मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

पशूपक्षांनो एकदा भेटून जावा .. 

काल फोन आला म्हणून वडाखाली थांबलो.फोन कट झाला म्हणून पुढे निघणार एवढ्यात जुनाट वटवृक्षाचा आवाज कानी आला.

“ आता माझा आसरा, विसरा. माणसाच्या विकासाचा रस्ता डोंगर सपाटीकरणातून व रस्ते रूंदीकरणातून जातो म्हणतात. रूंद दृष्टी नसलेल्या विकासकाला आधी खुपते झाडाचे अस्तित्व अन् सुरू होते झाडांची खुलेआम लंगडतोड, बेसुमार नृशंस हत्या.’

“ जंगल नावाच्या आमच्या आप्तातील जवळचे शेजारी भावकीतील लहानमोठी वड, सोयरे असलेले बाभुळ, लिंब धाराशयी झाले आहेत.यांत्रिक करवतीचे करकर आवाज माझ्या कानात घुमत आहेत. वर्षानुवर्षे वादळवारा ऊनपाऊस यांना समर्थपणे तोंड देणारे माझे भक्कम शरीर इवलुशा करवतीच्या करकरीने थरथर कापत आहे. पूर्वी कुऱ्हाडीने वृक्षतोड असल्यामुळे आमचा जीव जायला बराच वेळ लागायचा .घाव झेलत , कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणत ,दांड्याला नावं ठेवत कुऱ्हाड पात्याला व घाव घालणाऱ्या हाताला सहीसलामत सोडत मृत्यूशय्येवर काही दिवस तरी नक्कीच जायचे. आता तेजतर्रार कर्रकर्र करवतीच्या पापात दांडा म्हणून आमचा भाईबंद नाही. करवतीचा वेग व धार इतकी जलद आहे की शेकडो वर्षे लागलेलं, कमावलेलं वटलेलं आमचं शरीर क्षणात भुईसपाट होतं.करवतीच्या धारेमागे.  माणसाचा वेगवान हैवानी दिमाख आहे हे कळल्यामुळे आता आम्ही आमच्या गोतास नाव ठेवत नाही व करवतीलाही दोष देत नाही. शेजारच्या मरणासन्न झाडाचं दुःख करायला सवडच नाही कारण वीज चमकण्याच्या अवकाशातच काही क्षणातच शेजारचे दुसरे झाडही लगेच धाराशयी.”

“ माझा शेंडा कॅमेरा बनून शेजारचा विध्वंस पाहतो आहे. पारंब्याला त्याने मरणाला तयार राहा म्हणून संदेश दिलाय‌. मृत्यूचे भय सर्वच सजीवाला असतं कारण मृत्यूचे दुसरं नाव अस्तित्व अंत आहे. वाटसरूंना ऊन्हात सावली दिली. पावसात आडोसा दिला. वादळात सहारा दिला. वाळलेल्या पानाआड किड्यामुंग्यांना घर दिले,अन्न दिले, जमिनीला कस दिला. पक्षांना घरटी दिली.अंडे पिल्ल्यांची राखण केली. भिरभिरत्या ढगांना थांबवलं.- मातीत रिचवलं .नदी ओढे तृप्त केले. पशूपक्षांनो माझे उरलेत दोनच दिवस ,या अन् भेटून जा. उगवतीवेळी व मावळतीवेळी जोरजोरात किलबिलाट करा. मला पक्षांचा आवाज ऐकत मरायचे आहे.”  

“तुमच्या माणसातले महामानव क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणायचे …

… विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। …

आता तुम्हाला विद्येचे महत्त्व कळले आहे. पण अजून झाडाचे महत्व कळायचे आहे.”

झाडाविना ढग कोरडे गेले

ढगाविना नदी तलाव आटले

नदी तलावाविना पशूपक्षी मिटले 

पशुपक्षाविना शेत पोत लोप पावले

शेतीविना समृद्धी वैभव लयास गेले

समृद्धीसाठी माणसं हैवान बनत गेले

हैवानियत रोखण्यासाठी पुन्हा हैवानच बनत गेले

एवढे सारे अनर्थ एका वृक्षतोडीने केले …….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

इंग्लंड मुक्कामात  मी एक दिवस  माझी पत्नी  आणि  मुलीबरोबर  लंडनमधील  महाराष्ट्र  मंडळाचा गणेशोत्सव  पहायला गेलो  होतो. दुपारचं  जेवण आटोपल्यावर हिचीनवरून  आम्ही ट्रेननं  लंडनला निघालो. हवेत  खूप गारठा  होता. पाऊस येण्याचीही  शक्यता होती. यादृष्टीने  छत्री, स्वेटर, जर्कीन  वगैरे 

अगदी  बंदोबस्तात  निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्‍यात एक  मध्यमवयीन  बाई  एकटीच  मोठ्याने  बडबडत  होती. मला  ते विचित्र  वाटलं. मी प्रश्नार्थक  दृष्टीने मुलीकडे  पाहिलं. ” ती खूप  दारू  पिऊन बडबडत  असेल ” मुलगी  म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी  म्हणाली, “काय  इथल्या  लोकांचं  जीवन!  एकाकी. कुणी बोलायला  नाही ते असंच  स्वतःशीच  बोलत  बसतात “. 

काहीही असो, इथल्या गो-या  लोकांच्या समाजजीवनातली  एक काळी  बाजू  मला समजली.

आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर  उतरून बसने  लंडनमधल्या महाराष्ट्र  मंडळाच्या हाॅलमध्ये  पोहोचलो. इंग्लंडमध्ये  रहाणारी शेकडो  मराठी माणसं  भेटली. काहीजण  इतर देशांतूनही आले होते. अनेक  पुरूष सलवार, कुर्ता तर महिला  साड्या  परिधान करून आल्या  होत्या . सगळ्यांच्या  चेहर्‍यावर आनंद, मनामनात उत्साह  आणि  सर्वत्र उत्सवाचे  वातावरण भरले होते. त्यात  काही जणांचे  इंग्लंडमध्ये मोठमोठे  उद्योग होते. कुणी  नोकरी  करत होते  तर  काही  विद्यार्थी होते. काही  मुलं  आपल्या आईवडीलांसोबत, तर काही  वयस्कर आईवडील  आपल्या  मुलांसोबत  आले  होते.

आपले  भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे  आणि  इतर  भेद  विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान  मुद्द्यावर   या उत्सवात सारेजण  सहभागी  झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी  म्हणतात. 

आम्ही  पोहोचलो  तेव्हा सांस्कृतिक  कार्यक्रम सुरू  झाले  होते. अनेकांनी  विविध गीते, नृत्य, संगीत  सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त  प्रतिसादही  मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट  गाण्यावर सारे सभागृह बेभान  होऊन  नाचत राहिले. ज्यांना  नाचणं जमत  नव्हतं, ते  टाळ्या वाजवून  साथ  होते.

रात्री  दहाच्या  सुमारास आम्ही  परत  जायला निघालो. एखाददुसरा माणूस  सोडला  तर रस्त्यावर  कुणीच  नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर  पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने  जवळ जाऊन  पाहिलं. रेल्वेचा तो  बॅन्ड  होता. रेल्वे स्टेशन  म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर  काही  कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात  मिसळलेल्या निवेदकांच्या  सूचना, यांची  सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.

रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली  होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात  जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका  वाक्याची समर्पकता जाणवली .. 

“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चालले कोण तिकडच्या घरी ?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चालले कोण तिकडच्या घरी…” ☆ श्री सुनील देशपांडे

‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. ..  अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही 

देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच. 

परंतु कालमान  परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली.  पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा.  त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले.  तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत.  स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.

साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही.  मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.

कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही.  हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही.  काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी. 

ती कविता पुढे देत आहे.  त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा …. 

— पण मुलंही जातात घर सोडून…!

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून. 

आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन गाव 

एका नेमणुकीच्या पत्रानंतर…….

 

रात्रभर कूस बदलत बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठत राहतो उदास डोळ्यात….

 

आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन कपडे सुटकेसमध्ये भरताना……

भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना …….

आपली बाईक, बॅट, अन्  भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात… 

ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो. 

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून…..

 

रेल्वेच्या दारात डोळ्यातलं पाणी लपवत, 

हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,

हळूहळू चालत्या रेल्वे सोबत नाहीसा होतो मुलगा …….

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून ….

 

आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका 

आणि वाजणार नाहीत दाराबाहेर खुणेचे हॉर्न …

घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा…….

 

उंबरठा ओलांडतांना घराचा, त्यालाही रडावसं वाटतं.

आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावसं वाटतं.

पण जबाबदार्‍यांचा बंधारा

अश्रूंची वाट अडवतो, 

मुलगा मग सार्‍या भावना खोल छातीत दडवतो……

 

मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिली गेलीत. 

पण मूलं मात्र घराच्या अंगणातून सुटकेस घेऊन शांतपणे निघून जातात ….

 

एका अनोळखी शहरात,

जिथे कोणीही त्याची वाट पहात नाही 

अशा कुठल्यातरी एका घरात 

मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन  करतात ….

 

हो हे खरच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,

पण मुलंही जातात घर सोडून …..

मुलंही जातात घर सोडून …….!

( कवी – अनामिक )

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

लेखक : श्री धनंजय देशपांडे

लातूर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  

“मावशी,अगदी थोडं दुखेल हं म्हणत सुनंदाने मला इंजेक्शन दिलं मला रोज इंजेक्शनची सुई टोचवायची म्हणून तीच हळहळायची.

मी म्हटलं,”अगं तू इंजेक्शन देत्येस म्हणून तर मी बरी होत्ये ना.गेला महिनाभर तू माझी किती काळजी घेत्येस. या सुईने तर तुझं आणि माझं इतकं छान  नातं जोडलंना गं बाई “.

तिने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली,

“मावशी तुम्ही आयुष्यभर या सुईसारखी किती प्रेमाने नाती जोडली आहेत ऐकतेय ना मी पण, तुम्हाला भेटायला येणार्या लोकांकडून”.

” हो गं बाई, मी आपली माणसं  जोडण्याचं काम करत राहीले हेच माझ्या आवडीचं काम “.

“पण तुला गंमत सांगू का?”

“नाही,पण तुला वाटेल, काय म्हातारी बडबड करतेय, पण तू आहेस ना  गं माझं ऐकायला म्हणून बोलावसं वाटतय “.

इतर वेळेस कोण असतं इथे ?कामापुरतं येतात निघून जातात.

सुनंदा म्हणाली,” नाही मावशी बोला ना मला आवडेल ऐकायला” 

मग मी सरसावलेच,” अगं एकटीच असले ना की काही बाही सुचतं बघं. आत्ता तू सुईचा विषय काढलास ना तर मला नेहमी वाटतं माणसानेच तर सुई शोधली त्यात त्याचे गुण येणारच.

बघ ना….

घरात बाई सगळं जोडते शिवते  बारिक सुईने अगदी बारीक दोरा घालून जसं कुणालाही न दुखवता ती घरातली नाती जपते आणि ती दृढ करते.

पण घरात सुद्धा सगळ्यांना एकच सुई चालत नाही आई बरोबर वेगळ्या सुया वापरते.

 त्या सुईचा एक भाऊ असतो बघ दाभण नावाचा,जाड गोणपाट शिवायला वापरतात बघ.

 जेव्हा दांड मुलं निबर तनामनाची असतात तेव्हा बारिक सुई नाही कामाची तिथे दाभणच पाहिजे दोन दणके धाकदपटशा लागतोच.

ते आईला बोबर ठाऊक असतं जे सगळ्यांना ताळ्यावर आणून एकसंध ठेवेल.

वाकळ गोधडी शिवताना बघ जरा लांब सुई लागते.

खूप अंगभर टाके घालायचे असतात ना.

जेव्हा सर्वांना एकत्र बांधून एकमेकांना एका बंधनात ठेवायचं तेव्हा अशी लांब सुई सगळ्यांना एकत्र बांधून एकमेकांना नात्यांची उब द्यायला शिकवते बघ.

आणि ती क्रोशाची सुई पाहीली आहेस का तू ?

अगं खूप काम केलं मी त्यावर.

त्या सुईला नेढं नसतं बरका नुसता थोडसं नाक वाकवून तो भास केलेला असतो पण धागा बरोबर अडकतो बघ त्यात अशी माणसं असतात बघ फार न गुंतता आपल्या जवळ हात धरुन  ओढून पण छान सुबक जाळीदार काम करुन दाखवणारी पण चटकन वेगळी होणारी जेवढ्यास तेवढं वागणारी त्यांना सौंदर्य असतं पण नात्याची उब नसते.

फार गुंतत नाहीत ती कुठं.  

आणि जरा कुठे एखादा धागा निघाला की पार सगळं कसं सहज उसवत जातं कळतच नाही.

आणि शेवटीss तुमच्याss विणकामाच्या सुयाss त्याना का सुया म्हणतात ?नाही नेढं नाही टोक. मला तर आजकाल event साजरे करणारे असतात किनई ते अश्या सुयांसारखे वाटतात.

अगदी कुणालाही न दुखवता सगळ्यांना पटापट हलवत राहतात एकमेकात गुंतून काम करत असतात तेव्हा असं वाटतं अगदी गळ्यात गळा वाटतो पण काम झालं की प्रत्येक जणं इतका वेगळा होतो की इथे थोड्या वेळापूर्वी अगदी एकमेकांजवळ येऊन  काही छान प्रसंग उभा केला होता असं वाटतच नाही.

कुठेही गाठ नाही सुई टोचल्याची खूण नाही.

कर्तव्य म्हणून सारं काही.

जशी  विणकामाच्या बाबतीत पण गंमत आहे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत उब.

दोन सुया दोन हातात नाचत नाचत धागे जोडत उब तर निर्माण करतात पण…पण सुईतून एक धागा ओढत गेलं की सगळं विणकाम उसवलं की तिथे काही दिसतच नाही काही विणलं होतं का नाही ते. अगदी तसच.

मध्ये कुठे नात्यांच्या गाठी बांधलेल्याच नसतात या सुयांनी पण खरी सुई कुणाची सांगू तुमच्या डॉक्टर लोकांची.

त्यांना साक्षात दंडवत बघ.

माणसाचं फाटलेलं शरीर जोडून परत एकसंध करणं सोपं नाही किती बारिक दोरा त्यांच्या चिकाटीचा,किती बारिक सुई त्यांच्या ज्ञानाची, अलगद हाताने टाके घालणं आणि परत ते आत विरघळून जातील असं पाहणं हे फक्त देवाचे हातच करु शकतात बघ.

त्यांची सुई पुनर्जन्म देते गं रुग्णाला आणि तुमच्यावरचा म्हणजेच देवावरचा आमचा विश्वास दृढ करते.

एकच वाईट वाटतं बघ इतक्या  सुयांनी किती मदत केली आपल्याला…..

पण बाप्पाने, डोक्यावरच्या फाटक्या आभाळाखालचं एखाद्याचं  फाटकं नशिब शिवायची सुई दिली नाही बघ माणसाला…….

“सुईबाई गं… तुलाही वाईट वाटत असेल ना मी इतकं सगळं शिवते मग मला असं नशिब का नाही शिवता येत?” 

दुवा तरी मिळाला असता.

सुनंदाने पाहिलं मावशी  आपल्याच तंद्रीत होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते 

ते पाहून सुनंदालाही आपला कढ आवरावा लागला….

तिला वाटलं किती दुखण्यातूनही यांनी मन संवेदनशील राखलय.

असं जगावं आजूबाजूचं जग न्याहाळत त्यातील गंमती शोधत.

लेखिका : सौ. नीलिमा लेले.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये मुलीकडे दोन महिने होतो.यावर्षी सहा महिने होतो.पण यावर्षी घरातली अनेक कामं, मुलीची धावपळ यामुळे घर सोडून फारसं फिरायला गेलो नव्हतो.तसे आम्ही इंग्लंडला पर्यटन म्हणून न जाता मुलीला तिच्या कामात मदत करायलाच जातो. त्यामुळे त्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. तरीपण एक दिवस रात्रीची जेवणं आटोपून आम्ही निवांत बसलो होतो तर मुलगी तिथं आली, ” आईपप्पा, उद्या पाऊस नसला तर, आपण ऑक्सफर्डला फिरायला जाऊ”.

सकाळीच आटोपून दहाच्या सुमारास ट्रेनने फॅरिंग्टन, पॅडिंग्टनमार्गे आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो. स्टेशनवरून हाॅप ऑन हाॅप ऑफ .. या बसने शहराचा आधी फेरफटका घेतला.गेल्या वर्षी अशाच केंब्रिज या शहराला भेट दिल्याची आठवण जागी झाली. सुमारे तासभराच्या बस प्रवासात शहरातील जगप्रसिद्ध बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आणि विख्यात महाविद्यालयांना धावती भेट दिली.

जगभरातील १४ वेगवेगळया भाषांतून माहीती दिली जात होती. इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला जाणवल्या ;

– इथली अनेक महाविद्यालये कित्येक शतकांपासूनची आहेत. जगातील अनेक विख्यात व्यक्तींनी इथून शिक्षण घेतल्याचा इतिहास आहे.

– आजही ह्या महाविद्यालयांच्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.

– आपल्याकडे शिक्षण १९ व्या शतकापासून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो, मात्र स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विकास अधिक गतीने झाला.

– मात्र आपल्याकडच्या इमारतींची आजची अवस्था, स्वच्छता आणि तिथले वातावरण यात खूप फरक जाणवला. आपल्याकडे विद्यार्थी निवडणूका, विविध युवक महोत्सव अशा बाबतीत झालेल्या अप्रिय घटनांमुळे शिक्षणाबरोबरच गलिच्छ राजकारण, पैसा आणि इतर साधनांचा गैरप्रकार यामुळे आपल्याकडच्या शिक्षणाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे.

– इंग्लंडमधील विशेषत: ऑक्सफर्डमधील अनेक जुन्या, नव्या महाविद्यालयांतून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच वातावरण पहाता आपली स्थिती नक्कीच शोचनीय वाटते.

– महाविद्यालये, बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पहाताना, स्वच्छ रस्ते, लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त, वातावरणातील शांतता पाहून अशा बाबी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत ह्याची जाणीव झाली.

दिवसभरात जगातील एक सुंदर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहराचा प्रवास संपल्यावर सायंकाळी हलकासा पाऊस पडून गेला होता, हवेत खूप गारठा जाणवत होता. म्हणून तिथल्या, डोसा पार्क नावाच्या दक्षिण भारतीय हाॅटेलात गेलो.तिथले सगळे वातावरण दक्षिण भारतीय होते. मोठ्या कागदी कपातून चहा पीत असताना भिंतीवर कृष्णाचे एक लहानसेच पण अतिशय सुंदर चित्र पहायला मिळाले.

लहानपणापासून मी कृष्णाची अनेक चित्रं पाहिली.पण ते चित्र मला खूपच भावले. आजवर कृष्ण म्हटला की, सोबतीला राधा असलेला बासरी वाजवणारा कृष्ण किंवा फार फार झालं तर, महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथावर आरूढ किंवा अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण मी पाहिला होता. अनेक ठिकाणी कृष्णाची देव स्वरूपातली चित्रं पाहिली. मागे आपल्याकडचे एक अतिशय अभ्यासू, पुरोगामी विचारवंतांचे भाषण मी युट्यूबवर ऐकले होते.त्यांच्यामते कृष्ण हा भारतीय संस्कृतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्याला बदनाम करण्यासाठी ‘पाण्यात कपडे काढून अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रं पळवून गंमत करणारा खोडकर ‘ अशी त्याची प्रतिमा निर्माण केली. खरंतर अगदी आपल्या देशात असं कोणतं गाव असेल जिथं सार्वजनिक जलाशयावर गावातील स्त्रिया कपडे काढून अंघोळ करतात? आणि क्षणभर ते गृहीत धरलं तरी त्यांची वस्त्रं पळवून नेणा-याला लोकांनी काय केलं असतं ? अशा माणसाला लोकप्रियता मिळाली असती का ? त्या विद्वानांच्या मते राधा हे पात्रही कवींची कल्पना आहे. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी तो नैवेद्य आपल्या सर्वसामान्य गुराखी मित्रांना देणारा कृष्ण ही घटना कृष्णाची सर्वसमावेशकता दाखवून देते.या दृष्टिकोनातून डोक्याला साधा फेटा बांधलेला कृष्ण मी या चित्रात पहात होतो. कृष्णाची एका बाजूला देव अशी प्रतिमा निर्माण करायची आणि दुसरीकडे काही कथा त्याच्या नावावर खपवायच्या (ज्यातून त्याचे नकारात्मक चित्र डोळ्यासमोर उभे रहाते) या दोन्हीपेक्षा सर्वसामान्यांचा लाडका आणि बलिष्ठांच्या मुजोरीला भीक न घालणारा कृष्ण मला जवळचा वाटतो.

येताना पॅडिंग्टन रेल्वेस्टेशनवर उतरलो तर काही सुंदर संगीताचे स्वर कानावर पडले.

एका प्लॅटफॉर्मवर काही वादकांच्या वाद्यांतून संगीत सुरेल संगीत ऐकू येत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे येणा-या जाणा-या रेल्वेगाडयांचा धडधडाट, मधूनच येणारे अनेक कर्णकर्कश आवाज, त्यात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, रेल्वेतून सांडणारी माणसं, लोकांची धावपळ अशा बाबींपेक्षा हे वेगळंच होतं. आमची परतीची ट्रेन येईपर्यंत मी हे पहात होतो.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – मी गतीचे गीत गाई— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

 

☆ – मी गतीचे गीत गाई— – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधना ताईंचे हात बळकट तर होतेच.त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे!

विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं ,म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय! या गौरव ग्रंथात प्रत्येकाने त्याबद्दल लिहिले आहेच! त्यामुळे मी आज विकासदादांबद्दल  एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकास दादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला  गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय!

विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून  त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन , पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना.मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली!

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, “पद्मजा, काही काळजी करू नकोस,” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद…

परत धक्का देणे…असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो.

सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं  औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं ! त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही….

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे 

झेन आणि आनंदी राहण्याची कला 

काही दिवसांपूर्वी झेन तत्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती . त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दात जीवन आनंदाने जगण्याची तत्वे सांगितली होती .

* झेन हा शोधाचा आणि आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. आयुष्याला आत्ता आणि इथेच अनुभवण्याचा स्पष्टपणे पाहण्याचा आणि सरळपणे अनुभवण्याचा मार्ग आहे.

* कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने,मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं,ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ही गोष्ट म्हणजे झेन होय.

*आपले आयुष्य जगत असताना आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या सोबत घडु शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे म्हणजे आपण आनंदात जगु शकतो.

* तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमचे जितके नुकसान करु शकणार नाही तितकेच बेसावध विचार तुमचे नुकसान करु शकतात पण एकदा का आपण त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवले की आपण आनंदाने राहु शकतो.

* माणसाच्या मनातल्या नकारात्मक भावना या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात तर सकारात्मक भावना या रोगमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

* एखादी गोष्ट तेव्हाच अनुकूल ठरते जेव्हा माणूस तिच्याशी जुळवून घेतो.

* आयुष्याच्या मार्गांवर जशी तुमची वर्तणूक असेल त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य उलगडत जाते.

* तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना कशी प्रतिक्रिया देता,हे तुमच्या वैयक्तिक तत्त्वज्ञानानुळे निश्चित होतं.तुमच्या आनंदासाठी आणि हितासाठी ते पुर्णपणे जबाबदार असते .

* सत्य नेहमीच हाताच्या अंतरावर,तुमच्या आवाक्यातच असते.

* जेव्हा धामधुमीतसुद्धा तुम्ही शांत राहु शकता तीच निसर्गाची खरी अवस्था असते.

* जेव्हा तुम्ही दुःखाच्या काळातही आनंदी राहु शकता तेव्हा तुम्ही मनाचे खरं सामर्थ्य पाहु शकता.

* माझ्यासोबत जे काही घडतं ते केवळ मला त्यापासुन सर्वाधिक फायदा व्हावा या एकाच हेतुनं घडते.

* आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं,निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात आनंद कसा जोपासावा? वर्तमानात जगत असतानाही भविष्य कसं बदलावे ? याविषयी झेन तत्वज्ञान सकारात्मक शिकवते .  

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या विशिष्ट क्षेत्रात अनेक छोटे छोटे विषय असतात आणि या विषयात सुद्धा अनेक छोटे छोटे संप्रदाय तयार झालेले असतात . या संप्रदायानांसुद्धा अनेक वेगवेगळे फाटे फुटलेले असतात आणि या फाट्यांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन प्रयोग होत असतात . 

काही जण हे प्रयोग , नव्या दिशा , नव्या वाटा , नवे विचार यांचे सहजपणे आत्मचिंतन करून आपल्या जीवनात खरोखर परिवर्तन करून घेतात . या नव्या चिंतनामुळे जो आतमधून बदल होतो , तो बदल होत असताना व झाल्यानंतर आतमध्ये अनेक रोमांचित घटना तयार होत असतात . 

आपल्या वाढण्याऱ्या शरीरात वयामुळे , अनुभवांमुळे , मनामध्ये खूप नाजुक , हळुवारपणे नकळतपणे खूप आश्चर्यचकीत करणारे बदल होत असतात पण त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो . त्यामूळे खरं तर आपले नुकसानच होते .

झेन तत्वज्ञान स्वतःला ओळखवायला , आतमध्ये डोकावयाला प्रेरीत करत असते .

एकदा एक उत्कृष्ट नाव कमावलेला , निष्णात जसे दिसते तसे रेखाटणारा , रंगवणारा निसर्गचित्रकार होता . तो वेळ मिळाला की सर्व साहीत्य घेऊन निसर्गात जायचा . डोंगर , दऱ्या , इमारती , रस्ते , नद्या , समुद्र , बोटी , किल्ले यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्र काढायचा . अगदी बारीकसारीक सर्व डिटेल्स रंगवायचा , रंगवताना तल्लीन होऊन जायचा . त्याला स्वतःचे रंगवलेले निसर्गचित्र पाहुन खूप आनंद व्हायचा व आपण खूप भारी चित्रकार आहोत असा थोडा अहंकारही त्याच्या मनात निर्माण झाला होता . त्या चित्रकाराने आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने करून थोडेफार व्यावसायिक यशही मिळवले होते .

एक दिवस त्याने आपल्या चित्रांचा एक मोठा गट्टा सोबत घेतला आणि तो त्याच्या एका गुरूनां दाखवायला व मार्गदर्शन घेण्यासाठी घेऊन गेला . हे गुरुजी झेन तत्वज्ञानाचे अभ्यासक होते . मोठी साधना केली होती त्यांनी . गुरुजींनी त्याचे प्रत्येक चित्र नीट ,शांतपणे , व्यवस्थितपणे पाहीले आणि चित्राची फाईल पुन्हा होती तशी ठेवली .

निसर्गचित्रकाराने मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली पण गुरुजी काही पुढे बोलण्यासच तयार दिसेनात. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला व तो परत जायला निघाला . निघताना त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले .

दरवाजातून बाहेर जाताना त्याने पाहीले की गुरुजी काही तरी सांगत आहेत . तो परत आत आला व जमीनीवर मांडी घालून शांतपणे डोळे मिटून बसला .

गुरुजी म्हणाले प्रत्येक ठिकाणी जाऊन जसे दिसते तसे रेखाटण्याचे कौशल्य तू फार कष्टाने मिळवले आहेस . त्याबद्दल तुझे स्वागत व अभिनंदन करतो . पण आता तुझे डोळे मिटलेले आहेत . आता तुझ्या आतमध्ये डोकावून पहा . तिथला निसर्ग तुला दिसतो आहे का ?

आपण सगळेच जण बर्हीमुखी झालेलो आहोत . आपण बाहेरचा निसर्ग , बाहेरचे रुप , बाहेरचे जग पाहुन एकमेकांची कॉपी व तुलना करून , स्पर्धा करून , जसे दिसते तसे पाहतोय . तेच चित्रण कागदावर , कॅनव्हासवर रंगवतो . आतला निसर्ग , आतला आवाज , आतले जग, आतली अद्भूत दृश्ये , आतला आनंद , आतल्या वेदना कागदावर कधी रंगवणार ?  ज्या दिवशी तु आनंद , दुःख , सर्व संवेदना रंगवायला सुरुवात करशील त्यावेळी तुझी चित्रे नक्की वेगळी असतील . निसर्गात फिरशील त्यावेळी चिंतन कर , खूप वेळा नजर खिळवून एकाच ठिकाणी बस . ते दृश्य मनात साठव . शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या , धमन्यांमध्ये ते दृश्य खेळते राहील व नंतर हृदयावर त्याचे एक प्रतिबिंब उठेल असे ठरव व नंतर त्या प्रतिबिंबालाच कागदावर उतरव . तन मन धन चित्रांवर केद्रींत कर ,एक वेगळे अनवट चित्र निर्माण होईल . जे आतून येईल ते तुझे खरे चित्र असेल.

मग मी देखील या झेन गुरुजींना मनःपूर्वक नमस्कार केला व आतून चित्र काढता येतात का त्याचा प्रयत्न करू लागलो . मनाच्या आतमध्ये खुप खोलवर गेल्यावर उंचचउंच पाचगणीच्या टेबललॅन्डचे पठार दिसू लागले . त्या पठाराच्या अतिउंच कड्यावर मी स्वतः उभा राहून खाली वाकून पाहतोय असे काहीसे दिसू लागले . सभोवतालच्या डोंगररांगा कडेकपाऱ्या , आसमंतात भरलेली शुद्ध हवा , धुक्याची किमया , सुर्यकिरणांमुळे चमकणाऱ्या निसर्गाचे अद्भूत दर्शन दिसू लागले . मग पेन्सीलने रेखाटणे करण्याचीही गरज वाटत नव्हती . सगळे रंग आपोआप एकमेकांचा हात धरून हे अनोखे आकार , वेगळे भावविश्व वेगळे रूप धारण करून चित्रे कागदावर उतरू लागली . जसजसे आत जावू लागलो तसतसे बाहेरच्या जगाचा विसर पडू लागला . स्पर्धा संपल्या, टिकास्त्रे संपली , द्वेष संपला , विरोध संपला , मोठा चित्रकार होण्याची हाव संपली . आतमध्ये एक अद्भूत उजेड आहे . एक मोठी पोकळी आहे . त्या स्वच्छ निर्वात पोकळीतून प्रवास करताना आता फक्त आनंदच आनंद दिसत आहे .

तुम्ही देखील या झेन गुरुजींचे कधी तरी ऐका 🙏

कदाचित तुम्हालाही झेन गुरुजींचे ऐकल्यामूळे धर्मभेद ,जातीभेद , व्यक्तिभेद , स्वार्थ , आंदोलने , टिकास्त्र , हिंसा , द्वेष , सामाजिक , राजकीय , आर्थिक , मानसिक भेदाभेदीचा विसर पडेल व आपल्या आतल्या अनोख्या विश्वात संचार करून नव्या प्रकाशाचा उजेड सापडेल . 

प्रत्येकाला असा आतला नवा आनंद, नवा उजेड सापडावा यासाठी शुभेच्छा ! 💐

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

बघता बघता दोन हजार तेविसाव्व सरून दोन हजार चौविसाव्व्याला सुरवात होईल. तेविसाव्व्याच्या सुरवातीलाच घरातून घोषणा झाली की, मी आता थकले. या वर्षी मी काहीही पदार्थ करणार नाही. म्हणजे जेवणाच्या पानांतली वामांगी व्यंजने आणि इतर काही !

या घोषणेला सुरुवातीलाच हरताळ फासला गेला तो मे महिन्यांत. सोमेश्वरहून कोणीतरी दोन मोठमोठे भोपळी आंबे आणून दिले तेव्हा. इतके ताजे आंबे डोळ्यांसमोर फुकट कसे घालवायचे, या विचाराने हात कामाला लागले. मग काय? एका आंब्याचं गोडं लोणचं आणि दुसऱ्याचा मेथांबा! दोन्ही पदार्थ विलक्षण रुचकर! हे एवढंच कसं पुरणार, म्हणून आणखी भोपळी आंब्यासाठी शोभाची बाजारांत ट्रीप झाली. आंबे नाही मिळाले. पण …..

काळे गोल, गोड तीळ मिळाले. (कारळे नव्हेत) हा पदार्थ आजकाल रत्नागिरी बाजारातून दुर्लभ झाला आहे असं कळतं. एकेकाळी भारीवाल्या माम्यांकडे हे तीळ भरपूर असायचे. मग गोड्या तिळकुटाच्या संगतीत पुढचे काही दिवस छान गेले! याच माम्यांकडे कोकणचा मेवा म्हणजे करवंद, अटकं, अळू, तोरणं, हा रानमेवा मिळतो. त्याच्यावर स्वयंपाकघरात काही प्रक्रिया करायची नसते, त्यामुळे हा मेवा अनेक वेळा आणला जातो.

नाचण्याच्या सत्वाची किंवा पिठाची, गोडी किंवा ताकाची आंबटसर आंबिल अधूनमधून होतच असते. पण खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यातून उरलेल्याची साबुदाण्याची गोड आणि आंबट लापशी सुद्धा अनपेक्षितपणे होऊन गेली! खूपच स्वादिष्ट लागते.

घावन-घाटलं हा कोंकणातला लोकप्रिय पदार्थ. घावन नाही, पण नाही नाही म्हणतांना घाटलं झालंच. सिंधुदुर्गात तर घावन घाटल्याशिवाय कोणताही सण होऊच शकत नाही. अगदी तेराव्याला सुद्धा घावन घाटलं केलच जातं. तसंच काकडीच्या पातोळ्यांचा बेत आमच्या घरी केलेलाच नव्हता. पण लीलाकडून तेही आले. त्यामुळे तीही रिकामी जागा भरली गेली. नक्की आठवत नाही पण बहुतेक लीलाकडूनच एक बरका फणस आला होता. त्यामुळे सांदणं झाली. मेच्या अखेरीला शोभा बाजारात गेली होती. तेव्हा तिला रायवळचे गोड चवीचे, मोठ्या आकाराचे आंबे मिळाले. कोयाड्यासाठी (आंब्याची पातळ रसाची भाजी – अनेकांना हा प्रकार माहीत नाहीये) अतिशय छान. मग घोषणा राहिली बाजूला आणि सुंदर, रुचकर कोयाड्याची भरती जेवणांत झाली!

खरं सांगू? कितीही ठरवलं आणि कितीही घोषणा केल्या गेल्या,  तरी काही काही पदार्थ हे घरामध्ये केलेच जातात. आणलेला किंवा आलेला पदार्थ नासून फुकट जाऊ नये म्हणून तरी, किंवा काही विशिष्ट समयी, विशिष्ट संकेताने जेव्हा जिव्हालौल्य उफाळतं तेव्हा तरी !

असो. तुका म्हणे सुखी रहावे,

        जे जे होईल ते ते खावे.

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print