सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गौराई… ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

माहेरवाशीण म्हणून बर्याच ठिकाणी पुजली जाणारी गौर, काही घरात गणपतीची आई म्हणून आपल्या बाळाचं कौतुक, ,गणपतीचं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी तर कधी जगन्माता “श्रेष्ठा- कनिष्ठा”अशा बहिणींच्या रूपात आगमन करते .

महाराष्ट्र तसेच कर्नाटकात गणपतीच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे.

 प्रदेशानुसार पूजा पद्धतीत फरक असला तरी देव लोकात वास करणाऱ्या या लेकी बद्दलचे प्रेम ,आपुलकी सगळीकडे सारखीच असते.

“लेक”बनून आलेल्या या माऊलीचे यथाशक्ती पूजन करणे हाच भाव असतो. महाराष्ट्रात गौरीपूजनाची विविध रूपे पहावयास मिळतात. प्रदेशानुसार गौरीपूजनाची पद्धत वेगवेगळी असते.

कोकणस्थ व कऱ्हाडे ब्राह्मण खड्यांची गौर पुजतात. सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन नदीकाठी जाऊन तिथले पाच खडे किंवा सात खडे ताम्हणात कोऱ्या वस्त्रावर ठेवून आणतात .कापसाचे वस्त्र घालून, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घरी आणतात .गौरी माहेरवाशिण म्हणून येत असल्याने हा मान माहेरवाशीण मुलींचा किंवा कुमारीकेचा असतो.

कोकणस्थामध्ये गौर घेऊन येणारी स्त्री तोंडात पाण्याची चूळ ठेवते (त्या मागचे कारण की गौरी घरी येताना माहेरवाशीणीने सासरची गाऱ्हाणी सांगणे , मनस्वास्थ्य बिघडविणारे विचार तिच्या मनात येऊ नयेत) नदीवरून आणलेल्या या गौरीला उंबऱ्या बाहेर पायावर दूध पाणी घालून ,ओवाळून ,रांगोळीने काढलेल्या पावलावरून गौर घरात आणतात .तिला सर्व खोलीत फिरवून घरची स्त्री” इथे काय आहे “असा प्रश्न विचारते .ती गौर आणणारी मुलगी” उदंड “आहे असे मनातल्या मनात तीन वेळा उच्चारते. त्यानंतर तिला गणपती जवळ बसविले जाते .नंतर माहेरवाशीण तोंडातील पाणी टाकून बोलू शकते. आगमना दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो .दुसऱ्या दिवशी “घावन घाटल्याचा “नैवेद्य असतो तर कराडे ब्राह्मण लोक पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात. तिन्ही दिवस गौरीची खण नारळाने आणि तांदुळाने ओटी भरतात .निरोपादिवशी दही पोह्याचा नैवेद्य दाखवून अक्षता टाकून तिला स्थानावरून हलवले जाते. तिची कृपादृष्टी सगळीकडे राहू दे म्हणून तिला सर्व घरातून फिरवून आणले जाते.

देशस्थांच्या घरी उभ्या च्या गौरी बसवतात .त्यांना “महालक्ष्मी “असे म्हटले जाते. गौरींचे मुखवटे पितळेचे ,चांदीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस असतात. घरातल्या सवाष्णी दोन सुपामध्ये धान्याच्या राशीवर महालक्ष्मीचे मुखवटे ठेवून घरात आणतात .त्यापैकी “जेष्ठा गौरीला” तुळशी वृंदावना पर्यंत मिरवत नेले जाते .तिथे तिला” कनिष्ठा गौर “भेटते. दोघी नाही हळदी कुंकू लावून वाजत गाजत उंबऱ्यापर्यंत आणतात. उंबऱ्यावरील माप ओलांडून महालक्ष्मी घरात प्रवेश करते. घरभर काढलेल्या पावलावरून गौरीला फिरविले जाते .लक्ष्मी कोणत्या पावलांनी आली यावर “सोन्याच्या ,चांदीच्या , रुपयाच्यापावलांनी, धनधान्याच्या समृद्धीच्या पावलांनी” असे म्हणून तिला घरभर फिरवून गणेश मूर्ती शेजारी तिची स्थापना करतात नंतर घरातील स्त्री गौरी आणणाऱ्या सवाष्णीला कुंकू लावून साखर देते, लक्ष्मी तयार केलेल्या साच्यामध्ये गहू ज्वारी असे धान्य भरून त्यात पैसे ठेवतात व त्यावर मुखवटे ठेवतात .त्यांना साड्या नेसून दागदागिने घालून सजविले जाते .आलेल्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो.

दुसऱ्या दिवशी पत्रे फुले वाहून पूजा करून तिची प्रतिष्ठापना करतात. दुपारी पुरणपोळी ,16 भाज्या, चटणी ,कोशिंबीर असा नैवेद्य दाखवून सवाष्ण वाढली जाते .तिसऱ्या दिवशी दहीभात, मुरडीचे कानवले नैवेद्य दाखवून संध्याकाळी अक्षता टाकून विसर्जन केले जाते.

कोल्हापूर भागात तांब्यावरची गौर असते .पूर्वी मातीच्या सुगडाचा वापर केला जाई. परंतु हल्ली तांब्याचा तांब्या रंगवून त्यावर एका बाजूला गौरीचा चेहरा ,दाग दागिने ,हात काढले जातात .तर मागील बाजूस गो पद्म ,चंद्र, सूर्य ,शंख ,गदा चुडा इत्यादी शुभचिन्हे काढली जातात.

कोकणात वेंगुर्ले परिसरात सारस्वतांच्या घरी गणपतीची आई म्हणून गौरी पूजली जात असल्यामुळे गणपती आगमनाच्या आधी एक दिवस गौर येते महादेवासह. सुपात तांदूळ घेऊन त्यात पाच झाडांच्या फांद्या ठेवतात आणि त्या भोवती महादेव पार्वतीचे चित्र असलेला कागद गुंडाळतात .गणपतीच्या आधी आई-वडिलांची पूजा होते. हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो .आगमनानंतर आणि विसर्जना आधीही काकडी, नारळ, तांदूळ घेऊन गौरीची ओटी भरली जाते .या गौरीचे विसर्जन तिसऱ्या दिवशी झाडाखाली केले जाते.

सी.के.पी लोकाकडे तेरडा व खड्यांच्या गौरी पूजल्या जातात . माहेरवाशीण ही गौर घरात आणते .तेरडा व सात खडे सुपात घेऊन आणलेल्या माहेरवाशीच्या पायावर दूध पाणी घालून तिला ओवाळून घरात घेतले जाते .कुंकवाचे पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलावरून लाल ठसे उमटवत माहेरवाशीण चालते ,प्रत्येक खोली तिला औक्षण करून विचारले जाते ,”गौरी कुठे आलीस “ती उत्तर ते दिवाणखान्यात मग दिवाणखान्यात काय दिसले ?गौर घेतलेली माहेरवाशीण यजमानांच्या वैभवाचे, प्रगतीचे वर्णन करते नंतर सर्व खोलीत गौर फिरवल्यानंतर गणपतीच्या शेजारी तिला बसवतात मग मुखवटा लावून साडीचोळी नेसून शृंगारण्यात येते .सौभाग्यवाणासह गौरीची खणा नारळाने ओटी भरतात. या दिवशी खीर भाजी भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा व तिसऱ्या दिवशी खीर व मुरड घातलेले कान्होले नैवेद्य असतो.  पुन्हा मुरडून आमच्या घरातील असं मागणी करतात.

अशा रीतीने प्रत्येकाच्या घरी गौरीचे पूजन होत असते.

वाचनात आलेली माहिती

संग्राहिका –  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments