावर निपचित पडलेल्या या तरुणाला पाहिले, तो जिवंत होता, त्यानंतर लगेच त्याला ऍडमिट केले, जवळपास पाच लाख रुपये खर्च आला, तो आपणच सर्वांनी मिळून भागवला. (मी एकट्याने नाही…)

पूर्ण बरा झाल्यानंतर समजले, याला सर्व काही काम येतं, स्वयंपाक, वेल्डिंग, फॅब्रिकेटिंग, पेंटिंग, वायरिंग, अजूनही बरंच काही…! 

डिस्चार्जच्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो, त्यावेळी डोळ्यात कृतज्ञता होती… पाया पडून, हाताचे चुंबन घेऊन, मध्येच आकाशाकडे बघत अल्लाहकडे तो माझ्यासाठी काहीतरी मागत होता…

कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे त्याचं त्याला समजत नव्हतं…! 

‘ भाई घर मे कौन है?’ मी सहज विचारलं.

 ‘कोई नही सर अकेला हूँ…’

‘कोई तो होगा ना भाई…’ 

‘न्नहि स्सर… कोई न्नही’ प्रत्येक शब्दावर दाब देत तो म्हणाला. राम कहो या रहीम कहो, उन्ही की भरोसे जिंदा हूँ..’

‘ठीक है, इतना कुछ क्वालिटी तुम्हारे पास है, तो कुछ काम करो, मांगने के लिये रस्ते पे मत आना’

असं म्हणून मी तिथून निघालो. तो परत मागे आला, नमाज पढण्यासाठी जसे हात जुळतात, तसेच जुळवत तो म्हणाला, ‘ मै आपके एहसान कैसे चुकाऊ सर…?’ 

वैयक्तिक माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला, मला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मी पुढे भिक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे…. 

मी सुद्धा त्याकाळी त्यांना विचारले होते, ‘तुमच्या उपकारातून मी कसा उतराई होऊ…?’

ते म्हणाले होते, ‘मला काहीही परत करू नकोस बाळा,  जे काही तुला द्यायचे आहे, ते समोरच्या अडलेल्याला दे… आणि त्याला सुद्धा हेच सांग की तुझी पात्रता निर्माण झाल्यानंतर, तू पुढे ही मदत  पुढच्या नडलेल्याला दे…  साखळी चालू राहू देत… साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’ 

…… अर्थातच मी त्याला सुद्धा सांगितले, ‘ बाळा कोणीतरी माझ्यावर उपकार केले होते, मी त्याची परतफेड म्हणून तुला मदत केली…  आता ही मदत मला परत न करता, तू पुढे एखाद्या अडल्या नडल्या व्यक्तीसाठी कर, म्हणजे एक साखळी तयार होईल…  साखळी बंद नाही झाली पाहिजे….!’ 

.. त्याच्या चेहऱ्यावर भला मोठा शून्य होता… त्याला काय आणि किती समजले मला माहित नाही…! 

मी तिथून निघून गेलो, नमाजासाठी जोडलेले हात घेऊन तो तसाच शून्यात बघत होता…! 

पुढे जवळपास दोन वर्षे त्याचा माझा संपर्क झाला नाही, एकदा अचानक एका गॅरेजमध्ये काम करताना मला तो दिसला, त्याला काम करताना पाहून मला आनंद झाला. मी गाडीवरून उतरून त्याला मिठी मारली, पुन्हा तो अहसान वगैरेच्या गोष्टी करू लागला आणि पुन्हा मी त्याला सांगितले, कोणालातरी पुढे मदत कर रे… साखळी चालू राहिली पायजे भावा… 

…. पुन्हा तो शून्यात…. त्याला काय आणि किती कळलं साखळीविषयी मलाच समजलं नाही…. 

नमाजासाठी जोडलेला हात मात्र पुन्हा तसाच…! 

यानंतर पुन्हा त्या गॅरेजवर गेलो, परंतु तो दिसला नाही…! परत भीक मागायला सुरुवात केली असेल, असं समजून मी निराश झालो. 

पुढे कधीतरी कॅम्प भागात मला तो ओझरता दिसला, यावेळी त्याच्यासोबत एक आजी होती… 

मी त्याला गाठलं, ‘भाई कहा थे तुम?’

‘सर, दुसरा अच्छा जॉब मिल गया, वो छोड दिया…’ तो हसत म्हणाला 

‘बढीया यार….ये साथ में कौन है?’ मी आजीकडे पाहत विचारले. 

‘ये मेरी “आई” है सर…’

“आई”‘…? मी बुचकळ्यात पडलो 

…… या जगात माझे कोणीही नाही, हे खूप पूर्वी त्याने मला ठासून सांगितले होते…  तो माझ्याशी त्यावेळी खोटं बोलला होता… मला वाईट वाटलं.

‘भाई तुने मुझे बोला था, तेरा इस दुनिया मे कोई नही है, फिर ये अम्मी बीच मे कहा से आ गयी?’  मी जरा रागाने विचारलं. ‘झूठ बोला उस वक्त तुमने’ त्याने हातात घेतलेला माझा हात मी झटकून बोललो…. माझी नाराजी त्याला स्पष्ट दिसली. 

तो हसला, आणि प्रथमच मराठीत बोलला, ‘ सर, तसं काय नाय ओ … एका दिवशी ही आई मला रस्त्यावर मेल्यागत पडलेली दिसली… मला मी आठवलो… मी पण असाच रस्त्यावर पडलो होतो…. परत सर तुम्ही सुद्धा आठवला…. मला तुम्ही ऍडमिट केलं होतं… मग मी पण तिलाससून ला ऍडमिट केलं. ती बरी झाली…. बरी झाल्यावर मी म्हणलं, मावशी आता कुटं सोडू तुला ?

मावशी म्हणाली,  ‘मी आता कुटं जावू ? मला ना मूल… ना बाळ… जिथून आनलं होतंस, तिथंच सोड मला रस्त्यावर बाळा…’ … मला पण “अम्मी” नाही… पण, असती तर मी तिला रस्त्यावर सोडलं असतं का ???’

मंग मी तिला “आई” म्हणून डायरेक दत्तकच घेतलं ना सर… सरळ माझ्या झोपडीत घेऊन आलो, हां, आपल्याकडे हयगय नाय… उसकू बोला, अब तेरेको मय बच्चा हय, खाने का…. मस्त रयनेका… टेन्शन मेरे उप्पर छोडनेका… आता दिवसभर मी गॅरेजवर काम करतो, भाजी विकायचा मी तिला व्यवसाय टाकून दिला आहे, ती दिवसभर भाजी विकते, संध्याकाळी आम्ही मायलेकरं एकत्र भेटतो, सुखदुःख वाटून घेतो आणि जेवण करून मस्त झोपून जातो, टेन्शन कायकु लेनेका…??? “

त्याच्या बोलण्यात, वागण्यात कोणताही बडेजाव नव्हता… आपण काहीतरी विशेष केलं आहे हा भाव नव्हता….!

“आई” म्हणून डायरेक् दत्तकच घेतलं ना सर….!  त्याच्या या वाक्यांनी मी किती वेळा रडलो असेल, याचं मोजमापच नाही… ‘ येड्या तु किती मोठा झालास आता तुला कसं सांगू…? ‘ 

लोक स्वतःच्या सख्ख्या आई बापाला रस्त्यावर आणून बिनधास्त सोडून निघून जातात, अशा दुनियेमध्ये कोणीतरी एक जण आई दत्तक घेतो…! 

…. कित्येक जण आई बापाला आंबा समजून, गोड रस आणि गर खरवडून काढून खातात आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर त्यांना कोय म्हणून उकिरड्यावर  फेकून देतात…!  खरंतर ही कोय नसते…. ते बीज असतं…!!!  हे बीज पुन्हा जमिनीत रुजवायचं  असतं… प्रेमाचं खत घालून, मायेनं प्रेमाची धार सोडायची असते… दारात मग उमलतात आई बापाचे अंकुर, पुढे विशाल वृक्ष होऊन, हेच आई बाप आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात… सावली होऊन…! 

…… जे इतरांना समजलं नाही ते याला कसं समजलं असेल…???

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ SURPRISE : Young Generation ची नवीन पद्धत… ☆ सुश्री संध्या बेडेकर☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

SURPRISE: Young Generation ची नवीन पद्धत… ☆ सुश्री संध्या बेडेकर 

आज सकाळी सकाळी फोन वाजला. आजकाल अवेळी फोन वाजला की आधी जीव घाबरतो. नको नको ते विचार मनात येतात. एकतर मुलं आपल्या जवळ नाहीत. आता सासर माहेरचे सर्व सत्तरी पार झालेले. काही ना काही प्रत्येकाचे सुरूच असते. खरच ती म्हण आहे ना, ’ जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ अगदी बरोबर आहे. प्रत्येकाकडे काही ना काही इश्युज् आहेतच म्हणजे असतातच. कधी तब्येतीचा तर कधी पैशाचा. किंवा इतर काही. काहीच नसेल तर ज्येष्ठांची कल्पनाशक्ति अफाट असते, काही तरी शोधून काढतातच. आयुष्य म्हंटल की सुख आणि दुःख या दोघांशी जवळच नातं असतं. त्यांचा लपाछपीचा डाव चालूच असतो. . . त्यामुळे फोन घेईपर्यंत जीव वर खाली होतो. बरं सकाळची वेळ म्हणजे बऱ्यापैकी शांतता असते, त्यात ती फोनची रिंग कर्कश्य वाटते. भरभर धावणे काय ? आता तर भरभर चालणेही जमतं नाही. बरे असो. मी फोन घेतला.

ताईची सून अनिताचा फोन होता.

मी म्हटलं ••• “ काय ग !! सर्व ठीक ना. सकाळी सकाळी फोन कसा काय केला. ? “

अनिता म्हणाली, “ मावशी घाबरू नका. सर्व उत्तम आहे. “

अनिताने तिचा प्लान सांगितला. मला या नवीन मुलींचे कौतुकच वाटते. SURPRISE ही नवीन जनरेशन ची एक ओळख / सवयच झाली आहे. काही तरी छान प्लान कराचयचे आणि surprise द्यायचे.

ताईकडे तीन जनरेशन्स एकत्र राहतात. ताई, भाऊजी, ताईंच्या सासूबाई सौ. निर्मलाताई वय वर्षे ७५. आणि आजोबा. . आणि ही तिसरी यंग जनरेशन अजय आणि अनिता.

ताईचा आणि तिच्या सासूबाईंचा दोघींचा वाढदिवस एकाच महिन्यात असतो. या महिन्यात आजींची पंचाहत्तरी आणि ताईने पंचावन्न पूर्ण केले. कार्यालयात आजींची पंचाहत्तरी अगदी जोरदार थाटामाटात साजरी झाली. नातेवाईकांच्या उपस्थितीत समारंभ आठवणीत रहाण्यासारखा झाला. आजीबाई अगदी खुश होत्या. आजीचे पाय दुखतात म्हणून अनिताने त्यांना एक छान walking stick आणून दिली. तिच्या मदतीने आता त्या आत्मविश्वासाने चालतात. पडायची भिती वाटत नाही. काल अनिताला आजी आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगताना रंगून गेल्या होत्या. त्यांचे लग्नाआधीचे घर, शाळा, तेथे असलेले गणपतीचे मंदिर अनेक गोष्टी. त्यांची जीवाभावाची मैत्रीण उज्ज्वला आता आपल्या मुलाकडे रहायला गेली. त्यामुळे त्यांची भेट होत नाही. त्यांच्या आठवणींबद्दल भरभरून बोलत होत्या. ‘ आता या पायांमुळे मला बाहेर जाता येत नाही ‘. असंही त्यांच्या बोलण्यात आलं. मग अनिताने मनातल्या मनात एक प्लान ठरविला.

आज सकाळीच चहा घेताना अनिता म्हणाली, “ आज रविवार, तेंव्हा मला सुट्टी आहे. आजोबा, बाबा, आज आम्ही तिघी – मी आई आणि आजी – बाहेर जाणार आहोत. आज आमचा *Fun day out * आहे.

बाकी तुमच्या सर्वांचा स्वयंपाक घरात असेलच. आम्ही बाहेर फिरणार आणि जेवूनच घरी परतणार. चालेल ना ? ‘ 

अनिताने मावशींना सांगून आमरस, बटाटा भाजी, पुलाव, कोशिंबीर, चटणी, कुरड्या पापड असा सर्व स्वयंपाक करून घेतला. बाबा, आजोबा किती वाजता जेवणार?? हे विचारून मावशींना वेळेवर गरम पूऱ्या तळून द्यायची सूचना पण दिली.

अनिताला देशमुखांकडे येऊन जेमतेम वर्षच झाले आहे. आज अनिताने घरचा ताबा आपल्याच हातात घेतला की काय ? असंच सर्वांना वाटत होतं. सर्व आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. सर्वांच्या नजरेत कौतुक होते. आज अनिताचे वेगळेच रूप सर्वांसमोर होते.

Anyways everyone is happy.

अजय म्हणाला, “ अगं!! केवढा पुलाव केला आहेस ? दोन दिवसांचा स्वयंपाक केला की काय ? “

अनिता म्हणाली, “ अरे संपेल की. ”

अनिता, आई आणि आजी दहा वाजताच घराबाहेर पडल्या. आज अनिताचे ऐकायचे, असे सर्वांनी ठरवूनच टाकले होते.

अनिताच्या म्हणण्यानुसार आजींनी काठापदराची निळ्या रंगाची नवीन साडी नेसली. आईंनी पण सूचनेनुसार निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला. अनिताचा नेहमी प्रमाणेच जिन्स टॉप, अर्थातच निळा, असा पेहराव होता. अजयने लगेच तिघींचा फोटो काढला. सौंदर्याचे देशमुख घराण्यात वरदानच आहे.

अजयच्या निळ्या रंगाच्या नवीन कारने तिघी बाहेर निघाल्या.

आजोबा गमतीने म्हणाले, ” अरे व्वा अजय!! गम्मतच आहे रे. चला मी पण आज निळ्या रंगाचा कुर्ता घालतो.

अनिताने आजींना आपल्याबरोबर समोर बसविले. म्हणाली, ” आजी आजका दिन आपके लिये. आज का दिन आपके नाम. हुकम करो आजी, आपका हुकुम सर आंखों पर. कुठे कुठे जायचंय?? चला तुमचे जुने घर बघुया. ”

अनिताने कार जुन्या घराच्या दिशेने वळवली.

आजी म्हणाल्या, ” अग आता तिथले सर्व बदलले असेल. ”

तरी जुने घर, आजींची शाळा, गणपतीचे मंदिर. . आजी पूर्ण वेळ जून्या आठवणी सांगण्यात रंगल्या होत्या. अशा अनेक जागी फिरल्यानंतर तिघी वैशालीमध्ये कॉफी प्यायला आल्या. तेथें आजी आणि आजोबा लग्न झाल्यावर येत असत असं आजींनीच बोलताना सांगितले होते.

आई आणि आजी दोघी खूप खुश होत्या. आजचा दिवस वेगळाच उजाडला होता. आता एक वाजायला आला होता. तेथे कॉफी घेतल्यावर अनिताने कार अन्नपूर्णा हॉटेलसमोर उभी केली. आता अनिताच्या सरप्राइज प्लानचा दुसरा भाग होणार होता.

. . थोड्या वेळातच मावशी आईंच्या दोन सख्यांना आणि उज्वलाआजींना घेऊन तेथे पोहचल्या. हा आनंदी धक्का दोघी पचवतच होत्या तर, अनिताची आई, बहिण, वहिनी तेथे दोन‌ eggless cake घेऊन पोहचल्या. सर्व निळ्या रंगातच होत्या हे सांगायला नकोच…निळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांना जणू काही उधाणच आलं होतं. आजींचा आणि आईंचा दोघींचा आवडता रंग म्हणून आज निळाच निळा चोहीकडे.

आजींना आनंदाश्रू आवरत नव्हते. असा वाढदिवस त्यांच्या कल्पनेच्या परे होता. तोही नातसुनेने प्लान केलेला. . म्हणजे दुधात साखरच काय, अगदी मलाई, साय सर्वच भरभरून.

अनिताच्या सासूबाई आणि आई कौतुकाने समाधानाने अनिताकडे बघत होत्या. नजरेनेच धन्यवाद म्हणत होत्या. देवाचे आभार मानत होत्या.

गम्मत म्हणजे त्याच वेळेस तेथे अजयने बेल वाजली म्हणून दार उघडले तर समोर अनिताचे बाबा, भाऊ आणि काका हजर होते. आज सर्वांना सरप्राइजच सरप्राइज होतं. इथे पण आणि तिथे पण. सर्वांनी अनपेक्षित गेटटूगेदर मस्त enjoy केलं. इथे पण आणि तिथे पण.

अन्नपूर्णा मध्ये मस्त गप्पा टप्पा झाल्या. आई आजी दोघींनी केक कापले. शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोन मुलींनी पण आजींना आईंना * Happy Birthday Aaji, काकू* असं म्हणत wish केलं. केक खाल्ला. जेवण झाल. फोटो, selfie झाली. आजी आणि उज्वलाआजीचे फोटो, आईंचे त्यांच्या सख्यांबरोबर फोटो, असे अनेक combination मध्ये फोटो काढले व लगेच सर्वांना forward केले.

सर्व देशमुखांच्या घरी आले. सर्वांनी केक खाल्ला. कॉफी झाली. गप्पा झाल्या. आजी भरभरून आजच्या outing चे वर्णन करत होत्या. मधून मधून डोळे पुसत होत्या. अनिता उज्वला आजींना घरी पोहचवून आली.

– – आयुष्यभर लक्षात राहील असा हा दिवस उगवला आणि मावळला.

मी घरी पोचल्यावर आजच्या दिवसभराचे आकलन करत होते. अनिताचे तर खूप कौतुक आहेच.

खरंतर हॉटेलमध्ये जाणे ही एक सर्वसाधारण घटना, पण जेंव्हा त्यात आपुलकीचा ओलावा असतो, तेव्हा तोच प्रसंग अविस्मरणीय ठरतो.

. . . . आज अनेक अदृष्य सकारात्मक घटना घडल्या. देशमुख परिवारात अनिताने आपले विशेष स्थान मिळविले. घरचे सर्व आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी निश्चिंत झाले. सर्वांचे आपापसातील संबंध मजबूत झाले. अनिताने आपल्या लहान बहिणीसमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. माहेर सासर दोघांचा मान ठेवला. असा व्यवहार, संवाद आपुलकी म्हणजे सुखाची गुंतवणूक असते.

– – – मातीतील ओलावा जसा झाडांची मुळे पकडून ठेवतो, तसंच शब्दातील गोडवा, व्यवहारातील आपलेपणा, माणसातील नातं जपून ठेवतो. अशाने नातं बहरत फुलत. नातं घट्ट असलं तर इतर न आवडणाऱ्या लहान सहान गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं … खरं तर सुखी संसाराचा मार्ग अगदी सरळ सोपा असतो. फक्त दुसऱ्यांच्या भावना समजायला थोडी समजदारी असावी लागते.

– — – A family doesn’t need to be perfect. It just needs to be United.

आज अनिताच्या गोड वागणुकीने तिने सर्वांची मने जिंकून घेतली. आजी अनिताचा पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, •••

आजचे SURPRISE एकदम मस्त. Thank you, v much.

© सुश्री संध्या बेडेकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संत गाडगेबाबा” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “संत गाडगेबाबा” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

(आषाढवारी निमित्त प्रकट चिंतन) 

वैष्णव परंपरा वैदिक म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी धर्माला जवळची तर शैव परंपरा उघडपणे भेदभावाला प्राधान्य देणाऱ्या वैदिकांना विरोध करणारी होती. या दोन्ही संप्रदायांमधील संघर्ष संपवून तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधून सामाजिक समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू यांच्या मूर्तिविधानामध्ये कुठेही न आढळणारी लक्षणे लेऊन विठ्ठल मूर्ती साकारली गेली. अशा लोकविलक्षण मूर्तीला पूजणारा वारकरी संप्रदाय अठरापगड जातींना आपल्या कवेत घेणारा आहे.  त्यामुळेच दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने पंढरीची वारी करतात.  अशाच वारकरी वर्गामधील कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत होते.

