श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.)  इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. जावेदचा पत्ता नव्हता. सतीशने जावेदला फोन लावला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. जावेद कुठं राहतो हेही माहीत नव्हते. 

सतीशला आता काळजी वाटायला लागली. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते. देवाच्या कृपेने आजही तो काहीतरी मिळवतोच आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास उडायला नको असं सतीशला मनोमन वाटत होतं. जावेदने शब्द पाळला नाही तर ‘सतीश फसवला गेला’ हा शिक्का कायमचा बसला असता, तो त्याला नको होता. यापुढे कुणा गरजू माणसाला मदत करताना आपला हात आखडता घ्यावा लागेल म्हणून सतीशला खरी धास्ती वाटत होत

सुजाता दार उघडं ठेवून शेजारच्या काकूंना सांगत होती, “कालच मी ह्याना म्हटलं होतं की तो परत फिरकणार नाही म्हणून. अख्खी दुनिया बदलली तरी आमचे हे अजून तसेच आहेत. कुणी न कुणी यांच्या हळवेपणाचा फायदा घेत असतो आणि हे फसत जातात.  ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतात. भले तुम्ही लोकांच्या अनुभवातून शिकू नका. अमुक रस्त्यावरून जाताना कधीतरी ठेच लागली होती हे तरी माणसानं विसरू नये. लोकांना मदत करण्याच्या भानगडीत कशाला पडावं? ..  मागे ती कोण एक इन्वेस्टर बॅंकर आली. फारच गयावया करत होती म्हणून ह्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. तिने महिन्याअखेरचा चेक दिला. महिन्याअखेरीस तिनं दहा हजार रूपये यांच्याकडे जमा करून चेक लावू नका असं सांगितलं. उरलेले दहा हजार रूपये द्यायला तिने तीन महिने लावले…..आम्ही मध्यंतरी तिरूपतीला गेलो होतो. हॉटेलातून आम्ही बाहेर पडताच एक केविलवाणं जोडपं, छोटीशी मुलगी आणि आजी यांच्यासमोर हात जोडून उभे. ‘सर आमचा खिसा कापला गेला आहे. आमच्या परतीच्या प्रवासासाठी कृपा करून पाचशे रूपयाची तरी मदत करा. तुमच्या पत्त्यावर पैसे पाठवतो.’ अशी विनवणी करीत होते. ‘आता एनीव्हेअर बॅंकिग आहे. तुमच्या नातेवाईकाकडून पैसे मागवून घ्या ‘ म्हणून सांगायचं ना? पण नाही, यांनी लगेच खिशातून शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. बाकीची व्यवस्था करून घ्या म्हणून पुढं निघाले. उलट मलाच म्हणत होते, ‘अग वेंकटेशाच्या हुंडीत दोनशे रूपये अधिक टाकले असे समज.” तिची टकळी सुरूच होती.   

सतीश खिन्न मनाने डोळे मिटून आरामखुर्चीत विसावला. थोड्याच वेळात सुजाता आली आणि शांतपणे म्हणाली, “चला, साहेब आता विसरा सगळं, जेवून घ्या पाहू.” 

सतीश जेवायला बसला खरा. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. ‘ इतक्या वर्षाच्या नोकरीत मला माणसं ओळखता आली नाहीत की काय? कितीतरी लोकांना लहानसहान कर्जे दिली. एकाही खातेदारानं कधी फसवलं नव्हतं. अमुक व्यक्ति व्यसनी आहे त्याला कर्ज देऊ नका असं गावकऱ्यांनी पूर्वसूचना दिली असताना देखील मी त्या व्यक्तिला कर्ज दिलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही व्यसनी आहात अशी माहिती मिळाली असतानाही मी तुम्हाला हे कर्ज देतोय. गावकऱ्यांना खोटं ठरवायचं काम आता तुमच्या हातात आहे.’ त्या पठ्ठ्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडून माझा माणुसकीवरचा विश्वास खरा ठरवला होता.’ या विचारातच दोन घास गिळून सतीश ताटावरून उठला.  

पायात चपला सरकवून सतीश तडक एटीएम बूथवर गेला. पाच हजार रूपये खिशात कोंबून त्यानं गुपचूप घरात पाऊल टाकलं. 

“पैसे काढायला एटीएमला गेला होतात ना?” सुजाताने तोफ डागली.

सतीशला क्षणभर काय बोलावं, कळलं नाही. सतीशच्या मनात काय चाललेलं असतं हे तिला नेमकं कळतं, हा अनुभव सतीशने आजवर कित्येकदा अनुभवला होता. आता एटीएमला जाऊन पैसे काढायची गोष्ट म्हणजे हद्दच झाली होती. तो दिंग्मूढ होऊन पहात राहिला.   

“अहो, आपल्या शंभूने तुम्हाला एटीएम बूथमध्ये शिरताना पाहिलं होतं म्हणून मला म्हटलं. काय गरज होती पैसे काढायची?” सुजाता म्हणाली.     

सतीश न डगमगता म्हणाला, “हो गेलो होतो पैसे काढायला. अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून घरात ठेवलेले पैसे मी जावेदला दिले होते. ते पैसे परत आणून ठेवावेत म्हणून…” गंभीर मुद्रा करून सतीश सोफ्यावर बसला. 

अचानक कौन बनेगा करोडपतीतल्या अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये हात वर उंचावून सुजाता उच्च स्वरात गरजत म्हणाली, ‘आप सही हो, सतीशबाबू. आप जीत गए.’ सुजातानं सतीशच्या हातात पांच हजार ठेवताच चिरंजीव शंभू टाळ्या वाजवत खळखळून हसत होते.

“अहो, तुम्ही बाहेर पडलात तितक्यात जावेद आला अन पैसे देऊन गेला. किल्ल्या अडकवण्यासाठी तुम्ही एक बोर्ड सांगितलं होतंत म्हणे, ते ही तो देऊन गेला.” 

सतीश बोर्डाचं काहीच बोलला नव्हता. जावेदनं दाखवलेलं ते कृतज्ञतेचं एक द्योतक होतं. सतीश मनोमन खूश झाला. त्याचा विश्वासावरचा विश्वास आणखी पक्का झाला. 

तितक्यात दारावरची बेल वाजली. शेजारचे प्रभाकरपंत आत आले. चौफेर नजर टाकत ते म्हणाले, “तुमच्याकडचं फर्निचर चांगलं झालं आहे असं ऐकलंय. खरंच, खूपच छान. मला त्या सुताराचा फोन नंबर द्याल काय?” 

सतीश गप्पच होता. मघाशी जावेदचा मोबाईल नंबर स्वीच्ड ऑफ आला होता. सुजाता जावेदचं नवं कार्ड त्यांच्या हातात देत म्हणाली, “ लिहून घ्या हा त्याचा नवा नंबर. आणि हो त्याला काम देताना तुमच्या जबाबदारीवर द्या बरं का, आमच्या विश्वासावर देऊ नका.”  

प्रभाकरपंत निघता निघता म्हणाले, “अहो वहिनी, विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं ते एक अलिखित नातं असतं. कित्येक वेळेला विश्वासाला तडा बसतो, नाही म्हणत नाही. परंतु एकमेकांवरील विश्वासाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. खरं तर विश्वासावरच जग चालतं.” 

——- त्या रात्री सतीशला छान झोप लागली.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments