मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “काला पानी“—- नेटफ्लिक्स वेबसिरीज… ☆ डॉ.माधवी किशोर ठाणेकर ☆

डॉ.माधवी किशोर ठाणेकर

परिचय 

डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर )
M.D.(Homeopathy), M.D.(Alt.medicine), Diploma in panchakarma & reiki,

Dr.Thanekar’s wellness centre इथे गेल्या 18 वर्षांपासून consultant..

“सगळीकडे उपचार करुन कंटाळला असाल तर आमच्याकडे या ” या tagline खाली अनेक असाध्य आजारावर उपचार..

Smile foundation या संस्थेचे vice president म्हणुन कार्यरत..पुणे येथे मतिमंद आणि गतिमंद मुलांची निवासी शाळा सध्या सुरु..

सकाळ कडुन धन्वंतरी पुरस्कार प्रदान..

अनेक मासिकामधून,वर्तमानपत्रातून अनेक लेख,कविता प्रसिद्ध.

? इंद्रधनुष्य ?

☆ “काला पानी“—- नेटफ्लिक्स वेबसिरीज… ☆ डॉ.माधवी किशोर ठाणेकर ☆

अंदमान निकोबार बद्दल महाराष्ट्रीयन लोकांना आकर्षण आहे कारण आपल्या सावरकरांना तिथेच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती..तिथला सेल्युलर जेल,बारी, काळेपाणी ह्या गोष्टी अनेकांना माहिती आहेत..

या series चे नावच ‘काला पानी’ असल्यामुळे याचा संबंध अंदमानशी आहे हे उमगत होतंच..

दिवाळीची मिळालेली सुट्टी आणि त्यातही लेकीबरोबर निवांतपणे वेगळं काहीतरी बघायचं म्हणुन ही series बघायची ठरवली..एखादा एपिसोडच बघायचा असं ठरवून आम्ही दोघी बघायला बसलो खऱ्या पण या series ची पकड एवढी मजबुत बसली की दोन दिवसात सातही एपिसोडस बघितले..

तीन मुख्य पण अशा कितीतरी गोष्टींची जाणीव जसं वय वाढेल तसं आपोआपच आपल्याला होत असते..

१.नशीब किंवा destiny ही एक अद्भुत गोष्ट आहे..

२.आपण सगळे एकमेकांशी कोणत्यातरी अदृश्य धाग्याने जोडलेले असतो.

३.पृथ्वीवर कुठंही रहात असलो तरी आपल्या सगळ्यांचे आयुष्यावर असणारी मालकी ही निसर्गाचीच असते..

 हे परत एकदा अधोरेखित करायचे काम ह्या series मध्ये केले आहे..

अंदमान हा अनेक बेटानी बनलेला भारताच्या main land पासुन दुर असलेला भाग.. पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी.. इथल्या विमानतळावर उतरलेले एक साधेसुधे मध्यमवर्गीय बिहारी कुटुंब -नवरा बायको,तेरा चौदा वर्षाचा मुलगा आणि सहा सात वर्षांची मुलगी..टुरिस्ट गाईड म्हणुन त्यांना मिळालेला चिरंजीवी (चिरू ),त्याचा मित्र आणि ड्राइव्हर,चिरूचे कुटुंब-आई,आजारी वडील आणि निसर्ग प्रेमी अभ्यासक भाऊ,त्याची मैत्रीण ज्योत्स्ना, लेफ्टनंट काद्री, भ्रष्टाचारी SDOP केतन ,मेडिकल ऑफिसर सौदामिनी सिंग,त्यांचे assistant डॉक्टर्स, ATOM या मल्टिनेशनल कंपनी चे अधिकारी,त्यांच्या मुख्य डायरेक्टर ची पत्नी आणि इतर बरेच लोक या सगळ्यांचीच एकत्रितपणे एका संसर्गजन्य जैविक आजाराने कशी ससेहोलपट होते,याची कथा म्हणजे ही series..ORAKA ही मूळ आदिवासी जमात निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी आहे..त्यांच्या जाणीवा या आधुनिक माणसापेक्षाही प्रगल्भ आणि निसर्ग पूरक आहेत आणि त्याच आधारावर या संकटाशी कशा प्रकारे त्यांना मात करता येते,हे यात आहे..

आधुनिक जीवनशैली,तिचा उपभोग घेणे,मज्जा करणे आणि त्यासाठीच वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणे ही गोष्ट साध्य करणारा माणुस योग्य की प्रतिकूल परिस्थितीतही मूल्य शाबीत ठेवून निसर्ग जपणारी माणसे योग्य?माणसाचे माणुसपण हे देण्यात आहे,हिसकावून,ओरबाडून घेण्यात नाही,अंतर्मनातील जाणीवा प्रगल्भ असणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे हेच खरे आयुष्य,अनेकांना वाचवण्यासाठी प्रसंगी एकाचा बळी देणे हे निसर्गाचे तत्व समूहाशी असणारी बांधिलकी दाखवते पण एका व्यक्तीसाठी,तिच्या निव्वळ ऐषारामासाठी जेंव्हा हजारोचे जीव धोक्यात आणले जातात ते निसर्गविरोधी असते आणि म्हणुनच Human नसते..हे यात सांगितले आहे.. याची शिक्षा अनेक लोक भोगतात आणि विनाकारण मरून जातात..

 माणसाचा स्वार्थीपणा आणि निव्वळ स्वतःसाठी जगणे हे कुठल्या थराला पोचु शकते?आयुष्य क्षणभंगूर आहेच पण तरीही ते आहे,जगावेच लागते आणि जेंव्हा अत्यंत विपरीत परिस्थितीत ते टिकवावे लागते तेंव्हा मूळ स्वभाव हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि उरतो तो त्याक्षणी instinct नुसार करायच्या बधीर आणि निर्रढावलेल्या कृती..survival of fittest म्हणजे सद्यस्थितीत नक्की काय?असे अनेक प्रश्न ही series उपस्थित करते आणि आपण फक्त्त एक बाहुले आहोत नशिबाच्या हातचे या जाणीवेने अस्वस्थ होतो..

या series चे screenplay writing, cinematography, acting एकदम best..चिन्मय मांडलेकर,अमेय वाघ,आशुतोष गोवारीकर ही मराठी मंडळी यात आहेत आणि सुंदर अभिनय करतात..मोना सिंग ही माझी आवडती नटी यात आहे पण थोड्या काळासाठीच.. यातला सगळ्यात मोठा ऍक्टर आहे तो निसर्ग आणि तो पुरेपूर acting करतो आणि मनात घुसतो..

thriller entertainment म्हणुन नक्की  बघण्यासारखी ही series आहे,हे नक्की..

© मधुकिशोर (डॉ.माधवी किशोर ठाणेकर)

२२नोव्हेंबर २३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनचाफा ☆ सुश्री मानसी चिटणीस

सुश्री मानसी विजय चिटणीस

परिचय 

ग्रंथसंपदा : * सृजनभान, सांजवर्खी शकुन, माझ्यातील बुद्धाचा शोध हे तीन कवितासंग्रह . उत्सव कथांचा हा प्रातिनिधिक कथा संग्रह प्रकाशित नामांकित मासिकातून लेख प्रकाशित . वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन , तसेच सदर लेखन. विविध विषयांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिचय व रसग्रहण वर्तमान पत्रातून प्रसिद्ध. २० हून अधिक पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन* मराठी सोबतच हिन्दी व इंग्रजी कविता लेखन *In Marathi, बोभाटा या प्रसिद्ध पोर्टल साठी लेखन

सामाजिक : १. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा- कार्यवाह२. महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषद- कार्यकारी विश्वस्त ३. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला आकादमी- मुख्य कार्यवाह ४. यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभाग- सदस्य.

मानसन्मान व पुरस्कार:

१. शब्दधन काव्यमंच यांचा ‘छावा’ पुरस्कार २. नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेत ‘प्रथम’ परितोषिक ३. कोकण म सा प राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत द्वितीय परितोषक प्राप्त; चारूतासागर प्रतिष्ठान यांचे उत्कृष्ट लेख पारितोषक४. सर्वोदय साहित्य पुरस्कार, कोल्हापूर ५. बाल कुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांचा ‘साहित्यसृजन’ पुरस्कार
६. ‘आवाज महाराष्ट्राचा’ या न्यूज चॅनल चा ‘क्रांतीज्योती’ पुरस्कार ७. महाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांचा ‘कालिदास काव्यगौरव पुरस्कार’ ८. ग.दी.मा.प्रतिष्ठान,पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद,भोसरी व कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा ‘ग.दी.मा. साहित्य पुरस्कार ‘ ९. करम प्रतिष्ठान चा ‘करमज्योत’ पुरस्कार १०. डॉ. अशोक शिलवंत काव्यभूषण पुरस्कार.

मराठी चित्रपटासाठी गीतलेखन, चित्रपट कथालेखन व रेडियोसाठी जाहिरात लेखन, विविध कादंबर्‍या, कथासंग्रह, काव्यसंग्रह यांचे शब्दांकन, विविध संस्था,संमेलनात व्याख्याती म्हणून सहभाग,

स्वत:च्या कथांच्या अभिवाचनाचे प्रयोग. कथाकथन, कविता लेखन,अभिवाचन, बालगीते,नाट्यछटा स्पर्धा यात परीक्षक म्हणून सहभाग *’कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच ‘ ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन *विविध शाळांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम

उपक्रम : ‘कवितासखी’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम

? विविधा ?

☆ “मनचाफा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆

संध्याकाळची गडबड चालू होती.. मी आपली स्वयंपाकात मग्न. लौकर स्वयंपाक संपवून मला लिहायला बसायचे होते. मी पोळ्या करता करता त्याला हाक मारली पण रोजच्यासारखी आलो, आलो ची आरोळीही आली नाही की काय गं सारखी हाका मारत असतेस ची भुणभुणही आज नव्हती. कुठे गेला हा असा संध्याकाळचा? असा मी विचार करतानाच

हयाने मागून येवून घट्ट गळामिठी मारली.. मी ओरडले,

 “अरे काय हे !!!दिसत नाही का पोळ्या करतेय.. एवढा मोठा झालास तरी खोड्या काही संपत नाहीत तुझ्या. “

 तो हिरमुसला… पटकन हातातल्या रूमालाची पुरचूंडी त्याने कट्ट्यावर ठेवली आणि गेला… मी लक्षच नाही दिले.. नंतर तो ही अजिबात आला नाही लूडबूड करायला..

जेवायची वेळ झाली तरी नेहमीसारखा भूक म्हणून पण ओरडला नाही.. मीच दोन हाका मारल्या पण एक नाही की दोन नाही. अचानक लक्ष कट्ट्यावरच्या रूमालाकडे गेलं. उघडून पाहिलं तर मला आवडणारी चाफ्याची फूलं होती.. माझी चटकन ट्यूब पेटली आणि लक्षात आलं.. महाराज कुठे गेले होते ते. मी तसाच रूमाल घेवून त्याच्या खोलीत गेले.. खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता.. माझ्या हातातली फुलं बघून मला म्हणाला, ..

“आई… तुला आवडतात ना गं.. म्हणून तेजस च्या बागेतल्या झाडाची तोडून आणलीत.. मी स्वतः चढलो गं वर…. हे बघ ना कित्ती सुंदर आहेत ना… !!”

खरंच नुकतीच उमललेली ती चाफ्याची फुलं खूप सुंदर होती.. आणि त्यांच्या दरवळानं माझेही हात सुगंधीत झाले होते. मी क्षणभर तो सुगंध मनात भरून घेतला.. माझे डोळे भरून आले… त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवतं राहीले काही न बोलता.. सुगंध काय फक्त फुलांनाच येतो? नात्यातला सुगंधही असाच अविट असतो. काही दरवळ फक्त नाकाचीच नाही तर मनाचीही तृप्ती करतात. नात्यांचे दवरळही तसेच असतात काहीसे. निरनिराळ्या भावनांचे, तशाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येक  नात्याचा गंध वेगळा, तसाच दरवळही वेगळा. जे नातं पुन्हा जगावासं वाटतं त्या नात्याचा फ्लेवर आठवायचा आणि अनुभवायचे त्यांचे दरवळ. खासकरून त्यात मायेचा ओलावा मिसळला असेल तर ते तसेच दरवळत राहतात वर्षानुवर्ष..

काही नाती जन्मभर जोडलेली असतात काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतेही नाव न देता.. एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा.

हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो.. त्यातली सहजता तितकीच महत्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते, मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशिमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव.. आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा, शुष्कता.. हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय..

सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही.. मुळात घडवायची हा शब्दही चूकच.. त्यांना त्यांच्या कलेन घडू द्यायचं.. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं.. शान्तपणे सोबत करायची.. अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही… अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण.. मनात विचारांच्या सरी झिरझिरू लागल्या आणि डोळ्यांतून ओघळताना हातातल्या चाफ्याला भिजवू लागल्या.

माझे भरलेले डोळे पाहून त्याचा रुसवा क्षणात छू.. झाला. तो गोंधळला. त्याला कळेना आपली आई का रडतेय?…

“आई.. रडू नको ना गं.. ! काय झालं तुला…. ?तू रागावलीयस का माझ्यावर? अगं काय झालं तुला?” तो विचारत राहीला..

काहीच नाही बोलले.. पण एक मात्र नक्की,      नात्यांतले हे दरवळ नकळत जपताना         आज तो माझी आई झाला होता..

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली !” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली ! ☆ श्री मनोज मेहता 

डोंबिवली जुन्या जमान्यातली,

डोंबिवली गर्द हिरव्या झाडीत लपलेली !

इवलुशा लाल लाल मातीच्या रस्त्यांची ! टुमदार बंगल्यांची, सुंदर,

चिकनी -चिकनी, डोंबिवली !! 

माझी फोटोग्राफी १५ मे १९७२ पासून, माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरु झाली. भावाने सांगितले की इथे जाऊन अमुक अमुक यांना भेट, लग्नाचे इतकेच फोटो काढायचेत. हो, त्या जमान्यात ३६ ते ४८ म्हणजे ३ / ४ रोलची छायाचित्रं, म्हणजे भरपूर मोठा अल्बम. बारा फोटो एका रोल मध्ये. मग माझी स्वारी कॅमेऱ्याची बॅग घेऊन इच्छित स्थळी, म्हणजे त्यांच्या घरी पोचायची. ‘अरे वा वा, ‘ये मनोज ! अगं, मनोज आलाय, आटपा गं लवकर, अशा आरोळीनं माझं स्वागत व्हायचं. कारण त्याकाळी घरी देवाला नमस्कार करताना, हातावर दही देताना, मनांत असेल तर एक समूह फोटो असा शुभकार्याच्या फोटोंचा क्रम असायचा.

नंतर छान कौलारू घराच्या बाहेरील मंडपात किंवा आफळे राम मंदिरात अथवा मोजक्या मंगल कार्यालयात ही कार्य होत असत. सुरूवातीला  गुरुजींच्या पाया पडून, माझा छायाचित्रणाचा प्रवास सुरु व्हायचा.

मी लग्नाचे सर्व ब्राम्हण -विधी अन् जेवणावळींचे फोटो काढून, माझ्या घरी दुपारी १२ पर्यंत परतायचो.

त्यात सीकेपींचं लग्न असेल तर  अर्धा तास अगोदरच घरी ! मग सायंकाळी ६ ते ८ स्वागत समारंभ असायचा. तेव्हा आलेल्या प्रत्येकाला प्रचंड प्रसिद्ध असा गोल्डस्पॉट, व्हॅनिला / तिरंगी / टूटी-फ्रूटी आईस्क्रीम किंवा जॉय आईस्क्रीमचे कप, अशाप्रकारे हे डोंबिवलीतील स्वागत समारंभाला असायचं हं ! नो जेवण भानगड ! आणि या स्वागत समारंभाचे फोटू काढून मी अन नवरा नवरी साडेआठला आपापल्या घरी असायचो बरं !

तर मंडळी सत्तर ते ऐंशीच्या दशकात फोटोग्राफर, गुरुजी, वाजंत्रीवाले व मंगल कार्यालयं यांची संख्या अगदीच तुटपुंजी असायची. आणि मुख्य म्हणजे ज्यांना बोलावलं जायचं ते वेळेच्या आधी हजर असायचे. माझ्या छायाचित्रणाच्या सुरवातीच्या, म्हणजे १९७२ पासूनच्या कार्रकिर्दीत, साखरपुडा, लग्न- समारंभ इ. साठी, श्री. धामणकर, दीक्षित वा भातखंडे गुरुजी असायचे. त्यात प्रामुख्याने मला गुरु म्हणून लाभले ते ‘धामणकर गुरुजी’. मी इतक्या लहान वयात फोटो काढतो, म्हणून कौतुक आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही होतं. शिस्तबद्ध पण शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य ! प्रत्येक विधीचा अर्थ वधू -वरास समजावून, मगच त्यांच्याकडून कृती करून घ्यायचे. त्यात अजून एकाची भर पडली तो म्हणजे मी ! ‘मनोज, आता या विधीचा फोटो काढ. नीट काढ हो, पुन्हा मी फोटो काढायला देणार नाही. ‘ ते अर्थ सांगत असताना, माझंही लक्ष असायचं. धामणकर गुरुजींच्या ‘गुरुकृपेने’ मी  हळूहळू का होईना पण सर्व आवश्यक विधींचे फोटू काढण्यात तरबेज होऊ लागलो होतो.

सुमारे ४८ वर्षांपूर्वीची घडलेली गोष्ट आहे ही ! मला नक्की आठवत नाही १९७५ की ७६, पण डोंबिवली पश्चिमेला नाख्ये यांच्या एव्हरेस्ट मंगल कार्यालयात लग्न होते. त्या मंडळीचं नावही आता लक्षात नाही. कार्यालयाच्या चौफेर फेरी मारून, कुठं क्लोजअप फोटो घेता येतील, याचा मी आधी अंदाज घ्यायचो. मग पुढचा प्रवास सुरु व्हायचा.

तर मंडळी, त्यादिवशी या लग्नकार्यात गुरुजींचा पत्ताच नाही, कुजबुज सुरु झाली. काही मंडळी गुरुजींच्या घरी जाऊन आली, अजून कोण गुरुजी उपलब्ध आहेत का ते ही पाहून झालं. दोन्हीकडची मंडळी चिंतेत ! बरं गंमत म्हणजे, मला याचा काहीच थांगपत्ता नाही. काही वेळाने मी विचारायला गेलो की एवढा का उशीर होतोय, तेव्हा मला हे कारण समजलं. मी भाबडेपणाने विचारलं, ‘ मी करु का विधी ? मला मंत्र येत नाहीत, पण सगळे विधी व्यवस्थित करून घेईन आणि हो, मंगलाष्टका मात्र म्हणा कोणीतरी, हे सांगताच ते उडालेच की ! एकतर मी अर्ध्या चड्डीत फोटो काढायला आलेलो आणि हा एवढासा मुलगा हे काय सांगतोय ?

नंतर कोणीतरी आजोबा आले व त्यांनी माझी नीट चौकशी करून, खात्री करून, होकार दिला.

मग मी सीमांतपूजन करून, मुलीला गौरीहाराजवळ बसून पूजन करायला सांगितलं. नंतर कार्यालयाच्या मुख्य दारात वराकडच्या मंडळींना उभं करून, वधूच्या आईने वराचे पाय धुवून, तिलक लावून ओवाळायला सांगितलं. वधूच्या बाबांनी वराच्या हातात नारळ देऊन त्याला मंडपापाशी आणलं. माझ्या नशिबाने दोघा तिघांनी मंगलाष्टका म्हटल्या. बरोबर मुहूर्तावर, ‘आता वधू-वरांनी एकमेकांना हार घाला, ‘ अशी मी जोरात आरोळी ठोकली, मी दोघांचे फोटो काढले अन् वाजंत्रीही वाजली. ‘वधूवरांना करवल्यांनी ओवाळा हो !’ ते झाल्यानंतर नवरा-नवरीला मी पाटावर बसण्यास सांगितलं. नंतर कन्यादान, सप्तपदी इ. झालं. इतकं सारं, मी फोटो काढत -काढत (आजच्या जमान्यातील 20-20 की. ) पार पाडलं. लक्ष्मीपूजनाला नवऱ्यामुलाला मी विचारलं, ‘तुझ्या बायकोचं नाव काय ?  तेच लिहायचं हं, ताटातल्या तांदुळात !  हे सारे विधी मी प्रत्येक विधीचा फोटो काढून व पुढच्या विधीला काय करायचं ते सांगत, असं एक तासात आटोपलं. आता हे सर्व पाहायला, दर्दी ज्येष्ठांची गर्दी होतीच. सर्व विधी झाल्यावर, त्या ज्येष्ठांपैकी कोणी आजी होत्या, त्यांनी वधुवराला माझ्या पाया पडायला लावलं. ‘अहो, ते नवरा नवरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच त्यांच्या पाया पडतो ! असं मी म्हटल्यावर तुफानी हास्यकल्लोळ झाला !  पण मला काही कळेना, हे माझ्या का पाया पडतायत ? आणि वरती हातात पाकिट देऊन, मला आजींनी जवळ घेऊन माझी पापी घेतली, मला त्यांच्या जवळ बसवून प्रेमानं जेवायला घातलं.

ते पाकिट न उघडता, मी घरी आल्यावर वहिनीच्या हातात दिलं. तिने विचारलं, ‘ काय आहे यात ?’ मी म्हटलं, ‘मला काय माहित ? लग्नात दिलं मला. ‘ तिनं उघडल्यावर कळलं, त्यात २१ रू. होते.

नंतर फोटोचा अल्बम घ्यायला, ती मंडळी घरी आल्यावर, मी केलेले प्रताप भावाला व माझ्या वडिलांना कळले. ‘मनोजनेच आमच्याकडच्या लग्नात सर्व विधी पार पाडले !’ ‌’काहीतरी काय सांगताय ? आम्हाला काही बोलला नाही, ‘ असं म्हणत, भावानी मला हाक मारली. त्यांच्या समोर आल्यावर मी सांगितलं, यांच्याच आजीनं नवरा -नवरीला माझ्या पाया पडायला लावलं !’ हे ऐकताच सगळे खो खो हसायला लागले.

पण त्यादिवशी गुरुजी न आल्यामुळे हे सुंदर लग्न- रामायण घडलं. या प्रसंगातील प्रेमळ आज्जी, नवरा -नवरी, माझी चौकशी करून मला विधी करायला परवानगी देणारे आजोबा अन् सारी मंडळी… आजही हे आठवलं की मला गुदगुल्या झाल्याशिवाय रहात नाहीत.

यानंतर असा प्रसंग कधीही परत माझ्या वाट्याला आला नाही.

हां, कधी बारशाला तर कधी साखरपुड्याला मला समोरून कधीतरी कोणी विचारतं, ‘तुम्हीच सांगा हो मेहताजी, आता पुढे काय ते !’ मग मी त्या त्या प्रसंगी, कोणी काय करायचं ते व्यवस्थित सांगतो.

पण पण मी लग्नात कुण्या मुलीचा भाऊ तर कधी मामाचं पात्र, आयत्यावेळी अजूनही वठवतोय अन् कार्य सुरळीत पार पडतं. ते ही फोटोग्राफी करता करता हं.

हे घडून आलं ते फक्त अन फक्त माझ्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या, गोविंद धामणकर गुरुजींच्या गुरुकृपेमुळेच, अन तेही बाल वयात !

त्यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडते तुमची कलरफुल जनरेशन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मला आवडते तुमची Colourful Generation…. लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

नात : “नानी, तू किती generations बघितल्या ?”

मी : “ मी न……. ५…… बघ हं… माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात… तू…”

नात: ” यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?”

मी : “ तुझी…. “

नात : “ वॉव…. पण का ?”

मी: “ कारण ती सर्वात जास्त colourful आहे. ”

नात: “ म्हणजे कशी ?”

मी : “ म्हणजे असं….. की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता… ‘ घर… घर काम, घरच्यांची सेवा आणि    घरी येणाऱ्यांचे आदरातिथ्य.

मग माझी आई… या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढला…

तो म्हणजे शिक्षणाचा…. आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज… यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.

मग माझी पिढी… माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं…

 नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या… generation colourful होऊ लागली.

मग.. तुझ्या आईची generation………

Technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला…. ‘स्पर्धेचा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला. नवनवीन पाश्चिमात्य रंग डोकावू लागले… जागतिकीकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला…

आणि त्यानंतर…

नात : “ मी….. पण माझीच generation तुला का आवडते ?”

मी: “ कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळून आत्मविश्वासाचा प्रसन्न रंग  लेवून जन्मलेली तुझी पिढी…. technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं… जग तुमच्या बोटांवर नाचतं…

ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं…

समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे….

माझ्या आजीच्या ‘घर आणि संस्कार’  पासून ते…

तुमच्या ‘अवकाश’ या प्रचंड कक्षेतील सगळे ‘सुखद’ रंग जपण्याचा आणि ‘दु:खद’ रंगांशी झुंजण्याचा तुमचा ‘Cool’ रंग मला फार आवडतो……

तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात…

BE BOLD FOR CHANGE….

 व्हा धाडसी…. बदलासाठी… !!!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “

जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला  म्हणाले,

” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक  माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू  काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव  तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी  हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ☆ पाणवठा…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

श्री सुजीत कदम

? क्षण सृजनाचे ?

💦 पाणवठा…! 💦 ☆ श्री सुजीत कदम 

कसं असतं ना आपल्या लेखकांचं..?

काही वेळा खूप लिहायचं असतं.. पण विषय सुचत नाही.एखादा विषय सुचलाचं तर, काय लिहायचं हेच कळत नाही. कथा लिहायची, कविता लिहायची, की ललित लेख..? का आजकाल सर्वांनाच आवडणारी गझल लिहायची..? नक्की काय लिहायचं हेच कळत नाही. हे सारं ठरवत असताना सुचलेला विषय हळूहळू पुसट होत जातो आणि मग आपण पुन्हा नव्याने एखाद्या विषयाच्या शोधत हरवून जातो.. हे सगळं करत असताना सहज हसू येतं ते लहान पणीच्या एका कवितेने

“घड्याळात वाजला एक,

आईने आणला केक

केक खाण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला”

हे असंच काहीसं.. अजूनही होतंय की काय असं वाटतं राहत… दिवस भर विचार करून जेव्हा काहीचं लिहलं जात नाही तेव्हा आपल्यातला लेखक कुठे हरवलाय की काय..? असं वाटू लागतं. हे करता करता, दिवसा मागून दिवस जातात आणि एखाद्या दिवशी काहीच ठरवलं नसताना अगदी सहज भरं भर कागदावर काहीतरी उतरतं.. आणि मग… इतके दिवस ह्या विषयावरुन त्या विषयावर फिरणारं मन, एक वेगळाच विषय घेऊन कागदावर स्थिरावतं. तेव्हा कागदावर उतरलेले शब्द पाहिले ना की मनात येतं.. “

कित्येक दिवस दूर दूर चा प्रवास करून कुठल्याशा गावचे हे पक्षी..

ह्या पांढ-या शुभ्र कागदाच्या पाणवठ्यावर उतरले असावेत..

ह्या पाणवठ्याचा एकांत दूर करण्यासाठी…!

हे पक्षी काही क्षण थांबतील किलबिलाट करतील आणि पुन्हा उडून जातील..

एका नव्या प्रवासाच्या दिशेने…!

एका नव्या पाढं-या शुभ्र पाणवठ्यावर…

मी मात्र पुन्हा एका नव्या विषयाच्या शोधत फिरत राहीन पुढचे कित्येक दिवस वहिचा पांढरा शुभ्र पाणवठा घेऊन… पुन्हा काही नवे पक्षी , पांढ-या शुभ्र पाणवठ्यावर येतील ह्या एकाच आशेवर…!

© श्री सुजित कदम

पुणे

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या आवडीचा जणू एक साचाच असतो. त्या साच्यातून  तो आपल्याला आवडणारं राहणीमान, खानपान, वाचन,गायन,जीवन जगण्याची पद्धत ह्या सारख्या आवडी जपतं असतो. त्यामुळे तो जीवनात स्वतःला आवडणा-या गोष्टींचा आस्वाद घेतो पण हा आस्वाद घेतांना जर कधीतरी अवचट आपल्या आवडीचं वळण बदलून दुसऱ्यांच्या आवडीच्या वाटेवर चालून बघितलं तर ते कधीकधी जास्त पण आवडून जातं. पण असा बदल हा एखादेवेळीच स्विकारला जातो, एरवी आपली स्वतःची आवड,कल हा तसा ठाम असतो.

जबाबदा-या,कर्तव्य उरकंत आल्या की वेध लागतात स्वतः कडे नीट लक्ष देण्याचे, आपल्या आवडीनिवडी जपण्याचे, बरीचशी आवडती कामं,कला,छंद जोपासण्याचे. ह्या आवडीनिवडी,छंद जोपासण्याची पण एक  गंमत आहे.आपण दुसऱ्या ला सहजसहज सल्ले देतो,अमूक एक गोष्ट कर म्हणून आग्रही होतो पण विचार केला तर लक्षात येतं आपण सुचवलेली गोष्ट ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुरुप आहे की नाही ? की आपण आपली मतं त्यावर लादतोय.माझा स्वतःचा पिंड नोकरी करण्याचा ह्या उलट माझ्या बहिणीचा पिंड हा अतिशय उत्कृष्ट, आदर्श अशी गृहीणी होण्याचा.माझ्या बहिणीसारखी सुगरण,टापटिप घर ठेवणारी,अगदी बारीकसारीक सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी, घरच्यांच्या आरोग्याची उत्तम सुश्रुषा करणारी आणि घरच्या अगदी लहानात लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांचा पण भार लिलया पेलू शकणारी स्त्री अभावानेच आढळते.  आणि ही सगळी कामं ती अतिशय आवडीने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे करते. जर अशावेळी मी तिला बाहेर नोकरी करण्याचे सल्ले दिले तर तो तिच्यावर नुसता अन्यायचं होणार नाही तर तिच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा एक प्रकारे अपमानच होईल. थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते,त्यामुळे आवडीनिवडी बदलविण्याच्या चुकीच्या अट्टाहासापेक्षा त्या व्यक्ती मधील गुणांना पुरक कौतुकाची थाप देणं,तिला उत्तेजन देणं ही खरी माणुसकी.

मला स्वतःला विचाराल तर आता नोकरीमुळे असलेल्या अतिशय व्यस्त दिनचर्ये पेक्षा निवृत्ती नंतरचे आयुष्य हे अतिशय शांत, कमी गजबजलेल्या ठिकाणी घालवायला आवडेल, त्यामध्ये माझं वाचनं आणि शांत ठिकाणी भ्रमंती व पर्यटन हे आलचं. प्रवासाचं म्हणाल तर माझ्या बकेटलिस्ट मध्ये सागरीप्रवास याने की क्रुझ वरुन सागराच्या शांत सानिध्यात फेरफटका मारणे,अगदी “मै ओर मेरी तनहाई अक्सर बाते करेंगे”च्या स्टाईलमध्ये “डोंट डिस्टर्ब”चा बोर्ड न लावताही मिळणारा एकांत, बाजूला मंद,अलवार,हळू आवाजात ऐकू येणारे पण ह्रदयाला भिडणारे संगीत, ती अर्थपूर्ण हिंदीमराठी गाणी,स्वतःमध्ये रमुन जाण्याचे क्षण ह्याला मी नक्कीच अग्रक्रम देईन. बघूया आपली बकेटलिस्ट बनवून ठेवायला तरी हरकत नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘कुणी घर देता का घर?’ इथं पासून ‘कुणी घर आवरुन देता का घर’ इथपर्यंत आयुष्याची गाडी घरंगळत आली खरी, पण कशी कधी ते कळलंच नाही. पैसा – नोकरी – घर – पद – प्रतिष्ठा ही स्टेशनं बघता बघता मागे पडली आणि ‘निवृत्ती’ या शेवटच्या स्टेशनवर ती सुसाट धावणारी गाडी कधी ना कधी येऊन थांबणार हे कळत असूनही वळत मात्र नव्हतं… तोपर्यंत सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणं, स्वत: सर्वात पुढे रहाण्याच्या अट्टाहासापायी ठेचकाळणं… धडपडणं… आज हे हवं… उद्या ते हवं… हवं म्हणजे हवंच हा हट्ट… (की हवरटपणा) कधी घट्ट मित्र झाला ते कळलंही नाही.

अखेर त्या शेवटच्या स्टेशनवर येऊन थांबलेल्या गाडीतून बाहेर पडल्यानंतर, आता नेमक्या कुठल्या रस्त्याने जावं हे ठरवण्यातच काही वर्षं सरली… त्यात शरीरही थकलं आणि मनही.  

‘ घरात त्या शेजारच्यांसारखं फर्निचर हवं… अमकी सारखी क्रोकरी हवी… तमकीसारखा फ्रीज हवा… घरातल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज खोली हवी… आणि ओघानेच ती ‘डेकोरेटिव्ह’ हवी…’ या सगळ्या हव्यासापायी किती सामान साठवलं होतं घरात ते आता प्रकर्षाने जाणवायला लागलं… पिल्लं आकाशाचा वेध घेत घरातून उडून गेलेली… आणि आता आम्हीही त्या सामानासारखीच एक अडगळ बनायला लागलेलो…

काय करावं… कितीतरी गोष्टी आता अनावश्यक वाटायला लागल्या होत्या. म्हणजे त्यांची अडगळच वाटायला लागली होती… कमी करायला हवी ती अडगळ. पण कशी?…एकट्याला झेपणारं कामच नव्हतं ते…

किती ठिकाणी… किती जणांना विचारलं… मदत करता का म्हणून… जाहिरातही दिली… पण खात्रीशीर कुणी भेटलंच नाही. मग काय… हे सगळं स्वत:च आवरायला लागणार या विचारानेच हतबल झाल्यासारखं वाटलं… कुठून सुरुवात करावी या विचारात एक दिवस नुसतीच बसून राहिले होते… आणि…

आणि अचानक आणखी एक घर मला कळवळून हाका मारतंय्… माझ्यातलीही अडगळ काढून टाक म्हणून विनवण्या करतंय् असं जाणवायला लागलं… आणि क्षणभरात लख्खकन् ते घर डोळ्यासमोर आलं… हो… ते दुसरं घर… माझ्या मनाचं घर… आणि माझ्याही नकळत क्षणार्धात मी त्या घरात पोहोचले सुध्दा… स्थळकाळाचं भान हरपून गेल्यासारखी… आणि ते घर पहातांना आपोआप डोळे विस्फारले…

बापरे… या मनातल्या मूळच्या सुंदर-नितळ घराला ना भिंती… ना छप्पर… ना दार… ना कड्या कुलुपं…आणि आपोआपच अडगळ साठवायला जागाच जागा… आणि खरोखरच साठलेली प्रचंड अडगळ… नुसती अडगळ नाही… त्यावर घट्ट चिकटलेली गडद जळमटं… कधी कशी साठत गेली ही एवढी अडगळ? आठवायचा प्रयत्न करायला लागले. खरं तर कितीतरी गोड-सुखद आठवणींची प्रसन्न हिरवाईही होतीच की त्या जोडीने. पण या दाट जळमटांनी ती पूर्ण झाकून टाकली होती. एक एक जळमट प्रयत्नपूर्वक झटकायला लागले… आणि… हळूहळू सगळं दिसायला लागलं…

‘‘बाबांनी ताईला मात्र झालरी झालरींचा सुंदर फ्रॉक आणला… आणि मला मात्र हा असा… फुलंबिलं आहेत यावरही… पण रंग कसला? काय तर म्हणे मी कपडे खूप मळवते…” इथूनच सुरूवात… हा विचार एका कोप-यात दडून गेलेला… पण नेमकाच आठवला… आणि झाली सुरूवात… किती-किती गोष्टींची अडगळ होती त्या घरात…

‘ माझी काहीही चूक नसतांना बाईंनी मला शिक्षा केली… आणि चूक करणारी ती दुष्ट मुलगी माझ्याकडे पाहून कुत्सित हसली ’… तिचं हसणं विसरूच शकत नव्हते मी… ते आत्ता असं इथे पुन्हा दिसलं. 

‘ तो मला असं म्हणाला ’… ‘ ती मला विनाकारण असं बोलली ’… ‘ आणि तो काय समजतो स्वत:ला… जगातला काही एकमेव मुलगा नाहीये तो ’… अश्रूंनी माखलेला हा विचार… अश्रू सुकले तरी अजून आहेच की एका कोप-यात…

‘ सासूबाई किती भेदभाव करतात माझ्यात आणि माझ्या जाऊबाईंमध्ये… नणंदेमध्ये ’…. ‘ ‘ यांना ना काही कौतुकच नाहीये माझं… त्या तिच्यासारखी बायको मिळायला हवी होती यांना, मग कळलं असतं…’

…हे असले विचार निरर्थक आहेत हे समजेपर्यंत त्यांची अडगळ फारच साठते आहे मनात हे लक्षातच कसं नाही आलं आपल्या?…’ पण हा विचारही नकळत बारगळला प्रत्येक वेळी… आणि तितक्याच नकळत या अडगळीत दिसेनासा झाला.

… ‘ यांना कशी बाई अशी पटकन् छान नोकरी मिळते?’

… ‘ त्या काल बदलून आलेल्या क्लार्कवर साहेबांचा जास्त भरवसा… आणि आम्ही इथे मरमर काम करतोय्… त्याची दखली नाही?…’

…‘ तिला कसा इतका छान फ्लॅट मिळाला?… आमच्या मेलं नशिबातच नाही…’

…‘ यांना ब-या हव्या तिथे बदल्या मिळतात… आम्ही आपली गाठतोय वर्षानुवर्ष… दोन दोन तास खर्च करायला लावणारी लोकल… सकाळ… संध्याकाळ…’

… बापरे बापरे… आता आपोआप दिसायला लागले अनेक वेगवेगळे स्टँड आणि त्यावर दाटीवाटीने अडकवलेली ही इतकी प्रचंड अडगळ… किती भक्कम असतील हे स्टँड… असूया – मत्सर -द्वेष – हेवेदावे – हाव – असंतुष्टपणा – राग – संताप – गढुळलेले विचार… अस्वस्थता.. अशांतता… अशी आणि आणखी कितीतरी लेबलं लावलेले स्टँड आणि त्यांना लटकलेल्या असंख्य आठवणींची… वेळोवेळी मनात आलेल्या अविचारांची अक्षरश: ‘अडगळ’.

… आणि जाणवलं… रहात्या घरातली अडगळ तशीच ठेवून निरोप घेणं फारसं अवघड नसावं… पण ही मनातल्या घरातली अडगळ स्वच्छ न करता निरोप घेणं, म्हणजे ती तशीच सोबत घेऊन जाणं भाग पडणं… नको नको… रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने आलो होतो… तसंच अगदी तसंच… परत जायला हवं… तेव्हा हात तर रिकामेच असतील आपोआप… पण मन मात्र जाण्याआधी स्वत:च प्रयत्नपूर्वक रिकामं करायला हवं… त्यासाठी कितीही पैसे मोजले तरीही कुणी येणार नाही मदतीला हे प्रकर्षाने जाणवलं, आणि नकळत मनानेच निर्धार केला… त्याहीपेक्षा हिंमत बांधली… कंबरच कसली म्हणा ना… आणि केली तर आहे आता सुरुवात… बघू… प्रयत्न तर चालू आहे मार्ग शोधण्याचा… पण ही मनातली अगम्य आणि मनाइतकीच अथांग पसरलेली अडगळ किती आणि कशी आवरता येणार आहे हे तो परमात्माच जाणे… पण त्याच्या चरणी एकच प्रार्थना आहे… ही अडगळ मनातून पूर्ण काढून टाकून अगदी स्वच्छ-निर्मळ आणि निरपेक्ष मनाने त्याच्याकडे पोहोचेपर्यंत पुरतील एवढे दमदार श्वास मात्र त्याने पुरवावेत… त्याच्याकडून आता एवढीच अपेक्षा आहे.      

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

(निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो !!) — इथून पुढे 

आजचा तिसरा दिवस, बहात्तर तास उलटून गेलेले बाहेरचं जग पाहून. विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले.  हेल्मेटमधे तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिबकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळानं जुजबी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण ..  पण हे असं किती दिवस? हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं, डोळे पेंगुळत असलेले…. 

… तेवढ्यात सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय? आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय सहा इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. ” कैसे हो सब लोग?” बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. “ ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहै है. हमें यहां से निकालो जल्दी.”  आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, “ डरो मत, हम कोशिश कर रहे हैं. जल्दही आप निकल पाओगे. धैर्य रखना, बौखनाग की कृपा से सब बाहर आओगे.” सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बौखनागचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या सहा इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्कीटांचे पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकीटॉकीपेक्षाही स्पष्ट होता. 

नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधंही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या टोकाला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन दोन दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोंडणारी आई  गलबलून हुंदका देत बोलत होती, 

“बबुआ कैसन बा?” कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता, “ ठीक हूं मैय्या, फीकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. ” सर्वांचेच डोळे पाणावले. 

दहाएक दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे अन् खिचडी.  शीख बांधवांनी लंगर चालू केलंय वाटतं. वाहे गुरू त्यांचं भलं करो. रोज चिणल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मधेच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकता. मग इतके दिवस नेहेमी सोबतीला असणारे, एकमेकांचेच चेहरे पाहून कंटाळलेलो, एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला. इंजिनीयर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू, त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनीयर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागवून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून, दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं, तरीही पण ढकलत होतो.  सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडे नव्हते.  मग काहींनी दगडावर रेघोट्या ओढून चल्लस खेळायला सुरुवात केली.  काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले, बोगद्याच्या भिंतीवरच स्टम्प्स उगवले. एकाने चार पाच गोल दगड  एका पाठोपाठ वर फेकत जगलर्स स्कील ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं? सारखं तेच तेच कानी यायला लागलं, आमार शोनार बांग्ला आणि बाऊल गीति, काय काय ते. सगळ्यांचे कान किटले.  फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली मग त्याचाही वीट आला.  

कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याच्या भिंती खायला उठतात की काय? वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली.  कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी चार पाच तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही कानी यायचं. मशिन बिघडलं, बंद पडलं. अडकून पडलं. दोन दिवस अधिक लागतील.  ऐकून ऐकून कान विटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मधेच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. 

थोडक्यावर अडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीय. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनीयर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सीम सीम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पहात होते. काहीही करत नसले तरी सगळे दमूनभागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन् काही पडल्याचा आवाज आला, पाठोपाठ खणन् खणन्  व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला.  तो आवाज पहिल्यांदाच मंजुळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप सरकत आत आला.  त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो !! तो आवाज बोगदाभर घुमला. धुळीने माखलेल्या चेहेऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बौखनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली.  शेवटी एकदाचे गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्श ! एक दुःस्वप्न विरलं !! 

– समाप्त – 

© डॉ. जयंत गुजराती

२९/११/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print