कर्मयोगी संत गाडगेबाबा 

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात असलेल्या शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी जन्मलेल्या गाडगेबाबांचे बालपणीचे नाव डेबू असे होते. बाळसेदार व गोऱ्या डेबूला हे नाव मिळण्यामागे त्यांच्या पोटाचा गरगरीत आकार होता. त्यांची आई सखुबाई आणि वडील झिंगराजी जानोरकर .  झिंगराजी व्यसनी व कर्जबाजारी होते व त्यात त्यांना पुढे कुष्ठरोग जडला. त्यामुळे गावातील लोक त्यांना टाळू लागले,म्हणून त्यांनी गाव सोडले.   डेबू आठ वर्षाचा असतानाच झिंगराजी मरण पावले. अशा स्थितीत सखुबाईने आपले माहेर गाठले. डेबूचे यापुढील आयुष्य मामांच्या छायाछत्राखाली आजच्या भातकुली तालुक्यातील दापुरा येथे गेले. तेथून जवळ असलेल्या ऋणमोचन या गावी त्याने शिवमंदिरात गोपाळकाला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला.     जातीपातीचा भेद नसणाऱ्या या सहभोजनात गावातील इतर मुलांसह महार-मांगांच्या मुलांनीही भाग घेतला. त्यामुळे गावातील सनातनी लोकांच्या मनात संताप निर्माण झाला.  आपला धर्म डेबूने बुडविला असे ते म्हणू लागले, परंतु त्याची डेबूने पर्वा केली नाही.

वयाच्या बारा-तेरा वर्षाच्या काळातच डेबूला मामाच्या शेतात कष्टाची कामे करावी लागलीत. त्याच्या कर्तबगारीचा दिंडीम दापुराच्या पंचक्रोशीत पसरला होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा विवाह कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची कन्या कुंताबाईशी झाला. एक कुशल शेतकरी म्हणून नावारूपाला आलेल्या डेबूला एक वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. कर्जबाजारी झालेल्या मामाची शेती चंद्रभान सावकाराने आपल्या घशात घातली होती. चौसष्ट एकर जमीन गहाण ठेवून सावकाराने तिच्यावर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे डेबूच्या मामाने या धक्क्यानेच आपला प्राण सोडला. डेबूला त्यामुळे संताप येऊन सावकाराशी दोन हात करावे लागले. शेवटी सावकाराने त्यातील पंधरा एकर जमीन त्याला परत केली. या जमिनीवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होऊ लागली. परंतु डेबू केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. बालपणीच त्याला आपल्या अवती-भवतीच्या लोकांविषयी आस्था होती. समाजातील आळस, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा,जातिभेद, अंधश्रद्धा या समस्यांशी दोन हात करावेत असे त्याला नेहमीच वाटत असे. अध्यात्माविषयी ओढ असलेल्या डेबूने गुरूमंत्र घ्यायचे ठरविले. त्यांच्या गावाजवळच दौलात्गिरी गोसावी नावाचा बुवा प्रसिद्धीस आला होता. त्याचे दर्शन घ्यायला गेल्यावर डेबूला कळले की,दारू प्यायला दिल्याशिवाय तो गुरुमंत्र देत नाही. बुवाची अशी कीर्ती ऐकल्यावर डेबू आल्या पावली परत गेला. 

पंढरपुरात डेबूजी

आपल्या मनाच्या शान्तीकरिता त्याने तीर्थयात्रा करायचे ठरविले व तो पंढरपूरला आला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी सारे पंढरपूर फुलून गेले होते. वारकऱ्यांचा उत्साह एकीकडे शिगेला पोचला असताना काही भुरटे चोर मात्र त्यांचे खिसे रिकामे करण्याच्या उद्योगात मग्न होते. व्यापारी व पुजारी भाविकांची लूट करताना त्याने पाहिले.  धनिकांसाठी विठूमाउलीची सहज भेट तर भाविक मात्र रांगेत उभे असलेले पाहून त्याला या भेदभावाची अतिशय चीड आली. विठुरायाच्या चरणावर डोके ठेवणाऱ्या भक्तांना गचांडी देणारे बडवे पाहून तर त्याला उद्वेग आला. विठोबाच्या दर्शनापेक्षा तेथे येणाऱ्या गोर-गरीब भाविकांची सेवा करण्याचे त्याने ठरविले. नंतर त्याने कधीही विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. परंतु भाविकांच्या सेवेसाठी तेथे धर्मशाळा बांधली.

डेबूजीचा गाडगेबाबा झाला

भातकुली जवळील ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. १९०५ च्या यात्रेला डेबूजी आपल्या कुटुंबासह आला होता. तेथे भाविकांची होणारी गैरसोय पाहून त्याने त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आपले बिऱ्हाड सोडून त्याने अंगावर फटके कपडे घातले व एका हातात गाडगे तर दुसऱ्या हाती काठी घेऊन तो निघाला. लोकांच्या सेवेत मग्न झालेला डेबूजी आता गाडगेबाबा या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांचाही सहभाग वाढू लागला. गावोगावी फिरून गाडगेबाबांनी कीर्तने सुरू केलीत.  अंगावर फाटक्या कपड्यांची ठिगळे लावलेले कपडे आणि चिंध्या पाहून कुणी त्यांना चिंधेबाबा,गोधडे महाराज या नावांनीही  संबोधू लागले. गावात गेल्यावर प्रथम ते सारा गाव आपल्या खराट्याने झाडून काढीत आणि नंतर त्याच गावात कीर्तन करीत असत. त्यांचे कीर्तनही प्रचलित कीर्तनकारांपेक्षा वेगळे होते, तसाच त्यांचा पेहेरावही वेगळाच होता. फाटक्या चिंध्याचे वस्त्र,कानात फुटलेल्या बांगड्यांची कर्णभूषणे तर डोईवर फुटलेल्या गाडग्याचे शिरोभूषण. तर पायातील मोजेही वेगवेगळ्याप्रकारचे असत. प्रस्थापित कीर्तनकारांसारखी वाद्यांची साथ-संगतही त्यांच्याजवळ नव्हती. गावातीलच कुणी त्यांना वेळेवर साथ करीत असे.

महाराष्ट्रात वारकरी,पुणेरी व रामदासी अशा कीर्तनाच्या तीन परंपरा आहेत,त्यात कुठेही गाडगेबाबांचे कीर्तन बसत नव्हते. कारण की,ते या प्रकारच्या कोणत्याही परंपरेतून आलेले नव्हते,तर विपरित परिस्थितीतून त्यांनी आपली वेगळी कीर्तनशैली शोधली होती. त्याचप्रमाणे त्यांची निवेदन पद्धतीही वेगळीच होती. परंतु,या पद्धतीला एक प्राचीन परंपरा होती. जगातील सर्वच प्राचीन प्रबोधनकार आपल्या श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची उत्तरे मिळवीत असत. असे प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांचे कीर्तन रंगत असे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व आले आहे. गाडगेबाबांनी तिचा स्वीकार कितीतरी आधीच केला होता. म्हणून त्यांना लोकशिक्षक म्हटले जाते. 

वारकरी संप्रदायाचा प्रभाव, पण…

आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा निरर्थक कर्मकांडे आणि अनिष्ट प्रथा-परंपरांवर कठोर प्रहार करीत असत. त्यासाठी ते नेहमी संत तुकोबाराय व संत कबीर यांच्या वचनांचा आधार घेत असत. ईश्वर केवळ मंदिरात नाही,तर सर्वत्र आहे,त्याची भक्ती मंदिरात नाही तर दीन-दुबळ्या लोकांची सेवा करून करा ; असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करीत असत. प्रचलित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांच्या मांडणीपेक्षा त्यांची मांडणीही वेगळी होती. वारकरी संप्रदायातील समतेचे तत्व खऱ्या अर्थाने आत्मसात करून त्याला विवेकवादी विचाराची जोड देवून त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केलीत. त्यांचे मुंबई येथील बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झाले व तेवढेच ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध आहे. त्यातील त्यांच्या मांडणीवरून त्यांच्या विचारांचा परिचय आपणास होतो.

त्यांच्या कीर्तनातून बुद्धाची करुणा,तुकारामांचा परखडपणा आणि कबीराचा बिनतोड युक्तिवाद यांचे दर्शन आपणास होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर विभागांपेक्षा विदर्भातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप वेगळे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रारंभही त्यामुळेच विदर्भात झाला. भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या-नागड्या लोकांना वस्त्र,निरक्षरांना शिक्षण,बेघरांना घर,रोग्यांना औषध,बेरोजगारांना रोजगार,मुक्या प्राण्यांना अभय,गरीब व दुर्बलांना लग्नासाठी मदत आणि दुःखी-कष्टी लोकांना आधार द्यावा असे गाडगेबाबा नेहमी सांगत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. या तिघांच्याही कार्यात त्यांनी मोलाचे योगदान केलेले आहे. आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून त्यांनी डॉ.आंबेडकरांना नेमले होते. १४ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचे शेवटले कीर्तन पंढरपूर येथे झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांचे सारे अवसान गळाले. शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबा आपल्यातून गेलेत. त्यांच्या विचारांचा वसा घेतलेले अनेक विचारवंत आणि अनुयायी आजही महाराष्ट्रात आझेत. त्यापैकी एक आहेत,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.   विदर्भातील हे दुसरे संत होत. त्यांनी गाडगेबाबांचा अंत्यसंस्कार केला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जी पी…” – लेखक –  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जी पी…” – लेखक –  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आमच्या लहानपणी म्हणजे जेव्हा जनरल प्रॅक्टिशनर किंवा जीपी ही जमात अस्तित्वात होती तेव्हा त्यांना फॅमिली डॉक्टर म्हणत असत. 100 ते 200 फुटांच्या जागेचे 2 किंवा 3 भाग केलेले असत. एक दर्शनी भाग जिथे डॉक्टर स्वतः सर्व रोगांशी लढायला सज्ज असलेल्या योध्यासारखे गुबगुबित रिव्हॉल्विंग चेयर मध्ये डोके टेकायच्या ठिकाणी टॉवेल ठेऊन स्थानापन्न असत. खुर्चीच्या पुढ्यात त्यांचेे प्रचंड आकाराचे लाकडी टेबल. टेबलावरची काच आणि टेबल ह्यांच्या मधे अनेक मेडिकल रिप्रेझेंटिटिव्हनी सरकवलेली व्हिजिटिंग कार्ड्स. डॉक्टरांच्या डोक्यावर मधोमध मोठ्ठा गोल असलेला एक पंखा. गळ्यात स्टेथोस्कोप उपरण्यासारखा लटकवलेला. समोर पेशन्ट्सचे रब्बर बँडनी बांधलेले, काचेच्या पेपरवेटने सांभाळलेले केस पेपर्स, हाताशी आपले नाव, डिग्री, नोंदणी क्रमांक लिहिलेले लेटर हेड आणि फक्त त्यांच्या कम्पाउंडरला किंवा मेडिकल दुकानातील लोकांना कळेल अश्या अगम्य भाषेत काहीतरी लिहायला एक पेन. दवाखान्यात रुग्णांना बसायला समोरासमोर बनवलेले लाकडी बाक. ते संपले की दवाखान्याबाहेर ओसंडून जाणारी रुग्णांची गर्दी!

दुसरा भाग रुग्णाला चेक करायचा. दोन फूट बाय सहा फुटाचे एक टेबल ज्यावर रेगझिन घातलेले असे. त्यावर बसायचे म्हणजे खाली ठेवलेल्या स्टुलावर पाय ठेउनच “चढावे” लागे. बहुतेक डॉक्टरना प्रत्येक वेळेला वाकायला लागू नये म्हणून रुग्णांना एकदाच वरती चढून बसवायची सोय असावी. बाहेरच्या खोलीत रुग्णाची एकंदर कथा ऐकून आणि स्थिति पाहून डॉक्टर त्याला ह्या खोलीत बोलावत. रुग्ण शक्यतो त्या टेबलावर चढून बसत असे. मग डॉक्टर “आडवे व्हा” असे म्हणाले की कपडे सावरत झोपत असे. मग डॉक्टर हाताने पल्स मोजत, मग छातीत असलेल्या हृदयाचे ठोके डॉक्टर  छाती, पोट, पाठ सर्वत्र स्टेथोस्कोप लाउन मोजत! मग स्वतःच्या कपाळावर एक पट्टी बांधत ज्याच्या पुढे एक गोल आरसा असे. मग रुग्णाला “आsss” करायला लावून त्या आरशातून परावर्तित होऊन रुग्णाच्या घशात खोलवर जाणाऱ्या उजेडात ते मुखमंडलाचे दर्शन घेत. “काय खाल्ले?” असले जुजबी प्रश्न विचारात आणि “काळजी करू नको” इतके सांगून तिथेच असलेल्या छोट्याश्या बेसिन मध्ये साबणाने हात धुवून, शुभ्र टॉवेलला हात पुसून परत बाहेर आपल्या खुर्चीत स्थानापन्न होत. रुग्ण “काळजी करू नको” ह्या शब्दांनीच अर्धा बरा झालेला असे. क्वचित पितळ्याच्या, उकळवलेल्या सिरिंजमधून एखादे इंजेक्शन! बास. कम्पाउंडर ने बाहेरून डोसाचा नाक्षीदार कागद चिकटवून आत लाल रंगाचे औषध भरून बुचाची बाटली हातात दिली आणि तिच्या बरोबर 3 प्रकारच्या गोळ्या “ह्या सकाळी, ह्या दोन जेवणानंतर आणि ही फक्त रात्री” असे सामोर ठेवलेल्या गोळ्या कॅरमवरील सोंगट्या फिरवाव्या त्या गतीने फिरवत, त्याच्या सामोर असलेल्या छोट्याश्या खिडकीतून रुग्णाला फ़टाफ़ट सांगून “दहा रुपये” असे म्हणत व्यवहार पूर्ण केला की कम्पाउंडरच्या कॉन्फिडन्समुळे उरलेला आजार देखिल पळून जात असे. 

ह्या फॅमिली डॉक्टर्सना प्रत्येक रुग्णाची तब्बेत, त्याचा फॅमिली  इतिहास, आर्थिक स्तर सर्व माहीत असे. अनेक रुग्णांच्या शुभकार्याला त्याला जावे लागत असे. नाडी परीक्षा, स्टेथोस्कोप आणि घसा बघुन त्याच्या गोडट लाल औषध आणि चार गोळ्यानी कोणताही रोग दहा रूपयात बरा करणारा तो धन्वंतरी त्या भागातील हजारो लोकांचा देव असे. हातात लेदरची बॅग घेऊन डॉक्टर कधी होम व्हिजिटला आले की मामला गंभीर आहे ह्या जाणिवेबरोबर कोणीतरी सेलिब्रिटी इमारतीत आल्यासारखी त्यांना पहायला गर्दी व्हायची. रुग्णांच्या किमान दोन ते तीन पिढ्या एखादे फॅमिली डॉक्टर जगवायचे, फुलवायचे. ते  कुटुंबाचा भागच होऊन जायचे म्हणून बहुतेक त्यांना “फॅमिली डॉक्टर” असे नाव पडले असावे.

आज असे दवाखाने काढून समाजसेवा करणाऱ्या फॅमिली डॉक्टरचे प्रमाण कमी झाले आहे. नाडी आणि घसा पाहून औषध न मिळता अनेक टेस्ट करायला लागत आहेत. अर्थात मेडिकलची फी आणि दवाखाना टाकायचा प्रचंड वाढलेला खर्च हे देखील कारण आहेच. तसेच समाज वाढला तसे रोगही वाढले. ते रोग आमच्या जीपीच्या साध्या निदान प्रक्रियेतून कदाचित लक्षात येत नसतील. आज जे आहे ते वाईट खचितच नाही पण हल्ली डॉक्टर किंवा इस्पितळात जाताना जी भीती वाटते ती फॅमिली डॉक्टरकडे जाताना वाटत नसे. उलट काही महिन्यात त्यांना भेटल नाही तर निदान सर्दी तरी होऊ दे. त्या निमित्ताने “डॉक्टरांची” विचारपूस करता येईल असे विचार अनेक फॅमिली डॉक्टरांच्या रुग्णांच्या मनात यायचे! असो!

आज डॉक्टर्स डे आहे. त्या निमित्ताने आमचे फॅमिली डॉक्टर तसेच माणसांच्या जीवन मृत्यु किंवा सुदृढता आजार ह्यांच्यामधे कुठेतरी राहून आजार व मृत्युवर विजय मिळवत सुदृढ़, दीर्घायुषी समाज बनवायचा वसा घेतलेल्या तमाम उरले सुरले फॅमिली डॉक्टर्स, स्पेशलिस्ट, सर्जन, कन्सल्टंट असलेल्या तमाम डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद आणि ‘ डॉक्टर्स डे ‘ च्या शुभेच्छा !!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

थोड वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहील..

# काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

# तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.

# नातवंडे धावत-खेळत राहतील.

# तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!

# दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

# जमाव हळूहळू पांगू लागेल..

# काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.

# येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

# दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

# महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.

# तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.

# प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल. 

# आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.

# हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.

# या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.

# दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात, दणक्यात केले जाईल, तुम्हाला न मिळालेले खाद्य पदार्थ लोकांना खायला मिळतील

# मोठमोठ्या महाराजांची किर्तने,प्रवचने ५/७ दिवस मोठ्या दिमाखात होतील 

# अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.

 आता सांगा… 

# लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.मग तुम्ही कशासाठी धावत आहात?

# तुम्हाला कशाची काळजी आहे ?…

 # योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.

# आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.

# इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.

# इत्तरांचे प्रपंच मोडकळीस आणण्याचे पाप करु नका, त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबांवर होऊ शकतो

# आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….  

“होय, एक गोष्ट…”

# आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा,  तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.

# आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.

# सत्कर्म करत रहा. हेच खरे जीवन आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे… जन मानवले वरी – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे… जन मानवले वरी – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

जन मानवले वरी बाह्यात्कारी /

तैसा मी अंतरी नाही झालो //१//

*

म्हणऊनि पंढरीनाथा वाटतसे चिंता /

प्रगट बोलता लाज वाटे //२//

*

संत ब्रम्हरूप जाले अवघे जन /

ते माझे अवगुण न देखती//३//

*

तुका म्हणे मी तो आपणासी ठावा /

आहे बरा देवा जैसा तैसा //४//

  – संत तुकाराम.

 *

लोक मला जितका खरा मानतात

तितका मी अंतःकरणातून खरा नाही. त्या मुळे मलाच माझी काळजी वाटते. आणि तसे उघडपणे बोलायची लाजही वाटते. संत मंडळींना सगळेजणच परमेश्वरा सारखे दिसतात. ते माझ्या आत असलेल्या वाईट गोष्टी पहात नाहीत. पण परमेश्वराला मी आतून कसा आहे आणि बाहेरून कसा आहे हे नक्कीच माहीत आहे. तोच हे सर्व काही जाणतो.

संत मंडळी सर्वाना परमेश्वर स्वरूप मानतात. ते आपल्यातल्या चांगल्या गोष्टी पहातात. वाईट गोष्टी कडे दुर्लक्ष करतात. पण आपले आपनच प्रमाणीक न्यायाधीश झालो तर आपण कसे आहोत हे आपल्याला कळून येते. पण आपण आपल्याला जाणून घेणे सोपे काम नाही.

तुका म्हणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…” (डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचा गोषवारा) ☆ संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…☆ संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆

(डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचा गोषवारा) 

(’आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…’ हा डॉ.तारा भवाळकर लिखित लेख रविवार विशेषमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला आहे. तो पूर्ण लेख वाचनीय झालेला आहे. शासनाने आणि मराठी माणसाने हा लेख वाचावाच आणि त्यावर चिंतन, मनन करावे. या लेखातील हिंदीच्या सक्तीमुळे बालमनावर होणारा परिणाम आणि शासनाचा निर्णय लादण्याची एकूणच पद्धत कशी अन्यायाची आहे, हे विशद करणारा लेखातील महत्त्वाचा अंश या पोस्टमध्ये श्री जगदीश काबरे यांनी संकलित केलेला आहे. तो असा…)

महाराष्ट्र शासनाचे धोरण म्हणून सध्या त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार सरकार सध्या करत आहे आणि त्यानुसार इयत्ता पहिलीपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्याचा महाराष्ट्रातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, नाट्य परिषद आणि इतर अनेक संस्थांनीही याला विरोध केला आहे. म्हणजे पहिलीपासून तीन भाषा शिकवायला या सगळ्यांचा विरोध आहे, कारण हे धोरण पूर्णपणे अशैक्षणिक आहे, आणि बाल-मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिल्या वर्गात मूल येते, त्यावेळी ते केवळ सहा वर्षाचे असते, या वयात मुलगा वा मुलगी असली तरी शाळा हीच त्यांच्यासाठी नवीन गोष्ट असते आणि शाळेमध्ये सगळे विषय आणि इतिहास, भूगोल, व्याकरण, अमूक, तमूक, वगैरे त्यांची नावेसुद्धा त्यांना नवीन असतात.

अशा स्थितीत तीन निरनिराळ्या भाषा शिकवायच्या हे म्हटले तर त्याच्या मानसिकतेच्या आणि बौद्धिकतेच्या, शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणारी छोटी मुले असतात, त्यांना इतक्या विषयांची ओळख होणे, मुख्य म्हणजे तीन चार तास एका ठिकाणी बसणेही शारीरिकदृष्टया अवघड आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या न झेपणारे आहे, आणि अशा वेळेला तीन तीन भाषा शिकायला लागणे हे अशैक्षणिक व अन्यायकारक आहे, त्यांच्यावर दबाव टाकणारे आहे. शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतच शिकवायला पाहिजेत, त्या त्या प्रदेशातील भाषा असेल तर त्या भाषेत शिकवायला हवे. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा मुलांच्या शिक्षणात प्रवेश तेव्हा होता उपयोगी नाही. खासगी जीवनात ज्या भाषा बोलत असतील ते असतील, पण बालक ज्या शाळेत जाते, तिथले शिक्षण मातृभाषेेत पाहिजे, कारण पहिल्या चार वर्षात शाळेची सवय होते, शारीरिक क्षमता वाढते, आकलनाचा पाया भक्कम होतो, मातृभाषेमुळे सर्व विषयांचे चांगले आकलन होते, मध्येच दुसरी भाषा आली तरी ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, नव्हे तो होतोच.

प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो, क्षमता वेगवेगळी असते आणि अशा वेळेला सर्वसामान्यपणे जी पातळी असते, त्याला झेपेल त्याप्रमाणेच विषय शिकवले पाहिजेत, त्यात एकच भाषा म्हणजे तीही मातृभाषाच आवश्यक आहे, हे मत आचार्य शंकरराव जावडेकर आणि विनोबाजी भावे अशा विचारवंतांचे आहे. तरच त्याला आकलनात गती प्राप्त होते. कोणत्याही टप्प्यावर मातृभाषेत शिक्षण घेतले तर त्याला नकळत भाषेच्या सर्व क्षमता लक्षात येतात. व्याकरण व भाषेचा पाया पक्का होतो. त्याला व्याकरणात काय म्हणतात हे माहीत नसले तरी वाक्य कसे असावे हे कळते. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने लिंग, वचन समजते. बोलता येते. यादृष्टीने शब्दसंग्रह, विशेषण हे बोलता बोलता नकळत पक्के होते. आपली मातृभाषा चांगल्या दृष्टीने समजली तर दुसरी भाषा समजणे अवघड नसते. कारण जो बुद्ध्यांक असतो, तो कुठल्याही विषयात सारखाच गतिमान असतो. त्या मुलाला भाषेत गती असेल, तर दुसऱ्या भाषेतही गती येऊ शकते. यामुळे चौथीपर्यंत माध्यम भाषा मातृभाषाच असली पाहिजे. दुसरी भाषा मध्ये आली, कुठलीही आली तर त्याच्या आकलनात, भाषिक आकलनात घोटाळे होतात. नेमके काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला कळेनासे होते.

प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षक व पालक असे सांगतात, की दोनही भाषा शिकवल्याचा दुष्परिणाम दोन्ही भाषांच्या आकलनावर होतो. त्यांना धड मराठीही येत नाही, इंग्रजीही धड येत नाही. अनुभव असा आहे की, आपल्याला असे वाटते की, किंवा काही शिक्षण शास्त्रज्ञ म्हणे असे सांगतात, की मुलांना लहान वयात जास्त भाषा आकलन करण्याची क्षमता असते, पण हे पूर्णपणे सत्य नाही, याचे कारण त्यांनी त्या वर्गातील मुलांना शिकवलेले नाही. जे शिकवणारे आहेत, शिकवणाऱ्या शाळा आहेत, त्यांचे मत येथे विचारात घेतलेले नाही. शिक्षण शास्त्रज्ञ आपल्या कक्षात बसून निर्णय घेत असतात, आणि काही पुस्तकात वाचून सिद्धांत मांडत असतात. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा असतो, कारण शब्दसंग्रह, लिंग-वचन भेद कळणे, दोन भाषेत उच्चारदृष्ट्या त्यांना साम्य, भेद कळणे अवघड असते. पुष्कळदा दोन भाषा जवळच्या वाटल्या तरी त्यामध्ये उच्चारानुसार अर्थबदल असतो. आज आग्रह असा चाललेला आहे, की हिंदी तिसरी भाषा शिकवावी, म्हणजे मातृभाषा म्हणून मराठी, परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि देशातील तिसरी भाषा म्हणून हिंदी. आता गंमत अशी होते, की दोन भाषांच्यामध्ये उच्चारदृष्ट्या एकच शब्द असतो, परंतु त्यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न असतात, हे भाषा शिकविणाऱ्यांना माहीत आहे. इतरांच्या कोणाच्या लक्षातही येत नाही. मग मुलांचे गोंधळ होतात. साधे उदाहरण द्यायचे झाले तर एक साधा शब्द म्हणजे चेष्टा, मराठीमध्ये चेष्टा म्हणजे टिंगलटवाळी, आणि हिंदीमध्ये प्रयत्न म्हणजे येथे दोन वेेगवेगळे अर्थ होतात. कुठे टिंगलटवाळी, आणि कुठे प्रयत्न असा अर्थ होतो हे मुलांच्या लक्षात येत नाही. मुलांच्या डोक्यात हा घोटाळा वयाच्या सहाव्या वर्षात सुरू झाला तर त्याला कुठल्याही भाषेचे आकलन नीट होऊ शकत नाही. असे अनेक शब्द आहेत आणि सध्या तर मराठी भाषेवर अनेक वेळा असे अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे.

गेली ४५ वर्षे सीमाप्रदेशात राहत असल्याने अनेक माणसे द्विभाषिक असतात, त्या दोन भाषांमध्ये एकच शब्द, एकच उच्चाराच्या दृष्टीने समान असला तरी अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ भंगार या शब्दाचा मराठीतील अर्थ मोडक्या वस्तू असा काहीसा असतो तर कन्नडमध्ये भंगार याचा अर्थ सोने असा आहे. आता हे आकलन होणे मोठ्या माणसांनाही कठीण जाते आणि मुलांना तर ते अशक्य ठरते. प्रत्येक भाषेच्या उच्चारणाची शैली वेगळी आणि उच्चारांनुसार अर्थही वेगळा होतो. म्हणजे विरामचिन्हे, आरोह, अवरोह त्यानुसार होणारे अर्थ हे सगळे एकमेकांत गुंतलेले असतात. म्हणून अर्थ परस्पराच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा असू शकतो, आणि त्याचे आकलन मुलांना होत नाही. म्हणजे मातृभाषेचा उच्चार, लेखन हे पक्के झाले की मग दुसरी भाषा शिकणे सोपे जाते. मग ती दुसरी कोणतीही भाषा असली तरी त्या दुसऱ्या भाषेचे सहज आकलन होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मातृभाषेशिवाय एखादी परकीय भाषा शिकवायला लागले, तर मुलांना आपल्या मनातील आशय सलगपणे व्यक्त करणे अवघड जाते, म्हणजे मातृभाषेतही व्यक्त करणे सोपे जात नाही. काही प्राथमिक शिक्षक असे सांगतात, की चौथीपर्यंतच्या मुलांना सरळ दहा वाक्येही मातृभाषेतून बोलता येत नाहीत. लिहिणे तर दूरच.

भाषा शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. स्वत:ची भाषा शिकवण्याची, म्हणजेच मातृभाषा शिकवण्याची पद्धती आणि इतर भाषा शिकवण्याच्या पद्धती या शिक्षण शास्त्रदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, हे एक शिक्षिका म्हणून नमूद करावेसे वाटते. या सगळ्याचे आकलन शिक्षकांना झाले नसेल तर नेमक्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे ती भाषा आत्मसात होऊ शकत नाही.

लोकांना एका वेळी अनेक भाषा आल्या पाहिजेत असे मानले जाते. यामुळे प्रगल्भता येते असा समज आहे. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळी तुम्हाला एक भाषा चांगल्या पद्धतीने आकलन होते. ज्यावेळी तुम्हाला एका भाषेचे नीट आकलन होत असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला दुसऱ्या भाषा शिकण्यास अवघड जात नाही. कारण आकलन क्षमता चांगली झालेली असते. ते आकलन नसताना नुसती भाषा शिकवणे उपयोगाचे नाही.

आपण महाराष्ट्राचा अभिमान बाळगतो असे म्हणतो, शिवाजी महाराजांनी अरबी, फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द कसे निर्माण करता येतील यासाठी विद्वजनांची बैठक बोलावून राज्यव्यवहार कोष तयार केला होता. आपल्याला मराठीचा, इतिहासाचा, ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत आलेल्या साहित्य परंपरेचा, शिवाजी महाराजांचा खरोखरच अभिमान असेल तर आधी आपल्याला भाषेचा अभिमान बाळगावा लागेल. त्या भाषेचे आकलन नीट व्हावे यासाठी इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतूनच म्हणजे मराठीतूनच शिकवायला हवेत. पाचवीमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला दुसरी भाषा आणि आठवीमध्ये तिसऱ्या भाषेचे ज्ञान द्यावे, कारण तोपर्यंत त्याची शारीरिक क्षमता वाढलेली असते. सहा वर्षांच्या मुलावर तीन-तीन भाषांचे आणि बाकीच्या विषयांचे ओझे लादणे अन्यायकारक व अशैक्षणिक आहे. म्हणून सहा वर्षांच्या मुलाला मातृभाषा, तीन वर्षांनी दुसरी भाषा आणि मूल १२ वर्षांचे झाल्यानंतर तिसरी भाषा अशीच पद्धत हवी. म्हणून मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगत असताना परप्रांतीय भाषेची अप्रत्यक्ष सक्ती होणं हेही तितकंच अन्यायकारक आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुकशुकणारी पात्रं… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ शुकशुकणारी पात्रं… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

एखाद्या घरातून भरपूर पाहुणचार घेऊन आपण बाहेर पडावं आणि चालू लागताना अचानक त्या घरातल्या एखाद्या लहान मुलाने शुकशुक करून हात हलवावा, पुन्हा या म्हणावं, तसं पुस्तकातल्या काही पात्रांच्या बाबतीत घडतं.

साधारण तीन दिवसांपूर्वी पारखा ही भैरप्पांची कादंबरी वाचली. त्यावरती सविस्तर लेखही लिहून झाला. त्यातल्या काळिंगा या पात्राला खरमरीत पत्र लिहून झालं‌. तरीसुद्धा यातली तैय्यवा मला शुकशुक करू लागली. खरंतर पुस्तक वाचतानाच तिनं तिच्याकडे माझं लक्ष वेधून घेतलं होतं. म्हणजे दर वेळेस मला लेखक जेव्हा एखादा पात्र व्यंग असलेलं जन्माला घालतो मग ते व्यंग कुठल्याही स्वरूपाचं का असेना तेव्हा मला कुतूहल वाटतं. असं वाटतं की दुसऱ्या एखादा पात्राचं कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी किंवा त्याला जास्त न्याय मिळवून देण्यासाठी हे पात्र लेखकाने कमकुवत बनवलं असेल का? आणि मग त्या कथानकाचं वाचन चालू असतानाच माझ्या मनात एका दुसऱ्या पातळीवरती एकूण त्या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं नातं बघता डिसेक्शन चालू होतं.

थोडक्यात ह्या पात्राचा या पात्राशी संबंध नसेल तर अमुक एक पात्र इतकं उठावदार झालं असतं का? त्याचा एवढा प्रभाव पडला असता का? त्याचं महत्व जाणवलं असतं का? असा एक विचार माझ्या मनात सुरू होतो. पात्रांची जैविक आणि भावनिक गुंतवणूक मला खुणावू लागते. कथानक आपलं आपल्या वळणवळणाने पुढे जातं राहतं. पुस्तक वाचून मग नंतर त्याच्यावरती लिहून काम करून झाल्यानंतरही डिसेक्शन मोड पुन्हा डोक्यात सुरूच राहतो.

त्यावेळेला काही पात्रांवर अन्याय झालाय असं नकळत वाटून जातं, पण एक साहित्य निर्मिती ही एक कलाकृती आहे आणि ती विकली जाणंही गरज आहे ही गोष्ट जर मानली तर ती आकर्षित होण्यासाठी अशा क्लृप्त्या या लेखकाला कराव्या लागतात हे जाणल्यानं त्याबद्दल हळहळ वाटण्या पलिकडे काही करता येत नाही. परंतु अशी काही पात्रं मनाच्या तळाशी ही राहतातच.

आता यातल्या तैय्यवा या पात्राच्या बाबतीत मला असंच वाटलं ही खरंतर या कादंबरीतील नायकाची आई आहे पण तिला मुकी दाखवली आहे. आणि त्यामुळे अर्थातच तिचे संवाद नाहीत परंतु तिचे संवाद नसतानासुद्धा अप्रत्यक्षपणे ती सगळ्या घटनांशी कशी जोडलेली आहे आणि तिच्यावरती कसा वेगळ्या वेगळ्या प्रकारे जगण्यानेच नियतीनेच अन्याय केला आहे हे जाणवत राहतं. भैरप्पांच्या लेखनाची ही एक कमाल मला इथे जाणवते की एखादं व्यंग असलेलं पात्र सबंध कथानकामध्ये कुठे ना कुठे अदृश्य स्वरूपात स्पर्शत राहतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कादंबरी वेगळी वाटू लागते.

तर अशी वेगवेगळी पात्र त्यांची व्यंग किंवा त्यांची ताकद घेऊन येतात आणि त्या कादंबरीला एक वेगळंच स्वरूप देतात. हा विचार करून नंतर पुन्हा ती कादंबरी वेगळ्या दृष्टीने बघण्यात एक वेगळीच मजा असते. असं बघायला लागलं तर कादंबरीचा खरा नायक किंवा खरा खलनायक कुणीच नाही असे वाटू लागतं आणि या दृष्टिकोनातून कादंबरी काही काळाने तटस्थपणे पाहता येते पण तरीही तिचा आनंद तसाच घेता येतो.

एक वाचक म्हणून नंतर असंही वाटतं की आपलं आयुष्य असंही पाहता यायला हवं. पण ते जमत नाही ही खंत मात्र प्रत्येक वेळी जाणवते.

तुमच्यापैकी कोणाला कधी असं जाणवलं आहे का? 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares