मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

☆ असा बॉस होणे नाही… माहिती संकलक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

असा बॉस होणे नाही… 

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, “सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?” 

कलाम सर हसत म्हणाले, “शुअर, एनी प्रॉब्लेम?” 

“नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय.” 

“अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट.” 

“नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी 4 वाजता जाईन.” एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले. 

साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्यु. सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं. 

इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, “मुलं कुठे गेलीत?” 

“अहो, असं काय करता? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला. आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता?” 

ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, “अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो.” 

कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, “थॅंक्यु व्हेरी मच सर!” 

“नो, नो. ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू.” असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो.” 

मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते. 

(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.) 

माहिती संकलक :  श्री प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुका आकाशाएवढा…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

तुका आकाशाएवढा…! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

संत तुकाराम बीज —. फाल्गुन कृ. २, शके १९४५ – (या वर्षी दि. २७. ०३. २०२४)

सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा काळ ! भारतातील एक गांव !! गावात बारा बलुतेदार !!! पैकी एक सावकार !  आता सावकार म्हटलं की आपल्या समोर नमुनेदार सावकाराचे चित्र उभे राहिले असेल. स्वाभाविक आहे कारण सावकार म्हटलं की तो लालची असलाच पाहिजे, तो लांडीलबाडी करणारा असलाच पाहिजे अशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. पण हे सावकारी करणारे कुटुंब याहून वेगळे होते. सगळ्याच दगडांच्या मूर्ती घडवता येत नाहीत, कारण मूर्तिकार कितीही माहीर असला तरी दगड ही त्या प्रतीचा लागतो. हे अख्खे कुटुंब वेगळेच होते. आपले कर्तव्य म्हणून, पांडुरंगाने सोपवलेलेले पांडुरंगाचे काम म्हणून हे कुटुंब पिढीजात सावकारी करीत होते. घरात पंढरीची वारी होती, पैपाहुण्याचे स्वागत होत होते, गावातील प्रत्येकाला या कुटुंबाचा, घराचा आधार होता.

चारशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे मोगलाई !!! आता मोगलाई म्हणजे काय हे आमच्या पिढीला, आजच्या पिढीला कळणे तसे अवघड आहे, कारण ना आम्ही पारतंत्र्य अनुभवले ना मोगलाई !! पण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर इतकेच सांगता येईल, ‘मोगलाई’ म्हणजे ‘मोगलाई’!!! 

‘मोगलाई’चा अधिक चांगला अर्थ ज्याला समजून घ्यायचा असेल त्याने आपल्याच देशात स्वतःच्या राज्यातून परागंदा होण्याची पाळी ज्या ‘काश्मीरी पंडितां’वर आली त्यांची भेट जरूर घ्यावी. ‘ सर्वधर्मसमभावा ‘बद्दल असलेले सर्व समज (खरे तर गैरसमज ! ) आपसूक स्पष्ट होतील आणि विशेष म्हणजे आजची ती गरज देखील आहे. हे सर्व थोडे विषय सोडून आहे असे वाचकांना वाटू शकेल परंतु ज्यांच्याबद्दल हा लेखन प्रपंच करीत आहे त्यांची शिकवण डोळेझाक करणे मला जमण्यासारखे नाही. ते स्वच्छ शब्दात सांगतात,

मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु. ॥ 

“मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥

भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥

मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥ 

अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥ 

तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥”

(अभंग क्रमांक ६२१, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

त्याकाळातील मोगलाईचा सुद्धा ‘सात्विकतेचे बीज’ जीवावर उदार होऊन टिकवून ठेवणारी काही मंडळी होतीच. त्यापैकीच हे कुटुंब!! मूळ आडनाव आंबिले!! पंचक्रोशीत मान होता, वकुब होता. ही तीन भावंडे!! तिघेही भाऊच!! त्याकाळातील प्रचलित पद्धतीनुसार मुलांनी बापाचा व्यवसाय पुढे चालवायचा असा दंडक त्याकाळी होता. त्यामुळे या तिघांनी सुद्धा हेच करावे असे त्यांच्या बाबांना वाटणे हे त्याकाळातील रितीला धरूनच होते. पण मोठा भाऊ ‘संसारात’ पडला पण तसा तो विरक्तच होता. म्हणून सावकारी दुसरा मुलगा, ‘तुक्या’वर आली. त्याने ती जबाबदारी सचोटीने पार पाडण्याचा प्रयत्न देखील केला.

आपण मनात एक चिंतीतो, पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं. इथेही तसेच झाले. आईवडिलांचे छत्र हरपले, मोठा भाऊ संसार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला आणि धाकट्या भावाने वाटणी मागितली, त्यात अस्मानी संकट आले. “न भूतो… !” असा दुष्काळ आला. महाभयंकर दुष्काळ होता तो. त्याकाळात लाखो माणसे देशोधडीला लागली, लाखों जीव प्राणास मुकले, याची झळ तूक्याच्या कुटुंबाला बसणे हे ही स्वाभाविक होते. तसा तो बसलाही आहे. कुटुंबातील अनेक माणसे अन्न अन्न करीत प्राणास मुकली. एक काळी सावकार असलेल्या कुटुंबास घासभर अन्नास मोताद व्हावे लागले. कल्पना करा, सावकार असलेल्या कुटुंबावर अन्न-अन्न करण्याची पाळी आली तर त्यांची काय मनःस्थिती असेल. जे कुटुंब अनेकांचा पोशिंदा होते त्यावर भिकेची पाळी यावी!! यापेक्षा ‘दैवदुर्विलास’ काय असू शकतो. त्याकाळातील शेतकरी दुष्काळ आला म्हणून आत्महत्या करून कर्तव्यच्युत होत नव्हते, त्यामुळे या तुक्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून देऊ, कधी विचारही केला नाही. त्याने यातून धीराने मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि ‘प्रयत्नांनी परमेश्वर’ या उक्तीनुसार ते यशस्वीही झाले.

या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘हरिनामाचा’ उपयोग करून घेतला. आपल्याकडे एखादा संत झाला की त्याची पूजा करायची, त्याला देवत्व प्रदान करायचे आणि आपण निवांत रहायचे अशी पद्धत पडून गेली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते, आपलेही हेच मत असेल असा विश्वास आहे. पण आज मात्र नुसती पूजा करून भागेल अशी परिस्थिती नाही, आज या संतांच्या चरित्राचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आणि त्यानुसार आचरण करण्याची गरज आहे. ऐकणे म्हणजे कृती करणे आणि अभ्यासणे म्हणजे आत्मसात करणे, आत्मानुभूती घेणे, हे समजून घ्यायला हवे.

‘श्रीमान तुका आंबिले’ हे ‘संत तुकाराम’ होऊ शकले कारण त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि कृतीत आणली. नुसती कृतीत न आणता ती आत्मसात केली. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या पंक्तीनुसार ते जीवन जगले. हे सर्व लिहायला जितके सोपे तितकेच करायला अवघड.

*अखंड नामस्मरण, त्याला ‘सम्यक’ चिंतनाची जोड आणि ‘अरण्यवास’ यामुळे श्रीमान तुकाराम आंबिले संवेदनशील होऊ लागले, निसर्गाशी समरस होऊ लागले. एक दिवस सोनपावलांनी आला, तुक्याची वाचा अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली.

….. आणि मग ‘जीवा-शिवाची भेट झाली

तुक्याची ब्रह्मानंदी टाळी लागली. ‘अवघा’ रंग एक झाला नि तुक्या विठ्ठल रंगात न्हाऊन गेला!! तुक्या अंतर्बाह्य बदलून गेला. सर्व ठिकाणी एकच हरी भरून राहिला आहे याची त्यास अनुभूती आली, एक चैतन्य सर्व सृष्टीत भरून राहिले आहे याची चिरजाणीव त्यास झाली. सर्व ठिकाणी त्यास एक विठ्ठल दिसू लागला, देह विठ्ठल झाला, चित्त विठ्ठल झाले, भाव विठ्ठल झाला, क्षेत्र विठ्ठल झाले, आकाश विठ्ठल झाले, चराचर सृष्टि विठ्ठल झाली, आणि  असे होता होता तुका तुकाराम झाला नव्हे तुका आकाशा एवढा झाला!!!* सामान्य मनुष्य अथक परिश्रमानें, साधनेने ‘आकाशा एवढा’ होऊ शकतो, हे त्यांनी स्वानुभवाने सिद्ध करुन दाखवले आणि सामान्य जनांना भगवंत प्राप्तीचा सोपान सुगम करून दिला.

‘आकाशा’ एवढ्या झालेल्या तुकारामांना वैकुंठाला नेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले. तोच आजचा दिवस!! आजचा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. आजच्या पावनदिनी अल्पमतीने वाहिलेली ही शब्द सुमनांजली श्री संतश्रेष्ठ तुकारामांच्या चरणी अर्पण करीत आहे.

या लेखाचा समारोप त्यांच्याच एका अभंगाने करतो…

विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृ. ॥

संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥

करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥ 

काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥ 

तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥”*

(अभंग क्रमांक ५५३, सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय राम कृष्ण हरि…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर वामनराव जोशी … ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ वीर वामनराव जोशी… ☆ श्री प्रसाद जोग

वीर वामनराव जोशी

जन्मदिन  १८ मार्च १८८१

वऱ्हाड प्रांतामध्ये प्रखर देशभक्तीसाठी प्रसिद्ध वीर वामनदादा ह्यांचा जन्म अमरावती येथे झाला. अमरावतीत त्यांचे बालपण गेले. वडील गोपाळराव व आई अन्नपूर्णा होते. आईच्या सेवाभाव, निस्पृहता, सत्यप्रियता ह्या गुणांच्या संस्कारात दादा वाढले असल्याने लहानपणापासूनच त्यांचा देशसेवेकडे ओढा होता. स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला त्यांच्या हृदयात धगधगत होती. देशभक्ती ही त्यांची जीवननिष्ठा होती.

भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केले व त्यांचे संघटन करून त्यांना देशभक्ती शिकवली. लष्करी वाङमय ग्रंथ त्यांनी वाचनालयात ठेवले. व्यायामाकरिता आखाडे काढले. शस्त्रं जमविली, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले व बॉम्ब प्रयोग शाळा काढली.

१९०२, १९०८ आणि १९०८  ते १९१४ च्या सशस्त्र क्रांती उठावाचे नेतृत्व वामनरावांनी केले होते. त्यांना वाटत होते भारतमातेला मुक्त करण्याकरिता इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनतेला उघडपणे बंड  पुकारावेच लागेल. त्यावेळी संघटित, शिस्तबद्ध, धैर्यवान, स्वसंरक्षणक्षम असे तरुण सरसावले पाहिजे म्हणून विविध संघटना या दादांनी उभारल्या. त्यात अकोट येथे ३०० युवा संघटित झाले होते. युद्ध विषयक डावपेच समजावे याकरिता दादांनी या संदर्भातील १००० पुस्तकांचा संग्रह केला होता. त्या पुस्तकांचे  वाचन करण्यात येत असे. तसेच त्यात वर्णन केलेल्या डावपेचावर चर्चा सुद्धा केली जात असे. यातील डावपेचांचा उपयोग कित्येकदा वामनराव निवडणुकीच्या लढतीत करीत.

या काळात सरकार कडून क्रांतिकारकांचा कसून शोध घेणे सुरू झाले. गुप्त पोलीसही  दादांच्या व सहकाऱ्यांच्या शोधात होते. म्हणून दादांनी सर्व शस्त्रास्त्रे, युद्ध विषयक पुस्तके, बॉम्ब तयार करण्याची साधने सर्व जमिनीत पुरून ठेवण्याचा सल्ला सहकाऱ्यांना दिला.

दादांचे हस्तलेखन सुंदर व सुवाच्च होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘गीतारहस्या’ची हस्तलिखीत प्रत तयार करण्यासाठी बोलाविले. ‘गीतारहस्या’च्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख आहे. ‘गीतारहस्य’ ची  हस्तलिखीत प्रत तयार करताना गीतेचे तत्त्वज्ञान दादांनी आत्मसात केले. त्यांनी जीवनभर कर्मयोगाचा सिध्दांत आचरणात आणला.

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वामनदादा हे उत्तम वक्ते, लेखक, नाटककार होते. त्यांचे लिखाण राष्ट्रजागृतीसाठी जहाल व ओजस्वी असे होते. रणदुंदुभी, राक्षसी महत्वाकांक्षा, धर्मसिंहासन ही दादांची तीन नाटके रंगभूमीवर चांगलीच गाजली. त्यामुळे ते श्रेष्ठ नाटककार ठरले. ही नाटके राष्ट्र चळवळीस प्रेरक ठरली.

१९२१ साली भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे दादा अध्यक्ष होते.

१९४३ते १९५३ या काळात वामनराव दादांनी अमरावतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

रणदुंदुभि  नाटकांमधील त्यांची पदे विशेष गाजली होती आणि आजही ऐकली जातात.

१) आपदा राजपदा भयदा

२) दिव्य स्वातंत्र्य रवी

३)वितरी प्रखर  तेजोबल

४)परवशता पाश दैवें

५) जगी हा खास वेड्यांचा

वीर  वामनराव जोशी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।

सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥

*

प्राप्त करूनी ऐक्यत्व भजितो मज सकल जीवात

समस्त कृती तयाची साक्ष होते सदैव हो माझ्यात ॥३१॥

*

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥

*

सकल प्राणिमात्रात पार्था देखितो निज रूप

सुखदुःख सर्व जीवांचे जाणतो अपुल्यासमान

साक्षात्कार तयाला जाहला आत्म्याच्या अद्वैताचा

शिरोमणी त्या परम मानिती समस्त श्रेष्ठ योग्यांचा ॥३२॥

*

अर्जुन उवाच

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।

एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम्‌ ॥ ३३ ॥

कथित अर्जुन

कथन केलासी हे कृष्णा योग समदृष्टीचा

मला न उमगे चंचलतेने माझिया मनाच्या ॥३३॥

*

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्‍दृढम्‌ ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्‌ ॥ ३४ ॥

*

विकार मनासी सदैव असतो चंचलतेचा 

स्वभाव त्याच्या ठायी मंथन करण्याचा

बलशाली दृढ मनाचा कसा करू निग्रह

पवनासी थोपविणे ऐसे हे कृत्य दुष्कर ॥३४॥

*

श्रीभगवानुवाच

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्‌ ।

अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ६-३५ ॥

*

कथित श्रीभगवंत

महावीरा अवखळ चंचल  निःसंशय हे मन 

वैराग्यप्रयासे तया अंकुश जाणी रे अर्जुन ॥३५॥

*

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।

वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥

*

मना ना करि अंकित अपुल्या दुष्प्राप्य तयासी योग

वश करुनी मना प्रयत्ने सहज साध्य तयासी योग ॥३६॥

*

अर्जुन उवाच

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।

अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥

*

कथित अर्जुन

योगावरती मनापासुनी असुनी श्रद्धा केशवा

नसल्याने संयम मनावर विचलित अंतःकाळी 

योगसिद्धी तयासी अप्राप्य तसाचि राही वंचित

गती काय तयासी भगवंता अंतिम होते प्राप्त ॥३७॥

*

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।

अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ६-३८ ॥

*

मार्गावरती ब्रह्मप्राप्तीच्या झाला मोहित

निराधार मार्गास चुकोनी राही जो भरकटत

जलदासम तो व्योमामधल्या दो बाजूंनी भ्रष्ट

होउन जातो का श्रीकृष्णा होत्याचा तो नष्ट ॥३८॥

*

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।

त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९ ॥

*

किल्मिष माझ्या मनातील निवारण्या तू समर्थ

नष्ट करण्या संशयास मम दुजा नसे संभवत ॥३९॥

*

श्रीभगवानुवाच

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।

न हि कल्याणकृत्कश्चिद्‍दुर्गतिं तात गच्छति ॥४० ॥

*

कथित श्रीभगवंत

इहलोकी वा परलोकी त्याचा नाश न होत

सत्कर्मास्तव कर्मरत तया दुर्गती न हो प्राप्त ॥४०॥

– क्रमशः अध्याय सहावा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(२० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त खास हा लेख) 

तो दिवस मला आजही आठवतोय. मला रात्री अचानक एक वाजता फोन आला. मी भर झोपेतून खडबडून जागा झालो होतो. मोबाईल हातात घेतला व नंबर पाहीला तर तो परदेशी कॉल असल्याचे समजले. मी मोबाईल रिसिव्ह केला व हॅलो बोललो. समोरून एक महिला बोलत होती व डिस्टर्ब केले म्हणून क्षमा मागत होती. आपण कोठून बोलताय विचारले तर अमेरिकेतून बोलत आहे असे सांगितले. काय विशेष विचारले तर त्या सांगू लागल्या की आपला चिमण्यांविषयी संभाषणाचा इको फ्रेंडली क्लब वरील फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ पाहीला व तो खुपचं भावला व रहावलेच नाही म्हणून आपणास फोन केला. पुढे त्या बोलू लागल्या व त्यांची त्यातील काही वाक्य मात्र काळजाला भिडणारी होती व त्या वाक्यांनी माझ्या शरीरावरील रोम खडे झाले होते. त्या सांगत होत्या पुण्यामध्ये माझे लहानपण गेले अगदी लग्न होईपर्यंत मी तेथे  खुप खेळले बागडले. वडीलांनी घराच्या आवारात पक्षांसाठी खुप झाडे लावली होती. ते पक्षी पाहुन त्यांच्या विषयी खुप कुतुहल वाटायचे.  त्यांच्या प्रेमात मी कधी पडले समजलंच नाही. या प्रेमाचे रूपांतर आमचे मैत्रीत झाले. त्यांना मी रोज खाण्यासाठी धान्य टाकायची. त्या सुरूवातीला धान्य टाकताच क्षणी उडून जायच्या व मी तेथून निघून गेले की मग टाकलेले धान्य टिपुन खायच्या. या खेळात मी व त्या अगदी फार जवळ जवळ येत गेलो. आता त्या माझ्या हातात धान्य पाहीले की कधी कधी हातावरच येऊन बसायच्या. धान्य टाकायला उशीर झाला की जोर जोराने चिवचिवाट करायच्या. अगदी मुलाने हट्ट करावा तशा त्या हट्टी होत चालल्या होत्या. मी कुमारीका अवस्थेत आता या चिमण्यांची आई झाले होते. त्यांच्या जेवण पाण्याची काळजी मी रोज घेत असे व त्यांच्याशी संवाद साधत असे. मला माहीत नाही पण कोणत्या जीवनाची हि पुण्याई कामी आली होती माहीत व यांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले होते.

पुढे माझे  शिक्षण पूर्ण झाले. आई वडीलांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पतीसोबत अमेरीकेला रहायला गेले. चिमण्याचा सहवास मिळत नसल्याने मी पहिले खूप उदास व्हायची. कधी कधी तर हातात धान्य घेऊन व्हरांड्यात यायची व नाराज होऊन माघारी फिरायची कारण अंगणात चिमण्याच नसतं.

अमेरिकेत वर्षातील ४ महिने तर सुर्य दर्शन घडने कठिणच होते. बर्फ बारी सुरू झाली होती त्यामुळे पक्षी पहायला मिळायचे परंतु आपल्या सभोवताली नेहमीच चिवचिव करणा-या चिमण्या मात्र पहायला मिळणे दुर्मिळच होत. लग्नाचे दोन वर्ष चिमणी सारखे भुर्कुन कधी उडुन गेले कळलेच नाही. 

एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर  विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती.

मी त्या दिवसापासून अंगणात ती चिमणी रोज धान्य वेचुन खायला यावी व मला पहायला मिळावी म्हणून तीला धान्य टाकु लागले. ती एकच चिमणी रोज दिसायची. मी पण.. एक त एक म्हणून धान्य टाकण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. कालांतराने दोन, तीन, चार अशा चिमण्या वाढत गेल्या व मी धान्य टाकतच गेले. आता त्यांची व माझी चांगली ओळख निर्माण झाली होती व त्यांना पण माझा लळा लागला होता. ८ महिन्यांत त्यांची संख्या जवळपास १५ / २० झाली होती. आता त्या माझ्या व मी त्यांच्या चांगलीच परीचयाची झाली होती.  गॅलरीत बसुन हाताच्या अंतरावर त्या धान्य टाकताना बसु लागल्या होत्या. आता मी  अंगणात धान्य टाकण्याऐवजी त्यांना गॅलरीत धान्य टाकत होते व त्या तेथे येऊन खाऊ लागल्या होत्या. माझी धान्य टाकायची वेळ अगदी त्यांच्या परीचयाची झाली होती. मी दरवाज्याची कडी काढायला खोटी की त्या आवाजाने ते तेथे हजर होत असत. आता त्यांनी माझ्या घराच्या शेडच्या आवारातच त्यांनी घरटी केली होती. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. भयंकर पडणा-या बर्फात या कशा राहतील समजत नव्हते. थंडीचा जोर वाढला होता. त्या दिवशी धान्य टाकायला मला थोडा उशीर झाला होता. दरवाजावर  सारखा टक टक आवाज येऊ लागला. दरवाजा का वाजतोय समजायला मार्ग नव्हता. दरवाजा उघडला तर समजले की चिमण्या दरजावर चोची आपटत होत्या व धान्य मागत असल्याचा संकेत देत होत्या कारण बर्फाने सगळा परिसर पांढराशुभ्र होऊन गेला होता व त्यांच्या पोटापाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मी त्यांचा धान्य घालण्याचा नियम कधीच मोडला नाही व  कधी कधी दरजावर मुद्दाम त्यांचा चोचीचा आवाज ऐकण्यासाठी मी उशीर करायची . दोन वर्षांत त्यांची संख्या जवळपास ६०/७० वर पोहचली. खूप आनंद झाला मला हे सर्व पाहून व अनुभवून. आता मी एकटी नव्हते तर आमचं कुटुंब जवळपास ७२ सदस्यांच झाले होते. गेल्या महिन्यात मी अचानक आजारी पडले. मला उठणे बसणे कठीण झाले. पती या कठीण काळात माझी सेवा करायचे. त्यांना खायला घालायचे माझ्या लक्षातच आले नव्हते व ना कधी दरवाजावर टकटक झाली. आजारपणात मला माहित नाही पण कसा काय विसर पडला कळलेच नाही. जवळपास ४ दिवस मी बेडवरून उठू शकले नव्हते. आज ५ व्या दिवशी मी स्वतः उठून बसले व बाथरूममध्ये जाऊन आले. तर लगेच दरवाजावर टकटक सुरू झाली. मला तर हे ऐकून आश्चर्याचाच धक्काच बसला. गेली ४ दिवस यांनी कधीच दरवाजावर टकटक केली नव्हती. कसं बरं समजलं असेल त्यांना की मी आजारी आहे? व आपण दरवाजा वाजवून या आजारी आईला  सतावने उचित नाही म्हणून. आज फक्त घरात उठून बसले तर लगेच दरवाजा ठोठावला. असे कसे घडले असेल? कोणत शास्र यांना आवगत असेल बरं? याच विचारात गेली कित्येक दिवस मी होते. याच उत्तर मला अनेक दिवसांनी मिळाले. आज आपला व्हिडिओ पाहण्यात आला आणि पक्षांना खरोखरच व्हायब्रेशन समजतात याची खात्रीच पटली. मी मला रोखुच शकले नाही तुमच्या त्या व्हिडिओ मधील विधान ऐकुन व लागलीच आपणास फोन केला. 

    पंधरा ते वीस मिनिटे दिपालीजी बोलत होत्या. त्यांचे कानावर पडणारे शब्द अंगावर काटे उभे करत होते. आनंद याच गोष्टीचा वाटत होता की एक चिमणी पासुन ६० ते ७० चिमण्यांचा गोतावळा दिपाली ताईंनी अन्नदाता म्हणून उभा केला होता तो पण परदेशात. ताई तुमचे पक्षांच्या पाठीशी सदैव असेच प्रेम राहो व आपला हा गोतावळा अतिशय मोठा होत राहो व आपल्या हातुन त्यांना सदैव अन्नदान मिळत राहो हीच सदिच्छा.

आज आपण मला चिमणी पक्षांचं आगळवेगळ रुप दर्शन घडवलत़ त्याबद्दल निश्चितच ऋण व्यक्त करतो. आज जागतिक चिमणी दिन या आपल्या सर्व चिमण्या ताईंना जागतिक चिमणी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नक्कीच द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो.

मित्रांनो पक्षांचे जतन आणि संवर्धन हाच पिकांवर परिणाम करणा-या किडींवर नियंत्रण उपाय आहे. त्यामुळे त्यांचे जतन करा व त्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न ठेवत चला. 

लेखक : रमेश खरमाळे, माजी सैनिक 

मो ८३९०००८३७०

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे 

भगवान कृष्णाने छोट्या करंगळीनंच गोवर्धन पर्वत का उचलला ?

तसंही आपण सर्व जाणतोच की, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णानं करंगळीनं गोवर्धन उचलला.

दुसऱ्या बाजूने सुध्दा या प्रसंगाचा विचार करता येईल.

जेव्हा कृष्णानं इंद्राच्या रागा पासून गोकुळ वासियांचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपल्या बोटानं उचलण्याचं ठरवलं, तेव्हा कृष्ण आपल्या हाताच्या बोटांना विचारतो, मी कोणत्या बोटानं पर्वत उचलू ?

सर्वात आधी अंगठा म्हणाला, मी सर्वात ताकदवान आहे, पुरुष आहे, बाकीच्या तर स्त्रिया आहेत, आपण पर्वत उचलण्यासाठी माझाच वापर करावा !

नंतर तर्जनी म्हणते, भगवान, कधी कुणाला चुप बस असं सांगताना मिच कामास येते.आणि आपण जे काम करणार आहात ते इंद्राला चुप करण्याचंच आहे.म्हणून आपण माझा वापर करावा, हे उत्तम !

यानंतर मध्यमा म्हणाली, सर्वात उंच होण्यासोबतच मी ताकदवान सुध्दा आहे.म्हणून या कामासाठी आपण माझाच विचार करावा !

अनामिकेला खात्री होतीच, तरीही ती म्हणाली, भगवान, सर्व पवित्र कामं माझ्यामुळं संपन्न होतात. सर्व मंदिरांत मीच देवतांना टिळा लावते.

आता कृष्णानं फक्त छोट्या करंगळीकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती म्हणाली, ” भगवान, एक तर मी सगळ्यात छोटी आहे.माझ्यात असा कोणताच असामान्य गुण नाही.

माझा कुठं उपयोग सुध्दा होत नाही. माझ्याकडे एवढी शक्ती सुध्दा नाही, की मी पर्वत उचलू शकते. मला फक्त याची खात्री आहे की, मी तुझी आहे !” छोट्या करंगळीचं म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, “ कनिष्ठे तुझी विनम्रता पाहून मी आनंदी झालो आहे. जर काही उच्च मिळवायचं असेल तर विनम्र होणं आवश्यक आहे.” ….. आणि कनिष्ठेच्या सन्मानासाठी भगवंतानं करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला !”

कृष्णं वंदे जगद्गुरुम् 

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

इंजिनिअर या नात्याने मी गेली ४० वर्षे ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो आहे. या वाटचालीत मी ऑटोमेशन क्षेत्रातली प्रगती जवळून बघितली. त्या वाटचालीतला काही अंशी वाटा उचलला आहे. या चाळीस वर्षात अगदी साध्या manual मशीन पासून ते आजच्या ए-आयपर्यंतचा काल मी बघतोय. कमीतकमी मानवी श्रमामध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे हे ऑटोमेशनचे सुरवातीचे उद्देश. पुढे केवळ मानवी श्रम कमी करणे हा उद्देश राहिला नाही तर या ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीतकमी वेळात आणि श्रमात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे शक्य झाले आणि मशीन्स त्या उद्देशाने डिझाईन होऊ लागली. टकळी चरखा वापरून सुत काढणे यापेक्षा इलेक्ट्रिक मोटारवर चालणारी मोठमोठी स्पिनिंग मशीन हे सुत काढू लागली आणि कापडाचे उत्पादन प्रचंड वाढले. मी म्हणेन की ऑटोमेशनने कापड स्वस्त केले आणि चांगल्या गुणवत्तेचे कापड सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. महात्मा गांधींचा चरखा-माग वापरून जर इतक्या लोकसंख्येला कापड पुरवायचे म्हणले तर निम्मा देश आज गांधींसारखा उघडा राहिला असता आणि एक चतुर्थांश देश जाडेभरडे हरक आणि मांजरपाट कापड वापरत असता. या कापडाचे प्रकार आजच्या पिढीला माहित देखील नाहीत. जसजसा काळ गेला ऑटोमेशनचा उत्पादन क्षमता वाढवणे या पलीकडे  आता वस्तूची गुणवत्ता आणि अचूकता वाढवणे हा झाला. कारण मानवाला अशक्य जमणारी गुणवत्ता आणि अचूकता मशीन सहज देऊ लागली. वर मी कपड्यांचे उदाहरण दिले. पण इतर अनेक क्षेत्रात ऑटोमेटेड मशीनने प्रवेश केला. जसे की, प्लास्टिक, घातु प्रक्रिया, शेती आणि एक ना अनेक. आज कोणतेही क्षेत्र ऑटोमेशन शिवाय नाही. ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता, अचूकता आणि गुणवत्ता देऊन मानवी जीवन सुकर करण्याऱ्या वस्तू सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्यात आणून दिल्या. यात अगदी गृहिणींच्या स्वयंपाकघरातील वस्तूंपासून वाहनापर्यंत अनेक गोष्टी सामन्यांच्या आवाक्यात आल्या. ऑटोमेशनमुळे आलेली गुणवत्ता ठीक आहे पण उत्पादकता आता राक्षसी होऊ लागली आहे. उत्पादकता वाढली तशी कॉस्ट कमी होऊ लागली आणि किंमती सामन्यांच्या आवाक्यात आल्या हे जरी खरे असले. उत्पादकता मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली तसा याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला. जास्त उत्पादन करण्यासाठी लागणारे रॉ मटेरीअल निसर्गातून मिळवणे अपरिहार्य असल्याने निसर्ग ओरबाडला जाऊ लागला. नवीन तयार होणारा माल बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागल्याने यातून use and throwवृत्ती वाढली आणि प्रचंड प्रमाणात कचरा निर्मिती होऊ लागली. मानवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कचरा निर्मितीचे पाहिले पाउल ठरू लागले. वस्तू गरजेतून घेण्यापेक्षा स्टेट्स सिम्बॉल म्हणून घेण्याची वृत्ती वाढू लागली. ऑटोमेशनच्या पुढच्या टप्प्यात जसे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि software आधारित वस्तू आल्या तसे एकाच वस्तूंचे नवनवीन प्रकार (versions) आणि वैशिष्ठ्य (features) बाजारात येऊ लागले तसे वस्तूचे आपल्याकडील असलेले व्हर्जन जुने वाटू लागले. जुने टाकून नावे घ्या ही होड सुरु झाली. वस्तू टाकून देण्यासाठी ती निकामी होण्याची गरज राहिली नाही version जुने झाले out dated (obsolescence ) झाले, old fashioned झाले, हे वस्तू टाकून देण्याचे महत्वाचे कारण होऊ लागले. दर २ वर्षांनी बदलता मोबाईल, तीन वर्षांनी बदलती कार हे अभिमानाचे विषय होऊ लागले. हे घड्याळ माझ्या वडिलांनी १० वर्षे वापरले मग मी १५ वर्षे वापरले किंवा मी स्कूटर गेली १५ वर्षे उत्तम मेंटेन करून अजून वापरतोय असे अभिमानाने सांगणारी माणसे हास्यास्पद ठरू लागली.

ही सगळी प्रस्तावना करायचे कारण म्हणजे आता ए-आय येऊ घातले आहे नव्हे दारात उभे आहे. आजपर्यंत जे ऑटोमेशन घडत होते ते वस्तू उत्पादकता, वस्तू गुणवत्ता आणि अचूकता यासाठी घडत होते. मी या क्षेत्रात काम करताना उत्पादकता,गुणवत्ता आणि अचूकता या कारणांबरोबर एक सुप्त पण महत्वाचे आणि जास्त जाहीर चर्चा न केलेले कारण म्हणजे मनुष्यबळ कमी करणे हे हमखास असायचेच. एखादे ऑटोमेशन करण्याचे ठरवताना किती माणसे ते काम करत आहेत त्यातील किती कामगार कमी करता येतील किंवा दुसऱ्या कामावर वळवता येतील हा विचार करून ऑटोमेशन बजेट आणि आमचे कोटेशन मंजूर केले जाई. मनुष्यातले काही स्वभावतः असणारे दुर्गुण, भावनिक मूडवर असलेले अवलंबित्व  आणि बदलती परिस्थिती यातून हे ऑटोमेशन वाढत गेले. जिथे माणूस काम करणे शक्य आहे अशी कामे देखील यंत्रे करू लागली. वाढती मनुष्यबळ कॉस्ट, सततच्या आर्थिक मागण्या, कामचुकारपणा, अनाठायी सुट्ट्या घेणे, काही अवास्तव कामगार कायदे इत्यादीमुळे उत्पादन प्रक्रियेतील मनुष्यबळ काढून तिथे automated machine ने काम करून घेण्याकडे व्यवस्थापनाचा कल वाढू लागला. यातून NC/CNC/VMCमशीन्स, रोबोट, SPMs हे सर्रास येऊ लागले या मशीन्सची उत्पादकता मानवापेक्षा जास्त होतीच पण अचूकता आणि गुणवत्ता हा मोठा फायदा व्यवस्थापनाला आणि पर्यायाने ग्राहकाला मिळू लागला. उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन वाढले तसे softwareने ऑफिस ऑटोमेशन क्षेत्रात अचूकता, वेळेची बचत आणली. वेगवेगळ्या व्यवसायात घडणाऱ्या प्रत्येक activity चे dataस्वरुपात documentation होऊ लागल्याने प्रचंड data तयार होऊ लागला. हा data व्यवसायाची पुढील दिशा (Strategy) ठरवण्यास उपयुक्त ठरू लागला. निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक झाला. मानवी अनुभवला फारशी किंमत उरली नाही. त्यामुळे केवळ वयाच्या आणिअनुभवाच्या जोरावर प्रमोशन देणे. १९८४ साली मी फिलिप्स कंपनीत असताना word processorनावाचे electronic टायपिंग मशीन फिलिप्सच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये आले. ते फक्त डायरेक्टर आणि त्यांची सेक्रेटरी वापरत असे. साधे पत्र लिहिण्याचे मशीन पण आम्हाला ते वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचे फार अप्रूप. हे मशीन वापरणारी त्यांची सेक्रेटरी लई भाव खायची याचा आमच्या मनात मत्सर होता. आता कॉम्पुटर ऑफिस ऑटोमेशनचा भाग झाल्याने सेक्रेटरीच्या भाव खाण्याचे आणि आमच्या जळण्याचे हसू येते. फिलिप्सच्या प्रत्येक मॅनेजरच्या केबिन बाहेर त्याची सेक्रेटरीचे टेबल आणि टाईप रायटर असे. आता कॉम्प्युटरमुळे मॅनेजरच राहिले नाहीत.

मशीन ऑटोमेशनमुळे उत्पादकता वाढली त्यामुळे काही कामातील मनुष्यबळ कमी झाले असले तरी बेकारी फारशी वाढली नाही कारण या वाढत्या उत्पाद्कतेमुळे नवी क्षेत्रे तयार होत होती आणि मनुष्यबळ तिकडे वळवले गेले. आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चिमणी वाचवा … ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ चिमणी वाचवा … ☆ श्री प्रसाद जोग

जगभरात २० मार्च हा दिवस ‘ चिमणी वाचवा दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो.

चिमणी आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग. अगदी जन्माला आल्यावर आई आपल्याला भरवते तेंव्हा सुद्धा ती एक घास चिऊचा म्हणून देते आणि त्या चिमणीची आठवण काढत आपण जेवतो. जरा मोठं झालं की झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांग हा लहान मुलांचा लकडा असतो ,तेंव्हा सुद्धा चिऊताई हजर असायची आणि मग कावळेदादा येऊन म्हणायचा “चिऊताई चिऊताई दार उघड” , पुढची गोष्ट आपण साऱ्यांनी लहानपणापासून ऐकली आहेच.

जंगले निर्माण करण्यामध्ये चिमण्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी खाल्लेल्या वेगवेगळ्या बिया त्याच्या विष्ठेमधून पुन्हा जमिनीत रुजतात आणि त्यातून वृक्ष निर्माण होत असतात.मानवाने शहरीकरण झपाट्याने वाढवले त्या मुळे जंगले नष्ट होऊ लागली आणि आहे त्या शेतीत जादा पीक घेण्याच्या हव्यासापायी कीटक नाशकांचा वापर अवाच्या सव्वा वाढला आणि तोच या चिमण्यांच्या जीवावर देखील उठला. कीटक नाशके फवारल्यावर ते धान्य खाऊन चिमण्या मरून जाऊ लागल्या.रोज अंगणात बागडणाऱ्या चिमण्या हळू हळू दिसेनाशा होऊ लागल्या आहेत. चिमण्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,याच चिमण्या पिकावरील कीड/ आळ्या खाऊन टाकतात व शेतातले पीक वाचवतात.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल देखील ढासळायला लागला आहे,उष्णता वाढायला लागली आहे ,ही उष्णता ही गर्मी चिमण्यांना असह्य होते, त्यावर इलाज म्हणजे पसरट मातीच्या भांडयांमधे थोडे पाणी भरून ठेवा मग पहा भर दुपारी चिमण्या त्या मध्ये डुंबतील, पाणी पितील,जवळ ठेवलेले अन्नाचे कण खाऊन तृप्त होतील, तेंव्हा आपल्याला मिळणारे समाधान लाखमोलाचे असेल. अशी हजारो वर्षे मानवाला सोबत करणाऱ्या या चिमण्यांना वाचवायची जबाबदारी आपलीच आहे .त्या साठी फार काही करायची सुद्धा गरज नाही.

अशी ही चिमणी सकाळ झाली की किलबिलाट करून आपल्याला जागे करत असते.तिच्यासाठी जर शक्य असेल तर बागेमध्ये पुठ्ठयाचे किंवा लाकडी घरटे टांगून ठेवा. मोठ्या शहरामध्ये रहात असाल तर फ्लॅटच्या गॅलरीमध्ये रोजच्यारोज थाळीमध्ये पाणी ठेवा अगदी चार दाणे जरी तिला खाऊ घातले तरी मला खात्री आहे सगळ्यांना मोठा आनंद होईल.

चिमणीचा आवाज

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ सनातन संस्कृतीमधील काही ऋषिका — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सनातन संस्कृतीमधील काही ऋषिका — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

1) लोपामुद्रा

2) रोमशा

3) नदय

4) शश्वती अंगीरसी

5) अपला

6) विभावरी

7) सूर्या

8) काक्षिवती

9) वसूक्रपत्नी

10) यमी वैवस्वती

11) उर्वशी

12) इंद्रनी

13) पौलोमी

14) सरमा देवशुनी

15) जुहू

16) रात्री

17) सर्प रादांनी

18) श्री

19) लाक्षा

20) इंद्रमातर 

वरील नावे आपल्या सनातन संस्कृतीमधील काही महिला ऋषींकाची आहेत, ज्यांनी वेदांचे सूक्त व मंत्राच्या व्याख्या तयार करण्यामध्ये मौलाची कामगिरी केली आहे.

ब्रह्मवादिनी गार्गी,सर्वात मोठं नाव,तपस्विनी गार्गी

मैत्रेयी,याज्ञवल्क्य पत्नी

वाचक्नवी

सुलभा

वडवा 

प्रातिथेयी

काशकृत्स्नी (मीमांसा दर्शनावर काशकृत्स्नी ग्रंथकर्ती)

ब्रह्मवादिनी ऋता

स्वयंप्रभा

जया,सुप्रभा या दोघीही दक्ष कन्या आणि कृशाश्व ऋषिंच्या पत्नी, यांनी.अस्त्र संशोधन केलं होतं

स्वतः सीता वेदविद्याविभूषित

तसेच अरुंधती, वसिष्ठ पत्नी

अशी बरीच नावं आहेत, अनेक ऋषिका, ब्रह्मवादिनी, संशोधिका आहेत ज्या उच्च विद्याविभूषित आहेत,

ह्यापैकी किमान पाच नावाची आपण पुढील वर्षभरात ओळख करून घ्यावी. म्हणजे महिला दिन साजरा केल्याचे पुण्य आपल्याला लाभेल.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र !

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र !

नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल मध्ये  नेहमीप्रमाणे पेशंट व नातेवाईक यांची ये जा सुरू होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष डॉक्टर कैलास राठी व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रीना राठी हे नेहमीप्रमाणे आपले राऊंड घेत होते. डॉक्टर रीना आपल्या बाल रुग्णांची तपासणी करावयास निघून गेल्या. राउंड संपवून त्या परत डॉक्टर कैलास राठी यांच्या केबिन कडे येत असताना त्यांना ‘ती’ व्यक्ती पळताना दिसली. अरे ही व्यक्ती अशी का पळत असावी एवढा क्षणभर विचार मनात येईपर्यंत मागून कर्मचाऱ्यांचा पकडा ! पकडा त्याला त्याने सरांना मारले ! असा आरडाओरडा सुरू झाला. हे ऐकताच रीनाच्या डोक्यात त्याने हातापायी केली असेल असेच आले, परंतु त्यांनी डॉक्टर कैलास यांच्याकडे धाव घेतली. पाहते तर काय ? सगळीकडे जणू रक्ताचा सडा पडला होता. तिचा जीवन साथी खाली पडला होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली, पण क्षणभरच! पुढच्या क्षणी ही सावित्री यमाशी दोन हात करायला सज्ज झाली. आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभवाने व समय सूचकतेने तिने सगळे उपचाराचे चक्र फिरवले. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपल्या लाडक्या सरांना सावरायला पुढे सरसावला व डॉक्टर रीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले.

परंतु त्या क्रूर, विकृत व्यक्तीने कोयत्याचे एवढे वार केले होते की रक्त कुठून येत आहे हेच कळेना! डॉक्टर कैलास यांच्या डोक्यावर व मानेवर एवढे जीव घेणे वार केले होते की कुठल्या घावावर प्रथम उपचार करावा असे झाले. परंतु डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत झालेला स्टाफ व डॉक्टर रीना यांच्या सूचनेनुसार अजिबात वेळ न घालवता उपचार सुरू झाले. एखादा सामान्य व्यक्ती अशा हल्यानंतर कुठलाच नसता पण हे डॉक्टर कैलास राठी, खरोखरच लढवैये व जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी ! संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना आपल्या पत्नीस काय उपचार द्यावे ही सूचना देत होते! जातीचे डॉक्टर ते !

पतीवर उपचार करताना डोक्यात फक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करावे लागणार हेच विचार चक्र रीना यांच्या डोक्यात सुरू होते व त्या अन्वये त्या स्टाफला बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सूचना देत होत्या. आपल्या सगळ्या भावना बाजूला जाऊन एक डॉक्टर बनवून त्यांनी एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन डॉक्टर कैलास यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवण्याचा निर्णय घेतला व आपली समय सूचकता दाखवली. हा हा म्हणता ही वार्ता सगळीकडे पसरली. नातेवाईक, मीडिया, राजकारणी, समाजकारणी, शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध स्तरातील व्यक्ती अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाली. डॉक्टर राठी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध होऊ लागला.

आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर्स व सुयोग हॉस्पिटलच्या तज्ञांची टीम यांनी आपले शर्थीचे प्रयत्न सुरू केले व डॉक्टर राठी यांच्यावर उपचार सुरू झाले.

आता या सावित्रीच्या, रीनाच्या लढाईचा दुसरा पर्व सुरू झाला. कैलास राठी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ती खरोखरच भयानक रात्र होती डॉक्टर रीना यांनी प्रण केला की सकाळचा स्कॅन होईपर्यंत मी पाण्याचा घोट ही घेणार नाही! इकडे राठी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाची घालमेल काय सांगावी ? घरी त्यांची आई  लेकाच्या जीवासाठी देवाला साकडे घालत होती. डॉक्टर राठी यांचे अपत्य वृंदा  व राम दोघांना तर धक्क्यातून सावरणे अवघड झाले होते. परंतु आई-वडिलांनी दिलेली सकारात्मक दृष्टी व विचारसरणी त्यांना सांगत होती आमचे वडील यातून हमखास सुखरूप बाहेर पडतील! सकाळी ही वृंदा, सावित्रीची लेक सहा वाजताच पोहोचली आपल्या आई-वडिलांकडे ! सात वाजता स्कॅन चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर या सुकन्याने आपल्या आईला प्यायला पाणी दिले रात्रभर नाना  विचारांचे काहूर मनात असलेल्या व अस्वस्थ मन झालेल्या सगळ्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी ही हिम्मतवान सावित्री उभी राहिली. आपल्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आत लपवून, आत्मविश्वासाने भरलेल्या  डॉक्टर रीनाने सगळ्यांना एकच सांगितले बी पॉझिटिव. . कैलास शंभर टक्के बाहेर पडणारच आहे, नव्हे त्याला यातून बाहेर पडावेच लागेल. तुम्ही सगळे फक्त देवाचे नामस्मरण करा व विश्वास ठेवा की कैलास सुखरूप आहे ! सुखरूप आपल्यासमोर येतील ! काय हा विश्वास !काय तो देवावर भरोसा! सगळे काही प्रशंसनीय ! चोहो बाजूने देवाचा धावा सुरू झाला. डॉक्टर आपल्या विज्ञानाने व परिवार आपल्या प्रार्थनेने कैलास यांच्यावर उपचार करू लागले. इथे प्रत्ययास आले देव तारी त्याला कोण मारी?

डॉ. कैलास उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. परंतु हे डॉ कैलास पेशंटच्या भूमिकेत येतच नव्हते. त्यांच्यातला डॉक्टर सजक होता. आपले औषध उपचार ते सजक पणे करून घेत होते.

आय सी यु मध्ये  डॉक्टर रीना यांच्या बरोबरीने डॉ. प्राजक्ता ही आपल्या सरांच्या उपचारासाठी डोळ्यात तेल टाकून रात्रीचा दिवस करत होती. डॉ. राठी यांना वाचण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

यातच डॉ. कैलास यांच्या प्रकृती च्या काळजीने त्यांना मुंबई येथे हलवावे असे सांगण्यात येऊ लागले. परंतु, सगळी परिस्थिती पाहता, सगळे निष्णातडॉक्टर वरच्या विश्वासाने डॉ रीना यांनी खूप नम्रपणे हे नाकारले व स्वतःच्या जबाबदारीवर डॉक्टर कैलाश यांचे सर्जरी पुण्यभूमी नाशिकमध्ये डॉक्टर एखंडे व डॉक्टर बिर्ला यांच्याकडून करण्याचे निश्चित केले. त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम ! 

सर्जरी करावयाचे ठरल्यापासून विविध स्तरातील लोकांकडून प्रार्थना होऊ लागली. इथे जात पात, धर्म भेद कुठल्या कुठे पळाला! उगवच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी नमाज अदा केली! बोहरी समाजाकडून त्यांच्यासाठी पवित्र जल आले! हिंदू समाजात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या ! राठी कुटुंबांनी माणूस कमावल्याची ही साक्ष होती. राठी दाम्पत्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. आपल्या परिने ते सर्वांना नेहमीच मदत करत आले त्यांच्या सत्कर्माचा त्यांनी केलेले संचितकर्माचे फळ म्हणजे डॉक्टर कैलास यांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले.

आजपर्यंत हजारो बालकांना डॉक्टर रिना यांनी व अनेक पीडित रुग्णांना डॉक्टर कैलास यांनी प्राण दान दिले आहे. ते त्यांचे कर्तव्य जरी असले तरी देवाने त्यांचे प्राण वाचवून त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना दिले. ह्या लढ्यात रिनाला खंबीर पाठिंबा होता तो वसू दीदी, पिटू दीदी, उगाव येथील राठी परिवार, सातपूर चा मुंदडा परिवार मालेगाव चा कलंत्री परिवार व तिचा सर्व मित्र परिवार ज्यांच्या शुभेच्छा मुळे ती ही लढाई जिंकु शकली. र्डॉक्टर रीना राठी या सावित्रीने एका आईसाठी त्यांचा मुलगा, बहिणींसाठी भाऊ व मुलांसाठी वडील, सुयोग हॉस्पिटलचा कुटुंबप्रमुख व आपले सौभाग्य आपल्या जिद्दीने, समय सूचकतेने व सकारात्मक विचाराने परत आणले ! व्हेंटिलेटर निघेपर्यंत अन्नाचा दाणाही न खाणाऱ्या रीनाला व तिला साथ देणाऱ्या तिच्यासाठी उभ्या असलेल्या तिच्या परिवाराला माझे त्रिवार वंदन !

शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print