मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सगळ्या सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमाला मर्यादा आल्या होत्या. ढोल, ताशा, डॉल्बी यांचे आवाज घुमत नव्हते. मिरवणुका काढल्या जात नव्हत्या.  नकळत सगळ्या कार्यक्रमांना निराशेची झालर लागली होती. पण यंदा मात्र गणपती उत्सव धूम धडाक्यात चालू आहे.  माणूस हा उत्सव प्रिय आहे. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धीदाता गणेश आणि शक्ती- स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हींचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्ही उत्सवांचा उद्देश समाजात स्फूर्ती रहावी, जिवंतपणा रहावा, समरसता यावी असाच आहे.

पण अलीकडच्या काळात या सर्वांना थोडी वाईट गोष्टींची साथ येऊ लागली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणुका, सजावटीमधील अतिरिक्त स्पर्धा, तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवादरम्यान होऊ लागल्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिथे परमेश्वर हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटते. कोरोनामुळे मोठ्या मिरवणुकांना बंदी आली. काही अनिष्ट गोष्टी आपोआपच कमी झाल्या. वैयक्तिक पातळीवर घराघरातून गणपती बसवले गेले. परंतु सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्षे बंद होते. यंदा पुन्हा नव्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला गेला. आता महानगरपालिका विविध ठिकाणी विसर्जनासाठी हौद, निर्माल्यासाठी कुंड, यासारख्या गोष्टींची व्यवस्था करते. त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. देश, परदेशातही पुण्याच्या गणपतीचे महत्त्व फार आहे.

यंदा दोन वर्षानंतर गणपती उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा होत आहे. वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दलचे राग, द्वेष, मतभेद यांचे गणपती बरोबरच विसर्जन झाले पाहिजे. आणि चांगल्या भावना दुर्वांप्रमाणेच वाढीला लावल्या पाहिजेत. दुर्वा जशा जमिनीला चिकटून वाढत वाढत जातात, विस्तारत असतात, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून समाजजीवनाचा विस्तार केला पाहिजे. शाडूच्या मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो. त्या गणपतीची माती विरघळून तळाशी एकत्र येते- पुन्हा पुढच्या वर्षी नवीन निर्मितीसाठी ! तशी आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची, चांगले समाजमन निर्माण करण्याची राहिली पाहिजे. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. तो गणराया दहा दिवसात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवून जातो. घरातील लहान मुलाबाळांपासून सर्वांनाच गणपतीचे आकर्षण असते. गणपती दुकानात ठरवण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्व घर गणपतीमय झालेले असते. अलीकडे तर शाळातूनही शाडूची गणेशमूर्ती करायला शिकवतात. तसेच बऱ्याच घरी स्वतः केलेल्या मूर्ती बसवल्या जातात. असा हा गणपती बाप्पा ! त्याचे विसर्जन करायचे दिवस आले की सर्वांनाच फार वाईट वाटते ! कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे पाच दिवस गणपती असतो.  काहींच्याकडे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन होते. अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतींचे विसर्जन होत असते. या काळात पाऊस कमी झालेला असतो, परंतु काही वेळा बरेच दिवस पाऊस असतोही !. तरीही लोक उत्साहाने सार्वजनिक गणपती आणि त्यांचे देखावे बघायला जातात. एकूणच गणपतीचे हे दिवस उत्साहाचे असतात.

नुकताच मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मूल गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तयार नसते आणि अक्षरशः रडत असते. त्यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोर भट” नावाची कथा आठवली.त्या गोष्टीतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की, गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे. आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन इतके विषण्ण होई की घरी येऊन त्या रिकाम्या मखरासमोर ते दुःखी चेहऱ्याने बसत असत. खरोखरच बाप्पाला निरोप देताना मन भारावून जाते आणि अंतरीचा उमाळा भरभरून वाहू लागतो आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणतो –” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचा उपदेश… ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

? विविधा ?

☆ आईचा उपदेश ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे

सासरी जाणारी मुलगी आईला विचारते की, “आई, नक्की कशी वागु गं मी सासरी????”

आई म्हणते की, तुझ्या वहिनीने तुझ्या आईवडिलांशी जसे वागावे, असे तुला मनापासून वाटते. त्याहुन चांगली तू  तुझ्या सासरच्या मंडळींशी वाग!!

सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे ?

