मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्ही वाचनवेड्या ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

साधारण एक वर्षापूर्वी माझी भाची सौ मेधा सहस्रबुद्धे, जी स्वतः उत्तम शिक्षिका आहे, तिने कल्पना मांडली की आपल्याकडे इतकी छान छान पुस्तके आहेत, तर आपण ती एकत्रितपणे वाचूया का? 

माझी नणंद विमल माटेने ती कल्पना उचलून धरली.

माझ्या पतिराजांना पुस्तक म्हणजे जीव की प्राण  .त्यामुळे घरात कपड्याच्या कपाटापेक्षा पुस्तकाची कपाटे मोठी. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने ही त्यांना खरी आदरांजली, असेही वाटून गेले आणि मग एके दिवशी आम्ही एक ग्रुप फॉर्म केला त्याला नाव दिले” संवादिनी “.

माझी मोठी नणंद म्हणजे मेधाची आई सुध्धा लगेच आमच्या ग्रुपला जॉईन झाल्या.

मग आम्ही पहिले पुस्तक गुगलमीट वरून  सुधा मूर्तींचे ‘ wise  and otherwise ‘ वाचायला सुरू केले. वाचनाबरोबर रोज त्यावर चर्चा करता करता आमच्यासारखे पुस्तक वेडे एक एक करून ग्रुप ला जॉईन झाले. पहिल्या दिवशी आम्ही चौघी आणि मृदुला अभंग आणि मंजिरी अदवंत  आल्या.

‘समानशीले व्यसनेषु सख्यं ’ ह्या उक्तीप्रमाणे हळूहळू आमचा ग्रुप खूप मोठा झाला. आमच्या ग्रुप मध्ये ८६ वर्षापासून  पन्नाशीच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या  सर्वजणी तितकाच इंटरेस्ट घेऊन ऐकतात आणि वाचतात. एका सदस्याचे ९२ वर्षाचे वडीलसुद्धा  खूप आवडीने सहभागी झाले होते  तिच्याकडे होते त्यावेळेस.

गुगलमीटमुळे एकाच वेळी पुणे, सांगली, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इथल्या सगळ्या एकत्र वाचन करतो. एक मैत्रीण परदेशी आहे, पण तीही जमेल तसे जॉईन होते.

हा उपक्रम जवळ जवळ एक वर्ष चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही २५ पुस्तके वाचली आहेत .ह्याच वाचन कट्टयावर सावरकरांचे जीवन ह्याचे सार्थ चित्रण डोळ्यासमोर उभे करणाऱ्या मुग्धा पंडितना ऐकायला मिळाले. बनारसला जाऊन शिवतांडव म्हणून आलेल्या वैजयंती आसलेकर- कडून अस्खलितपणे तितक्याच ताकदीने म्हटलेले शिवतांडव ऐकायला मिळाले. करोनामुळे प्रत्यक्ष एकत्र येणे मागील काळात शक्य नव्हते. पण आम्ही इ-कोजागिरी साजरी केली. प्रत्येक सदस्याला त्यात भाग घेता आला आणि काहीतरी सादर करायला मिळाले. सूत्र संचालन सुद्धा ऑफ लाईन प्रोग्रामसारखे झाले. असा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म खूप काही देऊन गेला. कोरोनाने आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले.

आजकाल आपण म्हणतो की मुलांना वाचनाची गोडी नाही. मराठी भाषा ही त्यांना अगम्य.  पण तितकी चांगली पुस्तके एकत्र येऊन वाचली तर मुलंही लक्ष देवून ऐकतात हे आमच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांच्यासाठीही  एक दिवस मराठी भाषेतील हा खजिना त्यांच्या पुढे उघडावा असे आम्ही ठरवले आहे.

आत्तापर्यंत वाचलेली पुस्तकं फक्त मराठी अशी नव्हती. सर्व भाषांमधील भाषांतरित केलेली पुस्तकेही वाचली . तसेच ‘ महामुनी व्यास ‘ हे हिंदीमधले पुस्तकही तितक्याच कौतुकाने वाचले. आमच्या मामी सौ.उज्वला केळकरही आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत. त्या स्वतः ही उत्तम लेखिका आहेत, आणि त्यांची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण त्याही वाचनात समरस होतात.

अतिशय समृद्ध अशी आपली भाषा आता  टीव्ही मोबाईल संस्कृतीमुळे पुस्तकांपुरतीच सीमित राहिली आहे. अर्थात डीजीटलाइझेशनमुळेच एकत्र वाचनाचा आनंद घेता येतो. पण ती लपलेली संपदा अश्या व्यासपीठांवर ठळक पणे उपलब्ध झाली. आम्ही सगळ्या मैत्रिणी चातकासारखी वाचनाची वाट पाहतो आणि आमची पुस्तकाची तहान भागवतो. आमच्या एक सदस्या सौ मृदुला अभंग हिने सर्व वाचलेल्या पुस्तकांची यादी लेखकांच्या नावासहीत ग्रुपवरती पाठवली आहे.

असा आहे आमचा वाचन ग्रुप “ संवादिनी “, जो सतत नवनवीन  प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकींशी संवाद साधतो.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]

विचार–पुष्प – भाग १ – ध्येय

जीवनात, आपली प्रत्येकाचीच काहींना काही ध्येये असतात.म्हणजे स्वप्नच म्हणाना. आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याला उत्तुंग यश मिळावं. आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी व्हावा.आणखी बरच काही. मग त्याप्रमाणे आपण प्रयत्नांची शिकस्त ही करत असतो. कोणाचं मार्गदर्शन घेत असतो. सल्ला घेत असतो. एखादी व्यक्ती पण आपल्याला प्रेरणा देणारी असते.त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते.आणि आपण पुढे जात असतो. आपल्या जीवनात एखादा आदर्श आपल्यासमोर असेल तर आपले ठरवलेले ध्येय  लवकर साध्य करता येते.

स्वामी विवेकानंदांच्या मते, एखाद्याच्या समोर आदर्श असेल तर तो मनुष्य एखादीच चुक करेल, पण जर समोर आदर्शच नसेल तर तो मनुष्य मात्र, अगणित चुका करेल.म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे महत्वाचे आहे असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात, “युवकांनी उदात्त ध्येये ठेवली पाहिजेत, ती साध्य  होईपर्यन्त त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रगतिच्या वाटेवर त्यांचे पाऊल सतत पुढेच पडले पाहिजे.यश प्रयत्नपूर्वक खेचून आणले पाहिजे”. त्यासाठी त्यांच्यात हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. ती असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेले यश, मान सन्मान, कीर्ती नक्कीच प्राप्त होईल. अपयशाला सामोरं जाऊन ते यशामध्ये बदलविण्याचे धाडस आपल्यात हवं. मग आपले भाग्य आपल्याच हातात हे अनुभवायचे असेल तर आत्मनिर्भर व्हायला  हवे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भांड्यांवरची कोरलेली नावं ☆ सुश्री शुभा गोखले

?  मनमंजुषेतून ?

☆ भांड्यांवरची कोरलेली नावं ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

लहानपणी पुण्यातल्या  घरांमधल्या  भांड्यांवर खिळ्याने ठोकून नावं घातलेली असत. प्रत्येक तांब्या-पितळेच्या आणि नंतर स्टीलच्या सुद्धा भांड्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तीचं  नाव (मालक म्हणून असावं बहुदा !) तारीख आणि गावाच्या नावासह वळणदार अक्षरात कोरलेलं असायचं. जर एखाद्या समारंभात ते भांडं दिलं असेल तर ” चि. सौ. का. xxx च्या विवाहाप्रित्यर्थ किंवा चि. XYZ च्या मौजीबंधन समारंभ प्रित्यर्थ– ABC कुटुंबाकडून सप्रेम भेट ” असं तारखेनिशी लिहिलेलं असायचं ! 

असं नाव कोरून देणारा  माणूस माझ्या दृष्टीनी भांड्यांच्या दुकानातला सगळ्यात इंटरेस्टिंग माणूस असायचा ! तुळशीबागेच्या समोर जराशा उजव्या हाताला असणाऱ्या  “पंड्याच्या” भांड्यांच्या दुकानात आईची खरेदी सुरु झाली, की माझा मोर्चा तिथे शेजारीच असलेल्या देवळाच्या पायरीवर बसून, भांड्यांवर कोरून  नावं घालणाऱ्या काकांकडे  वळलेला असायचा—-आणि त्यांचं एकाग्रपणे चाललेलं ते काम मीही मन लावून बघत बसायची. 

एका संथ तालात, किंवा लयीत म्हणूया,  साध्या खिळ्याच्या साह्याने ठोकत ठोकत, गिऱ्हाईकाने कागदावर लिहून दिलेली  मराठी किंवा इंग्रजी अक्षरं अगदी वळणदार पद्धतीने उतरवणारे ते हात एखाद्या शिल्पकारासारखे वाटायचे मला— आता कुठे गेले ते हात ? काही दिवसांनी नावं घालायच्या मशीनचा उदय झाला, आणि ही परंपरागत कला लोपच पावायला लागली— बघता बघता लोप पावली सुद्धा  !!

पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, की मशीननी घातलेली नावं पुसूनही जातात , पण ठोकून कोरलेली नावं  ५०-६० वर्षांनंतरसुद्धा अजूनही भांड्यांवर टिकून आहेत !!!

– सुश्री शुभा गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

कै रामदास कामत

(18 फेब्रुअरी 1931 – 8 जानेवारी 2022)

नुकतेच ८जानेवारी २०२२ रोजी आघाडीचे गायक,संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली.एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला. रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे देवाघरचे ज्ञात कुणाला हे मत्स्यगंधा नाटकातले पद! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर.अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील नको विसरू संकेत मीलनाचा हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर चिरंजीव राहो जगी नाम, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, तम निशेचा सरला आणि प्रेम वरदानही ययाती आणि देवयानी या नाटकांतील ही गाणी खास त्यांचीच आहेत.

नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते,भावगीते,स्तोत्रे गायिली आहेत.

१८ फेब्रुअरी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड.त्यांचे वडील बंधूही गायक होते.तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू.पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.

मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे,जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते.

वयाच्या सातव्या वर्षी,१९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते,वास्तविक हे गद्य नाटक,परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती.पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

एकच प्याला~रामलाल

मानापमान~धैर्यधर

मृच्छकटिक~चारूदत्त

सौभद्र~अर्जून,कृष्ण,नारद.

मात्र मत्स्यगंधापराशर,धन्य तू गायनी कळातानसेन,मदनाची मंजिरीसारंगधर, व ययाती आणि देवयानीकच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००९ मध्ये बीड येथे झालेल्या ८९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच २००८च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली!

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक   उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ”  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?”  हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”

उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–

—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .

खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा  व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ”  हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ”  हे महत्वाचे आहे—-

विचार जरूर करा—

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

ओम स्थापकायच धर्मस्य हिंदूधर्म स्वरूपिणे/

अवतार वरिष्ठाय  सावरकराय ते नमः //

विनायक दामो दर सावरकर या विनायक  नावाप्रमाणेच ते बुद्धी मान, मेधावान, प्रद्न्यावान असेच होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती  नसानसात भिजलेली होती. त्यांच्या आयुष्यात त्यांना काही सहकारीही एकाच मताचे, एकाच विचाराचे असे भेटले होते. अनेक सहकार्यांपैकी, नेताजी सुभाषचंद्र बोस उर्फ सुभाषबाबू यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोघेही अभिजात देशभक्त आणि निष्ठावान होते.

सावरकरांचा जन्म सन अठराशे 83 मध्ये आणि सुभाषबाबूंचा जन्म अठराशे 97 मध्ये. इंग्लंडमध्ये जाऊन, सावरकर बॅरिस्टर झाले आणि सुभाषबाबू आय.सी.एस .झाले. पण देशस्वातंत्र्याच व्रत मात्र दोघांचं एकच. 1921 च्या मार्चमध्ये सावरकर अंदमानातून हिंदुस्थानात आले. आणि त्याच जुलैमध्ये सनदी नोकरीवर लाथ मारून सुभाषबाबू मायदेशी परतले. आणि ते सशस्त्र लढ्यावर भर असणाऱ्या, चित्तरंजन दास यांच्या मार्गाने गेले. 1924 ते 1937 सावरकर रत्‍नागिरीत स्थानबद्ध  होते. 1925 – 1926 ला सुभाषबाबू मंडालेच्या कारागृहात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या (युरोपातील).  आणि तेथील राजकीय नेत्यांशी विचारविनिमय केला. 1937 मध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले .आणि 1938 मध्ये सुभाष बाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. दोघेही क्रांतिकारकच! त्यामुळे सशस्त्र क्रांतीवर दोघांचाही विश्वास होता. इतकेच नाही तर, स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकारभाराचे चित्रही त्यांनी पाहिले होते .दोघांनाही हिंदू संस्कृतीविषयी अत्यंत अभिमान होता .श्रद्धा होती. प्रेम होते. लंडन मधल्या हिंदी सांस्कृतिक कार्यक्रमाला  भारतीय शिरोभूषणच  वापरावं असं सावरकर सांगत. आणि स्वतःही ते तसे वागत. सुभाषबाबू यूरोप मध्ये जिथे जिथे  कार्यक्रमाला जात ,तिथे भारतीय पोषाखातच  जात. तेथील लोकांना हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने सांगत. सुभाष बाबू बर्लिनमध्ये मराठीही बोलत .आणि छत्रपती शिवाजी आणि सावरकरांचे चरित्र सांगत असत. 1934 मध्ये युरोप मध्ये असतानाच सुभाषबाबूंनी (द इंडियन स्ट्रगल) हिंदुस्तानचा लढा हे पुस्तक लिहिलं. आणि अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक सावरकरांनी लिहिल.

 दोघांनाही एकमेकांची पुस्तक खूपच आवडली.

१९३७पासून दरवर्षी हिंदुमहासभेचे अध्यक्ष सावरकरच निवडले जात होते  १९३९ मध्ये सुभाष बाबू पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. पण महिन्याभरातच त्यांनी त्याचं त्यागपत्र दिलं. आणि (फॉरवर्ड ब्लॉक) पुरोगामी  गट  नावाचा नवा पक्ष काढून त्याचे ते अध्यक्ष झाले. १९३९मधे महायुद्ध काळातच उठाव व्हायला हवा, असं सावरकर आणि सुभाष बाबू दोघांनाही प्रकर्षानं वाटत होत. पण महात्मा गांधींचे मत मात्र याविरुद्ध होते. दोघांच्याही मते एका गोष्टीत मात्र मतभिन्नता होती. सावरकरांना वाटत होतं, नव्हे त्यांची खात्री होती की, हिंदू-मुसलमानांच्या  एकी शिवाय आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही ,निजामशाही ,बिदर शाही वगैरे पाच शाह्या असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतंच ना! खरंतर दोघांच्याही समोर शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आदर्श होता. दोघांनाही त्यांचा अभिमान होता. पण अजून सुभाष बाबूना सावरकरांचे मत पटत नव्हते. सावरकर युद्धाची संधी साधण्यासाठी सैनिकीकरणाचा प्रचार करत होते .पण सुभाषबाबूंना त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे ते त्यांना ‘रिक्रुट वीर’ असं म्हणून हिणवत होते. सावरकरांना मुसलमानांच्या बाबतीतलं काँग्रेसचे धोरण राष्ट्र घातक वाटत होतं. म्हणून “राजकारणाचं हिंदूकरण करा” असं ते सांगत होते. पण तेही सुभाषबाबूंना पटत नव्हतं. सुभाषबाबू बँरिस्टर जीनांना भेटले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जर्मन हिटलरलाही  भेटले.पण ते सध्या युध्दात भाग घेणार  नसल्याचे हिटलरने सांगितले .

“जपान त्या मानाने जवळ आहे आणि युद्धात भाग घेईल”. असं जपानमध्ये असलेल्या क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच गुप्त पत्र सावरकरांनी सुभाषबाबूंना दाखवलं. रास बिहारींनी, जपान मध्ये जे क्रांतिकारक होते, त्यांची हिंदू सभा स्थापन केली होती. १९१२ च्या डिसेंबरमध्ये लॉर्ड हार्डिंग्ज वर, मिरवणुकीत बॉम्ब टाकून ,स्त्री वेषात निसटून ते पुढे जपान ला गेले.” तसे सुभाष बाबू तुम्हीही करू शकाल”, असे सावरकर सांगत होते .युद्ध सुरू होताच बंगालच्या उपसागरातून ब्रह्मदेशातून  कोठूनही चढाई करता येईल असं ते सांगत होते.सावरकरांचा आशीर्वाद घेऊन सुभाषबाबू कलकत्त्याला गेले. घराभोवती कडक पहारा होता. शिवरायांचे स्मरण करून, आणि अनुकरण करून, त्या पहाऱ्यातून ते निसटले. ज्याप्रमाणे शिवाजीने संभाजी मेल्याची बातमी पसरवली, त्याचप्रमाणे सुभाषबाबूंनी आपणच मेल्याची बातमी पसरवली. ती तारीख  होती १७ जानेवारी १९४१. त्यांनी पुढे जे स्वातंत्र्ययुद्ध केलं, त्यात ते विमान अपघातात मरण पावले ,अशी बातमी पसरवून ते दुसऱ्या देशात गेले असावेत याबद्दल सावरकरांना खात्री होती.” ही नामी संधी आली आहे, हिंदुस्थाना  बाहेर जाऊन स्वातंत्र्य युद्ध करायला तुम्हीच समर्थ आहात” अस  सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले होते. म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाच श्रेय, सावरकर सुभाषबाबूंना देतात.’अभिनव भारतच्या ‘ सांगता समारंभाच्या अध्यक्षपदी, त्यांनी सुभाषबाबूंची निवड केली होती. पण ते स्वतः येणं शक्य नव्हतं.

म्हणून त्यांचं भव्य चित्रच उच्चस्थानी ठेवलं होतं.

रास बिहारींची गुप्त पत्र, सावरकरांची प्रेरक भेट, आणि सुभाषबाबूंचा साहसी कर्तृत्व या त्रिवेणी संगमाने, भारतात स्वातंत्र्याचा उदय झाला. राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेम, सावरकरांच तेजस्वी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व नव्या पिढीच्या समोर यायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं .भारतात सावरकरांना “भारतरत्न” ही सर्वोच्च पदवी दिली तरी ,त्यांच्या योग्यतेला ती अपुरीच पडेल असं वाटतं. त्यांनी जगावं कसं आणि त्याच बरोबर मरावं कसं असेही शिकवलं. “धन्योहं, धन्योहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित ,”अशा समाधानात प्रायोपवेशण करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे दिव्यत्व  पाहून  “तेथे कर माझे जुळती,”अस म्हणून आपोआप दोन्ही हात जोडले जातात.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !) इथून पुढे ——

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  ” पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून? “. यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. ” घरी गाय पाळा “. हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. ” एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार? ” डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, ” मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या “.  पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली.  ” बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल “.

लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली.  त्यानंतर ‘मी पण – मी पण ‘ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली.

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं- “ कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड.”  १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातली आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.

डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे. 

महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले.  पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.

 समाप्त

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

सकाळपासून घरामध्ये  एखाद्या सणासारखं वातावरण होतं. सासूबाईंच्या चेहर्‍यावरील उत्साह आणि स्वयंपाकघरातून येणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट या दोन्ही गोष्टींचं कारण एकच होतं – आज घरी दुपारच्या जेवणासाठी त्यांची एक मैत्रीण येणार होती. म्हणून घर पूर्णपणे सुशोभित केलं होतं.

काल संध्याकाळीच त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की उद्या त्यांची एक मैत्रीण जेवायला घरी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, आम्ही बाजारात गेलो आणि सासू- -बाईंनी एक छानशी, किंमती साडी आपल्या मैत्रिणीसाठी विकत घेतली.

आज तर त्या जणू काही वेगळ्याच पातळीवर होत्या. उत्साहाच्या भरात, त्या सकाळी माझ्या अगोदरच उठल्या होत्या. माझ्याआधीच स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी स्वतःच तयार केलेल्या यादीमधील एक एक पदार्थ, मनापासून व मोठ्या प्रेमाने बनवायला सुरुवातही केली होती.

त्या आज खूपच आनंदी दिसत होत्या.  पण मी… मी मात्र खोट्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जड अंत:करणाने त्यांना मदत करत होते.

आज माझ्या आईचा वाढदिवस होता. माझ्या लग्नानंतरचा आईचा हा पहिलाच वाढदिवस होता. आणि ती एकटीच असणार होती. मी इथं सासरी, बाबा ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी आणि भाऊ तर आधीच परदेशात गेलेला होता.

काल मी माझे मन घट्ट करून माहेरी जाण्याचे ठरवले होते. मी याबाबत माझ्या सासूबाईंशी काही बोलणार, तेवढ्यात त्यांनीच त्यांच्या येणाऱ्या मैत्रिणीबद्दल व उद्याच्या ठरवलेल्या बेताबद्दल सांगितले. दुपारचे भोजन आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मैत्रिणीबरोबर, फन सिटीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता.

ह्यावर मी आता काय बोलणार होते? मी गप्पच राहिले आणि कामाला लागले. सर्व घर व्यवस्थितपणे आवरले आणि स्वतःही जरा नाराजीनेच तयार झाले. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी मलाच पाठवलं.

दरवाजा उघडल्यावर भल्या मोठ्या पुष्पगुच्छाच्या मागे लपलेला चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि मी ‘आ ‘ वासून बघतच राहिले ! कारण समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे, माझी आई  होती. आई मला पुष्पगुच्छ  देत म्हणाली, ” सरप्राईज! “

आश्चर्याने आणि आनंदाने, मी तिथे उभी राहून आपल्या आईकडे एकटक बघत होते. 

” वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का देणार माझ्या मैत्रिणीला? ” मागे उभ्या असलेल्या सासूबाईंनी विचारले.

“माझी आई… तुमची मैत्रीण?” मी मोठ्या आश्चर्याने विचारले.

“अग, हो ! मी खोटं नाही बोलत ! कोण म्हणतं की विहीणी-विहीणी मैत्रिणी होऊ शकत नाहीत? ” सासूबाई म्हणाल्या.

“ नक्कीच होऊ शकतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सासू आपल्या सुनेचे, मुलीसारखे लाड करू शकते आणि तीच विहिणीला पण मैत्रीण बनवू शकते.” असे म्हणून माझ्या आईने पुढे होऊन सासू- बाईंना मिठीच मारली.

आनंदाने माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. मी सासूबाईंचे हात हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि त्यांच्या हाताच्या तळव्यांचे मुके घेतले व त्यांना मिठी मारली. आम्हा दोघींना बघून, माझ्या आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या व तिने स्मित हास्य केले.

नात्यांचा हा उत्सव, अत्यंत प्रेमाने साजरा करत असताना, एका बाजूला माझी आई होती, जिने मला नात्यांचं महत्त्व शिकवलं, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईं- ज्यांनी नातं हृदयापासून कसं जपायचं हे शिकवलं.

दोघीजणी माझ्याकडे बघून हसत होत्या आणि त्या दोघींच्यामधे उभी राहून, मी माझ्या नशिबावर खूष होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र हसू फुलले होते.

स्वतःला महत्त्व कसे मिळेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना “मान” कसा देता येईल याविषयी आपण विचार केला पाहिजे, हे मनापासून पटलं मला. 

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?विविधा ?

☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

—आजच्या नवयुगातील तुमचा आमचा सर्वांचा घनिष्ठ सोबती म्हणजे स्वतःचा मोबाईल..त्याच्याशिवाय घरबसल्या आप्त-स्वकीयांशी संपर्क साधणें-जोडलेले रहाणें म्हणजे दुर्गम बाब झाली आहे…एकटे असतांना कधी रेंज नसली किंवा नेटवर्क नसले तर एकदम सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो व जीव घाबराघुबरा होतो..याचा अनुभव मलाही आलेला आहे…

प्रगत युगातील हे आधुनिक लहानसे यंत्र लाॅकडाऊनच्या काळात तसे खूपच उपयोगी पडले…सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना व्यवसाय नोकर्‍या इत्यादींचे वर्क फ्राॅम होम चालले होते…भाजीपाला,जरूरीच्या वस्तू, औषधे इ. सर्व मोबाईलवरून आॅनलाईन मागविल्याने घरपर्यंत पोहोचत होते..स्वकीयांशी संवाद साधता येऊन परिस्थितीचा अंदाज घेता येत होता..

या लाॅकडाऊनच्या काळात शाळा काॅलेजे ही बंद पडल्याने, शाळा-काॅलेज वर्ग आॅनलाईन screen वर असल्याने, मुलांची मोबाईलशी जास्तीत जास्त जवळीक झाली हे मात्र खरे..अजूनही अद्ययावत परिस्थितीमुळे म्हणावा तसा बदल झालेला नाहीय..

या मुलांचे शाळेत जाणें नाही,मित्र-मैत्रिणींशी भेटणें नाही,त्यांच्याशी खेळणे नाही,म्हणून त्यांची चिडचिड होणें स्वाभाविक आहे..परंतु गृहपाठ करण्याचा बहाणा  करून ही लहान मुले आईवडिलांचा मोबाईल घेतात व तासनतास त्यावर गेम खेळत बसतात..किंवा टी व्ही वर कार्टून्स बघत बसतात,वेळेचा अपव्यय करतात हे मात्र गैर आहे..अर्थात काहीजण यांस अपवाद असतील..

मोबाईल,काॅम्प्युटर,लॅपटाॅप,टी.व्ही. याचा वापर किती प्रमाणांत, किती मर्यादा राखून करायचा याची सवय सर्व थोरा-मोठ्यांना अंगवळणी पडलेली बरी…

—आभासी जगतापलिकडेही एक जग असते हे पहाण्याची दृष्टी मुलांना संस्कारातून मिळते..!

अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा याचा सुजाण व जागरुक पालकांनी मुलांना बोध करून द्यावा..हा वेळ त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सार्थकी लावण्यात मुलांना सुयोग्य सहकार्य करावे..त्यांचा बहुमूल्य वेळ मोबाईलवर वाया घालविणे इष्ट नाही.. यासाठी पाल्यास दिवसभरातील कामाचे एक वेळापत्रक तयार करून द्यावे..त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळात ठरलेली कामें करण्याची नियमित सवय लागून भविष्यात यश संपादन करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होईल..यात शारिरीक व्यायाम,योगासने,अथर्वशीर्ष,अभंग-ओव्या पाठ करणें इ.चांगल्या सवयींचाही समावेश होतो..मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा,त्यांच्या आवडत्या छंदांना प्राधान्य द्यावे…जसे चित्रे काढणें,रंगविणें,गोष्टींची पुस्तके वाचणे,त्या गोष्टी दुसर्‍या मुलांना कथित करणें,शुध्दलेखन करणें,बुध्दीबळ खेळणें..टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणें,नृत्य संगीताची आवड असल्यास त्यांचा सराव करणें, एखादे वाद्य वाजविण्यास शिकणें वगैरे वगैरे..

बागकाम,शिवणकाम पाककला, हस्तकला लेखन हे मोठ्या मुलांसाठीचे पर्यायही आहेत..

तसेच,मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना ध्यानधारणा,चिंतन,मनन करण्याची सवय लावावी..अशाप्रकारचे संस्कार करून मुलांना लहान वयातच वेळेचे महत्व समजावून दिले तर त्यांच्याकडून कदापि वेळेचा अपव्यय होणार नाही..

वेळेच्या बाबतीत विल्यम पेन यांचे एक सुंदर वाक्य आहे..ते म्हणतात ” आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वांत जास्त असते,असे असूनही आपण सर्वांत जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो..”

वेळ हे जीवनातले असे नाणें आहे जे कसे आणि कुठे खर्च करायचे ते आपणच ठरवू शकतो..!

मुलांवर संस्कार करतांना किंवा संस्कारी मुले घडवीत असतांना,पालकत्व ही केवळ जन्मदात्या पालकांचीच नव्हे तर संपूर्ण कूटुंबाची जबाबदारी असते हेही इथे नमूद करावेसे वाटते..!

कर्तव्य पालकांचे

मुलांसी द्यावे संस्कार

हे संस्कारच देतील

त्यांच्या जीवनास आकार..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ !!)

खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य !! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्याआज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला.  खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले ! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. 

अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत.  मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार ! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्यांची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. 

दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे !

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘ पिग्मी डिपॉझिट स्कीम ‘. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !

क्रमशः….

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print