मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(एव्हाना तर आयुष्य साठीपर्यंत पोहचलंही…आता पुढे)

काळ कुठे वाट पाहतो? थांबतो का कुणासाठी?

मुलं परदेशी निघून गेली.आपापल्या विश्वात रमली.

आणि जीवनाची घडी अर्ध्यावरच मोडून जोडीदारानेही हात सोडला. सारेच जीवाभावाचे इकडे तिकडे पांगले.कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं, कुणाला काही वाटावे असे थांबे ऊखडून गेले. एक भकास पोकळी निर्माण झाली. खोल अंधारी, भयाण एकाकीपण पांघरु लागलं. हात निराधारपणे चाचपडत राहिले,श्वास कोंडू लागला. आणि त्याचवेळी एक जाणीवेचा ऊसळलेला प्रवाह आतून धक्के द्यायला लागला.त्यानं ती अधिक अस्वस्थ झाली. एका सावलीनं तिला हळुच गोंजारलं. कानात ती कुजबुजली.

“अग! वेडे,मी तुझ्याबरोबर सततच होते.आताही आहे. का उदास होतेस? उठ.”

त्यादिवशी ताईने बैठक मारली. एकटीच होती.

चार भिंती आसुसल्या होत्या. पेटीवर तिची मुलायम बोटे फिरली. सूर झंकारले.

सा ध नि रे

ग म ध नि सा

सा नि ध म ग रे

सा नि ध सा..

शुद्ध स्वरातील मारव्याची मधुर सुरावट ऊमटली. तीव्र मध्यम आणि कोमल ऋषभही एकदम चपखल लागले. ओठातून बंदीश उलगडली.

जाओ मोहन तुम हमसे ना बोलो

काहे करत मोहे प्यार..

सूरांची मंझील हळुहळु बांधली  जात होती. किती वेळ  ताई एकटीच गात होती. धुंद.बेभान.आत्ममग्न.

जाणवत होतं , आतून काहीतरी उचंबळतय् .स्वत:च्याच सूरांच्या पावसात ती भिजत राहिली.

कितीतरी वेळ.

अंजोरचा फोन होता.

” ताई! उद्या गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम ठेवलाय घरी.

येशील का तू? पात्रे सरांशी तुझी ओळख करुन देईन.

जमलं तर थोडं गा. आम्हाला आवडतं तुझं गाणं आणि इथे कुणी सवाई नाहीत.सारे शिकाऊ आहेत. ये. तुलाही बरं वाटेल.

ताईला अंजोरचा आग्रह मोडवेना. ती कार्यक्रमाला गेली. पण मनात एकमात्र ठरवलं होतं. गायचं बियचं नाही. नुसतं ऐकायचं.

छोटेखानीच कार्यक्रम होता.

अंजोरने घर सुंदर सजवून एक सूरमयी वातावरण निर्माण केलं होतं.  तबला,पेटी, तंबोरे ,जुळले. एकेकाचं गाणं उलगडत होतं. एक अंध मुलगा होता. त्यानं,

। जगन नायका रे नको अंत पाहू। मन मोही माझे किती काळ साहू।।

हे भजन त्याने इतकं सुंदर आळवलं की ताईचे डोळे झरझर पाझरले.

तो मुलगा एकच वाक्य बोलला.

“मला रंग दिसत नाहीत.पण सूर दिसतात.”

अंजोरने ताईची पात्रे सरांशी ओळख करुन दिली.

“सर, ही आमची ताई. संगीताचं तिला उपजतच ज्ञान आहे. ती गातेही खरं तर छानच.”

सर चटकन् म्हणाले, “मग गा की. इथे सगळे आपलेच आहेत.”

आणि नवल म्हणजे ताईने फारसे आढेवेढे घेतले नाहीत.

सूर लावला. डोळे मिटले. अन् 

। वद जाऊ कुणाला शरण ग ।करील जो हरण संकटाचे।।

सूरांच्या लगडी ऊलगडत गेल्या. हाय नोट्सही सुरेख लागल्या. भावपूर्ण. स्पष्ट. अर्थासकट गाणं भिडु लागलं. कोपर्‍यातल्या  दिव्यांमधल्या वाती सुद्धा लयबद्ध नाचू लागल्या.

एका अत्यंत सुरेल लाटांमधे वातावरणच तरंगू लागलं. जणू हे गाणं संपूच नये.

पात्रे  सर तर उठून उभे राहिले. आणि मग टाळ्यांचा नाद दिवाणखान्यात घुमला.

ताई जणु कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात होती. तिला वाटत होतं जणुं ‘मी कात टाकली…’

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात  — पपांनी अनेक दिग्गज गायकांच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह गोळा केला..आता पुढे..)

एक दिवस राग बिहागमधील गंगुबाई हंगल यांची एक बंदीश ऐकताना पपा सहज म्हणाले,

“पाह्यलंस, यांचाही आवाज जाडच आहे पण कंठातल्या सूरात किती माधुर्य आहे! स्फूर्ती ,साधना आणि श्रद्धा असली की कला फुलते.”

एखाद्या चित्रातही काही रंग तरल असतात तर काही गडद असतात.पण तेही कागदांवरच्या आकृतीला सजीवता चैतन्य देतात.

पपा एका तोतर्‍या माणसाची गोष्ट सांगायचे .तोतरेपणामुळे तो कसा हळुहळु लोकांना टाळू लागला  ..पण एक दिवस त्याला मार्ग सापडला.

तोंडात पुट्ठ्याचा तुकडा पकडून तो समुद्रावर पळायचा.हवेची कंपने अनुभवायचा.काही काळाच्या सरावाने त्याला जाणवले की त्याचे तोतरेपण कमी होतेय् . एक दिवस तर या व्यंगातून तो पूर्णपणे मुक्त झाला.आणि नंतरच्या आयुष्यात त्याने एक उत्तम वक्ता म्हणून ख्याती मिळवली.

ताई नुसतंच हूं म्हणायची.

दिवस  सरत गेले .काळ वहात गेला.आयुष्यात खूप बदल झाले.आयुष्याने कळत नकळत हात धरुन वेगवेगळ्या वाटेवरुन घुमवले.

शिक्षण संपलं. ताई प्रेमातही पडली. लग्न झालं. मुले झाली. संसार बहरला.जबाबदार्‍या वाढल्या.

एकेक टोक जुळवतानाआतलं काहीतरी विझत गेलं.

संसाराच्या पटावरली प्यादी सरकवण्यात दमछाक झाली.कधी तिरक्या चालीचा उंट तर अडीच घरात फिरत  राहणारा अश्व.राजाला वाचवण्यातच हेलपाटलं सारं. खरं म्हणजे सर्वसाधारणपणे जे आसपास घडतं तसंच. निराळं काहीच नाही. तीच मळलेली वाट.

गाणं गुणगुणण्यापुरतच राहिलं .  मशागत करण्यासाठी ना वेळ ना कुठला झरोका उरला. विसरच पडत चालला सगळ्याचा.

मधून मधून पपांशी चर्चा होत असे. कधी फोनवर.

कधी प्रत्यक्ष भेटीत.

“परवीन सुलतानाचं बारम्मा …गाणं काय रंगलं म्हणून सांगू बाबी. भैरवी झाली तरी लोक मैफल सोडून जायला तयारच नाहीत.”

कधीतरी ताई सिम्फनी मधे फेरफटका मारूनही यायची.नव्या कॅसेट्स घेउनही यायची.

कालांतराने पपाही गेले. एक बूस्टरच हरवला त्यांच्या जाण्याने.

आजकाल तिला एक जाणवू लागलं होतं. हर्षलला संगीत आवडतं. तो इंग्लीश गाणी  तर छानच गायचा. पण पारंपारिक शास्त्रीय, भारतीय संगीताकडेही  त्याची ओढ होती. सूर पटकन् पकडायचा.एकदा कोपर्‍यातधूळ खात पडलेली आजोबांची पेटी त्याने बाहेर काढली. काही सूरांच्या पट्य्या दाबल्या होत्या. त्या उचकवून बसवल्याही. मग ताईनेच त्याला काही बेसीक सुरावटी शिकवल्या.

हर्षलची बोटं पेटीवर सराईतपणे फिरायची.नकळत ताईच्या ह्रदयातएक आनंदाची तार छेडली गेली.

एक दिवस हर्षल ताईला म्हणाला, “आई तू या क्षेत्रात करीअर करायला हवी होतीस.तुला केव्हढं तरी येतं. कुठच्या कुठे गेली असतीस!”

तेव्हांही ताई हेच म्हणाली, ” नाही रे!तो फार लांबचा पल्ला आहे. मूळातच माझ्याकडे आवाजाचं भांडवल नाही.माझा आवाज घोगरा.बसका.”

विषय तिथेच संपला.एव्हाना तर आयुष्य साठीपर्यंत पोहचलंही होतं.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सुरांवरची ताईची पकड मूळातच पक्की होती, ऊपजत होती. आता पुढे..)

एक दिवस पपांचे एक मित्र घरी आले होते. जिन्यातच  त्यांनी पेटीवरचे सूर ऐकले  अन् ते थबकलेच.

“वाजव वाजव बेटा! खरं म्हणजे भूपात निषाद नसतो.पण तू सहजपणे घेतलेला हा कोमल निषाद कानाला मात्र गोड वाटला.

नंतर ते पपांना म्हणाले ,”हिला पाठव माझ्या क्लासमध्ये.रियाज हवा. सराव हवा. मग कला विस्तारते. शिवाय शास्त्रशुद्ध  प्रशिक्षणही मिळेल  हिला. “

ताई जायचीही त्यांच्या  क्लासला . पहाटे उठावं लागतं म्हणून कुरकुरायची. पपा तिला सतत विचारायचे.

“आज काय शिकलीस? दाखव की वाजवून. “

मित्रालाही विचारायचे.

“कशी चालली आहे साधना बाबीची? “

ते म्हणायचे , “ठीक आहे. “

एक दिवस मात्र ते म्हणाले.

“तिच्यात कलाकार आहे पण तो झोपलाय. कुठल्याही  साधनेला एक अंत:स्फूर्ती लागते. एक धार लागते मित्रा. “

पपांना फार वाटायचं,घराच्या अंगणातलं हे कलाबीज का रुजत नाही ? कां उमलत नाही ?

पपांनी तिला इ. एन. टी. तज्ञांकडेही नेले होते.  डाॅक्टरांनी  तिची सखोल तपासणी केली. स्वरयंत्राचे ग्राफ्स काढले. तसे रीपोर्ट्स पाहता सर्व काही नाॅरमल होते. काही ऊपाय करता येईल अशी स्थिती नव्हतीच मुळी.

आजी  म्हणायची,”लहानपणी घसा फुटेपर्यंत ही रडायची. रडून रडून हिचा आवाज असा झाला. “

डाॅक्टर मात्र म्हणाले, असं काही नसतं आजी. ” मग हातऊंचावून आकाशाकडे बघत म्हणायचे, “शेवटी डाॅक्टर म्हणजे काही देव नव्हे,विज्ञानाच्याही काही मर्यादा आहेतच की. चमत्कार होतातही. पण शास्त्रात त्याची ऊत्तरे नाहीत. तशी थिअरी नाही.

एक दिवस ताई चिडूनच पपांना म्हणाली, “हे बघा , उगीच मी गायिका वगैरे बनण्याचं स्वप्न तुम्ही बघू नका. आणि माझ्यावरही ते लादू नका. गाणं मला आवडतं. संगीतात मी रमते. माझ्या पद्धतीने मी त्याचा आनंद घेतच असते. हाय पीचवर माझा आवाज फाटतो. चिरतो. क्लासमधली मुलं मला हसतात. मला नाही जमत पपा.नका अशक्यातली स्वप्नं पाहू! “

त्यादिवशी मात्र ताईच्या डोळ्यात तुडुंब भरलेली विहीर होती.

मनात प्रचंड निगेटीव्हीटी होती. न्यूनगंड होता.

तसे पपाही समंजस होते.त्यांनाही जबरदस्तीचा रामराम नकोच होता. शिवाय अति महत्वाकांक्षा नैराश्य निर्माण करते याच मताचे ते होते.

त्यांनी नाद सोडून दिला असेही नव्हते. संगीताची अनेक पुस्तके त्यांनी आणली. भीमसेन,गंगुबाई हन्गल, शोभा गुर्टु , किशोरी आमोणकर अशा अनेक दिग्गजांच्या ध्वनीमुद्रिकांचा भलामोठा संग्रह गोळा केला. शिवाय रेडियो होताच.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘ – भाग 5 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग 5 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(सातवाहन नरेश गुणाढ्याला व त्याच्या महान कृतीला सन्मानपूर्वक राजधानीत घेऊन आला ).आता पुढे….

मुळ बृहत् कथेबद्दल थोडक्यात आख्यायिका अशी आहे की ती भगवान शंकर देवी पार्वतीला सांगत होते. विश्वातल्या सर्वच्या सर्व कथा-कहाण्या, काव्य, नाटक, आख्यायिका इत्यादी त्यात समाविष्ट होत्या. ती पूर्ण बृहत्कथा शंकराच्या एका गणाने योगाद्वारे गुप्त होउन ऐकली होती. हे लक्षात आल्यावर देवी पार्वतीने त्या गणास, माफी मागणाऱ्या त्याच्या एका मित्रास व एका यक्षास शाप दिला होता. त्यामुळे त्यांना मानव योनीत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. आणि उःशाप म्हणून जन समुदायापर्यंत बृहत्कथा पोहोचल्यावर त्यांना पुन्हा दिव्य- लोक प्राप्त होणार होता. त्या गणाच्या मित्राचे मानव जन्मातले नाव गुणाढ्य असे होते.

वर, शाप-उःशाप, पूर्वजन्मीचे ज्ञान पुनर्जन्म या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला नाही तरी ,एका वररुची या व्यक्तीने काणभूतीला व त्याने ही कथा पुढे गुणाढ्याला ऐकवली होती आणि त्याने तिचा जनसामान्यात प्रचार करण्यासाठी ती ‘पैशाची’भाषेत लिहिली या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकतो.

ही पुराणकथा नाहीय. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातवाह वंशाच्या नरेशांचा कालावधी इसवीसनपूर्व २०० ते ३०० वर्षे असा ऐतिहासिक पुराव्या वरून मानला जातो.त्यातील एक शासकाने गुणाढ्याला आपला मंत्री केले होते.

