मराठी साहित्य – विविधा ☆ फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

अल्प परिचय  
सतीश स. कुलकर्णी : साधारण तीस वर्षांपासून पत्रकारितेत. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकांमध्ये उपसंपादक ते वृत्तसंपादक. तीन वर्षांपासून मुक्त पत्रकारिता व व्यावसायिक लेखन, ब्लॉगलेखन. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ उपक्रमात  khidaki.blogspot.com ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस. ललित लेखनाचे ‘शब्दसंवाद’  पुस्तक प्रकाशित. शब्दांकन, संपादन, पुनःलेखन, मुद्रितशोधन, पुस्तक परिचय आदी काम व्यावसायिक तत्त्वावर करतो.

☆ विविधा : फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆

(डॉ. एडनवाला ह्यांना ‘स्माईल ट्रेन’ चा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.)

अहमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘स्माईल मेकर’ ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३० मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरातील ११, नगरवाला रस्ता पत्त्यावरचा बंगला, हेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी ‘पारशी टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली.

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या ‘ज्युबिली मिशन हॉस्पिटल’ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील ‘चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर’ ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत.

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचार करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे ‘स्माईल ट्रेन’. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचाच एक घटक बनले. त्यांच्या निधनानंतर ‘स्माईल ट्रेन’ ने संकेतस्थळावर विशेष श्रद्धांजली लेख प्रसिद्ध केला.

हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली.  श्री बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अगदी अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

… सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं भेट द्या >> – https://khidaki.blogspot.com/2020/07/Adenwalla.html

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई 

☆ विविधा : मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

 

परवाच संकष्टी झाली गणपतीची आरती आणि नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागलो ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…… त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी असं म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती, गणेश, गजानन, विनायक, अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली रत्नजडित किरीट घातलेली तुंदिल तनु असलेली जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का?

मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात. एक डोळ्याला दिसणार किंवा व्यक्त रूप आणि दुसर डोळ्याला न दिसणारे सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं असं आहे.” गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह हे अनंत अपरिमित आहे. या ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलाच एक अगदी छोटा भाग आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमितापासून परिमिता पर्यंत येत तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. ही  मोजमाप करणारी शक्ती गणित तज्ञांचा गणित तज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते जसं चिकू आंबा फणस यातील प्रत्येकाचं पान ,फुल, फळ निरनिराळ असत. आंब्याच्या झाडाला लिंबू किंवा चिकू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई चमेली ही फुलं लागत नाहीत. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच  ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी ,अनावृष्टी, साथीचे  आजार अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्राता तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायु आकाश अशा पंचमहा तत्वांनी बनलेले आहे. ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरण अर्ध्या आकाश तत्वात पुरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम). ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओमकारातून जन्माला आली व प्रत्येक गोष्ट ओ मच आहे असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व ,आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्ही मधील गाठ हे पृथ्वीतत्त्व, तेथून निघणारी रेषा हे वायू तत्व ,वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी .आणि त्यावरील टिंब हे चैतन्य.  आणि हे  सगळं सगळं ज्याच्या मध्ये सामावलं आहे ते आकाश तत्व. .अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा वस्तूचा सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणू केंद्रकात प्रोटॉन भोवती न्यूट्रॉन फिरत असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यापर्यंत गणना करून देतो ती शक्ती म्हणजेच गणेश .कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू, आणि विलय करणारा तो महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश आपण तरी काय करतो? पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने कौतुकाने त्याची पूजा करतो. उत्सव करतो आणि विसर्जन म्हणजे पृथ्वी तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे पर्वत बेटे यांची  उत्पत्ती होते. स्थैर्य येते आणि आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! आणि या या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश. या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. हे गूढ आहे.  उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय विज्ञानमय असा गणेश च असतो. गणेश उत्सव सुरू झाला आहे.. सर्व शक्तीच्या प्रतीकांची पार्थिव गणेशाची पूजा करीत असताना निसर्गाचा समतोल राखून त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सकारात्मकता-एक अभेद्य तटबंदी☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

जीवन परिचय

शिक्षण : M. Com. CAIIB

व्यवसाय : स्टेट बॅंक ऑफ इंडिया मधून अधिकारी म्हणून निवृत्त

छंद : वाचन, संगीत ऐकणे, ललित लेखन व कविता करणे. “अंतर्नाद” हा कविता संग्रह प्रकाशित. आत्तापर्यंत १० इंग्लिश व एका हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे (मेहता पब्लिशिंग हाउस आणि अजब प्रकाशन).

☆ विविधा: सकारात्मकता – एक अभेद्य तटबंदी – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

परवा सहजच मनात असा एक विचार आला की, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक जीवनातही  बऱ्याच गोष्टी, बरेच विचार, एखादी मोठी लाट यावी तसे येतात, काही काळ त्यात आपण भिजतो, आणि मग ती लाट नकळतच आपोआप ओसरून जाते. एखाद्या फॅशनची लाट आलीये म्हणतात ना तसेच. वैचारिक लाटा तर अनेक प्रकारच्या असतात. जागतिक किंवा राष्ट्रीय परिस्थितीनुसार सतत वेगाने उफाळणाऱ्या, पण तितक्याच वेगाने अनिश्चिततेच्या किनाऱ्यावर आपटून विरून जाणाऱ्या लाटांची तर गणती करणेच अशक्य आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातही, प्रत्येकाच्या भौतिक परिस्थितीनुसार, स्वभावानुसार, त्याच्या मानसिक आरोग्य कसे आहे त्यानुसार, शब्दशः असंख्य विचारांची मनात अशी सतत भरती- ओहोटी चालू असते, ज्याचा अनुभव प्रत्येकच माणूस क्वचित जाणतेपणाने आणि बहुतांशी अजाणतेपणी घेतच असतो. आणि बरेचदा या अशा लाटांचा माणसाला आनंद होण्याऐवजी त्रासच जास्त होत असतो हे सांगण्यासाठी स्वतःचे उदाहरण पुरेसे असते.

एकदा कुठेतरी मी असे एक वाक्य वाचले होते की, मनातले विचार नकारात्मक असोत की सकारात्मक, पण या दोन्ही प्रकारच्या विचारांचा माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर प्रचंड प्रभाव, किंवा दबाव म्हणुयात, पडत असतो. आणि अर्थातच सकारात्मक विचारांचा प्रभावही सकारात्मक  च असतो, ज्यातून सुख – शांती- समाधान यांचा अनुभव आयुष्यभर कळत नकळत पण आवर्जून येत रहातो. मनात असे  ठरवून, विचार करून, विचार आणता येत असतात का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. आणि मला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘ हो ‘ असेच द्यावेसे वाटते. सकारात्मक विचार किती मोलाचे आणि महत्वाचे असतात हे खूप पूर्वीपासून अनेक विचारवंत, तत्वज्ञ, आणि जाणकार लोक सांगत आलेलेच आहेत. पण असे विचार आणि त्यांचे महत्त्व अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत, त्याच्या जाणिवेच्या पातळीपर्यंत, झिरपत जाऊन तिथे कायमचे मुरलेले राहण्याची आत्यंतिक आणि कालातीत गरज आहे असे मला निःसंशयपणे म्हणावेसे वाटते.

पण मग मनात बहुसंख्येने येणारे नकारात्मक विचार, सकारात्मक कसे होऊ शकतील, हा प्रश्नही तितक्याच  स्वाभाविकपणे पडणारा आहे. त्यासाठीच इथे आणखी काही सांगावेसे वाटते आहे. आपण कसा विचार करतो, यावर आपले संपूर्ण आयुष्य कसे असेल हे अवलंबून आहे, ही गोष्ट सर्वप्रथम, प्राधान्याने समजून घ्यायला हवी, आणि मान्य करायला हवी. हेही मान्य करायला हवे की नकारात्मक विचारांच्या सतत सांनिध्यात राहिले तर आपोआपच उदास पणा, भय, दुःख, या भावनांना खत पाणी मिळत राहते आणि नकळतच नैराश्याच्या वाटेवर पावले पडायला लागतात. खरे तर स्वतः कडे, स्वतःच्या विचार  प्रक्रियेकडे त्रयस्थपणे आणि सजगपणे पाहिले तर ही गोष्ट सहजपणे लक्षात येण्यासारखी आहे. पण सामान्यतः तसे पाहिले जात नाही, कारण ‘ माझे काही चुकते आहे ‘ हेच मुळात मान्य न करण्याचा मानवी स्वभाव असतो.  पण एक अधिक एक म्हणजे दोनच, हे जसे आपण निःशंकपणे आणि सहजपणे मान्य करतो, अगदी तसेच हेही मान्य करायचे की सकारात्मक विचार आपली शक्ती, आपला आत्मविश्वास आणि आपले मनोबल निःसंशय वाढवतात. आणि मग स्वतःच्याच मनाशी जणू युद्ध करून, नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांना देता येऊ शकते. आणि केवळ आपला दृष्टिकोन बदलून हे युद्ध जिंकता येते. याचे एक सर्वश्रुत उदाहरण आहे ते शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचे. विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी अथक प्रयोग करत असताना हजाराव्या प्रयोगात त्यांना यश मिळाले. आधीच्या फसलेल्या ९९९ प्रयत्नांबद्दल ते म्हणायचे की ‘ ते प्रयोग फसले असे मी मानतच नाही. उलट, कोणत्या कोणत्या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही हे मी ९९९ वेळा सिद्ध करून दाखविले आहे‘. .. याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. या बाबतीत पाण्याने अर्ध्या भरलेल्या ग्लासचे जे उदाहरण दिले जाते, ते तर समजायला आणि पचनी पडायला अगदीच सोप्पे आहे. ग्लास पाण्याने अर्धा का होईना पण भरलेला आहे यात समाधान मानायचे की अर्धा रिकामा आहे याचे दुःख करत हताश निराश व्हायचे हे ठरविणे खरे तर कुणासाठीही अजिबातच अवघड नाही. पण त्यासाठी क्षणभर विचार मात्र करावा लागतो. आणि असा विचार करण्याची मनाला सवयच लावून घेण्याचा निश्चय एकदा का मनापासून केला की मग सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. मन आपोआप प्रसन्न रहाते, मनाची आणि शरीराची ही ऊर्जा वाढते, कामाचा उत्साह आणि गतीही वाढते. आणि अर्थातच आत्मविश्वास ही वाढतो.

एखादी वाईट घटना घडली, तर त्याहीपेक्षा वाईट काहीतरी घडू शकले असते, पण तसे घडलेले नाही, यात समाधान मानता आले तर घडलेली वाईट घटना सुसह्य वाटू लागते, आणि हा फक्त सकारात्मक विचारसरणीचा परिणाम असतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते, आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ते सिद्धही करता येते याची अनेक उदाहरणे डोळसपणे पाहिले तर आपल्याच अवती भोवती दिसतात.

म्हणूनच जगातल्या प्रत्येक माणसाने अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच ही आणखी एक गोष्टही अत्यंत मूलभत गरजेची मानली पाहिजे की, अनिर्बंध नकारात्मक विचार आणि त्यामुळे निर्माण होणारा नकारात्मक दृष्टिकोन यांना, अत्यंत जागरूकपणे आणि निश्चयपूर्वक स्वतःच्या मनात अजिबातच थारा द्यायचा नाही. स्वतःचे विचार आणि दृष्टिकोन ही सतत सकारात्मकच राहील याची जाणीवपूर्वक दक्षता घ्यायची. मग नक्कीच लक्षात येईल की सकारात्मक विचार ही , कितीही जोराने उफाळून आल्यावरही शेवटी वास्तवाच्या किनाऱ्यावर फुटून, क्षणात विखरून जाणारी विचारांची लाट नसतेच. तर ती असते एक अभेद्य तटबंदी ……. सतत प्रचंड उसळणाऱ्या, भयभीत करणाऱ्या, केव्हाही अक्राळ विक्राळ रूप धारण करून मनाला अक्षरशः हतबल करून टाकणाऱ्या सगळ्याच लहान मोठ्या नकारात्मक विचारांच्या क्रूर लाटांना, आपल्या पायाशी स्वतःचे अस्तित्वच विसरून पराभव पत्करायला भाग पाडणारी, निग्रहपूर्वक मनाला घातलेली अभेद्य तटबंदी.

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वर्णगौरी ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

डाॅ. मंजूषा देशपांडे

Brief  Introduction:  M.Sc. Ph. D. (Women and Migration Studies), Director,  Center for Community Development,  Shivaji University, Kolhapur, Asiatic Research Fellow, (2019) (Forgotten Food: Impact of Migration and Urbanisation ), Research Associate(2007-2008) Overseas Development Institute, London, UK and sponsored by International Institute of Environment and Development

☆ विविधा : स्वर्णगौरी ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

हा दक्षिण कर्नाटकातला मोठा सण!  स्वर्णगौरी गणेश चतुर्थीच्या अगोदर एक दिवस म्हणजे आपल्या हरतालिकेच्या दिवशी येते. ही गौर म्हणजे श्रीगणेश यांची आई पार्वती.

ती गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी  येऊन घरात आपल्या मुलाला खाण्यासाठी पुरेसे धान्य, फराळाची व्यवस्था, फळफळावळ, दूध,  दही,  तूप, तिच्या मुलाला खेळण्यासाठी काही खेळण,  त्याला बागडण्यासाठी शेतीवाडी,  पुरेसे भरजरी कपडे, … अशी सगळी व्यवस्था पाहण्यासाठी ज्या घरात गणपती बसवणार आहेत त्या घरी येते. सगळी व्यवस्था पाहून ती जर खूश झाली तर स्वतः सुवर्ण गौरी असल्यामुळे ‘ सोन्यासारखे झळाळते आयुष्य मिळू दे’ असा आशीर्वाद देऊन गणेशाला त्या घरी पाठवते. या गौरीच्या दिवशी साडी,  खण,  सर्व प्रकारची धान्ये,  डाळी,  गूळ, साखर, तूप बांगड्या,  एखादा दागिना, खेळणी, फळे,  सुका मेवा,  लाडू, करंज्या,  चकल्या असे सर्व सूप भरून वाण द्यायची पध्दत आहे. यापैकी एक वाण सर्वार्थाने तृप्त स्त्री ला द्यायचे आणि उरलेली 15 वाणे ज्या घरी गणपती बसवण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसेल अशा घरी द्यायची पध्दत आहे.

या गोड पध्दतीचे अजून एक वैशिष्ट्य आहे.  हे वाण देण्यासाठी त्या स्त्रीचे लग्न झाले आहे,  तिला नवरा,  मुले बाळे आहेत किंवा कसे असे कोणतेही बंधन नसते.

© डॉ. मंजुषा देशपांडे

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी मीना हरिणी ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

संक्षिप्त परिचय 

शिक्षा – MSc  B.Ed.

अभिरुचि – वाचन, रेडिओ ऐकणे यातून लिखाणाचा छंद.

प्रकाशित साहित्य--चार कथासंग्रह दोन अनुवादित,(इंग्रजी to मराठी), एक विज्ञान कथासंग्रह, विज्ञानलेख.

प्रसारण – सांगली आकाशवाणीवर अनेक कथा व लेख प्रसारित.

पुरस्कार – ऑटोबायोग्राफी ऑफ योगी-परमहंस योगानंद. या पुस्तकाला कवितासागर साहित्य अँक्याडमी पुरस्कार,  प्रतीक्रुती या विज्ञानकथेला आखिल भारतीय मराठी विज्ञान कथास्पर्धेमध्ये दुसरे बक्षीस.

☆ विविधा :  मी मीना हरिणी – सौ.अंजली दिलिप गोखले

हाय फ्रेंड्स, परवा ट्रीप ला आलेल्या सगळ्या फ्रेंडशि मी बोलतेय. आला होतात ना परवा सागरेश्वर ला? खूप दमलात ना? उन्हामध्ये नुसती पायपीट झाली म्हणून खूप वैतागला ना?

बरोबरच आहे तुमचं. फिरून फिरून, उंच उंच डोंगर चढून लालेलाल झाला होता सगळ्या. काय म्हणता? मला कसं माहिती? मी कोण? हो, सॉरी सॉरी. सांगते ह. तुम्ही सागरेश्वर च्या अभयारण्यात ज्यांना उत्सुकतेनं पहायला आला होतात, पण तुमची घोर निराशा झाली, त्या अनेक हरणे पैकी मी एक. माझं नाव मीना हरणी. तुम्ही म्हणाल, तुम्हाला मी दिसले नाही, मग मग मी कसं पाहिलं तुम्हाला? बरोबर? सांगते सांगते.

तुम्ही पहाटे-पहाटे रेल्वेनं प्रवास सुरु केलात, त्याच वेळी तुमची स्पंदनं आम्हाला इथे जाणवली. आपल्यालाही आता छान छान मुली भेटणार, पाहायला मिळणार म्हणून आम्ही पण आनंदात होतो. पण तुम्ही आलात आणि आम्हाला न भेटताच डोंगर चढायला सुरुवात केलीत. तुम्ही आमची निराशा केली. आमच्या डोंगर चढायचा म्हणजे सोपे काम नाही. आम्हाला रोजची सवय आहे. पण तुमच्यासाठी मोठं दिव्य होते. किती दमलात, घामेघूम झालात, लालेलाल झालात. कधीतरी आलं की असं होतं.

तुम्ही आमच्या अभयारण्यात आलात तेच मुळी भर दुपारी, सूर्य अगदी भर डोक्यावर आला होता. आम्ही ही उन्हामध्ये कधीच बाहेर पडत नाही. आमची चमचमती कातडी काळवंडते ना! शिवाय आम्हाला तहानही खूप लागते. अलीकडे पाण्याचेही शोर्टेज आहे. पावसाचा प्रमाण कमी झालंय, त्यामुळे आहे ते पाणी आम्हाला पुरवून पुरवून वापरावे लागते. शिवाय तुम्ही मुली किती बडबडत होतात, आवाज करत होतात. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. आम्हाला शांतताप्रिय आहे. शिवाय तुमच्याकडे मोबाईल म्हणतात ते खेळणे. घरी जे ऐकता, तेच घेऊन इथे आलात. मग बदलतो काय? ती कर्कश्य गाणी आम्हाला मुळीच आवडत नाहीत. शिवाय मोबाईल मधून बाहेर पडणारे ते रेज आम्हाला खपत नाहीत. म्हणूनच आम्ही सगळ्या जणी झुडपात बसून राहिलो होतो. तुमच्या नजरेला ही पडायचं नाही असा चंगच आम्ही बांधला होता. तुमचा दंगा आणि ती गाणी यामुळेच खरं आम्ही चिडलो होतो.

आम्ही कोणीच दिसलो नाही, त्यात रण रण त ऊन, म्हणून सगळ्याजणी खूप वैतागला. पुन्हा म्हणून सागरेश्वर ला यायचं नाही असं ठरवून टाकलं. पण फ्रेंड्स, तुम्हाला सांगू का?

आयुष्यात असे चढ-उतार येणारच. किती दमछाक झाली ना तुमची? पण पाठवा बरं, कष्टानं डोंगर चढून वर आल्यावर खालचं दृश्य किती छान दिसते की नाही तुम्हाला? चौकोनी चौकोनी शेत, टुमदार छोटी-छोटी घर, आणि वळणावळणाची कृष्णा माई! कष्टाशिवाय फळ मिळत नाही असं उगाच म्हणत नाहीत.

थंडगार पाण्याच्या गुहेमध्ये आल्यावर सगळा शिणवटा निघून गेला ना? रोज संध्याकाळी आम्ही तिथेच पाणी प्यायला जातो. व्यायामही होतो आणि पाणी मिळते. तुम्हाला कष्ट करूनच माहिती नाही. आपले शरीर किती काम करू शकते तेच तुम्हाला माहिती नाही. दमत दमत का होईना, एका दिवसात दोन डोंगर पार केले तुम्ही. तुमच्या स्नायूंमध्ये हे किती प्रचंड ताकद आहे बघा. त्यात ताकतीचा वापर करा म्हणजे यशाचे शिखर तुम्ही गाठू शकता. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा खूप खूप अभ्यास करा, छान पेपर सोडवा. भरपूर मार्क्स मिळवा आणि रिझल्ट सांगायला पुन्हा आमच्याकडे या. होय याच सागरेश्वर च्या डोंगरावर. आम्ही सगळ्या जणी तुमच्या स्वागताला येऊ. तर फ्रेंड्स लक्षात ठेवा येताना ते मोबाईल खेळणं मुळीच आणू नका.

फ्रेंड्स या अनुभवावरून दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थही तुम्हाला चांगला समजला असेल. बाय, भेटू पुन्हा.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित – अंगण ☆ सुश्री मानसी काणे

☆ विविधा : ललित  – अंगण  –  सुश्री मानसी काणे ☆

रोज रात्री आठ वाजता ‘‘माझ्या अंगणी नांदते नवर्‍याची बायको ,माझ्या नवर्‍याची बायको’’अस शीर्षकगीत आपण ऐकतो पण आज शहरात रहाणार्‍या लोकाना फ्लॅट सिस्टीममुळे अंगण ’माहीत असण थोड दुरापास्त आहे.पण मी ज्या भागात रहाते तिथे अजून अंगण आहे.अंगण ही फार सुंदर गोष्ट आहे.खर तर ही घरासमोरची मोकळी जागा.पण जाईजुईचे वेल,लालभडक जास्वंदी,स्वस्तीक,तगर,शेवंती ,चाफा आणि मंजिर्‍यानी बहरलेले तुळशीवृंदावन असलेल अंगण डोळ्याना सुखावून जात.इथून आपन प्रसन्न मनान घरात प्रवेश करतो.तुळशीपुढे दारार सुंदर रांगोळी रेखाटली आहे,नुकतच पाण्यान सचैल स्नान करून झाड टवटवीत झाली आहेत.सूर्याचे सोनेरी किरण ऊबदारपणान पाठीवरून हात फिरवत आहेत,दारात टाकलेले तांदुळाचे दाणे चिमण्या पाखर टिपत आहेत,एखादा भारद्वाज चाफ्याच्या झाडावर बसून घुमतो आहे हे दृष्य  डोळ्यात साठवून ठेवावस वाटत.

घरात आजी आजोबा असतील अन अंगणात झोपाळा असेल तर नातवंडांसकट त्यांचा मुक्काम झोपाळ्यावरच असतो. सकाळच दूध,अभ्यास,कधी दूधभात भरवण संध्याकाळच शुभंकरोती ,रात्री मांडीवर घेऊन झोके घेत झोपवण सगळ अंगणातच चालू असत.लपाछपी ,लंगडीपळती,गोट्या,विटीदांदू मग लुटूपुटूच क्रिकेट हे सगळ अंगण आनंदान मजेत पहात असत.सायकल ते टू व्हिलर आणि नंतर फोरव्हीलर हा प्रगतीचा प्रवास या अंगणान डोळे भरून पाहिलेला असतो.सोनुड्याच्या मुंजीचा आणि छकुलीच्या लग्नाचा छोटेखानी मांडव याच अंगणात सजलेला असतो.इथूनच घरात येणार्‍यांच  मनापासून स्वागत होत आणि निरोपही इथूनच दिला जातो.या अंगणान खूप रागलोभ पाहिलेले असतात.तसच जुईच्या मांडवाखाली सुगंध अंगावर झेलत काढलेला रुसवा पण पाहिलेला असतो. दिवाळीत आकाशदिवा अन दिव्यांची रोषणाई इथे उजळलेली असते.वर्ष प्रतीपदेची गुढी नव्याकोर्‍या खणान इथेच सजलेली असते.थंडीत कोवळ्या उन्हात पाठ शेकायला इथच बसावस वाटत.पावसाळ्यात इथूनच पागोळ्यांखालचे मोती ओंजळीत धरता येतात.उन्हाळी पावसातल्या गारा इथच वेचल्या जातात आणि कडक उन्हाळ्यात रात्री अंगणात बाजेवर पडून गार वार्‍यात चांदण्या मोजण्याची मजाही काही औरच असते.उन्हाळी वाळवण घालण्यासाठी अंगण हव.झळवणीच पाणी गरम करायला घागर ठेवायला अंगण हव.परीक्षेच्या दिवसात पाठांतरासाठी अंगणच हव अन सुटीच्या दिवसात गाण्याच्या भेंड्यांसाठीही अंगणच हव.गड्डा झबू अन भिकार सावकार रंगवण्यासाठी अंगण हव अन चांदोबा, विचित्र विड वाचायसाठीही अंगणच हव.रात्रीच जेवण सर्वानी मिळून करायला अंगण हव अन कोजागिरीच केशरी दूध चंद्राच्या प्रकाशात थंड करायला ठेवायलाही अंगणच हव.

अंगण म्हणजे घराचा आरसा.तिथल्या सुखदु:खाच प्रतिबिंब अंगणातल्या हालचालीत पडत आणि अंगणातल्या आनंदाचा शिडकावा घरावर होतो.म्हणून प्रत्येक घराला छोटस का होईना अंगण हव.नाहीतर ‘‘मैं तुलसी तेरे आँगनकी, अंगणी पारिजात फुलला,  माझ्या ग अंगणात। कुणी सांडिला दूधभात। जेविले जगन्नाथ कृष्णबाळ।। ’’ही गाणी कशी म्हणायची? सडा रांगोळी कुठ करायची? वाट कुठे पहायची? घराकडे येणारी सुखाची आनंदाची पायवाट पायरीपर्यंत पोहोचवण्याच हे माध्यम ‘अंगण‘आपल्या आयुष्यात असायलाच हव.गर्दीच्या शहरात सापडत नसेल तर खेड्यात जाऊन पहायला हव .काहीच नाही जमल तर मनाच्या एका कोपयात आज ‘अंगण’निर्माण करायला हव.

 

©  सुश्री मानसी काणे

संपर्क  – 02332330599

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणरायांचं आगमन ☆ श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – एम.ए. एम.एड. व्यवसाय – अध्यापन , क.ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यकेशन, ३० वर्षे अध्यापन, सद्य: निवृत्त

प्रकाशित पुस्तके –  एकूण – ६५  बालवाङ्मय – एकूण २९ पुस्तके – कविता संग्रह – २, नाटिका -४, चरित्र – १,बाल कादंबरी – १ भौगोलिक – 1, बालकथा – १२ प्रौढ वाङ्मय –  मौलिक एकूण ८ पुस्तके कथासंग्रह –४, कविता संग्रह – २   संकीर्ण –  २ अनुवादित – अनुवाद हिंदी भाषेतून – एकूण २७ पुस्तके लघुतम कथासंग्रह – एकूण – ६ , लघुकथा  (हिंदीतील कहानी)  संग्रह – अनुवादित – १३  कादंबर्‍या – ६, व्यंग रचना -२ , तत्वज्ञान -अध्यात्म – ५  पुरस्कार –     बालकविता, बालकथा, बालनाटिका आणि एकंदर बालसाहित्याचे लेखन यांना पुरस्कार  अनुवादासाठी – स्पॉटलाईट, त्रिधारा या पुस्तकांना, एकंदर लेखनासाठी पंजाब साहित्य कला अकादमीचा विशिष्ट पुरस्कार  अन्य – सांगली जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार  अनुवाद  (हिंदी मध्ये)- काही लघुतम कथा व कही कथा यांचा हिंदी मध्ये अनुवाद व समकालिन भारतीय साहित्य, भाषा पत्रिका, मधुमती, हिमप्रस्थ इ. मासिके व कथा आणि लघुतम कथा संकलाच्या पुस्तकात प्रकाशित गणवेश कथा हिंदी, तेलुगु, कन्नड तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित

सन्मान- कोटा – शब्दसरोज, जबलपूर – डॉ. श्रीराम दादा ठाकुर संस्कारधानी

आकाशवाणी प्रसारण – 1. प्रतिबिंब- कौतुंबिक श्रुतिका – १००च्या वर श्रुतिकांचे लेखन, २. नभोनाट्य – ५ नभोनाट्यांचे लेखन

शोध प्रकल्प – २ – १. किशोर मासिकातील प्रकाशित साहित्य, २. सांगली संस्थातील स्त्री शिक्षणाचा विकास – १८७५ ते १९५०

 

☆ विविधा : गणरायांचं आगमन – श्रीमती उज्ज्वला अनंत केळकर 

पार्वती मातेची परवानगी घेऊन, गणेशोत्सवासाठी गणराय महाराष्ट्रात आले आणि  घरोघरी नि विविध मंडळात अंश रुपाने स्थानापन्न झाले. या वर्षी त्यांना थोडं  बरं वाटत होतं. गर्दी फारशी नसल्याने मोकळा श्वास घेता येत होता. एरवी मिरवणुकीने येताना तो लोकांचा गोंधळ, आवाजाचा कल्लोळ यामुळे ते पार शिणून जायचे. स्वस्थपणे स्थानापन्न झाल्यावर त्यांना पार्वती मातेशी झालेला संवाद आठवला आणि त्यांच्या ओठांवर हसू फुटलं.

पार्वती माता म्हणाली होती, ‘यंदा जगभर सगळीकडे कोरोना… कोरोना…  ऐकू येतय. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहर आहे म्हणे… सांभाळून रहारे बाळा॰..’

आई माणसाची असो,  की देवाची, तिची काळजी आणि काळीज सारखच.

‘आई, लोक मला ‘सुखकर्ता… विघ्नहर्ता’ मानतात. कोरोनाचा कहर कमी कर, असं ते मला साकडं घालणार आणि कोरोना… कोरोना… म्हणत तूच मला घाबरवून टाकतीयस….’

‘तसं नाही रे… पण …’

‘कळलं … कळलं … आईचं काळीज…!’

‘मी पण तुझ्या पाठोपाठ २५ तारखेला येतेच आहे. लोकं मला माहेरवाशीण मानतात. तिच्यासारखं माझं कौतुक करतात पण मी जाणार घराघरातून. तुझा  वावर घरी.. दारी. यत्र… तत्र.. सर्वत्र.’

माता पार्वती आणि गणरायांचा संवाद चालू असताना, बाप्पांचा सारथी अर्थात उंदीर मामा यांचीही लगबग सुरू झाली.  बाप्पाला ब्रह्मदेवाकडे जाऊन E- पास घेण्याची त्यांनी आठवण केली. एका गोष्टीने मात्र उंदीर मामा खुश होते की यंदा लॉकडाऊनमुळे, मुळातच रस्त्यावर वाहतूक कमी झाल्याने रस्त्यावर खड्डे जरा कमी असतील.  त्यामुळे बाप्पांची स्वारी घेऊन जायला त्रास होणार नाही. यंदा मिरवणूक नसल्याने लांबत जाणारी पूजा नाही, त्यामुळे प्रसादाचे मोदक अगदी दुपारीच म्हणजे अगदी वेळेवर मिळणार. मामा आत्तापासूनच मनाचे मोदक खाऊ लागले.

यंदा ध्वनीप्रदुषण फारसे नसल्याने कानात घायलाला बोळे नकोत.  हा,  फक्त सॅनीटायझरची बाटली  आठवणीनं बरोबर घ्यायला पाहिजे, असं ठरवून उंदीर मामा पुढच्या तयारीला लागले आणि त्यांना एकदम मास्कची आठवण झाली. आपल्याला चिंधीही पुरे पण बाप्पांच्या मास्कचं काय करायचं? कोण शिवून देईल त्यांना मास्क, याची त्यांना विवंचना पडली.

गणरायांना एकीकडे  थोडं स्वस्थ, निवांत, वाटत होतं. यंदाचा उत्सव आपल्याला खरोखरच आरामदायी होईल, अशी त्यांना खात्री वाटू लागली होती पण दुसरीकडे आपल्या भक्तांविषयी कणवही त्यांच्या मनात… हृदयात दाटून आली होती. त्यांचा आनंद, उत्साह, जोश याच्यावर विरजण पडलं होतं. आता जाता जाता पहिलं काम म्हणजे धन्वंतरींना कोरोंनावर लस तयार करायला सांगणे.

आणखी काय अपेक्षा असेल बरं भक्ताची?  हां! येता येता लोक म्हणत होते, ‘कोरोंनात आता आणखी महापुराचं संकट तेवढं नको.’  मंडप आता रिकामा होता. गणरायांनी विचार केला आणि इंद्रदेवांना त्यांनी दूरध्वनी म्हणजे आकाशध्वनी लावला आणि त्यांच्याशी ते ऑन लाईन बोलू लागले. म्हणाले,  ‘इंद्रदेवा सांभाळून बरं! गोवर्धन पर्वतावर तू  कृष्णकाळात पाऊस पाडला होतास, तसा पाऊस गेल्या वर्षी पाडलास. केवढी तरी मालमत्तेची हानी झाली. माणसं, गुरं – ढोरं दगावली. यंदा देवा, पाऊस पाडा, नद्या-तळी- धरणं भरू देत. पण महापूर घेऊन येऊ नका. आताच्या काळात पुराचं पाणी अडवणारा कुणी शिष्योत्तम अरुणीही उरला नाही.’

मंडपात चार-सहा जण आरतीचं तबक घेऊन येताना त्यांना दिसले. मग त्यांनी आपला आकाशध्वनी बंद केला आणि ते सुहास्य मुद्रेने वरदहस्ताची नेहमीची पोझ घेऊन बसून राहिले.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर, सम्पादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी

☆ विविधा: तिन्हीसांजा ☆ सुश्री अपर्णा कुलकर्णी ☆

आज सकाळी एका मैत्रिणीने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या/देई वचन तुला…”

तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा..’ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?

मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,

ह्यात  ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर , ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?

तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.

आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल …पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?

…आणि  मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले..त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं..

मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…!!

पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की-

तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.

पहाट आणि सायंकाळ  ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या….तिन्ही सांजा !!*

तिन्हीसांज’ प्रमाणे त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.

हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं..की रात्र सम्पून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..

दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..

व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..

दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच  सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच!!

त्यामुळे, “तिन्ही सांजा”  हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.

तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे ,तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून..असा भावार्थ जाणवतो.

दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती..अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे..माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता  म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..

झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.

हा मला समजलेला अर्थ आहे.

आज त्या मैत्रिणीने तिन्ही सांजा बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.

संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा ..’हे गीत दिले आहे..

तिन्ही सांजा

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

 

कनकगोल हा मरीचिमाली

कनकगोल हा मरीचिमाली

जोडी जो सुयशा

चक्रवाल हे पवित्र,

ये जी शांत गभीर निशा

त्रिलोकगामी मारुत,

तैशा निर्मल दाहि दिशा

साक्षी ऐसे अमर करुनी हे तव

कर करी धरिला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या…

 

नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत

गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत

पाणी जसे मोत्यांत

पाणी जसे मोत्यांत,

मनोहर वर्ण सुवर्णांत

मनोहर वर्ण सुवर्णांत

हृदयीं मी साठवीं तुज तसा

जीवित तो मजला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या,

देई वचन तुला

तिन्ही सांजा सखे मिळाल्या..

-भा रा तांबे

© सुश्री अपर्णा कुलकर्णी

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: पर्णसंभार ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

जीवन परिचय

नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.

☆ विविधा: ललित : पर्णसंभार  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

(१९ तारखेच्या ई-अभिव्यक्ती मराठीच्या अंकात सुश्री मीनाक्षी सरदेसाई यांचा ‘पर्णसंभार’ हा लेख  नजरचुकीने पूर्ण आला नव्हता. तो संपूर्ण लेख आता प्रकाशित करीत आहोत.-संपादक, ई-अभिव्यक्ती .)

झाडं झाडांसारखी दिसतात ती त्यांच्या गर्द पानांमुळे.जंगलं गडदगहन होतात ती हिरव्या पर्णराजीमुळे. शिशिरात पानं संप केल्या सारखी झाडांना सोडून जातात तेव्हा झाडं विरहगीत गातात. “रंग न उरला गाली ओठी,—–श्रुंगाराचा साज उतरला” अशी त्यांची अवस्था होते. पोपटी ,कोवळ्या पालवी पासून काळपट  हिरव्या राठपणापर्यत सर्व अवस्थांतील पर्णसंभार हे झाडांचं वैभव.ह्या श्रीमंतीचा उपभोग आपण वेगवेगळ्या प्रकारे घेत असतो.

मला आठवतंय, सकाळी उठल्यानंतर काही न बोलता आम्ही केळीशी जायचो.तिच्या पानांवरच दंव केसांना लावायचो. का?तर केस तिच्या सोपटासारखे लांब होतात असं आईने सांगितलेलं. त्यात काय औषध होतं माहीत नाही, पण केळीचा तो रसरशीत सहवास मनाला खूप आनंद द्यायचा. टवटवीत, हिरव्या पानावरच्या ब्रेललिपी सारख्या उठावदार, समांतर शिरा, हळूहळू  अरुंद होत जाणारी नि टोकाशी संपणारी कोरीव पन्हळ, काही गडद हिरवी तर काही गर्भरेशमी पोपटी विशाल पानं,केळीबाईचं हे रुपलाघव बघताना भान हरपायचं.

सणावारी अशा पांनांवरचं लाल,पिवळं,शूभ्र,रसभरीत जेवण, म्हणजे स्वर्गसुखच.देवाचा नैवेद्य, कावळ्याना घास, हे सगळं केळीच्या फाळक्यांवर.आमची पाच वर्षांची लली एकदा त्या प्रशस्त पानावर झोपली. “किती गाल वात्तय” म्हणाली. हिरव्या पानावरची, गोरी उघडी लली म्हणजे एक निसर्गचित्र होऊन बसललं.

वड, पळस, फणस यांच्या पानांच्या पत्रावळी म्हणजे  हिरव्या डिशेस. पानं जोडण्यासाठी नारळाच्या झावळ्यांच्या काड्या. झाडं इतकी परिपूर्ण असतात की दुसरीकडे जावच लागत नाही. गप्पा मारता मारता हात चालू. हा हिरवा कचरा पुन्हा झाडं सत्व म्हणून घेतात. वर्तूळ पुरं. घासापुसायचं कामच नाही.

सणासुदीला आंब्याची पानं तोरण होतात.पानांची एखादी फांदी दाराला शोभा आणतात. कर्दळी चौरंगावरच्या पूजेला आणखी मंगल शोभा आणते.कोकणातली मुलं अंगणातल्या फणसाच्या पानांचे बैल करतात. मळ्यात खर्ऱ्या बैलांची औत नि अंगणात मुलांची औतं फिरत भाताची लावणी लावतात. थंडीत ह्याच पानांची शेकोटी वत्सल ऊब देते.

पानांच्या साथीने साधीसुधी पक्वान्न किंवा न्याहरी बनते. हळदीच्या पानावर गुळपीठ सारवायचं.ती पान वाफवायची. लवंग वेलचीचं  कामच नाही. हळदीचा वासच पानग्याना खमंग करतो. चातुर्मासात कांदा लसूण वर्ज,पण ओव्याची पानं उणीव भरून काढतात. त्यांची भजी खमंग, चविष्ट होतात. पानांचा छाप भज्याच्या आत उमटलेला.

एक सुंदर सजावट.पूर्वी तान्हया बाळांच्या आया बाळाच्या टाळूवर कापसाच किंवा एरंडाचं पान टोपर्ऱ्याखाली सारून ठेवत.कडक उन्ह बाधू नये म्हणून. संध्याकाळपर्यंत पान कुरकुरीत व्हायच.बाळाच्या मेंदू पर्यंत उष्णता पोचायची नाही.

पान खाणारे आपल्या चंचीत विड्याच्या पानांच्या चळती नोटांसारख्या जपून ठेवतात. पानाच व्यसन असणाऱ्याना ती पानं पैशासारखी मौल्यवानच की. अशी  ही पानं.घर सजवतात, औषध करतात, खेळणी होतात, स्त्रियांच्या नटण्याथटण्यालाही मदत करतात. मेंदी नाही का स्त्रियांचे हात, पाय केस रंगवते. अंगणात श्रावण सजलाय.त्यामुळेच मनात रंगला हा हिरवा पानांचा उत्सव.

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ललित: चहा ☆ श्री अविनाश सगरे

☆ विविधा – ललित : ☕️ चहा ☕️ ☆ श्री अविनाश सगरे

कसं मस्तमस्त वाटतंय सकाळीसकाळी वाफाळलेला चहा हातात पडल्यावर,म्हणजे कप हातात घेतल्यांवर!घराच्या बाल्कनीतून ओसरीतून गच्चीतून पार्किंग जागेतून हवं तर अंगणातून म्हणा नाही तर सोफ्यातून म्हणा ना! समोरचा दिसणारा हिरवागार निसर्ग,निळाशुभ्र तर कधी मेघांनी हा  आक्रमिलेला नभ आसमंत! जगवणारी ऑक्सीजनची ही स्वच्छ हवा,आपण सोडलेला कार्बनडायऑक्साईडचा हा फवारा शोषून घेणारा तो लतावेलीं वृक्षराजींचा परिसर. हं सांगायचं म्हणजे अंगाखांद्यावर हवेहवेसेच असे वाटणारे खेळणारे सोनेरी सूर्यकिरणे आणि त्याचा तो प्रकाशझोत.

पाखरांचे मधुर सुगमसंगीत,त्यातच कोकिळेचा स्वरसाज. तन मन कसे प्रसन्न उत्तम उत्साही सळसळीत अन उभारी देवून जातं.या सर्वाबरोबरच वाफाळलेला चहा घेत असतां चहाची वाफ कशी गोलाई करत हळुवार वरवर जाते तसा उगवलेला दिवसही शांत शांत हळुवार जावा असे वाटते.

तो सर्व तयारीनिशी सज्ज आहे तुमच्यां भैरवी भूपाळीला, तुमच्या अणुरेणूंत उर्जा भरायला आणि धमन्यातलं रक्त सळसळावायला. आणि सूर्यास्तापर्यंतच्या कष्टाने व्याकूळ दमलेल्या मनाला शरीराला शांत समाधानी करत ती रात्र आहे तुम्हांला निद्रादेवीच्या आधीन करायला,सुखाच्या या आपल्यां झोपेसाठी मऊमुलायम चादरअंगावर ओढायला चहा निमित्तही आहे व हवासाही आहे दिवस आरंभाला!परंतु त्यांमूळे माणूस आत्मध्यानात  न राहता विश्वाच्या या उदार उदात्त कृपाळू अभय अमोघ अथांग असिमितआणि  बहुसहस्त्र पसारयांशी एकरुप होतो तद्रुप तादात्म्य पावतो अर्थात ते जाणले ओळखले मानले तर आणि तरच आहे!

पंचमहाभूतां देणगी मुक्तहस्ते। घे झोळी भरुन शुभकरांते.

 

©  श्री अविनाश सगरे

मूळ हिंगणगांव सध्या जयसिंगपूर

Please share your Post !

Shares
image_print