मराठी साहित्य – विविधा ☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ अखेरचा हा तुला दंडवत…! ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग

अखेरचा हा तुला दंडवत…!

रविवार दि ६फेब्रुवारी २०२२ चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली. गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या.  अवघा देश शोकसागरात बुडाला. जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाला होती. गानसूर्य अस्ताला गेला. जणू दिवसातले, नव्हे जगण्यातलेच चैतन्य कोणीतरी काढून घेतले होते. संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता. दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. सूर निमाले.

कविवर्य भा रा तांबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे. ‘ मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा…’ दीदींच्या रूपाने हा गानसूर्य मावळला होता. याच गाण्यात सुंदर ओळी आहेत

जो तो वंदन करी उगवत्या

जो तो पाठ फिरवी मावळत्या

रीत जगाची ही रे सवित्या

स्वार्थपरायणपरा.

उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे. पण हा गानसूर्य अस्ताला गेल्यावर जगाने आपली ही रीत बदलली. या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली. घराघरात टीव्हीसमोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकांनी दर्शन घेतले. मुंबईत लोकांची दाटी आणि घराघरातील लोकांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी. प्रत्येकाला जणू आपल्याच घरातील कोणीतरी गेल्यासारखे वाटले. गानसम्राज्ञी, गानसरस्वती, गानकोकिळा यासारखी कितीही विशेषणे तुम्ही लावा, ‘ लता ‘ याच नावाने प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते. ही ‘ लता ‘ प्रत्येकाच्या मनात अशी रुजली होती की ‘ तिचा वेलू गेला गगनावरी…’ स्वर्गापर्यंत हा वेलू जाऊन पोहोचला. बहुधा स्वर्गलोकीच्या देवांनी, गंधर्वांनी तिला सांगितलं असावं की आता बस झालं पृथीवर लोकांना रिझवणं. खूप प्रतीक्षा करायला लावलीस आम्हाला. आता आम्हालाही तू हवी आहेस.

त्या सुरांची जादूच अशी अनोखी होती. सोन्याच्या तारेसारखा लवचिक, मुलायम आवाज ! खरं तर या आवाजाला उपमाच नाही. दीदी दिसायला तुमच्या आमच्यासारख्याच. पण जेव्हा त्या गायला लागत तेव्हा त्या गळ्यातून गंधार बाहेर पडे. सरस्वतीची वीणा झंकारत असे, श्रीकृष्णाची बासरी स्वरांचे रूप घेऊन प्रकट होई. सकाळी भूपाळी, भजन, भक्तिगीतं म्हणून हा आवाज उठवायचा, संकटात आधार होऊन धीर द्यायचा, ‘ ऐ मेरे वतन के लोगो…’ म्हणत राष्ट्रभक्ती जागवायचा. ‘ सागरा प्राण तळमळला… ‘ या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करायचा. ‘ मोगरा फुलला ‘, ‘ आनंदवनभुवनी ‘ यासारख्या गीतांनी एका वेगळ्याच आनंदरसाची बरसात करायचा. श्रीरामचंद्र कृपालू, बाजे रे मुरलीया बाजे सारखी गाणी वेगळ्या विश्वात घेऊन जायची. रात्रीच्या वेळी हा आवाज अंगाई गाऊन निजवायचा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती…’ असलेला हा आवाज होता. ( उगवतीचे रंग )

एक मुलगी नऊ दहा वर्षांची असल्यापासून श्रोत्यांसमोर गायला सुरुवात करते. पितृछत्र हरपल्यावर हीच चौदा पंधरा वर्षांची कोवळी पोर मोठी होऊन आपल्या घराची, भावंडांची काळजी घेते. दैवी सूर तर तिच्या गळ्यात असतोच. पण आपल्या मेहनतीने ती त्या सुरांना सौंदर्य प्राप्त करून देते. मिळेल तिथून शिकत जाते. शाळेत फारसे न गेलेली ही मुलगी पुढे स्वतःच्या बळावर शिकत जाते. पुस्तके वाचते तशीच माणसे वाचते. त्या सगळ्यातून जीवनाचे धडे घेते. स्वतःची तत्वे, नैतिक अधिष्ठान या गोष्टींशी कधीही तडजोड करत नाही. मिळेल त्या संगीतकाराकडून शिकत जाते. पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी ती करपून जात नाही. तिचं आयुष्य म्हणजे जणू आनंदयात्री ! संगीत, प्रवास, क्रिकेट, खाणं आणि खाऊ घालणं, नर्म विनोद, नकला या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आनंद तिने लुटला. लोकांनाही भरभरून दिला. तिच्या सुरांचं झाड अखेरपर्यंत बहरतच राहिलं. साडेसात दशकं हे झाड गात होतं, बहरत होतं आणि ‘ आता विसाव्याचे क्षण…’ उपभोगत होतं !

संत कबीर म्हणतात

कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हं रोये

ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये ।।

दीदी अशीच करणी करून गेल्या. अवघं जग हळहळलं. राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले. एका भारतरत्नाला अखेरचं वंदन करण्यासाठी पंतप्रधान आणि अवघे मान्यवर अंत्यदर्शनाला आले. ‘ जीवन कृतार्थ होणं ‘ ते अजून वेगळं काय असतं ! जगावं तर असं जगावं आणि मरावं तर असं मरावं !

आता दीदी देहानं आपल्यात नाहीत. पण त्यांचे सूर चिरंतन आहेत. ते सदैव आपली साथ करत राहतील. ‘ नाम गम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान हैं , गर याद रहे. ‘ तेव्हा दीदी ‘ अखेरचा हा तुला दंडवत…! ‘

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

(तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.) इथून पुढे —

३० ऑक्टोबरला राम-शरद अयोध्येत दाखल झाले! अयोध्येत सुमारे तीस हजार पोलिसांचा खडा पहारा होता…हत्याबंद. माणूसच काय पण पाखरूही रामजन्मभूमी परिसरात फिरकू शकणार नाही अशी पोलादी रचना केली गेली होती. तत्कालीन प्रशासन हे न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे पालन करण्यात व्यग्र होते. हाती लागलेल्या कारसेवकांना प्रशासन वाहनांमध्ये कोंबून दूरवर नेऊन सोडत होते. रामजन्मभूमीस्थळी हजारोंचा जमाव जमला होता. त्यांच्यामध्ये पोलिसांच्या पहा-याची मजबूत भिंत उभी होती. पोलिसांनी अटक केलेले कारसेवक एका वाहनात भरले…ते वाहन तेथून निघणार होते तेवढ्यात एका साधूने वाहनचालकाकडून त्या वाहनाचा ताबा मिळवला आणि ते वाहन सर्व अडथळे तोडून थेट रामजन्मभूमीस्थळी पोहोचले. हे एवढ्या वेगाने घडले की काही मिनिटे पोलिसही गोंधळून गेले. या गोंधळात तोवर त्या इमारतीच्या घुमटावर कारसेवक चढलेही होते….बारीक चणीचे आणि चपळ असलेले शरदकुमार हाती भगवा ध्वज घेऊन सर्वांत आधी घुमटावर पोहोचले…बंधू राम सोबत होतेच. आणि राजेश अग्रवालही. शरदकुमारांनी घुमटावर भगवा ध्वज फडकावला…त्या स्थळावर प्रतिकात्मक अधिकार सांगणारी ती कृती होती….त्याजागी चारशे आठ वर्षांनंतर पहिल्यांदा मूळचा ध्वज फडकत होता! यंत्रणेने या सर्वांना खाली उतरवण्यात यश मिळवले आणि त्यांची रवानगी दूरवर केली.

शरद,राम,राजेश आणि अन्य सहकारी १ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत परतले. अयोध्येतल्या एका मंदिरात रात्र काढली. दुस-याच दिवशी कार्तिक पौर्णिमा होती….२ नोव्हेंबर,१९९०! यादिवशी गंगा-यमुना स्नान घडले तर समस्त मनोकामना पूर्णत्वास जातात, अशी श्रद्धा आहे! या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते.

रामजन्मभूमीसमोर जाऊन भजने म्हणत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचे ठरले आणि अर्थात शरद,राम,राजेश हे यात सहभागी होणारच होते. त्यांनी भल्या पहाटे शरयूगंगेत स्नान केले. घाट चढून वर आले तर रस्त्यातल्या एका दुकानात एक वस्त्रकारागीर कारसेवकांसाठी भगव्या कपाळपट्ट्या तयार करताना दिसला. राम आणि शरद यांनी एक एक पट्टी खरेदी केली. आणि पट्टीच्या मागे पेनने लिहिले….कफन! ही कृती तशी काही आधी ठरवून केलेली नव्हती…हा कदाचित प्रारब्धाचा एक संकेतच असावा !

योजनेनुसार अयोध्येतील एका गल्लीतून एक गट नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी भजने गात निघाला. पोलिसांनी अडवले तर रस्त्यातच बसून राहायचे, अशी साधारण योजना होती. भर दुपारची वेळ. एका मठवजा इमारतीतून शरदकुमार आणि रामकुमार नुकतेच बाहेर पडले होते…शांतपणे चालत येत होते. तेवढ्यात पोलिसांनी गोळीबार करायला सुरूवात केली. एका गोळीने रामकुमारच्या मस्तकाचा वेध घेतला…क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहताच शरदकुमार रामकुमारकडे धावला…लक्ष्मण रामामागे धावला तसा….शरदकुमार त्याच्यापाशी खाली बसला…आणि दुस-याच क्षणी त्याच्याही शरीराचा वेध दुस-या एका गोळीने घेतला! दोघेही जागीच गतप्राण झाले! गल्लीत प्रचंड गदारोळ उठला.

पोलिसांनी मृतदेह वाहनांमध्ये भरून नेण्यास सुरुवात केली होती….परंतू राजेश अगरवाल यांनी त्याही स्थितीत काही व्यवस्था करून राम आणि शरद यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तेथून हलवले. प्रशासनाने ते मृतदेह अयोध्येतून बाहेर घेऊन जाण्याची अनुमती दिली नाही. नंतर शरयूच्या तीरावर राजेश अग्रवाल यांनी या दोघा भावांना अग्निडाग दिला…!

इकडे कोलकात्यात हीरालाल यांच्या पत्त्यावर एक पोस्टकार्ड आले होते….बाबा आम्ही वाराणसीला पोहोचतो आहोत अशा आशयाचे…काम झाल्यावर लगेच घरी यायला निघतो…जय श्रीराम! त्यानंतरच्या सलग चार दिवशी चार पत्रं आली…पोरांनी पत्र लिहित राहण्याचे वचन पाळले होते आणि प्रत्येक मुक्कामावरून एक एक पत्र धाडले होते.एकात लिहिले होते…ताईच्या लग्नासाठी लवकरच परत येऊ !

घटनेच्या दिवशीच कोलकात्यात बातमी पोहोचली होती….राम शरद आता आपल्यात नाहीत. कौसल्येचे राम आणि सुमित्रेचे लक्ष्मण रावणरूपी मृत्यूच्या जबड्यातून सुटून अयोध्येत परतू शकले होते…परंतू या सुमित्रेचे राम-शरद प्रत्यक्ष श्रीरामांच्या अयोध्येतून परतू शकले नाहीत. हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्यावर कोसळलेला वेदनेचा डोंगर अगदी महाकाय. आपल्या लेकरांच्या पार्थिव देहांचं अंतिम दर्शनही त्यांना घेता आले नाही. दोन महिन्यांवर लग्न आलेल्या बहिणीने,पौर्णिमाने मग आपला साखरपुडा मोडला आणि राममंदिर उभे राहीपर्यंत अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला…एक आनंदी कुटुंब असं मोडकळीस आलं होतं. रामकुमार आणि शरदकुमार कोठारी यांचे वडील हिरालाल आज जगात नाहीत….ते २००२ मध्ये गेले. हे जग सोडताना त्यांच्या मुखात ‘राम’ नाम होते..आणि शरद नामही! त्यांचा राम जीवनात न रेंगाळता मृत्यूच्या वनात निघून गेला होता. आणि या रामाच्या लक्ष्मणाने आपल्या भावाची सावली बनून त्याच्यासह जाणे स्वीकारले ! २०१६ मध्ये ह्या राम-शरदाची सुमित्राही पुत्रविरहाचं दु:ख हृदयात घेऊन परलोकी गेली! भावपूर्ण श्रद्धांजली !

— समाप्त —

(संबंधित विषयाबद्द्ल विविध स्रोतांमध्ये वाचलेल्या माहितीवर आधारित.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? 

याची कारणे : वयाच्या तिसऱ्या  टप्प्यातील मानसिक गोंधळ …… 

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:…

वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

— काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”.  मी उत्तर देतो: नाही !

— इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”.  मी पुन्हा उत्तर देतो नाही !

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:….   

– अनियंत्रित मधुमेह

 – मूत्रमार्गात संसर्ग;

 – निर्जलीकरण

हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही.  ५० वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात.  निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.  यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा– यासारख्या घटना घडतात. 

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण ५0% पेक्षा जास्त असते. तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय ५0 व्या वर्षी सुरू होते.  ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो.  हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे.  जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं असं वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

निष्कर्ष:

५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही,  तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः

१) द्रव्य पिण्याची सवय लावा.  पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे;  संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.  महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे.  हे लक्षात ठेवा !

२) कुटुंबातील सदस्यांना इशारा:::  पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा. .. जर आपल्या हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.

जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका.  आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत:साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. पन्नाशीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे !

लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

(अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆‘स्वरलता’ – बाँध प्रीती फूल डोर…. भूल जाना ना ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

(स्वरलता- (२८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२))

‘स्वरलता’ – बाँध प्रीती फूल डोर…. भूल जाना ना ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

प्रिय वाचकांनो,

नमस्कार! 

लता मंगेशकर, अशी व्यक्ती जिच्या नावाचा महिमाच पुरेसा होता, तिच्या सुरांच्या जादूने भारलेल्या आवाजाच्या दिवाण्यांसाठी! ६ फेब्रुवारी २०२४ ला तिला जाऊन २ वर्ष होतील. त्या गंधर्वगायनी कळांना या तारखेशी कांहीही देणे घेणे नाही. त्यांची मनमोहक सुरेल स्वरमधुरिमा आजही तशीच शाबूत आहे. जशी स्वर्गातील नंदनवनाच्या रंगीबेरंगी सुमनांची सुरभी कालातीत आहे, तसेच लताच्या स्वरांचे लाघवी लावण्य वर्षानुवर्षे सुगंधाचा शिडकावा करीत आले आहे आणि आमच्या दिलांच्या गुलशनला याच प्रकारे वर्षानुवर्षे असेच प्रफुल्लित ठेवीत राहील. तिने गायलेल्या एका गाण्यात हीच भावना अत्यंत सुरेख रित्या प्रकटली आहे, ‘रहें ना रहें हम महका करेंगे, बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में’ (चित्रपट ‘ममता’, सुंदर शब्द- मजरूह सुल्तानपुरी, लोभस संगीत-रोशन).

आमच्या कित्येक पिढ्या सिनेसंगीताच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांनी बघितलंय   सिनेसंगीत कसे बदलत गेले ते! मात्र त्यात एक ‘चीज’ कधीच बदलली नाही, ती म्हणजे गायनाचा अमृतमहोत्सव पार करणाऱ्या लताच्या आवाजाचा गुंजारव! याच स्वरांनी आमचे कोडकौतुक करीत अंगाई गीत ऐकवले, यौवनाच्या मंदिरी प्रणयभावना प्रकट करण्यासाठी स्वर दिलेत, बहिणीच्या मायेने ओथंबलेल्या राखीचे बंधन बहाल केले. इतकेच नव्हे तर, मनोरंजन क्षेत्रातील ज्या ज्या प्रसंगातील ज्या ज्या स्त्रीचे रूप, स्वभाव अन मनाची कल्पना आपण करू शकतो, ते ते सर्व कांही या स्वरात समाहित होते. श्रृंगार रस, वात्सल्य रस, शांत रस, इत्यादी भावनांना जेव्हां लताच्या स्वरांची साथ लाभायची तेव्हां तेव्हां त्या बावनकशी सोन्यात जडलेल्या रत्नांसारख्या उजळून निघायच्या!

मैत्रांनो, आपल्याप्रमाणेच माझ्या जीवनांत देखील लताच्या स्वरांचे स्थान असे आहे की, जणू सात जन्मांचे कधीही न तुटणारे नाते! लताच्या जीवनचरित्राविषयी इतके भरभरून लिहिल्या आणि वाचल्या गेले आहे की, आता वाचक म्हणतील, “कांही नवीन आहे कां?” मी लताच्या करोडो चाहत्यांपैकी एक आहे. पौर्णिमेच्या चंद्राला बघून जशी सागराला भरती येते, तद्वतच लताच्या आठवणीने माझ्या मनात उचंबळून आलेल्या भावना इथे सामायिक करते (शेअर करते). मागील कांही दिवसांत लताच्या दोन गाण्यांनी मला भावविवश होऊन वारंवार ती ऐकण्यास भाग पाडले आणि मनाच्या अथांग गाभाऱ्यापर्यंत ठाव घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोनही चित्रपटांची गीते निव्वळ शुद्ध हिंदी शब्दांची पराकाष्ठा करण्याचा आग्रह धरणारे गीतकार पंडित नरेन्द्र शर्मा यांनी लिहिली आणि त्यांना अभिजात संगीतसाज चढवला महान संगीतकार ‘स्वरतीर्थ’ सुधीर फडके यांनी!

१९५२- कोलकत्ता येथील अनोखा मिश्र संगीत महोत्सव -जेव्हा लताला उस्तादजींच्या आधी गाणे गावे लागले!      

या चार रात्री चालणाऱ्या मिश्र संगीत महोत्सवात मिश्र अर्थात ध्रुपद-धमार, टप्पा-ठुमरीबरोबरच सिनेसंगीत देखील समाविष्ट करण्यात आले होते. एका रात्री लता आणि  शास्त्रीय संगीताचे महान गायक उस्ताद बड़े गुलाम अली खान साहेबांचे गायन होते. पण आयोजकांनी लताला उस्ताद साहेबांच्या अगोदर गाण्याचा क्रम दिला. हे संगीत समारोहाच्या नियमांच्या चौकटीतून पाहिल्यास उस्तादजींचा अनादर करणे होते. लताला हे चांगलेच माहीत होते, म्हणून तिने आयोजकांना असे करण्याची मनाई केली, पण जेव्हां त्यांनी हे ऐकले नाही, तेव्हां तिने सरळ उस्ताद साहेबांकडेच तक्रार केली आणि म्हणाली की मी हे करू शकणार नाही. हे ऐकताच खांसाहेब जोराने हसले आणि तिला म्हणाले, ‘जर तू मला मोठा मानत असशील तर, माझे म्हणणे ऐक आणि तूच आधी गा,’ अन मग काय, कोलकत्तातील ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.

लताने त्यांचे म्हणणे ऐकले तर खरे, पण तिने आपल्या हिट सिनेमांतील गाण्यांना वगळून निवड केली एका मधुरतम गीताची, जे बांधले होते जयजयवंती रागात. १९५१ साली आलेल्या ‘मालती माधव’ नांवाच्या सिनेमातील हे गाणे होते, ‘बाँध प्रीती फूल डोर, मन ले के चित-चोर, दूर जाना ना, दूर जाना ना…. ‘. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या भावपूर्ण शब्दांना मधाळ संगीताचा साज चढवला होता सुधीर फड़के यांनी! या गाण्याचा असा कांही प्रभाव पडला की, तिने प्रेक्षकांना या संध्याकालीन संगीतलहरींच्या जादूने बांधून ठेवले. प्रेक्षकच नव्हे तर उस्तादजी सुद्धा लताच्या गायकीने प्रभावित झाले. 

नंतर जेव्हां खां साहेब मंचावर आले तेव्हां त्यांनी लताला सन्मानाने मंचावर स्थान दिले आणि तिची खूप तारीफ केली. त्या वेळेपर्यंत जे गाणे प्रसिद्ध झाले नव्हते, ते त्या दिवशी हिट झाले! मित्रांनो, हा लेख लिहिस्तोवर मी या गाण्याविषयी फारसे ऐकले नव्हते. मात्र जेव्हांपासून ते लक्षपूर्वक ऐकले आहे, तेव्हापासून त्याच्या जादूने भारल्यासारखे झाले आहे. लताचे हे गाणे यू ट्यूब वर उपलब्ध आहे. (शिवाय सुधीरजींच्या आवाजात देखील!) आपण देखील लताच्या या अनमोल गाण्याचा आनंद घ्या आणि माझ्यासोबतच आपणही एका विचाराने त्रस्त व्हाल की, ‘मालती माधव’ या सिनेमाची एकमात्र स्मृती असलेले हे गाणे चालले कां नाही?   

लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’

दुसरे गाणे आहे, भक्ती आणि प्रेमभावाने रसरसलेले असे गाणे ज्याचे एक एक शब्द जणू अस्सल दैदिप्यमान मोतीच, अन त्यांची चमक वृद्धिंगत करणारे कर्णमधुर संगीत सुधीरजी (बाबूजी) यांचे! जर अशी जोडी सोबत असेल तर, लताच्या सुरबहारचा एक एक तार वाजणारच ना. ‘भाभी की चूड़ियाँ’ (१९६१) सिनेमाचे गाणे होते, ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’ (राग–यमन). रुपेरी पडद्यावर एका सुवासिनीच्या रूपात चेहेऱ्यावर परम पवित्र भाव असलेली मीना कुमारी. मी कुठेतरी वाचले होते की, या गाण्यावर सुधीरजी आणि लताने खूप मेहनत घेतली आणि गाण्याच्या वारंवार रिहर्सल झाल्या. सुधीरजींना या गाण्यापासून खूप अपेक्षा होत्या. हे गाणे श्रोत्यांना खूप पसंत पडेल अशी त्यांना आशा होती. पण झाले याच्या अगदी विपरीतच, याच सिनेमाचे दुसरे गाणे, ज्याच्या प्रसिद्ध होण्याची साधारणच अपेक्षा होती, ते सर्वकालीन प्रसिद्ध गाणे म्हणून गाजले. ते होते, ‘ज्योति कलश छलके’! भूपाली रागावर आधारित या गाण्याला शास्त्रीय संगीतावर बेतलेल्या चित्रपट गीतात अति उच्च स्थान प्राप्त झाले. कदाचित त्याच्या छायेत ‘लौ लगाती’ ला रसिकांच्या ह्रदयात ते स्थान मिळू शकले नाही. मैत्रांनो, आपणास ही विनंती की, आपण हे सुमधुर गाणे अवश्य बघा-ऐका आणि त्यातील शांति-प्रेम-भक्तिरसाचा अक्षत आनंद घ्या!

लताच्या असंख्य आठवणी आठवत असतांना नेमकं काय वाटतंय, त्यासाठी तिच्याच अमर (१९५४) या चित्रपटातील एक गाणे आठवले. (गीत-शकील बदायुनी, संगीत नौशाद अली)    

“चाँदनी खिल न सकी, चाँद ने मुँह मोड़ लिया

जिसका अरमान था वो बात ना होने पाई

जाने वाले से मुलाक़ात ना होने पाई

दिल की दिल में ही रही बात ना होने पाई…”

प्रिय वाचकांनो, लताच्या गीतमंजूषेतील या दोन अमूल्य रत्नांच्या दिव्य प्रकाशात उजळलेल्या स्वरमंदिरात विराजित गानसरस्वतीच्या चरणी ही शब्दसुमने अर्पित करते!

धन्यवाद 🙏🌹

टीप : 

*लेखात दिलेली माहिती वरील लेखन साहित्य आणि लेखिकेचे आत्मानुभव तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.

**गाण्यांची माहिती सोबत जोडत आहे. यूट्यूबवर तुम्हाला गाण्यांच्या शब्दांवरून लिंक्स मिळतील.

  • ‘बांध प्रीती फूल डोर’- चित्रपट -‘मालती माधव’ (१९५१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके       
  • ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मै प्रीत बाती’- चित्रपट -भाभी की चूड़ियाँ (१९६१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – ६ फेब्रुवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

आई-वडिलांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याकाठी गेलेला श्रावणबाळ परतलाच नाही. मृगयेसाठी पाणवठ्याजवळच्या वृक्षावर अंधारात दबा धरून बसलेल्या राजा दशरथांच्या मरणबाणाला माणूस आणि जनावर यांतील भेद समजण्याचं काही कारण नव्हतं.  पाण्यात बुचकाळल्या गेलेल्या घागरीचा आवाज दशरथांना हरिणाचा आवाज भासला आणि त्यांच्या प्रत्यंचेवरून बाण निघाला….आणि थेट श्रावणाच्या काळजात घुसला तो मृत्यूचा वैशाखवणवा घेऊनच. लाडक्या पुत्राला डोळ्यांनी कधी बघूही न शकलेल्या त्या म्हाता-या काळजांनी महाराज दशरथांना पुत्रविरहाचा शाप अगदी हृदयापासून दिला. आणि मग कर्मधर्मसंयोगाने महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या हृदयाकाशातील राम’चंद्र’ वनवासाच्या काळोखात लुप्त झाला…चौदा वर्षांसाठी….ही दीर्घ अमावस्याच म्हणावी!

महाराज दशरथ पुत्रविरहाच्या वेदनेच्या वाटेवर चालताना लवकरच थकले आणि त्यांची मृत्यूनेच सुटका केली….ईहलोकात रामनाम घेत प्राण सोडणा-यांमध्ये दशरथ सर्वप्रथम ठरले. परंतू महाराणी कौसल्या पुत्रमुख पुन्हा पाहण्यात सुदैवी ठरल्या….त्यांचे पुत्र श्रीराम परतले आणि त्यांच्या सोबतीला गेलेले राणी सुमित्रा आणि दशरथ महाराजांचे सुपुत्र लक्ष्मण सुद्धा!

पण कलियुगातील एका सुमित्रेचे राम परतलेच नाहीत….हिच्यापोटी एक नव्हे तर दोन दोन राम जन्मले होते!

रामयाणात कौसल्येचे श्री राम आणि सुमित्रेचे श्री लक्ष्मण अशी जोडी. पण या सुमित्रेच्या पोटी जणू राम-लक्ष्मण एकापाठोपाठ जन्मले. फरक इतकाच की एक राम आणि दुसरा शरद म्हणून ओळखला जात होता. त्यांना एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की तुम्हांला चार मुलगे होतील. अत्यंत भाविक असलेल्या या दांमप्त्याने त्यांच्या या होणार असलेल्या मुलग्यांची नांवे आधीच ठरवून ठेवली होती….राजा दशरथांचे चार पुत्र…..राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न! त्यांना पहिला मुलगा झाला…त्याचे नामकरण अर्थातच राम…दुसरा लक्ष्मण! पण तिसरी मुलगी झाली..पौर्णिमा!  म्हणून मग लक्ष्मणाचे नाव बदलून शरद ठेवण्यात आले.

त्रेता युगात यज्ञांना संरक्षण देण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि श्रीलक्ष्मण या दोघाही कुमारांची मागणी केली होती. कलियुगात काळाने अनेक मातां-पित्यांकडे श्रीरामाच्या सुटकेसाठी पुत्रांची मागणी केली.

वर्ष १९९0. महिना ऑक्टोबरचा. दिवाळीच्या आसपासचे दिवस. म्हणजे आजपासून साधारण तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ. राजस्थानातील बिकानेरमधून कोलकात्यात व्यापारामध्ये आपले नशीब आजमावयला आलेल्या हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्या पोटी जन्मलेले दोन मुलगे असेच रामकार्यासाठी मागितले गेले आणि त्यांनी ते दिलेही. वीस बावीस वर्षांचे हे सुकुमार. १२ डिसेंबरला बहिणीचे लग्न होणार होते. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना या सुकुमारांनी आधी लगीन अयोध्येचे असा चंग बांधला. त्यांनी आई-वडिलांची परवानगी मिळवली. कारसेवा म्हणजे अयोध्येत जाऊन श्रीराम रायाची सेवा अशीच त्या जन्मदात्यांची कल्पना होती. कारण तोवर अयोध्येत असा रक्तरंजित संघर्ष पेटेल याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवाय हे कारसेवक प्रभु श्री रामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्यासारखे हाती धनुष्यबाण घेऊन निघालेले नव्हते. यांच्या हाती असणार होते फक्त भगवे ध्वज. हजारो वर्षांपूर्वी ज्या जागी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला होता, ते पवित्र स्थळ १५२८ मध्ये परकीय आक्रमक बाबरच्या एका सरदाराने, मीर बाकीने नष्ट करून त्यावर मस्जिद उभारली होती…त्याजागी पुन्हा मूळचे राममंदिर उभारण्यासाठी सेवा करायची होती…!

प्रवासादरम्यान दररोज एक पत्र लिहाल अशी अट हीरालाल आणि सुमित्रा यांनी आपल्या या पोरांना घातली. आणि ती त्यांना मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पोरांनी पळतच जाऊन दुकानातून पोस्ट कार्ड्स आणली आणि त्यावर पत्ते लिहिले…..प्रति,मा.श्री.हिरालालजी कोठारी….बडा बाजार…कोलकाता! काम आटोपून दहा बारा दिवसांत तर परतायचे होते.

दिवाळी संपून चार दिवस झाले होते…दिनांक २२ ऑक्टोबर,१९९०….कोलकात्यातील साथीदारांचे नेतृत्व करीत थोरले रामकुमार आणि धाकटे शरदकुमार अयोध्येकडे प्रस्थान करते झाले. संध्याकाळी सातची रेल्वेगाडी होती….उत्तर प्रदेशातील त्यावेळी मुघल सराय असे नाव असणा-या स्टेशनपर्यंत जाणारी. पण ही गाडी रद्द करण्यात आली. पण हे कारसेवक त्याच रेल्वेस्टेशनवर बसून राहिले….आणि प्रशासनाने रात्री दहा वाजता गुपचूप ती रेल्वे रवाना केली. मुलं पळतच त्या गाडीत शिरली आणि पहाटे मुघल सरायमध्ये पोहचली. तिथून त्यांना खाजगी वाहनातून अयोध्येत नेले जाणार होते.

यांच्या मस्तकात कारसेवा होती आणि मस्तकावर बांधलेल्या पट्टीवर कपाळावर शब्द दिसत होती जय श्री राम! कारसेवकांचा हा जत्था त्या दिवशी रात्री उशिरा रायबरेलीजवळच्या लालगंजपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे वाहनव्यवस्था उपलब्ध नव्हती. कारण प्रशासनाने प्रवासाची सरकारी साधने रोखून धरली होती. मग एका खाजगी टॅक्सीने हे दोघे आणि त्यांचे एक सहकारी राजेश अग्रवाल आझमगडच्या फुलपूर कसब्यात पोहोचले. येथून पुढे तर रस्ताच बंद केला गेला होता. मग ही जोडगोळी २५ ऑक्टोबरला इतर कारसेवकांसोबत चक्क शेतांतून लपतछपत पायीच अयोध्येकडे निघाली…बहुतांश प्रवास रात्रीच उरकायचा…वाटेत गावकरी देतील ते अन्न स्विकारायचे असा क्रम होता. तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

केसांच्या काळ्याभोर लाटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळुच लक्षात येते…..

देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची  

कालपरवापर्यंत ताई म्हणणारे अचानक काकू मावशी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते…..

किती छान ..  आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय . 

टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते….

की हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत.  

टीव्ही वर मॅचमध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते…..

आज जिमला जायला विसरले.  

बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि ‘ बसा मावशी ‘ म्हणते आणि हळुच लक्षात येते….

संस्कार शिकवणाऱ्या  माझ्यासारख्या आयाही आहेत तर.  

शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते ‘ लक्ष कुठे आहे तुझे? ‘  आणि हळूच लक्षात येते….

कोकराला “हाय फाइव” द्यायची वेळ झाली आहे.   

एखाद्या काॅलेजजवळ पाय आपोआप रेंगाळतात. त्या तरूणाईचा उत्साह आणि मस्ती बघून मन पण उल्हसित होते..  पण हळूच लक्षात येते….

की आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात.   

देवाजवळ सांजवात लावताना, स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते….

देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार.  

कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातून निघालेली कळ ‘ आई गं….’  आणि हळूच लक्षात येते….

लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस.  

बाहेर पाऊस चालू असतो .. कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते..  नको इतकी, कारण….

पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या रीयूनियनसाठी घेतलेल्या गाऊनमध्ये फिट व्हायचंय.  

काॅफीचा मग मात्र सांगत असतो..  कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमकरता आहे….

घे बिनधास्त….

आणि मी गाणे गुणगुणायला लागते ….

दिल तो बच्चा है जी .. .. 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपल्यातील क्षमता… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

आपल्यातील क्षमता… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हे आपल्याशी निगडित आहे. आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे हे आपण खूप वेळा ऐकतो. आता ती मिळवायची कशी? वाढवायची कशी?

हे बघू या.

एक असा सिद्धांत आहे, सृष्टीची निर्मिती झाली त्या वेळी ऊर्जा भरपूर होती. पण त्याला ठराविक आकार नव्हता. ज्यावेळी एकेक जीव निर्माण होऊ लागला त्यावेळी त्या ऊर्जेला आकार मिळाला.

ही ऊर्जाच प्रत्येकाला जिवंत ठेवते. आपण म्हणतो विज्ञान खूप प्रगत आहे. पण सगळ्याच गोष्टी त्यातून निर्माण होत नाहीत. जसे रक्त हे द्यावेच लागते. अशा काही गोष्टी शरीरच निर्माण करु शकते. एकच ऊर्जा प्रत्येकाला जिवंत ठेवते. हाच मोठा चमत्कार आहे. याला आपण विविध नावाने ओळखतो. देव, निसर्ग शक्ती, दैवी शक्ती, वैश्विक शक्ती या पैकी कोणतेही नाव देतो. या शक्ती मध्ये अफाट ताकद असते. याच ऊर्जेचा आपण एक अंश आहोत. जसे आपण घरात विविध उपकरणे वापरतो. फॅन,ट्यूब,मिक्सर पण या उपकरणांना एकच शक्ती चालवते ती म्हणजे वीज. याच प्रमाणे आपल्या सर्वांना एकच ऊर्जा चालवत असते.

ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी त्या ऊर्जेच्या जवळ असतो.

याचा अनुभव आपण लहान मुलांमध्ये घेतो. पण आपण जसे मोठे होतो तसे विविध अनुभव, विकार, अहंकार या मुळे या ऊर्जे पासून दूर जातो. आपल्याला सर्वांनी ओळखावे, आपण सगळ्यात उठून दिसावे असे वाटते. त्या साठी खूप धडपड करतो. या मुळे त्या ऊर्जे पासून अधिकच दूर जातो. कारण माझे अस्तित्व नष्ट होईल की काय अशी भीती असते. मग त्यातून केविलवाणी धडपड सुरु होते. कधीकधी ती हास्यास्पद होते. हे का होते तर आपण व ही ऊर्जा यात अंतर पडते व स्वतःला सिद्ध करण्यातून ते अंतर वाढतच जाते.

आणि मनाला त्रास होतो. हे अंतर कमी झाले तरच ती ऊर्जा वाढते व कार्यक्षम होते. या साठी स्वतःचे निरिक्षण, परीक्षण करणे व स्वतःची क्षमता वाढवणे आवश्यक असते. या साठी आपण स्वतः बरोबर राहणे आवश्यक असते. या साठी सर्वात उत्तम उपाय मौन आहे. मौनात सुरुवातीला अनेक विचारांचे जणू युद्धच होते. पण हळूहळू ते शांत होते. आणि या शांत मनात जे सकारात्मक ऊर्जेचे तरंग उठतात ते जग व्यापून टाकतात. म्हणजेच आतील व बाहेरील ऊर्जा यातील अंतर कमी होऊ लागते.

हे अंतर कमी होणे या साठी मन शांत होणे आवश्यक असते. त्या साठी पुढील गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.

१) दोन वेळा मेडिटेशन करणे

स्वतः बरोबर राहण्यासाठी विचारांना शांत करावे लागते त्या साठी मेडिटेशन आवश्यक आहे. सलग ४० दिवस रोज दोन वेळा मेडिटेशन केले तर मानसिक ताकद प्रचंड वाढते. आपल्या समस्या दूर होतात. आपल्याला सूचना ( इंट्युशन ) मिळतात. आपण निरोगी होतो.

२) निसर्गात जाऊन निसर्गाची प्रशंसा करणे. निसर्ग चमत्कार लक्षात घेणे.

आपण बऱ्याच गोष्टी जन्मापासून बघत असतो. जसे वारा, पाऊस, फुले, ऊन, सुगंध पण त्या कडे फार लक्ष देत नाही. हे सगळे जागरूकतेने बघावे. त्याचे कौतुक करावे. गवतावर चालावे, झाडाला मिठी मारावी, झऱ्यात नदीत वाहत असलेल्या पाण्यात पाय सोडावेत. ऊन अंगावर घ्यावे. वारा भरून घ्यावा. निसर्गाशी एकरूप व्हावे. यातून आपल्याला निसर्गशक्ती मिळते.

३) आज किमान  तास कोणा विषयी पूर्वग्रह ठेवणार नाही.

आपण आपले अनुभव, इतरांनी केलेली वर्तणूक, देवाण घेवाण अशा अनेक कारणांनी प्रत्येकाला एक किंवा अनेक लेबल्स लावून टाकतो. त्या मुळे कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा कोणीही समोर आले तरी प्रथम आपण लावलेले लेबल समोर येते. हेच आपल्याला दूर ठेवायचे आहे. सर्वांकडे नवीन दृष्टीने बघायचे. भूतकाळ, त्यातील घटना, भूतकाळात घडलेले विसरून जायचे. आणि पुढे काय होईल या विचारला दूर ठेवायचे. जितके जास्त विचार तितक्या जास्त अडचणी. म्हणून सगळ्यांकडे त्रयस्थपणे बघायचे व वागायचे.

वरील तीन गोष्टींचा अवलंब करुन आपण आपल्यातील क्षमता वाढवू शकतो.

तर मग आपल्यातील क्षमता वाढवू या.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आत्मविश्वास… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ आत्मविश्वासकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

तरुण वयात, उमेदीच्या काळात स्वतःची महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती आणि क्षमता यावर ठाम विश्वास असतो. अशावेळी काही भरीव कामगिरी, समाजोपयोगी काही मोठे कार्य करण्याची उर्मी असते. पण अशावेळी समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा विरोध, अडथळे यांचा सामनाही करावा लागतो. शेवटी स्वप्न अर्धवट सोडायची देखील वेळ येते. अशा काही चांगलं करू पाहणाऱ्यांचा संघर्ष डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ” आत्मविश्वास ” या त्यांच्या कवितेत मांडला आहे. आज आपण या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत

☆ आत्मविश्वास ☆

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

 

झेपावलो —- विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची —

— ब्रह्मांडाला गंवसणी घालायची

 

घेतांना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता

अन् तरीही असहाय्यता

क्षितिजाला गंवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

 

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षासी विस्तीर्ण

व्योमाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची —-

— त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

 

क्षण आला वज्रासारखा

निष्ठुरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन् त्या अभेद्य कवचाकडे

पकडू ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

 

मात्र,

जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन् त्यावर बसून

खंवटपणे वेडावणारे

खत्रूड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

 

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

—– जाणवलं —–

मग मात्र ढेपाळलो

पंखांतील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

पंख फुटले बळकटसे

रंगेबेरंगी पिसांचे

मोठ्या अभिमानाने अन् कौतुकाने

वळवून डौलदार मान

नजर टाकली त्यांच्याकडे

हरखून गेलो पाहून

त्यांच्यावरचे अभेद्य कवच

मुक्तछंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील ही कविता पूर्ण रूपकात्मक आहे. अतिशय कर्तबगार, महत्त्वाकांक्षी तरुणासाठी रंगीबेरंगी पिसांच्या देखण्या पक्षाचे रूपक योजले आहे. त्या पक्षाच्या वर्णनातून त्या महत्वाकांक्षी तरूणाचे यथार्थ वर्णन केलेले आहे. पक्षी मोठ्या अभिमानाने आपली डौलदार मान वळवून आपल्या रंगीत पिसांकडे पहातो. त्यांच्या बळकटपणाचे त्याला फार कौतुक वाटते. आपल्या पिसांचा त्याला फार अभिमान वाटतो.

