मराठी साहित्य – विविधा ☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे.  एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, कथा किंवा कविता. डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं . एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावाने सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्याला देतं.

बरं हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे. मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातील ती अक्षरे अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरे एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणाने घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसे एखाद्या काचेच्या बरणीत काजवे एकत्र गोळा करावेत आणि ती काचेची बरणी प्रकाशमान व्हावी, तिचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडावा आणि आपला चेहरा काळोखातही उजळून निघावा तसेच वाचन माझ्या अंतरंग प्रकाशाने भरून टाकते. मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघतो. उन्हाळ्यात तहानलेल्या धरणीवर जसे पावसाचे थेंब पडावेत आणि थोड्याच वेळात आपल्या शीतलतेने त्यांनी धरित्रीला शांत करावे तसे उत्तम वाङ्मय मनाच्या तहानलेल्या धरणीवर अमृताचे सिंचन करते. मग उन्हाने कोमेजलेले, करपलेले अंकुर टवटवीत होऊन वर येतात आणि ते ‘हिरवे हिरवे गार गालिचे ‘ मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात.

जेव्हा एखादे बुवा, पुराणिक, कथाकार, कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीद्वारे रामायण, भागवत, हरिविजय, पांडवप्रताप यासारखा एखादा ग्रंथ श्रोत्यांसमोर वाचतात, तेव्हा ते स्वतःबरोबर इतरांनाही आनंदाची अनुभूती देतात. मुळातच हे ग्रंथ भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहेत, त्यात सांगणाऱ्या बुवांची वाणी रसाळ आणि प्रासादिक असेल तर मग विचारायलाच नको. श्रोते त्या वर्षावात चिंब न्हाऊन निघतात. आताही माध्यम तेच असते. म्हणजे बुवांच्या समोर असलेला प्रासादिक ग्रंथ. पण त्या ग्रंथातील अक्षरे आता बुवांच्या हृदयातील ओलावा, आनंद, प्रसन्नता घेऊन ध्वनीचे रूप धारण करतात. आता त्यांचा हृदयात उतरण्याचा मार्ग बदलतो. डोळ्यांच्या ऐवजी ती कानावाटे प्रवेश करती होतात. कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. पण परिणाम मात्र तोच असतो. आणि तो परिणाम म्हणजे दिव्यानंदाची अनुभूती.

ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आणि तेव्हा जे श्रोते हजर असतील, ते किती भाग्यवान म्हणावेत ! ते दृश्य जेव्हा मी कल्पनेने डोळ्यासमोर आणतो, तेव्हा मला दिसते ते मंदिर. माऊली खांबाला ( पैस ) टेकून बसल्या आहेत. समोर त्यांचे बोल आपल्या कानात साठवून घेण्यासाठी चातकाप्रमाणे आतुर झालेला श्रोतृवर्ग बसलेला आहे. बाजूला निवृत्तीनाथ आहेत. माऊलींच्या दोन्ही बाजूला दोन समया प्रकाशमान आहेत. त्या समयांच्या प्रकाश माऊलींच्या मुखमंडलावर पडला आहे. मुळातच तेजस्वी असलेली माऊलींची मुद्रा त्या प्रकाशात आणखीनच दिव्य प्रकाशाने उजळून निघाली आहे. माऊलींच्या मुखातून आता अमृतासमान अशा एकेक ओव्या बाहेर पडताहेत. ओम नमोजी आद्याने सुरुवात झाली आहे. एकामागून एक निरनिराळी रूपके, उपमा घेऊन त्या ओव्या श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. इथे श्रोत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. हा आनंद किती आणि कुठे कसा साठवावा हे त्यांना उमजत नाही. जणू त्यांच्या सर्वांगाचे कान झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे अमृतमयी बोल ते आपल्या हृदयात साठवून घेत आहेत. हृदयीचे हृदयी घातले अशी ही अवस्था !

‘तरी आता अवधान दिजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे‘ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते उगीच नाही.

महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण लव कुश यांनी जेव्हा श्रीरामांच्या दरबारात श्रीराम आणि श्रोत्यांसमोर गायिले तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली ते आपण रामायणात वाचतोच. ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो ते ग दि माडगूळकर गीतरामायणाच्या लेखनामुळे अजरामर झाले. हेच गीतरामायण बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गाऊन अजरामर केले. यातील ते गीत सहजच ओठांवर येते

स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती.

मग ही गाणारी मुले कशी आहेत याचे चित्रमय वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात

राजस मुद्रा वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे

अशा एकेक ओळी आठवत जातात. या सगळ्यांचा श्रोतृवृंदावर काय परिणाम होतो, तो पण गदिमा जणू सचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. ते म्हणतात

सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुनी सर्ग चालती

सचिव मुनिजन प्रिया डोलती, आसवे गाली ओघळती.

प्रत्यक्ष श्रीरामांवर काय परिणाम झाला तर…

सोडून आसन उठले राघव, उठुनि कवळती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती.

अशी जादू जणू हे शब्द करतात ! मग ते शब्द वाल्मिकींचे असोत वा गदिमांचे. ती अमूर्त अक्षरे ध्वनीचे रूप घेऊन कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. आनंदाच्या चांदण्याची बरसात होते. कर्तव्यकठोर असलेल्या श्रीरामांचे देखील डोळे पाणावतात. माया, ममता, प्रेम, करुणा सगळे सगळे भाव हे शब्द उभे करतात.

असं म्हटलं जातं की प्रख्यात जर्मन कवी गटे यांनी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचं जर्मन भाषेत केलेलं भाषांतर जेव्हा वाचलं, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की हा जर्मन कवी आपलं देहभान विसरून शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला. कुठून आला हा आनंद ? पुस्तकाच्या वाचनातूनच ना ? या आनंदाला उपमा नाही आणि त्याची तुलना इतर कुठल्या आनंदाशी होऊ शकत नाही. त्या काळात पाश्चात्य साहित्यात सौंदर्यवाद ( romanticism ) मूळ धरू लागला होता. अशा काळात कालिदासाने लिहिलेलं शकुंतलेचं आणि निसर्गाचं वर्णन वाचून हा कवी अक्षरशः वेडा झाला. त्याने त्यावेळी शाकुंतल या ग्रंथाबद्दल काढलेले उद्गार असे आहेत. ‘ वसंतऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी ( युगपद्) ज्यात आहे, जे ( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे. ‘ मला वाटतं  हेच उद्गार सर्व ग्रंथांना लागू होतात .

ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून त्यांच्या भाषेत मला असे सांगावेसे वाटते

ग्रंथ सर्व रसांचा आगरु, ग्रंथ सर्व सुखांचा सागरु

तरी ग्रंथ हाती घेईजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे.

जशी प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ बाहेर पडणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या भावनांचे सुद्धा मुक्त होणे, निचरा होणे  किंवा ज्याला आपण विरेचन असे म्हणू तेही आवश्यकच असते.  पुस्तके आणि त्यांचे वाचन अशा प्रकारचे भावनांचे विरेचन ज्याला इंग्रजीत कॅथर्सिस म्हटले जाते ते घडवून आणतात. मी वाचकही आहे आणि लेखकही. माझा तर श्वास म्हणजे वाचन ! मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा एखादे आवडते पुस्तक हातात घेतो आणि माझा आनंद दुणावतो. मी जेव्हा दुःखात असतो तेव्हाही एखादे पुस्तक हातात घेतो आणि माझे दुःख उणावते. थोडक्यात म्हणजे गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकांचे वाचन हे ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ अशा प्रकारचे आहे. स्वानंदासाठी वाचन करावे, विचार, अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचन करावे. ‘मेरा पढने में नही लागे दिल…‘ असे न म्हणता ‘मेरा पढने मे हीं लागे दिल ‘ असे म्हणू या.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वाभिमान… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

स्वाभिमान…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

स्वाभिमान …किती जणांना असतो ? तुम्ही म्हणाल ” स्वाभिमान तर प्रत्येक मनुष्याला असतोच “. तुमच्या म्हणण्यात खोट नाही परंतु त्यामध्ये यथार्थता नाही हे अधिक खरं आहे. बहुतांशी लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की ते स्वाभिमानी आहेत.या गोड गैरसमजात माणसे जगतात आणि मरतात देखील . पण स्वाभिमान या शब्दाची नेमकी जाणीव व त्याचा गाभा किती जणांना आकळलेला असतो ? कोण जाणे. स्वाभिमान हा शब्द मानवी जीवनात अगदी अलिकडे दाखल झाला असावा.याचे कारण असे की , मुख्यतः विज्ञानयुगानंतरच मनुष्याच्या वैयक्तिक व विश्वात्मक भावनांना काही एक निश्चित अशी चौकट उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी स्वाभिमान हा शब्द इतर वेगळ्या अर्थाने कार्यरत असावा. त्याच्या मध्ये सखोलतेची व व्यापकतेची त्रुटी असावी.

