मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तोच चंद्रमा नभात” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

“तोच चंद्रमा नभात☆ श्री मनोज मेहता 

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!

आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.

या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?

पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..

देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!

जय हिंद… `जय भारत !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस” ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

परिचय 

पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत.
ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.

पुरस्कार

  • आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
  • गुणवंत युवा कलाकार,
  • गुणीदास पुरस्कार
  • पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
  • ह्रदयनाथ मंगेशकर करंडक

लेखन

  • बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
  • अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
  • फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.

? मनमंजुषेतून ?

“तुळस” डॉ. माधुरी जोशी 

मी अनेकदा  अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना  ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार  तुळशीची…

काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….

ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार…  ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे  का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…

काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच  उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी  तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….

खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..

एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…

पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं  ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…

उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे.‌..तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!

आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून  या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली !” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली ! ☆ श्री मनोज मेहता 

डोंबिवली जुन्या जमान्यातली,

डोंबिवली गर्द हिरव्या झाडीत लपलेली !

इवलुशा लाल लाल मातीच्या रस्त्यांची ! टुमदार बंगल्यांची, सुंदर,

चिकनी -चिकनी, डोंबिवली !! 

माझी फोटोग्राफी १५ मे १९७२ पासून, माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरु झाली. भावाने सांगितले की इथे जाऊन अमुक अमुक यांना भेट, लग्नाचे इतकेच फोटो काढायचेत. हो, त्या जमान्यात ३६ ते ४८ म्हणजे ३ / ४ रोलची छायाचित्रं, म्हणजे भरपूर मोठा अल्बम. बारा फोटो एका रोल मध्ये. मग माझी स्वारी कॅमेऱ्याची बॅग घेऊन इच्छित स्थळी, म्हणजे त्यांच्या घरी पोचायची. ‘अरे वा वा, ‘ये मनोज ! अगं, मनोज आलाय, आटपा गं लवकर, अशा आरोळीनं माझं स्वागत व्हायचं. कारण त्याकाळी घरी देवाला नमस्कार करताना, हातावर दही देताना, मनांत असेल तर एक समूह फोटो असा शुभकार्याच्या फोटोंचा क्रम असायचा.

नंतर छान कौलारू घराच्या बाहेरील मंडपात किंवा आफळे राम मंदिरात अथवा मोजक्या मंगल कार्यालयात ही कार्य होत असत. सुरूवातीला  गुरुजींच्या पाया पडून, माझा छायाचित्रणाचा प्रवास सुरु व्हायचा.

मी लग्नाचे सर्व ब्राम्हण -विधी अन् जेवणावळींचे फोटो काढून, माझ्या घरी दुपारी १२ पर्यंत परतायचो.

त्यात सीकेपींचं लग्न असेल तर  अर्धा तास अगोदरच घरी ! मग सायंकाळी ६ ते ८ स्वागत समारंभ असायचा. तेव्हा आलेल्या प्रत्येकाला प्रचंड प्रसिद्ध असा गोल्डस्पॉट, व्हॅनिला / तिरंगी / टूटी-फ्रूटी आईस्क्रीम किंवा जॉय आईस्क्रीमचे कप, अशाप्रकारे हे डोंबिवलीतील स्वागत समारंभाला असायचं हं ! नो जेवण भानगड ! आणि या स्वागत समारंभाचे फोटू काढून मी अन नवरा नवरी साडेआठला आपापल्या घरी असायचो बरं !

तर मंडळी सत्तर ते ऐंशीच्या दशकात फोटोग्राफर, गुरुजी, वाजंत्रीवाले व मंगल कार्यालयं यांची संख्या अगदीच तुटपुंजी असायची. आणि मुख्य म्हणजे ज्यांना बोलावलं जायचं ते वेळेच्या आधी हजर असायचे. माझ्या छायाचित्रणाच्या सुरवातीच्या, म्हणजे १९७२ पासूनच्या कार्रकिर्दीत, साखरपुडा, लग्न- समारंभ इ. साठी, श्री. धामणकर, दीक्षित वा भातखंडे गुरुजी असायचे. त्यात प्रामुख्याने मला गुरु म्हणून लाभले ते ‘धामणकर गुरुजी’. मी इतक्या लहान वयात फोटो काढतो, म्हणून कौतुक आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही होतं. शिस्तबद्ध पण शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य ! प्रत्येक विधीचा अर्थ वधू -वरास समजावून, मगच त्यांच्याकडून कृती करून घ्यायचे. त्यात अजून एकाची भर पडली तो म्हणजे मी ! ‘मनोज, आता या विधीचा फोटो काढ. नीट काढ हो, पुन्हा मी फोटो काढायला देणार नाही. ‘ ते अर्थ सांगत असताना, माझंही लक्ष असायचं. धामणकर गुरुजींच्या ‘गुरुकृपेने’ मी  हळूहळू का होईना पण सर्व आवश्यक विधींचे फोटू काढण्यात तरबेज होऊ लागलो होतो.

सुमारे ४८ वर्षांपूर्वीची घडलेली गोष्ट आहे ही ! मला नक्की आठवत नाही १९७५ की ७६, पण डोंबिवली पश्चिमेला नाख्ये यांच्या एव्हरेस्ट मंगल कार्यालयात लग्न होते. त्या मंडळीचं नावही आता लक्षात नाही. कार्यालयाच्या चौफेर फेरी मारून, कुठं क्लोजअप फोटो घेता येतील, याचा मी आधी अंदाज घ्यायचो. मग पुढचा प्रवास सुरु व्हायचा.

तर मंडळी, त्यादिवशी या लग्नकार्यात गुरुजींचा पत्ताच नाही, कुजबुज सुरु झाली. काही मंडळी गुरुजींच्या घरी जाऊन आली, अजून कोण गुरुजी उपलब्ध आहेत का ते ही पाहून झालं. दोन्हीकडची मंडळी चिंतेत ! बरं गंमत म्हणजे, मला याचा काहीच थांगपत्ता नाही. काही वेळाने मी विचारायला गेलो की एवढा का उशीर होतोय, तेव्हा मला हे कारण समजलं. मी भाबडेपणाने विचारलं, ‘ मी करु का विधी ? मला मंत्र येत नाहीत, पण सगळे विधी व्यवस्थित करून घेईन आणि हो, मंगलाष्टका मात्र म्हणा कोणीतरी, हे सांगताच ते उडालेच की ! एकतर मी अर्ध्या चड्डीत फोटो काढायला आलेलो आणि हा एवढासा मुलगा हे काय सांगतोय ?

नंतर कोणीतरी आजोबा आले व त्यांनी माझी नीट चौकशी करून, खात्री करून, होकार दिला.

मग मी सीमांतपूजन करून, मुलीला गौरीहाराजवळ बसून पूजन करायला सांगितलं. नंतर कार्यालयाच्या मुख्य दारात वराकडच्या मंडळींना उभं करून, वधूच्या आईने वराचे पाय धुवून, तिलक लावून ओवाळायला सांगितलं. वधूच्या बाबांनी वराच्या हातात नारळ देऊन त्याला मंडपापाशी आणलं. माझ्या नशिबाने दोघा तिघांनी मंगलाष्टका म्हटल्या. बरोबर मुहूर्तावर, ‘आता वधू-वरांनी एकमेकांना हार घाला, ‘ अशी मी जोरात आरोळी ठोकली, मी दोघांचे फोटो काढले अन् वाजंत्रीही वाजली. ‘वधूवरांना करवल्यांनी ओवाळा हो !’ ते झाल्यानंतर नवरा-नवरीला मी पाटावर बसण्यास सांगितलं. नंतर कन्यादान, सप्तपदी इ. झालं. इतकं सारं, मी फोटो काढत -काढत (आजच्या जमान्यातील 20-20 की. ) पार पाडलं. लक्ष्मीपूजनाला नवऱ्यामुलाला मी विचारलं, ‘तुझ्या बायकोचं नाव काय ?  तेच लिहायचं हं, ताटातल्या तांदुळात !  हे सारे विधी मी प्रत्येक विधीचा फोटो काढून व पुढच्या विधीला काय करायचं ते सांगत, असं एक तासात आटोपलं. आता हे सर्व पाहायला, दर्दी ज्येष्ठांची गर्दी होतीच. सर्व विधी झाल्यावर, त्या ज्येष्ठांपैकी कोणी आजी होत्या, त्यांनी वधुवराला माझ्या पाया पडायला लावलं. ‘अहो, ते नवरा नवरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच त्यांच्या पाया पडतो ! असं मी म्हटल्यावर तुफानी हास्यकल्लोळ झाला !  पण मला काही कळेना, हे माझ्या का पाया पडतायत ? आणि वरती हातात पाकिट देऊन, मला आजींनी जवळ घेऊन माझी पापी घेतली, मला त्यांच्या जवळ बसवून प्रेमानं जेवायला घातलं.

