मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.

पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे.  त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही.  काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे  असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात.  एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे.  ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल.  कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात.  शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान,  महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे.  ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे  ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.

दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील  ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत.  दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी.  “आदर्श विद्यार्थी  ,आदर्श शाळा  ,आदर्श समाज  हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी  आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.

सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

रजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘ भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत  ’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘ तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस ’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! ‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’ हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो ! 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. तिच्या मनात तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पूजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्याइतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘ थकवा वाटतोय ’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरात धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ‘ ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले. ‘ आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली ’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरात विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. ‘ तुझी  उपयोगिता संपायला आलीय ‘ याची जाणीव लोक आडून पाडून  तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासूसाठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘ देवा, उचल मला ’ म्हणून प्रार्थना करायची. ‘ भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला ’ म्हणत मनातल्या मनात त्याला दुषणे देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते….!

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता ! ‘ तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं….

मित्रांनो !

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा. हे असे प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी गृहीत धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर जर घडत असतील, तर हे फारच भयानक व हृदयद्रावक चित्र आहे.

  * “ जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ” *— 

लेखक : अज्ञात . 

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

एक काळ असा होता की, धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत – रस्त्यात, शेतात, नदीच्या काठावर, नाही तर हिरव्यागार कुरणातून चालण्या-भटकण्याचा – मनसोक्त आनंद लुटत होतो.

ते दिवस तर आता संपले. आता तोच आनंद लुटत असतो, उघड्या पडवीत आरामखुर्चीत निवांत बसून – धो धो पाऊस, थोडीशी थंडी, भीमाण्णांचे मल्हाराचे सूर, कांद्याची भजी, आल्याचा चहा – या सगळ्यांचे कथ्थक नर्तन अवलोकून!

या पावसाच्या चालू हंगामामध्ये – पाऊस भजी चहा – असे अपूर्व त्रिवेणी योग तीन-चार वेळा जुळून आले आणि मानस तृप्त जहाले !!

आजही पाऊस पडतोच आहे. पण संतत धार नव्हे. एकदाच पडला. अगदी धो धो नसला, तरी बऱ्यापैकी सरी कोसळल्या. पण आज मला फक्त पाऊसच हवा आहे. बाकी काहीच नकोय्.  दर क्षणांला स्वत:ला आकाशातून झोकून देत पृथ्वीकडे झेपावणारे पाण्याचे लाखो थेंब – शुद्ध, सात्विक आणि पवित्र – मी नजरेने पीत आहे – किती तरी वेळ! आता मला त्यासोबत इतर कुठले अर्कही नकोयत आणि दर्पही नकोयत.

कारण आजचा पाऊस, हा अष्टमीचा पाऊस. अष्टमीचा पाऊस म्हणजे कृष्णाचा पाऊस! त्याच्या जन्मकाळी  पडला तोच हा पाऊस. वसुदेवाचा पाऊस, देवकीचा पाऊस, यशोदेचा  पाऊस – आणि माझा पाऊस !!

हा पाऊस माझ्यासाठी घडवून आणील दुर्मिळ दर्शन श्रीमुखाचे, अलभ्य श्रवण वेणूनादाचे, अलौकिक स्पर्श चरणकमळांचे आणि उन्मनी गंधवेड ‘ अवचिता परिमळूचे ‘ !!

जसे इच्छिले तसेच घडले

मनिचे हेतू पूर्ण जाहले

 

थेंबाथेंबातून जाहले

दर्शन श्रीहरिचे

धारांच्या नादातुन आले

गुंजन मुरलीचे

 

मोरपीस लेवून मस्तकी

प्रभुजी अवतरले

अष्टमीच्या धारांतून दैवी

इंद्रधनू प्रकटले

लेखक : सुहास सोहोनी. 

दि. ७-९-२०२३ – कृष्ण जन्माष्टमी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणपत्ती बाप्पा मोरया …… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

गणपत्ती बाप्पा मोरया… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. “हाय! हॅलो!!” वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स’ चं आयोजन होतंच.

सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती… आणि गाणं सुरु झालं!

“गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया… मंगलमूर्ती…” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?” लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!” तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.

“मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे ‘गजानना गणराया’ गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! ‘आपल्याला काय करायचंय?’ म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा ‘उत्सव’ आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला ‘Showpiece’ करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!” म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!

मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?” तसं मी हसत म्हटलं, “साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!”

कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया …… 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्री आणि सौ गावडे हे दाम्पत्य राहात होते. दोघेही हाडाचे शिक्षक. श्रीगोंदा तालुक्यातील विविध खेडयांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थी घडवण्यात दोघांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडविण्यातच त्या दोघांनाही अपार आनंद मिळायचा. 

ते १९७० चे दशक. ‘वंशाला दिवा हवाच’ असा जनू अलिखित नियमच त्या काळी खेड्यांमध्ये होता. श्री. व सौ. गावडे यांना मात्र एका पाठोपाठ एक मुली होत गेल्या. त्यात एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या या दांपत्याच्या घरातील बहुतेक थोरले लोक अशिक्षित होते. ते मुलासाठी आग्रही होते. त्यामुळे कुटुंबनियोजन शक्य नव्हते. एका पाठोपाठ एक चार मुली झाल्या. त्या काळी मुंबईत नव्याने सोनोग्राफी मशीन आल्या होत्या. कायद्या अभावी गर्भलिंगनिदान आणि स्रीभ्रुण हत्या सर्रास चालू झाली होती. मुंबईला राहणाऱ्या एका नातेवाईकाने सगळी ‘व्यवस्था’ करण्याची तयारी दोघांना दाखवली. दोघे नोकरीला असल्याने पैशांचाही प्रश्न नव्हता. पण गावडे दांपत्याने गर्भलिंग निदान आणि स्री भ्रुण हत्येला स्पष्ट नकार दिला. “अजून कितीही मुली झाल्या तरी चालतील. पण आम्ही गर्भातील मुलगी मारणार नाही.” असा ठाम निर्णय दोघांनी त्याला कळवला. त्यांना पुढे अजून दोन मुली झाल्या. अनेक नवस, उपवास, जपजाप्य, इत्यादी चालूच होते. शेवटी सहा मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. त्याचा जन्म नेमका गोकुळ अष्टमीला झाला. म्हणून दोघांनी मोठ्या आनंदाने आपल्या या शेंडेफळाचं नांव ‘गोपालकृष्ण’ असं ठेवलं. 

शिक्षक आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलाला अभ्यासांत रूची घेण्यावाचून पर्याय नसतोच. शिक्षक आई वडिलांच्या संस्कारामुळे गोपालकृष्णला अभ्यासातच रूची निर्माण झाली. पुढे बारावी बोर्डाच्या वेळी त्याने इतका कसून अभ्यास केला की त्याला पुण्याच्या प्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये ओपन गटामध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला. पंचक्रोशीमधून एम् बी बी एस् च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो पहिलाच विद्यार्थी होता.

एम्‌बीबीएस्‌ चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर पुढे गोपालने पोस्ट ग्रॕज्युएशनसाठी स्रिरोग आणि प्रसुतीशास्र हा विषय निवडला. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्याचे हे शिक्षण चालू झाले. डॉ संजीव डांगरे गोपालचे पी जी गाईड आणि हेड आॕफ डिपार्टमेंट होते. त्यांची मुलगी, जान्हवी त्याच अभ्यासक्रमासाठी गोपालची ज्युनिअर म्हणून नंतर तेथे रूजू झाली. जान्हवीचे आई-बाबा दोघे मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधून पास झालेले एम् डी गायनिक. जान्हवीचे बाबा तर एकदम कडक शिस्तीचे होते. सिस्टरची आॕपरेशन दरम्यान काही चुक झाली आणि ते ओरडले तर सिस्टरांच्या हातातील आॕपरेशनची हत्यारे गळून पडत. पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे डिपार्टमेंट अतिशय चांगले चालले होते. जान्हवीच्या आई-वडिलांचे सिंहगड रोडवर स्वत:चे मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल होते. तरी केवळ सेवाभावाने डॉ डांगरे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट हेडची कायदेशीर जबाबदारी घेवून सेवा देत होते. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये स्रिरोग आणि प्रसुतीशास्र विभागात प्रचंड काम होते. गोपाल आणि जान्हवीला हॉस्पिटलमध्ये सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत एकत्र काम करावे लागे. त्यात जान्हवी खुपच सुस्वभावी होती. हळूहळू दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडू लागले. दोघांमधील जवळीक वाढू लागली. जान्हवीला विचारावे की विचारू नये या द्विधेत गोपालचे सहा महिने गेले. जान्हवीने तिने नकार दिला असता आणि शांत राहिली असती तर गोपालला फार नुकसान झाले नसते. पण तिने नकार देवून ही गोष्ट तिच्या बाबांना सांगितली असती तर मात्र गोपालची काही खैर नव्हती. शेवटी हिंमत करून गोपालने घाबरत घाबरत जान्हवीला विचारलेच. जान्हवीने त्याला चक्क “हो” म्हटले. गोपालला आभाळ ठेंगणे झाले. पण जान्हवीची एक अट होती. “माझ्या आई वडिलांना आम्ही दोघी मुलीच आहोत. मला त्यांची शेवटपर्यंत काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मी पुणे सोडणार नाही.” गोपालला कुठे तरी सेटल व्हायचेच होते. पुणे उत्तमच होते. त्यामुळे शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरातील थोरांच्या संमतीने लग्न पार पडले.

पुढील शिक्षण घेताना दोघांनाही डॉ लाला तेलंगासारख्या हाडाच्या शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. गोपालसाठी डॉ लाला तेलंग शिक्षक तर होतेच, पण त्यापेक्षा जास्त ते त्याचे श्रद्धास्थान होते. डॉ लाला तेलंगाचा गोपालवर खास जीव होता. डॉ लाला तेलंगांनी गोपाल नावाच्या दगडाला ख-या अर्थाने घडवले. डॉ लाला तेलंगांमधील हाडाचा शिक्षक, गोपालची त्या शिक्षकावरील निस्सीम श्रद्धा, दोघांच्या एकमेकांबद्दलचा स्नेह या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. त्यामुळे डॉ लाला तेलंगांनी दोन वर्षात सांगितलेला एक एक शब्द गोपालच्या मेंदूत अक्षरशः कोरला गेला. डॉ लाला तेलंगांनी गोपाळच्या मेंदूवर “Prevention is better than cure” या नियमाचे संस्कार वारंवार केले. 

यथावकाश गोपाळचे हे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण झाले. त्याने सिंहगड रोड वर ” गुरूदत्त वेल वुमन क्लिनिक” नावाने ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ  चेकअप सेंटर’ चालू केले. वेगवेगळ्या कँसरच्या तसेच इतर ‘सायलेंट किलर’ आजाराच्या तपासण्या करण्यासाठी वेगवेगळ्या मशिन त्याने विकत घेतल्या. अतिशय कमी दरामध्ये सर्व ‘रिकमेंडेड टेस्ट’ एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात हा  त्याचा प्रयत्न होता. पण या सर्व प्रकाराला लोकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. त्याने पदर पैसे खर्च करून वेगवेगळ्या माध्यमामधून लोकांशी संवाद सुरू केला. त्याला अनेक विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. 

“ मी फिट आहे. मला तपासण्यांची काय गरज?”

“ मला कसलाही त्रास नाही. मग उगाच तपासणी कशाला?”

“ आजार झाल्यावर पाहू की ! आत्ता उगाच खर्च कशाला?”

“ काही निघाले मग? उगाच गोळ्या औषधांचा मारा चालू होईल !”

“ उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? “

“ आजकालचे डॉक्टर कॅन्सरसारख्या आजारांची भीती घालून लोकांना उगाच तपासण्या करायला लावतात.”

अगदी गोपालच्या स्वतःच्या घरातील लोकही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप करून घ्यायला तयार होत नव्हते. या सर्व प्रकारांनी तो थोडा निराश झाला…….

होय, ही माझीच सत्यकथा आहे.

डॉ लाला तेलंग यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकताना “डॉक्टरने ‘रिॲक्टिव्ह’ नव्हे, तर ‘प्रोॲक्टिव्ह’ राहायलाच हवे” हे बाळकडू सरांकडूनच मिळाले होते. पण प्रत्यक्षात आपला समाज मात्र  आरोग्याच्या बाबत कमालीचा उदासीन अन्‌ ‘रिॲक्टिव्ह’ आहे. कुठलेही दुखणे भरपूर काळ अंगावर काढल्यानंतर अगदी असह्य झाले आणि इतर काहीच उपाय चालेनासा झाला की त्यानंतर नाईलाजास्तव लोक डॉक्टरकडे जातात. अशा वातावरणात काही त्रास होत नसताना डॉक्टरांना भेटने आणि तपासण्या करून घेणे लोकांच्या पचनी पडले नाही. या परिस्थितीत डॉक्टरने तरी ‘प्रो-ॲक्टिव्ह’ असावे. तेच समाजाला प्रेव्हेंटिव्ह हेल्थ बाबत ज्ञान देवून शहाणे करू शकतात. याच प्रेरणेने मी स्वत:चे पहिले ‘वेल वूमन क्लिनिक’ सुरू केले होते. पण घरातूनही टेस्टसाठी विरोध होत होता. ‘ मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे ’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.

रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.

सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.

या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.

कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल  हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?

२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,

ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

या मुळे पुढील फायदे होतात.

१ पिंपल्स कमी होणे

२ पित्ताचा त्रास कमी होणे

३ मधुमेह खूप कमी होणे

४ पोट साफ होणे

५ दम लागणे बंद होते

६ पंडुरोग नष्ट होणे

७ कृमी नष्ट होणे

८ शरीर शुद्धी होणे

पूर्वी असे आजार दिसत नव्हते.

याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.

गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.

यातील पटेल ते अंगीकारावे ही विनंती आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

५ सप्टेंबर हा जे .पी. नाईक यांचा जन्मदिवस असतो. पण राधाकृष्णन यांचे स्मरण होताना जे पी नाईक यांची कोणीसुद्धा आठवण काढत नाही. युनेस्को’ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते.

युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, ‘कोठारी आयोगा’सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची ‘अंगणवाडी योजना’ ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.

भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.

असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? 

किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. 

आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये..

लेखक : हेरंब कुलकर्णी 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.

याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,

त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल, 

नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल… 

हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.

मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय, 

आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!   

मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस! 

म्हणून तो तरणा पाऊस! 

आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस! 

किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

मघा नक्षत्रातला पाऊस असा कोसळत असतो की तरण्या विवाहितेला घराबाहेर पडताच येत नाही, तिला शेतांत धन्याच्या मागे जाता येत नाही की गावात कुठे जाता येत नाही. अशा सुनेला मग तो पाऊस सासूसारखा वाटू लागतो, चोवीस तास नजर ठेवणारा!

पूर्वा नक्षत्रातला पाऊस हा एका वेळेनुसार कोसळतो आणि ओसरतो देखील, त्याचं कोसळणं म्हणजे चपळ पर्जन्योत्सव होय. त्याची लगबग नि त्याचं कमी वेळेत भरपूर कोसळणं हे एखाद्या कामसू सुनेसारखं आहे, म्हणून तो सुनेचा पाऊस होय.

अर्थात ही केवळ नक्षत्रे लक्षात राहण्यासाठीची नावे होत, कारण हरेक स्त्रीला आधी सून व्हावं लागतं नि मग सासू बनावं लागतं, जे कुणालाच चुकलं नाही. त्यामुळे ही नावे कुणाएकीला दुखावण्यासाठी ठेवलेली नव्हती हे नक्की!

आता सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे. त्यानंतर पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती अशी नक्षत्रांची रांग असेल.

या प्रत्येक नक्षत्रासाठी गावगाड्यात स्वतंत्र म्हणी आहेत ज्यांना मातीचा अमीट दरवळ आहे..  

‘पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.’ (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे)

‘पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा’ (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील),

‘पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा’ (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),

आश्लेषा नक्षत्रासाठीची म्हण – ‘मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा.’

म्हणजे काय ? तर आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत !

‘पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख’ ( असं का म्हटलंय – पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं ) (REPOST)

‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ आणि

‘पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती!’

या म्हणींना मातीचा गोडवा आहे आणि यात अस्सल बोली भाषेतलं जिवंत सत्व आहे!

गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो. 

शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लहेजा ढंगदार आणि न्यारा आहे. 

गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही…   

लेखक – अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज माझ्या स्वप्नात आलं आमचं घर, आमचं अंगण ! दारासमोर दिसला पारिजातकाचा सडा ! शुभ्र पांढऱ्या रंगाची ,केशरी देठाने सजलेली, नाजूक इवली इवली फुले सगळीकडे चांदण्यासारखी पसरली होती. नारळाच्या झाडाच्या साथीला होते प्राजक्ताचे झाड ! एरवी तसं रिकामंच दिसणारं ! पण पावसाची चाहूल लागली की बहरून येणारं ! डावीकडे होती इतर छान फुलांची झाडे ! एक मोठा कुंदाच्या झाडाचा पसारा बाजूला होता. काही वर्षे इतकी सुंदर कुंदाची पांढरी आणि मागून थोडीशी जांभळी झाक असलेली कुंदाची फुले येत होती .संध्याकाळी त्याच्या कळ्या टपोऱ्या फुगलेल्या दिसत. पण काही वेळा झाडाला दृष्ट लागते ना तसं झालं ! एवढं फुलणारं झाड..   त्याला फुलेच येईनाशी झाली ! राहिला तो मोठा झाडाचा पसारा !

बाजूलाच होता जुईचा वेल ! छोटी छोटी सुवासिक फुले ! वरच्या माडीपर्यंत वाढत गेलेला तो वेल पावसाचे दोन-चार महिने डोळ्याला आनंदित, सुगंधित करून जायचा ! त्याची इवली इवली फुले वेलीवरून घरंगळत खाली यायची आणि ती पहाताना मन मोहरून जायचे ! एक वर्ष तर अधिकाच्या महिन्यात रोज जुईचा गजरा देण्याचा नेम केला होता. सवाष्ण अगदी सुहास्य वदनाने ते वाण घेत असे. मोगऱ्याची दोन-चार झाडे उन्हाळ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी वातावरण आनंदित, प्रफुल्लित करून जायची ! देशी गुलाबाचं एक झाड असेच एखाद्या वर्षी बहरून जायचे ! जवळपास एखादा निशिगंधही असे. त्याचा एखादा तुरा मोरासारखा डोलत असे ! ब्रह्म कमळाचे खोड वर्षभर दिसे न दिसे, पण या पावसाच्या काळात ब्रह्मकमळाची पाच दहा फुले तरी मनाला आनंद देत असत ! तुळशी वृंदावनातील तुळस मनाला प्रसन्न करत असे. अधून मधून छोटी बटन शेवंती रुजवलेली असे तर दसऱ्याच्या दरम्यान मिळावीत म्हणून झेंडू वाढवलेला असे ! गौरीच्या दिवसात तेरडयाची पाने मिळावी म्हणून एखादं गौरीचे रोपही बागेत असे. जांभळी, गुलाबी गौरीची फुलं काही दिवसच  येत, पण बागेची शोभा वाढवत ! छोटीशी जागा पण किती तऱ्हेतऱ्हेची फुले देत असे !

मागच्या अंगणात माझ्या दिरांनी सुंदर गुलाबाची कलमे वाढवलेली होती. तसेच पेरू, चिकू, पपई यांचे एकेक झाडे होते. विशेष म्हणजे आमच्या प्लॉटवर एक आंब्याचे, एक फणसाचे, एक जांभळाचे आणि तीन नारळाची अशी मोठी झाडेही  होती. घराभोवतीचा सर्व परिसर हिरवा गार केलेला होता. छान वाटायचे झाडांच्या आणि घराच्या सावलीत !

या घराच्या सावलीत तीस-पस्तीस वर्षे राहिलो. हळूहळू मुले बाहेर पडली आणि आम्हीही बाहेर पडलो. मुलांकडे आलो. पण जेव्हा जेव्हा घराची आठवण येते तेव्हा हेच स्मरणातील घर डोळ्यापुढे येते आणि तेथील स्वप्न फुले स्वप्नासारखी  मनामध्ये उमलू लागतात !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार आपल्या सवयी बनत जातात. गाण्याची म्हणजे गाणे ऐकण्याची आवड असली की आपोआप गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळं रात्री झोपताना एक मस्त गाणं ऐकून झोपल. की झोपेचं समाधान मिळतं. सहसा ह्या गाण्यांमध्ये जुन्या आणि आमच्या काळातील गाण्यांचा समावेश असतो. अगदीं कधी मधी हल्लीच लोकप्रीय गाणं ऐकण्याचा योग आणते.

“चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हमदोनो” ह्या गाण्याची व्हिडीओ क्लीप काल बघण्यात आली. सुनील दत्त चा अभिनय आणि मालासिन्हा चे दिसणे मस्तच पण खरंतर हे गाणे लक्षात राहतं त्या गाण्याच्या बोलांनी,चालीनी,आणि त्याच्यातील खूप अर्थपूर्ण शब्दांनी.खरचं किती अफलातून कल्पना नं. आपल्या परिचीत व्यक्तीला अनोळखी समजून त्याची परत नव्याने ओळख करून घेणे.खूपदा या परत ओळखण्याने आपल्याला पहिल्यांदा न दिसलेले गुण दिसतील.कदाचित परत एकदा स्वभावाची नीट ओळख पटेल.परत एकदा एकमेकांना नव्याने ओळखू लागू.जुने काही मनात उगीचच किल्मिष असतील तर आपल्या चुकीची,गैरसमजाची जाणीव होऊन परत एकदा मने साफ होतील.

काहीवेळा अतिपरिचयाने आपण दुस-याच्या मनाचा विचार न करता एकमेकांना ग्रुहीत धरायला लागतो.ह्या परत एकदा एकमेकांना जाणून घ्यायच्या कल्पनेतून कदाचित स्वतः च्या आधी दुस-याचा विचार करायला शिकू.

          “कितीदा नव्याने तुला ओळखावे,

              स्नेहाच्या धाग्यात गुंतत जावे,

              मौनातील इशारे उमजून घ्यावे,

                        शब्दही त्यासमोर फिके पडावे ।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print