सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ आठवणीतलं घर ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
घर नाही, अंगण नाही,
नाही मातीचा ओलावा !
तुळशी वृंदावन छाया नाही,
अंगणी नाही दिवा!
आठव येतो गावाकडचा ,
मनी आठवते, मातीची माया!
दारापुढला आंबा देई,
माथ्यावरती दाट छाया!
आठवते मज अंगण अपुले,
गप्पांचा तो कट्टा !
येई-जाई त्यास मिळे विसावा,
करी परस्परांच्या थट्टा!
नातीगोती सर्वांची होती,
साधे सुधेच जगणे !
पाहुणचार घरात होई ,
गात आनंदाचे गाणे!
येणारा जो असे पाहुणा,
पाहून खुशी होई !
दारा मधला माड देखणा,
मनास भुलवून जाई !
घर होते घरासारखे,
माणसे होती प्रेमळ!
आनंदाचे गाणे होते,
सदैव ठेवी मन निर्मळ!
………………….
………….
शहरामधल्या सिमेंटच्या ,
चौकोनी, देखण्या माड्या!
भुलवित नाहीत मम मनाला ,.
सुंदर मोठ्या गाड्या !
प्रत्येकाचे मन बंदिस्त असे,
जणू सिमेंटच्या भिंतींचे !
भक्कम अन् अभेद्य असे ते,
नाही पाझर पाण्याचे !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