मराठी साहित्य – विविधा ☆ “काहीही चालवून घ्यायचे का ??? ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ काहीही चालवून घ्यायचे का ??? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

“ ह्याचा पेक्षा चांगला मराठी नाही येतात का? “

वरील ह्याचा या शब्दातील ‘चा’ या शब्दाचा उच्चार ‘चार’ मधील ‘चा’ सारखा समजावा. तसाच ‘चांगला’ शब्दातील ‘चां’ चा उच्चार ‘च्या’ सारखा समजावा!

तर तमाम मराठी वर्तमानपत्रात आज ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वर्तमानपत्रे जाहिरातदारांनी दिलेला मजकूर जसाच्या तसा छापतात हे कबूल. पण म्हणून या मराठी वर्तमानपत्रांनी काहीच नाही म्हणायचं का?

किमान मराठी वृत्तपत्रे आपण मराठी वृत्तपत्रे आहोत याचे भान राखून जाहिरातदारांना बदल, दुरुस्ती सुचवू शकत नाहीत का? की पैसे मिळाले की काम झाले? इतर भाषिक, विशेषतः दाक्षिणात्य लोक त्यांच्या भाषेत एक काना मात्रा अधिक उणा खपवून घेत नाहीत. संगणकामध्ये इंग्लिश स्पेलिंगची अगदी किरकोळ चूक जरी झाली तरी त्वरित तांबडी अधोरेखा दिसू लागते. असे मराठीत कधी होईल?

जर खरेच आपली मराठी भाषा अभिजात म्हणून प्रस्थापित करायची असेल तर सर्व ठिकाणी किमान स्वीकारार्ह मराठी उच्चार, लेखन व्हावे, याचा आग्रह धरला पाहिजे. जाहिराती, सार्वजनिक सूचना या जर मराठीत लिहायच्या असतील तर त्यांतील मजकूर तपासून घ्यायला पाहिजे. यासाठी हे काम करून देणारी अधिकृत संस्था असणे गरजेचे आहे. अशी संस्था नसेल तर ती स्थापन केली गेली पाहिजे. तोवर मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठे यांतील तज्ज्ञ यांचेकडून हे काम विनंतीपूर्वक आणि सशुल्क करून घेणे अनिवार्य करावे.

एक तर बहुतांश जाहिरातदार संस्था अमराठी असाव्यात, असे दिसते. महामार्गांवर जे सूचना फलक दिसतात त्यात लेखन अपराध दिसतात, त्याचे एक कारण म्हणजे देश पातळीवर बहुधा contracts दिली जात असावीत आणि ही contracts बहुदा अमराठी लोकांकडे जात असावीत. अन्यथा असे प्रकार झाले नसते. आंबेगाव चे अम्बेगाव झाले असते का? हिंजवडी (म्हणजे हिंजव हा सलग उच्चार आणि लगेच डी.. जसे पुनव… डी.. म्हणजे पुणे) असे गावाचे नाव आहे.. त्याचे हिंजेवाडी झाले नसते. लोह गाव लोहे गाव झाले नसते. या अमराठी लोकांकडे हिंदी, इंग्लिश जाणणारे लोक उपलब्ध असतात आणि ते याच लोकांकडून मराठी मजकूर लिहून, वाचून घेतात. मग अशा चिंधीवृत्तीने घोटाळे होणारच !

अभिजात मराठीची अशा प्रकारांनी इभ्रत जात असते, हे ध्यानात कधी घेणार आपण? की हेच भाषेचे प्रवाहीपण असे मानायचे?…..

मोरया चा मोरिया, गोट्या चा गोटिया, शेतकऱ्याचा शेतकरीयाचा …. असा हिंदी उच्चार जवळपास सर्वमान्य झाला आहेच. च, ळ इत्यादी मुळाक्षरे अमराठी बांधवांना आणि भगिनींना जड जातात, हे मान्य.. पण म्हणून काहीही चालवून घ्यायचे का?

केवळ पैसे वाचवण्यासाठी contractors, copy writers कुणाकडूनही मराठी कामे करून घेत आहेत.

जर एखादी अधिकृत संस्था स्थापन केली गेली तर बरेचसे नियंत्रण येईल, असे वाटते !

तोवर नाही येत ऐवजी नाही येतात, असे वाचायची आणि ऐकायची सवय करून घ्यावी लागेल.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ को-जागर्ती…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

?विविधा ?

☆ को-जागर्ती…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच असते. मस्ती, गाणी, आणि आटीव मसाला दूध ! तरुणाई तर या पर्वणीची वाटच पहात असते. त्यांना चांदण्यात फिरण्याची एक आगळीच मौज अनुभवायची असते. अगदी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. ‘. अशीच.

अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी व इंद्र ऐरावत पूजनाचा हा दिवस. रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्राला अटीव दुधाचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. यादिवशी नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चंद्राचं एक वेगळंच रूप आपल्याला भासतं. व त्याचं महत्त्वही आहेच. खरंतर पौर्णिमेचा चंद्र नेहमीच छान दिसतो म्हणून तर कितीतरी कवींनी त्याच्यावर कविता केल्यात. अगदी चंद्राची कोर ते पौर्णिमेपर्यंतच्या चंद्राचं आगळं रूप यावर. !

त्यात हवीहवीशी थंडी अन मधुर सुंदर चंद्रप्रकाश मन प्रसन्न करतोच.

निसर्गाचा प्रत्येक रूप तसं लोभस सुंदरच असतं. चंद्र प्रकाशा इतकाच रात्रीचा आभाळभर पसरत जाणारा अंधार देखील. ! अमावस्येलाही स्वतःचं असं एक देखणे पण असतं तसंच पौर्णिमेला पूर्ण बिंबानं शोभणाऱ्या चंद्राचं सौंदर्य ही असतं…. खरंच मुळात पौर्णिमा मनाला भुरळ घालते त्यात शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सौंदर्य अन सगळ्यांचा जल्लोष, गाण्यांच्या मैफिली मस्तच. अगदी लक्ष लक्ष चांदण्यांना स्वच्छ निरभ्र आकाशानं मैफिलीचं निमंत्रणच दिले असं वाटतं. शहरापासून थोडं लांब किंवा एखाद्या बागेत घराच्या टेरेसवर असं मोकळ्या वातावरणात मोकळ्या जागेत याचा जास्त आनंद घेता येतो.

असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्र मंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन. प्रत्येकालाच ती विचारते की ‘को-जागर्ती ‘ ? म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कोणी जागा आहे का ?आणि तिच्या या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. जागरण करतात मग तिची वाट पाहणाऱ्या.. साद देणाऱ्या सगळ्यांनाच ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी देते. हे शीतल कोजागिरीचं चांदणं अंगावर घेतलं की मन:शांती, आरोग्य लाभते कारण अमृताचे काही थेंब तरी आटलेल्या दुधात पडतात. सारं जग जरी झोपलं तरी बुद्धिमान, विचारी, संयमी अन आपले कर्तव्य चोख बजावणारे लोक जागे राहतातच. याबरोबर निदान मौज करण्यासाठी तरी सगळे जागे असतात.

माझ्या माहेरी वालचंदनगरला चाळ संस्कृती हो. सगळे शेजारीपाजारी मैत्रिणी जमून चंद्र चांदण्या पौर्णिमा यांना अनुसरून गाणी म्हणायची. ग्राऊंडवर मस्त फेरफटका मारायचा आणि नंतर दूध घ्यायचे. त्याबरोबर भेळही असायची. लग्नानंतर रेल्वे क्वार्टरच्या पटांगणातच दूध आटवत ठेवायचे. भेंड्या खेळायच्या. शरदाचं चांदणं अंगावर घेत चंद्राच्या सोबतीनं महालक्ष्मीच्या हाकेची वाट पाहायची. आजही आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र जमतो आणि या पौर्णिमेचा आनंद घेतो. चांदण्यात फिरतो. दुधाबरोबरच एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. जीवन जगताना आपल्याला असे छोटे-मोठे आनंद नेहमीच सुंदर जगायला हवे असतात. आपली संस्कृती नेहमीच आपल्याला आरोग्य आणि जीवन याचा समतोल राखायला मदतच करत असते. मनाच्या, शरीराच्या, व्याधी म्हणजे सगळा अंधार त्यामुळे नाहीसा होतो आणि एक सुंदर निरामय जीवन आपल्याला लाभतं …. अन् आजही तनामनातला अंधार मिटवून, एक एक चांदणी मनाच्या निरभ्र आकाशात उमलते. अन पूर्ण चंद्रबिंब अमृत धारा बरसतांना महालक्ष्मीची हाक ऐकू येते,

……. “ को-जागर्ती.. ?.. को-जागर्ती.. ? “ …. अन् आभाळभर पसरलेल्या चंद्र प्रकाशात त्या आटीव दुधाला, बालपणापासून जिभेवर रेंगाळणारी तीच अमृताची चव येते…. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आदर फक्त उच्चारी नको, मनापासून हवा–” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आदर फक्त उच्चारी नको, मनापासून हवा–☆ श्री जगदीश काबरे ☆

परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी जेव्हा अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, “मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. ” त्यांच्या ह्या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्क बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण ह्या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखावालाच पाहीजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असे नाही वाटत?

वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पध्दतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का मजवातो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे!

कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एकाप्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनीचतेची सुरुवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला आती महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा.

वाचकहो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, नेमके आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचे असे झाले की, नुकताच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काँ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ दिला म्हणून एका प्राध्यापिकेवर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अवमान केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारले गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिले. त्या पत्रातही मराठी भाषेच्या व्याकरणातील त्याने असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचे व्याकरण कळते का हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलिस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचले आहे काय? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहित आहे काय?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरे झाले.

हे ‘उच्चारी आदर’ देण्याचे प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सअप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेले दिसतेय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगायला लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. इ. इ. त्यावेळी मला हसू येते. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरावणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजींचा अपमान करत नाही असे त्यांना वाटते काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचे राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणेच महत्वाचे वाटते. पण खरेतर शब्दांपेक्षा त्याच्या मागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. पण आपल्याकडे आपण उच्चारवाने काय बोलतो यालाच महत्व दिले जाते, आणि हे आपल्या दांभिक संस्कृतीला साजेसेच आहे.

विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान कारतात असे होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसेच देवी आणि आईला सुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा जर अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजीचा एकेरी उल्लेख का खटकावा?

‘शिवाजी कोण होता?’ या पानसरे लिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यात आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून नॉन ईश्शुचा ‘ईश्शु’ करणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातील मतितार्थ बदलणार आहे का? 

तसेही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस म्हणून उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणे आवश्यक आहे. पण ज्यांचे भाषेचे ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तींच्या आदर्श आचारणापेक्षा नुसते नामस्मरणच महत्वाचे वाटते. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचे काहीच नसते. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून…

1) कोणाला एकेरी नावाने संबोधले तर त्यांचे मोठेपण कमी होते असे मला वाटत नाही. त्यांचे मोठेपण त्यांच्या कर्तृत्वात असते… नावात नाही.

2) पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” वा प्रा. नामदेवराव जाधव लिखित “खरा संभाजी” अशी कितीतरी पुस्तके आहेत जिथे एकेरी उल्लेख आढळेल. पण याचा अर्थ हा नक्कीच नाही की या लेखकांचा दोन्ही छत्रपतींचा अवमान करण्याचा उद्देश होता. उलट ही दोन्ही पुस्तके वाचल्यावर कळेल की, वास्तववादी चरित्रे तर याच पुस्तकात आहेत.

3) याशिवाय प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘दगलबाज शिवाजी’ हेही एक पुस्तक आहे. नाव वाचून तेव्हाही लगेच लोक असेच भडकत होते. पण जेव्हा हे पुस्तक बाजारात आले, लोकांनी वाचले आणि “दगलबाज” या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तेव्हा टीका करणार्‍या लोकांनीच प्रबोधनकार ठाकरे यांचे कौतुक केले.

4) सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. एवढेच काय पण मागच्या शतकातील अनेक इतिहासकारांनी – अगदी सेतू माधवराव पगडी यांच्यापासून अनेकांनी शिवाजी राजांचा एकेरीच उल्लेख केला आहे. याचा अर्थ या सगळ्या थोर माणसांना शिवाजी राजांचा अपमान करायचा होता असे म्हणता येईल का?

स्वतःच्या नावापुढे शिवभक्त लावणे, गळ्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा अथवा राजमुद्रा यांचे लॉकेट घालणे ही तर हल्ली फॅशन झाली आहे. पण काय या गोष्टी करून महाराजांवर आपलाच हक्क प्रस्थापित झालाय असे ते समजतात का? खरे पहाता जो कोणी शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवत असेल तर तो जातपात पाळूच शकत नाही. कारण स्वतः महाराज धर्मनिरपेक्ष (secular) म्हणजेच त्या काळाततील 18 पगड जातीतील सर्वांना एक साथ घेऊन स्वराज त्यांना एकसमान मानणारे होते… ते मुस्लिम द्वेष्टे तर नव्हतेच नव्हते. पण हे सर्व शिवभक्त मानतात का? नाही. त्यामुळे असे खोटे शिवभक्त होण्यापेक्षा, आणि एकेरी उच्चारामुळे राजांचा अपमान होतो, असे समजण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलेली थोडी तरी पुस्तके मन लावून त्यांनी वाचली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराज बऱ्यापैकी समजतील. तसेही महाराष्ट्र सोडून सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करूनच त्यांचा इतिहास शिकवला जातो, त्यामुळे एकेरी नावाने त्यांचे कर्तृत्व तसूभरही कमी झाले आहे असे मला तरी वाटत नाही. तेव्हा राजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शंख करण्यापेक्षा स्वतःला शिवभक्त समजणाऱ्यांनी राजांना ‘डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे’, हेच एक मागणे.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३० ☆ श्री अरविंद लिमये ☆

थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.

“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “

“सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “

मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत?म्हणजे?कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.

माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.

माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.

काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो…!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज विजयादशमी. नऊ रात्र ( दिवस) साधना केली, शक्तीची आराधना केली तर विजयाची दशमी येणे अगदीच स्वाभाविक….. !!!

आपल्या पूर्वसुरींनी याचि अनुभूती घेऊन आपल्याला हे करायला सांगितले. भारतात जशी टाटांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट चांगली असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात खात्री /विश्वास आहे, अगदीच तीच खात्री/विश्वास आपल्या धर्माने सांगितलेल्या प्रत्येक कर्मकांडावर ठेवून, आपण त्याप्रमाणे आचरण केले तर भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेल यात शंका नसावी.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।। 

हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।।”

(अभंग क्रमांक २०७६ : सार्थ तुकाराम गाथा)

सध्या बाजारात SAP, oracle, ERP अशी विविध प्रकारची softwares उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या त्या विकत घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करतात. सनातन धर्माचे एक software आणि एक हार्डवेअर आहे. ते आपण नीट आचरणात आणून पाहिले तर ते चांगले की वाईट हे ठरविणे सोपे जाईल. पण आजची तथाकथित विद्वान मंडळी, अमलात, आचरणात न आणता हिंदू धर्माला नावे ठेवतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

मनुष्य श्रद्धेवर जगत असतो. पुढचा क्षण नक्की आनंदाचा असेल अशी श्रद्धा मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ही श्रद्धा टिकून रहावी म्हणून धर्माने काही कर्मकांड सांगितली आहेत. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये अमुक बटण दाबले की अमुक होते आणि दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये तेच बटण दाबून काहीतरी वेगळे होते, याचा अर्थ पाहिले software निकामी झाले आहे असे म्हणणे हे जितके हास्यास्पद तितकेच सनातन धर्माचे पूर्ण श्रध्देने आचरण न करता त्याला नाव ठेवणे हास्यास्पद नव्हे काय ? कितीही महाग सॉफ्टवेअर घेतले, महागडा मोबाईल घेतला तरी त्यात एक anti virus software घ्यावं लागते. आपल्या धर्माने अशी काही antivirus software तयार केली आणि अमुक करू नका, अमुक करा असे सांगितले तर ते उचित नव्हे काय ?

आपल्या मागील अनेक पिढ्या सनातन धर्माचे प्रॉडक्ट आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्वावान होते, आनंदात होते, समाधानी होते असे म्हणता येईल कारण त्यांनी उभारलेल्या इमारती, किल्ले, निर्माण केलेल्या अनेक वास्तू, कलाकुसर आणि अनेक गोष्टीयाचि साक्ष देत आहे…..

जुने अवघे खराब हा मंत्र दुराग्रहाने आचरणात न आणता, त्यातील दोष (असल्यास) कमी करून नवीन पद्धतीने मांडणी करून, त्याचे आचरण आपण करू. हे एक प्रकारचे सिम्मोलंघन ठरावे.

शक्तीची उपासना करून प्राप्त केलेली शक्ति देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी खर्च करता आली तर ती शक्ती दुप्पट होऊन आपल्याकडे परत येईल, असा मला विश्वास आहे.

भारतासारख्या महान देशात आपण जन्माला आलो हेच आपल्या आयुष्याचे सोने म्हंटले तर अतिशयोक्ति होणार नाही. आज आपण सर्वांना शिलांगणाचे सोने वाटतो, लुटतो. हा उपक्रम याचि साक्ष देतो की भारतात रस्त्यावर मेथीच्या भाजी सारखे सोने विकले जात होते…….

जो दुसऱ्याला सोने द्यायला शिकवितो, तिळगुळ द्यायला शिकवितो, राखी बांधायला शिकवितो, तो धर्म किती महान असेल……

“ धर्मो रक्षति रक्षितः ।। “ 

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!! भारत माता की जय!!!!

सर्वांना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगणातले ऋतू (श्रावण) ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

🔅 विविधा 🔅

अंगणातले ऋतू (श्रावण) ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

आषाढाच्या रिपरिपीने आताशा कुठं उघडीप दिलीय. सूर्य नेहमी सारखा केशरी गोळा दिसत नाही तो सुद्धा पिवळसर दिसतोय. पूर्वेकडे पिवळा रंग सांडला आहे. सकाळी सकाळी झाडांवर पक्ष्यांची मधूर किलबिल सुरू आहे. पाणकोंबडा त्याच्या धीरगंभीर आवाजात खोलवर घुमत आहे. सातभाई क्षणात कुंपणावर तर क्षणात भुईवर येत कलकलाट करत आहेत. चिकूच्या झाडावर बुलबुल गोड आवाजात गाणे गात आहे. गच्च भरलेले पाण्याचे रांजण रिते होऊन खडबडाट व्हावा, तसे काळे मिट्ट ढग आता पांढरट दिसत आहेत. क्षणात काळा ढग येतो न एक सर पाझरून जातो.

…. ‘क्षणात येते सरसर शिरवे

 क्षणात फिरुनी ऊन पडे’ 

विटांवर, कठीण भुईवर हिरव्यागार शेवाळाचे मऊ मऊ गालिचे पसरलेत. हिरवे हिरवे घनदाट जंगलच जणू! लहानपणी मुंग्यांची शेते म्हणायचो आम्ही. तगरीचे शेंडे पांढऱ्याशुभ्र फुलांनी डवरले आहेत. जणू आकाशातून कुणी चांदण्या अलगद झाडावर उधळून दिल्या आहेत. झाडाखाली अलगद झेपावणारा पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा बघितला की चांदण्या सांडल्याचा भास होतो. तगरीची ही एकेरी पाकळीची फुले देवाला प्रिय असतात म्हणे. दुसरी एक तगर असते टपोऱ्या पांढऱ्या फुलांची. या फुलांचा मात्र मंद गंध असतो.

सागाच्या उंच शेंड्यावर फुलांचे गुच्छ उमलले आहेत. त्याची इवली इवली पांढरी शुभ्र फुले लाह्या सांडल्यासारखी जमिनीवर पडली आहेत. किती नाजूक इवल्याशा पाकळ्या. वाऱ्याने इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत. शिव शम्भोला प्रिय असणाऱ्या बेलाच्या हिरव्यागार पानांनी झाकोळलेल्या झाडावर कवठासारखी गोल गोल हिरवीगार फळे लटकत आहेत.

तगरीची हिरवीगार पाने खाऊन फुलपाखरांच्या अळ्या सुस्त झाल्यात. आता निवांत कोषात पडून राहण्याचे मनसुभे आखत त्या पानांचे भोजन मिटक्या मारत खात आहेत. पण हे काय?कोषात जाण्याचे मनसुभे त्या पाणकोंबड्याने आणि बुलबुलानी उद्धवस्त केलेत. त्यांच्या सूक्ष्म नजरेने त्यांना कधीच हेरून ठेवले होते फक्त संधी हवी होती. एकाच झपाट्यात दोघांनीही सगळ्या जाडजूड अळ्या फस्त करून टाकल्या. पुन्हा फुलपाखरे तिथंच पानावर चिकटून बसलीत. इवल्याशा जीवानी पुन्हा या सृष्टीत बागडण्यासाठी.

ती पहा गोगलगाईची चमचमणारी वाट. कुठं गेलीय बरं?तिचे चमचमणारे शंख हळदीच्या पानावर चमकत आहेत. आपल्या इवल्याश्या दातांनी पाने कुरतडत आहेत. निसर्ग सगळ्यांनाच हवे ते खायला प्यायला देतो, सगळ्यांनाच सारखे पोसतो नाही का?

तांबड्या वाणी किड्यांचे पुंजके इथं तिथं वळवळत आहेत. ओल्या जमिनीतून गांडूळ वर येऊन इकडे तिकडे वळवळत आहेत. ही केसाळ सुरवंटे आपल्या पाठीला कुबड काढून इकडे तिकडे खुशाल फिरताहेत. पण दुरूनच बघा, चुकून जरी स्पर्श झाला तर आग आग ठरलेली. पण घाबरू नका, ती झेंडू किंवा मखमलीची पाने तोडा आणि चुरून तो रस सुरवंट फिरलेल्या जागेवर लावा, त्वरित आराम मिळेल.

ही कर्दळीची फुले एखाद्या सुस्नात तरुणीच्या ताज्या तवान्या मुखड्यासारखी तजेलदार दिसत आहेत. पानेही अंगाखांद्यावर दहिवराचे काचमणी मिरवत आहेत. आणि राम प्रहरी हा मंद धुंद हवाहवासा सुगंध कुणाचा?प्राजक्त फुलला की रातराणी?नाही हं, हा आहे केशरी पिवळ्या सोनचाफ्याचा हवाहवासा धुंद करणारा गंध. शेंड्याशेंड्यावर फुललेली ही आकर्षक फुलं उमलताना जणू सुगंधाचे घडे हवेत सांडत आहेत. सगळे अंगण दरवळून गेले आहे. छाती भरभरून कितीही गंध हुंगला तरीही एक नाक आणि एक फुप्पुस अपुरेच वाटते. झाडाखाली नका निरखू. चाफा, प्राजक्त, तगरीप्रमाणे या फुलांचा सडा नाही तुम्हाला दिसणार. ही फुलं खाली गळलेली दिसत नाहीतच. पाकळ्या पाकळ्यानी हवेच्या झुळुकिसरशी ही जमिनीकडे झेपावतात अन मातीत मिसळून जातात. तसेही इथं जन्माला येणारा प्रत्येकजण शेवटी मातीतच मिसळतो नाही का?फुले तर कशी अपवाद असतील?फुलामागे गोलगोल खरखरीत फळांचे गुच्छ येतात त्यात छोट्या छोट्या बिया असतात. त्या किंचित झुकलेल्या बोरीकडे पाहिलेत?असंख्य कळ्या फुलांनी कशी डवरलीय!

हा पहा टपटपणारा केशरी नाजूक देठांचा इवल्या फुलांचा प्राजक्त सडा!खरखरीत खोड न पाने पाहून हे सुंदर सुगंधी फुलांचे झाड असेल असे कुणालाच वाटणार नाही. इतक्या छान फुलांना कोण्या इंग्रजी लेखकाने शॉवर ऑफ टिअर्स का म्हणावे बरे?त्या वेड्याला मुळात त्याचे समर्पण कळलेच नाही. भल्या पहाटे अवकाशात फिरणाऱ्या देवाच्या भ्रमणासाठी ही सुगंधी कुपी तो उघडून स्वतःस प्रभू चरणी आनंदाने विलीन करतो.

त्या भिंतीच्या फटीतून ते बघा कोण डोकावतेय?तो आहे शंकरोबा. गौराईच्या फुलोऱ्यातील एक महत्वाचा फुलोरा, याची पांढरीशुभ्र इवली इवली तेरड्यासारखी फुले किती खुलून दिसतात ना?

सर्वच पक्ष्यांना आपला मनाजोगता खाऊ अगदी मनसोक्त मिळत आहे. बेडकांची पिले डबक्यात सुळक्या मारत आहेत. खारुताई आपली शेपटी फुलवून झाडावरून खालीवर सरसर तुरुतुरु धावत आहे आणि मांजर सावज सहज घावते का ?याचा अंदाज घेण्यासाठी फिस्करून दात विचकत तिला घाबरवत आहे. पण ती जणू त्याला वाकुल्या दाखवत अजून उंच उंच जात आहे.

मोकळ्या मैदानावर अमाप हिरवे गवत दाटीवाटीने उगवले आहे आणि कितीतरी गवतफुले त्यांच्या शेंड्यावर दिमाखात झुलत आहेत. विंचवीच्या झुडुपांनी जांभळट गुलाबी फुले धारण केली आहेत. जाता येता नाना रंगांची फुलपाखरे त्यांना चुंबीत आहेत. कुणी कुणाचा रंग घेतला?फुलांनी फुलपाखरांचा की फुलपाखरांनी फुलांचा?काही समजेना झालेय. मधूनच एखादी पावसाची सर सुकल्या पंखांना ओलावत आहे. सकाळपासून उन्हात शेकत बसलेले झाडांचे शेंडे पुन्हा भिजून चिंब होताहेत. पानांवर थांबलेल्या जलबिंदूवर सूर्यकिरणे पडून पाने चांदणं सांडल्यासारखी चमचम करताहेत.

या दोन झाडांमध्ये पहा काय गम्मत आहे!भल्या मोठ्या कोळ्याच्या जाळ्यात भक्ष्य अडकायचे सोडून हे काय अडकलेय बरं?राम प्रहरीच्या दहिवराचे असंख्य छोटे छोटे थेंब की जणू काचमणी?आणि ते कसे अलवार झुलतेय! काचमण्यांनी विणलेला पडदाच जणू. किती विलोभनीय आणि मनोहारी दृश्य आहे हे! आणि ही पहा टाचणी. लांबट शरीर, बटबटीत डोळे आणि चार पायांचा तांबूस चतुरासारखा दिसणारा कीटक. पाने कुरतडतोय.

झाडांचा पर्णसंभार वाढला आहे आणि पानात लपून एक कारुण्य कोकीळ किती आर्ततेने प्यावप्याव करत आहे. चिरकाची जोडी आणि होल्यांची जोडी छोटे छोटे कीटक आणि धान्याचे कण वेचत आहेत;इतक्यातच पावसाची जोरदार सर आली अन त्यांची अश्शी त्रेधातिरपीट उडाली की काही बोलू नका. पटकन त्यानी झाडाच्या फांदीचा आसरा घेतला.

रात्री कधी बाहेर अंगणात गेलात तर एखाद दुसरा काजवा चमचम करत तुमचे लक्ष वेधून घेईल, मात्र त्यासाठी बाहेर काळोख हवा, विजेच्या लख्ख प्रकाशात काजवे चमकत नाहीत;आणि हो, दंगा, हॉर्नचा कोलाहल पण चालत नाही. एकदम शांत निरव रात्र काजव्यांना आवडते.

…. या श्रावणाचा किती वर्णावा महिमा

 सुगंधी हिरव्या रंगांचा जणू हा महिना

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “हृदयशल्य !!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

हृदयशल्य !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही…. मायेची सावली लागते माणसाला.

आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती, ज्ञानदेव, सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती.. याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं. आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.

……. नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.

पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला.. स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा, राजबिंडा तरुण. सालस, सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे, शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही, सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं…… त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.

तो आला तसा इथलाच झाला. आजी, धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले.. पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती. कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना….. लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.

लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.

काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या… पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला…. त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता… ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते! 

अगदी तसंच झालं….. देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.

नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात, त्यांची झाडं होतात, त्यांना बहर येतो, कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं….. अनेकांचं आश्रयस्थान बनतं.

हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले… नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.

आपल्या मनातील प्रेमाच्या, त्यागाच्या, समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं…. त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही…. ! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.

तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली… एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला…. हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.

रतनजी टाटा…. नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत…. विश्व जाले वन्ही…. संते आपण व्हावे पाणी…. हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले…. भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!

(माहिती समाज माध्यमांतून साभार.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लेखनभान !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

लेखनभान ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

पूर्वी कधीही नव्हते एवढे लेखन स्वातंत्र्य आज आहे. लिहिणारे आणि लिहू शकणारे अनेक होते, पण ते प्रसिद्ध करण्याला तांत्रिक मर्यादा होत्या. कागदावर छपाई करून ते वाचकांपर्यंत पोहोचणे ही एक मोठी प्रक्रिया असे. त्यात संपादन हा एक अतिशय महत्वाचा घटक असतो. त्यामुळे ‘साभार परत’ ची सवय नवोदित लेखकांना करून घ्यावी लागे.

‘वाचकांचा पत्र व्यवहार’ सारख्या सदरात दोन ओळींचे पत्र छापून आले तरी लेखक झाल्यासारखे वाटे ! आता परिस्थती खूपच लेखन-आणि लेखक ‘फ्रेंडली’ झाली आहे.

सुरुवात Email ने झाली. पुढे Facebookआणि Whatsapp मुळे कुणालाही, कितीही, केंव्हाही आणि मुख्य म्हणजे ‘कसेही’ लिहिता येऊ लागले. काही विशेष अशा डिजिटल साहित्य-मंचांचा ठळक अपवाद वगळता लेखनाचे संपादन, नियंत्रण असा फारसा भाग उरलेला नाही. गावाच्या माळावर जाऊन बोंब ठोकायला पाटलाची परवानगी घेण्याची गरज लागत नाही, तशातला हा प्रकार. त्याचे दुष्परिणाम वाचक भोगत असतात. विशेषत: फेसबुकवरील ‘पोस्ट’ ला ‘कमेंट’ च्या माध्यमातून लेखी स्वरूपात, चित्र स्वरूपात प्रतिसाद देण्याची सुविधा असल्याने कुणी काहीही लिहू शकते. या काहीही लिहिण्यातून अनेक अप्रिय घटना, प्रसंग घडलेले आहेत.

फक्त एक गोष्ट बरी आहे, ती म्हणजे हे लेखन वाचायचे की नाही हे वाचक ठरवू शकतात ! पूर्वी लोक पत्रकार, लेखक हे आपल्याविषयी काही लिहितील म्हणून त्यांच्यापासून दूर राहायचे किंवा गरज असली तर जवळही जायचे! हल्ली फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या लेखकांच्या बाबतीत असे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विस्तारभयास्तव, फक्त एकाच प्रकारावर लेखकांनी कटाक्ष ठेवावा हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच !

जेंव्हा प्रत्यक्ष व्यवहारातील विषयावर, अनुभवावर लिहिले जाते, तेंव्हा त्या लेखनात नावांचा आणि इतर अनुषंगिक उल्लेख टाळायला पाहिजेत, असे मला अत्यंत प्रकर्षाने वाटते. व्यक्तीचा उल्लेख जर सन्मानजनक, कौतुकाचा, आनंदाचा, उपकाराचा इत्यादी इत्यादी असेल तर नावाचा थेट उल्लेख असलेला चांगलाच. परंतु मैत्री, प्रेम, चारित्र्य याबाबतीत महिलांचा उल्लेख करताना थेट नावे किंवा त्या व्यक्तीची ओळख पटेल असे लेखन टाळावे, असे वाटते. जरी घटना, प्रसंग कितीही जुने असले तरी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणाही व्यक्तीच्या नजरेस हा मजकूर पडला तर अनवस्था प्रसंग उदभवू शकतात. माझे अमक्या मुलीवर प्रेम होते पण आमचा विवाह होऊ शकला नाही, हे लिहिताना त्या मुलीच्या नावाचा आता उल्लेख का करावा? तिचे लग्न झालेले असेल, तिचा संसार सुरु असेल आणि संबंधित बाब तिच्या नव्या कुटुंबास माहीत नसेल, तर काय? एक तर ज्याने लेखन केले आहे त्याला ओळखणा-या वाचकांना नेमके कुणाबद्दल लिहिले गेले आहे, हे ताडणे फार अवघड नसते. कारण लेखक आणि वाचक तसे बरेचदा एकमेकांच्या ओळखीत, परिसरात असू शकतात.

छायाचित्रे वापरताना, विशेषत: महिलांची छायाचित्रे वापरताना भान राखणे गरजेचे आहे.

वृत्तपत्रांत अशा प्रकरणामध्ये व्यक्तींची बदललेली नावे छापण्याची पद्धत आहे. Electronic Mediaमध्ये चेहरे धूसर करून दाखवणे, लपवणे असे उपाय केले जातात. आणि हे आवश्यक सुद्धा आहे.

व्यक्तीमत्वाचे वर्णन करताना त्यांचे शारीरिक दोष लिहिण्याची अशी किती गरज असते लेखन विषय पोहोचवण्यासाठी? व्यक्तीच्या मर्मावर विनाकारण बोट ठेवून तो दुखावला जाईल, असे चांगले लेखक कधीही लिहित नाहीत.

लेखन विषयावर आता बंधने नाही घालता येत. पण अति होण्याआधी लेखकांनी आपापल्या लेखणीस वेसण घातलेली बरी !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ आई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

नवरात्र हा सण प्रामुख्याने मातृशक्तीचे जागरण करणारा आहे. त्यानिमित्ताने हा लेख…!

“या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”‘

खरंतर आईचे वर्णन करायला आई हा एकच शब्द पुरेसा ‘ बोलका ‘ आहे.

आई म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर !!!

आजच्या मंगलदिनी…..

जननीस वंदन !

गोमातेस वंदन !!

भूमातेस वंदन !!!

भारतमातेस वंदन !!!!

गुरुमाऊलीस वंदन !!!!!

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’,

‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; 

‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ 

… अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद ही ”नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘ मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. आईच्या मातृत्वभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ ( प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसिकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” आणि माझ्या लेकरास शिवाजी म्हणून घडवायला जमलं नाही तर किमान शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून तरी घडवेन, असा उदात्त विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. निसर्गाने दिलेला ‘निर्मिती’च्या नैसर्गिक अधिकाराचा स्त्री शक्तीने उचित उपयोग करून घ्यायला हवा. हा प्रयत्न काही प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे वाटते.

‘ देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’ याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसून क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक’ न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या पेक्षा चांगला उपाय नसेल असे मला वाटते..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

मातीच्या चार भिंती

त्यात माझी राहे आई

एवढे पुरेसे होई 

घरासाठी….. !!

आदरणीय मातृशक्तीस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण !!

श्रीराम समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- खूप दिवस वाट पाहून त्या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं होतं. दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध होताच. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून या दोघांनाही त्यांनी बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता!) 

हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?)

ब्रँचचा चार्ज घेऊन झाल्यानंतर लगेचच मी महत्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. घरापासून ब्रॅंचपर्यंतच्या रस्त्याला लागून थोड्याच अंतरावर असलेल्या ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ चा मी मनोमन तयार केलेल्या आमच्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत खूप वरचा नंबर होता. मिशनऱ्यांनी चालवलेल्या या संस्थेच्या बचतखात्यांत बरीच मोठी रक्कम शिल्लक असायची. शिवाय आठवड्यातून दोन-तीनदा तरी थोड्याफार रकमेचा भरणा नियमित होत असेच.

विशेषतः सोलापूर कॅम्पसारख्या लहान ब्रॅंचसाठी खास करुन अशा ग्राहकांना सांभाळणं गरजेचं असायचं. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा ‘लिटिल् फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’ च्या प्रिन्सिपल कम व्यवस्थापक होत्या. अतिशय शांत, हसतमुख चेहरा. प्रसन्न आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेंटमधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय असं मला वाटू लागलं!

मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगलं सहकार्य आणि सेवेबद्दल त्यांना आश्वस्त करून त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या थोड्या गंभीर झाल्यासारख्या वाटल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नपणा लोपला. नजरेतलं हसरेपणही अलगद विरून गेलं. पण क्षणभरच. लगेचच त्यांनी स्वतःला सावरलं.

“सी मिस्टर लिमये.. ” त्या बोलू लागल्या.

आमच्या ब्रॅंचमधील सेवेबद्दल त्या फारशा समाधानी नव्हत्या. आक्रस्तळेपणा किंवा आदळआपट न करता त्यांच्या मनातली ती नाराजी त्यांनी अतिशय सौम्य पण स्पष्ट शब्दात आणि तेवढ्याच डिसेंटली माझ्यासमोर व्यक्त केली.

हाकेच्या अंतरावरच्या आमच्या ब्रॅंचमधे आठवड्यातून दोन दिवस हातातली कामं बाजूला ठेवून त्यांची स्टाफ नन् पैसे भरायला बँकेत यायची. साधारण वीस-पंचवीस हजारांची रक्कम बँकेत भरून परत जायला तिला किमान दोन तास तरी लागायचे. घाईगडबडीच्या कामांमुळे, एवढा अनावश्यक दीर्घकाळ एका स्टाफला स्पेअर करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची तत्पर सेवेची सरळसाधी अपेक्षा होती आणि त्यात मी लक्ष घालावं अशी त्यांनी विनंती केली. ‘बँकेतला एखादा कॅशियर इथे पाठवून आठवड्यातले दोन दिवस इथून कॅश कलेक्ट करणं शक्य होईल का?’ असंही त्यांनी मला मोकळेपणानं विचारलं. यातून मार्ग काढायचं आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.

त्यांच्या विनंतीचा विचार करायचा तर दोन कॅश-काऊंटर्सपैकी एक काऊंटर थोडा वेळ बंद ठेवून तो कॅशिअर स्पेअर करणं मला प्रॅक्टिकल वाटत नव्हतं. दोघांपैकी हेडकॅशियरना या छोट्याशा कामासाठी पाठवणं योग्यही नव्हतं. रहाता राहिली सुजाता बोबडे. पण तिच्या सध्याच्या अवस्थेत तिला हे काम सांगणं रास्त नव्हतं.

‘खरंतर ब्रॅंचमधे नेहमी येणारी पेट्रोलपंपाची कॅश वगळता रिसिव्हि़ंग कॅशकाऊंटरला फारशी गर्दी नसायचीच. तरीही स्टाफ ननला बँकेत पैसे भरून बाहेर पडायला इतका उशीर का व्हावा?’ मला प्रश्न पडला.

मी सुजाताला केबिनमधे बोलावलं. ‘लिटिल् फ्लाॅवर’चा विषय काढताच ती चपापली.

“.. त्यांची कॅश.. मी नाही सर, सुहास गर्देच घेतात. “

“कां? रिसीव्हिंग काउंटरला आहात ना तुम्ही?मग तुम्ही कां घेत नाही?” माझा आवाज मलाच चढल्यासारखा वाटला.

