मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

?  मनमंजुषेतून ? 

☆ 🥀 जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता  माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं,  तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस. 

नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!

तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही  मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना. 

लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली. 

अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.

पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार  असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?

माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?

पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना,  मी काय म्हणू?

सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “

मी : पाणावल्या डोळ्यांनी निशब्द…

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? मनमंजुषेतून ?

☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

समाजात सध्या अतिशय चर्चेत असलेला विषय म्हणजे अयोध्यामधील राममुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.या सोहळ्यानिमित्त अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भागात मंदिराची तात्पुरत्या स्वरुपाची प्रतिक्रुती बनवून कोट्यावधी रुपये खर्च केले.पण याचवेळी एका लहान गावात मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी स्वखर्चाने इमारत बांधून गावच्या सरपंचाने  हिंदू मुस्लिम ऐक्य साधून समाजापुढे आदर्श ठेवला.

ही घटना आहे,कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गलगली या लहान गावातील.गलगली या गावी माझ्या बहिणीच्या मुलीचे,तनुजाचे सासर आहे.तनुजाचे पती श्री. राहुलकुमार गुजर म्हणजेच आमच्या घरचे जावयी.स्वतःची शेती,आँटोमोबाईलचे दुकान आणि गावचे सरपंचपद सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत रहाण्याची त्यांची मनोवृत्ती.गावातील कौटुंबिक कलह मिटवणे, लग्न जमवणे,शिक्षणासाठी गरजू मुलांना मदत करणे,गावात काही सुधारणा करणे अशी कामे ते नेहमीच करत असतात.

कोरोना काळात 2020 मध्ये अचानक लाँकडाऊन झाले त्याआधी दोन दिवस काही घरगुती कामानिमित्त राहुल आपल्या आईसमवेत दौंड,जि. पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेले होते,दोन दिवसांनी अचानक लाँकडाऊन चालू झाले आणि ते तिथेच अडकून राहिले.परतीचा मार्गच बंद झाला.त्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. एक महिन्याने बऱ्याच प्रयत्नातून गावी यायला परवानगी मिळाली पण गावात आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाईन म्हणून गलगली येथील एका उर्दू शाळेत रहावे लागले.या सात दिवसाच्या वास्तव्यात शाळेची दुरावस्था राहुल यांच्या लक्षात आली.त्यातच याकाळात त्यांना मुस्लीम समाजाकडून अतिशय मोलाचे सहकार्य ही मिळाले.यातूनच या शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार राहुल यांच्या मनी आला.पुढे कोरोना संपल्यानंतर या शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने करण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा करुन त्यांनी हा विषय मांडला आणि कामाला सुरवात करण्यास सांगितले. आर्थिक बाजू मी सांभाळेन असे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे या शाळेचे बांधकाम चालू झाले. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच राहुलना अपघात होऊन तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.त्यामुळे कामात थोडा खंड पडला. शारीरिक द्रुष्ट्या व्यवस्थित झाल्यावर काम परत जोमाने सुरु झाले आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण झाले. शाळेच्या या सुंदर वास्तुचा लोकार्पण सोहळा 26  जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा केला गेला. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय क्रुतज्ञतेने राहुलकुमार यांचा गौरव केलाच शिवाय त्यांच्या आईंचाही सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.

विशेष म्हणजे चांगले काम करीत असताना कुणीही मोडत घालू नये आणि ते व्यवस्थित पार पडावे म्हणूनच की काय या समाजोपयोगी कामाची वाच्यता काम पुर्ण होईपर्यंत राहुलकुमारनी कुठेही केली नाही,अगदी आपल्या आई व पत्नीलाही याबद्दल सांगितले नव्हते.10 वर्षांपूर्वी राहुल यांच्या पिताजींचे निधन झाले,त्यांची स्मृती म्हणून शिक्षकांनी त्यांचे नाव शाळेला दिले.कोरोना काळात हरवलेल्या माणुसकीचे दर्शन हिंदू- मुस्लिम एकतेतून घडले.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ -सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

व्हाट्सअँप हा प्रकार जितका उपयुक्त आहे तितकाच कंटाळवाणा सुद्धा आहे.

व्हाट्सअँपमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात.पण तितकच काही चुकीचे ज्ञान पण खात्रीपूर्वक खरे असल्यासारखे

बोकाळते, पसरते.लोक शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करतात.आणि करणारी लोक आपल्या  विश्वासाची असल्यामुळे त्या गोष्टींवर  विश्वास ठेवायचा की नाही ह्याबद्दल मन सांशक होते.

ग्रुपवर एखाद्याचा वाढदिवस असला की पूर्ण दिवस सदिच्छांचा भडीमार,केक्स फुलांचे गुच्छ वगैरे चे फोटो अगदी रात्री १२ वाजल्यापासून पाठवायची चढाओढ.सगळ्यांनी पाठवले आणि आपले पाठवायचे राहून गेले तर!

बरं वाढदिवसाचे एकवेळ ठीक त्या व्यक्ती पर्यंत पोहोचून तिला त्यामुळे आनंद मिळेल पण कोणाचे निधन झाले की श्रद्धांजली,rip ची लाईनच लागते.आता सांगा श्रद्धांजली त्या व्यक्तीला समजणार का?आपले समाधान.एरवी ती व्यक्ती जिवंत असताना तिला भेटले असते तर  तिच्या बरोबर दोन घटका वेळ घालवला  असता तर तिला किती समाधान मिळाले असते?जर ती व्यक्ती आजारी असताना तिची विचारपूस केली असती शक्य झाल्यास सेवा केली असती तर खरं.गेल्यावर श्रद्धांजलीचा देखावा कशाला आणि कोणासाठी?

तसेच सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग,रात्री गुड नाईट ती फुले,निसर्ग त्यांचे फोटो कशाला ?जसं काही गुड मॉर्निंग गुड नाईट विश नाही केले तर त्याची सकाळ, रात्र चांगली जाणार नाही.पण ह्या सदिच्छामुळे मोबाईल जाम होतो.पुढील जरुरीचे मेसेज,फोटो यायला रोड जाम होतो.मग सगळे डिलिट करा.

देवाधिकांचे फोटो,त्याचा तर भडीमार.परत डिलिट करायला जिवावर येत.पण नाईलाज 

काही लोकं ह्या जपाची साखळी करा.१०लोकांना पाठवा वगैरे पाठवतात  त्याच्यात पण काही अर्थ नसतो.पण समोरच्याला धर्मसंकट.पुढे साखळी चालू नाही ठेवली तरी पंचाईत पाठवयाचे तर मनाला पटत नाही.

गुड मॉर्निंग,गुड नाईट ह्या मेसेजचा उपयोग एकटी व्यक्ती राहात असेल तर तिची खुशाली रोजच्यारोज इतर नातेवाईकांना समजायला उपयोग होतो.ज्या दिवशी गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणजे त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे हे समजून त्याच्या मदतीला जाऊ शकतो.हा व्हाट्सअँपचा मोठा उपयोग आहे.

एखाद्या ठिकाणी लग्न ,मुंजी सारखा प्रसंग आहे एखादी व्यक्ती हजर राहू शकत नाही तर जगभरातून विडिओ कॉल करुन पाहू शकते .जणू काही ती व्यक्ती तिकडे हजर आहे आणि कार्याचा लाभ घेऊ शकते.मुलगा मुलगी जगभर कुठेही असली तरी आई वडिलांना विडिओ कॉल करुन भेटू शकतात.

वर्क फ्रॉम होम करुन करोनाच्या काळात,भरपूर पाऊस असताना घरबसल्या माणसे कामे करू शकली.मुले शाळेत न जाता घरच्या अभ्यास करू शकली.

व्हाट्सअँपचा एक मोठा फायदा ज्या व्यक्तीला ऐकू कमी येते कानाचा प्रॉब्लेम असतो ती व्यक्ती

व्हाट्सअँप वर वाचून,लिहून आपला वेळ आनंदात घालवू शकते बाहेरच्या नातेवाईकांशी मनमोकळे पणांनी टाईप करुन.संपर्कात राहू शकते.

एखाद्या फक्शनचे आमंत्रण एकाच वेळी सगळ्यांना देऊ शकतो.कार्ड काढा त्यावर पत्ते लिहा कॉरिअरने पाठवा तो खर्च,वेळ वाचतो.अपव्यय होत नाही.

शेवटी काय प्रत्येक नाण्याला दोन बाजू  फायदा,त्याच्या बरोबर तोटा हा असणारच.कसा आणि किती त्या व्हाट्सअपचा उपयोग करुन घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.

© सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆ 

मोबाईल शाप की वरदान हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. अतिरेक झाला तर तो शाप ठरतो .पण सदूपयोग केला तर ते वरदानच असतं. नाशिकचे माजी सैनिक श्री. मेघश्याम सोनवणे सर, ह्यांच्या उत्तम उपक्रमाच्या कथा -विश्वात माझं पाऊल पडलं आणि व्हाट्सअपतर्फे अनेक हितचिंतकांच्या  ओळखी झाल्या. माणसे जोडण्याच्या छंदाला बळकटी आली. आणि माझ्यासाठी मोबाईल वरदानच ठरलं. माझ्या धाकट्या मुलानी  चि.प्रसादनी   मला  वाढदिवसाचा मोबाईल भेट दिला आणि माझ्यापुढे एक नवीन विश्व उभ केलं. ह्या विश्वात खूप चांगली माणसं मला भेटली.आणि मैत्रीचं नातं घट्ट झालं .

त्यातूनच भेट झाली रमेश साळुंखेची. माझ्या कथांवर त्याचं अभिप्रायाचं,प्रतिक्रियांचं आदान-प्रदान झालं. आणि एक दिवस त्याचा फोन आला ” ताई मला तुमच्याशी मोकळेपणी बोलावसं वाटतंय .तुम्ही बोलाल का माझ्याशी?” शब्दातला प्रामाणिकपणा, वाक्यातलं   आर्जव  आणि आवाजातलं मार्दव मनाला भिडल.कां कोण जाणे मनांत आलं काहीतरी संघर्षमय आहे, ह्या वयानी लहान असलेल्या  मुलांत . अशा ह्या आशावादी विचारांनी सम्राट असलेल्या तरुणाची आत्मकथा नक्कीच आदर्शवादी असेल असं मला वाटलं मी म्हणाले “रमेश अगदी खुल्या दिल्याने बोल.काही प्रॉब्लेम आहे का तुला?त्या स्वाभिमानी तरुणाचं रमेशचं  लगेच उत्तर आलं, ” नाही ताई प्रॉब्लेम होता. पण परमेश्वर, माझी आई सुभद्राई, माझे बाबा शिवाजीराव, माझे बंधू विक्रम आणि हितचिंतक यांच्यामुळे मी संघर्षाच्या परीक्षेत पास झालो.”  

त्याच्या बोलण्याने माझी उत्कंठा  शिगेला पोहोचली. आणि मी विचारलं, “आयुष्याच्या कुठल्या परीक्षेत  तु पास झालास? सविस्तर आणि खुल्या दिल्याने सांगशील का मला तु तुझी कहाणी ?   तुझा आदर्श मी नक्कीच जगापुढे मांडीन. मग निराश  तरुणांनाही  आशेचा किरण सापडेल. आणि तुझ्यामुळे त्यांना स्फूर्ती  मिळेल “…..  रमेशच्या आवाजात मोकळेपणा आला. त्याची कहाणी ऐकून मी  स्तंभित  झाले. परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य ह्या इतक्या लहान वयातल्या मुलामध्ये आलं कुठून ? त्यानीच सांगितलेली त्याची ही कहाणी काळजाला हात घालणारी आहे.

ता. खटाव जि.सातारा गिरीजाशंकरवाडी येथे रमेशचं बालपण गेलं. बालपण कसलं !  हसा खेळायच्या दिवसातच त्याला लढाई द्यावी लागली . कारण तो म्हणाला,” मी अपंग आहे “ 

खटाव तालुक्यातील पश्चिमेकडच शेवटच्या डोंगर माथ्यावर वसलेलं गांव म्हणजे रमेशचं जन्मगांव. चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं.  वडील शिवाजीराव त्याचे  सारथी झाले. दैवाला दोष न देता रमेशच्या आई-वडिलांनी हे अवघड शिवधनुष्य पेललं.   शिवाजीरावांनी आणि त्या माऊलीने परिस्थितीवर मात करून आपल्या बाळाला वाढवलं. वडील रोज खांद्यावर बसवून आपल्या लेकराला शाळेत पोहोचवायचे. परिस्थितीशी सामना करण्याचं आयुष्याच्या शाळेतलं असे हे प्राथमिक शिक्षण घरातूनच रमेशला मिळालं होत. त्याच्या ह्या घरच्या  गुरूंना सादर प्रणाम.

रमेश पुढे म्हणाला,” मी चौथी पास झालो  खरा.,पण आता पुढे काय? पुढचं शिक्षण कसं घ्यायचं? हायस्कूल सहा कि. मी. लांब. रोज डोंगरावरून उतरून खाली  यायचं. पुन्हा डोंगर चढून घरचा परतीच्या प्रवास . पण तो करणार कसा? अक्राळ विक्राळ प्रश्नचिन्ह आ वासून समोर उभं होतं. शिक्षणाला पूर्णविराम द्यायची वेळ आली .. “ पण हा वाघाचा बच्चा लहान असूनही डगमगला नाही. मनात एकच विचार  शिक्षणाशिवाय आपल्याला गती नाही. आता थांबणे नाही. रमेशला त्रास होऊ नये म्हणून घरचे  कासाविस होऊन  त्याला विरोध करीत होते. पण म्हणतात ना, ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो ‘ अगदी खरं आहे हे. कारण गावात सकाळी सातला दुधाची गाडी यायची . गाडीतली माणसं देवासारखी  मदतीला धावली. आणि त्यांच्या मदतीने रमेशचा हायस्कूल  प्रवास सुरू झाला.  रमेशच्या विस्तृत विचारांची कक्षा पाहून मी डोळे  विस्फारले.   

तो म्हणाला ” मला अपंगावर  मात करून पुढे जायचं होतं. त्यासाठी मनातल्या आशेची पावलं पुढे आणि पुढेच पडत होती. आई-वडिलांनी व इतरांनी पण खूप केलं माझ्यासाठी.  त्यांना त्रास न देता मला स्वावलंबनाचा मार्ग शोधायचा होता.  प्रयत्नांच्या अंतापर्यंतचा  आणि मनाच्या गाभाऱ्यात वसलेला परमेश्वर,मला प्रेरणा देत होता. आणि म्हणत होता ‘मी आहे  ना तुझ्या पाठीशी ! मी चालवीन तुला, आणि तुझ्या जिद्दीला, पुढे अन पुढे जाण्यासाठी.” आणि ह्या जिद्दीने दहावी ते  B. A. मुक्तविद्यापीठातून रमेश पास झाला. आणि मग  काय त्याच्या आशेला धुमारेच फुटले की हो !

भूतकाळात  डोकावतांना रमेश सांगू लागला, ” हायस्कूलच्या गावी जाताना दूध गाडीच्या लोकांचे माझ्यावर खूप खूप उपकार झाले आहेत. सकाळी सात वाजता दूध गाडी यायची. ते लोक मला गाडीत बसवायचे.  हायस्कूलची वेळ तर ११ ते ५:३० होती. पण  बरं का,राधिका ताई   माझी शाळा  मात्र सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत असायची. कारण सकाळी माझ्या गावाकडून मला आणणारी गाडी सातला सुटायची .आणि रात्री साडेनऊला परतायची. शाळा सुटल्यावर संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ पर्यंत मी गाडीची प्रतीक्षा कऱीत बसून राहायचो. वाचन, होमवर्क, नोट्स काढणे यात वेळ  काढायचो. बसचा आवाज आला रे आला की आवराआवरीची धांदल उडायची माझी.” रमेश ची मिस्कील वृत्ती मला आवडली.

सत्कर्म करणाऱ्याला सत्पुरुष भेटतातच. माणसं मदतीला धावायची आणि बसमध्ये बसवायची. फार मोठ्ठ शिवधनुष्य पेललंय त्यानी. आणि तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणाची मशाल त्याच्या मनात धगधगत होतीच. पण आता तर पुढे आणखी खरी सत्वपरीक्षा होती. पुढची पायरी गाठण्यासाठी  25 की. मी.कराड गावी जाणं भाग होतं. हा तर मोठा संघर्ष ! पण डोंगराएवढे आव्हान त्याला तिळाएवढं वाटलं. ‘कुणालाही त्रास न देता आयुष्य जगायचय मला.  आनंदाने आहे त्या परिस्थितीत आनंद मानूनच जगायचं’  हे सूत्र, आणि ही उमेदच त्याचं अंतिम ध्येय होतं.आणि आजही आहे .आणि ते त्यानी जिद्दीने चिकाटीने गाठलं. 

आज रमेश साळुंखे, महाराष्ट्रात एकमेव असलेल्या अशा शास्त्रीय महाविद्यालयात कराड कॉलेजमध्ये नोकरीला आहे. गेली आठ वर्षे प्रामाणिकपणे तो आपली ड्युटी बजावतोय. .   कुठल्याही परिस्थितीत समाधान मानण्याचे बाळकडू आई-वडिलांनी त्याला लहानपणीच पाजलय. आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं कसब रमेशच्याही अंगात आहे. ह्याचे सगळे श्रेय, वडील शिवाजीराव आणि आई सुभद्रा यांनाच तो देतो. सुभद्रा नाव ऐकल्यावर, मला  महाभारतातील अर्जुन पत्नी व श्रीकृष्ण भगिनी,सुभद्रा आठवली. तिचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहविद्या आईच्या गर्भातच शिकला. तसंच ह्या सुभद्रापुत्राने संघर्षातून उत्कर्ष गाठण्याची कला आईकडून, जन्माआधीच शिकून घेतली असावी नाही का? 

भावनाप्रधान रमेश म्हणतो, ” मला अभिमान नक्कीच आहे की, असे आई-वडील मला लाभले.. माझे ध्येय गाठण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने आपले पाय आणि मदतीचे हात मला पुरवलेत. रमेश गर्वाने सांगतोय, “आज मी घडलो आहे ते माझ्या घरच्यांमुळेच माझे वडील श्री शिवाजीराव  माझी आई सौ.सुभद्रा आणि भाऊ विक्रम यांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला वाढवलं. पुढील शिक्षणाचा त्यांचा नकार मायेपोटी  होता. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांची तडफड,आणि माझ्यामुळे त्यांना म्हातारपणी त्रास होऊ नये म्हणून माझी धडपड.. या मायेतूनच मला प्रेरणा मिळाली. आणि आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यांच्यापुढे मी कायम नतमस्तक आहे, आयुष्याच्या या लढाईत अनेक हितचिंतक मला मिळाले. त्यांचे आभार . जीवाला जीव देणारे  परममित्र श्री.गोरख रा, थोरवे, श्री सचिन भि.शेडगे ,आणि सागर भि शेडगे यांच्यासारखे अजूनही साथ देणारे जिवलग मित्र मला लाभले, या सगळ्यांच्या मी कायम ऋणात आहे.”

रमेश मनापासून बोलत होता.

तर मंडळी अशी आहे ही खंबीर  रमेश साळुंखे याची कथा. तुमच्या दृष्टीनेही ती स्फूर्तीदायक ठरेल.अशी आशा आहे.  सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की, रमेशने यशाची परिसीमा आणि सुखाचा कळस गाठलाय . कारण त्याच्या आयुष्यात एका सौ.तेजस्वी नावाच्या गुणी मुलीने प्रवेश केला आहे.अर्थात                16 – 2 -2023  या शुभ दिनी त्याचे शुभमंगल झाले आहे .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

Scam *401

२ दिवसांपूर्वी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मला एक काॅल आला. त्याने म्हटले की तो Blue Dart कंपनीतून बोलतोय, माझं एक कुरीयर आले आहे, deliver boy ला माझा address सापडत नाहीये आणि माझा फोनही लागत नाहीये. तर मी तुम्हाला delivery boy चा नंबर sms करतो, तुम्ही त्याला फोन करुन guide करा.

त्याने दिलेला नंबर होता *401 आणि मग(दहा आकडी नेहमीप्रमाणे मोबाईल नंबर, मी विचारले हे 401 काय आहे तर म्हणाला तो त्या delivery boy चा specific extension नंबर आहे, पुढचा नंबर कंपनीचा आहे. 

मला आलेली शंका माझ्या दुर्दैवाने मी बाजूला सारली आणि त्या नंबर वर काॅल केला, तर मला माझा नंबर divert केला जात आहे अशी टेप ऐकू आली आणि त्यानंतर एका तासातच माझे WhatsApp account, hack करण्यात आले. माझ्या नावाने माझ्या WhatsApp account वरुन अनेक लोकांना पैशाची मागणी करणारे मेसेज गेले, मला साधारण ४५ मिनिटांनी हा प्रकार कळला, तेवढ्या वेळात माझा फोन hacker च्या नंबरवर फिरवण्यात आल्या मुळे मला कुणाचेही काॅल येऊ शकले नाही. 

झाल्या प्रकरणामुळे प्रचंड मनस्ताप झाला , मला माझा नंबर तात्पुरता deactivate करावा लागला त्यानंतर पोलिस कंप्लेंट, नवीन SIM card अशी बरीच उस्तवार करावी लागली.

नशीब कोणी मी समजून hackers ला पैसे नाही पाठवले. 

हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धडा होता आणि मला लागलेली ठेच अजून कोणाला लागू नये यासाठी हा पोस्ट प्रपंच.

मी यानंतर *401 या कोडबद्दल गुगल गुरुंकडून माहिती घेतली असता कळलं कि या कोड मुळे मी स्वतःच्या फोन ला hackers च्या नंबरवर divert करण्याची order दिली आणि मग त्याने फोन काॅल वरुन WhatsApp code घेउन माझं WhatsApp स्वतःच्या फोनवर घेतलं. आणि पुढचं रामायण धडलं.

मी याआधी Facebook वर बर्याच posts पाहिल्या होत्या ज्यात त्यांनी लिहिले होतं कि त्याचं account हॅक झालं आहे पण कसं झालं ते कोणीही लिहिले नव्हतं, जर या कोड बद्दल आधी माहिती असती तर बरं झालं असतं अर्थात हे उशीरा सुचलेले शहाणपण होतं तर कृपा करुन ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि असल्या प्रकारांना बळी पडू नका. 

लेखिका : शर्वरी अभ्यंकर

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील  प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.) — इथून पुढे 

कालपेनी बेटावर परतल्यावर, जेवण व विश्रांती झाल्यावर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काच्या मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडूका होता. झांजेच्या तालावर ‘भारत मेरा देश है’ म्हणत नाच करीत होते. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता.

नंतर तिथल्या होजिअरी फॅक्टरीला भेट दिली. तिथे बनविलेले टी-शर्ट, शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू, डेसिकेटेड कोकोनट यांची खरेदी झाली.

आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र सगळं राखाडी काळसर झालं होतं. शुक्राची चांदणी चमचमत होती. थंडगार, शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटंत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.

कोचीपासून चारशे किलोमीटर दूर असलेले कवरत्ती हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे. आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’. इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स ,लहान- मोठे, काळे- पांढरे, निळे- पिवळे मासे, शंख शिंपले, सी ककुंबर, कासव अशी विधात्याने निर्मिलेली आगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझियम बघायला गेलो. समुद्रजीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. ॲक्वेरियममध्ये शार्कमाशासह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते. इथे लक्षद्वीप डायव्हिंग ॲकॅडमी आहे.

केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरूमल याच्या कारकीर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात येथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होतं. १७९९ च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली. 

लक्षद्वीपवरील रहिवाशांचं  आयुष्य तसं खडतरंच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो, आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळ एवढंच उत्पादन आहे. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात. बोटींवरील सुसज्ज हॉस्पिटल्समध्ये स्थानिकांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचिनला नेण्यात येतं. इथला ८०% पुरुषवर्ग देशी- परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे व अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत. स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाच्या खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.

बोटीवरील स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसेच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेली पर्स,पाकिटे,  मोबाईल यांना कसलाही धोका नाही. सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.

या बेटांवर पक्षी किंवा प्राणी फारसे आढळले नाहीत. समुद्र पक्षांच्या एक दोन जाती आहेत .या बेटांपैकी बंगाराम, अगत्ती, तिनकारा अशी बेटं परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. इथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या निळ्या- निळ्या स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी, कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.

कोरल्स म्हणजे छोटे छोटे आकारविहीन समुद्रजीव असतात. समुद्राच्या उथळ समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनच असं जीवन त्यांच्यातील कॅल्शियम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रिफ्स तयार होतात .ही वाढ फारच मंद असते. या रिफ्समुळे किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक्ट  व अंटार्टिक्ट यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटांवर डोंगर, पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीप समूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा, एक मनुष्यवस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.

प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखं लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टीदेवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेले गडद निळे वस्त्र परिधान केलं होतं. पांढऱ्याशुभ्र वाळूतील छोटे शंख, कोळी, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या छोट्या पायांनी सुबक रेखीव रांगोळी काढत होते. उसळणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या लांब निऱ्या करून त्याला पांढऱ्या फेसाची झालर त्या समुदवसने देवीने लावली होती. छोट्या छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांच्या फुलदाण्या सजल्या होत्या. अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादि अनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.

– समाप्त – 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

अथांग अरबी महासागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डोलत आमचं स्वागत करीत होती. आता आमच्या मोठ्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. त्या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडांना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता. (लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोहोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच.)

लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला ३६ बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळ मधील कोची (कोचीन/ एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा मोकळा वारा भरून घेत मिनीकॉय बेटावर  उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट लक्षद्वीप समूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून जावं लागतं. तिथून अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या

सुनील नभ हे सुंदर नभ हे

नभ हे अतल अहा

सुनील सागर सुंदर सागर 

सागर अतलची हा

या कवितेची आठवण झाली. तिथून रिसॉर्टला पोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबऱ्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालित होता. सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट चढवून पाण्यात डुंबण्यासाठी सज्ज झालो. समुद्रातील पोहणं, डुंबणं, कयाकिंग,स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट\ चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्स  आपल्याला टोचतात. तिथे अनेक प्रशिक्षित ट्रेनर आमच्या मदतीसाठी सज्ज होते.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन् फतकल मारून बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. समुद्रात आजूबाजूला हात घातला की नानाविध कोरल्स हातात येत. काहींचा आकार झाडांचा तर काहींचा आकार फुलांचा, पानांचा पक्षांचा. कुणाला गणपतीसुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती  समुद्राला परत केली. कुठल्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून  आणणं हा दंडनीय अपराध आहे.

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.  आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात  उतरले होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, सोनेरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम  क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगद शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. त्या शिंपल्यात स्वतःला अलगद मिटवून घ्यावं असं वाटणारा, देहभान विसरणारा तो स्वर्गीय सुंदर अनुभव होता. 

जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. अकरा हजार लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी- छोटी अकरा गावं आहेत. मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतही आहे .प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा आहे. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे. चहा, सामोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या. दर डिसेंबरमध्ये तिथे ‘नॅशनल मिनीकॉय फेस्ट’ साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हवत असतात. 

इथे ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम असली तरी या बेटावर महल (Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचिनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटर्सच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतलो. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबलखुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्यावेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहिलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्ट्ससाठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचे बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकून राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनीसांकडून कळलं की तो पांढराशुभ्र, मऊ,  मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे. त्याचंच एक बेट तयार झालं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही. गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील  प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली 

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ।। 

— संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

*

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

*

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

*

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

*

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

*

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

*

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

*

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे 

आज सकाळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी ऐकू येत होती . शाळेंच्या बक्षीस वितरणांचा कार्यक्रम , विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम , झेंडा वंदनाचा कार्यक्रम व नेत्यांची भाषणे ऐकू येत होती . त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाची जोरदार सुरुवात दरवर्षीप्रमाणे सुरु आहे हे कळत होते .

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो होतो . सकाळची थंडी इतकी प्रचंड होती की दोनतीन कपडे, जॅकेट , कानटोपी , पायात वॉकींग शूज , अशा कडक बंदोबस्तात मी निसर्गात फिरत होतो . येताना गरमागरम जिलेबी आणायची म्हणजे 26 जानेवारी साजरी केल्यासारखे वाटते हा गोंडस विचारही मनात घोळत होता .

परत येताना नदीच्या किनारी जाऊन नंतर पुढे निवांत जावू असा विचार करून मी थोडी नेहमीची वाट बदलली . नदी किनारी आलो तर दोन निळ्या रंगाचे प्लास्टीक टाकून लाकडांचा आधार देऊन दोन तात्पुरत्या झोपड्या दिसल्या . पाच सहा उघडीनागडी चार पाच वर्षाची मुले एका चादरीवर लोळत पडलेली होती तर त्यातला एक सहा सात वर्षाचा मुलगा चाकूला धार करत होता .

मग त्याला हिंदीतून विचारले क्या करता है ? तर म्हणाला अभी रानडुक्कर मारनेको जाना है। इस लिए चाकू को धार करता हु. 

इतक्यात दाढीवाला , मोठे केस सोडलेला बरेच दिवस अंघोळ न केलेला त्याचा बाप आला व निवांत बसला . क्या काम करते हो ? तर म्हणाला रानडुक्करे मारायची व खेडेगावात विकायची आमचा धंदा आहे . मग थोड्या गप्पा मारल्या त्यातून समजले अशा थंडगार हवामानात , झोंबणाऱ्या थंडीत नदीकिनारी एक दोन दिवस मुक्काम करायचा . रानडुक्कर मारायचे . दिवसभर त्यासाठी जवळपास रानोमाळ भटकंती करायची . रानडुक्कर मिळाले तर विकायचे  नाहीतर निवांत पडी मारायची .

उघड्यावरच अंघोळी, उघड्यावर दगडाच्या चुलीवर स्वयंपाक, जंगलातील ओली सुकी झाडे शोधून बांधलेल्या उघड्या झोपड्या. त्याला कसलेही संरक्षण नाही. आयुष्याला कसलेही भविष्य नाही, पोरानां शाळा दफ्तरे नाहीत. कसली स्वप्ने, कसले अच्छे दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? हे माहीत नाही.

त्याला सहज विचारले तुझे नाव काय ? तर म्हणाला रामजी . त्यांच्या मुलांची नावे तर खूप भारीभारीच होती . आता देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली . आपल्या देशाने तर खुप प्रगती केली .पाचशे वर्षानंतर रामाला घर मिळाले . अयोध्येत राममंदीर 

बांधण्यासाठी किती हजार कोटी गेले व अजून जाणार आहेत याची गणतीच नाही . आजच कळाले तीन कोटी रुपये तर एका दिवसात भक्तांकडून दानपेटीत जमा झाले .

हातातली जिलेबीची बॅग रामजीच्या मुलानां दिली .त्यानां प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावत बसलो नाही . कारण जिलेबी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा वाटला .

या रामजीसारख्यांचा वनवास कधी संपणार ? त्यांच्या मुलानां शाळा दफ्तरे कधी मिळणार ? त्यांनां राहायला घरेदारे , पोटासाठी कामधंदा कधी मिळणार ? त्यांच्या बायकांनां  ओल्या लाकडांची चुल जावून गॅसवर स्वयंपाक बनवायला कधी मिळणार ? त्यानां अच्छेदिन कधी येणार ?

पच्च्यांहत्तर वर्षात आपण किती प्रगती केली या विचारात ,देशभक्तीची गाणी मोठ्याने ऐकत मी परत निघालो . प्रजासत्ताक दिनाचा अर्धा दिवस आता संपला . . .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print