मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दोन ध्रुव… दोन वाटा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “दोन ध्रुव… दोन वाटा…☆ श्री जगदीश काबरे ☆

साताऱ्याच्या डोंगररांगेत वसलेलं एक खेडं – आंधळीवाडी. नाव तसं विचित्र, पण गाव वाईट नव्हतं. शेकड्याने शेतकरी, थोडे शिक्षक, काही गावसेवक, आणि दोन व्यक्ती ज्यांच्याभोवती गाव फिरत असे त्या होत्या गणू बाबा आणि राहूल मास्तर.

गणू बाबा गावाच्या मंदिराचा पुजारी. तो फक्त मूर्तीपूजक नव्हता तर, लोकांचा ‘आध्यात्मिक आधार’ होता. अंगात केशरी शाल, गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर भस्म. अर्धे गाव त्याला साक्षात देवदूत मानत असे. बायका त्याच्या पाया पडून प्रसाद घेत, आणि पुरुष त्याच्या सल्ल्याने जीवन जगत.

दुसरीकडे, राहूल मास्तर सरकारी शाळेतील तत्त्वचिंतक ध्येय्यासक्त शिक्षक, पंचविशीतच मास्तर झालेला. पण त्याचा अभ्यास थेट विद्यापीठातील विद्यावाचस्पतीसारखा! चार्वाक, बुद्ध, आंबेडकर, आणि विवेकानंद यांच्या ग्रंथांनी त्याचं ग्रंथालय समृद्ध होतं आणि गावात तात्विक चर्चा घडवून आणणं तो त्याचं कर्तव्य समजत होता.

गणू बाबा म्हणे, “श्रद्धा ठेवा, देव सर्व पाहतो आहे.”

राहूल मास्तर म्हणे, “विचार करा, मानव स्वतःचं भविष्य घडवू शकतो.”

गावात कोणतंही संकट आलं, की ही दोन मते समोरासमोर येत. एकदा पिकांवर किड पडली. तेव्हा गणू बाबा म्हणाला, “मृत्युंजय यज्ञ करू.” 

मास्तर म्हणाला, “कृषी अधिकारी बोलावू.”

लोक गोंधळले, पण बहुतेक वेळा जसा विचार मागे पडतो आणि धार्मिक भावना जिंकतात, तसंच यावेळीही झालं आणि वैज्ञानिक विचार मागे पडला. लोकांनी उत्साहाने यज्ञ केला. पण पिकावरील कीड काही गेली नाही. शेवटी कृषी अधिकाऱ्याला बोलवून योग्य त्या रसायनांची फवारणी केल्यावरच कीड गेली. अध्यात्म हरलं आणि विज्ञान जिंकलं. विज्ञानाची महती लोकांना कळली पण अजूनही गावकऱ्यांमध्ये धार्मिक पगडा मात्र घट्ट रुजलेला होता.

गावात एकदा गंभीर साथीचा रोग पसरला. मुलं तापाने फणफणली, वृद्धांना धाप लागली. गणू बाबा म्हणाला, “शिव अभिषेक करूया, रोग निघून जाईल. ”

राहूल मास्तर सरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात धावला, डॉक्टरांना घेऊन आला, आणि लसीकरण सुरू केलं.

पण त्याच्या या कृतीवर टीका झाली. “मास्तर देवावर अविश्वास दाखवतो”, “पाप ओढतो”, असं गावात बोललं गेलं. एकदा तर मंदिरासमोर त्याच्यावर राग व्यक्त करत, काही गावकरी म्हणाले, “हा नास्तिक गावाला अपशकुन आहे.”

राहूल मास्तर जखमी नजरेने पाहत राहिला. पण लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाने जागवण्याचे कठीण कार्य शांतपणे करत राहिला.

खरं पाहता, गणू बाबा आणि राहुल मास्तर दोघेही बालमित्र. लहानपणी एकाच विहिरीवर पोहायला शिकले, एकत्र अभ्यास केला, पण नंतर वाटा वेगळ्या झाल्या. गणूने वडिलांनंतर मंदिराचा कार्यभार हाती घेतला, आणि राहूल पुण्यात शिक्षणासाठी गेला.

गणू बाबा नेहमी म्हणत असे, “मी देवासाठी जगतो.”

राहूल म्हणत असे, “मी माणसासाठी जगतोय… माणसातच देव आहे असे मी समजतो.”

दोन ध्रुवावर दोघे आपण अशी दोघांची दोन टोकांची मते असली तरी त्यांच्या मैत्रीत अंतराय आला नव्हता. दर महिन्याला एकदातरी दोघं झाडाखाली असलेल्या टपरीत चहा घेत आणि गप्पा मारत. गणू बाबा त्याला म्हणे, “तुझं नास्तिकपण मला समजत नाही रे.”

राहुल मास्तर म्हणे, “तुझं आंधळेपण मला सहन होत नाही बाबा.”

… आणि दोघांनाही एकदम हसू फूटायचं.

ती रात्र मात्र गावासाठी काळरात्र ठरली. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता, ओढ्यानं पुर आलेल्या नदीसारखं रौद्र रूप धारण केलं होतं. गणू बाबाचं मंदिर अर्धं पाण्याखाली गेलं होतं, तर राहुल मास्तरचं घर मोडकळीस आलं होतं.

राहूल मास्तरने गावकऱ्यांना शाळेत नेलं. कारण शाळा उंचावर होती. त्याने प्रत्येक घरात जाऊन, पाण्यातून वाट काढत लोकांना बाहेर काढलं. पण गणू बाबा मंदिर सोडायला तयार नव्हता.

“माझा देव आहे इथे. माझी त्याच्यावर निष्ठा आहे. तोच वाचवेल, ” तो म्हणाला.

राहुल मास्तर त्याच्याजवळ गेला. “बाबा, निष्ठा असली तरी निसर्गापुढे शहाणपण चालत नाही. तू जर खरोखर देवावर श्रद्धा ठेवतोस, तर देवळातून बाहेर ये आणि गावातील माणसांना मदत कर. ” पण गणू बाबा काही हलेना. शेवटी, राहुल मास्तराने त्याला उचलून गाडीवर टाकलं आणि शाळेत घेऊन गेला.

पूर ओसरला. निसर्गाच्या प्रकोपात दोन शेतकरी मरण पावले होते. गाव विस्कळीत झालं होतं. पण लोकांनी एक गोष्ट अनुभवली की, गणू बाबा आता फक्त देवाच्या नावानं बोलत नव्हता. तो मास्तरबरोबर गावात फिरत होता. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगत होता, अन्नवाटपात मदत करत होता. राहूल मास्तरही आता देवावर टीका करताना लोकांना चिकित्सक प्रश्न विचारू लागला, आणि लोकांना विचार करायला भाग पाडत होता. श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते हे लोकांना तो वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देऊ लागला. तसेच निष्ठा ही फक्त विचारात नाही, तर कृतीत दिसावी लागते हेही लोकांना प्रत्यक्ष निसर्गाच्या प्रकोपात त्याच्या वागणुकीने दाखवून दिले.

एक दिवस दोघांनी गावात ‘विचारवेध संमेलना’चं आयोजन केलं. विषय होता – “श्रद्धा की निष्ठा? “

गणू बाबा म्हणाला, “माझी श्रद्धा मला संकटात आधार देत होती, पण लोकांसाठी धावून निष्ठा दाखवली राहूल मास्तराने. देवावरच्या माझ्या श्रद्धेमुळे मी जर त्या दिवशी हल्लो नसतो तर कदाचित निसर्गाचा प्रकोपात मेलोही असतो. पण राहुल मास्तरामुळे मी वाचलो. आता मी समजलो आहे की, केवळ देवपूजा नव्हे, तर माणसांची सेवा हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. देव माणसातच असतो हे आता माझ्या लक्षात आले आहे. ”

 राजू मास्तर म्हणाला, “मी नास्तिक आहे, पण भावना नाकारत नाही. गणू बाबासारखी देवावर श्रद्धा ठेवणारी माणसं जर कृतीशील झाली, तर त्यांच्या श्रद्धेला काही अर्थ प्राप्त होतो. तर्क हे शस्त्र असलं, तरी माणुसकीने जगणे हीच खरी वाट आहे. ”

 एके दिवशी दोघं पुन्हा त्याच झाडाखाली भेटले.

गणू बाबा म्हणाला, “मास्तर, तू नास्तिक असून देवासारखं वागतोस. ”

राजू मास्तर हसला, “… आणि तू देवभक्त असूनही सर्व माणसांशी माणसासारखं वागायला लागलायस! “

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव कुठे असतो ? — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

 

?जीवनरंग ?

☆ देव कुठे असतो ? — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा.. ” 

 “ मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यांच्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे? “) – इथून पुढे —- 

उत्सवाची तयारी जोरात सुरु होती, आधल्या रात्री लाईटची तोरणे पेटली तसेच आंब्याचे टाळ सगळीकडे लागले. वाडीतील प्रत्येक घरातील तरुण उत्सवाच्या तयारीसाठी हजर होता. घरात वाडीतील बायका जेवणाच्या मदतीसाठी आपल्या काखेत विळी घेऊन हजर झाल्या. काही बायका तांदूळ वेचत होत्या, काही पीठ मळत होत्या.. काही भाजी चिरत होत्या… काही नारळ फोडत होत्या.. खोबरे किसणे सुरु होते…

 देवघरात देवीचा मुखवटा पूजेसाठी तयार होता. फुलांनी सुशोभीत करणे सुरु होते. गंध, फुले, अगरबत्ती, कापूर सर्व तयार होते. फुले, वेण्या, तुळशी, बेल, दुर्वा सर्वकाही होते.

सर्व तयारी करून मंडळी रात्री उशिरा झोपली. सकाळी लवकर ब्राम्हण मंडळी येणार होती.. म्हणून सर्वाना पहाटे उठायचे होते.. पूजा आणि घरात जेवणाची तयारी.

पहाटे घरातील सर्व मंडळी उठली. जगदीशमामा पूजेच्या तयारीसाठी देवखोलीत तयार होता. मोठया भावाने अनंताने आंघोळ करून तो पूजेचे सोवळे नेसत होता, लहान भाऊ वसंताने पण आंघोळ केली आणि तो पण सोवळे नेसायला आला. चारही भटजी हजर झाले आणि पूजेची तयारी करू लागले. सर्व तयारी मनासारखी झाली, तसे मुख्य भटजी बोलले “यजमान..

तसा सोवळे नेसलेला अनंता देवखोलीत आला, तेवढ्यात वसंतांची बायको वनिता देवखोलीत आली आणि जगदीशमामाला म्हणाली..

“मामा, पूजा हे करतील.. यांना पण अधिकार आहे ना?

मामा तसेच भटजी तिच्याकडे पहात राहिले.

“अधिकार दोन्ही भावांका आसता.. पण ज्येष्ठ भाऊ असताना..

हे बोलणे ऐकून मोठया भावाची बायको अंजली आत आली..

“मामा, पूजेला माझा नवरा बसेल, कारण वडिलांनंतर मोठया भावाचा अधिकार.. त्याला शक्य नसेल तर दुसरा.. पण इथे मोठा भाऊ सोवळे नेसून तयार आहे, काय हो भटजी?

 भटजी गडबडीने म्हणाले “हो.. हो.. बरोबर आहे.. म्हणजे मोठा भाऊ..

“भटजीना काय विचारतेस? तू मोठी पैसेवाली ना.. त्याना मोठी दक्षिणा देत असशील म्हणून..

“मी भटजीना कधी दक्षिणा देत नसते.. हे मामाच देतात.. भटजी शास्त्राप्रमाणे बोलणार..

 हे मोठयामोठ्याने बोलणे ऐकून त्त्यांची आई बाहेर आली.

“जगदीश, काय झाला?

“दोन्ही भावांनी पूजेक बसण्याची तयारी केल्यानी.. वनिता म्हणता माझो नवरो पूजेक बसतलो..

“मोठया भावान पूजा करुची आसता.. तेव्हा अनंता तूच पूजेक बस.. सावित्रीबाई म्हणाली. तशी वनिता आणि वसंता रागाने बाहेर गेले.

पूजा सुरु झाली.. आत वाडीतील पंधरा बायका जेवण करण्याच्या गडबडीत होत्या.. एक एक पदार्थ शिजत होता.. सावित्रीबाई सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन होत्या.. बाहेर जगदीशमामा पूजेच्या ठिकाणी काय हवे काय नको ते पहात होते. हळूहळू गावकरी जमू लागले.

एवढ्या बायका पुरुष घरी आले होते पण वसंता आणि त्याची बायको वनिता कशात नव्हते. त्याना राग आला होता… पूजेला बसायची इच्छा होती. पण सर्वांनी मोठा भाऊ म्हणून…

“म्हणून त्त्यांची भरभराट होत असते, कळले काय? त्याना मोठया कंपनीत नोकरी.. ती मास्तरीण.. तिचा पोरगा हुशार… म्हणून ती भांडत आली.. माझा नवराच पूजेला बसणार.. पण यावेळी मागे हटायचे नाही.. देवी आपल्यच घरी न्यायची.. ती परत हट्ट करेल.. पण ऐकायचे नाही..

वनिता आपल्या नवऱ्याला सांगत होती.

घरी पूजा झाली.. मग महा आरती.. मग महाप्रसाद… सायंकाळ पर्यत लोक जेवत होती आणि आपसात बोलत होती..

” या देवीचो या गावातलो शेवटचो उत्सव.. आता देवी मुंबईक जातली.

आता यापुढे उत्सव मुंबईक..

गावातल्या स्त्रिया भावुक झाल्या होत्या… मंदा काकू सांगत होती

“माजा चेडू अभ्यासात मागे व्हता.. या देवीक नवस बोललयय.. पुढच्या वरसा पासून कधी नापास झाला नाय..

संध्या सांगत होती”माझो नवरो दारू पी, मी देवीक नवस बोललंय.. तेची दारू सुटली.

प्रत्येक बाई आपला अनुभव सांगत होती. सावित्रीबाईना नमस्कार करत होती.

सावित्रीबाई पण भावुक झाल्या होत्या.. आता देवी मुंबईला चालली, म्हणजे आपण पण मुंबईक.. पुढचे देवीचे उत्सव मुंबईत. आपण लग्न करून आलो या गावात त्या दिवसापासून या गावात आणि या घरात राहिलो.. आता देवी आणि आपण.. दोघेही…

देवीचा उत्सव झोकात पार पडला.. आता देवी चालली मुंबईला म्हणून अनेकांचे डोळे पाणावले.

दुसऱ्यादिवशी विसर्जन करून उत्सव संपला.

सावित्रीबाई, जगदीशमामा, दोन भाऊ आणि त्यान्च्या बायका एकत्र बसल्या. मामा म्हणाले 

” तुमी दोघांनी देवीचा रुपडा मुंबईक न्यायचा असा ठरविलात.. पण मुबंईत खय? दोघांची दोन घरा आसात आणि तुमची आई.. तिका पण न्हेवक व्हया.

“मी मागेच सांगितले आहे, देवी माझ्याकडे आणि आई वसंताकडे.. माझी मोठी जागा..

“तुजी मोठी जागा.. मोठी जागा.. देवीला जागा कितीशी लागते.. एक फूट फळी ठोकली की देवी राहते.. बाबा गेल्यापासून तू देवींची पूजा करत राहिलास म्हणूंन तुला दिवस बरे आले.. आता मला तिची सेवा करू द्या.. माझे पण दिवस बरे येउदे.

तेवढ्यात अनंताची बायको मध्ये बोलली “देवी आम्हीच नेणार.. तिचा वार्षिक उत्सव करावा लागतो.. त्याचा खर्च किती होतो माहित आहे काय? काल उत्सव झाला, त्याला तीन लाख खर्च आला.. दरवर्षी आम्हीच खर्च करतो.. एक रुपया तरी देता काय देवीला? नुसती देवी नेतो.. देवी नेतो..

काय चालवलंय.. त्यापेक्षा आईला न्या तुमच्याकडे.

वनिता आता चिडली आणि बोलू लागली “म्हातारी आई आमच्या कपाळी आणि देवीचा मुखवटा तू नेणार.. कशी नेतेस ते बघते मी.. हात लाऊन बघ त्या मुखवट्याला….

“अग जा ग.. तुझा बाबा खाली आला तरी मला कोण थांबवू शकणार नाही.. चला हो.. घ्या तो मुखवटा.. अनंता आणि अनिता पुढे झाले आणि मुखवटा उचलू लागले तसा वसंता पुढे झाला आणि त्याने मोठया भावाला ढकललं… वसंता खाली पडला आणि देवीचा मुखवटा खाली पडला आणि मुखवटा मोडला.

 मघापासून दोन्ही मुलांचे बोलणे ऐकणारी त्त्यांची आई भडकली. चिडून म्हणाली..

“, चालते व्हा.. चालते व्हा.. माझ्या डोळ्यासमोर रवा नकात..

आई खाली वाकली आणि तिने खाली पडलेल्या देवीच्या मुखवट्याला उचलले. आता जगदीशमामा बोलू लागले..

“मघापासून गप्प रवान बघतय.. तुमका दोघांका देवीचो मुखवटो होयो कारण कोणी तरी सांगितलं म्हणे ज्या घरात देवींची पूजा होता, त्या घराची भरभराट होता.. म्हणून दोघांका देवी होई पण म्हातारी आई नको.. अरे मुर्खानो.. तुमका देव.. देवी म्हणजे काय कळलाच नाय.. अरे अशी तांब्याची नायतर पितळेच्या देवी साठी भांटतात आणि ही रक्तामासाची आई ही देवी तुमका नको? चालते व्हा.. चलत रवा.. ह्या देवीचो मुखवटो तुमका दोघांका मिळाचो नाय.. जा..

 आईने आणि मामानी पण देवीचा मुखवटा मिळणार नाही, हे सांगताच दोघे आपल्या पत्नीसोबत बाहेर पडले.

 सावित्रीबाई डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या. जगदीश मामा तिला म्हणाले

“ताई, तूझ्या झिलंका खरी देवी कोण ह्या कळलाच नाय… अरे मेल्यानू.. खरी देवी तुमी विसरलास.. आणि त्या मुखवट्याचो मुको घेवंक धावतास.. ताई, घाबरा नको.. तुजा हक्काचा माहेर आसा.. तुज्या माहेरक काय कमी नाय.. धान्यगोटो आसा.. दूधदुभाता आसा.. मानसा आसात.. उचल तो देवीचो मुखवटो आणि चल माझ्याबरोबर….

– समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ देव कुठे असतो ? — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ देव कुठे असतो ? — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

सावित्रीबाई घाईत होत्या. देवीचा उत्सव जवळ आला होता.. त्याना एकटीला एवढी तयारी करायची होती.. मदतीला त्त्यांचा भाऊ जगदीश येतो दरवर्षी, पण त्याचा संसार मोठा, वीस गुर होती गोठ्यात, शेती मोठी शिवाय आंब्याच्या बागा.. घरी गाडीमानस रोज.. त्याचे दोन मुलगे, सुना सर्वजण राबत होती म्हणून.. तरी ताईच्या मदतीला जगदीश येतोच.

सावित्रीबाईचें दोन मुलगे अनंता आणि वसंता. दोघेही मुंबईत. अनंता फायझर मध्ये चिकटला, त्याचा पगार, बोनस मोठा.. शिवाय त्याची बायको अंजली शाळामास्तरीण. त्याला एक मुलगा.. अनंताचा मोठा ब्लॉक मुलुंडमध्ये. शिवाय चारचाकी गाडी, घरी एसी वगैरे.

वसंता एका स्कुलबसवर ड्रायव्हर, त्याची बायको वनिता कपड्याच्या दुकानात कामाला. त्याना दोन मुली. मुंब्राच्या चाळीत संसार. सतत ओढातांड पैशाची. त्यामुळे सतत भांडण नवराबायकोमध्ये.

सावित्रीबाईंनी ऐशी पार केलेली, आता पाय गुढगे कामातून गेलेले, नजर कमी झालेली, ऐकू कमी येऊ लागलेले. घरवाले गेले त्यापासून एकटी राहिलेली.. त्यामुळे जेवण करायचा आळस, त्यामुळे खाणे कमी. त्यामुळे अंगात ताकद कमी झालेली. भाऊ जगदीश किंवा त्याचे मुलगे अधूनमधून यायचे.. घरी केलेले माशाचे कालवण आणुन दयायचे.. मग त्या दिवशी त्या भात शिजवायच्या आणि दोन घास जेवायच्या.. बाकी दिवशी चहा आणि दोन बिस्किटे यावर दिवस काढायच्या.

त्यान्च्या भावाला जगदीशला ताईची काळजी वाटायची, तो ताईला आपल्या घरी चल असं म्हणायचा. पण सावित्रीबाईना ते योग्य वाटायचे नाही. एकतर रोज देवींची पूजा करायची असायची आणि वर्षातून एकदा देवीचा उत्सव असायचा.

तो माघ पौर्णिमेचा देवीचा उत्सव म्हणजे त्या गावची शान होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या दिवशी देवींची पूजा व्हायची. चार ब्राम्हण चार तास पूजा करायचे… मग महा आरती दोन तास चालायची. मग देवीचा प्रसाद.. तो प्रसाद घयायला लोक गर्दी करत. सायंकाळी बायका ओटी भरायला येत.. गाऱ्हाने घालत. रात्री भजने होत.

सावित्रीबाईंचे दोन्ही मुलगे मुंबईत. त्याना आधी यायला जमायचे नाही. कसेबसे आधल्या रात्री येऊन पोचत. त्त्यांचा नवरा होता, तोपर्यत त्याना काळजी नसे, , पण आता थकायला झाले.. एकदिवस त्या आपल्या भावाशी बोलायला लागल्या..

“जगदीशा, माका आता झेपणा नाय रे.. डोळ्यांनी धड दिसणा नाय.. हे दोघे झील आधल्यादिवशी येतले.. पुढे पुढे या देवीचो उत्सव कसो होतलो?

“, मी इचारतंय अनंताक.. काय तरी मार्ग काढुक होयो.

दुसऱ्यादिवशी जगदीशमामाने भाच्याला म्हणजे अनंताला फोन लावला..

“अनंता, तुझी आई आता थकली रे.. वय झाला ना.. आता तूझ्या आईचो आणि देवीच्या उत्सवाचो काय तरी विचार करा.. तुम्ही दोघांनी.

“होय मामा.. आता आई थकली.. देवीच्या पूजेचो पण प्रश्न आसा.. आणि वार्षिक उत्सव पण. देवींची पूजा बंद होता नये.. या देविमुळे आमच्या कुटुंबाची भरभराट झालीया.. यंदा गावक देवीचो उत्सव करूया आणि पुढच्या वर्षीपासून माझ्या घरी मुलुंडमध्ये… “

“आणि आई तुझी.. तिका आता झेपत नाय रे.. तिका पण घेऊन जा.

“मी अंजलीक विचारून सांगतय.. नायतर आई वसंताकडे रवात.. थोडे दिवस माझ्याकडे रवात.

“काय ता ठरवा.. मी वसंताक पण फोन करतय..

असं म्हणून जगदीशमामांनी फोन खाली ठेवला.

जगदीशमामाने वसंतला फोन लावला..

“वसंता, यंदा उत्सवाक इलास काय देवीच्या पूजेचो, वार्षिक उत्सवाचो आणि आईचो प्रश्न मिटवूक होयो. तुझी आई आता थकलीया.. तिका दिसत नाय.. कानाने व्यवस्थित ऐकू येना नाय.. अनंताक फोन केल्लय.

“मग काय म्हणता माझो दादा? तो पैसोवालो आसा.. तेची जागा मोठी आसा.. मी चाळीत दोन खोल्यात रवतंय..

“पण दोघांनी काय ता ठरवा.. अनंता म्हणालो मी देवी माझ्याकडे नेताय.. आईक वसंता नेता काय विचारा..

“माझी जागा केदी? माझे दोन मुली..

“बरा बरा.. तू इलंस उत्सवक. मग बोलूया.

अनंताने भावाला फोन केला आणि दोन्ही भावांनी गावच्या घरातील देवी मुंबईला आणायचे ठरविले. मग दोन्ही भावांनी जगदीशमामाला फोन करून हा निर्णय सांगितला. मामा आपल्या ताईकडे आला आणि तिला म्हणाला 

“ताई, तूझ्या दोन्ही झिलांनी फोन केल्लो, दोघांचा मत देवी मुंबईक नेऊया, कारण रोजची पूजा कारणा आसाच पण येदोमोठो वार्षिक उत्सव, तेची तयारी करुची तुका जमाचा नाय.. तेंका तयारीसाठी लवकर गावक येना जमणा नाय आणि दुसरा महत्वाचा म्हणजे या घर पण पडाक झाला, एकतर दुरुस्थ करूंक होया, नायतर नवीन बांधूक व्हया.. त्यापेक्षा देवी मुंबईक नेणा बरा. देवी बरोबर तू पण झिलाकडे जा.. झील, सुनो, नातवंडा यांच्यात म्हातारपण घालवशीत.

“होय बाबा.. आता झेपणा नाय.. आता नातवंडाबरोबर पुढचा आयुष्य..

सगळ्या गावात बातमी पसरली. खानोलकरा देवी मुंबईला नेत आहेत, त्यामुळे यावर्षीचा या गावातील शेवटचा देवीचा उत्सव. सगळ्या गावाची विशेषतः महिलांची या देवीवर श्रद्धा होती, त्या श्रद्धेने देवींची ओटी भरत, तिला नवस बोलत.

जगदीशमामाला माहित होते, या गावातील देवीचा शेवटचा उत्सव, हे लोकांना कळले आहे, त्यामुळे यावर्षी गर्दी होणार, म्हणून त्यानी आपल्या मुलाला सांगून मंडप उभा केला. चारही बाजूला पताका लावल्या, इलेक्टिक तोरणे लावली. मुख्य रस्त्यापासून घरापर्यत वाट सारवली.. सारं घर शेणाने सारवले.. रांगोळ्या घातल्या. मग देवीच्या पूजेची तयारी. देवीचा मुखवटा रंगवून घेतला.. देवघराची झाडलोट केली.. रंग काढला.

एक दिवस आधी अनंता आणि त्याची बायको आली. आल्या आल्या अनंताने घरात काय काय हवे आहे, त्याचा अंदाज घेतला, तसे जगदीशमामाने बहुतेक सर्व तयारी केली होती, किराणा सामान, पंचे, केळीची पाने तयार होती. अनंताने कुडाळला जाऊन फुले, वेण्या आणल्या आणि तो पूजेसाठी येणाऱ्या भटजीना भेटायला गेला.

वसंता आणि त्याची बायको वनिता दुपारी आली. थोडे खाऊन ती दोघे वाडीत आमंत्रण द्यायला गेली. प्रत्येक घरी जाऊन उद्या देवीच्या उत्सवाला या, असे आमंत्रण देत होती. राजाभाऊ हे त्यान्च्या वडिलांचे मित्र. वसंतला पहाताच ते म्हणाले..

“काय आता हो शेवटचो उत्सव देवीचो गावातलो..

