मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती विमनस्क अवस्थेतच स्मशानात पोहोचली. तिचा एकंदर अवतार पाहून ही आजही काहीतरी भलतंच  करणार असा कयास तिथं उपस्थित असलेल्या एकाने लावला आणि त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. ती जळून राखरांगोळी झालेल्या चितेजवळ जाऊन दोन्ही पायांवर बसली आणि तिने त्या राखेत हात घातला. यातील चिमुटभर राख ती कपाळावर लावेल असं वाटत असतानाच का कुणास ठाऊक तिने अत्यंत आवेगाने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती राख घेतली…आधी तोंडाला फासली आणि मग आपल्या डोक्यात घातली….बघणारे सर्व स्तब्ध आणि नि:शब्द! काय बोलणार? 

“मी यानंतर कोणालाही असं बेवारस जळू देणार नाही!” असं काहीसं ती पुटपुटत राहिली बराचवेळ आणि तिथून निघून गेली झपाझप पावलं टाकीत. 

कालच दुपारी ती आली होती आपल्या सख़्ख्या भावाचं शव घेऊन इथं. सोबत मोजकीच माणसं. आणि त्यात कुणीही पुरूष नाही. तिच्या भावाला आदल्या संध्याकाळी काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं भररस्त्यात. तिने खूप आरडाओरडा केला पण कुणीही तिच्या मदतीला धाऊन आलं नाही. तिने स्वत: कशीबशी रुग्णवाहिका बोलावून घेऊन रक्तबंबाळ झालेल्या भावाला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. खरं तर तो जागीच गतप्राण झालेला होता. त्याचा देह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात हलवला पोलिसांनी..ती ही तिथपर्यंत गेली पाय ओढत ओढत आणि तिथलं भयावह वास्तव पाहून ती मनातून पार हादरून गेली. अगणित शवं पांढ-या कापडांनी गुंडाळून ठेवलेली…नातेवाईकांची वाट पहात. 

   उत्तरीय तपासणी होण्यास काही वेळ तर लागणारच होता….भावाचं शव ताब्यात घेण्याची तिची हिंमत होईना…एकटीच होती ती त्याची नातेवाईक म्हणून. आईचं काहीच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं होतं. वडील कामावर गेलेले होते. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेत ते हंगामी चालक म्हणून कामावर होते. ती इस्पितळातून थेट घरी पोहोचली. आणि अगदी विमनस्क अवस्थेत बसून राहिली. वडील घरी आले…त्यांना ही बातमी समजली होती उडत उडत. पण नेमकं काय झालं हे त्यांना तिच्या तोंडूनच कसे बसे समजले आणि ते धाडकन खाली कोसळले आणि थेट कोमा मध्ये गेले…बेशुद्ध! 

खुनासारखं भयानक प्रकरण ऐकून जवळचा कुणीही नातेवाईक यांच्या घरी फिरकायला तयार नव्हता. आपण भावाला असं एकटं बेवारस टाकून तिथून निघून यायला नको होतं…तिला वाटलं. तो पर्यंत रात्र सरून गेली होती. ती तशीच इस्पितळात पोहोचली. काहूर माजलेल्या काळजानं तिने सोपस्कार उरकले आणि भावाला स्मशनात आणलं. पण अंत्यविधी पार कोण पाडणार. घरचा एकही पुरूष तिथं आलेला नव्हता. महिला तर करूच शकत नाहीत अंत्यविधी. मग तिने आपल्या डोक्यावर एक मोठं फडकं बांधलं…पगडी सारखं. आणि स्वत: पुढे होऊन जे काही करायचं असतं ते केलं भरल्या डोळ्यांनी. “दादा, तुला काल तिथं असं एकट्याला टाकून यायला नको होतं रे मी!” ती त्याचा देह विद्युतदाहिनीच्या मुखात दिसेनासा होईपर्यंत म्हणत होती. तिथं रडायला ती एकटीच होती. स्मशान भूमीत आणखी बरेच देह प्रतिक्षेत होते अंतिम निरोपाच्या. पण त्यापैकी अनेकांच्या देहासमवेत फक्त एखादा पोलिसच होता. अन्य कुणीही नाही. मग तिला समजलं….अशा हजारो बेवारस मृतदेहांची पोलिसांना विल्हेवाट लावावी लागते. २०१८ ते २०२२ या चार वर्षांतली आकडेवारी होती…अकरा हजार बेवारस देह. पैकी केवळ दीड हजारांच्या नातेवाईकांची तपास लागला आणि त्यांना शेवटचा निरोप मिळाला. बाकीचे असेच सरकारी यंत्रणांनी थंडपणे आणि यांत्रिकपणे इथपर्यंत पोहोचवले आणि इथल्यांनी एखादी चीजवस्तू जाळून टाकावी तसे ते देह अग्निच्या हवाली केले होते! 

ती सकाळी एका निश्चयानेच स्मशानभूमीत पोहोचली होती. तिने भावाची राख आपल्या डोक्यात घालून प्रण केला…मी करीन बेवारसांवर अंतिम संस्कार!

वर्ष २०१८…खरं तर तिचं लग्न ठरलं होतं. एका फौजीसोबत तिचं रीतसर लग्न लागणार होतं. ती उच्चशिक्षित समाजसेवा विषयात पदव्युत्तर पदवी. कायद्याचा अभ्यास सुरु होता. एका इस्पितळात एडसग्रस्तांसाठी समुपदेशक म्हणून सेवाही करीत होती. चारचौघींसाराखीच तिचीही स्वप्नं होती. आईने लग्नासाठी दागिने खरेदी करूनही ठेवले होते. पण ती आईच देवाघरी गेली आणि पुढच्याच वर्षी माणसा-माणसांतली करूणा रसातळाला नेणारा कोरोना उपटला. लग्न लांबणीवर पडलं. तिचा भाऊ एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी करत असे. त्याचे कुणाशी काही वाद झाले आणि त्यात त्याचा खून पडला. 

हिच्या घरात आता आजारी वडील, त्यांची वृद्धा आई एवढीच माणसं शिल्लक राहिली होती. भावाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तिने त्याला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला आहे आजवर. गेल्या दोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे चार हजारांना प्रेतांवर तिने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात विविध जातीधर्मांच्या माणसांच्या प्रेतांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या महानगरामध्ये आसपासच्या राज्यांतून हजारो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात घरंदारं सोडून. यातल्या अनेकांच्या नशिबी अशी एकाकी मरणं येतात. देहांवर ओळखपत्रं सापडत नाहीत. फौजदारी कायद्यामधील तरतुदींनुसार विशिष्ट काळ वाट पाहून या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. 

आपली कथानायिका पुजा शर्मा गेल्या दोन वर्षांपासून दरदिवशी सरासरी तीन-चार मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हरिद्वार गंगा किनारी जाऊन या बेवारस लोकांची रक्षा विधिवत विसर्जित करते पापक्षालिनी गंगेच्या वाहत्या प्रवाहात…..हे पुण्यकर्मच नाही तर काय? 

नातेवाईक आता पुजा पासून अंतर ठेवून आहेत. तिच्या या कामामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमी झाली आहे. तिच्या घरीही कुणी फारसं येत नाही. हो, पोलिस आणि सरकारी यंत्रणांना मात्र पुजा आता एक हक्काची माणूस झाली आहे. फाटलेल्या आभाळाला हे पुजा नावाचं थिगळ पुरणार नसलं तरी काही भाग झाकणारं तर निश्चितच आहे. पुजाचे वडील तिला त्यांच्या वेतनातून काही रक्कम देत असतात, तर आजी तिच्या निवृत्तीवेतनाचा काही भाग देते. आजीच्या मालकीचा असलेला जमिनीचा एक छोटा तुकडा तिने पुजाला दिला आहे…त्या जागी आता काही बेवारस वृद्धांना,बालकांना आधार मिळतो. पुजाने पुढे जाऊन Bright the Soul Foundation नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे.

डोक्यात राख घालून काहीतरी विध्वंसक करण्याऐवजी पुजाने एक अत्यंत वेगळा मार्ग अनुसरला आहे…आणि म्हणूनच तिचं कौतुक वाटतं. पुजा शर्माच्या या कार्याला समाजाने पाठबळ दिलं तर बरंच होईल! 

सोळा संस्कारांपैकी हा सोळावा संस्कार न लाभणं यापरती दुर्दैवाची गोष्ट नसावी. सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला..तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी…असं कविवर्य सुरेशजी भट म्हणून गेलेत…खरा तर हा सर्व जीवांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारी अनेक माणसं,संस्था आपल्या आसपास असतील…सांगलीतल्या अशाच एका मित्रमंडळाविषयी वाचल्याचं स्मरतं. या सर्व जिवंत मनाच्या माणसांना मानाचा मुजरा! 

एका गावात बैल विकणारा एक माणूस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर दूर कुठल्याशा मुलखातून येत असे. त्याच्याकडच्या मोठ्या शिंगांच्या बैलांना स्थानिक भाषेत लोक हेडी बैलं म्हणून ओळखायचे…आणि म्हणून त्या विक्रेत्याला हेड्याबाबा असं नाव पडून गेलं होतं. मशगतीच्या कामाचा मौसम असल्यानं शेतकरी त्याच्याकडचे मोठाल्या शिंगांचे,ताकदवान बैल विकत घेतही असत. एकेवर्षी विकायला आणलेल्या बैलांना पाणी पाजायला म्हणून हा हेड्याबाबा नदीवर गेला आणि नदीतल्या त्याला अनोळखी डोहातल्या चिखलात रुतून बुडाला! दोन दिवसांनी त्याचं प्रेत पाण्यावरती आलं. त्याच्या देहाला हात कोण लावणार? ना ओळखीचा ना पाळखीचा…न जाणो कोणत्या जातीचा? जुना काळ तो. पोलिस पंचनामा असे फारसे सोपस्कार नव्हते त्या काळी. लोक नुसते काठावर उभे राहून दर्शक बनले होते. त्याच गावकुसाबाहेर राहणारा एक मोठ्या काळजाचा माणूस त्या चिखलात उतरला आणि त्याने ते प्रेत काठावर आणले. जनावरांची प्रेतं हाताळणं वेगळं…पण माणसाचा मृतदेह? सोपं काम नसतं हे! त्याने ते प्रेत दोन्ही हातांवर घेतलं आणि थेट त्याच्या मालकीच्या शेतावर नेलं. रीतसर सरण रचलं…आणि त्या अनोळखी,बेवारस देहाला अग्निच्या स्वाधीन केलं…सकाळी राख सावडली आणि ज्या नदीत त्याला मरण आलं होतं त्याच नदीत ती राख प्रवाहीत केली! लोक म्हणतात…हेड्याबाबा त्याच्या शेताची आजही राखण करतो…त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून! असो. 

पूजा शर्माची प्रेरणादायी कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपल्या माहितीसाठी लिहिली. पूजा शर्मा यांच्या सामाजिक संस्थेविषयी अधिक माहिती इंटरनेट वर मिळू शकते. ([email protected] या ईमेलवर संपर्क करता येईल.) विषय अप्रिय असला तरी अपरिहार्य आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विजयी पांडुरंग – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते.

वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे._____

आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो…. म्हणून त्याला” विजयी पांडुरंग” असे म्हणतात.

या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यानं मंदिर बांधलं आणि सोनाराकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  “माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल “मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे…

त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते. ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे  सांगितले…

त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत, तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली “दास जेवू घाला न.. घाला” म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत.

प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला. त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं.  हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही. म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो.

याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिले. मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे…!

प्रस्तुती : मंजिरी येडूरकर 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

रणजित देसाई ☆ श्री प्रसाद जोग

रणजित देसाई

जन्मदिन : ८ एप्रिल,१९२८

कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला आवडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.

त्यांचे कथा लेखन कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून प्रसिद्ध होत असे. त्यांच्या ‘भैरव’ या कथेला ‘प्रसाद’ मासिकाने घेतलेल्या कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. ‘रुपमहाल’, ‘कणव’, ‘जाणे’, ‘कातळ’, ‘गंधाली’, ‘कमोदिनी’, ‘मधुमती’, ‘मोरपंखी सावल्या’ इ. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि सामाजिक विषयावरच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठरावीक असा वाचक वर्ग तयार झाला. ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एक प्रकारे चित्रकथाच होत्या. इतकी त्यांची जिवंत मांडणी होती. ‘बारी’, ‘माझं गाव’ या कादंबर्‍या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या.

त्यानंतर १९६२ साली ‘स्वामी’ ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘स्वामी’ मुळे एक श्रेष्ठ लेखक म्हणून रणजित देसाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. एखादी कादंबरी वाचकांनी उचलून धरली म्हणजे काय? हे स्वामी कादंबरीच्या आवृत्या ची लांबलचक यादी वाचल्यावर लक्षात येते . मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे  ते अजुनंच नम्र झाले आणि एका आवृत्तीच्या सुरवातीला त्यांनी लिहिले, 

अहंकाराचा वारा  ना लागो माझ्या चित्ता.

त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘श्रीमान योगी’ ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि त्यानंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणार्‍या कादंबरीची वाट पाहू लागला.

‘लक्ष्यवेध’, ‘पावनखिड’, ‘राजा रवी वर्मा’ या सर्व कादंबर्‍यांच्या जोडीनं विशेष गाजलेली, त्यांनी लिहिलेली आणखी एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ ही आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्‍या लिहिणे ही त्यांची हातोटीच झाली होती. रणजित देसाईंनी पुढील काळात काही नाटकंही लिहिली. ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’ आणि त्यातही ‘गरुडझेप’, ‘कांचनमृग’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ ही नाटकं विशेष गाजली. या व्यतिरिक्त ‘नागीण’, ‘रंगल्या रात्री अशा’ ‘सवाल माझा ऐका’ इ. चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. १९७७ साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर बडोदे साहित्य संमेलनाचे १९६५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९८३ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांना फाळणीमुळे विस्थापित व्हावे लागले त्यांना मध्यवर्ती ठेवून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कुटुंबाची होरपळ त्यांनी ” हे बंध रेशमाचे” या नाटकात दाखवली.या नाटकाचे भाग्य काही औरच होते.याची श्रेय नामावली पहा.

दिग्दर्शक : मधुकर तोरडमल

गीते : शान्ता शेळके

संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी

नेपथ्य : रघुवीर तळाशिलकर

कलाकार : वसंतराव देशपांडे, रामदास कामत,जोत्स्ना मोहिले ,बकुळ पंडित,क्षमा बाजीकर

निर्माता : मोहन वाघ.

यातल्या शान्ताबाईंच्या गाण्यांनी नाट्य रसिकांवर टाकलेली मोहिनी आजही कायम आहे

आज सुगंध आला लहरत,

का धरिला परदेश,

काटा रुते कुणाला,

छेडियल्या तारा,

दैव किती अविचारी,

विकलं मन आज झुरत असाहाय्य,

संगीत रस सुरस.

हे बंध रेशमाचे या नाटकात लावणी गात असलेला प्रसंग आहे ती लावणी देखील लोकांना खूप आवडते >>दिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का अन राया अशी जवळ मला घ्याल का << क्षमा बाजीकर यांनी अगदी ठसक्यात ही लावणी म्हटली आहे .

रणजीत देसाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता मांजरे-कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्मिता मांजरे – कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बीए साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला . अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रमा यात ती सहभागी होऊ लागली.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यानुसार एलएलबी ला प्रवेश घेतला. पण मनातली वैद्यकीय शिक्षणाची इच्छा परत जागृत झाली आणि मग दहावीच्या गुणपत्रिकेवर तिने डीएचएमएस या होमिओपॅथीच्या पदविकेसाठी पण प्रवेश घेतला! कालानुक्रमे दोन्ही शिक्षणे पूर्ण केली आणि वकिली आणि डॉक्टरी अशा दोन्ही व्यवसायाभिमुख पदव्या स्मिताताईंनी मिळवल्या. त्यानंतर आवडीप्रमाणे नागपुरात स्वतःचा दवाखाना टाकला. तो चांगलाच चालू लागला.डॉ. स्मिताच्या हाताला चांगला गुण होता. भरपूर पेशंट येत असत. त्या आणि त्यांची असिस्टंट दवाखाना संपल्यावर सगळे पैसे मोजत बसायच्या. स्वतःचा दवाखाना झाला, दुचाकी आली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.यामुळे डॉक्टर स्मिता मांजरे यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

यादरम्यान घरात लग्नाचे वारे वाहू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात चहा पोहे आणि मुलगी पाहणे असे कार्यक्रम सर्रास होत असत. पण स्मिता ताईंनी एक-दोन कार्यक्रम झाल्यानंतर हे दाखवून घेणे काही बरे नाही, असे वाटून त्यांनी ते थांबवले. 

या दिवसांत त्यांच्या हातामध्ये विनोबा भावे यांचे ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक पडले.जसजशा स्मिताताई हे पुस्तक वाचत होत्या तसतसे त्या अंतर्मुख होत गेल्या. त्यामध्ये सांगितलेली ‘जीविका आणि उपजीविका’ यांचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ‘माझा स्वधर्म काय आहे’या विचाराने त्यांना भंडावून सोडले. अंगावर ल्यायला उत्तम कपडे, दाग दागिने, फिरण्यासाठी गाडी , चांगली कमाई हे सगळं असूनही काहीतरी अनुपस्थित आहे , असे व्याकुळ असमाधान या युवतीला जाणवू लागले.

त्याच भागात एक ध्येयवेडा तरुण डॉक्टर एम डी पूर्ण करत होता. एमबीबीएस झाल्यावर तो बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन राहिलेला होता.त्याच लोकांसाठी अधिक शिक्षण घेऊ या हेतूने तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. या डॉक्टरचे नाव होते रवींद्र कोल्हे !! बैरागड येथील आदिवासी जनजाती लोकांना आरोग्य सेवा द्यायची हे ध्येय ठरवून बसलेला हा तरुण सुयोग्य जीवनसाथीच्या शोधात होता. यादरम्यान स्मिताताईंचे परिचित सुभाष काळे यांनी ताईंना हे स्थळ सुचवले. पण त्याचबरोबर मुलाच्या वेगळ्या चार अटी सांगितल्या.या अटी काय होत्या 

१) महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल

२) चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे 

३) लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे 

४) कोर्ट मॅरेज करावे लागेल.

सुभाष काळेंनी सहजच सुचवले होते. कारण त्यावेळची स्मिताताईंची राहणी ही उच्चभ्रू प्रकारातील होती. जेव्हा या अटी कळाल्या तेव्हा आपण चारशे रुपयांची साडी नेसत होतो, गाडीवरून नागपुरात आरामात फिरत होतो आणि आपली कमाई पण भरभक्कम होती असे स्मिताताई एका मुलाखतीत सांगतात.

मात्र जसजसा त्या या अटींचा विचार करू लागल्या तसतसे त्यांना गीता प्रवचने वाचल्यापासून ज्या असमाधानाने अस्वस्थ केले होते ते असमाधान दूर होऊ लागले असा प्रत्यय आला. त्यांना या अटींमध्येच आपला स्वधर्म आहे, आपले जीवन ध्येय आहे याची आंतरिक जाणीव झाली.आणि मग दोघे भेटले १९८८ साली या ध्येयवेड्यांनी विवाह बंधन स्वीकारले.डॉ.स्मिता मांजरे डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आली.लग्न कोर्ट पद्धतीने झाल्यामुळे सप्तपदी झाली नाही .मात्र नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी नव्या नवरीला तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागड पर्यंत ३५ किलोमीटर चालत जावे लागले.लग्न ठरल्यानंतर स्मिताताईंनी दवाखाना बंद केला. आपले साठवलेले सगळे पैसे त्यांनी बँकेत एकरकमी डिपॉझिट करून ठेवले. स्वस्तातल्या साड्या खरेदी केल्या. महाग महाग साड्या मैत्रिणी आणि बहिणींना दिल्या. उंची सॅंडल्स, पर्सेस, प्रसाधने सारे काही वाटून टाकले आणि खऱ्या अर्थाने नवजीवनचा प्रारंभ केला !

डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते. ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात घेत असत. औषधांसाठी शहरातील धनिक लोकांना विनंती करून आदिवासी लोकांना जमतील तितकी औषधेही ते उपलब्ध करून देत. स्मिता ताईंनी जेव्हा बैरागड मध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांची स्वतःची झोपडी देखील नव्हती. आजूबाजूच्या जनजाती लोकांनी लाकडे कुडे आणि गवताने साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मिताताईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वीज नाही, नळ नाही, पिठाची गिरणी नाही, जवळपास दुकाने नाहीत असा नन्नाचा पाढा सगळीकडे दिसत होता. त्यातच आजूबाजूला दारिद्र्याने गांजलेली आजाराने ग्रस्त आणि अज्ञानी अशी आदिवासी जनजाती कुटूंबे. त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या.किर्र अरण्याचा एक वेगळाच गंध, शहरी सुरक्षिततेची उब नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांना नव्याने जाणवू लागल्या. पण एकदा मनापासून कार्य स्वीकारले की समस्या भेडसावत नाहीत .थोड्याच दिवसात विहिरीवरून पाणी भरणे, शेण गोळा करून आणणे, घर सारवणे, जात्यावर दळणे ही सगळी कामे त्यांच्या अंगवळणी पडली. नवीन शिकण्याची आवड त्यांना येथे कामाला आली. 

एका मोठ्या लोक वस्तीला एकच डॉक्टर असल्याने कोल्हेना अक्षरशः श्वास घ्यायला फुरसत नसे. खरं म्हणजे स्मिताताईंना पण आपण आरोग्यसेवा द्यावी, पेशंट तपासावे असे वाटत असे. पण सुरुवातीला आदिवासी लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता. त्यांना तेथील लोक कोल्लं आणि कोल्लाणी म्हणत .

एक  घटना घडली आणि लोकांनी कोल्लाणीला वैद्यकीय ज्ञान आहे हे स्वीकारले!!.वाघाने अक्षरशः फाडलेला एक पेशंट आला आणि त्यावेळी  स्मिताताईंना जवळपास ४०० टाके घालावे लागले.अत्यंत चिकाटीने त्यांनी ते काम पूर्ण केले आणि तो पेशंट  वाचला!! काही दिवसांत बरा झाला.नंतर तो चालत दवाखान्यात आला आणि डॉक्टर बाईंना नमस्कार करून गेला!. तेव्हापासून आदिवासी जनजाती लोकांनी ताईंना डॉक्टर म्हणून सहर्ष स्वीकारले!!मग मात्र तपासायला ताईच हव्या अशी आग्रही मागणी पण सुरू झाली!!

मेळघाटात कुपोषणाचे बळी जात असतात. आत्ताही जातात. पण आता प्रमाण कमी आहे. त्यावेळी रवींद्र कोल्हेंनी एमडीला हाच विषय घेऊन प्रबंध लिहिला. त्यांच्या मते हा प्रकार उपासमारीमुळे अर्थात अन्न कमी पडल्यामुळे, पोटाची खळगी न भरल्यामुळे घडतो.त्यांनी नंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची बातमी एका वृत्तपत्राच्या बातमीदाराला दिली. छोट्या चौकटीतील त्या बातमीने दिल्ली मुंबई हादरली. कारण आपल्या संविधानानुसार ”स्टारव्हेशन कोड” म्हणजे ‘भूकबळी’ हा शासनाचा गुन्हा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा विषय गाजला.दिल्ली मुंबईत सूत्रे हलली. घाईघाईने सारे मंत्री, सरकारी अधिकारी मेळघाटामध्ये येऊन पोहोचले.त्यांनी चर्चा केली. स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी तेथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू मातामृत्यू यांची माहिती दिली.मात्र या मृत्यूना ‘उपासमारीचे बळी’ असे न म्हणता ‘कुपोषणाचे बळी’ असे म्हणावे अशी शासकीय यंत्रणेने विनंती केली. सर्व प्रकारची मदत शासकीय यंत्रणा करणार आहे या गोष्टीमुळे स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी देखील तसे म्हणण्याचे मान्य केले आणि मग एकेकाळी १००० मागे २००मुले दगावत ते प्रमाण खूप कमी होत गेले . शासनाच्या मोठ्या यंत्रणेचा अशिक्षित गरीब लोकांना लाभ मिळवून देणे हे आपले ध्येय आहे.शासनाला समांतर कार्य यंत्रणा उभी करणे हे नव्हे , हे दोघही पती-पत्नींनी ठरवलेले होते.

आपल्या सोबतच्या या रान सवंगड्यांना प्रेरणा मिळावी , अन्नटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्मिता आणि रवींद्र यांनी सुधारित शेतीचे प्रयोग केले. स्वतः दुबार पिके काढून दाखवली. खते बियाणांची माहिती दिली  रेशन धान्याचे दुकान टाकले. कोल्हेंच्या दुकानांमध्ये तीस तारखेपर्यंत धान्य मिळत असे. आजही हे दुकान दिमाखात चालू आहे 

आपले कार्य , त्याच्या मागची प्रेरणा ही पुढच्या पिढीत रुजवण्यातही स्मिताताई आई म्हणून यशस्वी ठरल्या! त्यांचा मोठा मुलगा रोहित सुधारित शेती करतो.त्याचे प्रशिक्षण देतो. तर धाकटा मुलगा राम एमबीबीएस एमडी सर्जन होऊन मेळघाट  बैरागड येथेच वैद्यकीय सेवाकार्य करतो. खास वैदर्भीय शैलीतील आघळपघळ बोलणे, पण आवश्यक तिथे ठामपणे उभे राहणे आणि निर्भयता हे दोन महत्त्वाचे गुण स्मिताताईंच्या अंगी आहेत. नामदार नितीन गडकरी हे त्यांचे एकेकाळचे अभाविप मधले सहकारी कार्यकर्ते! त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या नाल्यांवर मोठमोठे पूल झाले आहेत, बरेच ठिकाणी रस्ते देखील आले आहेत. पण म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत.

नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही कन्या आता आदिवासी बंधू भगिनींची आई झाली आहे. एखादे व्रत घेणे सोपे पण  सातत्यपूर्ण आचरण अत्यंत कठीण असते. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासारख्या तेजस्वी दीपांचे महत्व असते.

लेखिका : डॉ रमा दत्तात्रय गर्गे

प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।२१।।

*

मनी कामना जोपासुनी पूजितो ज्या देवतेला

त्या देवतेप्रति स्थिर करितो मी त्या भक्ताला ॥२१॥

*

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।२२।।

*

श्रद्धा बाळगुनी मनात भक्त पूजितो त्या देवतेला

प्राप्त होती माढ्याकडुनी वांच्छित भोग त्या भक्ताला ॥२२॥

*

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।२३।।

*

अल्पमती त्या नरास लाभे फल परि ते नाशवंत

अर्चना करित ते देवतेची ज्या तयास ती होई प्राप्त 

भक्तांनी मम कसेही पुजिले श्रद्धा मनि ठेवुनी

मोक्ष तयांना प्राप्त होतसे मम चरणी येउनी ॥२३॥

*

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।२४।।

*

मूढ न जाणत अविनाशी माझे परम स्वरूप 

गात्रमनाच्या अतीत मजला मानत व्यक्तिस्वरूप॥२४॥

*

नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।२५।।

*

आवृत मी योगमायेने सकलांसाठी अप्रकाशित

अज्ञानी ना जाणत म्हणती मज जननमरण बद्ध ॥२५॥

*

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।२६।।

*

भूतवर्तमानभविष्यातील सकल भूता मी जाणतो

श्रद्धाभक्तिविरहित कोणीही ना मजला जाणतो ॥२६॥

*

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥२७॥

*

जन्म अर्जुना द्वेषापोटी वासनेच्या कारणे

अज्ञ राहती सकल जीव सुखदुःखादी मोहाने ॥२७॥

*

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।२८।।

*

निष्काम कर्मयोग्याचे होत पापविमोचन

द्वेषासक्ती द्वंद्वमुक्त ते माझेच करित पूजन ॥२८॥

*

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।२९।।

*

जरामरण मुक्तीकरिता येत मला शरण

ब्रह्माध्यात्म्याचे कर्माचे पूर्ण तया ज्ञान ॥२९॥ 

*

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।

प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।३०।।

*

अधिभूताचा अधिदैवाचा अधियज्ञाचा आत्मरूप मी

प्रयाणकाळी मला जाणती युक्तचित्त तयास प्राप्त मी ॥३०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ॥७॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी आत्मसंयमयोग  नामे निशिकान्त भावानुवादित सप्तमोऽध्याय  संपूर्ण ॥७॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९७७-८० या काळात मी NDA मध्ये होतो. तेथे असलेल्या अनेक ड्रिल इंस्ट्रक्टर्सपैकी, आम्हाला विशेष प्रिय असलेले (तत्कालीन) सुभेदार दरबारा सिंग यांची आज प्रकर्षाने आठवण झाली.

कोणाही सेनाधिकाऱ्याला विचारून पहा. ट्रेनिंग अकादमीमधील अनुभव, आणि विशेषतः तेथील ‘ड्रिल उस्ताद’, यांना तो कधीच विसरू शकत नाही. कारण, गाळलेल्या घामाच्या एकेक थेंबागणिक कॅडेट्सची शारीरिक आणि मानसिक जडण-घडण होत असते. आणि ड्रिल उस्तादही त्या घडणीचा एक शिल्पकार असतो.  

ज्यांनी-ज्यांनी NDA ची ‘पासिंग आऊट’ परेड पाहिली आहे त्यांना त्या सोहळ्यामागच्या कष्टांची जाणीव नक्की झाली असेल. अक्षरशः तासंतास परेड ग्राऊंडवर पाय आपटत आम्ही सराव करायचो. आम्हा कॅडेटसची कवायत पाहून प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजवायचे. पण आमच्याहूनही अधिक मेहनत घेणारे आमचे उस्ताद मात्र पडद्याआडच राहत असत. 

संपूर्ण सरावादरम्यान, परेड करणाऱ्या कॅडेट्सच्या पुढून, मागून, आणि दोन्ही बाजूंनी ड्रिल उस्तादांना बारीक नजर ठेवावी लागे. कुणाची चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी लागे. कारण एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण परेडची लय बिघडणे हे अक्षम्य असे. त्यामुळे, सगळे उस्ताद पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण ग्राउंडभर सतत थिरकत असायचे. एखादा सराव मनाजोगता न झाल्यास संपूर्ण परेड पुन्हा पहिल्यापासून सुरु करावी लागे. अशा वेळी दमल्या-भागलेल्या कॅडेट्सना हुरूप देत, त्यांना पुन्हा एकदा सरावासाठी उभे करणे सोपे काम नसे. 

आम्हाला प्रोत्साहित करण्याची दरबारा सिंग साहेबांची शैली खास होती. “बस एक और रिहर्सल, आपके उस्ताद के नाम!” इतकेच  म्हणणे अनेकदा पुरेसे असे. पण तेवढे बोलून थांबतील तर ते दरबारा सिंग कसले! 

“भरतनाट्यम का एक ‘शो’ करने के बाद हेमा मालिनी भी वन्स मोअर नही करती, लेकिन मेरा कॅडेट जरूर करेगा!” असे त्यांनी म्हटले की आम्ही पोट धरून हसत पुन्हा परेडसाठी तयार असायचो! 

आमच्या चुका काढतानाही ते असेच काहीतरी विनोदी बोलायचे, “कॅडेट बापट, ढीला क्यों पड गया? खटमल खुजली कर रहा है क्या ?” असे म्हणून “लेफ्ट-राईट” च्या ऐवजी “खटमल-खुजली, खटमल-खुजली” असे म्हणत ते आमच्या बाजूने चालायचे. अशा वेळी हसू दाबत-दाबतच, पण नव्या जोमाने आम्ही टाचा आपटायचो. 

पुढे सुभेदार मेजर या हुद्द्यावर बढती मिळून, दरबारा सिंग साहेब NDA मध्ये बरीच वर्षे पोस्टिंगवर राहिले. आम्ही पास आऊट झाल्यानंतरच्या काळातला एक प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. 

पासिंग आऊट परेडचा सराव चालू होता. कॅडेट्स दमलेले होते. कदाचित NDA च्या सिनेमागृहातल्या ‘शो’ची वेळही होत आली असेल. मनाजोगती परेड न झाल्यामुळे आणखी एक सराव करायचा आदेश मिळाला होता. त्या जास्तीच्या सरावादरम्यान हजार-दीड हजार कॅडेट्सची आपसात कुजबूज आणि धुसफूस चाललेली होती. 

परेडच्या शेवटी, NDA चे ‘निशाण’, म्हणजेच राष्ट्रपतींनी प्रदान केलेला मानध्वज सन्मानपूर्वक घेऊन जाण्याची वेळ झाली. त्या कारवाईदरम्यानही कॅडेट्सची कुजबूज थांबलेली नव्हती.

एरवी सदैव हसतमुख असणाऱ्या दरबारा सिंग साहेबांना ‘निशाण’चा अवमान मात्र सहन झाला नाही. ताड-ताड चालत ते मंचावर जाऊन उभे राहिले. त्यांचा अवतार पाहून कॅडेट्सची कुजबुज काहीशी कमी झाली. 

महत्प्रयासाने राग आवरत दरबारा सिंग बोलू लागले. “कॅडेट्स, मी दोनच मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या NDA मध्ये ‘Hut of Remembrance’ नावाची जी वास्तू आहे, त्यामध्ये गेल्या तीन वर्षात मी फक्त एकदाच गेलो आहे. त्या वास्तूमध्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतीच्या आजूबाजूला जी नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत, ते सगळे तुमच्यासारखेच NDA कॅडेट होते. त्यामध्येच एक नाव आहे लेफ्टनंट योगराज पलटा, वीर चक्र.”

एक दीर्घ श्वास घेऊन दरबारा सिंग पुढे म्हणाले, “१९६२ साली चीन युद्धाच्या वेळी शीख रेजिमेंटची नववी बटालियन अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे तैनात होती. बटालियनच्या एका चौकीवर युद्धासाठी सज्ज असलेल्या तुकडीमध्ये मीदेखील होतो. साधारण माझ्याच वयाचे एक तरुण अधिकारी आमचे कमांडर होते. ते म्हणजे, हेच लेफ्टनंट योगराज पलटा. 

१५ नोव्हेंबर १९६२ रोजी आमच्या चौकीवर चिन्यांनी हल्ला चढवला. चिनी सैन्य आमच्यापेक्षा कैक पटींच्या संख्येने, आणि भरपूर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह आले होते. पलटासाहेब आम्हाला प्रोत्साहित करत स्वतःदेखील गोळीबार करीत होते. ‘शेवटची गोळी, आणि रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण लढायचं आहे’, हेच ते आम्हाला सतत सांगत होते.”

परेडमधल्या सगळ्याच कॅडेट्सना जाणवले की दरबारासिंग साहेबांचा आवाज आता जड झाला होता. 

भरल्या कंठानेच ते पुढे बोलत राहिले, “मी आणि लेफ्टनंट पलटासाहेब शेजारी-शेजारीच होतो. एका क्षणी मॉर्टरचा एक गोळा आला आणि थेट पलटा साहेबांच्या चेहऱ्यावर लागला. त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचे निष्प्राण कलेवर माझ्या अंगावर पडले. क्षणार्धात माझी पगडी, दाढी,आणि छाती त्यांच्या रक्ताने चिंब झाली. 

माझ्या अंगावरून त्यांचा देह उचलण्याचाही अवधी मला मिळेस्तोवर चिनी सैनिक आमच्या चौकीमध्ये घुसले. एका मृतदेहाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मीदेखील मेलेलोच आहे असे समजून, दिसेल त्या सैनिकाला भोसकत ते क्षणार्धात आमच्या अंगावरून पुढे गेले.” 

आता मात्र NDA च्या परेड ग्राउंडवर अक्षरशः स्मशानशांतता पसरलेली होती. महत्प्रयासाने अश्रू आवरत असलेल्या दरबारा सिंग साहेबांकडे सर्व कॅडेट अविश्वासाने पाहत होते. 

सद्गदित आवाजात दरबारा सिंग म्हणाले, “सर्वप्रथम जेंव्हा मी ‘Hut of Remembrance’ मध्ये पलटासाहेबांचे नाव वाचले तेंव्हा मी नखशिखांत थरारलो होतो. अचानक माझ्या आयुष्यातली २०-२५ वर्षे गळून गेली आणि माझ्या दाढीवर आणि छातीवर गरम रक्त वाहत असल्याचा भास मला झाला. त्यानंतर पुन्हा कधीच मी तिथे गेलो नाही. पण, पलटासाहेबांसारख्या अनेक NDA कॅडेट्सच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून, माननीय राष्ट्रपतींनी दिलेला हा ध्वज जेंव्हा-जेंव्हा परेडवर आणला किंवा नेला जातो तेंव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. माझा हात आपोआप सलामीसाठी उचलला जातो.”

“लक्षात ठेवा कॅडेट्स, त्या वीरांची आठवण आपल्याला करून देणारे हे ‘निशाण’ आहे. जे त्याला निव्वळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा समजतात त्यांच्यासारखे करंटे तेच !”

कसेबसे एवढेच बोलून, पुन्हा ताड-ताड चालत दरबारा सिंग साहेब परेडवरून निघून गेले. त्यापुढील कैक मिनिटे संपूर्ण परेड हतबुद्ध होऊन तिथेच उभी होती. 

अशा आमच्या अविस्मरणीय दरबारा सिंग साहेबांनी अगदी परवाच, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या इहलोकातून कूच केले! 

“सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन दरबारा सिंग साहेब, आज १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या गावी, तुमच्यासाठी ‘अंतिम अरदास’ आयोजित केलेला आहे. तुम्हाला मानवंदना देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. म्हणून इथूनच तुमच्या कॅडेटचा तुम्हाला कडक सॅल्यूट!”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे 

‘तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं चंद्रबलं तदेव ।’ ……. म्हटल्याबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहुणी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहिणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते “

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “

सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

“होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लित झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

— समाप्त — 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे

**  आपली मुले चांगली घडावीत ही सर्वांचीच इच्छा असते.  पण काय करावे हे उमजत नाही.  चला तर त्या साठी शाळेने पालकांना एक गृहपाठ दिला आहे *****

(सूज्ञ पालकांकडून याची अपेक्षा आपल्या आपल्यासाठीच बर का !) 

चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे,जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.

त्यांनी लिहिले-

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिकह संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.

– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा.

– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.

– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यासाठी मदत करू द्या. त्यांना भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.

– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.

– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.

– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.

– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.

– त्यांना काही लोकगीते वाजवा.

– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.

– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफह आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.

– तुमच्या मुलांच्याह डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल निसर्गाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.

पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत…!

म्हणून हा प्रयत्न…

संकलन : श्री भार्गव पवार 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ I am in control – एक व्यसनयात्रा ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

I am in control  एक व्यसनयात्रा ☆  श्री मकरंद पिंपुटकर

I am in control  एक व्यसनयात्रा

रमेश हा एक almost आदर्श नागरिक होता. त्याची जुनी बजाज चेतक चालवताना तो कधी गाडी बेफाम पळवायचा नाही, नेहमी स्पीड लिमिटचे पालन करायचा. लाल काय, नियमानुसार तो कधी पिवळा सिग्नलही तोडायचा नाही. कधीही wrong साईडने गाडी चालवायचा नाही. 

म्हणजे एकंदरीत इतक्या सज्जनपणे गाडी चालवायचा, की अगदी शुक्रवार – शनिवार रात्री किंवा सणासुदीलासुद्धा पोलीस त्याला संशयावरून बाजूला घ्यायचे नाहीत. 

आणि ते तसे त्याला बाजूला घ्यायचे नाहीत म्हणून बरं होतं, कारण रमेश हा नेहमीच तर्र अवस्थेत असायचा. “मला दारूचं व्यसन नाही रे. दारू काय आपण केव्हापण सोडू शकतो. आपण नेहमी full control मध्ये असतो.” हातातला देशी दारूचा ग्लास रिचवताना तो त्याचं तत्त्वज्ञान सांगायचा. 

त्याचं लग्न झालं होतं, दोन मुली होत्या. दिवसा तर त्या शाळेत गेलेल्या असायच्या. रात्री जेवताना रमेश, लेकी आणि रमेशची बायको एकत्र असायचे. टीचभर स्वयंपाकघरात बायकोची लगबग चाललेली असायची, मुली दोन घास पोटात ढकलत असायच्या आणि रमेश नेहमीप्रमाणे कोणाशी काही न बोलता, आपल्याच धुंदीत (आपल्याच नशेत, खरं तर) उन्मनी अवस्थेत बसलेला असायचा. 

मला तर वाटतं की खाण्यापेक्षा त्याचा जास्त भर पिण्यावरच होता.  दारूच्या नशेत बायकोला – मुलींना मारहाण करायचा नाही हेच काय ते नशीब. 

त्याला चांगली नोकरी होती. आम्ही दोघं एकाच कारखान्यात काम करायचो. पण या व्यसनापायी त्याला अनेकदा warning मिळाल्या आणि मग, नाईलाजाने, शेवटी एके दिवशी कामावरून डच्चूही मिळाला. 

रमेशला काहीच फरक पडला नाही. ना त्याने दारू सोडली, ना त्याने नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उलट आता त्याला दारू पिण्यासाठी आणखी वेळ आणि मोकळेपणा मिळाला.

याची नोकरी गेल्यावर बायकोने महिनाभर आस लावली, तिला वाटलं – नवरा नोकरीसाठी प्रयत्न करेल. महिन्याभरात पुन्हा एकदा भ्रमनिरास झाल्यावर त्या माऊलीने धुण्याभांड्याची चार कामं आणखी वाढवली. 

रमेश पूर्ण वेळ full time घरकोंबडा झाला. 

याचं दारू ढोसणं चालूच होतं. कर्जाचा आणि खर्चाचा डोंगर वाढतच होता. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेल्यावर बायकोने शेवटी ज्या घरात ते रहात होते ते तिच्या वडिलांच्या मालकीचं घर विकलं, सर्व कर्जं बऱ्यापैकी फेडली. 

आता ते एका झोपडपट्टीवजा इलाख्यात भाड्याने राहत होते. रमेश अजूनही नोकरीसाठी प्रयत्नही करत नव्हता. “आपण दारूबाज नाही रे. आपण एकदम control मध्ये असतो.” हे त्याचं घोषवाक्य अजूनही कायम होतं. 

मुलींची शिक्षणं जेमतेम दहावी बारावीपर्यंत झाली, आलेल्या स्थळांबरोबर बायकोने मुलींची लग्नं लावून दिली, निदान त्या दोघींची तरी सुटका झाली. 

आयुष्य मागच्या पानावरून तसंच नीरसपणे पुढे सुरू होतं. 

आणि एका रात्री त्याच्या किंचाळ्यांनी बायकोला जाग आली. त्याच्या तोंडातून आणि शौचाद्वारे रक्त येत होतं. 

“ब्लड हॅमरेज,” सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे नेमकं काय हे त्या बिचाऱ्या बायकोला कळलं नाही. मग डॉक्टरच तिला समजावून सांगू लागले. 

हाताने यकृताची जागा दाखवत ते म्हणाले, “या इथे liver असते. किडन्यांप्रमाणे liver सुद्धा रक्तातील अशुद्ध भाग काढून टाकते. सारखी दारू पिण्याने तुमच्या नवऱ्याची liver निकामी झाली आहे. जेमतेम १०% काम करत आहे. 

दारूनं त्याची जठर, आतडी या सगळ्या सगळ्यांची आवरणं पार खराब झाली आहेत, त्यांत अल्सर झाले आहेत. त्यातला कुठलातरी एक अल्सर आज फुटला, म्हणून आज हे असं झालं.”

डॉक्टर कमालीच्या यांत्रिकपणे, कोणत्याही भावभावनेशिवाय हे सगळं सांगत होते. आणि त्यात आश्चर्य नव्हतं. जवळपास रोज एखादीतरी अशी केस यायचीच. काही महिन्यांनंतर तेही निर्ढावले होते. 

“आता आम्ही याचं नाव लिव्हर ट्रान्सप्लांट लिस्टमध्ये टाकू. ते ऑपरेशन महाग असतं,” डॉक्टरांनी खर्चाचा आकडा सांगितल्यावर बायको मटकन खालीच बसली. “पण लिव्हर कधी मिळेल काहीच सांगता येत नाही. शिवाय लिव्हर उपलब्ध झालीच तर एखाद्या दारुड्यापेक्षा दारू न पिणाऱ्या पेशंटला लिव्हर दिलेले जास्त चांगलं असतं, कारण व्यसनाधीन माणूस पथ्यपाणी करत नाही आणि मिळालेली नवी लिव्हरही नासवतो.

आज तुम्ही धावपळ करून त्याला वेळेवर हॉस्पिटलला आणलंत, आणि आज आम्ही त्याला वाचवू शकलो. कदाचित पुढच्या वेळी जर तुम्हाला उशीर झाला, किंवा आम्ही हा रक्तस्त्राव थांबवू शकलो नाही तर …”

निर्विकारपणे सांगताना अचानक डॉक्टरांचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं, त्यावरची प्रेतकळा पाहून तेही वरमले, चरकले, थांबले. 

पण त्यामुळे त्यांनी वर्तवलेला भविष्यात फरक पडला नाही. रमेश मृत्यू पावला – कणाकणाने, क्षणाक्षणाने, वेदनादायी मरण आलं त्याला. 

व्यसनापायी सर्व पैसा उधळवून टाकला होता त्याने, आयुष्यही उधळून टाकलं.

“आपल्याला व्यसन नाही रे दारूचं. I am in full control,” हे ध्रुपद घेऊन सुरू झालेली व्यसनयात्रा त्याचा प्राण घेऊनच संपली.

रमेशसारखेच एकदम full control मध्ये असणारे तुमच्या आजूबाजूलाही अनेक जण असतील. ते वेळीच सावरोत, ही सदिच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग

अण्णासाहेब किर्लोस्कर

( जन्मदिन ३१ मार्च,१८४३ — स्मृतीदिन २ नोव्हेंबर,१८८५ ) 

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय  बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत  ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं.

भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात.जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत अचानकपणे बदलून गेला.

संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी. याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा. रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली.

पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।

विघ्नवर्ग नग भग्न कराया,विघ्नेश्वर गणपती मग तो॥

 

कालिदास कवी काव्य रचित हे गानी शाकुंतल रचितो I

जाणूनिया अवसान नसोनी हे महत्कृत्यभर शिरी घेतो II

 

ईशवराचा लेश मिळे तरी  मूढयत्न शेवटी जातो I

या न्याय बलत्कवि निज वाकपुष्पी रसिकार्चन करितो II

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी

१)मना तळमळसी ,

२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .

१) नच सुंदरी करू कोपा

२) नभ मेघांनी आक्रमिले

३) पाण्डुनृपती जनक जया

४) राधाधर मधू मिलिंद

५) लग्नाला जातो मी

६) प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)

१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला  विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print