स्वाभिमान …शब्द उच्चारताना अंग किती मोहरून येते. आपण स्वाभिमानी बाण्याचे आहोत हा गोड गैरसमज बहुतांशी लोकांना सन्मान पुरवत असतो. पण या बहुतांशी लोकांनी स्वाभिमान या शब्दाची परीक्षा आपल्या जीवनात सखोलपणे अभ्यासलेलीच नसते हे कटू वास्तव आहे. स्वाभिमान या शब्दाचा शब्दशः अर्थ स्वतः विषयीचा अभिमान असा होईल. पण हा अर्थ या शब्दाला सखोलपण पुरवत नाही . स्वाभिमान या शब्दांत जोपर्यंत ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पडत नाही तोवर मनुष्याला स्वाभिमान कळणार नाही .हा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” अध्यात्मवादी धारणेची नसून ती वेगळ्या पण योग्य अर्थाची आहे. स्व जाणणे म्हणजे ज्या नैसर्गिक घडणीतून तुमची जडणघडण झाली आहे ती नैसर्गिक प्रक्रिया जाणून तिच्यानुसार प्रामाणिक वर्तन करणे होय. यामध्ये नक्कीच कालसुसंगत लवचिकता असतेच मात्र यामध्ये आशयाला धक्का पोचेल असे असत्य असू नये.मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून काही अन्य स्वार्थापोटी जेव्हा तो दुसरा एखादा मुखवटा चढवून समाजात वावरतो तेव्हा ” स्वाभिमान ” हा शब्द गळून पडलेला असतो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक धाटणीशी प्रामाणिक राहून वर्तन करत असाल तर तुम्ही ” स्व ” जाणलेला आहे आणि त्या ” स्व ” चा योग्य अभिमान तुमच्या मनाच्या तळाशी आहे. हा तळ म्हणजेच तुमचा स्वाभिमान असतो. हा तळ ढवळावा लागतो आणि त्या मंथनातून बाहेर पडते तुमचे नैसर्गिक रुप. हे रुप जसेच्या तसे समाजात घेऊन वावरणे म्हणजेच स्वाभिमान जागृत ठेवणे असा होतो. हीच आहे स्वाभिमान शब्दाची जाणीव व यथार्थता …

बहुतांशी लोकांना वरवरचा व शाब्दिक अर्थच अपेक्षित असतो. शब्दाच्या तळाशी असणारे रंग त्यांना जाणवत नाहीत की पृष्ठभागावर तरंगणारे नैसर्गिक तवंग त्यांना दिसत नाहीत . त्यांना फक्त शब्दाच्या समुद्रात दिसतो आपला चेहरा .हा चेहरा फसवा असतो. कारण या चेहऱ्याने ” स्व ” जाणण्याची प्रक्रिया पार पाडलेली नसते. अशावेळी केवळ शब्दजंजाळात अडकून स्वाभिमान बाळगण्यात कोणतीही यथार्थता नाही . स्वाभिमान बाळगायचाच असेल तर पहिल्यांदा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पाडा. नंतर त्या ” स्व ” चा मनापासून स्विकार करा. त्यानुसार तुमचे वर्तन करा…” स्वाभिमान ” तिथेच सापडेल.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुखी व्हा,समाधानी रहा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सुखी व्हा, समाधानी रहा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एका गुरुजींनी आशिर्वाद देताना म्हंटले “सुखी व्हा, समाधानी रहा,” आशिर्वाद जाम आवडला आणि पटला. समाधान ह्या शब्दामध्ये मन गुंतले आणि विचारात देखील पाडले.समाधान ही गोष्ट आपल्याला मिळवावी लागते, अनुभवावी लागते.”स्वाद लियो तो जानो”ह्या सारखं ती अनुभवल्या वरच खरी तिची लज्जत, खुमारी ही कळते.समाधान म्हणजे खरतंर वर्णन करायला शब्दही तोकडे पडतात अशी गोष्ट.समाधान ही अनुभवण्याची एक गोष्ट.बरं ही गोष्ट अनुभवली तर अगदी इटुकल्या पिटुकल्या ,साध्यासुध्या गोष्टीतही मिळते.फक्त ही गोष्ट मिळवण्याचं कसब मात्र हवं हं.

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप.आणि ह्या साखरझोपेतून मिळतं एक वेगळंच स्वप्नाळू  समाधान.

महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ. आणि ह्या अचानक धनलाभातून मिळतं घबाडाएवढं समाधान.

कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी.आणि ह्या मेजवानीतून मिळतं एक भरपेट ओतप्रोत,तुडुंब आनंदायी समाधान.

एखाद्या गोष्टीचे अप्रुप वाटत असतांनाच अचानक अलगद ओंजळीत पडलेली ती  गोष्ट म्हणजे खरे सुदैव.आणि ह्या सुदैवातून मिळतो  “अच्छे दिन” वालं साक्षात्कारी समाधान.

आपल्याला काय मिळाले ह्याचा ताळेबंद बघुन यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी त्रुप्ती.आणि ह्या त्रुप्तीतुनचं मिळते उद्याचे उज्ज्वल आशादायी समाधान.

रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख.आणि ह्या सुखातुनचं मिळतं एक आत्मिक समाधान.

मी तरी स्वतः ला खूप नशीबवान समजते.कारण ह्याची अनुभुती मी पावलोपावली घेते.तुम्हीही समजून बघा खूप मस्त वाटेल. ह्या जन्मावर,ह्या  जगण्यावर,शतदा प्रेम करावे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

🌸 विविधा 🌸

☆ ॥ श्रीकृष्ण ज्ञानदेव मैत्रभाव॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

देवकीया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, का शेखीं उपेगा गेला, पांडवासी..

असा तो.देवकीने प्रसवला,यशोदेने वाढवला,आणि तो झटला पांडवांकरता.वसुदेवाचा अंश होता, पण नंदाचे भाग्य झाला.अष्टनायिकांचा नाथ,सोळा सहस्रांचा आधार.गोपिकांचे सुखनिधान,राधिकेचा प्राण.गोपालकांचा सखा,गोधनाचा पाठीराखा.दुष्टांचा मारक,सज्जनांचा तारक.अधर्माचा विच्छेदक आणि धर्माचा संस्थापक.परम ईश्वराचा पूर्णावतार आणि मानवपणाचा साक्षात्कार.

सर्वांना तो त्यांचा वाटे.कदंबाखाली गोपालांशी खेळताना किंवा वृंदावनात रस रचताना त्यातल्या प्रत्येकाला वाटे,तो आपलाच.सुदाम्याला वाटले हा माझा सहचर ,कुब्जेला वाटले ‘हे माझ्यास्तव.’

पण साऱ्यांचा असून तो कुणाचाच नव्हता. गोकुळ सोडलं,प्राणप्रिय बासरी परत कधी अधरावर धरली नाही.अष्टनायिकांच्या मोहात, राधिकेच्या त्यागात, कृष्णेच्या सख्यत्वात,कुंतीच्या ममत्वात कशा कशात गुंतला नाही तो.

जिथे गेला तिथे पूर्णांशाने त्यात होता. तिथले प्रयोजन संपताच कमलपत्राच्या निर्लेपपणे आपला आभाळासारखा निळा शेला उचलून निघून जायची त्याची रीत. पण एका जागी मात्र हा जगन्नायक गुंतून पडला.त्याच्या शेल्याचं टोक अडकून पडावं अशी एकच जागा होती -अर्जुन !

धर्म भीमांना नमस्कार करणारा,नकुल सहदेवांना आशीर्वाद देणारा कृष्ण अर्जुनाला मात्र उराउरी भेटत असे.’पांडवांमध्ये मी अर्जुन’ असे त्याने म्हणावे इतके त्याचे याचे एकत्व! ‘अप्रांतमती’ लेखात द.भि. कुलकर्णी म्हणाले, ‘देवकी,यशोदा,गोप-गोपी,राधा,द्रौपदी सारेजण कृष्णाला दर्पण करून आत्मदर्शन घेत होते;एकटा अर्जुन असा होता की जो कृष्णाचा आरसा झाला होता-कृष्ण अर्जुनात आत्मदर्शन घेत होता!’ काय नितळ मन असेल अर्जुनाचं!

हे कृष्णाचं गुंतणं जाणलं ज्ञानदेवांनी.गीतेचं तत्त्वज्ञान सांगताना योगेश्वराचा स्वर कुठे हळुवार झाला, कुठे त्याचा कंठ दाटून आला, कुठे त्याला अर्जुनप्रीतीचे भरते आले, कुठे त्याला काळजी वाटली, कुठे तो हलके रागे भरला,हे त्यांच्या हळुवार अंतःकरणानं हलकेच टिपलं.त्या अर्थी ज्ञानेश्वरही आरसा झाले.ज्ञानेश्वरीत त्यांनी कृष्ण होऊन श्रोत्यांना अर्जुनाच्या जागी बसवलं,आणि कृष्णाहून हळुवार होऊन आपल्यातील अर्जुनाला समजावलं!

दभि म्हणाले तसं ‘ज्ञानेश्वरांना कृष्णाचे सर्वस्पर्शित्व नेमके आकळले आणि त्याचे केंद्रही गवसले होते. त्याचे पूर्णकाम,निरिच्छ,जीवन्मुक्त असणे त्यांनी जाणले.आणि तसेच अर्जुनातले त्याचे गुंतणेही!’ ज्ञानेश्वरांचे निर्मळ,उन्नत आणि संवेदनशील मनच हे जाणू शकते.

ज्ञानेश्वरीतले कृष्णार्जुन प्रेमाचे दाखले फार लोभस आहेत!

पाचव्या अध्यायात योगशास्त्राचे महत्व ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की हे सारं फार छान आहे. हे मला पुन्हा एकदा नीट समजाव .आणि अर्जुनाला योगमार्गाविषयी गोडी निर्माण होते आहे हे जाणून आनंदलेल्या कृष्णाचे वर्णन करताना माऊलींनाही आनंदाचे भरते आले आहे .

आधींच चित्त मायेचे, वरी मिष जाहले पढियंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे, कवण जाणे!

आधीच प्रेमाचं माणूस ,त्यात शिकायची इच्छा,त्यामुळे आता जो अपूर्व भाव उमलेल तो अद्भुत असेल खास !

ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टि,की नवया स्नेहाची सृष्टि,हे असो नेणिजे दृष्टी,हरीची वानू.

जे अमृताची वोतली,की प्रेमचि पिउनी मातली,म्हणोनि अर्जुन मोहे गुंतली,निघो नेणे!

श्रीहरीचे ते पार्थाकडे पाहणे कसे होते म्हणून सांगू ?त्यात कारुण्याची वृष्टी आहे की नव्याने उचंबळलेल्या स्नेहाने परिपूर्ण अशी भगवंताची दृष्टी आहे ? ती दृष्टी म्हणजे जणू अमृताची वोतीव पुतळी होती, जी त्या अद्भुत क्षणात निर्माण झालेला प्रेमरस पिऊन अशी मातली, की अर्जुनाच्या प्रेमाच्या विळख्यातून तिचा पाय निघेना !

पुढे ज्ञानदेव म्हणतात की ही कल्पना किती फुलवावी तितकी फुलेल पण मला त्या प्रेम दृष्टीचे अचूक वर्णन करता येणार नाही .परमात्म्याचे प्रेम इतके अथांग आहे त्याचे वर्णन कसे शक्य आहे? पण ज्याअर्थी त्यांनी अर्जुनाला आधी ‘परिस बापा’ असे संबोधले त्या अर्थी हा प्रेमाचा गुंता आहे असे मला खचित वाटते !

पुढे सहाव्या अध्यायात ब्रह्मविद्या सांगताना तर ज्ञानदेवांच्या योगेश्वराच्या मनात भय दाटून येते. की खरेच मी ही गुह्यविद्या याला देणे योग्य आहे का ? अर्जुनाच्या मनात जर अद्वैताचा भाव जागा झाला आणि हा याचा देहाचा अहंभाव विसरून माझ्यात मिसळून गेला तर मी याच्या प्रेमाच्या सुखाला मुकेन !मी एकटा करू काय ?

विपाये अहंभाव याचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय कीजेल, एकलेया..

दिठीचि पाहतां निविजे, कां तोंड भरुनी बोलिजे, नातरी दाटून खेंव दीजे,असे कोण आहे!

आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले..

ज्याला पाहताच दृष्टी निवावी आणि ज्याच्यापाशी मन मोकळे करावे किंवा उत्कटपणे ज्याला मिठी मारावी असं अर्जुना वाचून दुसरं आहे कोण ? हा जर माझ्याशी एकरूप झाला तर माझ्या मनाला भावलेली एखादी गोष्ट मी सांगावी कुणाला ?आनंदाने माझे अंतःकरण उचंबळून येईल आणि मनात हर्ष अगदी मावेनासा होईल तेव्हा मी ते कुणापुढे ओतावे ? आणि मग योगेश्वराने एक तलम पडदा तसाच ठेवला जेणे करून दोघांचे द्वैत अबाधित राहील.

या ओव्या वाचताना वाटलं,ज्ञानदेवांनी भोगलेलं एकटेपणच या ओव्यांमधून हळुवार संयतपणे व्यक्त झालंय.कोवळ्या वयात हरपलेले मायबापांचे छत्र,सोसावे लागलेले समाजाचे वार,निवृत्तीनाथांची योग्यता जाणून त्यांची गुरु म्हणून केलेली सेवा,लहानग्या मुक्ता सोपानाची काढावी लागणारी समजूत,समाजापुढे स्वतःला सिध्द करण्यासाठी करावी लागलेली दिव्ये ..या साऱ्या झंझावातात हा बालयोगी निचळ एकटा उभा राहिला.या साऱ्या सोसण्याचा अस्फुटसाही उद्गार साऱ्या साहित्यात कुठेही नाही.पुसटसाही नाही.पण साऱ्या विश्वाचा भार वहाणारा जगजेठी एकटा असतो,अगदी एकटा,हे ज्ञानदेवांइतकं कुणाला समजेल ?

ज्याला आपले बालसुलभ हर्षखेद सांगावेत,कधी शोक झाला,हृदय विव्हल झालं तर खांद्यावर डोकं ठेवावं,आनंदाने विभोर होऊन मिठी मारावी असं बरोबरीचं मैत्र त्यांच्या वाट्याला होतं कुठे ? मग साऱ्या भूतमात्रांनाच मित्र केलं त्यांनी.गुरु-शिष्य,माता-बालक, ईश्वर-भक्त अशी अनेक नाती ज्ञानेश्वरीत उलगडली पण पसायदानात स्थान मिळालं ते मैत्रभावाला.भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे !

गीता समजून घेताना कृष्ण त्यांचा सखा बनला असणार.गीतेचं तत्त्वज्ञान आत्मसात करताना त्यांच्या तरल प्रज्ञेला गीतेतलं कृष्णार्जुनाचं भावविश्व जाणवलं असणार.त्यामुळंच कृष्ण जे थेट बोलला ते आणि न बोलताही त्यानं जे सांगितलं ते,दोन्ही त्यांनी आपल्याला उलगडून दाखवलं..

एकाच तिथीला जन्मलेली ही दोन अप्रांतमती व्यक्तित्वे एकमेकांत अशी मिसळून गेलेली वाटतात.

तूं तो माझें, मी तो तुझे ,ऐक्य जाले तेथें कैचें दुजें !

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

पुढे धाव घेण्याची, झोकून देण्याची, समर्पणाची, एकरूप होण्याची असोशी आपल्या  अल्पाक्षरी रूपात व्यक्त करणारा लक्षवेधी शब्द म्हणजे ओढ!

ओढ म्हणजे अंतर्मनात अस्वस्थ खळबळ माजवणारी अनिवार भावना!

आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या मनातली घरट्याकडे परतण्याची असो, आईच्या मनातली बाळाला कवटाळण्याची वा बाळाच्या अबोध मनातली आईच्या कुशीत शिरण्याची असो,एखाद्याच्या मनातील मैत्रीची असो,कलासक्त मनातील नवनिर्मितीची असो वा भक्तियुक्त अंत:करणातील ईश्वरप्राप्तीची असो या सर्व विविधरुपरंगी ओढींचे उत्कटता हे अविभाज्य अंग असते.उत्कट भावनेशिवाय  ओढ निर्माण होऊच शकत नाही आणि मनात कळकळ,तळमळ नसेल तर उत्कटताही निर्माण होत नाही.ही अशी तळमळ निर्माण व्हायला त्या क्षणापुरता कां होईना ‘स्व’चा विसर अपेक्षित असतो आणि अपरिहार्यही.

प्रेम, माया, कल, प्रवृत्ती, पसंती, आवड,ओढा,आकर्षण असे ओढ या शब्दाचे विविध अर्थरंग या शब्दातला भाव व्यक्त करण्यास पुरेसे नाहीत.कारण  सकारात्मक भावनांनी युक्त अशा या अर्थशब्दांना परस्पर छेद देतात ते गरीबी,अभाव दर्शवणारा ओढग्रस्त, जोर लावणे,ताणणे या अर्थाचा ओढणे,दडपण व्यक्त करु पहाणारा ओढाताण मनाची चंचलता,स्वैरता,द्वाडपणाचं प्रतिबिंब सामावून घेणारा ओढाळ असे अनेक शब्द! ही सगळी ओढ या शब्दाचीच विविधरंगी रुपे!

पण तरीही ही होती सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वातली,मर्यादीत पैस असणारी ओढ! सर्वसाधारण माणसाच्या मनातली उत्कटता ध्वनित करणारी! या प्रकारची ओढ व्यक्तिगत परिघात वावरणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदु:खातून निर्माण होत असते. या परिघाला अंगभूत मर्यादा असणे स्वाभाविकच.पण स्वतःच्या सुखाचा,स्वास्थ्याचाच नव्हे तर सर्वस्वाचा होम करुन देशहितासाठी हालअपेष्टा सोसणाऱ्या देशभक्तांच्या मनातली मातृभूमीची ओढ ही सर्वांनाच सतत प्रेरणादायी ठरणारी अशीच असते.

काळ्यापाण्याच्या प्रदीर्घ काळातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीरयोध्यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांच्याच शब्दांत व्यक्त होते तेव्हा त्या शब्दाशब्दांत भरुन राहिलेले असते ते हेच देशप्रेम!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातली ही ओढ जेव्हा काव्यरूप धारण करते तेव्हा त्या ओढीतली असोशी आणि तळमळ….

‘ ने मजसी ने s परत मातृभूमीला….

सागरा प्राण तळमळला..’

अशा उस्फुर्त,उत्कट शब्दातून नेमकी व्यक्त होते..!

स्वार्थाचा लवलेशही नसलेली उत्कट देशप्रेमातून निर्माण झालेली ही तळमळ कुणीही नकळत नतमस्तक व्हावे अशीच म्हणावी लागेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

🌸 विविधा 🌸

☆ आजच्या दहिहंडी वरील छान विवेचन!!! ☆ अनामिक ☆

अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा प्रकाशझोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले … कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची … पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. आधी वाटणी ठरवायची … कान्हा … कान्हाला काही कळेना … तो म्हणाला .. माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक .. पेंद्या म्हणाला … काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. मग काय हवं तुम्हाला .. ? पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला … बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईट ची संधी … आणि अपघाती विमा … कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पना ही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता इव्हेंट बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. पण कान्हा … कान्हा शांत स्वरात म्हणाला .. अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हा शिवाय हा सण असाच साजरा करत रहातील .. असा म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..

– अनामिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ शिक्षक –बदलते स्वरूप… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.  शिक्षक हे समाजातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या हातूनच समाजाचा पाया रचला जातो. शिक्षकांची गुणवत्ता जितकी दर्जेदार तितकेच चांगले विद्यार्थी घडले जातात. समाजाचा मुलभूत घटक खरेतर शिक्षकच आहे. पुर्वी समाजात कोणतेही शुभकार्य असो , शिक्षकांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. इतकेच नाही तर गुरूजी, सर समोरून येताना दिसले की, आपोआप नजर खाली जाऊन शिक्षकांबद्दल विलक्षण आदर, त्यांचा दरारा मनात येत असे. पण आज कुठेतरी हे चित्र बदलताना दिसत आहे.

पुर्वी ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन शाळा आणि गुरूजी अथवा सर हेच होते. पण आज संगणक युग आले, लहान मुलांपासून ते काॅलेजात जाणाऱ्या युवकांपर्यंत हातात मोबाईल आले आहेत. जरूरी असणारी सर्व माहीती गुगलवर मिळू लागली आहे.  त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होत चालले आहे. दुसरे म्हणजे आज गल्ली गल्लीतून शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. यामुळे ज्ञानाचे मुख्य केंद्र असणारे, शाळा आणि शिक्षक यांचे समाजातील स्थान ढासळत चालले आहे. शिक्षकांबद्दल असणारा आदर, त्यांचा दरारा आजच्या विद्यार्थ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही.  काही ठिकाणी तर शिक्षकांना अपमानित करणे, उध्दटपणे बोलणे  असे घृणास्पद प्रकार घडताना दिसतात.  एकेकाळी शिक्षक हे समाजातले आदरस्थान होते. पण आज शिक्षकांचे समाजातील महत्त्व कमी होत चालले आहे.  ही स्थिती समाजासाठी घातकच ठरेल.  कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे, भावी नागरिक असतात.  शिक्षकांच्या हाताखालीच हे समाजाचे खांब मजबूत, गुणवंत, आदर्शवादी होत असतात. त्यामुळे शिक्षक हेच भावी समाजाचे ‘आधारवड ‘ आहेत. समाजाने सुध्दा शिक्षकांचे आजचे ढासळणारे स्थान,  महत्त्व इ. बाबींना सावरले पाहिजे.  ‘ शिक्षक हेच गावातील बहुमूल्य व्यक्तिमत्त्व आहे  ‘ हा विचार समाजमनावर कोरला जावा.

दुसरे म्हणजे स्वतः शिक्षकांनी सुध्दा आपले शाळेतील  ,समाजातील स्थान अबाधित राहील याकडे लक्ष देऊन उत्तम ज्ञानदान करावे. वर्गात शिकविताना ज्या विषयाचे संपूर्ण ज्ञान आहे असाच विषय अध्यापनास निवडावा. शिक्षकांनी आपल्यातील गुणवत्ता ही फक्त हुशार विद्यार्थी अधिक हुशार कसा होईल याकरताच न वापरता, वर्गातील सर्वसामान्य विद्यार्थीसुध्दा उत्तम व्हावा याकडे लक्ष केंद्रित करावे. आपले ज्ञान हे आभ्यासात मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल ह्याकरिता प्रयत्न करावेत.  दर्जेदार शिक्षक , शाळा आणि विद्यार्थी या गोष्टीवर सुध्दा समाजाचे भवितव्य अवलंबून असते. वर्गात शेवटच्या बाकावरील विद्यार्थी आणि पहिल्या बाकावरील विद्यार्थी यात शिक्षकांची समदृष्टी असावी.  “आदर्श विद्यार्थी  ,आदर्श शाळा  ,आदर्श समाज  हे प्रत्येक शिक्षकाचे लक्ष्य असावे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे त्यामुळे शाळेसारख्या पुण्यस्थानी शिक्षणाचा बाजार होवू नये याचे ध्यान आपण सर्व पालक ,विद्यार्थी  आणि सर्व शिक्षक मिळून ठेवले पाहिजेत.

सर्व शिक्षक बंधू -भगिनींना शिक्षकदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.

रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.

सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.

या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.

कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल  हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?

२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,

ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

या मुळे पुढील फायदे होतात.

१ पिंपल्स कमी होणे

२ पित्ताचा त्रास कमी होणे

३ मधुमेह खूप कमी होणे

४ पोट साफ होणे

५ दम लागणे बंद होते

६ पंडुरोग नष्ट होणे

७ कृमी नष्ट होणे

८ शरीर शुद्धी होणे

पूर्वी असे आजार दिसत नव्हते.

याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.

गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.

आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.

यातील पटेल ते अंगीकारावे ही विनंती आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ओळखावे नव्याने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार आपल्या सवयी बनत जातात. गाण्याची म्हणजे गाणे ऐकण्याची आवड असली की आपोआप गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळं रात्री झोपताना एक मस्त गाणं ऐकून झोपल. की झोपेचं समाधान मिळतं. सहसा ह्या गाण्यांमध्ये जुन्या आणि आमच्या काळातील गाण्यांचा समावेश असतो. अगदीं कधी मधी हल्लीच लोकप्रीय गाणं ऐकण्याचा योग आणते.

“चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हमदोनो” ह्या गाण्याची व्हिडीओ क्लीप काल बघण्यात आली. सुनील दत्त चा अभिनय आणि मालासिन्हा चे दिसणे मस्तच पण खरंतर हे गाणे लक्षात राहतं त्या गाण्याच्या बोलांनी,चालीनी,आणि त्याच्यातील खूप अर्थपूर्ण शब्दांनी.खरचं किती अफलातून कल्पना नं. आपल्या परिचीत व्यक्तीला अनोळखी समजून त्याची परत नव्याने ओळख करून घेणे.खूपदा या परत ओळखण्याने आपल्याला पहिल्यांदा न दिसलेले गुण दिसतील.कदाचित परत एकदा स्वभावाची नीट ओळख पटेल.परत एकदा एकमेकांना नव्याने ओळखू लागू.जुने काही मनात उगीचच किल्मिष असतील तर आपल्या चुकीची,गैरसमजाची जाणीव होऊन परत एकदा मने साफ होतील.

काहीवेळा अतिपरिचयाने आपण दुस-याच्या मनाचा विचार न करता एकमेकांना ग्रुहीत धरायला लागतो.ह्या परत एकदा एकमेकांना जाणून घ्यायच्या कल्पनेतून कदाचित स्वतः च्या आधी दुस-याचा विचार करायला शिकू.

          “कितीदा नव्याने तुला ओळखावे,

              स्नेहाच्या धाग्यात गुंतत जावे,

              मौनातील इशारे उमजून घ्यावे,

                        शब्दही त्यासमोर फिके पडावे ।।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उसळ आणि उसळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 उसळ आणि उसळी ! 😅🤣😇 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

सेन्सेक्सने उसळी घेऊन पासष्ट हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !

ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा, हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !

फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !

माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको !  ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !

मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही  उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !

सुज्ञास अधिक मी अज्ञानी काय सांगणार ?

आपापल्याला जिभेला पर्यायाने खिशाला जपा!

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print