त्याची बड्डकथा मूळ रुपात उपलब्ध नाहीय. पण सन ९३१ मध्ये कवी क्षेमेंद्र ने ७५००श्लोकांचा बृहत्कथा मंजिरी श्लोक संग्रह लिहिला व कवी सोमदेव भट्ट याने १०६३  ते १०८२ या कालखंडात २४०० श्लोकांचा कथासरित्सागर नावाचा ग्रंथ लिहिला. हे ग्रंथ त्यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या गुणाढ्याच्या एक लाख श्लोकां वरून संस्कृत मध्ये रूपांतरित केले. त्याला गुणाढ्याची बृहत्कथा असेही म्हणतात. बृहत्कथा म्हणजे भारतीय परंपरेचा महाकोष आहे. सर्व प्राचीन आख्यायिका, साहित्याचा उगम बृहतकथेत आहे. बाण, त्रिविक्रम, धनपाल इत्यादी श्रेष्ठ साहित्यकारांनी बृहत् कथेला विस्मयकारक, अत्याधिक सामान्य लोकांचे मनोरंजन करणारा ,उपजीव्य ग्रंथ मानला आहे. तो समुद्रा- सारखा विशाल आहे. हे त्यांनी वर्णन करून सांगितले आहे. त्याच्या थेंबातूनही खूप  आख्यायिकाकार व कवींनी आपल्या रचना केल्या आहेत.

वेद ,उपनिषदे, पुराणे इत्यादीतून प्राप्त होणाऱ्या कथा या उच्च वर्गाच्या साहित्य प्रवाहातून भारतीय इतिहासाच्या सांस्कृतिक भूतकाळाशी जोडल्या गेल्या होत्या. त्याला समांतर असा दुसरा एक लोक प्रचलित कथांचा प्रवाह पण आदि काळापासून अस्तित्वात होता.गुणाढ्याने सर्वप्रथम या दुसऱ्या साहित्यप्रवाहाचा संग्रह लोकभाषेत लिहिला.बृहत्कथा सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित आहे .समाजातील जुगारी, चोर, धूर्त,लंपट , ठग व्यभिचारी भिक्षु , अधःपतन झालेल्या स्त्रियाअशी कितीतरी पात्रे कथांमधून आहेत. त्यात मिथक आणि इतिहास ,यथार्थ आणि कल्पना लोक,सत्य आणि मायाजाल यांचा अपूर्व संगम आहे.

कादंबरी, दशकुमार चरित्र, पंचतंत्र, तसेच वेताळ पंचविशी,( विक्रम वेताळ कथा) सिंहासनबत्तिशी, शुकसारिका अशी कथा चक्रे, स्वप्नवासवदत्ता प्रतिज्ञायौगंधरायण, आणि अनेक कथा ,काव्य ,नाटक, अख्यायिका, उपअख्यायिका आहेत

त्यामुळे त्यांचे कर्ते बाणभट्ट, भास, धनपाल ,सोंडल, दंडी विशाखादत्त, भास, हर्षआणि अनेक …बृहत कथेचे अर्थात् गुणाढ्याचे ऋणी आहेत. पौराणिक कथा संग्रहाप्रमाणेच लोक कथा संग्रहाला पण असाधारण महत्व प्राप्त आहे. यामुळेच गोवर्धन आचार्यांनी वाल्मिकी आणि व्यासांच्या कालानंतर तिसरी महान कृती मानून गुणाढ्याला व्यासांचा अवतार मानले आहे.  लोककथांचे महान संग्राहक गुणाढ्याचे असामान्य महत्त्व यामुळे सिद्ध होते.

      **  ‌ समाप्त**

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आज ताईच्या ‘भक्तीचाच ठेवा’ या संगीत कार्यक्रमाचा शंभरावा प्रयोग होता. त्या निमीत्ताने  पात्रेसरांनी ताईच्या सत्काराप्रती एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. सभागृह प्रेक्षकांनी खचाखच  भरले होते. अलीकडे हा अनुभव प्रत्येकच प्रयोगाच्या वेळी  येतोच.

आज या कार्यक्रमाची भूमिका , संकल्पंना, प्रेरणा याविषयी  ताईच्या संगीत गृपमधील मान्यवर बोलणार होते. ताईही तिचे मनोगत व्यक्त करणार होतीच.

मंचावर सुंदर सजावट केलेली होती. फुलांची आकर्षक आरास होती. ऊदबत्त्यांचा दरवळ होता. समयांचा मंद,मंगल प्रकाश होता. वाद्यांचा जुळलेला मेळ होता. खरोखरच सारं वातावरण संगीतमय, मंगल, पवित्र वाटत होतं. वातावरणात मंद यमन रागाची धून वाजत होती. सुरावटीतील कोमल शांत सूर मनावर तरंगत होते.

ताईच्या मनातआनंद, समाधान, होतच पण पपांची खूप आठवण येत होती.

आज पपा हवे होते..!!

त्यांच्या बाबीचा हा सोहळा बघून ते खूप भरुन पावले असते. त्यांचे तेज:पूंज डोळे पाणावले असते. त्यांच्या अश्रुंच्या थेंबांतून अनेक आशीर्वाद झरले असते.

शाळेतच होती ताई. लहान होती. तसं गाणारं घरात कुणीच नव्हतं. मात्र पपांना संगीताची उत्तम जाण होती.त्याहूनही भारतीय शास्रीय संगीताची मनापासून आवड होती. सुरेल होता त्यांचा आवाज. पहाटे पहाटे ते अभंग, ओव्या गात. ते ऐकत रहावेसे वाटे. शिवाय रात्री  झोपताना आकाशवाणीवरची संगीत सभा ऐकतच  निद्राधीन व्हायचं, हा शिरस्ता.

एक दिवस ताई सकाळी ऊठली आणि सहजच भूप रागातीलसरगम  गाऊन गेली.आणि पपा म्हणाले, “वाह! बाबी, कमाल संगीत आहे तुझ्यात. “

“काहीतरीच काय पपा? मी आपलं सहजच गुणगुणले.बाकी माझा हा जाडा आवाज,मी काय गाणार?”

“अग! मग पेटी वाजवायला शिक.सतार वाजव.”

ताई ठासून म्हणाली ,

“पपा ,भलती सलती स्वप्ने पाहू नका. आणि मला वाद्य संगीतापेक्षा गायककीच आवडते. पण माझा हा घोगरा आवाज…?जाऊदे! गाणं ऐकण्याची मजा  मला पुरेशी आहे.स्वत:  गायलाच कशाला हवं.?”

पपांना फार वाईट वाटायचं. ताईमध्ये असलेला न्यूनगंड कसा दूर होईल याचा ते सदैव विचार करायचे.

नकोनको म्हणत असतानाही पपांनी एक छान पेटी तिच्यासाठी आणली.पण ताईने त्या पेटीला कधी हातही लावला नाही. एक दिवस पपांनीच एक अभंग पेटीचा सूर धरून गायला.

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते

कोण बोलाविते हरीविण।।

।देखवी दाखवी एक नारायण।

।तयाचे भजन चुको नका।।

पुढचा एक अभंग ताईने उत्स्फूर्तपणे  सूरात सूर पकडून गायला. घरात जणू एक छोटीशी भक्तीमैफलच रंगली.

मग ताईने हळूहळू पेटीला जवळ केले.पपांनी काही नोटेशन्सची अगदी प्राथमिक पुस्तकेही आणली. त्या नोटेशन्सवरुन तिने भूप,काफी ,दुर्गा रागाच्या काही बंदीशी ही बसवल्या. सुरांवरची तिची पकड मूळातच पक्की होती. ऊपजत होती.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं-, सगळं अस्ताव्यस्त झालं. कुणी टाळ्या वाजवत होतं. कुणी स्टेजवर काही ना काही फेकत होतं. कुणी फेकण्याचा नुसताच आविर्भाव करत होते. कदाचित त्यांनी आणलेली सामग्री संपली असावी. आता इथून पुढे )

मी माझ्या कादंबरीच्या निर्मितीविषयी माझं मनोगत प्रगट करणार होतो. परंतु बोलण्यासाठी मी तोंड उघडल्यापासून ज्या टाळ्या वाजायला सुरुवात झाली, त्या थांबेचनात. मी खुर्चीवर जाऊन बसेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. सुबोध माझ्या कानाशी कुजबुजत म्हणाला, ‘‘घाबरू नको! मी पोलिसांना फोन करून येतो.” समारंभाचं हे सगळं वातावरण बघून अध्यक्षांनी अध्यक्षीय समारोप न करताच समारंभ संपल्याचं जाहीर केलं.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही प्रेक्षक मंडपातलं वातावरण असंच राहिलं. नाव होणं दूरच… आता साहित्यिकांमध्ये एवढी बदनामी आणि अप्रतिष्ठा होईल, की विचारायला नको. सगळ्या समारंभाची चित्तरकथाच झाली.

दुसऱ्या दिवशी झाल्या गोष्टीचा जाब विचारायला हेल्पलाईन फर्ममध्ये मी दरवाजापर्यंत पोचतोय, तोच नकुल तिथून गडबडीने बाहेर पडताना दिसला. त्याचं बहुधा माझ्याकडे लक्ष नसावं. आता हा इथे? म्हणजे… हाही त्याचा कविता संग्रह छापून बसलाय की काय? हातात निमंत्रण पत्रिकाच देऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का देणार की काय? बिचाऱ्याने माझा प्रकाशन समारंभ व्यवस्थित पार पाडावा, म्हणून केवढी खटपट केली होती. एक दोन टोमॅटो, त्याच्या नि सुबोधच्या अंगावरही फुटले होते. ठीक आहे. त्याच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी मी त्याने केलेल्या मदतीची जरूर भरपाई करीन.

आत गेलो, तर समोर तीच… दगडी सुशीलाजी… मला पाहताच तिने सुरू केलं,

‘‘आपले साडे सात हजार रुपये झाले. उरलेले अडीच हजार अकरा वाजता आमची अकाउंटंट येईल, तिच्याकडून घेऊन जा.”

मला इतका राग आला होता, की माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. कसं तरी रागावर नियंत्रणा मिळवत मी म्हटलं,

‘‘कसले साडे सात हजार? तुम्ही माझे सगळे पैसे परत दिले पाहिजेत. इतकंच नाही, तर अब्रू नुकसानीबद्दल मला काही रक्कम मिळाली पाहिजे. नाही तर मी ग्राहक न्यायालयात जाईन.”

‘‘तसं तुम्ही करू शकणार नाही.” ती दगडी आवाजात म्हणाली.

‘‘का करू शकणार नाही? आम्ही माल एका प्रकारचा मागवला, पण तुम्ही दुसराच पाठवलात. आम्ही मागवले, खास श्रोते नि तुम्ही मात्र पाठवलेत अद्वितीय म्हणजे विध्वंसक श्रोते. माझ्या सगळ्या समारंभाचा बट्ट्याबोळ झाला. विध्वंस झाला. मी पोलिसात जाईन. फिर्याद करेन.”

‘‘महाशय थांबा जरा ! आपला काही तरी गैरसमज होतोय!” तिने रॅकवरून एक फाईल काढली. माझ्यापुढे ती फाईल ठेवली. कागदावर लिहीलं होतं, नूतन सभागृहात खालील लोकांनी जायचे आहे. त्याच्याखाली शंभर नावे व त्यांच्या सह्या होत्या. कार्यक्रमाची वेळ लिहिलेली होती आणि ती मंडळी परतल्यानंतरची वेळ घातलेली होती. ती म्हणाली, ‘‘बघा! नीट बघा! या हिरव्या फाईली आम्ही खास श्रोत्यांसाठी बनवलेल्या आहेत.”

‘‘तरीही आपण काही तरी चूक केलीय. माझ्या समारंभात अद्वितीय श्रोते आले होते.”

‘‘पन्नास अद्वितीय श्रोत्यांचीही ऑर्डर होतीच! हे बघा ना!” तिने एक लाल रंगाची फाईल काढली आणि उघडून माझ्यापुढे धरली. स्थळ – नूतन सभागृह. कार्यक्रमाची वेळ मी दिलेलीच होती. त्याखाली पन्नास नावे आणि सह्या होत्या. येण्या-जाण्याच्या वेळेच्या नोंदीसकट.

‘‘माझा समारंभ उधळून लावायची ऑर्डर? कुणी दिली ऑर्डर?”

‘‘आता आताच ते महाशय इथून गेले.”

‘‘पण तुम्ही ही ऑर्डर स्वीकारलीच कशी?”

‘‘आमची ही फर्म म्हणजे एक प्रकारचं दुकानच आहे, असं समजा ना! ज्या गि-हाईकाला, जेव्हा, जसा माल हवा असेल, तसा आम्ही पाठव्तो. दुकानात नाही, दोन-तीन कितीही गि-हाईकं अनेक प्रकारचा माल मागतात आणि दुकानदारही ज्याला जो माल हवा, त्याला तो देतो.”

‘‘अहो, पण एकाच समारंभार असे भिन्न प्रकारचे श्रोते म्हणजे…”

‘‘दुकानदार नाही, एकाच घरात साखर आणि डी.डी.टी.ची पावडर देत?”

या दगडापुढे डोकं आपटण्यात काही अर्थ नव्हता. चालता चालता एकेक गोष्ट स्पष्ट होत गेली. दंगा झाला तो नकुलच्या प्रास्ताविकानंतर. मगाशी नकुलचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही, असं नसणार. त्याने तसं दाखवलं असणार. पण… पण… हे असं कसं झालं? नकुल तर माझा जीवश्च कंठश्च मित्र! लहानपणी आम्ही शाळेत असताना जीवश्च कंठश्चची व्याख्या गमतीने, कंठ दाबून जीव घेणारा अशी करायचो. त्याचा आता प्रत्यक्ष प्रत्यत घेतला. असाही एक अनुभव. पुढे मागे लेखनात वापरूयात म्हणा!

नंतर मला कळलं, त्या फर्ममध्ये सुबोधच नकुलला घेऊन गेला होता. त्यानंतर असंही कळलं, की सुबोधकडून कंपनीला जेवढ्या ऑर्डर्स मिळतील त्या प्रमाणात त्याचं कमीशन सुबोधला मिळतं. तर असे माझे जान घेणारे जानी दोस्त. त्यांनी माझं केलेलं शोषण माझ्या ‘‘मातीच्या चुली” मधील पात्रांच्या शोषणापेक्षा कमी आहे का हो? वाचकहो, तुम्हीच निर्णय करा! अर्थात त्यासाठी कादंबरी वाचायला हवी. शऱ्याने मुखपृष्ठ बदललं नसेल, तर मूळ पुस्तकाला कव्हर घालून वाचतोय असं समजा.

अजूनही आमची पंचकडी आहे तशीच आहे. म्हणजे… जीवश्च.. कंठश्च. मला काही झाल्याचे मी काही कुणाला दाखवले नाही. तरी पण कधी तरी मी याचा बदला घ्यायचा ठरवलाय. पण कसा? तेच अजून सुचत नाहीये. तुम्ही सुचवाल? एका लेखकाला साहित्यिक बदला घेण्याचा उपाय… सुचवाल कुणी उपाय? 

– समाप्त –

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले- ‘‘गाढव आहेस!”

तसा मला केव्हाही काहीही म्हणायचा अधिकार सुबोधला आहेच आणि तो केव्हाही, कुठेही गाजवायची सवय सुबोधला आहे. 

आता काय झालं?” आता इथून पुढे)

समारंभाच्या दिवशी शंभर श्रोत्यांना सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळात बुक केलं. सर्व श्रोत्यांना वेळेवर पाठवा, असं सुशीलाजींना वारंवार बजावून आम्ही निघालो. श्रोत्यांच्या चार लीडरना (यांचा चार्ज दुप्पट होता) दुसऱ्या दिवशी सुबोध कुठे टाळ्या वाजवायच्या, कुठे वाहवा, कुठे बहोत खूब म्हणायचं, ते समजावून सांगणार होता.

श्रोत्यांची व्यवस्था झाल्यामुळे मी निर्धास्त होतो. आता प्रतिक्षा होती, ती केवळ समारंभाच्या क्षणाची. जाणारा प्रत्येक क्षण युगा युगासारखा, का काय म्हणतात तसा, वाटू लागला होता. आणखीही एका गोष्टीची प्रतीक्षा होती. मुखपृष्ठवगुंठित पुस्तकाची. पुस्तक तयार झालं होतं, पण अजून मुखपृष्ठ झालेलं नव्हतं. शऱ्याचं रोज उद्या चाललं होतं. अखेर प्रकाशन समारंभ दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपला. मुखपृष्ठविरहित पुस्तकाचे प्रकाशन करावे लागणार की काय, अशी मनात धाकधुक असताना शऱ्या विजयी वीराच्या थाटात प्रवेशता झाला. आम्ही उद्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवत होतो.

शऱ्याने आपल्या शबनममधून पुस्तकाच्या दहा प्रती काढून तिथे टेबलावर मांडल्या. मी झडप घालून पुस्तक उचललं. पुस्तकाचं शीर्षक होतं ‘‘मणाच्या चुली आनि वनवास.”

‘‘तू पुस्तकाचं शीर्षक बदललंस की काय?” वश्या म्हणाला. ‘‘मातीच्या चुली ‘तिथं’ मणाच्या चुली” झालं होतं, आणि ‘‘वणवा” ला स येऊन चिकटला होता.

‘‘ही सारी प्रकाशक महाशयांची किमया. माझी नव्हे. नकुलची… मुखपृष्ठ, मांडणी तो बघणार होता.”

‘‘पण मी मुखपृष्ठ डिझाईन करणाऱ्या तुझ्या झेन कॉम्प्युटरवाल्याला सगळी कल्पना देऊन आलो होतो… पण चूक झाली असली, तरी बरोबर झालंय. मुखपृष्ठ अगदी अर्थपूर्ण झालंय.” इति नकुल.

‘‘काय अर्थपूर्ण झालंय. माझ्या कादंबरीतील आशयाशी दुरान्वयाने तरी संबंध आहे का या मुखपृष्ठाचा?”

मुखपृष्ठात फोकसला गांधी टोपी, धोतर-झब्बेवाले दोन पुढारी, एकमेकांकडे माजलेल्या रेड्यासारखे टवकारून पाहात होते. पार्श्वभूमीवर लोकांच्या रांगा होत्या. मतदान केंद्राची पाटी होती.

‘‘राजकीय पुढारी मतांसाठी तळा-गाळातल्या लोकांना प्रलोभन दाखवतात आणि त्यांचं शोषण करतात. सखोल अर्थ आहे या मुखपृष्ठाला. मला विचारशील, तर हे उत्तम मुखपृष्ठ आहे.” नकुलने पुन्हा समर्थन केलं.

‘‘मला सखोल अर्थ कळायला नकोय! वरवरचाच अर्थ कळायला हवा आणि मला हे मुखपृष्ठ नको. नवीन तयार करा आणि प्रिटिंगपूर्वी मला ते दाखवण्याचे उपकार करा.” मी हात जोडून शऱ्याला म्हटलं. शऱ्याने ते मान्य केलं. पण समारंभाच्या वेळचं काय?

सुबोध म्हणाला, ‘‘जाऊ दे ना यार… प्रकाशन समारंभ याच मुखपृष्ठावर उरकून टाकू. तोपर्यंत लोकांना कुठे माहीत असतं, आता काय आहे? मुखपृष्ठ सुसंगत आहे की नाही?”

शऱ्याने नवीन मुखपृष्ठ तयार करण्याची तयारी दर्शवली. पण पुन्हा आर्ट पेपर विकत घेणं, चित्र तयार करणं इ.साठी साडे तीन हजार रुपये त्याने माझ्याकडून घेतले. मला हो म्हणण्यावाचून पर्याय नव्हता. दगडाखाली हात सापडला होता.

‘‘पहिल्या कव्हरची रद्दी आपल्या घरी नेऊन टाका. माझ्या प्रेसमध्ये जागा नाही.” शऱ्या म्हणाला.

‘‘नकुलला दे! तो या चित्राच्या आशयाच्या कविता करेल आणि वापरून टाकेल हे मुखपृष्ठ!” मी मनातल्या मनात शंभर आकडे मोजत बोलून देलो. उद्याचा प्रकाशन समारंभ होईपर्यंत तरी मला ही भुतावळ संभाळून घ्यायला हवी होती.

अखेर तो सुदिन, तो मंगल क्षण अवतरला. सकाळी नऊच्या मुहुर्तावर येणारा मंगल क्षण दीड तास उशिरा, म्हणजे साडे दहाला आला. सन्माननीय अतिथींचं आगमन हा मुहूर्त. प्रमुख अतिथी बरोबर नऊला आले. स्वागताध्यक्ष त्यांच्यापेक्षा व्यस्त. राजकारण, समाजकारण यातून वेळ काढणार. प्रमुख अतिथी प्राध्यापक, म्हणजे शिक्षकच शेवटी. त्यांना काय वेळच वेळ. स्वागताध्यक्ष खासदारसाहेब दहाला, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ख.सा.का. चे चेअरमनसाहेब साडेदहाला आले. लक्ष्मीपुत्र असल्यामुळे ते सर्वात बिझी. सर्व सन्माननीय अतिथींचं तुतारी बितारी फुंकून जोरदार स्वागत करण्यात आलं. मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. शारदास्तवन, स्वागतगीत झालं. नकुल प्रास्ताविक करण्यासाठी उठला. प्रास्ताविकात त्याने माझं, माझ्या प्रतिभेचं (माझ्या पत्नीचं नावही प्रतिभाच…), माझ्या लेखनाचं इतकं कौतुक केलं, की त्या क्षणी मला वाटलं, ते भाषण टेप करून साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठकडे पाठवलं असतं, तर माझ्या लेखन कर्तृत्वाचा खोल ठसा परीक्षकांच्या मनावर उमटला असता. पण आता काय उपयोग? ‘‘अब पछताए होत क्या” नकुलच्या भाषणाच्या मधे मधे टाळ्यांचा वर्षाव होत होता. अर्थात् या टाळ्या भाषणासाठी नसून ज्याच्याविषयी भाषण चाललंय, त्या माझ्या लेखनाच्या प्रशस्तीसाठी होत्या, याबद्दल माझी खात्री होती. श्रोते मोठे उत्साही आणि चैतन्यपूर्ण दिसत होते.

अगदी त्याच क्षणी प्रेक्षकातून एक टोमॅटो आला. टप्पकन पुस्तकावर आपटला नि फुटला. प्रमुख पाहुणे पुस्तकाचे नाव जाहीर करण्यासाठी माईकपाशी पोहोचले आणि हे काय? कागदाचे बॉल्स, टोमॅटो, अंडी इ. एकामागून एक स्टेजवर येऊ लागलं. श्रोत्यात कुजबूज, गडबड आणि हळूहळू आरडा ओरडा सुरू झाला. पाहुण्यांनी श्रोत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण दंगा वाढतच चालला. कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं. सुबोध आणि नकुल श्रोत्यांमध्ये फिरून श्रोत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण सगळं अस्ताव्यस्त झालं. कुणी टाळ्या वाजवत होतं. कुणी स्टेजवर काही ना काही फेकत होतं. कुणी फेकण्याचा नुसताच आविर्भाव करत होते. कदाचित त्यांनी आणलेली सामग्री संपली असावी.

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले – त्याने एक निवेदनपत्रवजा जाहिरात आमच्या हातात ठेवली आणि आम्हाला आत जाऊन सुशीलाजींना भेटायला सांगितलं. इंटरकॉमवरून आमच्या येण्याची सूचनाही दिली. आता इथून पुढे )

आम्ही जाहिरात वाचली. त्यावर लिहिलं होतं, कोणत्याही प्रकारच्या उद्घाटन, समारोप, पुढाऱ्यांची भाषणे, साहित्य-विज्ञान-भूगोल-इतिहास, इ. विषयांमधील परिचर्चा, उद्बोधन वर्ग, काव्यगोष्टी इ. साठी सजग श्रोते भाड्याने मिळतील.

आम्ही आत सुशीलाजींकडे गेलो. तिला पाहताच वाटले, तिचे नाव सुशीलाऐवजी शिला असायला हवे होते. इतका दगडी नि निर्विकार चेहरा मी आजपर्यंत पाहिला नव्हता. आम्ही तिच्यासमोर खुर्चीवर बसलो. तिने विचारले, ‘‘कशा प्रकारच्या श्रोत्यांची आपल्याला अपेक्षा आहे?”

‘‘म्हणजे? त्यातही काही प्रकार आहेत?”

‘‘तर!”

‘‘म्हणजे?… कोणत्या प्रकारचे श्रोते आहेत आपल्याकडे?”

‘‘श्रोत्यांचे प्रकार म्हणजे… सामान्य श्रोते, खास, म्हणजे विशिष्ट श्रोते आणि अद्वितीय श्रोते!”

‘‘त्या सा-यांचे दर सारखेच…”

‘‘सारखेच कसे असतील?” शिला माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच म्हणाली, ‘‘प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत.” असं म्हणून ती उठली आणि कपाटातलं श्रोत्यांचं दरपत्रक काढून माझ्यापुढे ठेवलं.

दरपत्रकात प्रथम सूचना होती, ‘‘खालील दर प्रत्येकी तीन तासांसाठी आहेत.” त्याखाली श्रोत्यांचे दर दिलेले होते.

  • सामान्य श्रोता – ३ तास थांबणे ५ रु. + २ वेळा स्पेशल चहा + एक नाश्ता + १ जेवण

टीप – ३ तासांपेक्षा जास्त थांबावे लागल्यास दुपारचे वा रात्रीचे (वेळेनुसार) जेवण द्यावे लागेल.

  • खास श्रोता – ३ तासांसाठी ८ रु. + २ वेळा स्पेशल चहा + एक नाश्ता + १ जेवण

टीप – ३ तासांपेक्षा जास्त थांबावे लागल्यास प्रत्येक तासाला ४ रु.ओव्हर टाईम.

  • अद्वितीय श्रोता – ३ तासांसाठी १२ रु. + २ वेळा स्पेशल चहा + २ कोल्ड्रिंक (याच्या ऐवजी देशी चालेल) + १ गोडाचे जेवण + एक नॉनव्हेज जेवण

अद्वितीय श्रोत्यांच्या दराच्या खाली टीप नव्हती. त्याबद्दल सुशीलाजींना विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अद्वितीय श्रोते असतील, तर कार्यक्रम तीन तासांपेक्षा जास्त लांबू शकत नाही.”

अद्वितीय श्रोते असतील, तर कार्यक्रम तीन तासातच संपतो, म्हणजे आहे काय हा प्रकार? एव्हाना सुशीलाजींनी ऑर्डर नोंदवण्याचा फॉर्म पुढे ठेवला. नाव, तारीख, वेळ, समारंभ, स्थळ या सगळ्या गोष्टी लिहून झाल्यावर खालती मुद्दा होता, श्रोत्यांचा प्रकार. आता त्यातला फरक कळल्याशिवाय श्रोते बुक कसे करायचे?

सुशीलाजींना त्याबद्दल विचारलं आणि दगड मनुष्यवाणीने बोलल्याचा भास झाला. दगड म्हणजे, सुशीलाजी म्हणाल्या, ‘‘आम किंवा सामान्य” श्रोते म्हणजे असे श्रोते, जे खुर्चीवर बसून खुर्च्यांची शान वाढवतात. ते अधून मधून जागे असतात. अधून मधून झोप काढण्याचीही सवलत त्यांना दिलेली असते. पण समारंभ पूर्णपणे संपून वंदे मातरम् किंवा पसायदान होईपर्यंत ते खुर्ची सोडत नाहीत, हे महत्त्वाचं.”

‘‘आणि खास श्रोते?”

‘‘खास श्रोते खुर्च्यांवर केवळ बसून खुर्च्यांची शोभा वाढवतात असं नाही. तर ते अधून मधून टाळी वाजवतात. वहावा ! क्या बात है ! असे प्रशंसोद्गार काढतात. यांना जाणकार श्रोते असंही म्हणता येईल. हे श्रोते समारंभ सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जागे राहतात. झोपत नाहीत.”

‘‘आणि अद्वितीय श्रोते? ही काय चीज असते?”

‘‘अद्वितीय म्हणजे असे श्रोते, जे समारंभात वारंवार व्यत्यय आणतात. विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाची आमदार मंडळी जसा अधिवेशनाचा विचका करतात, तसं काही मंडळी समारंभाचा विचका करतात. त्यांना विध्वंसक श्रोते असंही म्हणता येईल. ते मधून मधून टोमॅटो, अंडी, कागदाचे बोळे व्यासपीठाच्या दिशेने फेकत असतात. मधेच हाSS हूंSS करतात. मधेच आरडा ओरडा करतात. सभा उधळून लावतात.”

‘‘अं… काय?” मी इतका चक्रावून गेलो. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.

‘‘या श्रोत्यांना जास्त डिमांड आहे. म्हणून त्यांचे रेटस् जास्त आहेत.”

‘‘बोला !… आय मीन लिहा त्या फॉर्मवर … कोणत्या प्रकारचे किती श्रोते आपल्याला हवे आहेत.”

मी सुबोधला घेऊन चर्चा करण्यासाठी बाहेरच्या बाजूला आलो.

‘‘मला वाटतं ५० सामान्य श्रोते बुक करावेत.”

‘‘गाढव आहेस! ” तसा मला केव्हाही काहीही म्हणायचा अधिकार सुबोधला आहेच आणि तो केव्हाही, कुठेही गाजवायची सवय सुबोधला आहे.

‘‘आता काय झालं?”

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं, – पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!” आता इथून पुढे )

‘‘करेक्ट! त्याशिवाय लेखकाचं नाव होणार कसं? आणि त्याचा वणवा जगभर पेटणार कसा?” हे तारे नकुलने तोडले.

‘‘नाही तरी पुस्तक छापण्यासाठी इतका खर्च केलाहेस, त्यात आणखी थोडी भर… म्हणजे भरल्या गाड्यावर फक्त आणखी एक सूप…” इति सुबोध.

‘‘खर्च मी कुठे केलाय. शऱ्यानं केलाय. मी त्याला फक्त पैसे उधार दिले.”

‘‘उधार… वाट बघ… पैसे परत मिळतील! नाही… ते परत मिळतील… नक्की मिळतील… पण मग तुला फक्त सुपाचाच खर्च… म्हणजे प्रकाशन समारंभाचा. पण तो झाला की तुझं नाव सुपाएवढं… सॉरी… आभाळाएवढं होईल की नाही? म्हणजे नाव आभाळाएवढं आणि काळीज सुपाएवढं…”

आता नाव आभाळाएवढं होईल, की सुपाएवढं, जेवढं केवढं व्हायचं असेल, तेवढं होऊ दे… पण विचार केला, तीस तिथे चाळीस आणि मित्रांच्या सूचनेला मान्यता देऊन टाकली.

प्रकाशन समारंभ करायचे नक्की ठरले, तेव्हा आमचे सारे दोस्त… सख्खे चुलत, मावस, मामे, आत्ये इ. इ. समारंभाचं स्वरुप नक्की करण्यासाठी पुढे सरसावले. खूपशी चर्चा, वाद, खडाजंगी, बरेचसे कप चहा, भजी, वडे आणि अन्य उपहार रिचवून झाल्यावर कार्यक्रमाचं स्वरुप निश्चित करण्यात आलं. समारंभाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशित करायचं ते पाहुणे यांच्या नावांबद्दल दोस्त मंडळींच्यामध्ये खूप मतभेद झाले. अखेर खडकमाळ साखर कारखान्याचे चेअरमन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरले. या संदर्भात, सरस्वती ही लक्ष्मीची बटीक असून, लक्ष्मी ज्याच्या घरात पाणी भरते, त्याच्या घरात सरस्वती ही आपोआपच पाणी भरते, हा संबंध एका दोस्ताने स्पष्ट करून सांगितला आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ख.सा.का. चे चेअरमन नक्की करण्यात आले. पुढे-मागे परिसरातील एक होतकरू लेखक म्हणून गणपती बिणपती उत्सवात छोटा-मोठा सत्कार निदान ख.सा.का. च्या वतीने होईल, हा विचार अगदी मनात आला नाही, असं नाही. विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकाच्या बॉडीवर असलेल्यांपैकी एका मेंबरला प्रकाशनासाठी बोलवावं, ही वश्याची सूचना. त्यामुळे कादंबरीचा निदान पक्षी त्यातील एखाद्या उताऱ्याचा क्रमिक पुस्तकात अंतर्भाव होण्यास मदत होईल, असे त्याचे मत. स्वागताध्यक्ष म्हणून एखाद्या खासदाराला बोलवावं, म्हणजे त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लव्याजम्यामुळे थोडासा का होईना मॉब वाढेल, असं आपलं मलाच वाटलं. अखेर त्या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ख.सा.का. चे चेअरमन आबासाहेब पाटील, स्वागताध्यक्ष खासदार नरदेव व प्रमुख पाहुणे म्हणून निर्मीती मंडळाचे सभासद प्रा.डॉ. कळंबे यांची अत्यल्प बहुमताने निवड करण्यात आली.

सकाळच्या सत्रात पुस्तक प्रकाशन, दुपारच्या सत्रात ‘‘आजची कादंबरी दशा नि दिशा” या विषयावर परिसंवाद हे नक्की झालं. निमंत्रण पत्रिकेत मात्र ‘‘दशा न् दशा” असे छापले गेले. रात्रीच्या सत्रात कविसंमेलन घ्यावे. कवी अनेक असतात. त्यामुळे अनेक जण समारंभास उपस्थित राहतील, अशी सूचना कवी म्हणून थोडंफार नाव मिळवू लागलेल्या नकुलने मांडली, पण अन्य मित्रांनी ती कल्पना फेटाळून लावली. कादंबरीचे प्रकाशन आहे, तर रात्रीच्या सत्रात कादंबरीचे अभिवाचन करावे, असे ठरले. कादंबरीवाचन परिणामकारक व्हावे, म्हणून आमच्या गावातील सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मनवापासून ते सुधीर गाडगीळ, तुषार दळवी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, श्रीराम लागू यांच्यापर्यंत नावे पुढे आली. आता ही माझी जानी मानी याने की जान घेऊन मान मोडू घातलेली दोस्त मंडळी मला केवढ्या खड्ड्यात पाडणार, की पाताळात गाडणार याचा अंदाजच मला बांधता येईना. कादंबरी वाचन मीच करेन, अगदी परिणामकारक… अगदी सुचवण्यात आलेल्या नावांपेक्षाही परिणामकारक, असं म्हणून मी चर्चेला पूर्णविराम दिला. अखेर कादंबरीचा जन्मदाता मी होतो ना… माझ्याइतका न्याय तिला दुसरं कोण देऊ शकेल?

प्रकाशन समारंभ पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला. मी एका संध्याकाळी सुबोधला म्हटलं, ‘‘समारंभाची रुपरेषा तशी ठीक आहे… पण?”

‘‘आता कसला पण?”

‘‘सगळ्या सत्रात श्रोत्यांची चांगली उपस्थिती असेल, तर समारंभ शानदार होणार ना? आज-काल असल्या सांस्कृतिक उपक्रमासाठी वेळ कुणाला आहे? जवळचे नातेवाईक, दोस्तमंडळी सगळ्यांच्या अडचणी त्याच वेळेत निघतात. कुणाच्याकडे अचानक पाहुणा टपकतो. कुणाकडे अगदी त्याच वेळी जवळचा कुणी तरी आजारी पडतो. श्रोतेच नसले, तर समारंभ शानदार होणार कसा?”

‘‘मी आहे ना! तू कशाला काळजी करतोस?”

‘‘तू एकटा काय करणार? त्या एखाद्या जादुई सिरिअलप्रमाणे एका सुबोधचे शंभर खुर्च्यांवर शंभर सुबोध बसवशील का?”

‘‘नाही! तसं नाही मी करू शकणार! पण शंभर खुर्च्यांवर शंभर श्रोते बसवण्याची व्यवस्था मी करू शकतो.”

‘‘असं? ते कसं?” आणि सुबोधने त्याची योजना विस्ताराने मला समजावून दिली. सुबोधचा एक दोस्त होता. त्याने म्हणे अलीकडेच एक एजन्सी उघडली होती. या एजन्सीद्वारे भाड्याने श्रोते पुरवले जायचे. ‘‘आपण आपल्या समारंभापुरते भाड्याने श्रोते आणूयात.” सुबोध म्हणाला.

‘‘झक्कास!” मी म्हटलं.

मी आणि सुबोध दुसऱ्या दिवशी एजन्सीत पोहोचलो. एजन्सीचं नाव होतं, ‘‘हेल्पलाईन फर्म.” सुबोधच्या मित्राची काही तिथे भेट झाली नाही. पण त्या फर्मच्या पी.आर.ओ. ने मोठ्या आदराने आणि विनम्रतेने आमचे स्वागत केले. सुबोध आमच्या समस्येबद्दल त्यांच्याशी बोलला. त्याने एक निवेदनपत्रवजा जाहिरात आमच्या हातात ठेवली आणि आम्हाला आत जाऊन सुशीलाजींना भेटायला सांगितलं. इंटरकॉमवरून आमच्या येण्याची सूचनाही दिली.

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अखेर माझे पैसे आणि सुबोध व नकुल या सख्ख्या नि वश्या व शऱ्या या चुलत दोस्तांची प्रेरणा, यामुळे माझी ‘‘मातीच्या चुली आणि वणवा” ही कादंबरी छापून झाली. अजून मुखपृष्ठ राहिलंय, पण चार दिवसांत मुखपृष्ठ घालून पुस्तक हातात ठेवीन, याची खात्री शऱ्यानं दिलीय. कादंबरी तळा-गाळातल्या लोकांवर म्हणजे त्यांच्या जीवन संघर्षावर आधारलेली आहे. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ इ. पुरस्कार मिळवण्यासाठी तशी पूर्वअटच असते, अशी खात्रीशीर माहिती वश्याने पुरवली. तो पुस्तकाचा वितरक आहे, तेव्हा त्याची माहिती खात्रीशीर असणारच, असं मानायला प्रत्यवाय नाही. वाचकांना वाचायला कितीही कंटाळा आला, तरी जीवनविषयक सखोल जाण प्रकट करणारं चिंतन त्यात असलंच पाहिजे, असा वश्याचा आग्रह. कविता, कथा या क्षेत्रात लुडबुड करता करता आता तो समीक्षक बनू घातला होता. आपल्या शब्दांना जाणकार लोकांच्यात वजन आहे, याबद्दल त्याची स्वत:ची खात्री होती व संधी मिळेल तेव्हा आमच्यासारख्या मित्रांना ही गोष्ट पटवण्याचा तो प्रयत्न करत असे. त्याचं ‘‘शब्दहरण” हे पुस्तक पुरस्कारांच्या रांगेत नंबर लावून आहे, असं तो म्हणतो.

तर असा आमचा शऱ्या. समीक्षा ही आपली जीविका आहे. पुस्तक प्रकाशन ही उपजीविका आणि ज्या सरकारी कचेरीत तो फायलींशी आणि संगणकाशी झटापट करत, दरमहा पाच आकडी पगाराचा चेक खिशात घालतो, ती आपली उप उपजीविका आहे, असं त्याचं म्हणणं. आजच्या प्रकाशन मंडळींच्या प्रथेप्रमाणे, तो नवोदितांची पुस्तके त्यांच्या पैशाने छापून देतो. वश्या वितरण व्यवसायात स्थिरावलाय. शऱ्याने छापलेली पुस्तके वितरणासाठी तो नवोदितांकडून घेतो. खपल्यावर पैसे देण्याच्या बोलीवर. अद्याप काही त्याने कुणाला पैसे दिल्याचे ऐकिवात नाही. पण त्याबद्दल कुणी फारशी तक्रार केलेलीही दिसली नाही. बहुदा पुस्तकांचे डोंगर आपल्या घरात पडून जागा अडण्यापेक्षा दुकानात बरे, असा विचार लेखक मंडळी करत असणार आणि अडलेल्या जागेचं भाडं मागत नाहीयेत, हेच आपलं नशीब असाही विचार करत असणार ही मंडळी… काही का असेना, पुस्तक विक्रीच्या रुपाने का होईना, पण केवळ साहित्यावर जगणारा आमच्या दोस्त मंडळीतला हा एकटाच.

तर शरदने म्हणजे शऱ्याने स्वखर्चाने माझी कादंबरी छापायची आणि वश्याने म्हणजे वसंताने ती विकायची जबाबदारी पत्कारली. प्रुफं तपासण्याची जबाबदारी सुबोधने उचलली आणि मुखपृष्ठ, मांडणी इ. इ. गोष्टीत स्वत: जातीने लक्ष घालायचे नकुलने मान्य केले. माझ्याकडे फक्त कादंबरी लिहिण्याचं किरकोळ काम आलं.

त्या दिवशी असं झालं, ‘‘टाईमपास” मध्ये अरबट चरबट खात आम्ही टाईमपास करत होतो. आम्ही म्हणजे, मी, नकुल, सुभ्या, वश्या, शऱ्या ही पंचकडी. वड्याचा एक मोठासा तुकडा तोंडात कोंबत शऱ्या एकदम म्हणाला,

‘‘पक्या, काही तरी झकास पकव ना!”

‘‘काय?” मी आणि वश्या किंचाळलोच एकदम.

‘‘तू एका साहित्य सम्राटाला स्वयंपाकी बनवायला निघाला आहेस?” इति नकुल.

‘‘तसं नाही रे बाबा! तुझ्या मेंदूत काही तरी नवीन पकव असं…”

‘‘पिकव म्हणायचंय का तुला सुबोध?”

‘‘तेच ते… पिकव काय? आणि पकव काय?…”

‘‘तेच ते कसं असेल? आधी पिकतं आणि मग पकतं… आणि म्हणे जाणकार समीक्षक…”

‘‘हे बघ, जे काय असेल ना, धान्य किंवा अन्न… व्यवस्थित पॅकमध्ये लोकांसमोर येऊ दे… फुटकळ नको…” ही सूचना अर्थात वसंत महाराजांची.

‘‘म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?”

‘‘म्हणजे फुटकळ लंगोटी पत्रातून किंवा साप्ताहिक मासिकातून नको. पुस्तकच काढलं पाहिजे… झकास… तू एक काम कर. एक कादंबरीच लिहून टाक ना!”

‘‘आणि?”

‘‘आणि काय विचारतोस भोटसारखं? ती एकदम छापून बाजारात आली पाहिजे!”

‘‘येऊ दे! येऊ दे!… मी असा फर्स्टक्लास डिसप्ले करतो ना! येणाऱ्याने थांबून बघितली पाहिजे… नुसती बघितली पाहिजे, असं नाही, तर विकतच घेऊन टाकली पाहिजे!”

‘‘ते सारं झालं! कादंबरीही लिहिली… फर्स्ट क्लास… छापणार कोण?”

‘‘काय आहे, पुस्तक छापलंच नाही, तर साहित्य ॲकॅडमी, ज्ञानपीठ, निदान येता बाजार, राज्य पुरस्कारापर्यंत पोचणार तरी कसा तू?” ही कळवळ नकुलरावांची.

मलाही ते पटलं आणि त्याच बैठकीत मी कादंबरी लिहायची, ज्ञानपीठाच्या, किमान साहित्य ॲकॅदमीच्या निदान पक्षी राज्य पुरस्काराच्या योग्यतेची, असं निश्चित करण्यात आलं. आता या साऱ्या पुरस्कारांचा विचार करू जाता, कादंबरीत शोषित वर्गाचे दु:ख, यातना, वेदना आणि काय काय ते उघडून दाखवणारी असावी, अनुभवाधिष्ठित असावी, जीवनाचा शोध घेणारी असावी… वगैरे… वगैरे… हे सगळं चौकडीनं ठरवून टाकलं आणि माझ्यासाठी अगदी सोप्पं काम (त्यांच्या मते) ठेवलं, ते म्हणजे तशा प्रकारची कादंबरी लिहिणे. थोड्याच दिवसात मी माझ्या कल्पनेने अनुभवाधिष्ठित कादंबरी लिहून टाकली, ‘‘मातीच्या चुली आणि वणवा.”

पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!”

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print