“सासर हेच तुझ घर आहे. तिकडच्या कुरबुरी आम्हांला सांगत बसू नकोस. तुझ्या बहिण भावंडांना चॅट किंवा सतत फोन करायचा नाही. पूर्वी पत्र हा एकमेव दुवा होता. सासर व माहेर मध्ये त्यावेळी मुली कशा सासरी साखरेच्या पाकाप्रमाणे मिसळून जात होत्या त्यांचा आदर्श ठेव. त्या कमवत नव्हत्या पण माणस नातेवाईक जोडत होत्या.

तुम्ही आज कालच्या मुली खूप शिकलात, गलेलठ्ठ पगार हातात पैसा खेळतो. त्यामुळे तुमची जनरेशन आमची जनरेशन……. वडिलधार्‍यांशी भांडण करणं त्यांना तुच्छ लेखण असे प्रकार तुझ्याकडून होता कामा नये.

माहेर आता हे तुझं पाहुण्यांचे घर आहे असं समज. चार दिवसासाठी ये पाहुणी म्हणून रहा आणि निघून जा…….” हे निक्षुन सांगायला हवे,

मुलगी सासरी गेल्यानंतर माप ओलांडून घरात प्रवेश केल्यावर तिच्या आईचा लगेच फोन येतो काय गं कशी आहेस? आठवण येते का? असे विचारणा सतत होत असते. काय खाल्लं? काय करते? सासू काय करते? कामाला मदत करते का? अशा फालतू गोष्टींची विचारणा वारंवार होत असते. त्यामुळे मुलगी  बिथरते. तिला कळत नाही की आपण कसे वागावे? आपली काय जबाबदारी आहे? हळूहळू भांडण वाढू लागतात आणि घटस्फोटापर्यंत पाळी येते. याला जबाबदार सर्वस्वी मुलीची आईच जबाबदार असते.

आईने निक्षून सांगितले की…….

आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान याचा दुरुपयोग करू नको. विनाकारण रोज रोज मला फोन करू नको. आमच्या घरात म्हणजेच तुझ्या माहेरी तू लक्ष घालू नकोस. आम्ही सक्षम आहोत. आमच आम्ही बघून घेऊ सासर हेच तुझं घर आहे. त्या घरात तू प्रामाणिक व आपुलकीने वाग. सासु-सासर्‍यांना आई-वडील समज त्यांचा योग्य तो मान ठेव. कारण भविष्यात तुला ही कोणाचे ना कोणाचे तरी सासू व्हायचा आहे. त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडू नकोस. त्याचे परिणाम तुझ्या मुलांवर होतील तेही तुझ्याशी मग असेच वागतील. आपल्या मुलाने आपल्याशी कसं वागावं? असे  तुला वाटते तसेच आपण सासरी वागावे. टीव्ही सिरीयल बघून मनात भलते-सलते विचार आणू नकोस. ते सर्व क्षणिक आणि फसवे असते हे लक्षात ठेव.  एवढी शिकलेली मुलगी तुझ्या शिक्षणाचा व प्रगल्भतेचा वापर  कर. अंगी नम्रपणा व शालीनता बाळगून तो दाखवून दे. जितका गलेलठ्ठ पगार तितकीच गलेलठ्ठ मनावर रुजलेली संस्कृती आहे हेच दाखव. आईवडिलांचं नाव नक्कीच तुझ्या सासरी आदराने घेतलं जाईल. आम्ही मुलगी म्हणून तुझे लाड जसे केले तसेच लाड सासरी होतील. आपल्या शब्दात गोड स्वर मिसळ.

मैत्रिणींमध्ये टेंबा मिरवण्यासाठी माझ्या नवऱ्याचं नाक माझ्या मुठीत आहे. तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं दाखवण्यासाठी रोज त्याच्याकडे फालतू हट्ट करू नकोस. घरात स्वच्छता टापटीपपणा ठेव. दुसऱ्याने कामाला मदत करावी अशी अपेक्षा न बाळगता स्वतः काम करावे. मग तोच आपल्या मदतीला पुढे येईल रोज सकाळ-संध्याकाळ देवाला दिवा लावुन नमस्कार कर.

अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपाल्या मुलीला शिकवल्या, तर कोर्टात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची संख्या आणि पोलिस स्टेशनला 498-अ प्रमाणे दाखल होणाऱ्या बहुतांशी खोट्या तक्रारींची संख्या, जी दिवसेंदिवस मारुतीच्या शेपटासारखी वाढत चाललीय, ती निश्चितपणे कमी होईल, होईल. अस माझ सोज्वळ मत आहे.

© सौ. रोहिणी अमोल पराडकर

कोल्हापूर  

भ्रमणध्वनी – 8208890678

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौराईकडून गृहिणींना पत्र… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

?  विविधा ?

⭐ गौराईकडून गृहिणींना पत्र…  अज्ञात  ⭐  प्रस्तुती –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

प्रिय  सखी,

मजेत गेले माझे दिवस..तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले..मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं..मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास…पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार….काही वेळा डोळे भरुन आले आणि काही वेळा हसू न आवरण्यासारखे झाले…मग आम्ही दोघीनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू…जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं  , ???? आमच्यासाठी पंचपक्वानं, सोळा भाज्या  केल्यास पण तू एकटी असताना शिळं पाकं खाऊन राहणं कसं जमतं????? आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं? आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस ,तेवढा स्वत:ला मान कधी देतेस का गं??? जाता जाता  एक सांगू …जेवढं स्वत:ला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यात पाहशील..

कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस…तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि  डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस…स्वतःमध्ये ,…..  जसं पंचपक्वानं जसं तयार करतेस तसंच नविन कला शिकत जा, छंद जोपासत जा , स्वतःला वेळ दे..जगत जननीपण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस…कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे…आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनों थोडासा आराम करा…असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता ,स्वत:ला नव्याने घडवा…आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या   चेहर्‍या वरच्या तेजाने सारं जग बदलू दे…सोवळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे …गोळ्या घेऊन पाळया लांबविण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा..बाकी पुढच्यावर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस..मानसिक, शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी!!!!

तुझीच  ,

गौरी

– अनामिक

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच  भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी  हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता. कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर ! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी ? काही विशेष कारण आहे का ? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी ?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना ! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का ? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो ! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं  असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच ! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं ? कोमेजायचं कशाला ? दुर्मुखलेलं का राहायचं ? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का ? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे ? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना ? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं ! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का ? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? विविधा ?

☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके☆ 

जीवना, खरंच, इतकं  भरभरुन दिलं आहेस मला.

छोट्या कुरबुरी, आता उगा करु कशाला?

अगणित आनंदाचे क्षण, मोजता भासती तोकडे.

अन् दुःखाच्या हळव्या क्षणांचा, तो बोलबाला केवढा?

जरतारी किनारीचे वस्र ल्याले मी, झगमगते.

तरी त्याची कलाबूत, कुठेतरी का टोचते?

सुंदर सकाळ, फुलांचा मोहवतो दरवळ.

तरी द्दृष्टीस माझ्या का खुपते ही पानगळ ?

बालकाचे निरागस हास्य, त्यावीण सुंदर असे काय?

जीवन सरतानाही, पेला पुन्हा भरुन जाय.

सर्वगुणसंपन्न जरी या जगी नसे कुणी.

जगमगता एक गुण, असतो,प्रत्येकाचे ठायी.

गुणविशेष हेरावा, अन् मारावी पाठीवर थाप.

भोक दिसता, बोटे घालून, वाढवण्यात मतलब काय?

शांत आणि प्रसन्नचित्त,रहावे सदासर्वदा.

जीवन फार छोटे आहे, आज आहोत,

उद्याचे काय ठाऊक असते कुणाला?

हसण्यातून उधळा फुले, गा आनंदगाणी छानशी.

आज घ्या आनंदे जगून, विसरून उद्याची काळजी.

© निलिमा ताटके

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 6 ☆ सौ. अमृता देशपांडे  

देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या 26 वर्षाच्या तरुण मुलाचे पार्थिव घेऊन जेव्हा त्याचेच सहकारी तिरंग्यात लपेटून त्याला घरी आणतात, तेव्हा आईवडील, बहीण भाऊ,  आप्तमित्र या सर्वांच्या डोळ्यातलं पाणी… इथेतर शब्दच मुके होतात.  संवेदना स्तब्ध होतात.आईच्या कुशीतून जन्म घेऊन मातृभूमी ची सेवा करताना भूमातेच्या मांडीवर विसावलेला तो वीर! प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी त्या मातापित्याच्या त्यागाला,  धारातीर्थी पडलेल्या शूराला अश्रू वंदना देत असतं. भारतमातेने आपला तिरंगी पदर आपल्या सुपुत्राला पांघरलेला असतो. मानवंदना देणारे ते अश्रू ही स्वतःला कृतार्थ मानत असतात.

शहीद जवानांची बातमी कानावर पडताच थेट काळजाला भिडते. दुःखाला अभिमानाची किनार असलेली ही भावना इतर सर्व भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. देशभक्ती चा कठोर वसा घेतलेल्या आणि ‘ तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ या ध्यासाने सीमेवर रक्षण करणारा जवान जेव्हां धारातिर्थी पडतो तेव्हा अश्रू रूपानी ‘ भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी,  सैनिक हो तुमच्या साठी’ हा संदेश सर्व सैनिकांना पोचवत असतो. तेच त्यांच्या लढण्याचं बळ असतं..

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ. नयना कासखेडीकर

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण नगररचना असलेल्या जयपूर शहरात स्वामीजी खूप कमी काळ राहिले. जयपूर मध्ये एक सभापंडित व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी पंडितांकडून पाणीनीच्या व्याकरणातील सूत्रे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी अनेक प्रकारे समजावून सांगून ही तीन दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा स्वामीजी आकलन करू शकले नाहीत. पंडितजी त्यांना म्हणाले, “स्वामीजी माझ्याजवळ शिकल्याने आपला विशेष फायदा होईल असे वाटत नाही. तीन दिवस झाले, मी तुम्हाला एक सूत्रही समजावून देऊ शकलो  नाही. आपण हा प्रयत्न थांबवावा. या बोलण्याने स्वामीजी या सुत्राचा अर्थ समजण्यासाठी, निश्चय करून एकांतात तीन तास बैठक मारून बसले आणि सूत्राचा अर्थ लक्षात आल्यावर खोली बाहेर येऊन, तो पंडितजींना सुबोध शैलीत म्हणून दाखवला. एव्हढंच नाही तर सूत्रा मागून सूत्र आणि अध्याया मागून अध्याय त्याच पद्धतीने ते वाचत राहिले. पंडितजी आश्चर्यचकीत झाले. एकदा ही आठवण सांगताना स्वामीजींनी म्हटले आहे, “मनाचा पूर्ण निर्धार असेल तर, काहीही साध्य करणं शक्य असतं. एखादा पर्वत असावा आणि त्यातील मातीचा कण अन कण वेगळा करावा अशा प्रकारे मनुष्य कोणताही कठीण विषय आत्मसात करू शकतो”. अशा प्रकारे दोन आठवड्यात शक्य तेव्हढे त्यांनी पंडितजिंकडून शंका निरसन करून घेतले होते. या आधी पण वराहनगर मठात त्यांनी दोन वर्ष पाणिनी च्या व्याकरणाचा अभ्यास केला होता.

जयपूर संस्थानचे लश्कर प्रमुख सरदार हरिसिंग यांच्याकडे काही दिवस स्वामीजी राहिले होते. त्यांच्या प्रवसातला हा अनुभव अत्यंत वेगळा होता. हरिसिंग यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप चांगला अभ्यास होता. ते वेदांती होते, परब्रम्ह मनात असत. मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते साकाराचे पक्के  विरोधक आणि निराकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या बरोबर तासन तास अनेक चर्चा होत होत्या. सगळे ज्ञान काही फक्त बुद्धीच्या जोरावरच मिळत नसते, काही वेळा ते भावनिक पातळीवर सुद्धा मिळते. कारण ते जाणिवेच्या पातळीवरचे असते. असाच अनुभव स्वामीजींनी हरिसिंग यांना दिला.

एका संध्याकाळी ते दोघ फिरायला बाहेर पडले होते. त्याच रस्त्यावर समोरून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक चालली होती. यात भक्त आर्त स्वरात आणि भावभक्तीने भजने म्हणत होती. दोघेही ती मिरवणूक पाहत थांबले असताना, स्वामीजींनी हरिसिंगना स्पर्श केला आणि म्हटले, “तो पहा साक्षात भगवंत आहे”. हरिसिंग देहभान हरपून एकटक बघू लागले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या. क्षणात ते एका वेगळ्याच विश्वात गेले. हरिसिंग यांनी हा अनुभव घेतल्या नंतर स्वामीजींना म्हणाले स्वामीजी माला साक्षात्कारच झाला. तासण तास चर्चा करून मला जे उमगलं नव्हतं, ते सारं मला आपल्या या स्पर्शाने ध्यानात आणून दिलं. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीत मला खरोखर जगच्चालक प्रभुंचं दर्शन घडलं”. असाच अनुभव स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरात कालिमातेचं दर्शन घेताना घेतला होता. साकारावर विश्वास न ठेवणार्‍या स्वामीजींना हा अनुभव आला होता.

आता स्वामीजी जयपूरहून अजमेरला गेले. राजस्थान मधलं एक महत्वाचं ठिकाण. संपूर्ण भारतात एकमेव असं ब्रम्हदेवाचं मंदिर इथे आहे. त्याचं दर्शन आणि मोईनूद्दीन चिस्ती या दर्ग्याचं दर्शन घेऊन तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानच्या वळवंटातल्या साडेपाच हजार फुट उंचीच्या अबुच्या पहाडावर आले. त्यावेळी हा परिसर अतिशय शांत, उन्हाळ्यात तर हवा थंड आणि आल्हाददायक आणि अनेक संस्थांनिकांची प्रासादतुल्य  निवासस्थाने होती. ब्रिटिश रेसिडेंटचा मुक्काम यावेळी इथे असे. त्यामुळे ते ऐश्वर्याचं लेणं भासत असे. पण याचा स्वामीजींना काही फरक नव्हता पडणार कारण त्यांना यात काहीच रस नव्हता. त्यांना हवी होती शांतता आणि एकांत स्थान. त्यांना आकर्षण होतं अशा ठिकाणी ध्यानधारणा करण्याचं. चम्पा ही गुहा त्यांना सापडली आणि त्यात ते राहू लागले.

रोज संध्याकाळच्या शांत प्रहरी स्वामीजी तलावाच्या काठाने चक्कर मारत. इतर संस्थांचे कोणी न कोणी तिथे येत जात असत. एकदा खेत्री संस्थानचे मुन्शी जगनमोहन लाल आले. ते उत्तम कार्यप्रशासक होते. त्यांना राजस्थानी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांनी आपले खेत्रीचे राजा अजितसिंग यांना स्वामीजींनी भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट ठरली.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊलं खुणा ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? विविधा ?

🌼 पाऊलं खुणा 🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

– आज घरं कसं रिकामं-रिकामं वाटतं. अगदी पाहुणे येऊन गेल्यावर वाटत तसंच!मनंही थोडं उदासच.

श्रावण कधी संपला कळलंच नाही.

अन् आतां किती पटकन् गौरी-गणपती आले अन् गेलेही. खरंच, रोजच्या दिवसाला कशी चक्र॔ लावलेली असतात नाही?तरी, त्याच्या पाऊलखुणा असतातच.

आमची एकुलती एक लेक सासरी गेली अन् घराबरोबर मनंही उदासलं.

तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आपणही श्रीमहालक्ष्मी म्हणजे ‘गौराई ‘आपल्या घरी आणायच्या. ‘श्रीगणेशा’बरोबर  ‘गौराई’म्हणजे, आनंदाची पर्वणीच!

आज किती वर्ष झाली, प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, गौरी -गणपती घरी आणल्या. त्याच्या येण्यानं जणूं दूरदेशी गेलेला मुलगाच भेटायला येतो. लाडक्या लेकी ‘ गौराई ‘माहेरपणाला येतात., असंच वाटत. आमची लेक मदतीला येते., नातवंडही यायला लागली. मग सगळा उत्साहच!

वाजत गाजत गणराय मखरात बसतात. ‘गौर’ कशाच्या पावलांनी आली–समृध्दीच्या, . धनंधान्यांच्या..

विद्येच्या.. आरोग्याच्या.. पावलांनी आली, म्हणत घरभर, हळदी-कुंकवाच्या पावलांवरुन या गौराई फिरवून आणायच्या. छानशा आराशीत, मखरात बसवायच्या. नवीनसाड्या-दागिन्यांनी सजवायच्या. बाजूला अखंड तेवत राहील अशी समई ठेवायची. पुढे ओटीचे खणं, फळं, हळदी-कुंकवाचे करंडे,

कुंची घातलेलं त्यांच बाळ अन् धान्याच्या राशी, फराळाची तबकं, सुरेखशी रांगोळी, याने सगळं मंगलमय होत जात. मग, नुसती धांदल, गडबड…, श्रीगणेश अन् गौराईची पूजा, नैवेद्य, आरती, ..सवाष्ण, ब्राह्मण.. याचा आनंद आगळाच!शब्दात न सांगता येणारा..

रात्री सगळं आवरल्यावर निवांतपणे गौराईपुढे ‘ लक्ष्मी स्तोत्र, गणरायाच्या पुढे अथर्वशीर्ष म्हणतांना डोळे पाझरु लागतात. गणरायात कधी मला लाड करवून घेणा-या, व. प्रसन्न हंसणा-या मुलाचा भास होतो, तर कधी.. घरादारावर मायेची सावली धरणारं प्रेमळ, वडिलधारी कुणी वाटत. गौराईंपुढे बसून एकटक त्याच्या डोळ्यांकडे पाहतांना वाटत.. अरे, ही तर आपली आईच दोन रुपातली!तिचीच प्रेमळ, धीर देणारी..

कधी वाटत या तर माझ्या लेकीच.. ज्येष्ठा-कनिष्ठा.. आमच्या लेकीसारख्या मनाची जागा व्यापणा-या, आईशी संवादून, सुख-दु:खाचे क्षणं वाटून घेणा-या, कां प्रिय सख्या?माहेर-सासरच्या आठवणी जागवणा-या.. श्रीमहालक्ष्मीचीच ही दोन रुप.. गौराई.. ! म्हणजे ‘स्त्री’रुपचं.

मग तीआई-जगज्जननी असो कि, सखी, लाडाची लेक असो, तीन दिवस कोडकौतुक करवून घेणारी माहेरवाशीण. !

नकळत डोळे टिपले जातात. मनं आनंदाने बहरतेच. मनांतले ‘सल’अलगद रिते होतात तिच्यापुढे.

मग कोण काय म्हणतंय याची चिंता कशाला?त्या सगळं पाहताहेत.. त्याच्या डोळ्यांच्या कोप-यात पाण्याचं तळं साठत. ओठांच्या पाकळीत हसूं उमलून सांडत आहे. हे सारे क्षणं फक्तं नी फक्त माझे अन् त्यांचेच! तीन दिवसांनी त्या, श्रीगणेशा’बरोबर आपला निरोप घेणार हेही माहित असत. ‘ पुनरागमनायच ‘ म्हणून त्यांच्यावर अक्षतां टाकतांना नेहमीच गळा भरुन येतो. सगळं छान पार पडल्याच समाधानही असत.

एक एक आराशीच्या वस्तू, फराळाची तबकं, जाग्यावर जातात. त्याच्या साड्या, दागिने पेटीत जातात. हळदी कुंकवाची धामधूम थंडावते. एक सुनंपण येत. वाटत..

त्या वळून पाहताहेत, आमच्या लेकी सारख्याच. !अन् नकळतं मनांत शब्द उमलतात…

नका खंतावू मनांत, 

एकमेकां आम्ही इथं..

तुमच्या पाऊलंखुणा,

घरंभर जिथं-तिथं..

घरंभर जिथं-तीथं..

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर ☆

सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

?  विविधा ?

गणोबा… ☆ सुश्री ज्योत्स्ना डासाळकर 

श्रावण अमावास्या झाली की कोल्हापूरच्या गल्ल्यातून आवाज घुमू लागतो भावल्या घ्या गनुबं…. हा आवाज ऐकला की घरच्या आयाबाया लगबगीने बाहेर येतात आणि आवाज देणाऱ्या कुंभार मावशीला थांबवून त्यांच्या डोक्यावरची जड बुट्टी उतरून खाली घेतात. वर झाकलेला मेणकापड, त्याखालचं सुती कापड बाजूला सरकवली की डोळे दिपून जातील अशा बाहुल्या म्हणजे हरतालिकांचे रंगीत जोड दिसतात. त्याच्याबरोबरच असते ती निव्वळ काळ्या मातीची  अनाकर्षक अशी पाच ते सहा इंचाची एक आकृती. लांबून बघितलं तर एखादा पंचकोन वाटावा अशी, पण उचलून घेतल्यावर लक्षात येते की, तळपायाला तळपाय जुळवून घातलेली इवलीशी  मांडी जमिनीला समांतर पसरलेले इवले हात, त्यातला उजवा हात रिकामा, डाव्या हातात मसुराएवढी गोळी ( तो म्हणजे लाडू म्हणे) आणि त्या मूर्तीचा चेहरा बघितला की एवढा वेळ अनोळखी वाटणाऱ्या आपल्या नजरेत अचानक ओळख दिसते. नुसती ओळख नाही तर वात्सल्याची भावना दाटून येते– कारण तो चेहरा असतो गजमुख, त्याचे छोटेसे सुपासारखे कान, डोक्यावर किरीट — ओळख पटते — गणोबा!

होय गणोबाच ! हा गणपती विघ्नहर्ता- मंगलमूर्ती- वरद विनायक- वगैरे सगळ्या विशेषणांच्या पलीकडचा. कारण हा गणोबा असतो तो गौरीचा बाळ. गणू हे त्याचं नाव, पण माहेरी येणाऱ्या लेकधनिणीचा पोरगा, त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो ‘ गणोबा. ’ 

वास्तविक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत. या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा, कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी रोज मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला. याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला. आपले सगळे सणवार हे निसर्गाशी, पर्यावरणाशी मिळतेजुळते असे आहेत. नुसते मिळतेजुळते नव्हे तर एकरूप आहेत. जे सृष्टीत घडतं आहे त्याची संपूर्ण जाणीव आणि सृष्टीच्या बदलाबद्दलची कृतज्ञता यांचा समन्वय म्हणजे आपले सण.

गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. हा गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (अर्थात हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे, तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर)– तर त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो. हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय, कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.

खरंतर व्रत-विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे, कारण त्याची सोंड- हात- पाय- लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही. बरेचदा सोंड गळून पडते आणि गणपतीचा मारुती होतो. म्हणूनच ‘ करायला गेलो गणपती झाला मारुती ‘ अशी म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला.

 माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडत गेला. हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या काळ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला, मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला आणि मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली. मग वेगवेगळे रंग आले आणि या रंगात देवाची वस्त्रं, अलंकार, शरीर रंगवलं जायला लागले. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं तसं मूर्तींचे आकार वाढत गेले. पुढे जशी नैसर्गिक माती कमी पडू लागली, किंवा मूर्तीच्या भंग पावण्याच्या भीतीमुळे टिकाऊ मूर्तीची मागणी वाढू लागली, तशा साच्यातून घडणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण व्हायला लागल्या. मूर्तिकारांचे, भक्तांचे काम सोपे झाले.

 पण नकळत मूळ व्रताचा उद्देश बाजूला पडत चालला. पण त्याची स्मृती म्हणून आजही कितीही मोठी मूर्ती आवडली तरी या मूर्तीच्या उजव्या हाताला या काळ्या गणोबाचं स्थान असतंच. त्याचं स्थान उजव्या हाताला असतं, हे तो या व्रताचा मूळ अधिकारी असल्याचं खरे लक्षण आहे. वास्तविक गणोबा गणपती दोन नाहीत. गणोबा ही व्रताची शास्त्रोक्त मूर्ती, तर मोठी मूर्ती आपल्या हौसेची. आजही गौरीपूजनादिवशी याच गणोबाला गौरीच्या पदरात ठेवला जातो. संचारी गौर अपत्यप्राप्तीचा अभिलाष असणाऱ्या स्त्रीच्या ओट्यात याच गणोबाला देते. तिच्या दृष्टीने जिला गणोबा खेळवता आला तिला आई होण्याचा सन्मान मिळाला, कारण गौरीचं हे अवखळ बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे फक्त गौरीलाच माहिती आहे. — असा हा काळा सावळा पण  जिव्हाळ्याचा लाडका गणोबा !

“ श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः “

माझं माहेर खानदेशातलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादे !! लग्न करून कोल्हापूरला आल्यावर गणेशचतुर्थीच्या २-३ दिवस आधीच * गणूबा घ्या ओ गनुबा… भावल्या घ्या हो भावल्या * अशी तार स्वरात हाक कानी पडली.. मला आश्चर्य वाटलं- ‘ अगंबाई गणपती असे दारावर विकायला येतात?’ सहज कुतुहल म्हणून  त्या बाईला बोलावलं आणि  पहिल्यांदाच या गनुबाचं– नव्हे गणोबाच दर्शन घेऊन झालं. कारण मला वाटतं महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर- सांगली भागातच *गणोबा” ची मूर्ती पूजण्याची पद्धत असावी. खूप मोठमोठ्या मूर्तींबरोबर तर गणोबा फुकट मिळतो म्हणे !! आणि तो गणोबा पण मोठ्या गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान होतो.. उत्सवमूर्ती होऊन !

आणि मग हा गणोबा गौराई पुत्र.. गौरीजागरणाच्या गाण्यातून अधिक बाळरूपात भेटला- गन्या गन्या गनेशा !! गणानं घुंगरू हरवलं…. किंवा गण्या हटून का बसला? — अशासारखी ती गाणी — खास “ गणोबा “  साठी म्हटली जाणारी.

© सुश्री ज्योत्स्ना डासाळकर

एडवोकेट

मो. नं. ९५१८७७८८२४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल हरतालिकेचा सण होता. हे दिवसच मुळी उत्साहाने सणवार साजरे करण्याचे. हरतालिका असूनही बँकेला सुट्टी नसल्याने घरचं आवरुन,पुजा ,नमस्कार,नैवेद्य आटोपून बँकेला निघाले. परंतु मस्त सणाचा दिवस असूनही समोरचे दृश्य बघून मनं खट्टू झालं, वाईट वाटलं,खरचं शिक्षणाने,प्रगतीने माणसात सुधारणा होण्याऐवजी तो अधिकाधिक बिघडतच चालला आहे हे समोरचे दृश्य बघून लगेच लक्षात आलं.

आमच्या काँलनीमध्ये बरीच झाडं आहे. त्यामध्ये फुलझाडांचा सुद्धा समावेश आहे. मग हरतालिकेच्या पूजेचे निमित्त करून काही स्त्रिया आणि मुली अक्षरशः पत्री आणि फुलं ह्यासाठी अख्खी झाडच्या झाडं ओरबाडीत होत्या. बर चार शब्द समजावण्याचा प्रयत्न केलाही असता जर त्या स्त्रिया काँलनीतील वा पाहणीतील असत्या तर. खरचं जिवंत झाडांना रक्तबंबाळ करून स्वतःवर फुलं,पत्री वाहून घेणं देवाला तरी आवडेल का हो ?

मी तरी स्वतः नियम घालून घेतला आहे फक्त एक बिल्वपत्र  आणि एक फूल सगळ्या पूजांच्या वेळी वहायचं.मला खात्री आहे माझा महादेव हा एकशे आठ बिल्वपत्रांपेक्षाही माझ्या एका बिल्वपत्रातच संतोष पावेल.

काळ बदलला की सुधारणा ह्या होतात. पण सुधारणा ह्या फक्त हक्क मागणं,बरोबरी करणं, अरेतुरे संबोधणं, न बघणेबल वस्त्र परिधान करणं, व्यसनांमध्ये पुरुषांच्या वरचढ होऊ बघणं, स्वातंत्र्याचा गैरवापराने वरचढ स्थान मिळवणं ह्या नसून आपल्या मानसिकते मध्ये चांगला,सकारात्मक बदल करणं,काळ बदलला की थोडाबहुत चांगला बदल करणं, स्वतःची सामाजिक उन्नती, उत्कर्ष ह्याकडे लक्ष देणं ह्याला सुधारणा म्हणावं हे समजायला हवं.  पण कुठल्याही व्यक्तीने बदलेल्या काळाचा, झालेल्या बदलांचा, सोयीस्कर सुधारणा हे लेबल वापरण्याचा जर आपल्या सोयीचा अर्थ लावून आपल्या सवयी सुरू ठेवल्या तर समाजाचा -हास,अनर्थ हा अटळ.

काही मुली म्हणतात हे पूजेला पत्री,फुलं तोडणं जुन्या पिढीकडूनच आम्ही शिकल़ो तर ह्यावर उत्तर असं, जुना काळच वेगळा, झाडांच्या रुपात तेव्हा विपुल नैसर्गिक संपत्ती होती, शिक्षणाचा अभाव होता, वेळेची मुबलकता होती आणि मुख्य म्हणजे ह्या निमित्ताने त्या स्त्रियांना चार भिंतीबाहेर पडायला मिळायचे.

उपवासांचे ही तसेच. पुर्वी मनावर धार्मिक रुढींचा खूप पगडा होता. अंधश्रद्धेच जाळं खूप फोफावलं असायचं, स्त्रिया स्वतःच्या प्रकृती विषयी काळजी न घेता त्याबद्दल अनास्था बाळगतं. साधकबाधक आहार, प्रकृती ह्या विषयी अज्ञान होतं .पण आता काळ बदललायं. स्त्रियांना शिक्षणामुळे आहार, प्रकृती ह्याविषयी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे आपल्या वयानुसार  प्रकृती ला, झेपतील त्या पद्धतीने उपवास करावेत.

ह्या सणांच्या निमित्ताने जपल्या जाणाऱ्या परंपरा व आधुनिक धार्मिकता ह्यामध्ये सांधून पण कुठलेही टोक न गाठता सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो ह्याचं भान आलं खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print