तसाच कवी तरुण सळसळत्या उत्साहाचा आहे. चांगले शिक्षण घेतले. मनात जबरदस्त इच्छाशक्ती आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास असणारा तो ‘काय करू आणि काय नको ‘ अशी त्याची अवस्था आहे.  त्याच्या वागण्या बोलण्यात आपल्या प्राविण्याने, क्षमतांमुळे एक प्रकारचा रुबाब दौल आहे. त्याच्या कृतीतून ती ऐट, अभिमान डोकावतो हे डौलदार मान वळवणे या शब्दातून व्यक्त होते. असा तो आपल्याशी भरभरून बोलतो आहे.

झेपावलो… विस्तीर्ण आकाशी

विसंबून त्या पंखांच्या बळावर

मनात आकांक्षा

विजिगीषु गगनभरारीची….

… ब्रम्हांडाला याची गवसणी घालायची

कवीने विस्तीर्ण आकाशात झेप घेतली. त्याला आपल्या क्षमतांवर, कार्यकर्तृत्वावर अतूट विश्वास होता. त्यांच्या भरवशावरच त्यांनी या ब्रम्हांडाला गवसणी घालण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत जग जिंकण्याच्या जबरदस्त महत्वाकांक्षेने गगनभरारी घेतली. सर्वसमावेशक असे काहीतरी मोठे भव्यदिव्य करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने ही झेप घेतली होती.

घेताना वेध शब्दजाचा

जाणवली त्याची अथांगता 

अन् तरीही असहायता ?

क्षितिजाला गवसणी घालून

आपल्या कवेत सामावण्याच्या

एका केविलवाण्या प्रयत्नाची

गगनभरारी तर घेतली खरी पण या विस्तीर्ण आकाशाची अथांगता अनुभवल्यावर अवघे क्षितिज आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न केविलवाणे वाटू लागले आणि असहाय्यता जाणवू लागली.

कवीच्या मनाने सर्वांच्या उद्धारासाठी काहीतरी मोठे समाजकार्य करण्याचे ठरवून मनाने भरारी घेतली होती. पण त्याची विस्तीर्ण कार्यकक्षा, त्यासाठी करावे लागणारे प्रचंड कार्य, नियोजन यांचा आवाका बघून कवीला थोडी असहाय्यता जाणवू लागली. त्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडतील का असेही वाटू लागले.

हबकलो क्षणभर

नजरेच्या कवेपेक्षाही विस्तीर्ण

जीवनाच्या दर्शनाने

तरी आत्मविश्वास मात्र

आशेची कास धरून होता

पंखांमधल्या ताकतीची…

….. त्यांच्यावरच्या अभेद्य कवचाची

आपल्या दृष्टीच्या आवाक्यापेक्षाही विस्तीर्ण अंतरिक्ष म्हणजेच आपले अफाट कार्यक्षेत्र पाहून कवी थबकलाच. पण क्षणभरच. आपल्याला हे कार्य जमेल की नाही असेही क्षणभर त्याला वाटले. पण तेही क्षणभरच.  कारण त्याचा आपल्या कर्तृत्वावर, क्षमतांवर, निर्णयावर गाढ विश्वास होता. त्यामुळेच हे कार्य आपण निश्चितपणे करू शकू ही ठाम आशा तो मनात बाळगून होता.

क्षण आला वज्रासारखा

निष्ठूरपणे भेदून टाकायला जेव्हा

मनाचाच आत्मविश्वास

साहजिकच नजर वळली

पंखांकडे, पिसांकडे

अन त्या अभेद्य कवचाकडे

पकडून ठेवायला निसटणारा आत्मविश्वास

कुणीही आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही वेगळे करत असेल तर त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. पण तो जर दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काही उदात्त हेतूने चांगले कार्य करू पहात असेल तर मात्र काही विघ्नसंतोषी माणसे त्याच्या मार्गात आडवी येतात. त्याला यश मिळू नये म्हणून ते छुपी कारस्थाने करून त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. तो स्वतःच मनाने खचून हे कार्य थांबवेल असे त्यांना वाटत असते. त्यासाठी आत्मविश्वास ढळेल अशी परिस्थिती ते निर्माण करतात .पण आपला आत्मविश्वास शाबूत ठेवण्यासाठी तो आपल्या क्षमता, मनोनिग्रह, आपले नियोजन यासर्व गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पहातो आणि आपल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो.

मात्र जेव्हा का दिसले ते काळे ढग

त्याच्यावर स्वार

भेदक सौदामिनी

अन त्यावर बसून

खवटपणे वेडावणारे

खत्रुड डोमकावळे

तेव्हा मात्र धास्तावलो

जेव्हा त्याने पाहिले, आपल्या विरुद्ध समाजातील नकारात्मक प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. अशा नकारात्मक प्रवृत्तींना खतपाणी घालून त्यांचे उदात्तीकरण करण्याचा कुटील उद्योग काहीजण करत आहेत. अशी माणसे स्वतःचे महत्त्व शाबूत ठेवण्यासाठी आणि समाज एकत्र येऊ नये म्हणून काहीही करून समाजात फूट पाडत आहेत. चांगल्याच्या पायात खोडा घालणे हाच त्यांचा उद्देश बघून तो धास्तावून गेला.

इथे काळे ढग म्हणजे समाजातील या नकारात्मक प्रवृत्ती, त्यांचे झगमगते उदातीकरण म्हणजे भेदक सौदामिनी आणि आपले समाजातले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा बिनधास्त वापर करणारे आपमतलबी लोक म्हणजे डोमकावळे या रूपकांमधून कवीने समाजातील या दुष्प्रवृत्तींचे अचूक वर्णन केलेले आहे.

विश्वास सारा

कर्तव्याच्या पंखांचा

कर्मांच्या पिसांत

आणि संस्कारांच्या कवचात

 

पण हे सगळंच

ठिसूळ ठरतंय

डोमकावळ्यांना मिळालेल्या

विचित्र भेसूर वरदहस्तानं

………. जाणवलं……….

 मग मात्र ढेपाळलो

पंखातील शक्ती ढासळू लागली

आता भीती एकच

आत्मविश्वासाला तडा गेलेले

संस्काराच्या कवचाचे पंख

सुरक्षित नेतील का

परत घरट्यात तरी ?

कवी धास्तावला होता. तरीही त्याचा स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरचा, स्वतःवरील संस्कारांवरचा विश्वास ठाम होता. पण जेव्हा कवीने हे पाहिले की, ‘ जे आपमतलबी लोक असे अडथळे आणत आहेत, लोकआंदोलन  घडवून आणत आहेत त्यांना विरोध करायचं सोडून लोक त्यांनाच पाठिंबा देत आहेत आणि ज्यांच्यासाठी कवी चांगले उदात्त काही करू पाहतोय त्यालाच  त्यांचा पाठिंबा मिळत नाही. त्या विरुद्ध काही केले तरी आपली ताकद कमी पडते आहे,’ तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास पूर्ण ढेपाळला.

या सर्व नकारात्मक प्रवाहात आपण वहावत तर जाणार नाही ना कुठे, अनवधानाने प्रलोभनांना बळी तर पडणार नाही ना अशी त्याला आता वेगळीच भीती वाटू लागली. आपली तत्त्वे, आपले संस्कार यांच्या आधाराने आपण घरात तरी सुरक्षित राहू शकू की नाही अशी शंका सतावू लागली.

एखादा वेगळा उद्योग सुरू करून जम बसवलाय,  चांगली संस्था सुरू केलीय अन् ती लोकप्रिय होतेय असे पाहिले की त्याला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी काही विघ्नसंतोषी माणसे कशी खोडा घालतात, त्यांच्याविरुद्ध लोकांना भडकवतात अशी उदाहरणे आपण समाजात नेहमी बघत असतो. आपल्या चांगल्या कामामुळे काही लोक यशस्वी होतात, समाज मान्यता मिळवतात हे अशा काही जणांना खटकते आणि ते त्यांना बदनाम करून त्यांच्या कामात विघ्न आणून स्वतः समाजात मोठे होतात. सतत आपले वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करतात.

या कवितेत रुबाबदार देखणा पक्षी म्हणजे तो ध्येयासक्त, महत्वाकांक्षी तरूण, काळे ढग म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तींचे उदात्तीकरण म्हणजे भेदक सौदामिनी, समाजातले आपले महत्त्व, ताकद कमी होऊ नये म्हणून कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करणारे आपमतलबी लोक म्हणजे हे डोमकावळे या रूपकांमुळे कवीची भूमिका अचूक आणि  स्पष्टपणे विशद होते.

अभेद्य म्हणजे भेदण्यास कठीण असे कवच, विजिगीषु  गगनभरारी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार या विश्वासाने घेतलेली झेप, ब्रम्हांडाला क्षितिजाला गवसणी म्हणजे अतिशय अशक्य गोष्ट करायला धावाधाव करणे, शब्दज म्हणजे आकाश, अथांगता, व्योम म्हणजे अंतरिक्ष, वज्र म्हणजे कठोर, भेदक सौदामिनी, खत्रूड म्हणजे कृश मरतुकडे डोमकावळे यासारखे आशयघन अनोखे शब्द अचूक वापरल्याने कवितेला एक छान शब्दवैभव प्राप्त झालेले आहे. अशा रीतीने समाजोध्दार किंवा चांगली समाजसेवा करू पहाणारा आणि समाजविघातक प्रवृत्ती यांच्यातल्या संघर्षाची कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘आत्मविश्वास’ या कवितेत अतिशय परिणामकारकपणे सांगितलेली आहे.

रसास्वाद:

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

Scam *401

२ दिवसांपूर्वी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मला एक काॅल आला. त्याने म्हटले की तो Blue Dart कंपनीतून बोलतोय, माझं एक कुरीयर आले आहे, deliver boy ला माझा address सापडत नाहीये आणि माझा फोनही लागत नाहीये. तर मी तुम्हाला delivery boy चा नंबर sms करतो, तुम्ही त्याला फोन करुन guide करा.

त्याने दिलेला नंबर होता *401 आणि मग(दहा आकडी नेहमीप्रमाणे मोबाईल नंबर, मी विचारले हे 401 काय आहे तर म्हणाला तो त्या delivery boy चा specific extension नंबर आहे, पुढचा नंबर कंपनीचा आहे. 

मला आलेली शंका माझ्या दुर्दैवाने मी बाजूला सारली आणि त्या नंबर वर काॅल केला, तर मला माझा नंबर divert केला जात आहे अशी टेप ऐकू आली आणि त्यानंतर एका तासातच माझे WhatsApp account, hack करण्यात आले. माझ्या नावाने माझ्या WhatsApp account वरुन अनेक लोकांना पैशाची मागणी करणारे मेसेज गेले, मला साधारण ४५ मिनिटांनी हा प्रकार कळला, तेवढ्या वेळात माझा फोन hacker च्या नंबरवर फिरवण्यात आल्या मुळे मला कुणाचेही काॅल येऊ शकले नाही. 

झाल्या प्रकरणामुळे प्रचंड मनस्ताप झाला , मला माझा नंबर तात्पुरता deactivate करावा लागला त्यानंतर पोलिस कंप्लेंट, नवीन SIM card अशी बरीच उस्तवार करावी लागली.

नशीब कोणी मी समजून hackers ला पैसे नाही पाठवले. 

हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धडा होता आणि मला लागलेली ठेच अजून कोणाला लागू नये यासाठी हा पोस्ट प्रपंच.

मी यानंतर *401 या कोडबद्दल गुगल गुरुंकडून माहिती घेतली असता कळलं कि या कोड मुळे मी स्वतःच्या फोन ला hackers च्या नंबरवर divert करण्याची order दिली आणि मग त्याने फोन काॅल वरुन WhatsApp code घेउन माझं WhatsApp स्वतःच्या फोनवर घेतलं. आणि पुढचं रामायण धडलं.

मी याआधी Facebook वर बर्याच posts पाहिल्या होत्या ज्यात त्यांनी लिहिले होतं कि त्याचं account हॅक झालं आहे पण कसं झालं ते कोणीही लिहिले नव्हतं, जर या कोड बद्दल आधी माहिती असती तर बरं झालं असतं अर्थात हे उशीरा सुचलेले शहाणपण होतं तर कृपा करुन ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि असल्या प्रकारांना बळी पडू नका. 

लेखिका : शर्वरी अभ्यंकर

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print