ते पाकिट न उघडता, मी घरी आल्यावर वहिनीच्या हातात दिलं. तिने विचारलं, ‘ काय आहे यात ?’ मी म्हटलं, ‘मला काय माहित ? लग्नात दिलं मला. ‘ तिनं उघडल्यावर कळलं, त्यात २१ रू. होते.

नंतर फोटोचा अल्बम घ्यायला, ती मंडळी घरी आल्यावर, मी केलेले प्रताप भावाला व माझ्या वडिलांना कळले. ‘मनोजनेच आमच्याकडच्या लग्नात सर्व विधी पार पाडले !’ ‌’काहीतरी काय सांगताय ? आम्हाला काही बोलला नाही, ‘ असं म्हणत, भावानी मला हाक मारली. त्यांच्या समोर आल्यावर मी सांगितलं, यांच्याच आजीनं नवरा -नवरीला माझ्या पाया पडायला लावलं !’ हे ऐकताच सगळे खो खो हसायला लागले.

पण त्यादिवशी गुरुजी न आल्यामुळे हे सुंदर लग्न- रामायण घडलं. या प्रसंगातील प्रेमळ आज्जी, नवरा -नवरी, माझी चौकशी करून मला विधी करायला परवानगी देणारे आजोबा अन् सारी मंडळी… आजही हे आठवलं की मला गुदगुल्या झाल्याशिवाय रहात नाहीत.

यानंतर असा प्रसंग कधीही परत माझ्या वाट्याला आला नाही.

हां, कधी बारशाला तर कधी साखरपुड्याला मला समोरून कधीतरी कोणी विचारतं, ‘तुम्हीच सांगा हो मेहताजी, आता पुढे काय ते !’ मग मी त्या त्या प्रसंगी, कोणी काय करायचं ते व्यवस्थित सांगतो.

पण पण मी लग्नात कुण्या मुलीचा भाऊ तर कधी मामाचं पात्र, आयत्यावेळी अजूनही वठवतोय अन् कार्य सुरळीत पार पडतं. ते ही फोटोग्राफी करता करता हं.

हे घडून आलं ते फक्त अन फक्त माझ्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या, गोविंद धामणकर गुरुजींच्या गुरुकृपेमुळेच, अन तेही बाल वयात !

त्यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. पाण्याची सोय. ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. वाईला धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले. सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई. पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)

माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.

गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते. आणि त्यामध्ये लोखंडी बीडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते.

त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे मला माहीतच नव्हते. कारण लहान असल्यामूळे मला कोणी नेले नव्हते.मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो. कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे. छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे, ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून  पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत.

माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे, त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘ दिपक ड्रायक्लिनर्स ‘ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे.मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील  त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो.

नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो. त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा,मीठ, मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो.

पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी, यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते, झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वानां वाटायचे.

एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता,  त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो.सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच.बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन  टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेची मुख्य इमारत, डायनिंग हॉलची इमारत, प्राचार्यांचे, शाळेच्या मालकांचे निवासस्थान, रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो.

एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खुपच छान दिसत होती.ते चित्र मला मनापासून खूपच आवडले. मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत, हा विषय घेऊन जबरदस्त ‘ नाईटस्केप ‘ करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो.अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे. तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला. रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

– क्रमशः भाग पहिला

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि  ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे! 

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे?” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी,  “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली!” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस,” असं म्हणत. 

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का!”  खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून.” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!!”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’! 

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते..”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’……‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

(४ डिसेंबर… विजयाबाई मेहता यांचा जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा)

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर

“एक फुलपुडा द्या”

“कितीचा”

“वीसचा” पुडा बांधताना काकूंनी प्रत्येक पिशवीतून मूठभर फुलं घेतली. किमतीच्या मानानं फुलं जास्त होती. मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं.

“काकू,वीस रुपयांचा फुलपुडा पाहिजेय” सौ. 

“माहितीये”

“मग एवढी फुलं”

“घ्या हो. तेवढीच माज्याकडून देवाची सेवा” प्रसन्न हसत काकू म्हणाल्या.

“खूप जास्त देतायेत”

“असू द्या.” काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं.

“डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं ? ” सौनी आस्थेनं विचारलं.

“आठ दिस झाले”

“घरी आराम करायचा”

“असं कसं चाललं,पोटाची खळगी भरावी लागते ना. मी ही अशी म्हातारी, पोरं मोठी झाली. सुना आल्यात पण आज बी म्या कुणावर अवलंबून नाय. माज्या पैशानं फुलं आणून इकते. पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान हाये.”

“या वयातही काम करता कौतुक वाटतं”

“तेत माजा स्वार्थ हायेच की”

“म्हणजे”

“इथं फुलं इकायला बसते त्यात जीव रमतो. येगयेगळी लोकं भेटतात.ईचारपुस करतात ते बरं वाटतं. घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं. माज्याशी कुणालाबी बोलायला येळ नाई. काई ईचारल तर वसकन वरडतात. त्यापरिस इथं बसलेलं बरं”

“काकू,एक विचारू”

“काय ईचारणार ते माहितेय. जास्त फुलं का देता”

“बरोबर”

“ताई,आतापतूर लई पुडे दिले पण ह्ये इचरणारी तूच पयली.”

“इतर दुकानदार असं करत नाही. माल देताना हात आखडता घेतात.वर परवडत नाही असं ऐकवतात.”

“ते बी खरंय.”

“कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की”

“जास्त दिल्यानं डबल फायदा व्हतो. माज्याकडून फुलपुडा घेतलेलं गिर्हाइक पुना पुना येतं. जास्त फुलं मिळाल्यावर  लोकाला जो आनंद व्हतो ते पावून लई बरं वाटतं.”

“पण यात तुमचं नुकसान होतं ना”

“हा आता पैशे कमी मिळतात पण माल संपतो. फुलं ताजी हायित तोपतूर मागणी.  एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची. माणसाचं जगणं सुद्धा फुलासारखच .. उपयोग हाय तवर मान, नायतर….”

“म्हातारपणी पैसा उपयोगाला पडतो” सौ 

“तो कितीबी कमवला तरी कमीच. पैसा हा पाणीपुरीसारखा असतो,कधीच मन भरतं नाई. अन गरजंपेक्षा जास्त मिळालं की जगण्याला फाटे फुटतातच”

“वा,कसलं भारी बोललात.”

दोन दुकानदारांचे टोकाचे अनुभव. परिस्थिती भिन्न. एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी. दोघेही आपआपल्या जागी बरोबर !! पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची. 

“निघतो,आता भेट होत राहिलच” आम्ही फुलपुडा घेऊन  निघाल्यावर गुलाबांचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या “ *माणसानं घेताना आवर घालावा पर देताना हात कायम सैल सोडवा.*” खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हाय फाय, न्हाय काय”… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

 “हाय फाय, न्हाय काय… ☆ श्री मनोज मेहता 

माझ्या वडिलांचं इंग्रजी अतिशय उच्च दर्जाचं होतं. मला मराठीत कमी मार्क मिळाले तर ते खूप ओरडायचे, पण इंग्रजीत कायम काठावर पास होऊन सुद्धा कधीच काही बोलले नाहीत.

माझे सर्व नातेवाईक अजूनही सांगतात की तू ३/४ वर्षांचा असताना सन, मून, दुडियाच वगैरे शब्द मध्ये टाकत ३० मिनिटं थुकी न गिळता भाषण करायचास.

तर मंडळी आजही माझं इंग्रजी असं-तसंच आहे, तरीही माझ्या मैत्र खजिन्यात, परदेशी मित्रांची मोठी संपत्ती आहे. मनापासून सांगतो, मी भारत भ्रमंती करतो त्यावेळी मी फॉरेनर ह्या आकर्षणामुळे सहज त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो, अन् पुढे ते माझे छान मित्र-मैत्रिणी झाले. ते सगळे आजही  संपर्कात आहेत, हे माझ्यासाठी विशेष आहे.

आता तुम्ही म्हणाल ‘त्यात काय इतकं ?’  हं, इथेच तर खरी गंमत आहे. हाय, हॅल्लो, व्हॉट इज युअर गुड नेम?, यु कमिंग फ्रॉम?, व्हॉट आर यु डुइंग? डु यु लाईक इंडिया? ओह, या या, हं, ओके ओके, वाव व्हॉट अ लव्हली, गिव मी युअर एड्रेस प्लिज, ओके सी यु अगेन, बाय!

हसू नका, माझ्याकडून इतकं इंग्लिश संभाषण म्हणजे भरपूर झालं हो! पण त्यांचं बोलणं मला कळतं आणि मग माझं टेबल टेनिस सुरु होतं.  आणि म्हणूनच आमची गट्टी हो. असो, माझ्या व्यवसायात खऱ्या अर्थाने माझी परीक्षा देवानेच घ्यायची ठरवली म्हटल्यावर काय ?

बायर इंडिया हे माझं अशील. (क्लायंट) डोंबिवलीचा माझा मित्र, ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. सतीश गायकवाड ह्याच्या कडून १९८३ ला युनियनच्या सदस्यांचे फोटो काढायची पहिली ऑर्डर मिळाली अन् चांगल्या दर्जाच्या फोटोमुळे बघता-बघता अर्थातच मी तिथल्या प्रत्येकाचा मित्रही झालो.

एके दिवशी अचानक मला ठाणे- कोलशेत ऑफिस मधून श्री. पाटणकर यांचा दूरध्वनी आला, “मनोज, तुला आव्हानात्मक छायाचित्रं काढायची आहेत, दुपारी दोन पर्यंत पोच.”

मग काय स्वारी खूष! मी कपंनीत पोचल्यावर त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. ती हकीकत अशी होती की, ‘मुंबई ऑफिस मधून हे पार्सल आलेलं होतं. मुंबईच्या फोटोग्राफर्सनी केलेली कामं आवडली नाहीत, म्हणून आता हे आपल्याला आव्हान म्हणून स्वीकारून, टकाटक करून दाखवायचं आहे. 

मी कामाला लागलो. सुमारे दोन तासांनी पूर्ण केलं व उद्या मी फोटो घेऊन येतो, असं सांगून मार्गस्थ झालो. माझी स्वतःची रंगीत फोटोची लॅब असल्यामुळे, रोल डेव्हलप करून झक्कास प्रिंट्स बनवून बायर इंडिया कोलशेत ऑफिसला पोचलो. ती देशपांडे सरांना दाखवताच ते अन् पूर्ण ऑफिसातले सगळे उडालेच! “मनोज, यार तू कमाल आहेस, मस्त मस्त !” असं म्हणत त्यांचे बॉस म्हणजेच जर्मन डायरेक्टरना त्यांनी ते दाखवले. त्यांनाही आनंद झाला, “ब्युटीफुल फोटोज् !” मान वरखाली करून त्यांनी मला दाद दिली. 

दोन दिवसांनी मी बिल दिलं तर फोटो पाहून उडाले होते, त्यापेक्षा जास्तच उडाले. “तू काय स्वतःला मोठा फोटोग्राफर” वगैरे… सुरु झालं. “इतकं बिल? अजिबात इतके पैसे मिळणार नाही,” हे पांच सहा दिवस  सुरु होतं. 

शेवटी मी त्यांना संगितलं की “मला तुमच्या डायरेक्टरला भेटायचं आहे, मला अपॉइंटमेंट घेऊन द्या.” 

इकडे माझ्या घरी अजून वेगळाच धुमाकूळ. “स्वतःला काय समजतो, तुला इंग्रजी बोलायला येत नाही अन् कोणाला भेटायला चाललाय, व्यवसाय करायची अक्कल नाही” वगैरे मोठ्या बंधूनी हाणला. 

खरंच मला इंग्रजी बोलायला येत नाही, पण मी स्वतःशी ठाम होतो. काहीही झालं तरी माझं म्हणणं मी पटवून देणार, कारण मी खरा होतो. 

तारीख, वेळ ठरली. मी श्री. केलर साहेबांच्या केबिनमध्ये शिरल्यावर, लगेच त्यांनी मला हॅलो, करून शेकहँड केला. उंचेपुरे, निळे डोळे आणि सोनेरी केस, क्या बात! प्रसन्न व्यक्तिमत्व! मला चहा की कॉफी विचारून फोनवर ऑर्डर दिली, अन मी सुरु झालो ना ! “नमस्ते, गुड मोर्निंग सर, आय एम् मनोज, प्रोफेशनल फोटोग्राफर, धिस जॉब इज ॲबसुल्यूटली कमर्शिअल, अँड माय ब्रेनी वर्क, धिस इज नॉट फंक्शनल फोटोग्राफी, सो आय सबमिटेड द बिल! प्लीज, सर यु अंडरस्टॅण्ड ना ?” 

तोपर्यंत चहा आला, पांढरे चौकोनी तुकडे चमच्यात घेत, त्यांनी विचारलं “हाऊ मच?” मी गोंधळून म्हटलं “फ फोर!”  माझ्या आयुष्यात प्रथमच साखरेचे क्यूब पहात होतो. काय सांगू .

ती माझी दोन तासांची आयुष्यातील पहिली प्रोफेशनल मिटिंग, साखरेपेक्षा गोड झाली. माझं म्हणणं मी पटवून दिलं, ते त्यांना पटलं अन् लगेच मुंबई ऑफिसला फोन करून, त्यांनी माझं बिल द्या म्हणून ऑर्डरच काढली. 

मी खूष होऊन त्यांना अक्षरशः मिठी मारली व डोंबिवलीला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मला एका आठवड्यात चेक मिळाला.

इकडे केलर साहेबांच्या कॅबिन बाहेर बसलेल्या माझ्या मित्राला घाम फुटला होता.

मंडळी, बरोब्बर पंधरा दिवसांनी रविवारी श्री. केलर, त्याची बायको, मुलगी व मुलगा चौघेही आमच्या बंगल्यात चक्क जेवायला आले. माझा भाऊ आणि वहिनींबरोबर त्याचं बोलणं सुरु होतं. मध्येच मी “या, या, परफेक्ट !” म्हणून दाद द्यायचो. मजा करून मंडळी निघाली, तेव्हा केलर यांची मुलं मलाही चल म्हणत होती. हा माझ्यासाठी आयुष्यातला खास क्षण होता, आहे व चिरंतन असणार.

माझ्या या ‘मैत्र पोतडी’त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, नेदरलँड्, चायना, जपान, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका व भारतातील विविध राज्यातील मित्र-मैत्रिणी आहेत. उगाच नाही अमेरिकेत जाऊन आंतरराष्ट्रीय टुरिस्ट बसमध्ये, मी ‘लाल टांगा घेऊनी आला’ हे मराठी गाणं गायलं.

जगात कुठेही फिरा, काम करा, मजा करा, मनापासून स्वतःवर प्रेम करत असाल, तर भाषेची भिंत कधीच आड येणार नाही.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती, परंतु माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता… आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती…) इथून पुढे — 

एकदा तिला म्हणालो, ‘ अशी भीक घेण्यापेक्षा ‘चार पैशे’ कमव… काहीतरी धंदा आपण सुरू करू…. ‘

ती म्हणाली होती, ‘ मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय…?’

मी म्हणालो होतो, ‘ नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घालल…’

यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात…

यानंतर मी तिला पाच ते दहा विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तिला म्हणालो, ‘ बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर. ‘….

तिने माझं ऐकलं…. मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तिने त्या फूटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या…… व्हीलचेयर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली…. येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली….

व्यवसाय हळूहळू वाढत गेला. मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना… हे कर्तुत्व तिचं होतं…. !

तिला मी फक्त एक हात दिला होता, तिने या संधीचं सोनं केलं…. ती आकाशात  भरारी  घेत  होती…. !

कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा…. या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. स्वतःला जाणवते ती वेदना.. पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना…. ! तिने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता…. आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्यालासुद्धा मदतीचा हात द्यावा….. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात… ? 

मी तिला मनोमन नमस्कार करायचो.

ती मला नेहमी म्हणायची, ‘ एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा, या अधू पोरासाठी पण कायतरी कर…. ‘

कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले, तो आता स्वतःच्या पायावर चालतो, यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. त्याचं सर्व छान झालं, या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल, तर तिला… !

… दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख मानणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं…. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो…. !

.. मोठं होणं म्हणजे maturity येणं…. ! किती कॅरेटचं सोनं घातलंय यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity…. ! चुका  शोधायला मेंदू लागतो…. पण माफ करायला हृदय…. हे समजणं म्हणजे maturity…. !

… अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं…. तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले….

कृतज्ञतेने म्हणाली, ‘ ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा ‘

खरंच तिची भरभराट झाली होती…. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं 

का ?.. मुळीच नाही…..

… काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट….

… सर्वकाही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट…

… पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट…

चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे… स्वतःचा विकास करत असताना, या सर्व प्रवासात तिने रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला जास्त अप्रूप  !

दिवसेंदिवस ती उन्नती करत होती… रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणी सुद्धा येत होत्या परंतु त्यातून ती मार्ग काढत होती…

… फुंकर मारल्याने दिवा विझतो….. अगरबत्ती नाही…. !

… जो दुसऱ्याला सुगंध देतो तो कसा विझेल…. ?

रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास…. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….

… स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती…. !

ती शिकली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे… ! 

या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….

भाऊबीजेच्या दिवशी तिने फुटपाथवर तिच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली….

तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले… मी तिला ओवाळणी दिली.

तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला….

‘ पेढ्याच्या बॉक्सवरच भागवते म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील… ‘, मी हसत  म्हणालो.

‘ म्हातारी म्हणू नगो ‘.. तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत, हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली.

‘ बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण… ‘ मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं…

‘ म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… ‘ म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं…. ? माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो.

तिच्या पाया पडत म्हणालो, ‘ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. परंतु खरं सांगू का ताईपेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे…. !’

तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…

तिला म्हणालो, ‘ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस, मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सारं काही एक आईच करू शकते ना…. ’ 

आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, ‘ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय, रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उन्हात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय हे सुदा मला म्हाईत हाय, मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस…. तू माजा कुनीही नसताना माज्या साटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास…. म्हणलं, चला बीन बाळंतपनाचं या वयात आपल्याला बी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग  पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप…… ‘  तिने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले…. !

आता डोळ्यात पाणी माझ्या होतं…. !

म्हटलं, ‘ म्हातारे तू लय मोटी झालीस…. ‘ यावेळी “म्हातारी” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली…. हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, ‘ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ?  तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउजपीस पन हाय…. ‘ 

हा ” भरजरी पोशाख ” मी घेतला…. गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, ‘ जातो मी माई… ‘ ती म्हणाली, ‘ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगोस, मला आपली म्हातारीच म्हन…. मी तुजी म्हातारीच हाय…. ! 

मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो…

… आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो…! 

— समाप्त — 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print