मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

आज गोरेगाव, मुंबईच्या सन्मित्र शाळेचे १९८६ च्या दहावीच्या बॅचचे सगळेजण खुशीत होते. फारा दिवसांनी आज त्यांचं नाशिकला गेट टुगेदर होतं. व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेजा-मेसेजी व्हायची नियमितपणे, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंदच काही आगळा.

बऱ्याच जणांच्या विशेष खुशीचं कारणही तसंच विशेष होतं – आज त्यांचा सुपरहिरो त्यांना प्रत्यक्ष भेटणार होता – सुनील लुकतुके, डेप्युटी कलेक्टर – त्यांचा वर्गमित्र, आजच्या गेट टुगेदरला येणार होता.

त्याला भेटणं म्हणजे बौद्धिक मेजवानी असायची. सर्वसामान्य मध्यमवर्गातला मुलगा, मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेला, कोणतेही ट्युशन – क्लासेस न लावता, आपल्या मेहनतीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि टप्प्याटप्प्याने बढती घेत आज डेप्युटी कलेक्टर पदावर विराजमान झाला होता. आपल्या कर्तृत्वाने, निर्भीड, निस्पृह वागण्याने त्याच्या नावाचा डंका सर्वत्र गाजत होता आणि शाळामित्र – वर्गमित्र या नात्याने आपोआपच या सगळ्यांची कॉलर ताठ होत होती.

आजही तो लाल दिव्याची सरकारी गाडी न आणता, सगळ्यांबरोबर ग्रुपने केलेल्या बसने मुंबईहून नाशिकपर्यंत आला होता. गाण्याच्या भेंड्या, नकला – सगळ्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तो सहभागी होत होता, खळखळून हसत होता, रुसत होता, फुरंगटत होता, मज्जा करत होता.

सर्व मित्र मैत्रिणींना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत होता. एवढा मोठा माणूस, पण कोणतीही शेखी न मिरवता चारचौघांप्रमाणे सगळ्यांच्यात मिसळत होता – जणू अजून सगळेच जण शाळकरी होते.

पण त्यांना कल्पना नव्हती की त्या सगळ्या मित्रमैत्रिणींइतकाच, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त खुश स्वतः सुनील होता. आणि यामागचं त्याचं कारण होतं की त्याचे सुपरहिरो त्याला आज प्रत्यक्ष भेटत होते.

वर्गातल्या अनेक जणांशी तो फोनवरून संपर्कात होता, काहीजण व्हॉट्सॲपमुळे संपर्कात होते. आणि यातूनच त्याच्या सुपर हिरोंचे विविध पैलू त्याला उमगत होते.

तो विनी फडणीसला भेटला होता. तिचा पहिला मुलगा normal होता, पण धाकटी मात्र स्पेशल चाइल्ड होती. विनीचं कौतुक हे होतं की ना तिनं “माझ्याच नशिबी हे का” म्हणून कधी दैवाला बोल लावला ना तिनं एकाकडे लक्ष देताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज तिचा मुलगा तर कॉलेजात व्यवस्थित शिकत आहेच आणि तिची मुलगी भरतनाट्यम आणि स्विमिंगमध्ये, ती शिकत असलेल्या संस्थेला भारंभार सुवर्णपदकं मिळवून देत आहे. ज्यांची मुलं अशी शैक्षणिक दृष्ट्या challenged आहेत अशा पालकांना समुपदेशन करण्यासाठी विनीला त्यांच्याच सन्मित्र शाळेने नुकतेच बोलावले होते.

किशोर सरोदे हा त्याचा दुसरा हिरो. त्याचा मुलगा आता तेरा चौदा वर्षांचा आहे. आज सगळे स्पर्धात्मक युगात आपापल्या मुलांवर अभ्यास, tuitions या सगळ्यांची भारंभार ओझी लादत असताना, या पठ्ठ्याने मात्र लॉन टेनिसमध्ये प्राविण्य दाखवणाऱ्या आपल्या मुलाची शाळा बंद केली होती. त्याचा मुलगा – राघव आता पूर्णवेळ टेनिस खेळतो आणि आईवडिलांना विम्बल्डनच्या vip stand मध्ये बसवून सामना दाखवण्याचं स्वप्न उरी बाळगून आहे. आज राघव under 14 वयोगटात all India level च्या साठाव्या रँकिंगला पोचला आहे.

स्वतः इंजिनीयर असूनही, मुलाचे कौशल्य आणि मेहनत घेण्याची तयारी बघून एवढा मोठा निर्णय घेणारा किशोर सुनीलला स्तिमित करत होता.

स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा असलेली सुनंदा गोडबोले त्याला आज कित्येक वर्षांनी भेटत होती. तिचा नवरा पोलीस हवालदार होता. दारू पिऊन बायकोला मारहाण करणं हा त्याचा आवडता टाईमपास. आणि त्याच्या या छंदात त्याची आई आणि भाऊ सक्रिय सहभागी. माहेरची अति गरीबी असल्याने सुनंदाचे परतीचे दोर केव्हाच कापले गेले होते. पण सासरच्यांकडून इतका छळ होऊनही सुनंदा खचली नव्हती.

निरलस सेवा करून जेव्हा तिनं आजारपणात खितपत पडलेल्या सासूचे प्राण वाचवले, अपघातानंतर सेवा सुश्रुषा करून दिरांना शब्दशः आपल्या पायावर उभं केलं आणि नवरा नोकरीतून सस्पेंड झाल्यावर तिच्या पोळीभाजी केंद्राने जेव्हा घर चालवलं, तेव्हा कुठे तिच्या सासरच्यांचे डोळे उघडले आणि ती आता सन्मानानं सासरी रहात होती.

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी कर्करोगाचे निदान झाल्यावरही न खचणारा आणि करोना काळात नवरा बायको एकाच वेळी icu त असूनही निराश न होणारा प्रति टॉम क्रुझ मनिष …

विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नोकरी गमावलेला, नंतर करोनामुळे घरी बसावे लागलेला, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपली सदाबहार विनोदबुद्धी कायम राखणारा हिमांशू …

सुनीलच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये, शाळेत असताना त्याचा अभ्यास घेण्यापासून त्याच्या आईची महत्त्वाची भूमिका होती. आज त्याच्या अनेक वर्गमैत्रिणी स्वतः करीअर करण्याची संधी व पात्रता असूनही मुलांना यशस्वी करण्यासाठी पूर्ण वेळ गृहिणी झाल्या होत्या आणि आपापल्या परीने सुनीलच्या आईची भूमिका निभावत होत्या.

बाकी मित्र मैत्रिणींपैकी कोणी सायबर गुन्हे तज्ञ, कोणी योगगुरू झाले होते. कोणी शरीराला प्रमाणबद्ध करणारा – वळण लावणारा बॉडी बिल्डर, तर कोणी मनाला वळण लावणारे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, कीर्तनकार, कोणी डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, उद्योगपती, आर्मी ऑफिसर, आणि या सगळ्यांचे रुसवे फुगवे सांभाळत, क्वचित कधी डोळे वटारून पण बरेचदा प्रेमाने सांगून – समजावून – चुचकारून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा all rounder निलेश … सुपर हिरोंची ही यादी न संपणारी होती.

त्याची बायको त्याला नेहमी विचारायची – “तुझे शाळा सोबती तुझे सुपर हिरो का आहेत ?” आणि त्याचं नेहमी उत्तर असायचं की “हे एका साध्यासुध्या सुनीलचे मित्र आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या सुनीलचे मतलबी, फायद्यासाठी झालेले तोंडदेखले मित्र नव्हेत. शाळा कॉलेजात लौकिक अर्थाने त्यांना कदाचित कमी गुण असतील, पण आयुष्याच्या परीक्षेत ते त्याच्याइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच यशस्वी होते.

ते आर्थिक दृष्ट्या किती यशस्वी झाले, त्यांचं नाव –  मानमरातब किती आहे हे त्याच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं. पण त्यांची झुंजार सकारात्मक वृत्ती त्याला प्रेरणादायक होती.

गुरू ठाकूरने

“असे जगावे छाताडावर

आव्हानाचे लावून अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर”

ही कविता जणू या दोस्तमंडळींना बघून, अनुभवून आणि उद्देशून लिहिली होती आणि म्हणूनच ते सगळेच त्याचे सुपरहिरो होते, आहेत आणि राहतीलही.

आजच्या गेट टुगेदरच्या दिवशी, सगळेच जण आपापल्या सुपर हिरोंना भेटून जाम खुश होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके 

गडद काळोखामुळे दोन्ही बाजूंनी लढाई थांबबावी लागली आहे. उद्याच्या पहिल्या किरणांसोबत पुन्हा मृत्यू नाचू लागेल रणांगणावर आणि घेईल घास कुणाचाही. मृत्यूला कुठे शत्रू आणि मित्र सैन्यातला फरक समजतो? कुणीही मेला तरी त्याच्याच मुखात जाणार म्हणून तो हसतमुखाने वावरत असतो….वाट बघत थंड पडत जाणा-या श्वासांची.

मित्रसैन्य अलीकडच्या आणि शत्रूसैन्य पलीकडच्या भागात लपून बसले आहे अंधाराच्या पडद्याआड. गोळ्या झाडायच्या तरी कुणावर? दिसले तर पाहिजे या काळोखात. म्हणून परस्पर बाजूंना थोडीशी जरी हालचाल झाल्याची जाणिव झाली की अंदाजे बार टाकायच्या त्या दिशेला. यावेळी मात्र दोन्ही बाजू शांत होत्या. एका सैन्य तुकडीचा नायक आपल्या खंदकात भिंतीला टेकून बसला आहे. रातकिडे युद्धभूमीतल्या दिवसभरातल्या घडामोडींची जणू चर्चा करताहेत. झाडावरचं एखादं वटवाघुळ मधूनच दचकून उठल्यासारखं उडून जातंय आणि पुन्हा त्याच जागी येऊन चिकटून जातंय एखाद्या फांदीला. त्यांना रात्रीच दिसतं म्हणे !

एवढ्यात सैन्य तुकडी-नायकाच्या तीक्ष्ण कानांनी रणभूमीवरचा कण्हण्याचा क्षीण आवाज टिपला. कुणी तरी सैनिक बिचारा शेवटच्या घटका लवकर उलटून जाव्यात, एकदाचं सुटून जावं परलोकीच्या अज्ञात मुलखात यासाठी देवाला साकडं घालतोय. आपण आता हे जग पुन्हा पाहू शकणार नाही, याची त्याला पूर्ण खात्री वाटते आहे. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई, बहिण, भाऊ, मित्र उभे आहेत..आणि उभे आहेत बाबा ! त्यांचा निरोप घेऊन तो मागील वर्षीच पलीकडच्या राज्यात गेला होता संगीत शिकायला. आणि आता ही दोन्ही राज्ये एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. बाबांना न कळवताच तो त्या राज्याच्या सैन्यात भरती झालाय…संगीत वाद्यांच्या जागी आता त्याच्या नाजूक हातांत जीवघेणी हत्यारं आहेत.

विव्हळण्याचा तो आवाज सैन्य-तुकडी नायकाला शांत बसू देईना. कोण जाणे…तो आपल्याकडचाच सैनिक असला तर? त्याचा जीव वाचवू शकतो आपण ! नायकाच्या डोक्यात विचार सुरू होता. वरिष्ठांना विचारायला वेळ नव्हता आणि तशी परवानगीही कुणी त्याला दिली नसती. खुल्या मैदानातल्या युद्धभूमीत जाणं मोठ्या जोखमीचं होतं. तरीही नायक सरपटत सरपट्त निघाला त्या वेदनेच्या आवाजाच्या रोखाने. हालचाल टिपली गेली दूरवरच्या अंधारातून आणि गोळीबार होऊ लागला. तशाही स्थितीत नायकाने त्या जवानाला खेचून आणलेच आपल्या खंदकात. पण मघाशी आर्त स्वराच्या साथीने सुरू असलेले त्याचे श्वास मात्र आता थांबले होते. नायकाने खंदकातील कंदील त्या जवानाच्या चेह-यावर प्रकाशाची तिरीप पडेल असा धरला आणि त्याचा श्वास थबकला….बेटा ! त्याने अस्फुट किंकाळी फोडली. मोठ्याने रडणं त्याला शोभलं नसतं. त्याने कंदीलाची वात आणखी मोठी केली. आपल्या लेकाच्या चेह-यावरचं रक्त आपल्या हातांनी पुसलं आणि त्याच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेतलं. माणसा-माणसांतील रक्तरंजित संघर्षाने एका मुलाला आपल्या बापापासून कायमचं दूर केलं होतं.

रात्रभर नायक आसवं ढाळत राहिला. शत्रूकडून अधून मधून होत असलेल्या गोळीबारास उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. उलट तिकडूनच एखादी गोळी यावी आणि काळीज फाडून निघून जावी आरपार असं त्याला मनोमन वाटत होतं. तेवढीच भरपाई होईल एका जीवाची. आमच्या गोळ्यांनी हा संपला आणि त्यांच्या गोळ्यांनी मी संपून जावं…एवढा साधा हिशेब होता !

वरिष्ठांपर्यंत सकाळी बातमी गेलीच. सैन्य तुकडी-नायक आता फक्त एक बाप होता..अभागी ! त्याने विनंती केली…माझ्या लेकाला सैनिकी मानवंदना देऊन, बिगुलच्या, ड्रम्सच्या गजरात त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासाला पाठवू द्यात…माझा लेक सैनिक होण्यासाठी नव्हता जन्माला आला. त्याला संगीतकार व्हायचं होतं !  व्यवस्थेकडून नकार आला…कारण कितीही केला तरी तो शत्रू सैनिक. फार तर एक सैनिक देऊ बिगुल वाजवू शकणारा..त्याच्या थडग्यावर ! अगतिक बापाने हे मान्य केलं. लेकाच्या कोटाच्या खिशात त्याला एक गाणं सापडलं..कागदावर लिहिलेलं…रक्ताने माखलेल्या. गाण्याच्या शब्दांसोबत गाण्याच्या वाद्य-सुरावटीही वळणदार आकारात कोरून ठेवल्या होत्या कागदावर आणि खाली सही होती दिमाखदार….संगीतकार…..कुमार…………!

बापानं त्याच्या त्या गतप्राण झालेल्या मुलाचं शव खड्ड्यात हळूहळू उतरवलं….जगातली सारी आसवं त्याच्याच डोळ्यांत अवतरली होती जणू…..त्या आसवांनी खड्ड्याच्या वरची माती भिजू लागली…त्यातलीच एक मूठ माती त्याने खड्ड्यात शांतपणे चिरनिद्रेत गेलेल्या त्या देहावर टाकली. बापाच्या कुशीत मूल झोपतं तसा त्याचा चेहरा दिसत होता.

बिगुल वाजवणा-या सैनिकासमोर बापानं ती सुरावट धरली….जीव ओतून..प्राण फुंकून वाजव…माझ्या मुलाचे शेवटचे स्वर ! त्यानेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही…..छातीतली सर्व हवा त्याने बिगुलात फुंकण्यास प्रारंभ केला. युद्धभूमी डोळ्यांत प्राण आणून या मरणसोहळ्यातील स्वरांची उधळण पाहू लागली..कानात प्राण आणून शब्दांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू लागली…..

सैनिका…दिवस कडेला गेलाय आता….सूर्य तळ्याच्या, डोंगरांच्या आणि आभाळाच्याही पल्याड गेलाय.

सगळं ठीक आहे आता…नीज शांतपणे…दमला असशील ! देव इथंच जवळपास आहे !

अंधार डोळ्यांना काही पाहू देत नाहीये….पण आकाशातला एक तारा लकाकू लागलाय !

दुरून कुठून तरी रात्र येऊ लागलीय चोरपावलांनी !

देवाचे आभार मानावेत आज दिवसभरातल्या श्वासांसाठी !

ह्या विशाल गगनाखाली, ह्या सूर्याखाली, या ता-यांखाली

आपण आहोत आणि आपल्यावर त्याची दृष्टी आहे….

नीज बेटा ! देव इथंच जवळपासच आहे ! …… 

….. बिगुल वाजवणारा सैनिक प्राणपणानं ही सुरावट वाजवून आता थकलाय…त्याच्या बिगुलातून निघणारे सूर आता मंद मंद होत जाताहेत ! ते संपताच बाप त्याच्याकडे वळून म्हणाला….आता ही लास्ट पोस्ट सुरावट थांबव…. शिबिरातल्या सैनिकांना झोपेतून उठवणारी सुरावट..रिवाली वाजव…मित्रा ! हा माझा फौजी पोरगा आता उठेल…अंगावर सैनिकी वर्दी चढवेल आणि निघेल युद्धभूमीवर…वन्स अ सोल्जर…always अ सोल्जर !

(सैनिकांना अंतिम विदाई देताना बिगुलवर दी लास्ट पोस्ट सुरावट वाजवली जाते. त्या सुरावटीचा इतिहास अभ्यासताना ही एक काहीशी दंतकथा वाटणारी किंवा असणारी हृदयद्रावक कथा हाती लागली. ती आपल्यासाठी मराठीत लिहिली…माझ्या पद्धतीने आणि आकलनाच्या आवाक्याने.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग ३ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग ३ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

 (मागील; भागात आपण पाहिले – तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले. आता इथून पुढे )

येता दिस नव्यासारखा सुरू झाला.

दोघी फुईभाच्यांनी मिळून लोनच्याची तयारी केली.आख्खा दिवस आडकित्त्यानी कैऱ्यांच्या फोडी करन्यात गेला .फोडी साफ करून मिठाचं पानी काढून टाकून हळदमीठ लावून वाळाया घातल्या. करकरीत फोडी आता जरा मऊ पडल्या.

पुढच्या खोलीच्या दाराचे दोन्ही कान उघडल्यावर उन्हाचा कडोसा हक्कान आतमंदी आला व्हता.त्या कडोश्यात न्हालेल्या फोडी हळदूल्या दिसत व्हत्या. जसजसं ऊन चढत गेलं तसतसं फोडींनी अंग चोरलं. आतीच्या कुंकवावानी रंगाच्या लुगड्यावर त्यांचा पिवळा रंग लय तेज दिसत व्हता.

तेवढ्यात त्या समद्या लालपिवळ्या वाळवनावर येक परकरी सावली पडली. जोडीदारीन आली व्हती..

हातात गोधडीचा बोजा.

आती आणि संगीला मोहऱ्या निवडतांना पाहून ती घुटमळली आन हळूच म्हनली,

“मावशे!! संगीला घडीभर पाठवती का माझ्याबरबर  नदीवर?”

आतीनं जरावेळ विचार केला..

“अं..येवढा का गं उशीर आज पान्याला?

बरं जा घेऊन तिला. पन तिन्ही सांज व्हायच्या आधी येऊन लागा बर्का.जा गं संगे! तुझा मामा किर्तनातून परत यायच्या आदी ये “

“हुं” म्हनत हातातलं ताट परातीत सारून संगी पटकन उठली. आतीलाबी वाटलं,

 ‘तेवढाच जीव रमंल पोरीचा.’

दोघी नदीच्या वाटंला लागल्या.जोडीदारीन संगीला उगीच इकडचा तिकडचा विषय काढून बोलतं करायचा प्रयत्न करीत व्हती.संगी वरवर समदं ठीक असल्यासारखं बोलत व्हती.पन अंमळशानं तिचा आतीमामांसमोर घातलेला आनंदी मुखौटा चिरफाटला.जोडीदारनीला समदं समजत व्हतं.

“संगे!! तुला कळलंच असंन ना?”

“काय गं?”

“शिंदेसायबाच्या मोठ्या पोरीचं जमलं म्हनत्यात.”

यदौळ खालमानेनं चालनाऱ्या संगीनं चमकून वर पायलं.तिच्या चेहऱ्याची थरथर व्हवू लागली. निसतंच कानावर पडनारं बोलनं आता थेट काळजात शिरलं व्हतं..जखम करीत व्हतं.ती काई बोलली नाई. आशेचा बारकासा धागाबी तटकन तुटून गेला.काळजाच्या डव्हात गरगरत दिसेनासा झाला.

जराशानं संगीनं मोठा श्र्वास घेतला,सुटल्यासारखं हसली. तिनं मनाच्या पाटीवरून मागल्या ऐतवारचा परसंग पार पुसून टाकला.पैल्यासारख्या..पार पैल्यासारख्या गप्पा सुरू केल्या.जोडीदारनीला हायसं वाटलं.

नदीकाठची त्यांची नेहमीची गप्पांची जागा जवळ आली .दोन काळेभोर ,मोठाले दगड..त्यांच्या बाजूला चाफ्याची चारदोन झाडं जीव खाऊन फुलल्याली.जुन्यापान्या झाडांचा वाळला पाचोळा साऱ्या वाटंवर पायाखाली इथूनतिथून गालिचासारखा अंथरलेला.पोरींच्या पायतळीच्या रेषा त्या वाटेला ठावकी व्हत्या. भुईचंपा,पळशी,पाचुंद्याची फुलं उन्हाला वाकूल्या दाखवीत व्हती. समद्या झाडांवर पिवळ्या,पोपटी,हिरव्या रंगांच्या पानांचे पक्षी अंगभर फुल्लारलेले.नदीवरून गार गार वारं येत व्हतं.मातीचा वल्ला वास मनाचा ताबेदार झाला व्हता.सोबत पाखरांच्या गप्पा..

नदीमायच्या साक्षीनं दोघी गूज बोलू लागल्या.गोधडीला धुता धुता मनबी निर्मळ झालं जनू.

गोधडी वाळू घातल्यावर दोघीही कातळावर ओनावल्या.पाय नदीच्या पान्याबरबर नाचत व्हते.पैंजनं गानी म्हनत व्हती.वल्लं शरीर कातळाच्या खरबरीत पन मायाळू पाठीवर सैलावलं .दोघींचेबी डोळे निळ्या आकाशात ढगांच्या कापूसगोंड्यांकडं टुकूरटुकूर बघत व्हते..     जरावेळ पाठीचा काटा मोडल्यावर जोडीदारीन म्हनली, “संगे चल आपून तो जुना खेळ खेळू…कपच्यांचा.बघू कुनाची कपची नदीवर जास्त उड्या मारती??”

निळ्या आकाशाकडे बघतांना निळ्याच डोळ्यांची मालकीन झालेली संगी निळाईचा हात धरूनच म्हनली,

“चल.”

दोघींच्या चेहऱ्यावर हसन्याचं खुळं फूल उमललं.दोघींनीबी खेळासाठी बऱ्याच कपच्या शोधून   आनल्या.चढाओढीनं नदीच्या डव्हाचा तलम पदर छेदू लागल्या. आधी आधी घटकेत बुडी मारनाऱ्या कपच्या जुन्या दिसांची शपथ आठवल्यावर पान्यावर नाचू लागल्या.तो तो पोरींच्या हसण्याला उफाळ आला.संगीची कपची तर दोन दोन डुबक्या घेत लांबवर पळत व्हती‌.जोडीदारनीला तर काई जमंना.ती फुरंगाटली,

“संगे!! तुझी कपची कसं काय बरं दोन डुबक्या मारती? माझी तर बळंबळं येवढीतेवढी येक उडी मारती आन् खुशाल बुडी घेती बघ..आता गं?”

तेवढ्यात मागून एक कपची तीरासारखी सरसरत आली आन नदीच्या पदराशी नाजूक छेडखानी करीत तीन डुबक्या मारीत दुसऱ्या तीराच्या दिशेनं  गेलीबी. दोघींनाबी काई सुधरलंच नाई. संगीच्या हातातली कपची तशीच व्हती.येवढा नेम कुनाचा बरं? असा आचार करून दोघींनी मागं वळून पाह्यलं.

“काय जमतंय का?” पल्लेदार पुरूषी आवाज आला. मिशीच्या आकड्यावर ताव भरत कूनाचीतरी रांगडी आकृती कातळावर येक पाय ठिवून उभी व्हती.त्याच्या दंडावर तटतटलेले स्नायू संगीच्या नजरेत भरले…

पुन्यांदा.

महिपतरावाचा पोरगा समोर ऐटीत उभा व्हता.जोडीदारीन म्हनली,

“अगं हा तर ऐतवारी आलेला पावनाच दिसतोय..”

संगीनं वळखलं नवतं थोडंच? तिनं तिच्याबी नकळत त्याच्याकडं रोखून बघितलं आन तिची नजर खाली झुकली.तळव्यात घट्ट धरलेली कपची घामेजून चिंब झाली.तिच्या मनात राग व्हताच आन त्याच्या नजरेचा मागबी..

डोळे नको भरायला म्हनून ती मासूळीसारखी तडफडत व्हती.जोडीदारीन त्यांची जुगलबंदी बघत हलकंच चार पावलं मागं सरकली ..सुर्यातळी पाठ करून असलेल्या जोडीदारनीची सावली लांबत गेली.

दोघांमधील जडावल्या बाईसारखी शांतता येकदाची बाळंतीन झाली.संगी रागं भरलेल्या आवाजात बोलली ,

” तुमचं लगीन जमल्याचं साखरपान वाटायला आलात व्हय इथं? शिंदेसायबाचं दुकानातले आयतं बुंदीलाडू आमच्या आदबूनिदबू केलेल्या पुरनपोळीवर भारी पडलं म्हनायचं..”

संगीच्या रागाची आगवळ सुटली होती.तिनं मनातलं गरळ वकून टाकलं आन तोंड पुन्यांदा शिवून टाकलं.. पन दोन्ही डोळ्यांची तळी तिच्या आवरन्याला न जुमानता खळ्ळकन भरून आली. गुलाबपाकळ्यांवानी असलेल्या पातळ नाकपुड्या थरथरू लागल्या.जिवनी बारीक पोरावानी बाबर ओठ काढती झाली.

समोरच्या राकट चेहऱ्यावर आता खट्याळ हसू फुललं व्हतं.त्यादिवशीचं बुजऱ्या हसन्याचं ठिगळ कुडल्याकुडं पांगलं व्हतं.

“अस्सं झालंय व्हय?’

‘ हुं!  तुमाला कोनी सांगितलं ह्ये?”

संगीनं मागं वळून पाह्यलं.तिचे डोळे जोडीदारनीला शोधत व्हते.

“तिकडं काय बघताय? मी सांगितलं तर जमंल ना?”

पोरगा पुन्हा एकदा खोडकर हसला.संगीची सैरभैर नजर पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर गुतली.. त्याच्या गालावरच्या खळीत घट्टमुट्ट अडकून बसली.

“अवो बाईसाहेब!! शिंदेसायबाच्या पोरीची ष्टाईल या गावरान गड्याला कवा रूचायची? शेताच्या बांधावरनं फिरता फिरता तिचं तंगडं मोडाया बसलंय…शेहरातली मड्डम ती. माज्या गळ्यात पट्टा बांधून दाराशी बांधायजोगी..

………..

गावच्या यड्याला गावचंच कोन तरी खूळं मानूस पायजेल…नाय का? जे मानूस गड्याच्या मातकट हातानं खुडलेली चिच्चाबोरं न लाजता खाईल.. शेनामुताचा वास येतो म्हनून पावडरीनं धूत बसनार नाय…” येक गडगडाटी पन मायाळू हसू नजर खाली झुकलेल्या संगीला ऐकायला आलं..तिच्या नजरंसमोर त्याचा मर्दानी हात आला. त्या मोठाल्या तळव्यातली चिच्चाबोरं पाहून संगी हरखली.यदौळ रडू येऊ नाई म्हनून तिनं शिकस्त केली व्हती पन आता मातूर डोळ्यातलं पानी थांबायचं नाव घेत नवतं.दुसऱ्या तळव्यात खाऱ्या पान्याचं तळं भरत चाललं व्हतं.मनातल्या रानपाखरांच्या पंखात आता बेगुमान वारं भरलं व्हतं… 

– समाप्त – 

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग १ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग १  – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

बांधावरला आंबा मव्हारला तवाच आती म्हनली ,

“यंदाच्या वर्साला मोप आंबे येतीन..पोरीचं हात याच वर्सी पिवळे केले पायजेल…बिना आईबापाचं लेकरू त्ये. मव्हारला आंबा लगेच डोळ्यात भरतोय.गावात  कुतरमुतीवानी ठाईठाई माजलेल्या रानमुंज्यांची काई कमी नाई..”

चुलीपुढं बसलेल्या आतीच्या तोंडातून काई शब्द

मामांशी आन् सोत्ताशी निगत व्हते.आविष्याला पुरलेल्या भोगवट्यामुळं तिला अशी मोठ्यांदी बोलायची सवय लागली व्हती. ती बोलत असली की, मामा जराजरा ईळानं आपसूक ‘हुं, हूं’ करत पन तंबाखू मळायच्या नादात नेमकं कायतरी मत्त्वाचं हुकून जाई आन आती पिसाळल्यागत करी.

“या मानसाला मुद्द्याचं बोलनं कवाच ऐकू जायचं नाई “.

बारीक असतांना संगीला त्यांच्या या लुटपुटच्या तंट्याची लय गंमत वाटायची पन जशी ती शानी व्हत गेली तसतशी तिला आती आन मामांच्या डोंगरावरढ्या उपकाराची जानीव झाली. म्हनूनच मग

हुशार असूनबी धाव्वीतूनच तिचा दाखला काडला , तवा ऊरी फुटुन रडावा वाटलं तरीबी ती रडली नाई.तसं ऊरी फुटून रडावं असे परसंग आतीमामांनी येऊ दिलेच नव्हते तिच्यावर. लोकंबी नवल करीत,

‘भाची असूनबी पोटच्या पोरीसारखी वाढीवली शांताबाईनं संगीला’ असं म्हनत. 

कोनी म्हनायचं , ‘ माह्यारचं तर कुत्रं बी गोड लागातंय बायांना.ही तर आख्खी रक्तामांसाची भाची.खरा मोठेपना असंल तर तो तिच्या नवऱ्याचा.’

‘अवो! कशाचं काय? त्याला सोत्ताचं पोरच झालं नाई. त्याचा कमीपना झाकायला म्हनून त्यानं बी मोडता घातला नसंल.’

‘ खरंय बया तुजं.त्याचं सोत्ताचं पोर झालं असतं तर कशाला त्यानं बायकूच्या माह्यारचं मानूस संभाळलं असतं?’

लोक धा तोंडांनी धा गोष्टी बोलत पन संगीसाठी तर ती दोघं विठ्ठलरुक्माईच व्हती.संगीचा बाप घरच्याच बैलानं भोसकला..समदी आतडी चिरफाडली गेली. त्या दुखन्यातच त्यो गेला आन् त्याच्यामागे दोनच वर्सांत मायबी. कुरडईचा घाट घेता घेता अचानक पेटली.कांबळं टाकेपर्यंत अर्धीनिर्धी करपली व्हती.शेवटी गेलीच.संगी तवा तीन वर्सांची व्हती. मायबाप आठवतबी नव्हती तिला.पन तरीबी कदीतरी ‘मायबापं कशानं गेली’ हे कुन्या नातेवाईकानं भसकन सांगितल्यावर तिला रडू आलं व्हतं.

साळंच्या पैल्या दिशी मामांनी साळंत नेऊन घातलं, तवा तर तिनं रडून हैदोस घातला व्हता. वर्गात मुसमुसत असलेल्या संगीला मास्तरीन म्हनली व्हती, ” सख्खी पोर नसूनही शाळा शिकवत आहेत.किती मोठी गोष्ट आहे ही.” समदं तिला समजलं नाई पन रडू आपोआप थांबलं ह्येबी खरं… 

आतीमामांनी घातलेल्या मायेच्या पायघड्यांवरून संगी चालत राहिली.दुडदुडत पळत जानारी तिची चाल जलम येईस्तवर नागिनीसारखी तेज व्हत गेली. 

आज आतीच्या तोंडून अवचित सोत्ताच्या लग्नाची बोलनी ऐकल्यावर, बांधावरच्या आंब्यावानी संगीच्या मनातबी मव्हर डवारला व्हता.निराळ्याच तंद्रीत आता तिची कामं व्हत व्हती. रामाकिसनाच्या काळापासून तिच्या रक्तात भिनल्यालं बाईपन आता ठसठशीत व्हत चाललं. सोत्ताच्या नकळत ती आतीचा सौंसारातला वावर निरखू निरखू बघू लागली व्हती.

आतीबी ‘ पोर आता शानीसुरती झाली,तिला सौंसारातलं बारीकनिरीक कळाया पायजेल.कुडं अडायला नकं’ या इचारानं येवढीतेवढी गोष्ट तिला दाखवू दाखवू करीत व्हती. आत्तीच्या अनभवांच्या ठिपक्यांवरून संगी भविष्याची रांगुळी वढत चालली व्हती.

” हे बघ!! हे आसं करायचं..दानं आसं पाखडायचं.. समदं सुपातून वर उधळायचं, वाऱ्यावर झूलवायचं..वाईट-साईट, कुचकं-नासकं टाकून द्यायचं आन निर्मळ तेवढंच पोटात ठिवायचं. बाईच्या जातीला पाखडाया आलं पाहिजेल…”

आती काई सोत्ताशी, काई पोरीशी, काई चार भितीतलं तर काई पोथीतलं ती बोलत व्हती.संगी जशी उमज पडंल तसं समदं साठवून घेत व्हती. 

‘शांताबाईची संगी लग्नाची हाये’ आसं समद्या भावकीत आता म्हाईत झालं व्हतं.येक दिस सांजच्याला मामा हातावर मशेरी मळत असताना आतीनं ईषय काडला,

“काय कुठे उजेड दिसतोय का?”

मामांनी वर न बघताच मशेरीची यक जोरदार फक्की मारून तोंडात कोंबली आन् सावकाशीनं सांगितलं,

” यक जागा हाये. महिपत्या नाय का? खंडोबाचा साडू, त्या जनाबाईच्या चुलतभावाचा पोरगा..”

” हा मंग!! चांगला लक्षात हाये तो.

गिरजीच्या पोरीच्या लग्नात त्यानीच तर देन्याघेन्यावरून गोंधूळ घातला व्हता.लय वंगाळ मानूस…”

आतीला मधीच थांबवीत मामा म्हनले,

” त्याचा पोरगा हाये लग्नाला..”

आतीला जरा ईळ काई बोलायलाच सुधारलं नाई. उलसंक थांबून ती म्हनली,

“तसा येवढाबी वंगाळ नाई .गिरजी तरी कुठं लय शानी लागून चालली??”

आतीचा उफराटा पवित्रा पाहून मामांना मिशीमंदी हसाया आलं.

” बरं ते हसायचं नंतर बघावा.. पोरगा कसाय? काय करतो? “

” लय भारी हाय म्हंत्यात दिसायला. घरची पंचवीस येकर बागायती शेती, पोटापुरतं शिक्षेनबी हाये. सोभावबी त्याच्या आईसारखा हाये.. गरीब.महिपत्यासारखा नाई.

…पोर सुंदर पाहिजेल पोराला फक्त”

संगीचं समदं काळीज त्या बोलन्याकडं लागून रायलं व्हतं.तिच्या मनात बागायती शिवार डोळ्यांपुढं नाचत व्हतं. बांधावर असलेल्या आंब्याच्या बुडी बसलेल्या आपल्या रांगड्या नवऱ्याला ती न्याहारी घेऊन जायाचं सपान बघू लागली.मनातल्या कोऱ्या चेहऱ्याला आकार येऊ लागला. तेज तलवारीवानी नाक आन् काळ्याभोर मधाच्या पोळ्यासारखा दाट मिशीचा आकडा आसं काईबाई तिच्या मनात उगवत व्हतं,मावळत व्हतं.

आतीमामांनी लय जीव लावला पन समज आल्यापासून मिंधेपनाची जानीव संगीचा पिच्छा करीत व्हती. सख्ख्या मायबापापाशी जसा हट्ट करता आला असता तसा तिनं आतीमामांपाशी कदीच केला नाई. जे हाय ते गोड मानून घेत रायली. आता नवरा नावाचं हक्काचं मानूस तिला मिळनार व्हतं..ज्याला ती सांगू शकनार व्हती, कच्च्या कैर्‍या पाडायला. ज्याच्या मोठाल्या तळव्यात चिचाबोरं ठेवून येक येक उचलून खायला, दोघांनी मिळून बांधावर मोकळ्यानं फिरायला, मास्तरांच्या इंदीकडे हाये तशी झुळझुळीत पोपटी रंगाची साडी घ्यायला, इहिरीत पवायला शिकवायला. राहून गेलेल्या कितीतरी हौशी..ज्या आतीमामांनी भीतीपोटी आन् संगीनं भिडंपोटी कधीच पुरवून घेतल्या नव्हत्या.

तिच्या मनातल्या मव्हरलेल्या आमराईवर आता रानपाखरं गाऊ लागली व्हती‌. 

तंद्रीत हरवल्यानं तिला आतीमामांचं पुढचं बोलनं ऐकाया गेलं नाई.

आती काळजीच्या आवाजात म्हणत होती,

“महिपत्याचं काई सांगता येत नाई.त्याला आपली संगी पसंत पडती,ना पडती?”

“लगीन महिपत्याच्या पोराला करायचंय का महिपत्याला? आन काय म्हनून नाकारतीन?अशी कंच्या बाबतीत डावी हाये आपली पोर? गोरीदेखनी हाये,घरकामात चलाख, शेतीत घातली तर सोनं पिकवील..अजून काय पायजेल? आन तुला वाटत असंल आपल्या परस्थितीचं…तर महिपत्यापासून काय आपली परस्थिती लपून नाई.. जिरायती का व्हईना पन जमिनीचा टुकडा हाये..लय डामाडौलात नाई पन पावन्यारावळ्यात कमीपना येनार नाई असं लगीन लावून द्यू.”

” या वरसाला पावसानं दगा दिला नाईतर..”

” रीनपानी करू सावकाराकडून..नायतर म्हैस हायेच आपली.बघता यील कायतरी”

“अवो पन..म्हैस हाये म्हनून दुधदूभतं तरी मिळातंय..ती इकल्यावर कसं व्हायचं?”

“त्ये बघू अजून..पावनी अजून यायचीत,त्यांनी पोर पसंत करायची..मग पुडलं बोलनं.लय हुरावल्यासारखं नको करू”

“लगीन तर लावू कसंबी पन देन्याघेन्यावर अडून बसले मंग..?”

“नाईतर त्याचा बाप दुसरा.. एवढं काय पानी पडलंय त्या पोरावर?त्याला काय सोन्याचा पत्रा बशिवलाय? आपल्या पोरीसारखी  पोर कुठं घावनारे त्यान्ला?”

यावर आतीनं मान डोलावली.बोलनं तिथच थांबलं खरं ,पन दोघांन्लाबी आशा लागलीच व्हती. 

दुसऱ्या दिशी सक्काळ सक्काळ आती म्हनली,

“मळ्यातला आंबा तरी उतरून घ्या तेवडा. जमलंच संगीचं लगीन तर लोनचं-बिनचं घालता नाई यायचं.थोडं वडं,पापड,शेवया केल्या पायजेल. यावर्साला पोर हाये हाताखाली.पुडल्या वरसाला कसंबी होवो.”

संगीच्या रूपाकडं पाहून ‘पावनी नाई म्हननार नाईत.लगीन जमल्याशिवाय रहायचं नाई’ असं तिला मनापासून वाटत व्हतं.बोलता बोलता आती मशेरी थुकायला म्हनून भाईर गेली आन डोळ्याचं पानी पुसून आली ह्ये कोनलाच कळलं नाई.

संगी कुरडयांसाठी गहू भिजू घालीत व्हती.कुरडयचा ढवळासफीद, ऊन ऊन चीक साखर टाकून खायला तिला लय आवडायचा.तिच्या जोडीदारनी तिच्यासाठी ध्यान करून चीक आनीत.तिची आवड माहित असूनबी आतीनं कुरडयांचा घाट घरी कदीच घातला नव्हता. वानळा आलेल्या कुरडयांवरच त्यांचं वरीस निघून जाई.पन् यावर्षाला मातूर आतीनं कुरडयांचं मनावर घेतलं व्हतं.संगीला प्रश्र्न पडला.तिनं विचारलंबी,सावकाशीनं आती बोलली,

“इतके दिस तुला काई म्हनले नाई..पन माझी वयनी,तुझी माय कुरडयाचा घाट घेता घेता भाजली त्ये मीच पाह्यलं व्हतं डोळ्यानं..मोप हाकबोंब केली पन वयनी नाई वाचली.तवापासून कुरडया करूशीच वाटल्या नाई कदी.”

संगी गुमान ऱ्हायली..

“आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”

बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं. 

क्रमश: भाग १

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

“काय????” जोरात किंचाळत अमोघने सईला विचारले.. दचकून आजूबाजूच्या टेबलवरची लोकं पाहू लागली.

“आपण हॉटेल मध्ये आहोत… be calm अमोघ… चील मार…” सई कॉफीचा घोट चवी चवीने पीत म्हणाली.

अमोघ वैतागत म्हणाला, “तुझं हे चील ना मला कधी कधी शेखचिल्लीची आठवण करून देत राहतं… काय करशील तुझा नेम नाहीय.. काहीही वेड्यासारखा विचार करू नकोस.. आई तुला हे सगळं बोलली का?? मला आईशी बोलावं लागेल… नक्की प्रॉब्लेम काय आहे?? काय कमी आहे आत्ता तिला…?”

“हे बघ… मी तुला सांगते आहे… विचारत नाहीय… आईनाही यातलं काहीही माहिती नाहीये .. म्हणजे कल्पना आहे ..आणि हे मनात आले की पटकन मी करून मोकळी होते म्हणून आज तुझी बायको म्हणून बसलेय तुझ्यासमोर… नाहीतर तू दहा वेळा कबड्डी खेळाडूसारखं माझ्यापर्यंत येऊन मागे जात होतास.. रेषेला न शिवता… आठवतं ना…”

अमोघला आठवलं, इंजिनीअरिंगला असतानाच सई त्याला खूप आवडायची. पुढे जाऊन दोघांना नोकरी लागली. हळुवार प्रेम मनात उमलू लागले, पण ते सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आपल्या घरी आई एकटीच… आपला आणि सईचा तेव्हाचा आर्थिक स्तरही वेगळा…

एके दिवशी रविवारी ही सई सरळ घरी आली होती. आईने केलेले पोहे खाऊन चक्क तिनेच विषय काढला होता. तिला अमोघ आवडतो, तिच्याइतकी आत्ता आर्थिक परिस्थिती नसली तरी त्याच्या हुशारीवर असलेला तिचा विश्वास, त्यालाही ती आवडते असा दाट संशय… सगळे काही बोलून मोकळी…. आपण तर नुसते बघतच बसलेलो होतो. तिने उचललेलं हे पाऊल… पुढे लग्न… तिची साथ… मनासारखं घर… अवनी सारखी गोड मुलगी… आईचे कमी होत गेलेले कष्ट…. सईचं आईला आपलंसं करून घेणं… सगळं काही क्षणार्धात समोर येऊन गेलं….

तडकाफडकी मनात येईल ती बोलत आणि करत असली, तरी त्या मागे तिचे ठाम विचार.. त्या दिशेने कृती.. हे त्याला चांगलेच माहिती होते..

सवाष्ण नाही म्हणून आई लग्नात विधीला बसायला तयार नव्हती. या सईने आग्रह करून सूनमुख आईच आधी पाहणार असा हट्टच केला होता..

जसे आठवत होते तसे आई कधीच आरशासमोर उभी राहिलेली त्याला आठवली नाही. दोन मिनिटं छोट्या आरशात बघून बाजूला व्हायची.

तो तीन वर्षांचा असताना त्याची आजी आणि वडील दोघं एका अपघातात दगावले होते. आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा काहीही, पण आईने स्वतःला साध्या साड्या, साध्या रुपात गुंतवून घेतलं होतं. किती गोष्टी तिने मागे टाकल्या होत्या याची त्याला आत्ता कल्पना येत होती, स्वतः चा संसार सुरू झाल्यावर.. तरीही ती जे काही बोलत होती ते अजिबातच त्याला मान्य नव्हते… आईचं लग्न….

तो बुरसटलेल्या विचारांचा नक्कीच नव्हता, तरीही हे जे काही चालवलं होत सईने, ते त्याला पचनी पडत नव्हतं… तो एकदम गप्प होऊन गेला होता….

त्याच्या मनातली घालमेल पाहून सईने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला… “मला तुझ्या मनातली उलथापालथ अगदीच समजते आहे. मी खूप वेळ घेतलाय. काही गोष्टी माझ्या लेव्हलवर पास केल्या आहेत, आणि मग तुझ्याशी हे बोलते आहे… तुझ्या इतकंच… कदाचित तुझ्याहीपेक्षा जास्त मी आईंशी जोडले गेले… त्यांच्या शाळेच्या नोकरीत भागणार नाही हे ओळखून आजोबांनी त्यांची शिवणकलेची आवड व्यवसायात बदलण्यासाठी केलेले प्रयत्न, आईंचे कष्ट, सगळी कलात्मकता पणाला लावून नोकरी आणि व्यवसाय यावर तुला मोठं केलं त्यांनी. अवघा तीन वर्षांचा त्यांचा संसार… त्याच्या आठवणीत आजवर आयुष्य काढलं त्यांनी… आजोबांचंही शेवटच्या दिवसात किती केलं ते मी कॉलेजमध्ये असताना पाहिलं आहे. तुला सांगू… लग्नानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणायचे, ‘तुम्हाला छान सिल्कच्या साडीत.. कानातले.. बांगड्या.. केसात मोगऱ्याचा गजरा.. असं पहायचं आहे. तुम्ही भान विसरून आरशात बघत बसल्या पाहिजेत…’  त्या हसून सोडून द्यायच्या..”

“ बरं…. ‘यासाठी लग्नाचा घाट’ असं तुला वाटतं असेल तर नीट ऐक…  त्यांनी इतकी वर्ष एकाकी काढली. आपण आहोतच रे सोबत… पण आपलेही काही ना काही उद्योग सुरूच असतात…

तुला सांगू… म्हणजे हे माझे विचार आहेत.. प्रत्येकाला अगदी कोणत्याही वयात हक्काची सोबत लागतेच की.. ‘मी आहे ना…’ असं सांगणारा एक आवाज… कधी आपले लाड करणारं… वय विसरून लहान करणारं हक्काचं माणूस.. संवाद साधायला… अगदी कधी मनात आलं, तर मी जशी तुझ्याशी भांडते तसं भांडायलाही कुणीतरी हवं… बरं वाटत नाहीये… हे सांगायला अर्ध्या रात्री शेजारी कुणी हवं….”

तिला थांबवत अमोघने विचारले, “मग आता काय तू आईचं नाव वधुवर सूचक केंद्रात घालते आहेस का काय… यातून पुढे काय होईल याचा विचार केला आहेस..? लोकं काय म्हणतील??”

सईने लगेच उत्तर दिले… “किती आले होते रे तुझे नातेवाईक तुम्हाला मदत करायला… आणि जे मी तुला सगळं सांगितलं तसाच एक छान मेसेज बनवून मी सगळ्यांना पाठवणार आहे. कुणाला काही प्रश्न असणार नाहीत त्यांच्या लग्नानंतर…  .हे बघ, अवनी एरवी रविवारी अभ्यास करते का? पण परीक्षा असली की आपोआप न सांगता अभ्यासाला बसते… ती मानसिकता रुजलेली असते. तशीच थोडी मानसिकता सगळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात रुजवते… करते प्रयत्न…”

“आता इतका विचार केलाच आहेस तर लग्न कुणाशी आणि आई कुठे जाणार हेही सांगून टाक…”

“त्रागा करून घेऊ नकोस… काळजीही करू नकोस… गेले सहा महिने मी साठे काकांना पाहतेय… बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले आहेत… परवा नाही का तू होतास तेव्हा मला होममेड कणकेची वडी घेऊन आले होते… ते.. बायको कॅन्सरने गेली… बारा वर्ष झाली.. मुलगी लग्न होऊन ऑस्ट्रेलियात असते… सोसायटीत असलेल्या प्रोग्रॅममुळे आमची घट्ट मैत्री.. उत्साही.. स्वतः ला सकारात्मक कामात गुंतवून घेतलेले काका .. मुलांना किल्ले बनवायला मदत कर.. कामवाल्या मावशींच्या मुलांना शिकव.. गृहिणींसाठी आर्थिक साक्षरतेची कार्यशाळा घे.. असे असले तरी ही क्वचित एक उदासी जाणवली त्यांच्या चेहऱ्यावर…

मी त्यांच्याशी, त्यांच्या लेकीशी बोलून.. त्यांची परवानगी घेऊन… त्यांचं मत विचारात घेऊनच तुझ्याशी बोलतेय… आईना मी नाही, पण काकांनी कल्पना दिली आहे या सगळ्याची… त्या हो म्हणत नाहीत, पण नाही ही म्हणाल्या नाहीत… तू काय म्हणशील हा विचार… लोकांची धास्ती आहेच… त्यांनी स्वतःला मिटवून घेतलं आहे… नवरा नाही.. या एका गोष्टीपायी या पिढीमधल्या सगळ्याच बायकांनी कदाचित असंच स्वतः ला बंद करून घेतलं आहे……

….. आणि इतकं सगळं जुळून येतंय म्हणूनच हे तुला सांगते आहे. आपण बोलू सगळ्यांशी… मार्ग काढू… आणि त्या आपल्या जवळच राहतील.. दोघंही… अवनीला एक छान आजोबा मिळतील.. माझा आग्रह नाही तू त्यांना वडील मानावं असा… पण एक उबदार सोबत तुला नक्की मिळेल ही खात्री करूनच मी पुढे जायचा विचार करते आहे..

मी तर म्हणेन आईना एक दोन वर्ष राहू दे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये… कधी हौसेने त्यांचं माहेरपण झालं नाही, की सणवार… मला त्यांचं माहेरपण करायचं आहे… वर्षभर त्यांचे सगळे सण त्यांना नवीन साडी घेऊन मस्त साजरे करायचे आहेत मला … त्यांना मनापासून तयार होऊन आरशात पाहताना मला बघायचं आहे…..  अमोघ.. इतकं सोसून त्याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत आई… खूप शिकले मी त्यांच्याकडून… कधी एका शब्दाने ‘मी इतकं केलं…’ never… मी मनापासून काही ठरवते आहे.. मला तुझी फक्त साथ हवीय.”

अमोघ गप्प होत म्हणाला.. “बाई गं.. येत्या वटपौर्णिमेला मी वडाला फेऱ्या मारतो …ही वेडी मुलगी मला सगळे जन्म बायको म्हणून दे….”

हळूहळू सगळ्यांशी संवाद साधत दोघांनी गोष्टी पुढे नेल्या… सुमतीबाईंना सईने स्वतःच्या हाताने तयार केले होते.. आजवर झुगारून दिलेला मोठा आरसा… हिरवा रंग त्यांना अंगभर भेटायला आला होता.. लाल काठाची हिरवीगार पैठणी… हातात हिरव्या बांगड्या.. हाताला मेंदी… गळ्यात मोजके दागिने… नाकात नथ… केसात सुंदर गजरा…

त्या भान हरपून आरशात पहातच राहिल्या… डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते… तशाच काही भावना चेहऱ्यावर दिसलेले सईचे प्रतिबिंब त्यांना त्यात दिसले… नेहमीसारखे चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि डोळ्यात पाणी… “बघा आई… मी म्हणाले होते ना… एक दिवस तुम्ही स्वतःला विसरून आरशात बघत राहाल असे काही मी करेन…”

आरशात एक छबी कैद झाली होती…. एकमेकींच्या मिठीत विसावलेल्या त्या दोघींचे चेहरे …statue केल्यासारखे…

लेखिका : सुश्री रेणुका दिक्षित

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(किती अल्प संतुष्ट आहे ग हं विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग? महत्वाकांक्षा नको का काही ?” ) इथून पुढे —-

“ बरं वैदेही, ते जाऊ दे आता. किती पैसे लागतील ते सांग मला. मी चेक देते तेवढ्या रकमेचा “ .वैदेही आणि ऋचाला रडू आलं. आपल्याला वाटलं तशी आजी कठोर आणि आपमतलबी नाही हे ऋचाला समजलं. “ किती व्यवहारी आहे आपली आई ! तिचं ऐकलं असतं तर आपणही ताई माई सारखे पैसा गाठीला लावून राहिलो असतो.”   वैदेहीला ऋचाचं लग्न केवळ आईच्या मदतीमुळे  चांगलं करता आलं. ऋचाला छान नेकलेस,  व्याह्यांचे मानपान, सगळं हौसेने करता आलं. 

ऋचा सासरी जाताना आजी सांगायला विसरली नाही, “ ऋचा, बाईला आपली आयडेंटिटी जपता आली पाहिजे बरं ! तुझी नोकरी तू काहीही झालं तरी सोडू नकोस. तुझ्या आईची फरपट कायम लक्षात ठेव. इतकी गुणी आणि हुशार माझी वैदेही, पण बघ ना, एक चुकीचा निर्णय आणि जन्मभर पश्चाताप आला बघ नशिबाला. माझा जीव तुटतो तिच्यासाठी ! तुझ्या दोन्ही मावश्या पण लबाड आहेत बरं का ग! जपूनच अस हो त्यांच्यापासून !”

ऋचा हसली आणि आजीला मिठी मारून म्हणाली,”आज्जी, कित्ती ग हुशार होतीस तू ! अशीच आहेस का ग पहिल्यापासून?” आजी हसली आणि म्हणाली, “नको  का अशीच मी ऋचा? तुझे आजोबा भोळे सांब ! मी खमकी होते म्हणून नीट संसार केला बरं ! अग, संसाराला बाई चतुर धोरणी हुशार  लागते बाळा! कायम लक्षात ठेव !अग पैसा असेल तरच सगळं खरं बरं ! नाहीतर सगळे गुण मातीमोल होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ए रोहित ठोंब्या,तू सुद्धा !” रोहितने आजीला उंच उचलले आणि गरगर फिरवले. “ अरे हे काय मेल्या, मरेन ना मी !”– “ छे ग आजी,अजून मी डॉक्टर कुठे झालोय? मी डॉक्टर झालो की मग मरायचं ! आत्ता नाही !” – “ बाई गं वैदेही,अफाट आहे बरं पोरगं तुझं.”  आजी खुदुखुदु हसत आत गेली.  

ऋचा सासरी गेली आणि वैदेहीला घर सुनंसुनं झालं. आईला म्हणाली, “आई यावेळी नको ना जाऊ माईकडे ! थांब माझ्याजवळ ! मला माहीत आहे, तिकडे तुझी आबाळच होते, पण तू बोलत नाहीस.  दोघींकडे सुना मुलं नातवंडे असा धबडगा असतो. मला समजतं ग ! माझी जागा मोठी असती तर मी कायम तुला संभाळले असते बघ !”  आई उदास झाली.  म्हणाली, “चालायचंच वैदेही ! त्यानाही करू दे जरा आईची सेवा !तरी मी तुझ्याचकडे राहते जास्त, आणि ते पथ्यावरच पडलंय त्यांच्या ! यावेळी राहीन बाळा, पण दरवेळी नको आग्रह करू हं !” दोघींचे डोळे भरून आले. आजी खूप थकली आणि मग मात्र ती जास्त जास्त वैदेहीकडे राहू लागली. ताई माई लहर लागली तर फिरकत,, नाही तर येतही नसत. रोहित सुंदर मार्क मिळवून डॉक्टर झाला आणि त्याला हवी तशी सर्जरीला ऍडमिशन मिळाली  आजीला अतिशय आनंद झाला.आजी म्हणाली,” रोहित, माझं एक काम करशील? आपल्या नगरकर वकिलांचा मुलगा वकील झालाय ना? त्याला बोलावून आण.उद्याच.” रोहितने वकिलांना बोलावून आणले. आतल्या खोलीत बराच वेळ चर्चा चालली होती, पण ती कोणीच ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी नगरकर वकील गाडी घेऊन आले आणि आजींचे मृत्युपत्र रजिस्टर झाले सुद्धा ! आजींना फार समाधान झाले. ” रोहित, मला वचन दे.तू वैदेहीला नीट संभाळशील. कधीही अंतर देणार नाहीस “ .. .” नाही ग आजी, मी असं कसं करेन? मी आईला कायम संभाळणारच ! आणि तुला सुद्धा ! माझं लग्न नाही का बघणार तू?” रोहित लाजला. “ अरे लबाडा ! आत्ता सांगतोस होय? ये बघू घेऊन तिला उद्या !” 

दुसऱ्याच दिवशी रुचिराला घेऊन रोहित घरी आला. “आजी, ही बघ तुझी नातसून ! अगदी ढ आहे, काहीही येत नाही स्वयंपाक ! नुसतीच आहे डॉक्टर ! तूच शिकव हं हिला सगळं ! “ रुचिरा हसत होती. “आजी, मला सगळं येतं हो !काहीही सांगतो हा गाढव !”— “आजी, सर्जन नवऱ्याला गाढव म्हणत का ग तुमच्या वेळी?” सगळे हसण्यात सामील झाले.

वैदेहीला,आजीला ही गोड रुचिरा अतिशय आवडली. त्याच रात्री, काहीही हासभास नसताना आजी झोपेतच गेल्या. रोहितला अतिशय वाईट वाटले. त्याची आजी म्हणजे तर त्याची जिवाभावाची मैत्रीण– ती  गेली ! पण सगळ्यानी समजूत घातली, “अरे किती जगायचे रे त्यांनी ! चौऱ्याण्णव हे काय कमी झालं का वय? सगळं बघितलं त्यांनी !अगदी नातसून सुद्धा !आणखी काय हवं रोहित? झोपेत किती छान शांत मृत्यू आला त्यांना !” 

दिवस कार्य झाल्यावर नगरकर वकील आले. “ सगळ्याना बोलावून घ्या,आजीचं मृत्युपत्र वाचायचं आहे तुमच्या समोर ! “— ‘आईनं  मृत्युपत्र केलं होतं? आम्हाला नाही बोलली काही कधी !’ ताई माई म्हणाल्या. अतुलही अमेरिकेतून आला होता.

नगरकर वकीलानी सगळ्यांसमोर मृत्युपत्र उघडले. मृत्यूपूर्वी आठच दिवस आजीने रजिस्टर्ड मृत्युपत्र केले होते. आजींनी त्यात लिहिले होते,— “ माझा  जुना वाडा रोहितला द्यावा. तिथे त्याने हॉस्पिटल काढावे. हवे तर पाडून नवीन  हवी तशी इमारत  बांधावी.  आमच्या वास्तूचा असा  सदुपयोग दुसरा कशाने होणार?  माझ्या ताई माईना मी माझ्या फिक्स डिपॉझिट रिसीट निम्म्या निम्म्या देऊ इच्छिते. माझा दुसरा फ्लॅट वैदेहीला देण्यात यावा. माझे दागिने अतुलला मिळावेत. तसाही त्याला पैशाचा, घराचा उपयोग नाही. आणि माझी सगळ्यात जास्त सेवा वैदेहीने निरपेक्षपणे केली आहे, म्हणून तिला माझा फ्लॅट मी देतेय. बाकी माझे आशीर्वाद तर कायम तुम्हाला आहेतच. विल वाचून संपले. .सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. अतुल म्हणाला,  “ हे काय असलं विल ! मी एकुलता एक मुलगा !माझा हक्कच आहे दोन्ही घरांवर !” ताईमाई म्हणाल्या, “ हे काय आईचं वागणं !आम्ही काही कमी नाही केलं आईचं ! या रोहितला सगळा वाडा ! आणि वैदेहीला फ्लॅट पण ! आम्हाला हे मान्य नाही.”

नगरकर हसायला लागले. तुमच्या मान्य-अमान्यचा प्रश्नच येत नाही. आजींनी हे सगळं ओळखून रजिस्टर विल केलंय. त्यात कोणालाच बदल करता येणार नाहीत. तुम्हालाही पुष्कळ पैसे मिळाले आहेत. आजींच्या एफ डी मला माहीत आहेत किती रकमेच्या आहेत ते ! अतुलराव, उगीच वाकड्यात शिरू नका. किती वेळा आलात हो गेल्या पाच वर्षात आईकडे बघायला, भेटायला ? कधी तिला अमेरिकेला चल, असं तरी म्हणालात का ? मिळालंय तेही खूप आहे. कमी नाहीये. आजी हुशारच होत्या. मला जास्त तोंड उघडायला लावूच नका. मी, माझे  बाबा असल्यापासून तुमच्या घरी येतोय. तुमच्या वडिलांचे वकील होते माझे बाबा.  मी ओळखतो सर्व मंडळींना ! आजींनी फार विचारपूर्वक छान, आणि कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता विल केलंय. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, त्यांनी लिव्हिंग विल पण केलेय. म्हणजे, त्यांना वेळ आलीच तर कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवू नये, व्हेंटिलेटरवर अजिबात ठेवू नये असे ! नेत्रदान करावे. ते तर आपल्या रोहितने केलेच म्हणा ! किती हुशार होत्या आजी बघा. त्यांच्या अंतिम इच्छेला मान देणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कोणालाही काहीही कमी मिळालं नाही आणि असलं तर ज्याने त्याने त्यांनी असं का केलं ते समजून  घ्यावे ! माझी जबाबदारी सम्पली.” — नगरकर वकील निघून गेले.  

चेहरे पाडून ताईमाई आणि अतुल, तिथून चहासुद्धा न घेता निघून गेले. पैसा माणसात वाकडेपणा आणतो हे वैदेहीला पुन्हा एकदा समजले. तिला अतिशय वाईट वाटले. रोहित म्हणाला,”आई, तू का वाईट वाटून घेतेस? आजीला माणसांची  चांगलीच पारख होती. आला वाईटपणा तर येऊ देत. तू शांत रहा आणि आजीच्या इच्छेला आपण मान देऊया.  तू  किंवा मी, काहीही मागायला गेलो नव्हतो आजीकडे ग !  आपल्याला  तिचे विल माहीत तरी होते का? नाही ना? मग बस झाले.” रोहितने आईची समजूत घातली आणि तो रुचिराला फोन करायला वळला.

– समाप्त – 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कालच वैदेही  ऋचाला खूप रागावली होती. हल्ली ऋचाच्या मागण्या जरा जास्तच वाढल्या होत्या. रोहित अजून लहान होता, म्हणून अजून  तरी  आईचं ऐकत होता. ऋचा आता दहावीला होती आणि  मैत्रिणींकडे नवीन काही बघितलं की हिला ते हवंसं वाटे. यात तिची चूक नव्हती. ते वयच तसं होतं आणि अशा तिच्या मागण्याही काही फार अवास्तव नसत. पण फक्त विशालच्या एकट्याच्या पगारात भागवताना वैदेहीच्या नाकी नऊ येत. हे कोडे कसे सोडवावे, हेच तिला समजेनासे झाले होते हल्ली. मुलांकडे नीट लक्ष देता  यावे, म्हणून असलेली चांगली सरकारी नोकरी सोडली तिने आणि आता पश्चाताप करण्याखेरीज हातात काहीच उरले नाही !

तेव्हाही विशाल म्हणाला होता, की ‘ नको  सोडू नोकरी. आपल्याला अजून बरीच गरज आहे. अजून मोठा फ्लॅट घ्यायचाय ना, शिवाय मुलांसाठीही लागतीलच पैसे ! ‘ पण खुशाल सोडली आपण नोकरी. मैत्रिणी, बॉस   -सगळे सांगून थकले…. पण तेव्हा घर, मुलं यांचं भूत बसलं होतं डोक्यावर !आता लक्षात येतंय  की आपण नोकरी सोडल्याने काहीही फायदा झालेला नाही, उलट तोटाच झालाय. बहिणी म्हणाल्या होत्या की “ बरं झालं नोकरी सोडलीस. आता आईकडे तुला छान लक्ष देता येईल. आम्ही नोकऱ्या करतो, म्हणून फक्त सुट्टीच्या दिवशी येऊन जाऊ.” भाऊराया परदेशात स्थयिक झालेले, त्यांचे येणे कधीतरीच व्हायचे, आणि ते आले की मग काय ! तोचि दिवाळी दसरा व्हायचा आईला.   

अतुल आईचा अतिशय लाडका. अगदी उघड उघड ती त्याला देत असलेले झुकते माप लक्षात येण्यासारखेच असे. या तिघी बहिणी आणि हा एकुलता एक भाऊ. सगळ्यात धाकटा आणि सगळ्यात हुशार, म्हणून आईचा अत्यंत लाडका. त्याच्याच आवडीच्या भाज्या, त्याला आवडते म्हणून कायम घरात सणासुदीला जिलबीच. मुलींना आई फारसे महत्व द्यायचीच नाही. अतुल  म्हणेल ते प्रमाण. याचा परिणाम असा झाला, वरच्या दोघी जणींनी आपापली लग्नं ऑफिसमध्येच ठरवली आणि आईने  न बोलता लावूनही  दिली.

वैदेही त्यातल्या त्यात गरीब आणि भिडस्त ! सगळं दिसत असूनही बंड न करणारी आणि सोसणारीही. बहिणीही सांगून थकल्या– ‘अग वैदेही, नोकरी कसली सोडतेस? आम्ही नाही का केल्या नोकऱ्या? मुलंबाळं सांभाळून? तुलाही जमेल. मुलं काय ग, बघताबघता होतात मोठी, पण पैसा मात्र त्या प्रमाणात वाढत नाही,आणि गरजा मात्र वाढतात.’ 

पण वैदेहीला हे पटले नाही. कालांतराने तिचे वडील कालवश झाले  आणि आई एकटी पडली. बहिणींनी आधीच  खूप लांब घरं घेतली होती. वैदेहीचंच घर आईच्या जवळ होतं.  आई शिक्षिका होती आणि तिने स्वतःला  छान गुंतवून घेतलं होतं. पत्ते ग्रुप, भिशी ग्रुप, त्यांच्या समवयस्क मैत्रिणींच्या जवळपासच्या ट्रिपा, आईचा वेळ मस्त जायचा. आई एकटीही मजेत राहत होती. वैदेहीला आता वाटलं, किती मूर्ख आहोत आपण !

 मुलं बघताबघता सहजपणे मोठी होत होती, आणि लागलं सवरलं तर आई होती की बघायला . परवाच  ऋचा म्हणाली ते तिला आठवलं, “ आई, कशाला ग नोकरी सोडलीस तू? मला जर कमी मार्क मिळाले, तर तू म्हणणारच, आम्ही नाही हं तुला पेमेंट सीट देऊ शकत ऋचा ! माझ्या इतर मैत्रिणींच्या घरी दोघेदोघे नोकऱ्या करतात म्हणून सगळं कसं मस्त आहे. त्यांना नाही हा प्रॉब्लेम !”  वैदेहीला हसावे का रडावे हेच समजेना. या मुलीला चार महिन्यापासून पाळणाघरात नको टाकायला म्हणून  जीव नुसता तळमळला होता आपला, आणि म्हणून नोकरी सोडली ना आपण ! तर तीच मुलगी बघा काय म्हणतेय ! तिचंही बरोबरच होतं म्हणा. मागे त्यांची कुलू मनालीला ट्रिप होती. तर त्यावेळी आपण तेवढे पैसे देऊ शकलो नाही तिला. काय हे ! वैदेहीला पुरेपूर पश्चाताप झाला. विशाल तर काय ! त्याला कशाचेच सोयरसुतक नसायचे. ना कधी त्याने प्रमोशनसाठी धडपड केली, ना कधी काही नवीन गोष्टी शिकला ऑफिसमध्ये ! वर्षानुवर्षे तीच नोकरी करत राहिला… निर्विकार पणे !  आईला आता ऐशी वर्षे पूर्ण झाली. आता मात्र तिला एकटे राहवेना . तिघी बहिणींकडे ती आलटून पालटून राहू लागली. अतुल कायम अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे त्याचा प्रश्नच येत नव्हता. ताई माई जमेल तसं बघायच्या आईकडे.  त्याही आता  रिटायर झाल्याच होत्या. वैदेही सर्वात धाकटी. 

आईचा स्वभाव अतिशय हेकट, कुरकुरा आणि  कुणाशी  ऍडजस्ट करणारा नव्हता. आयुष्यभर मास्तरकी केल्यामुळे, मी म्हणेन तसंच झालं  पाहिजे ही वृत्ती लोकांना आता त्रासदायक  ठरू लागली. ताई माईंची घरं मोठी होती, तरी त्यांचीही मुलं सुना आल्या होत्याच ! आजीचं आणि नवीन नातसुनांचं एक मिनिट पटत नसे. सुना म्हणत, “अहो आई,, आजीचं नका सांगू काही करायला. त्यांना आमचं काहीही आवडत नाही. सतरा चुका काढत बसतात. तुम्ही त्यांचं सगळं करून जा. इतर कामं आम्ही करू”.   सुदैवाने वैदेहीकडे हे झगडे होत नसत. तिच्यात आणि ताई-माईमध्ये बरंच अंतर होतं म्हणून, आणि तिची मुलंही अजून कॉलेजमधेच शिकत होती. तरीही ऋचा रोहितचे आजीशी फार पटत असे. आजी फार लाडकी होती त्या दोघांची ! कुठे चाललीस, कधी येणार, हा काय ड्रेस घातलाय, अशी टीका टिप्पणी आजीची बसल्याबसल्या चालू असे.  आणि मुलांना ते मुळीच चालत नसे. मुद्दाम ऋचा आजीसमोर येऊन म्हणायची, ‘आजी हा स्कर्ट आवडला का? मांड्या दिसत नाहीत ना? आजी, गळा खोल आहे का टॉपचा?” – मुद्दाम आजीला चिडवून ऋचा म्हणे.. ‘हात मेले !’ आजी रागावून म्हणायची. किती वेळा तरी  वैदेहीने आईला सांगून बघितलं, की आई नको ग तू त्यांच्या   भानगडीत पडत जाऊस. आत्ताची मुलं आहेत ती. आम्ही घेतलं तुझं ऐकून, ती कशी घेतील? तू शांत बसत जा ना.” पण हे काही तिला जमायचं नाही. रोज रोज खटके! रोहित स्वतःच्या मेरिट वर मेडिकलला गेला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फी अगदी माफक, म्हणून तो अभिमानाने सांगे, “ मी खरा मेरिट होल्डर डॉक्टर होणार आजी!”

तरीही त्याला आजी म्हणायचीच ‘ हे काय लांडे कपडे ! ही कसली फाटकी पॅन्ट ! गुडघ्यावर फाटलीय ! आणि हे काय झबलं  घातलंय?” खोखो हसून रोहित म्हणायचा. आजी, ही अशीच  फॅशन असते, लै भारी असते बरं ! ‘पुरे मेल्यानो .. नसतं अवलक्षण,’  असं म्हणून आजी उठून जायची. रोहितवर आजींचा विशेष जीव ! एक तर तो अतिशय हुशार आणि दांडगोबा. आजी त्याचं सगळं ऐकायची.

आईची तब्येत चांगलीच होती. पण तरीही आता तिच्यासाठी म्हणून दिवसाची बाई ठेवावी, असा निर्णय मुलींनी घेतला. कारण मग त्याशिवाय यांना घराबाहेर पडताच येत नसे.  सुना बघायला अजिबात तयार नसत आणि वैदेहीच्या मुलांची कॉलेजेस दिवसभर ! ओळखीच्या एक चांगल्या बाई मिळाल्या आणि त्या सकाळपासून रात्रीपर्यंत येऊ लागल्या. आई खुशीने त्यांचे पैसे देऊ लागली. तिलाही सोबत, आणि गप्पा मारायला एक माणूस झालं. शांताबाई आजींना रिक्षातून देवाला, बागेत, आजी म्हणतील तिथे हिंडवून आणायच्या. मुलं चेष्टा करायची, “आजी भेळ खाल्ली का? आम्हाला नाही का आणली?” आजी खुशीत हसायची. वैदेहीची मुलंही मोठी झाली. आजी आता  नव्वदच्या जवळपास आल्या. ऋचाचं लग्न ठरलं आणि तिला खूप छान स्थळ मिळालं. आजीने वैदेहीला जवळ बसवलं आणि विचारलं, ‘ वैदेही, तुला काही पैसे हवे असतील तर निःसंकोचपणे सांग. माझ्या चार बांगड्याही मी देणार आहे ऋचाला. त्या मोडून तिला हवे ते कर हो तिच्या आवडीचे !”  वैदेहीच्या  डोळ्यात पाणी आले. तिला आत्ता खरोखरच गरज होती या मदतीची. “ अग वैदेही, मला समजत नाहीत का गोष्टी? तू नोकरी सोडलीस आणि मग तुझी फरपट सुरू झालेली मी डोळ्यांनी बघतेय ना. कानी कपाळी ओरडूनही तू माझं ऐकलं नाहीस. बघ बरं आता ! ताई माईंचे संसार बघ,आणि तू सगळ्यात उजवी, हुशार असून किती मागे पडलीस बघ बरं.  बाबांनाही फार वाईट वाटायचं ग तुझ्या बद्दल ! बरं, जोडीदार तरी धड निवडावास ! किती अल्प संतुष्ट आहे ग हा  विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग ग ? महत्वाकांक्षा असायला नको का काही ? “ 

– क्रमशः भाग पहिला 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.)  इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. जावेदचा पत्ता नव्हता. सतीशने जावेदला फोन लावला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. जावेद कुठं राहतो हेही माहीत नव्हते. 

सतीशला आता काळजी वाटायला लागली. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते. देवाच्या कृपेने आजही तो काहीतरी मिळवतोच आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास उडायला नको असं सतीशला मनोमन वाटत होतं. जावेदने शब्द पाळला नाही तर ‘सतीश फसवला गेला’ हा शिक्का कायमचा बसला असता, तो त्याला नको होता. यापुढे कुणा गरजू माणसाला मदत करताना आपला हात आखडता घ्यावा लागेल म्हणून सतीशला खरी धास्ती वाटत होत

सुजाता दार उघडं ठेवून शेजारच्या काकूंना सांगत होती, “कालच मी ह्याना म्हटलं होतं की तो परत फिरकणार नाही म्हणून. अख्खी दुनिया बदलली तरी आमचे हे अजून तसेच आहेत. कुणी न कुणी यांच्या हळवेपणाचा फायदा घेत असतो आणि हे फसत जातात.  ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतात. भले तुम्ही लोकांच्या अनुभवातून शिकू नका. अमुक रस्त्यावरून जाताना कधीतरी ठेच लागली होती हे तरी माणसानं विसरू नये. लोकांना मदत करण्याच्या भानगडीत कशाला पडावं? ..  मागे ती कोण एक इन्वेस्टर बॅंकर आली. फारच गयावया करत होती म्हणून ह्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. तिने महिन्याअखेरचा चेक दिला. महिन्याअखेरीस तिनं दहा हजार रूपये यांच्याकडे जमा करून चेक लावू नका असं सांगितलं. उरलेले दहा हजार रूपये द्यायला तिने तीन महिने लावले…..आम्ही मध्यंतरी तिरूपतीला गेलो होतो. हॉटेलातून आम्ही बाहेर पडताच एक केविलवाणं जोडपं, छोटीशी मुलगी आणि आजी यांच्यासमोर हात जोडून उभे. ‘सर आमचा खिसा कापला गेला आहे. आमच्या परतीच्या प्रवासासाठी कृपा करून पाचशे रूपयाची तरी मदत करा. तुमच्या पत्त्यावर पैसे पाठवतो.’ अशी विनवणी करीत होते. ‘आता एनीव्हेअर बॅंकिग आहे. तुमच्या नातेवाईकाकडून पैसे मागवून घ्या ‘ म्हणून सांगायचं ना? पण नाही, यांनी लगेच खिशातून शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. बाकीची व्यवस्था करून घ्या म्हणून पुढं निघाले. उलट मलाच म्हणत होते, ‘अग वेंकटेशाच्या हुंडीत दोनशे रूपये अधिक टाकले असे समज.” तिची टकळी सुरूच होती.   

सतीश खिन्न मनाने डोळे मिटून आरामखुर्चीत विसावला. थोड्याच वेळात सुजाता आली आणि शांतपणे म्हणाली, “चला, साहेब आता विसरा सगळं, जेवून घ्या पाहू.” 

सतीश जेवायला बसला खरा. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. ‘ इतक्या वर्षाच्या नोकरीत मला माणसं ओळखता आली नाहीत की काय? कितीतरी लोकांना लहानसहान कर्जे दिली. एकाही खातेदारानं कधी फसवलं नव्हतं. अमुक व्यक्ति व्यसनी आहे त्याला कर्ज देऊ नका असं गावकऱ्यांनी पूर्वसूचना दिली असताना देखील मी त्या व्यक्तिला कर्ज दिलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही व्यसनी आहात अशी माहिती मिळाली असतानाही मी तुम्हाला हे कर्ज देतोय. गावकऱ्यांना खोटं ठरवायचं काम आता तुमच्या हातात आहे.’ त्या पठ्ठ्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडून माझा माणुसकीवरचा विश्वास खरा ठरवला होता.’ या विचारातच दोन घास गिळून सतीश ताटावरून उठला.  

पायात चपला सरकवून सतीश तडक एटीएम बूथवर गेला. पाच हजार रूपये खिशात कोंबून त्यानं गुपचूप घरात पाऊल टाकलं. 

“पैसे काढायला एटीएमला गेला होतात ना?” सुजाताने तोफ डागली.

सतीशला क्षणभर काय बोलावं, कळलं नाही. सतीशच्या मनात काय चाललेलं असतं हे तिला नेमकं कळतं, हा अनुभव सतीशने आजवर कित्येकदा अनुभवला होता. आता एटीएमला जाऊन पैसे काढायची गोष्ट म्हणजे हद्दच झाली होती. तो दिंग्मूढ होऊन पहात राहिला.   

“अहो, आपल्या शंभूने तुम्हाला एटीएम बूथमध्ये शिरताना पाहिलं होतं म्हणून मला म्हटलं. काय गरज होती पैसे काढायची?” सुजाता म्हणाली.     

सतीश न डगमगता म्हणाला, “हो गेलो होतो पैसे काढायला. अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून घरात ठेवलेले पैसे मी जावेदला दिले होते. ते पैसे परत आणून ठेवावेत म्हणून…” गंभीर मुद्रा करून सतीश सोफ्यावर बसला. 

अचानक कौन बनेगा करोडपतीतल्या अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये हात वर उंचावून सुजाता उच्च स्वरात गरजत म्हणाली, ‘आप सही हो, सतीशबाबू. आप जीत गए.’ सुजातानं सतीशच्या हातात पांच हजार ठेवताच चिरंजीव शंभू टाळ्या वाजवत खळखळून हसत होते.

“अहो, तुम्ही बाहेर पडलात तितक्यात जावेद आला अन पैसे देऊन गेला. किल्ल्या अडकवण्यासाठी तुम्ही एक बोर्ड सांगितलं होतंत म्हणे, ते ही तो देऊन गेला.” 

सतीश बोर्डाचं काहीच बोलला नव्हता. जावेदनं दाखवलेलं ते कृतज्ञतेचं एक द्योतक होतं. सतीश मनोमन खूश झाला. त्याचा विश्वासावरचा विश्वास आणखी पक्का झाला. 

तितक्यात दारावरची बेल वाजली. शेजारचे प्रभाकरपंत आत आले. चौफेर नजर टाकत ते म्हणाले, “तुमच्याकडचं फर्निचर चांगलं झालं आहे असं ऐकलंय. खरंच, खूपच छान. मला त्या सुताराचा फोन नंबर द्याल काय?” 

सतीश गप्पच होता. मघाशी जावेदचा मोबाईल नंबर स्वीच्ड ऑफ आला होता. सुजाता जावेदचं नवं कार्ड त्यांच्या हातात देत म्हणाली, “ लिहून घ्या हा त्याचा नवा नंबर. आणि हो त्याला काम देताना तुमच्या जबाबदारीवर द्या बरं का, आमच्या विश्वासावर देऊ नका.”  

प्रभाकरपंत निघता निघता म्हणाले, “अहो वहिनी, विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं ते एक अलिखित नातं असतं. कित्येक वेळेला विश्वासाला तडा बसतो, नाही म्हणत नाही. परंतु एकमेकांवरील विश्वासाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. खरं तर विश्वासावरच जग चालतं.” 

——- त्या रात्री सतीशला छान झोप लागली.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सुजाता दारातच उभी राहून कुणाशी तरी बोलत होती, “काय काम काढलंस? त्यांनी बोलवलं होतं काय?” तिच्या या प्रश्नावर दबल्या आवाजात तो माणूस काही तरी सांगत होता. 

“ते बॅंकेतून रिटायर झाले म्हणून काय झालं, एवढे पैसे काय घरात असतात होय?” सुजाताचं बोलणं तेवढं सतीशच्या कानावर आलं. 

“ठीक आहे वहिनी, फक्त साहेबांना एकदा भेटून जातो.” असं म्हटल्यावर सुजाताने त्या गृहस्थाला आत बसायला सांगून सतीशला आवाज दिला, “अहो, ऐकलंत काय, जावेद आला आहे तुम्हाला भेटायला.”  सुजाता आत निघून गेली.   

सतीश दिवाणखान्यात येताच जावेद पटकन उठून उभा राहिला. सतीशने त्याला खुणेनंच बसायला सांगितलं आणि लगेच विचारलं, “किती पैसे हवे आहेत तुला?” 

त्यानं चमकून वर पाहिलं. सतीश हळूच म्हणाला, “मी ऐकलं आहे सगळं. किती हवे आहेत सांग.” 

इकडे तिकडे पाहत तो हळूच बोलला, “साहेब, पाच हजार रूपयाची नड आहे. मुलाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावं लागेल. तापानं फणफणला आहे तो. काल भारत बंद असल्याने माझा चेक वटला नाही. उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचे पैसे परत करतो.” 

सतीश पटकन आत गेला. पैसे आणून त्याने जावेदच्या हातात ठेवले. जावेदही तेवढ्याच घाईत निघून गेला.

हा सगळा प्रकार सुजाताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती कमरेला पदर खोचत बाहेर येत म्हणाली, “काय हो, हा जावेद चार वर्षापूर्वी आपल्याकडे फर्निचरचं काम करून गेला होता ना ! त्यानंतर आजच दिसला. आजवर त्याने कितीतरी ठिकाणी कामं केली असतील. पण पैशासाठी त्याला तुमचाच भाबडा चेहरा बरा आठवला. आणि बघाच तुम्ही, उद्या तो तुमचे पैसे परत करायला फिरकणारच नाही. मी अगदी खात्रीने सांगते.” सतीशने तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

सतीशच्या फ्लॅटमध्ये जेव्हा फर्निचरचं काम करायचं होतं, तेव्हा जावेद पहिल्यांदा सतीशला भेटला होता. त्यानं एकंदर पंचेचाळीस हजाराचं एस्टिमेट सांगितलं होतं. काटेकोर मोजमापासहित आयएसआय मार्कचा कुठला प्लाय, कुठले लॅमिनेशन वापरणार हे सगळं सतीशला त्यानं समजावून सांगितलं. जावेद त्याच्या एस्टिमेटवर ठाम होता. सतीशला बजेट जास्त वाटत होतं म्हणून विचार करीत होता.  

जावेद म्हणाला, “साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काम अगदी चोख करून देईन. दोन चार हजाराकडे पाहू नका. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हेच काम तीस हजारात देखील होईल. मला क्वालिटीत तडजोड करायला आवडत नाही. या उपर तुमची मर्जी !” 

सतीश पटकन म्हणाला, “अरे त्याचं काही नाही. माझं बजेटच तीस हजाराचं आहे.” 

“साहेब उरलेले पंधरा हजार दोन चार महिन्यानंतर तुमच्या सवडीने द्या, मी अ‍ॅडजस्ट करीन.” 

फर्निचरच्या कामामुळे सतीशच्या घरातल्यांची कसलीही गैरसोय झाली नाही. जावेदने सगळी मापं काटेकोरपणाने घेतलेली होती. त्यानं सगळं वूडवर्क बाहेरच करून घेतलं. एका रविवारी येऊन फिटींग आणि लॅमिनेशन करून गेला. सतीशने देखील राहिलेले पैसे जावेदला लगेच देऊन टाकले. जावेदने काम सुरेखच केलं होतं. 

थोड्याच वेळात सुजाता सतीशच्या समोर चहाचा कप ठेवत म्हणाली, “तुम्हाला आठवतं का, मध्यंतरी तुमच्या नात्यातला कुणी तरी आठवड्यात देतो म्हणून दोन हजार रूपये घेऊन गेला, परत फिरकलाच नाही. आता कुठल्याही कार्यक्रमात दिसला तरी तो न तुम्हाला ओळख दाखवतो न मला. तुमच्या एका मित्राचा जावई ‘लगेच परत करतो’ म्हणून एक हजार रूपये घेऊन गेला. फिरकला का तो इकडे?” 

सतीश शांतपणे सुजाताला म्हणाला, “हे बघ, हे पैसे परत येणार नाहीत, हे समजून उमजूनच मी दिले होते. आपल्याकडून त्यांना केलेली ही एक नगण्य मदत आहे असं समज, हे तुला त्यावेळीच बोललो होतो. तुला ती कविता आठवतेय का? ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !’”

सुजाता पटकन म्हणाली, “ते कवी महाशय असं का म्हणाले मला मुळात तेच कळलेलं नाहीये. देणारा देतो आहे तर घेणाऱ्याने त्याचे हात सुद्धा कशाला घ्यावेत? त्याचे हात त्यालाच राहू द्यावेत ना !” 

सतीश हसत हसत म्हणाला, “अगं, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्या माणसाची दानत घ्यावी आणि घेणाऱ्यांनी देखील कुणाला तरी देत जावे असा त्याचा अर्थ आहे.”

“ते असू द्या, पण हा जावेद तुमचा कोण लागतो बरं?” 

या तिच्या प्रश्नावर सतीश म्हणाला, “अग, जावेद आणि माझ्यात कसलंही नातं नाही हे खरं असलं तरी किमान माणुसकीचं नातं तरी आहे ना? तूच म्हणालीस ना, त्याला तुमचाच भाबडा चेहरा का आठवला म्हणून? कदाचित जावेदने माझ्यात माणुसकीचा ओलावा पाहिला असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय… 

सुजा, अग पैसे उसने मागण्यासाठी मुलगा आजारी आहे असं कारण कुणी सांगेल का? क्षणभर समज, तो खोटेही सांगत असेल. ते खोटंच आहे असं मी कशाला समजू? कदाचित खरं देखील असेल. एक वेळ बेगडी श्रीमंती दाखवता येईल पण सच्चेपणा कसा दाखवता येईल? ती सिध्दच करावी लागते. गरिबांच्यावरच विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय मला खूप वेळा आलेला आहे….. एका कवीने किती छान सांगितले आहे, ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत. आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे !’ .. कळलं?”   

“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ तिचं दु:ख… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गीता ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता.

मुलगी म्हणाली,” चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी “.

माधवने मात्र नकार दिला… रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं…

चाळीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला गीता सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी  मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. गीता  होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. माधवने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल…

“गीता,  तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करता येत नाही ग… कस जगू मी गीता तुझ्या शिवाय…” माधवला हुंदका अनावर झाला…

गीताचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे गीता सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. … लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली…

माधवने  डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली.

थरथरत्या हातानी डायरी उघडली आणि डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

‘नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस, असं म्हणून जगायचं ठरविले… ‘

बरंच काही लिहिलं होत… तो पानं  पालटत राहिला.

दि……

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,”आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या. ” तर म्हणाले ,”मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चल…  तू खा मी तुला सोडतो हॉटेलला “.

‘अरे, हे काय बोलणं झालं… मला काय एकटीला खायला जायची हौस होती का….?’

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो… नवऱ्याने गिफ्ट दिलं … फार हेवा वाटायचा… कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर ऐकणार नाही. मला म्हणतात, ‘नवऱ्यानं गिफ्ट दिल म्हणजे, फिरवलं, हॉटेल मध्ये जेवू घातलं म्हणजे  बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसत. नवरा -बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा ?’

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले……

दि….

माझा मुलगा पाच वर्षाचा आहे . माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ… थांबा थोडा वेळ…. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत. हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटले. खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागलं… हीचं मन दुखावलं हे लक्षातही नसतं… मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख…. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते… आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते… फार त्रास होतो तेव्हा…

दि,…. 

आज मी पडद्याचे कापडं आणले…  खुप ओरडले… कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का?   वगैरे वगैरे… काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंत चांगली नाही… तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात… इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत… त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही….

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. माधवला खूप आश्चर्य वाटले. वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की गीता इतकी दुःखी आहे. गीताच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले…. बहुतेक शेवटचे.

दि….

आज डावा हात खूप दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच. मीच जाऊन येते…. तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि….

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली… डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली..यांना फोन लावला… म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे…’

अँजिओग्राफी केली… 95 टक्के ब्लॉकेज… डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल…

घरी येऊन यांना सांगावं या  विचारातच घरी आले…..हे बाहेरगावावरून आलेले होते. घरी येताना औषध आणायला विसरले…. खुप थकवा आला होता…

म्हटलं, ‘थोडी औषधं आणून देता का?’

‘आताच आलीस ना रस्त्याने, आणायची ना स्वतः, परत कपडे बदलवू, परत जाऊ ” खुप चिडचिड आणि बडबड केली.

“असू द्या, मी घेईन उद्या “

“अग, पण काय झालंय….? काय सांगितलं डॉक्टरांनी “

“काही नाही, सगळं ठीक आहे “

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही… साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा सेटल आहे… रोजची लहान सहान बाबीवरून कटकट… आता मी थकले… हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात……..

डायरीचे शेवटचेच पान होते.

माधवने डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले… गीताचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे…. गीता, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचास ना… तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही… मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होतं आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही…..

का वागली तू अशी गीता ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू ? गीता  मी तुला समजूच शकलो नाही… आणि तू मला समजून घेतलं नाहीस…. तू आणि मी वेगळे आहोत असा कधी विचारच केला नाही… मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटलच नाही… तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही…. पण गीता, अग एकदा बोलायचं होतंस ग.. व्यक्त व्हायच होतस… भांडलो असतो कदाचित… परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं… नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसतं लागलं…. मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्नं असतील.

तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस ग. मला माफ कर… !!

✧═❁═✧

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print