“होय काका, आईक आता जमणा नाय.. तिचा वय झाला.. ह्या उत्सवाची तयारी मोठी… जगदीशमामाचा पण वय झाला… मामा म्हणाले, तुम्ही आता ही देवी तुमच्याकडे न्या, कारण तिची रोज पूजा होऊक होयी आणि हो उत्सव सुद्धा..

” मामाचा बरोबर आसा.. पण वसंता.. तुका एक सांगतय.. मी तूझ्या बाबाचो दोस्त.. ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीचो अवतार.. तुजा पणजोबानी काशी हुन घरात आणलेली. जो हेची पूजा करीत आणि ज्या घरात हिची पूजा होईत, त्या घराची ही देवी भरभराट करतली. तुज्या पणजोबाकडे काय व्हता? भिकारी होतो.. पण देवींची पूजा करूंक लागलो आणि परिस्थिती बदलली.

काकांचे हे बोलणे ऐकून वसंतांची बायको चमकली. तिने नवऱ्याला खुणा केली.. चला म्हणून.

वसंता बाहेर पडला तशी वनिता पण त्याच्यासोबत बाहेर पडली. ती नवऱ्याला म्हणाली 

“ऐकलेत ना.. काका काय म्हणाले ते.. जो कोण या देवींची पूजा करेल आणि ज्या घरात ही देवी असेल, त्या घराची भरभराट होईल.. तुमचे बाबा गेल्यापासून तुमचा मोठा भाऊ दरवर्षी पूजा करत आलाय.. तरीच त्त्यांची परिस्थिती एकदम टॉप.. चार खोल्यांचा ब्लॉक, मोटर.. आता या वर्षी तुम्ही पूजा करा आणि देवी आपल्या घरी नेऊया आणि तुमची आई तुमच्या भावाकडे….

“अग पण.. तो मोठा आहे ना.. त्याचाच मान असतो पूजा करण्याचा.

“पण यावर्षी तुम्ही पूजा केलीत तर काय होईल? मी सांगते मामांना.. यावर्षी आमचे हे पूजेला बसतील म्हणून. आणि देवी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी न्यायची… तरच आपली परिस्थिती सुधरेंल.. मला पण ब्लॉकमध्ये राहायचय.. माझ्या मुलींना चांगले नवरे मिळायला हवेत…

“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा..

” मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यान्च्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे?

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुतम कथा : मातृधर्म / रेस / अधिकार आणि कर्तव्य – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुतम कथा : मातृधर्म / रेस / अधिकार आणि कर्तव्य – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

(१) – मातृधर्म

“कोणाचा फोन होता हो? “

“संजयचा होता. थोड्या दिवसांसाठी आईंला घरी घेऊन जाईन, म्हणत होता. त्यांची कामवाली बाई काम सोडून गेलीय. मुलांना बघायला कोणी नाही. “

” म्हणजे आईंना आता कामवाल्या बाईच्या जागी आमंत्रण आलं आहे. यांची मुलं मोठी होतील, तेव्हा आईंची गरज संपेल. त्यानंतर काय? वृद्धाश्रम…! आई माझ्या सासूबाई असतील, पण मला त्या सख्ख्या आईपेक्षाही जवळच्या आहेत. जवळपास पंधरा वर्षं त्या आपल्याबरोबर आहेत. आतापर्यंत कुठच्याही दिराला त्यांची आठवण नाही झाली. माझी काही असहाय्यताही नाही, की मी आईंना कामवाल्या बाईच्या जागी काम करायला पाठवीन. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना आपल्याजवळच ठेवीन. “

“रंजन, तू जॉब करत नाहीस; पण त्या दोघी तर नोकरीवाल्या आहेत ना! त्याही अडलेल्या आहेत! तू कशाला कीस पाडत बसतेस? संजयच्या घरी जायचं की नाही, हा निर्णय आईने घ्यायचा आहे. शेवटी धाकटा मुलगा आणि सुनेच्या हक्काचाही प्रश्न आहे! “

“ठीक आहे. पण इतक्या वर्षांत कोणत्याही दिराने दोन-चार दिवसांसाठी म्हणूनही स्वतःच्या घरी नेलं नाही त्यांना. आज कामवाली बाई नाहीय, तेव्हा त्यांना आई हवी. बाई मिळाली की आईला परत पाठवणार. हे तर मलाही लागू पडतं ना..! उद्या माझी मुलं मोठी होतील, तेव्हा तर प्रोफेशनल सुनांचा जमाना आलेला असेल. जोपर्यंत गरज असेल, तोपर्यंत ठेवतील. त्यानंतर आमची रवानगी वृद्धाश्रमात होणार. आपल्या शरीरात बळ आहे, तोपर्यंत आपल्याकडे लोक आपला हक्क मागतात. पण त्यानंतर काय? याला विवशता म्हणायचं की फालतू विचार? “

दरवाजाआड उभी असलेली आई सगळं ऐकत होती. ‘या काळात सासूच्या बाबतीत असे विचार करणारी सून मिळणं, हे माझ्या सत्कर्मांचं फळ आहे. ‘ स्वतःच्या तन-मनाचा सन्मान झाल्यासारखं वाटलं तिला. बाहेर येऊन तिने मोठ्या सुनेला जवळ घेतलं. तिचा मुका घेतला.

“बेटी, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण हाताची सगळी बोटं सारखी नसतात. मी आई आहे ना…! “

आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती धाकट्या मुलाच्या-संजयच्या- घरी जायची तयारी करायला लागली.

मूळ हिंदी कथा : माँ का धर्म

♥ ♥ ♥ ♥ ♥

(२) – रेस – – – 

शाळेत स्पोर्ट्स डेचा शेवटचा दिवस होता. पुरस्कारवितरणही त्याच दिवशी होणार होतं. म्हणून काही पालकही तिथे उपस्थित होते.

नववीच्या रेसला सुरुवात झाली. सर्व स्पर्धक जीव तोडून धावत होते.

अंकित रेस जिंकला. तो जलद धावायचा. गरीब घरातून आला होता तो. तो जिंकल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला.

पण मंथन स्पर्धेत सहभागी असूनही धावलाच नाही. सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटलं.

“मंथन, यू आर बेस्ट रनर! धावला का नाहीस? काही प्रॉब्लेम आहे का? ” स्पोर्ट्स टीचरनी विचारलं.

” मी एकदम ठीक आहे, सर. रेसमध्ये भाग घ्यायची माझी मुळीच इच्छा नव्हती. मम्मी-पापांच्या दबावामुळे मी फिल्डमध्ये उभा राहिलो. बस्स…! “

” पण तू धावण्याचा प्रयत्नही केला नाहीस. इट्स व्हेरी बॅड! तुझे मम्मी-पापाही आले आहेत. किती वाईट वाटलं असेल त्यांना! मी खात्रीने सांगतो, तू धावला असतास, तर रेस जिंकला असतास. “

“जिंकलो असतो, तर काय झालं असतं? एक ट्रॉफी, प्रशस्तिपत्र किंवा पुरस्कार मिळाला असता. मला मानसिक शांती हवीय! चार वर्षांचा होतो, तेव्हापासून मी वेगवेगळ्या, अगदी कुठच्याही रेसमध्ये धावतोय. कधी गायन, कधी वादन, कधी स्विमर, ऍक्टर, क्रिकेट, ज्युडो-कराटे, चित्रकार, डॉक्टर, इंजिनिअर… आज हे, तर उद्या ते. रोज नवी स्वप्नं, नवी आव्हानं, नवे क्लास…! मम्मीच्या मैत्रिणींची मुलं जे जे करतात, ते सगळं मला करावं लागतं. माझी इच्छा आहे की नाही…. , नो वन केअर्स! ‘इट्स कॉम्पिटिशन टाईम’ म्हणत माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं. आता मला काहीही बनायचं नाहीय. इट्स फायनल! ” छातीवर लावलेला स्पर्धकक्रमांकाचा बॅच काढून त्याने फेकून दिला आणि तो ग्राउंडवर आडवा पडला. त्याच्याकडे बघून वाटत होतं, ज्वालामुखीतून लाव्हारस उसळतोय.

चौदा वर्षांच्या मंथनच्या मुखातून निघालेलं ते गंभीर बोलणं ऐकून सगळे लोक अवाक झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.

अंकितने हात देऊन त्याला उठवलं आणि म्हटलं, “मंथन, मला माहीत आहे, तुला मला जिंकू द्यायचं होतं ना? “आणि त्याने आपल्या गळ्यातलं मेडल काढून त्याच्या गळ्यात घातलं.

“नाही दोस्ता, आंधळ्या स्पर्धेच्या या युगात वाट चुकलेल्या माझ्या मम्मी-पापांचे डोळे उघडण्याचा मी प्रयास करत होतो. आता मी तेच करणार, जे मला आवडतं, “असं म्हणत मंथनने जीवनातला नवा संरक्षक पवित्रा घेतला.

मूळ हिंदी कथा :रेस

♥ ♥ ♥ ♥ ♥

(३) – अधिकार आणि कर्तव्य

मुंबई सेंट्रलच्या बसस्टॉपवर खूप वेळ उन्हात उभी राहून ती तापली होती. अधूनमधून घाम पुसत मोबाईलवर मेसेजही पाठवत होती. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. ती चिडून बोलली, “एवढी काळजी आहे, तर गाडी घेऊन मला न्यायला का नाही आलास? मी उडत तर येऊ शकत नाही. बससाठी थांबलेय. बस कधी येणार, हे माझ्या हातात आहे का? “

तेवढ्यात समोरून बस आली. फोन बंद करून ती बसमध्ये चढली. खूप गर्दी होती. एकही सीट रिकामी नव्हती. त्या गर्दीतून वाट काढत ती पुढे गेली आणि तिने महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर नजर फिरवली. तिने बघितलं, की एका आरक्षित सीटवर एक वृद्ध महिला व एक वृद्ध पुरुष बसले होते. जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना एवढ्या प्रेमाने बोलताना पाहून बसमध्ये बसलेल्या अर्चनाला खूप छान वाटलं. नाहीतर वयाच्या या टप्प्यावर एकमेकांशी हसतखेळत मित्रत्वाने गुटर्रगू करणारी जोडपी कमीच असतात.

ती मुलगी पुढे गेली आणि म्हणाली, “अंकल, ही लेडीज सीट आहे. तुम्ही उठा. “

हे ऐकल्यावर दोघं चकित झाले. त्या तरुण मुलीच्या नजरेतला राग बघून ते वयस्क गृहस्थ म्हणाले, “होय बेटी. मला माहीत आहे. पण आम्ही चढलो, तेव्हा हीच सीट रिकामी होती. म्हणून एकत्र बसलो. हरकत नाही. मी उठतो. तू इथे बस. “

ते उठू लागले, तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली, “अहो, तुम्हाला बरं नाही. तुम्ही बसा, मी उठते. ” आणि त्या वृद्ध महिलेने आपली सीट त्या मुलीला दिली. सुरक्षित अंतर सोडून ती मुलगी सीटवर बसली. आता ती सतत फोनवर ‘त्याच्या’शी बोलत होती. तेव्हा समोरच्या सीटवर बसलेली अर्चना उठली आणि त्या वृद्ध महिलेला आपली सीट देत बोलली, “आई, तुम्ही इथे बसा. अतिजागृत महिला आता आपला आरक्षणाचा अधिकार बजावायला शिकल्या आहेत. ” शेजारी बसलेले लोक हसले. उगीच राईचा पर्वत व्हायला नको, म्हणून कंडक्टर पुढे गेला आणि ‘तिकीट-तिकीट’ म्हणून ओरडायला लागला.

या सगळ्याचा पत्ताच नसलेली ती मुलगी फोनवर आपल्या मित्राशी रोमान्सभऱ्या गप्पा मारण्यात गढली होती. ती साफ विसरून गेली होती, की आयुष्यात अधिकाराच्या जोडीने कर्तव्यंही बजावायची असतात!

मूळ हिंदी कथा : अधिकार और कर्तव्य

♥ ♥ ♥ ♥ ♥

मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीची किंमत… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ माणुसकीची किंमत… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

अमेरिकेतल्या एका आडबाजूच्या शहरातील आडबाजूला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्या वेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का? ’ त्या म्हाताऱ्या आजीबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रूम शिल्लक नाही. ’ त्या निग्रो तरुणाने सांगितले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणू काही त्याचा अपराध असावा.

‘बघा ना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल. ’ म्हातारबुवा म्हणाले.

थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खिशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघून गेला.

थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजूड बॅग काढत असताना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.

‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा! ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘तू कुठे झोपणार? ’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट! ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालू करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.

‘किती पैसे झाले? ’ त्या आजोबांनी वरचारले

‘पैशांचे आपण नंतर बघू. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो. ’ असे सांगून तो निग्रो तरुण पॅन्ट्री मध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

‘किती पैसे द्यायचे? ’ त्या म्हातारबुवांनी ब्रेकफास्ट झाल्यावर विचारले.

‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत. ’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहिले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडून पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

.. तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातून काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातून हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकीत आणून ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो. ’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही बाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरून आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का? ’ आजोबांनी विचारले.

‘थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल. ’ म्हातारबुवांनी बघितले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.

आजीबाईं त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे. ’

‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या! ’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघितला. ‘ओ कॅफे’ हॉटेलचे लेटरहेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकित होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असायची.

ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्यूला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्ह्यूला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इंटरव्ह्यूचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिनमध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.

चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नी लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत. ’ ते आजोबा म्हणाले.

‘त्या दिवशी रात्री तू आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही. ’ आजीबाई म्हणाल्या

‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तू आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का? ’ ओ किफे साहेब म्हणाले.

‘जनरल मॅनेजर? ’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण— ‘

‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे. ’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले,

‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारसे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजले. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो. त्यात तू उत्तम मार्काने पास झालास. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तू नुसताच प्रामाणिक माणूस नाहीस तर उत्तम कॅरॅक्टर असलेला माणूस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणून तुझे स्वागत असो! ’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.

कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण मोलाची किंमत मिळते.

– – (एका सत्य घटनेवर आधारित) – – 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नागरिक शास्त्र…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “नागरिक शास्त्र…” ☆ श्री मंगेश मधुकर

संध्याकाळची वेळ, हॉलमध्ये आजी टीव्हीमध्ये तर ममा आणि राही मोबाइलमध्ये गुंग. दारावरची बेल वाजल्यावर राहीनं दार उघडलं.

“हाय!! बेबी डार्लिंग” प्रसन्न हसत पपा घरात आले. आतमध्ये अंगावर येणारी शांतता होती. ममाकडे पाहिल्यावर काहीतरी घडल्याचं पपांच्या चटकन लक्षात आलं.

“काय झालं”

“तुमच्या लेकीला विचारा”

“मी काय केलं” राही 

“आज स्कूलमधून फोन आला होता.”

“हा ते होय. मला जे वाटलं ते केलं. तुला चिडायला काय झालं. ”राहीच्या बोलण्यावर ममा भडकली.

“एक मिनिट. नक्की काय प्रकार आहे ते सांग” पपा.

“मागच्या आठवड्यात वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं बक्षीस मॅडमनी परत केलं.”

“का?” पपा मोठ्यानं ओरडले.

“हळू, एवढं रिऍक्ट होण्यासारखी मोठी गोष्ट नाहीये. ”

“तुझ्यासाठी नसेल पण आमच्यासाठी आहे. लेकीचं पहिलं बक्षीस, फार अभिमानाची गोष्ट आहे” ममा 

“पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवलं म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. तू सुद्धा खूप मेहनतीनं विषय मांडला आणि एकदम हा टोकाचा निर्णय.” पपा.

“कुठल्या धुंदीत होती काय माहिती?” ममा 

“ममा, उगीच काहीही बोलू नकोस”

“राही, बेटा तू चुकलीस. बक्षीस परत करण्याआधी आमच्याशी बोलायला हवं होतं. ”पपा.

“त्यानं काय झालं असतं”

“असं का बोलतेस.”

“राग येईल पण स्पष्टच सांगते की तुमच्यामुळेच मी प्राइज परत केलं. ”

“काय? ”ममा आणि पपा एकदमच ओरडले.

“हो”

“आम्ही असं काय केलं जे आम्हांलाच माहिती नाही. ”पपा 

“हो ना. आजकाल फार चुरुचुरू बोलायला लागलीयं”ममा.

“एक मिनिट, राही नक्की काय झालं म्हणून हा निर्णय घेतलास. आमच्याकडून काही चूक घडली असेल तर सांग. ” पप्पानी विचारलं पण राही काहीच बोलली नाही. ममा-पपा पुन्हा पुन्हा विचारत होते. राहीनं आजीकडे पाहील्यावर तिनं नजरेनंच बोलण्याची खूण केली.

“प्राईज मिळाल्यानंतर असे प्रसंग घडले की ज्यामुळे माझं कंफ्यूजन वाढलं. खरंच या प्राईजसाठी आपण योग्य आहोत का? असं वाटायला लागलं. ”

“म्हणजे. ”ममा 

“नक्की काय झालं. नीट सांग. ”पपा

“त्यादिवशी स्कूलला जाताना ममा हेल्मेट विसरली. मी आणून देते म्हटलं तर नको म्हणाली आणि एखादेवेळी नसलं तरी चालतं अस म्हणत गाडी घेऊन निघाली असं बऱ्याचदा झालंय. मी काही बोलले नाही पण नंतर चौकात रेड सिग्नल होता तरी ममानं गाडी थांबवली नाही. ”

“अगं, त्यावेळेला रस्ता मोकळा होता आणि आपल्याला उशीर झाला होता म्हणून.. ”

“सिग्नलवर फक्त वीस सेकंद बाकी होते. ”

“एवढ्या फालतू कारणासाठी बक्षीस परत केलंस. जाऊ दे. ते एवढं काही महत्वाचं नाहीये. आजकाल बरेचजण असंच वागतात. ”ममा.

“म्हणून नियम मोडायचा. आपल्याकडे कोणाला सिविक सेन्सचं नाही. अडाणी, शिकलेले सगळे सारखेच. ”

“काहीही बोलू नकोस. तोंड सांभाळ. ”ममा चिडली. राही आणि ममा यांच्यातली वादावादी वाढली तेव्हा पपा मध्ये पडले. “एक मिनिट, दोघीही गप्प बसा. राही, मी काय केलं ते सांग.”

“परवा आपण बाहेर गेलो तेव्हा गाडी चालवत मोबाईलवर बोलत होता नंतर पुलावरून जाताना सुकलेल्या फुलांची आख्खी पिशवी तुम्ही नदीमध्ये उलटी केलीत. ”

“त्याला सुकलेली फुलं नाही निर्माल्य म्हणतात. देवाला वाहिलेली फुलं, हार होते. ते पाण्यातच टाकायचे असतात” ममा.

“ते पूर्वी ठीक होतं पण आता आधीच नदी किती घाण झालीय. ती साफ करायचं सोडून आपण त्यात भर घालतोय. अशा अनेक चुकीच्या गोष्टी माहिती असूनही आपण करतो. सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भान कोणालाच नाही आणि नियम पाळणारा चेष्टेचा विषय बनतो. त्यातही सर्वात किळसवाणा प्रकार म्हणजे कसंही, कुठंही पचकन थुंकणारे, अशांच्या कानफाटात मारायची इच्छा होते पण??? ”

“मला एक कळत नाही. या गोष्टींचा आणि बक्षीस परत करण्याचा काय संबंध? ”

“ममा, ‘सिविक सेन्स’ वर बोलून प्राईज मिळाले परंतु नंतर आलेल्या अनुभवामुळे माझा गोंधळ वाढला. जर आईवडीलच चुकीचे वागत असतील तर नुसतं बोलण्याला काहीच अर्थ नाही म्हणून बक्षीस परत केलं. ”राही बोलायचं थांबली तेव्हा एकदम शांतता पसरली. ममा आणि पपाला काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नव्हते. परिस्थिती बघून आजीनं पुढे येत म्हणाली “राही अभिनंदन!! योग्य निर्णय घेतलास. आमचा १००% टक्के पाठिंबा आहे. आधी आपण करायचे मग इतरांना सांगायचे हीच तर आपली शिकवण. सगळ्यांना नागरिक शास्त्र पुन्हा पुन्हा शिकवलं गेलं पाहिजे. लहान वयात तू हा विचार करतेस. वा!! फार छान!! ”आजीनं राहीची पाठ थोपटली.

“येस, यू आर राइट, मी आणि ममा चुकलो. यापुढे असं करणार नाही. तुझं म्हणणं पटलं. दुसरा पाळत नाही म्हणून मी सुद्धा चुकीचं वागणार हे बरोबर नाही. स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्यांनी आधी सार्वजनिक नियम पाळलेच पाहिजेत.”

“सॉरी!! यापुढे काळजी घेईन. खरंतर नागरिक शास्त्र आयुष्यभर उपयोगी पडणारा विषय फक्त शाळेत 20 मार्कांपुरता राहिलाय ”ममा.

“राही, एक काम करू. तू स्पर्धेत बोललीस त्याचा व्हिडिओ करून व्हायरल करू. नागरिक शास्त्र जाणीव जागृतीच्या कामात आपला खारीचा वाटा…. ”पपांचे बोलणं संपायच्या आत ममा आणि राही एकदमच म्हणाल्या “ग्रेट आयडिया!!”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – २ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सौ. राधिका भांडारकर 

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

(शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा. देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?) – इथून पुढे —- 

ताईला सहज आठवलं. सर्व भावंडात शोभा देखणी होती. काहीशी नाजूकही होती. पप्पा तिला ‘चमेली’ म्हणायचे. पप्पांची फार लाडकी. सारी भावंड तिला ‘लाडावलेलीच’ म्हणायचे. तिनेही पप्पांना बजावून सांगितले होते, ” पप्पा मी काही ताई सारखी नोकरी वगैरे करणार नाही बरं! मला श्रीमंत, जमीनदार, सुखात ठेवणारा नवरा हवा. ”

भैय्यासाहेबांचं स्थळ अगदी तसंच होतं. घरदार, शेतीवाडी, गोधन असलेलं. भैय्या साहेबांचा स्वभावही खूप मनमिळाऊ, समंजस, सर्वांची काळजी घेणारा असाच होता. शोभा चांगल्या घरात पडली याचं पप्पांसकट सर्वांनाच समाधान होतं.

पण दैव जाणिले कुणी?

सायलीच्या जन्मानंतर जीवन जणू ढगाळलंच. ती ऑटिस्टिक आहे हे स्वीकारायलाही खूप महिने लागले. ती मंदबुद्धी नव्हती पण नॉर्मल नक्कीच नव्हती. वयाप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक माईलस्टोन वर ती अडखळत होती. बुद्धी, शरीर याची संगती नव्हती. मात्र मुलगी म्हणून वाढत असतानाचे शारीरिक नियम निसर्गाने पाळले होते. ती ऋतुमती झाली. तारुण्याच्या खूणा अंगावर उमटू लागल्या. पण हे तारुण्य मोरपिशी नव्हतं. ते विकृत भासत होतं. त्या तारुण्यात स्वप्नांची पिसं नव्हती. भुताटकीचा नाच होता. तिच्या अंगावर चढणाऱ्या गोलाईने शोभाचं उर धडधडत होतं.

एकदा तिला स्वप्नही पडलं होतं… ‘अजस्त्र गिधाडांच्या टोळीने सायलीला उंच आकाशात उचलून नेलं. ’ 

घामाघूम होऊन शोभा झोपेतून उठली. सायली शेजारी शांत झोपली होती. झोपेतच शोभाने सायलीला घट्ट पकडले आणि म्हटले, ” बाळा! माहित नाही हे जग तुझ्यासाठी कसं असेल? पण आता आपलं दोघींचं एकच जग. त्या जगात फक्त तू आणि मी. ”

ताईच्या मनात जेव्हा या आठवणी उतरल्या तेव्हा तिला वाटलं एकाच आई-बाबांच्या पोटी जन्माला आलो आपण, एकाच अंगणात खेळलो, वाढलो पण शोभाच्या नशिबाने अशी थट्टा का मांडली? पूर्वजन्मीची कर्म, भोग, देणी घेणी हे संकेत खरे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? तो नियंता? ज्याच्या हाती जीवनाची सारी सूत्रं आहेत. शेवटी हेच खरं आपण सारेच पराधीन आहोत, कठपुतळी समान आहोत. ”आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना”

सायली.. ईश्वराने बनवलेलं एक ॲब्सट्रॅक्ट माॅडेल. पण त्यातही मन होतं. भावना होत्या. त्या व्यक्त करण्याची क्षमता नसेल पण त्यांचं अस्तित्व होतं. सायलीच्या खोलीत भैय्यासाहेबांचा फोटो होता. त्या फोटोशी ती गप्पा करायची. असंबद्ध बडबड करायची. शोभाला कुणी बोललं, शोभा रडली तर तिला आवडायचं नाही. ते ती कधी आरडाओरड करुन हातवारे करुन व्यक्त करायची.

तिच्याजवळ एक बाहुली होती. कधी असं वाटायचं त्या बाहुलीत ती स्वत:ची प्रतिमा पाहते. त्या बाहुलीवर ती प्रेमही करायची तर कधी तिचा राग राग करायची. सायलीच्या वागण्याचं हंसुही यायचं आणि करुणाही वाटायची.

शोभाची मृत्यूशी अखेरची झुंज चालू होती. विनय आला होता. शोभाचे दीर— जाऊ आले होते. तेही आता वयस्कर झाले होते! थकले होते. काळ इतका लोटला होता की एक पिढी सरली होती. आता पुढच्या पिढीचे पर्व सुरू होतं.

सगळ्यांपुढे प्रश्न होता शोभानंतर आता सायलीचे काय?

विनय म्हणाला,” सायली सारख्या मुला मुलींची काळजी घेणारी भारतात काही केंद्रं आहेत. तारांगण या संस्थेची माहिती मी काढली आहे.

शोभाचे दीर म्हणाले, “गावाकडची काही पडीक जमीन आम्ही नुकतीच विकली आहे. त्यातून येणाऱ्या पैशांचा आम्ही सायली साठी ट्रस्ट करणार आहोत. सायलीचा संपूर्ण खर्च तिच्या शेवटापर्यंत ट्रस्टमार्फत होईल. ”

शोभाचा शेवटचा क्षण आणि सायलीचे उर्वरित भविष्य हे दोनच विषय सर्वांच्या मनात घोळत होते. या विषयावर जे काही ठरवायचं ते त्यांना नंतर नसतं का पार पाडता आलं? पण कदाचित आज सर्वजण एकत्र आहेत. उद्याचं काय माहित? सारेच विखुरतील.

पण या सगळ्या उहापोहात फक्त विनयच्या लक्षात आलं की सायली कुठेच दिसत नाहीय. गेली कुठे? ती एकटी जिना उतरून कुठेही जात नाही. पण आता या वेळेस ती घरात नाही हे सत्य होतं. मग ती गेली कुठे?

एक वेगळीच धावपळ सुरू झाली. शोधाशोध. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, मंडईत, मंदिरात, उद्यानात सर्वत्र. सायली कुठेही सापडली नाही. पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. तपासचक्रं सुरू झाली.

शोभाचा श्वास मंद होत चालला होता. एकीकडे ताईने मृत्युंजयाचा जप चालवला होता.

॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥ 

आणि दुसरीकडे सायलीची शोधाशोध. मध्यरात्री पोलिसांचा फोन आला.

विनयच हॉस्पिटलमध्ये गेला. पांढर्‍या चादरीत देह गुंडाळला होता.

मखमलीच्या तळ्यात पोलीसांना एक मृतदेह सापडला होता. विनयने चेहऱ्यावरची चादर हळूहळू उचलली.

तो निरागस, निर्विकार, निश्चेष्ट चेहरा सायलीचा होता!

शवविच्छेदनाच्या अहवालात “अपघात”अशी नोंद होती. सापडलेल्या वस्तुंमध्ये सायलीची बाहुली होती. तिचा पार लोळागोळा झाला होता.

त्याच क्षणी अतिदक्षता विभागातून परिचारिकेचा संदेश आला.

“ सॉरी! शी इज नो मोअर. ”

शोभा गेली. मुक्त झाली. शोभाच्या आयुष्यात एकच गोष्ट मनासारखी झाली होती. त्या अनोळच्या जगात शोभा आणि सायलीने हातात हात घालून प्रवेश केला होता.

लोकांसाठी ही जरी शोकांतिका असली तरी शोभाच्या दृष्टीने ही एक तिच्या आयुष्यात घडलेली फार मोठी सुखांतिका होती. तिच्यासाठी असा शेवट सकारात्मक होता. आता तिचा आत्मा मुक्त झाला असेल. नियतीच्या दृष्टीने सायलीने घेतलेला या जगाचा निरोप म्हणजे एक समर्पित दान होतं. तिच्या जन्मदात्रीसाठी.

या इहलोकात प्रश्न एकच होता. का आपण जाणाऱ्याची, त्याच्या मागे उरणार्‍यांची चिंता करतो? याला त्याला, नशिबाला दोष देतो? जर तर करतो? कोणाचा दोष असतो?

दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…

– समाप्त –  

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पराधीन… भाग – १ + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

‘आम्ही सिद्ध लेखिका संस्था‘ पुणे जिल्हा शाखा यांच्यातर्फे ‘१ मे २०२५ – महाराष्ट्र दिना’ निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री राधिका भांडारकर यांना त्यांच्या “पराधीन” या कथेसाठी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या समूहातर्फे राधिकाताईंचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.💐

आजच्या व उद्याच्या अंकात वाचूया ही पुरस्कारप्राप्त कथा पराधीन – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर

शोभाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. तिच्या हृदयाची क्षमता दहा टक्क्यावर आली होती. मॉनिटरवरच्या आलेखावरून फिरणारा तो हिरवा प्रकाशाचा ठिपका धोक्याच्याच सूचना देत होता. शोभाचे सारे चैतन्यदायी घटक हळूहळू उतरत होते. व्हेंटिलेटर वर असूनही तिला श्वास घेणं प्रचंड त्रासदायक होत होतं आणि तिची छाती जोरजोरात उडत होती.

ताईला कळुन चुकलं होतं की शोभाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे, या यातनांमधून शोभाला फक्त मृत्यूच सोडवू शकत होता. ताईला हे सत्य पटत होतं पण कितीही झालं तरी धाकट्या बहिणीने आपल्या आधी जावे हे सत्य स्वीकारणे तिला कठीण जात होते. शिवाय शोभाच्या जाण्याने काही नवीन प्रश्न उपस्थित होणार होते ते वेगळेच. सायलीचे काय?

खूप दिवसांपूर्वी शोभा ताईला म्हणाली होती, ” आयुष्यभर देवाने माझ्या पदरात नकारात्मक दानच टाकले. आता मात्र देवाजवळ माझं एकच मागणं आहे. माझं काही बरं वाईट व्हायच्या आधी सायलीने या जगाचा निरोप घ्यावा. कोण करेल ग तिचं? कोण जबाबदारी घेईल तिची? आणि सायली ही माझीच जबाबदारी नाही का? ती मी अशी कशी कुणावर सोपवू शकेन? ”

बोलता बोलता तिला हुंदके आवरत नव्हते.

कोपऱ्यात एका टेबलावर सायली बसली होती. स्वतःशीच हसत होती, काही बडबडत होती. जणू काही आईचं दुःख, तिचं अश्रू गाळणं या साऱ्यांच्या पलीकडे तिचं वेगळं जग होतं.

त्यादिवशी ताईने शोभाला समजावले. मोठ्या बहिणीच्या मायेने तिला जवळ घेतले. पाठीवर थोपटले.

“अग! असं का म्हणतेस आणि तुला कशाला काही होईल? तू असे विचार करू नकोस. शेवटी आपल्या हातात काय आहे? माणूस हा पराधीन आहे. जे ईश्वराच्या मनात असेल तेच घडेल पण एक लक्षात ठेव जो चोच देतो तो चाराही देतो. तू विश्वास आणि श्रद्धा ठेव. ”

भैय्यासाहेब गेल्यानंतर ताई, शोभा आणि सायलीला स्वतःच्या घरी घेऊन आली होती.

“आता तुम्ही इथेच रहा. मीही तर एकटीच असते. विनयला मी सांगितलं आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. ”

तसं पाहिलं तर सगळ्यांचीच आयुष्यं एकमेकात गुंतलेली. स्वतंत्र तरीही गुंतलेली. काही वर्षांपूर्वीच ताईच्या पतीचे निधन झाले होते. ताईला एकच मुलगा. विनय. तो अमेरिकेत स्थायिक. बाबा गेल्यानंतर ताई काही महिने विनय सोबत अमेरिकेत राहिलीही पण तिने जाणले की असे इथे परदेशात कायम राहणे मानसिक दृष्ट्या तिला शक्य नव्हते. विनयला तिने न दुखवता पटवूनही दिले

खरं म्हणजे जो तो आपापले आयुष्य जगत असतो. टप्प्याटप्प्यावर बदललेल्या आयुष्याची घडी सावरत असतो. पुढे जात असतो. भविष्यात काय घडणार हे कुठे ज्ञात असतं?

भैय्यासाहेब गेले. शोभा आणि सायलीचा आधार ढासळला. तशा त्या अनाथ नव्हत्या, शोभाच्या सासरची माणसं तशी जबाबदार आणि समंजस होती. जरी ती नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेली होती तरी कुणीही सायलीला आणि शोभाला नाकारलं नव्हतं, डावललं नव्हतं. पण ताईने आपणहून शोभाला मदतीचा म्हणण्यापेक्षा मायेचा, अपार विश्वासाचा, आधाराचा हात दिला. त्या दोघींचं एक प्रकारचं केविलवाणेपण ताईच्या काळजाला कुठेतरी चिरून जात होतं.

तेव्हापासून ताई, शोभा आणि सायली यांचं एकत्र जीवन सुरू झालं.

सोपं नव्हतं. प्रत्येकाचे आपापल्या आयुष्याचे कम्फर्ट झोन होतेच. आता एका निराळ्या समूहात आयुष्याची नवी सुरुवात करताना त्रास हा होणारच होता. शिवाय सायलीची स्वमग्नता हा त्यातला सर्वात दुबळा भाग होता. शोभाला सायलीची सवय झालेली होती. तिच्या वागण्या बोलण्यातला विचित्रपणा, तिचे कधी घसरणारे तर कधी प्रखर झालेले मानसिक कल, शोभाला सायलीच्या जन्मापासून तसे अंगवळणी पडले होते. आणि शेवटी शोभा एक “आई” होती. सायली तिच्या रक्तामांसाचा गोळा होता.

मावशी या नात्याने ताईला सुद्धा सायलीचा ऑटिझम ज्ञात होताच पण दूर असणं आणि सहवासात राहणं यात खूप फरक होता.

सायलीला तिच्या कुठल्याही वस्तुंना हात लावलेला चालत नसे. तिचे कपडे, तिच्या वस्तू, चपला अगदी केसाला लावायच्या पिना सुद्धा कोणी जागेवरून हलवल्या तर ती प्रचंड क्रोधित व्हायची. तिला सतत टीव्ही लागायचा. तिने लावलेला चॅनल कोणीही बदलायचा नाही. आवाज सहन न झाल्यामुळे तिला न विचारता जर टीव्ही बंद केला तर तिचा पारा चढायचा. शेवटी ती असाधारण आहे, वेगळी आहे, तिला कळत नाही, विचार करण्याची क्षमता तिच्यात नाही असा विचार करून, सायलीलाच केंद्रस्थानी ठेवून सारे व्यवहार करणं क्रमप्राप्त होतं.

एक दिवस ताई शोभाला म्हणाली,

“शोभा चूक तुझी आहे. अगं! अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा असतात तिथे का नाही तू तिला घातलेस? तिथे ती काही शिकली असती. वेळीच तुम्ही दोघांनी हा विचार का नाही केला? ”

“ताई तिच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही केलं होतं ग! तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाचाही विचार केला नाही पण नशिबाचे फासे उलटेच पडले. ”

शोभाचा आवाज रडवेला होत गेला, डोळे वहायला लागले.

सायली भिंतीला टेकून ताठ उभी होती, तिचे डोळे वटारलेले होते. चेहऱ्यावर विचित्र भाव होते. तिला पाहताच ताईने संवाद तोडला. विषय बदलला.

ताईला का माहित नव्हत्या शोभाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना?

भैय्यासाहेबांना लोकल गाडीत चढताना झालेला तो भयाण, जीवघेणा अपघात! त्यातून ते वाचले तरीही पूर्ववत कधीच झाले नाहीत. कायमचे अपंगत्व आले, नोकरी सोडावी लागली.

थोडीफार सेव्हींग्ज, साचलेले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, घरून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा आणि पुढे उरलेलं लांबलचक आयुष्य.

शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा.

देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.) – इथून पुढे —-

पॅसेंजर आली. प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली. खिडकीतून उतरतीचं ऊन अंगावर येत होतं. छताचा पंखा मोठमोठ्याने आवाज करत गरम हवा फेकत होता. दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं. या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं. आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती. त्याने मनाला आवर घातला. असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं. आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते. भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं, तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं, भुसावळ ते मुर्तिजापूर पॅसेंजरचं भाडं, मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस. टी. चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते. देवबा गरीब असला तरी स्वाभिमानी होता. जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.

“आबा पाणी ” नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला

” दादू आता घोट घोट पाणी पीजो रे भाऊ. नंतर कुठंबी पाणी मिळणार नाही ” 

नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली. घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली. त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली. देवबाने कपाळावर हात मारुन घेतला. खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती. पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.

शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला. “गरम कचोरी, दसमें तीन, दसमे तीन” त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला. पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.

” आबा मले कचोरी “नात म्हणाली. आता नातू चुप थोडीच बसणार होता.

“आबा मलेबी कचोरी” 

कचोरीवाला आला तसं देवबाने नाईलाजाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या. तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या. तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.

“आबा कचोरी” तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं. त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.

” दादूला देजो बेटा. नाहीतर तुम्ही दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा” कचोरी परत करत देवबा म्हणाला. पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं. नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.

गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला. खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली. एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता. त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.

“देरे दादा थोडं पाणी, पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं. देरे दादा, देवं माय. लई पुण्य मिळेल दादा” 

भिकारीण गयावया करत होती. लोकांसमोर हात पसरत होती.

देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं, कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना. उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते. आणि तेही चुकीचं नव्हतं. या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?

” बाबा दे रे पाणी पोऱ्याले” ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली. देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना. न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली. पण हाय रे दैवा. बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती. ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात “पानी बोतल “चा आवाज डब्यात घुमला. आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.

“कित्येकी है बोतल? ” देवबाने विचारलं

” पच्चीसकी”

“बाहर तो बीस की मिलती है “

” स्टेशनपे मिलती होगी, गाडीमें पच्चीसकी है. दू? “

देवबा अडखळला. पंचवीस रुपये जास्तच होते. पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला. भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं. भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती. तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता. त्याने निर्णय घेतला.

” दो. एक दो ” खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली. पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली. लगेच तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली. तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं. देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.

” आबा आपल्यालेबी बाटली घेजो” नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला

“और एक बोतल दे दो”

भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं. मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.

” अजून एक बोटल दे रे बाबा. मलेबी लई तहान लागलीये “

देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली

” बाबा कहाँ जा रहे हो ” पाणीवाल्याने देवबाला विचारलं

“भुसावल”

“तो और एक ले लो ना. भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी. साथमे बच्चे है, एक बोतलसे थोडेही काम चलेगा! “

तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं. पण पुढे पाणी नाही मिळालं तर?

“दे दू बाबा? “

देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.

” हां देऊन टाका ” नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला. देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले. फक्त नव्वद रुपये उरले होते. पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना. पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन तृप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली.

मलकापूर गेलं. गाडीतली गर्दी आता कमी झाली होती. सहा वाजत आले होते. जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता. देवबा विचार करत होता. आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं. जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते. जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता. ‘ ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू. आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू. पोरीला शरमल्यासारखं होईल. तिला समजावून सांगता येईल. आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत. घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे. पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं? ‘

“बाबा हे घे तुह्ये पैसे”

त्याने चमकून वर पाहिलं. मघाची भिकारीण समोर उभी होती. तिच्या समोर पसरलेल्या हातात एक, दोन, पाच रुपयाची नाणी होती. देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.

” नको नको. राहू दे”

” बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये. घे. भीक मागून जमा केलेत”

देवबाला काय करावं सुचेना. ते पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते. पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते. त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला

” राहू दे बेटा. नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का? “

” लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू. देव भलं करो तुह्यं”

ती निघून गेली तसा देवबा हसला. भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं. पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.

रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला. स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं. तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला

” चाळीस रुपये ” रिक्षावाला म्हणाला

देवबा हसला. थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता. पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती. दिवसभरातल्या माणुसकी आणि कृतज्ञेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ पाणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार. हवेत भयंकर उष्मा होता. अंगाची लाहीलाही होत होती. प्लॅटफाॅर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं. गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते. भुसावळकडे जाणारी पॅसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच. चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली

” दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी “

त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं

“व्हय रं बेटा? “

नातवाने निरागसपणे मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले. आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली. देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला. त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता. ही तर लहान मुलं होती. बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघा मुलांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता. त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लॅटफाॅर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला. पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं. त्याने समोरच्या प्लॅटफाॅर्मवर नजर टाकली. तिथल्या नळांनाही पाणी दिसत नव्हतं. स्टेशनमास्तरच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं

” बाबूजी पाणी हाये का कुठं? लेकरासाठी पाहिजे हुतं “

कर्मचाऱ्याने त्याला वरपासून खाली बघितलं आणि म्हणाला

” बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का? “

देवबाने नकारार्थी मान हलवली

” मंग कसं राहिन पाणी? आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू? आमीबी बाहेरुन मागवतो. जाय त्या कॅन्टीनमधी लागो तितकं पाणी हाये” कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला. देवबा मोठ्या आशेने तिकडे गेला.

” बाबू पाणी हाये का? “

कॅन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली

“बीस रुपया”

” बीस रुपये? नाय. मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी… “

त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.

“खुल्ला नही है पानी बाबा. बाहर जाओ, हाॅटलमें मिल जायेगा”

जिन्याने देवबा बाहेर आला. रोडावरच्या हाॅटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं

” बाबा चाय पिना है तो पिलो. पानी नही मिलेगा. बोतल दे दू? बीस रुपयेकी है ” हाॅटेलमालकाने विचारलं.

देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाॅटेलवर गेला. तिथून तिसऱ्या. चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत. पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला. पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं. देवबा म्हणजे शेतकरी माणूस. दोन एकरच्या कोरडवाहू शेतीचा मालक. शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा. मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले, धरणातलं, नद्यानाल्यातलं, जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली. निवडणुका आल्या की पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पडायचा पण मंत्रालयात जाहीर झालेला निधी सरपंचापर्यंत येतायेताच संपून जायचा. उन्हाळा आला की टॅंकर लाॅबी सक्रिय व्हायची. त्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षनेतेही आपले खिसे भरगच्च भरुन घ्यायचे. गावं मात्र तहानलेलीच रहायची. कुणालाही निवडून द्या आपल्या नशिबात पाण्यासाठी मरमरच आहे हे सत्य गावाने आता स्विकारलं होतं. अर्थात देवबालाही हे माहीत झालं होतं. पाण्याचा तुटवडा झाला की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा. त्यातून त्याच्या पदरी दोन मुली, मुलगा नव्हता. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती. मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच. पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती. शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं. मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता. खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं. पाण्याचा प्रश्न बिकट झालेला. दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची. दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा. तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं. त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची. मग देवबा सायकलवरुन

आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून विकत पाणी आणायचा. पण आता त्याचं वय झालं होतं. तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा.

तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला. तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता. नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं

“आबा पाणी नाय मिळालं? दादू परत पाणीपाणी करतोय. मलेबी तहान लागलीये”

दोन्ही नातवांचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला. तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली. साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला. पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला समजत होतं. कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची ते वाट बघत असावेत. त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना. ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं. सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका शेतकरी माणूस. समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.

“आबा पाणी पाहिजे” नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं. त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता. आता हिंमत दाखवावीच लागणार होती. त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला. ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती. देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं. तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला. पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं. काय करावं त्याला सुचेना

“काय बाबा काय पाहिजे? “कुणीतरी विचारलं

” दादा जरा पाणी पाहिजे हुतं. लेकरं लय तहानलीयेत” 

तो एका माणसाला म्हणाला. तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले. त्यांचंही बरोबरच होतं. अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.

” अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात. तिथून घ्या ना ” एक बाई चिडून म्हणाली

” बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे. उकळून थंड केलेलं. ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार? “

एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.

” थांबा बाबा” 

देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता. देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला

“अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का? आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही? “

” तीन जण “तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला. त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला

“जा. बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे”

देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला. मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.

” दादा लय उपकार झाले”

देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने हसला. देवबा नातवांकडे आला. थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली. त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली. देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares