मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -3 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -3 ☆ श्री आनंदहरी ☆

अंथरुणावर आडवं झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने झोपेत पोराचे पाय पोटावर लागू नयेत म्हणून मध्ये अंतर ठेवले होते. नाही म्हणलं तरी पोराकडं जरा दुर्लक्षच होतंय हे तिला जाणवत होतंच.. तो विचार मनात येताच तिला आतून भरून आलं. शांत झोपलेल्या पोराकडे तिने मायेने पाहिलं. ती हात लांब करून पोराला उगाचच हळुवार थोपटू लागली. ‘ काहीही न कळण्याचे वय पण बरेच शहाण्यासारखे वागतंय ‘ असं तिच्या मनात आले..

घरात आणखी कुणी असतं तर बरे झाले असते.. आपले काम, त्यात हे दुसऱ्यांदा गरोदर राहणं.. कुणाची, कशाची फिकीर नसणारा बाप यात पोराची फार आबाळ होतेय ती तरी झाली नसती.., तिच्या मनात उगाचच पोराची काळजी दाटून आली. ..पण घरात दुसरं असणार कोण ? जवळच असे कुणी नव्हतंच.. जे कुणी होते त्यांच्याशी तिच्या नवऱ्याने संबंध ठेवले नव्हते.. आणि तिला मनातून कितीही वाटत असले तरी तिला ठेवू दिले नव्हते.. त्याच्या दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या सवयीमुळे शेजारी-पाजारीही  तिच्याशी नसले तरी त्याच्याशी तुटूनच होते.. पण तरीही तिने मात्र शेजारधर्म पाळला होता.. शेजार राखला होता.

तिला जरा आराम वाटत असला तरी हवी असूनही झोप काही येत नव्हती. उगाचच मनात काहीबाही विचार येत होते. तिला नवऱ्याची आठवण आली. ‘ कुठं असतील ? कसे असतील ? अजून का घरी आले नाहीत ? ‘ अशा प्रश्नांच्या वावटळीत तिचं मन भिरभिरु लागलं होतं, भरकटू लागलं होतं.तिला नवऱ्याची जास्तच आठवण येत होती. तो दारू पिऊन घरात आला की नुस्ता दंगा-धुडगूस घालायचा. तिला शिव्यांची लाखोली वाहायचा, मारहाण करायचा… तिला तो घरात आलाच नाही तर बरे होईल असे तेंव्हा वाटायचं.. पण आत्ता मात्र तो यायला हवा, घरात असायला हवा असे वाटत होतं पण  कर्फ्यु लागल्यापासून त्याचा पत्ताच नव्हता. खरंतर त्याच्या विचाराने  तिच्या डोळ्यांत दाटून आलेली झोप पाला-पाचोळ्यासारखी उडून गेली होती.

तिला अस्वस्थ वाटू लागले तशी ती हाताला रेटा देत उठून बसली. नकळत तिची नजर पोराकडे गेली. ते कुशी बदलून गाढ झोपलेले होते. आपल्या अवतीभवती काय घडतंय याची त्याला खबतबातही नव्हती. तिची अस्वस्थता वाढू लागली. पोटात कळा येऊ लागल्या. वेदना असह्य होऊ लागली. गात्रागात्रात फक्त वेदनेचीच जाणीव भरून राहिली. तिचा चेहरा कसानुसा होत होता..

” देवा ss माणकुबा ss! “

तशाही स्थितीत तिने हात जोडून देवाची करुणा भाकली.

” चार रोज थांब रं….आरं दिस उजडंस्तवर तरी थांब बाबा ..”

ती पुटपुटली.. त्यावेळी तिची नजर स्वतःच्या पोटाकडे होती.. ती एकाच वेळी देवाला आणि येणाऱ्या जीवाला विनवीत होती.

पोटातील कळा थांबण्याचं चिन्ह दिसेना. ‘ काहीतरी करायला पाहिजे… कुणालातरी बोलवायला हवं..कुणाला बोलावणार ?’  मनात विचार येताच तिची नजर झोपलेल्या पोराकडे गेली.

‘त्येला हाळी मारून उठवावं काय ? तर येवडंसं प्वार.. ती काय करंल ?  उलटं भेदरून जायाचं … त्येला नगंच ..’ ती उठून  उभारायचा प्रयत्न करू लागली. असह्य कळांमुळे तिला जमेना.. ती तशीच खुरडत, सरकत दाराकडे निघाली.. पुढेही सरकवेना.. ती शेजारणीला हाका मारू लागली पण समोरची काहीच चाहूल लागेना… जीव घाबराघूबरा झाला होता.. साऱ्या अंगातून त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. वेदनेचा आगडोंब साऱ्या शरीरात पसरला होता. ती ओरडू लागली..किंचाळू लागली.. आक्रन्दू लागली. तिचा जीव गुदमरू लागला.  वेदना वाढतच प्राणांतिक वेदनेने ती धडपडत राहिली.. तिचा आवाज, ओरडणे, किंचाळणे कमी झालं… थांबले….  रात्रीची असह्य शांतता पुन्हा भवतालात भरून राहिली.

क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -2 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -2 ☆ श्री आनंदहरी ☆

बराचवेळ ती तशीच बसून होती. अचानक तिला पोराच्या भुकेची जाणीव झाली. उठून बसकर झटकावे तशी मनातली नवऱ्याची काळजी झटकून ती उठली. स्टोव्ह पेटवला आणि त्यावर भाताचं भुगुनं चढवलं.

‘ कायबी झालं तरी पोराच्या पोटाला काय-बाय कराय पायजेलच..’

तिच्यातली आई तिला म्हणाली. तिला पोराचं ध्यान झालं .. तिची नजर कोपऱ्यात बसलेल्या पोराकडं गेली. तिच्या धपाट्यानं रडवेलं झालेलं पोर तिथंच कलंडलं होतं. तिनं पोराकडं पाहिलं तसं तिचं काळीज तुटायला लागलं.

‘ उगाच मारलं लेकराला..’ असं मनात येऊन तिला स्वतःचाच राग आला. वाईट वाटून नकळत डोळे पाणावले. पोरावरची माया उफाळून आली. ती पोराजवळ गेली.ती स्वतःला सावरत पोराला उचलून घेण्यासाठी हळूच वाकली. त्याचवेळी तिला पोटात कळ आल्यासारखी वाटली. कशीबशी ती हळूच खाली बसली. खाली बसताच तिला जरा बरं वाटलं.

स्वतःच्या पोटाकडे नजर जाताच, आलेली कळ आठवून तिच्या मनात वेगळीच काळजी धकधकू लागली.

‘ ..पर अजून लै दिस हायती.. या समद्या धकाधकीत दिस आगुदर भरायचं न्हायती न्हवं ? ‘

मनात आलेल्या या आशंकेनं तिच्याही नकळत मनात गणित मांडलं गेलं होतं. तिच्या हिशेबाप्रमाणे अजून बराच अवधी होता पण हे ध्यानात येऊनही तिच्या मनातली धाकधूक कमी झाली नाही.

‘ दिस आगुदरच भरलं न्हाईत म्हंजी बरं… करफू तरी उठाय पायजेल.. धनी बी घरात न्हाईत..:

नवरा घरात नाही ही जाणीव पुन्हा तीव्र झाली आणि त्याची चिंता पुन्हा सतावू लागली. काही क्षणापूर्वीचा त्यांच्याबद्दलचा त्रागा, राग मनात उरला नव्हता. उलट त्याच्या आठवणीने, विचाराने ती काहीशी हळवी झाली होती. काही क्षणापूर्वी आपण त्याच्याबद्दल काही-बाही बोललो याची आठवण येऊन तिला स्वतःचाच राग आला .

‘ माझं मेलीचं त्वांडच वंगाळ ..’ म्हणत ती स्वतःलाच शिव्या देऊ लागली, दोष देऊ लागली.

‘ देवा.. माणकुबा ss … माझं कुकू राख बाबा..’ म्हणत ती बसल्या जागेवरूनच माणकेश्वराच्या देवळाच्या दिशेने हात जोडून देवाला विनवू लागली. तेवढ्या क्षणात ती स्वतःची वेदना विसरून गेली होती.

तिने पोराला हळुवारपणे जागे केले पण तिला पाहताच तिने मारलेला धपाटा आठवून पोर भेदरून उठले आणि तिच्याकडे टकामका पाहू लागले. आईचा मायेचा स्पर्श त्याला जाणवला तशी त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि ते आईला बिलगले.

” उठ राजा, वाईच भात खाऊन घे चल..”

ती त्याच्या केसातून मायेने बोटं फिरवत म्हणाली.

बराचवेळ आईपासून दूर राहिलेलं ते पोर आईला आणखीनच घट्ट बिलगले. ती त्याला कुरवाळत म्हणाली,

” चल राजा, वाईच खाऊन झोप..”

ती पोराला बाजूला सारत भुईला हाताने रेटा देत हळूच उठली. थाळी आणि पाण्याचा तांब्या घेत स्टोव्हजवळ बसली. स्टोव्हवरचं भुगुनं खाली उतरून त्यातला थोडा गरम गरम भात तिने थाळीत वाढला. गरमागरम भाताच्या वासाने पोराची भूक चाळवली असावी. ते झटकन उठलं आणि आईजवळ येऊन तिच्या मांडीवर बसले तसे ती मांडीवरून खसकन खाली बसवत त्याला म्हणाली,

” वाईच खाली बस की… बगल तवा मांडीवर येतंय..”

आत्ता मायेनं बोलणाऱ्या आईला असे एकदम चिडायला काय झाले ते त्या पोराला समजेना. ते घाबरुन आईकडे पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना कदाचित त्या पोराला समजली असावी. ते नुसतंच आईकडे पाहत गप्प बसून राहिले. तिला थोडे बरे वाटल्यावर तिने पुढे केलेल्या थाळीतील भात खाऊ लागले. पोरगा भात खाता खाताच पेंगु लागलंय हे तिच्या ध्यानात आले तसे तिने त्याला जरासं जवळ ओढले. त्यामुळे पेंगता पेंगता पोरगं दचकून जागं झालं. तिने त्याला थाळीतला भात भरवायला सुरवात केली. भात भरवून होताच तिने स्वतःचा आणि त्याचा हात थाळीतच धुतला, त्याच्या तोंडाला पाणी लावले. त्याला घोटभर पाणी प्यायला लावले आणि थाळी खंगाळून टाकली.

ती काळजी घेत हळूहळू उठली, जुनी वाकळ अंथरून पोराला त्यावर झोपायला लावले आणि स्वतः काळजी घेत त्याच्याजवळ कलंडली. आधीच झोपेला आलेले पोरगं लगेच झोपले.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संचारबंदी.. भाग -1 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -1 ☆ श्री आनंदहरी ☆

मोर्चा.. !

बंद…!

दंगल…!

जाळपोळ… !

जमावबंदी…!

संचारबंदी… !

  • ●    ●    ●     ●

” तुला रं मुडद्या रडाय काय झालं ? तुजी आय मेली का बा रं ? गप बस्तुस का ? “

चिडलेल्या तिनं पोराच्या पाठीत कावाकावानं धपाटा घालत विचारलं आणि पाटीतल्या भाजीची उलथा- पालथ करीत हताशपणे भाजीकडे पाहिले. भाजीची पाने पिवळी पडून भाजी कुजायला लागली होती. तिनं पाटीवर फडकं टाकून त्यावर पाण्याचा हबकारा मारला.

तिने मारलेल्या धपाट्याने  रडणारे पोर एकदम गप्प झाले होते.कधीही अंगाला हात न लावणाऱ्या, न मारणाऱ्या आईने धपाटा घातल्याने काहीसे आश्चर्याने, काहीसे भीतीने ते कोपऱ्यातूनच तिच्याकडे पहात होते. डोळ्यांच्या पापण्यात अजूनही पाणी होते, गालावर ओघळ होते पण त्याने ओठ मात्र घट्ट मिटून घेतले होते. हुंदका बाहेर पडला, भोकाड पसरले तर आपल्याला आणखी धपाटे बसतील, आईच्या हातचा मार खावा लागेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे भोकाड पसरणे तर दूरच मुसमुसण्याचा आवाजही बाहेर पडू नये म्हणून तो घाबरून तोंड दाबून बसला होता.

‘मला म्येलीला हाव सुटली..सस्तात भाजी घावल्याव दोन दोन पाट्या घेतल्या.. म्हनलं चार पैकं जास्तीचं हुतीली… पर वैशीच माझी.. समदंच गेलं.. चार दिस झालं करफू का काय म्हंत्यात त्यो हाय… भाजीबी सुकून, कुजून ग्येली आन त्या मुडद्या दलालाचं पैकंबी आंगाव …  त्यो चार रोज दम बी धरायचा न्हाय.. आन त्यात ह्यो मुडदाबी कुठंसं  उलातलाय कुणाला ठावं ? …’  ती स्वतःशीच पण मोठ्याने बडबडली. स्वतःच्याच बडबडीकडे तिचे लक्ष गेलं आणि बडबडीतलं शेवटचे वाक्य आठवून तिला काहींसं अपराधी वाटू लागलं. नवऱ्याची काळजी मनात ठसठसू लागली. या संचारबंदीच्या काळात नवरा कुठं असेल ?  हा प्रश्न तिला व्यथित करू लागला. कुणीसं म्हणालं होतं ‘ कर्फ्युत माणूस दिसला की गोळी घालतात..’ तिला ते वाक्य आठवलं आणि ती अधिकच बेचैन झाली.

 ‘कुठंसं आस्तिली ही.. ? चार दिस झालं…’

रोज रात्री नवटाक मारून तरंगत का होईना पण घरी येणारा नवरा दोन दिवस झाले परतला नव्हता. त्यात कर्फ्यु लागू झाला होता त्यामुळे तिच्या मनात शंका -कुशंका थैमान घालू लागल्या होत्या.

‘कुणाला ईचारावं बरं ..? .. कुणाला ईचारणार ? समदी खुडूक कोंबडीवानी आपापल्या घरातनीच तर हायती…’

तिच्या मनात प्रश्नापाठोपाठ उत्तरही आलं होतं पण तरीही तिला राहवेना

‘दारूच्या नशेमंदी त्यो रस्त्याव तर आला नसंल ?.. पोलिसांनी गोळी तर घातली नसंल नव्हका ?.. ‘  नसत्या शंका-कुशंका तिचं काळीज कुरतडू लागल्या होत्या. ती दाराशी आली… दार किलकीलं करत आजूबाजूचा कानोसा घेत समोर नजर टाकली.. त्याचवेळी दार अर्धवट उघडून बाहेरचा कानोसा घेऊ पाहणाऱ्या समोरच्या शेजाऱ्याला तिनं विचारलं ,

 ” व्हय वो भावजी, गावात समदं शांत हाय नव्हं ? “

 ” काय की.. कोण गेलंय बगाय ?…”

 ती उगाच काहीतरी काम सांगेल आणि शेजारधर्मामुळे ‘नाही’ म्हणता येणार नाही.. उगाच नसती झंझट नको असा विचार करत दार बंद करता करता शेजारी म्हणाला. त्याने दाराला आतून कडी लावल्याचा आवाज तिलाही ऐकू आला.

 दार पुढे लोटत  ती नवऱ्याच्या काळजीत भिजत हताशपणे बसून राहिली.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-२ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!)

मान टाकल्यासारखा दिवस उजाडला, तसाच मावळूही लागला. रोजच्यासारखी दुपार तापलीच नाही. राख धरलेल्या निखाऱ्यासारखा सूर्य दिवसभर थंड आभाळांत पडून राहिला होता.तो विझून जावू लागला,  तसं आभाळ विव्हळू लागलं. सांज झाली, आणि आसूड ओढल्यासारख्या विजा कडाडू लागल्या. संकटाची दवंडी पिटत वारा घोंगावू लागला. स्वतःचा जीव वाचवीत धुळीचे लोट पळू लागले.

मातीत खेळणाऱ्या पोरांच्या दंडांना धरुन पळवत बायाबापड्यांनी घरं गाठली.

घरासमोरची आवराआवर करून दार पटाटा लावली.अंगात संचार व्हावा तशी झाडं घुमू लागली.

वानरांनी जीव मुठीत धरून फांद्यांना मिठ्या मारल्या. पक्षांचे पुंजके घरट्यात लपले. पानांबरोबर ती जड घरटीही झुलू लागली. ऐन मुहूर्ताला आभाळ उरी फुटून रडू लागलं.त्याच्या अश्रूंचा महापूर आल्यासारखं पाणी कोसळू लागलं. अख्खं गाव पाण्यानं चिंब झालं. महार वाड्यात पेटू लागलेली चुलाणी पेटण्यापूर्वीच विझू लागली. पावसाच्या सड्यानं सादळून गेली. पावसानं जोर आणखी वाढवला तशी जनी धास्तावली.

फडक्यात बांधून ठेवलेलं दोन भाकरींचं पीठ झाडून घेऊन त्या वेळी ती भाकरी थापत होती. भुकेने कासावीस होऊन शिन्यानं भोकाड पसरलं. त्याच्या पाठीत धपाटा घालायला उठण्यासाठी दात ओठ खात जनीनं जमिनीला रेटा दिला, तेव्हा मांडीवर झोपलेल्या झीप्रीची झोप उडून ती रडायला लागली. झपाटून पटापटा मुके घ्यावेत तसं काकणं वर सारून जनीनं झीप्रीच्या इवल्याशा पाठीत धपाटे हाणले, आणि तिला जमिनीवर भिरकावलं. शेकून झालेल्या धुरकट भाकरीचे दोन तुकडे थाळीत टाकून तिने थाळी शिन्यासमोर सरकवली. आणि हात लांब करून झीप्रीला पुन्हा कवटाळून घेतलं. झीप्रीचा घाबरलेला जीव पाणी शिंपडल्यासारखा शांत झाला.

जनीच्या पुढे आता फक्त कसंबसं एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. तिने भाकरी थापली. शेकली. भाकरीचा तो चंद्र दुरडीत अलगत उभा ठेवला.तिच्या दिवसभराच्या भुकेल्या पोटात त्याच्या खरपूस वासानं आगडोंब उसळला.तिने आवंढा गिळला. आणि ती चुलाणं विझवायला लागली.

‘आता बबन्या आला की आर्धी आर्धी भाकर दोघांनी संगट खायची ‘असा विचार तिच्या मनात आला, तेवढ्यात झोपडीबाहेर कुणाचीतरी पावलं वाजली.

‘बबन्याचअसनार …’ जनी हरकली. झिपरीला सावरत ती दाराशी आली. समोर सादळलेला मिट्ट काळोख होता. त्यात बबन्या दिसेचना. तिने डोळे फाडून पाहिले तेव्हा खूप वेळाने तिला त्या अंधारात अंधुक दिसू लागलं. …समोर बबन्या नव्हताच. शिरपा न् सदा उभे होते. आख्खे भिजलेले. गुडघ्यापर्यंत चिखल माखलेले…

“ह्ये न्हाईत. ह्यो पाऊस मुडदा कोसळतुय न्हवं का कवा ठावनं. कुटं आडकून पडल्यात द्येवालाच ठाव..”

शिरपा न् सदाला काय बोलावं सुचेचना. देवाच्या साक्षीनं घडून गेलेलं आक्रित आठवून शिरपा न् सदा अजूनही कासावीस होते. धीर गोळा करून मग शिरपाच बोलू लागला आणि व्हय व्हय करत सदा भेदरल्या अवस्थेत मान डोलवत राहिला. सगळं ऐकून जनी शक्तीच गेल्यासारखी मटकन् खालीच बसली. मनातल्या धुवांधार पावसानं तिचे डोळे चिंब भिजून वाहू लागले. पण आरडून ओरडून रडायचं भान न् त्राण तिच्या भुकेल्या शरीरात नव्हतंच. भाकरीचा तो चंद्रही आता वास हरवलेल्या अवस्थेत विझलेल्या चुलीपुढं दुरडीत मान टाकलेल्या बेवारशासारखा थंड पडला होता..! सकाळी जाताना मागं वळून हात हलवणारा बबन्या तिच्या ओल्या नजरेसमोर तरळत राहिला आणि बबन्यासाठी काकुळतीला आलेल्या जनीचं मन वेडंपीसं झालं. मघाशी भोकाड पसरून रडणाऱ्या त्या आभाळासारखं ते खदखदू लागलं. झिप्रीला तिथंच जमिनीवर टाकून देहभान विसरल्याअवस्थेत ती चिखलपाण्यातून धावत सुटली ..वेशीच्या दिशेने..!       

वेशीसमोर देवाच्याच साक्षीने आक्रित घडून गेलं होतं!!                                             

सांज झाली, तेव्हा आत्ता बबन्या येईल म्हणून जनी सादळलेल्या चुलीत जाळ लावून भाकरी थापत होती तेव्हा तिकडे पावसात अडकलेला बबन्या वेशीवरच्या झाडाखाली उभा होता. शिरपा आणि सदा त्याच्या बरोबरच होते. पावसाचा जोर वाढला आणि झाडाखालीही पाणी ठिबकायला लागलं तसं शिरपा न् सदानं शाळेच्या आडोशाला धाव घेतली. शाळेच्या आवारात पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बबन्या त्यांच्याबरोबर आलेलाच नाहीय. तो झाडाखालीही दिसेना. नजर लांब करून पहायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की वेशीवरच्या मारुतीच्या देवळात कसलीतरी झुंबड उडालीय. ऑपरेशन करून आलेल्या बबन्याला त्यांच्यामागे शाळेपर्यंत इतक्या लांब पळता येईना तेव्हा त्याने जवळच असलेल्या मारुतीच्या देवळाकडे धाव घेतली होती. पाऊस चुकवायला म्हणून देवळाच्या पायरीवरून तो थोडा वर सरकला आणि..आणि तिथं पावसामुळे आधीच देवळात आश्रयाला थांबलेले गावकरी भडकले. ‘हे म्हारडं देवळात आलंच कसं..’ म्हणून ओरडू लागले. आदल्या रात्रीपासून उपाशी असलेला आणि ऑपरेशनच्या वेदनांनी कळवळणारा बबन्या हात जोडून गयावया करीत होता.

“पान्यात भिजाय लावू नगा..’ म्हणत त्यांचे पाय धरायला तो पुढे झाला तसा गावकऱ्यांच्या गर्दीतला एक जण पुढे झेपावला. 

“या म्हारड्यानं द्येव बाटिवला” म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला लागला. ते पाहून बाकीच्यांचीही भीड चेपली. तेही एकामागोमाग एक करीत पुढे आले. बबन्याला धक्के देत त्यानी भर पावसात त्याला देवळापुढच्या चिखलात ढकलला. कुणीतरी जवळचा एक दगड उचलला आणि नवीन दिशा मिळाल्यासारखे एकेक करत सगळेच खाली वाकले. बबन्यावर दगडं बरसायला लागली. हातातल्या काठ्यांचे वार सुरू झाले. बबन्या गुरासारखा ओरडत होता. हातापाय आवळत मार चुकवायचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. रक्ताळलेल्या बबन्याचे मासांचे लगदे लोंबू लागले तसे गावकरी दमून थांबले. मोठ्ठं यज्ञकर्म पार पडल्याच्या समाधानात पांगून गेले. मग पाऊसही थकून थांबला. शाळेच्या  छपराखालून शिरपा न्  सदा वेशीपर्यंत आले तोवर रक्ताळलेला बबन्या मारुती समोर चिखला सारखाच थंड पडला होता..!

…..जनी धावत धापा टाकत वेशीपर्यंत आली तोवर तिथे बबन्याजवळ चिटपाखरूही नव्हतं.वेशीवरच्या देवळात नाही म्हणायला मारुती मात्र उभा होता…! 

जनी बबन्याला आणि त्या देवालाही जाग यावी म्हणूनच जणू  धाय मोकलून आक्रोश करीत राहिली…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ एक अनोखी अनुभूती! ☆ श्री विजय गावडे ☆  

जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट करतांना काय नेऊ, काय नको या द्विधा मनस्तितीतून जात होतो. देव्हारा हालवताना मन गलबललं.  देव्हाऱ्यातील सगळे देव एका जागी डब्यात ठेवून, खाली देव्हाराही हलवला.

दोघांचेही बाबा फोटोतून आमच्या हालचालीवर नजर ठेवून होते. तिचे बाबा, माझे बाबा. दोघेही जिगरी दोस्त.“ ते फोटो गावी नेऊ. राहू  देत तो पर्यन्त इथे.”  ही म्हणाली. मीही आग्रह नाही केला.

सामान सुमान आता व्यवस्थित लावून झालंय. देव्हारा पण छान सजलाय. लहानसा लामणी दिवा लटकताना खूपच शोभून दिसतोय. हा दिवा आणि विठ्ठल रखुमाईची ‘कटेवरी कर’ वाली मूर्ती पंढरपूरी खरेदी केलेली. सासरेबुवा महिंद्रातून रिटायर झाल्यावर आम्हा सर्वांना पंढरपूर यात्रा घडवली होती त्यांनी. स्वखर्चाने.

“अरे! विठोबा रखुमाई कुठाय? देव्हारी तर नाहीये. गेली कुठे. घेताना तर सर्व सान थोर देवताना एकत्र घेतलेलं. गेली कुठे?”——अचानक हिच्या गालावरून अश्रू ओघळले. जोरजोरात हुंदके देत हिला रडताना पाहून मीही हादरलो. रडू आवरून तिला बोलतं केलं—. “ आपल्या दोघांच्या वडिलांना मागे ठेऊन आलो आपण. त्याचीच ही परिणती. विठोबा रखुमाई दोघही रुसलीत आपल्यावर.”

——लागलीच जुन्या घरी जाऊन दोघांही बाबांना सम्मानपूर्वक नवीन घरी आणलं!

पुनः शोध. विठूरखुमाईचा. रखमाय रुसलेली ऐकलेलं. इथे तर दोघेही आमच्या दोघांवर रुसलेली. सहन होत नव्हतं. अस्वस्थता वाढत होती, आणि आज शेवटी त्या कटेवरी कर घेतलेल्या दोघांच दर्शन झालं एकदाचं. गणेशाच्या विश्वास बसणार नाही एवढ्या लहान तस्विरीच्या मागे लपले होते विठुराया, सहकुटुंब! आमच्या कन्या रत्नाचं आगमन होण्यासाठी थांबले होते जणू, प्रगट व्हायचे!

की दोघांच्याही जन्मदात्यांना मागे ठेऊन आल्यामुळे रुसलेले जगत्पिता!—-तो विठुरायच जाणो. 

पंढरीनाथ महाराज की जय

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

पाखरांची चिवचिव आणि कोंबड्यांचं आरवणं दोन्ही रोजच्या वेळेपेक्षा खूपच लांबलं होतं. अखेर सूर्य उगवला, पण तो कमनुसाच होता.आजारातून  उठल्यासारखा.अशक्त. थंड पडलेला.बबन्या इतका वेळ मेल्यासारखा पडून होता पण मग याची जाणीव होताच कोणाचीतरी झापड बसावी तसा झामदिशी उठला.जनी कुशीवर झोपलेलीच होती.टिचभर लांबीचं महारवाड्यातलं बोळकांडातलं  झोपडीवजा घर त्यांचं.तीन महिन्यांच्या झिप्रीनं रात्रभर तिच्या केकाटण्यानं सगळ्यांनाच जागवलं होतं.त्यामुळे कांबळं सोडताना त्याची पाठ कुरकुरली.

डोळ्यातली ओली झोप लोचट मांजरासारखी ठाण मांडून बसू लागली तशी बबन्या सावध झाला. त्याने अंगभर आळस दिला आणि कुणीतरी खेचावं तसं तो उठला.त्याने चूळ थुंकली. मडक्यातलं लोटीभर पाणी तो गटागटा प्याला.

“जने….जागी हायस न्हवं? जातुय म्या..” झीप्री पाळण्यात चिडीचूप झोपली होती. ती त्याच्या आवाजाने दचकली.दीड वर्षाच्या शिन्या जनीच्या उबेला घट्ट झोपला होता. त्याच्यामुळे जनीला आपली कूसही बदलता येईना.ती अलगद उठून दाराबाहेर आली तोपर्यंत बबन्या दहा हात लांब गेला होता.

“लवकर या परतून.ऊनं उतरायच्या आदी या .लई यळ लाऊ नगासा.भाकरी लावून म्या वाट बगते..”

जनीनं पारोश्या तोंडानेच आवाज दिला. बबन्याने वळून हात हलवला आणि तो झपापा चालत राहिला.बबन्या गेला. पण त्याच्याबरोबर जन्मापासून त्याला सावलीसारखं चिकटून बसलेलं त्याचं ‘वंगाळ’ नशीबही होतंच. त्यानंच सगळं होत्याचं नव्हतं  करून टाकलं.

त्याचीच ही चित्तरकथा.. देवासाठी आणि देवाच्या साक्षीने घडलेली..!!

तालुक्याच्या गावकुसाबाहेरचा हा महारवाडा.गावाने पिढ्यानपिढ्या दहा हात लांब ठेवलेला.पण गाव आता जवळ येऊ लागलं होतं. काम निघेल, असेल तेव्हा का होईना पण अंतर कमी होऊ लागलं होतं. सरपंचाची माणसे, कधीकधी सरपंच स्वतःसुद्धा  या वस्तीत डोकावून जायचा.खोटं का होईना पण मिठ्ठास बोलायचा. नेहमी कसलं कसलं इलेक्शन असायचंच.ते नसेल तेव्हा दुसरी कांहीबाही कामं तरी निघायचीच.

आजसुध्दा एवढ्या सकाळीच चूळ भरून बबन्या रस्त्याला लागला होता ते सरपंचाच्याच सांगण्यावरून. झिप्री झाली तेव्हा हो नाही करता करता जनीने ऑपरेशन करून घेतलं होतं.त्याला आता तीन महिने उलटून गेले.झिप्री तीन महिन्यांची आणि तिच्यावरचा शिन्या दीड वर्षाचा.

बबन्याचा आणि जनीचा संसार शहरातल्या माणसासारखा असा चौकोनी होता. पण हा चौकोन त्यांनी जाणीवपूर्वक आखलेला नव्हता. तीही देवाची करणीच म्हणायची. कारण त्यांची पहिली तीन पिल्लं साथीतल्या उंदरांसारखी पटापटा मेलेली होती.चौथ्या खेपेचा शिन्या होईपर्यंत भरल्या अंगाच्या जनीचा सगळा चोथाच होऊन गेला होता.तरीही शिन्याला पाठीशी बांधून जनी बबन्या बरोबर शेतावर मजुरीला जायची. उन्हांतान्हांत राबायची.एक वेळेला का होईना, दोघाना भाकरतुकडा मिळायचा.

शिन्यासाठी छातीला दोन थेंब दूध तरी यायचं. पण झिप्री झाली आणि  जनीचं कंबरडंच मोडलं.

तिची छाती कोरडी पडली.

दिवसभर आळीपाळीनं तिच्या छातीला झोंबणारी शिन्या आणि झीप्री, तोंड ओलं होईना, तशी पेकाट मोडल्यासारखी केकाटू लागायची.तिकडे सरपंचाला ऑपरेशनची एखादी केस हवी होती आणि इकडे या दोघांना पैसा.तीनशे रुपयांची  हाव धरून उपासमारीची झीट आलेली जनी अखेर ऑपरेशनला तयार झाली.

ऑपरेशन झालं, पण यांच्यापर्यंत येऊन पोहोचले फक्त शंभर रुपयेच!त्या शंभरचंही त्यांना खूप अप्रुप वाटलं होतं. पण ऑपरेशननंतर जनीनं अंथरूण धरलं ते अद्याप पुरतं सुटलं नव्हतं.

पैसे आले आणि गेले.घरात खायप्यायची आबाळ पांचवीला पुजल्यासारखी पुन्हा सुरू झाली. पण आता फाटक्या पदरांत दुधाच्या तोंडाची दोन कच्चीबच्ची होती. त्यांना सोडून आणि मोडकी कंबर घेऊन जनीला शेतावर राबणं झेपेना.अखेर त्यांना देवासारखी सरपंचाची आठवण झाली.बबन्यानं त्याचे पाय धरले. मदतीची याचना केली सरपंचाने,’तू  ऑपरेशन करून घेतोस का’ म्हणून विचारलं. नियमाप्रमाणे म्हटलं तर जनीचं

ऑपरेशन झालेलं असल्यामुळे बबन्याला ऑपरेशनचे पैसे मिळू शकणार नव्हते.पण  सरपंच ‘त्येचं मी बघतो’. म्हणाला.नाव बदलून दाखवायचं ठरलं. डॉक्टर सरपंचाच्या खिशातलाच होता. त्यालाही ऑपरेशनची एखादी केस हवीच होती.

बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून

जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता.त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!

क्रमशः —————-

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘बाबांसाठी प्लाज्मा डोनरची आवश्यकता होती. हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर प्लाज्मा मिळू शकेल, असा कळलं. ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मी प्लाज्मा डोनरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि समोर आला, बुधना रहमकर.

‘अरे तुम्ही?’ मला आश्चर्य वाटलं. तुमची कवच कुंडले कुठे गेली?’ तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात?’

गेल्या वर्षी ‘सुपर स्पेशालिटी होस्पिटलमध्ये माझी मोठी काकू करोनावरील उपचारासाठी अ‍ॅडमिट होती. ऐंशीच्या वर तिचं वय होतं. अर्थरायटीसमुळे ती तशीही चालू शकत नव्हती. घरातल्या कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. आमची चिंता होती, तिथे काकूकडे नीट लक्ष दिलं जाईल की नाही? तिची देखभाल नीट होईल ना? कुणी परिचित नर्स मिळेल का,  काकूची नीट देखभाल करण्यासाठी?. एवढ्यात बुधना भेटला. म्हणाला, ‘आपण आपल्या काकूची मुळीच काळजी करू नका. मी त्यांची नीट देखभाल कारेन. आपण गेटवर जे काही द्याल, ते मी त्यांच्यापर्यंत पोचवेन. फोनवर आपलं त्यांच्याशी बोलणं करवीन. तुमची काकू आता माझी काकू आहे. मी त्यांची चांगली काळजी घेईन.’

‘पण तुम्हाला हे लोक आत कसे येऊ देतात?’

‘ मी त्यांनाही मदत करतो.’

‘तुला कोरोनीची भीती वाटत नाही?’

‘नाही. माझ्या शरीरावर कवच कुंडले आहेत. ती मला सुरक्षित ठेवतात.

 ‘कवच कुंडले….’

‘होय. त्यांची नावे आहेत, गरीबी आणि बेरोजगारी.

वर्षभरापासून आपल्यासारख्यांकडून जे मिळतं, त्यावरच मी माझं घर चालवतो.

मी त्याला 200 रु. देत म्हणतो,’ हे ठेवा. नंतर आणखीही देईन. काकू इथे आहेत, तोपर्यंत त्यांच्याकडे  लक्ष ठेवा.’ नंतर काकू बरी होऊन घरी आली.

बुधनाकडे पहात मी म्हंटलं, ‘तुमची कवच कुंडले कुठे गेली? तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात?’

 ‘सर, तेव्हा काय व्हायचं, घरी गेलं की आई सक्तीनं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला लावायची. कसला तरी काढादेखील प्यायला द्यायची. पण जसजसे होस्पिटलमध्ये पेशंट वाढू लागले, तसतसं घरी जाणं बंद झालं. तिथेच जेवणं- खाणं, रहाणं, झोपणं होऊ लागलं. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचं, कामाच्या नादात राहून गेलं आणि एक दिवस पॉझिटिव्ह झालो.’

या दरम्यान मी बुधनाला एक लिफाफा आणि आपलं कार्ड सोपवत म्हंटलं, ’धन्यवाद! तुझ्यापाशी माझं कार्ड ठेव. कधी गरज लागली, तर फोन कर.’

बुधनाने कार्ड ठेवून घेतलं आणि लिफाफा परत करत म्हंटलं, ‘सर, मला माहीत आहे, यात काय आहे. सर मी हे घेणार नाही.’

‘यात फार नाही, फक्त पाचशे आहेत. तुझ्या कामी येतील.’

‘नको सर, मी डोनर नाही, कर्जदार आहे. करोना पेशंटसच्या नातेवाईकांच्याकडून आधीच खूप काही घेतलय.  त्याच्या बदल्यात सेवा देण्याच्या ऐवजी स्वत:च आजारी पडलो. तेच कर्ज मला चुकवायचय.

मूळ हिन्दी कथा – कर्ज़दार  

मूळ लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर‘

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हमीपत्र …. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ हमीपत्र …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 प्रिय गुर्जी,

साष्टांग नमस्कार.

न्हान पनापसन ऐकत आली शाळच्या गोष्टी, गमती जमती.. अगदी किसना सुदाम्याच्या त्या न थांबलेल्या गोष्टी.. कसं ते गुरुकुलात राह्यले, मग एग येगळी कामं करायची अन मग गुरु माऊली कडन शाबासकी घ्याचे!

मला बी मग लै हवस वाटू लागली.असल्या गोष्टी ऐकून कधी एकदा शाळेत जातो,ती पाटी घेतो,अक्षर गिरवतो अन मोठ्ठ काय तर साहेबिन की काय हुतो अस्स वाटू लागलं.

मग मी आईच्या मागं सारखं भुन भुन चालू किली, “मला बी शाळेत धाड.” पण आईनं कसं नुश्या चेहऱ्याने बघितलं माझ्याकडं आन ती काय बोललीच न्हाई.असं रोजचं झालं. समद्या माज्या मैतरणी, पोरं ठोर शाळात जात्यात, ताटली घेऊन भात खात्यात, नवी कोरी कापड मिळत्यात, मी नुसती हरकून जात्या! पण माज्या नशिबात काय न्हाईच असं वाटू लागलंय. आई म्हणती,” काय करायचं लै शिकून?आणि तिनं माझ्या मोट्या भावालाच मला शिकवायला लावलं घरातच;अन तेच्या बरोबरीनं मी शिकतो,लिव्हतो चार मोडकी तोडकी अक्षरं!  आई म्हणती, “बास, पोटापुरत येतंय लिव्हायला,आता कोण पत्र लिव्हतय, तवा तुला वाचा-लिव्हायची उणीव भासल? पण फकस्त तेव्हढंच असतं का शाळत? कित्ती गमती जमती माजा भाऊ मला सांगतो. मी आईला म्हणलंच,”ते काही न्हाई आता सुट्ट्या सम्पत्याल मला शाळत जायचंचय!”

मग आईनं एक गोस्ट सांगितली, ती मी तुमाला सांगते, बारकीच है पण मला लै मोट्टी वाटली. आई म्हणाली,” ही लै लै दिवसापूर्वीची गोस्ट हाय, तवाच्या पोरी लै करून शाळेत जात नव्हत्या. गुरुजी घरो घरी फिरून पोरीच्या घरात समजून सांगून कसं बस एखाद दुसरी पोर शाळत जायची. गिली तर चौथी नायतर सातवी बास म्हणायची. पत्र लिव्हायला वाचायला आलं म्हंजी बास! फुढ शिकलं तरी चूलिफुडच बसायला लागणार आन जितकं जास्त शिकलं तर तसा नवरा हुडकायचा अवघड आणि जास्त शिकलेल्या तेवढा हुंडा कुठंन आणायचा? त्यापेक्षा मधनंच शाळा बंद करायची अन लगीन लावायचं असाच नेम हुता. मी बी शाळेत जात हुते, शाळा म्हंजी गावातच घरापसन जरा लांब एक मोकळा सोपा अन चार खोल्या. एक गुरुजी एक बाई हुत्या. चौथीपर्यंत पास झाले.पाचवीला आमच्यातल्या बऱ्याच पोरी बंद झाल्या,म्हंजी हुत्या पाच -सहा त्यातल्या बी दोन तीन गायब! मग पुना कमी संख्या म्हणून अजून एक बंद! आम्ही दुगीच राहिलो.सातवी पर्यन्त शिकायचंच अन बोर्डाची परीक्षा पास व्हायचंच असंच म्या ठरवलं अन शाळत नित नेमान हजर ऱ्हाऊ लागलो.

पैल गुरुजी अन बाई बदलून गेल्या अन दुसरं दोन नवीन गुरुजी आलं. अळी पाळीने आमच्या वर्गावर शिकवू लागलं. एक रजेवर  गेलं तरी दुसरं शाळा चालवायचं! सहा महिने निघून गेलं अन माझ्या बरोबरच्या त्या दुसऱ्या पोरीचं पण लगीन ठरलं. राहिले मीच! ना-नू करत कशी बशी कधी पूर्ण कधी अर्धा दिवस अशी मी शाळा करू लागले.

एक दिवस गुरुजींनी आईला बोलवून सांगितलं, “तुमची लेक खूप हुशार आहे, तिची शाळा चुकवू नका, उद्या पासून आम्ही दोघे जास्तीच वर्ग घेतो तेव्हढं न्यायची  आणायची सोय करा.” मग कधी आई तर कधी शेजारच्या कुणाबरोबर माझी येण्याजाण्याची  सोय झाली. परीक्षा जसजशी जवळ येऊ लागली तशी मला लैच हुरूप आला. मी सातवी फास होणार! आनंदानं मनपाखरू उंच उंच उडायचं. त्या दिवशी अशीच जादाच्या तासाला सुरुवात झाली. हस्त निघाला होता. दुपारीच काळ्या काळ्या ढगांनी सगळं झाकोळून गेलं हूतं. ढगांचा गडगडाट अन विजांचा कडकडाट पोटात भीतीचा खड्डा पाडत हुता. मी गुर्जीना सांगून घरचा रस्ता धरला पण पावसानं रस्त्यात गाठलंच. मोठं- मोठ्या सरी  चुकवता चुकवता चिंब भिजले. इतक्यात मागून गुरुजींची हाक आली, “अगं सरू, भिजू नको,आजारी पडशील अन मग अजून शाळा बुडेलचल, इथंच शेजारच्या वाड्यात मी रहातो, पाऊस कमी झाला की सोडेन घरी. “

मी गुरुजींच्या मागोमाग चालू लागले. वाड्यातल्या सोप्यातच मी अवगडून उभी राहिले त्या संतत धारा एकटक पहात भान हरपून! इतक्यात माझ्या खांद्यावर कुणाचा हात पडला. मी दचकून माग बगीतलं.

‘गुरुजी?’ गुरुजींच्या डोळ्यात येगळच काय दिसलं,असल्या चिंब गारठ्यात माझ्या अंगावर विजेचा लोळ पडल्या सार्क झालं. मी तडक धाव घेतली सोप्याबाहेर. दप्तर तिथंच फेकलं अन धो धो पावसात मागं न बघता पळत सुटले. रस्त्यावरच्या पाण्यात परकराचा घोळ आवरता येईना पण मी जिवाच्या आकांताने घर गाठल; अन धपदीशी पायरीवर पडले. डोक्याला खोक पडली. भीतीनं छाती धडधडू लागली अन मी तिथं तशीच बसून राहिले शून्य हून!  त्या दिवसापासून मी शाळेचा धसका घेतला अन गप्प घरात राह्यले ते कायमची!”

गोस्ट सम्पली…

आईची गोष्ट मला कळाली, आई म्हणाली,”आता शाळचं रूप बदललंय, पण गुरुजी? तुज्याही  नशिबाला असंच काय येऊ ने “

इचार केला, अन मग मीच ठरवलं तुमालाच पत्र लिव्हायच अन आईला हमी पत्र लिहून तिची भीती घालवायला सांगायचं. जमंल का तुमाला? असं ईचारायच!

जमंल गुरुजी तुमाला माज्या आईला पत्र लिव्हायला? येऊ ना मग शाळेला??

एक बिचारी मुलगी

© सौ.सुचित्रा पवार

१९ मे २०१९

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लग्नगाठी ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवन रंग ☆ लग्नगाठी  ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

मनातल्या भावनांवर कसातरी आवर घालत –मनाविरुध्दच ती बेडरुममध्ये आली.हो मनाविरुध्दच, कारण हे लग्नच तिला मनाविरुध्द करावे लागले होते.

खिडकीजवळच्या खुर्चीवर तो— काही तासांपूर्वीच झालेला तिचा नवरा बसला होता. नाही म्हणायला डोळ्यापुढे पुस्तक होते, पण काहीसा अस्वस्थच.

हातातील मोबाईल ठेवायला ती टेबलापाशी गेली–अन् तिचे लक्ष गेले —तिथे असलेल्या एका फोटोवर.

आश्चर्य, चीड, खेद, भिती, असहायता–सगळ्या भावना मनात एकदमच उफाळून आल्या. नकळतच फोटो हातात घेऊन ती जवळजवळ ओरडलीच,

“हा——हा –फोटो इथे कसा?”

पुस्तकांतून बघणारा तो, –जणु काही तिच्या प्रतिक्रियेची वाट पहात होता.

हळुच उठुन तिच्याजवळ जाऊ लागला. ती मात्र , डोळ्यातला राग, ओठांची थरथर, अन् चेहर्‍यावरचा संताप लावुन शकत नव्हती.

पण त्याचा शांत चेहरा,स्निग्ध डोळे,अन् संथ चाल.

तिच्या हातातला फोटो हळुच घेऊन,तेवढ्याच सौम्यपणे म्हणाला,

“हा –हा तुझा—-“

त्याचे वाक्य पुरे न होऊ देताच तिचे काहीशे किंचाळणे, “हो, हो होता तो माझा अन् मी त्याची. खुप खुप प्रेम होते –नाही अजुनही आहे आमचे एकमेकांवर.”

आणि आपण हे काय बोललो — म्हणुन मनात खंतावत, हतबल होऊन, मान खाली घालुन, मटकन खुर्चीत बसली. एवढा वेळ दाबुन ठेवलेले अश्रु मुक्तपणे गालावर ओघळु लागले.

टेबलावर असलेला आणखी फोटो, घेऊन, तिला दाखवत, तिच्याजवळ जात, 

“”बघ, जरा इकडे बघ””

मान वर करुन तिने फोटोतल्या सुंदरशा मुलीकडे बघितले. गोंधळलेल्या, बावरलेल्या नजरेने.

फोटोकडे बघत, त्याचा हळुवार आवाज, “” हा –हा जसा तुझा होता, तशीच ही माझीहोती. अगदी जीवापाड प्रेम करत होतो आम्ही.”

त्याचे डोळे पाणावले.

तिचे साशंक शब्द,””काय? ह्या -ह्या दोघांचे लग्न?”

“हो,–का अन् कसे?आता चर्चा करुन काय ऊपयोग? Marreges are settled in Heaven.  कुणाची लग्नगाठ कुणाशी बांधायची हे नियतीने आधीच ठरवलेले असते.आपण त्यात काही करु शकत नाही,फक्त मान्य करायचे,स्वीकारायचे,अन् मागचे विसरुन पुढे जायचे,””

क्षणभर थांबून, “ही माझी philosophy, पटते का तुला,?

नसेल पटत तरी सक्ती नाही”.

त्याच्याकड  बघत, हळुहळु पुढे येत तिने त्याच्या हातातले दोन्ही फोटो घेऊन टेबलवर पालथे ठेवले.

तिला जवळ घेऊन त्याने तिच्या डोळ्यातले पाणी पुसले.

दोघांच्याही मनातले भावनांचे वादळ __शांत झाले, —एकमेकांच्या आश्वासक , प्रेम स्पर्शाने.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ४ ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग ४  ☆ सुश्री सुमती जोशी ☆

पाखीचा कार्यक्रम दुसरा होता. या कार्यक्रमाचं निवेदन झाल्यावर संपूर्ण हॉलभर आनंदाची लाट उसळली. ‘फूल, फूल, ढले ढले’ रवींद्र संगीताच्या स्वर्गीय सुरांनी सगळा हॉल भरून गेला होता. पडदा उघडला. रंगमंचाच्या दोन्ही बाजूनी पांढराशुभ्र पोशाख घातलेल्या, गुलाबी हेअर बँड लावलेल्या, दागदागिन्यांनी नटलेल्या पऱ्यांच्या वेषातल्या मुली प्रवेश करू लागल्या. सगळ्याजणी एकसारख्या दिसत होत्या. रिद्धी. शिंजीनी, रूपसा कोणती हे वेगळेपणानं ओळखता येत नव्हतं. शुकतारा आणि नंदिता दोघीही उत्तेजित झाल्या होत्या. “पाखी कुठंय? पाखी?”

पहिल्या रांगेतल्या मुलींकडे बोट दाखवत नंदिता म्हणाली, “रांगेतली चौथी मुलगी म्हणजे आपली पाखी.”

नीट निरखून पहात उद्वेगानं शुकतारा म्हणाली, “नाही आई. ती मुलगी पाखीसारखी दिसतेय, पण ती पाखी नाही. आपली पाखी आणखी बारीक आहे.”

“ती मागच्या रांगेत असेल.” व्याकूळ होत नंदिता नातीला शोधू लागली.

किंचित स्मित करून चंद्रोदय उठला. “थांब पुढे जाऊन फोटो काढतो. कॅमेऱ्याची लेन्स नक्कीच पाखीला शोधून काढेल.”

शुकतारा अस्वस्थ झाली. सगळ्या रवींद्र संगीताच्या तालावर विलोभनीय नाच करत असल्या तरी त्यांचं मन पाखीला शोधण्यात गुंतलं होतं. रंगमंचावर पंचवीस मुली आहेत याचं चंद्रोदयला आश्चर्य वाटलं. ज्यांनी आपल्या मुलीला शोधलं ते पालक खूश दिसत होते. गाण्याचे मंजुळ सूर आणि नृत्याचा ताल याकडे दुर्लक्ष करत ते आनंदातिशयानं म्हणत, “ती बघ श्रेया, ती बघ तितली, ती बघ मामणी, ती बघ…” चंद्रोदयनं अनेक फोटो काढले पण कॅमेऱ्याच्या लेन्सला पाखीला शोधता आलं नाही. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तालावर नाचता नाचता शेवटच्या रांगेतल्या मुली पुढे आल्या, तरीही त्यात पाखी कुठेच दिसेना. तो अस्वस्थ झाला.

नाच संपल्यावर फुलपाखराप्रमाणे उडत उडत मुली विंगेत गोळा झाल्या. शुकतारा वेडीपिशी झाली होती. चंद्रोदयपाशी जात म्हणाली, “तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर ग्रीन रूममध्ये चला. मला काही हे बरोबर वाटत नाहीय.” चंद्रोदयला काही बोलायचा अवकाश न देता शुकतारा जवळ जवळ ओढतच त्याला घेऊन विंगेत गेली. पडदा पडला होता. पुढच्या कार्यक्रमाच्या निवेदनाचा आवाज हॉलमध्ये ऐकू येऊ लागला. ग्रीनरूमच्या दरवाजात आता अपाला उभी नव्हती. आतमध्ये मुलींचा चिवचिवाट चालू होता. शुकतारा आणि चंदोदय आत आले तेव्हा अपाला मुलींना खाऊची पाकिटं वाटण्याच्या तयारीत होती. “अगं अपाला, रिद्धी कुठंय? रिद्धी तर नाचलीच नाही.”

गोंधळलेल्या अपालानं मागे वळून पाहिलं. भुवया उंचावत ती उद्गारली, “असं कसं झालं?”

अपाला शोधू लागली. पालकांच्या शेकडो चौकशांना तोंड देणं आता तिला शक्य नव्हतं. अपाला हाका मारू लागली, “रिद्धी, कुठे आहेस तू? सगळ्या मुलींपाशी ये.” काय झालंय ते पंचवीस मुलींना समजेना. त्या अवाक होऊन अपालाकडे पाहू लागल्या. कोणीच पुढे आलं नाही. आता मात्र अपालाचं धाबं दणाणलं. शुकतारा तिच्यावर तुटून पडण्याआधीच चंद्रोदयनं शांतपणे विचारलं, “स्टेजवर किती मुली होत्या?”

“सत्तावीस मुली होत्या.” अपालानं एका दमात उत्तर दिलं.

“मोजून बघा. इथे पंचवीस जणीच आहेत.”

अपाला मोजू लागली. “एक, दोन, तीन, चार….तेवीस, चोवीस, पंचवीस! असं कसं झालं? उरलेल्या दोन मुली कुठंयत?” क्षणभर अपालाच्या तोंडून शब्द फुटेना. ती ग्रीनरूमच्या बाहेर आली आणि व्हरांडयाच्या डाव्या बाजूला असलेल्या एका खोलीत शिरली. पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी ही खोली वापरत असत. ती खोली व्यवस्थापकांनी आज त्यांना वापरायला दिली होती. खोलीत शिरल्यावर अपालाचे डोळे फिरले. मोठया सोफ्यावर बसून निशिगंधाच्या माळा आणि अनेक छोटया छोटया वस्तू गोळा करून रिद्धी आणि सोमदत्ता स्वत:च्या खेळात रंगून गेल्या होत्या. साजशृंगार झाल्यावर या दोघी सगळ्यांच्या नजरा चुकवून इथे कधी आणि कशा आल्या त्याचा अपालाला पत्ताच लागला नाही.  मेकअप बिघडू नये, आपापसात भांडू नये म्हणून आटापिटा करता करता कोण आहे आणि कोण पळालंय ते अपालाला समजलं नाही. कुठेही रिद्धी आणि सोमदत्ताचा आवाज येत नव्हता. कुठला रंगमंच, कुठला कार्यक्रम आणि कुठला नाच….’खेळायच्या खोली’त खेळतांना त्या देहभान विसरल्या होत्या.

समाप्त

श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ शारदीय आनंद बाजार २०११ या बंगाली कथेचा भावानुवाद

भवानुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print