मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य  आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “लोकमान्य आणि गणेशोत्सव…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणेश स्थापनेमागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का?

गणेशस्थापने मागील लोकमान्य टिळकांचा असलेला उद्देश आज पूर्णत्वास गेलेला दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही याच फूटपट्टीत अपेक्षित असावं.  “हो” तर म्हणू शकतच नाही. उत्तर “नाही” हेच असले तरी नाही असे म्हणतानाही मनात अनेक विचार आणि प्रश्न वाहत राहतात.  त्याबद्दल लिहिण्यापूर्वी आधी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची उद्दिष्टे, हेतू काय होते, यावर बोलूया. 

देश पारतंत्र्यात होता.  ब्रिटिशांच्या गुलामगिरीमुळे  पिचलेला होता.  समाज विस्कटलेला होता.  अनेक जाती वंश, वर्ण, अंधश्रद्धा आज्ञान यामुळे समाज एकसंध नव्हता.  ब्रिटिशांचेच लांगुलचालन करणारा एक भारतीय वर्गही  होता.  मात्र सामान्य जनांना,   परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार याविरुद्ध  एकत्र आणणे हे जरुरीचे आहे असा विचार जाज्वल्य देशाभिमानी आणि राष्ट्रवादी,  स्वातंत्र्यप्रेमी लोकमान्य टिळकांच्या मनात सतत असे. 

वास्तविक तेल्या तांबोळ्यांचा नेता म्हणूनही त्यांचा उपहास करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या मते तर भारतीय असंतोषाचे ते जनकच होते.  ब्रिटिशांशी सामना हा केवळ अर्ज विनंत्या करून होणार नाही हे जसे टिळकांनी  जाणले होते तसेच लोक भावनेची ही नस त्यांनी ओळखली होती. जाती,  उपजातीच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून,  ही जनता एकत्र येऊ शकेल हे लोकमान्य टिळकांनी जाणले आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. म्हणजेच या गणेशोत्सवाची मूळ कल्पना स्वराज्यासाठी संघटन ही होती.  आणि म्हणूनच घराघरातला गणेशोत्सव त्यांनी हमरस्त्यावर आणला. हा खाजगी उत्सव सार्वजनिक केला.

लोकमान्य टिळकांनी १८९३साली  केसरी वाड्यात त्याची सुरुवातही केली.  समाज प्रबोधन हा या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मागचा मूळ हेतू होता.  या माध्यमातून  त्यांनी क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अलौकिक सांगड घातली.  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवले.  थोडक्यात लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे  राष्ट्रकारण होते.  एक अत्यंत उदात्त,  प्रेरक असे कारण होते.  धर्मकार्य हा केवळ बहाणा होता.  स्वराज्य निर्मितीची आस उत्पन्न व्हावी हेच ध्येय होते. 

या सार्वजनिक गणेशोत्सवाची किर्ती चहुदूर पसरली आणि गावोगावी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन होऊ लागली.  आणि ती परंपरा आज सव्वाशे वर्षानंतरही टिकून आहे.

मात्र आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवातील उद्दिष्टे दिसतात का या प्रश्नाचे “नाही” असे ठाम उत्तर देताना माझ्या मनात काही विचार येतात आणि तेही मला इथे  व्यक्त करावेसे वाटतात. 

माझा जन्म स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला.  पारतंत्र्याच्या काळाचा फक्त इतिहास मी मनापासून अभ्यासला आणि त्याचा मला आजही अभिमान आहे.  या लेखाच्या निमित्ताने मला माझे बालपणी अनुभवलेले कित्येक सार्वजनिक गणेशोत्सव आठवले.  गणेश मूर्तीभोवती  केलेले ते सुंदर महाभारत, रामायणातल्या कथा सांगणारे देखावे आठवले.  गणेशोत्सवात सादर केलेली नाटके आठवली.  कित्येक नामवंत कलाकार या गणेशोत्सवांनी रंगभूमीला दिले.  उत्तम वक्त्यांची प्रबोधन पर भाषणे ऐकली.कीर्तने ऐकली. संगीत मैफिलीतले नामवंत गायक आठवले.  ते परिसंवाद, बौद्धिके सारं काही आठवलं आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे गणेशोत्सव अनुभवताना नक्कीच उदासीनता येते.  लोकमान्य टिळक तर यातून हरवलेलेच आहेत. आता उद्दिष्ट हरवले आहे आणि उत्सव राहिला आहे.  त्यातही पैसा, दिखावा, राजकारण यांचा प्रवेश झालाय.  सण उत्सव हे संघटनात्मक असतात.  समाजात ऐक्य, बंधुभाव प्रेम, समता, निर्माण करण्यासाठी असतात ही भावना न दिसता स्पर्धात्मक वादच दिसतात.  अहमहमिका, चढाओढ दिसते.  राष्ट्र कारण न दिसता राजकारण जाणवते. गोंगाट आणि धिंगाणा अनुभवायला मिळतो.  शहरात तर कित्येक वेळा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे गल्लोगल्ली वाहनांची कोंडी होऊन जनजीवनच विस्कळीत होते.  म्हणूनच आजच्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पना टिकून आहेत का? या प्रश्नाचे नाही असे उत्तर देतानाही  एकच वाटते की आता काळ बदललाय. देश स्वतंत्र ही झालाय.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली.  स्वातंत्र्यासाठी जनजागृती किंवा संघटन हे या गणेशोत्सवा मागचे टिळकांचे उद्दिष्ट आज ऊरले नसले तरी उद्दिष्टे बदलू शकतात.  ती अधिक सकारात्मक असू शकतात. आज देश स्वतंत्र असला तरीही मानसिक गुलामगिरीत आहेच.  आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण आपला देश, आपल्या राष्ट्रीय समस्या, आपले विज्ञान प्रगत जीवन, त्याचबरोबर आपली घसरत चाललेली नीती मूल्ये, देशाभिमान  यासंदर्भात पुन्हा एकदा देशाला संघटित करण्याची,  ऐक्याच्या प्रवाहात आणण्याची प्रेरणा बाळगली पाहिजे.नव्या पिढीला आपल्या प्रेरक इतिहासाची ओळख करून द्यायला हवी.

म्हणूनच  नुसतेच ढोल ताशे नकोत. थिल्लरपणा नको.  एकापेक्षा एक गणेश मूर्तींचे प्रदर्शन नको.  नुसताच उत्सव नको. सोहळा नको. तर जी परंपरा सव्वाशे वर्ष आपण टिकवली आहे त्यात नवी आवाहने पेलण्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे.  आणि हे इतर अनेक सार्वजनिक उत्सवासाठीही लागू आहे.

तर आणि तरच लोकमान्य टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवाला दिलेला मान ठरेल आणि आजच्या ‘नाही” चे उद्याच्या ‘हो’ मध्ये परिवर्तन होऊ शकेल. असे मला वाटते…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’मृत्युंजय ‘ च्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

शिवाजी सावंत

24 सप्टेंबर.!

1995 साली आजच्या तारखेला मृत्यंजय ह्या जगप्रसिद्ध लोकप्रीय पुस्तकाला,” भारतीय ज्ञानपीठ”ह्या संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक होते.

माझ्या स्वतः च्या अत्यंत आवडत्या पुस्तकांच्या यादीत  “मृत्युंजय” हे अगदीं वरच्या लेव्हल वर विराजमान झालंय.ह्या पुस्तकाने मला एक नवी दृष्टी दिली. ह्या पुस्तकाने नव्या भूमिकेत शिरून अंतरंग कसे जाणून घ्यायचे हे खूप छान शिकविले. बरेचदा आपण ज्यांना खलनायक समजतो ते कधी कधी परिस्थिती मुळे खलनायक बनतात हे समजावून सांगितले. प्रत्येकाचे वागणे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच असतं हे मृत्युंजयमधून शिकायला मिळाले. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा अभ्यासता आल्या.कुठलीही अजरामर, असामान्य कलाकृती निर्माण करतांना त्यात स्वतःला झोकून द्याव लागतं हे सावंत ह्यांनी मृत्यूंजय लिहीतांना दाखवून दिलं. मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत ह्यांनी थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.  

महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधी झाला नाही हे माहीत होते . ही  कादंबरी अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते . वाचकांना,मराठी साहित्याला ,शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली ही एक अद्भूत देणगीच म्हणावी लागेल.कादंबरीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकसुरी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा सगळया भूमिकांचा परिपाक आहे. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातून झालेला  कर्णाचा असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंबहुना आपण कधी ह्या अँगल ने विचारच केला नसतो.  हे पुस्तक आपल्या कित्येक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं नीट खुलासेवार, पटण्याजोगे समजावून सांगत.

हे पुस्तक वाचण्या आधी मला असलेल्या जुजबी माहितीमुळे महाभारतातील खूप प्रश्न मला भेडसवायचे त्यांची उत्तरे मला ह्या पुस्तकानेच मिळवून दिलीत.

ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी आवर्जून वाचावे , एकदा हातात हे पुस्तक घेतले की वाचून पूर्ण केल्याखेरीज तुमच्याच हातून हे पुस्तक खाली ठेववणार हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समुद्राची हाक… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ समुद्राची हाक… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

तो समुद्र मला बोलवत होता,

पण त्याची हाक माझ्याशिवाय      

कुणाला कळतच नव्हती!

 

ओढ लागली होती….

त्या भरती ओहोटीची, पांढऱ्या शुभ्र वाळूची…

तेथे वाळूचा किल्ला बांधायचा होता,

आणि लाटेच्या तडाख्याने पुसले जाणारे नाव लिहायचे होते..

 

थोड्याशा पाण्यात डुंबत  राहून..      

सागराचे ते विशाल रूप न्याहाळायचे होते!

उगवतीचा सूर्य नाही तर निदान

अस्ताला जाणारा सूर्य डोळ्यात साठवून ठेवायचा होता……

 

असे किती सूर्यास्त समुद्रावर पाहिले,

तरी मन तृप्त होत नाही…

तो केशरी,लाल गोळा स्वतःचे अस्तित्व,

त्या सागराच्या क्षितिजाशी  विलीन  करून,

त्यातच लोप पावताना पहायचा होता मला….

 

असे किती सूर्योदय- सूर्यास्त येतील..

पण गेला क्षण येत नाही ना…

ती खंत मी कुणाला, कशी सांगू?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ केल्याने होत आहे रे… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? विविधा ?

केल्याने होत आहे रे… ☆ श्री सतीश मोघे

श्वास, घास आणि ध्यास या तीन गोष्टी ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात. हाती कितीही पैसा असला तरी या गोष्टी घेण्यासाठी नोकर ठेवता येत नाहीत. या गोष्टी ज्याच्या त्याला सहजपणे करता येतील अशी मनुष्यदेहाची रचना विधात्यानेच केली असून त्यासाठी आवश्यक साधने व ऊर्जास्त्रोत या देहाच्याच ठायी देऊन ठेवले आहेत.

छानसा देह, त्यात विविध इंद्रिये आणि त्या प्रत्येक इंद्रियाच्या ठायी एक विशेष शक्ती, असे वरदान विधात्याने मनुष्याला दिले आहे. डोळयांना पाहण्याची, हातांना काम करण्याची, पायाला चालण्याची, कानाला ऐकण्याची अशा रितीने सर्वच अवयवांना विशेष शक्तीचे वरदान देऊन विधात्याने मुनष्य देहाची निर्मिती केली आहे. हे शक्तीचे वरदान देतांनाच या शक्तीचा वापर केला नाही तर ती शक्ती कमी कमी होत जाऊन लयाला जाईल, असा कठोर न्यायही जोडीला ठेवलेला आहे. हा कठोर न्याय अनुभवास यावयाची सुरुवात झाली की लागलीच सावध होऊन, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, या मंत्राची अंमलबजावणी, पुढील शक्तीक्षय थांबविण्यासाठी आवश्यक आहे. ‘काही वर्षापूर्वी मी विहिरीच्या कठडयावर उभा राहून पाणी विहिरीतून काढत होतो, हातात दोन बादल्या घेऊन अर्धा किलोमीटरवरुन पाणी भरत होतो. आता मात्र बाथरुममधली पाण्याने भरलेली बादली इकडून तिकडे करतांनाही कठीण जाते. पूर्वी मी तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जात होतो. आता पाच मिनिटे चाललो तरी दम लागतो’,   ही आणि असेच साधर्म्य असलेली वाक्ये आपण आपल्या बाबतीत म्हणत असतो वा दुसऱ्यांकडून त्यांचा अनुभव म्हणून ऐकत असतो. इंद्रियांच्या शक्तींचा वापर न केल्याने त्यांची शक्ती कमी होण्याचा कठोर न्याय यात झालेला असतो. हा कठोर न्याय होणे टाळायचे असल्यास, कष्ट करणे आणि त्यासाठी इंद्रियांना कृतीत व्यग्र ठेवणे आवश्यक आहे.

इंद्रियांना शक्ती देतांना तिचा वापर करणे अनिवार्य होईल, अशी परिस्थीती खरे तर विधात्याने निर्माण करून ठेवलेलीच आहे. माणसाला भूक दिली. भूकेसाठी अन्न मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी उदनिर्वाहाचे साधन आले. त्यासाठी पायपीट आली, काम करणे आले. ‘उदरभरणाची व्यथा, बसली सर्वांच्या माथा’, असे प्रत्येकाचे करून,प्रत्येकाला  कृती करणे अनिवार्य करून ठेवले आहे. जोडीला चांगली वस्त्रं, चांगाला निवारा, चांगले शिक्षण यांचा ध्यास लावल्याने यासाठी अधिक अर्थार्जन व अधिक अर्थाजनासाठी अधिक कष्ट या कर्मचक्रात विधात्याने माणसाला सहजपणे गुंतवून ठेवले आहे. प्राण्यांना, वृक्षांना जसे ऋतुचक्राशी जुळवून घ्यावे लागते, तसेच माणसालाही या कर्मचक्राशी जुळवून घेणे भाग आहे. हे प्रत्येकाने ओळखून कर्म करत राहिले पाहिजे.

मूठभर गर्भश्रीमंत व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आधी कष्टाच्या वेदना व भविष्यात सुख असाच प्रवास होतो. गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्यांनाही आहे ते टिकविण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. ‘खूप आहे’ म्हणून, काही न करता आळसाचे सुख घेणाऱ्या व्यक्तींचा भविष्यकाळ वेदनादायी असतो. अनेक श्रीमंत व्यक्ती यथायोग्य कष्ट न घेतल्याने देशोधडीला लागल्याचेही आपण पहातो. हे देशोधडीला लागणे आर्थिक दृष्टीने असते तसेच ते शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही असते.

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने देशोधडीला लागणे हे बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आल्याने होते. बुद्धीच्या वापरातून समृद्धी निर्माण करायची आणि आपणच निर्माण केलेल्या या समृद्धीच्या कोशात गुदमरून जायचे, असेच घडताना हल्ली दिसते. भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरी त्यांचा उपभोग घेण्यासाठी देह, इंद्रिय धडधाकड हवीत. देहइंद्रिये आर्थिक सुबत्तेने नाही तर शरीरश्रमानेच धडधाकट, बलवान राहतात. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला   शरीरसौष्ठव टिकविण्याठी शरीरश्रम आवश्यक आहेत.

वीरशैव तत्वज्ञानाचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी यासाठीच शरीरश्रमाचा गौरव करणारा मंत्र मानवजातीला दिला. ‘कायक वे कैलास’. ‘कायक’ म्हणजे कायेने (देहाने) केलेले काम. हाच ईश्वर. प्रत्येकानेच जमेल तेव्हढे शारीरिक श्रम हे केलेच पाहिजेत. यामुळे इंद्रियांची शक्ती अबाधित राहते आणि त्या शारीरिक श्रमात स्वत: त्यातील काठिण्य, कष्ट अनुभवल्याने, कष्ट करणाऱ्या इतर माणसांचेही मूल्य आपल्याला जाणवते. नकळत त्यांच्याविषयीचा आपला आदर वाढतो. स्वयंपाक, धुणे-भांडी करणाऱ्या मावशी आल्या नाहीत की आपण ते काम जेव्हा करतो, तेव्हा त्यांच्या कष्टाचे मोल जाणवते. यासाठी ..’आधी केलेच पाहिजे’.

जीविकेसाठी आणि शरीरस्वास्थ्यासाठी कष्ट अनिवार्य आहे, ही बाब प्रत्येकालाच ज्ञात असते. तरीही बरेच जण या दोन्ही गोष्टींसाठी कष्ट घेणे किंवा त्यापैकी एका गोष्टीसाठी कष्ट घेणे टाळत असल्याचे दिसून येते. यामागील कारणांचा शोध घेतला तर कंटाळा, आळस, थकवा ही कारणे आढळतात. यात ‘कंटाळा येणे’ हा सहज स्वभावधर्म आहे. पण ‘कंटाळा करणे’ हा इच्छाशक्तीचा आलेख खाली आल्याने आळसाकडे झुकणारा नकारात्मक प्रवास आहे. एकच एक काम करायला लागणे, इच्छा नसताना एखादे काम करावे लागणे, गुंतागुंतीची, आकडेमोडीची कामे करावी लागणे यामुळे कंटाळा येऊ शकतो. ढगाळ वातावरण, वीज गेलेली असणे व त्यामुळे होणारा असह्य उकाडा यामुळेही कंटाळा येऊ शकतो. कंटाळा हा प्रकृती

स्वभावधर्मावर अवलंबून असतो. तो प्रत्येकालाच येतो. माणसांचा येतो, जागेचा येतो, नोकरीचा येतो, पावसाचा येतो. अशा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो. प्रकृती स्वभावाने असा कंटाळा आला, तरी सर्वसाधारण विवेकी माणूस परिस्थितीचा अंदाज घेऊन ‘कंटाळा करायचा’आणि स्वस्थ बसायचे की कंटाळ्यावर मात करून ती गोष्ट पुर्तीस न्यायची, याचा निर्णय घेत असतो.

नेमून दिलेले काम कालमर्यादेत करावयाचे काम असेल आणि ते वेळेत केले नाही तर आर्थिक दंड वा नुकसान होणार असेल तर माणूस कंटाळ्यावर मात करतो. आपला प्रकृती स्वभाव बाजूला ठेवतो आणि काम तडीस नेतो. पण विवेकाची जागा आळसाच्या तात्कालिक सुखाने घेतली तर मात्र तो कंटाळा येताच ‘कंटाळा करतो’. ‘आळसे काम नासते’, असे होऊन कामात आणि त्याच्या सुखात विघ्ने येतात. अशी माणसे खरे तर व्यवसाय, नोकरी वा कुटुंब यात अडसर आणि बोजाच. व्यक्ती म्हणून त्या चांगल्या असतील व कृतिशून्यते मागच्या त्यांच्या मानसिक स्थितीशी संबंधित कारणे समर्थनीय असतील, तर बऱ्याचदा तिथे अन्य सदस्य त्यांचा भार स्वतः उचलून, त्यांची कामे करताना दिसतात. कामे तडीस जातात. पण यात कोणालाच मनापासून आनंद नसतो. एकाला निष्क्रियतेच्या जाणिवेने नैराश्य. तर दुसऱ्याला जादा भाराच्या वेदना. हे टाळण्यासाठी ‘कंटाळा आला’ तरी ‘कंटाळा करून’ चालणार नाही, अशी कर्तव्याची जाणीव स्वतःला करून देऊन नियोजित कामे करत राहिली पाहिजे.

शारीरिक श्रमात ‘थकवा’, ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक ऐपत आणि शारीरिक कुवत यांची जाणीव प्रत्येकालाच असते. त्यापलीकडे जाऊन काही करण्यापूर्वी विचार करायला हवा. देह कष्टविण्यासाठीच आहे, उपजीविकेसाठी अर्थार्जन आवश्यक व अर्थार्जनासाठी काम करत राहणे आवश्यक, हे जरी खरे असले तरी आवश्यक गोष्टी कोणत्या व किती? अर्थार्जन किती आवश्यक ? व त्यासाठी देहाला कुवती बाहेर पळवायचे का? कुवतीबाहेर ओझे उचलायला लावायचे का? याचाही विचार करायला हवा. व्याप हा, आवश्यक तेवढाच व त्याच मर्यादेत हवा. व्याप आहे म्हणून तो सारण्यासाठी कृतिशीलता आहे. कृतिशीलतेचा रियाझ हा कर्तृत्वाला गती देत असला तरी तो आपल्याला झेपणाऱ्या सुरात हवा, झेपेल एवढाच हवा. ‘आळस’ हा जसा शत्रू तसेच ‘अतिश्रम’ हाही शत्रूच. रात्र विश्रांतीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी असते. आपण रात्रीचा दिवस करतो, तेव्हा नकळत शरीर स्वास्थ्य गहाण टाकून रात्री कडून वेळ उसना घेत असतो. ही उसनवारी टाळली पाहिजे. अंगावर वस्त्र असतात इतपतच व्याप हवा. वस्त्रावर पुन्हा दुसरे वस्त्र चढवणे, म्हणजे व्याप नको तेवढा वाढवणे. क्षमतेबाहेर हा व्याप वाढला की अस्वस्थ वाटायला, गुदमरायला सुरुवात झालीच म्हणून समजा.

स्वभावधर्मानुसार कंटाळा, आळस आला तरी अर्थार्जनाची निकड म्हणून नियोजित काम करणे आवश्यक असेल तर आळस झटकून ते काम करण्यासाठी… अर्थार्जनाची निकड तेवढीशी नसली तरी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक त्या किमान कृती करण्यासाठी ‘ केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, याची जाणीव जागे करणारे  अलार्मचे घड्याळ नेहमी उशाशी हवे.

त्याचवेळी अवाजवी स्वप्ने आणि त्यासाठी क्षमतेबाहेरचे कष्ट होत असतील, तर ते थांबवून योग्य दिशा दाखवणारे संयमाचे होकायंत्रही नेहमी जवळ हवे. हे दोन्ही सोबत असले की ‘केल्याने होत आहे रे..’ याची, सारखी आठवण करून द्यावी लागत नाही. कृतिशीलतेचा रियाझ योग्य पद्धतीने होतो आणि जीवन गाणे अधिकाधिक रंगत जाते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौराई… ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गौराई… ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

माहेरवाशीण म्हणून बर्याच ठिकाणी पुजली जाणारी गौर, काही घरात गणपतीची आई म्हणून आपल्या बाळाचं कौतुक, ,गणपतीचं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी तर कधी जगन्माता “श्रेष्ठा- कनिष्ठा”अशा बहिणींच्या रूपात आगमन करते .

महाराष्ट्र तसेच कर्नाटकात गणपतीच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे.

 प्रदेशानुसार पूजा पद्धतीत फरक असला तरी देव लोकात वास करणाऱ्या या लेकी बद्दलचे प्रेम ,आपुलकी सगळीकडे सारखीच असते.

“लेक”बनून आलेल्या या माऊलीचे यथाशक्ती पूजन करणे हाच भाव असतो. महाराष्ट्रात गौरीपूजनाची विविध रूपे पहावयास मिळतात. प्रदेशानुसार गौरीपूजनाची पद्धत वेगवेगळी असते.

कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मण खड्यांची गौर पुजतात. सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन नदीकाठी जाऊन तिथले पाच खडे किंवा सात खडे ताम्हणात कोऱ्या वस्त्रावर ठेवून आणतात .कापसाचे वस्त्र घालून, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घरी आणतात .गौरी माहेरवाशिण म्हणून येत असल्याने हा मान माहेरवाशीण मुलींचा किंवा कुमारीकेचा असतो.

कोकणस्थामध्ये गौर घेऊन येणारी स्त्री तोंडात पाण्याची चूळ ठेवते (त्या मागचे कारण की गौरी घरी येताना माहेरवाशीणीने सासरची गाऱ्हाणी सांगणे , मनस्वास्थ्य बिघडविणारे विचार तिच्या मनात येऊ नयेत) नदीवरून आणलेल्या या गौरीला उंबऱ्या बाहेर पायावर दूध पाणी घालून ,ओवाळून ,रांगोळीने काढलेल्या पावलावरून गौर घरात आणतात .तिला सर्व खोलीत फिरवून घरची स्त्री” इथे काय आहे “असा प्रश्न विचारते .ती गौर आणणारी मुलगी” उदंड “आहे असे मनातल्या मनात तीन वेळा उच्चारते. त्यानंतर तिला गणपती जवळ बसविले जाते .नंतर माहेरवाशीण तोंडातील पाणी टाकून बोलू शकते. आगमना दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो .दुसऱ्या दिवशी “घावन घाटल्याचा “नैवेद्य असतो तर कराडे ब्राह्मण लोक पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात. तिन्ही दिवस गौरीची खण नारळाने आणि तांदुळाने ओटी भरतात .निरोपादिवशी दही पोह्याचा नैवेद्य दाखवून अक्षता टाकून तिला स्थानावरून हलवले जाते. तिची कृपादृष्टी सगळीकडे राहू दे म्हणून तिला सर्व घरातून फिरवून आणले जाते.

देशस्थांच्या घरी उभ्या च्या गौरी बसवतात .त्यांना “महालक्ष्मी “असे म्हटले जाते. गौरींचे मुखवटे पितळेचे ,चांदीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असतात. घरातल्या सवाष्णी दोन सुपामध्ये धान्याच्या राशीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवून घरात आणतात .त्यापैकी “जेष्ठा गौरीला” तुळशी वृंदावना पर्यंत मिरवत नेले जाते .तिथे तिला” कनिष्ठा गौर “भेटते. दोघी नाही हळदी कुंकू लावून वाजत गाजत उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावरील माप ओलांडून महालक्ष्मी घरात प्रवेश करते. घरभर काढलेल्या पावलावरून गौरीला फिरविले जाते .लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली यावर “सोन्याच्या ,चांदीच्या , रुपयाच्यापावलांनी, धनधान्याच्या समृद्धीच्या पावलांनी” असे म्हणून तिला घरभर फिरवून गणेश मूर्ती शेजारी तिची स्थापना करतात नंतर घरातील स्त्री गौरी आणणाऱ्या सवाष्णीला कुंकू लावून साखर देते, लक्ष्मी तयार केलेल्या साच्यामध्ये गहू ज्वारी असे धान्य भरून त्यात पैसे ठेवतात व त्यावर मुखवटे ठेवतात .त्यांना साड्या नेसून दागदागिने घालून सजविले जाते .आलेल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो.

दुसऱ्या दिवशी पत्रे फुले वाहून पूजा करून तिची प्रतिष्ठापना करतात. दुपारी पुरणपोळी ,16 भाज्या, चटणी ,कोशिंबीर असा नैवेद्य दाखवून सवाष्ण वाढली जाते .तिसऱ्या दिवशी दहीभात, मुरडीचे कानवले नैवेद्य दाखवून संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन केले जाते.

कोल्हापूर भागात तांब्यावरची गौर असते .पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर केला जाई. परंतु हल्ली तांब्याचा तांब्या रंगवून त्यावर एका बाजूला गौरीचा चेहरा ,दाग दागिने ,हात काढले जातात .तर मागील बाजूस गो पद्म ,चंद्र, सूर्य ,शंख ,गदा चुडा इत्यादी शुभचिन्हे काढली जातात.

कोकणात वेंगुर्ले परिसरात सारस्वतांच्या घरी गणपतीची आई म्हणून गौरी पूजली जात असल्यामुळे गणपती आगमनाच्या आधी एक दिवस गौर येते महादेवासह. सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्या भोवती महादेव पार्वतीचे चित्र असलेला कागद गुंडाळतात .गणपतीच्या आधी आई-वडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो .आगमनानंतर आणि विसर्जना आधीही काकडी, नारळ, तांदूळ घेऊन गौरीची ओटी भरली जाते .या गौरीचे विसर्जन तिसऱ्या दिवशी झाडाखाली केले जाते.

सी.के.पी लोकाकडे तेरडा व खड्यांच्या गौरी पूजल्या जातात . माहेरवाशीण ही गौर घरात आणते .तेरडा व सात खडे सुपात घेऊन आणलेल्या माहेरवाशीच्या पायावर दूध पाणी घालून तिला ओवाळून घरात घेतले जाते .कुंकवाचे पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलावरून लाल ठसे उमटवत माहेरवाशीण चालते ,प्रत्येक खोली तिला औक्षण करून विचारले जाते ,”गौरी कुठे आलीस “ती उत्तर ते दिवाणखान्यात मग दिवाणखान्यात काय दिसले ?गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानांच्या वैभवाचे, प्रगतीचे वर्णन करते नंतर सर्व खोलीत गौर फिरवल्यानंतर गणपतीच्या शेजारी तिला बसवतात मग मुखवटा लावून साडीचोळी नेसून शृंगारण्यात येते .सौभाग्यवाणासह गौरीची खणा नारळाने ओटी भरतात. या दिवशी खीर भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा व तिसऱ्या दिवशी खीर व मुरड घातलेले कान्होले नैवेद्य असतो.  पुन्हा मुरडून आमच्या घरातील असं मागणी करतात.

अशा रीतीने प्रत्येकाच्या घरी गौरीचे पूजन होत असते.

वाचनात आलेली माहिती

संग्राहिका –  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाच गणित… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

आनंदाचं गणित ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द उपलब्ध असतातच.ते समानार्थी तरी असतात किंवा त्या शब्दाच्या अर्थछटेशी जवळीक दाखवणारे तरी. मात्र क्वचित कधी वरवर एकाच अर्थाचे वाटणाऱ्या दोन शब्दांमधे ठळकपणे विरोधी सूर उमटत असल्याचे प्रत्ययास येते. ‘अधिक’ आणि ‘अति ‘ हे मराठी भाषेतले असे दोन शब्द! यातील ‘अधिक’ या शब्दात सकारात्मकता ओतप्रत भरलेली तर ‘अति’ हा शब्द थेट नकारात्मकतेकडे झुकणारा!

‘अधिक’म्हणजे जास्त, जादा. हे झाले त्याचे सर्वसाधारण अर्थ. पण त्याच्या वरकड, वरचढ या अर्थांतून वेगळीच छटा दृश्यरूप होते. अतिरिक्त, फार हे दोन्ही अर्थ अपेक्षा आणि वास्तव यातील संख्यात्मक किंवा गुणात्मक प्राबल्य ध्वनित करतात. गैरवाजवी, सव्याज, बहुसंख्य या अर्थांचा रोख वर उल्लेखित अर्थांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या बाबींकडे जाणवतो.

‘अधिक’ या शब्दाच्या संयोगाने तयार झालेल्या इतर अनेक शब्दांचे अर्थ,रंग,रुप आणि आवाका विचारात घेतला तर एखाद्या शब्दाची व्याप्ती किती थक्क करणारी असू शकते याची प्रचिती नक्कीच येईल.उदाहरणार्थ अर्धेअधिक,निम्मेअधिक, सर्वाधिक, अधिकउणा, अधिकरण,  अधिकाधिक, अधिकार,अधिकाराग्रहण यासारखे ‘अधिक’ शब्दाचे बोट धरून आपली स्वतंत्र वाटचाल करणारे कितीतरी शब्द! ‘अधिक’ या शब्दाला अपेक्षित असणारे ‘अधिक्य’ या शब्दांनाही अभिप्रेत आहेच आणि हे अधिक्य हाच या सर्व शब्दांचा ठळक असा गुणविशेष आहे!

‘अधिक’ आणि ‘उणे’ या परस्परविरुद्ध अर्थ असणाऱ्या दोन भिन्न शब्दांची न् आपली पहिली भेट आणि ओळख होते ती एकत्रितपणेच आणि तीही अगदी आपल्या बालवयात.याला निमित्त असतं प्रथमच नव्याने परिचय होणाऱ्या गणित या विषयाचं! तेव्हापासूनच ‘अधिक ‘ आणि ‘उणे’ हे शब्द एरवीही कधी कानावर पडले तरी नजरेसमोर येतात ती गणिताला अभिप्रेत असणारी त्यांची विशिष्ट अशी चिन्हांकित रुपेच.

या दोन्ही शब्दांना अपेक्षित असणारी बेरीज आणि वजाबाकी आयुष्यातही समजून घेतली तर जगणं अधिकच अर्थपूर्ण होईल.जगणं खरंतर सर्वांनाच आनंदी असावं असंच वाटतं खरं,पण त्या आनंदाचं गणित मात्र सांख्यिकी गणितासारखं किचकट होऊन बसतं बऱ्याचदा.योग्यवेळी हितकारक गोष्टींची बेरीज आणि अहितकारक गोष्टींची वजाबाकी करता आली तर किचकट वाटणारं आनंदाचं गणित नकळत सहज सोडवता येईल.ते कसं सोडवायचं हे सांगायला वेळोवेळी आपल्याला सहाय्यभूत होतात त्या अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या सहाय्याने आकाराला आलेले सार्थ वाक्प्रचार न् म्हणीच!

अगदी ‘अधिक’ या शब्दाच्या संदर्भापुरता विचार केला तरी अशा कितीतरी म्हणी चटकन् आठवतात.’अधिकस्य अधिकं फलं’ असा संदेश देत सत्कर्मांना प्रवृत्त करतानाच त्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा उपदेशाबराबरच ‘अति तेथे माती’ असा सावधानतेचा इशाराही देतात.त्या सगळ्याच जगण्याची दिशा दाखवणाऱ्या म्हणींना अभिप्रेत असणारं जगणं समजून घेतलं तरच आयुष्यातलं आनंदाचं गणित किचकट न वाटता सहजपणे सुटणं अधिकच सुलभ होईल एवढं खरं!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाठीशी रहा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ पाठीशी रहा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

केस मोकळे सोडलेले,कपाळावर ठसठशीत कुंकू,डोईच्या मधोमध पाडलेल्या भांगामध्ये कुंकवाची जाडसर रेघ,गळ्यात लांब मंगळसूत्र…अशी ती,बहुदा नवविवाहिता,अनवाणी पायांनी लोकल रेल्वेगाडीच्या पुढ्यात उभी होती. मोटरमनने शक्य होईल तितक्या जोराने हॉर्न वाजवला तेंव्हा ती पटकन बाजूला झाली….आणि गाडी आणखी पुढे सरकताच पुन्हा गाडी समोर आली. यावेळी मात्र ती दोन्ही रूळांच्या मधोमध पालथी पडली…मान एका रूळावर ठेवून. ‘हे भगवान! मध्यम वयाचा तो मोटरमन उदगारला…त्याची इच्छा असूनही गाडी थांबू शकणार नव्हती! गाडी तिला स्पर्श करणार त्या अगदी शेवटच्या क्षणाला तिने चटकन आपली मान बाजूला घेतली! पण तिचं शरीर तर दोन्ही रूळांच्या मधोमध होतंच….मोटरमनने एक क्षणासाठी डोळे बहुदा मिटून घेतले असावेत. खाडकन आवाज झाला…रेल्वेचा एक डबा तिला ओलांडून पुढे गेला होता…मोटरमनने पटकन गाडीमधून खाली उडी मारली. ती गाडीखाली निपचित पडलेली. तो पुन्हा गाडीत चढला आणि गाडी मागे घेतली. तिच्या किंकाळ्यांनी ऐकणा-यांची मनं बधीर झाली होती! उजव्या हाताची चार बोटं जागेवर नव्हती आणि डोक्याला डाव्या बाजूला मोठी खोल जखम! तिला दवाखान्यात न्यायला किमान वीस मिनिटे लागणार होती….ती वाचण्याची शक्यता नव्हती आणि तिच्या डोळ्यांतली जगण्याची आशा केविलवाण्या नजरेने सभोवार पहात होती…….का नाही बघणार? कुणाला मरायचं असतं?

तो कितीतरी वेळ त्या उंच पुलाच्या अलीकडे असलेल्या दिव्याच्या खांबाखाली बसून राहिला. पुलाखाली खोल समुद्र शांतपणे वा-यावर डुलत होता. येणारे-जाणारे आपापल्या येण्या-जाण्यात मश्गूल होते. तो तिथून उठणार इतक्यात तिथून जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली. तिला तिच्या लहानग्या मुलीसोबत त्या पुलाच्या आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर एक छानसा फोटो काढून हवा होता. त्याने मोठ्या आनंदाने त्या मायलेकींचे फोटो काढून दिले. ती महिला आणि ती लहान मुलगी त्याला हसून टाटा करीत तेथून निघून गेले. कुणीतरी थोड्यावेळासाठी का होईना,खोटं खोटं का होईना छान बोललं, याचं समाधान त्याला मिळालं. पण पुन्हा त्याचं मन त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावलं आणि तो पुलाकडे निघाला. कितीतरी वेळ त्या पुलाच्या कठड्यावर खोल समुद्राकडे पाय सोडून बसून राहिला….आणि एका क्षणी त्याने स्वत:ला खाली झोकून दिले! खाली पाण्यापर्यंत त्याचं शरीर पोहोचायला काही सेकंद तर लागणारच…ते पाच-सहा सेकंद त्याला युगासारखे भासले…आपण चूक करतो आहोत…नव्हे केलीच  आहे याची त्याला जाणीव झाली! आता फार उशीर तर झाला नाही ना….हा विचार करायला? कुणीतरी आपल्याला वाचवायला हवं! आता त्याला मरायचं नव्हतं! कुणाला असं मरायचं असतं?

तिला जणू आता काहीही जाणवत नव्हतं…वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणा-या नसा काळवंडून गेल्या होत्या…स्वत:चाच चेहरा आरशामध्ये बघण्याची सोय नव्हती राहिली….आणि दुसरं कुणीही या तिच्या चेह-याकडे पाहण्याची हिंमत दाखवत नव्हतं! त्यांना माहित होतं की आगीच्या धगीनं हिच्या शरीरातली धुगधुगी जवळ जवळ विझवत आणलेली आहे…फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे…हीची सुटका होईल आणि आपलीही! तिने तिच्या आयुष्यात असं कुणाला तरी मरताना पाहिलं होतं…पण तिला नाही मरायचं असं..आणि इतक्यात. कुणाला असं मरायचं असतं?

आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं ही तर समस्त प्राणी जगताची अंत:स्थ प्रेरणा. मग का कुणी असं या स्वत:च्या अस्तित्वच्या जीवावर उठतं? एरव्ही आपल्याला वेदना होतील,आपला जीव जाईल म्हणून स्वत:ला पदोपदी जपणारं माणूस,अगदी एवढ्याशा काट्यच्या एवढ्याशा टोकालाही बिचकणारा माणूस असा एकदम स्वत:ला त्या अंध:कारात का बरं झोकून देत असेल…काही समजत नाही!

दुस-या कुणीतरी आपल्याला जन्माला घातलं आहे…त्यामुळे दिला गेलेला जन्म आपला आपण मरणात परावर्तीत करण्याचा अधिकार आपल्याला नाही…असा विचार शहाणी माणसं करतात आणि प्राक्तन भोगत जीवनाच्या वाटेवर रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहतात. त्यांना ठाऊक असतं की या वाटेवर कुठे न कुठे तरी एखादं सावलीचं झाड असतंच,त्याच्या खाली चार-दोन मखमली फुलं पडलेली असतात. इथं क्षणभर विश्रांती घेता येईल की. कुठंतरी एखादा झरा आढळेल आणि जन्माची तृष्णा निववता येईल. अगदीच आणि काहीही सुख नाही असं आयुष्य असूच शकत नाही मूळी. श्वास घेणं काय कमी सुखावह आहे? पाण्याखाली मिनिटभर डोकं बुडवून पाहिल्यावर कळतं की श्वासांमधलं सुख!

एखाद्या जागी पोहोचण्याचे दोन मार्ग असतात…लांबचा मार्ग अवघड पण सुरक्षित. जवळचा मार्ग त्याचं हशील वसूल करून घेतो वाटसरूंकडून. याच जवळच्या मार्गावरून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अकाली मरणाच्या वाटमारांना बळी पडतात!

समस्त जगताच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारे दधिची मान्य आणि पुज्य! पण संघर्षाला पाठ दाखवून पळणारे कोणत्याही दयेस पात्र नाहीत. किमान त्या दुस-या दुनियेत तर नाहीतच नाहीत. अर्थात हा विचार धर्मपरत्वे बदलत जात असावाही. पण कुठंही गेलं तरी आगंतुकपणे जाणे स्वत:ला अपमानास्पद तर आहेच पण जिथं जातो आहोत त्यांनाही संकोचून टाकणारं!

राग,चिंता,निराशा,वैफल्य,मान-सन्मानाच्या,अपमानाच्या बेगडी कल्पना इत्यादी शेकडो कारणांनी माणसं आपल्याच हातांनी जेंव्हा आपली जीवनपुष्पे कुस्करून टाकतात तेंव्हा ती मागे राहिलेल्यांसाठी दुर्गंधीच सोडून जातात… वेदनांची! मृत्यूनंतर काय? हा प्रश्न कदाचित जगन्नियंत्यास कायम अनुत्तरीत रहावा, असं वाटत असावं असं वाटतं…कारण आजवर त्याचं विश्वासर्ह उत्तर नाही गवसलेलं! किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या लोकोक्तीनुसार प्रत्यक्ष अनुभवता न येणारं हे उत्तर असल्यानं…ते अविश्वसनीय वाटणंही साहजिकच आणि क्षम्यही! पण जाणारा कदाचित सुटून गेला असं वाटत असलं तरी त्याच्या मागे राहणारे आयुष्यभर पितामह भिष्मा सारखे बाणांच्या शय्येवर निजत असतात….हे मात्र अनुभवास येऊ शकते!

एखाद्याला आपल्यातून उठून जावंसं वाटतं याचाच अर्थ आपलं त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हतं. त्याचं ऐकून घेण्याची तसदी आपण नाही घेऊ शकलो..उलट त्यालाच ऐकवत राहिलो आपण..आपलंच रडगाणं!

मग त्यांनाही वाटूच शकतं ना…आपण गेल्यावर यांनाच त्रास होईल,मग कळेल यांना आपली किंमत!

दरवर्षी असं जगातल्या सात लाख लोकांना वाटतं! १० स्पटेंबर हा दिवस अशाच माणसांसाठी आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांच्या सतत आगेमागे रहा..त्यांना उपद्रव होणार नाही अशा बेतानं. देवानं आपल्याला दोन कान दिलेत…एक हृदय दिलंय…दोन डोळे दिलेत…ऐकायला,विचार करायला आणि बघायला. एक मेंदू दिलाय अंदाज घ्यायला…धोके ओळखायला. आपल्या लोकांना याचा लाभ द्यायला आपण मागे राहून चालणार नाही!

कुणालाही मरायचं नसतं…स्वत:चं स्वत: तर कधीच मरायचं नसतं…म्हणूनच मरू पाहणारी शेवटच्या क्षणी जगू पाहतात! चला, या जागतिक आत्महत्या विरोधी दिनाच्या निमित्ताने आपल्या माणसांशी संवाद साधायला आरंभ करूयात! ज्यांच्याशी आपण रक्ताने,नात्याने आणि समाजाने बांधले गेलो आहोत..ती सर्व आपलीच माणसे आहेत. कुणालाही एकटं पडू देता कामा नये!

कुणाला जगण्यानं छळलं असलं तरी मरणानं सुटका करेपर्यंत थांबण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण करणं म्हणजे आपण त्याचं हितचिंतक असणं! शतदा नव्हे तर अगणितदा प्रेम करावं, असा जन्म लाभलेले आपण….प्रेम करीत रहावे…बोलावणे येईपर्यंत!  

(दहा सप्टेंबर…जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. यानिमित्त सुचलेलं. यातील पहिला प्रसंग नजरेसमोर घडलेला पंचवीस वर्षांपूर्वी घडलेला…अजून जसाच्या तसा नजरेसमोर तरळणारा. यातून सकारात्मक विचार प्रसारीत व्हावेत, अशी भाबडी आशा मनात ठेवून केलेला अभिनिवेशविरहीत शब्दप्रपंच. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आले रे आले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आले रे आले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कालपासूनच खुप प्रसन्न वातावरण झालंय कारणं आपल्या लाडक्या आराध्य दैवताच आगमन होणार होत. खरचं गणपती गौरी हा मंगल सणांचा काळ खुप उत्साहाचा आल्हादकारक वाटतो.सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळें ह्या दिवसात कामाची खुप जास्त धांदल असूनही आम्हा बायकांची अजिबात चिडचिड होत नाही. सगळं कसं मनापासुन करावस वाटत.

आता दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलच जणू. दुर्वा, लाल फुल व्हायलेली ती हसरी, प्रसन्न, आश्वासक गणरायाची मुर्ती खुप चैतन्य देते.

परत एकदा गणेशचतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

गौरी गणपतीचा सण म्हटले की ,आपल्या आनंदाला सिमाच नसते. लहानांपासून थोरांपर्यंत उत्साह भरलेलेला असतो. गल्ली-गल्लीतून गणरायांच्या स्वागताची तयारी सुरू होते. ढोलतासे , लेझीम ही वाद्ये सुर धरण्यास सज्ज होतात.सगळीकडे आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण असते. पण या सगळ्यात गोरी गणपतीचा सण म्हटले की ,खेड्यातून  विशेष करून कोकणातून लक्ष वेधले जाते ते झिम्मा-फुगडीच्या खेळाकडे .  गणपतीचे आगमण झाले की तिसर्‍या दिवशी  जेष्ठागौरीचे आगमण होते. तेंव्हा तरी स्त्रियांमधील उत्साह शिगेला पोहचतो. तेंव्हा हा खेळ खेळला जातो.

विशेष म्हणजे झिम्मा-फुगडीचा खेळ हा खेड्यातून जास्त खेळला जातो.  नागपंचमीच्या सणानंतर या खेळाची तालीम सुरू होते .तसे पाहिले तर हे दिवस शेतावरील हातघाईच्या कामाचे दिवस आसतात . तरीसुध्दा दिवसभर थकूनभागून आलेली बाई  रात्री बारा-एक वाजेपर्यंत आपला कंटाळा विसरुण या खेळात दंग होते. जणू झिम्मा -फुगडीच्या खेळातून ती आपल्या कष्टाचा शीण घालविते. इतकी ती या खेळात रमून जाते.  गौरी गणपतीच्या  पारंपारिक गाण्यांवर एकमेकींच्या हातात हात गुंफून फेर धरला जातो. तेव्हा बाईचे एकमेकीच्या सोबतीने एकजूट असणाऱ्या संघटित रूपाचे दर्शन दिसून येते. आपला कंटाळा,  सुख-दुःख, व्यथा , संकटे हे सर्वकाही विसरुण बाई या खेळात दंग होते.

काही दशकापुर्वीचा विचार केला तर बाई सणासुदीच्याच निमित्ताने घरा बाहेर यायची. या झिम्मा-फुगडीच्या खेळात तर स्वतःस पूर्ण झोकून द्यायची. फेर झिम्मा , उडत्या चालीचा झिम्मा ,फुगडी  ,मंगळागौरीचे खेळ यात ती देहभान विसरुण रमायची. झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक गाण्यातून ती आपले माहेर ,सासर  ,सर्व नातीगोत्यांना तसेच बाईचे जगणे , तिचे राहणीमान  हे सर्व गोवत असे. यातून खेड्यातील  तिच्या संस्कृतीचे दर्शन घडायचे. लोकपरंपरेतून चालत आलेला आणि आपला सांस्कृतिक  वारसा जपणारा हा झिम्मा-फुगडीचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे.  गाण्याच्या तालावर धरला जाणारा ठेका आणि गमती-जमतीचे हावभाव हे सर्व पाहणारे सुध्दा दंग होतात .  ग्रामीण स्त्रीया विस-पंचवीस जणींचा मेळ करून गावचौकीत रात्री एकत्र येतात  आणि या खेळात रमून जातात. झिम्मा-फुगडी खेळाच्या विविध प्रकारातून बाईच्या शरिराचा सुध्दा व्यायाम होतो.

झिम्मा फुगडी ,मंगळागौर हे खेळ आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. मला या खेळाचे जास्त विशेष वाटते ते  खेड्यातील ग्रामीण स्त्री या खेळातून मनातून मोकळी होते. एरवी तिचे कष्टाचे हात शेतकाम  ,घरकाम  ,मोलमजूरीत बांधलेले असतात. पण गौरी गणपतीचा सण आला की आपले दागीणे,  साडी, चोळी याकडे तिचे लक्ष वेधते. घरातील साफसफाई पासून गौराईचे स्वागताची तयारी ती खुपच आनंदाने आणि उत्साहात करते .सणाची सगळी तयारी आटपून ती कितीतरी वेळ या खेळात जाऊन रमते. चारचौघी एकत्र येतात. भेटीगाठी होतात. माहेरवाशीण परतून येते. जिवाभावाच्या मैत्रीणी भेटतात. तसे सणवार आला की, आम्हा स्त्रीयांचा उत्साह अगदी शिगेलाच पोहचतो.  पण ग्रामीण स्त्रीला मात्र सणातून मिळणारा   हा आनंद वेगळाच.तिच्या दैनंदिन जीवनातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा थोडा वेगळा आनंद. हा आनंद ती आपल्या सणासुदीच्या विविध चालीरूढीतून व्यक्त करू शकते. तिचा आनंद सणासुदीच्या काळात शिगेला पोहचतो. आणि गौरी-गणपतीचा सण म्हटलेकी ,माहेरच्या आठवणी जागून नकळत ओठावर गीत येते ,

”  बंधू येईल माहेरी न्यायला

गौरी गणपतीच्या सणाला “

आणि

” बंधू रे शिपाया  ,दे मला रूपाया

गौरीच्या सणाला रे ,चोळीच्या खणाला “

तसेच

“रूणूझुणूत्या पाखरा, जा माझ्या माहेरा”,

अजून म्हणजे गौराईच्याअलंकाराचे लेणं सांगताना गीत आहे

” पाटाची आरूळी बाय, पाण्यानं तुंबली

आमची गौराई इथं का बसली, का जोडव्या रूसली

…पाटल्या रूसली,.. डोरल्या रूसली”

असे एक एक करून अलंकार गोवले जातात. आणि हे सगळे बाईच्या रंग रूपाचे वर्णन आहे .इत्यादी गाण्याच्या ठेक्यावर झिम्मा रंगात येतो. अशी कितीतरी पारंपारिक गाणी आहेत ज्यांच्या अर्थामध्ये आपण खोल जाऊ तितकेच ते आपणास भावूक करतात.या गाण्यांचा अर्थ शोधत गेलो तर त्या काळच्या स्त्रीयांचे राहणीमान ,त्याचे जगणे, सुख-दुःख, सासर-माहेरचा अभिमान ,नात्यांचा आदर  अशा कित्येक बाबींच्या तळाशी आपण जाऊ. आज आपणा स्त्रीयांना स्वातंत्र्य आहे ते पुर्वीच्या स्त्रीयांना नव्हते. अगदी काही दशकांपुर्वीचा विचार केला तर बाई ही घर आणि संसार याच साखळदंडात बांधलेली होती. मग जात्यावरच्या ओव्यांतुन म्हणा नाहीतर सणासुदीच्या या पारंपारिक गाण्यातून ती व्यक्त होत होती.

झिम्मा-फुगडी हा फक्त खेळ नाही  तर तो एका पिढीने दुसर्‍या पिढीला दिलेला आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा खेळ  त्यामधील  गाणी हे एकेकाळी बाईचे संपुर्ण जगणे आहे. आपण सगळ्याजणींनी हा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि येणाऱ्या पिढीला देणे हे आपले कर्तव्य आहे. आपला हा सांस्कृतिक वारसा चिरकाल टिकून रहावा हेच मागणे मी गणरायाकडे मागते.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

खरं म्हणजे याबाबतीत कित्येक वर्षै तेच चर्वित चर्वण ऐकतो आहे. शेतमालाला भाव का मिळत नाहीत ?  तसं पाहिलं तर भाज्या महाग झाल्या तर असा किती फरक कोणाचेही बजेटमध्ये पडणार आहे ?  नाही म्हणलं तरी कांदे बटाटे हे सुद्धा शंभरीच्या जवळपास अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. शेतमालाचे भाव वाढले की सगळ्यांचेच एकदम वाढत नाहीत. कुठल्यातरी  दोन तीन गोष्टींचेच भाव वाढतात. बाकीच्यांचे कमीच असतात. त्यामुळे ज्यांना बजेट सांभाळायचे आहे त्यांनी जास्त भाव असलेल्या भाज्या काही दिवस खाऊ नयेत.  भाव वाढले तरी किती दिवस वाढलेले राहतात? महिना दोन महिन्यात पुन्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाहीतच. शेतकऱ्यांच्या हिताची सगळीच सरकारे येऊन गेली. प्रत्येक सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते असे म्हणतात.  तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळावेत यासाठी आंदोलन करावेच लागते.  अगदी शरद जोशींच्या रस्ता रोको पासून आम्ही पाहतो आहोत.  कोणतेही सरकार शेतमालाच्या भावाच्या बाबतीत उदासीन का असते ? शेतमालाचे भाव वाढल्यास साधारण  मध्यमवर्गीयांमध्येच काहीशी नाराजी पसरते.  मला असे वाटते की मध्यमवर्गीयांची मते ही कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण तेच मोठ्या संख्येने मतदान करणारे मतदार असतात.  या मतदारांच्या नाराजीला घाबरून कोणतेही सरकार शेतमालाच्या भावांबद्दल निर्णय घेत नाही असे वाटते.

खरं म्हणजे सगळ्याच शेतमालाचे कमीत कमी भाव म्हणजेच बेसलाईन एकदा ठरवून घ्यावी आणि दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जशी महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ मिळते त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भावालाही महागाई निर्देशांका प्रमाणे वाढ मिळावी असे ठरवून टाकावे.  काय हरकत आहे ? सर्व पक्षांनी येत्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यावर शेतमालाच्या भावासंबंधी आम्ही काय करणार आहोत आणि शेतमालाला नक्की कमीत कमी किती भाव देणार आहोत हे जाहीर करून मते मागावीत. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर शेतकरी तो खर्च करतोच. शेतकऱ्याकडून पैसा खर्च झाला की तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये आला की मार्केट सुधारेल. मार्केट सुधारल्यावर उत्पादन सुधारेल उद्योग सुधारतील.  संपूर्ण अर्थव्यवस्थाच मजबूत होऊ शकेल असे आपले माझ्या अल्पमतीला वाटते. यात अडचण काय आहे हे सुद्धा सर्व राजकीय लोकांनी एकदा जाहीर करावे.  पण आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेणार एवढेच म्हणून मते मागून सत्ता मिळाल्यावर, कुठलाही शेतकरी हिताचा निर्णय घेतला जात नाही. असे मागील पन्नास साठ वर्षे मी पाहतो आहे. तर मला वाटते एकदा असे होऊन जाऊ द्या. सर्व राजकीय पक्षांनी ते निवडून आल्यानंतर शेतमालाला कमीत कमी कसा आणि किती भाव देतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करतील हेच त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करून टाकावे.  आहे कोणी डेरिंगबाज? अर्थात जो कधीच निवडून येऊ शकणार नाही अशांनी डेरिंग दाखवण्यात अर्थ नाही हेही खरे. परंतु महत्त्वाच्या मोठ्या राजकीय पक्षांनी याबाबत निश्चित योजना आकडेवारी सह जाहीरनाम्यात जाहीर करावी. करा तर खरं एकदा डेअरिंग! माझ्यासारखे मध्यमवर्गीय सुद्धा नक्की मत देतील अशा डेरिंगबाजांना !

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

Email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print