मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

वाकळ…श्री.दि.इनामदार ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ

कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल

 

पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर

पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर

 

कुणी शेला झटकला ,पीठ उडुन जाईना

बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना

 

झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ

ठिगळाच्या  पांघरुणा, शेला म्हणती सकळ

 

फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ

विठ्ठलप्रेमे भरुन आले, जनी रडे घळघळ…

 

संत जनाबाईला  दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून  तिची वाकळ घेऊन जातो.

ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार यांनी लिहिलेली  “वाकळ” नावाची एक सुंदर कविता . 

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पं. शिवकुमार शर्मा…. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

 

☆ पं. शिवकुमार शर्मा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या सुप्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचा संतुरवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली होती. सुरेख, देखणा, काश्मीरी सफरचंदासारखा टवटशवीत चेहरा,धवल केसांचा पसरलेला झाप, अंगातला जरकाडीचा सोनेरी कुर्ता,पायजमा,खांद्यावरची वेलबुट्टीची शाल पांघरलेला हा संगीत योगी  पाहताना मन भरुन गेले. वादनापूर्वी त्यांनी त्या अफाट श्रोतृवर्गाला नम्रपणे अभिवादन केले.आणि म्हणाले,”हे माझं भाग्य आहे की ज्या महान गायकाने सुरु केलेल्या या संगीत महोत्सवात मला माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे…मै पुरी कोशीश करुंगा..!!”

इतक्या महान कलाकाराची ही नम्रताच सदैव लक्षात राहण्या सारखी होती.

नंतरचे दीड दोन तास त्या तंतुवाद्यातून निर्माण  होणार्‍या संगीत लहरीवर श्रोते नुसते तरंगत होते. स्वर्गीय आनंदाचीच ती अनुभूती होती.

पंडीत शिवकुमार शर्मा हे मूळचे जम्मु काश्मीरचे. त्यांचे वडील ऊमा दत्त हे प्रसिद्ध गायक व तबला वादक होते.

वयाच्या पाचव्या वर्षीच शिवकुमारजींना त्यांनी गायन व तबलावादनाचे धडे द्यायला सुरवात केली.संतुर हे काश्मीरी लोकसंगीतातलं तंतुवाद्य. त्यांच्या वडीलांनीच असा निश्चय केला की,शिवकुमार हे भारतीय बनून प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय संगीत संतुरवर वाजवतील. वयाच्या तेराव्या वर्षापासून शिवकुमारजींने संतुर वादनाचे शिक्षण सुरु केले.

संगीतात संतुर व बासरीला आज मान्यता मिळाली असली तरी पूर्वी शास्त्रीय सभेमध्ये यांना समाविष्ट करुन घेण्यात विरोध होता.ही वाद्ये लोकसंगीतातील मानली जात होती. पार्श्वसंगीतात, पडद्यावर कुणी पहाडावर असेल तर,बासरी आणि खळखळत्या झर्‍याच्या काठी असेल तर संतुर अशीच धारणा त्यावेळी  संगीत क्षेत्रात होती. परंतु हरीप्रसाद चौरसिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा या जोडीने मात्र या लोकसंगीतातल्या वाद्यांना शास्रीय संगीताच्या प्रवाहात आणले.

संगीत हा ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. तपश्चर्या आणि साधनेच्या मार्गाने पंडीतजींनी प्रचंड यश मिळविले आणि संतुर या वाद्याला सांगितीक प्रतिष्ठा मिळवून दिली.नवं परिमाण दिलं. तसेच पुढच्या पीढीसाठी एक आयता रंगमंच मिळवून  दिला.

या त्यांच्या योगदाना बद्दल कुणी भरभरून कौतुक केलं तर ते एव्हढंच म्हणत, “मी फक्त प्रयत्न केला…!”

केव्हीडी नम्रता. तिळमात्रही अहंकार नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कारकिर्द सुरु झाली.

व्ही. शांताराम यांनी त्यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करण्यासाठी त्यांना पाचारण केले.

त्यानंतर त्यांनी संतूरवादनाचे खासगी कार्यक्रम सुरु केले.

ते उत्तम तबला वाजवत. गाईड मधील, ‘पिया तोसे नैना लागे रे..’ या गाण्यात त्यांनी तबला वाजवला आहे. पं. जसराजजींनाही त्यांनी तबल्याची साथ दिली आहे. तरुणपणी

मिळालेल्या यशाने त्यांना ग ची बाधा झाली नाही. टीम वर्कचे महत्व त्यांना होते. आणि म्हणूनच ते  एस डी बर्मन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचमदा यांचे आवडते वादक होते.!

त्यांनी इराणी संतुरचाही अप्रतीम वापर केला. बॉबी, दाग, एक नजर या चित्रपट गीतांत हे विलक्षण सुंदर संतुर वादन ऐकायला मिळतं.

प्रतिभा आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटगीतांना अप्रतीम चाली दिल्या. आणि त्या लोकप्रिय झाल्या. सिलसिला या चित्रपटातली गाणी सर्वज्ञातच आहेत.

अंतरराष्ट्रीय संतुर वादक म्हणून ते तुफान प्रसिद्ध झाले.

त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण , संगीत नाटक अॅकॅडमी च्या पुरस्काराने सन्मानित केले.

ज्या शास्त्रीय संगीतात संतुर वाद्याला स्थान नव्हते ,त्या संगीत सभा या वाद्याविना अपूर्ण ठरू लागल्या.या वाद्यावर दरबारी,मालकंस सारखे कठीण, अशक्य रागही त्यांनी सहजपणे वाजवले.  संगीतातला मिंड हा बहारदार प्रकारही त्यांनी लीलया हाताळला. काश्मीर संगीतातलं संतुर वादन काहीसं सूफी प्रकारातलं असतं. पण पंडीतजींनी या वाद्याची परिभाषाच बदलली. आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात या वाद्याला उच्च स्थान मिळवून दिलं.

त्यांच्या वडीलांचं स्वप्नही पूर्ण केलं.चित्रपट सृष्टीतल्या झगमगत्या प्रसिद्धीकडे त्यांनी पाठ फिरवली. आणि भारतीय शास्त्रीय संगीतातच लक्ष केंद्रीत केले. सर्व तंत्र आणि परंपरेच्या पलीकडे त्यांचं वादन होतं. त्यांचं संतुर वाजत नसे तर गात असे…

१३जानेवारी १९३८ ला जम्मु शहरात जन्मलेल्या या संगीतदूताची प्राणज्योत १०मे २०२२ ला अनंतात विलीन झाली. पण हा संगीतात्मा अमर आहे. मृत्यु हे सत्य आहे पण अस्तित्व हे चिरंजीव आहे. त्याला अंत नाही.

या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

 ☆ पुष्टिपती विनायक ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

(पुष्टिपती विनायक जयंती निमित्त) 

विघ्नहर्ता गजानन हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाखातील पौर्णिमेला पुष्टिपती विनायक म्हणून अवतार घेतला. 

नुकत्याच झालेल्या पुष्टिपती विनायक जयंती निमित्त गणरायाच्या या विशेष अवताराविषयी जाणून घेऊया.

सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे. गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा काही पुराणांमध्ये आढळतात. 

भगवान गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीच्या व्रतोपवासाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. जाणून घेऊ या पुष्टिपती विनायक जन्माची पूर्वपीठिका. 

गणरायाने भक्तांच्या रक्षणार्थ, कल्याणासाठी आणि राक्षसांचा पाडाव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. त्यापैकी पुष्टिपती विनायक हा एक अवतार असून, याचा उल्लेख मुद्गल पुराणात आढळून येतो. यातील कथेनुसार, प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांत उच्छाद मांडला होता. या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली. जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले. दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले. दुर्मतीपुढे टिकाव न लागल्याने महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले.

दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर देवऋषि नारदमुनींनी शिवनाथ व पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्यास सूचविले. दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी. तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी, असे व्रत शिव-पार्वतीला सांगितले. नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रुपात साक्षात शिव-पार्वतीसमोर प्रकट झाले. गणेशाचे अतिभव्य स्वरूप पाहून शिव-पार्वती भयभीत झाले. त्यांनी गणेशाला बालरुपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली. त्यानुसार गणेश बालरुप धारण करून शिव-पार्वती समवेत राहू लागले.

एका बाजूला हे घडत असताना, दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला. कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला. यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टिपती विनायक असे झाले. पुष्टिपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे. एक दिवस पुष्टिपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली. तेव्हा पुष्टिपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले. यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठविले. परंतु, दुर्मतीने उलट पुष्टिपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले.

दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्विकार पुष्टिपती विनायकांनी केला. ते दोघेही युद्धाला एकमेकांसमोर उभे ठाकले. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. दुर्मतीने पुष्टिपती विनायकाच्या दिशेने आपला परशू फेकला. तो परशू त्यांनी दाताने अडविला. या धुमश्चक्रीत पुष्टिपती विनायकाचा दात तुटला. तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला. दुर्मतीच्या वधाने सर्व देवगण भयमुक्त झाले.

कालांतराने द्वापारयुगात श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाला आवाहन केल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टिपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टिपती विनायकाचे पूजन केले. त्याठिकाणी एक मंदिर उभारण्यात आले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारव्हा या गावात हे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनःप्राप्तीसाठी पुष्टिपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते. ते मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे. तसेच पुष्टिपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला. आणि अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या ‘वातापी’ या राक्षसाचा नाश केला, अशीही एक उपकथा असल्याचे पुराणात आढळून येते. 

चित्र साभार : https://maharashtratimes.com ›

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्या घरात बाई नाही त्या घरातला पुरुष म्हणतो, “घरात कोणी बाईमाणूस नसेल तर घराला घरपण येत नाही!

एखादं अवघड काम नाईलाजाने अंगावर घेतांना, घरातली एकटीच बाई म्हणते, “निपटायचं कसं हो सगळं? घरात कोणी पुरुषमाणूसच नाही ना!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे त्या घरातलं बाईमाणूस आणि पुरुषमाणूस असं दोघेही म्हणतात की , वर्षातून निदान पंधरा-वीस दिवस तरी कुठे तरी एकटंच जाऊन रहावं!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार तसा गुण्यागोविंदाने चालू नसतो त्या घरातलं पुरुषमाणूस विचार करत असतं की, घरांतलं बाईमाणूस निदान महिन्याभरासाठी माहेरी कां जात नाही?

तर बाईमाणूस विचार करत असतं की, “हल्ली घरातल्या या पुरुषमाणसाला पूर्वीसारखं ऑफिसच्या कामासाठी आठ-दहा दिवससुद्धा बाहेरगांवी कां बरं जायला लागत नाही?

माणूसप्राणी हा असाच आहे. रोजच्या कामांपासून, – अगदी आवडत्या कामांपासून, माणसांपासून सुद्धा – त्याला चार क्षण विरंगुळा हवा असतो. पण अनेकदा तसे क्षण येतच नाहीत. आणि तो चेहेर्‍यावर न दाखवता मनांतून काहीसा निराशच होतो.

पण आश्चर्याची गोष्ट अशी – घरातला संसार गुण्यागोविंदाने चालू असो किंवा नसो, विरंगुळ्याचे क्षण लाभलेले असोत किंवा नसोत, एक माणूस हरपला की दुसरा माणूस कोसळतो ! बधिर होतो ! भुतासारखा जगतो! खरं तर आता सारे क्षण विरंगुळ्याचे असायला हवेत !   पण तसं होत नाही. आता प्रत्येक क्षण भकास असतो ! माणूस हे खरोखरच न सुटलेलं अवघड कोडं आहे !

अखेर हे माणसांचं जग आहे. प्रत्येक माणूस आपली आपली भूमिका जगत असतो. त्यातून कोणाचीही सुटका नाही!!!

मग ‘बाईमाणूस’ काय आणि ‘पुरुषमाणूस’ काय !!

© सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?विविधा ?

☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज मी ज्या विषयाला स्पर्श करणार आहे, हो तुम्ही बरोबरच वाचलेत, स्पर्शच करणार आहे असे मी फार जबाबदारीने म्हणतोय, त्याचे कारण म्हणजे या विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे आणि त्या वरील दोन्ही बाजूने खूपच लिखाण अगोदरच झालेले आहे !

पण म्हणून माझ्या सारख्या, दोन्ही बाजूचे विचार वाचल्यावर, ज्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे, अशा माणसाने त्या विषयी आपले मत व्यक्त करू नये असे थोडेच आहे?

“तो” अस्तित्वात आहे का नाही या विषयावर शतकानुशतके वाद चालू आहेत आणि जिथ पर्यंत मानव जात या पृथ्वीतलावर आहे, तिथपर्यत ते वाद असेच चालू राहतील यात कोणाला काडीचीही शंका घेण्याचे कारण नाही.

“तो”आहे असे मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या मते, “त्याची” मर्जी असेल तरच झाडावरची पाने हलतात, फुले फुलतात एवढेच कशाला तर  “त्याच्या” मर्जीनेच चंद्र, सुर्य उगवतात अथवा मावळतात, पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते, वगैरे वगैरे. 

“तो’ नाहीच असे मानणारा जो वर्ग आहे, ते आपली बाजू मांडतांना विरुद्ध वर्गाची मते,  शास्त्रीय आधार देवून खोडून काढतात !

“त्याच्या” अस्तित्वाबाबतची दोन्ही गटांची मते, एक आहे रे आणि दुसरा नाही रे, आपण जर नीट वाचलीत, ऐकलीत,  तर आपल्या असे लक्षात येईल की ती दोन्ही मते इतकी टोकाची असतात की आपल्यास असे वाटवे की, एकजण उत्तर धृवा वरून बोलतोय तर दुसरा दक्षिण !  या मध्ये माझ्या सारख्या माणसाचा फारच म्हणजे फारच पोपट होतो बुवा  !  म्हणजे कधी उत्तर धृवाचा जे बोलतोय ते खरे वाटाते, तर कधी दक्षिणेचा जे सांगतोय ते पण पटावे !

मी या बाबतीत एक observe  केले आहे की, दोन्ही धृवावरील लोकांचे इतके प्रचंड brain washing झालेले असते, की त्यापैकी कोणीही दुसऱ्या बाजूचे मत ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. फक्त आपापल्या धृवावरुन आपणच कसे बरोबर आहोत, हेच  ओरडून ओरडून सांगत असतो आणि एकमेकास challenge करीत असतो !

हे उत्तर आणि दक्षिण ध्रुववाले आपापल्या विचाराने इतके भारावून गेलेले असतात, की

या दोन्ही गटांना आपला काही लोकांकडून राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतला जातो आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही म्हणा, अथवा त्या योगे आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या पुढे ते त्याकडे काणाडोळा करीत असावेत !

पण या सगळ्या गोंधळात, त्या दोन्ही गटांकडे तटस्थपणे पाहणाऱ्या लोकांचा मला फार म्हणजे फार हेवा वाटतो ! हे लोक दोन्ही बाजू अगदी लक्षपूर्वक ऐकल्याचे दाखवतात आणि शेवटी आपल्या जे करायचे आहे तेच करतात !

समजा, आपल्या अत्यंत जवळच्या अशा प्रिय व्यक्तीचे त्याच्या जीवावर बेतणारे,  operation एखाद्या डॉक्टरने आपले कौशल्य पणाला लावून, आठ-नऊ तास खर्च करून, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवले असतील, तर त्या डॉक्टर मध्ये एखाद्याला “तो” दिसू शकतो !

मला असे वाटत की “तो” कधी कुणाला कुठे दिसेल याचा नेम नाही.  एखाद्याने आपल्याला अत्यंत अडचणीच्या वेळी जर योग्य मदत केली असेल आणि आपले त्या वेळेस जीवावरचे संकट दूर झाले असेल, तर आपण “त्याला” मदत करणाऱ्या माणसात बघतो आणि त्याचे उपकार जन्मभर विसरत नाही !

मग मला प्रश्न असा पडतो की “तो” खरच आहे का नाही आणि असलाच तर त्याचे नेमके रूप काय ? यावर निर्गुण, निराकार असे शब्द आपल्याला ऐकवले जातात ! पण त्याने माझे तरी समाधान होत नाही बुवा !

माझ्या मते आपण जर “त्याला” नीट शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या रोजच्या जीवनात “तो” आपल्याला ठाई ठाई दिसत असतो, अनुभवायला येत असतो, पण त्या साठी आपली नजर पारखी पाहीजे !

आपल्याला सुद्धा अशी पारखी नजर लाभो हीच सदिच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त 155260 हा नंबर करा डायल… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ फक्त 155260 हा नंबर करा डायल… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(केवळ वाचकहितार्थ )

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे  पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’   हा नंबर करा डायल

काही मिनिटांत आपली  रक्कम होल्डवर जाईल

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे  कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती  http://cybercrime.gov.in/  या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप  संस्था जुळलेल्या आहेत.

(अग्रेषित : सायबर क्राईम पेट्रोल) 

(केवळ वाचकहितार्थ)   

प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखाद्या शब्दाचं वर्णन करायला त्याच शब्दापासून तयार झालेले विशेषणच चपखल ठरावे असं क्वचितच पहायला मिळते. अर्थ हा असाच एक दुर्मिळ शब्द म्हणावा लागेल. ‘अर्थ या शब्दाचे सार्थ वर्णन करायला ‘अर्थपूर्ण’ हेच विशेषण यथार्थ ठरते’ या एकाच वाक्यात आलेले अर्थपूर्ण, सार्थ, यथार्थ, हे विविधरंगी शब्द ‘अर्थ ‘ या शब्दाच्या संयोगानेच जन्माला आलेले असणे हा योगायोग नव्हे तर आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्याची सुंदर झलकच म्हणता येईल.!

‘अर्थ’ या शब्दाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अर्थ या शब्दात परस्परभिन्न असे दोन अर्थ सामावलेले आहेत आणि त्या दोन्ही अर्थांनाही अंगभूत अशा खास त्यांच्याच विविध रंगछटाही आहेत.

अर्थ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे धनसंपत्ती.आणि दुसरा अर्थ आशय.

या दोन्ही अर्थांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे इतर असंख्य शब्दही आकाराला आलेले आहेत आणि त्या शब्दांतही ‘अर्थ’ आहेच. अर्थपूर्ण शब्दांचं हे फुलणं पाहिलं की एक सुंदर दृश्य माझ्या मनात अलगद तरळू लागतं. एखादं बी जमिनीत पेरावं तसा समजा एखादा शब्द पेरता आला असता तर तो अंकुरल्यानंतर त्याला कोवळी पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत तसंच काहीसं ते दृश्य अर्थ शब्दाला सर्वार्थाने सामावून घेतेय असे जाणवत रहाते.’अर्थ’ शब्दाच्या संयोगाने आकार घेतलेले असंख्य शब्द पाहिले की त्यांना दिलेली ही शब्दफुलांची उपमा कशी समर्पक आहे हे लक्षात येईल.

अर्थ या शब्दाच्या संयोगातून जन्माला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द अर्थ या शब्दाचे सौंदर्य अधिकच खुलवत रहातात.अर्थ शब्दाच्या ‘धन’ ‘संपत्ती’ या अर्थाशी इमान राखत अर्थशास्त्र, अर्थसंकल्प,अर्थभान,अर्थसंचय सारखे असंख्य शब्द आपापल्या वेगवेगळ्या अर्थ आणि रंगांच्या छटांनी अर्थपूर्ण झालेले आहेत. या शब्दाचे आशय, अभिप्राय, कस हे अर्थरंग सांभाळत असतानाच स्वतःच्या वेगळ्या छटाही कौतुकाने मिरवणाऱ्या सार्थ,परमार्थ,स्वार्थ,कृतार्थ, निरर्थक,सार्थक, यासारख्या असंख्य शब्दांची खास त्यांची अशी वैशिष्ट्येही आहेतच. उदाहरणार्थ ‘निरर्थक’ हा शब्द.या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवण्यासाठी अर्थशून्य, अर्थहीन,अनर्थक, व्यर्थ, पोकळ, वायफळ, भाकड, अकारण, अनावश्यक असे अनेक शब्द दिमतीला हजर होतात.सार्थ या शब्दाचा अर्थ अर्थासह,अर्थयुक्त यासारखे शब्द सोपा करुन सांगतात.स्वार्थ या शब्दाचे स्पष्टीकरण देणारेही मतलब, स्वहित,आत्महित,स्वसुख, आपमतलबीपणा असे अनेक शब्द आहेत.

एखाद्या शब्दाचे असंख्य पैलू उलगडून दाखवण्यासाठीच अगणित म्हणी रुढ झालेल्या असणं ऐकतानाही  अविश्वसनीय वाटेल पण ‘स्वार्थ’ या शब्दाला हे भाग्य लाभलेलं आहे.याचं प्रत्यंतर देणाऱ्या…’आवळा देऊन कोहळा काढणे’, ‘आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे’, ‘तुंबडी भरणे’,’आधी स्वार्थ मग परमार्थ’, ‘तळे राखी तो पाणी चाखी’, ‘आप मेले जग बुडाले’, ‘कामापुरता मामा’,’गरज सरो न् वैद्य मरो’ या आणि अशाच कितीतरी..!

हे पाहिले की भाषेचे नेमके सौंदर्य अशा अनेक शब्दफुलांच्या सौंदर्यातच सामावलेले आहे याची प्रचिती येते.मराठी भाषेचे अनेक प्रकारचे भाषालंकार,अर्थालंकार आहेत.यातील अनेक भाषालंकारांमधील ‘अर्थांतरन्यास’ या अलंकाराच्या रुपाने ‘अर्थ’ या शब्दाच्या सौंदर्यालाही खास सन्मान मिळालेला आहे..!

‘अर्थ’ या शब्दाला हिंदू तत्वज्ञानातही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मतत्वज्ञान मानवी जीवनाचा अर्थ म्हणजेच पुरुषार्थ प्रदान करते. अशा पुरुषार्थाचे चार घटक धर्म,अर्थ, काम न् मोक्ष असे आहेत. म्हणजेच अनुक्रमे कर्तव्य, साफल्य, आनंद आणि मुक्ती ! यातील साफल्य या अर्थाने अर्थ हा शब्द माणसाच्या आयुष्याचे मर्मच अधोरेखित करतो.

मराठी भाषेचे सौंदर्य खुलवलेय ते अशाच असंख्य शब्दांनी ! त्यातही त्याच्या वर उल्लेखित सर्व विशेष आणि विविध कारणांमुळे मला सर्वार्थाने ‘अर्थपूर्ण’ भासतो तो ‘अर्थ’ हाच शब्द..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दे डाय रिच…!!— जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

श्री विनय माधव गोखले

 ? मनमंजुषेतून ?

☆ दे डाय रिच…!!— जयंत विद्वांस ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

(नकुशा मालमत्ता )

एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत. फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत. ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत. त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले. 

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो. तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.

 मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते. खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते. 

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची.  नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार. 

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते. गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.

 मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.

 असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले, 

‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’ 

मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल. नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’ 

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

आपली मानसिकता कशी आहे– आपल्याला मुलांकडून पैसे घ्यायला- त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पैसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.

आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.

– आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.

 असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात.. 

दे डाय रिच!*

— जयंत विद्वांस

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वभाव पदार्थांचे— ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वभाव पदार्थांचे— ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचेही असते, असं माझं मत आहे.

इडली ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं.

तुपाबरोबर नि दुध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते. कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही. पण एक नंबरची लहरी बरं का ही! कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल.

मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या ! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध  हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत. रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

भेळ नटरंगी. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा – कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.

उप्पीट नि पोहे हे “सामान्य जनता” या वर्गात मोडणारे. म्हणजे अगदी सहनशील! यांच्या वाट्याला कधी कौतुकही येत नाही नि कधी टीकाही येत नाही. ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही. पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरीबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा मात्र जरा खास व्यक्तीमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं! सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी “नशीबवान”. महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं.. बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.

वडा, भजी हे पदार्थांमधले हिरो. लोकप्रिय… पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल! पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावावरून आठवण आली ती पावभाजीची. सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात 

गुण्या – गोविंदाने नांदवून आपला स्वत:चा चवीचा ठसा उमटवणारी खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड माणसांची दुनियाही अशीच रंगरसीली!

प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर! अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी. कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली! शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…

“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचीत झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही. पण नसली तर मात्रं नाडवते.

लाडू हा चराचरातून तयार होणारा.

तूप आणि साखर हे याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा. रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा. साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे! हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी ही पक्वानांची राणी!

नाजुक-साजुक स्वभावाची.. महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी  हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!

जिलेबी…नटरंगी.. पण बिनभरवशाची.. कधी आंबट तर कधी गोड.. आज कुर्र्यात असणारी कुरकुरीत पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस..

वर्ण काळा असला तरी अंगी गुण असले की साऱ्याचे आपण लाडके होतो…हे शिकवणारा गुलाबजाम!

ओठाला मुरड घालून पोटातला आनंद पोटातच ठेवणारी करंजी!

सगळे गुणीजन भोवताली असताना आणि पटकन सांगता येईल असा एकही गुण अंगी नसताना  ज्याच्याशिवाय पान वाढलच जात नाही ते म्हणजे  पोळी,भाकरी … आत्मविश्वासाचा वारसा घ्यावा तर त्यांच्याकडून..ना रूप, ना रंग, ना ठसा उमटवणारी चव..पण वर्षानुवर्षे त्यांचं महत्त्व अबाधित आहे.

भाताची मात्र कथा आगळीच…

भात मनमिळावू.

भाता तुझा रंग कसा?….

ज्यात मला मिसळाल तसा…

वरणात रंगून पिवळाधम्म होणारा, साखरभातात केशरात केशरी होऊन जाणारा, पुलावात 

रंगीबेरंगी तर दहीभातात पांढराशुभ्र! याला कशाचच वावडं नाही. दहीभात होऊन महादेवाच्या पिंडीवर विराजमान होतो नि चिकन किंवा मटणाशी दोस्ती करून इफ्तार पार्टीतही शामील होतो. सर्वधर्मसमभाव याच्याकडून शिकावा. चटकदार मसालेभाताच्या रूपात, तिखट बिर्याणीच्या थाटात सादर होणारा भात हा  गोड केशरी  साखरभाताच्या रूपातही प्रकट होतो. रूप, रंग, स्थळ, काळ, वेळ, प्रसंग… कशालाच न जुमानणारा हा भात माणसाला आयुष्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत आणि  त्यांनतरही प्रामाणिक साथ देतो.

म्हणूनच दक्षिण भारतात त्याला “अन्न” म्हणतात. अन्न बनून एकट्याने माणसाला संपूर्ण आयुष्यभर पोसायचं सामर्थ्य भातात आहे. म्हणून तर जन्मापासून सहाव्या महिन्यात भाताच्या पेजेने सुरू होणारी खाद्ययात्रा मेतकूट भात, वरणभात, आमटीभात, मसालेभात, वडाभात, पुलाव, बिर्याणी करत पुन्हा वरणभात, मेतकूटभात, पेज या क्रमाने माघारी येते नि भाताच्या पिंडाने संपते… इहलोकीच्या प्रवासानंतरही वारसदारांनी ठेवलेल्या दहीभाताच्या रूपाने ती अनंतकाळ तशीच सुरू राहते.. …. 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र आणि श्री रामकृष्ण यांची पहिली भेट १८८१ च्या डिसेंबरमध्ये दक्षिणेश्वरला झाली. ‘मन चलो निज निकेतने’, म्हणजे, ‘हे माझ्या मना आपल्या घरी परत चल’,आणि ‘जाबे की दिन अमार विफले चलीये’, म्हणजे, ‘माझे सारे दिवस असे व्यर्थच जाणार काय? अशी दोन बंगाली गीतं नरेन्द्रने मोठ्या आर्ततेने म्हटली आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व वेगळेच होते, कलकत्त्याच्या भौतिक शहरातून आलेला असूनही आध्यात्मिक धारणा असलेला नरेंद्र बरोबरच्या मित्रांमध्ये  वेगळा उठून दिसत होता. जे रामकृष्णांना  अत्यंत भावले होते. नरेंद्रचे भजन म्हणणे इतरांहून निराळे होते. त्या आर्त स्वरांनी श्री रामकृष्णांच्या अंत:करणाची तार छेडली गेली होती. “पहा पहा साक्षात सरस्वती त्याच्या उज्ज्वल दर्शनात प्रकट होत आहे”. असे उद्गार त्यांनी यावेळी भक्तांसमोर काढले होते.

नरेंद्रचे सुप्त आध्यात्मिक गुण रामकृष्णांनी ओळखले होते. त्यांनी नरेंद्रला विचारले, “रात्री झोपी जाताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का?” नरेंद्र म्हणाला, “हो दिसतो”. त्यावरून रामकृष्णांनी ओळखले की हा जन्मत:च ध्यानसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले होते, “किती उशीर केलास? प्रपंचात बुडालेल्या या सार्‍या लोकांच्या कथा ऐकून माझे कान किटून गेले आहेत. माझ्या खोल मनातील अनुभव ऐकून समजून घेणार्‍याची मी कधीची वाट पाहतोय. हे प्रभो मी जाणून आहे, की नारायणाचा अवतार असा जो प्राचीन नर ऋषि तो तू आहेस आणि मानव जातीच दु:ख हरण करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहेस”. आपलं असं कौतुक ऐकून नरेंद्र गोंधळून गेला होता.      

पुढे अजून भेटी झाल्या. रामकृष्णांना नरेंद्रची भेट रोज व्हावी असे वाटू लागले. श्रीरामकृष्णांच्या  रूपाने देव पाहिलेली व्यक्ती आपल्याला अखेर भेटली याचा आनंद नरेंद्रला झाला होता. वेगवेगळे अनुभव येत होते. नरेंद्र ब्राम्ह समाजात जात होताच. मूर्तिपूजा निषेध हा तिथल्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत होता. इकडे श्री रामकृष्ण तर, कालिमाता मानणारे, तिन्ही त्रिकाल  पूजाअर्चा करणारे मूर्तिपूजक होते. मनात द्वंद्व चालू होतच. या सगळ्याचा मेळ लावायचा नरेंन्द्र प्रयत्न करत होता. काहीतरी सखोल अनुभूति त्यांच्यात आहे हे जाणवत होते. पवित्र अंत:करणाचा, सर्व मानवजातीने आदर करावा अशा योग्यतेचे ते आहेत असे मनाला पटले आणि नरेन्द्रने त्यांना मनोमन नमस्कार केला. जवळ जवळ चार वर्षे नरेंद्रला श्रीरामकृष्णांच्या सहवासात येऊन झाली होती.

श्रीरामकृष्ण यांच्याकडे रोज भक्तगण येत असत. त्यांच्याशी ते संवाद साधत असत, एखादा अवघड सिद्धांत स्पष्ट करताना ते छोट्या छोट्या कथांचा वापर करत आणि समजावून  सांगत असत. त्यांचे बोलणे हे नुसत्या ग्रंथांतील सिद्धांताच्या आधारवर नसे तर ते स्वत:च्या अनुभवावर आधारित असायचे. एकदा असेच भक्तांशी संवाद चालू असताना श्रीरामकृष्ण सांगत होते, “लोक आपल्यावर टीका करतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपला मार्ग सोडू नये. कुत्री भुंकत असतात पण हत्ती आपल्या मार्गाने जात राहतो तशी आपली वृत्ती असावी”. असे विवेचन चालू असताना त्यांनी नरेंद्रला विचारले, काय नरेन तुला काय वाटतं ?ईश्वराची भक्ती करणार्‍यांची संसारी लोक त्यांच्या मागे निंदा नालस्ती करतात. तुझ्या माघारी लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तर, तू काय करशील”? नरेन्द्रने उत्तर दिले, “ ती माणसं म्हणजे,उगाच भुंकणारी कुत्री आहेत. असं म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीन”. यावर श्री रामकृष्ण म्हणतात, “नाही नरेन एव्हढी कठोर प्रतिक्रिया होता कामा नये. अचेतन सचेतन अशा सार्‍या चराचरात तो ईश्वर भरून राहिलेला आहे. तेंव्हा कोणी  कसाही वागो, त्याच्याबद्दल योग्य तो आदर आपण ठेवला पाहिजे”.लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करावे. खरे पण त्या टीका करणार्‍यांबद्दल ही आपण आपल्या मनात दुजाभाव धरू नये. जो वाईट वागतो, त्याचेही आपण हिताच चिंतावे. असा उपदेश यातून दिसतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print