मराठी साहित्य – विविधा ☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

अल्प परिचय:

संप्रति :असिस्टंट ब्रांच मँनेजर, अभिनंदन सहकारी बँक अमरावती
आवड : वाचन आणि थोडबहुत लिखाण.

? विविधा ?

☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सकारात्मक असणं ही आपल्या जीवनात हवी असलेली अत्यावश्यक बाब. आपण स्वतः सुखी,समाधानी राहण्यासाठी आपणच त्या दृष्टीने पावलं उचलणं हे ही महत्वाचचं. ह्याची सुरवात जर आपल्याकडून योग्य रितीने झाली तर मग आपोआप आपल्याला मार्गदर्शन, मदत ही मिळतेच.

परंतु हे आपलं सध्याचं जीवनमान हे अतिशय धावपळीचं, दगदगीचं झालयं. पूर्वी कामांचा ताण हा घरगुती स्वरूपातील होता. स्त्रियांना बाहेरच्या क्षेत्रातील ताणतणावाचा फारसा सामना करावाच लागत नव्हता. आता काळात, परिस्थितीत खूप बदल झाल्याने स्त्रियांना खुल्या क्षेत्रात त्या करीत असलेल्या नोकरी वा व्यवसायात निरनिराळ्या अडचणींचा सामना करून त्यातून यशस्वीपणे मार्ग देखील काढावा लागतो.

जसाजसा काळ पुढेपुढे जातो तसतसे आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामं करण्याच्या पद्धतीत फरक पडत जातो. ह्या बदलत्या पद्धतीचे काम हे नवीन पिढी त्यामानाने जास्त लवकर आत्मसात करते. कामामुळे एक प्रकारच समाधान नक्की मिळतं. तसचं अडल्या नाडल्यांना, गरजूंना, सहका-यांना मदत केल्याने एक आगळवेगळं आत्मिक समाधान लाभतं.

सुख, शांती, समाधान ही लहानशी पण खूप महत्वाची गोष्ट मिळविण्याचा साधा, सोप्पा सरळ उपाय म्हणजे आपल्याकडून दुस-याला उत्स्फूर्तपणे केल्या गेलेली मदत.

सहकार क्षेत्रात, ह्या बँकींग क्षेत्रात ह्या गोष्टीचे महत्त्व तर जरा जास्तच कळले, लक्षात आले. मदत ही करायचीच आहे, उपयोगी हे पडायचं आहे तर आपण आईस्क्रीम सारखं न जगता मेणबत्तीसारखं जगावं. वितळून जातांना पण फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्या ला प्रकाश देऊनच जावं.

ही मदत करतांना दोन महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करावे हे माझं स्वतः चं वैयक्तिक मतं. पहिली गोष्ट म्हणजे  मदत करतांना ही एका हाताची दुसऱ्या हाताला पण कळायला नको. व दुसरी गोष्ट म्हणजे मदत ही करतांना ती खरोखरच गरजूंना मिळायला हवी.म्हणजेच काय तर कुठलीही मदत करतांना निस्वार्थ भावनेने गाजावाजा न करता केल्या गेली तर अश्याप्रकारे केल्या गेलेली मदत ही आपल्याला चिरंतर सुख,समाधान, संतोष देऊन मनाची अवस्था एका उंचीवर जाऊन बसेल हे नक्की.

काल अशीच एक मस्त शार्टफिल्म बघण्यात आली.”शाम होने को है” हे त्या फिल्मचे नाव. दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांना केलेल्या मदतीकडे आपण फक्त आणि वैषयीक आणि दुषीत नजरेनेच बघतो ही खरीच सत्यातील शोकांतिका आहे. परंतु ही आपल्या दुषीत नजर बदलण्याचे, मनातील कलुषित विचार झटकण्याचे काम ही फिल्म करते. ह्या फिल्मची स्टोरी सांगून मी त्यातील मजा, उत्सुकता अजिबातच घालवणार नाही. फक्त इतकच सांगते कुठलिही घटना वाईट नसते, त्या घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन व आपला स्वतःचा अप्रोच मात्र आपण बदलविला पाहिजे. ह्या फिल्ममधील मुलीची सकारात्मकता आणि तिचे विचार खरचं अनुकरणीय. साध्या गोष्टीतही खूपदा सहजसुंदर आनंद, सुख, समाधान दडलेलं असतं फक्त त्यासाठी हवी पारखी नजर आणि हे सगळं हुडकून काढण्याचा जिज्ञासा. शिवाय भिन्नलिंगी व्यक्तींमध्येही नुसती आणि नुसती वैषयीक भावना नसून त्यामध्ये जिव्हाळा व मदतीची पण भावना असूच शकते हा डोळ्यात अंजन घालणारा दृष्टिकोन.

तेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरुर बघण्या सारखी शार्टफिल्म “शाम होने को है “त्याची लिंक खालील प्रमाणे.

शार्टफिल्म यूट्यूब लिंक  Please click here >>👉   “शाम होने को है”

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

22/08/2022

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टी आणि दिशा…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दृष्टी आणि दिशा ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दृष्टी ! समोर दिसणारी दृष्ये नजरेद्वारे आपल्या डोळ्यांनी अवलोकन करण्याची निसर्गदत्त क्षमता म्हणजे दृष्टी ही दृष्टी या शब्दाची सरळ,सोपी व्याख्या.पण ती दृष्टी या शब्दाच्या  असंख्य कंगोऱ्यांना दृश्यमान करण्यास तशी अपुरीच पडणारी. कारण त्या विविध कंगोऱ्यांचा वेध अशा मोजक्या शब्दांद्वारे घेता येणं शक्य नाहीच.

दृश्य, दृग्गोचर, दृष्टीभ्रम, दृष्टीमर्यादा, दृष्टीक्षेप,दर्शक, दृष्टांत,दर्शनी,दर्शनीय,-हस्वदृष्टी दीर्घदृष्टी,तीक्ष्णदृष्टी,जीवनदृष्टी, दूरदृष्टी,काकदृष्टी,पापदृष्टी असे ‘दृष्टी’ या शब्दांच्या अर्थसावल्यांनी आकाराला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द. या प्रत्येक शब्दांची व्याप्तीही तितकीच व्यापक.

हे सगळे शब्द दृष्टी या शब्दाच्या अर्थाशी थेट नातं सांगणारे आहेत. या खेरीज एरवी ऐकताना त्यांचा दृष्टी या शब्दाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय असं वाटावं असे दृष्टी या शब्दाचे इतरही अनेक अर्थ व्यक्त करणारे शब्दही आहेतच.लक्ष,अवधान, चित्त,दिशा,रोख,कल, मनोवृत्ती, कुवत,विचारबुद्धी,पारख असे दृष्टी या शब्दाचेच विविध अर्थरंग ल्यालेले अर्थपूर्ण शब्द दृष्टी या शब्दाची व्याप्ती समजून घेण्यास प्रवृत्त करणारे आहेत.

सुरुवातीस सांगितलेल्या दृष्टी या शब्दाच्या सरळसोप्या व्याख्येनुसार दृष्टी ही समोरची दृश्ये अवलोकन करण्याची निसर्गदत्त देणगी आहे हे खरे पण ही दृष्टी स्वायत्त नाहीय.ती जे अवलोकन करते म्हणजेच पहाते ते पहाण्याचे फक्त एक माध्यम या भूमिकेतून.सुंदर दृश्यांच्या अवलोकनातून मिळणाऱ्या सुखाला ‘नेत्रसुख’ असं म्हंटलं जात असलं तरी ते खऱ्या अर्थाने दृष्टीला होणारे सुख नाहीच.तो  दृष्टीद्वारे मनाला होणारा सुखाचा स्पर्श असतो.त्याला दृष्टीसुख म्हणतात ते या अर्थाने.दृष्टीला होणारे नाही तर दृष्टीमुळे मनाला होणारे सुख ! मनात उमटणारी ही सुखद भावना नंतर नजरेच्या रूपात आपल्या डोळ्यांत तरळत असते एवढेच.याउलट एखादं दृश्य जर अतिशय दुःखद, भयानक किंवा थरारक असलं तर दुःख,भिती थरार या भावना अशाच आधी मनातच उमटत असतात आणि  नंतर त्याच भावना नजरेतून व्यक्त होतात. म्हणूनच काय,किती,आणि कसं बघायचं हे दूरदृष्टीने ठरवायची सवय आपल्या मनाला आपणच लावायची असते.ती सवय चांगली असेल तर आपल्यासाठी सुखकारक, हितावह आणि ती वाईट किंवा अतिरेकी असेल तर मात्र दु:ख देणारी म्हणून हानिकारकच ठरते.

किती पहायचं याचं अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर मोबाईल,टीव्ही पहाण्याचं घेता येईल.ते पहाणं कामासाठी किंवा ठराविक वेळेकरता असेल तर हितकारकही ठरु शकेल आणि ते पहाण्याची सवय अतिरेकी असेल तर हानिकारक!

काय पहायचं हे आपल्याच स्वाधीन असतं.दैनंदिन वावरातही समोर येणारी प्रत्येक गोष्ट आपण पाहू शकतोच पण पहातोच असे नाही. घराबाहेर पडताना कुठे जायचं याचे नेमके भान आपल्या मनात पक्के असते आणि त्याचेच विचार मनात घोळत असल्याने नजरेसमोरून जाणारी सगळीच माणसे,दुतर्फाची दुकाने, आजूबाजूच्या हालचाली आपल्याला दिसू शकत असल्या तरी आपण त्या पहात नसतोच. आपलं लक्ष्य असतं आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणं हेच आणि त्यामुळे आपलं लक्ष असतं ते रस्त्यातले खाचखळगे, मागून पुढून येणारी वाहने, अशा आपल्यालाअडसर निर्माण करू शकणाऱ्या गोष्टींकडेच फक्त. त्यामुळे काय पहायचं हे आपणच आपल्याही नकळत ठरवलेले असते. आपलं लक्ष विचलित झालं तर मात्र अचानक अपघातही होऊ शकतो. अपघात झालाच तर त्याला तो ज्याच्यामुळे  झाला तोच नाही फक्त तर आपणही जबाबदार ठरतोच. दैनंदिन अनुभवातले हे ‘लक्ष्य’ आणि ‘लक्ष’ आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. नेमके ‘लक्ष्य’ ठरवून लक्षपूर्वक केलेली वाटचाल उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यकच असते.

चित्रपट,नाटक,टीव्ही ही माध्यमे दृष्टीद्वारे केलेल्या अवलोकनातून फक्त करमणूकच करीत नसतात तर विचारांना दिशाही देत असतात.त्यातील अभिरुचीपूर्ण कलाकृती आनंद न् समाधानाबरोबरच विचारांना योग्य दिशाही देतात.विचारांना मिळणारी ही दिशाच आपला दृष्टीकोन व्यापक बनवत असते.

त्या कलाकृती उथळ,बेगडी,सवंग करमणूक करणाऱ्या असतील तर त्यातून मिळणारं समाधान क्षणभंगूर तर असतंच आणि मनातल्या विचारांना वहावत नेणारंही.त्यामुळे निर्माण होणारा संकुचित दृष्टीकोन आयुष्यात आपल्याला भरकटत न्यायला निमित्त मात्र ठरतो.

आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक की नकारात्मक हे आपल्या विचारांची दिशाच ठरवत असते.म्हणूनच दृष्टी आणि दिशा यांचं आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखता येणं हे महत्त्वाचं !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते. तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो, ‘ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात, ‘ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’ त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते.

नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते.लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते. ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो. पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

🙏 गणपती बाप्पा मोरया! 💐

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 8 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पावसाचं ये जा चालूच आहे. आषाढात कोसळणारया पाऊस म्हणजे भरू लागलेली धरणे आणि मनात महापुराची भीति. पण हळुहळू हा जोर कमी होऊ लागतो. पुन्हा पाऊस आणि बघता बघता पाऊस गायब. हा लपंडाव म्हणजे श्रावण. म्हणजेच ऑगस्ट. श्रावण असो किंवा ऑगस्ट, दोन्ही  दृष्टींनी हा महिना महत्वाचा. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्वाच्या दोन घटना या महिन्यात घडल्या. एक म्हणजे नऊ ऑगस्ट!  1942 च्या या दिवशी स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळे वळण मिळाले. ‘चले जाव’ च्या घोषणेने अवघा देश दुमदुमून निघाला. दुसरा महत्वाचा  दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट. 1947 च्या या दिवशीच आपला देश स्वतंत्र झाला हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हा ऑगस्ट महिना आपल्या सर्वांना खूप खूप महत्त्वाचा. या दोन महत्वाच्या दिवसांव्यतिरिक्त अन्यही काही दिवस महत्वाचे आहेत. एक ऑगस्ट हा मुस्लिम स्त्रिया हक्क दिन आहे. 1905 मध्ये बंगालाच्या फाळणीच्या विरोधात जी स्वदेशी चळवळ कलकत्त्यात सुरू झाली त्याची आठवण म्हणून सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीचा दिवस वीस ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. तर हाॅकीतील किमयागार मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.

या ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तरावरील अनेक दिवसांचेही महत्व आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे आहे. आदिवासींचे अस्तित्व व त्यांची संस्कृती याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन आहे. छायाचित्र कला व कलाकार यांच्या सन्मानार्थ एकोणीस ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी व एकवीस ऑगस्ट हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो.

सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्याच्या जखमांची आठवण करून देणारे दिवस म्हणजे अनुक्रमे हिरोशिमा दिन आणि नागासकी दिन. !

प्राण्यांचे रक्षण आणि वर्धन यांचे महत्त्व लक्षात आणून देणारे दिवस म्हणजे जागतिक सिंह दिन, हत्ती दिन आणि कुत्रा दीन. हे अनुक्रमे दहा, बारा आणि सव्वीस ऑगस्टला साजरे होतात.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, दत्तभक्त टेंबेस्वामी, हुतात्मा राजगुरु, गोस्वामी तुलसीदास, महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी या महान व्यक्तींच्या जन्माचा हा महिना. तर याच महिन्यात लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनप्रवासाची अखेर झाली. भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिनही याच महिन्यातील.

या ऑगस्ट इतकाच  महत्त्वाचा श्रावण महिना! एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण तर दुसरीकडे सण, व्रतवैकल्यांची गडबड. रंग गंधाचे लावण्य अंगावर मिरवणारा मास. राखीपौर्णीमा साजरी करून भावाबहिणींचे नाते दृढ करणारा मास. नारळ वाहून समुद्राला शांत होण्याची विनंती करणा-या दर्यावर्दींचा मास. नागपंचमी, बैलपोळा यासारख्या कृषी संस्कृतीशी निगडीत असणा-या सणांचा महिना. मोहरमचे ताबूत नाचवणा-या मुस्लिमधर्मीयांचा मास.  पारशी नूतन वर्ष, फरवर्दिन, याच महिन्यात सुरू होते.

आषाढात कोसळून कोसळून दमलेल्या पावसाला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटत असावे. म्हणून तर श्रावणातल्या हलक्याफुलक्या  सरी थांबून थांबून पडत असाव्यात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने, श्रावणात निळा घन बरसून जाता जाता घनश्यामाची आठवण करून देत असतो. निसर्गातील आणि संस्कृतीतील वैभवाचे दर्शन घडवणारे साहित्य, काव्य, गीते यामुळे तर मनाची प्रसन्नता आणखीनच वाढत जाते. या प्रसन्न मनाने आपण सगळेच उत्सुक असतो मोरयाचे स्वागत करण्यासाठी!सुखकर्ता दुःखहर्ता अशा त्या गणरायाचे वेध लागलेले असताना, हवा हवासा वाटणारा श्रावण केव्हा निघून जातो, समजतही नाही. कालचक्राचे एक पाऊल मात्र पुढे पडतच असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? विविधा ?

☆ जय गणेश आणि निळी कमळं !! ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गणपती आणि निळी कमळं यांचं माझ्या मनात अतूट नातं आहे… २००३ साली माझ्या मुलाचं अभिजितचं लग्न झालं त्यानंतर पाच महिन्यांनी गणेशोत्सव आला. आमच्या घरात गणपती बसत नाही… पण घराच्या दारातच मंडळाचा गणपती बसतो… माझी सून प्रिया एक दिवस म्हणाली, आपण उद्या पहाटे दगडूशेठ हलवाईं च्या गणपतीला जाऊ ! आम्ही सर्वजण तयार होऊन पहाटे चार वाजता गणपतीच्या दर्शनाला गेलो, ते गणपती दर्शन अलौकिकच असतं ! गणेशाचा वाहण्यासाठी मुली /बायका निळी कमळं विकत असतात! गेली अनेक वर्ष आम्ही ती निळी कमळं विकत घेतोय बाप्पासाठी आणि घरी परतताना आमच्यासाठीही ! निळी कमळं फक्त त्याच एका पहाटे घेतली जातात… माझ्या आजोळच्या गावात एक तळं होतं ..म्हणजे आहे.. आमच्या लहानपणी त्यात असंख्य निळी कमळं असायची… निळ्याकमळाचं आकर्षण तेव्हांपासूनचं… पुढे निलकमल हा सिनेमा पाहिला तेव्हाही राजकुमारी “निलकमल” अर्थात वहिदा रेहमानला पाहून तळ्यातली निळी कमळंच आठवली होती….

दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन घेण्याचा नेम अर्थात सूनबाईनी पाडलेला पायंडा २००३ पासून आम्ही पाळतोय कोरोना काळात तो खंडित झाला ! या वर्षी कदाचित पहाटे पाऊले गणेशाच्या दर्शनासाठी वळतील पण आता ही प्रथा आमच्या घरात सुरू करणारी प्रिया आणि अभिजित, सार्थक तिघेही सिंगापूरला आहेत सध्या! पण माझ्यासारखी एरवी “सूर्यवंशीय” असलेली बाई सूर्य उगवायच्या आत उठून तेव्हा सारखंच आताही गणेश दर्शन घ्यायला जाईल असं वाटतंय…

ती निळी कमळंही साद घालतीलच आ ऽऽऽऽ जाओ….अशी☺बस गणेशजी का बुलावा आना चाहिए….🙏

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 5 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मुलींच्या शाळेत ‘ सारेगमप ‘ स्पर्धा होती. नमिताची  व ईशाची 30 मुलींमधून निवड झाली. इतर मुलीही होत्या. आठवडाभर प्रॅक्टीस आणि रविवारी स्पर्धा असे दोन महिने चाललं होतं.  शेवटी फक्त दोनच स्पर्धक राहिले.  नमिता आणि ईशा. दोघीही अतिशय तयारी करून आल्या होत्या. अंतिम टप्पा गाठला.  दोघींचीही चार चार गाणी झाली आणि निकालाचा क्षण आला.  मंचावर दोन स्पर्धक – दोघी मैत्रिणी होत्या. उत्सुकता, बावरलेपण, धडधडणारी छाती, दोघींही आतुरतेने वाट पाहत होत्या. एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या होत्या. निकाल घोषित झाला.  नमिता जिंकली होती.  दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून रडायला लागल्या. किती समजावले तरी थांबेनात. शेवटी मुख्याध्यापिका मंचावर गेल्या.  त्यांनी दोघींना सावरले. त्यांनी नमिताला विचारले, “नमिता,  तू का रडते आहेस? तू Winner आहेस ना?” नमिता रडतच बोलली, ” मॅडम,  ईशा जिंकली नाही म्हणून मला वाईट वाटलं ” तर ईशा म्हणाली, ” नमिता Winner झाली म्हणून मला खूप आनंद झालाय, इतका कि मला रडू आलं ” .

अश्रू चं इतकं निरागस, सुंदर रूप दुसरं कुठलं असू शकेल?

नमिता, ईशा एकमेकींसाठी रडल्या. आपल्या यशापेक्षा जिवलग मैत्रिणीचं अपयश मनाला लागणं, आणि मैत्रिणी च्या यशात आपलं अपयश विसरून जाणं,  हा मैत्रीचा आणि यश अपयश या दोन्ही ला योग्य प्रकारे सामोरे जाण्याचा धडा दोघींनी घालून दिला.

जर त्या भावना आवरून रडल्या नसत्या तर मैत्रीची,  प्रेमाची जागा असूया, ईर्ष्या  , हेवा यांनी घेतली असती. किती धोकादायक होतं ते! म्हणून त्या रडल्या ते योग्यच होतं ना!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क  ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजींच्या लोक संपर्कात सुशिक्षित लोक जास्त असायचे पण त्याचा बरोबर ग्रामीण भागातले लोक सुद्धा असायचे. सुशिक्षित लोकांबरोबर त्यांचा सतत विविध संवाद,चर्चा होत असत. सुशिक्षित तरुणांकडून त्यांना ही अपेक्षा होती की, ‘त्यांनी आपल्या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. एव्हढंच नाही तर भारतीयांनीच भारताचा इतिहास लिहिला पाहिजे. नाहीतर परकीय लोक आपल्या देशाचा इतिहास लिहितात. त्यांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची काहीही माहिती नसताना तो लिहीत असतात. त्यामुळे त्यांना भारताच्या इतिहासातले बारकावे समजत नाहीत. अशांनी इतिहास लिहिला आणि तो आपण वाचला तर आपली दिशाभूल होते असे त्यांना वाटायचे’.

स्वामीजी राजस्थान सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशात आले होते, त्यामुळे त्यांना साहजिकच ही तुलना करता आली असणार. आज तर आपल्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या इतिहासकडेही राजकीय द्वेषातूनच पाहिलं जातय. ही परिस्थिति इतकी वाईट आहे ही राजकीय स्वार्थापोटी देशाचा इतिहास, देशाभिमान यांचं महत्व राहिलेलं दिसत नाही. त्याकाळात ही गुहेत राहणार्‍या आध्यात्मिक स्वामीजींनी सामाजिक भान सुद्धा जपलं होतं. त्यांचा मोलाचा सल्ला,उपदेश अशा समाजात जिथं अनुभव येईल, जिथं गरज आहे तिथं तो देत असत.

भारत कृषि प्रधान देश आहे त्यामुळे जास्त संख्या ग्रामीण भागात राहणारी आहे. पण ग्रामीण भागातले खेडूत जास्त शिकले की शहराकडे धाव घेतात. खर तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीकडे हा वर्ग नोकरीला भुलून पाठ फिरवतो. हे स्वामीजींच्या त्या काळात सुद्धा लक्षात आलं होतं. उलट शहरातल्या सुशिक्षित लोकांनी खेड्यात जाऊन तिथल्या शेतकर्‍यांशी संवाद साधला पाहिजे. उलटा प्रवास झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही वर्गात आपुलकीचे नाते निर्माण होईल असे स्वामीजींचे मत होते. त्यानुसार ते सहवासात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत असत.

आज कोरोना साथीच्या परिस्थितून पुन्हा एकदा हीच गोष्ट सिद्ध झाली आहे. इतके कामगार आणि मजूर, कारागीर असेच खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या आमिषानेच स्थलांतरित झाले आहेत. त्याचा अशा संकटाच्या वेळी केव्हढा परिणाम व्यवस्थेवर आणि त्यांच्याही जीवनावर पडलेला दिसतोय. आता तर शहराकडून खेड्यात जाऊन तिथली अर्थव्यवस्था भक्कम करण्याची वेळ आली आहे.

स्वामीजींनी अशा खेडूत लोकांबरोबर तरुण लोकांना पण दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तरुणांना संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याचे काही प्राथमिक धडेही त्यांनी तरुणांना दिले कारण, संस्कृत शिकलं तरच भारताची परंपरा खर्‍या अर्थाने समजू शकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय पाश्चात्य देशात जे जे काही नवे ज्ञान असेल, नवे विचार असतील, त्याचाही परिचय भारतीयांनी करून घेतला पाहिजे. सर्व अभ्यासला शिस्त हवी, माहितीमध्ये रेखीवपणा हवा,नेमकेपणा  हवा. कोणत्याही विषयाच्या ज्ञांनाच्या बाबतीत परिपूर्णतेची आस हवी या गोष्टींवर स्वामीजींचा भर होता. हे गुण आपण भारतीयांनी पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत असे त्यांना वाटे.

त्यांचे नुसते तात्विक गोष्टींकडे च लक्ष होते असे नाही .इतके लोक भेटायला येत, त्यांना कोणाला कशाची गरज आहे या व्यावहारिक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. अलवर मुक्कामात एका गरीब ब्राम्हणाला आपल्या मुलाची मौंज करण्याची इच्छा होती पण त्याची तेव्हढी आर्थिक परिस्थिति नव्हती. तेंव्हा स्वामीजींनी लोकांना विनंती केली की सर्वांनी वर्गणी गोळा करून, त्या मुलाची मौंज करावी. सर्वांनी संमती दिली. पण पुढे स्वामीजी जेंव्हा अबुला गेले तेंव्हा त्यांनी तिथल्या अनुयायला पत्र लिहून विचारले की, सांगितलेल्या सर्व गोष्टी चालू आहेत ना आणि त्या ब्राम्हणाच्या मुलाची मौंज झाली का हे ही विचारले.

अशा प्रकारे स्वामीजींनी पुढच्या प्रवासाला गेल्यावर आधीच्या मुक्कामातल्या लोकांशी पत्र संवाद चालू केला. संपर्क ठेवला आणि उपदेश पण करत राहिले. परिव्राजक म्हणून फिरताना ते कुठेही गुंतून पडत नव्हते पण  पत्र लिहिणे, संबंधित लोकांचे पत्ते लक्षात ठेवणे, जपून ठेवणे या नव्या व पूरक गोष्टी अनुभावातून त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि यातूनच मग स्वामीजींनी आपल्या वराहनगरच्या मठातील गुरुबंधूंना संपर्कात राहण्यासाठी पत्र लिहिणे सुरू केले.

अलवरचा निरोप घ्यावा असं त्यांना वाटलं, सात आठवडे झाले होते इथे येऊन. त्यात अनेकांनी अनुयायित्व पत्करल होतं. खूप हितचिंतक जमवले होते. प्रवास पुढे सरकत होता तसे त्यांच्या अडचणी कमी होत होत्या. मोठ्या संख्येने लोक ओळखू लागले होते. पुढे पुढे तर, पुढच्या मुक्कामाला कोणीतरी परिचय पत्र द्यायचे ते बर्‍याच वेळा आधीच्या मुक्कामातील प्रभावित झालेली व्यक्तीच असायची. सहज ही सोय व्हायची, पण त्यांनी स्वत: कधी अशा सोयीसाठी प्रयत्न केला नव्हता.

अलवर सोडून स्वामीजी आता जयपूरला पोहोचले. यावेळी अलवरचे त्यांचे खूप हितचिंतक लोक त्यांना सोडायला त्यांच्या बरोबर पन्नास साठ किलोमीटर पर्यन्त आले होते. यावरून स्वामीजींच्या सहवासाचा परिणाम कसा होत होता याची कल्पना येते.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सव काल आणि आज … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ गणेशोत्सव काल आणि आज… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत. कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले. त्यामागे तत्कालीन परीस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो, कदाचित त्या काळी काळाशी सुसंगत असेल ही ! 

ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल आणि नंतरच्या काळात त्याला सार्वजनिक रूप आले. टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली. मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले. एक चैतन्य संचारले या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला. लोक शिकले, शिक्षित झाले, उत्सवात बदल झाले, लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले. भरमसाठ मंडळे एकमेकांवर ईर्षा, भांडणे अन जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले. प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला. रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.

सामाजिक वातावरण पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत एक छोटे गाव एक गणपती, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ? मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत. उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे, टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे  म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.

देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत. जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली, पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.

अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तनकट फोपावल्यासारखे !

मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची, परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या   रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची, ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची, मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या, मुगातल्या लाल अळ्या अन  चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धवायच्या, उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची, चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा. शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या, आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची  एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !

सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून  जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा. पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन “🍲🍜🍚

“अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात ‘रेडी टू ईट’ पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

‘रेडी टू ईट’ पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….

कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :

अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, “डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो.” असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !

ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे – आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

‘रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो’, ‘खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत’, ‘असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?’

 – या सगळ्याला एकच उत्तर आहे, ‘ब्रॅण्डिंग’! 

‘ब्रॅण्डिंग’ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!

आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.

अरे हो हल्ली ‘रेडी टू ईट व मेक’ पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

लेखिका – वैद्य रुपाली पानसे –

मो 9623448798 ईमेल [email protected]

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print