मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण -…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण …” ☆ श्री सुनील देशपांडे

आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !

आज त्यांची पुण्यतिथी 

त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये  गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.

आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या  कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात. 

पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर  रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा  ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.  

आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच. 

परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’  खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?

या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’

असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी  म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती  त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….

म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी

“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान

मातीला हे मिळणारच. 

झाड कधी कण्हतं का?

कधी काही म्हणतं का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान!

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप

बोरकर एकदा म्हणाले

सिगारेटचा सोडीत धूर 

“सत्तर संपली तरी माझ्या

गळ्यात तरुणताजा सूर!

तीन मजले चढून आलो

असा दम अजून श्वासात

– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”

कवितांतून

रंग रंग झरू लागले

प्रत्येक क्षण

आनंदाने भरू लागले!

घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,

धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!

पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस

पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत

उभा होता किती वेळ,

रंगून जाऊन बघत होता

बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!

रस्त्यावरच उभं राहून दोघांनी

मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!

मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,

जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!

खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! 

आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?

नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?

अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?

थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?

तुम्ही काय घ्यायचं

ते तुम्ही ठरवा,

तुम्ही काय प्यायचं

ते तुम्ही ठरवा!

त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:

वय तुमचं साठ असो, सत्तर असो,

तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;

मोरासारखा अंधार फुलून आल्यावर

मजा आणते थोडीशी काजूफेणी!

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

 

आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता  रसिकार्पण.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा

 

डोळे भरत त्यांची आठवण

आपण आज काढतोच ना?

दोन कविता आठवून आठवून

त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?

डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं

तुम्हीच ठरवा

 

सरत्या वर्षाच्या काळोखात 

अंधार गडद होत असतो

नव्या वर्षाच्या प्रकाशात

त्यांचं काव्य उजळत असतं

अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं

तुम्हीच ठरवा

 

पाडगांवकर हयात नाहीत

असंही म्हणता येतं

पाडगांवकर मनात आहेत

असं सुद्धा म्हणता येतं

हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं

तुम्हीच ठरवा.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा. 

 

———- श्रद्धापूर्वक  — सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

माझी दत्तोपासना

आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची  यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे. 

दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.

हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. 

आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.

विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं…..  पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो. 

कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.

त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते. 

निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…

या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!! 

तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल. 

||श्री गुरुदेव दत्त||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला.) इथून पुढे — 

1939 ते 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले. या काळात फळणीची योजना मागे पडली. दुसऱ्या महायुद्धात युरोपातील 60 लाख निरापराध ज्यु लोकांची नाझी जर्मनीने अमानुष कत्तल केली. आता मात्र ज्यु लोकांना आत्मरक्षा करता येण्याजोगा स्वातंत्र्य देश निर्माण करण्याची गरज सर्व जगाला जाणवली. 1947 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्यु लोकांच्या मायाभूमीची फाळणी करून ज्यु लोकांसाठी स्वतंत्र्य देश आणि अरबांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अरबांनी त्याला परत विरोध केला. पण दुसऱ्या महायुद्धात अनन्वित अत्याचार झालेल्या ज्यु लोकांसाठी संपूर्ण जगाने लावलेल्या रेट्यामुळे 1948 साली इस्राईल या नवीन देशाची स्थापना झालीच. लगेच शेजारील इजिप्त, सिरिया, ट्रान्सजॉर्डन, लिबेनोन, इराक, सौदी अरेबिया, येमेन या अरब राष्ट्रांनी मिळून ईस्राएलवर हल्ला केला. इस्राईलने सर्व अरब राष्ट्रांचा एकत्रित पराभव केला. आपले पहिले स्वातंत्र्ययुद्ध इस्राईलने महत प्रयासने जिंकले. त्यानंतर जगभरातून ज्यु आपल्या मायभूमीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागले. अरब लोक इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न करत राहिले. दहशदवादी गटांकडून छोटे मोठे हल्ले तर सतत चालूच होते. पण शेजारील अरब देशांनी 1956 ला सुवेज कॅनल युद्ध, 1967 ला सहा दिवसाचे युद्ध, 1973 चे योनकिपरचे युद्ध करून इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  इस्राईलने या सर्व युद्धात अरबांचा पराभव करत आपले अस्तित्व टिकवले.

ज्यु लोकांनी कायम आपल्या मायभूमीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. इतकेच नव्हे तर अमाप कष्ट करून त्या वाळवंटात नंदनवन फुलवले. कमी पाण्यात केले जाणारी इस्राईली शेती आणि औद्योगिक प्रगती जगतमान्य आहे. इस्राईलची संरक्षण दले आणि गुप्तचर यंत्रणांची जगात दहशद आहे. मध्यपूर्व भागात तेल नसलेले एकमेव प्रगत राष्ट्र असा लौकिक इस्राईलने मिळवला आहे.

एकेश्वरवादी ज्यु लोकांनी स्वतःचा धर्म संभाळला. पण त्यांनी इसाई आणि मुस्लिम लोकांसारखा आक्रमक धर्मप्रचार केल्याची उदाहरणं फारशी ऐकीवात नाहीत. पण त्यांनी आपली वेगळी धार्मिक ओळख म्हणजे अहंकार जपला. त्यात ज्यु समाज कायम आर्थिक दृष्टया प्रगत होते. त्याचा फटका त्यांना वारंवार बसला. आर्थिक प्रगती करणे समाजमान्य आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा सरळ तिरस्कार करता येत नाही. काहीतरी वेगळे कारण शोधावे लागते. ज्यु लोकांनी जपलेले धार्मिक वेगळेपण त्यांच्या तिरस्काराचे कारण झाले.

‘नंगे से खुदा डरता है’ असे म्हणतात. पण ज्यु लोक कधीच भूखे किंवा नंगे नव्हते. व्यक्तीजवळ गमावण्याजोगे काही असेल तर व्यक्ती जरा घाबरूनच राहतो. ज्यु लोकांच्या अशा व्यापारी स्वभावामुळे त्यांना कधी कुणी घाबरले नाही. त्यामुळे ज्यु लोक सॉफ्ट टार्गेट झाले. त्यांच्या धर्मिक वेगळेपणाच्या आधारावर जगभर त्यांचा छळ झाला. नंगाडपणातून येणारी सत्ता आणि ताकत असल्याशिवाय संपत्ती टिकवता येत नाही. हे सत्य हिंदूप्रमाणे ज्यु लोकांनाही उशिरा उमगले. आजही सुसंस्कृत आणि सधन असललेले ज्यु इस्राईल बाहेर फारसे आक्रमक नाहीत. चालुबाजूनी ज्यु द्वेष्ट्या मुस्लिम अरब राष्ट्रानीं वेढलेल्या इस्राईल मध्ये ते आक्रमक राहिले नसते तर कधीच त्यांचे अस्तित्व नष्ट केले गेले असते.

जगभरात सर्वत्र फ्रस्ट्रॅटेड लोक आढळतात. त्यांच्या आत सुरु असलेली खदखद बाहेर काढण्यासाठी ते सॉफ्ट टार्गेट शोधत असतात. पूर्वीपारपासून ज्यु लोक हे अतिशय सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे इस्राईलवर दहशदवादी हल्ला होऊनही जगभरातील सगळे वैफल्यग्रस्त लोक ज्युं आणि इस्राईल विरुद्ध मोर्चे काढत आहेत. आपले फ्रस्ट्रेशन कमी करायचा प्रयत्न करत आहेत.  मनातील दुःख आणि इर्षा कुठेतरी बाहेर पडणारच असते. इतिहासात असेच सर्व लोकांनी सॉफ्ट टार्गेट असलेल्या ज्यु लोकांवर आपले फ्रस्ट्रेशन काढले आहे. पहिल्या महायुद्धाशी ज्यु लोकांचा काहीही संबंध नव्हता. पहिले महायुद्ध हरल्यानंतर जर्मनीत प्रचंड अगतिकता निर्माण झाली. हिटलरने ज्यु लोकांना जर्मनीच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवून ती सगळी अगतिकता काढण्यासाठी वांगे उपलब्ध करून दिले. 

इस्लाम आणि इसाई आक्रमक धर्मप्रचार करतात. धर्मप्रचार करताना इतर धर्माना आधी वाईट म्हणावे लागते. त्यामुळे धर्मप्रचार संघर्ष निर्माण होतात. इसाई धर्माला इतर धर्मांचे सहअस्तित्व तरी मान्य आहे. इस्लामला तेही मान्य नाही. ते आजवर मोठमोठया संघर्षाचे कारण ठरले आहे. पण हे दोन्ही धर्म कमालीचे आक्रमक आहेत. प्रतिकारात यांना उलटा मार पडल्यावर पटकन ते व्हिक्टिम कार्ड बाहेर कडून जगभर प्रदर्शने आयोजित करतात. ही कला ज्यु आणि हिंदू लोकांना आजवर जमलेली नाही. 

एकेश्वरवादी धर्म सर्वसमावेशक होऊ शकत नाहीत हे सत्य आहे. मी ज्यावर विश्वास ठेवला आहे तेच एकमेव सत्य आहे असा भ्रम झाला की आपल्या सारखा विश्वास असणारे आपले आणि त्या व्यतिरिक्त विश्वास असणारे परके वाटू लागतात. ‘केवळ आपण शहाणे आणि इतर जग बावळट’ इथपर्यंत ठिक आले. इतर लोकांशी संघर्ष होण्याची शक्यता कमी असते. पण धार्मिक नेत्याची ताकत त्याच्या समर्थकांच्या संख्येवरून ठरते. म्हणून ते आपल्या समर्थकांना संपूर्ण जगाला स्वतः सारखे शहाणे करून टाकण्याला म्हणजे धर्माप्रचार करण्याला धर्मकर्तव्य घोषित करून टाकतात. समस्या येथे सुरु होते. जेव्हा आपलाच विश्वास अंतिम सत्य आहे असा मानणारे लोक आपापल्या विश्वासाच्या प्रचारासाठी समोरासमोर समोर येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. सामूहिक धार्मिक ओळखीचा वैयक्तिक फायदा नगण्य असतो. पण या सामूहिक धार्मिक ओळखीचा फायदा धूर्त नेत्याने उचलला तर समूहातील बहुतेक मंडळी नागवले जातात. सामान्य लोकांचे ब्रेन वॉशिंग करून हे धूर्त नेते त्यानां धर्मायुद्धासाठी तयार करतात. असे कडवे सैनिक धर्मासाठी (म्हणजे नेत्यासाठी) लढले की नेत्याचा राजकीय फायदा पक्का होतो. अशा धर्मायुद्धात युद्धात मारतात ती सामान्यांची मुले. सामान्यांच्या मुलांच्या प्रेतांच्या पायऱ्या करून धूर्त नेते मंडळी उच्चं राजकीय पदापर्यंत पोहचतात. त्यासाठी आपल्या समूहाची वेगळी धार्मिक ओळख ते प्रयत्नपूर्वक जपतात. समूहाची धार्मिक ओळख सोडू पाहणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करून इतरांना समूह सोडण्यापासून पराववृत्त केले जाते. 

याउलट एका ईश्वराच्या अनेक रूपांना मानणारे हिंदू सारखे लोक ‘एकम् सत् विप्रा बहुदा वदन्ति’ असे म्हणत नवीन लोकांना त्यांच्या आराध्य देवांसहित स्विकारतात. म्हणूनच भारतावर हल्ले करायला आलेले शक, कुषाण, हुण सारखे अनेक लोक सुद्धा त्यांच्या देवा-धर्मासहीत हिंदू जीवन पद्धतीत समाविष्ट झाले. राजकीय संघर्षानंतर होऊ शकणारा मोठा धार्मिक संघर्ष टाळला. परदेशी गेलेले हिंदू तेथील देवांना आपल्या अनेक देवांपैकी एक देव म्हणून सहज स्विकारतात आणि त्या समाजाचा भाग होतात. वेगवेगळ्या लोकांचे आराध्य देव एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे असल्याचा विश्वास असल्याने हिंदूंनी धर्मप्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हिंदू समाज जगभर शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.

कृष्णानेही अधर्मी लोकांविरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगितले. पण सनातन परंपरेत न्यायाने वागण्याला धर्म वा यम म्हटले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय(चोरी न करणे), अपरिग्रह(गरजेपेक्षा जास्त संचयाचा लोभ न करणे) आणि ब्रम्हचर्य(निस्पृहतेच्या ज्ञानमार्गावर चालणे) या पाच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनुष्य वागल्यास त्याचा वैयक्तिक फायदा तर होतो. समाजातील बहुतांश लोक या पाच न्याय तत्वानुसार वागल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. या पाच न्यायतत्त्वांना डावलून समाजातील एखाद्या घटकावरती अन्याय झाल्यास सामाजिक समस्या निर्माण होतात आणि समाज स्वास्थ बिघडते.

सनातन परंपरेत या पाच यमधर्मा प्रमाणे न वागणाऱ्या लोकांना अधर्मी म्हटले जाई. धर्मी आणि अधर्मी या अतिशय वैयक्तिक ओळखी होत्या. ‘न्यायाने अर्थात धर्माने वागणारा’ ही जन्माने येणारी ओळख नव्हे. जन्मावरून कुणाला धर्मी वा अधर्मी म्हणता येत नव्हते. तसे असते तर एकाच कुटुंबात जन्मलेले कौरव अधर्मी आणि पांडव धर्मसंगत ठरले नसते. धर्मी-अधर्मी कर्मावरून ठरते. सनातन समाजात अधर्मी अशी ओळख असणे ही भूषणाची गोष्ट नव्हती. त्यामुळे अधर्मी व्यक्तींच्या समूहाला अधर्मी अशी सामूहिक ओळख देऊन संघटित करणे आणि त्या संघटीत शक्तीचा उपयोग आपला राजकीय फायद्यासाठी करणे हे धूर्त नेत्यांसाठी कठीण होते.

प्रेषितांना अपेक्षित असलेले बहुतेक संघटित ऐकेश्वरवादी धर्म हे वैयक्तिक आत्म उन्नतीचा मार्ग होते. पण नंतरच्या काळात जेव्हा धूर्त अनुयायी या महापुरुषांच्या विचाराचा पराभव करून धर्माचे राजकारण करतात तेव्हा मात्र धर्म अफूची गोळी झाले.  नेते गबर झाले आणि धर्माचे सामान्य अनुयायी नागवले गेले. जोपर्यंत सामान्य जनतेला हा खेळ नीट कळत नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार आहे.

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छोटीशी कृती… — लेखिका : सौ. शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

दुःख कुरवाळणारी माणसं… — लेखिका : सौ. शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघं नुकतेच अमेरिकेला राहायला गेलो होतो. तीन-चार महिने झाले असतील. नवरा कामात व्यस्त होता, आठवड्यातून तीन-चार दिवस त्याचा प्रवास चालायचा. घरी मी एकटीच. मला अजून अमेरिका म्हणावी तितकी झेपत नव्हती. सारखी भारताची, घरच्या लोकांची आठवण यायची. त्यात अजून तिथे फार ओळखीही झाल्या नव्हत्या. त्यामुळे एकटेपणा खूप जाणवायचा. त्यात तो सरत्या नोव्हेंबरचा काळ होता. शहरातले सगळे रस्ते, मॉल्स, घरे ख्रिसमसच्या रोषणाईने सजले होते. मला मात्र दिवाळी ह्या वर्षी भारतात साजरी नाही करता आली याचं दुःख होतं आणि त्यामुळे ती रोषणाई बघून अजूनच खिन्न वाटत होतं.

त्यातच आम्ही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाणार होतो. ती सुट्टी ऐन वेळी रद्द करावी लागली होती. कारण नवऱ्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. त्यावरून आमची माफक वादावादीही झाली होती आदल्या दिवशी आणि नवरा सकाळच्या फ्लाईटने त्याच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेलाही होता. घरी मी एकटीच होते, त्यामुळे स्व-अनुकंपेला बऱ्यापैकी वावही होता. सबंध दिवस घरात बसून स्वतःची कीव करून थोडंफार रडूनबिडून झाल्यावर त्याचाही कंटाळा येऊन मी घराबाहेर पडले. तशी माझी जायची ठिकाणं तोपर्यंत दोन-तीनच होती. घराजवळची पब्लिक लायब्ररी, एक मॉल आणि कोपऱ्यावरचं कॉफी शॉप!

मॉलमध्ये जायचं ठरवून तिथे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे सगळं उत्सवी वातावरण होतं. मोठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे रोषणाई, ठिकठिकाणी सेल आणि ऑफर्स. बराच वेळ मी निरुद्देश्य भटकले. पण माझं एकटेपण राहून राहून अंगावर येत होतं. शेवटी चालून चालून पाय दुखायला लागले, तेव्हा मी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शिरले. मला बऱ्याच दिवसांपासून बूट्स घ्यायचे होते, म्हणून बायकांच्या फुटवेअरच्या सेक्शनमध्ये गेले. तिथे एक सत्तरेक वर्षांची कृष्णवर्णीय बाई सेल्सवूमन होती. त्यावेळेला मी एकटीच कस्टमर होते. मला काय हवं ते विचारून ती चपळाईने तिथल्या स्टेप लॅडरवर चढून मला हवे तसे बूट दाखवत होती.

आपल्याला सहसा भारतात इतक्या वयस्कर व्यक्तीकडून सेवा घ्यायची सवय नसते. त्यामुळे तिची लगबग पाहून मला थोडं कानकोंडं होत होतं. बूट दाखवता दाखवता आमचं जुजबी बोलणं सुरु झालं. पॅट्रिस नाव होतं तिचं. ’डू यू नो, आय ऍम सेवेंटी टू?’ ती माझ्या पायात बूट चढवता चढवता म्हणाली. मला अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी तिला सांगितलं, मीच ट्राय करते. बुटांच्या सात-आठ वेगवेगळ्या जोडया तिने आणल्या होत्या आणि गुडघ्यांवर बसून ती मला ते बूट ट्राय करायला मदत करत होती. उठ-बस करताना तिचे गुडघे दुखत आहेत, हे मला जाणवत होतं आणि म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून तिला थँक्स म्हणून मी जायला उठले. तर ती पटकन म्हणाली की तिने विकलेल्या दर जोडीमागे तिला कमीशन मिळतं. ‘यू शुड बाय अ पेअर,’ पॅट म्हणाली.

मी एक बुटांची जोडी पसंत केली. ती पॅक करता करता पॅट बरंच काही बोलत होती. कदाचित माझा एकटेपणा तिला जाणवला होता म्हणून असेल, कदाचित तिलाही बोलायचं होतं म्हणून असेल, पण तिने मला तिची कहाणी सांगितली. तिची पाच मुलं होती, त्यातली शेवटची दोन तिच्याबरोबर रहात होती. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी तिशीची आज मुलगा पस्तिशीचा. दोघेही काही करत नव्हते आणि ही सत्तरीची आई त्यांना सांभाळण्यासाठी दिवसातून दोन-दोन नोकऱ्या करत होती, सकाळी नऊ ते चार एका डॉक्टरच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्सवूमन म्हणून, आणि सुट्टीच्या दिवशी बेबीसीटिंग! हे सर्व बहात्तर वर्षाच्या वयात!

‘साऊंडस सो डिप्रेसिंग!’ तिचं बोलणं ऐकण्याच्या नादात अनवधानाने मी बोलून गेले. पॅट हसली,म्हणाली, ‘हन, आय डोन्ट हॅव दी बँडविडथ टू बी डिप्रेसड, आय हॅव माय हॅंड्स फुल’!

मला एकदम चटका बसल्यासारखं झालं. सगळं व्यवस्थित असून फक्त एक विकेंडची सुट्टी मनासारखी नाही झाली आणि अमेरिकेत एकटेपणा वाटतोय हे स्वतःचं इवलंसं दुःख कुरवाळत मी स्वतःची कीव करत पूर्ण सकाळ घालवली होती आणि ही बहात्तर वर्षांची बाई मला सांगत होती की निराश होऊन रडत बसायला माझ्याकडे वेळच नाहीये!

पॅटचं ते वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आजही कधी छोट्या छोट्या कारणांवरून आपण फार दुःखी वगैरे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हा मी प्रयत्नपूर्वक पॅटचं हे वाक्य आठवते. आपोआपच चित्त ताळ्यावर येतं.

स्व-अनुकंपा आणि स्वतःचे खरे-खोटे दुःख कुरवाळत बसणे हे कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने केलेलं आहे. नव्हे, ते अगदी नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकासाठी त्याच्या किंवा तिच्या अडचणी मोठ्याच असतात आणि त्या त्या वेळेला हतबल वाटू शकतं. ‘हे माझ्याच बाबतीत का होतंय’ असे प्रश्नही पडू शकतात, पण हाताशी असलेला रिकामा वेळ जितका जास्त तितकं ह्या स्व-अनुकंपेमध्ये   स्वतःला गुरफटून घेणं जास्त सोपं होतं. जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणाऱ्या, सतत कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला वेळच नसतो.

पूर्वी हा स्व-अनुकंपेचा सोहळा खासगी तरी असायचा. केवळ कुटुंब आणि काही मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोरच हा कार्यक्रम चालायचा. आता सोशल मीडियामुळे दुःख कुरवाळणे हा एक सार्वजनिक इव्हेंट बनत चाललाय. बऱ्याच लोकांसाठी आणि दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. ’मला घरात कुणी समजून घेत नाही’ इथपासून ते ’सासू/सून/नवरा/मुलं/बॉस ऐकत नाही’ इथपर्यंतची सर्व लहान मोठी, खरी-खोटी दुःखे फेसबुकच्या किंवा इन्स्टाच्या चव्हाट्यावर उगाळली जातात.

अशा पोस्टसवर तोंडदेखल्या, खोटया सहानुभूतीचा रतीब घालणारा एक प्रेक्षकवर्ग आहेच, जो ह्या स्व-अनुकंपेच्या रोपट्याला सतत खतपाणी घालून ते जोपासतो आणि मग त्या दुःख कुरवाळत बसण्याची सुद्धा सवय लागते माणसांना. मग कुणी सोल्यूशन दिलेलेदेखील आवडत नाही. कारण मुळात पडलेले प्रश्न सोडवायचेच नसतात, फक्त त्यांचं भांडवल करत मनावरचं दुःखाचं गळू तसंच ठसठसतं ठेवायचं असतं काही लोकांना.

मी ह्या ट्रॅप मध्ये शिरतेय, अशी शंका जरी मला आली तरी मी पॅटचं हे वाक्य मनाशी परत परत आठवते आणि स्वतःला कसल्या ना कसल्या कामात गुंतवून ठेवते. अगदी काही नाही तर दीड-दोन तास चालायला तरी जाते. आपली बरीचशी दैनंदिन आयुष्यातली दुःखं किंवा अडचणी ह्या फुग्यासारख्या असतात, आपण जितकी हवा देऊ तितकी ती फुगत जातात आणि आपण कामाची टाचणी लावली की विरून पण जातात!

लेखिका : सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री पुरुष समानता… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ स्त्री पुरुष समानता? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

युगानु युगे चाललेला वाद स्त्रीला दिलेली कमीपणाची वागणूक चाकोरीबद्ध राहण्याची शिक्षा तिच्या क्षमतेबद्दलची गृहीते तिच्यावरच लादलेली काही कार्ये यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदभाव युगानू युगे होत आलेला आहे.

पण आता शिक्षित झालेली स्त्री तिने सिद्ध केलेली तिची क्षमता सगळ्या क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी यामुळे स्त्री आणि पुरुष यांची समानता सिद्ध झालेली आहे आणि सगळीकडे 50% स्त्रियांना आरक्षण दिलेले आहे.

पण म्हणून स्त्री पुरुष समानता आली आहे असे म्हणता येईल का? मुळात समानता म्हणजे काय अभिप्रेत आहे? स्त्रियांनी बिनधास्त पणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे;पुरुष जी जी कामे करतात ती ती कार्यें स्त्रियांनी करून दाखवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता झाली का?

अहो एका शरीराचे असलेले अवयव देखील आपण डावे उजवे भेद करून समान मानत नाही मग दोन भिन्न प्रकृतीच्या जीवांची बरोबरी असली पाहिजे हा आग्रह का?

नाण्याच्या दोन भिन्न बाजू कधी समान होतील का? एक प्रवाह असलेले नदीचे दोन काठ कधी एकत्र येतील का? लोहचुंबकाचे दोन ध्रुव आहेत तेच एकत्र येतात का नाही? समान ध्रुव एकत्र येऊच शकत नाहीत. मग अशा वेळी समाजातील दोन घटक स्त्री पुरुष यामधे समानता आणण्याचा अट्टाहास का? कितीही प्रयत्न केले तरी तशी समानता येईल का?

सृजनासाठी समाजातील या दोन घटकांची बरोबरीची भागीदारी असली तरी स्त्री ही जास्त सामर्थ्यशाली जास्त सहनशील असल्यामुळे कितीतरी हाडे एकत्र फ्रॅक्चर झाल्यावर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या प्रसव वेदना हसत झेलण्याची ताकद स्त्रीमध्येच बहाल केलेली असल्याने अपत्यांना जन्माला घालण्याचे काम स्त्रियांकडे दिलेले आहे ते त्यांचेच राहणार.

स्त्रिया जशी पुरुषांची कामे करतात तशी पुरुषही स्त्रियांची कामे करू लागले आहेत म्हणून हॉटेलमध्ये जेवण करायला आचारी पुरुष असतात. आई वडील दोघेही कमावते असल्याने मुलांकडे लक्ष पुरुषही देतात. मुलगी माहेरचे सर्व बंध सोडून सासरी येते तसें जबाबदारी मुळे मुलेही आई वडील व घरचे बंध सोडून दूर दूर कामानिमित्ते जातात हे एक प्रकारे सासरी जाण्यासारखेच आहे.

याचाच अर्थ काही कामे स्त्रिया करू लागल्या आहेत तर काही पुरुष. नेहमीच्या रूढी परंपरा सोडून वावरण्यात रहाण्यात स्त्री पुरुष समानता आलेली आहे.

पण अनादी काळापासून स्त्रीला लाभलेला मातृत्वाचा अधिकार कोणीच हिसकावून घेऊ शकत नसल्यामुळे स्त्री पुरुष समानता असे म्हणणे चुकीचेच ठरणार आहे. या बाबत स्त्री ही अग्रगण्याच राहणार.

जसे एक नमस्कार करायला दोन हात लागतात ;एक चाल चालायला दोन पाय लागतात तसेच समाज रचनेसाठी स्त्री पुरुष दोन्ही घटक आवश्यक असतात त्यात कमी जास्त महत्वाचा असे भेद होऊच शकत नाहीत. त्यामुळे स्त्री ही जास्त श्रेष्ठ असली तरी ती स्वतः तसे समजतं नाही हा श्रेष्ठ गुण तिच्याकडून घेऊन दोन्ही घटकांनी एकत्र काम केले तर नक्कीच विधायक कार्यें पार पडतील यात शंकाच नाही.  

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – २ – लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

१९८६ साली माझी बदली पुणे येथे झाली. पुणे येथे असतांनाच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय , इंग्रजी माध्यमाच्या योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रात मला प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेक देशांतील डोळस प्रशिक्षणार्थी असतांनाही मी तेथे उत्तम प्राविण्य संपादन केले. पुणे येथे असतांनाच समाजशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत एम्. ए. उत्तीर्ण झालो. पुणे महानगर पालिकेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला प्रदान केला. 

१९९९ साली नाशिक येथील शासकीय अंध शाळेत माझी बदली झाली. येथील मुलांना संगीत शिकवले जात होते. माझ्या गीतांना संगीताची साथ मिळू लागली. त्यामुळे माझी नवनवीन देशभक्तीपर व सामाजिक गीते नावारूपाला आली. सौ. शारदा गायकवाड या स्वाध्यायी समाजसेविकेच्या पुढाकारामुळे ‘ज्योतीकलश’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २००२ साली व ‘ चैतन्यचक्षू’ हा दुसरा काव्यसंग्रह २००४साली प्रकाशित झाला. नाशिक जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन माझा गौरव केला. समाजकल्याण खात्याच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ मला दिला. राष्ट्रीय अंधजन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य शाखेने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार मला प्रदान केला. याच काळात स्वाध्याय प्रणित तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यातील ‘ विचक्षण’ परीक्षेत मला जागतिक मेरीट प्राप्त झाले. 

माझ्या जीवनात अभूतपूर्व असा योग चालून आला. आजवर कुठल्याही शासकीय अंध शाळेतील अंध शिक्षकाला अधिक्षकाचे पद प्राप्त झालेले नव्हते. परंतु मला ते मिळाले. शासकीय अंध शाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधिक्षक पदावर मी रूजू झालो. त्या काळात कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी जोडला गेलो. या परिषदेतील वृंदा कांबळी यांनी माझ्या निवडक १८ कवितांच्या आधारे ‘सहा टिंबातून’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबतची संकल्पना अशी की जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक, गायक, आकाशवाणी निवेदक अशा सहा व्यक्तींना प्रत्येकी तीन कविता गायन किंवा वाचन करण्यास दिल्या. त्यासाठी योग्य असा निवेदन पट तयार केला. अनेक तालुक्यातून हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

अधिक्षक पदाची कारकिर्द यशस्वी रित्या पार पाडून २०१४ साली मी सेवानिवृत्त झालो. 

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु मला तो पडला नाही. नाशिक ही कवी लेखक नाटककार यांची साहित्य पंढरी आहे. या साहित्यिक मेळ्यात मी स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने  माझ्या कवितांना जनाधार प्राप्त झाला.माझे अंधत्व गौण मानून माझ्या प्रतिभेचा आदर केला गेला. अनेक कविमंडळे नाशिकमध्ये आहेत. दर आठवड्याला कुठे ना कुठे कविसंमेलन होतेच. त्यात सहभाग घेऊ लागलो. २०१६ साली ‘दृष्टीपल्याड’ हा माझा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशेष म्हणजे मी ज्या शासकीय विद्यानिकेतनात शिक्षण घेतले होते त्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 

अनेकांच्या आग्रहाखातर ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे माझे आत्मचरित्र २०१७ साली भव्य समारंभात प्रकाशित झाले. हा भव्य समारंभ म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन होता. संपुर्ण महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास हजर होते. 

इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भगवत गीतेवर आधारित ‘गीताप्रज्ञा’ ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते मला रू १५००० चा पुरस्कार एका भव्य समारंभात प्राप्त झाला.

सेवा निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुखाचा व अधिक कार्यमग्न होण्यासाठी बोलका कॉम्प्युटर व बोलका मोबाईल हाताळण्याची कला मी अवगत केली. अनेक साहित्यिक व्हाट्सऍप गृपवर माझ्या कविता प्रसारित होऊ लागल्या. १० व ११ जून २०१७ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला तसेच २०१७ साली लिमका बुक रेकॉर्ड्स साठी सलग २४ तास कविसंमेलन पुणे येथे   माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

राज्यभरात अनेकदा अंध अपंगांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद मी भूषविले.तसेच डोळस कवींच्या अनेक संमेलनात माझ्या कवितांना तसेच काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ऑनलाइन काव्यस्पर्धेत वारंवार पुरस्कार प्राप्त होत आहेत.गझल या काव्यप्रकारातही माझी यशस्वी वाटचाल चालू आहे.

माझ्या मराठी व अहिराणी कविता वृत्तबद्ध व छंदोबद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकजण त्या कवितांचे गायन करून ऑडिओ पाठवतात. काही यूट्यूब चानलवर त्या गायनाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात.  

डिसेंबर २०२१ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दूरदृष्टी या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे व काळोखातली प्रकाशवाट या आत्मचरित्राच्या विस्तारीत आवृत्तीचे प्रकाशन

झाले.  जानेवारी २०२३ मध्ये प्रतिभेचे नंदनवन हा माझा पाचवा काव्यसंग्रह नाशिक येथे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात प्रकाशित झाला. 

अशाप्रकारे माझा यशस्वी जीवनप्रवास चालूच आहे.अंधत्वाबद्दल मी कधीही देवाला दोष दिला नाही कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणेच मी आयुष्य जगलो. माझा मुलगा उत्तम प्राथमिक शिक्षक असून मुलीचे एलएलबी झाले असून तिचे पती भारतीय लष्करात ‘मेजर’ पदावर आहेत. चार नातवंडांसह  आमचे परिवार सुखी आहेत. कथा संपावायच्या आधी मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल की माझ्या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ. रेखा हीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेवटी जाता जाता एक स्वरचित कविता सादर करत आहे.

☆ चैतन्य-चक्षु ☆

(वृत्त आनंदकंद)

चैतन्य-चक्षु अपुले, जागे सदैव ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

शिखरास उंच पाहू, पंखात जिद्द ठेवू  

ध्येयास गाठण्याला, उत्तुंग झेप घेऊ  

नैराश्य टाळण्याला, गाणे मधूर गाऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

सृष्टी दिसे न काही, मज मान्य न्यूनता ही  

दैवास दोश द्यावा, ऐसे न यात काही  

जन्मास पाहण्याची, दृष्टी सकार ठेवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

नेत्रांध हो कुणी हा, प्रारब्ध जीवनाचा  

स्वार्थांध वासनाधिन, हा दोष मानवाचा  

टाळून या विकारा, गुणवान सर्व होऊ  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

काही असे करू की, दिपवू अखील विश्व  

म्हणतील अंध असुनी, झाला प्रकाश-पर्व  

अंधार आवसेचा, दीपावलीत भुषवू  

अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू  

— समाप्त — 

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ फॉल-पिको… – लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आज योगासनांचा क्लास जरा लवकरच संपला.

थंडी मुळे सगळ्या गारठून गेल्या होत्या.

सकाळी सातच्या बॅचला सगळी young generationची गर्दी आणि दहाच्या बॅचला सिनियर सिटीझन मंडळी.या बॅचला येणा-या सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या.योगासने कमी आणि गप्पा टप्पा जास्त.

प्रत्येकीच्या काही ना काही शारीरिक तक्रारी. तरीही मानसीताई सगळ्यांना छान सांभाळून घेऊन प्रत्येकीकडून योगासने करवून घ्यायच्या.आज थंडी जरा जास्तच होती.त्यामुळे ब-याच जणींनी दांडी मारली.

नेहमीच्या सात आठ जणी हजर होत्या.

मानसी ताईंचे घर खालीच होते.

आज सगळ्यांना गरमागरम चहा आणि पॅटीस‌ ची मेजवानी मिळाली.आज गप्पांचा मूड होता.काणे काकू थोड्या अबोल वाटल्या.

“का हो काकू,आज अगदी गप्प गप्प?”मी विचारले.काणे काकू म्हणाल्या, “काय सांगू ?काल घरात पार्टी होती.रात्री जेवायला, झोपायला उशीर झाला.यजमानांना आताशा कलकल सहन होत नाही.तरीही मुलाने आणि सुनेने,आम्हाला कमीतकमी त्रास होईल याची खबरदारी घेतली होती. सगळेच जण बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. संजय स्मिताने आम्हाला आधीच सांगितले होते,’आई बाबा,तुमची वेळ झाली की तुम्ही जेवून घ्या, आम्हाला उशीर होईल’.यांचा स्वभाव तिरसट.मी इतकी वर्षे सहन केले.सगळ्या मित्रांसमोर यांनी संजयला विचारले, ‘तुमचा थिल्लरपणा कधी संपणार आहे?मला आवाजाचा त्रास होतोय.’

संजयने शांतपणे सांगितले,’बाबा,अजून एक तासभर.अकराच्या आत सगळे आपापल्या घरी जातील.’ यांची आत धुसफूस सुरूच होती.

मी लक्षच दिले नाही. मला माझ्या मैत्रिणीचे वाक्य आठवले. ती म्हणायची, ‘हे बघ असे प्रसंग येत राहतातच. आपण तोंडाला ‘फॉल-पिको’ करायचे. वादाचा प्रश्नच येत नाही.’

किती छान सांगितले तिने. मला तो शब्द फारच आवडला.

तिच्याही घरी हाच प्रकार आहे. सून चांगली आहे, सास-याचे त-हेवाईक वागणे सहन करते.

कधी तरी शब्दाला शब्द वाढतोच. पण ‘फॉल पिको’मुळे, सारं काही आलबेल आहे.”

काणे काकूंनी सांगिलेला फॉल-पिकोचा मंत्र सगळ्यांना जाम आवडला.

मानसी ताई म्हणाल्या, “हे बघा, घरोघरी कमी अधिक प्रमाणात हे असं असतेच,गोष्टी जेवढ्या ताणल्या जातील तेवढे ताण तणाव वाढत जातात.करोना काळापासून सर्व नोकरदार मंडळी चोवीस तास घरात आहेत,यापूर्वी याची सवय नव्हती.करोनाने प्रत्येकाला माणूसकी आणि नात्यांची किंमत दाखवून दिलीय.

तुझं माझं, हेवे दावे या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा अर्थ चांगलाच समजलाय आपल्याला.तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागा, प्रेम-माया यांची देवाण घेवाण एका रात्रीत होत नसते. तरूण पिढीला मानसिक ताण तणाव, त्यांची टार्गेटस्, बॉस लोकांची मर्जी, किंवा हाताखालील सहकाऱ्यांना, जिभेवर साखर ठेवून संभाळून घेणे इ. ब-याच गोष्टींना सामोरे जावे लागते. तुम्ही सगळ्या बॅचला येता. आपली सुख-दु:ख एकमेकींबरोबर शेअर करता,‌तासभर नवीन ऊर्जा घेऊन घरी जाता.

घरी देखील असंच खेळीमेळीचे वातावरण ठेवा.या आधीच्या बॅचच्या सगळ्यांना मी नेहमी हेच सांगते.त्यातल्या काही जणींना सुना/जावई येऊ घातल्या आहेत. पेराल तसे उगवते,म्हणतात ते अगदी बरोबर आहे.जीभेवर साखर ठेवा.योग्य वेळी संसारातून अलिप्त व्हा,पण वेळेला त्यांना समज,सल्ला अवश्य द्या.

आणि क्षमाचा फॉल-पिकोचा मंत्र, मला पण खूप आवडला.

तेव्हा काणे काकू,घरी गेल्यावर हा मंत्र जपा.” सगळ्यांनी मानसी ताईंच्या बोलण्याला खळखळून हसत दाद दिली.

लेखिका : श्रीमती क्षमा एरंडे

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कसं असतं नां!!!… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कसं असतं ना!.. जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना!.. जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं!… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं.. असा माझा हट्टही असतो ना!.. पण कसं असतं नां!!

… शब्दांच्या भोवऱ्यात मी अडकून तुम्हाला कोड्यात टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही… चित्र जरी एक अल्लड बालिकेचे तुम्हास दिसत असले… तरी मी काही आता बालिका राहिली नाही..  हि बालिका  आता याच वयाच्या बालिकेची मातेच्या रूपात आहे… आणि आणि तिला आता तिचाच भुतकाळ सतत तिची आताची बालिका सारखी सारखी नजरेसमोर आणून दाखवत असते…

आता कळतयं आपण जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा असतो… आईचं तेव्हाचं आपल्याशी एकंदरीत वागणं किती बरोबर होतं ते.. बाई गं मुलीच्या जातीला असलं वागणं शोभायचं नाही बरं.. हे तिचं सतत  उपदेश पर  चौविसतास बोलणं मनाला मुरड घालायचं… आवडायचं तर मुळीच नाही.. भांडणाची  चकमक उडाली नाही असा एक दिवस कधीही सरला नाही… चंद्र सूर्य यांच्या झांंजावादनाने दिवस रात्र सरसर सरले… आईचं बरोबर होतं हे कळले आणि पटलेही.. आणि माझं …

… आणि माझं किती किती चुकीचं आहे हे आता माझीच मुलगी जेव्हा मला सांगू लागली तेव्हा… माझ्या आईचं म्हणणं मला सतत आठवतं राहिलं..कसं असतं नां.. आणि आता पुढे माझी मुलगी जेव्हा आईच्या भुमिकेत जेव्हा येईल तेव्हा मी किती बरोबर होते हे तिला कळेल…. आणि  तिचं किती…

कसं असतं नां… जसं दिसतं तसं ते मुळीच नसतं ना… जे वाटतं ते तसं हवं असतं तसंच दिसलं असतं..आताच नव्हे तर कायमचं तर कुठं बिघडलं असतं… आणि आणि जेव्हा जेव्हा त्याची म्हणून आठवण कधी मधी येईल तेव्हा तेव्हा ते तसचं दिसायला हवं असतं..पण पण.. कसं असतं नां….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

३ डिसेंबर–‘जागतिक अपंग दिन’ निमित्त – प्रसिद्ध कवी-काशिनाथ महाजन यांच्याशी प्रत्यक्ष भेट 🌹

तीन डिसेंबर ! जागतिक अपंग दिनानिमित्य माझ्या एका अविस्मरणीय भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडते.

स्थळ- पुण्यनगरी नाशिक,

सरळ भेटण्याचा आणि पत्र व्यवहाराचा पत्ता-  श्री काशीनाथ देवराम महाजन, फ्लॅट नं १४, मधूसूदन अपार्टमेंट, त्रिवेणी पार्क, जेलरोड, नाशिक- पिनकोड – ४२२१०१, फोन नंबर – ८४५९३०००७६

माझी या स्थळी पोचण्याची सांजवेळ साधारण ५. मंडळी वरील नामनिर्देशित व्यक्ती प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी कैक जण त्यांना कविसंमेलनात भेटले असाल एक कवी, अध्यक्ष, निमंत्रित अन बरेच कांही. आमच्या भेटीचा योग्य मात्र अचानकच आला पण मी मात्र त्यांचे नाव आमचे मित्र महेंद्र महाजन (मुक्काम सटाणा) यांच्या स्वरातून ऐकले होते. पर्यावरण, सायकल, भाऊबीज अन अजून विषयांवर, स्वर महेंद्रचे अन कविता-गीत काशिनाथ महाजन. सटाणा येथे महेंद्रची भेट झाल्यावर मी   त्यांना माझी नुकतीच प्रकाशित पुस्तके भेट दिली आणि तसेच काशिनाथ सरांना देखील एक संच द्यायची विनंती केली. मात्र माझे भाग्य जोरावर नक्कीच होते. महेंद्रने मला नाशिकला त्यांना प्रत्यक्ष भेटून पुस्तके द्यावीत असा सल्ला दिला.

त्यानुसार मी   काशिनाथ सरांची भेटीकरता वेळ मागितली अन त्यांना भेटले. त्यांना अंध म्हणणे म्हणजे त्यांच्या दिव्यदृष्टीचा अपमानच होय असे जाणवले. त्यांच्या जीवनाच्या प्रखर जाणीवा त्यांच्या अनुभवातून आहेत की चैतन्यमय अनुभूतीतून आहेत हा मला पडलेला मूलभूत प्रश्न! त्यांनी मला भेटीची वेळ दिल्यावर त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख असलेला लेख मला अग्रेषित केला. तो माझ्या या या लेखासोबत अग्रेषित करीत आहे. त्यांनी अंधत्वामुळे आलेल्या अंधाराचे एक भव्य दिव्य प्रकाशज्योतीत रूपांतर कसे केले याचे मला नवल वाटते. लहानसहान अडचणींचा उदो उदो करणारे आपण वास्तविक परिस्थितील आशेच्या प्रकाशाच्या कवडश्याकडे कसे दुर्लक्ष करतो याचे प्रत्यंतर मला या भेटीत प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या सोबत घालवलेला अंदाजे दीड तास त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रकाशलेला होता. आपल्या दिव्य दृष्टीने माझ्याशी आनंदाने संपर्क साधत त्यांनी जणू संपूर्ण वातावरण भरून टाकले होते. ‘असा कुठलाच विषय नाही ज्यावर मी कविता रचली नाही’, हे मला तेव्हा अतिशयोक्तीपूर्ण विधान वाटले, पण भेटीनंतरच्या त्यांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर मला सामील करून घेतल्यावर त्यांच्या कवितांचा जो ओघ सुरु आहे तो मला स्तिमित करून टाकणारा आहे. किंबहुना त्यांच्या संपूर्ण कविता वाचायचे म्हटले तरी आपले वाचन तसेच फास्ट हवे! या कवितांचे विषय विविध तर आहेतच, पण त्यांचे मन इतके संवेदनशील आहे की त्यातून उगम पावलेल्या आत्मानुभूतीच्या तीव्र आवेगातूनच त्यांच्या कविता उत्स्फूर्तपणे जन्मतात असे जाणवते. आपल्याला असलेल्या दृष्टी लाभामुळे आपले मन बऱ्याच ठिकाणी भरकटत असते, मात्र या दिव्यांग व्यक्तीचे मन भावानुभूतीत केंद्रित असते असे मला वाटते, म्हणूनच हा कवितांचा जलौघ सतत त्यांच्या दिव्यांग लेखणीतून प्रसवत असावा!

मंडळी त्यांच्या भेटीदरम्यान अनौपचारिक अन खेळीमेळीचे कौटुंबिक वातावरण अति लोभस होते. त्यांची काळजी घेणारा मुलगा, गोडगोजिरी नात, अन सर्वार्थाने त्यांची ‘पूर्णांगिनी’ शोभेल अशी सहचारिणी रेखा (त्यांची पूर्वाश्रमीची मामेबहीण) हिच्याविषयी मनात इतका आदर निर्माण झाला की, तो शब्दात मांडू शकत नाही. सौ रेखा ही काशिनाथ सरांची भाग्यरेखा म्हणून शोभत होती. रुचकर उपहारासोबत काशिनाथ सरांकडून त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची माहिती देणे आणि जाणून घेणे सुरु होते. त्यांचा घरातील वावर आणि संवाद साधण्याचे कौशल्य बघून आणि ऐकून कुठेही भास होत नव्हता की त्यांना दिव्य चक्षूच मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच मी या महान कवीला नि:संकोचपणे एक कविता ऐकवण्याची विनंती केली. कसलेच आढेवेढे न घेता त्यांनी माझ्या विनंतीला लगेच मान्य करीत एक कविता ऐकवली. त्यासाठी ब्रेल लिपीच्या त्यांच्या संग्रहातून लगोलग स्वतः कविता शोधून, त्यांनी तालासुरात आणि भावपूर्ण स्वरात स्वतःची कविता ऐकवली. मंडळी त्यांच्या कविता अशाच गेय आहेत! महाराष्ट्रातील कैक व्यक्तींनी त्या कवितांना आवाज दिलाय. यू ट्यूब वर त्या उपलब्ध आहेत. सदर कविता होती ‘चैतन्य चक्षू’. अत्यंत प्रेरणादायी अशी ही कविता, तो अनुभव विडिओत रेकॉर्ड करून जपून ठेवलाय. या लेखासोबत सदर व्हिडिओची यू ट्यूब वरील लिंक शेअर करीत आहे. स्वतःचे जीवन समृद्ध असलेल्या या विलक्षण कवीचे कौटुंबिक जीवन देखील सुखमय आहे. मुले आयुष्यात स्थिरस्थावर झालेली, पत्नीची अखंड प्रेमपूर्ण साथ, हे सर्व मला या भेटीत अनुभवास येत होते या प्रेमळ कुटुंबासोबत फोटो काढणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती अन आठवणींचा खजिना देखील!

प्रसिद्ध लेखक विश्वास देशपांडे लिखित रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचे मी हिंदी आणि इंग्रजीत केलेले अनुवाद त्यांना भेट दिले तेव्हा ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मोठया अगत्याने मला भेट दिले. या भेटीतून मी किती अन कशी ऊर्जा घेतली याचा अनुभव शब्दातीत आहे. आयुष्यातील कैक वर्षे मागे गेल्याचा फील आला. जराजराश्या दुःखाने खचून जाणाऱ्या स्वतःच्या जीवनातील क्षण आठवून मनात अपराध बोध देखील जागृत झाला. या उलट दुःखाचे किंवा आपल्यातील न्यूनाचे भांडवल न करता सुखाने जगणाऱ्या या आनंदयात्री व्यक्तीला माझे या जागतिक अपंग दिनी कोटी कोटी प्रणाम! काशिनाथ सरांना अशीच अक्षय ऊर्जा मिळत राहो आणि त्यातून या सरस्वतीपुत्राच्या आधीच पाच कवितासंग्रहांनी समृद्ध असलेल्या साहित्यिक खजिन्यात दर दिवशी नवनवीन माणिक मोत्यांची भर पडो ही आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना!   

धन्यवाद!🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे  प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे. 

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे . त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता. 

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. 

मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना

दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. 

नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले. 

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. 

मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –

जीवनात आला अंधार

तरी सोडणार नाही निर्धार

कविताच देतील मला आधार

आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार 

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. 

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. 

दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. 

मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो ;पण तसाच उठायचो . 

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, ;त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला. 

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले. 

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील  अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. 

‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.

विज्ञानाची संगत आम्हा, हेलन केलर पाठीशी

मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली. 

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही  शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. 

 – क्रमशः भाग पहिला

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print