मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

15 सप्टेंबर. ! अभियंतादिन. तमाम इंजिनिअर्सनां शुभेच्छा. अभियंतादिन ज्या व्यक्तीच्या अफाट, अचाट कर्तृत्वामुळे अस्तित्वात आला त्या व्यक्तीला आपण विसरुच शकणार नाही.

हे आदर्श अभियंता म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना”‘नाईट कमांडर” म्हणून ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 चा.

त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. मात्र हे पंधरा वर्षांचे असतानांच वडीलांचे निधन झाल्याने ह्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला होता. वडील खूप हुषार होते परंतु तेव्हाचा काळ हा सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नसते ह्या पध्दतीचा होता. त्यामुळे त्यांचे वडील बुध्दीमान असूनही पैसा गाठीशी न जोडून ठेवल्याने त्यांच्या पश्चात ह्यांच्या कुटूंबाला परिस्थीतीचे चटके खूप सोसावे लागले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून एका कामगिरीचा श्रीगणेशा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील  खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती दारं ग्वाल्हेर व म्हैसूर येथील धरणांवर बसविण्यात आली.

सर विश्वेश्वरैया ह्यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती च्या रांगेत बसविण्यात आले. विशाखापट्टणम  बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया ह्यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने तेव्हाच्या काळातील हे आशियातील सर्वात मोठे सरोवर ठरले. ह्यामुळेच ते  ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, , किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगीक प्रकल्प सुरु केलेत. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन समोरील काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेणे हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख बनली. तिरुमला-  तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सर विश्वेश्वरय्या ह्यांची सुरत येथून  पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टन्ट  चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली. पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे. या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी क्यानटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ?हा सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न पडला. श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. परंतु अशा स्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी या सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने ह्या  ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते. त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. मी ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असताना हे डिझाईन केले आहे त्यामुळे  त्या पेटंटचे पैसे  घेणे माझ्या नीतिमत्तेला धरून नाही असे त्यांनी सरकारला सांगितले. स्वयंचलित दरवाज्यांचे हे डिझाईन इतके चांगले होते  की हे जलाशयावर बसवलेले हे दरवाजे पाहण्यास ते पन्नास वर्षांनी स्वतः गेले तरी ते दरवाजे उत्तम रीतीने काम करीत होते. पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली. कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हतेह त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

सर विश्वेश्वरय्या ह्यांच्या बुद्धीमत्तेचे  भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे. तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही. सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया सारख्या  रोगालाही आळा  बसला.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती, जी अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, त्यांना’नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्या गेल.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स ह्या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

अशी अद्वितीय, असामान्य माणसं आपल्या देशाची खरी संपत्ती असतात. वयाच्या 101 व्या वर्षी दिनांक 14 एप्रिल 1962 रोजी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि जगातील तमाम इंजिनिअर्स ना ह्या अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरंगी वसंत ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरंगी वसंत ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मराठीत कविता लोकप्रिय करण्याचं आणि काव्यरसिक घडवण्याचं काम विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकार आणि वसंत बापट या त्रिमूर्तीनं केलं. त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जागोजागी कविता वाचनाचे कार्यक्रम केले. श्रोत्यांना ते आवडू लागले. त्यांना दादही मिळत गेली. या त्रिमूर्तीत शोमन होते, वसंत बापट. पाडगावकार म्हणायचे, ‘वसंत बापट म्हणजे सळसळणारं चैतन्याचं झाड, तर विंदा म्हणायचे, वसंत बापट यांच्या व्यक्तिमत्वाचे ९ रंग आहेत. प्राध्यापक, कवी, गीतकार, शहीर, समीक्षक, सापादक, कार्यकर्ता, वक्ता, शोमन हे ते ९ रंग.

वसंत बापट, म्हणजे विश्वनाथ वामन बापट तथापि ते वसंत या नावानेच सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ला कर्‍हाड इथे झाला. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी पूर्ण झाली. 

प्राध्यापक – उत्कृष्ट अध्यापन हा त्यांच्या कवितेचा पाहिला रंग. नॅशनल कॉलेज वांद्रा इथे १५ वर्षे, नंतर रुईया कॉलेज माटुंगा इथे १५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर ७४मध्ये मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर अध्यासनाचे ते प्राध्यापक होते. ते मराठी आणि संस्कृत विषय शिकवायचे. ते कुशल आणि विद्यार्थीप्रिय अध्यापक होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिन्दी, बंगाली इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.  

कवी – वयाच्या २०व्या वर्षी वसंतरावांनी कविता लिहायला सुरुवात केली. ३०व्या वर्षी ‘बिजली’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहावर त्यांचे सेवादलाचे आणि सानेगुरुजींचे संस्कार स्पष्ट दिसतात. त्यानंतर पुढे ६० वर्षे त्यांनी कविता लिहिल्या. अकरावी दिशा, तेजसी, मानसी, रसिया, राजसी इ. त्यांचे २५ कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी १०००च्या वर कविता लिहिल्या. बिजलीनंतर त्यांचे अनुभवाचे क्षेत्र अधीक विस्तृत व जाणीवा अधिक सखोल होत गेल्या. त्यांच्या कवितेवर संस्कृत, इंग्रजी, बंगाली कवितेचा प्रभाव होता. संस्कृतमधील अभिजात आणि नादवती शब्दकला त्यांच्या कवितेत दिसून येते. गुरुदेव टागोरांचा मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंद प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार त्यांच्या कवितेवर दिसून येतात.

निसर्गातील लावण्य विभ्रम, यौवनाचा अभिजात डौल , खट्याळ शृंगार याबरोबरच वसंतरावांची कविता सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या जाणीवाही व्यक्त करते. जनजागृती करणे हेही कवितेचे एक मोठे काम आहे, असे ते मानत. राष्ट्र संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन आंदोलनाच्या प्रसंगी त्यांची संवेदनाशीलता त्यांच्या काव्यातून प्रगट झाली आहे. उत्तुंग आमची उत्तर सीमा… महाराष्ट्राचा पोवाडा, गांधींची जीवनयात्रा, नव्या युगाचे पोवाडे, (भाग १ ते ३) , सैन्य चालले पुढे इ. कविता याची साक्ष देतील. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी ‘मेघहृदया’च्या रूपाने मराठीत आणली, तर ‘सकीना’तील कवितांना खास उर्दू लहेजा आहे. 

वसंतरावांनी अनेक बालकविताही लिहिल्या. अबडक तबडक, चंगा मंगा, परीच्या राज्यात, फिरकी, फुलराणीच्या कविता असे त्यांचे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. 

युगोस्लावियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात ते भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. इ.स. १९७७ व १९९३ मध्ये अमेरिकेत आणि १९९२ मध्ये आखाती देशात त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. ते श्रेष्ठ आणि लौकिकसंपन्न कवी होते.

गीतकार – वसंतराव उत्तम गीतकार होते. गीत म्हणजे कविताच. फक्त ही कविता वृत्त, छंद, मात्रा, यमक इ. बंधने पाळून लिहिली जाते. आणखीही सूक्ष्म फरक सांगितला जातो. कविता या अंत:स्फूर्तीने लिहिल्या जातात तर गीताची प्रेरणा बाह्य असते. चालीमुळेही गीत लोकप्रिय होते. उत्तम गीत ही उत्तम कविता असेलच असे नाही. पण ग.दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्याप्रमाणेच वसंतरावांची गीते या उत्तम कविताही आहेत. ‘उत्तुंग आमची उत्तर सीमा’, ‘गगन सदन तेजोमय’, ‘देह मंदीर चित्त मंदीर’, ‘सदैव सैनिका’, ही त्यांची गीते लोकांना खूप आवडतात. असेच ‘दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्लेही चालली खुशीत’ हे       तालकाव्यही ऐकताना खूप मजा वाटते.

शाहीर – शाहिरी हा वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा पैलू. वीरश्रीयुक्त ओजस्वी रचना आणि नजाकतीचा वा धीट शृंगार ही शाहिरी काव्याची वैशिष्ट्ये. पोवाडा आणि लावणी हे शाहिरी काव्याचे गीतप्रकार. वसंतरावांनी राष्ट्र सेवादलाच्या  कलापथकासाठी अनेक पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. ‘शूर मर्दाचा पोवाडा’, ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ असे त्यांचे पोवाडे गाजले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी त्यांनी कलापथकाद्वारे अनेक कार्यक्रम बसवून सादर केले. त्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’, हे कार्यक्रम लिहिले. बसवले आणि कलापथकाद्वारे ते सादरही केले. ते उत्तम दिग्दर्शक होते. पौराणिक, ऐतिहासिक कथानकांवर त्यांनी नृत्यनाट्ये लिहिली. ‘शिवदर्शन’ हा नृत्यनाटकात्मक कार्यक्रम चांगला गाजला. कलापथकासाठी त्यांनी, तमाशा, लोकनाट्य, पथनाट्य, नृत्य, नाट्य याबरोबरच लोककलेचे अन्य प्रकारही वापरले. त्यांच्या कलापथकाच्या कार्यक्रमांनी समाजाची आणि जाणकारांची खूप दाद मिळवली.

समीक्षक – वसंतरावांनी समीक्षात्मक लेखन तूलनेने थोडं केलय, पण जे केलय ते लक्षणीय आहे. आधुनिक मराठीचे शतक १९०० ते २००० संपले, तेव्हा त्यांनी या कलखडातील साहित्यावर २४ लेख लिहीले. ‘शतकाच्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. तौलनिक साहित्याभ्यास- मूलतत्त्वे आणि दिशा हे त्यांचे आणखी एक समीक्षणात्मक पुस्तक. त्यातून त्यांच्या विचारांचा आणि अभ्यासाचा आवाका स्पष्ट होतो. समीक्षा या शब्दाची व्याप्ती थोडी वाढवली आणि त्यात सामाजिक व राजकीय जीवनाची समीक्षा असा अर्थ घेतला, तर त्यांच्या आणखी काही पुस्तकांचा समावेश इथे करता येईल. प्राचीन बखर वाङ्मयाच्या शैलीत त्यांनी लिहिलेलं ‘विसाजीपंतांची बखर’ हे पुस्तक म्हणजे राजकीय समीक्षाच आहे. ‘बारा गावचं पाणी’, ‘अहा देश कसा छान’, ‘गोष्टी देशांतरीच्या ही त्यांची प्रवासवर्णने एका अर्थाने सामाजिक जीवनाची समीक्षाच आहे.

संपादक – साधनाच्या पहिल्या अंकापासून ते साधनाशी निगडीत आहेत. १९८३ ते १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. 

कार्यकर्ता – वसंतरावांची लहानपणापासून राष्ट्र सेवादलाशी जवळिक होती. तरुणपणी ते सेवादलाचे निष्ठावान कार्यकर्ते झाले. त्यांनी तरुणपणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. ४२च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना काही काळ तुरूंगवासही भोगावा लागला होता. राष्ट्र सेवादलाच्या कलापथकाचे ते अध्वर्यू होते. कलापथकासाठी त्यांनी कार्यक्रम लिहिले. बसवले आणि सादरही केले. या कलपथकाने लोकजागृतीचे मोठेच काम केले होते.

वक्ता – सामाजिक, वाङ्मयीन, संस्कृतिक क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी भाषणे दिली. त्यांची भाषणे ऐकताना लोक मंत्रमुग्ध होऊन जात. कुमार गंधर्वांनी माळव्यात निर्गुणी भजनाचा कार्यक्रम सुरू केला, त्यावेळी निरुपणासाठी त्यांनी वसंतरावांना बोलावले. अतिशय सुरेख आणि प्रभावी असं त्यांचं निरूपण असे.

शोमन-  वसंतरावांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. उंच-निंच शरीरयष्टी , गोरापान रंग, सोनेरी काड्यांचा चष्मा, प्रसंगाला अनुसरून केलेली अभिरुचीपूर्ण वेशभूषा, कधी सिल्कचा कुर्ता-पायजमा, वर जाकीट, कधी पूर्ण सुटाबुटात आणि एरवी पॅंट व हाफ बुशशर्ट असा त्यांचा पेहेराव असे. ‘आपल्या अस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण करणारे ते चैतन्यामूर्ती होते’, असं त्यांची विद्यार्थिनी मृदुला जोशी म्हणते. 

तर असे हे नवरंगात रंगून गेलेले वसंत बापट. त्यांच्या ‘सेतू’ या कविता संग्रहास आणि मुलांसाठी लिहीलेल्या बाल-गोविंद’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. ७२व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. या मंचावरून त्यांनी अत्यंत प्रभावी आणि सर्वंकश असे भाषण केले होते. 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गंध सुगंध… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गंध सुगंध… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिरात टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते. आणि तऱ्हेतऱ्हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणे, अत्तर यांचे वास नाकाला येऊ लागतात.

पंचंद्रियात गंधाचे इंद्रिय हे फार तीक्ष्ण असते. कोणत्या वासामुळे आपण कुठे आहोत हे डोळ्यांनी न पाहता सुद्धा समजते. त्यावरून सहज आठवले ते पदार्थांचे वास!

यांच्या एका स्नेहांकडे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास जावे की कांदे पोह्याचा वास अगदी बाहेरच्या दारापर्यंत यायचा! तसे कांदे पोहे तेच पदार्थ घालून केले तरी त्यांच्या इतके छान जमतील असं वाटायचं नाही. तो कांदे पोह्याचा वास अजूनही स्मरणात आहे!

 उन्हाळ्यातील संध्याकाळी अंगणात पाणी मारले की येणारा मातीचा वास- मृद्गंध, संध्याकाळी उमलणारी जुई, मोगरा, रात राणीची फुले यांचे सुगंध हे काही कुपित भरून ठेवायचे गंधच नाहीत मुळी! ते फक्त मनाच्या कुपीतच भरून राहतात आणि आपले आपल्याला अनुभवता येतात. असाच एक गंध माझ्या आजोळ च्या घरात मी मनात भरलेला! माझ्या मामाच्या घरी म्हैसूर सँडल्स वापरला जाई.तो येणारा चंदनी वास मला आजोळच्या घरी घेऊन जातो. आम्ही ‘हमाम’ साबण वापरणारे त्यामुळे त्या चंदनी सोपचा वास आमच्यासाठी दुर्मिळच होता!

सुगंध हा असा सांगता तरी येतो पण माझ्या मुलीला आजीची गोधडी पांघरली, की आजीचा वास त्या गोधडीला येतो आणि तसाच वास आईच्या गोधडीलाही येतो असं ती म्हणायची तेव्हा मी बघतच राहायची! पण ते आजीचं आईचं ते पांघरूण तिला मायेच्या सुगंधात ओढून घ्यायचं!

कितीतरी वेगळे वास दिवस भरात घेतो. किराणा मालाच्या दुकानात  तेल, डाळी, धान्य, साबण इत्यादींचा एकत्रित वास भरलेला असतो. पॅकिंगच्या जमान्यात दुकानात येणारे हे वास आता कमी झाले आहेत. कापडाच्या दुकानातील कोऱ्या कापडाचा गंध हाही वेगळाच! तो कॉटन ला येणारा वास आता सिंथेटिक कपड्यांना नाही!

कामावर जाताना येताना लोकल, बस प्रवास यातील गंध, घामाचा कुबट वास नको म्हणून मारलेले विविध प्रकारचे स्प्रे यामुळे होणारे वासाचे मिश्रण नाकाला झोंबणारेच वाटते काही वेळा तर ते ऍलर्जीकही  असते.

गंध सुगंधांच्या या दुनियेत देवघरात येणारा वास काही वेगळाच असतो वातावरणाचा परिणाम असेल किंवा काही असेल पण तिथे येणारा धूप, कापूर, उदबत्ती, अत्तर यांचा सुगंध मनाला पवित्रतेचा आनंद देतो. वेगवेगळे गंध आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतात आणि कळत नकळत ते आपण घेत असतो.कोळीणीला माशांच्या गंधाइतके काहीच प्रिय नसते. तिच्या उशाशी वासाच्या फुलांपेक्षा मासळीचा गंधच तिला अधिक आनंद देतो! बालगंधर्व अत्तराचे खूप शौकीन होते. त्यांच्या रोजच्या स्नानाच्या पाण्यात विविध प्रकारची अत्तरे वापरली जायची. त्यांच्यासाठी कनोजहून अत्तरे मागवली जायची.पूर्वीच्या काळी राजे रजवाडे अशा सुगंधी अत्तराचे मोठे खरेदीदार असतं.तो जमाना गेला!  गंधांचे महत्त्व बदलले.सेंटची कृत्रिम दुनिया जन्माला आली आणि पाश्चात्य संस्कृतीचे सुगंध दरवळू लागले.

गंधाच्या दुनियेत एकदा शिरल्यावर बरेच काही सुगंध आणि आठवणी मनात दरवळू लागल्या. अंगणातल्या वेलीवर उमलणारी जुईची नाजूक फुले तोडून गजरे ओवणारी माझीच मी मला आठवली. सोनचाफ्याची फुले दप्तरात ठेवून वह्या पुस्तकांना सुगंधित करणारी आणि मोगऱ्याच्या वासावर अजूनही जीव टाकणारी मी, सुगंधाच्या बद्दल किती किती लिहू?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नेत्रदान श्रेष्ठ दान” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “नेत्रदान श्रेष्ठ दान” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

दृष्टीदान हे मला लाभता फिटे पारणे नेत्रांचे

डोळ्यापुढती उजळून येती रंग सुखाच्या दुनियेचे ||

नेत्रदानामुळे दृष्टी लाभ घडलेल्या एका छोट्या मुलीचा निरागस आनंदी चेहरा आणि बाजूला असंख्य रंगांची सरमिसळ अशा एका चित्राला समर्पक अशा या दोन ओळी मी लिहिल्या आणि मनात विचार आला, खरंच त्या मुलीच्या आयुष्यातील हा केवढा आनंदाचा, भाग्याचा, क्रांतिकारी क्षण आहे ! त्याने तिचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. तिला दृष्टी लाभली. ती स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू लागली.  कल्पना करा मीट्ट काळोखात चार पावले चालताना सुद्धा भीतीने आपल्याला धडकी भरते. इथे तर अवघ्या आयुष्याचा प्रश्न आहे.

अंधत्व ही आजकालच्या अनेक समस्यांपैकी एक गंभीर समस्या आहे. अंधत्व येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. डोळ्याच्या बुबुळांच्या आजारामुळे येणारे अंधत्व ( कॉर्निया ब्लाइंडनेस ) हा यातीलच एक प्रकार. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने यावर इलाज करता येतो. बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून या अंधत्वावर मात करता येते. या शस्त्रक्रियेने खराब झालेले बुबुळ ( कॉर्निया )काढून तिथे चांगले बसवितात.

पण यासाठी माणसाच्या शरीरातील नैसर्गिक बुबुळांची गरज असते. कारण अजून पर्यंत कृत्रिम बुबुळ बनविणे शक्य झालेले नाही. मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे अशी निरोगी नैसर्गिक बुबुळे उपलब्ध होतात. यासाठी नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासापर्यंत त्याचे नेत्रदान करावे लागते. त्यामुळे मृत्यूनंतर लगेचच नेत्रपेढीला कळवावे लागते. नेत्रतज्ञ येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. डोक्याखाली उशी ठेवावी. खोलीतील पंखा बंद करावा. ए.सी असेल तर सुरू ठेवावा. डोळे कोरडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार ठेवावे.

डॉक्टर मृत व्यक्तीच्या डोळ्यातील फक्त बुबुळाचा (नेत्रपटल) आवश्यक भाग काढून घेतात. त्याजागी कृत्रिम भिंग ठेवून डोळे व्यवस्थित बंद करतात. नेत्रदान केल्याचे लक्षातही येत नाही. चेहरा अजिबात विद्रुप होत नाही. काढून घेतलेली नेत्रपटले पुढील ७२ तासात उपयोगात आणता येतात. बुबुळ रोपणाने ज्यांना दृष्टी येऊ शकते अशा व्यक्तींना त्याचे रोपण केले जाते. हे नेत्रदानीत डोळे कुणाला बसवले ही माहिती गुप्त ठेवली जाते.

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन जणांना दृष्टी येऊ शकते. कारण एका व्यक्तीस एकच बुबुळ बसवितात. तेव्हा मृत्यूनंतरही अत्यंत अनमोल असणारे डोळे शरीराबरोबर नष्ट न करता त्यांच्या दानाने दोघांची अंधारी आयुष्य प्रकाशमान होतात व जाता जाता एक मोठे पुण्यकर्म घडते. यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही नेत्रपेढीकडे नेत्रदानासाठी आपले संमती पत्र/ इच्छापत्र भरून देऊ शकतात व या तपशिलाची नोंद केलेले कार्ड घरातल्यांच्या माहितीसाठी ठेवता येते. असे संमतीपत्र भरलेले नसले तरी चालते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या संमतीने सुद्धा नेत्रदान करता येते. कारण हे काम तर नातेवाईकांनी करावयाचे असते.

दरवर्षी साधारणपणे दोन लाखांच्या जवळपास नेत्र पटलांची आवश्यकता असताना केवळ चाळीस हजारांच्या आसपास नेत्र पटले उपलब्ध होतात. ही जी प्रचंड तफावत आहे ती दूर करण्यासाठी समाजाचे फार मोठे प्रबोधन होणे गरजेचे आहे.  आपल्याकडे केवळ दीड टक्का लोक नेत्रदान करतात तर शेजारील श्रीलंकेत हे प्रमाण शंभर टक्के आहे. ‘नेत्र ही राष्ट्रीय संपत्ती आहे’ या दृष्टीने बघण्याची मानसिकता त्यांनी स्वीकारली आहे. म्हणूनच स्वतःच्या देशाची गरज भागवून ते आपल्यासह अनेक देशांना काॅर्निया पुरवतात.

नेत्रदानाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत. शिवाय याविषयीचे अज्ञान किंवा अपुऱ्या माहितीमुळेही नेत्रदान केले जात नाही. ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली असेल त्यांच्या जवळच्या व्यक्तींची मानसिक अवस्था अशी असते की, त्यांना त्यावेळी या इतर गोष्टी सुचणे शक्य नसते. अशावेळी इतर कोणीतरी सांत्वन करून त्यांना नेत्रदानाची आठवण करून देणे आवश्यक असते. यातूनच एक सत्कर्म घडून येते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रमित्र बनून अशावेळी नेत्रदानासाठी आवाहन करायला हवे.

आम्ही या संदर्भात काम करायला सुरूवात केल्यावर अनेकांनी सांगितले,” नेत्रदान इतके सोपे असते याची कल्पनाच नव्हती. पुरेशी माहिती नव्हती नाहीतर यापूर्वीही घरातल्यांचे नेत्रदान केले असते. इथून पुढे आम्ही तर करूच पण इतरांनाही सुचवू.”  यातूनच ही चळवळ व्यापक बनून अंधांची संख्या घटू शकेल. कोणतेही वय, लिंग, रक्तगट, धर्माची तसेच ब्लड प्रेशर, मधुमेह, अस्थमा,  मोतीबिंदू,  काचबिंदू झालेली व्यक्ती नेत्रदान करू शकते.

‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, डोळ्याला मार लागणे, जंतुसंसर्ग, ॲसिड किंवा चुना डोळ्यात जाणे अशा कारणांनी बुबुळ पांढरे होते. यालाच ‘फुल पडणे’ असे म्हणतात. यामुळे अंधत्व येते. अशा लोकांना नेत्रदानामुळे दृष्टी परत मिळू शकते. तेव्हा समाजात अशी कोणी अंध व्यक्ती आढळल्यास त्यांना ही माहिती देऊन डॉक्टरांकडे पाठविणेही तितकेच आवश्यक आहे. ज्यांना नेत्रदानामुळे नजर येऊ शकते अशांची नाव नोंदणी केली जाते व नेत्रदान मिळाले की त्यांना बोलावले जाते.

नेत्रदान जागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर असा ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ पाळला जातो. यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचावी हे प्रयत्न केले जातात.

यासाठी प्रत्येकाने नेत्रदानाविषयी पूर्ण माहिती घ्यावी, शंका दूर कराव्यात, इतरांना आवाहन करावे. आपण समाजाचा एक घटक असल्याने समाज स्वास्थ्यासाठी शक्य तितके योगदान देऊन प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यामुळे नेत्रदानाच्या या चळवळीस बळ मिळेल. यातूनच अनेक बांधवांना ‘अंधारातून प्रकाश वाट’ सापडेल.

नेत्रदानाचे संकल्प पूर्णत्वास न्यावे

मरावे परी नेत्ररूपी उरावे

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तमसो मा ज्योतिर्गमय” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “तमसो मा ज्योतिर्गमय” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

पंचमहाभूतांपैकी एक ‘प्रकाश’ हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भागच असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही. पण प्रकाशाशिवाय जगण्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.

आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. कधीतरी वीज गेली तर थोडीशी जाणीव होते. पण मुद्दामच डोळे मिटून काही काम करून बघा. कधी एकदा डोळे उघडतो असे होते आपल्याला. अंधारात चाचपडणे सहनच होत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.

आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पनेविषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. ‘हा आपला विषय नाही. आपल्याला काय करायचे ह्या चळवळीशी ‘ अशी अलिप्तता पण दिसली. पण आम्हाला प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते या नेत्रपेढीच्या एका विशेष कार्यक्रमात‌.

एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक पंचविशीची विवाहित मुलगी. बाळ झाल्यावर दृष्टी गेली होती. आता दृष्टी आल्यावर स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. 

एक पन्नाशीच्या बाई आणि  ६५ वर्षांचे आजोबा हेही खूप भारावले होते. त्या बाई घरातून फारशा बाहेर न गेलेल्या. मग घर हेच विश्व आणि घरातली कामे करणे हेच एकमेव उद्दिष्ट. पण नजर गेली आणि  चुलीवर स्वयंपाक करणे, विहिरीकडे जाणे थांबले. परावलंबित्वाने  नैराश्य आले. ते आजोबा पण घरात डांबले गेले. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आणि एकटेपणाने घेरले.  

ण दोघांनाही दृष्टीदानामुळे पुन्हा जगण्याच्या प्रवाहात सामील झाल्याने अत्यानंद झाला होता. स्वयंपाकपाणी, घरातली कामे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामे या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने ही  किती क्षुल्लक कामे आहेत ना. पण त्यांना त्यासाठी परावलंबित्व आले होते. अशा लोकांना इतरांकडून दुर्लक्षित होते पण शक्य आहे ना. थोडक्यात निरुपयोगीपणाची जी अगतिक भावना  त्यांच्या मनाला घेरून होती ती आता दूर झाली होती.

त्यांच्याबरोबर आम्हाला सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आपण करत असलेल्या कामाची ही अतिशय सुंदर फलश्रुती बघून मन भरून आले.

नेत्रदान जागृतीच्या कामामुळे खूप अनुभव आले. अनेक लोकांशी जोडले गेलो. हे काम करताना आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता केली. तसेच ओळखीच्या इतर ८-१० जणांचे नेत्रदान करवून या कार्यात आपला खारीचा वाटा उचललेला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 7 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 7 ☆ सौ. अमृता देशपांडे  

प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला ह्रद्य प्रसंग म्हणजे तिची लग्नाच्या दिवशी सासरी पाठवणी…ही वेळ तिच्या साठी तर कठीण असतेच, पण आईवडील,  बहीण भाऊ,  मित्रमैत्रिणी यांच्यासाठी सुद्धा कठीण असते. लेकीचं लग्न ठरलेल्या दिवसापासून तयारीत गुंतले  असताना हे सगळेजण काळजात एक हुरहुर घेऊन वावरत असतात. प्रत्येक जण प्रेम, आपुलकी,  जबाबदारी यांची वसने स्वखुशीने अंगी लेवून कार्यतयारीत  मग्न असतो. धुमधडाक्याने लग्न करायचे, कुठेच काही कमी होऊ नये,  हा एकच ध्यास असतो. त्यातून वधूबद्दलचे प्रेमच ओसंडत असते. एकदा का अक्षता पडल्या, आणि जेवणे पार पडली की इतके दिवस आवरून धरलेलं अवसान  पूर्णपणे गळून पडते आणि डोळ्यांच्या पाण्याच्या रूपाने घळाघळा वाहू लागते.  आईला लग्न ठरल्य्पासून पोटात आतडे तुटल्यासारखे वाटतेच. वडिलांनी कन्यादानात लाडक्या लेकीचा हात जावयाच्या हातात देताना थरथरत्या स्पर्शातून खूप काही सांगितले असते.मुलीकडच्या सर्वांना तिचे जन्मापासूनच आतापर्यंतचे सहवासाचे क्षण आठवत असतात.  आता इथून पुढे ती आपल्या बरोबर नसणार याचे वाईट वाटते. पण ती सासरी आनंदात रहावी ही भावनाही असते. अशी डोळ्यातल्या पाण्याची शिदोरी घेऊन सासरी गेलेली लेक तिथे फुलते, फळ ते, बहरते,  आनंदी होते.त्यातच आईवडिलांना समाधान असते. तिने सासरी समरस होऊन सासर आपलेसे करणे,  हेच आणि हेच अपेक्षित असतं त्यांना… पाठवणीच्या वेळी आलेलं डोळ्यातलं पाणी दोन्ही परिवारांच्या ह्रदयातला सेतू असतो. म्हणून लग्नात अश्रूंनी ओलीचिंब झालेली पाठवणी ही प्रत्येक धर्मात एक संस्कारच आहे. इथे अश्रू अक्षतांप्रमाणेच पवित्र आणि मंगलरूप धारण करतात.  म्हणूनच त्यांना गंगाजमुना म्हणतात.गंगाजमुना या पवित्र नद्या.  जल जेव्हां प्रवाहीत असते, तेव्हा सगळा कचरा वाहून जाऊन स्वच्छ पाणी वहात असते. वाहून न गेलेले पाणी साचलेले डबके होते. पाण्याने प्रवाहीत असणे, हाच त्याचा धर्म.  डोळ्यातून पाझरणा-या गंगाजमुना नी हा क्षण पवित्र आणि अविस्मरणीय होतो.

मराठी चित्रपट सृष्टीत या प्रसंगावरून ‘ लेक चालली सासरला, ‘ ‘ माहेरची साडी’ असे कित्येक चित्रपट वर्षोंवर्ष गर्दी खेचत होते. गीतकार पी. सावळाराम यांचं ” गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गाणं त्रिकालाबाधित आहे.  कानावर पडताच काळीज गलबलतं…स्त्रीवर्गच नाही तर प्रत्येक पुरूष ही कासावीस होतो. ” सासुरास चालली लाडकी शकुंतला, चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला” हे हुंदके एका ऋषींचे…..

” बाबुलकी दुवाएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

मैकेकी कभी ना याद आए

ससुरालमें इतना प्यार मिले”

हे नीलकमल या सिनेमातलं गाणं, 

हम आपके है कौन?  यातलं

” बाबुल जो तूने सिखाया,  जो तुमसे पाया,  सजन घर ले चली ” हे  गाणं किंवा हल्लीच्या “राजी”  मधलं “उंगली पकडके तुमने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है पार करा दे”

नीलकमल 1960-70 या दशकातला, हम आपके है कौन? हा सिनेमा 1990 च्या दशकातील,  तर राजी 2020 चा. साठ वर्षांच्या काळात किती तरी मोठे बदल झाले, शतक ओलांडलं,  पण या प्रसंगाची भावना तीच, आणि डोळ्यातलं पाणी ही तेच!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३४ परिव्राजक १२ – आदर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३४ परिव्राजक १२ – आदर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 खेतडीचे राजे अजितसिंग, वयाच्या नवव्या वर्षीच गादीवर बसलेले. हे संस्थान छोटंच होतं. त्यांच्या संस्थांनाची प्रगती आणि विकास होण्यात त्यांना अडचण वाटायची ती, अशिक्षित प्रजा. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न सतावत असत. जगमोहनलाल यांनी राजेसाहेबांची स्वामीजींबरोबर भेट ठरवली. पहिल्याच भेटीत दोघंही जुना परिचय असल्यासारखे मनमोकळे बोलू लागले. औपचारिक परिचय झाल्यावर अजितसिंग यांनी पहिलाच प्रश्न विचारला, “स्वामीजी जीवन म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “परिस्थितीच्या दडपणाचा प्रतिकार करत करत माणसाच्या ठायी असलेल्या आंतरिक शक्तीचा जो विकास आणि आविष्कार होतो ते जीवनाचे स्वरूप होय”. या उत्तराने प्रभावित होऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,“शिक्षण म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “मी असं म्हणेन की, विशिष्ट विचारांशी माणसांच्या जाणिवांचा जो अतूट असा संबंध निर्माण होतो, त्याला शिक्षण हे नाव द्यावं”. वा, म्हणजे फक्त अनेक विषयांची माहिती करून घेणे एव्हढाच शिक्षणाचा मर्यादित अर्थ नाही. त्यातील तत्वांमुळे जाणीव आणि भावना एकरूप होऊन जीवनाला विशेष अशी दिशा यातून मिळाली पाहिजे. तेंव्हाच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल. स्वामीजींनी घेतलेल्या अनुभवावरून त्यांचे हे शिक्षणाबद्दल मत झाले होते.

यानंतर वरचेवर स्वामीजी आणि महाराज यांच्या भेटी होत राहिल्या. अनेकवेळा स्वामीजी भोजनासाठी जात. काहीवेळा काही निमंत्रित व्यक्तीही पंगतीला असत. एकदा खास भोजन आयोजित केले असताना महाराजांनी ठाकूर फत्तेसिंह राठोड, अलिगड जवळच्या जलेश्वरचे ठाकूर मुकुंदसिंग चौहान, जामनगरचे मानसिंह यांनाही बोलावले होते. या खास व्यक्तींमध्ये राजस्थान मधले समाजसुधारक हरविलास सारडा ज्यांनी तिथल्या बालविवाह प्रतिबंधित कायदा प्रयत्न करून संमत करून घेतला होता त्या काळात पुढे हा कायदा त्यांच्याच नावाने ओळखला जाऊ लागला असे लोक यावेळी उपस्थित होते.

हरविलास अजमेरचे आर्य समाजाचे अध्यक्ष पण होते. त्यांच्या याआधी स्वामीजीबरोबर अजमेर, अबू, इथेही भेटी झाल्या झाल्या होत्या. वेदान्त, स्त्रियांच्या सुधारणा, संगीत, मातृभूमीचं प्रेम आणि स्वतंत्र बाणा अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या होत्या. स्वामीजींचा त्यांच्यावरही खूप मोठा प्रभाव पडला होता.

राजे अजितसिंग यांच्याबरोबर तर त्यांचे नातेच जुळले होते. ते वयाने समवयस्कही होते. त्यामुळे घोड्यावरून रपेट मारणे, खेळ खेळणे, अशा काही गोष्टी ते एकत्र करत आणि आस्वाद घेत. स्वामीजी गाणं म्हणायला लागले की राजे स्वत: हार्मोनियमची त्यांना साथ करायला बसत. अशा प्रकारे संगीत ते तत्वज्ञानपर्यंतच्या त्यांच्या सर्व आवडीनिवडी जुळल्या होत्या. जसा राजस्थानच्या गौरवशाली इतिहासा बद्दल स्वामीजींना आदर होता तसा स्वामीजींच्या आध्यात्मिक अधिकाराचा आजीतसिंगांना आदर होता. या सहवासातून राजे अजितसिंग, जगमोहन, आणि काही जणांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली. अजितसिंग खेत्रीचे सत्ताधीश होते तरी पण, शिष्य म्हणून गुरुचं स्थान त्यांच्या दृष्टीने उच्चच होते. गुरुविषयी नितांत आदर आणि भक्ति होती. एव्हढी की, गुरुची सेवा आपल्या हातून घडावी असं त्यांना मनापासून वाटायचं.

स्वामीजी तेंव्हा राजवाडयातच राहत होते. ते झोपले असताना अजितसिंग हळूच येऊन पंख्याने वारा घालायचे, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे, त्यांचे पाय दाबून द्यायचे. एकदा तर स्वामीजींना जाग आली आणि त्यांनी पाय दाबताना थांबवले तर, “माझा शिष्य म्हणून सेवा करण्याचा हक्क हिरावून घेऊ नका” असं काकुळतीला येऊन अजीतसिंगांनी त्यांना सांगितलं. भर दिवसा लोक आजूबाजूला असताना अजितसिंग स्वामीजींना गुढगे टेकवून प्रणाम करीत. इतकी नम्रता ते या पदावर असताना सुद्धा होती. पण स्वामीजींनी त्यांना या पासून परावृत्त केले कारण, नाहीतर त्यांचा प्रजेमधला जो आदरभाव होता त्याला धक्का पोहोचू शकत होता याचं भान स्वामीजींना होतं.

खेतडीला स्वामीजी दोन ते तीन महीने राहिले. गहन आणि तात्विक प्रशनाची उत्तरे स्वामीजींनी तर त्यांना दिली होतीच. पण आधुनिक विज्ञानातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यातील महत्वाच्या सिद्धांताचा परिचय पण त्यांना करून दिला होता स्वामीजींनी. स्वामीजींच्या सूचनेवरून राजवाड्यात एक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. गच्चीवर एक दुर्बिण बसविण्यात आली. स्वामीजी व अजितसिंग दोघेही गच्चीतून त्याद्वारे आकाशातील तार्‍यांचे निरीक्षण करत असत. स्वामीजींचा संस्थानच्या बाहेरील सुद्धा लोकांशी संबंध येत असे. सर्वांना ते भेटत असत.

या वास्तव्यात स्वामीजींना खूप काही शिकायला मिळाले होते. एकदा राजवाड्यात नर्तकीचे गायन आयोजित केले होते. तंबोर्‍याच्या तारा जुळल्या, गाणे सुरू होणार तसे अजितसिंग यांनी स्वामीजींना ऐकायला बोलवले. तेंव्हा स्वामीजींनी त्यांना उत्तर पाठवले, आपण संन्यासी आहोत, कार्यक्रमास येऊ शकत नाही. हे त्या गायिकेच्या मनाला लागलं. तिने षड्ज लावला, आणि संत सूरदासांचे भजन म्हणण्यास सुरुवात केली. ध्रुवपद होतं,

हमारे प्रभू अवगुण चित न धरो,

समदर्शी प्रभू नाम तिहारो,

अब मोही पार करो!      

अर्थ – हे प्रभो माझे अवगुण मनात ठेऊ नका, आपल्याला समदर्शी म्हणजे सार्‍या भूतमात्राकडे समान दृष्टीने पहाणारे असे म्हणतात, तेंव्हा आपण माझा उद्धार करा .

रात्रीच्या शांत वेळी हे आर्त आणि मधुर सूर स्वामीजींपर्यंत पोहोचले. गीतातला पुढच्या ओळींचा अर्थ होता,

‘लोखंडाचा एक तुकडा मंदिरामध्ये मूर्तीत असतो, तर दूसरा एक कसायाच्या हातात सूरीच्या रूपात असतो, पण परिसाचा स्पर्श होताच,त्या दोहोंचे सुवर्ण होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात. आपण माझा उद्धार करा’.

एका ठिकाणचे पाणी नदीच्या प्रवाहात असते, तर दुसर्‍या ठिकाणी ते कडेच्या गटारातून वाहत असते.  पण दोन्ही पाणी एकदा गंगेला जाऊन मिळाले की, सारखेच पवित्र होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात, कृपा असेल तर माझा उद्धार करा’.

हे शब्द स्वामीजींच्या अंत:करणाला जाऊन भिडले. नंतर स्वामीजींनी त्या गायिकेची क्षमा मागितली. आपण बोलतो आणि वागतो त्यात विसंगती असते. या दोन्हीत एकरूपता साधायला हवी हा धडा स्वामीजींनी कायम लक्षात ठेवला. त्यांचा दृष्टीकोन बदलला.

जीवनातल्या यात्रेतल्या प्रत्येक वळणावर स्वामीजी स्वत: सतत शिकत राहिले होते आणि दुसर्‍यालाही काहींना काही देत होते. अशा प्रकारे स्वामीजींनी आता सहा महिन्यांनी खेत्रीचा जड अंतकरणाने निरोप घेतला.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

आज आपल्या पैकी खूप जणांना नीरजा भनोत कोण हेही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय वीरांगना होती, जिने १९८६ साली  तिच्या स्वतःच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची “अशोक चक्र” हे  वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयीप्रमाणे या विरांगनेला  विसरून गेले. 

नीरजा भनोत ही हरीश भनोत, या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि ‘PAN AM 73‘ या एयरलाइन्स कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 

५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तानमधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या PAN AM 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान इस्राइलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकावयाचे होते. 

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून अमेरिकन प्रवाशांना निवडून, मारायची धमकी देवून, ते पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. 

नीरजाने पासपोर्ट गोळा केले, पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले. 

नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरवले आणि त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रके प्रवाशांपर्यंत पोहोचविली. तिने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे  सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. 

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार, इतक्यात तिला एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलाला  शोधून विमानाच्या बाहेर पडत होती, तेवढ्यात तो चौथा अतिरेकी तिच्यासमोर आला. तिने त्या मुलाला आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाशांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. 

नीरजाने वाचविलेला तो लहान मुलगा मोठा झाल्यावर वैमानिक झाला. स्वतःच्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “ माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.” 

भारताने नीरजाला “ अशोक चक्र “ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने  तिला “ तमगा-ए-इन्सानियत “ हा सर्वोच्च पुरस्कार दिला. 

अमेरिकेने “ जस्टिस फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड “ हा वीरता पुरस्कार देवून तिला सन्मानित केले.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींच विसर्जन झालं घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या  विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का हे गौरीगणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेयं. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मनं तसचं घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेल असतं. घर कसं भरल्याभरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो.नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमीटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो.

जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्ती साठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून येऊन,तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची खात्री पटली की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणे गौरी ह्या सुद्धा  माहेरची आठवण सतत मनात पिंगा घालणारच किंवा मधून मधून माहेराची ओढ वाटणारच त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी त्या औटघटकाच येणार,पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आनंदचा शिडकावा करुन जाणार,प्रेमाची मायेची पखरण करुन जाणार.त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री विश्वास पण तेवढाच असतो.जरी बाप्पा चे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरडकानवला देतो.मुरडकानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरडकानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी,जुन्या प्रथा ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही झालाच तर फायदाच होतो त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा, अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते,त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या ह्या हक्काच्या विनंतीने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print