मुख्यमंत्री आणि त्यांचा लवाजमा कार्यक्रमस्थळावर पोचतो. रितीप्रमाणे राष्ट्रगीताला आणि राज्यगीताला मुख्यमंत्र्यांसह स्तब्ध ताठ उभे राहतात.मुख्यमंत्री तर दोन्ही गीतं स्वतःही म्हणतांना दिसतात.
अपवाद फोटोग्राफर्सचा.
इकडे राष्ट्रगीत सुरू आहे आणि तिकडे सगळे फोटोग्राफर उभे आडवे मेरे धरत फोटो काढतायत.अरे राष्ट्रगीताला उभे राहिले याचे फोटो कशाला ? आणि तुम्ही भारतीय नागरिक नाही आहात का ? राष्ट्र राज्यगीताला उभं राहणं,मान देणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का ? नंतर काढा की फोटो जीव जाईस्तो.
☆ “आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…” ☆ संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆
(डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचा गोषवारा)
(’आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…’ हा डॉ.तारा भवाळकर लिखित लेख रविवार विशेषमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला आहे. तो पूर्ण लेख वाचनीय झालेला आहे. शासनाने आणि मराठी माणसाने हा लेख वाचावाच आणि त्यावर चिंतन, मनन करावे. या लेखातील हिंदीच्या सक्तीमुळे बालमनावर होणारा परिणाम आणि शासनाचा निर्णय लादण्याची एकूणच पद्धत कशी अन्यायाची आहे, हे विशद करणारा लेखातील महत्त्वाचा अंश या पोस्टमध्ये श्री जगदीश काबरे यांनी संकलित केलेला आहे. तो असा…)
महाराष्ट्र शासनाचे धोरण म्हणून सध्या त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार सरकार सध्या करत आहे आणि त्यानुसार इयत्ता पहिलीपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्याचा महाराष्ट्रातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, नाट्य परिषद आणि इतर अनेक संस्थांनीही याला विरोध केला आहे. म्हणजे पहिलीपासून तीन भाषा शिकवायला या सगळ्यांचा विरोध आहे, कारण हे धोरण पूर्णपणे अशैक्षणिक आहे, आणि बाल-मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिल्या वर्गात मूल येते, त्यावेळी ते केवळ सहा वर्षाचे असते, या वयात मुलगा वा मुलगी असली तरी शाळा हीच त्यांच्यासाठी नवीन गोष्ट असते आणि शाळेमध्ये सगळे विषय आणि इतिहास, भूगोल, व्याकरण, अमूक, तमूक, वगैरे त्यांची नावेसुद्धा त्यांना नवीन असतात.
अशा स्थितीत तीन निरनिराळ्या भाषा शिकवायच्या हे म्हटले तर त्याच्या मानसिकतेच्या आणि बौद्धिकतेच्या, शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणारी छोटी मुले असतात, त्यांना इतक्या विषयांची ओळख होणे, मुख्य म्हणजे तीन चार तास एका ठिकाणी बसणेही शारीरिकदृष्टया अवघड आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या न झेपणारे आहे, आणि अशा वेळेला तीन तीन भाषा शिकायला लागणे हे अशैक्षणिक व अन्यायकारक आहे, त्यांच्यावर दबाव टाकणारे आहे. शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतच शिकवायला पाहिजेत, त्या त्या प्रदेशातील भाषा असेल तर त्या भाषेत शिकवायला हवे. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा मुलांच्या शिक्षणात प्रवेश तेव्हा होता उपयोगी नाही. खासगी जीवनात ज्या भाषा बोलत असतील ते असतील, पण बालक ज्या शाळेत जाते, तिथले शिक्षण मातृभाषेेत पाहिजे, कारण पहिल्या चार वर्षात शाळेची सवय होते, शारीरिक क्षमता वाढते, आकलनाचा पाया भक्कम होतो, मातृभाषेमुळे सर्व विषयांचे चांगले आकलन होते, मध्येच दुसरी भाषा आली तरी ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, नव्हे तो होतोच.
प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो, क्षमता वेगवेगळी असते आणि अशा वेळेला सर्वसामान्यपणे जी पातळी असते, त्याला झेपेल त्याप्रमाणेच विषय शिकवले पाहिजेत, त्यात एकच भाषा म्हणजे तीही मातृभाषाच आवश्यक आहे, हे मत आचार्य शंकरराव जावडेकर आणि विनोबाजी भावे अशा विचारवंतांचे आहे. तरच त्याला आकलनात गती प्राप्त होते. कोणत्याही टप्प्यावर मातृभाषेत शिक्षण घेतले तर त्याला नकळत भाषेच्या सर्व क्षमता लक्षात येतात. व्याकरण व भाषेचा पाया पक्का होतो. त्याला व्याकरणात काय म्हणतात हे माहीत नसले तरी वाक्य कसे असावे हे कळते. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने लिंग, वचन समजते. बोलता येते. यादृष्टीने शब्दसंग्रह, विशेषण हे बोलता बोलता नकळत पक्के होते. आपली मातृभाषा चांगल्या दृष्टीने समजली तर दुसरी भाषा समजणे अवघड नसते. कारण जो बुद्ध्यांक असतो, तो कुठल्याही विषयात सारखाच गतिमान असतो. त्या मुलाला भाषेत गती असेल, तर दुसऱ्या भाषेतही गती येऊ शकते. यामुळे चौथीपर्यंत माध्यम भाषा मातृभाषाच असली पाहिजे. दुसरी भाषा मध्ये आली, कुठलीही आली तर त्याच्या आकलनात, भाषिक आकलनात घोटाळे होतात. नेमके काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला कळेनासे होते.
प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षक व पालक असे सांगतात, की दोनही भाषा शिकवल्याचा दुष्परिणाम दोन्ही भाषांच्या आकलनावर होतो. त्यांना धड मराठीही येत नाही, इंग्रजीही धड येत नाही. अनुभव असा आहे की, आपल्याला असे वाटते की, किंवा काही शिक्षण शास्त्रज्ञ म्हणे असे सांगतात, की मुलांना लहान वयात जास्त भाषा आकलन करण्याची क्षमता असते, पण हे पूर्णपणे सत्य नाही, याचे कारण त्यांनी त्या वर्गातील मुलांना शिकवलेले नाही. जे शिकवणारे आहेत, शिकवणाऱ्या शाळा आहेत, त्यांचे मत येथे विचारात घेतलेले नाही. शिक्षण शास्त्रज्ञ आपल्या कक्षात बसून निर्णय घेत असतात, आणि काही पुस्तकात वाचून सिद्धांत मांडत असतात. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा असतो, कारण शब्दसंग्रह, लिंग-वचन भेद कळणे, दोन भाषेत उच्चारदृष्ट्या त्यांना साम्य, भेद कळणे अवघड असते. पुष्कळदा दोन भाषा जवळच्या वाटल्या तरी त्यामध्ये उच्चारानुसार अर्थबदल असतो. आज आग्रह असा चाललेला आहे, की हिंदी तिसरी भाषा शिकवावी, म्हणजे मातृभाषा म्हणून मराठी, परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि देशातील तिसरी भाषा म्हणून हिंदी. आता गंमत अशी होते, की दोन भाषांच्यामध्ये उच्चारदृष्ट्या एकच शब्द असतो, परंतु त्यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न असतात, हे भाषा शिकविणाऱ्यांना माहीत आहे. इतरांच्या कोणाच्या लक्षातही येत नाही. मग मुलांचे गोंधळ होतात. साधे उदाहरण द्यायचे झाले तर एक साधा शब्द म्हणजे चेष्टा, मराठीमध्ये चेष्टा म्हणजे टिंगलटवाळी, आणि हिंदीमध्ये प्रयत्न म्हणजे येथे दोन वेेगवेगळे अर्थ होतात. कुठे टिंगलटवाळी, आणि कुठे प्रयत्न असा अर्थ होतो हे मुलांच्या लक्षात येत नाही. मुलांच्या डोक्यात हा घोटाळा वयाच्या सहाव्या वर्षात सुरू झाला तर त्याला कुठल्याही भाषेचे आकलन नीट होऊ शकत नाही. असे अनेक शब्द आहेत आणि सध्या तर मराठी भाषेवर अनेक वेळा असे अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे.
गेली ४५ वर्षे सीमाप्रदेशात राहत असल्याने अनेक माणसे द्विभाषिक असतात, त्या दोन भाषांमध्ये एकच शब्द, एकच उच्चाराच्या दृष्टीने समान असला तरी अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ भंगार या शब्दाचा मराठीतील अर्थ मोडक्या वस्तू असा काहीसा असतो तर कन्नडमध्ये भंगार याचा अर्थ सोने असा आहे. आता हे आकलन होणे मोठ्या माणसांनाही कठीण जाते आणि मुलांना तर ते अशक्य ठरते. प्रत्येक भाषेच्या उच्चारणाची शैली वेगळी आणि उच्चारांनुसार अर्थही वेगळा होतो. म्हणजे विरामचिन्हे, आरोह, अवरोह त्यानुसार होणारे अर्थ हे सगळे एकमेकांत गुंतलेले असतात. म्हणून अर्थ परस्पराच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा असू शकतो, आणि त्याचे आकलन मुलांना होत नाही. म्हणजे मातृभाषेचा उच्चार, लेखन हे पक्के झाले की मग दुसरी भाषा शिकणे सोपे जाते. मग ती दुसरी कोणतीही भाषा असली तरी त्या दुसऱ्या भाषेचे सहज आकलन होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मातृभाषेशिवाय एखादी परकीय भाषा शिकवायला लागले, तर मुलांना आपल्या मनातील आशय सलगपणे व्यक्त करणे अवघड जाते, म्हणजे मातृभाषेतही व्यक्त करणे सोपे जात नाही. काही प्राथमिक शिक्षक असे सांगतात, की चौथीपर्यंतच्या मुलांना सरळ दहा वाक्येही मातृभाषेतून बोलता येत नाहीत. लिहिणे तर दूरच.
भाषा शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. स्वत:ची भाषा शिकवण्याची, म्हणजेच मातृभाषा शिकवण्याची पद्धती आणि इतर भाषा शिकवण्याच्या पद्धती या शिक्षण शास्त्रदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, हे एक शिक्षिका म्हणून नमूद करावेसे वाटते. या सगळ्याचे आकलन शिक्षकांना झाले नसेल तर नेमक्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे ती भाषा आत्मसात होऊ शकत नाही.
लोकांना एका वेळी अनेक भाषा आल्या पाहिजेत असे मानले जाते. यामुळे प्रगल्भता येते असा समज आहे. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळी तुम्हाला एक भाषा चांगल्या पद्धतीने आकलन होते. ज्यावेळी तुम्हाला एका भाषेचे नीट आकलन होत असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला दुसऱ्या भाषा शिकण्यास अवघड जात नाही. कारण आकलन क्षमता चांगली झालेली असते. ते आकलन नसताना नुसती भाषा शिकवणे उपयोगाचे नाही.
आपण महाराष्ट्राचा अभिमान बाळगतो असे म्हणतो, शिवाजी महाराजांनी अरबी, फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द कसे निर्माण करता येतील यासाठी विद्वजनांची बैठक बोलावून राज्यव्यवहार कोष तयार केला होता. आपल्याला मराठीचा, इतिहासाचा, ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत आलेल्या साहित्य परंपरेचा, शिवाजी महाराजांचा खरोखरच अभिमान असेल तर आधी आपल्याला भाषेचा अभिमान बाळगावा लागेल. त्या भाषेचे आकलन नीट व्हावे यासाठी इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतूनच म्हणजे मराठीतूनच शिकवायला हवेत. पाचवीमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला दुसरी भाषा आणि आठवीमध्ये तिसऱ्या भाषेचे ज्ञान द्यावे, कारण तोपर्यंत त्याची शारीरिक क्षमता वाढलेली असते. सहा वर्षांच्या मुलावर तीन-तीन भाषांचे आणि बाकीच्या विषयांचे ओझे लादणे अन्यायकारक व अशैक्षणिक आहे. म्हणून सहा वर्षांच्या मुलाला मातृभाषा, तीन वर्षांनी दुसरी भाषा आणि मूल १२ वर्षांचे झाल्यानंतर तिसरी भाषा अशीच पद्धत हवी. म्हणून मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगत असताना परप्रांतीय भाषेची अप्रत्यक्ष सक्ती होणं हेही तितकंच अन्यायकारक आहे.
☆ “वटपौर्णिमा: एका नवीन दृष्टिकोनातून!!” ☆ श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) ☆
☆
वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दनः ।
*
वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता ।।
वटानि वेष्टयति मूलेन वृक्षांतरमिति वटे ।
*
आज आहे वटपौर्णिमा!
☆
आर्यांच्या भार्यांचा सौभाग्य दिवस!
धार्मिक पार्श्वभूमी परंतु वैचारिक पाया असलेल्या, आर्यांच्या अनेक श्रीमंत पुराणकथांप्रमाणे ही एक कथा- सत्यवान सावित्रीची!
पाश्चात्य अशा कथांना ‘मायथॉलॉजी’ म्हणतात. आम्ही तो अंधपणे वापरतो. किती चुकीचा शब्द!
इंग्रजी Myth हा शब्द संस्कृत मिथ्या या शब्दावरूनच आला असण्याची दाट शक्यता आहे.
ऑक्सफर्ड शब्दकोश सांगतो- myth म्हणजे दंतकथा किंवा अशी कल्पना किंवा गोष्ट ज्यावर लोक विश्वास ठेवतात. पण ती अस्तित्वात नसते किंवा सत्य नसते. मिथ म्हणजे पुराणकथा असाही दुसरा अर्थ ऑक्सफर्ड शब्दकोश आपल्याला सांगतो.
आपल्या अत्यंत समृद्ध परंपरेमध्ये अनेक गोष्टी आणि अनेक कथा, परंपरेने गेली सहस्त्रावधी वर्षे एका पिढीकडून पुढील पिढीला सोपवल्या गेल्या आहेत. त्यांना काल-परवापर्यंत ‘myth’ असं म्हटलं जात होतं, त्याला आता शास्त्रीय आधार मिळू लागला आहे. आपल्या ज्या अनेक गोष्टींना मिथ्या म्हणून हिणवलं गेलं त्या सत्य आहेत, असं हळूहळू प्रतिपादित होत आहे.
आजची सत्यवान सावित्रीची, सती सावित्रीची, वटसावित्रीची कथा ही अशीच एक सत्यकथा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्यात थोडी अतिशयोक्ती असेल, नाही असे नाही. परंतु ते संपूर्णत: मिथ्या नाही यावर विश्वास ठेवा. विराट वटवृक्षाच्या शास्त्रीय गुणांकडे किंवा मानवी आरोग्याला या वटवृक्षापासून जे काही लाभ होत असतात त्याच्या खोलात शिरण्याचा या लेखाचा उद्देश नाही.
वटपौर्णिमेच्या सणाकडे आम्ही आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहोत.
ज्येष्ठाचा महिना नावाप्रमाणेच सर्व महिन्यांमध्ये ज्येष्ठ आहे. याचं कारण वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू संपून ज्येष्ठामध्ये वर्षा ऋतू सुरू होतो. वर्षा ऋतू म्हणजे समृद्धीचा, संपन्नतेचा, सुखवर्षेचा, जलवर्षेचा ऋतू. वसंतातले शृंगार संपलेले आहेत. ग्रीष्माचा दाहक उन्हाळा संपत आलेला आहे. वातावरण कोरडं आहे. पृथ्वी अतृप्त आहे. तृषार्त आहे. ही तहानलेली वसुंधरा आता आपल्या प्रियकराची अधीरतेने वाट पाहत आहे! मेघांची कृष्णवस्त्रे परिधान करून, लखलखीत सौदामिनीचे तेजस्वी अलंकार अंगाखांद्यावर मिरवत, मरुत रथावर आरूढ होऊन गडगडाटी वाद्यांच्या जयघोषात वरुणाने गरजत, बरसत, नैऋत्येकडून वेगाने यावं आणि आवेगाने आपल्यावर वर्षावं, बरसावं, चिंब भिजवावं या प्रतीक्षेत सूर्यमालिकेतील ही सम्राज्ञी आहे! भूमिरूपी शरीरावरील रंध्र आणि रंध्र वरुण राजाने स्वर्गातील देण्याने भरून टाकावे, आणि मग त्याच रोमारोमांतून, जीवनाचे नवीन हरित अंकुर आकाशाकडे झेपावावे, पुन्हा नवीन जीवन आपल्या कुशीत जन्म घ्यावं हे स्वप्न उराशी बाळगून ही शुष्कअधर धरा सख्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.
आणि तो येतोच! दिग्गजाच्या दिमाखात! रुद्राच्या रुबाबात! धरित्रीला कडकडून भेटतो, बरसतो, शांत होतो. आणि ती पण शांत होते. या मीलनातून नवं जीवन जन्म घेतं! पृथ्वी मोहरून जाते. मातृत्वाचा महोत्सव सुरू होतो. हा नुसता मातृत्वाचा महोत्सव नव्हे! हा अमरत्वाचा पण महोत्सव!
जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत वरून वरुण कोसळत राहणार आहे तोपर्यंत पृथ्वी आणि पृथ्वीवरचं जीवन अमर असणार आहे याची ही ग्वाही आहे! ती सावित्री हे आमच्या पृथ्वीचे प्रतीक आहे! आणि आमच्या माताभगिनी हे त्या सावित्रीचे प्रतीक आहेत! जोपर्यंत या माता-भगिनी आहेत तोपर्यंत नवजीवन उमलत राहणार आहे, त्यांच्या कुशीमध्ये नवे अंकुर जन्म घेत राहणार आहेत, तोपर्यंत मानवता अमर असणार आहे!
हा विशाल वटवृक्ष पृथ्वीतूनच वरती आला आहे आणि त्याच्या पारंब्या परत पृथ्वीकडे झेपावत आहेत. स्त्रीच्या उदरातून जन्मणारा पुरुष पुढे स्त्रीच्याच प्रसवशील उदरातून मानवतेचा निर्झर पुढे अखंड वाहता ठेवण्यासाठी कणभर का होईना, योगदान देतो. वटवृक्ष हे त्याचंच प्रतीक!
वटवृक्ष विशाल आहे. परंतु पृथ्वीपेक्षा मोठा नाही. पुरुष श्रेष्ठ आहे. परंतु स्त्रीपेक्षा मोठा नाही, हेच यातून सांगायचं आहे. बरं, आमच्या माता भगिनींचं हृदय इतकं विशाल की, पुरुषानं दिलेल्या कणभर योगदानाचं त्या शंभर नंबरी सोन्यात रूपांतर करतात, अवघ्या नऊ महिन्यात! तरी यत्किंचितही आसक्ती नाही की गर्व नाही! ‘नवजीवनाचा अंकुर स्त्रीचं नाही तर पुरुषाचं कुलनाम लावतो! ‘इदम् न मम’ या निष्काम वृत्तीने आमच्या माता भगिनी अक्षरशः जिवावर उदार होऊन, यातना सोसून मानवतेला अमर करण्यासाठी झिजत राहतात. नवांकुर निपजवत राहतात!
क्षण एक पुरे प्रेमाचा
वर्षाव पडो मरणांचा!
या आचार्य अत्र्यांच्या अजरामर सुभाषिताचे मूर्त स्वरूप म्हणजे आमच्या माता भगिनी!
साऱ्या हालअपेष्टा सोसूनसुद्धा आपल्या पतीची अत्यंत प्रेमाने, निर्व्याज भावाने सेवा करण्यात माता-भगिनींना पराकोटीची धन्यता आणि कृतकृत्यता वाटते. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये, चढउतारांमध्ये, पतीचा त्यांना खचितच वटवृक्षासारखा आधार असतो. पतीच्या छातीवर डोकं ठेवल्यावर, दिवसभराचे श्रम स्त्री एका क्षणात विसरून जाते! जणू काही वटवृक्षाखाली बसलेला पांथस्थ! स्त्रीची रीतच काही वेगळी! ज्या वटवृक्षाखाली ती बसते तो वटवृक्ष एकेकाळी तिच्याच उदरातून निपजलेला असतो! असं हे परस्पर जीवाभावाचं नातं!
वटवृक्ष पांथस्थाकडे जात नाही, पांथस्थ वटवृक्षाकडे येतो! नदी सागराकडे जाते! स्त्री पतीकडे जाते! या साऱ्याचं उदात्त प्रतीक म्हणून वटवृक्षाजवळ जाऊन स्त्रिया हा स्त्री-पुरुष नात्याचा भव्य दिव्य आणि अनंत काळपासून चालत आलेला सोहळा साजरा करतात. त्यामुळे घरात वडाची फांदी आणून हा भव्य दिव्य सोहळा साजरा करू नका. कोजागिरी पौर्णिमेला खोलीतील ट्यूबलाइटखाली बसून दूध पिण्यासारखे आहे ते!
निसर्गाकडे जा! वटवृक्षाखाली जा. सूत गुंडाळत असताना त्याच्या अथांग पानांकडे पहा, त्याच्या भक्कम खोडाकडे पहा. त्याच्या साजिऱ्या गोजिऱ्या पारंब्यांकडे पहा! डोळे भरून पहा.
वटवृक्षाच्या भोवती गुंडाळले गेलेले सूत म्हणजे स्त्रीचे पुरुषाभोवती असलेले प्रेमपाश आहेत! ते जोपर्यंत भक्कम आहेत तोपर्यंत काय इकडे तिकडे जाईल पुरुष, त्याची बिशाद! असा सगळा हा प्रेमाचा, विश्वासाचा, श्रद्धेचा आणि मानवतेचा मामला आहे!
वटपौर्णिमा हा या अशा स्वर्गीय, दैवी नात्याचा महोत्सव आहे! स्त्री आणि पुरुष यांचं परस्परांवरील प्रेम, त्यांची एकमेकांवरची नितांत श्रद्धा आणि पवित्र असे विवाहबंध, यांचा हा त्रिवेणी संगम वरून प्रेमाचे साक्षात प्रतीक असलेला निशिकांत चंद्र मोठ्या कौतुकाने पाहत आहे! पौर्णिमेचा चंद्र! सुखाची पौर्णिमा! ती ही वटपौर्णिमा!!
(पूर्वसूत्र- पॅकिंग उघडून त्यातले कपडे बाहेर काढताना नॅपकीनची घडी थोडी जड वाटली म्हणून मी उलगडून पाहिलं तर आत एक दत्ताची मूर्ती! ती नीट रहावी म्हणून अशी नॅपकिनमधे व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली असावी. मी भान हरपून त्या मूर्तीकडे पहातच राहिलो…! )
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पोटापाण्याचं नियोजन सुरू झालं तरी मन त्या मूर्तीजवळच घुटमळत होतं. आठ वाजता जवळचं दुकान उघडताच आधी तीनचार दिवसांपुरतं वाणसामान आणलं. मग आंघोळ करून दत्ताची मूर्ती त्या रिकाम्या देवघरांत ठेवली आणि हात जोडून अलगद डोळे मिटले. मनातली अस्वस्थता क्षणार्धात नाहीशीच झाली. त्या मूर्तीला माझ्या मनात एक खास स्थान होतं त्याला कारणही तसंच होतं. ती मूर्ती मला चार वर्षांपूर्वी एखादा चमत्कार घडावा तशी मिळाली होती तेव्हाची ती तिन्हीसांज मी कधीच विसरणं शक्य नाही. एखादी गोष्ट अगदी निकडीची वाटत असूनही त्याक्षणी नाही मिळाली तर मन अस्वस्थ होणारच ना? माझंही तसंच झालं होतं. तेव्हाच्या माझ्या अस्वस्थतेला निमित्त झाला होता तो खूप वर्षांपूर्वी बाबांनी, मी घर सोडून नोकरीच्या शोधात आयुष्यांत प्रथमच मु़ंबईला निघालो तेव्हा आशीर्वाद म्हणून मला दिलेला दत्ताचा एक अगदी लहान कागदी फोटो! माझ्या आयुष्यातल्या माझ्या मनात घर करून राहिलेल्या कांही मोजक्या अशा अतिशय करूण प्रसंगांपैकी तो एक प्रसंग! या सदराच्या ८व्या भागात तो सविस्तर आलेला आहेच. बाबा तेव्हा अंथरुणाला खिळून होते. मुंबईत एक जुजबी पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी माझ्यासाठी चालून आली तेव्हा ती स्वीकारून मी चांगल्या नोकरीच्या शोधात रहावं असं ठरलं आणि मुंबईला जाण्यासाठी मी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. निघायची वेळ आली तेव्हा विचित्र दडपण आणि अनामिक अशा भीतीमुळे मी खचूनच गेलो होतो. निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला त्यांच्याजवळ गेलो तेव्हा आपल्या थरथरत्या हाताने माझा आधार घेत ते कसेबसे उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.
“तुला काय देऊ? “
त्यांनी विचारलं. पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी आम्हा कुणाचीच अपेक्षा नव्हती.
“छे छे बाबा.. खरंच काही नको. आशीर्वाद द्या फक्त. “
“ते तर आहेतच रे… ” बोलत बोलत त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला. तिथे ठेवलेली त्यांची डायरी उचलली. आणि त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढून तो मला दिला.
“घे. हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत. नीट जपून ठेव. याचे नित्यदर्शन घेत जा. या फोटोच्या रूपात दत्तमहाराज तुझी पाठराखण करतील. ” ते म्हणाले होते. तो बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा आणि एका पेराएवढ्या रुंदीचा दत्ताचा लहान फोटो होता. पिवळ्याधमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं! माझ्या आयुष्यांत आलेल्या असंख्य कसोटी पहाणाऱ्या प्रसंगांच्या वेळी फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा देत आलं होतं ते हेच दत्तरूप!
आजही तो फोटो आणि त्याचे नित्यदर्शन घेताना मला आठवत रहाणारे माझे बाबा ही माझ्यासाठी अतिशय मोलाची अशी ठेव आहे!
वर्षानुवर्षे माझ्या डायरीत जपून ठेवलेल्या त्या दत्तरूपाचं नित्यदर्शन घेत पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरची, अकोल्याला गेलो त्याच्या चार वर्षं आधीची ती संध्याकाळ! तोवर हा फोटो कांहीसा जीर्ण झाला होता. त्याच दरम्यान माझी इचलकरंजीहून आॅडिट डिपार्टमेंटला बदली होऊन मी एका शनिवारी रिलिव्ह झालो. रविवारच्या रात्रीचं पुण्याचं रिझर्वेशन. योगायोग असा की माझ्या कोल्हापूरला रहाणाऱ्या भावाकडे तेव्हा आई होती आणि ती तेव्हा मुंबईला माझ्या मावशीकडे गेलेली होती. त्यामुळे तिला भेटून पुण्याला जाणं मला शक्य होणार नसल्याची रूखरूख माझ्या मनात होती. आणि अचानक भावाचा निरोप आला. ‘आई मुंबईहून परतीच्या प्रवासाला निघालीय. ती थेट कोल्हापूरला न येता आधी सांगलीला तुझ्याकडे येईल आणि तुम्हा सर्वांना भेटून, शनिवारची रात्र राहून मग कोल्हापूरला येईल’ असं भावानं सांगितलं. माझ्या मनातली रूखरूख त्यामुळे नाहीशी झाली हे खरं तरीही आईचं येणं माझ्यासाठी एक शुभशकुनही ठरणार आहे याची मात्र मला तेव्हा कल्पना नव्हती. पण घडलं तसंच. आईचे आशीर्वाद घेऊन नवी जबाबदारी स्विकारायला जाण्याची माझी इच्छा पूर्ण होणाराय याचा आनंद होताच. मी इचलकरंजी ब्रॅंचमधून रिलिव्ह झाल्यानंतर निघताना ड्राॅवरमधली माझी डायरी आठवणीने सोबत घेतली. त्याच डायरीत मी बाबांनी दिलेला ‘तो’ फोटो ठेवलेला होता. दर नवीन वर्षाच्या सुरुवातीला डायरी बदलताना तो फोटो नव्या डायरीत आठवणीने ठेवणं गेली पंचवीस वर्षं माझ्या अंगवळणीच पडलं होतं. त्यादिवशी मात्र हातातल्या डायरीतला तो फोटो पहाताना अनेक शक्याशक्यतेंचे विचार मनात गर्दी करू लागले. आता ऑडिट डिपार्टमेंटला गेल्यावर सततची फिरती. नित्यपूजा, रोजचं गुरूचरित्र वाचन हे कांही आता शक्य होणार नव्हतंच. आणि हा फोटोही प्रवासात तेवढ्या निगुतीने जपता येणार नव्हता. म्हणूनच दत्ताची एखादी छोटी फोटोफ्रेम आपण विकत घ्यावी, जेणेकरून पोथी वगैरे नाही तरी सततच्या प्रवासात ती आपल्याला सोबत नेता येईल. त्यासाठी आता सांगलीला घरी गेल्याबरोबर लगेच बाहेर पडून मार्केटमधे जायला हवं. कारण रविवारी तिथली दुकानं बंद. ही खरेदी आजच करायला हवी. मी घरी पोचताच आरतीने चहा केला. ती स्वत:चं आवरून माझी वाट पहात होती. पाच वाजून गेले होते आणि मुंबईहून निघालेली आई सातच्या दरम्यान घरी येणं अपेक्षित होतं. तरीही दोन तास म्हणजे पुरेसा वेळ होता पण आता उशीर करून चालणार नव्हतं. आम्ही घराला कुलूप लावून निघालो. पेठेतल्या गिफ्ट सेंटर्सकडे मोर्चा वळवला. दत्ताच्या लहानमोठ्या अनेक फोटोफ्रेम्स बघितल्या पण त्यातली एकही पटकन् घ्यावी असं वाटेचना. प्रवासात नेण्यासाठी मला हवी होती तशा छोट्या आकाराच्या फ्रेम्स मोजक्याच होत्या, पण प्रत्येकवेळी डायरीतल्या फोटोतलं तेजस्वी दत्तरूप नजरेसमोर यायचं आणि समोरची फोटोफ्रेम बाजूला सारली जायची. मग छोट्या मूर्तीही पाहिल्या पण त्याही आवडतील अशा नव्हत्याच.
साडेसहा वाजून गेले तेव्हा आई यायच्या आत घरी पोचणं आवश्यक असल्याने आम्ही नाईलाजाने रिक्त हाताने परतीची वाट ठरली. थोडी नाराजी मनात होती पण पर्याय नव्हता. त्याक्षणी तातडीनं घरी पोचणं हेच महत्त्वाचं होतं.
घरापर्यंत गेलो तेवढ्यात आईही आमच्या पाठोपाठ रिक्षातून उतरली. तिची बॅग घेऊन आम्ही आत नेऊन ठेवली. चहापाणी झालं आणि आईने आतली बॅग आणायला सांगितलं.
“आधी तुझा ऐवज तुझ्याकडे सोपवते.. ” बॅग उघडताना ती म्हणाली.
” ऐवज? .. म्हणजे गं? “
” हे घे. तारामावशीनं खास तुला भेट म्हणून दिलंय. हे द्यायचं होतं म्हणून तर मी आधी इथं आले. ” आई म्हणाली. मी पुढे होऊन ते गिफ्टपॅक घेतलं. उत्सुकतेनं उघडून पाहिलं तर आत दत्ताची एक सुंदर मूर्ती! माझा विश्वासच बसेना. हवं ते हवं तेव्हा मिळण्यातला तो आनंद खरोखरंच अवर्णनीय होता!
“ही मूर्ती? तारामावशीनं दिलीय? मला? कां बरं? कारण काय सांगितलं? ” न रहावून मी विचारलं.
” खूप दिवसांपूर्वीच तिने घेऊन ठेवली होती म्हणे. आपल्यापैकी कुणी भेटेल तेव्हा द्यायचं ठरवलं होतंन्. मी गेलेच होते, म्हणून माझ्याकडे दिली.. ” आई म्हणाली.
मला गिफ्ट शाॅपीमधे मनासारखी फोटो फ्रेम किंवा मूर्ती न मिळणं, मुंबईला गेलेल्या आईचं नेमकं आजच परत येणं, तारामावशीला माझ्यासाठी भेटवस्तू म्हणून ही मूर्तीच द्यावीशी वाटणं आणि खूप आधीपासूनच तिने माझ्यासाठी ती घेऊन ठेवलेली असणं, आणि नेमकी मला हवी तेव्हाच ती मिळणं हे सगळे फक्त योगायोग असूच शकत नव्हते! त्या सगळ्यापेक्षाही खरंच वाटणार नाही असं आश्चर्य म्हणजे बाबांनी मला आशीर्वाद म्हणून कित्येक वर्षांपूर्वी दिलेल्या, मी डायरीत जपून ठेवलेल्या त्या फोटोचंच ही मूर्ती म्हणजे हुबेहूब मूर्तरूप होतं! तसंच पीतांबर, प्रसन्न चेहऱ्यावरचं तेच मंद स्मित, उभं रहाण्यातली तीच ढब. तो फोटो देऊन एखाद्या मूर्तीकाराकडून तशीच मूर्ती घडवून घेतलेली असावी तसं त्या फोटोचंच हे प्रतिरूप!! ती पहाताक्षणीच नजरेला जाणवलेल्या अद्भूत स्पर्शाने मी शहारलो! हे सगळंच अतर्क्यच नव्हतं फक्त तर माझ्यापुरतातरी तो एक चमत्कारच होता!!
त्याच मूर्तीला आज नमस्कार करून बॅंकेत जायला निघताना याच सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या होत्या!
बॅंकेत जायला बाहेर पडलो तरी मनात गर्दी होती ती याच विचारांची! त्याच गर्दीतून वाट काढत वर झेपावले ते याच संदर्भातले नंतरचे कितीतरी प्रसंग! त्या घटनेच्या मुळाशी जात तिचा कार्यकारणभाव शोधण्याचे मी केलेले आटोकाट तरीही तितकेच केविलवाणे प्रयत्न आणि त्याला लगडलेले तारामावशीच्या संदर्भातले महत्त्वाचे धागेदोरे, ज्यांनी मला निरूत्तर करीत माझ्या मनातल्या श्रद्धेची वीण अधिकच घट्ट केलेली होती! त्या सगळ्याच आठवणी म्हणजे अकोल्यातल्या प्रतिकूल परिस्थितीने दिलेल्या चटक्यांवर घातलेली हळूवार फुंकरच ठरली माझ्यासाठी…!
यावर्षी चंदिगढमधील पंजाब युनिव्हर्सिटीने एका वर्षाचा कर्मकांड आणि पौराहित्य शिकवण्यासाठी डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे. सामान्य हिंदूंनी पौरोहित्य केल्यामुळे घरात धनधान्य, समृद्धी आणि आरोग्य वास करेल, असे कोर्स सुरू करणाऱ्या तज्ञांचे म्हणणे आहे. ते खरेच आहे म्हणा. कारण मंत्रामध्ये ताकद असते हे तर आता नासानेसुद्धा मान्य केले आहे. अमेरिका, रशिया, झालेच तर बुर्किनो फासो येथे मंत्रांवर संशोधन करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप विद्यापीठातून तर यावर असंख्य संशोधन निबंध प्रसिद्ध होत आहेत. फार काय, आपले थोर मांत्रिक परमपूज्य श्री श्री श्री तात्याजी विंचूजी यांच्या आदिमंत्राला जगातील सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. असे असताना या देशात मात्र मंत्र आणि मांत्रिक याकडे वाईट नजरेने पाहण्याचे नतद्रष्ट फॅड बोकाळले आहे. ‘शिकले तेवढे हुकले’ असे आमचे थोर गुरुवर्य बाबाजी बंगाली म्हणत ते काही खोटे नाही. या शिक्षणामुळेच आपल्या पारंपरिक ज्ञानाला नावे ठेवण्याची वाईट परंपरा येथे निर्माण झाली आहे.
तसेच पुण्यातील एका रुग्णालयात आमच्या एका मांत्रिकबंधूने केलेल्या उपचारांवर होत असलेली टीकाही त्या परंपरेतूनच आलेली आहे. कीव येते आम्हास त्या टीकेची आणि टीकाकारांची! मंत्रशक्तीवर एवढा अविश्वास? त्यांना काय वाटते, सारे काही विज्ञानामुळेच होते? अज्ञान आहे ते त्यांचे! अशा अज्ञानींची टीका काय मनावर घ्यायची, या सात्त्विक विचारानेच आम्ही गप्प आहोत. पण आमच्या संयमाची नैदानिक चाचणी घेऊ नका. आमच्याही हाती लिंबू आणि टाचण्या आहेत. मनात आणले तर आम्ही कधीही ओम फट् स्वाहा करून त्या टीकाकार दुश्मनांची नळी तोडू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. असो.
पुण्यातील रुग्णालयाने मांत्रिकोपचाराला सहर्ष मान्यता दिल्यामुळे तेथे एका रुग्णावर वैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीत रीतसर मंत्र-तंत्रोपचार करण्यात आले. समोरची शक्ती अधिक होती. करणी जरा जास्तच काळी होती. वेळ कमी असल्याने ती उलटवणे शक्य झाले नाही. परिणामी रुग्ण दगावला, ही बाब वेगळी. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राचा वापर करूनही रुग्ण दगावतातच ना? तेव्हा शास्त्र चुकीचे नाही. त्याविरोधात उगाच अंधश्रद्धा म्हणून बोंबाबोंब करून आपल्या पवित्र धर्माच्या विरोधात वागण्याऐवजी सर्वानी त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. या शास्त्राचा आपल्या उपचार पद्धतीत समावेश करून घेतला पाहिजे. केंद्रात आयुष मंत्रालयाची स्थापना झालेली आहे. तसे खास ‘जारण-मारण मंत्रालय’ आपल्याला स्थापन करता येईल. स्किल इंडियाअंतर्गत सर्व मांत्रिकांना, बाबा बंगालींना एकत्र आणून त्यांची रुग्णालयांमध्ये नियुक्ती करता येईल. त्याद्वारे देशातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीच नव्हे, मूठकरणी, वशीकरण, प्रेमसंबंध, लग्न न होणे, नोकरी न मिळणे, मूल न होणे अशा कित्येक समस्या शंभर टक्के गॅरंटीपूर्वक दूर केल्या जाऊ शकतील. एक महिन्यात समस्या दूर न झाल्यास सगळे पैसे गॅरंटी के साथ परत देणारी अशी उपचार पद्धती आज अमेरिकेतसुद्धा नाही. ती येथे लागू करता येईल.
विज्ञानवाद्यांना हे सारे हास्यास्पद वाटेल. परंतु यज्ञामुळे पर्यावरण शुद्ध करता येते, मोबाइलला गाईचे शेण लावले तर त्यामुळे किरणोत्साराचा धोका नष्ट होतो अशा अनेक गोष्टी तरी त्यांना कुठे पटल्या आहेत? परंतु आज आपण ते मान्य केलेच आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांतही आज ना उद्या मानद मांत्रिकांच्या जागा भरल्या जातील आणि देशात एक नवी आरोग्यमंत्रक्रांती होईल यात आम्हाला शंका नाही. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातून त्याची सुरुवात झालेली आहेच. जयतु हिंदुराष्ट्रम् !!!
खरतर टांग म्हटल्यावर नानाची टांग हेच आठवतं. असं म्हणणं सभ्यतेला धरुन नसले तरी सभ्यपणे राग व्यक्त करण्यासाठी या पेक्षा सभ्य शब्द नाहीत. टांग हा असभ्य शब्दातला त्यातल्यात्यात सभ्य वाटतो. दगडापेक्षा वीट मऊ………
झालं असं…. परवा सहज म्हणून मुलांची सायकल चालवावी असं वाटलं म्हणून सायकलवर टांग टाकावी म्हणून सायकलीसह बाहेर पडलो……. सायकलवर टांग टाकावी अस म्हटल्यावरच चालवायच फील येतं. पण आज तो योग दिसत नव्हता.
सायकल घेऊन थोडे पुढे जाऊन टांग टाकणार तोच एका ओळखीच्यांनी हात दाखवला…. टांग टाकतांना कोणी हात दिला तर बरं वाटत, पण दाखवला तर वाईट वाटतं हे तेव्हा मला चांगलं जाणवल. त्यांनी वर करून दाखवलेल्या हातामूळे माझी वर गेलेली टांग खाली आणावी लागली, आणि सायकलवर टांग टाकणे राहिले. थोड्या गप्पा झाल्यावर त्यांचा कल पाहून मी सायकल घेऊन पुढे निघालो……. आजकाल कोणतीही गोष्ट कल पाहून करावी लागते. नाहीतर उगाच कलकल होते.
परत पाय टाकणार, तोच शेजारचे रस्त्यात दिसले. काय? सायकल चालवायला सुरुवात करणार का? छान… आजकाल आपला पाहिजे तसा व्यायाम होत नाही. अधुनमधून चालवणे गरजेचे आहे. सध्या व्यायाम करायला सायकल हाच उत्तम उपाय आहे. उपाय यावर ते इतके बोलले की मला बऱ्याचदा तिथून काढता पाय घ्यावा आणि सायकलवर टाकावा असे वाटले. पण उपायावर ते इतके घट्ट चिकटले होते की मला थांबून ऐकणे हाच उपाय होता. इतका त्यांचा उपाया वरचा पाया भक्कम होता.
एकदाचा त्या (उ)पायातून सुटलो. परत पुढे जाऊन सायकलवर पाय टाकून बसणार…… तोच परत ओळखीचा आवाज. कसे काय? आज एकदम सायकल? नाही, चांगलेच आहे ते. पण सांगतो आजकालच्या सायकल फक्त दिखाऊ….. आपल्या वेळी कशा टिकाऊ होत्या. यावर त्यांनी नाजूक, दणकट, दिखाऊ, आणि टिकाऊ यावर त्यांचे मन मोकळं करण्यास सुरुवात केली. (अगदी घंटागाडीत कचऱ्याची टोपली झटकून रिकामी करावे तसे. ) मी त्याच्या टिकाऊ आणि दिखाऊ यावर खाऊ की गीळू या नजरेने बघत ऐकत राहिलो. आणि परत एकदा सायकलवर बसण्याऐवजी त्यांचे ऐकत ऊभा राहीलो.
चला आता आरामात सायकल चालवू, असा विचार केला तोच परत आणखीन एकदा थांबावे लागले. कारण परत ओळख हेच होते. अहो आजकाल तुमच्या सारख्याचे काम एक. सी. मधे आरामात बसून करायचे. त्यामुळे अस सायकल चालवणं गरजेचे आहे. तुमच्या सारख्यांचे आणि आरामात बसून यावर त्यांचा इतका जोर होता की थोडावेळ मी काहिही काम न करता दिवसभर नुसता बसून (फुकटचा) पगार घेतो असच मला वाटलं.
आज बहुतेक सगळ्याच राशी माझ्या राशीला भेटण्याचा योग दिसत होता. कारण यात बराच वेळ खर्च झाला होता. (आपण स्व:ताहून बोललो तर आपण वेळ देतो. आणि दुसरा आपल्याशी बोलला तर आपला खर्च होतो. हे मला नव्याने समजले. ) आता इतकावेळ गेल्यावर सायकलवर टांग टाकायची या विचारालाच टांग मारावी असे वाटले आणि घराकडे परतलो. ते देखील सायकल हातात धरुनच…..
पण परतीच्या प्रवासात देखील परतीच्या पावसासारखे अवेळी एकाने मला गाठलेच. आणि विचारले…… झाली का रपेट मारुन…… किती लांब गेला होता. सकाळची वेळ छान असते बघा….. आपण बदल बदल म्हणतो तो हाच. आपण मुलांची सायकल चालवतो, आणि मुलांना वडिलांची गाडी चालवायची असते……. चालायचेच, चालवा असे म्हणाले. मी मनातच म्हटले तुझ्या नानाची…….. आणि सायकलवर टांग न टाकताच घरी परतलो. एखादी जागा (खूर्ची) मिळाल्यावर तेथून पायउतार होण्याचे दु:ख काय असते ते मी सायकलवर न बसता पायउतार होऊन अनुभवले. आणि सायकल जागेवर ठेवून पायऱ्या चढायला म्हणून टांग उचलत होतो.
त्यादिवशी सकाळी सगळी कामं आटपून रोजच्या प्रमाणे पेपर हाताळायला घेतला तर ही मोठ्या ठळक अक्षरात जाहिरात दिसली….
अंतराळवीरांसोबत जायला मेड पाहिजे. अंतराळात पण प्रदूषण वाढायला नको व त्यांना ताजे अन्न मिळायला हवे म्हणून काहीही शिजवलेले अन्न न नेता कुकिंग करू शकणारी मेड न्यावयाचे ठरले आहे. भारतीय असल्यास प्राधान्य
वाचूनच माझ्या तर मनातल्या मनात लाडू फुटायला लागले. डॉ. जयंत नारळीकर माझ्या दूरच्या नात्यात होते. माझी आई नेहमी सांगायची, फार पूर्वी त्यांच्या व आपल्या बैलगाडीचे चाकं एकाच बोरीच्या झाडापासून बनवले होते म्हणून. मी ठरवलं! त्यांच्याकडूनच थोडा वशिला लावायचा आणि जायचंच. ह्यांना तसं सांगितलं व मुलीला विचारून, मी जाऊन येईपर्यंत त्यांना मुलीकडे ठेवायचे ठरलं.
हे बोललेच मध्ये…..
“सुनिता विल्यम्स सारखी अडकून पडली म्हणजे? ”
मी म्हटले..
“काही अडकत नाही. आणि ती अडकली तरी आलीच ना वापस? आधी मला अर्ज तर करू द्या. त्याच्यानंतर सिलेक्शन होईल. मग मी जाईल”
मी अर्ज केला ठरल्याप्रमाणे वशिला पण लावला आणि एक दिवस गंमतच झाली चक्क नासा मधून फोन वाजला….
“My name is John, I’m speaking from NASA. Are you Jyoti Kulkarni? “
मी म्हटले…
“Yes, but I can’t speak English and I don’t understand it. Can you arrange for someone who speaks Marathi? “
तो म्हणाला…
“There is no need for that. We have developed an app that translates from speech. If I speak English, you will hear it in Marathi, and if you speak in Marathi, I will hear it translated into English. “
चलाबाई माझा मोठा प्रश्न मिटला तेवढं इंग्लिश मध्ये बोललेलं समजलं मला पण पुढचं कसं समजलं असतं इतकं सगळं?
तो पुढे म्हणाला….
“अभिनंदन मॅडम तुमचे अंतराळवीरांसोबत मेड म्हणून जाण्यासाठी तुमचं सिलेक्शन झालं आहे. ” बापरे! मला तर काही सुचतच नव्हतं आनंदाने! यांना म्हटलं….
“अहो माझं सिलेक्शन झालं आहे अंतराळवीरांसोबत जाण्यासाठी” आता ह्यांना कुचकं बोलल्याशिवाय राहवलं नाही…
“मेड म्हणूनच ना! ” बडबडलेच ते
स्वतःला यायला मिळणार नाही म्हणून जळकुकडेपणा आहे येवढंही कळत नाही का मला! मी साफ दुर्लक्ष केलं आणि म्हंटलं ;
“हो पण म्हणून काय झालं! त्यांना माझ्या कष्टांची, चांगला स्वयंपाक करण्याची किंमत आहे म्हणून माझं सिलेक्शन झालं बरं”
तितक्यात तो म्हणाला,
“आधी माझं ऐकून घ्या मॅडम! मग तुम्ही आपसात भांडा! ” मी तोंडावर हात ठेवून त्याला तोंड वाकडं केलं. व्हिडिओ काॅल होता नं!
मनातच म्हंटलं “सगळे पुरुष इथून तिथून सारखेच! हो न्नं तं काय! ”
आणि त्याच्याशी बोलू लागले..
पुढे तो म्हणाला..
“तुम्हाला कपडे आमच्यातर्फे अंतराळ यानात घालता येतील असे मिळतील. खाणं अर्थातच आमच्या सोबत मिळेलच आम्हाला महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी छोले भटूरे, असे सगळे पदार्थ खाऊ घालावे लागतील”
मी म्हंटले…
“अय्या हो ss त्यात काय एवढं पुरणपोळी पासून सगळं खाऊ घालेन. नाही तरी आता सगळे सणवार तिकडेच होतील नं! “
“माझ्या काही शंका मी विचारू शकते का? ” त्याला पुढे बोलूच न देता मी मध्येच बोलले.
“शुअर! “. तो म्हणाला….
“तिथे नैसर्गिक विधी कसे उरकायचे? आणि झोपायचे कसे? “
मला नेहमी अंतराळवीरांबद्दल पडलेला प्रश्न विचारूनच टाकला.
“त्याचे ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊच नं मॅडम. आता आम्ही नवीन शोध लावला आहे. आता अंतराळयाना मध्येच पृथ्वीवर असते त्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण निर्माण करता येते! तुम्ही काही तरंगणार नाही इथे. त्यामुळे यानात पृथ्वीपेक्षा खूप काही निराळं तुम्हाला वाटणार नाही. शिवाय काही अडचण आली तर आम्ही आहोतच”… तो म्हणाला.
“शिवाय आम्ही असाही शोध लावला की सगळ्या वेस्ट प्रॉडक्टचं विघटन अंतराळातच करून टाकता येईल. तिकडे प्रदूषणाला सुरुवातच होणार नाही. तुम्हाला अंतराळ यानाची खिडकी उघडून सारखा कचरा टाकायचं कारणच नाही” हॅ हॅ हॅ करत त्यांनी जास्तीची माहिती पुरवली.
“मेल्या भारतीय बायकांना एवढे बुद्धु समजतोस का? मला माहिती आहे, विमानाप्रमाणेच यानाची पण खिडकी उघडता येणार नाही ते! गधड्या मला ‘भ’वरच्या सगळ्या देता येतात. अस्सल वऱ्हाडी आहे मी! त्याचं भाषांतर तुझ्या इंग्लिश मध्ये काय होईल माहिती नाही”
मनातच म्हटलं मी.
त्याच्याबरोबर जायचं असल्याने मोठ्याने कशाला बोलू? त्याच्या हॅ हॅ हॅ तर माझंही दात विचकणं मिसळून टाकलं मी!
सगळ्या फाॅर्मॅलिटीज् पूर्ण झाल्यावर आमचे जायचे नक्की ठरले आणि आम्ही ठरल्याप्रमाणे यानात बसलो. आणि यान उडालं. माझ्या बाकीचे कोणी ओळखीचे नव्हते. पण जॉन असल्याने काळजी नव्हती.
बापरे! यानात दिशा समजायचं काही कारणच नव्हतं! जाॅनला ते माझ्या चेहऱ्यावरूनच समजलं की काय! तो म्हणाला….
“अंतराळात दिशा नसते पृथ्वीवर आपण सोयीसाठी दिशा ठरवलेल्या आहेत”
“बरं! बरं!” मी म्हंटले
मग मी चहा ठेवायला उठले तरंगायलाच लागले. जॉनला म्हटले…
“तू तर म्हणाला होतास की आम्ही इथे पृथ्वीवरचं वातावरण तयार केलं आहे म्हणून! “
तो म्हणाला.. “ओह् सॉरी” त्यांनी कसंबसं उठून प्लग लावलं व बटन ऑन करून पृथ्वी सारखं वातावरण तयार केलं.
नंतर मी चहा व स्वयंपाक केला सगळ्यांसाठी. असे दिवस खूप छान गेले. मेड असले तरी सगळ्यांनी सामावून घेतले मला. भाषांतराच्या ॲपमुळे भाषेची अडचण आलीच नाही. खेळी मेळीने, हसत खेळत दिवस जात होते.
एक दिवस रात्री खूपच लवकर झोप लागली मला. हो अंतराळात झोपेची सवय नेहमीप्रमाणेच राहते बरं का! आपण नेहमीप्रमाणेच झोप घेऊ शकतो. आता थोडी थोडी माहिती मलाही व्हायला लागली होती.
मी झोपले. अर्ध्या रात्री मला वॉशरूम मध्ये जायचं होतं. खूप शोधत होते टॉयलेट. पण सापडतच नव्हते. काही केल्या बाथरूम सापडली नाही. खूपच अस्वस्थ झाले मी.
शेवटी झोपेतल्या झोपेतच माझ्या लक्षात आले की खूप झोपेत असले की स्वप्नात आपल्याला वॉशरूमची जागा सापडत नाही. मला हे झोपेतही लक्षात आले की आपण यानात नसून खूप झोपेत आहोत म्हणून! मग ताडकन उठले व घरातल्या वॉशरूम मध्ये जाऊन आले.
हुश्य! बापरे जागी झाले नसते अन अंतराळयानातली वॉशरूम सापडली असती तर…. 😛
पुरुष ही परमेश्वराची कीर्ती असेल तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे. मातृरूपाने तुम्हाला जन्म देणाऱ्या, पत्नी रूपाने तुमच्या जन्माची सोबत करणाऱ्या, कन्या रूपाने तुमच्या ठाई जन्म घेणाऱ्या, तुमच्या आयुष्यात त्या तिन्ही अवस्थेतील कोवळ्या प्रेमाची साक्ष पटवून पुत्र पती आणि पिता या चढत्या पदव्यांना नेणाऱ्या स्त्रीजातीची किंमत अमूल्य आहे. विश्वातल्या प्रेमाच्या, मांगल्याच्या, कोमलतेच्या सौंदर्याच्या व पवित्र्याच्या सार्वभौम सर्वस्वाची स्त्री ही एकरूप विजयपताका आहे. विधात्याने ही सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीला सर्जनशील बनवणाऱ्या स्त्रीला भारतीय संस्कृतीत देवा समान मानले आहे. गणपतीच्या बाजूला उभ्या असणाऱ्या रिद्धी सिद्धींना स्त्रीचा मान मिळाला आहे. तसेच लक्ष्मी सरस्वती दुर्गा याही सन्मानाने विराजित आहेत. नम्रता श्रद्धा आणि ज्ञान या गुणांची जी सगुण मूर्ती आहे त्या स्त्रीचा जिथे आदर गौरव होतो तिथे देवतांनाही आवडीने राहावे असे वाटते.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. कौटुबिंक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार, शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. आपण विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली परंतु आजही आपले विचार तितके प्रगल्भ नाहीत. ‘ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप’ हीच भावना लोकांच्या मनात आहे. म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. कौटुंबिंक हिंसाचारात हुंडाबळी, माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण, मुलगे झाले नाहीत किंवा फक्त मुलीच झाल्या म्हणून शारीरिक त्रास, व्यसनी पती असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ह्या सर्व गोष्टींमुळे स्त्री अक्षरशः पिचून गेली आहे.
स्त्रीचा सन्मान म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती एक विचारसरणी आहे. स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या कार्याचा आदर करणे, यातूनच खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान होतो. पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान असणं, तिच्यावर अन्याय, अत्याचार होणं हे गृहीतच धरलं गेलं होतं, किंबहुना इतक्या वर्षांत ते आता समाजाच्या नसानसात आरपार गेलंय. मात्र त्यातून सुटण्याचा, मुक्तीचा क्षण कोणता असेल? अत्याचाराच्या बाबतीत काही वेळा तर अमानुषतेचा कळस गाठला जातोय. कोणतीही गुलामी सुंदर असू शकत नाही. स्वातंत्र्याचे पाणी स्त्रियांच्या अंगात मुरल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही असं महर्षी कर्वे म्हणाले होते स्त्री जोवर बलात्काराच्या जोखडातून मुक्त होत नाही तोवर तिचे सौंदर्य खुलणार नाही. स्त्री ही पुरुषाचा गुलाम नसून भागीदार आहे. मधुमेहाप्रमाणे समाजास चिकटलेल्या भोगवादाच्या अग्नीत जेव्हा तिचं अस्तित्व बेचीराख होतं तेव्हा तिला आजही अबला आहे असं म्हणणं भाग पडतं. रोजच नव्याने तिच्यावरच्या अत्याचाराच्या घटना ऐकून कायदा आणि सुव्यवस्था यात बदल होण्याची गरज आहे असं वाटतं. रोजच बहरण्यासाठी जन्म घेतलेली वेल डवरण्याआधी सुकून जाते याची खंत वाटते.
☆ आगे आगे होता है क्या… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
जगाच्या पसरलेल्या प्रचंड पसा-यात आपल्या संसाराचं बस्तान सुरळीत बसवून ते निटनेटकेपणे टिकवून ठेवण्यासाठी आपल्या वकुबानुसार कुठलतरी कर्म आपल्याला स्वीकारणं भागच पडतं. मग ते आवडीच असो नहीतर नावडत असो. शकारण बुडत्याला कडीचाआधार असल्या शिवाय हा दुस्तर भवसागर तरून पारकरण शक्य होत नाही. इथे उतू नको मातू नको घेतलावसा टाकू नको असे आवर्जून सांगणारे मात्तबर अनुभवी खूप मार्गदर्शक भेटतात आपला अनुमभव ते सांगतात. त्यांच्या त्या प्रभावशाली तार्किक विचाराने प्रभावित होण्याशिवाय आपल्या पुढे कोणताच विकल्प नसतो. आपण या सांसारिक संघर्षात नव्यानेच पदार्पण करणारे नवयुवक असतो. आपल्याला कुठलेतरी कर्म स्वीकारावेच लागते. मग पुढे ते स्विकृत कर्म आपला धर्म मानून जन्मभर जपाव लागते तेव्हा कुठेआपल्या जन्माचे सार्थक झाले असे लोक समुहाकडून आपल्याला ऐकायला मिळते. कर्म नाही जपलं तर करंटेपणा पदरी पडतो.
स्वीकारलेल्या कर्माच्या मार्गावर सुसाट वेगाने धावताना कुठल्यातरी सुविचाराच्या थांबल्यावर अंमळ विश्रांती घेवून पुन्हा नव्या दमाने कर्माला भिडल्यावर यश पदरी पडतं यात शंका नाही.
मग आपणास गीतेत महत्त्वाचा म्हणून विवरणकेलेला निष्कामकर्मयोग आठवतो, फळाची इच्छा न बाळगता कर्म करत राहिल्याने यश, किर्ती, संपदा आपल्याकडे चिरंतन वास्तव्याला येतत. सूख आपल्या पायाशी लोळण घेते आणि अंत्यंत महत्त्वाच म्हणजे आपल्या कुळाचाही उद्धार होतो
आणि बनतो आपण दिगंत कीर्तीचे धनी. हे सगळं तत्वज्ञान मागच्या अनेक पिढ्यांनी स्वेच्छेने पाळलं म्हणून त्यांचा त्यांच्या पूर्वजांच्या सह इहलोकी लौकिक झाला. याचे अनेक पुरावे पूर्वजांनी पुराणात नोंदवून ठेवलेले आहेत. पण ते आज मितीला कितपत खरे ठरतील या बाबत मनात शंका निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
आजकाल काळ, माणूस, निसर्ग, व्यवहार, संस्कार संस्कृती संसार बदलला आहे. हा सगळा प्रकार आणि प्रताप माणसांनीच केला आहे या बाबत दूमत नाही. तो आता देव आहे की नाही इथपर्यंत बळावला आहे. म्हणूनच देवाविषयीचा माणसाच्या मनात असणारा धाक ही संपुष्टात आला आहे. त्या मुळेच माणूस स्वैराचारी व भोगवादी बनलाय. तो विवेकच विसरून गेलाय. पैसाच इथला देव बनलाय. माणूस त्यांच्या भोवती फिरू लागलाय. त्या देवानेच माणसाला आज कोणत्या स्थितीत आणून ठेवलं आहे ते अवलोकन करण्यातच खरी मजा आहे.
आपल्या जीवनातले माया, ममता लळा, जिव्हाळा, हे परवलीचे शब्दच परागंदा झालेत. जाताना त्यांनी माणुसकी ही गिळंकृत केलीय. मग माणुसकीने वागणारी माणसे कमी झालीत आणि माणसे पाशवीवृत्तीची बनलीत. त्यानी तर कमालच केली. सौख्य, स्वास्थ, शांतता, आध्यात्म, श्रद्धा, विश्वास, यांना कुठल्याकुठे पळवून लावलं त्यामुळे वरून झगमगीत दिसणार जगणं आतून भकास झालं. नैराश्याने ग्रासलं. माणसाचं भविष्य ही भयभीत झाल. लाचार झाल. ते एकाकीपणे चिंता करतय माणसांची, पण त्याच्या हातात तरी काय ठेवलय माणसांनी, कारण माणूस आज स्वतंत्र झालाय माणसावरच वर्चस्व गाजवायला. तिथे बिचार लाचार भविष्य तरी काय करणार, ? आता विज्ञानाचा व विकासाचा पराक्रम पहात बसण्याशिवाय माणूस दुसरं काय करू शकतो बरं? जुनं सोनं होतं असं म्हटलं तर काळही तुमच्या कानात हळूच सांगेल अभी रुको और देखो आगे आगे होता है क्या !