(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण ग़ज़ल “आदमी…”। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )
☆ काव्य धारा 84 ☆ गजल – आदमी… ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
(सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगणी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी द्वारा रचित एक अतिसुन्दर भावप्रवण कविता “पूस की सुबह…”। )
☆ कोहरे के आँचल से # पूस की सुबह…☆ सौ. सुजाता काळे ☆
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
१९ व्या शतकातले प्रसिद्ध भाषांतरकार व कवी रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचा आज स्मृतिदिन.
( ९/१/१८५४–४/६/१९१८ ).
काही वर्षें मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून, आणि नंतर सरकारी न्यायालयात मुन्सफ म्हणून कार्यरत असणारे
रावसाहेब कानिटकर हे उत्तम अनुवादक आणि कवी तर होतेच, आणि त्याचबरोबर चित्रकला आणि संगीत या कलांचेही ज्ञाते होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
त्यांची अनुवादित पुस्तके अशी—-
मॅक्समुल्लर यांच्या “ Origin and growth of religion “ या पुस्तकाचा मराठी अनुवाद – सन १८८३.
शेक्सपिअरच्या “ हॅम्लेट “ या प्रसिद्ध नाटकाचा – “ वीरसेन “ किंवा “ विचित्रपुरीचा राजपुत्र “ या नावाने अनुवाद – सन १८८३.
शेक्सपिअरच्याच -“ टाईमन ऑफ अथेन्स “ , “ कोरिओलेनस “ , आणि “ मर्चंट ऑफ व्हेनिस “ या नाटकांचेही मराठी अनुवाद .
जॉन स्टुअर्ट मिलच्या “ Subjection of women “ या पुस्तकाचा -” स्त्रियांची परवशता “ या नावाने अनुवाद –
सन १९०२ .
“ गीतांजली “– हा रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद – सन १९१३ – “ अनुवादाचा आदर्श नमुना “ अशी या पुस्तकाची ओळख सांगितली जात असे.
त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना —
“ श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध “ हे दीर्घकाव्य – सन १८७८.
“ अकबर बादशहा “ – दीर्घकाव्य – सन १८७९.
“ संमोहलहरी “ – दीर्घकाव्य – सन १९००.
“ कविकूजन “ हा स्फुट कवितांचा संग्रह, जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी १९३३ साली प्रकाशित केला. या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी श्री. कानिटकर यांचे अल्पचरित्र प्रसिद्ध केलेले आहे .
रावसाहेब गोविंद वा. कानिटकर यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
आचार्य धर्मानंद कोसंबी
“ The prominant Indian buddhist scholar “ अशीच ज्यांची ओळख होती, असे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचाही आज स्मृतिदिन.(९/१०/१८७६ – ४/६/१९४७). गोव्यातील सांखवल या खेड्यातल्या एका सनातनी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ज्ञानग्रहणाची उत्कट आस असणाऱ्या कोसंबी यांनी त्यासाठी घर सोडून जाण्याचा प्रयत्नही अनेकदा केला होता. आणि पुढेही याच हेतूने खूप भ्रमंतीही केली होती. बौद्ध धर्माचा अभ्यास आणि संस्कृत आणि पाली या दोन भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा ध्यास ही तेव्हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली होती. पुढे पाली भाषेतून बुद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी ते नेपाळला गेले होते. पण या धर्माची तिथली निराशाजनक स्थिती पाहून तिथून ते आधी कलकत्त्याला आणि मग सिलोन ( श्रीलंका ) इथे गेले. तिथल्या विद्योदय विद्यापीठात त्यांनी या विषयाचे रीतसर शिक्षण घेतले, आणि १९०२ साली बौद्धभिक्षू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. तिथून बर्मा इथे जाऊन त्यांनी बौद्ध धर्माविषयीच्या ब्रह्मी भाषेतल्या पुस्तकांचा तौलनिक अभ्यास केला. सात वर्षांनी भारतात परत आल्यावर कलकत्ता, बडोदा, आणि पूर्ण पश्चिम भारतात त्यांनी या विषयावर अनेक व्याख्याने दिली. अध्यापनही केले. शेवटी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये रुजू झाले. हार्वर्ड विद्यापीठातले डॉ. जेम्स वूड हे तेव्हा संस्कृत, अर्धमागधी आणि पाली या विषयातील तज्ञाच्या शोधातच होते. त्यांच्या आमंत्रणावरून श्री. कोसंबी हार्वर्डला गेले. तिथेच त्यांनी लिहिलेले “ विशुद्धीमग्ग “ हे बौद्ध तत्वज्ञानावरचे पुस्तक नंतर फार गाजले. तिथे ते रशियन भाषाही शिकले . त्याबरोबर मार्क्सवाद जाणून घेण्यातही त्यांना फार रुची वाटत होती. १९२९ साली ते रशियाला गेले. लेनिनग्राड विद्यापीठात पाली भाषा शिकवण्याचे कामही त्यांनी केले. भारतात स्वातंत्र्य चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परतले. एकीकडे गुजरात विद्यापीठात विनावेतन अध्यापन करत, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी स्वयंसेवक गोळा करण्यास सुरुवात केली. या सत्याग्रहासाठी त्यांनी सहा वर्षे तुरुंगवास भोगला. पण बौद्धधर्माचा मूलगामी शोध घेणे मात्र त्यांनी थांबवले नाही. नंतरच्या काळात त्यांनी मुंबईत अनेक बहुजन-विहारांची स्थापना करून बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. गोवा मुक्ती संग्रामासाठी ते फार आग्रही होते. आमरण उपोषण करत असतांना त्यांचा मृत्यू झाला.
आचार्य कोसंबी यांचे प्रकाशित साहित्य —-
१. “ जातककथा “ — मराठीत लिहिलेल्या बुद्धकथा — याचे अनेक भाग आहेत.
२. “ निवेदन “ हे आत्मचरित्र
३. “ भगवान बुद्ध “ हा बुद्ध-चरित्रात्मक ग्रंथ – अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झालेला आहे.
४. “ बोधिसत्व “ हे मराठी नाटक.
५. “ विसुद्धिमग्ग “ हा पाली भाषेतील ग्रंथ .
–दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त काळ अर्ध्या जगात प्रचलित असणाऱ्या विवेकवादी बौद्धधर्माला, नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असा नवा पाया पुन्हा रचून देण्याचे मोठेच काम करणाऱ्या आचार्य कोसंबी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शब्द म्हणजे भाषेचं वैभव!भाषेचे अलंकार! या अलंकारांचं रंगरुप,कस,त्यांची जडणघडण भाषेचं मोल वाढवतात.भाषा लवचिक आणि सुंदर बनवतात.भाषेचं हे रंगरुप,सौंदर्य शब्दांच्या विविध रंगछटांवरच अवलंबून असतं.
कांही शब्द परस्परभिन्न अर्थ लेवूनच तयार झालेले असतात. रूप तेच पण अर्थरंग मात्र अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेले.
अशाच काही शब्दांपैकी ‘वाण’ हा शब्द.’ मूर्ती लहान पण किर्ती महान ‘ ही म्हण चपखलपणे लागू पडावी असा हा अगदी छोटा दोन अक्षरी शब्द ! वाण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्या प्रत्येक अर्थात लपलेल्या असंख्य अर्थकळा पाहिल्या की ‘भाषेचे सौंदर्य शब्दांमुळे खुलते’ हे सहज पटावे.
‘वाण’ म्हणजे अभाव. कमतरता. ‘येथे कशालाच वाण नाही’ म्हणजे सगळे उदंड आहे. कशाचंच दुर्भिक्ष,कमतरता, अभाव नाही. अभावाला एक प्रकारचे रितेपण,पोकळी, उणेपणा, हेच अपेक्षित आहे.या अर्थाने वाण हा शब्द कसर, चणचण, ददात, वानवा, अनुपलब्धता असं बरच कांही सामावून घेतो.
‘वाण’ म्हणजे ‘रंग’ सुध्दा. फक्त दृश्यरुपातले रंग नाही,तर व्यक्तिमत्त्वातले गुणदोष स्वभावरंगही.’गुण नाही पण वाण लागला’ या म्हणीत अंतर्भूत असलेला ‘रंग’ इथे अभिप्रेत आहे.
‘वाण’ म्हणजे नमुना. झलक, वानगी,म्हणजेच उदाहरण! याचं व्यवहारातलं एक उदाहरण म्हणजे धान्याचे दुकान! तिथे दर्शनी भागात लहान लहान वाडग्यात तांदूळ, गहू , डाळी, यांचे विविध नमुने म्हणजेच ‘वाण’ ठेवलेले असतात. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करावी तसे त्या त्या धान्याचे ते वाण पाहून, तपासून कोणत्या प्रकारचे धान्य खरेदी करायचे याचा निर्णय घेणे सोपे जावे हा यामागचा उद्देश असतो.
‘वाण’ आणि ‘वसा’ या दोन शब्दांच्या संयुक्तरूपातून तयार होणारा ‘वाणवसा’ हा एक शब्द. वाणवसा म्हणजे ‘व्रत’. नित्यनेम म्हणून स्वीकारलेला एक आचार नियम!
वाण या शब्दाचा ‘घरी लागणारे किराणा सामान’ असाही एक अर्थ ‘वाणसामान’ या शब्दद्वयातून ध्वनीत होतो खरा पण मला तरी ‘वाणसामान’ हा शब्द वाण नव्हे तर ‘वाणी’ या शब्दाशी संबंधित असावा असे वाटते.वाणी म्हणजे दुकानदार. ‘वाण्याकडून आणावयाचे सामान’ ते वाणसामान या अर्थी हा शब्द बोलीभाषेतून तयार झालेला असावा आणि म्हणूनच वाण या शब्दाशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसावा असे वाटते.
‘वाण’ या शब्दाचा आणखी एक पूर्णपणे वेगळा अर्थ म्हणजे आहेर. आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक प्रथा-परंपरा माणसं जोडणाऱ्या आहेत. वाण देण्याची प्रथा ही त्यातलीच एक. ‘आहेर’ या शब्दाला भेट, उपहार, भेटवस्तू ,नजराणा, मानपान, शिष्टाचार, चोळी-बांगडी, घरचा आहेर असे अनेक कंगोरे आहेत.तसाच आहेर या शब्दाचा ‘वाण’ हा एक वेगळाच कंगोरा.एक अनोखा पैलू.वाण या शब्दात कोणत्याही विविध प्रसंगी दिलेले सगळ्याच प्रकारचे आहेर समाविष्ट होत नाहीत. लग्नमुंजीसारख्या समारंभात दिली जाणारी भेट किंवा भेटवस्तू म्हणजे आहेर.पण असे आहेर म्हणजे वाण नव्हे. काही विशिष्ट परंपरांमधील आहेरच ‘वाण’ म्हणून ओळखले जातात.’अधिक महिन्या’मधे जावयाला सन्मानाने दिला जाणारा आहेर म्हणजे अधिक महिन्याचं ‘वाण’. संक्रांतीचं वाण म्हणजे संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात सुवासिनींना दिलेल्या नित्योपयोगी भेटवस्तू. या संक्रांतीच्या वाणाला ‘वस्तू लुटणं’ असंही म्हणतात. का माहित नाही. कदाचित ‘लयलूट’ याअर्थी असेल का?
वाण हा आपल्या परंपरांमधला अतिशय मोलाचा सांस्कृतिक ठेवाच म्हणायला हवा. इथे वाण म्हणजे प्रेम,सन्मान, आपुलकी,सदिच्छा यांचे प्रतीक म्हणून दिला जाणारा आहेर.
भारतीय संस्कृतीत परस्परांमधील आपुलकीच्या स्नेहबंधांसाठी ‘देवाणघेवाण’ अपेक्षित आहे. देवाण-घेवाण या शब्दातही ‘वाण’ हा शब्दही अंशरुपाने असणे हा निव्वळ योगायोग नसावा. आपल्या संस्कृतीत अपेक्षित असलेल्या प्रेम,आपुलकीची ‘देवाण-घेवाण’ काळानुरुप रितीभाती बदलल्या तरी आपण विसरू नये एवढेच !!
चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.
अरे बापरे…?? काय करावे तेच सुचेना…
मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.
माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”
“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.
“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतोस ,इतके त्याला जपतोस .. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”
—- पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.
“मनाचे चार्जिंग ?? हे काय नवीन.???”
“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, ॲप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतु, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते, ते मनाकडे.”
लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.
माझे धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरंतर वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.
मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली.
किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.
बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.
एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!
“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!”
“दोस्ता…” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.
क्लासवरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार ?”
“नको..तू हरलास तर मला बरे वाटणार नाही..”
“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”
बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.
मुलाने स्पोर्टींगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.
आता काय करायचे…?
अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणि लगेच परत आली.
“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.
दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले. बॅगमध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गंमत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पेटारा उघडत होता.
जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!
आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मुलं जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात… अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वत:चे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो.
चटकन आरशात पाहिले.
“अरे..! फारसा फरक पडला नाही”.
उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली. तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते. बराच वेळ पाहत राहिलो.
मन गलबलून आले .खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.
काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले ,’कसं असतं ना आपलं मन..?
अचानक आनंदून जाते..क्षणात गहिवरते, हळवे होते..
एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.’
—या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.
“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”
“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”
समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”
मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो. त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.
लग्न पुन्हा एन्जॉय केलं.
“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचास तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेलास . उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”—डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.
“ थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अॅम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो. आपण मोठे झालो की मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरतो . रुटीन सोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे ,कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”
“ मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”
☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी ☆
राजस्थान हे तेथील अनेक गोष्टी, विशेषत: तेथील वैभवशाली इतिहास, भव्य राजवाडे, राजे, महाराजे, महाराण्या यांच्या कथा, रंगेल संस्कृती आणि चविष्ट पाककृती यांमुळे प्रसिद्ध आहे.
पण कुणाला माहीत आहे का की, राजस्थानमधील थरच्या वाळवंटाखाली एक रहस्य दडले आहे? ते म्हणजे १६ फूट खाली एक भव्य दिव्य लायब्ररी आहे, जिथे १२ महिने २४ तास थंड वातावरण असते, अगदी उन्हाळ्यात सुध्दा..!
ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून गणली जाते, जिच्यात ९ लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत..!
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामधल्या पोकरण तालुक्यात असलेल्या भादरिया गावात एका मंदिराखाली ही लायब्ररी बांधलेली आहे, जिच्यात एका वेळी ४००० माणसे (वाचक) बसू शकतात.
त्या ठिकाणी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, महाकाव्ये, इतिहास, शब्दकोश, नकाशांसंबंधी, अशी अनेक पुस्तके ५६२ काचेच्या कपाटांमध्ये मांडलेली आहेत…
संग्राहिका : सुलू साबणे – जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली…. ) इथून पुढे —-
रिलायन्स ग्रुपचे अंबानी, सौ नीता आणि श्री भावेश यांना भेटावयास महाबळेश्वरमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना भक्कम हात दिला…
—-रस्त्यावर …..फुटपाथवर दहा मेणबत्त्या विकून स्वतःचं घर चालवणारा लहान भावेश….. आज हजारो अंध बांधवांना घेऊन मेणबत्त्या तयार करून त्या जगातल्या बारा देशांमध्ये विकत आहे…. येणारा पैसा या हजारो अंध बांधवांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तो खर्च करत आहे….!
एक होती गांधारी…. जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली…. आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून शंभर “कौरव” जन्मले…. !
–एक आहे सौ. नीता, जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी डोळे उघडे ठेवले आणि तिने शंभरावर “अंध कुटुंबे” जगवली…. !
महाभारतातली गांधारी मोठी ? की आधुनिक युगातली सौ. नीता भावेश भाटिया …. ? माझी बहिण !
नदीतल्या पाण्यात दगड असतात आणि माती सुद्धा ….. दगड फक्त भिजत असतो…. माती पाण्यात विरघळून जाते…. ! नुसतं भिजणं आणि विरघळणं यात खूप फरक असतो…भिजणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून दुसऱ्याचे विचार मान्य करणं ….. परंतु विरघळणे म्हणजे स्वतःचं कोणतेही अस्तित्व न ठेवता…. जोडीदाराच्या विचारांशी समरस होऊन स्वतःला समर्पित करणे….
श्री भावेश भाटिया यांची पत्नी सौ नीता भावेश भाटिया असो किंवा माझी पत्नी डॉ मनीषा अभिजित सोनवणे असो….
या दोघी अक्षरशः माती झाल्या…. आणि म्हणून आम्ही आमची मुळं या मातीत रुजवू शकलो….
अशा अनेक अज्ञात नीता आणि मनीषा समाजात आहेत…. मी त्यांना प्रणाम करतो…. !
`भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन ` या तत्वावर मी आणि मनीषा आम्ही काम करत आहोत ….
पण भावेश भाई हे तत्व स्वतः जगत आहेत आणि आचरणात सुद्धा आणत आहेत…. !
आणि म्हणून तो मला मोठ्या भावापेक्षाही जास्त आहे…. घरात जरी सगळ्यात थोरला मी असलो, तरी समाजामध्ये मी त्याला मोठ्या भावाचं स्थान दिल आहे…. !
पुण्यातील अंध भिक्षेकऱ्यांसाठी असाच एक प्रकल्प आमच्या माध्यमातून पुण्यात सुरु करण्याचं वचन मला भावेश भाईने दिलं आहे…! हा प्रकल्प सुरु झाला तर, पुण्यातील अंध बांधवांच्या आयुष्यात क्रांती घडेल…!
यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रातील अंध भिक्षेकरी बांधवापर्यंत पोचवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे पुढचे स्वप्न असेल…. यात आपणा सर्वांचे आशीर्वाद हवेत….!
कार्यक्रम झाल्यानंतर भावेशभाई मला हात जोडून म्हणाला, ‘ दादा आपके साथ सेल्फी ले सकता हूँ क्या….? ‘
मोठी माणसं अशीच असतात…. नेहमी दुसऱ्याला आदर देतात…
उलट मी भावेश भाईला म्हणालो, ‘ आप तो मेरे बडे भाई हो…. मैं तो एक गरीब डॉक्टर हूँ ….आपके साथ खडा होने की मेरी औकात नही है ….आप मुझे चरणोमे रख लो… तो मेरी जिंदगी बन जायेगी….! ‘
यावर बसल्याजागी भावेशभाईने मला मिठी मारली आणि शून्यात पहात म्हणाला…., ‘ दादा मै तो आपको देख नही सकता हूँ .. लेकीन नीताको पूछूंगा फोटो मे मेरा छोटा भाई “अभिजीत” दिखता कैसे है….? तू मुझे बता…. ! ‘
मी म्हणालो, “ नीताभाभी को क्या पूछना है दादा … ? मैं खुद आपको बताता हूँ …., ‘ हम दोनो दिखनेमे सेम टू सेम है… दो हात, दो पांव, एक नाक, दो कान…. सब same to same….बस फर्क सिर्फ इतना है…
आसमान सिर्फ आपसे दो गज दूरी पे है…. और मेरी उंचाई आपके घुटनो तक भी नही है ….!
बस फर्क सिर्फ इतना है…हमने हाथ मे मशाल पकडी है…. आप दिल मे लिए घुमते हो….!
बस फर्क सिर्फ इतना है.. इन्सान बनने की नाकाम कोशिश हमारी…. आप ईश्वर से भी बेहतर इन्सान बन गये हो….!
बस फर्क सिर्फ इतना है… हम आँखे लिए अंधे जी रहे है…. आप अंधेरे मे रहकर, दूसरोंको रोशनी दे रहे हो….! “
—– यानंतर काळ्या चष्म्याच्या आडून भर उन्हातही पाऊस कोसळून गेला….!
(१४ मे २०२२, वैशाख शु १३, धर्मवीर संभाजी महाराज जयंती)