मराठी साहित्य – विविधा ☆ श्वानपुराण… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ श्वानपुराण… ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोकल हैं भाई! इधर के ही हैं!

अंधेरी रातों में..सुनसान राहोंपर कुणी मसीहा निकले ना निकले…पण या ठिकाणी खरे शहेनशाह असतात ती ही मंडळी!  (या वाक्यातील अंधेरीचा मुंबईतील अंधेरीशी काहीही संबंध नाही.) तर…ही मंडळी चतुष्पाद वर्गातील आणि केनाईन प्रकारातील असतात. आता कुणी केनाईन (म्हणजे फ्रेंच-इंग्लिश भाषेतील कुत्रा हा शब्द) ला K-9 असं समजू आणि लिहू शकत असेल तर त्याला आपण काय करणार?

लहानपणी तमाम बालकवर्ग यांना भूभू या संबोधनाने ओळखातो…पण हा भूभू जेंव्हा भोभो करीत मागे लागतो तेंव्हा बालकांची बोबडी वळते, हेही खरेच. पुल्लींगी कुत्रा म्हणजे एक कुत्रा. आणि स्त्रीलिंगी कुत्री. अनेकवचन कुत्रे असे असतात. पण अनेक कुत्री असा अर्थ प्रचलित आहे. फार वेगळ्या अर्थाने,विशेषत: महिला वर्गात ‘कुत्री’ हा एकवचनी अपशब्द वापरात आहे. परेश रावलांच्या तोंडी ‘कुत-या’ ही शिवी तर सिनेरसिकांना अत्यंत गोड लागते. खरं तर हिंदीवाले कुत्र्या हा शब्द कुतरीया असा उच्चारतात. असो.

श्वान मानवाच्या जवळ आले आणि अगदी घरचे झाले त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. इथे श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक असा विषय काढला तर खूपच लिहावे लागेल..म्हणून थांबतो. पण भटके कुत्रे हा एक अत्यंत गंभीर विषय म्हणावा लागेल….रात्री उशीरा घरी आणि तेही एकट्या-दुकट्याने (हो…दुचाकीवर दोघे असले तरी) परतणा-या वाटसरु लोकांना हा विषय पक्का माहीत आहे. भय इथले संपत नाही याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल.

कुत्रे धावत्या वाहनांचा, विशेषत: दुचाकी वाहनांचा पाठलाग का करीत असावेत, यावर खूप संशोधन झालेले आहे. दुचाकी,हलकी वाहने(कार,रिक्षा इ.) आणि नंतर अवजड वाहने असा श्वानांचा पसंतीक्रम असतो, हेही निरीक्षण आहे.

कुत्रे दुचाकीच्या मागे लागले आहेत…आणि दुचाकीस्वाराच्या पोटरीचा लचका तोडला आहे, असे फार क्वचित झालेले असावे…आणि झालेच असेल तर त्याचे कारणही निराळेच असावे! कार चालक मात्र या चाव्यातून बचावतात…कारण ते आत सुरक्षित असतात. दुचाकीचालक जखमी होतात ते घाबरून वाहन दामटताना वाहन घसरल्यामुळे किंवा कुठेतरी धडकून. वाहन एका जागी स्थिर थांबले की कुत्रेही थांबतात आणि काहीच सेकंदात शांत होऊन निघून जातात, असा अनुभव आहे. इराक मध्ये अमेरिकी सैन्य घुसले आणि तिथे काहीच न सापडल्याने गोंधळून गेले होते. यावर ताईम्स ऑफ इंडिया मधल्या एका स्तंभात जग सूर्या नावाने लिहिणा-या लेखकाने इराक म्हणजे धावती कार..तिच्यामागे धावणारे अमेरिकी सैन्य…थांबलेली कार आणि आता करायचे नक्की काय? अशा संभ्रमात पडून जागच्या जागी थांबलेले कुत्रे असे चित्र शब्दांनी रंगवले होते. हो…या स्तंभ शब्दावरून आठवले….कुत्रे आणि खांब यांचा खूप निकटचा संबंध आहे. पण खूप बारीक पाहिलं तर कुत्र्यांना खांबच पाहिजे असतो, असे नाही. उभ्या असलेल्या कोणत्याही वस्तूवर हे प्राणीमित्र आपला ठसा उमटवू शकतात. कारण त्यांचे साध्य ठरलेले आहे..साधन नव्हे!

सर्वच हिंस्र श्वापदं आपला आपला इलाखा निश्चित करण्याच्या बाबतीत खूप सतर्क असतात. आता या सीमारेषा ठरवायच्या कशा? यावर त्यांनी एक अत्यंत सोपा उपाय शोधून काढला आहे…अनादी कालापासून. लघुशंका! इथे लघु म्हणजे अत्यंत थोडे असा अर्थ घेण्यास हरकत नाही. एन.जी.सी.,डिस्कवरी वाहिन्यांच्या कृपेने सामान्य लोकांना फक्त चित्रे,प्राणीसंग्रहालये यांतून पहावे लागणारे प्राणी घरबसल्या पाहण्याची सोय झाली. त्यातून मग प्राण्यांची इत्यंभूत माहिती दिसू लागली…(बिचा-या प्राण्यांच्या खाजगी जीवनाचा भंग मात्र पदोपदी होतानाही दिसू लागला!)

वाघ,सिंह आपल्या सीमा कोणत्या आहेत,हे इतरांना सहज समजावे म्हणून परिसरातील झाडांवर आपल्या मूत्राचा अगदी मोजक्या प्रमाणातील फवारा मारताना आपण पाहिले असेल. म्हणजे संबंधित जागा मालक जवळपास नसतानाही आगंतुकास सहज समजावे की Tresspassers will be prosecuted! आणि तरीही कुणी घुसलाच तर त्याचं काही खरं नसतं..हे समस्त प्राणीजगत जाणून असते. बरं, हे  marking करताना ज्याच्या साठी ह्या खाणाखुणा पेरलेल्या असतात त्याला सहज गंध मिळेल याचीही काळजी घेतली जाते…नाहीतर आपले सरकारी फलक…वाहन उभे करून झाल्यावरच समजते की आजतर P-2. आणि तोपर्यंत इटुकली पिटुकली पावती फाडून झालेली असते.

दुस-या प्राण्याच्या नाकासमोर ही खूण असेल, त्याला ती सहज हुंगता यावी, अशाच उंचीवर ही फवारणी अचूक केली जाते. आता, आपले कुत्रे जरी आपल्या आश्रयाने रहात असले तरी त्यांनी आपापसात आपले जागावाटप निश्चित करून घेतलेले असते. त्यांची वार्डरचना अगदी अचूक असते. बाहेरचा कुणी आला की त्याला सीमेच्या पलीकडे पिटाळून लावणे एवढंच काम सर्व मिळून करतात. बाकी संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न जास्त असतो. म्हणून कुत्रे विजेच्या खांबावर विशिष्ट उंचीवरच खूण करून जातात. दुस-या कुत्र्याला उभ्याउभ्याच  (अर्थात आडव्या आडव्याच) तो वास हुंगता यावा आणि तिथून मुकाट पुढे निघून जाता यावं) गोष्टी लक्षात याव्यात,अशी योजना असते. आता खांब कमी असतील आणि परिसर मोठा असेल तर मग कुत्रे अन्य मार्ग शोधतात. दुचाकी,मोटारी यांचे टायर्स अगदी सोयीचे ठरतात. रबरावरील खुणा लवकर मिटत नाहीत…यासाठीच टायर long lasting म्हणवले जात असावते! म्हणून कुत्रे याच वस्तूवर टांग वर करतात! बाहेरून आलेला कुत्रा अगदी सहज ह्या पाट्या पाहतो…आणि शारीरिक ताकद मर्यादित असेल तर पुढील मार्गावर निघून जातो..शेपूट योग्य त्या ठिकाणी लपवून.

आता आपण जर आपली ही गंधीत दुचाकी घेऊन निघालो आहोत…आणि हा गंध भलत्याच श्वानांचा असेल तर आपण ज्या गल्लीतून जातो निघालो आहोत त्या गल्लीतील बाहु(दंत)बली सभासद लोकांना आक्षेप असणं साहजिकच नव्हे काय? हे लोक दुचाकी,कारच्या नव्हे तर त्यांच्या टायर्स वरील शत्रूपक्षाच्या सुकलेल्या खुणांचा मागोवा घेत धावत असतात..आणि आपल्याला वाटतं की ते आपल्या मागे धावताहेत! असं घडत असताना (दुचाकीवरील) व्यक्तींनी आपलेही पाय थोडे वर उचलून धरले आणि सरळ रेषेत मार्गाक्रमण करीत राहिले तर काम होते…ते पहारेकरी त्यांच्या सीमा ओलांडून पुढे येत नाहीत..उलट मागून येणा-या दुस-या  वाहनांच्या मागावर…नव्हे वासावर राहतात…त्यांचे आपले वैय्यक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही!

पण आपण नेहमीच त्यांच्या मार्गातून ये जा करीत असू, आणि ती ही रात्री…तर काही दिवसांनी हे ड्युटीवर असलेले पहारेकरी आपल्या ओळखीचेही होऊ शकतात. त्यांना अधोन्मधून चापानी देत गेलं की तर मग आपली  साधी तपासणीही होत नाही. पण एखादेवेळी पहारेकरी बदलला गेला आहे आणि आपल्याला ते ठावे नाही, तर अशावेळी अतिआत्मविश्वास नडू शकतो.  

एवढं सगळं असलं तरी भीतीही वाटतेच. यावर उपाय म्हणून काही लोक मार्ग बदलतात. पण असे मार्ग नसतातच मुळात. दाट मनुष्यवस्ती ,गर्दी किती आहे! यावर एक गमतीशीर उपाय सांगणारा एक विडीओ सध्या खूप बघितला जातो आहे…काही लोक रात्री दुचाकीवरून गल्लीत घुसले आहेत…..अर्थात जागरूक कुत्रे त्यांच्या मागे धावाताहेत…दुचाकीवरील लोक ओरडून म्हणताहेत…लोकल ही भाई…इधर के ही हैं….(आम्ही इथलेच आहोत भावांनो! स्थानिक निवासी आहोत…!) आणि हे ऐकून ते कुत्रे आपले आक्रमण रहित करतातही…असे दिसते!) टोल नाक्यावर साधारण असा संवाद ऐकू येत असतो..पण हा मोकाट टोळश्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी वापरलेला फंडा मात्र अजब आणि मनोरंजन करणारा आहे. मात्र ही सबब सर्वच कुत्र्यांना समजेल असे नाही! त्यामुळे सावधान! आणि हो…शक्य झाल्यास वरचेवर वाहनांचे टायर्स पाण्याने स्वच्छ करीत जावे, हे उत्तम! 

 (या लेखात एकट्या मुलाला, व्यक्तीला गाठून त्याचा चावे घेऊन जीव घेणा-या कुत्र्यांचा विचार केलेला नाही! हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दिल्लीत एका व्यक्तीचा मोकाट कुत्र्यांनी जीव घेतल्याची घटना ताजी आहे!)

(सहजच आपली गंमत! संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ ‘पानशेत’ नंतर… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

१२ जुलै १९६१. पानशेत धरण फुटलं. नदीकाठच्या पेठा वाहून गेल्या. संसार उध्वस्त झाले. वाडे पडले. घरं वाहून गेली. माणसं गेली, पैसाआडका गेला, दागिने वाहून गेले, पुण्याचं होत्याचं नव्हतं झालं.

त्याआधीचं पुणं वेगळं होतं. पुण्यात गुरांचे गोठे होते. बरेच बोळ होते. रस्त्यांवर फारसा प्रकाश नसे. घोड्यांच्या पागा होत्या, टांगे होते, बग्ग्या होत्या. खूप साऱ्या सायकली होत्या. घरोघरी चुली होत्या, शेगड्या होत्या, कोळशाच्या वखारी होत्या. कंदील होते. पलंग होते. खाटा होत्या. हौद होते…

पहाटे पिंगळे यायचे, सकाळी वासुदेव यायचे. दुपारी डोंबारी आणि दगडफोडे आपापला खेळ करून पैसे मागायचे. खोकड्यातला सिनेमा यायचा. मुलं त्याला डोळा लावून ‘शिणूमा’ बघायची. माकडाचे खेळ यायचे. नागसापवाले गारूडी यायचे. डोंबारी दोरीवरून चालायचे. ‘जमूरे’ चादरीत लपून गायब व्हायचे.

पुणं पहाटेचंच उठायचं. पूजाअर्चा चालायच्या. खूप मंदिरं होती. त्यात घंटानाद व्हायचे. धूपदीपांचा सुगंध दरवळायचा. आरती नैवेद्य व्हायचे. व्रतवैकल्यं असायची. सण जोरात साजरे व्हायचे. त्यात धार्मिकता ठासून भरलेली असे. अगदी पाडव्यापासून सुरू होऊन, वटसावित्री, श्रावण, मंगळागौरी, नारळीपौर्णीमा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी, रथसप्तमी, होळीपर्यंत सण उत्साहात साजरे होत. गणपतीत वाड्यावाड्यात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत. गणपती चौकात सतरंज्या टाकून लोक गजानन वाटव्यांची गाणी ऐकत. घरोघरी धार्मिकतेनं गणपती बसे. सत्यनारायण वगैरेही जोरात होई. घरोघरी नवरात्र बसे. वाड्यावाड्यात भोंडले होत. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा…’ ऐकू येई. अनेक बायकांच्या अंगात देवी येई. दिवाळीत घरोघरी फराळाचे पदार्थ बनत. मुलं किल्ले करत. मुली रांगोळ्या काढत. वर्षभर सणसमारंभ चालत.

त्याकाळी बरेच पुरुष धोतर नेसत. बायका नऊवारी साडी नेसत. पाचवारी साडी अजून रूळायची होती. बालगंधर्व बायकांचे आवडते होते. त्यांचे हावभाव, साडी नेसणं याची बायका नक्कल करत. ‘असा बालगंधर्व पुन्हा न होणे…’ हे सर्वमान्य होतं.

मुलं पतंग उडवत, विट्टीदांडू खेळत. आट्यापाट्या, लगोरी, सूरपारंब्या वगैरे मुलांचे आवडते खेळ होते. मुली सागरगोटे, बिट्ट्या वगैरे खेळत. भातुकली हा मुलींचा आवडीचा खेळ होता. मुलं चड्ड्या घालत. मुली परकर पोलकं घालत. बायका अंबाडा घालत. त्यात एक फूल खोचत. ठसठशीत कुंकू लावत. मंगळसूत्र घालत. मुली कानात डूल घालत. काही मुलं शेंडी ठेवत.

पानशेत पुरामुळेच पुण्याचं रूप पालटलं. मुकुंदनगर, महर्षीनगर, सहकारनगर, दत्तवाडी, पानमळा असे अनेक नवीन भाग उदयाला आले. वाड्यांच्या पुण्यात बंगल्यांची एंट्री झाली. तिथून पुणं वाढायला सुरुवात झाली. पेठांमध्ये वसलेलं पुणं, ही पुण्याची ओळख पुसून नवीन पुढारलेलं पुणं दिसू लागलं. जसं ते रहाणीमानात बदललं, तसं ते आचारविचार आणि संस्कृतीतही बदलू लागलं. कर्मठ पुण्याचं आता प्रगतीशील पुण्यात रुपांतर होऊ लागलं. संस्कृती, आचारविचार, रुढी, परंपरा या मागासलेपणाचं निदर्शक मानल्या जाऊ लागल्या. साठच्या दशकात संसाराला लागलेल्या पिढीची तारेवरची कसरात झाली. रुढी परंपरांवर त्यांच्या आईवडिलांच्या दबावामुळे असलेला अर्धवट विश्वास आणि आभासी प्रागतिक विचारांचं सुप्त आकर्षण यात त्यांची कुतरओढ झाली. म्हणून ते आपल्या मुलांवर कुठलेच संस्कार नीट करू शकले नाहीत. कर्मठपणावरून त्यांचा विश्वास  उडाला होता आणि नवीन, प्रागतिक विचार पचवायला ते असमर्थ होते.

या दरम्यान पुणं वाढतच होतं. साठच्या दशकात जन्माला आलेली नवीन पिढी मोठी होत होती. धार्मिकता, कट्टरता यावर आपल्या आईवडिलांचा डळमळीत झालेला विश्वास त्यांना जाणवत होता. ही पिढी प्रागतिक विचार बोलू लागली होती. त्यांच्या या विचारांपुढे त्यांचे आईवडील हतबल झालेसे वाटत होते. आईवडीलांच्या पिढीत आईवडील मोठे असत. मुलं त्यांच मनोभावे ऐकत असत. पुढच्या पिढीत आईवडील मुलांच्या प्रागतिकतेनं मंत्रमुग्ध झाल्यानं आईवडील मुलांचं ऐकू लागले.

नव्वदच्या दशकात पुढची पिढी आली. तिच्या आईवडिलांवरच पुरेसे संस्कार झालेले नव्हते. तिच्यावर कसलेच संस्कार करायला तिच्या आईवडिलांना वेळ नव्हता. वेळही नव्हता आणि माहितीही नव्हती. आजी आजोबा ही स्थानं संपली होती. गोष्टी सांगणारी आजी लुप्त झाली होती. ‘ममा, पप्पां’ना गोष्टी सांगता येत नाहीत. त्यांना तेवढा वेळही नाही. त्यात टीव्ही घरात आले. आजीपासून नातवापर्यंत सगळे निरनिराळ्या सिरीयल्समध्ये अडकले. त्यात ‘डिस्टर्ब’ नको, म्हणून आईबापांनीं मुलांच्या हातात मोबाईल दिला. त्यानं ती व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेली. बहुतेकसे आईवडील एकपुत्र असल्यानं मुलांना बोलायला घाबरू लागले. आपल्या मास्तरांनी मारलेल्या छड्यांचे वळ अभिमानाने मिरवणारे आईबाप मुलांच्या अंगावर हात टाकायला बिचकू लागले. मुलांच्याही ते लक्षात आले. ती अवास्तव मागण्या करू लागली. त्यांचे हट्ट पुरवले जाऊ लागले. आजीआजोबा किंवा आईवडीलांचा  ‘धाक’ संपला. धाक हा शब्द डिक्शनरीत जाऊन पडला. शिक्षकांनी मुलांना मारणं गुन्हा ठरू लागला. मारलं तर मुलं आत्महत्या करू लागली. शिक्षकांना जेल होऊ लागली. मुलांवरचा धाक संपला!

त्यात आय.टी. इंडस्ट्री पुण्यात आली. जो तो आयटीत पळू लागला. त्यांना अवाच्यासवा पगार मिळू लागले. त्यातल्या प्रत्येकानं दोनदोन चारचार फ्लॅट्स विकत घेतले. त्यानं पुणं अजूनच विस्तारलं. पुण्याची राक्षसी वाढ होऊ लागली. खराडी, वाकड, धानोरी, अशी अनेक पूर्वी कधी पुण्यात न ऐकलेली नावं सर्रास ऐकू येऊ लागली. पेठेत रहाणारी लोकं आपापली घरं व्यापाऱ्यांना विकून तिकडे रहायला जाऊ लागली. आयटी क्षेत्रानं पुण्याची संस्कृती अजून रसातळाला गेली. आजचं आणि आत्ताचं पहा, आम्हाला कोणी मोठे नाहीत. अगदी आईवडील सुद्धा नाहीत. त्यांना असा कितीसा पगार होता. आत्ताच आम्ही त्यांच्या दसपट कमावतो, असा गंड मनात मूळ धरू लागला. मुली सर्रास दारू पिऊ लागल्या. रस्त्यावर सिगारेटी पिऊ लागल्या. वीतभर चड्ड्या घालून रस्त्यावरून फिरू लागल्या. लग्न करायची गरज कमी होऊ लागली. ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ नावाचा नवीन विचार पुढे आला. आईवडील अधिकच हतबल होऊन पहात राहिले. अनेक कुटुंबं आयटीमधल्या मुलींच्या पैशावर पोसली जात असल्यानं, आईवडील मुलींना काही बोलू शकत नव्हते. आता पुणं, आयटी पुणं झालं होतं. जागांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. खूप हॉटेलं झाली होती. अनेकांच्या घरी स्वयंपाक बनत नव्हता. बाहेरचं खाण्याची संस्कृती रुजत चालली होती. दारू फारच सामान्य झाली होती. ड्रग्जचे नवनवीन प्रकार येत होते. एकमेकांच्या संगतीनं नवी पिढी त्यात ओढली जात होती.

आयटी बरोबर परप्रांतीयही पुण्यात खूप आले. त्यांनी त्यांची संस्कृती पुण्यात मिसळली. रंगपंचमी बंद होऊन पुण्यात धुळवड जोरात खेळली जाऊ लागली. प्रचंड पैसा घेऊन पुण्यात शिकायला आणि नोकरीला आलेल्यांनी नीतिमत्ता पूर्णपणे धाब्यावर बसवली. पुण्यात बुद्धिमत्ता कमी झाली आणि पैसा बोलू लागला.

या आयटीयन्स् मुळे जागांना प्रचंड भाव आले. पुण्याभोवतालचे शेतकरी शेती बंद करून ‘स्कीमा’ करू लागले. बिल्डर बनू लागले. ‘गुंठामंत्री’ नावाची एक नवीन जमात उदयाला आली.

साठ वर्षांत पुणं आता पूर्णपणे बदललं आहे. ब्राम्हणी पुणं तर केव्हाच लोप पावलंय.  सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक अशी पुण्याची ओळख पुसली गेली आहे. पुरणावरणाच्या पुण्यात, सदाशिव पेठेत मटण आणि बिर्याणीची दुकानं दाटी करू लागली आहेत.

आता पुण्यात फारसे वाडे शिल्लक नाहीत. सकाळी वासुदेव येत नाही. दगडफोडे, डोंबारी, भुते, ‘जग्ग’ डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या बायका, कुडमुडे, पोपटवाले ज्योतिषी, ‘जमूरे’ वाले नाहीसे झालेत. नदीचं आता गटार झालंय. पानशेतफुटीपूर्वी ओंकारेश्वराजवळ सुद्धा नदीचं पाणी पिता यायचं. आता त्यात पाय घालायचीही किळस येते. पानशेत फुटीनंतर पुणं बदललं, वाढलं, विस्तारलं. पण जे रूप बदललं, ते पुणं नाही राहिलं. ते बौद्धिक, तात्विक, विचारवंतांचं, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं पानशेतच्या पुरात वाहून गेलं. उरलं आणि वाढलं ते पुणं नाहीये, एक अक्राळविक्राळ संस्कृतीहीन, चेहेरा नसलेलं, मुंबईच्या पावलावर पाऊल टाकायला निघालेलं एक चेहेराहीन, पानशेतफुटीनं  बकाल केलेलं गर्दीचं एक शहर!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – माझे बाबा ‘तो’ आणि मी यांच्यातला एक दुवा आहेत असं पूर्वी वाटायचं. ते गेले आणि तो दुवा निखळला याची रुखरुख पुढे बरेच दिवस मनात होती.पण ‘त्या’नेच मला सावरलं. तो दुवा निखळल्यानंतर ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर खरंतर वाढायला हवं होतं पण तसं झालं नाही.ते दिवसेंदिवस कमीच होत गेलं.)

आज मला जाणवतं ते असं की माझ्या अजाण वयापासूनच सभोवतालच्या आणि विशेषतः घरच्या वातावरणामुळे श्रद्धेचं बीजारोपण माझ्या मनोभूमीत झालंच होतं. नंतरच्या अनेक अघटीत घटना, प्रसंग यांच्या खतपाण्यामुळे ते बी रुजलं,अंकुरलं आणि फोफावलं. त्या श्रद्धेबरोबरच आई-बाबांनी त्यांचे अविरत कष्ट, प्रतिकूल परिस्थितीतही जपलेला प्रामाणिकपणा, सह्रदयता आणि माणुसकी यासारख्या मूल्यांचे संस्कार स्वतःच्या आचरणांनी आम्हा मुलांवर केले होतेच. त्यामुळे मनातल्या श्रद्धेतला निखळपणा सदैव तसाच रहाण्यास मदत झाली. ती श्रद्धा रुजता-वाढताना कधी कणभरही अंधश्रद्धेकडे झुकली नाही.अनेक अडचणी, संकटांच्यावेळीही ‘त्या’च्याकडे कधी ‘याचक’ बनून पहावंसं वाटलं नाही. त्या त्या प्रत्येक वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना ‘तो’ फक्त एक साक्षीदार म्हणून सदैव माझ्या मनात उभा असायचा. ‘कृपादृष्टी असू दे’ एवढीच मनोमन एकच प्रार्थना ‘त्या’च्या चरणी असे. त्यामुळे स्वतःची अंगभूत कर्तव्यं निष्ठेने आणि मनापासून पार पाडण्याकडेच कल कायम राहिला. नित्यनेमाचे रूपांतर त्यामुळेच असेल कर्मकांडात कधीच झाले नाही. तसे कधी घडू पहातेय अशी वेळ यायची तेव्हा या ना त्या निमित्ताने मी सावरलो जायचो. मग आत्मपरीक्षणाने स्वतःच स्वतः ला सावरायची सवय जशी अंगवळणी पडली तसा मी ‘त्या’च्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. ‘तो’ आणि मी यांच्यातलं अंतर कमी होत जाण्याचे हे एक ‘प्रोसेस’ होते!

आणि मग वेळ आली ती माझ्या कसोटीची. पण त्यालाही माझे बाबा १९७३ साली गेल्यानंतर दहा वर्षांचा काळ उलटून जावा लागला!

बाबा नेहमी म्हणायचे, “दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळे ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकाला जमत नाही.करवून घेणारा ‘तो’च ही भावना हवी.एकदा निश्चय केला कि  मग त्यापासून परावृत्त करणारेच प्रसंग समोर येत रहातात.तेच आपल्या कसोटीचे क्षण.जे त्या कसोटीला खरे उतरतात तेच तरतात….! “

‘तो’ आपली कसोटी पहात असतो म्हणजे नेमकं काय? आणि त्या कसोटीला ‘खरं’ उतरणं म्हणजे तरी काय? याचा अर्थ समजून सांगणारा अनुभव मला लगेचच आला.

तो दत्तसेवेच्या वाटेवरचं पुढचं पाऊल टाकण्याचा एक क्षण होता. घडलं ते सगळं  अगदी सहज घडावं असं.

यापूर्वी उल्लेख केल्यानुसार १९५९ साली कुरुंदवाड सोडून किर्लोस्करवाडीला जायची वेळ आली तेव्हा आईने दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दर्शनाला येण्याचं व्रत स्वीकारलं होतं. ते व्रत जवळजवळ दोन तपं अखंड सुरु होतं. आई वय झालं तरी ते व्रत बाबा गेल्यानंतरही श्वासासारखं जपत आली होती.

माझे बँकेतले कामाचे व्याप, जबाबदाऱ्या, दडपणं हे सगळं दिवसेंदिवस वाढत होतंच. त्यामुळे रोजची देवपूजा आणि गुरुचरित्राचं नित्य-वाचन एवढाच माझा नित्यनेम असायचा.

नोव्हेंबर १९८३ मधल्या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई नृसिंहवाडीला गेली आणि अचानक माझी मावस बहिण सासरच्या कार्यासाठी या भागात आली होती आणि माझ्या आईला  भेटून जावं म्हणून आमच्या घरी  आली. थोडा वेळ बसून बोलून मग पुढे पुण्याला जायचं असं तिनं ठरवलं होतं.आई यायची वेळ होत  आली होतीच म्हणून तिची वाट पहात ती  थोडा वेळ थांबली होती.

मी नुकताच बँकेतून येऊन हातपाय धुवत होतो तेवढ्यात आई आली. त्यामुळे दार उघडायला तीच पुढे झाली. आमच्या मुख्यदारापर्यंतच्या तीन पायऱ्या चढतानाही आई खूप थकल्यामुळे गुडघ्यावर हात ठेवून सावकाश चढतेय आणि बहिण तिला हाताचा आधार देऊन आत आणतेय हे मी लांबून पाहिलं आणि कपडे बदलून मी बाहेर जाणार तोवर बहिणीने तिला खुर्ची देऊन भांडंभर पाणीही नेऊन दिलं होतं.

“किती दम लागलाय तुला. आता पुरे झालं हं. अगदी देवधर्म आणि नेम झाला तरी शरीर स्वास्थ्यापेक्षा तो महत्त्वाचा आहे कां सांग बघू. खूप वर्ष सेवा केलीस.आता तब्येत सांभाळून रहायचं” बहिण तिला पोटतिडकीने सांगत होती. दोघींचा संवाद अगदी सहज माझ्या कानावर पडत होता.

“सवयीचं झालंय ग आता.नाही त्रास होत.जमेल तेवढे दिवस जायचं. नंतर आराम आहेच की. त्याच्या कृपेनंच तर सगळं मार्गी लागलंय. मग घरच्या कुणी एकानं तरी जायला हवंच ना गं? प्रत्येकाला त्यांचे त्यांचे व्याप आहेतच ना? इथं मी रिकामीच असते म्हणून मी जाते एवढंच” आई म्हणाली.

आईनं आजपर्यत हक्कानं, अधिकारानं आम्हा कुणावर कधीच काही लादलं नव्हतं. आज मावस बहिण आल्याचं निमित्त झालं म्हणून आईच्या मनाच्या तळातलं मला नेमकं समजलं तरी. आई आता थकलीय. घरातल्या कुणीतरी एकानं जायला हवंच तर मग ते मीच हे ओघानंच आलं. कारण तेव्हा माझा मोठा भाऊ बदली होऊन नागपूरला गेला होता. लहान भाऊ अजून शिकत होता. प्रवासाची दगदग आता यापुढे आईला जमणार नाही हे या प्रसंगामुळे मला तीव्रतेने जाणवलं होतं आणि आईचं ते व्रत आता यापुढे आपण सुरु ठेवायचं आणि त्यातून तिला मोकळं करायचं हे त्याचक्षणी मी मनोमन ठरवून टाकलं. त्यानंतरची डिसेंबर १९८३ ची पौर्णिमा दत्तजयंतीची होती.

या पौर्णिमेला नेहमीप्रमाणे आई सकाळीच नृ.वाडीला गेलेली.त्या संध्याकाळी मी बँकेतून परस्परच वाडीला गेलो. दत्तदर्शन घेतलं. हात जोडून मनोमन प्रार्थना केली ,

‘दर पौर्णिमेला निदान एक तप नित्यनेमाने आपल्या दर्शनासाठी येण्याची माझी मनापासून इच्छा आहे. आपला कृपालोभ असू दे. हातून सेवा घडू दे.” अलगद डोळे उघडले तेव्हा आत्यंतिक समाधानाने मन भरून गेलं होतं. अंत:प्रेरणेने पडलेलं दत्तसेवेच्या वाटेवरचं हे माझं पुढचं पाऊल होतं.

घरी हे आईला सांगितलं.आता यापुढे खूप दगदग करून,ओढ करुन तू अट्टाहासानं नको जाऊस.मी जात जाईन असंही म्हटलं.सगळं ऐकून आई एकदम गंभीरच झाली.

“माझ्याशी आधी बोलायचंस तरी..” ती म्हणाली.

” का बरं?असं का म्हणतेस?”

“उद्या तुझी कुठे लांब बदली झाली तर? कशाला उगीच शब्दात अडकलास?”

“नकळत का होईना अडकलोय खरा” मी हसून म्हटलं. ” तू नेहमी म्हणतेस ना, तसंच. सुरुवात तर केलीय. होईल तितके दिवस जाईन. पुढचं पुढं”

आईशी बोलताना मी हे हसत हसत बोललो खरं पण तिच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.

खरंच. देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्स्फरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण थोडेच या परिसरात रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?”

या जरतरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोलाज… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? विविधा ?

☆ कोलाज ☆ श्री सतीश मोघे 

शाळेत’ कार्यानुभव’ हा विषय होता. त्यात कधीतरी  तुकड्या तुकड्यांचा कोलाज घरून करून आणणे, असा गृहपाठ असायचा. रंगबिरंगी घोटीव पेपर आणून ते कापायचे आणि हवे तसे चिकटवायचे. चिकटवतांना ठाऊक नसायचं की पूर्ण झाल्यावर कसे दिसेल ? वर्गात सर्वांचे कोलाज पाहिल्यावर कळायचे की आपल्याच रंगाचे कागद वापरून एखाद्याने फारच सुंदर ते केले असायचे. रंगसंगतीची जाण आणि तुकडा योग्य ठिकाणी लावणं या दोन गोष्टी कोलाज सुंदर करतात, हे समजायचं. आपण हा तुकडा इथे, तो तिथे लावायला हवा होता असं वाटायचं. हे कोलाज करायाचेच काम आयुष्यभर करायचे आहे, हे तेव्हा ठावूक नव्हतं.

दोन जीवांच्या कोलाजमधून एक नवीनच जीवाचा तुकडा जन्माला येतो. तो जन्माला आला की आईचं मातृत्वाचं कोलाज चित्र पूर्णत्वाला जातं. वयाची चार-पाच वर्ष हा ‘दिल का टुकडा’ आईचंच कोलाज विश्व आपलं समजत असतो. हळूहळू स्वतःच कोलाज तो तयार करायला सुरुवात करतो.

ही कोलाज करण्याची क्रिया अखरेच्या श्वासापर्यंत सुरुच असते.

शक्य असतील त्या वस्तू घेऊन आपण आपला संसाराच्या कोलाजचा सांगाडा उभा करतो आणि आयुष्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या भावछटांसह त्यात ठेऊन संसाराचे हे  कोलाज रंगीत करत असतो.

मनुष्य हाच मुळात एकसंध नाही, त्याचं आयुष्य एकसंध नाही.. तेही  तुकड्या तुकड्याचे…तुकडे तुकडे एकत्र येऊन तयार होणारे कोलाज. पुन्हा आयुष्यातले तुकडेही बदलणारे… बालपणाचे मित्र, कॉलेजचे मित्र, आताचे मित्र, बदलणारे. नातंवाईक, त्यांचे प्रेमसंबंध बदलणारे. कुणाला आपण नकोसे तर कुणी आपल्याला नकोसे. हवीहवीशी व्यक्ती कायम सोबत राहीलच याचीही शाश्वती नाही. या सर्व परिस्थितीत हाती जे जे आहे त्याचे सुंदर कोलाज करून त्याचा आनंद घेणं, हेच कौशल्य आहे.

अनुभव घेणारं मन, त्याला अनुभवापर्यंत नेणारा देह आणि या मन आणि देहाला विवेकाने हाकणारी बुद्धी या तिन्ही गोष्टी जागेवर शाबूत असल्या की, त्या त्या वेळी असणाऱ्या तुकडयांची जागा (Placement) योग्य ठरविली जाते. कोणाला किती महत्व दयायचं, कोणाला केंद्रस्थानी ठेवायचं, कोणाला कोणाजवळ ठेवायचं हे हळूहळू कळतं, हळूहळू आत्मसाद होतं.

काही तुकडे असे वाटतात की डोळे मिटून कुठेही ठेवा, शोभून दिसतात, आनंद देतात,असे वाटते. काही मात्र कुठेच मॅच होत नसतांनाही ठेवावे लागतात,असे वाटते.हा सगळा त्या तुकड्यांना असणारा वरवरचा रंग पाहून आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भावनेचा खेळ आहे,

ही भावनाच सकारात्मक आणि निर्मोही झाली की या कोलाजचा खरा आनंद मिळतो. समोरच्या तुकड्याने आपले केलेले ‘दिल के टुकडे’ आठवायचे की त्यांने आपल्याला कधीकाळी दिलेला  भरपुर आनंद आठवायचा ? हाच खरा प्रश्न आहे.

आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक तुकड्याला आणि आपल्यालाही एक काळी बाजू असते आणि एक रंगीत बाजू असते.रंगीत बाजू सन्मुख,डोळ्यासमोर ठेऊन कोलाज केले तरच ते सुंदर होते…सुंदर दिसते.

आयुष्याचा कोलाज म्हणजे  जोडलेल्या तुकड्यांच्या रंगीत भावछटांचा तुकड्या तुकड्यांनी घेतलेला आनंद. त्या तुकड्यांना एकसंध करून त्यात  फार गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्नही करू नये. सर्वसंगपरित्याग करून आत्म्याच्या भेटीसाठी तपसाधना करणाच्या संत‌ सत्पुरुषांची जीवने सोडली तर आपणा सर्वांची जीवने निरर्थकच. तेव्‍हा त्यात अर्थ शोधून बुद्धी झिजवा कशाला!      एका प्रसिद्ध चित्रकाराला, “त्याने काढलेल्या ॲबस्ट्रॅक्ट चित्रात काय अर्थ आहे?” असे विचारले. तो उत्तरला “या चित्रात अर्थ शोधायचा नसतो. त्यातल्‍या वेगवेगळ्या दिसणाऱ्या आकृती आणि विविध

रंगछटा केवळ भोगायच्या असतात.. त्यांचा आनंद घ्यायचा असतो.” आपलेही जीवनाचे कोलाज असेच ॲबस्ट्रॅक्ट.त्यात अर्थ न शोधता रंगांचा फक्त आनंद घ्यायचा.

हे कोलाज म्हणजे विविध व्यक्ती,त्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा-भावछटांचे,स्वभाव छटांचे.. तुकड्या- तुकडयांचे जोडकाम. त्यातल्या त्यात सकारात्मक, आपल्याला भावतील, आनंद देतील असे तुकडे हाताशी घ्यावेत. त्यांच्या दोषांची  काळी बाजू

नजरेआड करून गुणांची रंगीत बाजू सन्मुख करावी. आपली समज आणि कौशल्य यानुसार ते हृदयात किंवा हृदयापासून हव्या तेवढ्या अंतरावर ठेवावेत आणि रंगीत कोलाजचा घेता येईल तेव्हढा आनंद घ्यावा, हेच बरे.

अर्थात हे करताना कागदाचे कोलाज आणि आयुष्याचे कोलाज यातला एक मुख्य फरक समजून घेतला पाहिजे.कागदाच्या कोलाजचे तुकडे एकदा चिकटले की चिकटले. त्यांना कागदाला,एकमेकांना सोडून जायचे स्वातंत्र्य नाही. पण माणसाच्या जीवनातील कोलाज मधील माणसे (तुकडे) मात्र सोडून जाऊ शकतात.  कधी त्यांच्या इच्छेने तर कधी नाईलाजाने.  या कोलाजमधले आजूबाजूचे तुकडे सोडून गेले तर फारसा फरक पडत नाही. पण मधलेच..केंद्रस्थानी असलेले,हृदयातले तुकडे सोडून गेले तर मात्र कठीण होते. संपूर्ण कोलाजची पुन्हा नवीन मांडणी करावी लागते… नवीन तुकड्यांना सोबत घेऊन… आयुष्य आहेच असे की, हा जुन्या-नवीनचा खेळ अव्याहत  सुरूच असतो.अशावेळी असे का घडले? याचा विचार करून बुद्धी शिणवण्यापेक्षा आहे त्या तुकड्यांची पुनर्मांडणी करून नव्या उत्साहाने त्याच्या रंगाचा, भावछटांचा आनंद घेणं ज्याला जमलं त्याला प्रत्येक क्षणी हे कोलाज,त्यातल्या व्यक्ती आनंद देतात,आवडतात.तुकड्या तुकड्यांच्या  खंडप्राय आयुष्यात आनंद मात्र अखंड,एकसंध राहतो.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मिरगाने होणाऱ्या जेष्ठातल्या पेरण्यांची धांदल संपते न संपते आषाढाचे काळेभोर मेघ चोहोबाजूनी गर्दी करू लागतात. सावळे सावळे जलद पाळणारे कधी एकाच ठिकाणी हट्टी बाळासारखे थांबणारे ढग मनात वेगळीच हुरहूर उठवत राहतात.काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते उगीचच त्या पाण्याने गच्च भरल्या नभांकडे बघून.म्हणून तर कालिदासाच्या यक्षाला वियोग झालेल्या पत्नीची आठवण अस्वस्थ करून गेली असेल.हे मेघच पत्नीला निरोप देतील आणि विरह अग्नीत तडफडणाऱ्या मनाचा तिला अंदाज येईल असे त्याला वाटले असावे.आषाढाच्या पहिल्या दिवशी ढगांकडे बघून कालिदासाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

थंडगार हवा सगळ्या आसमंतात शिरून शेत शिवाराला हुडहुडी येते.चराचर आनंदी झालेलं असतं.पाखरांचा मधूर किलबिलाट सगळ्या वातावरणात भरून राहतो.इंदिरा संतांच्या रंगरंगुल्या,सान-सानुल्या गवतफुलांवर काळी, पिवळी,पांढरी,तपकिरी फुलपाखरे रुंजी घालत असतात.उन्हाळभर माळावर खुरट्या,वाळक्या कुरणावर दात आपटून ल्याप झालेली जनावरं आता वाऱ्यावर सळसळणाऱ्या हिरव्यागार कोवळ्या लूस गवतावर अंगावरची पावसाची सर झिंझाडत तुटून पडतात.किती खाऊ न किती नको!हावऱ्यासारखी नुसती हुंदडत गवतात मस्ती करत राहतात.

कुळवाची पाळी देऊनही मागे उरलेल्या चुकार तणाला खुरप्याच्या टोकाने उचलणाऱ्या शाला, माला, मंदा ,नंदाला सभोवतीच्या काळ्याकुट्ट ढगात पंढरीचा विठोबा दिसतो आणि वारीची आठवण येऊन त्यांना आनंदाचे भरते येते.आपला हात सरसर हलवत “अगं वारीला कवाशी जायाचं?”म्हणत मनातच वारीच्या वाटेवर टाळ मृदुन्गाच्या गजरात गाऊ-नाचू लागतात.

कृषिवलाना बेंदराच्या सणाची चाहूल लागलेली असते.जाता येता वाघाटीच्या वेलावर पानाआड दडलेल्या वाघाटया काढून घरधणीनीला

बारशीला कालवण करायला द्यायच्या असतात.हुनंगा झाला की खिचडा. वेळात वेळ काढून बैलांना ,गुरांना धुवून कांती तुकतुकीत करायची असते.चांगला खुराक घालून बैलांचा लाड करायचा असतो.मागच्या बेंदराला आणलेले कंडे विरून गेलेले असतात, दिष्टीचे मणी पण फुटलेले असतात.शिंगांचा रंग उडालेला असतो.येत्या बाजारातून सगळं सगळं न चुकता आणायचं असतं. फाटकी झूल शिवायला टाकायची असते.गोंडे ऐनवेळी कुठं सापडत नाहीत,तेही यावर्षी नवेच घ्यायचा विचार असतो.झालंच तर लेकीच्या पहिल्या करीवर नवे कासरे, कंडे ठेवायचे असतात.

घरधणीनींना खिचडा कांडायचा असतो,आकाडाची कर तळायला कापण्या-दामट्याचं दळण दळून आणायचं असतं.आकाड पाळायला आलेल्या लेकी हातातला चुडा अन अंगभर दागिने मिरवत सगळ्या आळीत चहा पाण्याला फिरत असतात.

देवळात  मागच्या वर्षी सप्ता झाल्यावर कपाट बंद केलेले तबला,पेटी,मृदंग बाहेर येतात.पथाऱ्या टाकल्या जातात.एकादशी होईपर्यंत आता दररोज विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन रंगणार असतं.

अ ss आ  अवघे गरजे पंढरपूर

चालला नामाचा गजर,चालला नामाचा गजर..कोणतरी सूर लावत असतो,ताल धरायला मग एकेकजण येऊन बसतो.पोराठोरांचा पाय देवळातून निघत नाही.जेवण करून धोतराची खोळ अंगभर पांघरून भजनात तल्लीन झालेल्यांच्या अंगातला गारठा कधीच पळून गेलेला असतो.

आषाढ एकादशीचा तो पवित्र दिवस येतो.दिवसभर देवळाला जत्रेचे रूप आलेले असते.घंटा खणखणत राहते.भोळा भाबडा जीव फक्त विठूच्या जीर्ण शिर्न चरणांवर लीन होतो.मागत काहीच नसतो,त्याच्या आत्म्याशी फक्त क्षणभर एकरूप  होतो.अबीर बुक्का कपाळावर लावून थोड्याशा नकळत केलेल्या पापाची वजाबाकी करतो.

अध्यात्मातल्या सत्शील लोकांचा चातुर्मास आताशा सुरू झालेला असतो.श्रावणाला पवित्र महिना मानत असले तरी आषाढ सुद्धा त्याचा सख्खा भाऊच असतो.त्याच्याइतकाच तो शुद्ध अन पवित्र असतो म्हणूनच अवसेच्या दिवे उजळून आषाढ जणू त्याचे स्वागत करतो.नव्हनाच्या लाह्या याचदिवशी भाजल्या जातात.

वर्षभर ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची गुरुपौर्णिमा असो,अवघ्या महाराष्ट्राचा आषाढी एकादशीचा उपवास -वारी असो,बेंदूर असो,म्हसोबा ताई आईचा गोडा-खारा निवद असो,की तेजोमय दिव्याची पूजा असो,आषाढ गुंग असतो आपल्याच तालात,धांदलीत,नव्या नवरीच्या पैंजनाच्या तालात, लाजऱ्या नजरेत,कापऱ्या वाऱ्यात,भुरभुरत्या पावसात,अवसेच्या दिव्याच्या प्रकाशात आणि त्या

‘और ना डरा दे मुझको

ए काले काले घन..’वाल्या मनाला विव्हळ करणाऱ्या घनसावळ्या पाण्याने ओथंम्बलेल्या दाटीवाटीच्या मेघात…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीने विसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आठवणीने विसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवाच माझी मैत्रिण सांगत होती कि तिच्या कोणालातरी अल्झायमर झालाय. आता त्यांना कोणी आठवत नाही.त्यामुळे त्या कोणाला अोळखत नाहित.•••• वगैरे वगैरे•••• आणि मग विसरणे हे एवढ्या भयंकर थराला जाऊ शकते असे कळल्यावर अंगावर सर्रऽऽऽकन काटा आला.

मग विचार आला का हा असा आजार निर्माण झाला असेल? मग त्यावर उपाय म्हणून स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय सांगितले जातात. बदाम खा•••• अक्रोड खा•••• वगैरे उपचार सांगितले जातात;आणि शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात.पण शक्यतो अशा व्यक्तींना परत फारसे काहिच आठवत नाही.

आता डॉक्टर तज्ञ यावर अनेक उपाय सांगतात पण मला उगीचच एक विचार डोक्यात आला•••• मनुष्य केव्हा एखादी गोष्ट विसरतो? तर एखाद्या गोष्टीला खूप दिवस झाले असतील; त्या गोष्टींशी पुन्हा पुन्हा संपर्क येत नसेल तर मनुष्य ती गोष्ट विसरून जातो. जसे लहानपणी घोकून घोकून पाठ केलेली स्तोत्रे गाणी आपल्याला आता आठवत नाहित पण कोणी म्हणायला सुरुवात केली तर अधून मधून ते आपल्याला आठवू लागते. याच्या उलट जर आपण कधी कोणाशी भांडले असू एखाद्याने आपला अपमान केला असेल किंवा एखादी चांगली घटना घडली असेल तरी ती गोष्ट आपल्याला काही केले तरी विसरता येत नाही. कोणाचा प्रेमभंग झाला असेल तर ते प्रेम त्याला विसरणे शक्य नसते; आणि मग असे वाटले ज्या गोष्टी अापण अगदी मनावर घेतो ज्या गोष्टींमुळे आपल्या हृदयाला काळजाला थरार जाणवला असेल अशा गोष्टी आपण कधीच विसरत नाही.

मग ज्यांना विसरण्याचा आजार झालाय त्यांचे काय? तर ते लोक फार भावूक असावेत.प्रत्येक गोष्ट ते मनावर घेत असावेत. म्हणूनच सगळ्याच गोष्टी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग हे लक्षात ठेवण्याचे पोते ताणून ताणून भरले की मग काही गोष्टी अगदी तळाशी जाऊन बसतात.काही गोष्टी  इतर गोष्टिंच्या मधे जाऊन बसतात.मग त्या गोष्टी कितीही महत्वाच्या असल्या तरी वेळेवर त्या आठवत नाहित. मग ही एक प्रकारची सवय लागून जाते; आणि त्याचे रुपांतर अशा भयंकर रोगात होत असावे.

त्यामुळे मला यातून मार्ग काढताना जाणवले जर आपण अगदी महत्वाचे आहे तेच लक्षात ठेवले आणि जे अनावश्यक आहे,ज्याने आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी जाणिवपूर्वक विसरल्या तर? म्हणजे कोणी आपल्याशी भांडले असेल कोणी आपल्याला त्रास दिला असेल तर असे प्रसंग आपण विसरायला शिकले पाहिजे. म्हणजेच जाणिवपूर्वक किंवा आठवणीने विसरणे हा रोग नसून ती एक कला आहे. आणि हिच कला प्रत्येकाने अंगिकारायला पाहिजे असे वाटते.

म्हणजे बघा हं•••• जर आपण ज्या गोष्टी महत्वाच्या नाहित त्रासदायक आहेत अशा गोष्टी पुढच्या क्षणी विसरायचे ठरवले तर मनामड्ये चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला जागा शिल्लक राहिल. एक वाईट गोष्ट विसरली कि पुढच्या दहा चांगल्या गोष्टिंसाठी जागा होईल. मग चांगल्या गोष्टी आठवत राहिल्या तर मन प्रसन्न राहिल. अर्थातच त्यामुळे आरोग्य चांगले राहिल••••

आपण आपल्या घरातूनही जुने फाटके कपडे काढून फेकून देतो तेव्हा नवे चांगले कपडे ठेवण्यासाठी कपाटात जागा होते. घरातील जुन्या वस्तू जेव्हा बाहेर काढतो तेव्हा नव्या वस्तूंचा उपभोग आपल्याला घेता येतो•••• तसेच आपण आठवणीने काही गोष्टी विसरू या.म्हणजे चांगल्या गोष्टी आपोआपच लक्षात राहतील.मग म्हणूया खरच विसरणं ही एक कला आहे•••• ती आत्मसात करू या•••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- भावाचं पत्र वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले.आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो.बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. अखेर भावनेच्या आहारी जाऊन का होईना पण मी मन घट्ट केलं आणि आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायचा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता नव्हतीच.मी हातातल्या इनलॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि लक्षात आलं, त्याला आत दुमडायचा जो फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात काही मजकूर दिलेला आहे. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? हो नक्कीच. थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. प्रयत्नपूर्वक एक एक अक्षर जुळवायचा आटापिटा करून ते वाचलं.त्यातून जे हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!)

घाईघाईने कशीबशी लिहिलेली फक्त दोन वाक्यं होती ती.प्रयत्नपूर्वक अक्षरं जुळवत मी ती वाचली आणि अंतर्बाह्य शहारलो!

‘दत्तकृपेचा प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल. ‘

या आधीच्या अस्वस्थ मनस्थितीत ‘बाबा हिंडते-फिरते असते तर त्यांच्याशी बोलता तरी आलं असतं.त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता’ असं उत्कटतेनं वाटत राहिलं होतं. ते शक्य नाहीय हे माहित असल्याने मन अधिकच सैरभैर झालं होतं. आणि माझी ही अस्वस्थता नेमकी जाणवल्यासारखं बाबांनी मी न विचारताच माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला दिलं होतं. मी निश्चिंत झालो. युनियन बँक न सोडण्याचा निर्णय घेतला. खूप दिवसानंतर प्रथमच चार दिवस रजा घेऊ घरी गेलो. मी घेतलेल्या निर्णयाने आई आणि भाऊ दोघांचा खूप विरस झाला होता. आई कांही बोलली नाही पण भाऊ मात्र म्हणाला,

“ही नशिबाने मिळालेली सोन्यासारखी संधी तू सोडायला नको होतीस. तू प्रोबेशन पिरिएडला घाबरून हा निर्णय घेतलायस.हो ना?”

“तसं नाही…पण..”

“मग कसं?”

मी काही न बोलता बाबांकडे पाहिलं. ते शांत झोपले होते. मी बॅग उघडली. बॅगेतलं इन्लॅंडलेटर काढून त्यातला बाबांनी लिहिलेला मजकूर भावाला दाखवला. त्याने तो वाचला आणि अविश्वासाने आईकडे पहात ते पत्र तिच्या हातात दिलं. आईनेही ते वाचलं. काय समजायचं ते समजली. एकवार अंथरुणावर शांतपणे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं आणि ते पत्र मला परत दिलं.

“माझं लिहून झाल्यावर मी ते चिकटवणार तेवढ्यात यांनी मला थांबवलं होतं. ‘मी वाचून देतो मग टाक’असं म्हणाले होते.

आम्ही खरंतर त्यांना विनाकारण त्रास नको म्हणून त्याबद्दल काही बोललोही नव्हतो. तरीही आमच्या गप्पातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असणार नक्कीच. म्हणून तर जागा मिळाली तेवढ्यात घाईघाईने लिहिलंय हे सगळं जमेल तसं. होतं ते बऱ्यासाठी म्हणायचं दुसरं काय?”

आई असं म्हणाली खरी पण घडलं होतं ते फक्त बऱ्यासाठीच नव्हे तर खूप चांगल्यासाठी होतं याची प्रचिती आम्हा सर्वांना लवकरच आली.

स्टेट बॅंकेतली नोकरी युनियन बॅंकेच्या तुलनेत पगार,इतर सवलती, प्रमोशन्सच्या संधी,मुंबईतून बदली मिळायची अधिक शक्यता अशा सर्वच दृष्टीने निश्चितच आकर्षक होती.तरीही ”दत्तकृपेच्या प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल ‘ या अंत:प्रेरणेने लिहिलेल्या बाबांच्या शब्दांत लपलेलं गूढ मला योग्य मार्ग दाखवून गेलं होतं.कालांतराने यथावकाश ते गूढही आपसूक उकललं.

माझ्या कन्फर्मेशननंतर लगेचच झालेल्या वेज रिव्हिजनच्या एग्रीमेंटमधे आमच्या बँकेची प्रमोशन पॉलिसी पूर्णतः बदलली. नोकरीची तीन वर्षे पूर्ण होताच प्रमोशनसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्यू देण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला झाला होता. त्यामुळे ती माझ्यासाठी सुवर्णसंधीच ठरली. तीन वर्षे पूर्ण होताच मीही प्रमोशन टेस्ट दिली आणि लगेचच मला पहिलं प्रमोशनही मिळालं.एवढंच नव्हे तर पुढची वेगवेगळ्या

रॅंकची सगळी प्रमोशन्सही मला प्रत्येकवेळी फर्स्ट अटेम्प्टलाच मिळत गेली. त्याही आधी बेळगाव बँक, मिरज स्टेट बँक यासारख्या बँका युनियन बँकेत मर्ज झाल्याने आमच्या बँकेचे ब्रॅच नेटवर्कही सांगली कोल्हापूर भागात अनपेक्षितपणे प्रचंड विस्तारलेलं होतं. त्यामुळे मला लगेचण या भागात बदली तर मिळालीच शिवाय प्रमोशन्सनंतरही प्रत्येक वेळी सोईची पोस्टिंग्जही जवळपासच मिळत गेली. स्टेट बँकेत राहिलो असतो तर हे इतकं सगळं इतक्या सहजपणे नक्कीच मिळालं नसतं.

हे सगळं ज्यांच्या प्रेरणेने शक्य झालं ते माझे बाबा मात्र हा सगळा उत्कर्ष पहायला होतेच कुठे?

बाबांनी इनलॅंडलेटरमधे लिहिलेला तो दोन वाक्यांचा मजकूर हाच आमचा अखेरचा संवाद ठरला होता. कारण त्यानंतर लगेचच सप्टेंबर १९७३ मधे ते गेलेच. जाताना त्यांची सगळी पूर्वपुण्याई आणि आजही मला दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या मोलाच्या आठवणी हे सगळं ते जाण्याआधी जणू माझ्या नावे करून गेले होते!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बकुळ हार ☆ सुश्री गौरी बागलकोटे ☆

🔅 विविधा 🔅

🌸 बकुळ हार 🌸 सुश्री गौरी बागलकोटे ☆

आताच फेसबुक चाळत असताना मी एका ज्वेलर्स ची जाहिरात पाहिली. त्यात त्यांनी एक दागिना प्रमोट केलेला — बकुळ हार

मनात आले कोणत्याही प्रकारात म्हणजे १ग्रॅम, बेंटेक्स,चोख सोंने यात  बकुळ हार मिळेल या जमान्यात, पणं खरी बकुळी मिळण कठीण झाले आहे. नाही म्हणायला कोल्हापूरच्या अंबाबाई देवळासमोर मिळतात बकुळीचे गजरे,  पणं लोकली फारशी पहायला नाही मिळत बकुळी. झाडे पणं कमी झाली. रातराणीच कौतुक सगळ्यांना. ती असते कुंपणावर. पण बकुळ दुर्मिळ झाली. शहरातून हद्दपार झाली जवळजवळ. बांधावर शेताच्या किंवा रस्त्याकडेला एखादे बकुळ दिसते. नाहीतर नवग्रहांची, किंवा नक्षत्र  झाडे असतात तिथे हमखास सापडेल. बकुळीच्या झाडाखालून गेल्यावर तो सुगंध पूर्ण श्वासात भरून घ्यावासा वाटतो. तो बाकी फुलांना नाही.

लहानपणी आम्ही एवढे बिझी नसायचो हा क्लास झाला की दुसरा तो झाला की तिसरा. त्यामुळे निसर्ग, सण साजरे करायला थोडा वेळ असे लहान मुलांना.

हादगा जवळ आला की विविध फुले शोधत मुली फिरत. त्यात गुलबक्षी विविध रंगात सजलेली, पिवळा, पां ढरा,अन् गुलबक्षी रंग. इतकी सुंदर फुले रस्त्याच्या कडेला उगवत अतिशय नाजूक, कमी आयुष्य असलेली फुले. दोन रंगाच्या कॉम्बिनेशन मधे ही उगवतात. जसे की पांढरा लाल, लाल पिवळा खुप छान दिसतात. त्याची देठे नाजूक असतात. एका विशिष्ठ कोनातून वाकवावी लागतात, नाहीतर लगेच तुटतात. देठाच्या शेवटी हिरव्या रंगाचा गोल असतो. असे फुल खुप छान रंगांनी सजलेले.

आता हादगा कमी झाला. मुलींना या सर्व गोष्टीत फारसा इटरेस्ट राहिला नाही. रस्त्याच्या कडेला ही फुले अजूनही दिसतात, अन् भूतकाळात घेऊन जातात. त्या फुलांची केलेली तीन पेडाची वेणी अजून आठवते, फुले दिसली की ती तोडून वेणी करावीशी वाटते. आम्ही मुलीचं अस नाही, मुल आमचे बालमित्र आम्हाला ह्या वेण्या करायला फुले तोडून आणुन देत असत. आणि आम्ही बसून त्या वेण्या गुंफत असु. मधे कुठे वेणी सुटत आली तर आमच्या मैत्रिणी मित्र सांगत इथे सुटत आलाय. मग कुणीतरी नाजुक हातानी सावरून वर घेत असे. त्यात मोडलेल फुल काढून आम्ही ती वेणी परत गुंफत असु. आणि त्या फुलाचा खालचा  हिरवा गोल भाग हिरवे मिरे म्हणून भातुकली मधे घेत असु.

अजरणीची फुले, याला बोलीभाषेत हद्ग्याची फुले म्हणतात. मला वाटत होत ह्याची झाडे संपली. पण नाही बऱ्याच कॉलेज कॅम्पस मध्ये ही झाडे अजून तग धरून आहेत. त्याच्या पाकळ्यांच्या पिपण्या फार आनंद देवुन जात. मी कुणाच्या गालावर फोडली, मी कुणाच्या कपाळावर फोडली. याची स्पर्धा लागायची,  त्यावरून चिडाचीडी, भांडाभांडी. सॉलिड मजा यायची. तू मला टिचकी मारलीय काग …काग.??😊

ह्याची पणं वेणी होते. भिजकी फुले असतील तरच याची वेणी मोडते. नाहीतर खुप मोठी वेणी होते. माझ्या हत्तीचा फोटो खुप मोठा म्हणजे पा टा एव्हढा होता. त्याला पुरेल एवढा हार व्हायचा. भानुंच्या वाड्यात हे झाड होत. आता नाही आहे. पण परवा सांगलीला जाताना वालचंद च्या कंपाऊनडला संपूर्ण  अजरणी ची झाडे आहेत. तेव्हा अजून आजरणी अजून जिवंत आहे, हे मला पटले.

भानुवाड्यात पांढरा चाफा पणं होता. त्याच्या अंगठ्या फार पॉप्युलर होत्या.  पाकळी बारीक चीमट्यानी भोक पाडायचं अन् ती पाकळी देठात ओवायची, सगळ्या पाकळ्या झाल्या की झाली अंगठी तयार.

असे हे लहानपणी चे दागिने.

गोरे वाड्यात, (आता कळल त्याला गोरेवाडा म्हणतात) बकुळीच झाड होते. जेरे बाईंच्या शाळेत जाताना मोठ्ठं बकुळी झाड होतं. शाळेला जाता येता आम्ही सगळे ही फुलं वेचायचो. कुणी मुठीत घट्ट पकडुन फुल घरी घेवून यायचो. कुणी मुठीचा वास घ्यायचा, पुन्हा, पुन्हा घेत राहायचा. कुणी ही फुल देवाला घालण्यास घरी घेवून येत, न वास घेता. कुणी वरून फुल पडल की पडल उचलून तोंडात घालत. फुलातील मध चोखायला. अशी किती मिळाली त्यावर आनंद द्विगुणित व्हायचा. हे सर्व शाळेतून येताना. कारण घरी जाताना आम्हाला  कोणी घ्यायला येत नसे.  कुणी ना कुणी आम्हाला सोडायला यायचे. तेंव्हा नुसता सुगंध श्वासात भरून घेत असु. जो आता फार दुर्मिळ झाला आहे.

बकुळ हार सोन्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा सध्या फार चलतीत आहे. ज्याचा आकार तेव्हडा बकुळीसारखा आहे. दिसते बकुळ फुल पणं त्यात तो मनात भरणारा सुगंध मात्र हरवलेला आहे…….

© सुश्री गौरी बागलकोटे

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काय मंडळी खरे आहे ना? माझा तरी अनुभव तसाच आहे. अपना हाल एक ईमोजी सबको बिना बोले बताता है| तर झाले असे,माझी मैत्रीण ( जी सतत ईमोजी मधून बोलत असते ) तिची चूक नाही बरं का.एकदा ती आजारी होती. बरे सांगावे कसे ?ग्रुप वर मेसेज केला तर कोणी विचारपूस करेना मग तिने 🤕 ईमोजी स्टेटसला.आणि घोळच झाला.सगळ्यांना वाटले तिला अपघात झाला किंवा डोके दुखत आहे.मग तशी चौकशी सुरू झाली.आणि सर्दी झाली आहे सांगता सांगता खरेच डोके दुखी झाली.पण इतक्या चौकशा झाल्या म्हंटल्यावर स्वारी ईमोजी माय झाली की.

हे ईमोजी महत्व माझ्या काही डोक्यात बसेना.तरी पण बघू प्रयत्न करून म्हणून तिच्या पावलावर पाऊल प्रमाणे ईमोजी वर ईमोजी ठेवून मी पण ईमोजी धर की टाक करते आणि हसे करून घेते.काय होते कोणी काही म्हंटले की पोस्ट आवडली की मी कोणताही भेद न करता ( स्त्री पुरुष ) दिलून टाकते.सांगायचे इतकेच असते,पोस्ट आवडली.आणि छान वाटले.पण त्यातून नसती आफत ओढवते ना.🫢 आणि काय चुकले कळतच नाही.🤦🏻‍♀️

मग एक समजले ईमोजी जसे शब्दा वाचून बोलतात तसे चुकीचे ईमोजी फार धोकादायक 🫣.एकदा अतीच फजिती केली ना या ईमोजी रावांनी.एकदा गृपवर कोणासाठी तरी श्रद्धांजली अर्पण केली होती.मी पण घाई घाई 😢 हे पोस्टवून टाकले.खूप सारे रिप्लाय आले होते त्यात सर्वांनी माझी चांगलीच खिल्ली उडविली होती.मग लक्षात आले रडक्या 🥲 ईमोजी ऐवजी चुकून 😂 हे साहेब तेथे घाई घाई गेले होते.😭

खरी गंमत येते 🥰😘 💞  हे ईमोजी राव पोस्टल्यावर.प्रेमात बुडालेला 🥰 हा जास्तच डेंजर.😘 (लाल टेंगुळ – एका मैत्रिणीने याचे केलेले नामकरण ) हा लहान मुलांना चालेल,मैत्रिणीला चालेल.पण नको तिथे घाईने/चुकीने गेला तर? जिथे गेला तिथे 🕺🏻आनंदी आनंद.आणि आपली कोंडी. आणि 🥰 (तीन टेंगळे – कोणाला तरी खरीच 🤕 आणेल) हे म्हणजे एकदम चाटून पुसून काम.🫢🤫

हे सोपे कसले हे तर माझ्या सामान्य किंवा बाळ बुध्दीला एकदम अवघड 😇 काम.बरे कतीही काळजी घेतली किंवा उसनी हुशारी आणली तरी ही भाषा काही जमत नाही. कारण भलभलते  गैरअर्थ काढण्यात समोरचे पटाईत (अगदी आपली चूक असली तरी 🙆🏻‍♀️).मग काय 🤦🏻‍♀️पुन्हा चूक आपलीच असल्याचे पुरावे सादर केले जातात.👊🏻

आणि हो हे झुके भाऊ कधी बदल करतील सांगता येत नाही.डोळे झाकून ईमोजी घाई घाई पोस्टावा तर तिथे वेगळाच अपरिचित (अर्थ न कळलेला) ईमोजी राव येऊन बसलेला असतो.आणि आपल्याला फजितून टाकतो.

असे अनुभव जमा करत करत ईमोजीराव पोस्टताना फार काळजी घेते पण तरीही भिक नको पण कुत्रे आवर या प्रमाणे कोणीतरी म्हणतेच, टाईप कर फोन कर पण ईमोजी आवर मग मी जास्तच दक्षता घेते.अगदी गुगल बाबां कडून सगळी माहिती घेते.अर्थ समजून घेते.पण काहीतरी घोळ होतोच आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने या प्रमाणे मी मरते हे चुकीचे इमुंचे (लाडा चे नाव हो) अर्थ किंवा अनर्थ निस्तरताना.

कदाचित हे चुकीने टाकलेले किंवा घाईने पोस्टलेले मेसेज यातून गैरसमज किंवा गैरअर्थ निघू नयेत या साठीच एडिट किंवा डिलीट चे रबर दिले असावे. व माझ्या सारख्या चुकून पोस्टणाऱ्या लोकांची सोय केली असावी.

पण मी दमून जाते हो हे निस्तरताना.आणि ठरवते काही 🙃🙂 उलट सुलट होण्या पेक्षा 🤫 चूप बसावे.

आता हे शेपूट फारच लांबत चालले.तर सांगायचे इतुकेच की शब्दावाचून बोलणारे ईमोजी चुकले तर शब्दांच्या पलीकडले अनर्थ करतात.त्या मुळे हे भाऊ नीट अर्थ समजल्या बिगर पोस्टू नयेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “बाप” एक माणूस….!! –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर  मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो. 

पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक  गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं  पुरविण्यासाठी वेळप्रसंगी  जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच  पण  त्याचे त्याला  कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला  कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत  ह्या एकाच ध्यासापोटी  आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….

पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून   धरलेला झरा,  मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!

अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार  वंदन..!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print