मान खाली घालून ती गप्प उभी होती.

“कांही प्रॉब्लेम?”

तिचे डोळे भरून आले.

“ठीक आहे. तुम्ही जा. सुहासना पाठवा. मी त्यांच्याशीच बोलेन. “

ती केबिनबाहेर गेली. त्या क्षणी मला तिचा भयंकर रागही आला आणि तिची 

कीवही वाटली.

पण जेव्हा सुहास गर्दे केबिनमधे आले आणि त्यांनी सर्व पार्श्वभूमी मला समजावून सांगितली तेव्हा मात्र ते ऐकून मला आश्चर्य तर वाटलंच आणि हसूही आलं. प्रश्न मी समजत होतो तेवढा गंभीर नव्हताच. गंमत म्हणजे एरवी स्ट्रिक्ट डिसिप्लिन असणाऱ्या मिशनरी सिस्टीममधल्या ‘लिटिल् फ्लॉवर’ मधील स्टाफ ननज् आणि मिस् डिसोझानाही बँकेमधे रोख रक्कम भरण्याच्या साध्या साध्या प्राथमिक नियमांचीही काहीच जाण नव्हती. रोख भरणा करायच्या रकमेतल्या नोटा कशाही उलट सुलट लावलेल्या असायच्या. शिवाय पैसे भरण्याच्या स्लिपमधे नोटांचं विवरणही, किती रुपयांच्या किती नोटा वगैरे.. , भरलेलंच नसायचं. त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या आणि त्रुटी प्रत्येकवेळी स्वतः दूर करून त्या स्टाफ ननसमोर पैसे मोजून घेण्यात खूप वेळ जायचा. तिला थांबावं तर लागायचंच शिवाय या एकाच कामात गुंतून पडल्यामुळे सुजाताच्या काऊंटरसमोर ग्राहकांची गर्दी वाढत गेली की सुजाता भांबावून जायची. आत्मविश्वास गमावून बसायची. त्यामुळे सहजसोपा आणि सोयीचा मार्ग म्हणून सुहास गर्देनी ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश स्वीकारायचं काम स्वतःकडेच घेतलं होतं. यामुळे सुजातापुरता प्रश्न सुटला तरी ‘लिटिल् फ्लावर’ चा प्रश्न मात्र अधांतरीच राहिला होता. आता मात्र स्वतः पुढाकार घेऊन तो मलाच सोडवायला हवा होता.

खरंतर त्यांचं काय चुकतंय हे त्यांना भेटून कुणी आवर्जून समजून सांगितलेलंच नव्हतं. बँकेकडून चांगल्या आणि तत्पर सेवेची अपेक्षा करणाऱ्या त्यांना ते सांगणं मला त्याक्षणी आवश्यक वाटलं.

पूर्वनियोजित वेळ ठरवून मी पुन्हा मिस् डिसोझांची भेट घेतली. त्यांना संबंधित सगळे नियम, पध्दती व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्याचं महत्त्व विशद केलं. त्या दिवशीची भरणा करायची रोख रक्कम आणि त्यांचं स्लिपबुक मागून घेतलं. त्यांनी स्टाफ-ननलाही बोलावून समोर बसवून घेतलं. हे सगळं नीट समजून शिकून घ्यायला सांगितलं. नोटा कशा अॅरेंज करायच्या, त्यांचं विवरण स्लिपमधे कसं भरायचं हे सगळं मी त्यांना समजून सांगितलं. त्याबरहुकूम स्वतःच करूनही दाखवलं.

“मी आज बॅंकेत जाताजाताच आलोय. तुमची हरकत नसेल तर आज हे स्लिपबुक आणि पैसे मी स्वतः बरोबर घेऊन जातो. वेळ मिळेल तेव्हा स्टाफ ननला स्लीपबुक घेण्यासाठी नंतर पाठवून द्या”असं सांगून मी त्यांचा निरोप घेतला. ब्रँचमधे पोचताच कॅश न् स्लीपबुक सुजाताच्या ताब्यात दिलं. थोड्या वेळानं नन् आली. स्लीपबुक घेऊन दोन मिनिटात परतही गेली. एका गंभीर बनू पहाणाऱ्या साध्या प्रश्नाचं हे सोपं उत्तर सर्वांसाठीच सोयीचं होणाराय हे लक्षात आलं आणि आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच त्यांच्याकडे जाऊन, कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी ती बँकेत घेऊन येऊ लागलो. सर्व ग्राहकांच्या बाबतीत ही अशी सेवा देणं शक्यही नसतं आणि ग्राहकांची तशी अपेक्षाही नसते. पण कधीकधी अशा अपवादात्मक प्रसंगी प्रश्न लगोलग सुटावा व महत्त्वपूर्ण ग्राहकाचं समाधान व्हावं यासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात. कायदा आणि व्यवहार यांची अशी सांगड परिस्थितीनुसार घालावीच लागते.

‘ब्रँच मॅनेजर’ हे पद दुरून पहाताना कितीही मानाचं आणि आकर्षक वाटत असलं तरी खरं तर ते जबाबदारीचंच जास्त असतं. ग्राहक, कर्मचारी आणि वरिष्ठ या परस्परविरोधी पातळ्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणून काम करताना सन्मानाची झूल अशी बऱ्याचदा स्वतःचा आब राखून उतरवून बाजूला ठेवावी लागते. मी तेच केलं होतं! 

काही दिवस हे असंच सुरळीत सुरू राहिलं. पण अचानक एक दिवस कांही घटनांना अनपेक्षितपणे वेगळं वळण लागलं आणि एका अनपेक्षित क्षणी या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला आणि पुढे मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी ठरली जी क्षणकाळापुरतं कां असेना मला हतबल करून गेली होती!

पुढे मला येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवात सुद्धा!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print