मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अजाण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ अजाण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दूर कशाला शोधती वेड्या

पुढ्यात तुझ्या देव आहे

गर्व नको करु स्वतःवर

अजूनी जन्मात वाव आहे.

*

पाप अनंत करुनी म्हणे

तु श्रीमंतीतही राव आहे

उगी साहुकारी मिरवीतो

दैवापुढे का तो भाव आहे.

*

हौस पुरवितो खास खास

सृष्टिचा हिरावून तो घास

देहाचा महाल मिथ्या सारा

श्वासावर का मज्जाव आहे.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सद् भाव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ सद् भाव सुश्री नीलांबरी शिर्के 

तुमचा देव

आमचा देव

अस काही

नसत राव

देव मानतो

त्याच्या मनी

सदाच असतो

सद्भाव

 

कोणी राम राम

कोणी म्हणे राधे श्याम

कोणी म्हणत नारायण

कोणा मुखी भोलेराम

जय गुरूदेव म्हणूनी

त्री देवांना भजती कोणी

व्यंकटेशा म्हणत म्हणत

लोटांगण कुणी घालती

नाव वेगवेगळाली पण

मनात एकच भक्तिभाव

विठ्ठल म्हणा पांडुरंग म्हणा

वसतो तेथे एकच भाव

 🌹

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वैरी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वैरी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केतकी अगदी बेचैन होती. मुद्दाम सगळ्यांचा विरोध पत्करून हौसेने तिने शहरातल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला खरा, पण या सगळ्या मॉडर्न जगात आपला निभाव लागेल का, असं वाटून तिला दडपण आलं फार. खेडजवळ असलेल्या अगदी दहा हजाराची वस्ती असलेल्या खेड्यातून केतकी एकदम शहरात पोचली. आत्तापर्यंत तिचं जग किती सीमित होतं. आजी आजोबा, आई बाबा आणि धाकटा भाऊ कुणाल.

शाळेत अभ्यासात चांगली होती केतकी. अगदी स्कॉलर नाही पण अभ्यासू आणि नाकासमोर बघून चालणारी. केतकीच्या घरची पिढीजात श्रीमंती होती. कित्ती मोठी शेतीवाडी, बागायती गावात आणखी दोन मोठे वाडे. त्यांच्या बांधाला बांध लागून पोतदार काकांचीही शेती घर सगळं होतं. पोतदार सुद्धा कर्वे लोक इतकेच श्रीमंत, जमीनदार आणि प्रतिष्ठित होते. , पण पूर्वी काय घडलं कोणाला माहीत नाही पण या दोन कुटुंबातून विस्तव जात नसे.

— — कर्वे लोकांचं म्हणणं की पोतदारांच्या मागच्या पिढीत खोट्या सह्या करून, लबाड्या करून कर्व्यांच्या जमिनी लुबाडल्या. पैसे चारून सातबारा आपल्या नावावर करून घेतले. कोर्टात कर्वे पोतदारांविरुद्ध केस हरले. मग तर काय, हे वैर कायमचं वाढतच गेलं. कर्व्यांनी आपल्या दोन घरांच्या मध्ये मोठी भिंत बांधून घेतली. , जेणेकरून पोतदारांचे तोंडही बघायला लागू नये.

पोतदारांना दोन मुलगे होते. एक खूप शिकून शहरात स्थायिकच झाला होता. दुसरा असेल केतकी एवढा.

कर्वे कुटुंब आणि पोतदार एकमेकांच्या कोणत्याच भानगडीत पडत नसत की चौकश्या करत नसत. बिचाऱ्या बायकांची मात्र यात फार घुसमट होत असे. , त्यांना एकमेकांशी बोलावेसे वाटे, पण पुरुष लोकांचा दराराच असा होता की कोणी त्यांच्या विरुद्ध जायला धजत नसे.

केतकी शहरात कॉलेजला गेली. नवीन नवीन अगदी बुजरी असलेली केतकी आता या शहरी जीवनाला रुळायला लागली. फार आवडायचं तिला हे मोकळं वातावरण. केतकी आता पक्की शहरी झाली. सुट्टी पडली की केतकी गावाकडे जात असे. नाही म्हटलं तरी तिचं जन्मगाव होतं ते. तिला ओढ होतीच गावाकडची. पण थोड्याच दिवसात तिला तिच्या होस्टेलच्या आठवण यायची. त्या मैत्रिणी, कॉलेज, तिकडचे मोकळे वातावरण अगदी हवंहवंसं वाटे तिला.

केतकी आता शेवटच्या वर्षाला होती. डिग्री नंतर तिने एम ए करायचे ठरवले होते. त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी केतकीला बोलवायला आल्या.

” केतकी. , आम्ही सगळ्या या शीतल च्या फार्म हाऊस वर दोन दिवस जाणार आहोत. येतेस का? चल ना. मग एकदा हे वर्ष संपलं की कधी कोणाला भेटणार ग आपण? चल की. शीतलच्या बाबांचे फार्महाऊस जवळच आहे दोन तास अंतरावर. चल चल. आपण सात आठ जणी आहोत ”.

केतकीला त्यांचं मन मोडवेना. अगदी उत्साहाने त्या सगळ्या गाड्या करून रमत गमत शीतलच्या फार्म हाऊसवर पोचल्या. खूपच सुंदर होते त्यांचे फार्म हाऊस.

शीतलच्या आईबाबांनी प्रेमाने सगळ्या मुलीचं स्वागत केलं. खाण्या पिण्याची नुसती रेलचेल उडवून दिली त्यांनी. मुली मनसोक्त हिंडल्या, बागेत रमल्या. जवळच तळं होतं तिथे पाण्यात पाय बुडवून बसल्या..

शीतलच्या आई म्हणाल्या, ”बरं झालं ग तुम्ही सगळ्या आलात. आता डिग्री नंतर कोण कुठे जाल सांगता येत नाही. “

त्या दिवशी मुली फिरायला गेल्या आणि येताना अंधार पडल्याचे भान राहिले नाही त्यांना. झपझप चालत येत असताना केतकी एका मोठ्या दगडाला अडखळून जोरात पडली.

आई ग असं तिचं विव्हळणं ऐकून सगळ्या थांबल्या.

“काय झालं केतकी? ”अग बघ ना शीतल. पाय अडखळून पडलेच मी. थांब. मला हात द्या. मी तुम्हाला धरून धरून येते घरापर्यंत. ” केतकीचा पाय भप्प सुजला होता. कळ तिच्या मस्तकात जात होती. त्या वेदना सहन करत ती कशीबशी घरापर्यंत आली.

शीतलच्या आईने बघितलं आणि म्हणाल्या बाई ग! केवढा सुजलाय हा पाय. इथे तर आता डॉक्टर पण नसतात ग. थांब. मी लेप लावून देते. केतकीने तिच्या जवळची पेन किलर गोळी घेतली. दुसऱ्याच दिवशी सगळ्या परत शहरात जाणार होत्याच. रात्रभर केतकीला असह्य वेदना होत होत्या. कधी एकदा शहरात जाऊन डॉक्टरला दाखवते असं झालं तिला. पोचल्यावर तिची मैत्रीण स्नेहा म्हणाली “, केतकी खूप सुजलाय ग पाय. इथून जवळ एक चांगलं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. मी रिक्षा आणते. आपण जाऊया तिकडे.”

केतकीने मान डोलावली. स्नेहा रिक्षा घेऊन आली आणि दोघीही त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या.

थोड्याच वेळात तिला आत नेलं आणि सगळे सोपस्कार झाले.

बाहेर येऊन डॉ. स्नेहाला म्हणाले, ”तुमच्या मिस केतकीना घोट्याजवळ आणि पावलाजवळ दोन फ्रॅक्चर्स आहेत. त्यांना प्लास्टर घालावे लागेल. तुम्ही त्यांचं हॉस्टेल वर मॅनेज कसं करणार? त्या पेक्षा त्यांना आठ दिवस आमच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तर चालेल का? मग नंतर तुम्ही काय करायचं ते ठरवा. ”

स्नेहा आणि केतकी बरं म्हणाल्या. अशा स्थितीत ती गावाला तरी कशी जाणार होती?

केतकीला प्लास्टर घातले. तिने गावी फोन करून सगळं सांगितलं. आई बाबा आजोबा घाबरून गेले.

“आई तू मुळीच काळजी करूनकोस. मग आठ दिवसांनी तुम्ही आपली गाडी घेऊन याआणि मला घेऊन जा. तोपर्यंत माझं दुखणंही बरंच बरं होईल. ”

डॉक्टरांशी बाबा बोलले आणि त्यांनाही ते पटलं. त्या असह्य वेदना जरा कमी झाल्यावर केतकीला जगाचे भान आले. प्रथमच आज डॉक्टर सकाळच्या राऊंडला आल्यावर ती त्यांच्याशी छान बोलली. त्यांच्या एप्रन वरची नेमप्लेट बघितली तिनं. डॉ. निखिल असं नाव होतं. किती छान रुबाबदार डॉक्टर होता तो. तरुण आणि अगदी हसरा.

“काय मग? बरं वाटतंय का? जेवण आवडतंय का इथलं? ” त्यांनी हसून विचारलं.

“काय लाजवताय सर. माझी घरच्यासारखी काळजी घेतात अहो तुमच्या आया आणि सगळे तुम्ही. ” केतकीच्या डोळ्यात पाणी आलं.

चारच दिवसात केतकीला खूप बरं वाटायला लागलं.

तिचं प्लास्टर आता तीन आठवडे रहाणार होतं.

 ” डॉक्टर, मी घरी जाऊ का? माझे आईबाबा कार घेऊन मला न्यायला येतील, तुम्ही परवानगी दिलीत तर. मग आम्ही तुम्ही सांगाल तेव्हा प्लास्टर काढायला येऊ” केतकी म्हणाली.

डॉक्टर म्हणाले, ” हो पण नीट औषधे आणि काळजीही घ्या ”

केतकीचे आईवडील दुसऱ्याच दिवशी आले. तिचे आईवडील डॉक्टर निखिल ना भेटले. त्यांचे शतशः आभार मानत हॉस्पिटलचे बिल भरून केतकीला घरी घेऊन गेले. केतकीने जाताना बरोबर खूप पुस्तकं घेतली. आता निदान तीन आठवडे तिला फक्त काठी घेऊन घरातल्या घरात चालायचं होतं. केतकी दुपारी पुस्तक वाचायला लागली की तिचं मन लागत नसे वाचनात.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखाची आकाशा गवसणी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुखाची आकाशा गवसणी… ? श्री आशिष  बिवलकर ☆

बालपणीचा काळ सुखाचा,

हलक्या फुलक्या आठवणी |

मौज मजा धमाल मस्ती सारी,

सुखाची आकाशाला गवसणी |

*

आभाळ ही वाटलं ठेंगण तेव्हा,

सुंदर स्वप्नांची उंच उंच भरारी |

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद,

नव्हती कसलीच दुनियादारी |

*

काळ्या मातीत मुक्त बांगडणे,

मोकळ्या मैदानावरचे खेळ |

माळरानाची बिनधास्त सफर,

मित्रमंडळींसाठी भरपूर वेळ |

*

कैऱ्या चिंच पेरू रानमेवा,

रोज चालायची मेजवानी |

पंचतारांकीतच होत जगणं,

ऐट सारी होती राजावानी |

*

अंगावर फाटका कपडा तरी,

नव्हती परिस्थितीची लाज |

मर्यादित साधन सामुगीत,

संस्कारांनी चढवला साज |

*

दुर्मिळ होत चाललय आता सर्व,

जीवघेण्या स्पर्धेत बालकांची उडी |

हिरावून घेतलं जातंय बालपण त्यांचं,

माफ कशी करेल तुम्हां आताची पिढी?

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 273 ☆ मैत्रीण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 273 ?

☆ मैत्रीण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

शाळेतली मैत्रीण,

प्रवासात भेटली,

ओळखीचं हसून

शेजारी बसली,

कितीतरी दिवसांनी

भेटलो अशा आम्ही,

शाळेतल्या आठवणींची,

केली मग उजळणी,

“कुठे असतेस, काय करतेस,

सांग तरी आता,

बदललेलं नाव आणि

सांग तुझा पत्ता”

“मी ही तिच आहे

आणि तू ही तिच की,

आठवणींच्या बागेतली

फुलं वेच की,

सगळेच बदल आयुष्यातले

चांगले असत नाहीत,

बदललेल्या नावाला,

मी ‘ओ’ देत नाही,

जमेल तसा संसार करते,

सांभाळते चूल,

कधीतरी झटकते,

आयुष्यावरची धूळ”

एवढं बोलून झाल्यावर,

तिचा थांबा आला,

हसतच तिनं मग—-

माझा निरोप घेतला,

नाही दिला पत्ता,

नाही सांगितलं नाव—

जाता जाता तिनं घेतला,

काळजाचा ठाव!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिला पाऊस – पहिली सर… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पहिला पाऊस – पहिली सर ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पहिला पाऊस, पहिली सर,

अलगद धरी, जलाची धार!

कोरत जाई तीच मनावर,

 नक्षी नाजूक ती अलवार!

*

पहिला पाऊस, पहिली सर,

 आठवणींसह मनात शिरते!

भिजवून चिंब चिंब करते,

 मन ओलेते करून जाते!

*

 पहिला पाऊस, पहिली सर,

 घेऊन येई वाऱ्याची साथ!

 झुळूक मिळता त्याची सुंदर,

 घेऊ आपण हाती हात!

*

 पहिला पाऊस, पहिली सर,

 उलगडते भूवर सरसर!

साजरा मोहक मोती सर,

 भोवताल हा करी धूसर!

*

 पहिला पाऊस, पहिली सर,

 आठव देई पहिल्या प्रेमाचा!

गहिऱ्या, कोमल, मृदू स्मृतींचा,

 क्षण असे तो आनंदाचा!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सांगे अशिक्षित माय…’ – कवी : श्री किसान वराडे ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सांगे अशिक्षित माय…’ – कवी : श्री किसान वराडे ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर 

दिवस उगवता शेताचा रस्ता धरी

मावळतीलाच माय परते घरी ।।

 *

बाप वावरात रात्रंदिवस राबे

पक्षी कीटकांचाही वाटा राखे

भूतदया तो जपे सदा अंतरी ।।

 *

मायबाप कष्टती भुरीत दिवसभर

तरी कुणा न मिळे खायला पोटभर

असून उपाशी जनांंचे उदर भरी ।।

 *

कठोर श्रमूनही बारीमास हाल

सरे हंगाम, न उरे खळ्यात माल

सावकार ठेवी हातावर तुरी ।।

 *

कोणती यात्रा? न कधी गावजत्रा

रानात कामे मागोमाग सतरा…

शेतात राम अन् गोठ्यातच हरी ।।

 *

फाटकेच धोतर, सदऱ्यास टाके

सग्या- सोयऱ्यात दारिद्र्य झाके

विरळ लुुगडे आई दांडे करी ।।

 *

आठव होता चुकती आत ठोके

खोल विहिरीवर बाप मोट हाके

माय आमची होत असे बारकरी ।।

 *

कधी आलाच मानगीचा घाला…

रामबाण औषध मग झाडपाला!

सर्दीवर उपाय ओव्याची धुरी ।।

 *

नव्हते सवंगडी… नाते न उरले…

दारिद्र्यातच मम लहानपण सरले

न देऊ गेली स्वप्नी काही परी ।।

 *

कसे असते हो रम्य ते बालपण?

मला न भावले चुकून एकदापण

कधी न पडली ताटात शिरापुरी ।।

 *

सांगे अशिक्षित माय एक गोठ…

कोरडीत ना भरेल तुमचे पोट

शिका तुम्ही, गाव सोडा, जा शहरी।।

☆ 

कवी : श्री. किसन वराडे

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #287 ☆ देव काळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 287 ?

☆ देव काळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कौतुकाचा होत गेला पावसाळा

मी स्वतःला वाटतो आहे निराळा

*

धन्य झाले अमृताने नाहले मी

जन्म पोटी घेतला तू आज बाळा

*

पाय दिसती हे तुझे मज पाळण्यातच

पाळण्यातच पाहते मी नेक चाळा

*

का विदेशी श्वान हे दारात असता

उच्चभ्रू वस्तीत आला हा गबाळा

*

बायको का पाहिजे ही फक्त गोरी

हा तुम्हाला चालतो जर देव काळा

*

कावळ्यांनी फार येथे प्रश्न केले

चालली आहे इथे का कार्यशाळा?

*

पाखरे चोचीत घालुन चोच बसली

माणसे म्हणतात का संसर्ग टाळा

*

हे तुझे पाणी कसे झाले सुगंधी

त्यात तर तू घातला नव्हतास वाळा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन हेची कारण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ मन हेची कारण ☆ श्रीशैल चौगुले ☆

कुठे सोडू मनाला

अंत जीवा लागेना

जाई तेथे सांगाती

खंत खरी सांगेना.

*

कधी दिशा पूर्वेची

कधी पळे उत्तरी

अशास्वत चंचली

क्षणो-क्षणी मंथरी.

*

मनो-मनी मनची

ठाम नसे जीवना

दृढ जरी निर्धार

मागे त्याचे भावना.

*

आवरे ना सारथ्या

अश्व धाव मनाचे

कृष्ण सांगे कौंतेया

 दोर संयमी रुचे.

*

मनाविन निरर्थ

समयाचा निर्णय

मनरथ सावरे

तोची खरा विजय.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मंजुघोषाचे सांगणे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ मंजुघोषाचे सांगणे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

धर्म अमुचा गर्व आहे भारताला

भूषणावह तोच आहे या जगाला

*

तू जगावे अन जगू द्यावे दुजांना

मारणे का रे हिताचे का कुणाला

*

ज्या दुधावर पोसलेला मायच्या या

अस्तनी मधला निखारा तू निघाला

*

दाखवी तू प्रेम खोटे भूल पडली

लागलो माशा प्रमाणे मी गळाला

*

पारधी आडून जाळे टाकणारा

हा शिकारी हा कधीही ना कळाला

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares