मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर 

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.  यावर्षी अक्षय तृतीया १० मे ला साजरी होत आहे.  हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो.

अक्षय याचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही ते.  या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असा संकेत आहे.  या दिवशी आपण दान केले तर विपुल प्रमाणात ज्या वस्तूंचे दान केले त्या पुन्हा आपल्याजवळ प्राप्त होतात अशी भावना आहे.

अक्षय तृतीया सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत.  भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

याच दिवशी भगवान गणेशांना वेदमहर्षी व्यासांनी महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. 

अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता.

अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.

हा दिवस म्हणजे  माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे.  त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेची आराधना केल्यास आयुष्यभर घरात सुखसमृद्धी नांदते.

याच  दिवशी  श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले.

वनवासी असलेल्या पांडवांसाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याचा उल्लेख ‘द्रौपदीची थाळी’ असा केला जातो ज्यामुळे वनवासातही पांडवांना कधीही उपासमार घडली नाही.

अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवर गंगा अवतरली होती.

भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.

जैन बांधव हा दिवस भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा करतात.

जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात होते असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मंगल पवित्र दिन!

अक्षय तृतीयेचा हा सण खानदेशात मात्र अगदी दिवाळी सारखाच साजरा केला जातो.  तिकडे या सणास आखाजी असे म्हणतात.

आखाजी हा जसा सासुरवाशिणींचा सण तसेच तो पितरांचाही सण मानला जातो. खरं म्हणजे हा शेतकरी बांधवांचा सण. मातीशी अतूट नातं सांगणारा सण. या दिवशी शेतमजुरांना सुट्टी असते.  सालगडी (सालदार) यांची नवी कामेही ठरविली जातात.  खानदेशातील आगळीवेगळी अक्षय तृतीया परंपरा आजही तितक्याच, भक्तीभावाने,  उत्साहाने पाळली जाते.  या सणाला अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.

वसंत ऋतू संपून ग्रीष्माची चाहूल लागते. घागर हे त्याचं प्रतीक आहे.  या घागरीवर छोटे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावर खरबूज,  सांजोऱ्या,  आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते.  आधी ह्या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच नवीन माठ आणून घरात वापरला जातो.

पाटावर धान्य पसरून सभोवती रांगोळी घालून त्यावर या घटाची पूजा केली जाते.  या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते.  पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो.  घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.  एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.  या दिवशी घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी,(रश्शी) कुरडया, पापड,  भजी असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय तृतीया— आखाजी हा श्रमण संस्कृती दर्शविणारा  कृषी उत्सव आहे.याच दिवसापासून शेती  कामाला सुरुवात होते.  हलोत्सव, वप्पमंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत.

आखाजी म्हणजे माहेराचा  विसाव्याचा आरामाचा सण. सासरी कामाच्या घबाडग्यातून मुक्त होऊन माहेरी लाडकोड, कौतुक करवून घेण्याचा सण.

घरोघरी उंच झाडाला झुले बांधले जातात. खानदेशात सासुरवाशिण लेकीला गौराई म्हणतात आणि जावयाला शंकर.

“ वैशाखाच उन्हं

 खडक तापून लाल झाले वं माय”

 

“झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

 माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बंधूंना हातमा दी ठेवजो दी ठेवजो

बन्धु  मना सोन्याना सोन्याना

पलंग पाडू मोत्याना मोत्याना”

 

“ गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन खिडक्या त्याला”..

अशी गोड बोली भाषेतील अहिराणी गाणी सख्या झुल्यावर झुलताना आनंदाने गातात, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जपलेली ही लोकपरंपरा अतिशय लोभस आहे.

ऋतुचक्र फिरत असते.  एका मागून एक ऋतू बदलतो. वसंत सरतो ग्रीष्म येतो. आपले सारेच भारतीय सण नव्या ऋतुच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने साजरे केले जातात. त्यातलाच हा अक्षय तृतीयेचा सण.  पाण्याची घागर भरून उन्हाळ्याचे स्वागत करणारा सुंदर सण!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

विशाखा नक्षत्र येई पौर्णिमा

आला पहा वैशाख मास हा

साडेतीन मुहूर्तातील एक

अक्षय्य तृतीया मुहूर्त खास हा

अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव चंदन यात्रा दिन, अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. हे सांगताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले.

शाकल नावाच्या नगरात ‘सुनिर्मल’ वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो ‘कुशावती’ नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे. ‘नाभी’ व ‘मरुदेव’ यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पाडला नाही. तेव्हा ऋषभदेवाने आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम-सुफलाम केली. तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या ‘जयंती’ हिचा ऋषभदेवांबरोबर विवाह लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा, यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ‘ब्रह्मावर्त’ याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो विश्व प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ पुत्र ‘भरत’ याच्या स्वाधीन राज्यसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक, कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात बराच प्रवास केला. एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा ‘श्रेवांस’ याच्या घरी गेले. तेव्हा राजाने त्यांना ऊसाचा रस पिण्यास दिला त्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर्य अक्षय्य टिकले म्हणून आजही हस्तिनापूर उर्फ दिल्ली शहर संपन्न राजधानीचे ठिकाण आहे.

देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.

विविध राज्यांमध्ये अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या ‘चंदनयात्रा’ या उत्सवाची सांगता करतात. जगन्नाथ पुरीला मदनमोहनाच्या मूर्तीला चंदनाचे तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तुंचे एक नगर तयार करतात. त्यामध्ये एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला ‘राजा’ व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला ‘दिवाण’ असे म्हणतात. गावातील सर्व लोक हे नगर पाहण्यासाठी जातात. या नगरीतील जे धान्य मुंग्यांनी वाहून नेले असेल ते धान्य महागणार किंवा त्याचे पीक चांगले येणार नाही असे भाकीत केले जाते व ज्या दिशेला मुंग्या कापूस घेऊन जातात त्या दिशेला कापसाची निर्यात करतात.

राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला ‘आखाजी’ म्हणून ओळखले जाते. खान्देशात आखाजीचा हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.

अक्षय्य तृतीया सागर भरती

नौकाविहारा कोणी न जाती

उसळो ना सागर, रहावी शांती

सागरोत्सव अक्षय्य संपन्न करती

अक्षय्यतृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो म्हणून या महिन्यात समुद्रपर्यटनाला कोणीही जाऊ नये. या काळात सागराने त्रास देऊ नये म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुजरातमध्ये सागराची पूजा करण्यासाठी ‘सागरोत्सव’ संपन्न केला जातो.

कोकणात कुमारीकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून शिरा असलेला शंख फिरवितात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा खाण्यास देतात. या दिवशी शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी व्यवसायास प्रारंभ करतात. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून, त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो अशी प्रथा, परंपरा आहे.

अक्षय तृतीया दिन भाग्याचा

अक्षय घट तो भरू पाण्याचा

पलाशपत्रे रास गव्हाची

आंबे ठेवून पूजा त्यांची

कुंभार वाड्यातून मातीचा कलश आणून पळसाच्या पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर कलश ठेवून त्यात पाणी भरावे व आपल्या पूर्वजांसाठी तीळ तर्पणविधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तिला दक्षिणेसहित दान देऊन आंब्याच्या रसाचे जेवण घालावे.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेता या युगांचा प्रारंभ झाला असून नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचे जयंती उत्सव संपन्न करून, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने चैत्रगौरी उत्सवाच्या सांगतेबरोबर अक्षय्य तृतीया हा सण संपन्न करतात.

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्याने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते, तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

कृतज्ञता पितरांच्या प्रती

आशीर्वच भरभरून देती

कृपाच त्यांची मिळण्या यशप्राप्ती

अक्षय अखंड अक्षय्य तृतीया ती

*

पूर्वज सांगून गेले आम्हा

परंपरा साऱ्या येतील कामा

पाऊलखुणांवर आम्ही चालतो

अक्षय्यदिनी या पूर्वजास स्मरतो

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अजुन किती पैसे पैसै करतेस गं…पाकिट तर केव्हाच रिकामं करून झालं… शर्टाचे नि पॅंटचेही खिसे सगळे झाडून झाडून दाखवले… आता माझ्या जवळ एक दिडकी देखील शिल्लक ठेवली नाही… नोकरी धंद्याचा माणूस मी ,मलाही काही किरकोळ खर्च वगैरे रोज करावे लागतात कि … आणि तू तर मला कफ्फल्लकच करून सोडलसं… तरी बरं तुला महिन्याच्या पगाराचा नि त्यानंतर केलेल्या सततच्या मागणीनुसार दिलेल्या पैशाचा हिशोब कधीच मागितला नाही… आणि इनमिन  दोघचं आपण नवरा बायको घरात राहत असताना  एव्हढे भरमसाठ पैसै लागतातच कशाला.. त्यात माझं दिवसाचं जेवणखाण, चहापाणी तर बाहेरच्या बाहेर निपटत असतं…ती तुझी सतरा महिला मंडळ, अठरा भिशीची वर्तुळं, किटी पार्टीची महिला संमेलनं, साडी ड्रेसेचे सतराशेसाठ exhibitions…गेला बाजार  माॅल मधील शाॅपिंग,अख्खं टाकसाळ जरी तुझ्या हाती दिलं तरी तुला ते कमीच पडेल… आणि आणि एव्हढी ढिगानं ढिग खरेदी करूनही कुठल्याही समारंभासाठी म्हणून नेसण्यासाठी एकही साडी तुझ्याकडे कधीच नसते…याबाबत तु कायम चिंतित राहतेस… मला ते दर वेळेला न चुकता ऐकवून दाखवतेस.. यावर मी काही आहेत त्या साड्यांमध्ये सुचवू पाहतो तेव्हा वसकन अंगावर येत म्हणतेस शी या कार्यक्रमाला असल्या साड्या काही उपयोगाच्या नाहीत.. त्याला ती तसलीच हवी… मागच्या वेळी माझी घ्यायची राहून गेली… आता ती साडी नसेल तर मला काही या कार्यक्रमला जायला लाज वाटेल बाई… म्हणजे थोडक्यात काय आली नवी खरेदी… मी आता असं करतो साड्यांच्या दुकानातच नोकरी करतो.. म्हणजे निदान तुला साड्यांचीं चिंता कधीच भेडसावणार नाही…

… तुम्ही सारखं सारखं माझ्या साडीवर काय घसरताय… तुम्हा पुरुषांना त्यातलं काय कळणार म्हणा… आणि तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता मग मी काय घरी बसून माश्या  मारू… विरंगुळा म्हणून महिला मंडळ, भीशी क्लब, किटी पार्टी, यातून चार शहाण्या , हूशार बायकांच्या सहवासात काढते… कितीतरी नवी नवीन गोष्टी कळतात…आजं जगं कुठं चाललयं आणि आजची महिला कुठे आहे… याचं वास्तवातलं भान येतं… तो आपल्या केंद्र सरकारने केलेला महिला आत्मनिर्भर चा कायदा आता मला चांगलाच समजलाय बरं… सारखं सारखं उठसुठ तुमच्या कडून किती दिवस पैश्यासाठी याचना ती करावी म्हणतेय मी… मलाही वाटतं आता आपण आत्मनिर्भर व्हायला हवं… आणि आणि तुम्ही मला ते तसं होऊ देण्यास तयार असायलाचं हवं… नाही का?.. मग देताय ना दर महिन्याला माझे म्हणून खास   आत्मनिर्भरतेचे पैसे…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले.) – इथून पुढे –  

” हे बघ राघव! तू तुझ्या मतांवर इतका ठाम असशील ना तर माझे काही म्हणॉणे नाही.  तू तुझा स्वतंत्र, मी माझी. मला तुझी ही अरेरावी मुळीच चालणार नाही. लक्षात ठेव या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझा शंभर टक्के अधिकार आहे. मला माझी मतं आहेत आणि मी तुझ्यावर एक कपर्दीकही अवलंबून नाही.रिमाचा सांभाळ करायलाही मी तुझ्यापेक्षा जास्त समर्थ आहे.”

नानी आतल्या आत प्रचंड हादरली होती. आर्थिक स्वातंत्र्यांमधून मिळालेली ही आवाजाची धार तिला जाणवत होती. पण मग नानीने असा आवाज कधीच का नाही वापरला?

अशा पार्श्वभूमीवर तिला तिची आणि नानांची ही भांडणे आठवत. जेव्हां ती खोदून खोदून आठवायची तेव्हा तिच्या मनात आलं सारं काही सोडून जाण्याचा विचार तिच्याही मनात नव्हता का कधी आला? पण राघव साठी ती मिटूनच राहिली.  मनातलं ओठावरही आलं नाही. एक घाव दोन तुकडे हा विचार तर फारच दूर राहिला. 

राघवचं आणि सुनेचं  नक्की काय बिनसलं होतं याचा खोलवर जाऊन मागोवा घेण्याचा नानी प्रयत्न सुद्धा करत नाही.  कोण चूक? कोण बरोबर ?कसं ठरवायचं आणि का ठरवायचं? मुलगा म्हणून राघवच बरोबर असही तिला वाटत नाही आणि सुनेने थोडं पडतं घ्यावं असंही वाटत नाही.  पण यांचं नातं मात्र तुटू नये असं नक्कीच वाटतं. रिमाच्या भविष्याचं काय असंही वाटतं. 

नानी गप्प बसली तरी नानीला दुःख होतं.  कळून चुकतं इथेच सारं बदललंय. नाती कचकड्याची होत आहेत. संसाराच्या व्याख्या बदलत आहेत.  जो तो आत्मकेंद्रित झालाय.  ही आपली संस्कृती आहे का? हे लोण पलीकडचं आहे. 

पण तरीही नानीच्या मनात गोंधळ असतो. नाते टिकवणे म्हणजे नक्की काय?  रडत खडत निभावणं याला नातं टिकवणं म्हणायचं का? की” मेरी झाँसी नही दूंगी” या प्रकारातला आवेश दाखवून दणादण कापाकापी करायची?

राघवच्यात  नानांचे काही गुण असणारच. तसं पाहिलं तर नानीचं अवंतीशी— सुनेशी— नातं चांगलं आहे. मोकळेपणाचे आहे.  ती तिच्या ऑफिसमधल्या घटना सांगते.  तिच्या मैत्रिणींबद्दलही  बोलते. ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या नात्यांबद्दल बोलते आणि बिनदिक्कतपणे राघवच्याही तक्रारी करते.कधी कधी संगणक,मोबाईल बाबतीत नानीची शिकवणीही घेते.   नानी तिचं हरवलेलं रूप अवंतीत  पाहते आणि त्यावेळी नानीला एक स्त्री म्हणून सुनेची कणव येते आणि खूप बदललंय असं वाटत असतानाच नानीला वाटतं छे! सारं काही तसंच आहे अजून.  समाज बदलतो, पण तो फक्त वरवर. त्याचा वेश बदलतो, खाद्य बदलते, जगण्याची तंत्रं बदलतात, पद्धत बदलते, वागणं बदलतं, प्रगतीच्या भुलभुलय्यात सारेच भरकटतात.  पण या ऑर्बिट च्या फेऱ्यात सापडलेलं मन काही बदललेलं नाही. माणसातल्या माणूसपणातली प्रगती काही माणसाला या तंत्रज्ञानाने अजूनही साधता आलेली नाहीच. 

रिमाचं आणि नानीचही एक सुंदर नातं आहे.  आजी आणि नातीचं नातं! पण या नात्यातही खूप बदललेले कंगोरे आहेत. रिमाच्या हुशारीने, दिसण्याने, चातुर्याने नानीचा उर एकीकडे मायेने भरून जातो तर कधी तिच्यातला फटकळपणा, ताडताडपणा,भाषा, बदललेला पेहराव बघताना नानी मनातल्या मनात धास्तावते.  तिसऱ्या नव्या पिढीचं प्रातिनिधिक स्वरूप तसं नानीच्या पचनी नाही अजून पडलेलं. 

एक दिवस नानी  रिमाला चुचकारत म्हणाली होती,” रिमा बेटा! अंधार पडायच्या आत घरी येत  जा ग! काळजी वाटते आणि हे बघ तू छानच दिसतेस पण इतका उघडेपणा कशाला हवा? झाकण्यातही अधिक सौंदर्य असतं.”

तेव्हां ती म्हणाली होती,

“आज्जी आजकालची फॅशन आहे ही! नाहीतर काकूबाईचं लेबल लागेल मला. आणि तुझी “सातच्या आत घरात” ही व्याख्या बदल बरं.  खूप मोठी स्वप्नं आहेत माझी आणि ती पुरी करण्यासाठी मला या वेळा कशा सांभाळता येतील? आज्जी यु आर द बेस्ट आज्जी इन द वर्ल्ड.  मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नेहमी सांगते माझ्या आजीचे विचार खूप मॉड आहेत.  सो प्लीज नाऊ डोन्ट बी आउट डेटेड हं!”

“आउटडेटेड” नक्की काय असतं याचा कधीकधी नानी विचार करते, पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या, आजूबाजूला चर्चेत असणाऱ्या अनेक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, आत्महत्येच्या, नैराश्याच्या, एकतर्फी हिंसक प्रेमाच्या, अपहरणाच्या,जिहादच्या, खुनाच्या बातम्या नानीला नक्कीच अस्वस्थ करतात.  कळीचं फुल बनत असलेल्या रिमाला बघताना उर धडकतोच. सोशल मीडियाचा वाढलेला राक्षस समाजाचा गळा दाबत आहे असंही नानीला वाटतं. या राक्षसाने चुकून आपल्या घराचं दार कधी ठोकलं तर?  नानी घाबरते. विलक्षण थरकाप होतो तिचा.  पण त्याचवेळी तिला हेही जाणवतं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे हे सगळं आता. मग तिला धीर मिळतो तो घरातल्या देव्हाऱ्याचा.  निदान तो तरी आहे अजून, तिला माहित आहे, ना नमस्कार करायला कुणाला वेळ ना दिवा लावायला सवड. कधीतरी आठवण आल्यासारखे हात जोडायचे.  पण नानी मात्र त्या देवांशीच बोलते.  दिवा उजळवून त्यांची आरती करते. त्याच्याशी तिचा मूक ,अश्वासक संवाद घडतो.सुखाय,रक्षणाय.सर्वांच्याच.

अनेक चर्चा घडतात.  घटनांचं मंथन होतं. मतांची देवाण-घेवाण होते आणि शेवटी एकच निष्कर्ष असतो “कालाय तस्मै नमः”

सकाळी फिरताना नानीला डी बिल्डिंग मधले सरदेसाई ठराविक वेळेला भेटायचे. गेल्या कित्येक दिवसात ते दिसले नाहीत. बऱ्याच दिवसांनी नानीला त्यांची अनुपस्थिती जाणवली.  नानींना त्यांच्याविषयी एवढेच माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वाकडेवाडीत घर होतं. एकटेच राहत होते.  पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले  होते.  पण एक दिवस उंबरठ्यावर पाय अडखळून ते पडले आणि मग त्यांच्या जीवनाचं तंत्रच बदललं. शेवटी मुलीने त्यांना तिच्या घरी आणले.  तेव्हापासून सरदेसाई या कॉम्प्लेक्सचे सदस्य होते.  पण काही दिवसापूर्वीच कळलं की आता ते कामशेतला वृद्धाश्रमात असतात. त्यावरूनही पोडियमवर चर्चा झाली.कारणमीमांसा झाली,बदलत्या कुटुंब संस्थेवर ओरखडे उमटले, आजकाल म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी कोण घेतोय? वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके 

गीतकार आनंद बख्शी

किसी राहमें किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर ! .. मेरे हमसफर…मेरे हमसफर !

सृष्टी अव्याहतपणे सृजनाची,नवनिर्माणाची,चैतन्याची वाट चालावी म्हणून स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांना नियतीने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकपावलाने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली असावी! अन्यथा हा केवळ देहव्यवहार उरला असता प्राणीजगतातला!

मराठीतल्या एकांड्या ‘मी’ चं अनेकवचन म्हणजे आपण…  हिंदीतल्या मैं चं बहुवचन म्हणजे हम! या अनेकवचनांत एकापेक्षा अधिकजणही असू शकत असले तरी याचा ‘आपण दोघं’ हा अर्थ गृहस्थाश्रमी माणसांना अधिक भावणारा!

माणसं व्यवहारानं,प्रेमानं,योगायोगानं आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि मग चार पावलं असली तरी वाट आणि चाल एक होऊन जाणं साहजिक,सहज होऊन जातं. आणि मग जसजसा रस्ता पावलांना पुढे पुढे नेत राहतो तसतशी पावलांना एकमेकांची मोहिनी पडत जाते..हाताच्या बोटांना गुंफलेले राहण्याची गोडी अनुभवण्याचे सुख सोडवत नाही….जसा जीव देहाला बिलगून रहावा तसंच की हे!

वाटेत ठेचा लागूही शकतात,नव्हे लागतातच. पण सावरायला सोबत असतं आपलं माणूस. क्षणिक रागाचे खाचखळगे एखाद्या अंधा-या वळणावर दबा धरून बसलेले असतात आणि पावलं त्यांच्या जाळ्यात अडकतातही कधीकधी नकळतपणे….पण जाणती मनं हात सोडत नाहीत सहजी! यातूनच हातांची आणि काळजांची गुंफण अधिकाधिक घट्ट होत जाते.

पण….मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते का असंच? संसारसुखाचा चषक ओठांना स्पर्शत राहून प्रेमरस जिव्हेला तृप्ततेचा अभिषेक घालीत देहात उतरत जात असताना हा अमृतचषक रिता होत जातो आहे, याची नकोशी जाणीवही उभी असते आतल्या मनातल्या अंगणात अंग चोरून. आपण माळरानावर उभे असावं आणि बोचरा वारा वाहू लागावं मधूनच…या बोचरेपणातून देहाची सुटका नाही. पण हा बोचरा वारा काही सतत येत-जात नाही….अगदी विसर पडून जातो त्याचा. आणि मग तो हळूच अवतरतो.

जगण्याच्या या प्रवासातल्या सोबतीला हमसफर,हमराह म्हणतात हिंदीत,ऊर्दुत. यातला हम मात्र सोबती अशा अर्थानं आणि सफर म्हणजे अर्थातच प्रवास! अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या असल्या तरीही ही  प्रेमसरिता मध्येच खंडीत होऊ नये असं वाटतंच….जगातल्या इतर कोरड्या नद्या पाहून. शेवटी इतरांच्याही अनुभवांची गोळाबेरीज करत असतंच हृदय. विरह म्हणजे दुसरं मरणच. म्हणून ती दोघं एकमेकांना हळुवारपणे सांगू पाहताहेत…रस्त्यात कुठलं वळण कधी येईल याचा भरवसा नाही…..

किसी राह में…किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर…मेरे हमसफर…मेरे हमसफर!

तु एखाद्या आंधळ्या वळणावर हात सोडून जाणार नाहीस ना माझा हात सोडवून घेऊन?

किसी हाल में किसी बात पर…..कहीं चल न दे ना तू छोडकर!

विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी,एखाद्या गोष्टीवरून तु मला गमावणार तर नाही ना?

मेरा दिल कहे कहीं ये न हो, नहीं ये ना हो

किसी रोज तुझसे बिछड के मैं तुझे ढुंढती फिरूं दर-बदर.

माझं मन सतत आशंकित असतं…असं नाही ना होणार? नकोच तसं व्हायला….आपण एकमेकांना पारखे झालोत आणि मग एकमेकांना शोधत रानोमाळ भटकत आहोत…असं नको व्हायला.

तेरा रंग साया बहार का तेरा रूप आईना प्यार का

तुझ्या मनाचा रंग जणू चैत्रपालवीची ओली सावली आणि तुझं दृश्यरूप म्हणजे प्रेमाचं दर्पण…विविध रंगछटा उभं करणारं.

तुझे आ नजर में छुपा लूं मैं तुझे लग न जाये कहीं नजर!

तुला जगाच्या अप्रिय नजरेपासून लपवून ठेवण्यासारखी एकमेव जागा म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पापण्या…त्यांच्या आड तु सुखरूप.

तेरा साथ है तो है जिंदगी तेरा प्यार है तो है रोशनी.

जीवनाचं दुसरं नाव म्हणजे तुझा सहवास. तुझी प्रीती म्हणजे या वाटेवरलं प्रकाशाचं झाड. श्वास क्षितीजापल्याड जायला केंव्हा निघतील काही सांगता येत नाही मर्त्य मानवाला.

कहॉं रात हो जाए क्या खबर..

या जाण्यादरम्यान अंधार गाठेल तेंव्हा तुझ्या निरंजनातील ज्योतीचा स्निग्ध उजेड पुरेसा होईल!

आनंद बख्शी! सामान्यांच्या असामान्य भावनांना शब्दरूप देणारे कवी. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मातृसुखाला पारखे झालेल्या या माणसाला आपल्या वडिलांचं पत्नी-विरहदु:ख त्यावेळी समजलं असेल की नाही ठाऊक नाही.पण विरहवेदनेची जाणीव त्यांना पुढील आयुष्यात कुठे न कुठे अनुभवायला निश्चित मिळाली असावी. त्याशिवाय नेमके आणि तरीही साधे शब्द लेखणीतून प्रसवत नाहीत. प्रारंभीच्या उमेदीच्या काळात ब्रिटीश नौदलात कनिष्ठ साहाय्यकाची नोकरी, ब्रिटीशांविरोधी उठावत सहभागी झाल्याने झालेली अपमानास्पद हकालपट्टी,स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय फौजेत केलेली अल्पकाळ सेवा यानंतर आनंद बख्शी (बक्षी नव्हे!) सिनेसृष्टीत आले आणि रमले! मदनमोहन यांच्या नंतर सैनिकाचा संगीतकार झालेला कदाचित दुसराच माणूस. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारलेल्या या कवीने शेकडो गाणी लिहिली. आनंदजींसारखी, केवळ आठ मिनिटांत एखादे संपूर्ण गाणे लिहिण्याची हातोटी फार कमी कवींना लाभलेली असेल!

मेरे हमसफर (१९७०) हिंदी चित्रपटासाठी आनंदजींनी लिहिलेल्या या गीताला लतादीदींशिवाय अन्य कुणी न्याय देऊ शकलं असतं का ही शंकाच आहे. मुकेशजींना हे गाणं देण्याचा आग्रह धरणा-या आनंदजींना मुकेश यांच्या साध्या,सरळ स्वरांचं सामर्थ्य माहीत होतं….कारण सर्वसामान्यांचं भावजीवन नजरेसमोर उभे करणारे शब्द सर्वसामान्यांनाही गुणगुणता यावेत असं गायलं जावं असं त्यांना वाटत होतं आणि यासाठी मुकेशच हवे होते.

आनंदजींच्या या शब्दांना चालीचं कोंदण द्यायला आणखी एक आनंदजी होते आणि त्यांच्यासोबतीला कल्याणजी! मनात भक्तीभावना निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला कर्नाटकी संगीतातला राग चारूकेशी त्यांनी निवडला आणि ताल रूपक. अतिशय हळूवारपणे संतुर श्रवणेद्रिंयाला साद घालत येते….सोबतीला नाजूक परंतु तितकाच स्पष्ट तबला…आणि बासुरी! आणि लगेच लता नावाच्या स्वरपालखीत विराजमान होऊन शब्द उमटतात…किसी राहे में..किसी मोड पर! यानंतर येणा-या कहीं शब्दाची तर मोठी खुमारी. एकच शब्द तीन अर्थाने ऐकवणं म्हणजे स्वरांची पूजा केल्यावरच प्राप्त होणारा कृपाप्रसाद! एक ‘कहीं’ म्हणजे कुठेतरी किंवा कुठेही..अर्थात स्थान निश्चित नसलेलं स्थळ. तु मला सोडून तर जाणार नाहीस ना? दुसरा ‘कहीं’ म्हणजे शक्यता,शंका,आशंका अशा अर्थाने..प्रश्नार्थक! या ‘कहीं’ ला ‘नहीं’ चं गोड यमक म्हणजे गुलाबावर शिंपडलेलं कस्तुरी अत्तर. या कहीं चं उत्तर नकारार्थीच यावं अशी वेडी आशा असतेच मनात कहीं न कहीं ! सतार हळूच डोकावून जाते ओघात. एका कडव्यानंतर तेरा रंग साया बहार का म्हणत मुकेशजींनी गाण्यात केलेला पुन:प्रवेश सुखावणारा आहे.

हे गाणं संपावंसं वाटत नाही…जसा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास संपावा असं वाटत नाही तसं. कुणाचं जाणं न जाणं आपल्या हाती नाही ठेवलं विधात्यानं. पण जाऊ नकोस असं आर्जव करण्याची ताकद मात्र ठेवली आहे. कुणी सांगावं मनाच्या या आर्ततेमुळं एखाद्याचा इथला मुक्काम आणखी थोडा वाढू शकेल!

५४ वर्षे हे गाणं हळव्या माणसांच्या मनाचा ठाव घेत आलं आहे…आणि जोपर्यंत मानवी जीवनात आत्मिक प्रेमाला जागा असेल तोवर अशी गाणी ऐकली,गायली,गुणगुणली जातीलच. या गाण्यासाठी आनंद बख्शींना अगणित हृदयं तळापासून धन्यवाद देत असतील, यात शंका नाही.

            (मनात येतं ते शब्दांत उतरवण्याची ऊर्मी दाटून येते आणि मग असं काहीबाही लिहिलं जातं. यानिमित्तानं आपल्याही भावनांची उजळणी होते हा स्वार्थ!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।११।।

*

वेदज्ञानी म्हणती ज्या परमपदा अविनाशी

प्रवेशती ज्यात यत्नशील महात्मा सन्यासी

आचरती ब्रह्मचर्य इच्छुक ज्या परमपदाचे

कथन करितो तुज श्रेष्ठत्व त्याचि परमपदाचे ॥११॥

*

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।

मूर्ध्न्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।१२।।

*

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।

य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।१३।।

*

सर्वद्वारांना संयमित करुन हृदयात मना स्थिरावून

जित मनाने योग धारणे प्राणा मस्तकात स्थापून

ॐकाररूपी एक अक्षरी ब्रह्म करुनिया उच्चारण

देहासी त्यागता  परम गती  आत्म्यासी प्राप्त प्रसन्न  ॥१२,१३॥

*

अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।

तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।१४।।

*

अनन्य चित्ते स्थिर मज ठायी स्मरण माझे सतत  

एकरूप त्या योग्याला होतो मी सुलभ  प्राप्त ॥१४॥

*

मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।

नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।१५।।

*

अशा महात्म्या पुनरपि नाही पुनर्जन्म गती

दुःखाने भरलेल्या देहाची पुनश्च नाही प्राप्ती ॥१५॥

*

आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।

मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।१६।।

*

आब्रह्मलोक समस्त असती पुनरावर्ती अर्जुन 

ष्राप्ती कोण्या लोकाची तरीही त्यांना पुनर्जन्म 

मी असल्याने कालातीत प्राप्ती माझी थोर

त्यानंतर मग कोणलाही नसतो पुनर्जन्म घोर ॥१६॥

*

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।

रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।१७।।

*

सहस्रयुगे कालावधी एक विरंचीदिनाचा

तितकाच काळ प्रजापतीच्या एका निशेचा

योग्याला ज्या झाले याचे आकलन ज्ञान 

कालतत्व ते पूर्ण जाणती ज्ञानी योगीजन ॥१७॥

*

अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे ।

रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।१८।।

*

ब्रह्मदेव दिन उजाडता होते उत्पन्न 

समस्त जीवसृष्टी अव्यक्तापासुन

रात्र होता प्रजापतीची भूतसृष्टी विरुन

अव्यक्तातच पुनरपि जाते होऊन लीन ॥१८॥

*

भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।

रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।१९।।

*

प्रकृतीच्या वश असतो जीव समुदाय

दिवसा होई उत्पन्न रात्रीस पावतो लय ॥१९॥

*

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।

य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।२०।।

*

अव्यक्ताच्या या अतीत सनातन भाव अव्यक्त 

सर्वभूत जरी नष्ट जाहले दिव्य षुरुष तो अनंत ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस आजच म्हणजे ५ मे रोजी आहे. 

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला  

मत्सर गेला  

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९०  रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हंसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

लेखक : श्रीकांत उमरीकर

जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणती साडी नेसू ???? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कोणती साडी नेसू ????  – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बायकांना पडणारा सर्वात मोठ्ठा गहन प्रश्न…

.. .. ..  कोणती साडी नेसू.. प्रत्येक बाईच्या आयुष्यात, ‘संध्याकाळी भाजी काय करू’? प्रमाणेच, ‘कोणती साडी नेसू’ हा प्रश्न पण फार ज्वलंत प्रश्न असतो. पुरूषांना जसं मयताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं…  बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठंच  चॅलेंज असतं.  प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या, ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात. पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. 

तुमच्याकडे भले शंभर साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे, एखादी कामकाजी मिटींग असेल तेव्हा. वाढदिवस, डोहाळेजेवन वगैरेला जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली. लग्नाला जाताना प्युअर सिल्क, कांजिवरम, वगैरे साड्या नेसाव्या लागतात. दहाव्याला, तेराव्याला वेगळ्या लाईट कलरच्या, बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे, त्याप्रमाणे साडीचा भारीपणा..  हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरूण ह्यावरून पण बायका जरीची /  बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरीबॉर्डरची नेसली तरी चालते. तरूण व्यक्ती गेली असेल तर मात्र दु:ख जास्त दाखवावं लागतं. मग जरा जास्त साधी साडी. 

साडी ठरवताना जिच्याघरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते.काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात… साडी खरेदी हे ह्यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे ह्यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात.  

साडी नेसताना स्मरण शक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो. तिथे तेव्हा कोण कोण होतं. कोणी कोणी ही साडी पाहिली आहे. आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील. ही सगळी व्हिडीओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. 

बरं एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमधे आलेल्या असतात. मग ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ अशी आपली गत होते. आणि ते  पाहून आपण दुस-या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका!! हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला धन्य धन्य होऊन जातं. 

बरं साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी ‘छान आहे साडी’ असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोप-यातून तुमच्या साडीकडे बघत असतात. आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात.

“माझ्याकडेपण होती अशातली, खूप पिदडली मी. मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली.” अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. 

खूप छान साडी बघून एखादी म्हणते, “हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुुझी साडी चांगली होती”.पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, *पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं?*असा विचारही मनात येतो.

त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वहात असलं तरी ‘कोणती साडी नेसू’ ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साडया ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमधे पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या-मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरिन टूरचे वेगळे. ट्रीपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा…  किती ते डोकं लावायचं बाईने. 

पुरूषांना दोन ड्रेस दिले तरी ते त्याच्यावर दोन वर्ष आनंदाने काढून टाकतील.उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभार मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही परिणामी अनेक महत्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.   

पण *बायका* बिचा-या .. ..  कोणती भाजी करू?.. कोणती साडी नेसू?.. ह्या दोन प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतात….

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 140 ☆ लघुकथा – चटकन ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा चटकन। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 140 ☆

☆ लघुकथा – चटकन ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

सुबह उठकर रोज की तरह अखबार उठाया और छत  पर चली गई। उसे अच्छी लगती है छत पर लगे पेड़-पौधों से मुलाकात। हवा में लहराती डालियां मानों गलबहियां करने को आतुर हैं। उसकी नजर पड़ी –‘अरे ! खिल गया यह फूल ,कितना सुंदर है’, धीरे से सहला दिया। फूल मानों बालों में टँक गया। वह गमलों में पड़ी सूखी पत्तियां निकालने लगी, खर-पतवार भी निकाल फेंके। अब इनको पूरा पोषण मिलेगा। जीवन में खर -पतवार नजर क्यों नहीं आते? मुरझाते पौधों को पानी से सींच वह मानों खुद ही हरी – भरी हो गई।

पेड़ – पौधों को खाद – पानी देते कितना समय निकल गया, पता ही नहीं चला। नाश्ता बनाना है, वह नीचे आ गई। पति सुबह जाकर रात में ही घर आते हैं, कहते हैं बहुत काम रहता है उन्हें। घर में वह सारा दिन अकेली। अपने कमरे में आकर चादर की सलवटें ठीक कीं, तकिए जगह पर रखे ,हाँ अब ठीक। बच्चों के कमरे पर नजर डाली, सब साफ ही है, पहले कितना बिखरा रहता था घर, अब तो — उसने गहरी साँस ली। डाईनिंग टेबिल से चाय के कप , गिलास , सॉस की बोतल हटाकर जगह पर रखी। फूलदान में रखे फूलों का पानी बदला। पानी बदलने से  फूलों में जैसे जान आ गई हो। कितने दिनों से घर के बाहर निकली ही नहीं , रोज वही काम , वही रूटीन । ड्राइंगरूम में रखे काँच के फूलदान को बहुत संभालकर उठाया।‘ओह! कितना नाजुक है,’ धीरे से रख रही थी फिर भी अनायास जोर से रखा गया, ‘उफ! चटक गया।‘ जीवन में रिश्ते भी तो ना जाने कब, कैसे बिखर जाते हैं –?

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 195 ☆ इन सम यह उपमा उर आनी… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “इन सम यह उपमा उर आनी…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 195 ☆ इन सम यह उपमा उर आनी

एक शब्द दो लोग पर अर्थ अलग निकलता है। हमारा व्यक्तित्व उसके साथ जुड़कर उसे  शक्तिशाली बनाता है। जिनकी कथनी और करनी में भेद हो, केवल एक पक्ष को साधते हुए बयानबाजी  की जा रही हो तो शक होना जायज है। जल्दबाजी में दूसरे के शब्दों को कापी कर  स्वयं बढ़चढ़ कर बोलना और हँसी का पात्र बनना। सच तो ये है कि जब दोहरा चरित्र हो तो हास्य के साथ शर्मनाक स्थिति बन जाती है, जिसे सुधारने की नाकाम कोशिश, अनजाने ही उलझन उतपन्न कर देती है। वर्षों से एक ही पदचिन्ह पर चलना और नए युग से तारतम्यता न रख पाना आपको गर्त में धकेल रहा है। जिसे सब कुछ पहले ही मुक्त हस्त से सौंप दिया हो और अब फिर देने की घोषणा करना कहाँ तक उचित है। बंदरबाट की विचार धारा से उन्नति नहीं हो सकती है। जो जिसके योग्य है उसे वो मिलना चाहिए अन्यथा आप के साथ वो भी डूबेगा जिसकी चिंता में आप दिन- रात  एक करते जा रहे हैं।

सत्यराज से सत्यधर्म तक सबको समान अवसर मिलना चाहिए। गुणीजन जब बड़े पदों में बैठेंगे तभी सही निर्णय होंगे। रणनीति बनाने की कला सबको नहीं आती। सही विचारधारा के साथ सर्वजन हिताय सर्वजन सुखाय का चिंतन जनकल्याण की दिशा को गति प्रदान करेगा।

आछे दिन पाछे गए, गुरु सो किया न हेत।

अब पछताए होत क्या? चिड़िया चुग गय खेत।।

हैरानी तो तब होती है जब सलाहकार विदेशी धरती पर बैठकर देश को राह दिखाने की नीतियाँ निर्धारित करता हो। समझदारी को ताक पर रख कुछ भी बोलते जाना क्योंकि जो बोल रहे हैं उसका अर्थ तो सीखा ही नहीं। जिसका जमीनी जुड़ाव नहीं होगा उसे न तो कहावतों  न ही मुहावरों का पता होगा। वो बस लिखा हुआ पढ़ेगा। अरे भई कम से कम ऐसा लिखने वाला तो ढूंढिए जो चने के झाड़ में बैठ कर न लिखता हो, उसे हिंदी और हिन्द के निवासियों के मन की जानकारी हो।

अभी भी समय है जागिए अन्यथा- जो जागत है सो पावत है, जो सोवत है सो खोवत है।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares