मराठी साहित्य – विविधा ☆ “सरप्राईज ट्रीप…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सरप्राईज ट्रीप…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा का आपल्या मनाने आस्तिकता स्विकारली की आपली प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा ही बसतेच. कुठलीही मुर्ती, फोटो दिसला की आपण आपोआपच नमस्कार करतो. कुठलाही प्रसाद मिळाला की तो लगेच डोळे मिटून भक्तीभावाने ग्रहण करतो. कुठल्याही देवाचा अंगारा कपाळाला लावतो,पण जेव्हा कधी आणीबाणीची परिस्थिती येते, संकटाचा सामना करायचा असत़ो, काही निर्णायक प्रसंग समोर उभे ठाकले असतात, किंवा अतीव सुखाची अचानक अनुभूती झालेली असते तेव्हा मात्र हटकून आपल्या डोळ्यासमोर आपलं परम दैवतच येतं,कठीण प्रसंगी आपण जास्तीत जास्त त्याचाच धावा करतो वा अतीव सुखाचे क्षण उपभोगतांना क्षणोक्षणी त्या परम दैवताचीच आठवण करतो.

अर्थातच आपली प्रत्येकाची श्रद्धास्थान ही वेगवेगळी असू शकतात. कारण ह्या श्रद्धेचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडल्या गेलेला असतो. आपलं परम दैवतं हे आपण अनुभवांनी घरात नित्य बघितल्याने, मनापासून निवडलेलं असतं. काल महाशिवरात्र झाली. माझंही परम दैवत शिवशंभो महादेव. त्यावरून ब-याच आठवणी जाग्या झाल्यात, गाठीशी आलेल्या अनुभवांच्या पुरचुंडीची गाठ जरा सैलसर झाली

महाशिवरात्री ला बँकेला सुट्टी असते त्यामुळे जरा निवांतपणा. ह्या दिवशी दोन्ही वेळी उपास असतो. त्यामुळे फराळाला लागणारी निम्मी तयारी ही अधल्या दिवशी करता येते, नव्हे ती तशी करुन ठेवणचं जास्त सोयीचं पडतं.

तसं तर नेहमीच देवळात वा मंदिरात सकारात्मक उर्जा तेवत असते. शांत व पवित्र वातावरणामुळे मन पण प्रसन्न राहातं. काही विशिष्ट दिवस हे त्या दैवताच्या पूजेसाठी खास असतात अशी आपल्या मनाची धारणा असते. हे दिवस सुखद भावनिकदृष्ट्या आपल्याला पाठबळं देतात. आपल्याला ज्या देवाची ओढ असते,ज्याच्यावर आपली मनापासून भक्ती असते,ज्याचा दर्शनासाठी आपल्याला नित्य जावसं वाटतं तेच आपलं परमं दैवतं असतं.

मागील महाशिवरात्रीला लिहीलेल्या पोस्ट मध्ये मी यवतमाळ व अमरावती मधील प्राचीन जागृत शिवमंदारांबद्दल लिहीले होते. माझे स्वतःचे परमदैवत शिवशंभू महादेव तर आमच्या “अहों”चे परमदैवत प्रभू श्रीरामचंद्र. ज्या नवराबायकोंच्या आवडीनिवडी ह्या विरुद्ध असतात ते “काँमन नवराबायको”. आणि विरुद्ध आवडीनिवडी असून सुद्धा जे परस्परांच्या आवडींचा मान ठेवतात, आदर करतात ते “स्पेशल नवराबायको”. त्यामुळे माझ्या शिवभक्तीचा आदर करीत आठ दहा वर्षांपूर्वी “अहोंनी” मला सरप्राईज ट्रीप म्हणून सोरटीसोमनाथ येथील महादेवाचे दर्शन घडविले तो क्षण माझ्यासाठी अमुल्य क्षणांपैकी एक होता. गुजरात मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रम साठी जायचे असल्याने त्यांनी ह्या ट्रीप चे नियोजन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटीसोमनाथ. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

समुद्रकिनारी वसलेल्या ह्या मंदिरामध्ये खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण ,अद्भुत शांती आपल्याला अनुभवायला मिळते हा माझा स्वानुभव. तेथे देवळाच्या कंपाऊंड वाँलपर समुद्राच्या महाकाय लाटा आदळतात आणि जणू ह्या लाटांचे रुप बघून मनात,संसारात असलेल्या छोट्या छोट्या लाटा अवघ्या काही मिनिटात विरुनच जातात जणू.खूप जास्त माझ्या आवडीच्या ठिकाणां पैकी हे एक ठिकाण. तेथेच अहिल्याबाई होळकर ह्यांनी जिर्णोध्दार केलेलं अजून एक शिवमंदिराच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग आला.

ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जुनी आठवण परत एकदा जागी झाली. ह्यासाठीच कदाचित सणसमारंभ, उत्सव असावेत असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग  –५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.

मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं . पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.

कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते,  आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, ‘हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे’. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले  आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर,  एकट्या असणार्‍या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या  विरुद्ध लढणार्‍या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलासिंगा यांचे कौतुक केले.

आणि ….. मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले  यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले . याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.

याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन यावर सुरुवात करून ते म्हणतात, मद्रासला झालेला सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”

“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.

यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स…. जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जरी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? विविधा ?

☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.

जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.

काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.

कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.

शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?

वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.

काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्‍हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆

श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे

अल्प परिचय 

एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.

शिक्षण – एम,काॅम पर्यंत.

विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.

दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.

? विविधा ?

☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे 

नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:

बोलणे….कौस्तुभ परांजपे.

बोलणे……

बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….

बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.

आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.

बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.

बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे  लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.

काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.

राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.

बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.

बोलण्यात ताकद आहे,  “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.

बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.

काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.

काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.

काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.

पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात‌. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.

मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.

असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

जळगाव-महाराष्ट्र

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमाचा सप्ताह…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 प्रेमाचा सप्ताह 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चौदा फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या सप्ताहातील शेवटचा पण सगळ्यात महत्वपूर्ण दिवस.व्हँलेंटाईन डे . हा दिवस सगळी मनाने आणि वयाने तरुण असणारी मंडळी कुणी उघडउघड तर कुणी मनोमन साजरा करतोच.

प्रेमात पडायला ना वयं लागतं ना रंगरुप. प्रेमात पडतेवेळी सगळीकडे ,सर्वत्र,चारोओर सदाबहार वातावरणच भासतं.तारुण्य हवचं असं काहीही नसतं,वयानं नसलं तरी मनानं चालतं.रंगरुपाची तर बातच सोडा कारण प्रेमात पडलेल्यांना सगळचं सुंदरच दिसतं.

प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी हो. प्रेम शब्द उच्चारल्यावर लगेच भुवया उंचावल्या जाण्याचं सहसा आपल्याकडे वातावरण. पण प्रेमात पडणं म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीवर, गोष्टीवर,वस्तुवर आपण मनापासून प्रेम करतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडणं

जवळपास अवतीभवती सतत हवीहवीशी, वावरावीशी वाटणं,तिचं अस्तित्व कायम मनाच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित असणं,कुठलाही निर्णय घेतांना सल्ल्यासाठी त्या व्यक्तीची हटकून आठवण येणं.पावलोपावली त्या व्यक्तीला आतल्या आवाजाने मनापासून पुकारणं अथवा आपल्या व्यक्तीने आवर्जून घातलेल्या सादेला अगदी समरसून प्रतिसाद देणं,इतकी साधीसोप्पी प्रेमाची परिभाषा असतांना आपणचं त्याला वेगळं वळणं देऊन जरा क्लिष्ट आणि आडवळणाचं बनवतो बघा.

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही काहीतरी वेगळेपण त्यात असतचं ।।

 

प्रेम म्हणजे काहींच्या मते त्यागात,

तर काहींच्या मते उपभोगात असतं,

असं हे प्रत्येकाचचं वेगवेगळं गणित असतं.।।

 

प्रेम हे काहींच्या मते अपेक्षा करण्यात असतं,

तर काहींच्या मते ते अपेक्षा पुरविण्यात असतं,

हे करणं वा पुरवणं दोन्हीही तसं रास्तच असतं,

असं हे प्रेमाचं समीकरणचं वेगवेगळं असतं.।।

 

प्रेम हे रोजच्या देखभालीत असतं,

तसचं ते लांबून काळजी घेण्यातही असतचं,

देखभाल असो वा काळजी करणं हे

वेगवेगळ्या त-हेनं शेवटी जीव लावणचं असतं।

 

प्रेम हे काहींच्या मते जवळीकेत असतं,

कधी प्रेम दुरून अनुभवण्यात पण असतं,

प्रेम हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्येत बसतं।

 

काहींच्या मते प्रेम हे घेण्यात असतं,

तर काहींच्या मते मनापासून ते देण्यातच असतं,

अश्या ह्या देवाणघेवाणीचं तंत्रच वेगळं असतं.।

 

म्हणून खरचं प्रेम हे प्रेमच असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं

भासतं, कधी वेगवेगळं पण भासतं।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

परिचय  

उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.

राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.

? विविधा ?

☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .

पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .

पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे 

1950 ते 1970 च्या दोन दशकात जन्म घेतलेले माझ्याशी सहमत होतील. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश केलेली ही पिढी.

पाचव्या वर्षी पर्यंतचे लालनपालन आजी-आजोबा,  काका काकू, आत्या,  आईबाबा,  मोठी भावंडे यांच्या सहवासात होत असे. आजोळचे मातुल लोक तर खूपच लाड करायचे. तिथे रागावणे, डोळे मोठे करणे हे नसायचेच. फक्तच कौतुक आणि लाड. चारच दिवस आलेली माहेरवाशीण आणि नातवंडे आजोळच्या घराचा परमानंद होता.

लालन म्हणजे लाड आणि पालन म्हणजे पाळणे. पाच वर्षांपर्यंत घरात भरपूर लाड असायचे. मुख्य म्हणजे लवकर उठण्याची सक्ती नसे. घरातले सगळेच खाऊ द्यायला, गोंजारायला,  सतत आसपास असत.

आज्जीनं दिलेला लाडू, आईनं दिलेल्या गूळ-शेंगा,  काकानं आणलेला ऊस, बाबांनी आणलेला सुका मेवा अशा खाऊच्या लाडाकोडातलं श्रीमंत बालपण!

आजोबांची काठी,  आत्याची पर्स,  काकांच्या चपला, बाबांच्या स्कूटरच्या किल्ल्या असे ऐवज लपवणे ही त्यावेळेस आवडती खोड होती. त्यावेळी त्यांच्या मूडप्रमाणे मारही भरपूर खावा लागे.

घरची मुले कुठे आणि काय खेळाहेत,  कशानं खेळत आहेत यावर घरातल्यांचं बारीक लक्ष असे. हेच पालन! अशा प्रेमळ शिस्तीच्या  लालनपालनात आयुष्याचा पाया भक्कम व्हायचा. घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी, ओढ आणि सुरक्षितता वाटण्याचं कारण हा भक्कम पायाच आहे.

पाच वर्षांनंतर गुढीपाडव्याला पाटीपूजन केले जायचे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जायची. पाटी आणि पेन्सिल या दोन वस्तू मुलांच्या हाती सोपविल्या जायच्या.

मुलांना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव करून दिली जायची. त्यावेळी पाटीपेन्सिल हे आयुष्यातलं पहिलं साधन. पुढे वही-पेन, फळा-खडू, हे तिचे वारसदार.

पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायची. एक एक अशा अकरा आकड्यांची.  देवासमोर पाटीपूजन करायचं. मग ती मुलांच्या स्वाधीन केली जायची. मार्च-एप्रिल मध्ये गुढीपाडवा येतो, महिनाभर पाटी जपून ठेवली जायची. कधीतरी दुपारी हळूच पाटीवर सूर्य, फूल, चांदोबा ,  झाड अशी चित्रे काढायचा प्रयत्न चालू असायचा.

जून मध्ये शाळा सुरू होते.  एका हातात डबा ( कडीचा स्टीलचा डबा)

आणि दुस-या हातात पाटी. खिशात पेन्सिलीचा तुकडा.  नवा कोरा शाळेचा ड्रेस. तो मापानं मोठाच शिवलेला, दोन वर्षांची बेगमी.  

अगदी सुरवातीला मण्यांची पाटी म्हणजे पाटीच्या अर्ध्या भागात दहा तारा , प्रत्येक तारेवर दहा, नऊ, आठ, सात असे एक पर्यंत रंगीत मणी ओवलेले.( आठवले का?) त्या मण्यांच्या मदतीने गणिताच्या दुनियेत पाऊल टाकलं.

त्यानंतर मणी नसलेली पाटी. तीही दोन आकारात उपलब्ध होती..लहान आणि मोठी. आम्हाला दुसरीच्या वर्गात लहान पाटी आणि तिसरी, चौथीला मोठी पाटी दिली गेली. आणखीही एक पाटी मिळायची, डबल पाटी.

म्हणजे दोन पाट्या जोडपट्टी लावून एकत्र केलेल्या असत. पेन्सिलीनं लिहिलेलं पुसलं जाऊ नये, म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे ठेवले जायचे.

एक अख्खी पेन्सिल शाळेत पोचेपर्यंत अख्खी असायची, लिहायला सुरुवात केली कि, तुकडे कधी व्हायचे ते कळतच नव्हते. मग ते तुकडे लिहून संपेपर्यंत नवी मिळायची नाही. त्यावेळी एकमेकांना पेन्सिलीचे तुकडे देऊन  मदत करण्यात खूप आनंद वाटायचा.

पेन्सिलीचा षटकोनी आकार इतका योग्य कि चिमुकल्या बोटांतली शक्ती गरजेपुरतीच लागेल, इतका विचार करून निर्मात्यांनी तयार केली असे.

अंगठा, तर्जनी आणि मधले बोट या त्रयींची पेन्सिलीशी दोस्ती झाली की पाटीवर अक्षरे व अंक डौलदारपणे उतरत. या तीन बोटांचा संबंध थेट मेंदूशी होऊन तिथल्या पेशी तरतरीत होऊन अपेक्षित परिणाम पाटीवर दिसे. अॅक्युप्रेशर हा शब्द खूप नंतर कळला. त्यावेळच्या शिक्षण तज्ञांनी इतक्या लहान वयाच्या मुलांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा सर्वांगाने विचार करून ही पद्धत आचरली असणार.

पाटी सांभाळणे म्हणजे लिहिलेले पुसले जाणार नाही  आणि पाटी फुटणार नाही याची काळजी घेणे,  पेन्सिलीचे तुकडे सांभाळणे ही जबाबदारी पाच ते नऊ वर्षाच्या बालकांवर होती .

पाटीवर लिहिल्याने अक्षर वळणदार आणि टपोरे होते, हे मात्र खरं!!

चौथीतून पाचव्या इयत्तेत गेल्यावर पाटी पेन्सिल चा निरोप घेऊन वही पेन यांची ओळख होत असे.

त्या बालवयातलं बालगीत ” शाळा सुटली पाटी फुटली,  आई मला भूक लागली ” हे गाणं प्रत्येक बालकाच्या मनातलं होतं.

कालानुरूप ते बालवयही मागे पडले,  त्याबरोबरच पाटीपेन्सिल ही कालबाह्य झाली.

इतका मोठा बदल होईल, अशी कल्पना ही कुणी केली नसेल.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री…ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही  अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते,  मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांनी विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रतींनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे  संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर केलेल्या कामावर पाणी चं फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता.  काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी  संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने.याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून, तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(दि. नऊ फेब्रुवारी हा कवी निदा फाजली यांचा स्मृतिदिन. त्यानिमीत्त त्यांच्या विषयी रेखाचित्रकार श्री.मिलिंद रतकंठीवार यांनी लिहीलेला लेख: निदा फाजली)

निदा चा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वर किंवा आवाज. खरे त्यांचे पाळण्यातील नाव हे मुक्तिदा (मुक्तीदाता तर नव्हे ?) हसन पण त्यांनी स्वीकारलेले टोपण नाव म्हणजे निदा… आणि फाजली हे काश्मीर मधील एका गावाचे नाव.. असे असले तरीही, त्यांची प्रतिभा ही सर्वांना कवेत घेणारी सार्वत्रिक होती, वैश्विक होती. त्यांच्या पत्नीचे नाव मालती जोशी. आणि गोड अश्या कन्येचे नाव तहरीर तहरिर चा अर्थ लिखित (प्रमाणपत्र).

त्यांच्या प्रागतिक धारणांमुळे पाकिस्तानात त्यांना गैरइस्लामिक मानत असत. त्यांच्या रचनांचा आशय, गर्भार्थ हा सर्वांच्या मानवी जीवनाला स्पर्श करणारा होता. मानवतेला साद घालणारा होता. दुनिया जिसे कहते हैं, जादू का खिलौना हैं, मिल जाए, तो मिट्टी हैं, खो जाये तो सोना हैं… धूप मे निकले हो तो, घटाओं मे नहा कर तो देखो, जिंदगी क्या हैं, किताबो को हटाकर देखो… कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कही जमी, तो कही आस्मा नही मिलता, होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज हैं.. एक आदर्श, वस्तुनिष्ठ, संयमी, विचारवंत पण खोडकर प्रियकर त्यांचे शायरीत, दिसायचा.. त्यांची शायरी, ही मला नेहेमीच भावायची त्यांचे रेखाचित्र काढावे असे माझ्या मनात होतेच, त्यांच्याशी संपर्क साधला असता, पुण्यात त्यांच्या आगमनानंतर त्यांचा निरोप आलाच…योगायोगाने प्रसिद्ध गझल गायक आल्हाद काशीकर यांचा देखील परिचय झाला. “मै बहुत खुश हूँ, कि आपने मुझे इस काबिल समझा” ” सर, मै होता कौन हूँ? आप की शायरी ही उतना हौदा रखती हैं..” मी शक्य तितका नम्र होत म्हणालो.. एका प्रथितयश शायर शी शक्य तेवढ्या मृदू भाषेत, शक्य तेवढ्या अदबीे ने बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो.. पण गतिरोधका वर वाहन जसे डचमळते तसा मी अडखळत होतो.

त्यांना पोर्ट्रेट दाखवताच, त्यांनी मनमोकळे पणाने कौतुक केले, त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील बोलावून घेतले.. आणि स्वाक्षरी केली… “मै भी, मै भी” असे त्यांची छोटीशी गोड कन्या तहरीर, उडी मारत हट्ट करू लागली . मी म्हणताच तिने देखील स्वाक्षरी केली. नंतर खूप दिलखुलास गप्पा झाल्या.. अगदी मुस्लिम मन ते मोदी सरकार. धर्म ते राष्ट्र.. संस्कृती ते राष्ट्र.. अगदी पाकिस्तान सुद्धा.. “दुश्मनी लाख ही सही, खत्म ना किजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहीये”

असा संदेश सरते शेवटी त्यांनी दिला. आपल्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले. “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को, हंसाया जाये…”

त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच, त्यांच्या सारख्या विचारवंत कलाकाराला आम्ही ओळखू शकलो नाही, याची रुखरुख लागून राहिली.

नऊ फेब्रुवारी या निदा फाजली यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण होणे.. हे नितांत गरजेचे आहे..

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 रोझ डे 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

ह्या निमीत्ताने तीन पिढ्यांमधील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.आपल्या आधीची पिढी  स्पष्टवक्ती आणि जरा फटकळच. त्या पिढीतील लोकं तोंडावर सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांच्या पचनी हा “रोझडे”.वगैरे अजीबातच पडत नाही. आमची पिढी ही तळ्यातमळ्यात करणारी पिढी, ना घरका न घाटका म्हणू शकता. संपूर्णपणे विरोधही नाही ह्याला आणि सरसावून साजरा करण्याइतकं धैर्य, स्वतः चे भ मत झडझडून सांगण्याइतका मोकळेपणाही नाही. आणि ह्या उलट आत्ताची पिढी हा उत्सव साजरा करतांना आधीच्या दोन पिढ्यांच्या मतांशी काहीच देणंघेणं नसलेली पिढी.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

अर्थातच हा आठवडा समारंभ म्हणून साजरा करण्याबाबत दुमत हे असतंच. काही मंडळी अगदी ह्याच्या विरुद्ध असतात तर काही मंडळी हा उत्सव  साजरा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. अर्थातच प्रेमाला कुणाचाच विरोध नसतो, विरोध असतो तो साजरा करण्याच्या पद्धतीबाबत.थोडक्यात हा उत्सव म्हणजे इंग्रजी वा विलायती वासंतिक उत्सव.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोजचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावर पाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा कुणी झाडावरचे फूल तोडून नेईल म्हणून वा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी आणि तो बुके बेधडक देणारी आणि घेणारी सुद्धा हल्लीची ही बिनधास्त, धीट आजची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच”रोझ डे”फुलावा ही सदिच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print