मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत  वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….

अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.

तर झालं असं..

चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!

कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.

29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि  पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….

दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या  गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या 

हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि  मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.

त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर  उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.

बिछान्यावर पडताच झोप लागली.

दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन  आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.

दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी  परिस्थिती अधिक आव्हानात्मक  होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency  लागली नाही.

रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या  गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती. 

एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण  डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत  असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

 क्रमशः…

लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.

प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.

मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.

जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.

मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही. 

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ लिम्ब… शांता शेळके ☆

निळ्या निळ्या आकाशाची

पार्श्वभूमी चेतोहार

भव्य वृक्ष हा लिंबाचा

शोभतसे तिच्यावर

 

किती रम्य दिसे याचा

पर्णसंभार हिरवा

पाहताच तयाकडे

लाभे मनाला गारवा

 

बलशाली याचा बुंधा

फांद्या सुदीर्घ विशाला

भय दूर घालवून

स्थैर्य देतात चित्ताला

 

उग्र जरा परी गोड

गन्ध मोहरास याच्या

कटु मधुर भावना

जणु माझ्याच मनीच्या

 

टक लावून कितीदा

बघते मी याच्याकडे

सुखदुःख अंतरीचे

सर्व करीते उघडे!

 

माझ्या नयनांची भाषा

सारी कळते यालाही

मूक भाषेत आपुल्या

मज दिलासा तो देई

 

स्नेहभाव आम्हातील

नाही कुणा कळायाचे

ज्ञात आहे आम्हांलाच

मुग्ध नाते हे आमुचे !

– शांताबाई शेळके

☆ काव्यानंद – लिम्ब….शांताबाई शेळके ☆

शांताबाई शेळके यांच्या आत्मपर कवितांपैकी एक कविता–लिम्ब  (अर्थात  कडुलिम्ब!)

निसर्गाचा आणि मानवी मनाचा संबंध हा अनादी कालापासूनचा आहे.आपल्या आनंदाच्या उत्सवात माणूस निसर्गाला विसरलेला नाही आणि आपल्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.’आपुलाच वाद आपणाशी’ हा सुद्धा निसर्गाच्या सहवासातच होतो.त्यामुळे शांताबाईंसारख्या कवयित्रीने निसर्गाशी साधलेली जवळीक आणि संवाद समजून घेण्यासारखा आहे.

‘लिम्ब’ ही  कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी ती  निसर्ग कविता वाटते.असे वाटण्याचे कारण म्हणजे कवितेचे शिर्षक आणि पहिली तीन कडवी.पहिल्या तीन कडव्यात बाईंनी  लिंबाच्या झाडाचे फक्त वर्णन केले आहे.बलशाली बुंधा असलेला,विशाल फांद्या असलेला,त्याच्या पर्णसंभारामुळे मनाला गारवा देणारा,आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला हा भव्य वृक्ष मन आकर्षित करून घेणारा असा आहे.कुठे दिसला असेल हा वृक्ष त्यांना ? एखाद्या माळावर,प्रवासात,एखाद्या खेड्यात किंवा कदाचित अगदी घराजवळही.पण त्यांनी केलेले वर्णन हे इतके बोलके आहे की तो आपल्याला मात्र पुस्तकाच्या पानातून सहज भेटून जातो.पण कविता इथे संपत नाही तर इथे सुरू होते.कारण कुठेही सहजासहजी दिसणारा हा वृक्ष कवयित्रीचा सखा बनून जातो.

पुढच्या तीन कडव्यात त्या काय म्हणतात पहा.कडुलिम्बाच्या मोहोराला येणारा गंध गोडसर उग्र असा असतो.आपल्या मनातील भावनाही अशाच नाहीत का? थोड्या गोड तर थोड्या गोड.त्यामुळेच त्यांची आणि लिंबाची  मैत्री होते.आत्ममग्न अवस्थेत एकटक त्याच्याकडे बघत असताना,नकळतपणे आपल्या मनातील सुखदुःख  त्या वृक्षासमोर उघडे करत असतात.जितक्या नकळतपणे मैत्रिणिशी बोलावे तितक्या सहजपणे त्या वृक्षाशी मनातल्या मनात बोलत असतात.या एकटक बघण्यातूनच त्या वृक्षालाही त्यांच्या डोळ्यांची भाषा समजू लागली आहे आणि तोही आपल्या मूक भाषेतून त्यांच्याशी समजुतिचा संवाद साधत आहे.निसर्गाशी एकरूप होणं याशिवाय वेगळं काय असतं ?त्यामुळे ही मैत्री इतकी घट्ट झाली आहे की त्यांच्यातले मुग्ध नाते हे शब्दांच्या पलिकडले आहे आणि म्हणूनच ते इतरांना समजण्यासारखे नाही.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे तसा तो निसर्गप्रियही आहे.आपण निसर्गाशी जितकी जवळीक साधावी तितका तो आपलासा होऊन जातो.मग तोच आपला सुखदुःखातील भागीदार बनतो.आपली विमनस्क अवस्था दूर करायला मदत करतो.कवयित्रीच्या आत्ममग्नतेमुळे रसिकांना ,साध्या सोप्या भाषेतील पण उत्तम कविता वाचायला मिळाली आहे.लिम्बासारखीच गारवा देणारी आणि मन सदैव हिरवे गार

ठेवणारी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

मावळताना दिवस मन उगाच कातर होतं. का ? कसं ? कशासाठी ? आजवर कधीच कळलं नाही . जगण्याच्या चाकोरींची गतिमानता थांबवणे अवघड काम .

ते  -हाटगाडग्यासारखं,सतत फिरत रहातं पोटासाठी , प्रतिष्ठेसाठी ,नात्यागोत्याच्या गुंत्यासाठी आणि भूतकाळात उपभोगलेल्या लाघवी स्वप्नांच्या स्मरणासाठी. सारंच कसं खूप धुसर झालेलं असतं काळाच्या पडद्याआड. वर्तमानात त्याची दखलही घेता येत नाही. टाळताही येत नाही त्याला . आठवण पाठपुरावा करणंही काही केल्या सोडत नाही. करायचं तरी काय ? हा यक्षप्रश्न भेडसावतो सारखा . मग लागीर झालेलं झाड घुमत रहाव तसंआपणही धुमसत रहातो आतल्याआत, हिम्मत हरवलेल्या मांत्रिका  सारखं .  इथंच डोकावतो मनोनिग्रह . स्थितप्रज्ञ होण्यासाठी  सावरायला . ओळख त्याला. जवळ कर .  सगळं काही काळजात बंदिस्त करून तूच चौकीदार हो मनाचा. ठणकावून सांग त्याला, बलदंड पुंडासारखा वागलास तर याद राख. आता देहाचा वारु थकलाय , त्याला गरज आहे विश्रांतीची . ती दिली नाहीस तर मीच परागंदा होईन इथून . मग मला नको विचारूस. ज्याला आत्मा म्हणतात तो तूच काय ? म्हणून म्हणतोय तुला शांत हो. निरभ्रांत हो. लगाम घाल मनाला.  वाच चार ओळी अध्यात्माच्या, संत महंतांच्या , भारतीयांच्या थोर परंपरेच्या आणि वानप्रस्थ हो योग्या सारखा .

त्याग करून तुझाच  तू. अरे, मी हे सगळं सगळ्यांसाठी सांगतोय.  तू कोण टिकोजीराव लागून गेलास माझ्यापुढे ? 

त्याग हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे आत्मशांतीचा. म्हण ॐ शांती शांती.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

अल्प परिचय

शिक्षण – B.Arch.1985, ME Townplanning.1987

सम्प्रति –

  • दहा वर्षे आर्कीटेक्ट व इंटीरियर डिझायनर व्यवसाय.
  • अक्षरानंदन या संस्थेत एक वर्ष काम केले.
  • पालकनीती या मासिकाच्या संपादकीय मंडळावर 20 वर्षे.
  • पालकनीती परिवार या एन् जी ओ वर 1996 पासून विश्वस्त.
  • स्वतःच्या घरी ‘खेळघर’ या, झोपडपट्टीतील मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात.
  • 1998 पासून शिक्षण आणि पालकत्व या क्षेत्रात तज्ञ मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत.

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

खूप वर्षे झाली…. कधीपासून बरं? आपल्या मनातल्या विचारांबद्दल कळायला लागलं तेव्हापासून हा शोध मनात पिंगा घालतोय.

आपल्याच जगण्याकडे थोडे बाहेरून बघायला लागल्यावर कधी कधी काही उलगडल्यासारखं वाटतं… त्याबद्दल लिहायचं आहे.

कधी छान वाटतं? कशामुळे? कशामुळे रुसतो आनंद आपल्यावर?

आवर्जून प्रयत्न करून मिळवता येतो का आनंद? शोधुयात बरं … असं ठरवलं आणि लिहायला सुरूवात केली. 

बहुसंख्य वेळा मन व्यापलेलं असतं  कशाने तरी… काय असतं हे ओझं? 

काळजी, ताण, भविष्यात करायच्या गोष्टींची आखणी किंवा मनासारखं झालं नाही म्हणून राग, अचानक काही वाईट घडतं त्याचं दुःख, गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून असहायता… अशा अनेक गोष्टींनी व्यापलेलं असतं मन! 

त्यात मुळी जागाच उरत नाही आनंदाला! 

अच्छा असं होतंय का?

थोडे आणखी खोलात जायला हवे…… 

काळजी, ताण, राग, दुःख अशा भाव भावनांची वादळे आपल्या मनाचा अवकाश व्यापून रहातात आणि म्हणून आनंदाला जागा रहात नाही शिल्लक! म्हणजे हे तर अडथळे आहेत आनंदाच्या वाटेवरचे. पण असे कसे, आपण माणूस आहोत, भावना तर असणारच. ते संवेदनाक्षम मनाचे लक्षण आहे. 

या भावभावना उत्स्फूर्तपणे आपल्याही नकळत मनात उफाळून येतात आणि दंगा घालतात. मला आठवतंय, छोटीशी घटना घडते आणि खूप काही जुनं जुनं वर येतं आणि मन अस्वस्थ होऊन जातं. असं का होतं? खरंच या  भाव भावनांना समजून घ्यायला हवं आहे. भावनांचे वादळ जरा शमले, की ते सारे विसरून पुढे जायची घाई असते आपल्याला!

मनाच्या शांत अवस्थेत स्वतःच्या वर्तनाला, भावनांना निरखून पहायला वेळ काढला तर… ?

लहानपणी ऐकलेल्या एका प्रार्थनेच्या ओळी आठवताहेत,

” दिसाकाठी थोडे शांत बसावे,

मिटूनी डोळे घ्यावे क्षणभरी.

एकाग्र करोनी आपल्या मनाला,

आपण पहावे निरखोनी.”

——ही शांतता, हा ठेहेराव मिळवू शकू का आपण…?

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न्यायप्रिय राजमाता… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

Ahilyabai Holkar 1996 stamp of India.jpg

न्यायप्रिय राजमाता… ☆  प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

इंदौरच्या आडाबाजार परिसरात राणी अहिल्यादेवी बाहेर पडल्या आहेत, रस्त्यावर एक गायीचं वासरू रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडलेलं दिसतंय, त्याच्या बाजूला गाय हंबरतेय, चाटतेय, तिच्या डोळ्यातून डोंगराएवढं दुःख डोळे भरून वाहतंय, एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूने घायाळ झालीय, त्या वेदना, संवेदना, दुःख हे सगळं त्या  गायीच्या डोळ्यात दिसतंय, तो प्रसंग माता अहिल्यादेवी पाहताहेत, बेचैन, अस्वस्थ झाल्यात !

त्या मुक्या गायीला न्याय मिळाला पाहिजे, 8- 10 दिवसाच्या त्या निष्पाप बछड्याला रस्त्यावर चिरडून निघून जाणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा राग त्यांच्या मनामध्ये आहे, आपण रोज हजारो लोकांना तर न्याय देतो पण या मुक्या गायीला न्याय कोण देणार ! तिच्या 8-10 दिवसांच्या वासराची, तिची काय चूक? अहिल्यादेवी व्याकुळ होऊन आपणच न्याय दिला पाहिजे हा निश्चय करत तडक परत राजवाड्यात फिरतात, जिथे रोजचा जनता दरबार आणि न्याय देण्यासाठी बसतात त्या सिंहासनावर स्वार होतात, आपल्या सरदारांना पाहिलेली घटना सांगतात, या अमानुष घटनेला मग शिक्षा ठरते, ती शिक्षा म्हणजे थेट मृत्युदंड !

त्या घटनेची चौकशी केली जाते तर आपल्या पोरानेच त्या वासराला चिरडल्याची माहिती समोर येते. अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव रस्त्याने घोड्याच्या रथातून जात असताना आडव्या आलेल्या त्या गोंडस वासराला चिरडून मालेराव पुढे निघून गेल्याची माहिती मिळते. अहिल्यादेवींनी शिक्षा तर मृत्यूदंडाची दिलीय, मग आता माघार नाही, अन माघार घेतील त्या अहिल्यादेवी कसल्या !

स्वतःचा मुलगा मालेराव त्या वासराचा मारेकरी असल्याचे ऐकून त्या किंचितही हटल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत, थबकल्या नाहीत, आणि त्यांनी तात्काळ त्या सिंहासनावरून आदेश दिला, त्या मालेरावला रस्त्यावर झोपवा अन त्याच्या अंगावरून बेफाम वेगाने घोड्याचा रथ चालवा ! त्याला मृत्युदंडच झाला पाहिजे !

सगळं सभागृह स्तब्ध झालं, चकित झालं, भयभीत झालं,  विचार करतंय—  अरे या तर मालेरावच्या आई, पोटच्या पोराला कोण रथाच्या खाली देईल! असं निर्दयी कोण मारून टाकेल! आणि गुन्हा काय तर एका 8-10 दिवसाच्या वासराला चिरडलं! काय त्या वासराची किंमत? ज्याच्यासाठी राणी अहिल्यादेवी आपल्या पोटच्या एकुलत्या एक पोराला मृत्युदंड देताहेत— पण या करारीबाण्याच्या अहिल्यादेवींना विरोध करण्याचं धाडस त्या वाड्यातल्या एकाही सरदारात नव्हतं!

एकही जण पुढे यायला तयार नाही, रथ चालवायला तयार नाही. मालेरावला मारायचं तेही सगळा आडाबाजार बघणार . ज्या राजघरण्यावर जीव ओवाळून टाकला त्या राजपुत्राला मारायचं कसं, हे पाप कशासाठी करायचं . मात्र अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावर कशाचाच लवलेश नाही . उलट त्या निष्पाप गायीला न्याय मिळवून देण्याची त्यांना ओढ लागलीय . अन एकही जण पुढे येत नसल्याचं पाहून त्यांनी एक निगरगट्ट, धष्टपुष्ट आणि घट्ट काळजाच्या नोकराला आदेश दिला . रस्त्यावर मालेरावला झोपवलं, मालेराव डोळे बंद करून झोपले आहेत, कारण आता मरणातून सुटका नाही हे त्यांनीही ओळखलंय, सगळा आडाबाजार रस्त्याच्या बाजूने बघायला तोबा गर्दी करून उभा आहे.  ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गायसुद्धा तिथेच स्तब्ध उभी आहे. ही न्यायप्रिय राणी स्वतःच्या पोराला मृत्युदंड देतीय. \ मात्र रथ पळत येतोय आणि थबकतोय, त्याही निगरगट्ट नोकराचं धाडस होईना, परत परत रथ बेफाम धावत येतोय, मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या आतच थबकतोय!

हे वारंवार होतंय, मात्र मालेरावला चिरडण्याचं धारिष्ट दाखवत नाही, म्हणून राणी अहिल्यादेवी स्वतःच त्या रथाच्या सारथी होतात. आता मालेरावला चिरडलं जाणार हे नक्की होतं, बेफाम रथ येतोय – मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या अगोदरच ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गाय रथाच्या समोर येऊन उभी राहते, रथ पुढे जाऊच देत नाही . अहिल्यादेवी रथ परत फिरवतात पुन्हा वेगाने घेऊन येतात.  मात्र पुन्हा गाय समोर येते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय !—

जणू ती गाय रथाच्या आडवे येऊन अहिल्यादेवींना म्हणतेय, “ बाई, पोटच्या पोराच्या मृत्यूचं दुःख मी भोगलंय, या यातना, संवेदना मी भोगल्यात. आता हे दुःख तुझ्या पदरी कशाला! आईच्या काळजाला होणाऱ्या जखमा, आईच्या आतड्याला पडणारा पिळ मी भोगलाय! माझा बछडा माझ्यापासून हिरावला पण मला न्याय देण्यासाठी तू तुझ्या बछड्याला कशाला हिरावते आहेस ! तुझ्या न्यायदानाची पद्धत आणि नीती पाहून मी माझ्या दुःखाला सुद्धा विसरून गेलेय ! “

या घटनेनं सगळा परिसर घायाळ आणि स्तब्ध झाला . लोकं अहिल्यादेवींकडे याचना करताहेत, की ही गाय त्यासाठीच आडवी येतेय की पोटच्या पोराला मारू नका! चूक झाली असेल पण त्याची शिक्षा अशी करू नका!

आणि शेवटी अहिल्यादेवींना माघार घ्यावी लागली आणि त्या तडक आपल्या राजवाड्यात परतल्या! हा त्यांच्या आयुष्यातला एकमेव निर्णय जो नाईलाजाने त्यांना माघारी घ्यावा लागला, तेही त्या गाईच्या आडव्या येऊन करणाऱ्या विनवण्यामुळे!

अत्यंत कठोर, न्यायप्रिय आणि उत्तम शासक असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला, पहिल्यांदा नवरा खंडेरावांचा मृत्य, त्यानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू, त्यानंतर मुलगा मालेरावांचा मृत्यू!

घरातले सगळे कर्ते पुरुष गेल्यानंतरही भगवी पताका खांद्यावर घेऊन महिलांची फौज तयार करत लढाया करणारी रणरागिणी माळवा प्रांताने अनुभवली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, मठ, धर्मशाळा, पाणवठे, पाणपोया, विहिरीचं बांधकाम, काशी विश्वनाथ, सोमनाथापासून ते परळी वैजनाथापर्यंत सगळ्या हिंदूंच्या आस्थांना नवसंजीवनी दिली. जीर्णोद्धार केला!

आमच्या छत्रपती शिवरायांनी देव वाचवला आणि त्या देवांचा जीर्णोद्धार करत आमच्याच राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचा आणि हिंदूंचा उद्धार केला, हिंदूंची ओळख जपली.

महान पराक्रमी, योद्ध्या, न्यायप्रिय, कठोर शासक, रणरागिणी, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!🚩🙏

संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुत खोया, कुछ न पाया… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
परिचय

जन्म – सातारा जिल्हा.

शिक्षण – भावे प्राथमिक व माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड व  रमणबाग शाळेत झाले. बी एम सी सी मधून बी.काॅम.

चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. 

कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

?  विविधा ?

☆ बहुत खोया, कुछ न पाया… ☆ श्री सुरेश नावडकर

आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं…

पार्टीमध्ये ‘चिअर्स’ करुन, ग्लासला ग्लास भिडवायला शिकलो, मात्र ‘वदनी कवळ घेता’ म्हणायचं असतं.. ते विसरलो….

वेलकम ड्रिंक म्हणून, माॅकटेल प्यायला शिकलो, मात्र जेवण सुरु करण्यापूर्वीचं.. आचमन घेणं विसरलो..

हक्का नुडल्स, ट्रिपल शेजवान काट्याने गुंडाळून तोंडांत कोंबताना, अस्सल चवीची.. शेवयांची खीर विसरलो..

हाताने वरण-भात, ताक-भात खाण्याची लाज वाटू लागली परंतु काट्या चमच्याने पुलावाची शिते गोळा करुन खाताना, फुशारकी वाटू लागली..

पावभाजीवर.. जादा अमूल बटरचा आग्रह धरु लागलो, मात्र वाफाळलेल्या वरण-भातावरची तुपाची धार विसरलो… 

बिर्याणी, फ्राईड राईस, जिरा राईस खायला शिकलो, पण ‘वांगी भात, मसाले भात, मुगाची खिचडी म्हणजे नक्की काय असतं?’ या नातवाच्या प्रश्नावर निरुत्तर झालो…

एकेकाळी पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलेबीवर ताव मारण्याचे विसरुन गेलो, आता मात्र जेवणानंतर स्वीट डिश म्हणून दोनच गुलाबजाम व चमचाभर आईस्क्रीमवर समाधान मानू लागलो..

दोन्ही हात वापरुन ब्रेड, पाव खाऊ लागलो, मात्र आईने शिकविलेला ‘एकाच हाताने जेवावे’ हा संस्कार.. विसरुनच गेलो..

‘सॅलड’ या भपकेदार मेनूमधील झाडपाला मागवून खाऊ लागलो, पण कोशिंबीर, चटण्या, रायते हद्दपार करुन बसलो…

इटालियन पिझ्झा, पास्ताची आॅनलाईन आॅर्डर होऊ लागली, मात्र अळूची पातळ भाजी, भरली वांगी, बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली…

मठ्ठा, ताक, सार हे शब्दच विसरुन गेलो, पण जेवणानंतर फ्रेश लेमन, सोडा का नाही? हे बिनधास्तपणे विचारु लागलो…

साखर भात, लापशी, गव्हाची खीर इतिहास जमा झाली अन् स्वीट म्हणून आईस्क्रीम, फालुदाची.. गुलामी स्वीकारली…

मसाल्याचे वास तसेच ठेवून पेपर नॅपकीनने हात व तोंड पुसू लागलो, मात्र जेवणानंतर हात स्वच्छ धुवून, खळखळून चूळ भरणं.. विसरुन गेलो..

थोडक्यात, आरोग्याच्या सर्व सवयी सोडून देऊन, पाश्र्चात्यांचं अनुकरण करत, स्वास्थ्य बिघडवून कमी वयातच शारीरिक व्याधींना बळी पडू लागलो…

‘जुनं ते सोनं’ समजून घेतलं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये.. पण ‘सुरुवात कधी करायची?’ इथंच गाडी अडलेली आहे….

(या रचनेचे सर्वाधिकार रचयिता  ©️ सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत)

© सुरेश नावडकर

२२-५-२२

मोबाईल ९७३००३४२८४

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

नेहाशी, फोन  वर  बोलत  होते. “आई, तुम्ही सांगितलं तश्या  कापसाच्या गाद्या बनवून  घेतल्या हं.”

“बरं केलंत… इतक्या लहान  वयात  कसली  ती पाठदुखी आणि कंबरदुखी.!!”””मी म्हटलं..

इकडचं तिकडचं बोलून मी फोन  ठेवला—-

—-आणि  त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोहोचले .

मला  तो खांद्यावर  काठी  टाकून धनुष्यासारखी  दोरी ताणत  “एक विशिष्ट  टिंग टिंग “आवाज  करीत  चाळीत  शिरणारा लखन आठवला … कापूस पिंजून गाद्या शिवून  देणारा. शिवाजी  पार्कच्या १३० बिऱ्हाडं असलेल्या चाळीत  तो रोज यायचा . एकही दिवस  असा नाही जायचा  की त्याला काम नाही मिळालं…

.. माझ्या चाळीतल्या आठवणी  “चाळवल्या  “गेल्या… 

कित्ती लोकं यायची सकाळपासून !!!!

आता सोसायटी किंवा कॉम्प्लेक्समधेही  सकाळपासून माणसं येत असतात. पण ती “स्विगी” ची, नाही तर  “झोमॅटो”ची.  नाहीतर  “amazon, myntra, etc. ची.   कुठल्याही वेळी आणि बिन चेहऱ्याची , अनोळखी माणसं..

खरं  तर  इमाने इतबारे, कष्टाने  इकडची  वस्तू तिकडे “पोचवण्याचं  ” काम करीत  असतात बापडी.

पण मनात  “पोहोचू  “शकत  नाहीत.

याउलट  साठ सत्तरच्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी  होऊन मनापर्यंत  पोहोचली  कळलंच  नाही.

सकाळची  शाळा असायची. रेडिओ  वर मंगल  प्रभात सुरू असायचे . त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या “वासुदेवाची ” Entry व्हायची. तेव्हढ्या ” घाईतही  त्याला दोन पैसे  द्यायला धावायचो ..

रोज नाही यायचा  तो. पण त्याच्या विचित्र पोशाखाचं  आणि गाण्याचं वेड होतं आम्हाला…

कधी  एक गृहस्थ  यायचे . भगवी  वस्त्र ल्यायलेले. हातात कमंडलू असायचं. तोंडाने “ॐ, भवती  भिक्षां देही “असं म्हणत  सगळ्या चाळीतून  फिरायचे, कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचे ही नाहीत.

मी आईला  कुतूहलाने विचारायचे, “ ह्यांचाच  फोटो असतो का रामरक्षेवर ? “

आठवड्यातून  एकदा घट्ट  मुट्ट, चकाकत्या  काळ्या रंगाची  वडारीण  यायची . “जात्याला, पाट्याला टाकीय,…”

अशी  आरोळी  ठोकत . जातं नाही तरी  पाटा घरोघरी  असायचाच . त्यामुळे दिवसभर  तिला काम मिळायचंच .

तिची  ती विशिष्ट पद्धतीने  नेसलेली साडी.. अंगावर  blouse  का घालत  नाही याचं आमच्या  बालमनाला  पडलेलं कोडं असायचं. (हल्लीची  ती कोल्ड shoulder आणि  off shoulder ची  फॅशन  यांचं  चित्र बघून आली  की काय?)

हमखास  न चुकता  रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची  गाडी असायची . “मिठ्ठाची  गाडी आली , बारीक मीठ,

दहा  पैसे  किलो, दहा  पैसे  “!!!!  ही त्याची हाक ऐकली  की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो. 

तसाच  एक तेलवाला यायचा . कावड  असायची  त्याच्या खांद्यावर . दोन बाजूला दोन मोठ्ठे डबे . एकात खोबरेल  तेल एकात गोडं तेल. घाणीवरचं.. तेलाच्या घाणी एवढाच  कळकटलेला  आणि  तेलकट.. ढोपरापर्यंत  घट्ट  धोतर ., कधीकाळी पांढरं असावं, वर बंडी आणि काळं जॅकेट ..त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरपण माझ्या डोळ्यासमोर  येते.

अशा  तेलवाल्याकडून, पॅकबंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ  पोसली. हायजीनच्या कल्पनाही  घुसल्या नव्हत्या डोक्यात.

सकाळची  लगबग, गडबड  आवरून घरातल्या  दारात गृहिणी  जरा  निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास  बोवारीण यायची . मुळात कपड्यांची चैन होती कुठे  हो. पण त्यातल्यात्यात जुने कपडे  देऊन, घासाघिस  करून, हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर  चाळीतले  अनेक संसार  सजले  होते.

हे सगळं सामूहिक चालायचं हं . जी बोवारणीला कपडे  देत असायची  तिच्या घरात  गंज  आहे  का, परात  आहे  का, “लंगडी “आहे  का हे तिच्या शेजारणींना माहित असायचं.

अशाच  दुपारी कधी  कल्हई वाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत  तो फणसाच्या  झाडाखाली  बस्तान बसवायचा .

त्याचा तो भाता, नवसागराचा  विशिष्ट धूर  आणि वास..कळकटलेली  भांडी, पातेली, कापसाचा बोळा  फिरवून चकचकित  झालेली पहिली  की आम्हाला काहीतरी  जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चूर्र आवाज . तो गेल्यावर ते बॉलबेअरिंग्ससारखे  छोटेछोटे  मातीत पडलेले गोळे गोळा करायचे… 

कशातही  रमायचो  आम्ही. 

संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्यावेळी कुरमुऱ्याच्या पोत्याएवढाच जाडा– पांढराशुभ्र  लेंगा सदरा  घातलेला  कुरमुरेवाला यायचा . खारे  शेंगदाणे, चणे, कुरमुरे  हा त्या वेळचा  खाऊ …जो घेईल  तो एकटा नाही खायचा –  वाटून खायचा . चाळीचा  संस्कार होता तो.- “sharing is caring ” हे शिकवायला नाही लागलं आम्हाला..

घंटा  वाजवत , रंगीबेरंगी  सरबताच्या  बाटल्यांनी भरलेली  बर्फाचा  गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर  रस्त्यावर उभी  राहायची . महिन्यातून एखादेवेळी खायला आम्हाला परवानगी  मिळायची . १३० बिऱ्हाडातली कमीत कमी  दिडेकशे  पोरं तो बर्फाचा  गोळा कधी ना कधी खायची,  पण कोणी आजारी  पडल्याचं मला  तरी  आठवत  नाहीये..

संध्याकाळी सात वाजेपर्यंत  पटांगणात धुमाकूळ  घालून , गृहपाठ , परवचा, म्हणून गॅलरीमधे कोण आजोबा  आज  गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत  असायचो .

उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की “कुल्फीय..” ओरडत  डोक्यावर ओला पंचा  गुंडाळलेला मटका  घेऊन  कुल्फी विकणारा यायचा ..चाळीत  तेव्हा तरी  कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची  सहसा . पहिला  दुसरा नंबर आला तर  क्वचित मिळायची ..

अशी  ही बाहेरून येणारी सगळी  माणसं “आमची  “झाली होती.

शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नातेवाईकही “आपले “वाटायचे …

या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा  व्यक्तिमत्व विकास होत राहिला.

माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी  आजही अधूनमधून अशा “चाळवतात” .

पु. लं च्या बटाट्याच्या चाळीने  “चाळ  संस्कृती  “घराघरात “पोहोचवली.

आमच्या चाळीने  मात्र ती आमच्या  “मनामनात  “रुजवली …

लेखिका – सुश्री नीलिमा जोशी 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

⭕ आज राष्ट्रीय वाढदिवस दिन !

⭕ पु.ल. नेहमी म्हणायचे,

“जवळ जवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे !”

वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. 

जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. 

‘सोळावं वरीस धोक्याचं,

 ‘वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का ?’,

 ‘वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’ 

अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात.

 अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो. 

काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघा तिघांची, चार पाच जणांची जन्म तारीख एकच असू शकते, नव्हे ती असतेच.

पण १ जून हा असा दिवस आहे की,

 चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडेथोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात. 

असं काय आहे की ?—- 

१ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो.

 १ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे. 

सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा.

 एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य.  त्या काळातील  ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली.

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं.

 शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. 

मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही. 

त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकची एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. 

पण गुरुजींना exact तारीख हवी असायची..,आणि ती काही पालकांना सांगता यायची नाही.

 मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे, 

ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. 

अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीखही १ जून असल्याचं दिसून येतं. 

अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे.

 जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत. 

पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती.  त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस या दिवशी साजरा करताहेत.

⭕ राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

प्रस्तुती — श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मैत्रिण… कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा पाटील (मनप्रीत)

अल्प परिचय 

सीमा ह.पाटील. (मनप्रीत)

शिक्षण – M.com. D.ed.

सम्प्रति – पंधरा वर्षे हायस्कुल शिक्षिका.

सध्या प्रायव्हेट ट्युशन 10th पर्यंत आणि एकयशस्वी  उद्योजिका.

आवड-  नाटकपाहणे,भावगीतांचे, सुगम संगीताचे कार्यक्रम एन्जॉय करणे. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे.वाचन,भावलेल्या प्रसंगावर लिखाण, कथा लेखन , कविता लेखन , चारोळ्या लेखन .अनेक लेखन स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम केले आहे.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभ हस्ते ‘प्रीतिसरी ‘ हा  चारोळी संग्रह  प्रकाशीत झाला आहे. थोड्याच दिवसात काव्यसंग्रह प्रसिद्ध होत आहे. सभोवतालचा परिसर ‘या सदरांतर्गत महाराष्टातील अनेक किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

 सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. विविध महिला ग्रुप मध्ये सक्रिय. तसेच  राजकीय  सक्रिय सहभाग.

अलीकडे ‘गझल’ हा लिखाणाचा अतिशय सुंदर आणि माझा आवडता प्रकार शिकत आहेत.

? काव्यानंद ?

 ☆ मैत्रिण…कै. शांता शेळके ☆ रसग्रहण.. सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

कै. शांता शेळके

मैत्रिण – 

स्वप्नातल्या माझ्या सखी

कोणते तुझे गाव?

कसे तुझे रंगरुप

काय तुझे नाव?

 

कशी तुझी रितभात?

कोणती तुझी वाणी?

कसे तुझ्या देशामधले

जमीन, आभाळ, पाणी?

 

लव्ह्याळ्याच्या मुळांतून

झिरपताना पाणी

त्यात पावले बुडवून तू ही

गुणगुणतेस का गाणी?

 

सुगंधित झुळका चार

केसांमध्ये खोवून

तू ही बसतेस ऊन कोवळे

अंगावर घेऊन?

 

काजळकाळ्या ढगांवर

अचल लावून दृष्टी

तू ही कधी आतल्याआत

खूप होतेस कष्टी?

 

कुठेतरी खचित खचित

आहे सारे खास,

कुठेतरी आहेस तू ही

नाही नुसता भास.

  • शांता शेळके

☆ रसग्रहण ☆

आज खूप सुंदर आणि हळवे भाव व्यक्त करणारी जेष्ठ कवयित्री शांता यांची ‘मैत्रीण ‘एक अप्रतिम  कविता !सादर केली आहे.

 स्वप्नातल्या माझ्या सखी

 कोणते तुझे गाव?

 कसे तुझे रंगरुप

 काय तुझे नाव?

कवयित्री स्वप्नातल्या आपल्या सखीशी संवाद साधत असताना अगदी अनोळखीपणे विचारत आहेत, अग सखी तुझे गाव कोणते? तू दिसतेस कशी? आणि तुझे नाव काय?

म्हणजेच कधी कधी आपल्या स्वतः मधीलच काही वैशिष्ट्ये आपणास वेगळी वाटू लागतात. आणि याच वैशिष्ट्यांना आपण असे प्रश्न विचारतो म्हणजेच आपण एखादे आपले मत मांडत असू तेव्हा किंवा जेव्हा आपण एखादी भूमिका पार पाडत असतो किंवा तेव्हा त्याबद्दल आपण जर साशंक असू अशा वेळी द्विधा मनस्थिती  बद्दल आपण आपल्याच मनाला प्रश्न विचारत आहोत असं काहीसं या ओळीतून कवयित्रीला सांगावेसे वाटते असे वाटते.

 कशी तुझी रितभात?

 कोणती तुझी वाणी?

 कसे तुझ्या देशामधले

 जमीन,आभाळ, पाणी?

 लव्ह्याळ्याच्या मुळांतून

 झिरपताना पाणी

 त्यात पावले बुडवून तू ही

 गुणगुणतेस का गाणी?

वरील कवितेतून कवयित्री आपल्या मनात लपलेल्या सखीच्या कानात हळूच प्रश्न विचारत आहे माझी जी व्यक्त होण्याची पद्धत आहे तीच तुझी स्वतःची आहे का? की काही वेगळ्या परंपरा, रूढी यांच्या प्रभावाखाली येऊन तू काही निर्णय घेत तर नाहीस ना?

तू जे काही वर्तन करतेस त्यातून तुला नक्कीच आनंद मिळत आहे ना? असं कवयित्री अगदी हळव्या भावनेसह गुणगुणतेस ना गाणी अशा सुंदर शब्दांत विचारत आहेत.

 काजळकाळ्या ढगांवर

 अचल लावून दृष्टी

 तू ही कधी आतल्याआत

 खूप होतेस कष्टी?

 कुठेतरी खचित खचित

 आहे सारे खास,

 कुठेतरी आहेस तू ही

 नाही नुसता भास.

वरील ओळी मधून कवयित्री शांता शेळके यांनी जीवन जगत असताना प्रत्येक स्त्री च्या मनाची तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतानाही भविष्यातील काही गोष्टींचा विचार करून नाईलाजाने गप्प बसावे लागते तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते तिचे अगदी भावस्पर्शी वर्णन वरील कवितेतील कडव्या मधून केले आहे त्या म्हणतात पाण्याने गच्च भरलेल्या कृष्ण ढगासारखी म्हणजेच पापणी आड सजलेल्या अश्रू ना बाहेर न येऊ देता अगदी प्रयासाने तू ते थांबवतेस ना, हो अगदी नक्की मी तुला अगदी जवळून ओळखते, कारण मी तुझी जिवलग सखी ना?

म्हणजेच प्रत्येक स्त्री च्या मनात एखाद्या दुःखी प्रसंगी लपलेल्या एका असहाय्य  भावनेची समजूत काढताना कवयित्री इथे दिसत आहेत !!

© सीमा पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print