मराठी साहित्य – विविधा ☆ अलिप्तता सिद्धांत… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ अलिप्तता सिद्धांत… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बरेचदा असे होते आपण सकारात्मक इच्छा करतो. योग्य मेडीटेशन करतो पण पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत.मग आपला विश्वास कमी होत जातो. असे का होते याचा आज आपण विचार करु या.

योग्य परिणाम होण्यासाठी सगळे निसर्ग नियम एकत्रित वापरले पाहिजेत.

आपण जी इच्छा मागतो त्या पासून अलिप्त झाले पाहिजे. इच्छा पूर्तीची मागणी करायची आणि त्या पासून अलिप्त व्हायचे हे परस्पर विरोधी वाटू शकते. पण आपण ज्याच्या मागे लागतो ते पुढे पळते आणि ज्याचा फारसा विचार करत नाही ते अलगद मिळते याचा अनुभव बरेचदा आला असेल. हे कसे होते हे बघू या.

समजा आपण चांगले घर  मिळाले आहे अशी इच्छा केली आहे. पण आपण निसर्ग शक्तीकडे इच्छा करुन सोडून देत नाही. नाना शंका डोक्यात येतात.

असे घर मला कसे मिळेल?

लोन मिळेल का?

मी ते फेडू शकेल का?

माझा कडे अजून पैसा येईल का?

अशा नाना शंका मनात घेऊन  चिंता करत रहातो. म्हणजेच या इच्छापूर्ती विषयी अनिश्चितता वाटते. अनंत अडथळ्यांचा विचार आपण करतो.  आणि हेच आपल्या इच्छापूर्ती मधील अडथळे असतात. हेच अडथळे दूर करायचे असतात.

 इच्छापूर्ती होण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.

▪️ Self commitment – स्वतःशी वचन बद्धता

मी इच्छा निर्माण करेन पण त्यातील अडथळ्यांचा विचार करणार नाही.अलिप्तता सिद्धांत अंमलात आणणार आहे. ज्या घटना घडणार आहेत त्याचा स्वीकार करणार आहे.कोणतेही लेबल लावणार नाही.

▪️ मी अनिश्चिततेच्या क्षेत्रावर विश्वास ठेवणार आहे.

अनिश्चिततेचे क्षेत्र म्हणजे आपल्या शंका. ही इच्छा पूर्ण होणार की नाही असे वाटणे ही अनिश्चितता आहे.

▪️ मी इच्छेशी निगडित उत्तरे कशी मिळतील याचा विचार करणार नाही.

▪️ मी फक्त इच्छा पूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवणार आहे.

▪️ इच्छापूर्तीचा आनंद घेणार आहे.

हे विचार स्वतःच्या मनाशी करायचे आहेत. आपल्याला सगळ्याची चिंता करायची व स्वतःवर जबाबदारी घेण्याची सवय लागलेली असते.तीच सवय आपल्याला बदलायची आहे. थोडा वेळ लागेल पण प्रयत्न करुन हे बदलू शकतो.

आज पासून आपल्या इच्छापूर्ती मधील अडथळे आपणच दूर करु या.

धन्यवाद! 🙏🏻

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सहज शांतपणे बसायचं …

हळूच डोळे मिटून घ्यायचे 

अंतरंगातले कल्लोळ शांत होईपर्यंत काहीही करायचं नाही.

 मनाला स्थिरता आली की 

मानसपुजा  सुरू करायची..

 

 प्रेमाने मायेने अंतकरणपूर्वक…

 हळूहळू आत आत  जायचं 

हे  आता जमायला लागले होते……….

 

प्रथम डोळे भरून त्याच्याकडे बघायच.नमस्कार करायचा..पुजा सुरू करायची..

 पंचामृत स्नान ,मग शुद्धोदक स्नान जरतारीची मखमली  देवाची वस्त्र ..

ती अर्पण करायची..

सोन्यामोत्याचे अलंकार घालायचे .

 

सुंदर हार फुलं देवाला वहायची..

आणि मग एकटक .. 

ते गोजिर रूप बघतच राहावं असं वाटायचं ..

जीव त्यात रमायचा..

 

 मोठ्या चांदीच्या ताटात पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवायचा

 आरतीच तबक निरंजनांनी सजवायचं….

 

 आरत्या म्हणायच्या सोबत टाळाचा गजर त्या नादात पाच-सहा आरत्या होऊन जायच्या..

 धूप लावायचा ..

कापूरच्या आरतीने ओवाळायच ओवाळताना कापूर आरती म्हणायची मंत्रपुष्पांजली झाली की

साष्टांग दंडवत घालायचा 

…..

 सगळं कसं यथासांग  करायचं

 नंतर त्याच्यासमोर बसून राहायचं…..

काही न बोलता शांतपणे…

कारण  

त्याला सगळंच माहित असत..

 

 असं वाटायचं पुजा  सफल झाली……

 पूर्वी तेवढ्याने जीव रमायला  लागला होता .

आताशा एक वेगळीच ओढ लागली होती…

 

मनात यायच  पंचामृताचा फुलांचा वास कधीतरी जाणवावा..

पक्वान्नांचा गंध नाकाला क्षणभर तरी यावा ..

निरंजनाची उष्ण ऊब आरती घेताना  हाताला स्पर्शून जावी..

 निदान कापराचा तो चिरपरिचित वास तरी यावा….

 

काहीतरी घडावं असं वाटायचं आजही क्षणभर तसंच वाटलं…..

 

 अर्थातच तिला माहीत होत आपला इतका अभ्यास नाही …भक्ती भाव नाही हे लगेच घडणार नाही..

 खूप मनोभावे अनेक वर्ष तप साधना करायला हवी तेव्हाच हे होईल 

 

आज तर मनाने बजावलच ही अपेक्षा करूच नकोस ..

अनुभव प्रचिती या फार लांबच्या गोष्टी आहेत …

तिथपर्यंत पोहोचायला अजून खूप वेळ आहे …

साक्षात्कार काय इतक्या सहजासहजी होत नसतो…

इथे सबुरी हवी .

 

आणि खरंतर असं कुठलं मागणं मागायलाच नको …

इथपर्यंत वाटचाल करायचं हे भाग्य मिळालं हेही खूप झालं .

 

हे सगळं कळत होतं पण मन मात्र आज खुळावलं होतं .

 

ती भानावर आली. पूजा पूर्ण झाली होती .कापूर अजून जळत होता. दिव्यांच्या वातीच्या उजेडातलं ते मोहक रूप  ती बघत  होती..

 

 किती वेळ गेला काही कळलच नाही आणि अचानक हवेच्या मंद झोक्याबरोबर खिडकी जवळच्या प्राजक्तांचा वास दरवळला..

 अंगावर एक अनामिक लहर आली मन भारल्यासारखं झालं ..

 

देवाने आज जणू कौलच दिला होता प्रसाद म्हणून हा सुवास आला होता का…जाणवला होता का..

काय सुचवायचे असेल बरं…

 

 केवळ मानस पूजेतच तो नाही तर चराचरात तो भरून राहिलेला आहे ही तर शिकवण देवाने दिली नसेल ..

एक हलकीशी गोड जाणीव मनाला स्पर्श करून गेली …

खरतर हा वास नेहमी यायचा..पण त्यातला हा गर्भित अर्थ आज ऊमगला..

 

तो असतोच आसपास कुठल्या ना कुठल्या रूपात.

 सगुणरूपाची पूजा करायची सवय असल्याने तेच रूप परिचित असते आणि तेच खरे वाटते.

 इतके संकुचित रूप असेल का बरं  त्याचे ?

 

त्यासाठी आता  शांतपणे  विचार करायला हवा  ….हळुहळु  मग तो चराचरात  दिसेल.

 अगदी आसपासच्या  माणसातही ….

हेच सुचवायचं असेल का ?

ती भानावर आली …

खरंच मनापासून प्रयत्न करायला हवे आहेत हे तिच्या लक्षात आले. वरवरच्या विचारातून बाहेर येऊन अंतरंगात खोल डोकावून पहायला हवे आहे..

 संकल्पना तपासून बघायला हव्या आहेत .

आज मनाला एक वेगळाच विचार स्पर्शून गेला होता .

त्यावर अभ्यास करायला हवा .

विचार नीट तपासून बघायला हवे

 तिला मनोमन संतोष वाटला. 

 

त्यानी  मार्ग दाखवला  आहे.. त्यावरून आता जायला हवे.

 जे हवेहवेसे वाटते आहे ते तिथे गवसेल.

 

डोळे उघडून ती लौकिकात परत आली. 

आज मन मात्र  काहीसे शांत स्थिर झाले आहे असे वाटत होते .

अननभूत असे काहीसे त्याला आज गवसले होते .

 

एक मात्र खरे होते..

आजची मानसपूजा खूप काही शिकवून गेली होती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वसाहती अंतराळातील — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ वसाहती अंतराळातील — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल.

अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार, आणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.

अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण वजन हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल, शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.

एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रांगोळी… – लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ रांगोळी… – लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या.

अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळपिठाची ओळ.

बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं सुंदर कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली.

अजून तांदूळपिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या, त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटेसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या .त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या .

विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, “इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटं सुद्धा टिकली नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं ?”

त्या हसल्या, म्हणाल्या, “रांगोळी काढत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली.रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !”

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने  सोडवून घेतल्या होत्या.

कशातही अडकून राहू नये , सोडून द्यावं.संयमाने, आनंदाने, क्षमाशील व्रताने जीवन जगावं.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच अल्पजीवी आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखिका :श्रीमती गायत्री कामत-प्रभू

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

आजी होणे किंवा आजोबा होणे  या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?

नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.

नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.

तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.

नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.

तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.

घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)

☆ – आगमन…  – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।

*

नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

*

प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी  हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

*

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले

संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री

अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.

मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।

खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित  करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.

नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली  

इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली

आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १

गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं.  तुझी ती इवल्याशा  डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.

प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली

तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली

ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २

किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे?  तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्‍याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.

पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले.  आता या क्षणी माझी  ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.

खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली

स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली

संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली

मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३

वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं.  अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना   माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.

खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!

तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.

या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु.  नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.

प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!

पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.

या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.

आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली  ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे.  स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा  स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते.  पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद.  नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो.  आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो  कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.

या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.

संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार  निवृत्त होताना आपल्या वारसाला  वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने  आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.

एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.

विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला  तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”

हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(प्रथम पुरस्कार प्राप्त लेख)

योग शिबिर चालू होते.  गुरुजींनी पहिलाच प्रश्न विचारला.  आपण आनंदी समाधानी आहात का? दुसरा प्रश्न– पूर्वीचे लोक जास्त सुखी होते की, आताचे जास्त सुखी आहेत? विचार सुरू झाले. खरंच  भौतिक प्रगती इतकी झाली. कष्ट कमी झाले. तरीही पूर्वीचा माणूस जास्त सुखी होता. अशी उत्तरे आली .का बरं असं असेल?

आज समाजाचं चित्र पाहिलं तर,  अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येक जण ताण-तणावात जगतोय असं दिसतं.  नुसत्याच बाह्य उपचारांनी आणि पाश्चात्य वैद्यक शास्त्राच्या उपायांनी सुद्धा खरं आरोग्य राखता येत नाही. त्यासाठी आपली जीवनदृष्टी आणि जीवनशैली बदलायला हवी. ही गोष्ट आता पाश्चात्यांनाही कळून चुकली आहे. त्यामुळे ते लोक आता भारतीय अध्यात्म योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत . मग ही योग साधना काय आहे बरं? उपनिषदांमध्ये तसेच भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात तर भगवंतांनी अर्जुनाला ‘ध्यान योग’  सांगितला आहे .पतंजलीनी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या योगदर्शन लिहिले आहे. मानवी मन आणि सत्याची त्यांना पुरेपूर माहिती होती त्यामुळेच त्यांनी योगशास्त्र लिहिले.

‘ योग ‘ म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध , अशी पतंजलीनी व्याख्या केली आहे. कसे जगावे? ती एक कला म्हणून कशी अंगी करावी? याबद्दल पतंजलीनी आपल्या ग्रंथात अत्यंत महत्त्वाचा असा अष्टांग योग सांगितला आहे .  “ध्यान ” या अंगाचा विचार करत असताना, त्यापूर्वीची पाच अंगे, (बाह्यांगे )म्हणजे साधनपादाची थोडक्यात माहिती घ्यायला हवी. १) यम — (सत्य ,अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य ,अपरिग्रह )  २)  नियम– ( शुद्धी , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान )  ३) आसन– शरीर निश्चल राहून सुख वाटते ती स्थिती . ४) प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा प्राणाला दिशा देणे. मन एकाग्र होऊन शारीरिक शक्ती वाढते . ५) प्रत्याहार — इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच प्रत्याहार. त्यासाठी खूप निग्रह करावा लागतो. पुढील तीन महत्त्वाची आंतर अंगे म्हणजे विभूतीपाद. ६)  धारणा — एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. वरील सहा पायऱ्या चढून गेल्यानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे ” ध्यान”. ७) ध्यान — ध्यै — विचार करणे, हा धातू आहे .चिंतन किंवा विचार हे धारणे संबंधित असतील तरच त्याला ध्यान म्हणता येईल. नुसतेच अर्धा तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. चित्त धारणेच्या विषयावर  स्थिरावल्यानंतर, त्यापासून जो प्रत्यय येत असतो, त्याच्याशी एकतानता साधणे या क्रियेलाच ध्यान म्हणतात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळी नेत्र पटलावर प्रतिबिंब उमटते. त्या तेजाने नसा चेतविल्या जाऊन ,संवेदना मेंदूकडे जातात. मेंदू कडून त्याचा अर्थ लावला की त्याचे  ज्ञान होते. म्हणजेच प्रत्यय आला, असे आपण म्हणतो. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते. आणि एखादा प्रश्न चटकन सुटू शकतो. जप करणे हेही ध्यान होऊ शकते. कोणत्या ना कोणत्या मूर्त रूपाचा आधार घेऊन विचार करणे, हा आपला स्वभाव असतो. ईश्वराचे चिंतन करताना ,कोणते ना कोणते मूर्त रूप समोर येईल. कारण विचार आणि रूप अविच्छेद्य आहेत. पंचेंद्रिय आणि मन त्यावर गुंतून ठेवून ,स्थिर करून, ध्यानाच्या अभ्यासाने मनाची संपूर्ण एकाग्रता साध्य होते. जप नुसत्या जिभेवर न ठेवता मनातून केला पाहिजे . सुरुवातीला जप मोठ्याने करावा. म्हणजे तो ठसतो . जप करताना दुसरे विचार आले तरी ते विचार संपले की जप पुन्हा सुरू करावा. मन थकलेले असेल तर ध्यानामुळे बळकट होते .सोन्याची चीप असेल तर, ती धारणेचा विषय. आणि सोन्याची तार म्हणजे धारणा. ही तार कुठेही तुटता कामा नये, असे चिंतन म्हणजे ध्यान. झोपेत स्वतःचे अस्तित्व विसरतो .आवडी नावडी, गरीब श्रीमंती अशा भावनिक पातळ्या सोडल्या की शांत झोप लागते. ती निष्क्रियता हेच ध्यान. झोपेचे ज्ञान आपल्याला जागृती कडे  किंवा सत्याकडे नेते.

ध्यान करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. ध्यान करताना शांत जागा निवडावी. खूप भूक लागली असेल तर ध्यान लागणार नाही. तसेच पोट गच्च भरले असेल तर ध्यान न होता झोपच लागून जाईल. ध्यान करण्यापूर्वी घरातली कॉल बेल बंद करावी. तसेच घरातल्या प्राणिमात्रांना जवळ घेऊ नये. मनात सर्वात जास्त प्रलोभने डोळे निर्माण करतात, त्यामुळे ध्यान करताना डोळे बंद करून ,श्वासावर लक्ष केंद्रित करून ,नंतर दीर्घ श्वास घ्यावेत. त्यामुळे ताण कमी होतो. 90 दिवस सलग ध्यान केले तर, कुटुंबातील इतर व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम दिसतो. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर, योग साधनेसाठी सूर्योदयापूर्वीची सर्वोत्तम वेळ. त्याचप्रमाणे संध्यासमयी  ४–३० ते  पाच नंतर. कारण त्यावेळी आपली मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते. पृथ्वीच्या ऊर्जा संक्रमणातून जात असतात. आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी झालेला असतो. शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवनप्रणालीशी संलग्न झाली की ,आपोआप जाग येते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणात योगाचा विकास झाल्याने सगळे योगाभ्यास सकाळी  किंवा संध्याकाळी करावेत.

ध्यानाचे फायदे किती सांगावे तितके कमीच ! वीस मिनिटाच्या ध्यानाने चार ते पाच तासांच्या झोपे इतकी विश्रांती मिळते. ध्यान मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. विश्रांती, जागरूकता आणि एकाग्रता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ध्यानानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून येणारी ऊर्जा डोळ्याला स्पर्श करावी. व  हळुवार डोळे उघडावे. जेव्हा शंभर लोक एकत्र ध्यान करतात, तेव्हा त्याच्या लहरी पाच कि.मी. पर्यंत पसरतात. आणि नकारात्मकता नष्ट करतात. हॉवर्ड येथील ‘ सारा लाझर ‘ हिच्या टीमला कळून आले की,, ” माईंड फुलनेस मेडिटेशन” खरोखरच मेंदूची रचना बदलू शकतो. आठ आठवडे माइंड फुलनेस आधारित “स्ट्रेस रिडक्शन हिप्पो कॅम्पस”  मध्ये कॉर्टीकल  जाडी वाढवते. जे शिकणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करते. .मेंदूच्या अभ्यासाने अहवाल दिला आहे की व्यक्तीनिष्ठ चिंता आणि नैराश्याच्या पातळीपासून मुक्त होण्यास एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्यास नवीन अभ्यास समोर येत आहेत. काही प्राचीन फायदे जे आत्ताच एफ. एम .आर. आय .किंवा  इ.ई.जी. सह पुष्टी होत आहे. खरोखरच ध्यान आपल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांमध्ये मोजता येण्याजोगे बदल घडवून आणते.ऐलिन लुडर्स यांनी आणखी एक संशोधन करून सांगितले की, ध्यानामुळे मेंदूतील करड्या द्रवामध्ये वाढ होते. जे विचारक्षमतेचे मुख्य स्रोत असते.एम्मा  सेप्पाला या प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांनी सांगितले की, ध्यानाने स्मरणशक्तीत वाढ होते व बौद्धिक पातळी उंचावते.   सृजनशीलता वाढते. मनाची साफसफाई होते याची शक्ती आपल्या गुलामी आणि प्रकृती यांचा प्रतिकार करण्यास समर्थ होऊन आनंदात पोहोचवते. भावनिक स्थिरता वाढते तसेच वैचारिक आणि भावनिक केंद्रशांत राहतात ध्यानाने अमिग्डालाचा आकार कमी होतो जो ताणतणावाने वाढतो.

अंधशाळेतले मुलं स्वतःमध्ये स्थिर राहून भजन किंवा कविता म्हणतात .योग साधना कोण करू शकतो? तर युवा, वृद्धो  वा अतिवृद्धो वा, व्याधीतो दुर्बलोपिवा /  अभ्यासात सिद्धि- माप्नोती , सर्व योगेष्वतंद्रितः//

अष्टांग योगातील पाच बाह्यंगे आणि धारणा ,ध्यान ही अंतरंगे साध्य झाली की, शेवटची समाधी  या पायरी पर्यंत जाता येते. समाधीत ज्ञानग्रहण होते. अनेकांना सिद्धीही प्राप्त होतात. समर्थ रामदास ,ज्ञानेश्वर माऊली, आणि अनेक संतांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ,पुणे येथील डॉक्टर प. वि. वर्तकांनी समाधी स्थितीत ‘ मंगळ ‘ ग्रहावरील वर्णन पाहिले. आणि तेथे लाख वर्षांपूर्वी पाणी आणि शेवाळ होते असे 1975 साली सांगितले .त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे खरे असल्याच्या बातमी नुसार 1986 साली, त्यांचे विवेकज्ञान सत्य असल्याचे सायन्सच्या संशोधनानी सिद्ध झाले. नंतर त्यानी ‘ गुरु ‘ ग्रहाचेही वर्णन सांगितले. अमेरिकेतील डॉक्टर दीपक चोप्रा यांनी लिहिलेले “क्वांटम हीलिंग “

हे पुस्तक बेस्ट सेलर बुकच्या यादीत आलेले आहे. त्यात त्यांनी योगाचा अभ्यास वैद्यकीय उपचारांनाही कसा पूरक ठरतो,, तसेच ज्ञानाच्या  माध्यमातून  खोल मनापर्यंत  पोचून, अडचणी समजून घेऊन ,मनातला गुंता सोडविता येतो . तसेच ध्यानाच्या माध्यमातून आजार बरे करण्यास कशी मदत होते, हे सविस्तर पुस्तकात सांगितले आहे.

श्री. श्री .रविशंकर यांच्या “आर्ट ऑफ लिविंग ” च्या ऍडव्हान्स मेडिटेशनच्या कोर्समध्ये आम्ही कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकलो. पंचकोष, ओरा, ओँकार, चंद्र, (पौर्णिमेचा), सूर्य ,शरीरातील षटचक्रांवरचे हरी ओम, असे कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकून खूप आनंद मिळवला. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये लोक हे ज्ञान आत्मसात करत आहेत. रामदेव बाबांचीही शिबिरे चालू आहेत. योगाचे अनेक शिक्षकही तयार झाले आहेत. शालेय पातळीपासून अभ्यास व्हायला हवा. जागोजागी स्पर्धा, ताण-तणाव दिसत आहेत .अशा वेळी स्वच्छ , निर्मळ,  आणि निरामय आरोग्यासाठी योग साधनेचीच गरज आहे .आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 21 जून हा ‘जागतिक योग दिवस,’ आणि 21 मे हा ‘जागतिक ध्यान दिवस ‘ असे म्हणून अधिष्ठान दिले आहे. त्याचा परिणाम ही जाणवू लागला आहे .सर्वजण मिळून सर्वांसाठी प्रार्थना करूया.

//सर्वेपि सुखिनः  सन्तु, सर्वे संतु निरामयः//.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय…” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..  

“ए,काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की,येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं. 

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की..”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”

“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”

“ए गपयं.सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”

“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं  माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट  असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत. 

नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ,वरवरचं आहे.काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला.आता मुलांचं भावविश्व बदललयं.बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही.याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत.आता बालपण लवकर संपतं कारण…” 

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांचं चरित्र आणि चारित्र्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा नजरेस पडलं त्याला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली ! व्ही.शांताराम आणि बाबुराव पेंटर यांचे हे चित्रपट-कार्य ‘सिंहगड’ या शीर्षकाने १९२३ मध्ये चित्रपटगृहात झळकले होते…पण हा चित्रपट मूक होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की सरकारला चित्रपटांवर मनोरंजन कर लावायची कल्पना सुचली…आणि त्यातून उत्तम महसूल प्राप्त होऊ लागला! १९२३ नंतर असे एकूण आठ मूक चित्रपट आले ज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. १९३२ मध्ये व्ही.शांताराम यांनी महाराजांवरील पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शन केले….आणि या चित्रपटाचेही नाव ‘सिंहगड’ हेच होते. यात मांढरे बंधूंपैकी सूर्यकांत यांनी महाराजांची भूमिका केली होती.    

शिवरायांचे चरित्रच एवढे रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे की आजही त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तयार होत आहेत आणि होत राहतीलही. २०२४ पर्यंत या चित्रपटांची संख्या ४३ एवढी होती. शिवाय सर्जा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशांसारख्या चित्रपटांतही शिवराय दिसले.  दरम्यान दोन दूरदर्शन हिंदी मालिका आणि काही मराठी मालिकांमध्ये छत्रपतींचं कलाकारांनी घडवलेलं दर्शन झालं. विषयाचा केंद्रबिंदु असलेली शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतेच असते. कारण महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आवाकाच अतिविशाल आहे. 

महाराजांची भूमिका करणा-या कलाकारांपैकी अमोल कोल्हे, शंतनु मोघे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, रविंद्र महाजनी, महेश मांजरेकर ही काही नावे नजरेसमोर येतात. रितेश देशमुखही लवकरच आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसतील. हिंदीत अक्षयकुमारही हे (भलतेच !) धाडस करून बसला आहेच ! या कलाकारांच्या अभिनयक्षमेतेविषयी आणि देखणेपणाविषयी काही शंका नाही आणि प्रेक्षक त्यांचे आभारीही आहेत… वास्तविक छत्रपतीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही वर्णनं उपलब्ध आहेत. यात महाराजांची शारीरिक उंची बेताची होती हे सर्वच वर्णनात आढळते. असो. साधारणत: महाराजांएवढी शारीरिक उंची असणारे अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे हे कलाकार आपण पाहिले आहेत. परंतु साधारणपणे आजपासून सत्तर वर्षे मागील पिढीतील प्रेक्षकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर कोणी अढळ स्थान मिळवलेले असेल तर ते चंद्रकांत मांढरे यांनी. अर्थात चंद्रकांत यांची उंची जास्त होती आणि चेहराही महाराजांच्या उपलब्ध चेह-याशी मिळता-जुळता नव्हता. त्यांचे बंधू सूर्यकांतही छत्रपतींची भूमिका करीत. पण भालजी पेंढारकरांनी चंद्रकांत मांढरेंच्या माध्यमातून ज्या रितीने शिवराय उभे केलेत..त्याला तोड नसावी ! चंद्रकांत यांचं या भूमिकेतील वावरणं अतिशय राजबिंडं, देखणं आहे. संवादफेक अतिशय निर्दोष. अभिनय राजांना साजेसा. एका प्रसंगात महाराज अफझलखानाच्या भेटीस निघालेले आहेत..खान दगा करणारच याची खात्री असल्याने महाराजांनी वाघनखे जवळ बाळगली आहेत. ती वाघनखे पोटाशी लपवून ठेवल्यानंतर एका विशिष्ट निग्रहाने,आत्मविश्वासाने छत्रपती आपली नजर समोर करून पाहतात….अतिशय भेदक भासली चंद्रकांत यांची नजर या प्रसंगातील अभिनयात….वाटलं खुद्द शिवराय बघताहेत मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून! 

हा चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट होता. पण नंतर नजीकच्याच काळात चंद्रकांत यांचं महाराजांच्या भूमिकेतील रंगीत छायाचित्र उपलब्ध झाले ते या लेखात दिलं आहे. 

बहुदा याच चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी ‘सेट’वर दिग्दर्शक भालजी पेंढारकर आलेले असताना शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चंद्रकांत हे भालजींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू पहात असताना भालजींनी त्यांना, “आपण छत्रपतींच्या वेषात आहात..आपण असं कुणाला वंदन करणं योग्य दिसत नाही” अशा आशयाचं सांगितलेलं वाचनात आलं! विषयाचं गांभीर्य जाणणारे भालजींसारखे दिग्दर्शक मराठीला लाभले, हे सुदैवच !   

हरी अनंत..हरी कथा अनंत असं देवाच्या बाबतीत म्हणलं जातं. शिवरायांच्या कथांच्या आणि त्यांच्या रुपांबाबतही असंच म्हणता येईल. मात्र ही रूपं विविध माध्यमांतून साकारणा-या कलाकारांनी विशिष्ट भान बाळगून असावे असे मात्र वाटते. 

जी बाब चित्रपटांची तीच बाब महाराजांच्या चित्रांबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारची असंख्य चित्र उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार चित्रांना चेहरा,उंची आणि वेशभूषा दिलेली दिसते. त्यावरून अनेक प्रतिकृतीही विक्रीसाठी आलेल्या दिसतात. झेंड्यांवरील चित्रेही एका विशिष्ट चेह-याची आढळतात. पण या सर्वांत लक्ष वेधून घेते ते श्रेष्ठ चित्रकार गोपाळ बळवंत कांबळे यांनी १९७४ मध्ये साकारलेलं महाराजांचं तैलचित्र. महाराष्ट्र शासनाने हे अधिकृत चित्र म्हणून स्विकारलेलं आहे आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हेच चित्र प्रदर्शित केलेलं दिसतं. चित्रपटांची मनमोहक भव्य बॅनर्स रंगवण्यात हातखंडा आणि राष्ट्रीय प्रसिद्धी असेलेल्या गोपाळ बळवंत उर्फ जी.कांबळे यांनी हे चित्र काढण्याबद्दल एक पैसाही मोबदला घेतला नव्हता…ते म्हणाले होते…”देवाच्या चित्राचा मोबदला घ्यायचा नसतो!” या अधिकृत चित्रनिर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे… (१९७४-२०२४) ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचे हे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जावे, असे वाटते. त्यातून एकवाक्यता दिसेल. असो. 

आपल्या राजांना आपल्या नजरेसमोर आणणा-या सर्व कलाकारांना, लेखकांना, शिव अष्टक संकल्प घेतलेल्या दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांना, संगीतकारांना, गायकांना, मूर्तीकारांना, शिल्पकारांना, वक्त्यांना, इतिहासकारांना साष्टांग दंडवत ! प्रातिनिधीक स्वरूपात चंद्रकांतजी मांढरे, भालजी, यांचा चित्रांद्वारे उल्लेख केला आहे. हे केवळ शिव-स्मरणरंजन आहे. ऐतिहासिक प्रमाण असलेलं अभ्यासू लिखाण नाही… 

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अतिथि… – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

“मी आजच्या  अतिथींना   विनंती  करतो की,  त्यांनी  दीप प्रज्वलन  करावं…..”

असं निवेदक म्हणाला 

आणि  स्मितहास्य  फुललं.

अतिथी. … !

माझ्याशी महिनाभर  आधी  बोलून   तारीख , वार , वेळ  नक्की  करून  कार्यक्रम  सादर  करण्यासाठी  निमंत्रित  केलेला मी  ‘अतिथी ‘कसा  काय  ठरलो?

तिथी , वार,  वेळ  न ठरवता  जो  येतो  तो  अतिथी.

पण  अगदी मोठमोठय़ा  कार्यक्रमाच्या  पत्रिकेतदेखील ‘प्रमुख  अतिथी’ अमुक अमुक  असं चक्क  दहा  दिवस  आधीच  लिहिलेले  असतं.असो !

पण  खरंच  विचार  केला तर  आजच्या  काळ, काम,  वेग  या  बंधनात  पुरते गुरफटून  घेतलेल्या  टेक्नोसेव्ही मोबाईल  जगतात  ‘अतिथी ‘म्हणून  येणं  किंवा जाणं शक्य  आहे  का?

पंधरा- वीस  वर्षांपूर्वी  ही  मजा  नक्कीच  होती.

“कालपासून  तुझी  सारखी  आठवण  येत  होती  आणि  आज  तू  हजर “,  असं म्हणताना  तो  खुललेला चेहरा   दिसायचा.

“आलो  होतो  जरा  या  बाजूला.    बरेच  दिवस  भेट  नाही…”

“तुमच्या  हातची  थालीपीठांची आठवण झाली. चला  तेवढंच  निमित्त…”

“बसा  हो  भावोजी, कांदा  चिरलेलाच आहे. दहा  मिनिटांत थालिपीठ  देते आणि  आज दहीही फार  सुरेख  लागलंय  हो! आलेच. “

असा संवाद जर आज ऐकवला तर,  “बापरे ! किती  मॅनर्सलेसपणे  वागत  होती  माणसं ?   न  कळवता  असे  कसे  कोणाच्या  दारात  उभी  ठाकू शकतात  ?  भयंकर आहे.” अशा  प्रतिक्रिया  नक्कीच  येतील.

कारण  अतिथी  परंपरा  आता  कालबाह्य  झाली आहे. नव्हे,  ती  हद्दपार  होणे  किती  महत्वाचे आहे,  हे  आम्हाला  पटले  आहे.

आम्ही  स्वतःभोवती  एक सोयीस्कर  लहानसं  वर्तुळ  आखून  घेतलंय.  त्या  परिघामध्ये उपयुक्ततेनुसार  माणसं  वाढतात  किंवा  कमी  होतात.

“येतोय”..”निघालोय”. ..” बस मिळाली” ..”ट्रेन  पकडतोय”…”लिफ्टमधे आहे”… अशा अपडेशनमधे  कोठेतरी  अचानक  मिळणारा भेटीचा सुखद धक्का  हरवून  गेलाय.

परवा मुलीने  “अतिथी देवो भव”चा अर्थ  विचारला…

तिच्याच  भाषेत  सांगायचं  म्हणून  म्हटलं, “outdated software आहे.  हे आता नाही कुठे कुणी install   करत.”

एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला  न  सांगता, न कळवता, भेटून  तर  पहा.

old version किती user friendly होतं,  याचा  अनुभव   नक्कीच येईल .

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

? विविधा ?

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी  ☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ 1. वसंत पंचमी… डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“जय शारदे वागीश्वरी

विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी”

ज्येष्ठ कवयित्री के.शांता शेळके यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही रचना….

साक्षात सरस्वती मातेला आपल्या समोर उभी करते.

रसिकहो, वसंत पंचमी म्हणजे या विद्येच्या देवतेचा जन्म उत्सव!

ही सकल कला, संगीत आणि वाणीची देवता..केवळ श्वास घेतला म्हणजे जगणं नाही… मनुष्याच्या जीवनात विद्या,कला हवी.. त्याचबरोबर मधुर वाणी..

सरस्वतीच्या हातातील वीणा संगीत साधनेचे द्योतक आहे…

तिची शुभ्र वस्त्रे सात्विक भाव सांगतात…कमळ संसार सागरातून अलिप्तता शिकविते.

पूर्वी शाळेत पाटी पूजन असे.

आता पाटीच नाही..

हसरी, सुमुखी, उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे मधुमती अशी ही सरस्वतीची मूर्ती.. हे स्वरूप.

“विद्या विनयेन शोभते!” हेच सांगते…

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

© डाॅ.व्यंकटेश  जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४ मो ९९७५६००८८७

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

☆ 2. शाळेची योग्य वेळ… श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

शाळेची योग्य वेळ – 

1) आमचं बालपण 2) मुलांचं बालपण 3) शिक्षक म्हणून.  

कोकणातलं ठार खेडं. चालतच शाळेत जायचं. आमची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. पंचक्रोशीत एकच. ती दुबार भरायची. सकाळी 7.30 ते 10.30 दुपारी 2.30 ते 5.30.

पाच मैलांवरून येणाऱ्या मुलांनी कसं यायचं?केव्हा उठायचं? त्यांच्या दुपारच्या वेळेचं काय? जेवणाचं काय?हा विचार कोणीही का केला नव्हता ?  कारण  शिक्षण सार्वत्रिक नव्हतं. ब्राह्मणांची मुलं सातवी पर्यंत कशीबशी  शिकायची नि मास्तर व्हायची. बाकीची जरा जाणती झाली की “मुंबईक  जावन रामाबालू नायतर गिरणीत चिकटुची.” शहरातल्या  काही शाळा 11 ते 5 .तरी पहिली ते चौथी सकाळीच. का? माहित नाही.

2) आमची मुलं लहान असतानाही थोडीफार अशीच परिस्थिती होती.  मोठ्यांच्या शाळा, कॉलेजीस, ऑफिसेस दुपारी, पण लहान मुलांना मात्र सकाळचीच शिस्त (?) किंवा शिक्षा. कारण?

3) मी शिक्षक असताना  फारच दारूण अवस्था होती. आमची शाळा खेड्यातली. तरी टेक्निकल हायस्कूल. टेक्निकलचे वर्ग सकाळी. बाकीचे पाचवीते दहावी सर्व वर्ग 11त 5..गावातल्या पहिली ते चौथी प्राथमिक शाळा — जिल्हा परिषदेच्या. त्याही 11ते 5 होत्या. छान चाललेलं.

— मुलांची संख्या वाढली , तुकड्या वाढल्या. इमारत पुरेनाशी झाली. शाळा दुबार भरवणे हा पर्याय उरला. आणि  लहान मुलांवर संकट आलं. पाचवी ते सातवी 7.30 ते 12. आठवी ते आता दहावी कं12.30 ते6. दोन्ही शिफ्टच्या मधल्या सुट्टया लहान झाल्या. आमची शेतकऱ्यांची, मजुरांची मुलं त्यांच्या आयाही  कामाला जायच्या.  त्यांनी मुलांचे डबे कधी करायचे?बरींच मुलं बिन आंघोळीची यायची. कारण पाणी सुटलं तरी ते भरून ठेवायला हवं आयांना.  मुली तर आपापल्या वेण्या कशातरी गुंडाळून यायच्या. केस विंचरायला सवड नको? पहिल्या तासाला वर्गात घाण वास सुटलेला असायचा. पोट साफ करून तरी मुलं येतील ही शंकाच. मुलांना स्वच्छl रहाण्याचं शिक्षण कसं मिळायचं? शाळेची इमारत बांधणं ही काही साधी गोष्ट नव्हती. अशी सगळी आबदा.  इमारत होईपर्यंत असंच सगळं.

आता काही उपाय.–

1) शाळेच्या इमारती डामडौल नसलेल्या पण, मोठ्या, सर्व वर्गाना पुरतील अशा बांधाव्यात म्हणजे कमी खर्चात ऐसपैस असाव्यात. दोन शिफ्ट करण्याची वेळच येऊ नये.

2) मुंबई, पुण्याच्या सर्व स्त्रिया नोकरी करतातच. त्यांच्या मुलांची सकाळची शाळा त्यांना सोयीची. मुलांना सगळ्या तयारीनिशी एकदा शाळेत पाठवलं की स्वतःची तयारी. पण त्यात मुलांच्या झोपेचं, शीशूच काय? त्यांच्या बालपणावर उगीचच ताण, त्यांच्या आजी,आबांना ठेऊन घ्याव. ते निवांतपणे, प्रेमाने नातवंडांचं करतील, एकदा मुलांच्या बाजूने विचार केला की उपाय खूप आहेत. शब्द मर्यादेमुळे बास.   

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

रिटायर्ड मुख्याध्यापिका

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416. मो. – 9561582372, 8806955070.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print