मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ न धरी शस्त्र करी मी… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…! 

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. 

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकॄष्ण।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती. 

इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली. 

” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”

” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.” 

मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…  

“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली. 

“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न. 

“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.

प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं. 

पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.

होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते. 

“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक…  सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.

विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता. 

“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”

मार्थाची ही सत्य कथा इथे संपली. 

… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.

अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे. 

…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे

(शिक्षक दिनानिमित्त)

तिच्याबरोबर काही वेळेला मॉलमध्ये जाणे घडते. ती शिक्षकी पेशातली. बऱ्याचदा अचानक ३० ते ४५ या वयोगटातले तरुण जवळून जातांना थबकतात आणि म्हणतात,  “आपण मोघे मॅडम ना ! मॅडम ओळखलत? मी १९९३ बॅचचा… मी १९९६ बॅचचा…. ” आणि काही बोलायच्या आत ते वाकून नमस्कार करतात. “ मॅडम अजूनही तुम्ही शिकवलेला धडा आठवतो.” कुणाला शिकवलेली कविता आठवते, कुणाला केलेली आर्थिक मदत आठवते, तर कुणाला दिलेला आत्मविश्वास… तो दिवस हिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, धन्यतेचा दिवस असतो. तिच्या शिक्षकी पेशापुढे मला माझे अधिकारीपण थिटे वाटायला लागते. जगातल्या कुठल्याच क्षेत्रात, शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे असा सन्मान आणि धन्यता  लाभत नाही.  ते पवित्र नाते पाहून परमेश्वराने पुढच्या जन्मी शिक्षक करावे, असे का कुणास ठावूक त्याक्षणी वाटू लागते.

हे असे बऱ्याच ठिकाणी घडते. प्रसंग मॉलमधला सांगण्याचे कारण एव्हढेच, की या नात्याच्या भेटीसोहळ्यात वेशभूषाही आडवी येत नाही, एव्हढे हे नाते पक्के असते. ही तिथे साडीमध्येच असते असेही नाही आणि तोही विद्यार्थ्यांच्या पेहरावात असतोच, असे नाही. पण या नात्यात आदरयुक्त भावनेचे प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यांच्या मेंदूत कायमचे झालेले असते आणि ‘लाईफटाईम ॲन्टी व्हायरस कीट’ या नात्यात “इनबिल्ट” असते.अगदी आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यातही दुराव्याचा,गैरसमजाचा व्हायरस आल्याचे काही ठिकाणी दिसते.पण या नात्यात ते अपवादाने नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्या प्रेमयुक्त आदराची आहे, याबाबत मन, बुद्धी आणि देहाचे कधी नव्हे ते क्षणात ऐक्य होते आणि नमस्काराची कृती होते. आपल्या शिक्षकांबाबतही आपले असेच होत असते.

परवाच माझे एक स्नेही, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. मित्रगोत्रीसर घरी मुक्कामाला होते. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते ठाण्यात येणार हे कळताच ,परिसरातल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे फोन सुरु. स्टेशनवर स्वागत, घरी घेऊन जाणे, पुन्हा स्टेशनवर पोहचविणे, प्रेमाचा आग्रह, भेट होताच सर्वांचा वाकून नमस्कार, या सर्व गोष्टी पाहून शिक्षकी पेशातल्या व्यक्ती खरेच नशिबवान असे वाटले,.त्यांचा हेवाही वाटला.

या मंडळींना स्वत: ऐश्वर्यवान होण्यापेक्षा विद्यार्थी ऐश्वर्यवान झालेले पाहणे आवडते. पंखात बळ देऊन, भरारी घेण्याचा आत्मविश्वास देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा, पुन्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना घडवत राहायचे. हे ज्ञानदानाचे,विद्यार्थी घडविण्याचे अग्निहोत्र प्रज्वलित ठेवण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या सर्वच शिक्षकांना वंदन.

आजचा दिवस शिक्षणपद्धती, शिक्षक यांच्या दोषांविषयी बोलण्याचा नक्कीच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या समस्या, गरजांमध्ये झालेले बदल, तात्विक अधिष्ठानात झालेले बदल हे तुमच्या आमच्यात, डॉक्टर, वकील इत्यादी सर्वच पेशात झालेले आहेतच. तेव्हा यात ‘सर्व बदलले ते ठीक, पण शिक्षकांनी तरी बदलायला नको, त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यागी, तत्वनिष्ठ रहावे,’ असे म्हणून त्यांच्यावरच नैतिकतेचा, तत्वनिष्ठतेचा बोजा टाकणे, योग्य वाटत नाही. तीही माणसेच आहेत. आपण बदललो, तीही बदलली आहेत.

अजूनही चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. चांगले शिक्षक, प्राध्यापक आहेत. जे चांगले आहेत, तेच पुढे आठवणीत राहतील…मनाशी मनाचे नाते  जुळलेले राहील आणि खूप वर्षांनी जरी अशा शिक्षकांना विद्यार्थी भेटले, तरी ते तेव्हाही निश्चितच त्यांना वाकून नमस्कार करतील. 

सर्व आदरणीय शिक्षकांविषयी अशाच भावना आहेत:

 कधी तर नाहीच,

कधीतरी क्वचित

होते त्यांची भेट

जावून बसले

असतात मात्र

 आपल्या काळजात थेट !

सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा आणि वंदन…

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आभाळाचा वाढदिवस…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आभाळाचा वाढदिवस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आभाळाचा वाढदिवस.. हो हो तुमच्या आमच्या माणसां सारखाच आभाळाचा वाढदिवस…कितवा वाढदिवस? म्हणून किती कुत्सितपणे शंका काढताय ना… तुमचं सगळयांचं असचं ठरलेलं असतं.. वाढदिवसाला मोजमाप लावयाचं.. त्याची जन्मतारीख कोणती? ते कोणतं वर्ष होतं.. मग आता किती पूर्ण झाली? ( अजुन उरली किती?) किती गणिती प्रश्न उभे कराल… एखाद्याला जन्मतारीख ठाऊकच नसेल… नसेल त्यावेळी तशी नोंद करून ठेवायची पध्दत तर त्याने त्याचा कधी नि कसा साजरा करावा वाढदिवस?.. तुम्हीच सांगा! त्याला वाटत नसेल आपलाही वाढदिवस साजरा करावा म्हणून.. आणि अश्या कितीतरी गोष्टींच्या सहवासात आपण आलेलो असतो… मग घरच्या नित्योपयोगी वस्तू असतील.. संस्था, आस्थापना, प्राणी, वाहन, सारं सारं काही… आपल्या संपर्कात आल्यापासून त्याची कालगणना आपण सुरू करतो… कदाचित त्याची एक्सपायरी डेट सुध्दा आपल्या ठाऊक असते… त्याची वारंटी गारंटी चा कालावधी लक्षात ठेवतो आणि मग अभिमानाने दर वर्षी त्याचा वाढदिवस साजरा  केलाच तर, करण्यात आनंद मानतो… पण चंद्र सूर्य तारे, ग्रहगोल, हवा,पाणी, नद्या, तळी, समुद्र, आकाश ,डोंगर निसर्ग याचं काय.. ते करत असतील का स्व:तापूरता वाढदिवस साजरा.? .. आपल्या नकळत..निसर्गाची पूजा दरवर्षी या ना त्या नावाने  आपण करत असतो तोच दिवस त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायला काय हरकत आहे…वसुंधरादिन …काही वेळा वर्षातून दोन तीनदा देखील आपण त्याचे पूजन करतो तेव्हा तेव्हा देखील वाढदिवस करायला काय हरकत आहे… आपण नाही का तारखेने, तिथीने तर वाराने वगैरे वगैरे वाढदिवस एकाहून अधिक वेळा साजरा करतो मग यांचा केला म्हणून बिघडले कुठे. त्या सगळयांनी सतत निरपेक्ष आपल्या सेवेला हजर असावे आणि बदल्यात आपण त्यांना काय देणारं… साधं गिफ्ट पण आपण कधीच देत नाही पण तरीही ते रिटर्न गिफ्ट मात्र भरभरून देत असतात… आपला तो हक्कच आहे असे समजून ते घेत असतो…निळे पांढरे, जांभळे, नारिंगी, सोनेरी, लाल, रूपेरी… रंगांचे आकाश छतासारखे डोक्यावर पसरलेले…हसत प्रसन्न पणे पाहत असते… मग त्याला आनंद होईल, उत्साह दुणावेल, प्रसन्नता वाटेल अशी एक तरी गोष्ट त्याला द्यायला… निदान हवेने भरलेले फुगे अंतराळात सोडून दिले तरी  त्या आकाशाचा बालका सारखा आनंद गगनात मावेनासा झालेला आपल्याला नाही का कळणार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

(काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.)       

सवैय्या

आता सवैय्या म्हणजे काय हे बघू या मंडळी! सवैया एक छन्द (वृत्त) आहे. चार ओळी (प्रत्येक ओळीत २२-२६ शब्द) अशा या छंदांना समूह रूपात हिंदीत ‘सवैया’ असे परंपरेने म्हणतात. रसखान यांचे सवैये फार प्रसिद्ध आहेत. निम्नलिखित कविता ‘मानुष हौं तो वही रसखानि’ ही त्यांच्या कृष्णभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. यात विविध प्रकारे कवी असे सांगतो की मला कृष्णाशिवाय काही नको. त्यांच्या साऱ्या कवितांचा आत्मा कृष्णलीला हाच आहे. कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा अलौकिक शब्दांत कवीने आपली कृष्णभक्ती प्रकट केली आहे. आता रसखान यांच्या या प्रसिद्ध कवितेचा आस्वाद घेऊ या. यांतील कांही मोजक्याच सवैयांचा अर्थ समजून घेऊ, कारण कविता रसपूर्ण तर आहे पण बरीच मोठी आहे. हे रसग्रहण करतांना कवीची कृष्णभक्ती जशीच्या तशी प्रस्तुत करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.

“मानुष हौं तो वही रसखानि”

मानुष हौं तो वही रसखानि, बसौं मिलि गोकुल गाँव के ग्वारन।

जो पसु हौं तो कहा बस मेरो, चरौं नित नंद की धेनु मँझारन॥

पाहन हौं तो वही गिरि को, जो धर्यो कर छत्र पुरंदर धारन।

जो खग हौं तो बसेरो करौं मिलि कालिंदीकूल कदम्ब की डारन॥

रसखान ब्रजभूमीशी इतके समरस झालेत की तेथील कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी त्यांना नाते जोडायचे आहे. कवी वरील सवैयात आपल्या इच्छा व्यक्त करीत म्हणतात, ‘देवा, माणसाच्या जन्माला घालायचे तर गोकुळातल्या एखाद्या गुराख्याच्या किंवा गवळ्याच्या जन्माला घाल, पशूच्या जन्माला घालायचे तर गोकुळातील नंदाच्या घरच्या गाई किंवा पाड्याच्या जन्माला घाल, रोज कान्हा वनात घेऊन जाईल याची ग्यारंटी! अन हो, दगडच व्हायचे तर जो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ना तिथेच पडून राहू दे मला. त्या पवित्र पर्वताचे छत्र करंगळीवर धारण करून कधी काळी इंद्रदेवाच्या कोपापासून गोकुळातल्या लोकांचे प्राण वाचवले होते त्या गिरीधराने! अरे पक्ष्याच्या जन्माला घातलेस तरी हरकत नाही, मात्र अशी सोय कर बाबा की, मी ब्रजभूमीवर जन्म घेईन अन कालिंदीच्या तटावरील एखाद्या कदंबाच्या फांदीवर आपले घरटे बांधीन. अरे कधी काळी याच कदंबाच्या फांद्यांचे हिंदोळे घेत असतील राधा अन गोपाळकृष्ण!  नाही तर याच कदंब वृक्षावर बसून तो कृष्ण मुरली वाजवून गोपींना रिझवीत असेल! असे माझे नशीब असेल का की, जिथे जिथे कृष्णाचा आणि गोपगोपींचा वास होता तिथंच मी पण जन्म घेईन?’  

या लकुटी अरु कामरिया पर, राज तिहूँ पुर को तजि डारौं।

आठहुँ सिद्धि, नवों निधि को सुख, नंद की धेनु चराय बिसारौं॥

ए रसखानि जबै इन नैनन ते ब्रज के बन बाग तड़ाग निहारौ।

कोटिक हू कलधौत के धाम, करील के कुंजन ऊपर वारौं॥

वरील सवैयात कवी रसखान यांना श्रीकृष्णाच्या बालपणीच्या वस्तूंचा भारीच मोह पडलाय असे दिसते. त्यांच्यासाठी ते कशा कशाचा त्याग करायला तयार आहेत हे बघा! ते म्हणतात, ‘या गवळ्याची काठी आणि कांबळे मला अतिप्रिय, त्यांच्यावरून त्रिलोकाचे राज्य जरी मिळाले तरी मी ओवाळून टाकीन! नंदाच्या गाई चरावयास घेऊन जायचे सुख मिळणार असेल तर आठ सिद्धी (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व) तसेच नऊ निधी (पद्म निधि, महापद्म निधि, नील निधि, मुकुंद निधि, नंद निधि, मकर निधि, कच्छप निधि, शंख निधि आणि खर्व) यांच्या सुखाचा मी त्याग करू शकतो. मी स्वतःच्या नेत्रांनी ब्रजभूमीतील वने, उपवने, उद्यान आणि तडाग हे सर्व जीवनभर बघत राहून ते नेत्रात साठवीन. ब्रजभूमीतील काटेदार वृक्षवेलींकरता कोटी कोटी सुवर्ण महाल अर्पण करावयास मी आनंदाने तयार होईन.’

सेस गनेस महेस दिनेस, सुरेसहु जाहि निरंतर गावै।

जाहि अनादि अनंत अखण्ड, अछेद अभेद सुबेद बतावैं॥

नारद से सुक व्यास रहैं पचि हारे तऊ पुनि पार न पावैं।

ताहि अहीर की छोहरियाँ, छछिया भरि छाछ पै नाच नचावैं॥

कवी वरील ओळींमध्ये म्हणतात, ‘शेष (नाग), गणेश,  महेश (शिव), दिनेश (सूर्य) आणि सुरेश (इंद्र) हे देव त्याचे (कृष्णाचे) निरंतर ध्यान करतात, त्याचे आकलन करू न शकलेले वेद त्याचे गुणगान असे गातात ‘तो अनादी, अनंत, अखंड, अछेद (छिद्र नसलेला) आणि अभेद्य, आहे.’ नारद मुनी, शुक मुनी, वेदव्यास सारखे गाढे ज्ञानी ऋषी मुनी ज्याच्या नावाचा सतत जप करतात, तरीही त्याचा भेद जाणू शकत नाहीत, असा परात्पर परब्रह्म असलेल्या या गोकुळातील बाळकृष्णाला या गवळणी (अहीर की छोरियाँ) ताकाचे भांडे (छछिया-ताक ठेवण्याचे मातीचे लहान भांडे) दाखवत नाचायला लावतात, कधी पैंजण घालायला लावतात तर कधी घागरा चोळी!’ जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण! त्याच्या लीला अपरंपार! आणि या जगदीश्वराला आपल्या मनाला वाटेल तसे नाचवणाऱ्या या गवळणींचे भाग्य किती थोर बरे! त्याचे बालरूप इतके मनमोहक आणि सुजाण असूनही अजाण गोपींसाठी हा अशा लीला करतो.

(असे म्हणतात की स्त्रीरूप घेऊन भगवान विष्णूंशी एकरूप होण्यासाठी देव आणि ऋषी मुनी यांनी गोपिकांचे रूप घेतले. पण गोपिका झाल्यावर ते आपले मूळ रूप विसरले आणि भोळ्या भाबड्या गोपिकांच्या रूपात त्यांना कृष्णाचा असा सहवास लाभला! खरे काय अन खोटे काय त्या पूर्णब्रह्म कृष्णालाच माहित, एक मात्र सत्य, जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण गोपींसाठी नृत्य करायला सदैव तयार असायचा, फक्त लोण्याचा गोळा अन वाडगाभर ताक द्यायला लागायचं!)

धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।

खेलत खात फिरैं अँगना, पग पैंजनी बाजति, पीरी कछोटी॥

वा छबि को रसखान बिलोकत, वारत काम कला निधि कोटी।

काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥

वरील सवैयात एक गोपी आपल्या सखीजवळ कृष्णाच्या सुंदर रूपाचे वर्णन करीत म्हणते, “सखे, अगं, धुळीत खेळून खेळून कृष्णाचं सगळं अंग धुळीने माखलय, कित्ती शोभून दिसतोय नाही हा असा! आणि त्याचे कुरळे केस बघ कसे सुंदर बांधले आहेत,, एक चोटी (चुट्टी) शिरावर शोभून दिसतेय (द्वारकेत गेल्यानंतर सोन्याचा मुकुट आला तरी ही बालपणीची शेंडी काहीं न्यारीच!) अंगणात खेळता खेळता खाणे अन खाता खाता खेळणे हे तर हृदयंगम दृश्य, खातो काय तर पोळी अन लोणी (माखन रोटी). असे धावत पळत अन पडत असतांना पायातील चाळ (पैंजण) छुनून छुनून वाजताहेत, ते नादब्रह्म म्हणजे सप्तसुरांपलीकडले, अर्थात आठवे!!!, आठवावा आठव्याचा (कृष्णाचा) आठवा स्वर, अर्थात त्याच्या पैंजणाची झंकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) त्याने पीतवर्णाची लंगोट घातलेली आहे (मोठे झाल्यावर पितांबर, धन्य हो, किसनकान्हा!). या कृष्णाच्या मनमोहक आणि मनभावन स्वरूपाने सगळ्यांना वेड लावलच आहे, त्याच्या सौंदर्यशोभेपुढे प्रत्यक्ष कामदेव आणि कलानिधी चंद्र देखील आपल्या करोडो सुंदर रूपांना ओवाळून टाकीत आहेत. अगं सखये, जरा बघ तरी, त्या मेल्या कावळ्याचे भाग्य कसे फळफळलेय ते, चक्क कृष्णाच्या हातातील ‘माखन-रोटी’ वर झपाटून डल्ला मारला आणि ती घेऊन कसा उडून गेला बघ!”

कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।

मोहनी ताननि सो रसखानि अटा चढि गोधन गैहै तौ गैहे॥

टेरि कहौ सिगरे ब्रज लोगनि काल्हि कोऊ सु कितौ समुझे है।

माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥

रसखान वरील ओळींमध्ये गोपी कृष्णाच्या प्रेमात किती वेड्या झालेल्या आहेत ते सांगतात. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, कृष्णाची मंद मंद सुरेल नादमधुर बासरी वाजते ना तेव्हा, माझ्या कानात कोणी बोटे घालावी, अर्थात मला ना त्याच्या बासरीची तान मुळी ऐकायचीच नाही बाई! तो ना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून येईल आणि मुद्दामच माझ्या मनाला मोहून घेणाऱ्या ताना घेत गायी चरायला नेत असता गवळी म्हणतात ती गाणी (गौचारण) गात बसेल. पण मी ना सर्व ब्रजवासीयांना ओरडून ओरडून सांगेन, मला भलेही काहीही अन कितीही समजावून सांगून बघा, पण हे सखी, या श्यामलतनु कृष्णाच्या मुखावरील ते मंद, मधुर स्मितहास्य तर माझ्या मनाचा ताबा घेतंय! मला माझं मनच आटोक्यात ठेवता येत नाहीय. तो माझ्या हृदयकमलाभोवती भ्रमरासारखा गोड गुंजारव अन प्रेमालाप करीत फिरतोय! अर्थात् मी कृष्णाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेय. मी इतकी व्याकुळ आणि उन्मत्त झाले आहे की काय सांगू अन कसं सांगू! मी सगळी लाज सोडून श्रीकृष्णाकडे धाव घेत आहे.”

मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।

ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥

भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।

या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥

कवीने या सवैयात गोपीचे कृष्णावरील आगळेवेगळे प्रेम प्रकट केले आहे. कृष्णाच्या वस्तूंना धारण करण्याची तिची कशी तयारी आहे बघा. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, मी ना आपल्या शिरावर (कृष्णासारखाच) मोरपंखाचा मुकुट धारण करेन. गुंजांची माळ गळ्यात घालीन, झालच तर पीत वस्त्रे परिधान करून हातात काठी घेऊन आणि गवळण बनून वनावनात गायी चरायला घेऊन जाईन अन त्यांच्या मागे फिरत फिरत छान रखवाली करीन. कृष्ण तर मला इतका परमप्रिय आहे, की त्याच्यासाठी मी वाट्टेल ते करीन, त्याला प्राप्त करायला तू सांगशील ते सोंग घेईन. पण एक लक्षात ठेव बाई, कृष्णाची जी मुरली आहे ना, जिला तो अधरात धरून ठेवतो, तिला मात्र मी माझ्या अधरात कध्धी म्हणून कध्धी धरायची नाही हं!” (सवत आहे ना!)

मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।

ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥

अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।

और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।

गोपिका म्हणतात, ‘शिरावर मोरपंख, ओठांत मुरली आणि गळ्यात वनमाळा घातलेल्या कृष्णाला बघत राहिल्याने मन वाऱ्यावर डोलणाऱ्या कमलपुष्पासारखं डुलतय. माझ्या अशा प्रेममग्न अवस्थेत कोणी वैरीण जरी उलटे सुलटे बोलली तरी सहन केल्या जातंय! रसखान म्हणतात, जेव्हा लावण्याचा गाभा अशा कृष्णाशी इतके स्नेहबंध जुळले आहेत की, कोणी एक म्हणू दे किंवा कोणी लाख वेळा टोकले तरी, आता इतर कुठलाच रंग असो व नसो, त्या सावळ्या कृष्णसख्याच्या रंगातच रंगून राहायचे आहे!’ जाता जाता याच अर्थाचे माणिकबाईंचे गाणे आठवले, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’

ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाला शोभायमान होते अशा कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही शब्द कुसुमांजली अर्पित करते!

– समाप्त – 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उसळ आणि उसळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 उसळ आणि उसळी ! 😅🤣😇 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक मी अज्ञानी काय सांगणार ?

आपापल्याला जिभेला पर्यायाने खिशाला जपा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आला की, सणांची रेलचेल असतेच असते. अगदी भराडी गौर, शिवामूळ, मंगळागौरी, नागपंचमी, शुक्रवारची सवाष्ण, वरदलक्ष्मी व्रत, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, पिठोरी मातृपूजन, पोळा ! दर दोन तीन दिवसाआड येणारे सण.

सर्व सणांचं ठीक आहे. पण मला नेहमीच जन्माष्टमीचं कायम नवल वाटायचं. श्रीरामजन्म, श्री दत्त जन्म  श्री हनुमानजन्म, जवळपास सगळेच मंदिरात होतात. मात्र कृष्णजन्माचा उत्सव हा मंदिरांसोबतच प्रत्येक घरी होतो. माझ्या माहेरी तर जन्माष्टमीला आम्ही गोकुळाष्टमी म्हणायचो. माझे वडील प्रख्यात मूर्तीकार. सकाळी आंघोळ झाली की ते गोकुळ करीत बसायचे. प्रारंभी गणपती, नंतर श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, राधा, काही गौळणी, अगदी पूतनामावशी सुद्धा. काही गायी वासरं, कालिया. श्रीकृष्णाचे मित्र वगैरे. मजा यायची. आम्हाला कुठलं काय येतंय ? पण शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता बाबा आम्हाला मातीकाम शिकवायचे. माणसं, प्राणी करणं कठीणच प्रकरण होतं. मग कुठे पाण्याचं टाकं, नाग, गौळणीच्या डोक्यावरचा माठ, फळं, ताकाचा डेरा असं काहीतरी करायचो. पुढे पोळ्यालाही वाडबैल वगैरे करताना तीच त -हा ! बाबा एकच वाक्य बोलायचे. ” आज ओल्या मातीला हात लावला नाही  तर पुढला गाढवाचा जन्म मिळतो. ” झालं. गाढव कोण होणार ? म्हणून आम्हीही करायचो. कळत नकळत असं कलेचं शिक्षण मिळत गेलं. नंतर त्यांची साग्रसंगीत पूजा नैवेद्य व्हायचा. दुपारी रात्रीच्या भजनाची आणि सुंठवड्याची तयारी असायची.

रात्रीचं भजन छानच रंगायचं. पंचपदी, शिक्का, गजर झाला की इतर भजनं व्हायची. त्या दिवशी कृष्णाची गाणी जरा जास्तच व्हायची. नंतर गवळण. ती झाली की कृष्णजन्म. कृष्णजन्म होताच गुलालाची उधळण होई. मग कृष्णाचा पाळणा. त्यावेळी घरातल्या स्त्रियाही त्यात सहभागी होत. शेवटी आरती आणि सुंठवड्याचा प्रसाद.

दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन आणि गोपालकाला. हे सर्व झालं की गोकुळाचं विसर्जन. इकोफ्रेंडली हा शब्द आज सर्वांना ठावूक झालाय, पण शंभर वर्षांपासून किंवा त्याच्याही आधी माझ्या माहेरी तो होता. कारण गोकुळाचं विसर्जन पाण्यात न होता, परसातल्या दोडक्याच्या किंवा पडवळाच्या झाडाखाली व्हायचं. सगळं गोकुळ आम्ही त्या वेलांच्या मुळाशी ठेवायचो. पूर्वी श्रावणात श्रावण बरसायचा. रंग नसायचेच त्या मुर्त्यांना. हळूहळू ती ओली माती मातीत मिसळून जायची.अनेकांच्या घरी हा कुळाचार पण आहे.

मला बालपणी पडलेला प्रश्न हाच होता, की कृष्णजन्म घरोघरी का होतो ? ब्रह्मा विष्णू महेश हे ठावूक होतं. उत्पत्ती स्थिती लय. पण स्थिती म्हणजे विष्णूरूप रामाचेही होते.. आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी प्रभू रामचंद्र. लहानपणी कळत नव्हतं पण जसजशी मोठी होत गेले तेव्हा स्वतःच विचार करू लागले. आजही कृष्ण कळला नाहीच. जरासा विचार केला एवढंच. रामाबद्दल वाटतो तो आदर. आदरयुक्त प्रेम. आणि कृष्ण वाटतो सखा. मनापासून प्रेम करावं असं वाटणारा.

आपल्या कुळाचाराचे देव कुण्या मोठ्या घरी असतात किंवा परंपरेने आपल्याकडे आलेलेही असू शकतात. पण सामान्यपणे आपल्या देवघरात कोण असतं ? श्री गणपती, अन्नपूर्णा आणि रांगता बाळकृष्ण ! सासरी जाताना आई लेकीला अन्नपूर्णा देते. ” तूही तुझ्या घरची अन्नपूर्णा हो ” असा आशीर्वाद देते. आणि दुसरा असतो बाळकृष्ण. मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ! देवाची पूजा करताना  ती मुलगी हळुवारपणे बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याचे वस्त्र बदलते. त्याला मुकुट, गळ्यात साखळी, हातात पायात कडे तोडे घालते. नटवते. सजवते. जसं आपल्या बाळाशी वागावं तशी ती लाडिक वागते. राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधते, स्वतःचा रक्षणकर्ता मानते. घरात काही घडलं तर त्याच्या कानात सांगते. जसं जिवाभावाच्या मित्राशी बोलावं तसं. आधार वाटतो त्याचा. आणि कधी काही सुचेनासं झालं की, त्याचाच सल्ला घेते.

कृष्णाने काय शिकवलं ? तुमचं कर्म तुम्हीच करा. यश आहेच. कारण मी पाठीशी आहे. सोबत आहे. कृष्णाने कुठला त्याग नाही केला ? जन्मतः च आईबाप दुरावले, नंतर नंद यशोदा दुरावले, राधा दुरावली, गोकुळ दूर गेले. असाही त्याग ? पुन्हा मागे वळून न बघण्याचा ? द्रौपदी सखी त्याची. तिचं लज्जारक्षण करणारा सखा तिचा.असूराच्या तावडीतून सोळा सहस्त्र एकशे नारींची त्याने सुटका तर केली. पण पुढे समाजातलं त्यांचं स्थान काय.. म्हणून त्यांना स्वतःचं नाव दिलं. पती म्हणून. बालपणी गुरं राखली, आणि मोठेपणी मित्राच्या रथाचा सारथीही झाला. त्याला योग्य मार्गदर्शन करीत जय मिळवून दिला.

…… आणि एवढं सगळं करूनही अलिप्त तो अलिप्तच राह्यला.

आपल्या मुखातून मातेला ब्रह्मांडाचे दर्शन घडवणारा कृष्ण माझ्या एवढ्याशा शब्दात बांधला जाणार आहे होय ? पण खरंच एवढं कायम वाटतं की, पुत्र, पिता, सखा, मित्र, अगदी पळवून नेणारा प्रियकर आणि नवरासुद्धा श्री कृष्णासारखाच असायला हवा.

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

(मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले. आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले.) — इथून पुढे — 

माझ्या घरात सगळीकडे फ्रेम करून लावलेली चित्रे होती. ती त्याने प्रामाणिकपणे व्यवस्थित पाहीली पण त्याची नजर काही तरी वेगळे चित्र शोधत होती. मग मी माझी नुकतीच पूर्ण केलेली पावसाची, दाट धुक्याची, जलरंगातील चित्रे दाखवली. आणि अर्शद एकदम खुष झाला. 

येस, येस, 

आय वाँट धिस टुडेज रेनी सिझन ॲटमॉसफियरीक वंडरफूल पेंटीग्ज.

दिस वील बी गुड मेमरीज फॉर मी. 

असे म्हणत त्याने ती तीन चित्रे सिलेक्ट केली. माझा अकाऊंट नंबर ऑनलाईन पेमेंटसाठी  विचारला पण माझ्याकडे तशी त्यावेळी सुविधा नव्हती. मग तो क्रेडीटकार्डची सुविधा उपलब्ध आहे का? असे विचारु लागल्यावर मी नकार दिला. कारण मी त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे एवढे सुरक्षित नव्हते.मग एटीएम मधून रोख पैसे देण्याचा पर्याय नक्की झाला.  बबल रोलच्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेली व्यवस्थित पॅक केलेली चित्रे त्याच्या गाडीतून अर्शदने मागच्या सीटवर ठेवली व आम्ही पाचगणीच्या शॉपींग सेंटरच्या पोस्टाशेजारच्या स्टेट बँकेच्या एटीएमला गेलो. त्याने पेमेंट काढून रक्कम हातात दिली.मग कितीतरी दिवस मनात साचलेले एक मोठे ओझे दूर झाल्याने मी रिलॅक्स झालो. कारण ती रक्कम पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतकी होती.आणि एटीएम शेजारच्याच पुरोहीत नमस्ते या हॉटेलमध्ये आम्ही निवांतपणे कॉफी पिण्यासाठी गेलो.

मला तर  फारच आश्चर्य वाटत होते की इतक्या धुवांधार पावसात हा माणूस माझ्याकडेच चित्र घ्यायला का आला असावा ? त्याला कोणी रेफरन्स दिला ? त्याला चित्रेच का घ्यावीशी वाटली ? तो या गावात शिकला,त्याचा व पाचगणीचा काय संबंध ? माझे अनेक प्रश्न मी त्याला विचारले. पण अर्शदने थोडक्यात प्रश्नांची उत्तरे दिली. 

आज खूप वर्षानंतर मी पाचगणीला आलो. शाळेत असताना हा वादळी पावसाचा दिवस, कडाक्याची थंडी, हे धुके मला सतत आठवत असते. आज सध्यांकाळी मी लॅपटॉपवर सहज पाचगणी पेंटीग्ज या नावाने सर्च मारला तर तुमच्या पेंटिंगचे फोटो दिसले. कुठूनतरी अचानक एक अज्ञात शक्तीने सुचवले किंवा मनात विचारांचे वादळच उठले की आताच जावून या चित्रकाराला भेटलेच पाहीजे. मी आता परदेशात स्थायिक झालो आहे.मनातल्या साचलेल्या या पावसाच्या धुक्याच्या आठवणी  चित्ररुपाने मला नेहमीच या परिसराची,तुमची व येथील पाचगणीच्या या भेटीची आठवण करून देत राहतील. प्रेमाने गळाभेट घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि माझी प्रत्यक्ष अनुभवलेली,घडलेली खरी  गोष्ट इथे संपली. 

डोक्यावर हुडी घालून चाललेला पाठमोरा अर्शद त्यादिवशी मला देवदूतासमान वाटला. कित्येक वर्ष ह्या नखशिखान्त पावसात ओलाचिंब झालेल्या या देवदूताची प्रतिमा मनाच्या अज्ञात पोकळीत स्वस्थ बसून राहिली होती आज या थिंक पॉझिटिव्हच्या लेखामूळे पुन्हा जागृत झाली, पुन्हा आठवली.

खरं तर मी नास्तिकही नाही व आस्तिकही नाही. मी नियमित देवपूजा व मंदिरानां भेटीही देणारा धार्मिक माणूस नाही. पण गेले कित्येक वर्ष  मला हा प्रश्न सतावतो की हे अज्ञात देवदूत मला का भेटत गेले ?  या देवदूतांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या वर्णाचे, स्त्री किंवा पुरुष असो वेगवेगळ्या रुपाने अडचणींच्या वेळी हजर कसे होतात ? आणि ते कधीकधी परत भेटतात किंवा कधी आयुष्यात भेटतही नाहीत. आपण कोणाला मदत केली किंवा मार्गदर्शन करून नवा रस्ता  दाखवला याचा त्यानां कधी अभिमान वाटत नाही. ते कुठे याचा नामोल्लेखही करत नाहीत. त्यांच्या भावविश्वात मी आता मदत केली आहे तर तुमच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा आहे असे त्यांचे वर्तन कधीही असत नाही.

मी हिंदू आहे व अर्शद मुस्लीम आहे म्हणून आमच्यामध्ये कधी असा दुजाभाव, दुराचाराचा विचार आला नाही. देवदूतानां कुठे धर्म,जात असते

आपल्या आयुष्यातील कठीण काळात सर्वतोपरी छोटी असो वा मोठी मदत करणाऱ्यानां देवदूतच म्हणावे लागेल ना ? 

म्हणजे देवदूतानां जात, धर्म, पंथ नसतो. मग आपण का जात,धर्म, पंथ व हिंदूत्व कवटाळून बसतो. मी तर मंदिराच्या परिसरात चित्र रेखाटण्यासाठी जात असूनही कधी आत जात नाही. देवाच्या दर्शनाला रांग दिसली की लांबूनच हात जोडतो. आणि देवाला मनातूनच सांगतो बाबा रे ! तुला तर माहीतच आहे की तुझ्यापासून काहीही लपवू शकत नाही.तू तर सर्वज्ञ आहेस, सगळीकडे तुझा वावर असतो मग रांगा लावून तुझ्याकडे येण्यासाठी वेळ कशाला घालवू ? रांगेत फुकट वेळ घालवायचा याला काय अर्थ आहे ? तू जे अडचणींच्या काळात मनुष्यरूपी देवदूत पाठवतोस ते काय कमी आहे का ? मग मनातूनच माझा नमस्कार स्विकार कर. 

यु नो एवरीथिंग अबाऊट मी.

आजही कधीतरी  मोठी अडचण आली की मला परत कधीही न भेटलेल्या हुडीवाल्या देवदूताची प्रतिमा आठवते. माझा तीस पस्तीस वर्षांचा चित्रकलेचा प्रवास अशा ज्ञात अज्ञात देवदूतांनी सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या मार्गाने अचानक प्रकट होवून भरघोस यशाशक्ती मदत केली. आमची चित्रकला बहरली, फुलली संपन्न झाली त्या या देवदूतांमूळेच. या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या मानवी सजीव देवदूतानां आज यानिमित्ताने मी नतमस्तक होऊन सप्रेम नमस्कार करतो.

मन, शरीर, बुद्धी व आत्मा या चार जीवनातील गोष्टींचे योग्य संतुलन असले की देवदूत भेटतातच, किंवा भेटले नाही तर कधी कधी आपणच कोणाचा तरी देवदूत बनून समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला, त्याची चिंतामग्न अवस्था समजून हातभार लावला, खरी मदत जर केली तर या जन्मात आपणही एक छान कर्म केल्याचे मानसिक समाधान नक्की मिळेल.

मी जरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी कधीही गेलो नाही तरी त्यांचे दोन शब्द मला नेहमीच प्रेरणा देतात. 

‘श्रध्दा’ और ‘सबुरी’.

आपल्या कामावर असलेली निस्पृह  निष्ठा,मनात असलेली प्रामाणिक इच्छाशक्ती व आपल्या जोपासलेल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक काम असो किंवा तुमच्या आवडत्या कलेवर असलेले निर्व्याज सच्चे  प्रेम असेल तर ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती करायला एक दिवस  देवदूत नक्की भेटायला येतो.तो नवनव्या वेषात येतो. कधी तो सरकारी अधिकारी म्हणून येईल, तर कधी शिक्षकाच्या, मित्राच्या रुपाने प्रकट होईल. कधी काळ्या कोटात वकीलाच्या रुपाने येईल तर कधी पांढरा कोट घालून डॉक्टरांच्या रुपाने येईल. कधी साध्या वेशात येईल, कधी टाय सुटबुटातील पोशाखात उद्योजकाच्या रुपाने येईल तर कधी हुडीवाला पोशाख घालून शांतपणे सुखाची पखरण करत व मदत करून निघून जाईल.

पण पक्का विश्वास ठेवा स्वतःवर 

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

🌟 🌟 🌟 🌟

(माझ्या चित्रकलेच्या अडचणीच्या संघर्षाच्या प्रवासात या हुडीवाल्या देवदुताला मी पार विसरूनच गेलो होतो. लेख लिहील्यानंतर त्या रात्री कित्येक वर्षांनी देवदूताचा गुगल, फेसबूक अशा समाज माध्यमांवर शोध घेतला तर देवदूत सापडला. मेसेंजरवर रात्री त्याला उशिरा मेसेज पाठवला तर देवदूताने मोठ्या उत्स्फूर्तपणे लगेच मला प्रतिसाद दिला. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात देवदूताना विसरतो पण देवदूत कधीच आपल्याला विसरत नसतात. या देवदूताचा चेहरा मला आठवत नव्हता. आज खूप वर्षानंतर त्या देवदूताचा बायोडाटा पाहीला तर हा स्मार्ट देवदूत त्यावेळी जागतिक बँकेचा प्रेसिडेंट होता.त्यांचा फोटो सुरुवातीला मुद्दाम दिला आहे.) 

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ आसवांचा चांद्रप्रवास ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांची प्रतिक्षा ! 

७ सप्टेंबर,२०१९. या आधी त्या दोन डोळ्यांत कित्येक वर्षे फक्त चंद्रच चमकताना दिसायचा…अमावस्या असली तरी ! आज मात्र दोन्ही डोळ्यांत अमावस्या भरून राहिलेली आहे. हजारो किलोमीटर्स दूर आणि वर असणा-या चंद्राच्या अंतरंगातील ओलावा शोधून काढण्याच्या प्रयत्नात या माणसानं रक्ताचं पाणी केलेलं असताना त्या चंद्राने याच्याच डोळ्यांत दीर्घकाळ टिकून राहील असा ओलावा भरून टाकला ! 

सामान्य पुरुषाचं रडणं खरं तर भित्रेपणाचा,असहाय्यतेचं लक्षण मानलं जातं…पण शूर पुरुष जेव्हा रडतात तेव्हा त्यांचे अश्रू फुलांना जन्माला घालण्याचा प्रण करीत वाहात असतात. जगाला शंभर टक्के यशाचीच गोडी समजते. यापेक्षा कमी जग खपवून घेत नाही. शंभर आणि नव्व्याण्णव यामधील एकचा फरक नव्याण्णवची किंमत अगदी कमी करून टाकतो. 

कैलासविदवू सिवन...एका सामान्य शेतक-याच्या पोटी जन्म. माध्यमिक शिक्षण मातृभाषा तमीलमध्ये घेतलेलं….खाजगी शिकवणी न लावताही अभ्यासात उत्तम गती. दैवाने प्रदान केलेल्या बुद्धीला कष्टाचं खतपाणी घालून देशाच्या सर्वोच्च अंतराळ संशोधन केंद्राचा प्रमुखपदी विराजमान होण्याची किमया. आणि हाती घेतलेलं चांद्रयानाचं व्रत. कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षांचं भलंथोरलं ओझं वागवत वागवत प्रचंड कष्टानं चांद्रयान-२ विक्रम लॅन्डर आणि प्रग्यान रोव्हर चंद्रावर, आणि तेही त्याच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला निगर्वी, मितभाषी माणूस. त्यादिवशी चंद्रालाही हळहळ वाटली असेल…अगदी जवळ येऊनही चांद्रयानाला चंद्राशी नीट गळाभेट घेता नाही आली ! खरं तर फक्त ही गळाभेटच शिल्लक राहिली होती…बाकी जवळजवळ सर्व कामगिरी उत्तम बजावली होती चांद्रयान-२ ने. मात्र ऐनवेळी अपयशाने पायांत खोडा घातला आणि जगाच्या लक्षात त्याचं केवळ कोसळणं लक्षात राहिलं. आमराईमधल्या सर्वांत डेरेदार आम्रवृक्षावर वीज कोसळावी आणि फळं जळून जावीत अशी स्थिती झालेली… 

… तोंडातून शब्द फुटू शकत नव्हते तेव्हा आसवांनी शब्दांची जागा घेतली. टाळ्या वाजवण्याच्या बेतात असलेले अनेक हात खाली झाले, नजरा दूर झाल्या. उभ्या देशाचा विश्वास गमावल्याची भावना मनात जोरात शिरली…आणि आसवांचा बांध फुटला ! देशाच्या नेतृत्वाने सांत्वन केलं, धीराचे चार बोलही सांगितले. सबंध देश निराश झाला होताच…आणि ते साहजिकच होते. पण त्याचक्षणी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्धार झाला. अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच ध्यासाने काम केले…चुकांचा मागोवा घेतला आणि त्या सुधारण्याच्या योजना नव्याने आखल्या. दिवस निघून गेले, वर्षे निघून गेली….आणि १४ जुलै २०२३ चा दिवस उगवला आणि २२ जुलै २०१९चा दिवस आठवला ! 

आजच्या २३ ऑगस्टला सुद्धा ७ सप्टेंबर मनात घर करून होता. चांद्रयान-२ शेवटच्या काही मोजक्या मिनिटांत यशापासून दूर जाऊन कोसळलं होतं ! आज असं व्हायला नको…पण गतवेळी झालेल्या चुका, अपघात यांपासून नव्या दमाच्या शिलेदारांनी धडा घेतला आहेच…सर्व काही व्यवस्थित होईल अशी खात्री होती मनात….तसंच झालं….केवळ चांद्रयानच नव्हे तर के.सिवन नावाच्या या मोठ्या माणसाचं हळवं मनही चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं… डोळ्यांत पौर्णिमेचा चंद्र उतरला होता ! आताच्या आसवांना तीन वर्षे अकरा महिने आणि सोळा दिवसांपूर्वीच्या आसवांची याद आली…..मात्र त्या आणि या आसवांमध्ये पृथ्वी आणि चंद्र नव्हे तर जमीन-अस्मानाचा फरक होता….आताची आसवं आनंदाची होती…..! 

कैलासविदवू सिवन साहेब…हा देश आपला सदैव ऋणी राहील ! आपले हार्दिक अभिनंदन ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

महत्वाचे निवेदन

काव्यानंद  या सदरात मराठी भाषेतील  कवितेचे रसग्रहण  अपेक्षित  आहे.आज आम्ही अपवादात्मक  बाब म्हणून  हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण  प्रकाशित  करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य  प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य  पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.

संपादक  मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.         

सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले. 

त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे.  ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print