श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ वीर वामनराव जोशी… ☆ श्री प्रसाद जोग

वीर वामनराव जोशी

जन्मदिन  १८ मार्च १८८१

वऱ्हाड प्रांतामध्ये प्रखर देशभक्तीसाठी प्रसिद्ध वीर वामनदादा ह्यांचा जन्म अमरावती येथे झाला. अमरावतीत त्यांचे बालपण गेले. वडील गोपाळराव व आई अन्नपूर्णा होते. आईच्या सेवाभाव, निस्पृहता, सत्यप्रियता ह्या गुणांच्या संस्कारात दादा वाढले असल्याने लहानपणापासूनच त्यांचा देशसेवेकडे ओढा होता. स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला त्यांच्या हृदयात धगधगत होती. देशभक्ती ही त्यांची जीवननिष्ठा होती.

भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केले व त्यांचे संघटन करून त्यांना देशभक्ती शिकवली. लष्करी वाङमय ग्रंथ त्यांनी वाचनालयात ठेवले. व्यायामाकरिता आखाडे काढले. शस्त्रं जमविली, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले व बॉम्ब प्रयोग शाळा काढली.

१९०२, १९०८ आणि १९०८  ते १९१४ च्या सशस्त्र क्रांती उठावाचे नेतृत्व वामनरावांनी केले होते. त्यांना वाटत होते भारतमातेला मुक्त करण्याकरिता इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनतेला उघडपणे बंड  पुकारावेच लागेल. त्यावेळी संघटित, शिस्तबद्ध, धैर्यवान, स्वसंरक्षणक्षम असे तरुण सरसावले पाहिजे म्हणून विविध संघटना या दादांनी उभारल्या. त्यात अकोट येथे ३०० युवा संघटित झाले होते. युद्ध विषयक डावपेच समजावे याकरिता दादांनी या संदर्भातील १००० पुस्तकांचा संग्रह केला होता. त्या पुस्तकांचे  वाचन करण्यात येत असे. तसेच त्यात वर्णन केलेल्या डावपेचावर चर्चा सुद्धा केली जात असे. यातील डावपेचांचा उपयोग कित्येकदा वामनराव निवडणुकीच्या लढतीत करीत.

या काळात सरकार कडून क्रांतिकारकांचा कसून शोध घेणे सुरू झाले. गुप्त पोलीसही  दादांच्या व सहकाऱ्यांच्या शोधात होते. म्हणून दादांनी सर्व शस्त्रास्त्रे, युद्ध विषयक पुस्तके, बॉम्ब तयार करण्याची साधने सर्व जमिनीत पुरून ठेवण्याचा सल्ला सहकाऱ्यांना दिला.

दादांचे हस्तलेखन सुंदर व सुवाच्च होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘गीतारहस्या’ची हस्तलिखीत प्रत तयार करण्यासाठी बोलाविले. ‘गीतारहस्या’च्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख आहे. ‘गीतारहस्य’ ची  हस्तलिखीत प्रत तयार करताना गीतेचे तत्त्वज्ञान दादांनी आत्मसात केले. त्यांनी जीवनभर कर्मयोगाचा सिध्दांत आचरणात आणला.

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वामनदादा हे उत्तम वक्ते, लेखक, नाटककार होते. त्यांचे लिखाण राष्ट्रजागृतीसाठी जहाल व ओजस्वी असे होते. रणदुंदुभी, राक्षसी महत्वाकांक्षा, धर्मसिंहासन ही दादांची तीन नाटके रंगभूमीवर चांगलीच गाजली. त्यामुळे ते श्रेष्ठ नाटककार ठरले. ही नाटके राष्ट्र चळवळीस प्रेरक ठरली.

१९२१ साली भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे दादा अध्यक्ष होते.

१९४३ते १९५३ या काळात वामनराव दादांनी अमरावतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

रणदुंदुभि  नाटकांमधील त्यांची पदे विशेष गाजली होती आणि आजही ऐकली जातात.

१) आपदा राजपदा भयदा

२) दिव्य स्वातंत्र्य रवी

३)वितरी प्रखर  तेजोबल

४)परवशता पाश दैवें

५) जगी हा खास वेड्यांचा

वीर  वामनराव जोशी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments